मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आय. टी.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आय. टी.” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ऐ चला गं भराभर… इतके दिवस नुसतं बेंचवर बसून तो नवा प्रोजेक्ट येण्याच्या आशेवर बसून काढले… वाटलं नव्हतं नवीन प्रोजेक्ट येईल असा… कंपनी ने तर पंधरा दिवसांनी बेंचवर च्या फोर्सला नारळ देण्याचं पक्क केलेलचं होतं… पण समहाऊ नवा प्रोजेक्ट एकदाचा मिळाला… आज त्याची रिव्ह्यू मिटींग काॅल केलीय अरली इन दी मार्निंग… त्यात नेमका उशीर झालाय आपल्याला… बाॅस कधीचा उखडला असणारं… प्रोजेक्ट सुरू करून आठवडाच झालायं…. चार महिन्याची डेड लाईन आहे त्याची… पण बाॅस ने प्राॅडक्शन मॅनेजरला आपल्याला विश्वासात न घेताच जंटलमन वर्ड दिलाय तिसऱ्या महिन्यातच अलाॅटेड जाॅब पूर्ण करून देतो म्हणून… त्याचं कायं गं सांगायला जातयं.. शेवटी आपल्या मानगुटीवर बसून रात्रंदिवस पिळून काढणार आपल्याला आणि हा शेवटी एक नंबरचे रॅंकिंग घ्यायला मोकळा… ॲप्रिसिएशनच्या दिवशी हे श्रेय माझ्या सिनसियर टिमचं आहे असं कोरडं पोकळ शब्दबापुडे कौतुक भरलेल्या मिटींग मधे करताना आपल्या ओठांवर पडलेल्या मधाचा थेंब जिभेने चाटत.. (ए. जी. एमची हांजी हांजी करत) बोलणार आणि सगळं तूप आपल्याच पोळीवर ओढून घेणार आणि आपल्याला… रॅंकिंगच हॅंगिंग करणारं… वर म्हणणार… मॅनेजमेंट ने यंदाच्या वर्षी काॅस्ट कटींगचं टारगेट ठेवल्यानं सगळ्यांना रॅंकिंग नि इयरली इनरक्रीमेंटला कट दिला आहे… म्हणजे वर्षाचा मलिदा कंपनीच्या डायरेक्टर नि मॅनेजमेन्टने खाऊन घ्यायचा आणि प्रत्यक्षातल्या टास्कफोर्सला धतुरा दाखवायचा… मी तर बाई ठरवलयं एप्रिलला जो बोनस, इन्सेटीव्ह जमा झाला कि या कंपनीला कल्टी मारणारं… तसं माझ्या प्रोफाईलला बघून दोन तीन कंपन्यांनी चांगली ऑफर देऊ केलीय.. फिनॅशियल बेनिफिट खात्यावर जमा झाले रे झाले दुसऱ्या मिनिटाला पेपर टाकणार… कोण काम करणारं या आसल्या टाईट पोझिशन्स मधे… आपल्या काय कंपनीचा तुटवडा आहे काय… तू नही तो और सही… साखर कधी संपत नसते.. हंटिंग करत राहिलं म्हणजे साखरेच्या गोडीचा वास लगेचच जाणवतो… मग मोर्चा तिकडे का वळवू नये… आणि पुन्हा तिथं ही असाच अनुभव येतोय असं दिसलं कि आहेच पुन्हा नवा शोध घेणे… हि मु़ग्यांची रांग कधीही संपत नाही.. कुठून नि कशी सुरू होते काही कळत नाही… पण एक मात्र खरं त्यांची हि येजा कधीही एकट्याने होत नसते कायमच मोठी रांगच्या रांग लागलेली असते… ते बाहेर पडलेत कि आत निघालेत हे त्या निघालेल्या रांगेवरून कळत नाही.. पण एक आहे तो साखरेचा कण जेव्हा आपल्या चिमटीत पकडून वाहून नेतात तेव्हा दोन मुंग्या कश्या समोरासमोर आल्यावर संवादाचं शेअरिंग करतात… तसंच आपल्या आय. टी. वाल्यांचं देखील आहे… पर्कची साखर गोडीला कुठली चांगली आहे आणि जास्त काळ पुरणारी आहे इतकी बाब समजलं म्हणजे झालं… चल तर आपण दोघी कॅन्टीन मधे जाऊन कप ऑफ टी घेऊन एकमेंकांना गुडबाय म्हणूया…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काव्यवेडे सावरकर – भाग-२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ काव्यवेडे सावरकर – भाग-२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

(करुण रसाला अनुकूल अशा अक्रूर वृत्तातील गीत, सागराच्या काठी बसून आपल्या हृदयाची व्यथा सांगताना त्यालाच पुन्हा परत घेऊन जाण्याची विनंती करताहेत. पण हा मूळ स्वभावच नाही, त्यामुळे त्यालाही ते धमक्या देतात, ‘अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ‘ आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमर गीत म्हणजे ‘ जयोस्तुते ‘!)…

५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा झाली हे कळल्यानंतर त्यांनी महाकाव्याचा संकल्प केला व रोज दहा ते पंधरा कविता करण्याचे ठरविले. गुरु गोविंद सिंग यांच्यावर २०० आर्या लिहिल्या. महाकाव्याच्या लक्षणात दोन गोष्टी येतात. त्याची काव्यवस्तू व त्याची पद्यरचना!  सावरकरांच्या काव्यातील भावना, कल्पना इतक्या उदात्त आहेत की त्याची अभिव्यक्ती तितक्याच सुंदर पद्य रचनेतून झाली पाहिजे. महान आत्म्याच्या वस्तीसाठी कलेवरही तसेच महान हवे नं!  

प्रथम ‘सप्तर्षी ‘ या महाकव्याला सुरुवात केली. आकाशात सप्तर्षी पाहण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद झाला. व तिथे जाण्याची इच्छा झाली. यातून या काव्याचा जन्म झाला. नंतर तिथे अनुष्ठूप छंदात ‘ कमला ‘ हे दीर्घ काव्य लिहिण्याची इच्छा झाली. ऐन तारुण्यात ते मायदेशाला व संसाराला पारखे झाले. बंदिवासाची आपत्ती आली. त्यामुळे या दीर्घ काव्यात ते स्वतःचे प्रतिबिंब पाहत असतील तर त्यात नवल नाही. या काव्यात तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कमलेच्या नाजूक भावभावनांचे पापुद्रे अगदी अलगद उलगडले आहेत. स्त्री मनाचे आकलन व उकल सुंदर केली आहे.

अंदमानात प्रथम सावरकर कविता

भिंतीवर काट्यांने लिहीत व ती पाठ करून ठेवत. त्यांची खोली बदलली व तिथै येणारा कैदी महाराष्ट्रीयन असेल तर तो भिंतीवरची कविता पाठ करी. पण तुरुंगाधिकाऱ्यांना ते काय लिहितात हे न कळल्याने त्यांचे हातही पायाप्रमाणे बेडीने बांधले जाऊ लागले. मग ते कविता रचून मनात पाठ करू लागले. वीस वर्षे पोर्तुगीजांशी टक्कर दिलेल्या पेशवाईच्या काळावर काव्य लिहिण्याच्या त्यांच्या संकल्पाचा परिणाम म्हणजेच ‘ गोमंतक ‘ हे दीर्घकाव्य!  कोकणच्या राजकारणी घडामोडी विषद करण्याचा हा काव्य प्रयत्न! इतिहासाच्या पृष्ठभूमीवर कल्पनेच्या कुंचल्याने कवीने काढलेले एक चित्र आहे. या काव्याचा पूर्वार्ध निर्यमक रचना असल्याने बंदिवासात ती लक्षात ठेवणे, पाठ करणे अशक्य झाले त्यामुळे ती रचना, अंदमानातून बाहेर आल्यावर शेवटी रत्नागिरीच्या तुरुंगात कागद पेन्सिल मिळाल्यावर त्यांनी पूर्ण केली. या महाकाव्याचा उत्तरार्ध त्यांनी २० मात्रांच्या निर्यमक ‘वैनायक’ या नव्या स्वनिर्मित वृत्तात रचला.

तुरुंगात खितपत पडलेल्या एका वीर युवकाचे विरहोद्गार त्यांनी ‘विरहोच्छ्वास ‘ या काव्यात गुंफले. अक्रूर या वृत्तातील हे विरह शोकाचे उच्छ्वास मनाची पकड घेतात. विरहात आठवणऱ्या पूर्वस्मृती, म्हणजे प्रत्येक उच्छ्वास हे स्वतंत्र भावगीत आहे. अशा चाळीस भावगीतांची सुरेख गुंफण केली आहे.

एक करुणामय व एक क्रूर अशा दोन प्रकारच्या गूढ शक्ती जगात वावरत असतात हे सांगण्यासाठी त्यांनी, घटाघटा रक्त पिणाऱ्या पण पिलांना पाजणाऱ्या व्याघ्री वरून ‘मूर्ती दुजी ती ‘ ही काव्यरचना केली. अंदमानातील प्रसंगावर आधारलेल्या चांदोबा व सायंघंटा या कविता आहेत. चांदोबा दिसल्यावर बालपण, मामाचा वाडा, भावंडे या साऱ्या स्मृती दाटून येतात. दिवसाचे काम संपल्यावर कोठडीत बंद करण्यापूर्वी सायंकाळची घंटा वाजे, त्यावेळी एक दिवस संपला, ही जाणीव होई. ही कल्पना सायंघटा मधे आहे. तसेच एक दिवस मायभूमीची विजय घंटा वाजेल हा आशावाद आहे.

रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यावेळी ‘आकांक्षा ‘ नावाची अतिशय उच्च दर्जाची रूपकात्मक हृद्य रचना लिहून टागोरांना पाठविली. या कवितेत एक गोष्ट आहे. गरुडाच्या जोडप्याला शापामुळे कावळ्यांच्या संगतीत रहावे लागते. पण त्यांची मुलगी एकदा गरुड व साप यांच्यामधील युद्ध पाहते, त्यात गरुड जिंकतो. तो मला हवा हा हट्ट धरते. गरुड प्राप्तीची आकांक्षा सोडत नाही. इतकी यशाची खात्री हवी.

त्यांच्या ‘बेडी’, ‘कोठडी ‘, ‘जगन्नाथाचा रथोत्सव ‘, ‘ निद्रे ‘, ‘मरणोन्मुख शय्येवर ‘ या कविता अध्यात्मिक बैठकीच्या आहेत. अंदमानातून सुटल्यावर आधी अलीपूर नंतर रत्नागिरी तुरुंग शेवटी येरवडा तुरुंगात ठेवले होते. हिंदुस्थानात आल्यावर अंदमानात रचलेल्या काव्याचे जे तुकडे तुकडे आठवतील ते गोळा केले त्यांच्या कविता व कैद्यांनी पाठ केलेल्या कविता घेऊन त्यांनी काव्यसंग्रह पूर्ण केले. कमला व गोमंतक हे १९२३ ला प्रकाशित झाले तर रानफुले हा काव्यसंग्रह १९३४ ला प्रकाशित झाला. शेवटी रत्नागिरीत स्थानबद्ध केल्यावर त्यांनी निबंध, नाटके अशा गद्य लेखनास प्रारंभ केला. नाटकातून त्यांनी काही पद्य रचना केल्या. ‘ स्वदेशी ‘, ‘हिंदू एकता ‘, ‘अस्पृश्यता निवारण ‘, ‘ हिंदुध्वज ‘, ‘सशस्त्रता ‘या काव्यातून राष्ट्र ऊध्दारासाठीची कळकळ, तळमळ लक्षात येते. याशिवाय आर्या वृत्तातील

‘गोदावकिली ‘ मोरोपंती विशेषांनी सजली आहे, ‘बालविधवा दुःस्थिती ‘, ‘टिळक स्तवन ‘ या ही आर्या वृत्तात आहेत. ‘महाराष्ट्र भाटाचे विजय गीत ‘, ‘नाशिक येथील गोदातटाकी ‘, लेडी ऑफ लेक ‘(भाषांतर) या कवितांतून निरनिराळ्या वृत्तांचा वापर केला आहे. शिवाजी महाराजांच्या आरतीत परिलिना वृत्ताचा वापर केल्यामुळे कविता रचनेच्या दृष्टीने सौंदर्य प्रधान झाली आहे. ‘ शिववीर ‘ या गीतात परिलिना ची लय थोडी शिथिल केली आहे त्यामुळे या स्त्री गीताला शोभणारी रचना निर्माण झाली आहे. ‘अनंताची आरती’ आसावरी रागातील असून ‘हिंदू नृसिंह’ मधे भूपती रागाचा सुंदर उपयोग केला आहे. ‘ अटकेवर जरी पटका ‘ हे विजय गीत असल्याने त्याच्या आवेशाला साजेल अशा फटक्याच्या हरिभागिनी वृत्तात आहे.

प्रकाशित परंतु जप्त, प्रकाशित परंतु नाटकातून विखुरलेल्या, काही विस्मृतीत गेलेल्या, अनेक झडत्यांच्या वेळी हरवलेल्या, तुकड्यांवर लिहून पडलेल्या, जप्त होतील म्हणून प्रकाशित न केलेल्या अशा अनेक सावरकर रचित कविता आहेत.

साहित्याचार्य, वेदांततीर्थ, बाळशास्त्री हरदास म्हणतात, “आधुनिक भारताच्या महान वैतालिकात (राजदरबारातील कवी) सावरकरांचे स्थान व्यासांचे आहे, शुकाचे नाही कारण दिव्यत्वाकडे जाणाऱ्या प्राकृतिक ओघाची परागतिक वंचनेपासून मुक्तता करणे तिचे स्वरूप आहे. “

सावरकर रुपातील या अलौकिक बुद्धिमत्तेस शतशः प्रणाम!!!

– समाप्त –

(संदर्भ- वा. गो. मायदेव संपादित ‘सावरकरांची कविता ‘)

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-१ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-१ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

संत साहित्य हा भक्तिमार्गीयांचा शाब्द आविष्कार आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक फार मोठा कालखंड भक्तिमार्गाने दुमदुमला होता. या काळात विविध धर्मपंथ, संप्रदाय होते एवढेच नाही तर उपास्यदेवताही विविध होत्या आणि उपासना मार्गही विविध होते. परंतु त्यांचे प्राणतत्व एकच होते. ते म्हणजे भक्तिभाव!

या परंपरेत दक्षिणोत्तर किंवा पूर्वपश्चिम भारताचा विचार केला तरी महाराष्ट्रात स्थापित असलेला वारकरी संप्रदाय हा खूप महत्वाचा ठरतो. इथल्या संतांची भूमिकाही महत्त्वाची आहे. सर्व भक्तिसंप्रदायांच्या या पसाऱ्यात महाराष्ट्राचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र हा भारताच्या मध्यावर आहे. भाषिकदृष्ट्या आर्यभाषिक प्रदेशांच्या सीमा आणि द्रविड भाषिक प्रदेशांच्या सीमा असलेले शेजारी चारही बाजुंनी आहेत. त्यामुळे उत्तर – दक्षिण, आर्य – द्रविड सर्वांना सामावून घेण्याचे सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र प्राचीन काळापासून करीत आला आहे. व्यापक अर्थाने महाराष्ट्र हे भारतीय संस्कृतीचे संगमतीर्थ आहे असे म्हणावेसे वाटते..

स्थूलमानाने इसवी सनाचे बारावे ते सतरावे शतक हा पाच ते सहा शतकांचा काळ भक्तिमार्गाचा कालखंड मानता येईल. स्वातंत्र्योत्तर काळात काही साहित्यप्रकारांनी जो “आवाज” दिला, तेच काम भक्तीचळवळिंनी मध्ययुगातच केले. समाजातल्या प्रस्थापितांनी धर्मक्षेत्रात जे मापदंड निर्माण केले होते ते भक्तीमार्ग यांनी झुगारून दिले. कृत्रिमता, पाखंड उघडे पाडले. न्यूनगंडातून उपेक्षितांची मुक्ती केली, त्यांचा आत्मविश्वास जागवला. आत्मप्रतिष्ठेचा मार्ग प्रशस्त केला.

वरील हेतू सिद्धीस नेण्यासाठी संत साहित्य निर्माण करावे लागले नाही, तर ते निर्माण झाले. अखिल भारतात काश्मिर ते कन्याकुमारी आणि बंगाल ते आसाम इथपर्यंत अनेक संत झाले. त्यातही स्त्रीसंतांनी सुद्धा साहित्यात खूपच मोलाची भर घातली आहे. विस्तार भयास्तव इथे सगळी नावे घेता येणार नाहीत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर जात, पात, धर्म, स्त्री, पुरुष हा भेदभाव न करता ” आम्ही आनंदे नाचू गाऊ ” म्हणणाऱ्या संतांमधे स्त्री संत अनेक झाल्या.

मुक्ताई!  ज्या कुलकर्णी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून यज्ञोपवित संस्कार करण्यास नकार दिला. निवृत्तीनाथ त्यावेळी दहा वर्षांचे तर मुक्ताई फक्त चार वर्षांची. दादाच तिचे पालक आणि गुरू झाले. त्यात मुक्ताई, तिचा विवाह हे तर दूरदूरपर्यंत शक्य नव्हतं.

पण त्यामुळे मुक्ताईचे साहित्य, तिचे अभंग कम अस्सल ठरत नाहीत. त्यांची काव्यरचना ही अतिशय मौलिक आहे. त्यातही “ज्ञानदेव तुकाराम ” या मध्यमपदलोपी समासात जी वारकरी संत मंडळी आहे, त्या स्त्री संतांमधे संत मुक्ताई, संत जनाबाईचे नाव महत्वाचे आहे. निर्मळा, नागी, कान्होपात्रा, बहिणाबाई, सोयराबाई, लिंबाई, विठाबाई अशा आणखी अनेक स्त्रीसंत आहेत.

मुक्ताबाईंना अतिशय अल्प आयुष्य मिळालं. संन्याशाची मुलं म्हणून आतिशय विचित्र आयुष्य या चारही भावंडांच्या वाट्याला आलं. त्यात मुक्ताई सर्वात धाकटी असूनही सर्वांची आई झाली. समाजातली मिळणारी वागणूक बघून एक दिवस ज्ञानेश्वर महाराज अतिशय दुःखी झाले, आणि झोपडीची ताटी (दरवाजा) बंद करून घेतली. सर्व भावंडांनी त्यांना बाहेर येण्याची विनंती केली. मात्र मुक्ताईने आपल्या अभंगांमधून त्यांचे मन वळवले. तेच अभंग पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले.

चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ॥

शब्दशस्त्रे व्हावे क्लेष । संती मानावा उपदेश ॥

विश्वपट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

*

संत तोची जाणा जगी । दया क्षमा ज्याचे अंगी ॥

लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥

मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

चिमुकल्या बहिणीने केलेली ही विनवणी माऊलींना टाळता आली नाही, आणि ते बाहेर आले. संत कसा असावा याचं अतिशय सुंदर विवेचन यात आहे.

याशिवायही मुक्ताईच्या अनेक अभंग रचना प्रसिद्ध आहेत.

तशीच कान्होपात्रा. ती कोण होती? काय? यावर विवेचन नको. ती फक्त विठ्ठलभक्त होती. स्त्रीसंत होती.

*

नको देवराया अंत अता पाहू

प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ॥

*

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले

मजलागी जाहले तैसे देवा ॥

*

मोकलोनी आस जाहले उदास

घेई कान्होपात्रेस हृदयात “

*

हा तिचा अभंग सर्वश्रृत आहे.

संत बहिणाबाई. सांसारिक सुख तिला फारसं लाभलं नाही. जरठ नवऱ्याशी संसार करावा लागला. त्यांचाही अभंग बघा.

विरक्तीचे मूळ । प्रपंचाचा त्याग

पाहताचि एक । गृह शैल ॥

स्त्री ही मोक्षमार्गातली धोंड आहे ही आजवरची धारणा आहे पण घर हा परमार्थ मार्गातला स्त्रीच्या दृष्टिने फार मोठा असल्याचे ती बोलून दाखवते. अशा अनेक स्त्री संत आहेत. त्यांचं साहित्यही विपुल आहे. मात्र त्यात संत जनाबाई यांचं स्थान वेगळं आणि मोठं आहे.

ते पुढील भागात बघूया!!

क्रमशः… 

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “कन्यादान …. असेही!!” – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कन्यादान …. असेही!!” – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना घेण्याची विनंती करू, देणगी म्हणून ते जे काही मूल्य देतील ते आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पगार म्हणून दिला जाईल.)– इथून पुढे 

  1. लिक्विड वॉश

कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत.

यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे.

हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत,

यातून मिळणारा निधी, पगार देण्यासाठी वापरणार आहोत.

  1. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे… प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे

ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत.

समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी भिक्षेकर्‍यांच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत.

या सर्वातून जे देणगी मूल्य मिळेल तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.

– – तर असे या प्रकल्पाचे… आमच्या संसाराचे प्राथमिक स्वरूप आहे…!  

भविष्यात हळूहळू आणखीही प्रकल्प या माध्यमातून सुरू करण्याचे डोक्यात आहे बघूया कसं जमतं ते…!  

ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे ते लोक दुसऱ्यांनी दिलेल्या उसन्या प्रकाशावर आतापर्यंत चालत होते, या प्रकल्पाच्या माध्यमातून, स्वतःच्या काळ्याकुट्ट आयुष्याच्या मध्यरात्री, ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील… स्वयंप्रकाशित होतील… स्वयंपूर्ण होतील… आणि स्वतःच्या प्रकाशात चालायला सुरुवात करतील आणि म्हणून या प्रकल्पाचे नाव *’मध्यरात्रीचे सूर्य…!!! “

आपल्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून…

  1. प्रत्येक व्यक्तीस रुपये 200 प्रतिदिन देणार आहोत
  1. सकाळचा चहा नाष्टा आणि दुपारचे जेवण.
  1. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा इ. काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस देणार आहोत.

आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छा यामुळे हा प्रकल्प भरभराटीस येईल असा विश्वास आहे!  

माझ्यासाठी हा प्रकल्प नव्हेच, ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या जगण्याचा हा सोहळा आहे.

आपली साथ आणि सोबत आजपर्यंत मिळाली तशीच ती इथून पुढे सुद्धा लागणार आहे, आपण नेमकी कशी मदत करू शकता हे येत्या दोन दिवसात पुन्हा कळवतो.

मध्यरात्रीचे सूर्य पत्ता : 

Jayanti Apartments Hos Soc Swami Vivekanand Rd and Bibwewadi Kondhwa Rd/Sitaram Thakare Rd. Bibvewadi, Pune

(आमची काम करणारी मंडळी सोमवार ते शनिवार (रविवारी सुट्टी) 11 ते 4 या वेळात इथे असणार आहेत, सकाळची रस्त्यावरची कामे करून दुपारी दीड ते चार या दरम्यान मी तिथे असेन)

नेमकं काय घडलं त्या दिवशी – – 

– अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रोडक्शन सुरू झाले पाहिजेच हा माझा हट्ट होता.

– या दिवशी प्रकल्पात करू इच्छिणारे 50 दिव्यांग आजी आजोबा यांनी येथे हजेरी लावली.

– संपूर्ण एप्रिल महिन्यात, कोणत्या बस स्टॉप वर जायचे, कोणत्या बसमध्ये बसायचे, कुठे उतरायचे, कंडक्टरला काय सांगायचे, तिकीट कसे काढायचे, ते किती असते, कुठे उतरायचे याचे ट्रेनिंग झाले.

– सेंटरवर आल्यानंतर माझे लोक काम करतील की नाही हे माझे चॅलेंज नाहीच, बसचा पास काढून देऊन सुद्धा, व्हीलचेअर घेऊन, ज्यांना दंडाला धरल्याशिवाय उभे राहता येत नाही अशा माझ्या माऊलींनी बस मध्ये कसे बसायचे, प्रवास कसा करायचा, सेंटरवर कसे पोचायचे हे माझे मुख्य चॅलेंज आहे, आणि यावर मला तोडगा सुचत नाही.

– सर्वांसाठी एक प्रायव्हेट बस करायची म्हटलं, तर ते कमीत कमी महिन्याचे 80 हजार रुपये घ्यायचे म्हणतात… डोनेशन मधून मिळालेले पैसे फक्त बससाठी द्यायची माझी इच्छा नाही.

बघू…. तर हे सर्व दिव्य करून 50 आजी आजोबा आणि दिव्यांगलोक अक्षय तृतीयेला कामासाठी हजर झाले.

– फुलांचे वर्गीकरण करणे, पावडर करणे, गिफ्ट आर्टिकल तयार करणे अशी अनेक कामे अक्षय्य तृतीयेला सुरू झाली.

– अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आई-वडिल, ज्यांनी जागा दिली ते दानिश भाई, जे हा प्रकल्प चालवायला मदत करणार आहे ते विपुल भाई, लिक्विड वॉश चे सर्व तंत्रज्ञान देणारे मेहता भाई, आणि ज्यांनी सर्व मशीन दिले असे निलेश लिमये, सेंचुरी एन्का यांच्या हस्ते सर्व मशीनची पूजा केली.

– इथे काम करणाऱ्या सर्वांना आपण आयडेंटीटी कार्ड आणि युनिफॉर्म दिला आहे.

– काम केलेल्या सर्व वृद्ध आजी आजोबा आणि दिव्यांग यांना पुरणपोळी तूप आणि चितळे यांची लस्सी दिली आहे, कोरडा शिधा दिला आहे.

लेख वाढत चालला आहे… आता थांबतो…

30 एप्रिल… संध्याकाळी, सेंटरला कुलूप लावताना एका मान्यवरांनी विचारले, ‘उद्या सुट्टी का मग? ‘ 

‘का? कसली सुट्टी? उद्या काय आहे? ‘ मी म्हणालो.

‘उद्या एक मे… कामगार दिन… कामगारांना सुट्टी द्यायची असते.. ‘ ते म्हणाले.

मी त्यांना म्हणालो, ‘ काम करायला आलेले आमचे भिक्षेकरी हे कामगार नाहीत, प्रकल्पाचे पार्टनर आहेत, सुट्टी कामगार घेतात… पार्टनर नाहीत…! ‘ 

यानंतर सेंटरला कुलूप लागले आणि त्यांच्या तोंडालाही…!  

आपले स्नेहांकित,

 

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

डॉक्टर फॉर बेगर्स

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

जागृत दैवत.. माय माझी जोगेश्वरी…

माझे काका (अण्णा)दुपारी मंदिरात ओट्यावर विश्रांती घ्यायचे. दुपारी बारानंतर गुरव जोगेश्वरीचा पोशाख बदलायचे. एकदा आम्ही भावंड तिथेच लपंडाव खेळत होतो. दोन्ही दरवाजे बाराला बंद व्हायचे. गुरव काहीतरी आणायला म्हणून वरच्या मजल्यावर गेले आणि दोन मिनिटातच खाली आले तेव्हां त्यांच्या लक्षात आलं, देवीचा चांदीचा मुकुट गायब झाला आहे. त्यावेळी फोन नव्हते. पण फरासखाना अगदी जवळ होता. आमच्यातल्याच एका जाणत्याला काकांनी तिकडे पिटाळलं, पोलिसांचं भलं मोठ्ठ पथक धावत आलं, काहीजण मंदिराचा कोपरान् कोपरा धुंडाळू लागले काहींनी मंदिराला घेराव घातला, तर काही पोलिसांनी उलट सुलट प्रश्न विचारून आमची भंबेरी उडवली. पोलीस पथक, अथक दोन दिवस धावपळ करीत होते पण यश आले नाही, आणि काय सांगू तुम्हाला!  एक दिवस अचानक चोर मुकुट घेऊन देवीसमोर उभा राह्यला. त्यानी लोटांगण घालून देवीपुढे नाक घासले, डोळ्यातून घळघळा पश्चातापाचे अश्रू ओघळत होते. शब्द फुटले, ” आई मी चुकलो, मी चोरी केली माझ्या हातून पाप घडलंय, पण मला मुकुट परत आणून देण्याची सद्बुद्धी तू दिलीस. मला क्षमा कर देवीआई, माझे अपराध पोटात घाल. ” देवी पुढे क्षमा याचना करणाऱ्या त्याच्या भोवती पोलिसांनी घेराव घातला. चोर पुराव्यानिशी अगदी सहज सांपडला होता आपणहून तो पोलिसांच्या समोर आला आणि म्हणाला, ” इन्स्पेक्टर साहेब बेड्या घाला मला, फटके मारून माझी ‘ ‘खाल ‘उडवा, माझ्या कडून फार मोठं पाप, घडलंय मी अपराधी आहे. मला या पापाचं प्रायश्चित्त मिळायलाच हवं. असं म्हणून त्यानी बेड्या घालून घेण्यासाठी हात पुढे केले, थरथरत्या पायांनी कसंबसं उभं रहात तो म्हणाला, ” पण साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो, मला फक्त अर्धा कप चहा आणि एक बनपाव द्याल का? दोन दिवसाचा उपाशी आहे हो मी!  या पोटासाठी चोरी केली. रात्रभर तळमळत होतो मी. चोरी केल्याची टोचणी मनाला पोखरत होतीच, अपराधी भावनेने, मानसिक ओढाताणीने, उपासमारीने मला ग्लानी आली, मी जमिनीवर कोसळलो. — आणि आणि –पहाटे जोगेश्वरी माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, “उठ!  माझा मुकुट परत मंदिरात नेऊन ठेव. ” सत्य की स्वप्न मला कळेना, साहेब, उठायची पण ताकद नव्हती माझ्या अंगात, मी जागा झालो आणि एक प्रकारचं चैतन्य आलं माझ्या हातापायात. खरं सांगतो, मी आईसमोर कसा? कधी? आलो हे मला कळलंच नाही. ” पश्चातापाने रडणाऱ्या त्या तरुणाला बेड्या घालण्यासाठी, आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस सरसावले. इतका वेळ शांतपणे हा प्रकार बघत असलेले माझे काका आता पुढे झाले, आणि म्हणाले, “इन्स्पेक्टर साहेब मला कल्पना आहे कायद्याने तुमचे हात बांधले गेले आहेत. चोरांनी आपणहून गुन्हा कबूल केला तरी तो कायद्याने गुन्हेगारच ठरतो. पण बेडया ठोकण्याआधी माझी तुम्हाला एक कळकळीची, हात जोडून विनंती आहे, फक्त, फक्त दहा मिनिटं थांबा, ह्याला थोडा वेळ द्या, अपराधी बेकारी मुळे सैरभैर झाला होता, त्यातून उपासमार, पोटात अन्नाचा कण नाही. साहेब माणूस चोरी कां करतो? तर पोटासाठी. रिकाम्या पोटात कावळे ओरडत असतात तेव्हांच रिकाम्या डोक्यात सैतान शिरतो. आणि मग सदविवेक बुद्धी मागे पडून माणसाच्या हातून गुन्हा घडतो. भरल्या पोटी कोण कशाला करेल हो चोरी? जोगेश्वरी च्या दरबारातून त्याला उपाशी जाऊ देऊ नका, फक्त थोडावेळ थांबा. समोरच्या गुंडींच्या हॉटेलमधून मी चहा पाव मागवला आहे, तो या तरुणाला पोटभर खाऊ द्या मग खुशाल त्याला फरासखान्यात न्या”. माझ्या काकांचं बोलणं ऐकून भीतीने आणि भुकेने थरथर कापणारा तो तरुण माझ्या काकांच्या पायावर कोसळला. त्याला प्रेमाने उठवत अण्णा म्हणाले, ” उठ बाळा! माझ्या पाया कशाला पडतोस? जोगेश्वरी आईचे पाय धर. ही सारी तिची कृपा. तिनेच तुला विवेक बुद्धी दिली आहे. ” आणि मग पुन्हा एकदा तो कैदी जोगेश्वरीच्या पायाशी कोसळला. अश्रुंचा अभिषेक माय माऊलीच्या चरणावर झाला.

मंडळी आपणही त्या जोगेश्वरी माय माऊलीच्या चरणावर नतमस्तक होऊ या.

– क्रमशः भाग २९ 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

|| श्री नारद उवाच || 

यज्ज्ञात्वा मत्तो भवति, स्तब्धो भवति, आत्मारामो भवति ॥ ६ ॥

अर्थ : ज्या (प्रेमरूपा भक्तीला) जाणून मनुष्य उन्मत्त (आनंदभरित) होतो, स्तब्ध (शांत) होतो, (आणि) आत्माराम होतो.

“प्रेम-प्रेम सब कोइ कहैं, प्रेम न चीन्है कोय।

जा मारग साहिब मिलै, प्रेम कहावै सोय॥”

*

“प्रीति बहुत संसार मे, नाना बिधि की सोय|

उत्तम प्रीति सो जानिय, राम नाम से जो होय।”

प्रेमात भक्ति हवी की भक्तीत प्रेम हवे…? हा एक मोठा प्रश्न आहे. वर दिलेले संत कबीरांचे दोहे या बाबतीत पुरेसे बोलके आहेत असे खंत येईल…

कबीर म्हणतात, सर्वात चांगले प्रेम कोणते? तर रामानामाची…!  बाकी सर्व व्यर्थ आहे.

मागेही आपण पाहिले आहे की जे अनित्य आहे, त्यावर कितीही प्रेम केले की ते प्रेम अनित्य असणार, अर्थात त्यातून शाश्वत आनंद मिळू शकणार नाही. कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच राहणार, कावळ्याला कितीही वेळा अंघोळ घातली तरी तो गोरा होणार नाही…. नाही का?

आता ज्याला ही सर्व कळतं तो परम प्रेम करू लागतो, तसा प्रयत्न करू लागतो…!  या प्रेमाची खोली अथवा व्याप्ती जसजशी वाढू लागते, त्याप्रमाणात त्याच्या अंतरंगात काही बदल होऊ लागतात…!

साधक मत्त होतो. इथे मत्त या शब्दाचा भावार्थ आपल्याला घ्यायचा आहे. एखादा प्रियकर जेव्हा त्याच्या प्रियसीवर प्रेम करतो, तेव्हा तो तिच्या अनुसंधानात अखंड बुडालेला असतो. त्याला त्याच्या मनात, घरात, घराबाहेर फक्त त्याची प्रियसी दिसत असते. कोणी त्याला आवाज दिला तर त्याला प्रियसीने हाक मारली असं वाटतं. कुठे खुट्ट झालं तर प्रेयसी आली की काय असं वाटत राहत. थोडक्यात सर्व ठिकाणी, सर्वत्र त्याला फक्त त्याची प्रियसी दिसत असते, भासत असते. अशा मनुष्याला लोकं दिवाणा झाला असे म्हणतात, वेडा झाला असे म्हणतात….

रामकृष्ण परमहंस एक असेच भक्त आणि महान सत्पुरुष होऊन गेले. ते कालिमतेचे भक्त होते. काळीमातेने दर्शन द्यावं म्हणून त्यांनी कठोर तपस्या केली. कधीकधी त्यांना उन्माद व्हायचा (भक्तीचा) ते गडबडा लोळत असत. कालिमतेचे नाव घेतले की शांत होत असतं. या वेडाच्या पायीच त्यांच्यावर जगदंबा कालीमाता प्रसन्न झाली. ती त्यांच्याशी बोलू लागली….!  ज्याप्रमाणे आज रामाशी हनुमंताचे नाव जोडले जाते, त्याप्रमाणे कालिमातेशी रामकृष्ण परमहंस यांचे नाव जोडले जाते..!  अलीकडच्या काळातील रामकृष्ण परमहंस हे महान सत्पुरुष आहेत.

शुकाचार्य म्हणतात, भक्त प्रल्हाद हा बालक असताही भगवंताचे ठिकाणीच चित्त आसक्त झाल्यामुळे त्याने अनेक प्रकारची खेळणीही टाकूनच दिली होती. जसे काही श्रीकृष्णरूपी ग्रहाने (पिशाचाने) त्याचे चित्त ग्रासले होते, जगाला तो या रूपाने पाहतच नव्हता. बसता, उठता, फिरता, खाता, झोपता, पिताना, बोलताना, त्या प्रल्हादाला त्या कार्याचे भानच राहत नव्हते. कारण त्याला वाटत होते की, गोविंदाने त्याला चहूकडून घेरलेले आहे. कधी भगवंताचा वियोग झाला असे समजून रडत असे, कधी प्रभूच्या मीलनाचा आनंद वाटून हसत असे, कधी कधी भगवतांच्या लीलाचे गायन करीत असे, कधी मोठमोठ्याने हाक मारीत असे, कधी लाज सोडून नाचत असे, कधीकधी तर तन्मय होऊन स्वतःस श्रीकृष्ण मानून त्या शामसुंदराच्या लीलाचे अनुकरण करीत असे. ‘

भक्तीच्या वाटेवर चालताना अनेक स्थानके येत असतात, असे आपण म्हणू शकतो. भयंकर अश्रुपात होतो, पण तो हवाहवासा वाटत असतो. कधी साधकाची समाधि लागते, त्याला कधी उन्माद स्थिती प्राप्त होते. तर कधी तो एकदम स्तब्ध होऊन जातो. आपण त्यास तटस्थ स्थिती म्हणू शकतो.

साधक द्वैत भावात असेल तर भगवंत सर्व करीत या न्यायाने निश्चिंत असतो आणि अद्वैत भावात असेल तर माझ्याहून भगवंत वेगळा नाही, त्यामुळे मीच सर्व ठिकाणी आहे आणि मीच सर्व काही करीत आहे, हे त्याच्या डोक्यात पक्के असते. त्यामुळे तो बऱ्याच वेळेस स्तब्ध होत असतो….!

प्रेमभक्तीने गोकुळातील गोपिकांना प्राप्त झालेल्या तटस्थ्य अवस्थेचे म्हणजेच स्तब्ध स्थितीचे वर्णन तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून उत्कृष्ट असे केले आहे.

“दिवस राती कांही नाठवे तयासी । पहाता मुखासी कृष्णाचिया ॥

“याच्या मुखे नये डोळियासी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥”

गोपी कायम प्रेम समाधीत असतं असे म्हटले जाते.

शेवटी साधक आत्माराम होतों असे सूत्र आहे – – – 

भक्तीच्या यथार्थ ज्ञानाने तो भक्त मत्त होतो, स्तब्ध होतो, असे सूत्रात प्रारंभी म्हटले आहे. कोणाला वाटेल ही मत्तता, स्तब्धता कदाचित अन्य काही कारणाने ही प्राप्त होऊ शकते, पण भक्ताची ही स्थिती का होते, याचे कारण शेवटच्या या लक्षणात दिले आहे. ‘आत्मारामो भवति’ आत्माराम होणे म्हणजे आत्मस्वरूपी रममाण होणे. मागील सूत्रात ‘न रमते’ असे म्हटले आहे. जीवाचा स्वभाव कोठे तरी रमण्याचा आहे, अज्ञ जीव जड विषयात रमतो, पण भक्त केवळ आत्म्याच्या ठिकाणीच रममाण होतो, हे सिद्ध करण्याकरिता ‘आत्मारामो भवति’ असे म्हटले आहे.

आत्मा हा नित्य समीप आनंदमय आहे. विषय हे दूर आहेत व प्रारब्ध-साध्य आहेत. सर्वानाच अनुकूल विषयाचे प्रारब्ध सिद्ध असते असे नाही तसेच ते विषय प्राप्त झाले तरी त्याच्या भोगात अनेक प्रतिबंध असतात. त्यात आराम मिळणे अशक्यच असते. म्हणूनच गीतेत तिसर्‍या अध्यायातही,

*”यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्‍चमानवः।

आत्मन्येवच संतुष्टस्तस्यकार्य न विद्यते ॥ १७ ॥

(जो केवल आत्म्यातच रत, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्याच्या ठिकाणीच संतुष्ट झाला त्याला कोणतेही कार्य उरत नाही.)

काही सूत्रे आपल्याला तांत्रिक वाटू शकतात. पण ज्याप्रमाणे सुगरण एखाद्या पदार्थात मोहन घालून तो पदार्थ करते, तसे आपण या सूत्रांमध्ये आपल्या “आवडीचे मोहन घालावे म्हणजे ही भक्तिसुत्रे आपल्याला आनंद देत मार्गदर्शन करतील…

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमरावतीचा आलुबोंडा… लेखक – अज्ञात विदर्भीय ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अमरावतीचा आलुबोंडा… लेखक – अज्ञात विदर्भीय ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

देशी चण्यांच्या सनान लालभडक मसालेदार तर्रीत आलिशानपणे डुंबणारा गलेलठ्ठ आलुबोण्डा बघताक्षणीच वैदर्भीय अंतःकरणाला घळाघळा पाझर फुटल्याशिवाय राहात नाही.

या रुबाबदार आलुबोण्डयाला वरून शेवकांद्याचा मुकुट चढवला की ते लोभस रुपडं काही केल्या हॉटेलसमोरून पाय उचलू देत नाही.

म्हणूनच आपल्या विदर्भातले आजोबा गुटगुटीत नातवाला मोठ्या लाडाने “काहून बे आलुबोण्डया!” अशी प्रेमळ विचारणा करतात की नाही?

भगवदगीतेत वर्णिल्याप्रमाणे अगदी “मुखं च परिशुष्यते” अशी अवस्था झालेल्या गलितगात्र योद्ध्याला सुद्धा आलुबोण्डा दाखवला तर त्याच्या तोंडाला पाणी सुटून त्याची हिम्मत वाढेल.

अमरावतीच्या पहाटे डायटिंगचा संकल्प करून निघालेल्या फिगर कॉन्शस पब्लिकचा मॉर्निंग वॉक आलुबोण्डयाच्या टपरीवर समाप्त होतो.

चष्मा घरी विसरले तरी टपरीवर रचून ठेवलेला आलुबोण्डयाचा पहाड खूप लांबूनही बरोब्बर दृष्टीला पडतोच.

१२० च्या स्पीडने सुसाट पळणाऱ्या बाईकला करकचून ब्रेक लावण्याची ताकद आहे आलुबोण्डयाच्या मायावी सुगंधात महाराजा!

प्रारंभी भीत भीत सिंगल आलुबोण्डा ऑर्डर करणाऱ्या नवख्या पाहुण्याचा आवाज तो पोटात गेल्यावर एकदम दणदणीत होतो. मग भारदस्तपणे “एक और लगाना भाऊ! ” अशी दमदार ऑर्डर आपोआप निघते.

याउलट लहान आकाराचा, चपटा, बहिर्वक्र आणि फिकट पिवळा पुणेरी ‘बटाटावडा’ बघून अशी कुठलीही प्रेरणा अमरावतीच्या पोटयना होत नाही. कारण कुठल्याही वयाचे असले तरी पोट्टेशाही जात नाही म्हणून ‘पोट्टेच’ ते.

तर मंडळी, हा बटाटावडा अत्यंत फिक्कट, निस्तेज आणि ऍनिमिया झालेल्या रुग्णासारखा पावाच्या गादीवर निपचित झोपलेला असतो. स्वतंत्रपणे तर्रीबिर्रित पोहण्याचं त्राणच नसतं बिचाऱ्यात. आधीच मिळमिळीत, वरून सुक्या पावाच्या कुबड्या घेऊन येणारा हा बटाटावडा कशीबशी गरजू माणसाची भूक शमवत असेलही कदाचित. पण भरपेट जेवलेल्या टग्यांच्याही पोटात भूक उत्पन्न करण्याचं सामर्थ्य त्याच्यात बिलकुल नसतं.

जातिवंत आलुबोण्डयाला ब्रेडपावाच्या कुबड्यांची बिलकुल गरज नसते भाऊ!  त्याला पाहिजे असतो लालेलाल तर्रीचा स्विमिंग टॅंक!  ज्यांना धारोष्ण तर्री सहन होत नाही, त्यांच्यासाठी आलं लसणाची झणझणीत कढी हा पण एक सुंदर विकल्प असतो.

मात्र साखर घातलेलं गुळचट ताक वगैरे दिसलं की स्वतः आलुबोण्डयालाच मळमळल्यासारखं होत असेल. या जीवलग आलुबोण्डयाला “नको” म्हणणारे कॅलरी कॉन्शस पांढरपेशे वरवर नाकं मुरडत असलेत तरी अंतःकरणातून मात्र हळहळत जिभल्या चाटतात. त्यांचा आत्मा कढईभोवती घुटमळत राहतो, असं म्हणतात.

आजकाल मात्र ठिकठिकाणी नाश्त्यासाठी समोश्याचं प्रस्थ बोकाळलेलं आहे. याचं कारण मैदा हा बेसनापेक्षा स्वस्त पडतो आणि समोसा दीर्घकाळ गरम राहतो हे आहे. बहुतांश अड्ड्यांवर आलुबोण्डे तळण्याची सकाळी एक निश्चित वेळ असते. शौकीन खाऊगुल्ले बरोबर त्यावेळी हजेरी लावतात. त्यांचा ‘अमरावतीचा वक्तशीरपणा’ अगदी वाखाणण्यासारखा असतो. ठराविक गिऱ्हाइकांसाठी स्टॉक तयार होतोच आणि हाहा म्हणता लंपाससुद्धा होतो. “सोल्ड लाईक हॉट केक” हा इंग्रजी वाक्प्रचार पण स्लो वाटेल त्या वेगापुढे. मग पुढे दिवसभर त्यांचं समोश्यांचं गुऱ्हाळ चालत राहतं.

“आलुबोण्डा संपला. ” हे काळजात चिरा मारणारं कठोर वाक्य कधीकधी कानावर आघात करतंच.

अशा बिकट प्रसंगी “आजचा आपला दिवस कसा जाईल? ” याची चिंता त्या भाऊला घेरते. ठरल्या ठिकाणी, ठरल्या वेळी, ठरलेली वस्तु न मिळणं म्हणजे मुहूर्त चुकवल्यासारखं वाटतं त्याला. मग या आकस्मिक मानसिक धक्क्यातून कसाबसा सावरत तो शांतपणे आलुबोण्डा मिळण्याचं दुसरं ठिकाण आठवू लागतो. वेळप्रसंगी लोखंडाचे चणे खाण्याची हिम्मत असणाऱ्या अमरावतीत चे भाऊ देशी चण्यातला ‘आलुबोण्डा’ हा मात्र एकदम विक पॉईंट आहे.

काही ठिकाणी संध्याकाळी आलुबोण्डयांचा दुसरा घाणा काढण्याचा रिवाज आहे. संध्याकाळी शिफ्ट संपवून बाहेर पडणाऱ्या कामगारांसाठी बहुधा कारखान्यांच्या तोंडावरच हे अड्डे असतात. बघताक्षणीच पोटात दंगल उसळावी अन मन रसाळ रसाळ व्हावं अशीच या गुटगुटीत बाळाची ख्याती आहे.

अशाच एका उघड्या टपरीवर, महाकाय कढईत, मावळत्या सूर्यप्रकाशात, खळखळत्या तेलात विहार करणारे चैतन्यमयी सोनेरी आलुबोण्डे माझ्या स्मृतीत अजरामर झालेले आहेत.

लेखक : अज्ञात विदर्भिय…

प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ओंजळ … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ओंजळ … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचताना आज एक ओळ फार आवडली, की महाराज करतल भिक्षा घेत असत.

करतल म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी!!

मला हा शब्द खूपच आवडला. प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी परमेश्वराने जास्तीत जास्त माप म्हणजे ‘करतल’ दिले असावे असे मनात आले.

करतल म्हणजे ओंजळभर!

आता हेच पहा ना…. खूप तहान लागली असली तर फक्त ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते. इतकंच काय.. ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.

आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते.

खुप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा….!!

तर कधी एखादी सलज्ज ललना‌ ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच व्यक्त करू शकते.

बाप रे… केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे….!!

म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे. त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये असे पटकन मनात आले.

दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. किती छान पद्धत आहे भारतीयांची हात जोडून अभिवादन करण्याची!!  

समोरच्याचे मन जिंकायला दोन करतल पुरेसे आहेत. कोणाला धीर देतांना त्याचे दोन्ही करतल आपल्या दोन्ही करतलांनी घट्ट धरले तर समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो ते शब्दांत सांगणे कठीण आहे.

अर्घ्य देतात तेही ह्याच करतलांच्या ओंजळीने आणि एखाद्या स्वमालकीच्या गोष्टीवर पाणी सोडतात तेही ह्याच ओंजळीने!!

ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे दोन्ही करतल जोडून प्रार्थना केली आणि ‘पसायदान’ मागितले… l!

खरंच परमेश्वराने केलेल्या या छोट्या छोट्या योजना माणसाला आत्यंतिक समाधान देऊन जातात. आणि मन जेव्हा असे समाधानाने भरून जाते, तेव्हा आपोआपच शब्द ओठी येतात……….

तेथे कर माझे जुळती!!  

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काव्यवेडे सावरकर – भाग-१  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ काव्यवेडे सावरकर – भाग-१  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

२८ मे हा विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती दिन! या दिवशी कांही लिहावं असं मनात आलं. पण कशावर लिहायचं? एक कवी म्हणून की एक क्रांतिकारी? एक नाटककार की वक्ता की समाज सुधारक? कुटुंबाच्या हाल अपेष्टा बघून द्रवणारा भावनाप्रधान माणूस की अंदमानात कोणत्या परिस्थितीत कवित्व जागं ठेवलं यावर लिहायचं? कां इतर कैद्यांचं प्रबोधन केलं यावर की स्थानबद्ध तेत असतानाही स्वातंत्र्यसंग्रामाला बळ देणारा म्हणून कां एक द्रष्टा राजकारणी कां एक डावलला गेलेला महानायक? जेवढं लिहावं तेवढं थोडं आहे. मी आज फक्त त्यांच्या कवितांच्या दालना मधून एक फेरफटका मारणार आहे.

वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी ‘सवाई माधवरावांचा पोवाडा’ रचला तर १६ व्या वर्षी चाफेकर व रानडे यांच्यावरही बारा चौकी, १९२ चरणांचा मोठा पोवाडेवजा फटका लिहिला. २१ व्या वर्षी

सिंहगडाचा पोवाडा तर २३ व्या वर्षी सुप्रसिद्ध बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा रचला. पोवाड्याचा हेतू वीर रसात्मक प्रसंग निवडून लोकांना स्फुरण देणे हा आहे. त्यामुळे काहीजण पोवाड्यांना वीर काव्य असेही म्हणतात. सावरकरांच्या पोवाड्यात वीररस आहेच परंतु विदग्ध कवीला शोभणारे अलंकार जास्त आहेत. सूर्याजी म्हणतो, ‘जाऊ इच्छिता काय, धरुनी आल्या दोराला, अहो षंढ, तो दोर मघाची लढूनिया मेला’ असे रूपक अलंकार प्रचुर काव्य त्यांच्या पोवाड्यातून आढळते. तानाजीच्या समाधी विषयी सांगताना ते म्हणतात, ‘ मग त्या गडाची भूमी ठेवी, तानाजीस उदरी, तेव्हापासूनि रत्नाकर बहु तिचा द्वेष करी’. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यांनी १८९८ मधे रचलेला ‘स्वदेशीचा फटका’ चांगलाच गाजला.

सावरकरांना टिळक व परांजपे यांच्या प्रयत्नामुळे विलायतेला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि १९०६ साली जून मध्ये त्यांनी हिंदुस्थानचा किनारा सोडला. त्या रात्री जहाजावर त्यांनी ‘ तारकास पाहून ‘ ही कल्पना रम्य कविता केली. ‘आकाशातले तारे म्हणजे नंदनवनीच्या काजव्यांचे थवे की मायेच्या सुनील शालूवरचे लकलकणारे टिकले ‘, अशा कल्पनांवरून कवीचे कोवळेपण जाणवते. या कवितेत सागर व चांदणीचे प्रेम वर्णन केले आहे. शृंगाराचे वर्णन करताना त्यात अतिव पावित्र्य राखले आहे.

विलायतेला गेल्यावर त्यांनी जव्हारवरुन संस्थानचे अधिपती श्रीमंत राजे कृष्ण शहा यांचा गौरव करणारी पत्रात्मक कविता पाठविली. विलायतेतील साडेचार वर्षांच्या वास्तव्यात अभ्यासाबरोबरच त्यांनी ग्रंथ लेखनही केले.

सावरकरांच्या कवितेत उत्कट काव्यागुणांनीं ओथंबलेली भावगीते फारशी आढळत नाहीत. कारण त्यांचे विचार तर्कशील असल्याने भावनेने रंगता रंगता ते तार्किक प्रवचनाच्या प्रांतात कधी शिरतात हे त्यांनाच कळत नाही. ‘प्रियकर हिंदुस्थान’ मध्ये कवी म्हणतो, “तुझ्या जलाही अनंत पितरा दिले तिलांजलिदान, पुण्यभूमी तू! पितृभूमी तू! तू आमुचा अभिमान! ” तसेच ‘स्वतंत्रते चे स्तोत्र ‘, ‘ हिंद सुंदरी ती ‘ अशा विषयातून देशप्रेम दाखविणारी गीते लिहिली आहेत. मुलाच्या निधनानंतर ‘ प्रभाकरास ‘ ही कविता कोमलता, वात्सल्य, असहाय्यता अशा भावभावनांनी परिपूर्ण आहे. ‘तनुवेल ‘ हे उत्कट प्रेमगीत आहे. आर्या वृत्तात लिहिलेली ‘ बालविधवा – दुःस्थिती – कथन ‘ ही कविता म्हणजे त्या स्त्रियांची वकिली थाटात मांडलेली कैफियत आहे.

दोन्ही भावांना भारतात अटक झाली हे कळल्यावर वहिनींना उद्देशून पत्रात्मक कविता ‘सांत्वन ‘ लिहिली. या कवितेत तळमळ, जिव्हाळा ओतप्रोत भरला आहे कारण ही छांदस प्रकारातील ओवीबद्ध शिथिल रचना आहे.

१९०९ साली सावरकर बॅरिस्टरची परीक्षा पास झाले. राजद्रोह न करण्याच्या अटीवर त्यांना सनद मिळणार होती पण त्यास त्यांनी नकार दिला. लवकरच ते राजद्रोहाच्या आरोपावरून पकडले गेले व त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. ब्रिटिश कोर्टाने नंतर त्यांना हिंदुस्थानात धाडण्याचा आदेश दिला पण हिंदुस्थानात गेल्यानंतर आपल्याला अंदमानलाच धाडले जाईल ही भीती होती म्हणून त्यांनी ‘माझे मृत्युपत्र’ ही वसंततिलका वृत्तातील कविता गुप्तपणे आपल्या वहिनी कडे पाठविली. मृत्युपत्रातील त्यांची संपत्ती व तिची केलेली वाटणी आवर्जून वाचावी. भारतात येताना त्यांनी सुटण्याचा धाडसी प्रयत्न केला पण पकडले गेले. आता भारतात गेल्यानंतर आपला अमानुष छळ होणार याची खात्री असल्याने वज्रवृत्तीचे कवच निर्माण करणाऱ्या ‘ आत्मबल ‘ या काव्यात कवी म्हणतो ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला ‘ हे असे अचलधारणा प्रकट करणारे गीत लिहिले.

हिंदुस्तानात खटला चालल्यावर त्यांना आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा झाली. त्यावेळेसच हत्येस चिथावणी या आरोपावरून दुसरा खटला भरला गेला. त्यावेळी त्यांना खात्री होती की आता फाशी होणार. त्यावेळी ‘ पहिला हप्ता ‘ ही देशभक्तीपर कविता लिहिली. मायभूला म्हणतात, “ऋण ते फेडाया | हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितो हा.” अंदमनातील बंदिस्त जीवनाने आयुष्याचा बराच भाग व्यापल्याने त्या अनुभवातून बऱ्याच कविता निर्माण झाल्या आहेत. ‘ पायातील बेडी ‘ हे मनःशल्य असले तरी ती एखाद्या दागिन्याप्रमाणे घासून, पुसून घालावी लागे. नाहीतर ती गंजल्याने जास्तच टोचू लागे. हा विरोधाभास पाहून ते म्हणतात, ” फोडूनि, तोडूनी जी जाळावी, तीच कशी उजळावी आपण, आपुलीची रे बेडी, हौस तुझी ही वेडी ” केंव्हाही मृत्यूच्या स्वाधीन व्हावे लागेल, अशावेळी मृत्यूचा स्वीकार सुखाने करण्याची मनाची तयारी करताना म्हणतात, ” ये मृत्यो! ये तू ये! यावयाप्रती निघालाच असशील जरी ये तरी सुखे, कोमेजुनी जावया भिवोत ही फुले, ही द्राक्षे रसरशीत सुकुनि जावया, भ्यावे ते कां म्हणूनी तुजसि परी मी? ” अशाच ‘ जा झुंज ‘, मला देवाचे दर्शन घेऊ द्या ‘ या ही भावगीताचे नमुने म्हणून सांगता येतील. पण या सर्व कवितांवर राज्य करणारी कविता किंवा भावगीत म्हणजे, ‘ सागरा प्राण तळमळला ‘! आपण आपल्या प्रतिभेचे देणे देशप्रेमाच्या आविष्कारात वेचले पाहिजे, अशी सावरकरांची तळमळ होती. करुण रसाला अनुकूल अशा अक्रूर वृत्तातील गीत, सागराच्या काठी बसून आपल्या हृदयाची व्यथा सांगताना त्यालाच पुन्हा परत घेऊन जाण्याची विनंती करताहेत. पण हा मूळ स्वभावच नाही, त्यामुळे त्यालाही ते धमक्या देतात, ‘अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ‘ आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमर गीत म्हणजे ‘ जयोस्तुते ‘!

क्रमशः… 

(संदर्भ- वा. गो. मायदेव संपादित ‘सावरकरांची कविता ‘)

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझी जिथे घरगुती जेवणाची सोय झालेली होती ते घर आणि त्या घराशी जुळलेले माझे भावबंध हा माझ्या शेगावला जाण्याच्या उत्कट इच्छेच्या पूर्तीसाठी गजानन महाराजांनीच योजनापूर्वक निवडलेला अल्पकाळासाठीचा एक थांबा होता याची त्या क्षणी तरी मला कल्पनाही नव्हती!)

माझी अचानक अहमदनगरला बदली झाल्यानंतर योग्यवेळी आलेलं ते एक वळण होतं. हे वळण माझ्या ऋणानुबंधांचाच एक भाग होतं हे माझ्या अकल्पितपणे लक्षात आलं ती खूप नंतरची गोष्ट.

अचानक उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीत त्या काकूंनी गरजूंसाठी घरगुती जेवणाचे डबे द्यायला सुरुवात करून घराचा डोलारा हिमतीने सांभाळलेला होता ती त्यांची मुले लहान असतानाच त्यांचं सौभाग्य हरवलं होतं तेव्हाची गोष्ट! आता मुलं हाताशी आली होती, घरखर्चापुरतं कमवत होती, आईला आता दगदग करू नको, आराम कर म्हणत होती, तरीही सुरुवातीपासून जोडलेल्या चार दोन घरी जेवणाचे डबे देणं त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. खरंतर ते कुटुंब कष्टातून वर येत होतं तेव्हाही घराचं घरपण टिकावं म्हणून काकूंनी घरी येऊन जेवणारे मेंबर्स कधीच स्विकारले नव्हते आणि आजतागायत तेच धोरण त्यांनी अवलंबलं होतं. त्यांनी स्वत:च ठरवून घेतलेल्या या नियमाला मी मात्र अपवाद ठरलो होतो. याला निमित्त ठरले होते ते आमच्या ब्रॅंचमधले श्री. कुलकर्णी. त्यांच्या शेजारचंच हे कुटुंब. केवळ या कुलकर्णींनी केलेल्या विनंतीला मान देऊन काकूंनी माझी जेवणाची सोय करायचं मान्य केलं होतं हे नंतर गप्पांच्या ओघात काकूंकडूनच मला समजलं.

काकू स्वयंपाक खूप रुचकर करायच्या. अगत्यानं, प्रेमानं वाढायच्या. ते घर भेटलं नसतं तर मला सगळं निभावणं खरंच खूप अवघड गेलं असतं.

अहमदनगरमधलं माझं रुटीन असं मार्गी लागलं तेव्हा इथली उर्वरित तीन वर्षे सुरळीत जाणं फारसं जिकीरीचं नसेल असं मला वाटलं खरं पण त्याच दरम्यान पडद्यामागे अशा कांही घटना घडत होत्या की त्या माझा इथला अन्नाचा शेर संपवण्याला लगेचच निमित्तही ठरल्या!

इथे येऊन मला फार तर चार महिनेच झाले असतील. मी त्या दिवशी नेहमीप्रमाणे काकूंकडे जेवण करून ब्रॅंचला जाण्याऐवजी, सकाळीच कांही महत्त्वाच्या कस्टमर्स व्हिजिट्स असल्याने उशीरा जेवायला जायचं ठरवून तसा निरोपही काकूंकडे देऊन आलो, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की हा माझा इथला अखेरचा दिवस असणार आहे. कारण त्यादिवशीच्याच इनवर्ड मेलमधे माझी तातडीने अकोला ब्रॅंचला बदली झाल्याची ऑर्डर होती! हे सगळंच अकल्पित, अनाकलनीय आणि चक्रावून टाकणारं होतं! हे सगळं कां? .. कशासाठी? .. हे प्रश्न त्या क्षणी तरी निरूत्तरीतच होते. पुढे त्याचं जे कारण समजलं तेही तसं अकस्मात निर्माण झालेलं असंच होतं. ऍडव्हर्स ऑडिट रिपोर्टमुळे अकोल्याच्या मॅनेजरची रातोरात गच्छंती झालेली होती आणि तातडीची गरज म्हणून मग तिथं कुणाला तरी पाठवायलाच हवं, म्हणून माझं हे पोस्टींग. ‘.. पण मीच कां? ‘ याला समाधानकारक उत्तर नव्हतं. ही गजानन महाराजांनी सुरू केलेली माझ्या परीक्षेची सुरूवात असावी अशी पुसटशी शंकाही तेव्हा मनात यायचं कांही कारण नव्हतं. पण लौकरच त्याची प्रचिती मात्र येणार होती आणि आश्चर्य म्हणजे याचं सूतोवाच व्हायला निमित्त ठरणार होत्या या काकूच!

खरंतर इथलं रुटीन नुकतंच सुरळीत सुरू झालं तेव्हा मला आता निदान महिन्यातून एका वीकेंडला तरी सांगलीला घरी जाता येईल हाच विचार मनात येऊन मी त्यातच समाधान मानलं होतं. आणि आता मी कधी विचारही करू शकणार नाही अशा अकोल्यासारख्या दूरच्या ब्रॅंचमधे झालेली माझी ही अशी बदली यांचा मेळ बसवायचा कसा?

माझ्यापुरता विचार करायचा तर ही बदली अकाली आणि अन्यायकारकच नव्हती फक्त तर माझ्या दैनंदिन अडचणी प्रचंड प्रमाणात वाढवणारीही ठरणार होती. ही ट्रान्स्फर आॅर्डर वाचली त्याक्षणी तरी मला ती पनिशमेंटच वाटली होती. तोवरच्या माझ्या २८ वर्षांच्या बॅंकिंग करिअरमधे सतत होत आलेलं माझं कौतुक आणि मिळत गेलेलं यश यांना परस्पर छेद देणारी अशीच ही शिक्षा आहे या विचाराने मी अस्वस्थ होतो. आता कुठल्याही क्षणी झोनल ऑफिसचा तातडीनं रिलीव्ह होण्याचा फोन येईल हा विचार मनात आला आणि आठवण झाली ते मी रोज जेवायला जात होतो त्या काकूंची. मग घाईघाईनेच ब्रँच-रूटीनची व्यवस्थित घडी बसवून दुपारी एक-दीडच्या सुमारास त्यांच्या घरी जेवायला जाण्यासाठी मी ब्रॅंचमधून बाहेर पडलो. त्यांना माझी बदली झालीय हे सांगायला तर हवंच या विचाराचंच दडपण वाटत राहिलं. ते घर आणि तिथली माणसं यांनी माझ्या नेमक्या गरजेच्या वेळी मला कसलेही आढेवेढे न घेता केलेली मदत माझ्यासाठी खूप मोलाची होती. अतिशय अतूट असे हे ऋणानुबंधच आहेत अशीच माझी भावना होती. आता इथून कायमचं निघून जावं लागणाराय हे नाईलाजाने मी स्वीकारलं, तरी तसं काकूंना सांगणं मला खूप जड जाणार होतं. आज रात्री जेवायला येऊ तेव्हा सांगूया कां असंही एकदा वाटलं पण आजच अचानक रिलीव्ह व्हायला लागलं तर? .. हा विचार मनात आला आणि मी नाईलाजाने त्यांना हे आत्ताच सांगून टाकायचं असं ठरवलं. हे सगळे उलट सुलट विचार मनात घेऊनच मी बेल वाजवली. जेवणासाठी पानं घेऊन काकू माझीच वाट पहात होत्या.

“आज खूप उशीर केलात? ” आमच्या दोघांचीही पानं वाढता वाढता त्यांनी विचारलं.

“हो ना. तुम्ही जेवला नाहीत अजून? “

“तुमचीच वाट पहात होते. ” त्या म्हणाल्या.

भूक लागली होती तरी जेवणात माझं लक्षच नव्हतं. जे सांगायचं त्यासाठी मी शब्द जुळवत राहिलो.

” काकू ” मी क्षणभर घुटमळलो. “.. माझी बदली झालीय.. “

त्यांनी अविश्वासाने चमकून माझ्याकडे पाहिलं.

“बदली? अशी मधेच? “

त्यांना झालेला विषाद त्यांच्या शब्दांत झिरपलेला होता.

“कुठं झाली म्हणायची? “

“अकोल्याला. “

“अकोला? कुठलं अकोला? म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातलं, जवळचंच ना? “

“नगर जवळचं म्हणजे? “

“इथं आपल्या नगर जिल्ह्यांत एक खेडंगाव आहे ना अकोला नावाचं. तिथंच ना? “

“छे छे.. नाही. तिथं आमच्या बँकेची ब्रॅंच नाहीये. माझी बदली झालेलं हे अकोला नागपूर जिल्ह्यात आहे. “

” हां. ते कां? माहितीय. ते गजानन महाराजांच्या शेगाव जवळचं. ” त्या म्हणाल्या.

अपेक्षितपणे त्यांचे हे शब्द कानावर पडताच मी चमकून त्यांच्याकडे पहातच राहिलो.

“कां हो? काय झालं? “

“अ..? नाही.. कांही नाही. मला.. मला.. हे माहित नव्हतं. शेगाव अकोल्यापासून जवळ आहे कां? ” मी उत्सुकतेने विचारलं.

“हो तर. अगदी जवळ. एस. टी. ने फार फार तर तासाभराचं अंतर. “

मी थक्क होऊन ऐकतच राहिलो. या क्षणापर्यंत मला अडचणीची, नकोशी वाटणारी ही बदली महाराजांनीच घडवून आणलेली आहे असा विचार मनाला स्पर्शून गेला आणि मी शहारलो. ताई गेल्यानंतरच्या अस्वस्थतेत मी अतिशय तळमळीने गजानन महाराजांना मनोमन केलेली प्रार्थना आठवली आणि मन भरून आलं. आपली बदली ही आपत्ती नाही तर इष्टापत्ती आहे हा विचार मनात आला आणि शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याचा अचानक आलेला हा योग मनाला उभारी देऊन गेला. त्याच मनोवस्थेत मी काकूंचा निरोप घेतला. जाण्यासाठी वळणार तेवढ्यांत त्यांनी मला थांबवलं.

” नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन, महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रूजू व्हा. सगळं छान होईल. ” त्या म्हणाल्या.

मी हेच तर ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच वाटलं आणि मी निश्चिंत झालो!

पण…? हे वाटतं तेवढं सोपं नसणाराय, यानंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारच ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मात्र मला नव्हती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares