मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र-  “सी मिस्टर लिमये, फॉर मी हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो ऑफ फंडस् रेगुलरली फ्रॉम अॅब्राॅड. हा प्रश्न प्रिन्सिपलचा होता. तरीही वुईथ एक्स्ट्रीम डिससॅटिस्फॅक्शन त्यादिवशी मी त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार ८५०/-रुपये पाठवून दिले. इट्स नाईस यू कम हिअर पर्सनली टू मीट मी. सो नाऊ मॅटर इज ओव्हर फॉर मी. सो प्लीज हे पैसे घ्यायचा मला आग्रह करू नका. माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे आॅर आदर. “

यात न पटण्यासारखं काही नसलं तरी मला ते स्वीकारता येईना “मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास आहे मॅडम. माय गॉड ऑलसो वुईल स्क्वेअर अप माय लॉस इन हीज ओन वे. प्लीज एक्सेप्ट इट मॅडम. प्लीज फॉर माय सेक”)

त्या हसल्या. अव्हेर न करता त्यांनी ते पैसे स्वीकारले. तरीही ८५०/- रुपये गेले कुठे ही रुखरुख मनात होतीच. पण ती फार काळ टिकली नाही. कारण मी परत येताच सुहास गर्दे सुजाताला घेऊन माझ्या पाठोपाठ माझ्या केबिनमधे आले. जे घडलं त्यात चूक सुजाताचीच होती आणि तिला ती कन्फेस करायची होती.

“समोरची गर्दी कमी झाल्यावर त्या दिवशी सुजाताने ‘लिटिल् फ्लॉवर’ची कॅश मोजायला घेतली होती. ” सुहास गर्दे सांगू लागले. ” पन्नास रुपयांच्या नोटा मोजायला तिने सुरुवात केली तेवढ्यात पेट्रोल पंपाचा माणूस पेट्रोल खरेदीच्या अॅडव्हान्स पेमेंटच्या डी. डी. साठी कॅश भरायला धावत पळत येऊन तिच्या काउंटर समोर उभा राहीला. नेहमीप्रमाणे त्याला डी. डी ताबडतोब हवा होता. कॅश मोजून घेतल्याशिवाय डीडी देता येत नव्हता. कॅश-अवर्स संपत आलेले. त्यात सुजाताला रुटीन मेडिकल चेकअपसाठीची अपॉइंटमेंट असल्याने काम आवरून जायची घाई होती. त्यामुळे ‘लिटिल् फ्लॉवर’ची नुकतीच मोजायला सुरुवात केलेली कॅश नंतर मोजायची म्हणून तिने तशीच काउंटरवर बाजूला सरकवून ठेवली आणि पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली. त्यात नेहमीप्रमाणे एक रुपयापासून शंभर रुपयापर्यंतच्या नोटांचा खच होता आणि त्याही सगळ्या जुन्या नोटा! ती कॅश गडबडीने मोजून झाली तेव्हा तिच्या लक्षात आले की त्यात आठशे पन्नास रुपये जास्त आहेत. नाईलाजाने पुन्हा सगळी कॅश मोजून तिने खात्री करून घेतली आणि मग शिक्का मारलेल्या रिसिटबरैबर जास्ती आलेले ८५०/- रुपयेही पेट्रोल पंपाच्या माणसाला तिने परत केले आणि ‘लिटिल् फ्लावर’ची कॅश मोजायला घेतली. ती कॅश मोजून झाल्यावर त्यात ८५०/- रुपये कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. आधी अर्धवट मोजून बाजूला सरकवून ठेवलेल्या त्या कॅशमधल्या पन्नास रुपयांच्या १७ नोटा पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली तेव्हा त्यात अनवधानाने मिसळून गेल्याने त्यात ८५०/- रुपये जास्त येत होते. हा घोळ लक्षात येताच सुजाता घाबरली. कारण तोवर पेट्रोल पंपाचा ड्राफ्ट काढायला आलेला माणूस ड्राफ्ट घेऊन परत गेला होता. “

“तो माणूस रोज बँकेत येणार आहे ना? “

“नाही सर. रोज त्यांचे दिवाणजी येतात. शनिवारी ते रजेवर असल्याने दुसऱ्या नोकराला पाठवलं होतं. “

” ठीक आहे, पण पेट्रोल पंपाचे मालक तुमच्या ओळखीचे आहेत ना? त्यांना भेटून त्याच दिवशी हे सांगायला हवं होतं ना लगेच. “

“हो सर.. पण.. ” बोलता बोलता सुहास गर्दे कांही क्षण मान खाली घालून गप्प बसले.

” मी इतर दोन-तीन स्टाफ मेंबर्सना घेऊन शनिवारी लगेच तिथे गेलो होतो सर. पण… “

“पण काय? “

“त्या नोकराने सरळसरळ हात वर केले. ८५०/- रुपये मला परत दिलेच नव्हते म्हणाला. मालकाने त्याला दमात घेतलं तेव्हा पॅंटचे खिसे उलटे करून दाखवत त्याने रडतभेकत कांगावा सुरू केलान्. “

“म्हणून मग तुम्ही मिस्. डिसोझाना फोन केलात? ही चूक कॅश काऊंटिंगमधे झालेल्या चुकीपेक्षा जास्त गंभीर होती सुहास. ” ती कशी हे मी त्यांना समजून सांगितलं. मी त्यांना त्यांचे पैसे परत करायला गेलो तेव्हा तिथं जे जे घडलं त्या सगळ्याची त्यांना कल्पना दिली. ते सगळं ऐकताना सुजाताची मान शरमेनं खाली गेली होती. तिचे डोळे भरून आले होते. ती असहायपणे उठली. न बोलता जड पावलांनी बाहेर गेली.

त्यानंतर पगार झाला त्यादिवशी मनाशी कांही ठरवून सुजाता केबिनचे दार ढकलून बाहेर उभी राहिली.

” मी आत येऊ सर? ” तिने विचारलं. ती बरीचशी सावरलेली होती.

“ये.. बैस. काय हवंय? रजा? ” ती कसनुसं हसली. मानेनंच ‘नाही’ म्हणाली. मुठीत घट्ट धरुन धरलेली शंभर रुपयांची नोट तिने माझ्यापुढे धरुन ती कशीबशी उभी होती.

“हे काय? “

” सर.. ” तिचा आवाज भरुन आला. “तुम्ही होतात म्हणून त्यावेळी मला सांभाळून घेतलंत सर. माझ्याऐवजी तुम्ही स्वतः पैसे भरलेत. त्यावेळेस खरं तर ते मी स्वतः भरायला हवे होते पण तेव्हा तेवढे पैसे नव्हते माझ्याजवळ. आता दर महिन्याला थोडे थोडे करून ते मी परत करणाराय सर… ” ती म्हणाली.

ऐकलं आणि मी मनातून थोडासा हाललो. याच सुजाताबद्दल क्षणभर कां होईना पण माझ्या मनात संशय निर्माण झालेला होता. नशीब रागाच्या भरात मी तो बोलून दाखवला नव्हता. नाहीतर….? नुसत्या कल्पनेनेच मला अस्वस्थ वाटू लागलं. नकळत कां होईना योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याचं समाधान त्या अस्वस्थतेइतकंच मोलाचं होतं! घडून गेलेल्या आत्तापर्यंतच्या या सगळ्या प्रसंगांच्या मालिकेचा हा समाधानकारक समारोप आहे असं मला वाटलं खरं, पण ते तसं नव्हतं. मी सुजाताची समजूत घातली. पैसे परत करायची आवश्यकता नाहीये हे तिच्या गळी उतरवायचा प्रयत्न केला. पण तिला ते पटेना. अखेर मिस् डिसुझांना जे उत्स्फूर्तपणे सांगितलं होतं तेच सुजाताला सांगावंसं वाटलं. म्हटलं, “सुजाता, तुला माझे पैसे परत करावेसे वाटले हेच मला खूप महत्त्वाचं वाटतं. पण अशी ओढाताण करून तू ते पैसे परत करायची खरंच काही गरज नाहीये. तुला माझं नुकसान होऊ नये असं वाटतंय ना? मग झालं तर. मिस्. डिसोझांना सांगितलं तेच तुला पुन्हा सांगतो, तू खरंच काळजी करू नकोस. माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे ऑर अदर. माझं म्हणणं नाराजीने स्वीकारल्यासारखी ती उठली. मला वाटलं, या सर्वच प्रकरणाला मी योग्य पद्धतीने पूर्णविराम दिलाय. परंतु ते तसं नव्हतं. तो पूर्णविराम नव्हे तर अर्धविराम होता, हे मला कुठं ठाऊक होतं? प्रत्येकाच्याच विचारांचा आणि मनोभूमिकांचा कस पहाणाऱ्या या प्रसंगांचे धागेदोरे भविष्यात घडू पहाणाऱ्या अतर्क्याशी जोडले गेलेले आहेत हे त्या क्षणी कुणालाच ज्ञात नव्हतं, पण पुढे घडू पहाणारं, माझ्या मनावर आनंदाचा अमीट ठसा उमटवणारं ते अतर्क्य योग्य वेळेची वाट पहात होतं हे पुढं सगळं घडून गेल्यानंतर मला समजलं तेव्हा मी अंतर्बाह्य थरारून गेलो होतो! ! इतक्या वर्षानंतर आज ते सगळं असं आठवणंसुद्धा माझ्यासाठी खूप आनंददायी आहे!

सुजाताला तिची समजूत घालून मी परत पाठवलं आणि कामाचा ढीग उपसायला सुरुवात केली. तो दिवस मावळला. पुढचे कांही दिवस रोज नवे नवे प्रश्न सोबत घेऊन येणारे नेहमीचे रुटीन पुन्हा सुरू झाले. तो प्रसंग पूर्णतः विस्मरणांत जाणं शक्य नव्हतंच. पण तरीही वाढत्या कामांच्या ओघात तो प्रसंग, त्याची जाणीव आणि आठवण सगळंच थोडं मागं पडलं. पुढे बरेच दिवस मधे उलटले आणि त्या प्रसंगाची पुन्हा आठवण व्हायला माझ्या आईचं अचानक माझ्याकडे रहायला येणं निमित्त झालं.

मी सोलापूरला फॅमिली शिफ्ट केलेली नव्हती. पण बऱ्यापैकी मोठी आणि सोयीची जागा भाड्याने घेतलेली होती. कधी शाळेला सुट्ट्या लागल्या की आरती/सलिल, तर कधी शक्य असेल तेव्हा आई तिकडे येऊन रहात. आई आली तोवर ‘लिटिल फ्लाॅवर’च्या घटनेला तीन आठवडे उलटून गेले होते. पण आई येणार म्हटलं तेव्हा त्या घटनेची हटकून आठवण झाली त्याला कारण म्हणजे माझ्या बचत खात्यात शिल्लक असलेले ते फक्त पाच रुपये! त्याशिवाय खिशात होती ती जेमतेम दीड दोनशे रुपये एवढीच रोख शिल्लक. आई आल्यावर आमचा दोन्ही वेळचा स्वैपाक ती घरीच करणार म्हणजे आवश्यक ते सगळं सामान आणणं आलंच. हा विचारच त्या घटनेची आठवण ठळक करून गेला. ‘पण आता ते विसरायला हवं. निदान ते सगळं आईला सांगत बसायला तर नकोच. ‘असा विचार करून पाच-सहा दिवसांनी पगार होणार असल्याने तोवर पुरेल एवढ्याच आवश्यक वस्तू मी आणून दिल्या. त्यानंतर खिशात शिल्लक राहिली फक्त शंभर रुपयांची एक नोट!

त्या शंभर रुपयांच्या नोटेतच पुढे घडू पहाणाऱ्या आक्रिताचे धागेदोरे लपलेले होते हे त्याक्षणी मात्र मला माहित असायचा प्रश्नच नव्हता!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पुण्य म्हणजे नक्की काय असतं..?… लेखिका : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

💥 मनमंजुषेतून 💥

☆ पुण्य म्हणजे नक्की काय असतं..?… लेखिका : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

लहानपणी अनेकदा ‘असं का करायचं? ‘ या प्रश्नाला उत्तर असायचं “पुण्य मिळतं म्हणून! ” आणि ‘असं का नाही करायचं’ याचं “पाप लागतं म्हणून” असं उत्तर हमखास मिळायचं. पण पाप आणि पुण्य कसं ओळखायचं याचं उत्तर मनाशी निगडित आहे, नव्हे, पाप आणि पुण्याच्या तारा दुसऱ्याच मनाशी जोडलेल्या आहेत हे सत्य समजायला वयाची कित्येक वर्षे जावी लागली. या अशाच दिवसांची ही गोष्ट!

गणपतीचे दिवस आले की मला ती जेमतेम पाच- पावणेपाच फुटाची बटुमूर्ती आठवते. अवघ्या दु:खाचा प्रदेश जिथवर पसरला असावा आणि समस्त सोशीकपणाची सीमा जिथून सुरू होत असावी असा तो समईतल्या सरत्या ज्योतीसारखा चेहरा आठवतो. सुकत चाललेल्या रोपट्यासारखी, विटकरी लुगड्यातली ती कृश देहयष्टी डोळ्यांसमोर येते. दात नसलेल्या तोंडावरचं ते गोड हसू आठवतं. समोरच्या रस्त्यावरून येणारी-जाणारी माणसे बघत, दाराशी एकटीच बसलेली ती दीनवाणी मूर्ती दिसते. पागोळ्यांमुळे छपराखाली खळगाही व्हावा आणि भरूनही निघावा तसं काहीसं होतं.

तर अशा त्या माझ्या आजेसासूबाई, मनूताई! लहानपणी पायाला गळू झालं. त्या काळाच्या उपायांप्रमाणे त्यावर जळू लावली गेली. का तर जखमेतला अशुद्ध द्रव शोषून घेते म्हणून. थोड्या वेळाने ती ओढून काढायची होती पण कामाच्या नादात घरातली मंडळी विसरली, अशुद्ध रक्तानंतर त्या जळवेने पायातले शुद्ध रक्तही ओढून घेतले आणि मनूताईचा उजवा पाय कायमचा अधू झाला. तरीही लग्न झालं, संसार झाला, मुलंबाळं झाली. पण वयाच्या तिसाव्या वर्षीच वैधव्य पदरी पडलं. मुलं शिकली सवरली पण वृक्ष वाढत रहावा आणि त्याच्या बुंध्याशी असलेल्या पाराला चिरा पडत रहाव्यात तसं होत राहिलं. वृक्षाचा पाचोळा, पारावरचं अश्राप देऊळ निमूट झेलत राहिलं.

माझ्या मुलीचं, सोनलचं बारसं झाल्यावर मी आजींना माझ्याबरोबर पुण्याला घेऊन आले. वैधव्य आल्यानंतर त्या काळी ज्या जनरीती पाळल्या जात असत त्या बिनबोभाट पाळणारा, द्रव्यहीन, कुचंबलेला, कित्येक वर्षे घराबाहेर न पडलेला हा एकाकी, लहानखोरा जीव आनंदाने माझ्याबरोबर यायला तयार झाला यामागचे कारण मला सहजी कळण्यासारखेच होते.

जेवायच्या वेळी त्या खाली बसत आणि आम्ही दोघे डायनिंग टेबलवर. असे दोन- तीन दिवस गेल्यावर मला राहवेना. “आजी तुमचा काही असा नियम आहे का की खाली बसूनच जेवायचं? ” जुन्या धारणांना आपला धक्का बसू नये अशा मर्यादेने मी विचारले.

निर्मळ हसून त्या म्हणाल्या, ” नाही ग, तसं काही नाही, पण सवय नाही आणि मला टेबल उंच पडतं ना! “

त्यांच्या उंचीची अडचण लक्षात आल्यावर मी त्यांच्या खुर्चीसाठी एक चौकोनी, जाड उशी करून घेतली आणि माझे मिस्टर त्यांना उचलून खुर्चीत बसवू लागले.

माहेरून मी सी. के. पी. असल्याने मांसाहारी आहे हे त्यांना माहीत होतं. त्यांना वाटलं होतं की माझ्याकडे रोजच तसा स्वयंपाक असणार. दोन तीन दिवस माझ्या ताटात शाकाहारी जेवण बघून, माझ्याकडे पाहात त्यांच्या सायीसारख्या आवाजात त्या मला हळूच म्हणाल्या, ” संजीवनी, तुझ्या पानात ते ‘तुमचं’ काही दिसत नाही? माझ्यासाठी तुझा पोटमारा करू नकोस हो, तुला हवं ते तू आपली खुशाल करून खात जा. “

मी थक्क झाले. ट्रिपला गेल्यावर माझ्या पानातलं नॉनव्हेज पाहून नाकतोंड वाकडं करणाऱ्या, पलीकडच्या टेबलावर जाऊन जेवणाऱ्या काही मैत्रिणी मला आठवल्या. सासऱ्यांना आवडतो म्हणून (वेगळ्या भांड्यांत, आपल्या परवानगीनेच) करावासा वाटणारा सामिष सैपाक सुरू केल्यापासून पार मागची आवराआवर होईपर्यंत जवळच्या देवळात जाऊन बसलेल्या सासूबाई आठवल्या. ही तर माझ्या दोन पिढ्या आधीच्या, शुद्ध ब्राह्मणी संस्कारात वाढलेली बाई! तिचं मऊ मन माझ्या मनाला एखाद्या शीतल झुळुकीसारखं स्पर्शून गेलं आणि डोळ्यात पाणी भरून आलं.

गणपतीचे दिवस जवळ आले होते. आमच्या घराच्या पाठीमागच्या मंडपात सजावटीची तयारी जोरात चालू होती. खिडकीजवळ एक उंच स्टूल ठेवून त्यावर मी त्यांना बसवत असे. तिथून ते सगळे छान दिसत असे. ती सजावट बघताना त्या म्हणाल्या, ” किती वर्षे ऐकत आले पुण्यातल्या गणपतींबद्दल! फार बघण्यासारखे असतात ना? बरं झालं, बसल्या जागेवरूनच या गणपतीचं तरी दर्शन होईल आता मला. ” ऊन-पावसासारखा त्यांच्या चेहऱ्यावर खंत आणि आनंदाचा लपंडाव पाहिला मी. आपल्या पांगळेपणाची इतकी खंत त्यांना आजवर कदाचित कधीही वाटली नसावी.

आमच्या प्रेमनगर कॉलनीतल्या एकांची रिक्षा होती हे मला ऐकून माहीत होतं. मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेले. नवा नवाच संसार होता आमचा. सांपत्तिक स्थिती बेताचीच होती. पण त्यांना म्हटले, “काका, गणपतीच्या पाचव्या दिवशी मला रिक्षेतून माझ्या आजेसासूबाईंना गणपती दाखवायला न्यायचे आहे, दुपारी चार ते साधारण सात वाजेपर्यंत. जमेल का तुम्हाला? त्यांना अधू पायामुळे जास्त चालता येत नाही. ” काकांचा होकार आला. ह्यांनी सोनलला सांभाळायची जबाबदारी घेतली आणि बेत पक्का झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी आजींना म्हटले, “आजी, दुपारी चार वाजता आपल्याला बाहेर जायचं आहे. सोनलच्या बारशाला घेतलेलं निळं इंदुरी लुगडं नेसून तयार व्हा बरं का. “

आजींचा चेहरा कावराबावरा! बिचाऱ्या कोमट आवाजात म्हणाल्या, ” मला फार चालवत नाही ग संजीवनी. कुठं जायचंय? “

“जायचंय जवळच. ” मी म्हटलं.

बरोबर चार वाजता रिक्षा दारात येऊन थांबली. काकांनी आधार देत आजींना रिक्षेत बसवलं. त्यांच्या अंगाभोवती शाल गुंडाळत मी काकांना म्हटलं, “काका ही तुमची आजी आहे असं समजा. जरा हळूच चालवा आणि कमी गर्दीच्या ठिकाणी अशी रिक्षा थांबवा की आजींना रिक्षेतूनच त्या – त्या गणपतीबाप्पांचं दर्शन होईल. जितकं शक्य आहे तेवढं फिरवाल आम्हाला. “

चांगली माणसं अवतीभवती असण्याचा जमाना होता तो! काकांनी रुकार भरत मान हलवली, रिक्षेला किक मारली आणि आमची बाप्पादर्शन टूर निघाली. बरोबर तिघांना पुरेल असा खाऊ डब्यात भरून घेतला होता. पाणी घेतलं होतं आणि फार पाणी प्यायला लागू नये म्हणून लिंबाच्या गोळ्या जवळ ठेवल्या होत्या.

सातारा रोडवरून निघालेली रिक्षा मजल दरमजल करत सिटी पोस्टाजवळच्या दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ येऊन थांबली. जवळपास अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट! आताइतकी अलोट गर्दी होण्याचा काळ नव्हता तो आणि वेळही साडेपाच-सहाची. रिक्षा चौकातल्या उंच स्टेजच्या पायऱ्यांपाशी येऊन थांबली. तो शालीन थाट पाहून डोळे तृप्त झाले. आजच्यासारखी भव्यदिव्य सजावट तेव्हा नव्हती. डोळे दिपवणारा श्रीमंती, भव्य दिव्य देखावाही नव्हता नि दिखावाही नव्हता. त्या मूर्तीचे महात्म्यच कदाचित तेव्हा भाविकांना जास्त मोलाचे वाटत असावे.

स्टेजवर पाच सहा तरुण गप्पागोष्टी करत बसले होते. त्यांनी, रिक्षेतूनच धडपडत दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या, भक्तिभावाने हात जोडणाऱ्या नाजुकशा आजींना बघितले. दोघेतिघे पटापट खाली आले आणि त्यातल्या एकाने लहान बाळाला उचलून घ्यावे तसा, तो चिमणासा देह हातांवर उचलून, पायऱ्या चढून चक्क बाप्पांच्या अगदी चरणांपाशी उभा केला. आम्हालाही वर बोलावले. आजवर जिचे त्यांनी फक्त वर्णन ऐकले होते अशी ती सुविख्यात, भव्य मूर्ती, इतक्या जवळून, याचि देहि याचि डोळा बघताना, तिच्या पायांजवळ डोके टेकवताना आजींच्या सुरकुतल्या गालांवरून घळाघळा आसवांच्या धारा ओघळत होत्या आणि मी बाप्पांच्या ऐवजी आजींचा अश्रूंतून वाहणारा आनंद आनंदाने बघत होते. किती रूपात दिसतो नाही देव आपल्याला?

रिक्षेत बसल्यावरही किती तरी वेळ वाहात होते ते थकलेले वयस्क डोळे! माझा घट्ट धरून ठेवलेला हातच काय ते बोलत होता. मागे वळून काकांनी म्हटले, ” काय आजी, खूश ना? अहो दगडूशेठ गणपतीच्या पायांना हात लावायला मिळाला तुम्हाला! असं पुण्य कुणाला मिळतं का? ” 

आजी डोळे पुसत म्हणाल्या, “अहो, माझ्यासारख्या लंगड्या बाईला कधी पुण्यातले गणपती बघता येतील असं जल्मात वाटलं नवतं. देव तुम्हा दोघांचं खूप कल्याण करेल हो! मला देव दाखवलात तुम्ही! “

तोवर न उमजलेली, ‘ एकाच्या आनंदाच्या कारणाच्या तारा दुसऱ्या मनाच्या मुळाशी जुळल्या की तिथे जे झंकारतं ते पुण्य असतं ‘ ही व्याख्या तेव्हा आकळली मला आणि त्यासाठी फार काही तप करावं लागत नाही ही गोष्टही कळलीच! !

लेखिका : सुश्री संजीवनी बोकील

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यो मां पश्यति सर्वत्र। ☆ श्री हेरंब देऊळकर ☆

श्री हेरंब देऊळकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ यो मां पश्यति सर्वत्र। ☆ श्री हेरंब देऊळकर ☆

यो मां पश्यति सर्वत्र l

सर्वं च मयि पश्यति ll

…. श्रीमद्भगवद्गीतेमधल्या श्लोकाचा अर्धा चरण.

सिद्धावस्था प्राप्त झालेल्याची स्थिति या चरणात भगवंतांनी सांगितली. अखिल चराचराशी एकरुपता, अभिन्नत्व, ऐक्याचे म्हणा, वर्णन यात आले.

देवाचे नि प्रसन्नपणे l 

जे जे घडेल बोलणे l 

ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे l 

या नांव प्रासादिक ll

….. अशा ज्या संतांनी प्रत्यक्ष परमेश्वराशी संवाद साधला व ज्यांनी प्रासादिक वाणीने आपल्यासारख्यांच्या आत्यंतिक हितासाठी (श्रेयस् ) कमीत कमी व सोप्या शब्दात जो उपदेश केला तो आपल्यापुढे ठेवावा म्हणून हा लेखनप्रपंच.

अवघी भूते साम्या आली l 

देखिली म्यां कै होती l

विश्वास तो खरा मग l 

पांडुरंग-कृपेचा ll

*

माझी कोणी न धरू शंका l 

ऐसे हो कां निर्द्वंद्व l 

तुका म्हणे जे जे भेटे l 

ते ते वाटे मी ऐसे ll

…… सर्व भूते एकरूप आहेत असे माझ्या डोळ्यांना जेंव्हा दिसेल, तेंव्हाच माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली असे मी समजेन. माझ्याविषयी कोणालाही जरासुद्धा शंका, भय वाटू नये अशी द्वंद्वरहित स्थिती झाली पाहिजे. आपल्या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात जी जी वस्तू दिसेल ती ती माझेच रूप आहे असे वाटले पाहिजे. समर्थ हेच सांगतात…..

कदा ओळखीमाजी दुजे दिसेना l

मनी मानसी द्वैत कांही वसेना l 

बहुता दिसा आपुली भेटी झाली l

विदेहीपणे सर्व काया निमाली ll

एकदा तुकाराम महाराज ज्ञानोबांच्या दर्शनासाठी जात असताना वाटेत शेतात झाडाखाली पक्षी दाणे टिपत होते. महाराजांना पाहून सर्व पक्षी उडाले. तुकारामांना वाईट वाटले, त्यावेळी त्यांच्या मुखातून हा अभंग निघाला. जो पर्यंत पक्षी पुन्हा अंगावर येऊन बसत नाहीत तोपर्यंत महाराज प्राणायाम करून निश्चल उभे राहिले. शेवटी महाराजांचा प्रेमभाव, विश्वात्मक भाव प्रकट झाला.. म्हणजेच किंबहुना चराचर आपणचि झाला असे झाले हे ओळखून सर्व पक्षी पुन्हा खांद्यावर बसले व झाडावर नि:शंक होऊन जसे खेळतात तसे खेळू लागले, तेंव्हा महाराजांचे समाधान झाले.

संत एकनाथ यांचे गाढवाला पाणी पाजणे, संत नामदेवांचे कुत्र्याने चपातीची चवड नेली असता त्यांच्या मागोमाग तुपाची तामली घेऊन धावत जाणे हा समदर्शी भाव झाला. गाढव, कुत्रा आपण म्हणतो, त्यांना त्यांतील चैतन्य दिसले. माऊलींनी निर्जीव भिंत चालवणे, ध्रुवाने प्राणायाम केल्यावर विश्वाचा श्वास थांबणे, कृष्ण गाई- वासरांना रानात नेत असताना वाटेत काटे-कुटे दगड धोंडे टोचत असता त्याचे दु:ख गोपीना होणे … हे सर्व चराचरात्मक भाव जागृत झाल्याचे द्योतक आहे. भगवद्गीता हेच प्रतिपादन करते…

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनी l 

शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ll

सिद्धावस्था अजूनही प्राप्त न झालेल्या साधकाचे मनोरथ सांगून थांबतो……

गंगातीरे हिमगिरीशिला बद्धपद्मासनस्य

ब्रह्मज्ञानाभ्यसनविधिना योगनिद्रां गतस्य l 

किं तैर्भाग्यं मम सुदिवसै: यत्र ते निर्विशंका:

कण्डूयन्ते जरठ हरिणा श्रुंगमंके मदीये ll

….. गंगेच्या तीरी हिमालयाच्या सान्निध्यात बसून पद्मासन इ. आसने सिद्ध करून घेतली, ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करता करता योगनिद्रा प्राप्त झाली. पण माझ्या जीवनात तो सुदिन केंव्हा येईल जेव्हा हिमालयातील हरिणे निर्भय होउन आलेली खाज कमी करण्यासाठी आपली शिंगे माझ्या मांडीवर घासतील …. तो मंगलदिन.

© श्री हेरंब देऊळकर

बेळगाव 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मला दुबईत भेटलेले पु. ल. …” – लेखक : श्री प्रशांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मला दुबईत भेटलेले पु. ल. …” – लेखक : श्री प्रशांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

८ नोव्हेंबर. पुलं चा वाढदिवस. त्यानिमित्ताने पुलंनी दुबईच्या महाराष्ट्र मंडळात कथा कथनाच्या रूपाने पहिला परदेश दौरा केला. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांचा सहवास लाभला. 1982 सालची ही आठवण.

दुबईच्या एअरपोर्ट समोर त्यावेळचे दुबई इंटरनॅशनल हॉटेल चे भव्य सभागृह दुबई महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांनी खच्च भरले होते. सर्वांना उत्सुकता होती ती महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना डोळे भरून पाहण्याची. आतापर्यंत पुस्तकातून भेटलेले पुल प्रत्यक्ष भेटणार होते. ‘हसवण्याचा माझा धंदा’ या कार्यक्रमातून ते आपल्या काही कथा साभिनय सादर करणार होते. या आधी पुलंना वाऱ्यावरची वरात, बटाट्याची चाळ या सारख्या प्रयोगातून बघितलेले ही काही भाग्यवंत मंडळात होतेच. त्यांच्या कडून पुलं बद्दल खूप काही कौतुकास्पद गौरव उदगार कानी आले होतेच. पण आज मात्र मंडळाचे पदाधिकारी कॉलर ताठ करून फिरत होते. त्याला कारणही तसेच होते. मंडळाच्या आठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतातून एका नामवंत कलाकाराला आमंत्रित करण्यात आले होते. आणि तो कलाकार सर्वांचे आवडते पुलं असावे हा एक सुंदर योगायोग होता. तत्पूर्वी मंडळाचे कार्यक्रम हे स्थानिक कलाकारांचे नाटक, गणेशोत्सव, वार्षिक सहल यापुरते मर्यादित असायचे. पण यावर्षी पुलं ना आमंत्रित करून मंडळाने एका नवीन पर्वाला सुरुवात केली होती. त्या पर्वाचे साक्षीदार होण्याचे भाग्य ज्या सभासदांना लाभले ते हा क्षण डोळ्यात साठवून आयुष्यभर आठवण म्हणून जपून ठेवणार होते. (पुलं च्या ‘चित्रमय पुलं’ या पुस्तकात पुलं च्या दुबईतील पहिल्या वहिल्या परदेश दौऱ्याच्या पोस्टर च फोटो अंतर्भूत केला आहे. )

कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच सांगण्यात आले की ‘जर कोणी हा कार्यक्रम रेकॉर्ड करताना आढळला तर कार्यक्रम थांबवण्यात येईल व टेपरेकॉर्डर जप्त करण्यात येईल. ‘उपस्थित या अनाउन्समेंट चा अर्थ लावत असतानाच कार्यक्रमाला सुरुवात देखील झाली. पुढचे दोन अडीच तास सभागृह हशा टाळ्यांनी एवढे दणाणून गेले की मगाचच्या अनाउन्समेंटचा सर्वांना विसर पडला.

कार्यक्रम पार पडल्यावर पुलं पण खुश होते. आखाती देशातील त्यांचा पहिलाच कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. प्रेक्षकांच्या गराड्यात असताना कोणीतरी मगाचच्या अनाउन्समेंट विषयी विचारले, तेव्हा पुलं म्हणाले, ” अहो, त्याचे काय आहे, कधीतरी अशा कार्यक्रमात बोलण्याच्या नादात विनोदाने एखादया नेत्याविषयी विनोद म्हणून काहीतरी बोलले जाते. ते तेवढ्यापुरतेच घ्यायचे असते. पण काही जण असे कार्यक्रम रेकॉर्ड करून त्या नेत्यापर्यंत पोहोचवतात, पुलं तुमच्याबद्दल जाहीरपणे असे बोलतात. असे सांगून कान भरले जातात. मग तो नेता नाराज होतो. म्हणून मला अशी काळजी घ्यावी लागते. ” पुलं च्या या खुलाशाने मात्र या सभासदांचे समाधान झाले आणि पुढील आठ दिवसांचा पुलं चा दुबई मुक्काम दिलखुलास होणार याची खात्री पटली. पण यात आणखी एका आनंदाची अचानक भर पडणार आहे याची कोणाला कल्पना होती?

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सात वाजता दुबई प्लाझा हॉटेल मध्ये पुलं चा पेटीवादनाचा आणि सभासदांसोबत गप्पांचा प्रोग्राम ठरला होता. पण त्यावेळी मिळालेल्या पेटीचे आणि पुलंचे सूर काही जुळले नाहीत. म्हणून पेटी बाजूला सारून पुलं गप्पा मारायला बाह्या सरसावून बसले. तेवढ्यात तिथे त्याकाळच्या रेडिओवरचे बादशाह, निवेदक अमीन सयानी यांचे आगमन झाले. त्याचे झाले असे की रेडिओच्या काही कामानिमित्त अमिनजी शारजाला होते. त्यांना पुलं दुबईत असल्याचे समजल्यावर ते पुलं ना भेटायला आले होते. दोघांची दिल्लीत ऑल इंडिया रेडिओ पासूनची ओळख होती. पुलं त्यांना सिनियर म्हणून पुलं ना ते ‘दादा’ म्हणत होते. मग तेही पुलंच्या बाजूला मांडी घालून बसले आणि दोघांच्या अनौपचारिक गप्पांना सुरुवात झाली. साक्षीदार होतो आम्ही. हातात माईक येताच अमीनभाईंनी पुलं ना काहीतरी प्रश्न विचारताच पुलं पटकन हात जोडत म्हणाले, ” ए बाबा, मेरा interview वगैरे मत लेना! ”

हसत हसत अमिनभाई म्हणाले, ” खैर, दादा अब तो छोड देता हुं, लेकिन इंडियामे मिले तो नही छोडूंगा! “ मग थोडा वेळ गप्पा मारून ते निघून गेले. त्यानंतर मात्र पुलंचे सभासदांच्या घरी जेवणाचे वार लागले. रोज कोणा ना कोणाकडे तरी आमंत्रण असायचे. जेवणाबरोबर गप्पांचा फड पण रंगायचा.

एकदा एकाकडे असाच जेवणाचा बेत ठरला होता. पुलं वेळेवर हजर होते. गप्पा सुरूच होत्या. पण जेवणाची वेळ टळून चालली होती. कोणीतरी यजमानांना जेवणाची आठवण करून दिल्यावर ते म्हणाले,

‘एक मित्र येणार होते त्यांची वाट पाहतोय. ‘ पुलं पटकन मिश्कीलपणे म्हणाले, ‘ मलाच जेवायला बोलावलंय ना? ‘ त्या प्रश्नातच यजमानांना काय समजायचे ते समजले.

एके दिवशी पुलंच्या प्रकाशकाचे एक स्नेही पुलं ना भेटायला आले आणि घरी चलण्याची गळ घालू लागले. बोलता बोलता पुलं ना म्हणाले, ” माझ्याकडे B & O ची म्युझिक सिस्टिम आहे, त्यावर तुम्हाला कुमारांचे गाणे ऐकवतो. कुमारांचे गाणे कोळून प्यालेले पुलं म्हणाले, “अहो, गाणे जर समजत असेल तर साध्या टेपरेकॉर्डरवर देखील चांगले वाटते. त्यासाठी म्युझिक सिस्टिमच कशाला हवी? “ असे बोलून पुलं नि त्याला कसेबसे (पि)टाळले.

पुलं च्या सहवासातले ते दिवस हा हा म्हणता सरले. जाताना मंडळाच्या अध्यक्षांनी मानधनाची ठरलेली बिदागी म्हणून 1001 दिरहामचे पाकीट पुलं च्या हातात ठेवले. पुलं नी ते बघितले आणि अध्यक्षांना म्हणाले, ” तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी मानधन 1001 रुपये असे सांगितले होते. दिरहाम नाही “. (त्यावेळी 1 दिरहाम ला 2 रुपये असा exchange rate होता. )

अध्यक्षांनी नम्रपणे सांगितले की “ हो आम्हाला माहीत आहे पण आम्ही आनंदाने ही बिदागी तुम्हाला देतोय”. सांगितलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम मिळत असतांना पुलंचा हा सालस प्रामाणिकपणा सर्वाना स्पर्शून गेला.

दुबईहून गेल्यानंतर काही दिवसांनी पुलं चे पत्र आले त्यात सर्वांचे आभार मानत असताना पुलंनी लिहिले होते की …. ” लहानपणी आयुष्यात वारावर जेवायची वेळ कधीच आली नव्हती.. ती पाळी दुबईत आली आणि तेव्हा प्रत्येक भगिनींच्या घरी जेवायला जाताना भाऊबीज असल्यासारखे वाटत होते. “

एका घरी गप्पा मारताना पुलं असेच सहज म्हणाले होते, “ तुम्ही वसंतराव देशपांडेंना बोलवा. मी त्यांच्या बरोबर पेटी वाजवायला येईन. ”सर्वांना ही कल्पना पसंत पडली होती. पण हे होणे नव्हते. पुढच्याच वर्षी वसंतराव गेले अन ती कल्पना पोरकी झाली. शेवटी प्रत्येक कार्यक्रमाचे पण नशीब असते!

असाच एक कार्यक्रम पुलं च्या पंचाहत्तरी निमित्त दुबईत करायचा ठरला. नावही पुलंना साजेसेच दिले गेले “पुलंदाजी”.. पुलंच्या साहित्यावर कार्यक्रम करायला त्यांनीही आनंदाने परवानगी दिली. कार्यक्रमानंतर ठरलेले मानधन द्यायला मित्र त्यांच्याघरी गेला. त्या दिवशी तारीख होती 6 डिसेंबर (बाबरी मशीद घटनेचा दिवस). बोलता बोलता पुलंना त्या तारखेची आठवण होऊन ते सुनीताबाईना म्हणाले,

“अगं, आज त्या बाबरी मशिद चा वाढदिवस ना? “ सुनीताबाईना त्या घटनेचा वाढदिवस हा उल्लेख आवडला नाही. तसे त्यांनी म्हणताच पुलं पटकन म्हणाले, “ठीक आहे, वाढदिवस नाही तर ‘पाडदिवस’ म्हण हवे तर. ” 

त्या वयातही पार्किन्सन्स च्या आजाराने ग्रासलेल्या पुलंची विनोदबुद्दी, हजरजबाबीपणा शाबीत राहिला होता.

पुलं च्या सुरुवातीच्या काळातील पुस्तकांवर पारल्यातील घराचा अजमल रोड असा पत्ता असे. यानंतर पुण्याला गेल्यावर 777 रुपाली असा झाला आणि नंतर मालती माधव. घर बदलत गेले तसे त्यांचे पत्तेही बदलत गेले पण पत्याचा धनी मात्र एकच होता… ‘ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ‘!

… आता चौवीस वर्षें झाली ह्या धन्याचा पत्ता बदलून पण पत्त्याचा धनी आमच्या मनात कायमचा घर करून बसलाय.

 

लेखक : श्री प्रशांत कुलकर्णी, अबुधाबी

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठीचे भवितव्यः आपली जबाबदारी… ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ मराठीचे भवितव्यः आपली जबाबदारी… ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

“मराठी” शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभा रहातो तो महाराष्ट्र ! कारण महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे. या मायबोलीचे भवितव्य आणि आपली जबाबदारी या विषयावर आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने, डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम यांना अभिवादन करून आपण विचार करूया.

भारतात फक्त तमिळ, तेलगू, संस्कृत, ओडिया, मल्याळम्, कन्नड या सहा भाषांना शासनाच्या निकषांवर आधारित अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण मराठीला “अभिजात भाषेचा दर्जा अ‌द्याप मिळाला नाही याचा खेद अनेक मराठी भाषिकांना वाटतो. मराठीला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी गुजरात, पंजाब, तमिळनाडू, बंगाल, कर्नाटक इ. राज्यांमध्ये मराठी भाषा संतानी पोहोचवली. महाराष्ट्रातील संत साहित्याला आजही जगभरात स्थान आहे. म्हाइंभटांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरांची “माझा मऱ्हाटाचि बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके||” असे म्हणणारी भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी, संत एकनाथांचे, चोखामेळ्याचे अभंग, तुकारामांची गाथा, दासबोध, पतंजली साहित्यावरील ग्रंथ, गोमंतकीय साहित्य, कोकणी साहित्य यांचे मराठी भाषेतील योगदान महत्त्वपूर्ण व दर्जेदार आहे. या सर्वांनी भाषाप्रसारणाबरोबरच समाज प्रबोधनही केले.

एवढा भरीव इतिहास असलेल्या मराठी भाषेला “भवितव्य नाही असे म्हणावे तरी कसे?” अभिजात नाही म्हणून आर्थिक, सांस्कृतिक, गौरवात्मक तोटे असतीलही पण तिचा ऱ्हास कधीच होणार नाही. आपण सर्वानी भाषा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करूया.

कवी सुरेश भट म्हणतात, “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी”! यांच कवितेत त्यांनी म्हणले आहे, “शेवटी मदांध तख्त फोडते मराठी”. सह्याद्रीच्या सिंहाने, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचे तख्त फोडण्याबरोबरच “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदित॥ साहसुनोः शिवस्यैषा मुद्राभद्रायराजते॥” या शिलालेखाची मुद्रा निर्मिती केली आणि “मराठी भाषा शब्दकोश” तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी भाषेतील शब्दांना कितीतरी मराठी प्रतिशब्द दिले. अशी ही महाराष्ट्राची “मराठी मायबोली” उज्ज्वल भवितव्याकडेच वाटचाल करणार हे नक्की.

या उज्ज्वल भवितव्यासाठी शासन, मंत्रीमंडळे, मान्यवर साहित्यिक यांनी पुढील कार्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

१. देशभरात महावि‌द्यालये, वि‌द्यापिठे यांमधून विविध सांस्कृतिक केंद्रे उभारता येतील.

२. मराठी जागतिक स्तरावर नेण्यासाठी भारताबाहेरील वि‌द्यापीठात, शाळांमधून ऐच्छिक विषय म्हणून मराठी शिकवले गेले पाहिजे. उदा. लंडन येथील वि‌द्यापीठात संस्कृतचे केंद्र आहे.

३. सर्व देशांमधून आज महाराष्ट्रीयन्स आहेत. त्यांच्या मुलांना मराठी शिकण्यासाठी ऑनलाईन सोयीची कार्यवाही झाली पाहिजे. मराठी भाषेसाठी प्रमाणपत्र परीक्षा ठेवायला हव्यात.

४. एकत्र कुटुंब पद्धती मराठी भाषेसाठी अत्यावश्यक आहे. घरात आजी आजोबांनी मुलांवर मराठी भाषेचे संस्कार केले पाहिजेत. यासाठी कथाकथन, भेंड्या खेळणे, ओव्या, उखाणे, म्हणी, हादगा, गणपती गौरी, कवी संमेलन, वाचन कट्टा, ग्रंथालये, भजनी मंडळे, नाटक, सिनेमा यांचा प्रभावी वापर केला पाहिजे.

५. सध्या इंग्रजीला जागतिक भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे मुलांना इतर राज्यांत, परदेशात पाठविण्याचा दृष्टीने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे कल अधिक आहे. पण “ज्ञानरचनावाद” स्वभाषेतूनच होतो. म्हणून मराठीतून संकल्पनानिर्मिती, आकलन, संकलन इ. गोष्टीवर भर देण्यासाठी पुस्तक निर्मिती आवश्यक आहे.

६. मराठी शाळांमधील वि‌द्यार्थी संख्या घटते आहे पण घरात अद्याप तरी मराठी बोललं जातं. मराठी विषय म्हणून शाळेत अभ्यास केला जातो या पार्श्वभूमीवर मुलांना मराठी पुस्तके, ग्रंथालये, कार्यक्रम उपलब्ध करून द्यावेत.

७. सर्वच ठिकाणी माध्यमांच्या नको त्या घुसखोरी मुळे योग्य संस्कार मुलांवर होत नाहीत पण याच माध्यमांच्या योग्य वापरातून, मराठी साहित्य प्रसारणातून मुलांमध्ये गोडी वाढविता येईल.

८. शाळांमधून “मराठी भाषा प्रयोगशाळा” निर्मिती करता येईल. मराठीतील उच्चार, पाठांतर, नवनिर्मिती यांवर भर देता येईल. यासाठी शासन अनुदान उपलब्ध झाले पाहिजे.

९. मराठीची गोडी वाढविल्यास विद्यार्थी कविता लेखन, कथालेखन, ललित लेखन, विचार संकलन, संमेलन सहभाग इ. गोष्टी शिकतील.

आणि….

मराठी पुढील पिढीकडे जशी आहे तशी हस्तांतरित होईल. . . मग भवितव्य उज्ज्वलच असेल, नाही का?

 

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मानवतेचा मानस…! ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

मानवतेचा मानस…! ☆ श्री संदीप काळे ☆

मी नवी मुंबईहून नाशिकच्या मार्गाला लागलो. रस्त्यामध्ये काही पाड्यांना भेटी देत सायंकाळपर्यंत नाशिकला जावं, हा बेत करून मी जात होतो. शहापूरजवळच्या एका पाड्यावर थांबलो. तिथल्या काही शेतकरी बांधवांशी बोलत होतो. निवडणुका, सरकार, स्थानिक पातळीवरील राजकारण आणि त्यात भरडली जाणारी ही सगळी पाड्यावरची माणसं आहेत, हे मी अनुभवत होतो. त्या पाड्यावर मी काही शेतकऱ्यांशी बोलत असताना एक छोटासा टेम्पो त्या गावात आला. टेम्पोला पाहून सगळे लोक हातामध्ये तांब्या, बाटली, ग्लास घेऊन टेम्पोच्या दिशेने जात होते.

मी माझ्या बाजूला उभ्या असलेल्या शेतकऱ्याला म्हणालो, “ही मंडळी अशी पळतात का? ’’ ते म्हणाले, “काही नाही, दूध आलेय. ते दूध आणण्यासाठी जात आहेत. ’’ मला वाटले, की दूध विक्रीसाठी कोणीतरी घेऊन आले असेल, पण तसे नव्हते. ते दूध तिथे मोफत वाटले जात होते. मी माझ्या बाजूला असलेल्या माणसाला परत म्हणालो, की ही माणसे फुकट दूध देतात का, पैसे घेत नाहीत? तो म्हणाला, ‘मानस’ नावाचा शेतीचा फार्म आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या गाईचे दूध रोज काढून आसपासच्या आदिवासी पाड्यांवर, गावांमध्ये वाटले जाते.

मला त्या व्यक्तीचे ऐकून आश्चर्य वाटले. मी त्या टेम्पोवाल्याला म्हणालो, “तुम्ही हे दूध रोज वाटप करता का? ’’ ते म्हणाले, “नाही, दोन ते तीन दिवसांत आम्ही दूध एकत्रित जमा करून वाटप करत असतो. ’’ तुमचा फार्म कुठे आहे? मी पुन्हा त्याला विचारले, तो म्हणाला, “१५ किलोमीटर अंतरावर आहे. ’’ मी त्या फार्मचा पत्ता घेतला आणि तिथे लोकांशी बोलून त्या फार्मच्या दिशेने निघालो. शहापूरवरून पुढे जाताना साजिवली येथे भातसा धरणाच्या अगदी जवळ असलेले हे `मानस कृषी शेती’ असा मोठा बोर्ड लावलेला आहे. मी ओळख सांगून आतमध्ये प्रवेश केला.

एका झोपडीमध्ये एक व्यक्ती आदिवासी महिलांना धान्य वाटप करताना मी पाहिले. मी तिथं गेलो आणि मागे चुपचापपणे उभा राहिलो. सर्व महिलांना धान्य दिल्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘ ज्या गरजू आणि कुपोषित बालकांच्या आई आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे धान्य देण्याचे काम करत असतो. आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक गरजवंत महिला यांना या संदर्भात सांगा. ’’ त्या महिलांनी डोक्यावर बॅगा उचलल्या आणि त्या आपल्या घराच्या दिशेने निघाल्या.

त्यातल्या मी दोन महिलांशी बोलत होतो, त्यामध्ये गीता नावाची महिला मला म्हणाली, ` या जमान्यात कोण कोणाला मदत करते बाबा, ही माणसे पुढाकार घेऊन काहीतरी चांगले काम करतात, ’ दुसऱ्या जमुनाबाई म्हणाल्या, `गेल्या अनेक वर्षांपासून ही माणसे धान्य वाटप करण्याचे काम करतात. याच शेतामध्ये पिकलेले, इथेच देण्याचे काम त्यांनी हाती घेतले. प्रत्येक वेळेला धान्य देण्यासाठी येणाऱ्या महिला वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या भागातल्या असतात. काळ नेहमी आम्हा गरिबाची परीक्षा घेतो. कधी आजारपण लहान मुलाभोवती असते, कधी म्हाताऱ्या माणसाचा जीव जातो. अशा स्थितीत ही माणसे देव म्हणून आमच्या आसपास असणाऱ्या सर्व पाड्यांवर जातात. सर्वांना भेटून मदत करतात. मी कुपोषणामुळे चार मुलांना मुकले. आता आई-बाबा आणि अपंग असलेल्या पतीला मी सांभाळते. ’

जी व्यक्ती धान्य वाटप करत होती त्या व्यक्तीजवळ जाऊन मी त्यांना नमस्कार केला. त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडून तिथे चालणाऱ्या सगळ्या उपक्रमाविषयी माहिती घेतली. मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचे नाव व्यंकटेश जोशी (९४२३१३६६०४), ते ‘मानस’चे संचालक होते. मूळचे नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे असणारे जोशी यांनी त्यांच्या अनेक सहकारी मित्रांच्या मदतीने २५० एकर शेतीत सजीव शेतीचे प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात स्वतःला वाहून घेतले. जगात शेतीबाबत होणारे सर्व प्रयोग येथे होतात. देशभरातून शेतकरी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

गुजरात येथून गिरनार महाराज यांच्याकडून आणलेल्या पाचशे गीर गाई आहेत. या गाईचे दूध विक्रीसाठी नाही तर आसपासच्या गावांतल्या गरीब, कष्टकरी यांना वाटण्यासाठी आहे. गोमूत्रापासून पिकासंदर्भात असणारी सर्व औषधे येथे तयार केली जातात. विहिरीत गोमूत्र सोडले जाते आणि ते पुन्हा झाडांना दिले जाते. शंभर एकर शेती येथे पडीक आहे, त्याचे कारण ती जमीन गाईंना चरण्यासाठी ठेवली आहे. गाय, अग्निहोत्र, जैविक खत ही ओळख या प्रकल्पाची आहे. जोशी माझ्याशी बोलत होते आणि मी त्यांचे सारे ऐकत होतो. सारा प्रकल्प जोशी यांनी मला फिरून दाखवला.

एका व्यक्तीची ओळख करून देताना जोशी मला म्हणाले, हे व्यंकटेश कुलकर्णी, माझे मावस भाऊ आणि गुरुसुद्धा आहेत. या प्रोजेक्टचे चेअरमन आहेत. त्यांनीच मला मुंबई दाखवली. मी कुलकर्णी सर यांना नमस्कार केला. एखाद्या साधूच्या चेहऱ्यावर जसे तेज असते तसे तेज कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर होते. जोशीकाका काही माणसांशी बोलत होते, त्या वेळी मी कुलकर्णी यांच्याशी वेगवेगळ्या प्रयोगांविषयी बोलत होतो. कुलकर्णी म्हणाले, शेतीसाठी देशी गाय खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी जिथे शेती आहे तिथे गाय महत्त्वाची आहे. त्याशिवाय शेतीसाठी प्रसन्न वातावरणही महत्त्वाचे आहे, त्यासाठी अग्निहोत्र आवश्यक आहे.

अनादी काळापासून शेतीतून निघणाऱ्या धान्यातून आमच्या पिढ्या धष्टपुष्ट तयार झाल्या. कित्येक माणसे १३० वर्षांपर्यंत जगायची, पण आता सारेकाही सत्त्वहीन, रासायनिक खताचं खाऊन पन्नाशीत माणसांना जगणं नकोसे झाले आहे. कुलकर्णी यांचे शेतीबाबत सारे प्रयोग जबरदस्त होते. तिथला सोनचाफा तर आयुष्यभर आठवणीत राहील असाच होता. जोशी पुन्हा आले आणि माझ्याशी बोलत होते. ते म्हणाले, “माझे वडील नारायण जोशी स्वातंत्र्यसैनिक होते. ते प्रचंड धार्मिक होते. हातात येईल तेवढा तांदूळ ते घ्यायचे, तेवढाच शिजवून खायचे. माझे आजोबा गोविंद आबा भट गावाकडे ज्योतिषी होते, कुणाची गाय चोरीला गेली, घरातून माणूस निघून गेला, तो कुठे गेला, ते बरोबर सांगायचे. त्यांची कार्यपद्धती मी अवगत केली, असे मला जोशीकाका सांगत होते.

मी जोशीकाका यांच्या गाडीत बसलो. त्यांनी प्रोजेक्टवर जितके प्रशिक्षण सुरू होते तिथे आम्ही जाऊन आलो. द्राक्षे, डाळिंब, चिकू, भातशेती, भेंडी अशा सर्व पिकांबाबत प्रशिक्षण सुरू होते. दरवर्षी किमान सात ते आठ हजार शेतकरी येथून प्रशिक्षण घेऊन विषमुक्तीसाठी पुढाकार घेतात. जोशी, कुलकर्णी आणि अन्य मित्रांच्या सहकार्याच्या मदतीने सुरू झालेल्या या प्रयोगाच्या माध्यमातून येत्या दहा वर्षांत राज्यातले किमान अर्धे शेतकरी तरी विषमुक्त शेतीकडे वळवण्याचा ‘मानस’ या बंधूने आखला आहे. “

जोशी आणि कुलकर्णी बंधूंचा निरोप घेऊन मी परतीच्या वाटेने निघालो. जोशी काकांनी मला सोनचाफ्याची फुले बांधून देताना ते मला म्हणाले, तुम्हाला सोनचाफ्यांची फुले फार आवडतात. मला एकदम धक्का बसला, मी म्हणालो, तुम्हाला कसे काय माहिती. त्यावर जोशीकाका हसून म्हणाले, मी ज्योतिषी आहे, काकांच्या बोलण्यावर मीही हसलो.

… त्या सोनचाफ्याचा सुगंध पुढचे चार दिवस माझ्या गाडीत आणि घरात दरवळत होता. त्यापेक्षाही जोशी, कुलकर्णी यांनी निःस्वार्थीपणे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना गायींच्या संवर्धनातून दिलेला विषमुक्त शेतीचा प्रयोग फार महत्त्वाचा होता. `जय किसान’चा नारा या बंधूंच्या समर्पक भावनेतून निनादणारा होता, बरोबर ना…?

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों – मूळ हिन्दी व इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों – मूळ हिन्दी व इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे

फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों.

परमवीर चक्र…. भारतीय हवाई दल.

निर्मलजित सिंह सेखों यांचा जन्म १७ जुलै १९४३ रोजी पंजाब मधील लुधीयाना जिल्ह्यातील रुरका इसेवाल या गावात सेखों जाट सिख परिवारात झाला होता. त्यांचे वडिल वारंट ऑफीसर (ऑनररी फ्लाइट लेफ्टिनेंट) त्रिलोक सिंह सेखों हेही भारतीय हवाई दलात नोकरीस होते व आई हरबंस कौर या गृहिणी होत्या.

४ जून १९६७ रोजी निर्मलजित सिंह सेखों हे भारतीय हवाई दलात पायलट म्हणून अधिकारी पदावर नियुक्त झाले.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते भारतीय वायुसेनेच्या “द फ्लाइंग बुलेट” या अठराव्या स्क्वाड्रन मध्ये कार्यरत होते.

१४ डिसेंबर १९७१ रोजी श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-86 जेट विमानांनी 26वे स्क्वाड्रन पीएएफ बेस पेशावर येथून उड्डाण केले.

सुरक्षा तुकड़ी चे नेतृत्व सांभाळत फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह तेथे १८व्या नेट स्क्वाड्रन वर तैनात होते.

भारतीय हवाई दल स्थानकावर हल्ला होताच निर्मलजित सिंह सेखों आपल्या विमानासह तयार झाले. तोपर्यंत फ्लाईट लेफ्टनंट घुम्मन ही कंबर कसून तयार झाले होते. थंडीचे दिवस असल्याने अगदी पहाटे च्या वेळी विमानतळावर खूपच धुके होते. त्यामुळे सर्वत्र अंधुक दिसत होते.

सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी चेतावनी मिळाली की शत्रूने आक्रमण केले आहे. निर्मलजितसिंह व घुम्मन यांनी लगेच आपण उडण्यास तयार असल्याचे सांगितले आणि उत्तराची दहा सेकंद वाट बघून मग विमानाचे उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. बरोबर आठ वाजून ४ मिनिटांनी दोन्ही अधिकारी शत्रूचा सामना करण्यासाठी आपापल्या विमानांसह आकाशात होते.

त्यावेळी शत्रूचे पहिले F-86 सायबर जेट भारतीय विमानतळाभोवती चक्कर मारण्याच्या तयारीत होते. धावपट्टीवरुन घुम्मन यांच्या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर निर्मलजित सिंह च्या नेट विमानाने उड्डाण करताच धावपट्टीवर त्यांच्या बरोबर मागे एक बाॅम्ब येऊन पडला.

घुम्मन स्वतः त्यावेळी एका सायबर जेट चा पाठलाग करत होते. निर्मलजित हवेत उडताच दोन सेबर जेट विमानांना सामोरे गेले. यापैकीच एका विमानाने विमानतळावर बाॅम्ब टाकला होता. बाॅम्ब पडल्यामुळे सेखों व घुम्मन यांचा विमानतळावरील संपर्क कक्षाशी संपर्क तुटला होता. बाॅम्ब च्या स्फोटामुळे संपूर्ण विमानतळ धूर व धुळीने व्याप्त झाले होते त्यामुळे दूरपर्यंत काहीच दिसत नव्हते. तेव्हड्यात फ्लाइट कमांडर स्क्वाड्रन लिडर पठानिया यांच्या नजरेत शत्रूची दोन विमाने हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. घुम्मन यांनी ही निर्मलजीत सिंह यांच्या मदतीस जाण्यासाठी तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. तेवढ्यात रेडियो संदेशावर निर्मलजीत सिंह यांचा आवाज़ ऐकू आला… “मी दोन सेबर जेट विमानांच्या मागावर आहे. मी त्यांना परत जाऊ देणार नाही…. “

त्यांनंतर काही क्षणांत नेट च्या हल्याचा आवाज़ आकाशात ऐकू आला आणि आगीने पेटलेले एक सायबर जेट जमीनीवर पडतांना दिसले. तेव्हड्यात निर्मलजीत सिंह सेखों यांनी आपला संदेश पाठविला… “मी लढत आहे व मला खूप मजा येत आहे. माझ्या आजूबाजूला शत्रूंची दोन सेबर जेट आहेत. मी एकाचा पाठलाग करत आहे. दुसरे माझ्या बाजूनेच उडत आहे. “

या संदेशाच्या उत्तरात स्क्वाड्रन लिडर पठानिया यांनी निर्मलजित सिंह यांना सुरक्षेसंबंधी काही सुचना दिल्या. त्यानंतर नेट विमानातून अजून एक राॅकेट उडाले. त्याबरोबरच शत्रूचे सेबर जेट उध्वस्त झाल्याचा आवाज ही आला. त्यांनी अजून एक निशाणा साधला आणि जोरात आवाज करत शत्रू चे अजून एक सेबर जेट ध्वस्त झाले.

थोड्या शांततेनंतर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांचा संदेश पुन्हा ऐकायला आला. ते म्हणाले… “बहुतेक माझे नेट ही शत्रूच्या निशाण्यावर आले आहे. घुम्मन, आता तुम्ही मोर्चा सांभाळा. “

हा निर्मलजीत सिंह यांचा शेवटचा संदेश होता आणि देशाच्या रक्षणार्थ शत्रूच्या विमानांना धूळ चारत वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली.

फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांच्या या अतुलनीय शौर्य व साहसामुळे आणि देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याने भारत सरकार ने वर्ष १९७२ मध्ये युद्धकाळातील सर्वोच्च सन्मानाचे पदक, ‘परमवीर चक्र’ (मरणोपरांत) देउन त्यांचा सन्मान केला.

देशाला त्यांच्यावर गर्व आहे.

— — — — — हे वीर जवान, तुझे सलाम! ! ! ! !  🇮🇳

हिंदी व इंग्रजी लेखक- अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अशीही एक अनोखी आदरांजली… – लेखक : श्री अभिषेक ढिले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अशीही एक अनोखी आदरांजली… – लेखक : श्री अभिषेक ढिले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

– – कथाकथनाचा एक मंच आहे. मंचावर एक लाकडी पोडियम आहे. पोडीयमच्याच मागे लाकडी स्टूलावर पाण्याचे तांब्या – भांडे ठेवले आहे…

… सगळ्याचा आनंद घेत माझ्यासारखे भक्तरूपी श्रोते कथाकथनाचा आस्वाद घेत आहेत… कार्यक्रम पुण्यात असून सगळे वेळेवर पोहोचले आहेत… याचं कारण म्हणजे तारमास्तरांनी बहुदा दिलाचा तगादा कुणाचाही पत्ता न चुकवता पाठवला असावा…

गाडी लेट झाल्याने मधु मनुष्टे आणि सुबक ठेंगणी मागच्या लाइनीत जोडीनं बसले आहेत. त्यांच्याच बाजूला उस्मान शेठ आपल्या फॅमिलीसोबत आम्लेट खात आहेत. बसायला जागा न मिळाल्यामुळे आपले बिस्तरे थिएटराच्या नैऋत्येला अंथरून बगू नाना, झंप्या आणि अनुभवी मंडळी यांची चार तासांची निश्चिंती झाली आहे. मास्तर आत येतानाच टॅनिक युक्त चहा घेऊन आले आहेत…

मधेच कुठूनतरी रावसाहेबांचं साताच्या वर हासू ऐकू येऊन त्यावर “हाण तुझ्या xxx” अशी जोरदार दाद देखील येत आहे.

अंतुबरवा तर आज स्वतःहून तिकीट काढून आले आहेत. एव्हाना त्यांच्या दाताचा संपूर्ण अण्णू गोगट्या झाला असला तरी त्यांच्या येण्याने त्यांच्याकडचा गंगेचा गडू शाबूत असल्याची खात्री झाली आहे…

श्री अभिषेक ढिले

कोणी एक कुळकर्णी दिवाळी अंकातल्या बाईचं चित्रं पहावं तसं समोर बघत आहे आणि विनोद ऐकताच “पाताळविजयम” नाटकातल्या राक्षसासारखा हसत आहे. शेजारच्या गटण्याला तर तो माणूस कम शैतान वाटत असल्याने गटणे त्याच्याकडे केवळ भूतदयेने बघत आहे.

गटणे आता साहित्याशी आणि जीवनाशी पूर्णपणे एकनिष्ठ झाला असावा. कारण, कार्यक्रमाला तो सहकुटुंब उपस्थित आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पुढारीसाहेब मधूनच उठून सर्वांना नमस्कार (कुणाचे लक्ष असो वा नसो) करून दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याकरता निघाले आहेत. त्याच वेळेस दारातून गडबडीत असणारा नारायण लग्नाची खरेदी उरकून सगळ्या माम्यांना घेऊन आत शिरत, कोपऱ्यातल्या राखीव जागेत ‘आणि मंडळीं’मध्ये जाऊन बसला आहे…

आज चक्क चक्क पोस्टमास्तर पहिल्या रांगेत अखंड दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्ट दिसत आहेत. डिलीव्हरीच्या चिंतेतल्या माणसाला हसताना पहायचा हाच तो योग…

कधी नव्हे तर पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर चक्क शेजारी बसले आहेत. एवढचं काय तर प्राध्यापक भांबुर्डेकर, प्रा. येरकुंडकरांसोबत सलगी करत आहेत. चितळे मास्तर जणू हरिवंश ऐकल्यासारखं कथाकथन ऐकत आहेत… मध्येच पेस्तनकाका नाकात तपकिर घालत आहेत. असल्या नल्ल्या हरकतीमुळे पेस्तनकाकी हळूच पेस्तनकाकांना चिमटा काढत आहेत.

थिएटरच्या बाहेरच्या गेटवर बसलेला कावळा येणाऱ्या जाणाऱ्याला “काय झालं का जेवण, काव काव” असं विचारत आहे.

देव गाभाऱ्यातून बाहेर यावा, तसा चौकातला पानवाला सुद्धा ठेला बंद करून आला आहे.

… आणि…

… आणि या सगळ्यांच्यासमोर आमचं पु. ल. दैवत निष्काम कर्मयोगाने कथाकथन सादर करत आहेत…

“अरे देवव्रत, तुला पुराव्याने शाबित करुन सांगतो. देवळात गेल्यावर मनाला एक प्रकारची प्रसन्नता, भव्यता, दिव्यता वैगरे काय काय वाटतं ना तसचं वाटतं होतं. आम्हाला साक्षात कृष्णाच्या तोंडून डायरेक्ट गीता ऐकल्यासारखं वाटतं होतं. “

… आम्हाला सांगत होते ना हरितात्या… पुरूषोत्तमबद्दल…

लेखक : श्री अभिषेक ढिले (देवव्रत) 

प्रस्तुती:सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बघा,.. पटतंय का ?… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ बघा,.. पटतंय का ?… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मी जन्माने ब्राह्मण असलो तरी कोणत्याही जातीचा कधीही द्वेष केल्याचे मला स्मरत नाही. तसेच परिस्थिती गरिबीची असूनही कधीही सरकारने आरक्षण देऊन माझी उन्नती करावी असे मला वाटले नाही. मध्यंतरी सरकारने खुल्या वर्गातील लोकांसाठी काही सवलती देऊ केल्या होत्या, त्याचाही लाभ मी घेतला नाही.

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, तसेच मी कोणत्याही जातीच्या किंवा त्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या विरोधात नाही. ज्यांना कोणाला आरक्षण हवे आहे असे वाटते त्यांनी आरक्षण मागावे आणि सनदशीर मार्गाने मिळवावे. पण त्यासाठी अमुक एका जातीच्या व्यक्तीला किंवा समाजाला शिव्या द्याव्यात याच्या मी विरोधात आहे. किंबहुना अशा अनेक घटना घडल्याचे विविध वृत्तपत्रातून वाचनात आले आहे. यातून अशा लोकांची विकृत मानसिकता कळून येते.

अमुक एका जातीच्या लोकांना होलपटण्याचा प्रयत्न म्हणा किंवा कृती म्हणा, अनेक वेळा झालेली आहे. विविध राजकीय पक्षांनी याचा उपयोग आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केलेला आढळतो.

समाजाने आता जागृत व्हावे, स्वावलंबी व्हावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे असे माझे वैयक्तिक मत आहे.

या देशाच्या जडणघडणीत प्रत्येक जातीचा मोलाचा सहभाग आहे. ब्रिटिशांनी आपली जातीत विभागणी केली आणि आम्ही आज सुध्दा तसेच भांडत आहोत, आणि स्वतःचे नुकसान करीत आहोत, हे ज्या दिवशी हिंदू समाजाच्या लक्षात येईल, त्यादिवशी आपल्या प्रगतीला खरी सुरुवात होईल असे वाटते.

राजकीय पक्षाचे नेते भांडतात, वैर धरतात आणि नंतर एकमेकांच्या राजकीय फायद्यासाठी युती आणि आघाडी करतात आणि सामान्य माणसे राजकीय अभिनिवेष बाळगून आपल्या जवळच्या माणसांत वैर धरतात. मागील पाच वर्षात खास करून महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय भूमिका, त्यांच्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी कशा बदलल्या हे आपण पाहीले आहे. त्यामुळे आता जनतेने सूज्ञ होऊन (कोणत्याही अफवा, सामाजिक माध्यमे किंवा प्रलोभनांना बळी न पडता) उचित पर्याय निवडला पाहिजे. आपल्याकडे काही लोकं प्रलोभनांना बळी पडतात आणि त्यामुळे संपूर्ण समाजाचे नुकसान होत असते. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेमध्ये एकच उपाय आहे – – तो म्हणजे १००% मतदान.

आपण सर्वांनी तसा प्रयत्न करू म्हणजे महाराष्ट्र खऱ्या महा राष्ट्र होईल.

 १००% मतदान करून बहुमताचे सरकार आणू.. म्हणजे पक्षीय फोडाफोडी होणार नाही.

— —बघा, पटतंय का ?

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १७  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

त्या चार ओळी… 

उषाच्या स्टडी टेबलावरचा पसारा मी आवरत होते. मनात म्हणत होते, “किती हा पसारा! या पसार्‍यात हिला सुचतं तरी कसं? शिवाय तो आवरून ठेवण्याचीही तिला जरूरी वाटत नाही. ”

 इतक्यात टेबलावरच्या एका उघड्या पडलेल्या वहीवर अगदी ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ओळींकडे सहज माझं लक्ष गेलं तेव्हा प्रथम माझ्या नजरेनं वेचलं ते तिचं सुरेख अक्षर, दोन शब्दांमधलं सारखं अंतर आणि अगदी प्रमाणबद्ध काना मात्रा वेलांट्या. उषाचं अक्षर आणि उषाचा पसारा या दोन बाबी किती भिन्न आणि विरोधाभासी होत्या !

तिने लिहिलं होतं,” मला छुंदा खूप आवडते. ती कशी जवळची वाटते ! मला आणि निशाला अगदी सांभाळून घेते. अभ्यासातल्या अडचणी ती किती प्रेमाने समजावून सोडवून देते ! कधीच रागवत नाही.

ताई बद्दल काय म्हणू? एक तर वयातल्या अंतरामुळे तिच्या मोठेपणाचं तसं दडपण येतंच. शिवाय ती भाईंकडे (आजोबांकडे) राहते, शनिवारी येते, सोमवारी जाते. त्यामुळे या घरातली ती पाहुणीच वाटते. का कोण जाणे पण ती थोडी दूरची वाटते आणि बिंबा (म्हणजे मी) मला मुळीच आवडत नाही. तिचा प्रचंड राग येतो. सतत आम्हाला रागावते. मोठी असली म्हणून काय झालं? तिची दादागिरी का सहन करायची? तिला कधी काही प्रश्नाचे उत्तर विचारले तर सुरुवातीलाच ती ढीगभर बोलून घेते. प्रश्न मात्र देते सोडवून. तसं तिला सगळं येत असतं पण सांगताना, ” तुला इतकं साधं कसं कळत नाही? कसं येत नाही?” असा तिचा माझ्याविषयीचा जो भाव असतो ना तो मला मुळीच आवडत नाही. समजते काय ती स्वतःला?”

बापरे!!

हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनाची नेमकी काय स्थिती झाली असेल? खूप मोठा धक्काच होता तो! क्षणभर वाटलं आत्ता तिच्यापुढे ही वही घेऊन जावं आणि तिच्या या लेखनाचा जाब विचारावा पण दुसऱ्या क्षणी मी काहीशी सुन्न झाले. उदासही झाले आणि किंचित स्थिर झाले. माझ्याबद्दल तिच्या मनात असे विचार असावेत? राग, चीड आणि दुःख या संमिश्र भावनांनी माझं अंतर्मन उकळत होतं. शिवाय उषा—निशा या जुळ्या बहिणी असल्यामुळे जरी उषाने हे स्वतःपुरतं लिहिलेलं असलं तरी तिच्या या भावना प्रवाहात निशाचेही माझ्याबद्दल तेच विचार वाहत असणार. याचा अर्थ या दोघी माझ्याविषयी माझ्यामागे हेच बोलत असतील. त्या क्षणी मला जितका राग आला, जितकं वाईट वाटलं त्यापेक्षाही एक मोठी बहीण म्हणून मला “माझं मोठेपण हरलं” ही भावना स्पर्शून गेली. त्यांच्या जन्मापासून ते आतापर्यंत मी मनोमन त्यांना किती जपलं, किती प्रेम केलं यांच्यावर, यांनी चांगलं दिसावं, चांगलं असावं, चांगलं व्हावं म्हणून जी कळकळ माझ्या मनात सदैव दाटलेली होती त्याचा असा विपर्यास का व्हावा? आत्मपरीक्षण अथवा आत्मचिंतनासारख्या थीअरीज अभ्यासाव्यात असं वाटण्याइतकं माझंही ते वय नव्हतं. माझ्याही विचारांमध्ये परिपूर्णता अथवा परिपक्वता नक्कीच नव्हती. बुद्धीने मी इतकी प्रगल्भ नव्हते की या क्षणी मी तटस्थ राहून काही रचनात्मक विचार करू शकत होते. मी अत्यंत बेचैन आणि डिस्टर्ब्ड मात्र झाले होते हेच खरं. माझ्या या बेचैनीमागे कदाचित ही कारणे असतील. पहिलं म्हणजे उषा— निशांना माझं सांगणं दादागिरीचं वाटू शकतं हा विचार माझ्या मनात कधी आला नाही. त्यावेळी वाटायचं,” मी जे बोलते, मी जे सांगते ते त्यांच्यासाठी हिताचे आहे. ” असे वाटायचे. नकळतच एक मोठ्या बहिणीच्या अधिकाराने त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचा तो माझा प्रयत्न होता आणि या वैचारिकतेवर मी तेव्हाही ठाम होते. शिवाय मी डॉमिनेट करते असं त्यांना वाटू शकते याचा मी कधी विचारच केला नाही. माझ्या मनात फक्त बहिणींचं जपून ठेवलेलं एक गोड नातं होतं पण त्या नात्यात आलेला हा विस्कळीतपणा जेव्हा माझ्या ध्यानात आला तेव्हा मी एखाद्या जखमी हरिणीसारखी घायाळ मात्र झाले. ज्या घरात आई, वडील, आजी आहेत त्या घरात बहीण या नात्याने काही वेगळे संस्कार, विचार बिंबवण्याचा माझा अधिकार किती नगण्य आहे याची मला जाणीव झाली. शिवाय कुठेतरी माझं वागणं अतिरिक्तच आहे असे पुसटसे वाटूही लागले होते.

वास्तविक छुंदालाही मी खूप वेळा माझा हाच बाणा दाखवला होता.

एकदा गणिताचा पेपर देऊन ती घरी आल्यानंतर मी जेव्हा तिला पेपरातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारले तेव्हा जवळजवळ तिची सगळीच गणितं चुकलेली होती हे समजलं. माझा पारा इतका चढला की मी तिला म्हटले,” शून्य मार्क मिळतील तुला या पेपरात. एक भलामोठा भोपळा घेऊन ये आता. शाळेत जाण्याचीही तुझी लायकी नाही. ”

केवळ धांदरटपणामुळे तिची प्रत्येक उदाहरणातली शेवटची स्टेप चुकली होती. पण शाळेत तिची गुणवत्ता इतकी मान्य होती की शिक्षकाने तिचे पेपरातले गुण कापले नाहीत म्हणून ती सुरक्षित राहिली पण त्याही वेळेला मी छुंदाला म्हटले होते.. “ या पेपरात तुला शून्यच मार्क आहेत हे कायम लक्षात ठेव. ” ती काही बोलली नाही पण त्यानंतर मात्र तिला गणितात नेहमीच पैकीच्या पैकी गुण मिळत गेले अगदी इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षीही ती शंभर टक्क्यात होती. त्याचं श्रेय फक्त तिच्या मेहनतीला आणि जिद्दीलाच अर्थात.

पण त्यादिवशी जेव्हा उषाने लिहिलेल्या त्या प्रखर ओळी वाचल्या तेव्हा माझ्या मनावर आघात झाला आणि एक लक्षात आले किंवा असे म्हणा ना एक धडा मी शिकले की एकच मात्रा सर्वांना लागू होत नाही हेच खरे. आणि आपल्या बोलण्याचा परिणाम हा चांगला ते अत्यंत वाईट या रेंजमध्ये कसाही होऊ शकतो. तिथे आपले अंदाज चुकतात. मुळातच कुणाला गृहित धरणं हेच चुकीचं.

काही दिवस तो विषय माझ्या मनात खुटखुटत राहिला. सर्व बहिणींच्याबाबतीत मला या चौघी एकीकडे आणि मी एकीकडे ही भावनाही डाचत राहिली. एकाच घरात राहून मला एक विचित्र एकटेपणाची भावना घुसळत होती. काही दिवसांनी घरात कोणालाही न जाणवलेलं माझ्या मनातलं हे वादळ हळूहळू शांतही झालं याचा अर्थ बदल झाले —माझ्यात किंवा उषा निशांच्यात असेही नाही पण रक्ताच्या नात्यांचे धागे किती चिवट असतात याची वेळोवेळी प्रचिती मात्र येत गेली. मतभेदातूनही आम्ही टिकून राहिलो. तुटलो नाही. आमच्या घरात खर्‍या अर्थाने लोकशाही होती. तसेच वाढे भांडून ममता याचाही अनुभव होता.

एक दिवस पप्पांना घरी यायला खूप उशीर झाला होता. पप्पांची जाण्याची आणि परतण्याची वेळ सहसा कधीच चुकली नाही पण त्यादिवशी मात्र घड्याळाच्या काट्यांची टिकटिक संपूर्ण घराला अस्वस्थ करून गेली मात्र. का उशीर झाला असेल? त्यावेळी मोबाईल्स नव्हते, संपर्क यंत्रणा अतिशय कमजोर होत्या. फारफार तर कुणाकडून निरोप वगैरे मिळू शकत होता. बाकी सारे अधांतरीच होते. चिंतेचा सुरुवातीचा काळ थोडा सौम्य असतो. संभाव्य विचारात जातो. ऐनवेळी काही काम निघाले असेल, पप्पांची नेहमीची लोकल कदाचित चुकली असेल किंवा उशिरा धावत असेल. व्हीटी टू ठाणे या एका तासाच्या प्रवासात काय काय विघ्नं येऊ शकतात याचाही विचार झाला. त्यावेळी आतंगवाद, बाँबस्फोट वगैरे नव्हते पण अपघात मात्र तितकेच होत असत आणि अपघाताचा जेव्हा विचार मनात आला तेव्हा मात्र आमचं घर हादरलं. अशा कठीण, भावनिक प्रसंगी जिजी माझ्यापुढे तिची तर्जनी आणि मधलं बोट एकमेकांना चिकटवून समोर धरायची आणि म्हणायची,” यातलं एक बोट धर. पटकन मी तिचं कुठलंही बोट ओढायची मग ती म्हणायची,” सारं सुरक्षित आहे. बाबा येईलच आता. ” तिची काय सांकेतिक भाषा होती कोण जाणे! मला तर संशयच होता की “हीचं कुठलंही बोट धरलं तरीही ती हेच म्हणेल पण गल्लीच्या कोपऱ्यावर पप्पांची सायकलची घंटा नेहमीच्या सुरात वाजली आणि आम्हा साऱ्यांचे धरून ठेवलेले श्वास मोकळे झाले. ” पप्पा आले. ”

त्या क्षणी फक्त एकच वाटलं की जगातल्या साऱ्या चिंता मिटल्या आता. प्रतीक्षा, हुरहुर, “मन चिंती ते वैरी न चिंती” या वाटेवरचा प्रवास ज्या क्षणी संपतो ना तो क्षण कसा कापसासारखा हलका असतो आणि त्याचा अनुभव किती आनंददायी असतो हे फक्त ज्याचे त्यालाच कळते.

त्यादिवशी रात्री झोपताना उषा माझ्या कुशीत शिरली आणि चटकन म्हणाली, “काय ग आम्ही अजून किती लहान आहोत नाही का? तुमचं तर बरंच काही झालं की…. शिक्षणही संपेल आता. आई पप्पांना मध्येच काही झालं तर आमचं कसं होईल?” ती खूप घाबरली होती की काल्पनिक काळजीत होती नकळे पण तिच्या मनातली भीती मला कळली. मी तिला जवळ घेतलं, थोपटलं आणि म्हटलं,” झोप आता. असं काहीही होणार नाही. ”

आज जेव्हा मी वयाच्या एका संथ किनाऱ्यावर उभी राहून साक्षी भावांनी या सर्व घटनांचा विचार करते तेव्हा जाणवते की घरात लहान भावंडांचे जरा जास्तच लाड होत असतात. त्यांच्यासाठी आई-वडील आपल्याला लागू असलेले अनेक नियम सहजपणे मोडतात. या तक्रारींच्या भावनेबरोबर एक असेही वाटते की लहान भावंडं मोठी होईपर्यंत आई-वडीलही थकलेले असतात का? त्यांच्याही मनात “जाऊ दे आता” असे सोडून देण्याचे विचार सहजपणे निर्माण होतात का आणि त्याचवेळी थकत चाललेल्या आई-वडिलांना पाहताना धाकट्यांच्या मनात असुरक्षिततेची एक भावना निर्माण होत असेल का? त्यादिवशी नकळत उषाने तिच्या मनातली हीच असुरक्षिततेची भावना व्यक्त केली आणि पुढे तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांना बेपर्वाईने कुणाकुणाला दोषी ठरवताना, तिच्यात हीच असुरक्षिततेची भावना असेल का?

असेल कदाचित …

— क्रमश:भाग १७

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares