मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मडबाथ ☆ सुश्री सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून :  मडबाथ ☆ सुश्री सावित्री जगदाळे ☆

शेतात ऊसाची रोपे लावायला गेलो होतो. आता नर्सरीत ऊसाची देखील रोपे मिळतात . ऊसाची लागण करणारी पुरुषांची टीम असते. रोपं लावायला मात्र बायकाच असतात. मग मीही बायकांबरोबर गेले. शेतात काम करण्याचा आनंद असतो. जसा लेखन वाचनात असतो. शारीर कष्टाने मनही टवटवीत होते.

रोपांची लावणी करण्याची पध्दत मला माहीत नव्हती. मी वाकून लावू लागले. तर बायका म्हणाल्या, ‘वाकून कुठवर लावशील? बसून लाव.’

‘मला दोन पायावर बसता येत नाही. बसून मागे सरकता येत नाही.’ मी म्हटलं.

‘अगं असं फतकल घालायचे. अन्‌ असं सरीवर हात टेकवून मागं सरकायचं.’

६० वय ओलांडलेल्या फुईंनी सांगितलं. मग मी बसले सरीत फतकल घालून, खुरप्याने खड्डा खणून त्यात ऊसाचे रोप लावायचे. माती घालून नीट दाबायचे. मग खुरपे , रोपांमधील अंतर मोजण्यासाठी दिलेली दोन फुटाची काटकी. रोपांचा ट्रे मागे ओढायची आणि सरीवर हात टेकूवून मागे सरकायची.  जमायला लागलं . मग मलाही हुरूप आला. बाकीच्यांनी डोक्याला टॉवेल, अंगात जुना शर्ट, कमरेला जुनं गुंडाळलेलं. त्यामुळं त्यांना कपडे खराब होण्याची भिती नव्हती. मला फुई म्हणाल्या, ‘सायबीन आली तशीच. डोक्याला काय न्हाय, अंगात काय न्हाय.’  मी म्हटलं, ‘असू द्या. कुठं ऊन आहे? आभाळ तर आलंय.’

तेवढयात पाऊस सुरूच झाला. शिरबातात्या आणि ह्यांचं सुरु,  ‘वातावरण मस्त आहे. आता रोप तकवा धरणार.’

पण आमची भंबेरी उडाली. शिरबा तात्या सगळ्यांना ट्रे आणून देत होते. मग त्यांनी छत्र्याही आणून दिल्या. ह्यांनी मला जर्कीन आणि प्लॉस्टीकची टोपी दिली. पावसामुळे चिखल झाला. सगळं अंग चिखल्याने लडबडून गेलं. साडी, जर्कीन चिखलात माखले. रोपं लावायला सगळ्यांनाच उत्साह आला मग मी तरी का उठून जाऊ. साठी, पासष्टीच्या बायका सहज माती चिखलात काम करत होत्या. पाऊस झेलत होत्या. मग मलाच का जमू नये? मी ही जिद्दीने मडबाथ घेत रोप लागण करू लागले.

© सुश्री सावित्री जगदाळे

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी मीना हरिणी ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

संक्षिप्त परिचय 

शिक्षा – MSc  B.Ed.

अभिरुचि – वाचन, रेडिओ ऐकणे यातून लिखाणाचा छंद.

प्रकाशित साहित्य--चार कथासंग्रह दोन अनुवादित,(इंग्रजी to मराठी), एक विज्ञान कथासंग्रह, विज्ञानलेख.

प्रसारण – सांगली आकाशवाणीवर अनेक कथा व लेख प्रसारित.

पुरस्कार – ऑटोबायोग्राफी ऑफ योगी-परमहंस योगानंद. या पुस्तकाला कवितासागर साहित्य अँक्याडमी पुरस्कार,  प्रतीक्रुती या विज्ञानकथेला आखिल भारतीय मराठी विज्ञान कथास्पर्धेमध्ये दुसरे बक्षीस.

☆ विविधा :  मी मीना हरिणी – सौ.अंजली दिलिप गोखले

हाय फ्रेंड्स, परवा ट्रीप ला आलेल्या सगळ्या फ्रेंडशि मी बोलतेय. आला होतात ना परवा सागरेश्वर ला? खूप दमलात ना? उन्हामध्ये नुसती पायपीट झाली म्हणून खूप वैतागला ना?

बरोबरच आहे तुमचं. फिरून फिरून, उंच उंच डोंगर चढून लालेलाल झाला होता सगळ्या. काय म्हणता? मला कसं माहिती? मी कोण? हो, सॉरी सॉरी. सांगते ह. तुम्ही सागरेश्वर च्या अभयारण्यात ज्यांना उत्सुकतेनं पहायला आला होतात, पण तुमची घोर निराशा झाली, त्या अनेक हरणे पैकी मी एक. माझं नाव मीना हरणी. तुम्ही म्हणाल, तुम्हाला मी दिसले नाही, मग मग मी कसं पाहिलं तुम्हाला? बरोबर? सांगते सांगते.

तुम्ही पहाटे-पहाटे रेल्वेनं प्रवास सुरु केलात, त्याच वेळी तुमची स्पंदनं आम्हाला इथे जाणवली. आपल्यालाही आता छान छान मुली भेटणार, पाहायला मिळणार म्हणून आम्ही पण आनंदात होतो. पण तुम्ही आलात आणि आम्हाला न भेटताच डोंगर चढायला सुरुवात केलीत. तुम्ही आमची निराशा केली. आमच्या डोंगर चढायचा म्हणजे सोपे काम नाही. आम्हाला रोजची सवय आहे. पण तुमच्यासाठी मोठं दिव्य होते. किती दमलात, घामेघूम झालात, लालेलाल झालात. कधीतरी आलं की असं होतं.

तुम्ही आमच्या अभयारण्यात आलात तेच मुळी भर दुपारी, सूर्य अगदी भर डोक्यावर आला होता. आम्ही ही उन्हामध्ये कधीच बाहेर पडत नाही. आमची चमचमती कातडी काळवंडते ना! शिवाय आम्हाला तहानही खूप लागते. अलीकडे पाण्याचेही शोर्टेज आहे. पावसाचा प्रमाण कमी झालंय, त्यामुळे आहे ते पाणी आम्हाला पुरवून पुरवून वापरावे लागते. शिवाय तुम्ही मुली किती बडबडत होतात, आवाज करत होतात. आम्हाला ते अजिबात आवडत नाही. आम्हाला शांतताप्रिय आहे. शिवाय तुमच्याकडे मोबाईल म्हणतात ते खेळणे. घरी जे ऐकता, तेच घेऊन इथे आलात. मग बदलतो काय? ती कर्कश्य गाणी आम्हाला मुळीच आवडत नाहीत. शिवाय मोबाईल मधून बाहेर पडणारे ते रेज आम्हाला खपत नाहीत. म्हणूनच आम्ही सगळ्या जणी झुडपात बसून राहिलो होतो. तुमच्या नजरेला ही पडायचं नाही असा चंगच आम्ही बांधला होता. तुमचा दंगा आणि ती गाणी यामुळेच खरं आम्ही चिडलो होतो.

आम्ही कोणीच दिसलो नाही, त्यात रण रण त ऊन, म्हणून सगळ्याजणी खूप वैतागला. पुन्हा म्हणून सागरेश्वर ला यायचं नाही असं ठरवून टाकलं. पण फ्रेंड्स, तुम्हाला सांगू का?

आयुष्यात असे चढ-उतार येणारच. किती दमछाक झाली ना तुमची? पण पाठवा बरं, कष्टानं डोंगर चढून वर आल्यावर खालचं दृश्य किती छान दिसते की नाही तुम्हाला? चौकोनी चौकोनी शेत, टुमदार छोटी-छोटी घर, आणि वळणावळणाची कृष्णा माई! कष्टाशिवाय फळ मिळत नाही असं उगाच म्हणत नाहीत.

थंडगार पाण्याच्या गुहेमध्ये आल्यावर सगळा शिणवटा निघून गेला ना? रोज संध्याकाळी आम्ही तिथेच पाणी प्यायला जातो. व्यायामही होतो आणि पाणी मिळते. तुम्हाला कष्ट करूनच माहिती नाही. आपले शरीर किती काम करू शकते तेच तुम्हाला माहिती नाही. दमत दमत का होईना, एका दिवसात दोन डोंगर पार केले तुम्ही. तुमच्या स्नायूंमध्ये हे किती प्रचंड ताकद आहे बघा. त्यात ताकतीचा वापर करा म्हणजे यशाचे शिखर तुम्ही गाठू शकता. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करा खूप खूप अभ्यास करा, छान पेपर सोडवा. भरपूर मार्क्स मिळवा आणि रिझल्ट सांगायला पुन्हा आमच्याकडे या. होय याच सागरेश्वर च्या डोंगरावर. आम्ही सगळ्या जणी तुमच्या स्वागताला येऊ. तर फ्रेंड्स लक्षात ठेवा येताना ते मोबाईल खेळणं मुळीच आणू नका.

फ्रेंड्स या अनुभवावरून दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थही तुम्हाला चांगला समजला असेल. बाय, भेटू पुन्हा.

 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित – अंगण ☆ सुश्री मानसी काणे

☆ विविधा : ललित  – अंगण  –  सुश्री मानसी काणे ☆

रोज रात्री आठ वाजता ‘‘माझ्या अंगणी नांदते नवर्‍याची बायको ,माझ्या नवर्‍याची बायको’’अस शीर्षकगीत आपण ऐकतो पण आज शहरात रहाणार्‍या लोकाना फ्लॅट सिस्टीममुळे अंगण ’माहीत असण थोड दुरापास्त आहे.पण मी ज्या भागात रहाते तिथे अजून अंगण आहे.अंगण ही फार सुंदर गोष्ट आहे.खर तर ही घरासमोरची मोकळी जागा.पण जाईजुईचे वेल,लालभडक जास्वंदी,स्वस्तीक,तगर,शेवंती ,चाफा आणि मंजिर्‍यानी बहरलेले तुळशीवृंदावन असलेल अंगण डोळ्याना सुखावून जात.इथून आपन प्रसन्न मनान घरात प्रवेश करतो.तुळशीपुढे दारार सुंदर रांगोळी रेखाटली आहे,नुकतच पाण्यान सचैल स्नान करून झाड टवटवीत झाली आहेत.सूर्याचे सोनेरी किरण ऊबदारपणान पाठीवरून हात फिरवत आहेत,दारात टाकलेले तांदुळाचे दाणे चिमण्या पाखर टिपत आहेत,एखादा भारद्वाज चाफ्याच्या झाडावर बसून घुमतो आहे हे दृष्य  डोळ्यात साठवून ठेवावस वाटत.

घरात आजी आजोबा असतील अन अंगणात झोपाळा असेल तर नातवंडांसकट त्यांचा मुक्काम झोपाळ्यावरच असतो. सकाळच दूध,अभ्यास,कधी दूधभात भरवण संध्याकाळच शुभंकरोती ,रात्री मांडीवर घेऊन झोके घेत झोपवण सगळ अंगणातच चालू असत.लपाछपी ,लंगडीपळती,गोट्या,विटीदांदू मग लुटूपुटूच क्रिकेट हे सगळ अंगण आनंदान मजेत पहात असत.सायकल ते टू व्हिलर आणि नंतर फोरव्हीलर हा प्रगतीचा प्रवास या अंगणान डोळे भरून पाहिलेला असतो.सोनुड्याच्या मुंजीचा आणि छकुलीच्या लग्नाचा छोटेखानी मांडव याच अंगणात सजलेला असतो.इथूनच घरात येणार्‍यांच  मनापासून स्वागत होत आणि निरोपही इथूनच दिला जातो.या अंगणान खूप रागलोभ पाहिलेले असतात.तसच जुईच्या मांडवाखाली सुगंध अंगावर झेलत काढलेला रुसवा पण पाहिलेला असतो. दिवाळीत आकाशदिवा अन दिव्यांची रोषणाई इथे उजळलेली असते.वर्ष प्रतीपदेची गुढी नव्याकोर्‍या खणान इथेच सजलेली असते.थंडीत कोवळ्या उन्हात पाठ शेकायला इथच बसावस वाटत.पावसाळ्यात इथूनच पागोळ्यांखालचे मोती ओंजळीत धरता येतात.उन्हाळी पावसातल्या गारा इथच वेचल्या जातात आणि कडक उन्हाळ्यात रात्री अंगणात बाजेवर पडून गार वार्‍यात चांदण्या मोजण्याची मजाही काही औरच असते.उन्हाळी वाळवण घालण्यासाठी अंगण हव.झळवणीच पाणी गरम करायला घागर ठेवायला अंगण हव.परीक्षेच्या दिवसात पाठांतरासाठी अंगणच हव अन सुटीच्या दिवसात गाण्याच्या भेंड्यांसाठीही अंगणच हव.गड्डा झबू अन भिकार सावकार रंगवण्यासाठी अंगण हव अन चांदोबा, विचित्र विड वाचायसाठीही अंगणच हव.रात्रीच जेवण सर्वानी मिळून करायला अंगण हव अन कोजागिरीच केशरी दूध चंद्राच्या प्रकाशात थंड करायला ठेवायलाही अंगणच हव.

अंगण म्हणजे घराचा आरसा.तिथल्या सुखदु:खाच प्रतिबिंब अंगणातल्या हालचालीत पडत आणि अंगणातल्या आनंदाचा शिडकावा घरावर होतो.म्हणून प्रत्येक घराला छोटस का होईना अंगण हव.नाहीतर ‘‘मैं तुलसी तेरे आँगनकी, अंगणी पारिजात फुलला,  माझ्या ग अंगणात। कुणी सांडिला दूधभात। जेविले जगन्नाथ कृष्णबाळ।। ’’ही गाणी कशी म्हणायची? सडा रांगोळी कुठ करायची? वाट कुठे पहायची? घराकडे येणारी सुखाची आनंदाची पायवाट पायरीपर्यंत पोहोचवण्याच हे माध्यम ‘अंगण‘आपल्या आयुष्यात असायलाच हव.गर्दीच्या शहरात सापडत नसेल तर खेड्यात जाऊन पहायला हव .काहीच नाही जमल तर मनाच्या एका कोपयात आज ‘अंगण’निर्माण करायला हव.

 

©  सुश्री मानसी काणे

संपर्क  – 02332330599

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणरायांचं आगमन ☆ श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर

श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – एम.ए. एम.एड. व्यवसाय – अध्यापन , क.ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यकेशन, ३० वर्षे अध्यापन, सद्य: निवृत्त

प्रकाशित पुस्तके –  एकूण – ६५  बालवाङ्मय – एकूण २९ पुस्तके – कविता संग्रह – २, नाटिका -४, चरित्र – १,बाल कादंबरी – १ भौगोलिक – 1, बालकथा – १२ प्रौढ वाङ्मय –  मौलिक एकूण ८ पुस्तके कथासंग्रह –४, कविता संग्रह – २   संकीर्ण –  २ अनुवादित – अनुवाद हिंदी भाषेतून – एकूण २७ पुस्तके लघुतम कथासंग्रह – एकूण – ६ , लघुकथा  (हिंदीतील कहानी)  संग्रह – अनुवादित – १३  कादंबर्‍या – ६, व्यंग रचना -२ , तत्वज्ञान -अध्यात्म – ५  पुरस्कार –     बालकविता, बालकथा, बालनाटिका आणि एकंदर बालसाहित्याचे लेखन यांना पुरस्कार  अनुवादासाठी – स्पॉटलाईट, त्रिधारा या पुस्तकांना, एकंदर लेखनासाठी पंजाब साहित्य कला अकादमीचा विशिष्ट पुरस्कार  अन्य – सांगली जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार  अनुवाद  (हिंदी मध्ये)- काही लघुतम कथा व कही कथा यांचा हिंदी मध्ये अनुवाद व समकालिन भारतीय साहित्य, भाषा पत्रिका, मधुमती, हिमप्रस्थ इ. मासिके व कथा आणि लघुतम कथा संकलाच्या पुस्तकात प्रकाशित गणवेश कथा हिंदी, तेलुगु, कन्नड तिन्ही भाषांमध्ये प्रकाशित

सन्मान- कोटा – शब्दसरोज, जबलपूर – डॉ. श्रीराम दादा ठाकुर संस्कारधानी

आकाशवाणी प्रसारण – 1. प्रतिबिंब- कौतुंबिक श्रुतिका – १००च्या वर श्रुतिकांचे लेखन, २. नभोनाट्य – ५ नभोनाट्यांचे लेखन

शोध प्रकल्प – २ – १. किशोर मासिकातील प्रकाशित साहित्य, २. सांगली संस्थातील स्त्री शिक्षणाचा विकास – १८७५ ते १९५०

 

☆ विविधा : गणरायांचं आगमन – श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर 

पार्वती मातेची परवानगी घेऊन, गणेशोत्सवासाठी गणराय महाराष्ट्रात आले आणि  घरोघरी नि विविध मंडळात अंश रुपाने स्थानापन्न झाले. या वर्षी त्यांना थोडं  बरं वाटत होतं. गर्दी फारशी नसल्याने मोकळा श्वास घेता येत होता. एरवी मिरवणुकीने येताना तो लोकांचा गोंधळ, आवाजाचा कल्लोळ यामुळे ते पार शिणून जायचे. स्वस्थपणे स्थानापन्न झाल्यावर त्यांना पार्वती मातेशी झालेला संवाद आठवला आणि त्यांच्या ओठांवर हसू फुटलं.

पार्वती माता म्हणाली होती, ‘यंदा जगभर सगळीकडे कोरोना… कोरोना…  ऐकू येतय. महाराष्ट्रात तर कोरोनाचा कहर आहे म्हणे… सांभाळून रहारे बाळा॰..’

आई माणसाची असो,  की देवाची, तिची काळजी आणि काळीज सारखच.

‘आई, लोक मला ‘सुखकर्ता… विघ्नहर्ता’ मानतात. कोरोनाचा कहर कमी कर, असं ते मला साकडं घालणार आणि कोरोना… कोरोना… म्हणत तूच मला घाबरवून टाकतीयस….’

‘तसं नाही रे… पण …’

‘कळलं … कळलं … आईचं काळीज…!’

‘मी पण तुझ्या पाठोपाठ २५ तारखेला येतेच आहे. लोकं मला माहेरवाशीण मानतात. तिच्यासारखं माझं कौतुक करतात पण मी जाणार घराघरातून. तुझा  वावर घरी.. दारी. यत्र… तत्र.. सर्वत्र.’

माता पार्वती आणि गणरायांचा संवाद चालू असताना, बाप्पांचा सारथी अर्थात उंदीर मामा यांचीही लगबग सुरू झाली.  बाप्पाला ब्रह्मदेवाकडे जाऊन E- पास घेण्याची त्यांनी आठवण केली. एका गोष्टीने मात्र उंदीर मामा खुश होते की यंदा लॉकडाऊनमुळे, मुळातच रस्त्यावर वाहतूक कमी झाल्याने रस्त्यावर खड्डे जरा कमी असतील.  त्यामुळे बाप्पांची स्वारी घेऊन जायला त्रास होणार नाही. यंदा मिरवणूक नसल्याने लांबत जाणारी पूजा नाही, त्यामुळे प्रसादाचे मोदक अगदी दुपारीच म्हणजे अगदी वेळेवर मिळणार. मामा आत्तापासूनच मनाचे मोदक खाऊ लागले.

यंदा ध्वनीप्रदुषण फारसे नसल्याने कानात घायलाला बोळे नकोत.  हा,  फक्त सॅनीटायझरची बाटली  आठवणीनं बरोबर घ्यायला पाहिजे, असं ठरवून उंदीर मामा पुढच्या तयारीला लागले आणि त्यांना एकदम मास्कची आठवण झाली. आपल्याला चिंधीही पुरे पण बाप्पांच्या मास्कचं काय करायचं? कोण शिवून देईल त्यांना मास्क, याची त्यांना विवंचना पडली.

गणरायांना एकीकडे  थोडं स्वस्थ, निवांत, वाटत होतं. यंदाचा उत्सव आपल्याला खरोखरच आरामदायी होईल, अशी त्यांना खात्री वाटू लागली होती पण दुसरीकडे आपल्या भक्तांविषयी कणवही त्यांच्या मनात… हृदयात दाटून आली होती. त्यांचा आनंद, उत्साह, जोश याच्यावर विरजण पडलं होतं. आता जाता जाता पहिलं काम म्हणजे धन्वंतरींना कोरोंनावर लस तयार करायला सांगणे.

आणखी काय अपेक्षा असेल बरं भक्ताची?  हां! येता येता लोक म्हणत होते, ‘कोरोंनात आता आणखी महापुराचं संकट तेवढं नको.’  मंडप आता रिकामा होता. गणरायांनी विचार केला आणि इंद्रदेवांना त्यांनी दूरध्वनी म्हणजे आकाशध्वनी लावला आणि त्यांच्याशी ते ऑन लाईन बोलू लागले. म्हणाले,  ‘इंद्रदेवा सांभाळून बरं! गोवर्धन पर्वतावर तू  कृष्णकाळात पाऊस पाडला होतास, तसा पाऊस गेल्या वर्षी पाडलास. केवढी तरी मालमत्तेची हानी झाली. माणसं, गुरं – ढोरं दगावली. यंदा देवा, पाऊस पाडा, नद्या-तळी- धरणं भरू देत. पण महापूर घेऊन येऊ नका. आताच्या काळात पुराचं पाणी अडवणारा कुणी शिष्योत्तम अरुणीही उरला नाही.’

मंडपात चार-सहा जण आरतीचं तबक घेऊन येताना त्यांना दिसले. मग त्यांनी आपला आकाशध्वनी बंद केला आणि ते सुहास्य मुद्रेने वरदहस्ताची नेहमीची पोझ घेऊन बसून राहिले.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतले जसराज…. ☆ सुश्री आसावर केळकर-वाईकर

☆  मनमंजुषेतून : आठवणीतले जसराज…. – सुश्री आसावर केळकर-वाईकर

काहीवेळापूर्वी बातमी आली आणि मनानं खूप वर्षं मागं नेलं. अगदी शालेय वय होतं… नुकताच घरात टीव्ही आला होता आणि कुठलाही गाण्याचा कार्यक्रम त्यावर लागला कि वडिलांची हाक यायचीच… हातातलं काय असेल ते सोडून हाकेला ओ देत धावायचं आणि ‘बैस इथं.. ऐक नीट’ असं त्यांनी म्हणताच टीव्हीला डोळे लावून पाहाताना काय सुरू असेल ते सगळं कानात साठवायचा प्रयत्न करायचा… एकदा असाच टीव्हीवर कार्यक्रम सुरू झाला आणि पपांनी मला हाकारलं… मी धावत आले तर कुणीतरी मैफिलीची अगदी नुकतीच सुंदर सुरांत खूप सुरेल सुरुवात करत होतं आणि कॅमेरा त्याचवेळी फिरून प्रेक्षागृहातल्या पहिल्या रांगेत स्थानापन्न झालेल्या धोतर-झब्बा-खांद्यावर शेला अशी सुंदर वस्त्रं परिधान केलेल्या एका व्यक्तीवर स्थिरावला आणि वडिलांनी सांगितलं, ‘हे बघ… हे पंडित जसराज!’ ती त्यांच्या नावाची झालेली पहिली ओळख!

ते खुर्चीच्या हातावर कोपर टेकवून तर्जनी आणि मधलं बोट गालावर आणि उरलेली तीन बोटं हनुवटीवर ठेवून अतिशय कौतुकभरल्या नजरेनं एकाग्रपणे त्या गायकाकडं पाहात होते, त्याला ऐकत होते. पुन्हा कॅमेरा गायकाकडं वळला आणि जेमतेम वीस-बाविशीचा तो तरूण स्क्रीनवर दिसू लागला. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयातही एकूणच ‘सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्यात त्या गायकाचे सूर आणि जसराजजींच्या चेहऱ्यावरच्या त्या सुखद भावांचा खूप मोठा सहभाग असावा असं आज वाटतं. मी अजून हातावर ताल देत मात्रा मोजत आलापाचे सूर त्यात बसवण्याच्या पायरीवरच होते तेव्हां… मात्र एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तो शांतावणारा सूर आणि मैफिलीच्या सरत्या काही क्षणांमधे कॅमेऱ्यानं टिपलेला पं. जसराजजींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओसंडणारा क्षण ह्या गोष्टी तेव्हांपासून काळजात घर करून आहेत. नंतर कळलं कि तो युवा गायक म्हणजे ‘प्रतिजसराज’ म्हणून नावारुपाला येत असलेला त्यांचा पट्टशिष्य संजीव अभ्यंकर! आपण घडवलेलं सुंदर शिल्प आपल्या नजरेनं न्याहाळून त्याचा आनंद लुटण्यातलं सुख त्यादिवशी जसराजजींच्या डोळ्यांत दाटलं होतं. गुरू-शिष्याची जोडीही ‘त्यानं’ जमवावी लागते म्हणतात… ही जोडी अशा सर्वश्रेष्ठ जोड्यांपैकी एक म्हणायला हवी!

पुढं त्यांना ऐकताना तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली. पुढे काही दिवसांतच त्यांची ‘दिन की पूरिया’ ही कॅसेट आलेली आठवते. दुसऱ्या बाजूला ‘मुलतानी’ होता. ती कॅसेट कितीवेळा ऐकली असेल याची गणतीच नाही. अगदी शालेय वयात गाणं म्हणावं असं काही कळत नसताना, दिन की पुरिया आणि मुलतानीचे आरोह-अवरोहही माहीत नसताना किंबहुना रागांची ही नावंसुद्धा ऐकलेली नसताना फक्त सुरानं मोहून जाऊन कॅसेट पुन्हापुन्हा ऐकणं ही गोष्ट विलक्षणच म्हणायला हवी… ती ताकद त्या सुरांची होती, त्या लडिवाळ सुरानं मनावर घातलेल्या मोहिनीचा तो परिणाम होता!

त्यानंतर दोन-तीन वर्षांतच केव्हातरी आमच्या सांगलीच्या तरुणभारत ग्राउंडवर मोठा मंडप घातलेल्या भव्य स्टेजवरच्या मैफिलीत जसराजजींना तल्लीनतेनं गाताना डोळे भरून पाहिल्याचं आणि काना-मनात तो सूर खोलवर साठवून ठेवल्याचं आठवतं. सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहाताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! शास्त्रीय संगीत म्हटलं की बहुतांशीवेळा गळा नसणाऱ्या, संगीत न शिकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अकारणच त्याचं एक क्लिष्ट चित्र रंगवलं गेलेलं असतं. मात्र जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.

त्यांच्या बंदिशींचा एक वेगळाच ढाचा आणि बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे समोरच्या कोणत्याही वर्गवारीतल्या श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत! ही सगळी किमया म्हणजे दैवी देणगीला त्यांनी दिलेल्या अपार साधनेची जोड आणि त्याचं फलित होतं.

विचार करता जसराजजींचा भावगर्भ रससंपन्न सूर, किशोरीताईंची अफाट प्रतिभासंपन्न, विद्वत्तापूर्ण तरीही रसाळ गायकी, कुमारजींचा टोकदार सुरातील नक्षीदारपणे उभा केलेला राग, भीमसेनजींचा कमावलेला दमदार सूर अशा अनेक अद्भुत गोष्टींनी आमच्या पिढीचं संगीताचं वेड समृद्ध केलं आहे. आज काहीवेळेस स्टेजवर घडणाऱ्या काही गोष्टी मनास येत नाहीत तेव्हां त्याच्या मुळाशी कोणताच पूर्वग्रह, दुस्वास या गोष्टी नसून ह्या फक्त संगीताशी निष्ठावंत कलाकारांनी डोळ्यापुढं उभं केलेलं संगीताचं एक सुंदर, मनमोहक विश्व असतं, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली ह्या कलाकारांच्या कलेनं प्रदान केलेली आत्मसुखाची अनुभूती ल्यायलेली रत्नप्रभा असते. असे संस्कार आमच्या पिढीच्या कानांवर झाले यापरते आमचं भाग्य ते काय असावं!? ह्या व्यक्तिमत्वांनी आमचं जगणं समृद्ध केलं… मनात अनेक जाणिवांची रुजवण ह्यांच्या कलेनं केली… डोळे मिटताक्षणी ह्यांच्या सुरांनी ‘त्याचं’ दर्शन घडवलं… अस्सलपण म्हणजे काय हे ह्यांच्या सुरांनी दाखवलं!

आज स्वर्गाच्या द्वारी सुशोभन असेल आणि साक्षात कृष्णपरमात्मा, त्यांचा कृष्णलल्ला त्यांच्या स्वागताला हजर असेल… त्यानं त्यांना मिठीत घेऊन आपुलकीनं स्वर्गात पाचारण केलं असेल आणि त्यांच्या रसाळ, भावगर्भ सुरांत ‘ओम्‌ नमो भगवते वासुदेवाय’ ऐकायला ‘तो’ आतुरला असेल! भगवद्गीतेतल्या ‘त्याच्याच’

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

ह्य आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं ‘त्यानं’च जसराजजींना दिलेलं वरदान तो आत्ता अंतरी अनुभवत असेल…!

शाममुरारी.. त्यांच्या सुरांच्या रूपानं कायमस्वरूपी आनंदाचा ठेवा आमच्याही आयुष्यात ठेवलास त्यासाठी तुझे अपार ऋण!

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

फोन : ०९००३२९०३२४

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुंबईस्पिरीट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆  मनमंजुषेतून : मुंबईस्पिरीट  – श्री अमोल केळकर

Running (Raining)  successfully since २६ जुलै २००५

१५ वर्ष होतील.  अनेक प्रसंग जातायत डोळ्यासमोरुन. त्यानंतरची एक ही २६ जुलै अशी नाही की २००५ ची आठवण आली नाही मुंबई वर अनेक संकटे आली. पण २६ जुलैच्या संकटाचा वय्यक्तिक अनुभव घेतल्याने ते मनावर कायम कोरले गेलंय म्हणूनच आज सगळ्या जगासमोर भयानक आपत्ती असताना, यापूर्वी असे भयानक संकट कुठले अनुभवले?  तर २६ जुलैचा प्रलय असे मी सांगेन

दुपारी ३ ते दुस-या दिवशी उजाडेपर्यत मुंबईची जीवन वाहिनी अर्थातच लोकलच्या कुशीत, कुर्ला स्थानकात ती काळ रात्र काढली. त्यावेळी स्थानकात दोन लोकल एक ठाण्याकडे जाणारी तर एक मुंबई कडे जाणारी ज्यात मी स्वतः होतो, माझ्यासारख्या  हजारो लेकरांचा सांभाळ करत या दोन माऊली भक्कम उभ्या होत्या.

मी कुर्ला स्थानकात लोकल मधे सुखरुप अडकलोय हा घरी साधारण रात्री ७ च्या सुमारास धाडलेला शेवटचा निरोप. नंतर केवळ प्रतिक्षा.

काही तासात लोकल सुरु होऊन कुर्ल्याहून पहिल्या लोकलने परतायचे भले  रात्रीचे ११/१२ वाजले तरी चालतील ही आशा संपुष्टात आली जेंव्हा रुळावरील पाणी फलाटाला समांतर आले आणि त्यानंतरच्या थोड्याचवेळात लाईट ही गेले.

मग लक्षात यायला लागले जे घडतय ते भयानक आहे.

नेहमीसारखा भुकेला स्टेशनवरचा “वडा -पावच” धाऊन आला.

आपत्तीत लुबाडणूक करायचा विषाणू त्यावेळी इतका पसरला नव्हता त्यामुळे योग्य भावातच मिळाला.

तो खाऊन परत जाग्यावर येऊन बसलो. खिडकीची जागा आणि वाट काढून आत टपकणारा पाऊस त्यामुळे ती जागा दुस-या कुणी घेणे शक्य नव्हते. कोसळणा-या पावसाच्या प्रचंड आवाजात थोड्या थोड्या अंतराने डुलक्या घेऊन,  झुंजमूंज झाल्यावर आता रस्त्याने जायचे ठरवले

कुर्ला ( पू) ला स्टेशनबाहेर कमरेपेक्षा जास्त पाण्यातून, आफीस बॅग सांभाळत देवनार डेपो पर्यत चालत जाऊन,  नंतर बसने वाशी आणि मग वाशी- बेलापूर रिक्षा असा प्रवास करत २७ जुलै मध्यान्ही ला सुखरूप घरी पोहोचलो आणि या भयानक अनुभवाचा सुखरूप शेवट झाला.

कुणी विसरु शकेल

ती काळी रात्र  ?

जणू सागरच बनले होते

मिठी नदीचे पात्र ……

.

.

तरीही आमचे सुरु

शहरीकरणाचे सत्र

शिकलो नाही आपण

यातून काडी मात्र

(अमोल)

२६ जुलैग्रस्त  नवीमुंबईकर

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारावून टाकणारे धैर्य !! ☆ संग्राहक – श्री मिलिंद वेर्लेकर

 ☆  इंद्रधनुष्य : भारावून टाकणारे धैर्य !! : – संग्राहक – श्री मिलिंद वेर्लेकर

धन्य ती लाईबी! आणि धन्य ते गुणग्राहक मुख्यमंत्री!!

कुठून आणतात, या साध्यासुध्या भारतीय महिला हे अदभूत धैर्य, कमालीचा कणखरपणा, अतुलनीय चिकाटी आणि स्वयंस्वीकृत काम सक्षमपणे निभावून नेण्यासाठी कंबर कसून घेतलेली पराकोटीची जिगरबाज मेहनत अंगात…….

लाईबी ओइनम, मणिपूर मधल्या इंफाळमधली एक साधीशीच, गरीब पण अफाट जिद्दी पन्नाशीतली भारतीय कर्तुत्ववान स्त्री….

३१ मे २०२० चे संध्याकाळचे पाच वाजलेले.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने आणि काही म्हणजे काहीच सुरु नसल्याने गिर्हाईकचं नसल्याने, दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असलेली लाईबी ही पाच सीटर ऑटो रिक्षाचालक रस्त्याच्या शेजारीच सुकवलेल्या खाऱ्या माश्यांचा छोटासा ढीग गोणपाटावर टाकून गिऱ्हाइकांची वाट बघत बसली होती.

गेली दहा वर्षे इंफाळमध्ये पहिली रिक्षाचालिका म्हणून कष्ट करून कुटुंबाचे कसेबसे उदरभरण करणारी लाईबी तिच्या दोन मुलं आणि डायबेटिक दारू पिणारा नवरा असलेल्या घरातली कमावणारी एकमेव सदस्य.

आणि त्यामुळेच लॉक डाऊन असल्याने आणि रिक्षा व्यवसाय बंदच असल्याने खारवलेले मासे विकत कशीबशी दोन वेळची चूल घरात पेटायची तिच्या.

तितक्यात एक वयस्कर आणि प्रचंड थकलेले म्हातारे गृहस्थ चिंताक्रांत चेहऱ्याने तिच्या जवळ त्याचं चौकात येऊन बराच वेळ काही शोधल्यासारखे करू लागले.

बराच वेळ त्या चौकात उभं राहून सुद्धा कुणाचीच काहीच हालचाल दिसेना म्हणून शेवटी त्या गृहस्थांनी रस्त्याकडेला मासे विकत बसलेल्या या लाईबीला विचारलं कि त्या वेळी तिथं एखादी कॅब मिळेल का जी तिघांना  तातडीने इंफाळपासून तब्बल १४० किलोमीटर लांब असलेल्या कामजोंग या पर्वतरांगांनी वेढलेल्या ठिकाणी नेऊन सोडेल.

“सगळं बंद आहे साहेब. आत्ता कॅब मिळणं अशक्य आहे आणि तुम्ही म्हणताय ते अंतर सुद्धा इथून खूप लांब, अशक्य अवघड पर्वतरांगांनी वेढलेलं आणि प्रचंड वाईट नागमोड्या रस्त्यांनी भरलेलं आहे आणि तातडीने म्हणत असाल तर आत्ता त्या ठिकाणी खाली उतरलेले खूप दाट ढग असणार आहेत त्यामुळे आत्ता इथे कुणी मिळालाच कॅबवाला जरी चुकूनमाकून तरी तो जीव धोक्यात घालून आत्ता तिथे पोचायला कॅब घालेल याची मला अजिबातच खात्री वाटत नाही साहेब.” लाईबी खरं ते म्हणाली.

म्हातारे गृहस्थ आता मात्र खचून रडकुंडीला आले.

“तुम्ही सांगताय ते सगळं मला ठाऊक आहे. गेले दोन तास मी सिव्हील हॉस्पिटलपासून इथे भटकत भटकत शोधत शोधतच आलोय कॅब मिळतेय का म्हणून पण मला सगळ्यांनी हेच सांगितलं आहे.

काही कॅंब चालक मला वाटेत भेटले पण कोणीच यायला तयार नाहीये पण आम्हांला तिघांना आत्ताच कामजोंगला जायचंच आहे. कॅंब चालकांनी स्पष्ट नकार दिलाय कारण माझ्यासोबत माझी कोलकात्यात नर्स असलेली आणि कोरोना वार्डात वैद्यकीय सेवा देताना कोरोना पोझीटीव्ह झालेली पण उपचारानंतर पूर्ण बरी झालेली आणि आता कोरोना निगेटिव्ह झालेली माझी मुलगी आहे.

त्यांच्या मते अवघड रस्त्यांसोबत कोरोना पेशंट हा देखील एक धोकाचं आहे आणि दुर्दैवाने कुणीच तो धोका पत्करू इच्छित नाहीयेत.

गेले पंधरा दिवस माझी मुलगी इथे उपचार घेतीये आणि कोरोनाशी दोन हात करताना प्रचंड थकून गेली आहे. बरी झाल्यावर आता डॉक्टरांनी तिला सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलंय आणि म्हणून आता सक्तीचा डिस्चार्ज मिळाल्यावर आम्हांला तिला घेऊन तातडीने कामजोंगला आमच्या गावी पोचायचं आहे.

कारण कोरोना केस असल्याने इथं कुठलंच हॉटेल सुद्धा आम्हाला ठेवून घ्यायला तयार नाहीये ही प्रचंड अडचण आहे. आणि आता माझ्या मुलीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह झाल्याने आणि बेड्स कमी असल्याने हॉस्पिटलने आता माझ्या मुलीला कंपल्सरी डिस्चार्ज दिला आहे”

रडवेल्या आवाजात तो एक म्हातारा असह्हाय गांगरलेला गांजलेला गरीब बाप, शेजारीच एका टपरीत थकून बसलेल्या आपल्या अशक्त मुलीकडे हात दाखवत आपलं गाऱ्हाणं कळवळून सांगत होता.

आता मात्र त्या लोकांची ती प्रचंड अडचणीची परिस्थिती नीट जाणवलेली लाईबी आत्मविश्वासाने म्हणाली,” बाबा तुम्हाला चालणार असेल तर मी माझ्या पाच सीटर रिक्षातून तुम्हाला कामजोंगला सोडू शकते.”

आश्चर्यचकित झालेले ते म्हातारे गृहस्थ आणि त्यांचे भाऊ असे दोघेही रस्त्यावर खाली बसून अगदी थोडेसेच मासे विकणाऱ्या त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागले.

आता मात्र त्यांचे शंकाग्रस्त चेहरे वाचून झटक्यात पन्नास वर्षीय लाईबी उभी राहिली आणि शेजारीच जरा अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या रिक्षाकडे हात करून तिनं आपल्या खिशातला रिक्षा चालक परवाना त्यांना काढून दाखवला.

“चिंता करू नका साहेब. माझी कॅब नाहीये पण ही पाच सीटर रिक्षा आहे आणि गेली दहा वर्षे मी या शहरात ही बऱ्यापैकी जड रिक्षा चालवते आहे. त्यामुळे कामजोंग पर्यंतच्या नागमोड्या डोंगराळ रस्त्यांवर जरा प्रयत्न करून ही रिक्षा मी नीट चालवू शकेन यावर तुम्ही विश्वास ठेवा.

पहिलं म्हणजे तुमच्या मुलीला कोरोना झालाय तो वैद्यकीय सेवा देताना झालाय.

दुसरं म्हणजे आत्ता इथे इम्फाळ मध्ये तुम्हाला कुणीच मदत करू शकणार नाही असा माझा इथला अनुभव आहे. त्यामुळे जर मी आत्ता तुम्हाला ही मदत नाही केली तर तुम्ही रात्रभर आणि कदाचित किती वेळ इथंच रस्त्यावर भयानक थंडीत पडून राहाल हे सांगणं सुद्धा अवघड आहे.

माणुसकीच्या दृष्टीकोनातून तिला आणि तुम्हाला मदत करणं हे मी माझ कर्तव्य समजते आहे.

माझा नवरा माझ्या सोबत येईल म्हणजे तुम्हाला सोडून रातोरात आम्हाला इथे परत यायला सोपे जाईल. तुम्हाला चालणार असेल तर मी हे करायला तयार आहे.” लाईबी प्रचंड आत्मविश्वासाने म्हणाली.

त्या संकटाच्या अडचणीच्या वेळी दुसरं काहीच करता येण्याजोगं नसल्याने म्हातारे गृहस्थ आणि काका इम्फाळ पासून कामजोंग पर्यंतचा अशक्य अवघड रस्ता माहित असताना देखील पोटच्या मुलीसाठी या अफाट दिव्याला तयार झाले.

रिक्षा स्वच्छ साफ करून, आवश्यक ती कागदपत्र घेऊन, डीझेल भरून, स्थानिक वेष बदलून शर्ट आणि पॅन्ट हा रिक्षा चालकाचा गणवेश घालून लाईबी आणि परतीच्या प्रवासात सोबत म्हणून तिचा नवरा असे दोघे थोड्याच वेळात तिथे दाखलं झाले.

जाऊन येऊन २८० किलोमीटरचे रिक्षाचे पाच हजार रुपयांचं भाडं ठरलं जे परिस्थितीने गरीब असलेल्या वडलांनी कामजोंगला एका स्वयंसेवी संस्थेशी फोनवर बोलून विनंती करून ठरवलं आणि सोमिचांग चीठून ही बावीस वर्षीय तरुण नर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाला देत असलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल आणि हे करत असतानाच तिला कोरोना संसर्ग झाल्याबद्दल तिच्या विषयी कृतज्ञता म्हणून ते भाडं देण्याचं त्या स्वयंसेवी संघटनेनं लगोलग मान्य केलं.

संध्याकाळी ठीक सहा वाजता लाईबीने रिक्षा सुरु करून बाहेर काढली आणि देवाचे नाव घेऊन ही पाच सीटर रिक्षा आता सोमिचांग चीठूनला, तिच्या वृद्ध वडील आणि काकांना आणि लाईबीच्या नवऱ्याला घेऊन आवश्यक त्या वेगाने एका अत्यंत अवघड आणि दाट धुक्याने वेढलेल्या नागमोड्या डोंगररस्त्यावरून दूरवरच्या कामजोंगकडे धावू लागली.

“माझ्या आयुष्यातला तो सर्वात भयावह प्रवास होता. मला ते रस्तेही अजिबात सवयीचे नसल्याने सोमिचांग मला तिच्या त्या अशक्त अवस्थेतही पुढील रस्त्यांबद्दल मार्गदर्शन करत होती आणि अत्यंत जबाबदारीने रिक्षा चालवत सोमिचांगला त्रास होणार नाही अश्या काळजीने मी रिक्षा चालवत होते.

दिवसासुद्धा ज्या रस्त्यावर कॅब चालक मोठी गाडी घालायला भितात अश्या अशक्य नागमोड्या खालीवर असलेल्या घाटरस्त्यांवर दाट धुक्यात लहानश्या रिक्षाच्या अंधुक दिव्यात एका अशक्त मुलीला आणि दोन म्हाताऱ्या माणसांना घेऊन जबाबदारीने रिक्षा चालवत नेणे आणि ते ही सतत न थांबता आठ तास हे माझ्यासाठी एक प्रचंड मोठे दिव्य होते.” लायबी सांगत होती.

प्रवासाला सुरुवात केल्यावर तासाभरातचं सातच्या सुमारास अंधारातच तो भयावह डोंगररस्ता सुरु झाल्याने खांद्यावर घेतलेले काम किती जोखमीचे आहे याची कल्पना लाईबीला येऊ लागली. तरीही नेटाने आणि जिद्दीने ते थोडंथोडकं नव्हे तर तब्बल १४० किलोमीटरचे ते अशक्य धोकादायक अंतर या जिगरबाज महिलेने पुढील सलग आठ तसं अजिबात न थांबता कापून पूर्ण केलं आणि पहाटे अडीच वाजता कामजोंगला पोचून या तिघांनाही तिने त्यांच्या घरात सुखरूप सोडलं.

घरात पोचल्यावर गदगदून आलेल्या अशक्त सोमिचांग चीठूनने, परिस्थितीचे गांभीर्य माणुसकीने समजून घेऊन स्वतःचा जीव शब्दशः धोक्यात घालून त्या सर्वांना कामजोंगला सुखरूप आणून सोडल्याबद्दल लाईबीचे अक्षरशः पाय धरत पुन्हा पुन्हा आभार मानले.

पण यावेळी लाईबी मात्र सोमिचांगला कोरोनामुळे अवघडलेलं वाटू नये म्हणून मुद्दामून त्याकडे लक्ष न देता इम्फाळचे हॉस्पिटल कसे आहे, कोरोना उपचार नेमके काय असतात, सोमिचांगने त्या सर्व काळात धैर्य कसे टिकवले आणि काय काय केले असले प्रश्न विचारत सोमिचांग चीठूनला पोटच्या मुलीप्रमाणे, आता ती पूर्ण बरी आहे हे जाणून कोरोनामुळे अजिबात घाबरून न जाता आईच्या मायेने जवळ घेतले.

खांद्यावर घेतलेलं काम पूर्ण केल्यावर आता मात्र दिवसाची घरची कामे लाईबीला समोर दिसायला लागली आणि त्यामुळे चहापाणी झाल्यावर सोमिचांग आणि कुटुंबीय तेव्हा तिथेच थांबून सकाळी निघाचा आग्रह करत असूनसुद्धा लाईबी आणि तिचा नवरा आता तडक रातोरातच इम्फाळकडे निघाले.

तोच सगळा अवघड रस्ता त्या पहाटेच्या बेफाम गारठ्यात संपवून पुन्हा दुपारी एकच्या सुमारास इंफाळला ते दोघं घरी पोचले.

दुसऱ्या दिवशी ही बातमी सोमिचांगला प्रवासाचे पाच हजार रुपये देणाऱ्या स्वयंसेवी संघटनेमुळे मणिपूर राज्यात सर्वदूर पसरली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा पोचली.

लाईबी ओइनम या आपल्या राज्यातल्या या गरीब पण झुंझार महिलेचा तातडीने सत्कार करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी लाईबीला घरी आपल्या मुख्यालयात बोलावून राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी यथोचित गौरव करून शाल आणि १,१०,१००० रुपयांचे रोख पारितोषिक हातात ठेवले.

“अतुलनीय धैर्य, पराकोटीची माणुसकी आणि कोरोनासारख्या संकटाच्या काळात एका साध्या भारतीय स्त्रीने दाखवलेली ही जिद्द केवळ मणिपूरलाच नव्हे तर देशातल्या सर्वच महिलांना अनुकरणीय आहे आणि म्हणून मी श्रीमती लाईबी यांचा मी माझ्या राज्याच्या वतीने सन्मान करत आहे.” असे प्रशंसेचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

लाईबी ओइनमला कॉलेजात जाणारी दोन मुले आहेत. दहा वर्षांपूर्वी तोडकेमोडके पैसे साठवून नवऱ्याच्या साथीने तिने ही रिक्षा घेतली आणि जिथे गरीब स्त्रिया रोजगारावर शेतात काम करतात अश्या मणिपूरमध्ये स्थानिक लोकांच्या त्यावेळच्या रोषाची आणि टिंगलटवाळीची मुळीच पर्वा न करता योग्य तो परवाना काढून, रिक्षा चालवायला शिकून, चालवून आणि मणिपूर मधली पहिलीच रिक्षाचालक होवून, कुटुंबाचा चरितार्थ चालवायला लाईबीने सुरुवात केली.

२०१५ साली या जिद्दीच्या लाईबीवर ‘ऑटो ड्रायव्हर’ या नावाची एक छोटेखानी डॉक्युमेंटरी सुद्धा निघाली आहे जी त्यावेळी फार गाजली.

कष्ट करेन पण भिक मागणार नाही या जिद्दीतून समाजाच्या विरोधात जाऊन रिक्षा चालवून आणि वेळेला रस्त्याकडेला बसून खारे मासे विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या आणि तशीच आणीबाणीची वेळ आल्यावर माणुसकीने विचार करून एका कोरोना योद्धा नर्सलाच कोरोनाने गाठले असताना तिच्या मदतीला मागचापुढचा विचार अजिबात न करता आईच्या मायेने कंबर कसून उभ्या राहिलेल्या धीरोदात्त लाईबी ओइनमला टीम भारतीयन्स’चा मानाचा जय हिंद.

संग्राहक –मिलिंद वेर्लेकर

मूळ लेख – न्यु इंडियन एक्सप्रेस कडून साभार

‘टीम भारतीयन्स’,  ‘फील फ्री टू शेअर’

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी

☆ विविधा: तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी ☆

आज सकाळी एका मैत्रिणीने विचारलं होतं की कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत ‘तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : “तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला…”

तसेच ‘झाल्या तिन्ही सांजा, करून शिंगार साजा..’ या गाण्यातही तिन्ही सांजा असा अनेकवचनातच शब्द प्रयोग केला आहे.. असं का बरं..?

मग मलाही हे लक्षात आलं की खरंच,

ह्यात  ‘तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण ‘सांज झाली’ असे म्हणतो; ‘सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. ‘तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; ‘तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे म्हणत नाही. तर , ‘तिन्ही सांजा’ या शब्दप्रयोगाला काही संदर्भ आहे का?

तिन्हीसांजा हा खरंतर आपल्या नेहमीच्या वापरातला आणि सोपा शब्द आहे. पण आज मात्र तोच अवघड वाटायला लागला.

आणि मनात प्रश्न आला, सांज म्हणजे संध्याकाळ. सांजा हे त्याचे अनेकवचन असेल …पण मग तिन्ही सांजा म्हणजे काय? कुतूहलाने शब्दकोशात पाहिले. तिथे तिन्ही सांजा म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ असेच दिलेले. पण तिन्ही म्हणजे काय?

…आणि  मग दोन्ही गाण्यांचे lyrics पुन्हा पुन्हा ऐकले..त्यातून काही संदर्भ लागतोय का हे चाचपडून पाहिलं..

मग अर्थातच गुगल ची मदत घेतली. प्रथम तर गुगल वर तिन्ही सांजा असे टाइप करताच भराभरा चार पाच सांज्याच्या रेसिप्यांचे व्हिडीओज दिसायला लागले…!!

पण मग आणखी नेटाने गुगलून पाहिलं तर ही अशी माहिती मिळाली की-

तिन्ही सांजा’ हा शब्दप्रयोग ‘त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर (भाषा तज्ञ) ह्यांनी सुचविले आहे. ‘त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो.

पहाट आणि सायंकाळ  ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या….तिन्ही सांजा !!*

तिन्हीसांज’ प्रमाणे त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे.

हा अर्थ समजल्यानंतर जेंव्हा

तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गीत परत वाचलं तेंव्हा वाटलं..की रात्र सम्पून दिवस सुरू होताना रात्र व सकाळ एकजीव असलेली एक सुंदरशी पहाट म्हणजे पहिली सांज..

दिवस वर येऊन सकाळ व दुपार एकजीव असतानाची ती दुसरी सांज..

व दिवस सम्पताना दिवस व रात्रीच्या सुरवातीच्या जो एक एकजीव काळ असतो ती म्हणजे तिसरी सांज..

दिवसाच्या या चक्रात असे तीन संधिकाल असतात पण पहिल्या संधिकाली-म्हणजेच  सांजवेळी आपण रात्र व दिवसाची सुरवात वेगळी करू शकत नाही… दुसऱ्या व तिसऱ्या संधिकाली – सांजवेळीही असेच!!

त्यामुळे, “तिन्ही सांजा”  हे कदाचित एकजीवतेचे प्रतीक म्हणून वापरले असावे.. असे मला वाटते.

तिन्ही सांजा गीताच्या पहिल्या कडव्यात सर्व शाश्वत गोष्टीना साक्षी मानून तुझा हात हाती घेतला आहे ,तो ही तिन्ही सांजांची एकजीवता स्मरून..असा भावार्थ जाणवतो.

दुसऱ्या कडव्यात नाद- बासरी, रस- कविता, पाणी- मोती..अशा उदाहरणातून द्वैत- अद्वैत ही कल्पना मांडली आहे..माझ्या हृदयातील जीव म्हणजे तू अशी एकजीवता  म्हणजेच द्वैतातील अद्वैत सांगून पुन्हा तिन्ही सांजा हे रूपक वापरत गाणे समेवर येते..

झाल्या तिन्ही सांजा या गाण्यात ही अशीच एकजीवता अपेक्षित आहे, असे वाटते.

हा मला समजलेला अर्थ आहे.

आज त्या मैत्रिणीने तिन्ही सांजा बद्दल विचारलं म्हणून मी ही बारकाईने शब्द व अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला.

संदर्भासाठी ‘तिन्ही सांजा ..’हे गीत दिले आहे..

तिन्ही सांजा

तिन्ही सांजा सखे मिळाल्या,

देई वचन तुला

आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या..

 

कनकगोल हा मरीचिमाली

कनकगोल हा मरीचिमाली

जोडी जो सुयशा

चक्रवाल हे पवित्र,

ये जी शांत गभीर निशा

त्रिलोकगामी मारुत,

तैशा निर्मल दाहि दिशा

साक्षी ऐसे अमर करुनी हे तव

कर करी धरिला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या…

 

नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत

गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत

पाणी जसे मोत्यांत

पाणी जसे मोत्यांत,

मनोहर वर्ण सुवर्णांत

मनोहर वर्ण सुवर्णांत

हृदयीं मी साठवीं तुज तसा

जीवित तो मजला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या,

देई वचन तुला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या..

-भा रा तांबे

© सुश्री अपर्णा कुलकर्णी

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ऋतुचक्र ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : ऋतुचक्र – श्रीमती उज्ज्वला केळकर

सकाळी चहा केला, की स्वैपाकघराला लागून असलेल्या गॅलरीत उभं राहून समोरच्या झाडा-पेडांकडे बघत बघत चहा घ्यायची माझी जुनीच सवय. सकाळचा थोडासा गारवा, समोरच्या झाडा-पेडांच्या हिरवाईमुळे डोळ्यांना मिळणारा थंडावा, थोडी का होईना, स्वच्छ हवा, या सार्‍या वातावरणामुळे देह-मन कसं प्रसन्न होतं. ही सारी प्रसन्नता मग दिवसभर पुरवायची.

मध्यंतरी मी आठ – दहा दिवस गावाला गेले होते. त्यावेळी झाडांची पानगळ अगदी भरात होती. त्यांच्या अंगा –खांद्यावर बागडणारे, विसावणारे पक्षी कसे स्पष्ट दिसत होते.

गावाहून परत आले. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे चहा घेऊन गॅलरीत उभी राहले, तर एक पक्षी चिर्रर्र करत आला आणि झाडांच्या पानांच्या हिरव्या छ्त्रीत छ्पून गेला. सगळीकडं शोध शोध शोधलं त्याला, पण कुठे म्हणून दिसेना. मनात आलं, जाताना ओकं- बोकं वाटणारं झाड बघता बघता नव्या नाजुक कोवळ्या, पोपटी पालवीनं कसं भरून गेलय. वार्‍याच्या मंद झुळुकीबरोबर नवी पालवी हिंदोळत होती. झुलत, डुलत होती.

एका खालच्या फांदीच्या डहाळीवर एका  कोवळ्या पानाशेजारी एक जीर्ण शीर्ण झालेलं जुनं पान होतं. त्याचं जून, जरबट देठ अजूनही डहाळीला धरून होतं. पण ते बोट आता कधीही सुटणार होतं. त्याच्या शेजारचं कोवळ, लहानगं पान कधी त्याला लडिवाळ स्पर्श करून जायचं, तर कधी क्षणभर त्याच्या छातीवर मान ठेवून पाहुडायचं. तिकडे बघता बघता वाटलं, जसं काही आजोबांच्या छातीवर डोकं ठेवून नातू पहुडलाय आणि गप्पा मारतोय आजोबांशी. मनाला मग चाळाच लागला, काय बर बोलत असतील ते?

त्या जुन्या पानाला आता लवकरच डहाळीपासून दूर जावं लागणार होतं. त्याने शेजारच्या नव्या कोवळ्या पानावरून हात फरवत त्याचा निरोप घेतला, तशी ते नवं पान रडवेलं होत म्हणालं, ‘आजोबा, जाऊ नका नं तुम्ही! मला खूप खूप वाईट वाटेल तुम्ही गेल्यावर!’

जुनं जून पान म्हणालं, ‘मला जायलाच हवं. आम्ही जुन्या पानांनी जागा करून दिल्याशिवाय या फांद्यांवर, डहाळ्यांवर नवी पानं, फुलं काशी येतील?’

‘कुठे जाशील तू इथून?’ नव्या पानाने विचारलं.

‘मी इथून झाडाच्या तळाशी जाईन. तळाच्या मातीवर पडेन. हळू हळू माझा चुरा होईल. त्यावर पाणी पडेल. मग मी हळू हळू जमिनीच्या आत आत जाईन. माझं खत होईल. मी आणखी आत जाईन. मुळापाशी जाईन. मुळं माझं सत्व शोषून घेतील. वर वर खोडातून फांद्यांपर्यंत , डहाळ्यांपर्यंत पोचवतील. तिथून पाना-फुलांपर्यंत पोचवतील आणि आशा तर्‍हेने मी तुझ्याकडे येईन नि तुझ्यात सामावून जाईन. आता नाही नं तू उदास होणार? रडणार?

‘आजोबा लवकर याल नं? मी वाट पाहीन.’

‘हो तर!’ असं म्हणता म्हणता जून जरबट देठाने आपलं डहाळीचं घर सोडलं. पिवळं पाडलेलं जून जरबट पान इवल्या पानाचा निरोप घेत खाली आलं आणि झाडाच्या तळाशी विसावलं. तळाशी असेलया इतर सोनेरी, तपकिरी पानात मिसळून गेलं. तिकडे पाहता पाहता एकदमच सुचलं –

पर्णरास सोनियाची तरुतळी विसावली वर हासतात फुले, रत्नझळाळी ल्यालेली

आज हासतात फुले, उद्या माती चुंबतील हसू शश्वताचं त्यांचं, रस फळांचा होईल.

पुन्हा झडतील पाने , फुले मातीत जातील. रस जोजवेल बीज बीज वृक्ष प्रसवेल.’

तर अशी ही कविता. समोरच्या झाडाची बदलती रुपे बघता बघता सहजपणे सुचलेली.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित: पर्णसंभार ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

जीवन परिचय

नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.

☆ विविधा: ललित : पर्णसंभार  – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆

(१९ तारखेच्या ई-अभिव्यक्ती मराठीच्या अंकात सुश्री मीनाक्षी सरदेसाई यांचा ‘पर्णसंभार’ हा लेख  नजरचुकीने पूर्ण आला नव्हता. तो संपूर्ण लेख आता प्रकाशित करीत आहोत.-संपादक, ई-अभिव्यक्ती .)

झाडं झाडांसारखी दिसतात ती त्यांच्या गर्द पानांमुळे.जंगलं गडदगहन होतात ती हिरव्या पर्णराजीमुळे. शिशिरात पानं संप केल्या सारखी झाडांना सोडून जातात तेव्हा झाडं विरहगीत गातात. “रंग न उरला गाली ओठी,—–श्रुंगाराचा साज उतरला” अशी त्यांची अवस्था होते. पोपटी ,कोवळ्या पालवी पासून काळपट  हिरव्या राठपणापर्यत सर्व अवस्थांतील पर्णसंभार हे झाडांचं वैभव.ह्या श्रीमंतीचा उपभोग आपण वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो.

मला आठवतंय, सकाळी उठल्यानंतर काही न बोलता आम्ही केळीशी जायचो.तिच्या पानांवरच दंव केसांना लावायचो. का?तर केस तिच्या सोपटासारखे लांब होतात असं आईने सांगितलेलं. त्यात काय औषध होतं माहीत नाही, पण केळीचा तो रसरशीत सहवास मनाला खूप आनंद द्यायचा. टवटवीत, हिरव्या पानावरच्या ब्रेललिपी सारख्या उठावदार, समांतर शिरा, हळूहळू  अरुंद होत जाणारी नि टोकाशी संपणारी कोरीव पन्हळ, काही गडद हिरवी तर काही गर्भरेशमी पोपटी विशाल पानं,केळीबाईचं हे रुपलाघव बघताना भान हरपायचं.

सणावारी अशा पांनांवरचं लाल,पिवळं,शूभ्र,रसभरीत जेवण, म्हणजे स्वर्गसुखच.देवाचा नैवेद्य, कावळ्याना घास, हे सगळं केळीच्या फाळक्यांवर.आमची पाच वर्षांची लली एकदा त्या प्रशस्त पानावर झोपली. “किती गाल वात्तय” म्हणाली. हिरव्या पानावरची, गोरी उघडी लली म्हणजे एक निसर्गचित्र होऊन बसललं.

वड, पळस, फणस यांच्या पानांच्या पत्रावळी म्हणजे  हिरव्या डिशेस. पानं जोडण्यासाठी नारळाच्या झावळ्यांच्या काड्या. झाडं इतकी परिपूर्ण असतात की दुसरीकडे जावच लागत नाही. गप्पा मारता मारता हात चालू. हा हिरवा कचरा पुन्हा झाडं सत्व म्हणून घेतात. वर्तूळ पुरं. घासापुसायचं कामच नाही.

सणासुदीला आंब्याची पानं तोरण होतात.पानांची एखादी फांदी दाराला शोभा आणतात. कर्दळी चौरंगावरच्या पूजेला आणखी मंगल शोभा आणते.कोकणातली मुलं अंगणातल्या फणसाच्या पानांचे बैल करतात. मळ्यात खर्ऱ्या बैलांची औत नि अंगणात मुलांची औतं फिरत भाताची लावणी लावतात. थंडीत ह्याच पानांची शेकोटी वत्सल ऊब देते.

पानांच्या साथीने साधीसुधी पक्वान्न किंवा न्याहरी बनते. हळदीच्या पानावर गुळपीठ सारवायचं.ती पान वाफवायची. लवंग वेलचीचं  कामच नाही. हळदीचा वासच पानग्याना खमंग करतो. चातुर्मासात कांदा लसूण वर्ज,पण ओव्याची पानं उणीव भरून काढतात. त्यांची भजी खमंग, चविष्ट होतात. पानांचा छाप भज्याच्या आत उमटलेला.

एक सुंदर सजावट.पूर्वी तान्हया बाळांच्या आया बाळाच्या टाळूवर कापसाच किंवा एरंडाचं पान टोपर्ऱ्याखाली सारून ठेवत.कडक उन्ह बाधू नये म्हणून. संध्याकाळपर्यंत पान कुरकुरीत व्हायच.बाळाच्या मेंदू पर्यंत उष्णता पोचायची नाही.

पान खाणारे आपल्या चंचीत विड्याच्या पानांच्या चळती नोटांसारख्या जपून ठेवतात. पानाच व्यसन असणाऱ्याना ती पानं पैशासारखी मौल्यवानच की. अशी  ही पानं.घर सजवतात, औषध करतात, खेळणी होतात, स्त्रियांच्या नटण्याथटण्यालाही मदत करतात. मेंदी नाही का स्त्रियांचे हात, पाय केस रंगवते. अंगणात श्रावण सजलाय.त्यामुळेच मनात रंगला हा हिरवा पानांचा उत्सव.

 

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070

Please share your Post !

Shares
image_print