मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई … ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई …  ☆ डॉ अभिजीत सोनवणे

साधारण चार वर्षांपूर्वी COVID लॉकडाऊन काळात मला भेटलेली एक माऊली… 

स्वतःचं सर्व आयुष्य उध्वस्त झालेलं… 

मुलं सोडून गेलेली… 

आयुष्य संपवायच्या विचारात असलेली…

 

त्याच टप्प्यावर एक अपंग मुलगा तिच्या आयुष्यात येतो… 

ती त्याचं मातृत्व स्वीकारते…. 

70 व्या वर्षी ती पुन्हा आई होते… 

त्याच्या आनंदासाठी ती कोणत्याही थराला जावू शकते… 

….. फक्त एक आईच हे करू शकते…. !!! 

 

हा सर्व भावपूर्ण प्रसंग मी माझ्या शब्दात ” आई ”  या शीर्षकाखाली मांडला होता ! 

 

श्री. व सौ. भाविका काळे हे माझे स्नेही… त्यांचा मुलगा विवस्वत काळे… ! 

कोवळ्या वयातच या मुलाने दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहिले… ! 

पहिल्यांदा हा मला भेटला, त्यावेळी मी त्याला विचारले, “ बाळा आयुष्यात तुला पुढे काय करायचंय ?” 

 

“ समाजाला एक सकारात्मक दिशा मिळेल… नुकत्याच उमलणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना एक आशा मिळेल; असे चित्रपट मला पुढे बनवायचे आहेत काका …  मला व्ही. शांताराम सर, सत्यजित रे साहेब यांच्यासारखा दिग्दर्शक व्हायचंय… “ .. ठाम स्वरात विवस्वत बोलत होता. 

…. हा मुलगा जेमतेम १८  वर्षाचा सुद्धा नसेल… 

 

अठरा वर्षांचा असतानाचा मला मी आठवलो … 

शाळा / कॉलेज बुडवून, दे धमाल हाणामारीचे पिक्चर मी मित्रांसोबत पाहायचो… 

एकतर डोअरकीपर आमचा मित्र असायचा… आमच्या भीतीने तो तिकीट नसतानाही गप गुमान आम्हाला आत सोडायचा… 

एखाद्या अनोळखी डोअरकीपरने आत सोडायला आम्हाला अटकाव केला तर, चित्रपटाआधीच आमच्यातल्या प्रत्येकाच्या अंगात बच्चन… मिथुन… धर्मेंद्र यायचा… ! 

… मग त्या नवीन डोअर कीपरचा आम्ही “चुथडा” करायचो… ! 

 

मी साधारण त्यावेळी बारावीत असेन… 

मला कोणतीही दिशा नव्हती… ! 

वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये…. वडिलांचे मित्र म्हणजे लय मोठे अधिकारी… 

ते घरी यायचे आणि मला विचारायचे, “ बाळा आयुष्यात पुढे तू कोण होणार आहेस… ? “

मी नव्या नवरीगत खाली मान घालून उत्तर द्यायचो… “ बच्चन, मिथुन किंवा धर्मेंद्र… ! “

….. ते मोठे सायेब गेल्यावर, बापाचा लय मार खात असे मी… ! 

 

आम्हाला … म्हणजे आमच्यासारख्या मुलांना एक सकारात्मक दिशा मिळेल… नुकत्याच उमलणाऱ्या, आमच्यासारख्या तरुणांना एक आशा दिसेल, असे आमच्यापुढे कोणीच रोल मॉडेल नव्हते… किंवा असतील तर त्यांना पाहण्याइतपत … समजण्याइतपत आमची अक्कल आणि लायकी नव्हती…  

 

‘ अशा मोठ्या लोकांना पहा रे… समजून घ्या रे बाळांनो… ‘   हे प्रेमानं सांगणारे लोकही आम्हाला त्यावेळी भेटले नाहीत… ! 

मला फक्त आठवतात… चुकलो म्हणून मुस्काटावर खणखणीत मारलेला हात…. आणि ढुंगणावर बसलेली लाथ… !

 

…. “हात” आणि “लाथ” यापेक्षा आमच्यासारख्या नालायक मुलांशी, थोडीशी जर कोणी केली असती “बात”….  तर आम्ही बी घडलो असतो… ! 

… पण नाही… आम्ही बिघडलो…. ! 

 

“ सर…” विवस्वत ने हाक मारली आणि मी डोळे उघडून, भूतकाळातून पुन्हा वर्तमान काळात आलो…!

“ सर मला तुमचा “आई” हा अनुभव आवडला आहे…  आणि मी त्यावर शॉर्ट फिल्म करू इच्छितो, आयुष्याची सुरुवात … ध्येयाची सुरुवात मी आपल्यापासून करू इच्छितो… आपल्या शब्दांनी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल समाजामध्ये…आपण मला शॉर्ट फिल्म करायची परवानगी द्याल काय ?” 

 

डोळे उघडून मी जागा झालो…  

…. जगाने “ना लायक” ठरवलेल्या माझ्यासारख्या एका मुलाला, विवस्वत नावाच्या दुसऱ्या एका “लायक” मुलाने दिलेली ही सलामी होती…

माझ्या डोळ्यात पाणी होतं… !!! 

 

मी त्याला म्हणालो,  “ ए भावा, समाजाला दिशा किंवा तरुणांची आशा म्हणून माझे शब्द किती योग्य ठरतील मला माहीत नाही रे… पण तू आयुष्याची सुरूवात माझ्या सारख्या नालायक माणसापासून करू नकोस… समाजात खूप लायक आणि नायक लोक आहेत… तू त्यांची एखादी कथा किंवा अनुभव घे ना..!”

 

“ सर, प्लीज तुम्ही लायक आहात किंवा नालायक हे समाजाला ठरवू द्यात… विवस्वत सारख्या मुलांना ठरवू द्यात… तुम्ही जजमेंट नका देऊ…”  सौ भाविकाताई काळे, विवस्वतची आई बोलली. 

…. यापुढे परमिशन देण्या आणि घेण्याचा प्रश्नच नव्हता… ! 

 

यानंतर या छोट्या मुलाने, “आई” नावाने एक शॉर्ट फिल्म बनवली… 

ती जगभर गाजली… 

माझ्या शब्दांना त्याने चित्ररूप दिले… ! 

या शॉर्ट फिल्मची लिंक खाली देत आहे…

…… शॉर्ट फिल्म आवडली, तर त्याचे सर्व श्रेय विवस्वतचे… ! … माझा रोल करणाऱ्या श्रीपाद पानसे यांचे… 

… आजीचा रोल करणाऱ्या श्रीमती आरती गोगटे यांचे… 

https://youtu.be/zhm6g-X2IoQ?si=J-1bGa6aAKZlXaiv

नाहीच आवडली फिल्म, तर सर्व शिव्या या  ना – लायकाच्या पदरात घाला… ! 

मी पदर पसरून उभा आहे माऊली… !!! 

आपला;

डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जठराग्नीत उजळलेलं सोनं !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“जठराग्नीत उजळलेलं सोनं ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… अर्थात भुकेलाही खाऊन उरलेली माणसं !

क्षुधा हा संस्कृत शब्द..आणि भूख बहुदा जर्मन भाषेतून जगभर पसरलेला शब्द…आपल्याकडे भूक  अर्थात या शब्दाच्या आधीपासूनच जगात भूक आहेच..सर्वव्यापी! भुकेचा आणि पोटाचा संबंध असणं स्वाभाविक आणि त्यामुळे भुकेल्या पोटी,अर्धपोटी राहिलेल्या लोकांचाही इतिहास असणं स्वाभाविक. 

भुकेपोटी भीकेला लागलेली माणसं,जठराग्नी शांत करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी  जगाने पाहिलीत तशी भुकेला खाऊन राहिलेली माणसंही पाहिलीत…ती संख्येने अगदी थोडी असली तरी! 

खरं तर जगात अन्नाची कमतरता कधीच नव्हती. कमतरता होती आणि आहे ती अन्नाच्या समान वितरणाची. कुणाचं ताट शिगोशीग भरलेलं तर कुणाचं ताट निरभ्र आकाशासारखं…रितं! माणसं दैव नावाच्या कुंभाराने घडवलेलेल्या मडक्यांसारखी.. कुणाच्या मुखी लोणी तर कुणा मुखी अंगार पडतो. 

देवाला जगात यापुढे अवतार घ्यावा लागला तर तो भाकरीच्या रुपात घ्यावा लागेल,असं म्हणतात. ज्यांची पोटं भरलेली आहेत आणि ज्यांची रिकामी आहेत…हे दोन्ही गट देवाने अवतार घेण्याची वाट पाहताना दिसतात! 

गानकलेच्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर चिरंजीव विराजमान झालेली स्वरांची अपत्ये म्हणजे दीनानाथ आणि माई मंगेशकर यांची पंचरत्ने. त्यांनी, विशेषत: लतादीदी आणि आशाताई या दोघींनी मिळून तर दोन्ही ध्रुव आपल्या आवाजाच्या कवेत घेतले. हृदयनाथ,लता,आशा,उषा आणि मीना यांचे यश देदीप्यमान आहेच. पण त्यापेक्षाही त्यांनी भुकेशी दिलेला लढा असामान्य असाच म्हणावा लागेल. या संघर्षातून त्यांची व्यक्तिमत्वे घडली….अनेक कंगोरे असलेली. ज्याने भूक अनुभवली त्याच्या जीवनात तो अनुभव कदापि विसरता न येणारा असतो. किंबहुना पानात पंचपक्वान्ने वाढलेली असताना, त्यांच्या जिव्हाग्री त्यांनी उपवासनंतर चाखलेला पहिला घास नांदत असतो….आणि तो भरवणारा हातही! 

दैनिक सकाळ सप्तरंग पुरवणीत गेले काही महिने रविवारी पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महान इतिहास शब्दबद्ध करून ठेवत आहेत….त्यांचे हे कार्य सिद्धीस जावो,ही माता सरस्वतीचरणी प्रार्थना. आजच्या लेखनात माई,आशा,उषा आणि हृदयनाथ यांनी त्यांच्या खानदेशातील गावातून मुंबईपर्यंत केलेल्या रेल्वे प्रवासाची आठवण लिहिली गेली आहे. 

संपूर्ण प्रवासभर सहप्रवासी विविध पदार्थ सेवन करीत असताना प्रचंड भुकेजलेली ही मुलं कुणाकडे हात पसरत नाहीत. पाणी पिऊन भुकेची समजूत काढत काढत उघड्यावर निजतात. किती तरी तासांनी पुढ्यात आलेल्या बिस्किटास आईच्या संमतीशिवाय हात लावत नाहीत. त्यांच्या समोर इतर माणसं जेवून उठत असताना यांच्या चेह-यावर बुभुक्षितपणाची रेषाही उमटत नाही. पहिल्या पंगतीतून काही कारणाने उठावे लागते आणि दुस-या पंगतीत त्यांच्या आईने, माईने दाखवलेला बाणेदारपणा भुकेवर मात करून पंगत सोडून उठतो…आणि ताठ मानेने पुढच्या प्रवासात निघतो! 

तिस-या दिवशी हाता तोंडाची गाठ पडायची होती….पण इथे तो हात दैवी होता आणि तोंड बाळाचे होते. माई,आशा,उषा इत्यादी समोर असताना त्यांच्याशी न बोलता दीदी थेट हृदयनाथ यांच्याकडे आल्या आणि त्यांना अन्नाचा घास भरवला….हा पहिला घास अमृताचा न ठरता तरच नवल! जठरात पेटलेल्या अग्नीत हे स्वर-सुवर्णालंकार काळाने घातले ते जाळाव्यास नव्हेत तर उजळावायास…आणि त्यांचा प्रकाश सा-या जगाने अनुभवला आहे! 

प्रत्यक्ष हा लेख वाचताना प्रत्येक सहृदय माणसाच्या पोटात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही..असाच हृदयनाथांनी लिहिलेला अनुभव आहे. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… ज्याचं त्याचं प्राक्तन किती वेगवेगळं असतं… हे जागतिक सत्य आहे आणि ते सर्वांना विदीत असतचं… फरक एव्हढाच असतो आपल्या सगळ्यांना मात्र हवं असतं फक्त अनुकूल असणारं प्राक्तन… म्हणजे बघा अथ पासून इति पर्यंत.. नव्हे नव्हे आदी पासून अंतापर्यंत अर्थात जन्मापासून ते मृत्युपर्यंत सगळा आयुष्याचा प्रवास कसा सुशेगात आणि सुखात होईल.. आता त्या मिळणाऱ्या सुखाची मात्रा थोडीफार कमीजास्त चालते पण अगदीच सुख मिळूच नये अशी भावना कधीच नसते बरं त्यात… तो आला राजा सारखा, सुखाचा जगला नि गेला अशी मागची जगरहाटी बोलत राहावी हिच एकमेव इच्छा असते…. पण पण…

प्राक्तनाचं दान देणाऱ्याच्या मनात नेहमी वेगळचं काहीतरी असतं… आपल्याला कायमचं ते गुढ असतं, रहस्यमय असतं… चारचौघांसारखाच असणारा आपला हा आयुष्याचा प्रवासात सतत आपल्या वाट्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळचं येत असतं… अनाकलनीय गोष्टी घडत असतात… अगदी कितीही पद्धतशीरपणे नियोजनबद्ध जगायचं आपणं ठरवतो हो पण तो नियंता तिसरचं आपल्या भाळी मारत असतो…घालमेल होते तेव्हा आपल्या जिवाची… सगळ्यांनाचं भलं करणार आपल्यालाच कसा विसरला असा प्रश्न पडतो.. आणि गमंत म्हणजे हे असं प्रत्येकाच्या मनात तस्सचं येतं.. मग तुम्ही कसंही जगा.. स्वतःसाठी, दुसऱ्या साठी काहीही फरक पडत नाही… जे जे होणार ते ते ठरल्याप्रमाणे तसेच होणार… ना आपल्याला ना दुसऱ्याला त्यात काडीमात्र बदल घडवून  आणता येत नाही… साधी गोष्ट जन्म कुठे कधी व्हावा ते शेवटचा श्वास कधी कुठे सोडून द्यावा आहे का आपल्या हातात… मग या दोघांच्या मधल्या प्रवासातील अनेक गोष्टींचा आयुष्यभर आटापिटा करत असतो तो अनुकुलता असावी… पण प्रतिकुलतेची छाया सतत मंडरत राहते आणि आपला संघर्ष तिथे सुरू असतो… क्षणाचा आनंद मिळतो आयुष्याची बाजी लावून… संघर्षात उभे असतात आपलेच म्हणवारे,शत्रू, हितचिंतक… मुखवटे घातलेले चेहरे दाखवून…आणि आणि यादी कितीही मोठी करता येईल… तर हा सगळा प्रपंच आठवला कशावरून… ते प्राजक्ताचं फुल दिसलं आणि हा फापट पसारा मांडत गेलो…

प्राजक्ताचं इवलं इवलसं नाजूक सुकोमल फुलं बघाना..  उमलून येतं तेव्हा सुंगधाने  किती परिलुप्त असतं.. फांदी फांदीवर लगडलेलं दिसतं.. किती किती प्रसन्न, टवटवीत नि आनंदविभोर असतं ते स्वतः आणि इतरांनाही ते तसाच अनुभव देतं… त्या प्राजक्तांच्या फुलांकडे बघताना प्रत्येकाला त्या फुलांबदल प्रेम हे वाटतचं… असं वाटतं या फुलानं असचं कायम या फांदीवर झुलत राहावं… पण तो वाहणारा वारा मात्र दोषाचा धनी होतो… अगदी मंद झुळूकेच्या रूपात वाहत  जातो तेव्हा तो या निष्पाप फुलांना फांदी वरून अलगदपणे उचलून घेऊन जातो आणि आणि मधेच जड झाले बुवा आता तू माझ्या मागे मागे चाली चाली करत ये बरं असं सांगून त्या फुलांना तो जमिनीवर सोडून जातो… काही वेळ ती अबोध फुलं जमिनीवरून देखील वाऱ्यासह घरंगळत पुढे पुढे जाउ लागतात… पण तो प्रवास अल्पजीवी असतो.. त्यांचं सुकोमल देह धुळीत, मातीत लोळून गेल्यानं दगड धोंडे यांसारख्या अडथळ्यांना तटल्याने   थकून जाऊन गलितगात्र होऊन मातीमय होतात… आपला शेवटचा श्वास त्या मातीमध्ये घेताना त्या मातीला आपला सुगंध अर्पण करून जातात… जवळपास सगळ्या फुलाचं असचं होतं… पण काही फुलं वाऱ्याने इतस्ततः होतात., भरकटतात… एकटीच पडतात… शोध घेत असतात इतरही फुलांचा ती कुठे आहेत… पण तो शोध कधीच लागत नाही… मग एकटेच पडल्याने त्यांच्या नशीबी बेवारसाचं मरणाला सामोरं जावं लागतं…जगणं आनंदाचं झालं वाटतं नाही तोच बाभळीच्या काट्यासारख्या झाडांच्या फांदीत अडकून पडणं होतं.. अरे तू कोण आहेस.. आणि इतका सुंदर सुगंध तुझ्याजवळ कोठून आला… थोडा आम्हालाही तो सुंगधानं न्हाऊ घालना.. नाही तरी आमच्या जगण्याला तसा काहीच अर्थ उरलेला नाही… ना आमच्या कडे कधी कोणी ढुंकूनही पाहिले जात नाही… आज तू आमच्या तावडीत बरा सापडला आहेस.. तेव्हा आमचं सगळ्याचं जिणं सुगंधीत करं बरं… असं म्हणून  त्या प्रत्येक काट्याने त्या फुलाला कवटाळून घेण्यास सुरुवात करायला घ्यावी… या काट्यांच्या धुसमुळेपणाने त्या प्राजक्ता च्या फुलाच्या नाजूक देहाला कैक ओरखडे बसू लागतात…एकेक पाकळी विर्दिण होत जाते.. छिन्नविछिन्न  होते.. केशरी देठ अलग होऊन  तो एकिकडे खाली मातीत पडतो  नि त्या त्या पाकळ्या आपला निश्वास सोडत दूर दूर मातीत गलितगात्र होऊन पडतात… त्या आक्रस्ताळी काट्यांना प्राजक्ताचा  सुगंध तर मिळालाच नाही… उलट  जनमानसाकडून त्याच्या या कृत्याची निर्भत्सना मात्र त्यांची  झाली… अरसिक,निर्दयी मनाचे काट्यांनी अखेर त्या चुकलेल्या फुलाची जीवन यात्राच संपविली…. मग कुणी सात्वंनपर म्हणत गेलं त्याचं प्राक्तनच तसं होतं… आगळं वेगळं जगावेगळं… क्षणभंगुर जीवनात सुगंधाची बरसात करून जगलं… मी नियंता असूनही मला त्या प्राजक्ताच्या सुंगधाला वंचित व्हावं लागावं हा केव्हढा दैवदुर्विलास आहे…त्या नियंत्याला सुध्दा एक वेळ मनात किंतु चा कंटक टोचत राहतो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…–☆ श्री जगदीश काबरे ☆

लोकांपासून कसलेही काम घ्यावयाचे असेल, तर सोशिकपणा धारण केला पाहिजे, हा आपल्या विचाराचा गाभा असला पाहिजे तरच आपण समाजसुधारणेच्या कामात तग धरू शकू. सुधारणेची गरज वाटते ती सुधारकाला. तो ज्या लोकांना सुधारण्याची अपेक्षा करतो, त्यांच्याकडून त्याने विरोधाची, तिरस्काराची, किंबहुना जीवावरील संकटाचीही अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण सुधारक जिला सुधारणा म्हणतो, ती कुधारणाच आहे, असे स्थितिशील समाजाला वाटत असते. अशा वेळेस सार्वजनिक संस्था उभारणे आणि शस्त्रकाट्याच्या कसोटीवर टिकवून ठेवणे ही एक कसरतच असते.

अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून, त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की, कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल, तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमतांविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव देशात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे संस्थापक, त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही.

सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करून रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मात्र मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत, त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड, ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, तरच ती संस्था लोकांच्या विश्वासास पात्र ठरेल.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सम्राट अशोक आणि जागतिक शांतता. – ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ सम्राट अशोक आणि जागतिक शांतता. ☆ श्री सुनील देशपांडे

खालील मजकूर मला व्हाट्सअप वरून फिरत फिरत आला. तो आणि त्यावरचे माझे विचार सादर करीत आहे –

सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?

खूप विचार करूनही “उत्तर” सापडत नाही ! तुम्हीही या “प्रश्नांचा” विचार करा !

 सम्राट अशोक

 वडिलांचे नाव – बिंदुसार गुप्त

 आईचे नाव – सुभद्राणी

 …. एकच “सम्राट” ज्याच्या नावाने जगभरातील इतिहासकारांनी “महान” हा शब्द लावला.

… या “सम्राटा” चे राजेशाही चिन्ह “अशोक चक्र” भारतीयांनी त्यांच्या ध्वजात ठेवले.

… हाच “सम्राट” ज्याचे शाही चिन्ह “चारमुखी सिंह” हे भारत सरकारने “राष्ट्रीय चिन्ह” मानून चालवले आहे आणि “सत्यमेव जयते” स्वीकारले आहे.

… ज्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान, सम्राट अशोकाच्या नावावर आहे, तो “अशोक चक्र” आहे.

… “अखंड भारत” (आजचे नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) च्या विशाल भूभागावर एकहाती सत्ता गाजवणारा सम्राट, ज्याच्या आधी किंवा नंतर असा राजा किंवा सम्राट कधीच नव्हता…

… सम्राट अशोकाच्या काळात “23 विद्यापीठे” स्थापन झाली. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंदाहार इत्यादी विद्यापीठे प्रमुख होती. या विद्यापीठांमध्ये परदेशातून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत असत.

… “सम्राट” च्या कारकिर्दीला जगातील विचारवंत आणि इतिहासकार भारतीय इतिहासातील सर्वात “सुवर्ण काळ” मानतात.

… “सम्राट” च्या काळात भारत “विश्वगुरु” होता. तो “सोन्याचा पक्षी” होता. जनता सुखी आणि भेदभावमुक्त होती.

… ज्यांच्या कारकिर्दीत, “ग्रॅंट ट्रंक रोड” या प्रसिद्ध महामार्गासारखे अनेक महामार्ग बांधले गेले. 2, 000 किलोमीटरच्या संपूर्ण “रस्त्या’च्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. “सराय” बांधण्यात आली..

 माणसं माणसं आहेत.. , प्राण्यांसाठीही, पहिल्यांदाच “वैद्यकीय गृह” (हॉस्पिटल) उघडण्यात आली. प्राण्यांची हत्या बंद झाली.

……. असा “महान सम्राट अशोक” ज्यांची जयंती त्यांच्याच देशात का साजरी केली जात नाही? तसेच सुट्टीही का जाहीर केली जात नाही?

ज्या नागरिकांनी ही जयंती साजरी करावी ते आपला इतिहास विसरले आहेत, आणि ज्यांना हे माहित आहे, त्यांना ही जयंती का साजरी करावीशी वाटत नाही हे कळत नाही हे खेदजनक आहे.

… “जो जिंकतो तो चंद्रगुप्त” होण्याऐवजी “जो जिंकतो तो सिकंदर (अलेक्झांडर)” कसा झाला??

चंद्रगुप्त मौर्याचा प्रभाव पाहूनच अलेक्झांडरच्या सैन्याने युद्ध करण्यास नकार दिला होता हे सर्वांनाच माहीत आहे. सैन्याचे मनोबल वाईटरित्या तुटले आणि अलेक्झांडरला “मागे फिरावे” लागले.

वरील सर्व मजकूर वाचल्यानंतर खरोखरच हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात यावा आणि आत्तापर्यंत जे घडले नाही ते इथून पुढे तरी घडावे.

चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापर्यंत भारत देश आणि संस्कृतीचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला होता.

सम्राट अशोक हा आपल्या देशाचा सगळ्यात मोठा राजकीय आणि सांस्कृतिक ठेवा आहे हे सर्वमान्य आहेच, म्हणूनच त्याची प्रतिके आज सुद्धा स्वतंत्र भारताची प्रतिके म्हणून आपण अभिमानाने धारण करतो. अशा या महान सम्राटाची जयंती पुण्यतिथी कुणाला माहिती आहे काय? असल्यास ती साजरी करणे आणि जीवनगाथा सर्व समाजाला ज्ञात व्हावी अशा दृष्टीने जागृती करणे हे कार्य करण्याची गरज आहे.

…. अनेक सामाजिक संस्थांना विनंती की याबाबत काहीतरी अधिक कार्यवाही व्हावी. त्यातून आपल्या महान परंपरेची आठवण आणि समाज जागृती व्हावी. मला असे वाटते सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून तर त्याचे महत्त्व अधिक आहे. सम्राट अशोकामुळे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारच नव्हे तर अंगीकार संपूर्ण आशिया खंडात, विशेषतः पूर्व आणि दक्षिण आशियामधील सर्व देशांमध्ये झाला होता. आपल्या मातीतील सर्वश्रेष्ठ चक्रवर्ती हिंदू सम्राट त्याच्या उत्तर आयुष्यात बुद्ध धर्माचा प्रचारक झाला ही खूप मोठी आणि अभिमानास्पद घटना आहे.

शांततेचा प्रसार शक्तिमान व्यक्ती किंवा राष्ट्राकडूनच चांगला होऊ शकतो. हिंसेचा अतिरेक झाल्यानंतर शांतीचा पुरस्कार ही खूप मोठी क्रांतिकारक घटना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युनोचा जन्म झाला. शेवटी अपरिमित मनुष्यहानी नंतरच माणसाला जाग येते, परंतु ती जास्त काळ टिकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेचे वारे व युनोचा उदय या घटना घडून सुद्धा त्याचा परिणाम फार काळ टिकला नाही. सध्या तर सगळीकडे युद्धाचाच ज्वर पुन्हा पसरलेला दिसतो. यावेळी आपल्या भारतीय संस्कृतीतील या महान परंपरेची आठवण जागृत ठेवून जागतिक शांततेच्या दृष्टीने भारताने प्रयत्नशील राहावे. जागतिक शांततेसाठी सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याची आठवण सतत जागती ठेवणं ही गोष्ट अत्यावश्यक आहे असे वाटते…… तीच चक्रवर्ती सम्राट अशोकाला सर्वात मोठी श्रद्धांजली आणि भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सन्मान ठरेल. या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर काही हालचाल होईल का? आपण आशा करूया ! 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-११ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-११ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

लग्न पहावं करून-.

जोगेश्वरी परिसर म्हणजे अगदी मोक्याची जागा. आत्ताचा गजबजलेला लक्ष्मी रोड तेव्हा अस्तित्वातच नव्हता. तो रस्ता नागमोडी आणि कच्चा होता. काही अंतराने फक्त चार-पाच देवळे होती. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, भिक्षावळ, पालखी श्री जोगेश्वरी रस्त्यावरून पुढे जायची. ही वर्दळीची जागा म्हणून जोगेश्वरीजवळच श्री. शंकरराव कुलकर्णी ह्यांनी गाळा विकत घेतला होता. त्यामुळे छकडा किंवा बैलगाडीतून सायकली दुरुस्त करायला आणायला त्यांना सोईचं पडायचं. मंदिरात ओटा आणि दगडी फरशी होती. शुभकार्य निघाले की जोगेश्वरी परिसरात शिरल्यावर लग्न कार्यवाहक सगळीच काम करून समाधानाचा निश्वास सोडून निर्धास्तपणे तिथून बाहेर पडायचे. कारण सगळ्या वस्तू जोगेश्वरी परिसरातच मिळायच्या. ‘घर पहाव बांधून आणि लग्न पहावं करून ‘ इतकं शुभकार्य करणे अवघड होते. वधूपिता प्रथम वळायचा पत्रिकेच्या कारखान्यात. शामसिंग रामसिंग परदेशी उत्तम पत्रिका छापायचे. इतकी तत्पर सेवा होती की ‘शाम प्रिंटिंग प्रेस’ मध्ये पन्नास हजार पत्रिका तयार असायच्या, सगळा मसुदा एकदम रेडी. श्रीगणेश प्र. श्रीजोगेश्वरी प्र. वधू वर वडील मंडळी वधू-वर पिता सगळं छापलेले रकाने तयार असायचे नंतर फक्त नावं विचारून फायनल करून प्रिंट करायची. चला ! महत्वाचं शुभ मुहूर्ताचे पहिलं कार्य असं पार पडून पत्रिकांचे गठ्ठे 2 तासात लग्न घरी वेळेवर व्यवस्थित पोहोचायचे. अशा तऱ्हेने कार्याचा पहिला आणि महत्त्वाचा गड, ‘सर’ केला जायचा. काही हौशी पुणेकर पत्रिकेवर वधूवरांचे फोटो छापून घ्यायचे. आत्ताच्या अवजड, भरभरून, डेकोरेट केलेल्या अल्बम पत्रिका, वाचतानाच वाचणारा वाकतो. पण काही म्हणा हं !त्या वेळच्या ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीची सर नाही येणार आत्ताच्या लग्न पत्रिकेला. कार्याला वाजंत्री, सनई, चौघडा हवाच. ती मंडळी याच परिसरात भेटायची. दूध भट्टी, गॅस बत्तीवाले, दारू गोळे, भुईनळे वाले आमंत्रणाची वाटच बघत बसलेले असायचे. राजीवडेकरांच्या प्रसिद्ध दुकानात धोतर, कोट-टोपी जॅकीट, पगडी घेऊन हौशी पुरुष मंडळी बाहेर पडायची, तर शालूकरांच्या दुकानातून शालू घ्यायला बायका अधीर व्हायच्या. मनासारखा शालू मिळाल्यावर नवरीची कळी खुलायची. देण्या घेण्यासाठी हलकी भारी नऊवारी निवडायला वडीलधाऱ्या बायका खण आळीकडे लगबगीने जायच्या. वाटेत आचारी अड्डा लागल्यावर अनुभवी माणसं मजुरी, मेनू, माणसांची संख्या सारं काही घासाघिस करून, व्यवहार पक्का करून मोकळे व्हायचे. चला ! जेवणावळीचं मुख्य काम संपलं ss. ढोल, ताशा, मिरवणूक, वाजंत्री ई. व्यवहार खुंटा बळकट करून पक्का केला जायचा. आता राहिला अत्यंत आवडीचा… हौसेचा व्यवहार म्हणजे सोनं, दागिने खरेदीचा. रु. 250 /- तोळा सोन्याचा भाव होता. गरीबाघरचे वधूपिते मणी मंगळसूत्र, जोडवी विरोली, खरेदी करायचे तर हौशी श्रीमंत वधूपिते लाडक्या लेकीसाठी पेशवाई थाटाचे दागिने पसंत करायचे, घोंगडे आळीतल्या घोंगड्यांची पण तेव्हा चलती होती. सगळ्या साईजच्या घोंगड्यांनी शरीराला मस्त उब मिळायची. ज्ञानविलास प्रसिद्ध कारखाना पण इथेच होता. लग्नात नवरा सायकल, घड्याळ्या- साठी आणि भारी शूज करता रुसून बसायला नको, म्हणून ओरिएंटल मध्ये लेटेस्ट बुटाची खरेदी व्हायची. नवी कोरी सायकल घ्यायला कुलकर्णी अँड सन्स तिथे सज्ज होतेच, आणि अजुनी आहेत. मिलन, कला विकास फोटो स्टुडिओ पण सेवेला हजर असायचे. सारं काही श्री जोगेश्वरीच्या सानिध्यातच मिळाल्यामुळे वरमायपिता वधूमायपिता धन्य धन्य होऊन मानाच्या कसबा गणपतीला पान सुपारी, अक्षत, विडा, शकुनाचे पाच लाडू आणि पत्रिका द्यायला नटून थटून बाहेर पडायचे.  

– क्रमशः भाग पहिला 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ गृहिणी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गृहिणी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

मी म्हणजे मलाच पडलेलं एक रहस्य आहे. तसं ते अनेक जणांना अगदी देवाला पण पडलेलं कोडं आहे, असे नवऱ्याला उगाचच वाटत असते. मी कशी आहे? हे मलाच न कळल्याने ते नवऱ्याला कळावं, अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. तरी मी आशावादी आहे.

मी एक साधीसुधी हसरी मुलगी आहे, जिला खूप काही करायचे होते. फुलपाखराचे पंख लावून गरुड झेप घ्यायची होती. स्वप्नांच्या बागेत बागडताना अचानक फुलांचा हार गळ्यात पडतो आणि आजूबाजूचे टाळ्या वाजवून सांगतात, आता तू गृहिणी झालीस. संसार म्हणजे उत्तर माहीत असतं, प्रश्नच कळत नाही. फुलपाखरू पकडता पकडता अचानक घोड्यावर बसवल्यावर धांदल होते. ही घोडदौडही आवडायला लागते. थोडं सावरलं की लक्षात येते, आपण नुसतेच घोड्यावर बसलोय. लगाम आपल्या हातात नाहीत. पण यातही आनंद वाटतो.

आपलं घर, आपला संसार, तुझं सासर, तुझी माणसं करत कौतुक सुरू होतं. सगळ्यांच्या वेळा, मूड, आवडी सांभाळत. जेव्हा मुलं येतात तेव्हा खरी कसरत सुरू होते. त्यांचे कौतुक करता करता गृहिणी पद आनंदाने मिरवायला लागते. माझं घर माझा अभिमान होतो, माझी मुलं माझी जबाबदारी होते. हे अविरत सगळं करताना वेगळं समाधान वाटत असतं.

मध्येच कोणीतरी तू काय करतेस? असा वेगळाच प्रश्न विचारून घोळात पाडतं.

मी घर सांभाळते म्हटलं, की प्रतिप्रश्न, त्यात काय? ते तर कुलूप पण सांभाळतं. तू नोकरी व्यवसाय काय करतेस? म्हटल्यावर विचार सुरू होतो की मी घरात नक्की करते काय? नुसती बसून असते? मी काम करते? त्याला समाजात मान नाही? मी जे करते ते मातीमोल आहे?

घरच्या लोकांना दोन वेळा घरी केलेले ताजे अन्न वाढते. माझ्या घरी हक्काने पूर्वकल्पना न देता कधीही, कोणीही येऊ शकते, कारण माझं घर मी सांभाळते, कुलूप नाही सांभाळत. माझ्याशी कोणीही, कितीही जमीन वेळ गप्पा मारु शकते, कारण माझ्याकडे खूप वेळ असतो. मला भेटून, माझ्याशी बोलून लोकांना छान वाटतं. कारण मी घाईत नसते. मी खूप वाचते, खूप लिहिते, खूप फिरते, खूप आराम करते, खूप विचार करते, कारण मी इतर काही करत नाही.

माझी वास्तू आणि घरातलेही निर्धास्त असतात कारण मी घरात असते. माझ्या निव्वळ असण्यानेही अनेक गोष्टी आपोआप होतात. मला विशेष वेगळे काही करावे लागत नाही. आला गेला, सणवार नेमाने उत्साहाने साजरे करते. माझं अंगण प्रसन्न असतं, रांगोळी हसत असते, झाडं डोलत असतात, पक्षी गात असतात कारण त्यांना माहीत असतं, माझं त्यांच्याकडे लक्ष आहे. माझ्या नावावर काही नसलं तरी मी आरामात जगते कारण तेवढी पुण्याई मी रोज कमवत असते. मी नटते, गाते, हसते, रुसते, ओरडते, वैतागते कारण मी हेच तर करते. याची नोंद कोणी घेतं, कोणी घेत नाही, कोणाला कौतुक वाटतं, कोणाला वाईट वाटतं. पण मी मजेत असते कारण मी प्रत्येक दिवस माझ्या पद्धतीने भरभरून जगते.

प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा तो निर्माण होऊ नये असे बघते. टीव्हीवरच्या अनेक कार्यक्रमांना न्याय देते. रेडिओवरचे आर जे माझा मित्र परिवार आहे. ते मला घरबसल्या जगभर फिरवून आणतात. माझ्या मुलांना कुलूप उघडावे लागत नाही, माझ्या सासू, सासऱ्यांना कोणाला सांगू? कोणाशी बोलू? असा प्रश्न पडत नाही. आमच्या वादातही संवाद असतो. मी थोडा वेळ बाहेर गेले तरी अख्खं घर माझी वाट बघतं. मुलांना, सासू- सासऱ्यांना डॉक्टरकडे न्यायला कोणाला सुट्टी घ्यावी लागत नाही, कारण मी असते. कमी तिथे मी असा माझा बाणा. खरं सांगू? माझं घर जास्त आजारी पडत नाही, कारण मी असते ना.

माझी शेजारीण माझ्याकडे किल्ली ठेवून, निरोप ठेवून जाते. माझं तिच्या घराकडे लक्ष असणार हे तिला माहीत असतं त्यामुळे cctv नाही लागत. ती म्हणतेही माझ्यापेक्षा तुझाच धाक जास्त आहे मुलांना, मी काही बोलत नाही. फक्त बघते. आपल्याला काय करायचंय- कोणी कुठे गेलं, कधी आलं आणि काय करतंय? तरी पण माझं लक्ष असतं. पाण्याची टाकी वाहत असते, नळ सुरू असतो, दिवा बंद करायचा राहतो, लाईटचं बिल एखाद्या महिन्यात येत नाही पासून उद्या चतुर्थी आहे पर्यंत सगळं बघावं लागतं, आपल्या पुरतं नाही लोकांचंही. पास झाला, नोकरी मिळाली की समोरचा सोन्या मलाही पेढे देऊन नमस्कार करतो. कधीतरी अभ्यासात केलेल्या मदतीची आठवण काढतो, आईला डबा द्यायला जमलं नाही तरी तू होतीस म्हणून अडलं नाही काकू, म्हणतांना त्याचे डोळे पाणावतात. परदेशी चाललोय पण तुझ्या खाऊची आठवण येईल म्हणतो. त्याच्या दिवाळीच्या पार्सलमध्ये माझे रव्याचे लाडू विराजमान होतात.

मी लग्नाला, कार्यक्रमांना मदतीपासून जाते कारण मला ते मनापासून आवडतं आणि जमतंही. माझ्या डोक्यावर रजेचा बागुलबुवा नसतो. माझ्या गावात कुठे काय छान मिळतं ते परगावचेच नाहीत, तर गावातलेही मला विचारतात. कारण मी चटणीपासून दागिन्यांपर्यंत स्वतः जाऊन खरेदी करते.

आम्ही मैत्रिणी मिळून काहीही करत असतो. कार्तिकस्वामीच्या दर्शनासाठी रांग लावतो, देवीची ओटी भरायला जातो, बागेत कदंब फुललाय कळलं की दरवेळी अप्रुप असल्यासारखे जातो, सुरंगीला बहर आला की तो बघावा लागतो, बुचाच्या फुलांचा सडा गोळा करतांना लहान मुली होतो. गाण्याच्या मैफलीला जातो, सिनेमा बघायला जातो, टेकडीवर सूर्योदय बघायला जातो. कोणाच्या घरी बसून आपल्याला काय करायचं म्हणून चंद्रापर्यंत गप्पा मारतो. खळखळून हसतो, चिडवतो, भेटतो, बोलतो, बघतो. तू छान दिसतेस, अशी दिलखुलास दाद मैत्रिणीला देतो. तिचा ड्रेस, तिचा दागिना, केशरचना आवडून जाते आणि आमची दादही तिला भावतेच. हा ड्रेस छान नाही दिसत, हे केसांचं काय टोपलं केलंय, असंही सांगतो. असं काहीही विनाकारण करून मस्त वाटतं ही गोष्ट खरी.

न संपणारी यादी आहे. तरी लोकांना वाटतं मी काही करत नाही. असू दे काही बिघडत नाही. कारण मी आहे सदाबहार भारतीय गृहिणी!

मी खूप काही करते ते इतरांना दिसत नाही. मी खूप काही वाचवते, त्याचे मोल नाही. अहोंच्या पिठात आमचं मीठ. यात महत्त्वाचे काय हा प्रश्न नाही. माझ्यासाठी जेवणारा महत्वाचा असतो. घरातच असते त्याची मी किंमत करत नाही.

लगाम माझ्या हातात नसला, तरी काही बिघडत नाही. मी आहे म्हणून घोडा पळतोय, याची लगाम धरणाऱ्याला कल्पना आहे.

तो फक्त बोलत नाही. खरं सांगते मला याची खंत नाही. मातीलाही मोल असतं, हे मी जाणते.

हा सर्व भारतीय गृहिणींचा प्रातिनिधिक अनुभव आहे. साधर्म्य आढळायलाच हवं.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आम्ही बाबांजवळ पोचण्यापूर्वीच बाबांनी अखेरचा श्वास घेतला होता… ! आम्ही त्यांच्यापासून एका श्वासाच्या अंतरावरच उभे तरीही त्यांच्यापासून लाखो योजने दूरसुद्धा… !!

बाबांचं असं अनपेक्षित जाणं पुढे येणाऱ्या अतर्क्य अनुभवांना निमित्त ठरणार होतं! )

 बाबांचं असं अनपेक्षित जाणं माझं भावविश्व उध्वस्त करून गेलं होतं. मी अगदी हताश, हतबल होऊन त्यांचे दिवस होईपर्यंत आई व भावंडांबरोबर असूनही स्वतःच्याच दुःखात रुतून बसलो होतो. माझ्याही नकळत्या वयापासून वर्षानुवर्षे साठत गेलेल्या बाबांच्या कितीतरी आठवणी मनात गर्दी करीत रहायच्या ! त्या आठवणींमधेच मी गुंतून पडायचो. गप्पगप्प रहायचो.

 बाबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अगदी साध्या साध्या गोष्टी पण ते गेल्यावर मात्र त्यांचं महत्त्व आणि मोल आत्ता खऱ्या अर्थानं जाणवतंय असंच वाटत रहायचं. त्या आठवणींमधली बाबांची कितीतरी रूपं! सगळीच आज हरवून गेलेली तरीही हवीहवीशी!! प्रतिकूल परिस्थितीतही कधी हतबल न होणारे, दत्त महाराजांवर अतिशय निखळ, दृढ श्रद्धा असणारे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती जपणारे, आर्थिक ओढग्रस्तीतही समाधानाने रहाणारे, जांभळाच्या झाडाचं लाकूड ठिसूळ असतं, आम्ही पडून इजा करुन घेऊ नये म्हणून काळजीपोटी आम्हाला कधीच दारातल्या जांभळाच्या झाडावर चढू न देता स्वतःचा जीव धोक्यात घालून, आमच्यासाठी रोज स्वत: झाडावर चढून आम्हाला ताजी टपोरी जांभळं काढून देणारे, आर्थिक ओढग्रस्तीमुळे आमचे अगदी साधे बालहट्टही बऱ्याचदा पुरे करता यायचे नाहीत तेव्हा त्यांच्या नजरेत भरून राहिलेली दुखरी खंत केविलवाणं हसत लपवायचा प्रयत्न करणारे… अशी बाबांची कितीतरी रूपं!

 बाबा कधीच आमच्यावर हात उगारणं सोडाच आम्हाला रागवायचेही नाहीत. कधीतरी अतीच झालं तर चिडून आईच आम्हाला धपाटा घालायला यायची तेव्हाही, ” मारु नकोस गं.. लहान आहेत ती.. ” म्हणत आमची सुटका करायचे.. !

 आम्हा सर्वच भावंडांवर त्यांचं प्रेम, माया होतीच पण त्याबाबतीत त्यांच्याकडून प्रत्येक वेळी झुकतं माप मिळत गेलं होतं ते मलाच. माझं काही खास कर्तृत्त्व होतं असं नाही, पण लहान वयात दोन इयत्ता एकदम करून मी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माझ्या भावाबरोबर तिसरीत शाळेत जाऊ लागलो याचंच त्यांना अप्रूप वाटायचं. माझ्यापेक्षा तो अभ्यासात कितीतरी पटीने हुशार. त्यामुळेच परीक्षेत माझ्यापेक्षा कितीतरी जास्त मार्क मिळवून तो नेहमी नंबरात असायचा. त्याला शाबासकी मिळायची पण जवळ घेऊन कौतुक मात्र माझंच व्हायचं. बाबा गेल्यानंतर हे सगळं आठवायचं तेव्हा मात्र एक वेगळीच रुखरुख मन कुरतडू लागायची. बाबांकडून लहानपणापासून असं उदंड प्रेम, माया मिळवूनही त्यांची सेवा करणं मात्र माझ्या नशिबात नव्हतं. बाबांचं आजारपण सुरू झाल्यापासून मी नोकरी निमित्ताने कायम त्यांच्यापासून दूर तिकडे मुंबईत. आई आणि माझे दोन्ही भाऊ यांनी बाबांच्या संपूर्ण आजारपणात त्यांची अतिशय प्रेमाने, मनापासून सेवा केली पण मला मात्र ते समाधान मिळालं नाही याचं दुःख मनात घर करुन राहिलेलं! बाबांचे दिवस होईपर्यंतच्या प्रत्येक क्षणी मला ते त्रास देत राहिलं होतंच आणि पुढंही दीर्घकाळ मनात रुतून बसलं होतं. त्या विचारात लपलेली माझ्या मनातली अस्वस्थता बाबांच्या पर्यंत मी न सांगता अलगद जाऊन पोचलेली होती याचा प्रत्यय देणाऱ्या घटना पुढे माझ्या आयुष्यात जेव्हा घडल्या तेव्हा मृत्यू आणि पुनर्जन्मामागच्या गूढ रहस्याची दारं थोडीतरी किलकिली झाली पण ते सगळं मधे बरीच वर्षे उलटून गेल्यानंतर! पण त्याही आधी बाबा गेल्याच्या आम्हा सर्वांच्याच मनातल्या दुःखावर हळुवार फुंकर घालून ते दु:ख हलकं करु पहाणारी एक घटना माझ्या मोठ्या भावाच्या संदर्भात घडली तीही आश्चर्याने थक्क व्हावं अशीच होती. आमचं समाधान करता करता बरंच कांही हातचं राखून ठेवणारी आणि म्हणूनच अनाकलनीय वाटावी अशीच ती घटना होती!

 ती घटना अतुलच्या, माझ्या पुतण्याच्या तान्हेपणीची. बाबा सप्टेंबर १९७३ मधे गेले. त्यानंतर वर्षाच्या आत भावाचं लग्न करायला हवं म्हणून आमच्या जवळच्या नातेवाईकांनी त्याच्यासाठी वधुसंशोधन सुरु केलेलं. योगच असे जुळून आले की बाबा जाऊन वर्ष व्हायच्या आत मे १९७४ मधे भावाचं लग्नही झालं. अतुलचा म्हणजे माझ्या पुतण्याचा जन्म १९७५ मधला. जन्मतः तो अतिशय चांगला, तब्येतीने छान, सुदृढ होता. काळजी वाटावी असं कांही नव्हतंच. पण बाळंतपणानंतर तो तीन महिन्याचा झाल्यावर वहिनी त्याला घेऊन इस्लामपूरला परत आल्या आणि अचानक कधी कल्पनाही केली नव्हती असं विपरीत घडलं. तोवर एरवी अगदी शांत, लाघवी असणारं बाळ दिवसभर अगदी आनंदी, खेळकर असायचं पण तिन्हीसांजेला मात्र कर्कश्श रडू लागायचं. कितीही थोपटलं, जोजवलं, शांत करायचा प्रयत्न केला तरी त्याचं रडणं थांबायचंच नाही. खूप रडून थकल्यानंतर भुकेल्या अवस्थेतच मलूल होऊन झोपून जायचं. दुसऱ्या दिवशीही असंच घडलं. वरवर लक्षात येईल अशी कांहीच लक्षणं जाणवली नाहीत आणि आजीच्या बटव्यातल्या औषधाचाही काही उपयोग झाला नाही तेव्हा मात्र तातडीने त्याला ओळखीच्या डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी बाळाला तपासलं. सगळंच तर व्यवस्थित होतं. ‘एकदम वातावरण बदलल्यामुळं रडत असेल. काळजी करण्यासारखं कांहीही कारण नाही’ एवढा दिलासा डॉक्टरांनी दिला तेव्हा मनातली भीती काही अंशी कमी झाली खरी पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळीही अंधार पडू लागताच बाळ रडू लागलं तसा मात्र सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला. तो गुरुवार होता. आई देवापुढे दिवा लावत होती. तिने घाईघाईने दिवा लावून देवाला मनोभावे नमस्कार केला. तिच्या काय मनात आलं कुणास ठाऊक. ती जागची उठली. बाहेर येऊन तिने वहिनींकडून बाळाला घेतलं. मांडीवर घेऊन त्याला थोपटत शांत करायचा प्रयत्न करत असतानाच तिने भावाला जवळ बोलावलं. म्हणाली, “हे बघ, मी देवापुढं दिवा लावून आलीय. आज गुरुवार आहे. तू आत जाऊन देवाला हात जोडून प्रार्थना कर, डबीतला चिमूटभर अंगारा हातात घे आणि यांचं स्मरण करुन त्यांना सांग, म्हणावं, ‘आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही आहोत. आणि कधी विसरणारही नाही. ‘ आणि बाळाला तो अंगारा लाव. यापेक्षा आत्ता याक्षणी बाकी आपल्या हातात कांहीही नाहीय. “

 बाळाचं रडणं सुरूच होतं. भाऊ लगोलग जागचा उठला. आत गेला. देवाला प्रार्थना करून, बाबांचं स्मरण करून, त्यांने बाळाला अंगारा लावला आणि क्षणार्धात हळुहळू शांत होत बाळाचं रडणं कमी होत गेलं. हात-पाय हलवत इकडं तिकडं पहात बाळ आपली

बाळमूठ चोखत अलगद डोळे मिटत झोपून गेलं!

 घडल्या गोष्टीचं आश्चर्य करीत सर्वांनी त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली खरी पण त्या आश्चर्याइतकंच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय घडतंय त्याचं नाही म्ह़टलं तरी थोडं दडपण प्रत्येकाच्या मनावर होतंच.

 दुसऱ्या दिवशी तिन्हीसांजेला जेव्हा न रडता बाळ छान खेळत राहिलं, तेव्हा मात्र सगळ्यांच्या डोक्यावरचं ओझं आपसूकच हलकं झालं होतं!

 या अनपेक्षित अशा अघटीत घटनेमुळे अतुल बाळाच्या रूपानं बाबाच या घरी परत आलेत अशीच भावना सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली आणि ते सहाजिकही होतंच!

 हे सगळं पुढं कधीतरी गप्पांच्या ओघात मला प्रथम समजलं तेव्हा मनातल्या दृढ श्रद्धेमुळेच असेल पण त्याबद्दल कणभरही साशंकता माझ्याही मनात निर्माण झालेली नव्हती एवढं खरं. पण त्यावेळी मला न वाटलेली साशंकता माझ्या मनात नंतर डोकावून गेली ती या घटनेला परस्पर छेद देणारी, कधीच विसरता न येणारी, सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी एक अनपेक्षित घटना पुढे माझ्याही संसारात घडली तेव्हा! मनात डोकावून गेलेल्या त्या साशंकतेत मृत्यू आणि पुनर्जन्म याबाबतचं अनामिक असं कुतूहलही नकळत मिसळून गेलेलं होतं आणि तेच पुढं अनेक दिवस मला बेचैनही करीत राहिलं होतं!!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गुरुचरित्र” का वाचावे ?… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

गुरुचरित्र” का वाचावे ?… ☆ श्री सुनील शिरवाडकर

चंपाषष्ठी झाली की दत्तभक्तांना दत्तजयंतीचे वेध लागतात. आपापल्या परीने नियम पाळुन एक सप्ताहाचे पारायण सुरु होते. नरसिंह सरस्वतींच्या विविध लिलांचे वर्णन गुरुचरित्र ग्रंथात विस्ताराने केले आहे. दत्तभक्त मोठ्या श्रध्देने या ग्रंथाचे पारायण करीत असतात. या ग्रंथाच्या पारायणाने अनेक दिव्य अनुभव आलेली पण अनेक मंडळी आहेत मी स्वतः या ग्रंथाची अनेक पारायणे केली आहेत. मग मला त्यातून काय मिळाले? काय अनुभव आले?

येथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. बुद्धीला न पटणाऱ्या, आजच्या काळाशी विसंगत वाटणाऱ्या अनेक कथा, उपदेश या ग्रंथात आहेत. विवाहित स्त्रियांचे, विधवा स्त्रियांचे आचरण, ब्राम्हणांनी करावयाची आन्हिके, कर्मकांड वगैरे बाबी पटणार्या नाही. पण मग हा ग्रंथ का वाचायचा?पारायण करताना मनात काही कामना, इच्छा धराव्यात का?कारण भगवद्गीतेत तर सांगितले आहे “मा फलेषु कदाचन”..

गजानन विजय ग्रंथात दासगणू म्हणतात,

“प्रसंग याचना करण्याचा।

मनी नको आणूस साचा।”

पण मग पारायण करताना वाटतेच ना असे की आपल्याला काहीतरी फळ मिळावे… हे हे असे असे घडावे…. असे असे व्हावे. सगळ्यांच्याच मनात असे विचार येतील असे नाही. पण पारायण केल्यावर त्याचे फळ मिळावे, काही positive व्हावे असे तर बहुतेकांना वाटतेच.

आणि तसेही ग्रंथात जागोजागी उल्लेख आहेतच. । 

जो का भजेल श्रीगुरुते ।

इहपर साधेल तयाते । 

अखंड लक्ष्मी सदनाते।

अष्टैश्वर्ये नांदती।

*

सिध्द म्हणे नामधारकासी।

श्रीगुरुमहिमा आहे ऐसी।

भजावे मनोभावेसी।

कामधेनू तुझे घरी।

गुरुचरित्रातील सर्वच ओव्यांचा अर्थ नाही समजत. बऱ्याच वेळा असेही होते, वाचन चालू आहे.. पण मन भरकटत चालले आहे. पण थोडाच काळ. पुन्हा मन आपोआप वाचनात गुंतत जाते.

आणि मग…

जसे जसे पारायण पूर्णत्वाकडे जाते…. मनातील इच्छा आपोआप कमी कमी होत जातात. ही सेवा गुरूंनी आपल्याकडून करून घेतली हेच मोठे फळ असे वाटायला लागते. आणि जेव्हा पारायण पूर्ण होते तेव्हा….

… तेव्हा, त्या क्षणी मिळणारी अनुभूती… ते मानसिक बळ…. ती आत्मिक शांती कोणत्याही ऐहिक, भौतिक सुखापेक्षा मोठी वाटु लागते.

… आणि खरे तर हेच असते पारायणाचे फळ.

पारायण सात दिवसांचे करा… तीन दिवसांचे करा, अगदी काही जण रोज एखादा अध्यायही वाचतात. पण ग्रंथाला जवळ करा. मनोभावे वाचन करा. ग्रंथाच्या शेवटी ग्रंथकार म्हणतात,

।। मुख्य भाव कारण।।

।।प्रेमे करिता श्रवण पठण।।

।।निजध्यास आणि मनन।।

।।प्रेमे करोनि साधिजे।।

*

।।श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।।

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर! ☆ श्री संभाजी बबन गायके 

स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर!

The (sup)porters of the Indian Army !  

स्टान्जीन पद्मा सियाचीन ग्लेशियर परिसरातील नुब्रा खोऱ्यातील एका दुर्गम गावात राहतो. या भागातील जीवन अतिशय कष्टाचे आणि जिकीरीचे. तापमान कायमच जवळजवळ शून्याच्या खाली. उदरनिर्वाह करणे खूपच कठीण. पण येथील मूळच्या लोकांना या हवामानाची सवय झालेली असते. यांपैकीच एक तरुण, स्टान्जीन पद्मा. याने सुमारे बारा वर्षे भारतीय सैन्यासाठी भारवाहक म्हणून सेवा बजावताना संकटात सापडलेल्या जवानांचे प्राण वाचवलेले आहेत. शिवाय गिर्यारोहक, सैनिक यांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला अनमोल सहाय्य केले आहे.

१९८४ मध्ये भारतीय सेनेने ‘ऑपरेशन मेघदूत’ हाती घेतले आणि सियाचीन ग्लेशिअर वर वर्चस्व प्रस्थापित केले. या अतिशय धाडसी, रोमांचक आणि शौर्यपूर्ण कामगिरीस या वर्षी एप्रिल मध्ये चाळीस वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानी सैन्याने याच ठिकाणी आपल्या आधी पोहोचून त्यांच्या सैन्य चौक्या प्रस्थापित करण्याची गुप्त योजना आखली होती…. पण भारतीय सैन्य त्यांच्या आधी तेथे पोहोचले! तिथे टिकून राहण्यासाठी अत्यावश्यक रसद हवाई मार्गाने पोहोचवली गेली. आणि हजारो सैनिक बर्फातून तीन दिवस-रात्र चालत इच्छित स्थळी पोहोचले. आणि म्हणूनच आज ती सीमा भारतासाठी सुरक्षित करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे… आणि पाकिस्तान आपल्याकडे पहात थयथयाट करीत बसला आहे… अन्यथा आज चित्र काहीसे वेगळे असले असते. असो.

सियाचीन ग्लेशिअरवर तापमान उणे चाळीस आणि आणखीही खाली जात असते. अशा भयावह, जीवघेण्या हवामानात निव्वळ श्वास घेणे हेच मोठे आव्हान ठरते. तेथील हवामानात हेलीकॉप्टर उडवणे हे अत्यंत धोक्याचे ठरते. पण बरेचदा यातूनच रसद खाली टाकावी लागते, आणि मग ही रसद पाठीवर लादून घेऊन वरपर्यंत पोहोचवावी लागते. काहीवेळा या कामासाठी याक सारख्या प्राण्यांचा वापर केला जातो, पण हे प्राणीसुद्धा या हवामानात फार काळ तग धरू शकत नाहीत, किंवा त्या उंचीवर पोहोचू शकत नाहीत. मग हे वाहतुकीचे काम कोण करणार? जिथे मोकळ्या माणसाला बर्फात एक-एक पाऊल टाकीत पुढे जायला कित्येक तास लागतात, पायांखाली शेकडो फूट बर्फाची दरी असू शकते, शरीराचा कोणताही भाग काही वेळासाठी उघडा राहिला तर हिमदंश होतो, साधा श्वास घ्यायला त्रास होतो तिथे हे काम कोण उत्तम करू शकेल?

सियाचीन परिसरातील निसर्गसुंदर नुब्रा खोऱ्यातील रहिवासी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून हे काम अक्षरश: अंगावर घेतात. पाठीवर सुमारे वीस किलो वजनाचे सामान घेऊन उंच पर्वत चढतात…. सियाचीन येथे बर्फातील चौक्यांवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी खाद्यपदार्थ, इंधन पोहोचवतात…. पिण्यायोग्य पाणी बनविण्यासाठी बर्फ खोदून देतात, डोंगर कड्यांवर पोहोचण्यासाठी शिड्या, दोर लावून देतात. सुमारे बावीस हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या आपल्या सैनिकांसाठी हे पोर्टर-तरुण खूप महत्वाची भूमिका बजावतात.

बर्फाळ भागात आयुष्य गेल्यामुळे ह्या लोकांना त्या परिसराची, हवामानाच्या लहरीपणाची खूप जवळून ओळख असते. या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या हिमस्खलनाच्या घटनांत या पोर्टर्सची खूप मोठी मदत होते. काही ठिकाणी तर केवळ दोरीच्याच साहाय्याने पोहोचता येते. आणि यात या लोकांचा हातखंडा आहे.

वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी तर सैनिकाना त्वरीत हलवावे लागते… अशा वेळी हेच पोर्टर्स मदतीला धावून येतात. भारतीय लष्कर या लोकांना सलग नव्वद दिवसच काम देऊ शकते. एरव्ही हे तरुण तेथे येणाऱ्या गिर्यारोहकांचे वाटाडे म्हणून काम करतात.

जेंव्हा पोर्टरचे काम उपलब्ध नसते तेंव्हा जवळच्या शहरात जाऊन हे लोक मिळेल ते काम करतात. आणि पोर्टर म्हणून भरती होण्यासाठी अक्षरश: दोन अडीचशे किलोमीटर्सचे अंतर बर्फातून चालत पार करतात. भरती करून घेताना या लोकांची रीतसर शारीरिक चाचणी, निवड स्पर्धा घेतली जाते. सियाचीन मध्ये सुमारे शंभर लोकांची या कामासाठी निवड केली जाते.

अतिधोकादायक ठिकाणी भारवाहकाचे काम करणाऱ्यास एका दिवसासाठी रुपये ८५७ आणि तळावर काम करण्यासाठी रुपये ६९४ इतका मोबदला दिला जातो. आता या दरांमध्ये बदल झाला असेल. कामाच्या ठिकाणी असलेली हवामानाची आव्हाने, शत्रूपासून असलेला धोका यांमुळे काही भारवाहकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

एकदा पदमाला आपल्या सेनेच्या अतिउंचीवरील चौकीवर तातडीने अन्नपदार्थ पोहोचवण्याचे आदेश मिळाले. अत्यंत प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता हा गडी स्नो स्कूटर घेऊन निघाला आणि चौकीवर अन्न पोहोचवले. मात्र माघारी येत असताना त्याची स्कूटर नादुरुस्त झाली ती तशीच ठेवून तो पायी खाली निघाला. मात्र धुक्यामुळे पुढचे काही दिसू न शकल्याने एका अत्यंत खोल दरीत कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याच्या सुदैवाने सकाळी एक गस्ती पथक त्याला शोधायला येऊ शकले. आणि मोठ्या परीश्रमाने त्याला तिथून बाहेर काढले गेले.

 त्याचा एक सहकारी निमा नोर्बु असाच एका दरीत कोसळला होता. त्याच्या सुटकेचे सर्व प्रयत्न विफल झाले होते. पण पदमाने अगदी हट्टाला पेटून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून हेलीकॉप्टरची व्यवस्था करवून घेतली आणि निमाचा ठावठिकाणा शोधून काढला. स्वत: बर्फाच्या खोल दरीत उतरून काही तासांच्या अथक परिश्रमाने निमाला मृत्यूच्या खाईतून सुरक्षित बाहेर काढले… परंतू बर्फदंशामुळे निमाचा एक हात आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कापावे लागले! 

 सियाचीन मध्ये सैनिक जेवढे कष्ट, त्रास भोगतात तेवढेच हे आपले स’पोर्टर्स’ ही कष्ट करतात… पण त्यांचे देशप्रेम अतूट आहे.

तांत्रिक कारणामुळे एका भारवाहकास सलग नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस कामावर ठेवता येत नाही. ८९ दिवस भरल्यावर हे तरुण पुन्हा आपल्या गावी परततात, वैद्यकीय तपासणी करून घेतात आणि काही दिवसांनी पुन्हा कामावर येऊ शकतात…

पदमा वर्षातून किमान तीन वेळातरी सियाचीन वर जायचा.. ! लेह मधील जवाहर नवोदय विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या पदमाने आपल्या सहकारी भारवाहकांचा हिशेब ठेवण्याची, त्यांच्या कामाचे नियोजन, पर्यवेक्षण करण्याचीही जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली आहे.

२०१३ मध्ये पाच सैनिक बर्फाखाली गाडले गेले होते. त्यांना वाचवण्यासाठी पाच जणांचे पथक धाडले गेले, त्यात पदमाही होता. पण या बचाव पथकावर एक बर्फाचा कडा कोसळला. या पाचपैकी एक जण केवळ कमरेइतकाच गाडला गेल्याने तो बाहेर पडला आणि त्याने इतरांना बाहेर काढले. आपल्या जीवाची पर्वा न करता हे पाचही जण दुसऱ्या दिवशी पुन्हा बचाव मोहिमेवर गेले आणि त्यांनी दोन सैनिकांचा जीव वाचवण्यात यश मिळवले! 

स्टान्जीन पद्मा याला भारताच्या राष्ट्रपती महोदयांनी ‘जीवन रक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. भारतीय सैनिकांच्या पाठीशी आणि मागे पुढे उभ्या असणाऱ्या या भारवाहकांचे आभार! 

शत्रू या भारवाहकांवर गोळीबार करायला कमी करत नाही. काल परवाच कश्मीरमध्ये दोन पोर्टर्स अतिरेक्यांच्या गोळीबारात मरण पावले. आपल्या देशाच्या सीमा राखायला असे अनेक तरुण कामी येतात…. त्यांच्या प्रती आपण आभारी असायला पाहिजे!

कृपया या शूर, हिम्मतवान, साहसी देशभक्तांविषयीची ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी. मी ही माहिती आंतरजालावरून इंग्रजी भाषेतील ‘दी बेटर इंडिया’, ‘द कॅरावान’ अशा स्रोतामधून मिळवली असून भाषांतरित केली आहे..

जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके

 ९८८१२९८२६०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares