मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – २  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

डॉ. वि. दा. वासमकर

?  विविधा ?

☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – २  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

(विधीनाट्यांमध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंग हा परंपरेनुसार धर्मविधीसाठी राखून ठेवलेला असतो त्यात ईश्वरविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक तात्विक व गंभीर विवेचनाचा भाग असतो. आणि उत्तररंगात तद्नुषंगिक आख्यानात लोकरंजन आलेले असते, असे त्या स्पष्ट करतात.) इथून पुढे —

‘लोककलांची आवाहकता’ या लेखामध्ये अलीकडच्या काळात मराठी रंगभूमी लोककलांचा आश्रय घेताना दिसते. असे त्या सुरुवातीलाच म्हणतात. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून दशावतार, गोंधळ, भारूड, जागरण अशा लोकनाट्यविधांचा उपयोग अनेक नवीन नाटकांनी केलेला आहे. याचे कारण सांगताना त्या म्हणतात, -“पश्चिमेचे अनुकरण हे एक कारण आहेच. पण केवळ पश्चिमेच्या एखाद्या नाटकाच्या अनुकरण करणे एवढ्याच एका प्रेरणेने मराठी नागर नाटकात लोकनाट्याचा प्रवेश झाला आहे काय?… आपले एकूणच आधुनिक जीवन हे दिवसेंदिवस तंत्रज्ञानाधीन होत चालले आहे. आधुनिक जीवनाचा निसर्गाशी आणि मातीशी असलेला संबंध तुटत चालला आहे. त्यामुळे भौतिक समृद्धी वाढत असतानाही एका पोकळीची जाणीव होत आहे. अशावेळी मानवी संस्कृती पुन्हा आपली मुळे शोधीत आहे… कलेच्या क्षेत्रातील या प्रेरणेचा आविष्कार पुन्हा नव्याने लोककलांचा शोध घेण्यातून होत आहे. कारण लोककलांमध्ये एक उत्स्फूर्तता असल्याने साक्षात जिवंतपणा असतो… जेथे जेथे समूहमनाशी नाते जोडण्याची तीव्रतेने गरज भासली, तेथे तेथे नागरकलांपेक्षा लोककला प्रभावी ठरलेल्या दिसतात. आजच ब्रेख्टमुळे नागर रंगभूमी लोककलांकडे वळली आहे असे नव्हे”. ताराबाईंच्या या भाष्यातून लोककलांचे महत्त्व आधोरेखित होते. ‘अदाची लावणी आणि नाट्यगीत’ हा आणखी एक महत्त्वाचा लेख या संग्रहात आहे. म्हणजे दरबारातील लावणी किंवा बैठकीची लावणी होय. अदा म्हणजे अभिनय. ही लावणी अभिनयप्रधान असते. तिच्यात अंगप्रत्यंगांचा लयबद्ध अविष्कार असतो. भावनांना चेतवणारे आविष्कार करणे हे या लावणीचे प्राणतत्त्व असते, असे प्रतिपादन करून प्रारंभीच्या सर्व शृंगाररसप्रधान नाट्य गीतांचे स्वरूप पाहिले, अभिनयरूप पाहिले तर बैठकीच्या अदाच्या लावणीचा हा नवा अवतार असल्याचे लक्षात येईल, असे त्या स्पष्ट करतात. अदा करणाऱ्या कलावतीची जागा स्त्रीपार्टी पुरुष नटाने घेतली पण शृंगारप्रधान नाट्यगीताचा आशय, सांगीतिक अविष्कारदृष्ट्या चाली आणि आंगिक अभिनय, मुद्राभिनय हा सर्वच आविष्कार एकसंधपणे पाहिला तर बैठकीच्या लावणीचे हे नवे रूप असल्याचे लक्षात येईल, असे मार्मिक अवलोकन त्या करतात.

तारा भवाळकर या जशा लोकसाहित्यमीमांसक आहेत, तशाच त्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या विचारवंतही आहेत. स्त्रीवादाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील एक म्हणजे ‘मायवाटेचा मागोवा’ हे पुस्तक. हे पुस्तक श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनने 1998 मध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकात दहा लेखांचा समावेश केला आहे. ‘लोक साहित्याचे पुनराकलन’ हा या संग्रहातील दुसरा लेख. हा लेख त्यांनी स्त्रीवादविषयक चर्चासत्रामध्ये वाचला होता. या लेखाच्या सुरुवातीला ताराबाईंनी स्त्रीवाद म्हणजे काय याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते थोडक्यात असे -आधुनिक जीवनातील अनेक विचारधारांची निर्मिती पाश्चिमात्य जगतात झाली. आणि नंतर त्या जगभर पसरल्या. त्यातीलच एक म्हणजे स्त्रीवाद… स्त्रीकडे पाहण्याचा, तिला वागवण्याचा, तिच्याशी वागण्याचा दृष्टिकोन जगभर एकाच प्रकारचा आहे. आणि तो पुरुषांच्या तुलनेने गौणत्वाचा आहे. विषमतेचा आहे. स्त्री गौण आहे; पुरुषप्रधान आहे; ही भूमिका कुटुंब, समाज, धर्म, राज्य, अर्थ, संस्कृती आदी सर्व क्षेत्रात अनेक वर्षे नांदत आहे. आणि ही विषमता केवळ लिंगाधारित विषमता आहे… स्त्री-पुरुष विषमतेतून खरे तर विषमतेच्या जाणिवेतून, आधुनिक जगात स्त्री विषयक चळवळी सुरू झाल्या. यांतून संघर्षरत असलेल्या स्त्रीच्या जाणिवा अधिक विकसित झाल्यानंतर स्त्रीला स्वतःच्या स्थितीचा आणि म्हणूनच एकूणच मानवी समाजातल्या स्त्री-पुरुष नातेसंबंधाचा पुनर्विचार करण्याची तीव्र गरज भासू लागली… सृजनशील स्त्रीला आपले गौणत्व नेहमीच जाचत होते. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध तिने आवाज उठवायला सुरुवात केली आणि या चळवळीतून सिमॉन द बोव्ह या फ्रान्समधील स्त्रीच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथाची निर्मिती झाली 1949 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचा जगाच्या पाठीवरील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतर झाले. आणि यातून स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. आपल्याकडेही अनेक विचारवंत स्त्रिया या चळवळीशी निगडित झाल्या. त्यातील एक म्हणजे डॉ. तारा भवाळकर. ताराबाईंनी स्त्रियांच्या भावना त्यांच्या गीतातून, कथातून, किंवा म्हणी – उखाण्यातून कशा प्रकट झाल्या आहेत याचे चित्रण अनेक लेखांमध्ये केले आहे. ‘लोकसाहित्याचे पुनराकलन’ या लेखांमध्येही त्याचा प्रत्यय येतो. त्या लिहितात – 

देवा नारायणा माझी विनंती फार फार |

जन्म बायकांचा नको घालूस वारंवार ||

अशा स्त्री जन्माला नकार देणाऱ्या ओव्या स्त्रीगीतातून अक्षरशः शेकड्याने सापडतात, असे ताराबाई म्हणतात. त्या पुढे म्हणतात, “लोकगीतातून एरव्ही रामाचे कितीही कौतुक केले असले तरी त्याने गर्भवती सीतेचा परित्याग करणे स्त्री मनाला रुचलेलं नाही. तो लोकगीतातील स्त्री मनाला फार मोठी जखम करून गेलेला दिसतो.

सीता पतिव्रता नाही रामाला कळाली |

वनाच्या वाटेवरी चाके रथाची गळाली ||

असे म्हणून पुरुषसत्तेचा प्रतिनिधी असलेल्या रामाची अन्यायी वृत्ती चव्हाट्यावर मांडली आहे. ‘किती चतुर बायका’ हा लेखही स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिला आहे. या लेखामध्ये शंकर-पार्वतीचा एक संवाद उद्धृत केला आहे. या संवादात शंकर आणि पार्वती एकमेकाला कोडी घालत असतात – ऐका हो शंकरा बोलाचा अर्थ करा असे पार्वतीने म्हटल्यावर संशयग्रस्त शंकर विचारतात – ऐकलं ग पार्वती बोलाचे अर्थ किती? कोणाला हात देत होतीस, कोणाला पाय देत होतीस, कोणाच्या मुखाकडे पाहून तू हसत होतीस या ओळींमध्ये शंकराने एका परीने पार्वतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. यावर पार्वती मिश्किलपणे म्हणते- कासाराला हात देत होते, सोनाराला पाय देत होते, आरशाच्या मुखाकडे पाहून मी हसत होते हे उत्तर ऐकत राहताना पार्वतीच्या ओठाच्या कोपऱ्यात हसू दिसायला लागतं. हे उत्तर देणारी पार्वती नक्कीच चतुर आहे; असे ताराबाई म्हणतात.

 सारांश डॉ. तारा भवाळकर यांचे लोकसाहित्य संशोधन विचारात घेतले की, त्यांच्या चिकित्सक, मर्मग्राही दृष्टिकोनाचा सहज प्रत्यय येतो. त्यांच्या विपुल लेखनाचे सार थोडक्यात सांगायचे झाले तर त्या लोक संस्कृतीशी, स्त्रीच्या मानसिकतेशी अंत:करणापासून जोडल्या गेल्या आहेत.

– समाप्त –

लेखक : डॉ. वि. दा. वासमकर

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आत्मसाक्षात्कार ☆ मी… तारा… – भाग – ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? आत्मसाक्षात्कार ?

☆ मी… तारा… भाग – ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना!

डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने करामत गाजवली आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या. वस्तूत: ही मुलाखत १३ एप्रील १९२१ पासून क्रमश: ई-अभिव्यक्तीवर ५ भागात प्रसारित झाली होती. आज डॉ. तारा भावाळकर विशेषांकाच्या निमित्ताने ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.. उज्ज्वला केळकर )

तारा – याशिवाय ताराबाईंनी आणखी काही लिहिलय की नाही?

ताराबाईलिहिलय….. इथून पुढे )

ताराबाईज्याला संकीर्ण स्वरूपाचं म्हणता येईल, असं ताराबाईंनी खूप काही लिहिलय. सुरुवातीच्या काळात हरिवंश राय बच्चन यांच्या कवितांचा… खंडकाव्याचा… ‘मधुशाला’चा अनुवाद त्यांनी केलाय. निरनिराळी व्यक्तिचित्रे असलेले, ‘माझीये जातीचे’ सारखे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. ‘मरणात खरोखर जग जगते’ सारखा एखादा कथासंग्रह आहे. ललित लेखन आहे. समीक्षा लिहिल्या आहेत. काही संपादनं केली आहेत. आचार्य जावडेकर यांच्या जेलमधील पत्रांचे संपादन केलं आहे. रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन केले आहे. त्याला प्रस्तावना लिहिल्या आहेत. ज्याला अवडक-चवडक म्हणता येईल, असं आत्मकथनपर लेखनही त्यांनी बरंच केलं आहे.

तारातर ताराबाई, तुमच्या एकंदर लेखनाचा धावता परिचय तुम्ही करून दिलात, आता तुम्हाला मागच्या आयुष्याकडे वळून पहाताना काय वाटत? धन्यता वगैरे… ? आणि ही वाटचाल करताना तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळालं का? तुम्हाला कुणाचं काही घ्यावसं वाटलं का? किंवा तुमच्यासमोर लेखनाबाबत कुणाचे आदर्श होते, याबद्दल काही सांगाल का?

ताराबाईत्याचं काय आहे, एकाच एका मार्गदर्शकाची ताराबाईंना कधी गरज वाटली नाही आणि ते शक्यही नव्हतं. कारण त्या महाविद्यालयात गेल्या नाहीत. शिकणं आणि शिकवणं या गोष्टी एकाच वेळी त्या परस्परावलंबी अशा करत गेल्या. पण सुदैवाने प्राथमिक शिक्षणापासून, कुणी ना कुणी तरी, ज्यांना आपण गुणी माणसं म्हणतो, मोठी माणसं म्हणतो, ते पाठीवर हात ठेवणारे लोक मिळत गेले. लोकसाहित्याच्या अभ्यासाला दिशा दाखवणारी, रा. चिं. ढेरे, प्रभाकर मांडे यासारखी जेष्ठ मंडळी, नरहर कुरूंदकर, मुंबई विद्यापीठाच्या उषाताई देशमुख, सरोजिनी वैद्य अशी मंडळी भेटत गेली. सरोजिनी वैद्य यांच्या बरोबर त्या अमेरिकेला एक संशोधनपर निबंध वाचण्यासाठीही जाऊन आल्या. १९९१मध्ये आरीझोना स्टेट युनुव्हर्सिटी, अमेरिका येथील चर्चासत्रात त्यांचा सहभाग होता आणि यावेळी त्यांनी आपला लोकसाहित्यावरील संशोधनपर निबंध वाचला होता.

शांताबाई शेळके यांनी ताराबाईंचे लोकसाहित्यावरचे लेखन वाचल्यानंतर म्हंटले होते, ‘ताराबाई स्त्रीकेन्द्रित लेखन करतात. स्त्रियांविषयी पोटातिडिकेने लिहितात पण स्त्रीमुक्तीवाल्यांच्या लेखनात जी उंच पट्टी जाणवते, ती ताराबाईंच्या लेखनात नाही. त्यांचे लेखन आक्रोशी नाही. ’ कोल्हापूरला ताराबाईंना एक पुरस्कार मिळाला होता. ‘मंगल पुरस्कार’. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना तो दिला गेला होता. हा पुरस्कार शांताबाई शेळके यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. त्यावेळी बोलताना हे उद्गार त्यांनी काढले होते. हे भाषण चालू असतानाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनासाठी शांताबाईंची एकमताने निवड झाल्याची बातमी आली. त्यामुळे हा प्रसंग ताराबाईंच्या विशेष स्मरणात आहे.

बेळगावच्या इंदिरा संत जवळिकीच्या. कुसुमाग्रज हे नेहमीच पाठीशी होते. ताराबाईंच्या ‘लोकनागर रंगभूमी’ पुस्तकाचं पु. ल. देशपांडे यांनी विशेष कौतुक केलं होतं. पुण्याला किर्लोस्कर शताब्दीच्या निमित्ताने भाषणे करायची संधी, त्यांना पु. ल. देशपांडे यांच्या प्रशस्तीमुळे मिळाली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पत्र पाठवून विश्वकोशात अतिथी संपादक म्हणून काम करण्याची विनंती केली होती. त्यावेळी विश्वकोशात लोकसाहित्य हा विषय प्रथम समाविष्ट झाला. असे ताराबाईंच्या पाठीवर हात ठेवणारे, प्रोत्साहन देणारे असे अचानक भेटत गेले. जगण्याच्या प्रवाहात, कुणी येतात, भेटतात, कुणी हात सोडून जातात, तसं त्यांच्याबाबतीतही झालं.

अडचणी येतच असतात. एकीकडे नोकरी, घर सांभाळणं, लेखन, भाषण, संशोधन या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करत असताना, काही बर्‍या-वाईट गोष्टी घडत असतात. ताराबाई म्हणतात, ‘वाईट ते सोडून द्यायचं!’

ताराताराबाईंच्या आयुष्यात अडचणी आल्या, पण त्याचप्रमाणे अचानक आनंद देणार्‍या घटनाही घडल्या असतीलच ना!

ताराबाईहो. तर! नशिबाने चांगली माणसंही भेटत गेली. प्रोत्साहन देणारी माणसं भेटत गेली.

क्रमश: भाग ३ 

डॉ. ताराबाई भावाळकर

संपर्क – ३, ’ स्नेहदीप’, डॉ. आंबेडकर रास्ता, सांगली, ४१६४१६ मो. ९८८१०६३०९९

 प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अलविदा मित्रा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ अलविदा मित्रा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

(सरत्या वर्षाला निरोप )

मित्रा तुला अलविदा म्हणतांना खूप गहिवरून आलंय रे

तू नव्याने आलास तेव्हा तुझं जंगी स्वागत झालं

एक आनंदतरंग घेऊन आलास तू माझ्या जीवनात

माझ्या सुखदुःखाच्या क्षणांशी एकरूप झालास

संकटसमयी माझं बळ शक्ती ठरलास

माझ्या आनंदात दिलखुलासपणे सहभागी झालास

तुझ्या कुशीत मी कधी अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली

तू आंजारलं गोंजारलंस प्रेमानं सांत्वन केलंस

… आणि आता क्षण येऊन ठेपलाय …. तुला निरोप देण्याचा

 

तुझ्याशी खूप बोलायचयं… काही सांगायचयं … पण तू तर निघालास

काय म्हणालास मित्रा ?.. काळ कोणासाठी थांबलाय ?

बरोबर आहे मित्रा तुझं ….

माझीचं सगळी गात्रं थकलीत, मीच नाही धावू शकले तुझ्या वेगाने

 

 

तू निघालास मित्रा पुन्हा कधीही परत न येण्यासाठी

पण तुझ्या आठवणी मी जपून ठेवल्यात ह्रदयकुपीत

अलविदा मित्रा…… अलविदा.. अलविदा.. अलविदा….

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – २ – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – २  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

(साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू? ) – इथून पुढे 

त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!

सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..

मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. ‘हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे. ‘ एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्‍यावर.. ! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता.. !

तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!

कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्‍यात शिरलो..

“तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका.. !”

त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्‍यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..

सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!

“प्रारंभी विनती करू गणपती.. “

दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!

‘प्रणम्य शिरसा देवं’, ‘शांताकारं भुजगशयनं. ‘, गणपती अथर्वशीर्ष… ‘ च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या –

महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि

स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:

अथावाच्य..

आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की!

ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो… सहीसही ती भूमिका वठवत होतो.. ‘काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!’ असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!

‘गंधाक्षतपुष्पं समर्पयमि.. ‘ असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..

“अबे … उस्मान … वो फुल उधर नजदिक रख ना.. !”

फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं.. !

गणेशपुजन सुरू असतांनाच, “अबे … उस्मान …”?

पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात.. !

“धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.. ” दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती.. की होता?!

सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..

‘अब मुझे जाना होगा.. देर हो गई है.. ‘ असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्‍या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..

अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? ‘यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे’ – हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता.. !

निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं.. वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा… !

तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?

‘आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे.. ‘ अल्लाजानने माहिती पुरवली..

मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्‍या पुडीत थोडी तूरडाळ.. आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..

‘अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?’ मी अलाजानला विचारलं..

“डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!”

अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी… सार्‍या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !

मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत.. !

– समाप्त – 

लेखक : श्री तात्या अभ्यंकर 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘खरे‘ महानपण‘ … ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

खरे ‘महानपण‘… ☆ श्री सुनील शिरवाडकर

वीजेच्या मीटरचं रिडींग घेण्यासाठी तो दर महिन्याला नियमितपणे येत असतो. मीटरचा फोटो काढायचा.. आणि जायचं.. पुढच्या आठवड्यात वीज बील आणुन द्यायचं.. हे त्यांचं काम.

त्या दिवशी मला जरा रिकामपण होतं.. त्याच्याकडेही वेळ होता. मग बसलो गप्पा मारत. त्याच्या बोलण्यातुन समजलं.. असे रिडींग घेण्याचं काम साधारण दोनशे जण करतात. आणि हे सगळं चालवण्यासाठी जी एजन्सी आहे त्याचा मालक एक मोठा राजकीय पुढारी आहे.

तसं आपण ऐकुन असतोच.. या या पुढार्यांचा हा असा बिझनेस आहे वगैरे.. त्यामुळे मला फारसं आश्चर्य वाटले नाही. हे जगभरच चालतं. अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश देखील एका मोठ्य तेल कंपनीचे मालक होतेच. कित्येक क्रिकेटपटू, अभिनेते हॉटेल व्यावसायिक असतात हेही ऐकुन असतो. या एवढ्या पैशाचं ते करतात तरी काय असा सामान्यांना प्रश्न पडतोच. उपजीविकेसाठी काही उद्योग धंदा करणे वेगळे.. आणि हे वेगळे.

या पार्श्वभूमीवर मला आठवले लोकमान्य टिळक.

लोकमान्य टिळक.. त्यांची देशभक्ती.. त्यांचं कार्य याबद्दल आपण सगळेच जण जाणुन आहे. पण टिळक उपजीविकेसाठी नेमकं काय करत होते हे फारसं कोणाला माहित नाही. केसरी हे वर्तमान पत्र ते चालवत.. पण त्याकडे टिळकांनी व्यवसाय म्हणून कधीच बघितले नाही.

काही काळ त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पण आगरकरांशी काही वाद झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली. टिळक घरचे तसे खाऊन पिऊन सुखी होते. पण सार्वजनिक कामांसाठी अतिरिक्त पैसा हा लागतोच. त्यासाठी मग काय करावे असा त्यांना प्रश्न पडला. टिळकांना कायद्याचे ज्ञान उत्तम प्रकारचे होते. त्यांनी ठरवलं.. आपण विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण द्यायचं.. वकिलीच्या शिक्षणाचे क्लास काढायचे.. त्यातुन पैसा उभा करायचा.

पुण्यातील हा बहुधा पहिला खाजगी कोचिंग क्लास. सुरुवातीला त्यांच्यावर टिकाही झाली.. पण त्यांनी मनाची तयारी केली होतीच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कायद्याचं शिक्षण घ्यायला मुले येऊ लागली. कायद्याच्या शिक्षणासोबतच टिळक आपल्या विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या राजकारणाचे धडेही देऊ लागले. टिळकांच्या तालमीत तयार झालेले ही तरुण मुले आपापल्या गावी जाऊन वकिली करता करता राजकारण पण करु लागले. थोडक्यात काय तर.. टिळकांना त्यांच्या राजकारणासाठी एक भक्कम यंत्रणा क्लासच्या माध्यमातून उभारता आली.. आणि हे सगळं उत्तम प्रकारे अर्थार्जन करता करता.

तशीच गोष्ट महात्मा फुले यांची. फुले यांनी फारसं राजकारण केलं नाही. पण समाजकारण मात्र केलं. सामाजिक कामे करत असताना.. समाजसेवा करत असताना म. फुल्यांनी आपल्या शेतीवाडी कडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. शेतीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. पुण्यातील मांजरी शिवारात त्यांची जमीन होती. दहा बारा माणसं कायमस्वरूपी कामासाठी होती.. आणि गरज पडली तर अजुनही मजुर रोजंदारी वर असायचे. शेतीच्या कामासाठी १५-२० बैल होते.. झालंच तर २-३ गायी होत्या. दरमहा शेकडो रुपयांची उत्पन्न त्यातुन जोतीरावांना मिळत होतं. पुण्यातुन मोठ्या रुबाबात ते कधी घोड्यावरुन.. तर कधी घोडागाडीतुन शेतीची पाणी करायला येत.

विदेशी भाज्या, फळे लावण्याच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज होते. पण जोतीरावांनी जेव्हा कोबी, फुलकोबी, टॉमेटो, मोसंबी, अंजीर, डाळींब अशी वेगवेगळी पिके घेतली.. त्यातुन चांगला पैसा कमावला.. ते पाहून आजुबाजुचे शेतकरीही त्यांचं अनुकरण करु लागले.

जोतीराव एक बांधकामांचे ठेकेदारी होते ‌येरवडा येथील पुलाच्या बांधकामाचा ठेका त्यांनीच घेतला होता. बांधकाम पुर्ण झाल्यावर त्यांनी सर्व मजुरांना आपल्या मांजरी येथील बागेत मोठ्या थाटात जेवण दिलं होतं.

खडकवासला येथील तलावाच्या बांधकामासाठी दगड पुरवण्याचे कंत्राट जोतीरावांनी घेतले होते. पुण्यातील गंजपेठेतील आपल्या दुकान वजा ऑफिसमध्ये बसून जोतीराव हे सगळे व्यवहार करत.

टिळकांनी काय.. किंवा जोतीरावांनी.. राजकारण, समाजकारण करताना त्यांनी पैसे कमावण्यासाठी जे केलं ते सचोटीने. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी मिळवलेला पैसा केवळ लोकांसाठी.. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी वापरला होता.

केवळ स्वतःसाठी.. स्वतःच्या गोतासाठी व्यवसाय.. उद्योगधंदे करणारे.. साम्राज्य उभे करणारे आजचे हे राजकीय पुढारी.. त्यांच्या तुलनेत समाजासाठी आपला पैसा खर्च करणारे पदरमोड करणारे शंभर वर्षापुर्वीचे राजकीय, सामाजिक नेते म्हणुनच महान वाटतात.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एकमेवाद्वितीय…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

“एकमेवाद्वितीय…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

लंडनमधे एक चौकात सावरकरांचा अर्धकृति पुतळा आहे. हा तिथे बसवू नये म्हणून Conservative पक्षाने संसदेत वाद घातला होता, पण सरकारने सांगितले…….

…. “इंग्लंडच्या सर्व शत्रुंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत, सावरकर हे त्यातील एक आहेत. इंग्लंड हे भाग्यवान राष्ट्र आहे, त्याला सावरकर यांच्यासारखा चारित्र्य संपन्न, प्रखर राष्ट्रभक्त आणि कमालीचा बुद्धिमान शत्रु मिळाला.”

सावरकर…. एकमेवाद्वितीय…

१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९०० मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..

२) १८५७ च्या बंडास “स्वातंत्र्ययुद्ध” म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.

३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्थानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकाला “एक भिकार चिटोरे” म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, तेही १९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..

४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी. ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी…

५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी १९२१ साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.

६) परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…..

७) मे, १९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…

८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच…

९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी…

१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक…

११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतिकारी…

१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच….

१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले…

१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतिकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले… त्यासाठी तुर्की, रशियन, आयरिश, इजिप्शियन, फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता…

१५) विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फक्त सावरकरच…

१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर…. तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या, मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर…

१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वितीय…

१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव… व्याकरणात त्या वृत्तांना “वैनायक” म्हणून ओळखले जाते.

१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.

२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले…

२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदिर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै. श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत “पतितपावन” मंदिर बांधले.

२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..

२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असताना, मातृभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फक्त सावरकरच पहिले…

२४) प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, “लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या” असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच…

२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच…. लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फक्त सावरकरच……

 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “औडक चौडक ताराबाई” ☆ प्रा. अविनाश सप्रे ☆

प्रा. अविनाश सप्रे

?  विविधा ?

☆ “औडक चौडक ताराबाई☆ प्रा. अविनाश सप्रे ☆

ताराबाई भवाळकरांची मराठी महामंडळाने दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी केलेली निवड चतुरंग अन्वयसाठी या परिसरातील लेखक, कवींच्यासाठी आणि मुख्य म्हणजे समस्त सांगलीकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची घटना वाटणे साहजिकच म्हणता येईल, पण ही बातमी प्रस्तुत झाल्यानंतर बघता बघता समाज माध्यमातून, वृत्तपत्रातून, दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून, दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून प्रचंड प्रमाणात बाईच्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव झाला, तो अभूतपूर्व स्वरूपाचा होता. सर्वसाधारणपणे संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावांची चर्चा सुरू झाली आणि नंतर प्रत्यक्ष निवड झाली. वादविवाद होतात, उलटसुलट चर्चांना उधाण येते, निवडीमागच्या राजकारणाबद्दल बोलले जाते, खऱ्या खोट्या बातम्या पसरल्या किंवा पसरवल्या जातात, असा आजवरचा अनुभव, पण ताराबाईची निवड असे काहीही न होता झाली आणि तिचे सार्वत्रिक स्वागत झाले. एवढेच नव्हे तर ताराबाईची निवड या अगोदरच व्हायला हवी होती, अशीही प्रतिक्रिया उमटली. ताराबाईच्या ज्ञानसाधनेबद्दल आणि बौद्धिक कर्तृत्वाबद्दल वाटणारा आवर या निमित्ताने प्रकट झाला असे म्हणता येईल.

पुण्यातील शनिवार पेठेच्या सनातनी आणि पारंपारिक, कर्मठ वातावरणात आणि चित्रावशास्त्रीच्या वाड्यात बाईचे बालपण व्यतीत झाले. पुढे त्यांचे कुटुंब नाशिकला गेले आणि तिथे त्यांची वैचारिक जडणघडण होऊ लागली. इथे त्यांना कविवर्य कुसुमाग्रजांचा सहवास लाभला. याच काळात त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद केला. त्यानंतर नोकरी निमित्ताने सांगलीस आल्या आणि इथे त्यांचे वैचारिक आणि वाड्मयीन कर्तृत्व बहाला आली आणि नामवंत विदूषी म्हणून त्यांचा लौकिक झाला. पंचावन्न वर्षापेक्षा अधिक काळापासून बाईचे सांगलीमध्ये वास्तव्य आहे आणि सर्वत्र संचार करूनही सांगली हीच आपली कर्मभूमी आहे असे त्या अभिमानाने सांगतात.

लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला या बाईच्या विशेष आस्थेचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय राहिला आहे महाराष्ट्रत, महाराष्ट्रबाहेर एकट्याने भ्रमंती करून बाईनी या विषयाचा वेध घेतला, साधनसामग्री गोळा केली, साहित्य गोळा केले, मौखिक संस्कृतीचे स्वरूप समजून घेतले. त्यांच्या आविष्कार पद्धती आणि शैलींचा विचार केला. त्याची चिकित्सा केली आणि या मौल्यवान लोकसंचिताला अभिजनांच्या विचार विश्वात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. बहुजनांचे लोकसाहित्य म्हटले की एकतर भाबड्या श्रद्धेने बघणे (बाई त्याला गहिवर संप्रदाय म्हणतात) किंवा उच्चभ्रू अभिजन त्याकडे अडाण्यांचे साहित्य समजून तुच्छतेने, उपेक्षेने पाहतो. ही दोन्ही टोके बाजूला सारून बाईनी या संस्कृतीकडे चिकित्सेने, डोळसपणे पाहिले, त्यातले हिणकस बाजूला करून सत्व शोधले आणि या विषयाकडे बघण्याची नवी दृष्टी दृष्टी दिली. ४० च्या वर बाईची ग्रंथसंपदा आहे आणि त्यातल्या ‘लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिमा’, ‘यक्षगात आणि मराठी नाट्यपरंपरा’, ‘लोकजागर रंगभूमी’, ‘मिथक आणि नाटक’, ‘लोकसंचित’, मायवाटेचा मागोवा, मातीची रूपे, लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, महामाया इत्यादी ग्रंथामधून त्यांनी लोकसाहित्य आणि संस्कृतीवर मूलभूत प्रकाश टाकला आहे. या ग्रंथांना लोकसाहित्याच्या अभ्यासात संदर्भ ग्रंथ म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. मराठी विश्वकोशासाठीही त्यांनी या विषयावर लिहिलेल्या नोंदी आणि या विषयांचे केलेले सिद्धांतन महत्वाची मानले जाते.

नाटक आणि स्त्रीवाद हे बाईचे आणखी दोन अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. ‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण प्रारंभ ते १९२०’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. केली आणि त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट प्रबंधाचे सुवर्णपदक मिळाले अलीकडेच त्यांनी आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे चरित्र लिहिले. ‘मराठी नाटक नव्या दिशा, नवी वळणे’ हा त्यांचा नव्या नाटकांवरचा ग्रंथही प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित कला विभागात त्यांनी वेळोवेळी नाटकावर व्याख्याने दिली आहेत. सांगलीमध्ये तरुण व हौशी रंगकर्मीना घेऊन त्यांनी ए. डी. ए. ही नाट्य संस्था स्थापन केली आणि नवीन नाटके सादर केली. राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या नाटकात त्यांनी स्वतः काम केले आणि त्यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले. मुळातच प्रखर आत्मभान असणाऱ्या बाईनी नव्याने आलेल्या ‘स्त्रीवादाचा’ पुरस्कार केला आणि स्त्रीमुक्ती चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. याच दृष्टीतून त्यांनी संत स्त्रियांच्या क्रांतिकारकत्वाची नव्याने ओळख करून दिली आणि लोकसाहित्याची स्त्रीवादी दृष्टीतून नवी मांडणी केली. अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘सीतायन’ या पुस्तकातून त्यांचा हा दृष्टिकोन प्रखरपणे अधोरेखित झाला आहे.

औडक चौडक हा ताराबाईचा शब्द. त्याचा अर्थ ऐसपैस, आडवं तिडवं, वेडंवाकडं, आखीव रेखीव नसलेलं, स्वच्छंदी, मोजून मापून नसलेलं आपलं आजवरच जगणं आणि वाटचाल अशी आहे, असं त्यांना सुचवायचे असते, त्यामुळेच आपलं आयुष्य समृद्ध झालं असं त्या सांगतात. वयाची ८० पार करूनही त्या सदासतेज असतात या मागचं हे रहस्य आहे. बाई एकट्या राहतात, पण एकाकी नसतात. विचारांच्या संगतीत असतात, पुस्तकांच्या संगतीत असतात, लिहिण्याच्या संगतीत असतात, जोडलेल्या असंख्य लहान थोर, तरुण वृद्ध मित्र-मैत्रिणींच्या संगतीत असतात. जे घडले तेची पसंत अशा समाधानतेनं राहतात. अनेकांच्यासाठी आधारवड असतात.

प्रा. अविनाश सप्रे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – १  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

डॉ. वि. दा. वासमकर

?  विविधा ?

☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – १  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

मराठीमध्ये लोकसाहित्य संशोधकांची एक मोठी परंपरा आहे. साने गुरुजी, डॉ. सरोजिनी बाबर, कमलाबाई देशपांडे, दुर्गा भागवत, ना. गो. नांदापूरकर, रा. चि. ढेरे, प्रभाकर मांडे, गं. ना. मोरजे, विश्वनाथ शिंदे इ. लोकसाहित्यमीमांसकांनी मराठी लोकसाहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. या लोकसाहित्यमीमांसकांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लोकसाहित्य संशोधनाचे मौलिक योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि दिल्ली येथे होऊ घातलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा समावेश होतो.

डॉ. तारा भवाळकर ह्या मराठी विषयाच्या निष्णात प्राध्यापक असून; एक मर्मग्राही लोकसाहित्यसंशोधक म्हणून मराठी साहित्यविश्वाला परिचित आहेत. त्यांनी लोकसाहित्याचे संकलन आणि चिकित्सा तर केली आहेच; शिवाय नाट्य रंगभूमीवरील त्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकसाहित्य आणि रंगभूमीबरोबरच त्या स्त्रीवादी साहित्य चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी ललित आणि समीक्षणात्मक लेखनही केले आहे. या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या विपुल लेखनात दिसून येते. हे लेखन पुढील काही ग्रंथांमध्ये समाविष्ट झाले आहे. ते ग्रंथ असे – ‘लोकसंचित’, ‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’, ‘लोकसाहित्य : वाङ्मय प्रवाह’, ‘मायवाटेचा मागोवा’, ‘महामाया’, ‘लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा’, ‘लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा’, ‘लोकपरंपरेतील सीता’, ‘यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘मराठी नाटक : नव्या दिशा नवी वळणे’, ‘मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद’, ‘मिथक आणि नाटक’, ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, ‘आकलन आणि आस्वाद’ ‘निरगाठ सुरगाठ’, ‘प्रियतमा’, ‘. मरणात खरोखर जग जगते’, ‘माझिये जातीचे’, ’बोरीबाभळी’, ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’, ‘स्नेहरंग’’, ‘मधुशाळा’ (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या पुस्तकाचे मराठीतील पहिले भाषांतर) अशा विविध विषयांवरील सुमारे चाळीस ग्रंथ ताराबाईंच्या विपुल आणि मर्मग्राही लेखनाचे दर्शन घडवितात. ताराबाईंच्या या विपुल लेखनाचा विचार करणे या छोट्याशा लेखात शक्य नाही म्हणून त्यांच्या काही लोकसाहित्यविषयक ग्रंथांचा येथे थोडक्यात विचार करू.

‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’ हा तारा भवाळकर यांचा ग्रंथ स्नेहवर्धन प्रकाशनने २००९मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथात ताराबाईंनी लोकसाहित्याच्या अभ्यासाची तात्त्विक मांडणी करणारे अठरा लेख समाविष्ट केले आहेत. ‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’ या पहिल्याच लेखात ताराबाईंनी लोकसाहित्य म्हणजे काय याची चर्चा केली आहे. Folklore या इंग्रजी शब्दाच्या आशयाची व्याप्ती त्यांनी सविस्तर स्पष्ट केली आहे. ‘लोकसाहित्य’ या सामासिक शब्दाची फोड करताना आणि त्याचा अर्थ स्पष्ट करताना ‘साहित्य’ हा शब्द ‘साधन’-वाचक आहे असे ताराबाई म्हणतात. आणि ‘लोक’ या शब्दाचा अर्थ त्या पुढीलप्रमाणे स्पष्ट करतात- “लोक म्हणजे केवळ ग्रामीण लोक नव्हेत की जुन्या काळातील लोक नव्हेत तर ‘लोकशाही’ या शब्दातील ‘लोक’ (people) या पदाला जवळचा असा आशय व्यक्त करणारा ‘लोक’ हा शब्द आहे” असे त्या म्हणतात. म्हणजेच सांस्कृतिकदृष्ट्या विशिष्ट मानसिक जडणघडणीचा समावेश ज्या समाजात किंवा ज्या समूहामध्ये आढळतो, असा मानवसमूह म्हणजे ‘लोक’! लोक हा शब्द नेहमीच समूहवाचक असतो. या अर्थाने लोकशाहीतील ‘लोक’ हा शब्दही समूहवाचक आहे असे त्यांचे मत आहे. लोकसाहित्याची अशी व्याख्या देऊन; ताराबाईंनी दुर्गा भागवत, दत्तो वामन पोतदार, हिंदीतील वासुदेव शरण अग्रवाल, पंडित कृष्णदेव उपाध्याय, रा. चि. ढेरे, यांच्या व्याख्या देऊन त्यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. लोकसाहित्य या शब्दात लोकगीते, लोककथा, म्हणी, उखाणे, कोडी ही शाब्द लोकसाहित्याची अंगे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसाहित्य ही प्रवाही घटना असते; अबोध समूह मनाच्या (collective unconscious) प्रेरणेतून लोकसाहित्य घडते, असेही त्या स्पष्ट करतात. भारतातील अनेक विद्यापीठातून लोकसाहित्याचे स्वतंत्र अभ्यासविभाग सुरू झालेले आहेत ही समाधानाची गोष्ट आहे, असे या लेखाच्या शेवटी त्या म्हणतात. लोकसाहित्याशी अन्य ज्ञानशाखांचा संबंध कसा येतो हे त्यांनी ‘लोकसाहित्य आणि ज्ञान शाखा’ हे शीर्षक असलेल्या तीन लेखांमधून स्पष्ट केले आहे. त्यामध्ये मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र व भाषाविज्ञान यांचे महत्त्वाचे योगदान असून; इतिहास, पुरातत्त्वशास्त्र आणि भूगोल यांचेही लोकसाहित्याशी जवळचे नाते असते असे त्या म्हणतात. लोकसाहित्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी घनिष्ठ नाते असते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. कृषिनिष्ठ भारतीय जीवनातील सणवार व धर्मव्रते निसर्गसंबद्ध कसे आहेत हे त्या दाखवून देतात. लोकजीवनातील यात्रा उत्सवही निसर्गाशी संबद्धच असतात असे सांगून यात्रांमध्ये लोकसंस्कृतीच्या व लोकजीवनाच्या अनेक पैलूंचा अविष्कार होतो; देवतांविषयीचा आदर व्यक्त होतो. बहुरूपी, गोंधळी, भुत्ये, वासुदेव असे अनेक लोक कलावंत यात्रा जत्रात आपल्या कलेचे प्रदर्शन करतात लोक जीवनातील या सर्व अविष्कारालाच बहुदा धर्म हे नाव दिले जाते. नागपंचमीची नागपूजा, बैलपोळ्याला बैलाची पूजा, मंगळागौरीची पूजा, नवान्नपौर्णिमा, गौरी-गणपतीची पूजा, आणि वटसावित्रीची पूजा इत्यादी पूजा व्रते हे सगळे धर्म म्हणून ओळखले जातात मात ताराबाईंच्या मते हे सर्व लोकधर्मच आहेत आणि या लोकसंस्कृतीमध्ये धर्माचे रूप निसर्ग धर्माचे आहे असे त्या म्हणतात. या लोक धर्मामध्ये मोक्षाची मागणी नसते तर ऐहिक जीवनाविषयीच्याच मागणी करणारे हे लोकधर्म असतात. असे त्या प्रतिपादन करतात. ताराबाईंच्या या विवेचनातून प्रस्थापित धर्मापेक्षा लोकधर्माला महत्त्व दिलेले दिसून येते. ‘नाट्यात्मक लोकाविष्कारांची काही उदाहरणे’ या लेखामध्ये वारकरी, नारदीय, आणि रामदासी संप्रदायांच्या कीर्तनपद्धतीचा व विवाह विधींचा ताराबाईंनी परामर्श घेतला आहे. अशा रीतीने लोकसाहित्यविषयक तात्त्विक भूमिका मांडल्यानंतर या ग्रंथाच्या शेवटी साने गुरुजींच्या लोकसाहित्याच्या संकलनविषयक कार्याची ताराबाईंनी ओळख करून दिली आहे.

‘लोकसंचित’ हा ताराबाईंचा आणखी एक महत्त्वाचा लोकसाहित्यविषयक ग्रंथ. पुण्याच्या राजहंस प्रकाशनने हा ग्रंथ डिसेंबर 1989 मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथात वीस लेख समाविष्ट झाले आहेत. या ग्रंथातही सुरुवातीला लोकसाहित्यविषयक तात्त्विक भूमिका आली आहे. ‘लोकनाट्यातील धार्मिकता आणि लौकिकता’ या पहिल्याच लेखात ‘लोकनाट्य’ ही संकल्पना स्पष्ट करताना तमाशा, खंडोबाचे जागरण, गोंधळ, कोकणातले नमन, दशावतारी खेळ यांचा विचार करून हे सर्व एकाच गटात बसणार नाहीत असे त्या म्हणतात तमाशा हा प्रकार प्रयोगविधांपेक्षा भिन्न आहे आणि आजच्या तमाशात धार्मिकतेचा अंश इतका पुसट झाला आहे की तो शोधूनच काढावा लागतो, असे त्या म्हणतात. मात्र दशावतारी खेळ, खंडोबाचे जागरण, गोंधळ इत्यादी विधिनाट्यांमधून धार्मिकतेचा प्रत्यय येतो असे त्या सूचित करतात. कारण या विधीनाट्यांमध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंग हा परंपरेनुसार धर्मविधीसाठी राखून ठेवलेला असतो त्यात ईश्वरविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक तात्विक व गंभीर विवेचनाचा भाग असतो. आणि उत्तररंगात तद्नुषंगिक आख्यानात लोकरंजन आलेले असते, असे त्या स्पष्ट करतात.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. वि. दा. वासमकर

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – १  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी – मी धूपार्तीचा भिक्षुक.. ! – भाग – १  – लेखक : श्री तात्या अभ्यंकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये.. कॅशियर कम मॅनेजर होतो मी.. आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक.. अस्वस्थ करणारे.. आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक.. पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..

बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच.. त्याशिवाय रोज एखादी ‘काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?” असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा.. कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. “क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है.. साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना. ” असं म्हणून मला दमात घ्यायचे..

कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. ‘ए तात्या… म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू.. ‘ अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत.. मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून ‘सौ किलो.. !’ असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!

गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्‍यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही.. ) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्‍याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्‍यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्‍यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..

झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्‍या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. ‘तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. ‘दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका.. ‘ असं आग्रहाचं बोलावणं असायचं.. ! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..

संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो.. पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. “गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?”

मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्‍याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला ‘अय्यप्पा-गणेश’ स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्‍या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने.. !

हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?

मला सांगा – एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्‍यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?

लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे.. ! 

तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..

“मालिक, थोडा नाष्टा करो.. “

“बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका.. !”

बापरे.. ! ‘मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?’ मला काही खुलासा होईना.. ‘बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं.. ‘ अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!

समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. ‘आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं’ असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!

“आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका.. !”

न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!

ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! ‘सगळं झुगारून निघून जावं का इथून?’ हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्‍या त्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..

‘देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे.. ‘ या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे.. !

साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?!

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री तात्या अभ्यंकर 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ येतो… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ येतो…  ☆ श्री मंगेश मधुकर

आपल्याकडं “जातो” असं म्हणत नाही …. म्हणूनच “येतो” म्हटलं.

नमस्कार !! 

मी २०२४ …. निरोप घ्यायला आलोय, पुन्हा भेट नाही. आता ‘मी’ फक्त आठवणीत,

अवघ्या वर्षभराची आपली सोबत. तरीही ऋणानुबंध बनले. वर्षभरातल्या सुख-दु:ख, चांगल्या-वाईट

घटनांचा ‘मी’ साक्षीदार… 

कोणासाठी खूप आनंद, कोणासाठी अतीव दु:ख, कोणासाठी लकी तर कोणासाठी दरिद्री.

.. कोणासाठी दोन्हीही….. या निरोपाच्या वेळी हितगुज करावसं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच.

 

नवीन वर्ष सुरू होत असलं तरी आपलं आयुष्य मात्र तेच ते आहे.

नेटवर्क, टेंशन्स आणि ट्राफिक हे आता अन्न, वस्त्र, निवाऱ्या इतकेच जगण्याचा भाग आहेत.

तुम्ही म्हणाल की, , जातोयेस तर गप जा. उगीच उपदेश कशाला?’

– – बरोबर आहे. आजकाल कोणाला शिकवलेलं आवडत नाही. पुढच्यास ठेच अन मागचा शहाणा या म्हणीला आता काही अर्थ उरलेला नाहीये….. सगळं कळत असूनही लोकं ठेचा खातात. त्याच त्याच चुका करतात. काही वेळीच शहाणे होतात. अनेकजण दुर्लक्ष करतात… पुन्हा पुन्हा ठेचकळत राहतात.

असो..

 

अनुभवावरुन सांगतो, आज जगण्यातल्या वाटा निसरड्या आहेत. आयुष्य असुरक्षित झालयं.

कधी, कुठं, काय होईल याचा नेम नाही. व्यवहाराला अतोनात महत्व आल्यानं, प्रेम, आपुलकी यावर ‘तात्पुरतेपणाचा’ गंज चढलाय. सर्व काही असूनही अस्वस्थता आहे. माणसं एकटी आहेत….

जो तो आपापल्या कोषात राहतोय. नात्यातलं अंतर वाढतयं. गॅझेटस कितीही अडव्हान्स झाली तरी भावनिक आधार देत नाही. मायेचा, विश्वासाचा, प्रेमाच्या स्पर्शासाठी माणसाचीच गरज पडते.

– – नेमकं हेच विसरलं गेलंय.

 

 

एक विनंती,

माझ्याकडं नको असलेल्या, बिनकामाच्या वस्तूंचे भलं मोठं गाठोडं आहे…..

तुम्ही वर्षानुवर्षे सांभाळलेले, अपमान, राग, द्वेष, मत्सर, असूया, अहंकार, ईगो, मीपणा.. त्या गाठोड्यात टाका. मी सगळं घेऊन जातो. मनावरचा ताण हलका होईल. प्रसन्न वाटेल.

 

 

अजून एक,

नवीन वर्षात संकल्प वैगरेच्या भागडीत पडू नका.

जे येईल त्याला सामोरे जा. तुमच्यामुळे जर कोणी आनंदी होत असेल तर तुमच्याइतका श्रीमंत दुसरा नाही.

ही संधी सोडू नका कारण आनंद वाटला की वाढतो……

2025 मध्ये तुमचा आनंद सदैव वाढता राहो हीच शुभेच्छा !!

“येतो…”

तुमचाच,

२०२४ 

(ता. क. ते गाठोडयाचं लक्षात ठेवा.) 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares