मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पु.ल. आणि वारा…” लेखिका :सौ. मंगला गोडबोले ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

पु.ल. आणि वारा…” लेखिका :सौ. मंगला गोडबोले ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

 पुलंचा हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तता किती अफाट होती ह्याची एक झलक…

1960-61च्या आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती.त्यातील संवाद पाहा:

वसंत सबनीस : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता. हीच ‘वरात’ तुम्ही आता ‘वाऱ्यावर’ सोडली आहे, हे खरं आहे काय?

पुलं : “वाऱ्याचीच गोष्ट काढलीत म्हणून सांगतो…”

“भावगीत गायक झालो तो काळ ‘वारा फोफावला’ चा होता…!”

“नट झालो नसतो तर ‘वारावर’ जेवायची पाळी आली असती…”

“शिक्षक झालो त्यावेळी ध्येयवादाचा ‘वारा प्यायलो’ होतो…”

“संगीत दिग्दर्शक झालो त्यावेळी पेटीत ‘वारा भरून’ सूर काढत होतो…”

“नाट्य दिग्दर्शक झालो त्यावेळी बेकार ‘आ-वारा’ होतो…”

“प्राध्यापक झालो तेव्हा विद्वत्तेचा ‘वारा अंगावरून गेला’ होता…”

“पटकथा लिहिल्या त्या ‘वाऱ्यावर उडून’ गेल्या…”

“नुसताच साहित्यिक झालो असतो तर कुणी ‘वाऱ्याला उभं नसतं राहिलं…!”

“ही सर्व सोंगं करतांना फक्त एकच खबरदारी घेतली. ती म्हणजे ‘कानात वारं शिरू न देण्याची…!

“आयुष्यात अनेक प्रकारच्या ‘वाऱ्यांतून हिंडलो.’ त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले ते साठवले आणि त्यांची आता ‘वरात’ काढली…!”

“लोक हसतात… माझ्या डोळ्यात आतल्या आत कृतज्ञतेचं पाणी येतं आणि म्हणूनच अंगाला अहंकाराचा ‘वारा लागत’ नाही!”

🙏🙏🙏 वा राव !

पुलंना उभा महाराष्ट्र

साष्टांग दंडवत घालतो

ते उगीच नाही!

(सौ.मंगला गोडबोले यांच्या – ‘पुलं… चांदणे तुझ्या स्मरणाचे’ या पुस्तकातून).

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तंत्रज्ञान दिनानिमित्त…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “तंत्रज्ञान दिनानिमित्त…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कुठलाही महत्त्वाचा प्रसंग आयोजित करतांना माणूस आजकाल एखाद्या महत्वाच्या,वैशिष्ट्यपूर्ण वा खास दिवसाचे औचित्य साधायचा प्रयत्न करतो.त्यायोगे तो खास दिवस अजूनच खास होऊन कायमचा चांगल्या आठवणींनी स्मरणात राहायला मदतच होते.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जर टप्प्याटप्प्याने गेलेल्या काळाचा विचार केला तर आपल्याला आपल्या भारताची झालेली लक्षणीय प्रगती लक्षात येईल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली भारताची वेगवेगळी प्रगती झालेली दिसून येईल.आपल्या होणाऱ्या प्रगतीमध्ये तसेच विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे ह्यात कुठलीच शंका नाही. हे युगच यंत्रांच युग आहे.पण फक्त मनात मात्र एक भिती दडून बसलीयं की हे  प्रगत यंत्रयुग चालत्याबोलत्या माणसाला यंत्र तर बनवीत नाही नां ? अर्थातच ही भिती काही अगदीच अनाठायी नाही बरं का,ब-याच अनुभवाने जाणवलेली ही भिती आहे. तरीही नाण्याला दोन्ही बाजू असल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे तंत्रज्ञानाबाबत उजव्या विचारसरणीचं पारडं नक्कीच जड आहे हे विसरून चालणार नाही.  11 मे  हा  “तंत्रज्ञान दिन “!

विज्ञानामुळे नवनवीन क्रांती उदयास येते  आणि हीच क्रांती आपली उत्तरोत्तर प्रगती घडवून आणते.हल्ली काळ खूप बदललायं. परंतु पूर्वीच्या काळी ह्या विज्ञानाच्या अद्भूत कामगिरीमुळे निर्माण झालेले चमत्कार आणि त्या चमत्कारांमुळे तयार झालेले अविष्कार जनमानसाकडुन पचविल्या जाणं ही खूपच अवघड गोष्ट होती.

विज्ञानाचे अविष्कार येतांनाच दोन रुप घेऊन येतं.त्याच्या योग्य वापरामुळे झालेली  प्रगती, विकास आणि उत्कर्ष हे एक रुप आणि त्याच्या अतिरेकी ,चुकीच्या वापरामुळं झालेली अधोगती,पिछेहाट हे दुसरं रुपं.

पूर्वी माणसं ही नोकीयाच्या जाहीराती प्रमाणे ” कनेक्ट दी पीपल ” ह्यावर विश्वास ठेवणारी होती. माणसाचं माणसावाचून अडायचं असा हा “अच्छे दिन” असलेला काळ होता. ह्या यंत्रयुगामुळे माणसाला माणसाची गरज नसल्याची परिस्थिती निर्माण होऊ घातलीयं आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे.

पूर्वी एकमेकांची मदत घेणं ह्यात प्रेम,आपुलकी हक्क दडलेला होता आणि तोच एकमेकांतील दरी मिटवून त्यांना जोडण्याचं दुव्याचं काम करायचा. आता ह्या यंत्रयुगांने एकमेकांची मदत घेतांना एकप्रकारची “हिचकीच”आलीयं.मुळात मदत घेणं हे कमीपणाचं लक्षण हा अत्यंत चुकीचा विचार मनात ठसवतं पिढी उत्तरोत्तर पुढे जातेयं.साधं उदाहरणं पूर्वी एकमेकांना पत्ते विचारतांना,ते शोधतांना खूप मजा यायची. पत्ता विचारणारा, शोधणारा थोडा काळजीत विचारायचा आणि समजावून सांगणारा अगदी तो प्रश्न चुटकीसरशी सोडवूंन दिलासा द्यायचा. आता मुळात पत्ता शोधणेच जवळपास बंद झालयं कारण एकमेकांकडे जाणीयेणीच मुळात कमी झालीयं आणि अगदीच नाईलाजाने जावं लागलं तर कमीपणा न वाटू देणारं “जीपीएस”वरील कोरडी बाई तुम्हाला पोहोचवते इप्सित स्थळी.

आता अत्याधुनिक बँकींग चे बदलते रुपं बघतांना तर हा अनुभव पावलोपावली येतोयं. अर्थातच ह्या नवीन तंत्रज्ञानाने सगळं खूप सहज,सोप्प झालयं हे ही खरचं किंवा ही काळाची गरज म्हणू हवतरं.मध्ये एक आजोबा आणि नातू बँकेत आले होते. ते दोघेही त्या  आजोबांना घरबसल्या बँकींग करता यावे म्हणून अँप डाऊनलोडींगसाठी बँकेत आले होते. अर्थातच आजोबांची सोय बघणं हा निरपेक्ष प्रामाणिक उद्देश नातवाचा होता पण आजोबा ह्यातून काय मिळवतात आहेत हे बघण्याच्या नादात आजोबा खूप काही गमावतात आहे हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. आजोबा गमावतं होते त्यांचा वेळ घालवणं, आजोबा गमावत होते संवाद साधणं,आजोबा गमावत होते तो पासबुकातील आकडे बघतं राहण्याचा,मनाशी हिशोब करण्याचा आनंद, ते गमावतं होते मित्रमंडळी,समवयस्क परिचीत लोकांना एकत्र भेटण्याचा,वैचारिक देवाणघेवाणीचा आनंद,ते गमावतं होते अतिशय काटकसरीतून जमा केलेल्या पुंजीतुन केलेले फिक्स डिपाँझीट परतपरत वाचण्याचा, हाताळण्याचा आनंद.हे त्या नातवाला कळतच नव्हते वा जाणवतही नव्हते. असो कालाय तस्मै नमः हेच खरे.दोघही योग्यच होते फरक फक्त पिढीचा होता.”कुछ पाने के लिये कुछ तो खोना पडता है”ह्यावर परत एकदा विश्वास बसला.

11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरण मध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरण मधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्‍या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम केलेच कसे ह्या विचारानेच जगाला धक्का बसला. 

भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती.  १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.

तंत्रज्ञानाचा विषय निघाला तेव्हा अजून लक्षात आलं अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली. ह्या व्यतिरिक्त भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं. हे सैन्य आणि नौदल यांनी एकत्रित केले आणि भारत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग बनला.

आजचा हा तंत्रज्ञान दिन आपल्यासाठी एखादा सोहळा,समारंभ ह्या  सारखाच महत्त्वाचा आहे हे नक्की. आजच्या ह्या तंत्रज्ञान दिनी ह्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “श्रद्धा आणि विश्वास…” लेखक –अज्ञात☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “श्रध्दा आणि विश्वास…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज नैवेद्याला नुसती दूधसाखर ठेवलीये हो.. गोड मानून घ्या.. ” असं म्हणून आज्जींनी स्वामींच्या मूर्तीला भक्तिभावाने नमस्कार केला..आणि ‘आज बाहेर पडायलाच हवं. फळं, भाजी सगळंच आणायला झालंय. छान उघडीप पण आहे.’ असं स्वतःशीच म्हणत त्या बाहेर जायची तयारी करू लागल्या. “बाहेर जाऊन येते हो. उद्याला नैवेद्यासाठी फळं, पेढे घेऊन येते.  उद्या परत दुधसाखरच समोर ठेवली तर म्हणाल आजही दुधसाखरच का ? म्हणून..”असं स्वामींच्या मूर्तीकडे बघून म्हणत त्या स्वतःशीच हसल्या अन कुलूप लावून बाहेर पडल्या..त्यांना एकुलती एक मुलगी.. लग्न होऊन सासरी गेली.. यजमान त्या आधीच गेलेले…मुलीच्या लग्नानंतर त्यांनी रहाता भला मोठा बंगला विकून कोथरूडमध्ये छोटासा फ्लॅट घेतला आणि त्या स्वामींच्या सोबतीने राहू लागल्या.. माहेरी सगळेच स्वामींचे भक्त त्यामुळे नकळत्या वयापासून त्यांच्यावर श्रद्धा जडली ती आजपावेतो..एकटेपण आल्यावर मग स्वामींच्या मूर्तीशी बोलायची सवयच जडली… अगदी एखाद्या माणसाशी बोलावं तसं त्या स्वामींच्या मूर्तीशी बोलत. अगदी सगळं सगळं सांगत. एकट्या असल्या तरी व्यवस्थित स्वयंपाक करून बरोब्बर साडेबाराला मूर्तीसमोर नैवेद्याचं ताट ठेवत अन पंधरा मिनिटांनी, “स्वामी, बरं झालंय ना सगळं ? तिखट नाही ना लागलं काही ? ” असं त्यांना विचारून तेच ताट त्या स्वतः घेत असत..इच्छा एकच होती की शेवटी लोळत घोळत पडू नये..शांतपणे मरण यावं.. हल्ली त्या तसं स्वामींना वारंवार सांगत…दिवस, वर्षं सरत होती. आज अंथरुणावर अंग टाकायच्या आधी हात जोडून त्यांनी नेहमीप्रमाणे स्वामींचं स्मरण केलं.. आणि  ” स्वामी, आता आयुष्याच्या या सांजवेळी पुढच्या प्रवासाला निघून जावंसं वाटतं…जे योग्य असेल ते घडवून घ्या..” अशी प्रार्थना करून त्यांनी डोळे मिटले..मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कपाळावर कुणीतरी हात ठेवल्याचा त्यांना भास झाला अन, ” बाळ, सगळं तुझ्या मनासारखं होईल, पण अजून वेळ आलेली नाही.”  हे वाक्य अगदी स्पष्टपणे ऐकू आलं.. त्या जाग्या होऊन अंथरुणावर उठून बसल्या.. काही दिवसांपासून चाललेली मनाची घालमेल संपली. अतीव समाधानानं अंतःकरण भरून आल्यासारखं झालं. त्यांनी स्वामींकडे पाहिलं. मंदशा दिव्याच्या उजेडात स्वामींची मूर्ती तेज:पुंज दिसत होती. खरं सांगू, यालाच म्हणतात श्रध्दा आणि विश्वास.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

पत्रकार रजत सरदेसाई एका MD (आयुर्वेद) डॉक्टरांची मुलाखत घ्यायला चालले होते. बरोबर त्यांचा मित्र बंड्या काळे होताच. डॉक्टरांनी मुलाखतीचे शीर्षक “मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे” हेच राहणार असेल तरच मुलाखत देईन असं म्हटल्याने हे दोघं बुचकळ्यात पडले होते. बंड्याला तर ब्राझीलमधील चिकिन्हो स्कार्पा या अब्जाधीशाची आठवण आली. त्याने, मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, त्याच्या चार कोटी रुपयांच्या बेंटली गाडीचं शाही इतमामात दफन करायचं घोषित केलं होतं. 

 “तो स्कार्पा आणि हे डॉक्टर, दोघेही विक्षिप्तपणाबाबतीत एकाच माळेचे मणी दिसतायत,” असं म्हणत म्हणत, बंड्या आणि रजत, मुलाखत देणाऱ्या दादर, मुंबईच्या डॉ. सुयोग कुळकर्णी यांच्याकडे पोचले. 

 रजतने भेटल्याभेटल्या मुद्द्यालाच हात घातला, “सर, कटाक्षाने आयुर्वेदिकच प्रॅक्टिस करणारे म्हणून तुमचा छान नावलौकिक आहे. पण मुलाखतीचे शीर्षक हेच हवे हा तुमचा अट्टाहास का ? याबद्दल काही सांगाल का, प्लीज ?”

 “होय. पहिल्याप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल मला कोणतेही प्रमाणपत्र अथवा पुरस्कार नकोय. तो तर माझा पेशाच आहे, त्याबद्दल मी फी – पैसे आकारतो. त्यामुळे त्याबद्दल वेगळा पुरस्कार मागणं, हे मला तरी पटत नाही. कदाचित माझं बोलणं तुम्हाला extreme वाटेल. पण असं आहे बघा की, खेळाडू असो, वा चित्रपट अभिनेता, किंवा अगदी एखादा शास्त्रज्ञ – या सगळ्या जणांना त्यांच्या उपजीविकेच्या साधनांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पद्म पुरस्कार दिले जात आहेत. पण मी जे काम करतो ते पूर्ण निस्वार्थीपणे, अगदी नव्या पैशाचाही फायदा न घेता. आणि शिवाय ते समाजाच्या प्रचंड उपयोगाचे आहे. म्हणूनच माझे ठाम प्रतिपादन आहे की ” मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे ! “ डॉक्टर शांतपणे पण आग्रहाने बोलत होते.

 “पण असं तुम्ही काय जगावेगळं करता ?” न राहवून शेवटी बंड्याने मध्ये नाक खुपसलंच. 

“मी प्लेटलेट डोनर आहे.”

 बंड्याच्या चेहऱ्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह.

 “बंडूदादा, पांढऱ्या रक्तपेशी (white blood cells WBC), तांबड्या रक्तपेशी (red blood cells RBC) यांच्याप्रमाणे प्लेटलेट या आपल्या रक्तात असतात. WBC, RBC यांच्यापेक्षा आकारात खूपच लहान. एक मिलीलिटर रक्तात तब्बल अडीच लाखांहून जास्त प्लेटलेट्स असतात. जखम झाल्यावर आलेले रक्त थांबवणे हे यांचं प्रमुख काम,” रजतने थोडक्यात प्लेटलेट्सची कुंडली मांडली. 

 “हां, हां. ते त्या पलीकडच्या गल्लीतील राजूच्या वडिलांना डेंग्यू झाला होता, तेव्हा त्यांच्या या प्लेटलेट कमी झाल्या वगैरे ऐकलं होतं. अरे, पण रक्तदान ऐकलं होतं, ही प्लेटलेट डोनेशन काय भानगड आहे ?” बंडूतील शंकासूर काही शांत होईना.

 “ज्या पेशंटच्या रक्तातील प्लेटलेट संख्या कमी आहे, अशांची जर मोठी शस्त्रक्रिया होणार असेल, किंवा काही अपघात वगैरे झाला असेल तर त्यांना प्लेटलेट्स द्याव्या लागतात. ” – डॉक्टर साहेब. “आणि दुसरा मोठा गट म्हणजे कॅन्सर पेशंट्सचा. कॅन्सर उपचारातील केमोथेरपीचा एक वाईट साईड इफेक्ट म्हणजे याने प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरित्या कमी होते.”

 “सर, खरं सांगू का, मला एक कळलं नाही”, बंडू निरागसपणे आपलं घोडं पुढं दामटत होता, ” की समजा झाल्या रक्तातील प्लेटलेट्स कमी, तर एवढं काय आकाश कोसळणार आहे ? म्हणजे, तुम्ही म्हणता तसं ज्यांना अपघात झाला आहे, जखम झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे अशांचं ठीक आहे एक वेळ, पण बाकी असा कुठे आपल्याला एवढा रक्तस्त्राव होतो की जो थांबवायला या अशा इतरांकडून घेतलेल्या प्लेटलेट्स घ्याव्या लागतील ?”

 बंड्याच्या अश्या या un-diplomatic बोलण्याने रजत चांगलाच कावराबावरा झाला, पण त्याला आश्र्वस्त करत डॉक्टरसाहेब सांगू लागले, ” सर्वसामान्यांना कल्पना नसते पण दैनंदिन जीवनात असंख्य वेळा आपल्या शरीरात सूक्ष्म रक्तस्त्राव होत असतात. जोरात शिंकलात, किंवा शौचाला जरा जास्त जोर केलात तरी रक्तस्त्राव होतो. ज्यांच्या प्लेटलेट्सची संख्या सुयोग्य आहे, अशांच्या शरीरात हा रक्तस्त्राव इतक्या बेमालूमरीत्या आणि इतक्या सहजी आणि इतक्या लगेच थांबवला जातो की ते आपल्याला कळतही नाही आणि त्यामुळे त्याचं महत्त्वही उमगत नाही. पण जर हे छोटे छोटे रक्तस्त्राव थांबले नाहीत तर त्याचं पर्यवसान internal haemorrhage (हॅमरेज) मध्ये होतं आणि पेशंटच्या जीवालाही धोका होऊ शकतो. आणि कर्करोगाच्या पेशंटसची रोगप्रतिकार क्षमता अशीही कमी झाली असते, त्यामुळे त्यांच्याबाबतीत अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.”

 डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं. 

–क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शांत झोप आनंदी मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ शांत झोप आनंदी मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

हे वाचूनच छान वाटते.काही जण म्हणतील की आनंदी मन असेल तर शांत झोप लागेल.आणि काहींचे म्हणणे असेल शांत झोप लागली तर मन आनंदी होईल.थोडक्यात या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.

प्रथम आपण शांत झोप लागण्या साठी काय करायचे ते बघू.

यात काही भौतिक ( शारीरिक व्याधी व बाह्य ) व काही मानसिक कारणे असतात.

बाह्य कारणे आपणच निर्माण करतो. त्या साठी पुढील उपाय करावेत.

१) झोपण्या पूर्वी किमान ३ तास आधी जेवावे.

२) जेवल्यावर शतपावली  करावी

३) झोपण्या पूर्वी २ तास टीव्ही,मोबाईल अशी साधने दूर ठेवावीत.

४) झोपण्या पूर्वी १ तास आधी एखादे पुस्तक वाचावे/नामस्मरण करावे/ मंद संगीत ऐकावे.

 मानसिक कारणे

🔹 भूतकाळातील कटू आठवणी

🔹 आपल्या चुका

🔹 ईर्षा, राग, वाईट विचार, हतबलता, जबाबदाऱ्या

हे सगळे विचार झोपताना येतात आणि झोप येत नाही.

या साठी पुढील गोष्टी करता येतील.

शांत झोप येण्यासाठी हे करू शकतो.

१) सकाळी मेडिटेशन करणे.

२) दिवसात आवश्यक तेव्हा व्हाईट लाईट घेणे.

३) दीर्घ श्वसन करायचे.

झोपताना म्हणायचे, मी एक महान, पवित्र आत्मा आहे. मला शांत व गाढ झोप लागली आहे. या मुळे मनाला तशी आज्ञा मिळते.

४) असे डोळ्या समोर आणायचे, माझ्या हृदयातून शांती व प्रेमाची किरणे बाहेर पडून ती मेंदूत जात आहेत. आणि तिथे खूप शांती अनुभवत आहे.

हे केल्यामुळे

शांत झोप लागते

कमी वेळेत झोप पूर्ण होते.

सकाळी गजर न लावता जाग येते.

उत्साही व प्रसन्न वाटते.

♦️ या मुळे दिवसाची सुरवात प्रसन्न चित्ताने व आनंदाने होते.

या उपयामुळे जो आपला मूळ विषय आहे, शांत झोप आनंदी मन साध्य करू शकतो.

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवत्व… लेखिका – सुश्री रश्मी लाहोटी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ देवत्व… लेखिका – सुश्री रश्मी लाहोटी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

“पाळी नाही आली.”

“लघवी तपासली का?”

“नाही.”

“झोप टेबलवर.”

तपासणी झाली. नवऱ्याला आत बोलवायला सांगितलं. दहा बारा महिन्याचं बाळ अगदी काळजीपूर्वक सांभाळत तो आत आला. 

खूपदा दिसणारं हे चित्र. कुटुंबनियोजनाची काळजी घेण्यात अजूनही बरीच जनता उदासीन असते. काही हजार मोजले की मोकळं ! हा सोप्पा पण चुकीचा समज.

“अडीच महिने झालेत.”

“हो, पाडायचं.”

“आधी काळजी घ्यायची की मग.”

“ ….”

“आधीचं काय?”

“मोठा मुलगा पाच वर्षांचा, अन् ही मुलगी दहा महिन्यांची !”

“ॲापरेशन करून टाकायचं असतं… किमान लवकर तरी यायचं, मोठा गर्भ पाडायचा म्हणजे तिला त्रास होणारच की !”

“आम्हाला ठेवायचंच होतं, म्हणून इतकं लांबलं.”

“इतकं लहान बाळ असून ठेवायचं होतं?” आता आईच्या कडेवर विसावलेल्या गुटगुटीत मुलीकडे पहात विचारलं.

“हे भावाचं आहे. भाऊ चार महिन्यांपूर्वी ॲक्सिडेंटमधे गेला. त्याची बायको दोन महिन्यापूर्वी बाळाला टाकून गेली, त्यामुळे हे आता आमचंच. म्हणून आता तिसरं नको.”  नवरा बाळाच्या केसात हात फिरवत म्हणाला.

“हिला मंजूर आहे का?” बायकोकडे पहात विचारलं.

“हिनेच सुचवलंय…” नवरा तिच्याकडे कौतुकाने पहात म्हणाला.

“आताचा भावनेच्या भरात केलेला विचार कायम राहील का नंतरही?” सर्वसाधारण प्रश्न आणि शंका!

“विचार बदलू नये अन् बारकीवर अन्याय होऊ नये म्हणूनच हे पाडायचं अन् लगेच ॲापरेशन करायचंय. कारण तीन तीन लेकरं पोसण्याइतकी ऐपत नाही आमची.” तिचं पोरीचा गालगुच्चा घेत ठाम उत्तर !

आपल्या आजूबाजूलाच कितीतरी अगदी साधीसुधी दिसणारी, पण खूप मोठ्या उंचीवरची माणसं आपल्याला पहायला मिळतात ! देव फक्त मंदिरातच विराजमान असतो असं थोडंच आहे !! देवत्व असं कितीतरी लोकांच्या मनात आणि वागणुकीतही दिसतं कधीकधी आणि आपल्या मनाचं मोरपीस करतं !!!

लेखिका : सुश्री रश्मी लाहोटी

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनातलं शब्दात… लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मनातलं शब्दात… लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

आज अनिताकडे  पार्टी आहे . तिच्या आणि अजयच्या  ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत . त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे .

पहिल्यांदाच सर्वांना  घरी  बोलविण्याचा  बेत तिने ठरविला . नाहीतर महिन्यातून एकदा सर्व  मित्र  बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. गप्पा टप्पा मारतात , आणि  रिचार्ज होऊन घरी येतात . हॉटेल असेच शोधतात जेथे  मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल.••••

या सर्व कार्यक्रमात आजी-आजोबा घरीच राहतात , त्यांना रात्रीचे बाहेर जाणं , उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही .. यावेळेस अनिता-अजयने घरीच बोलविण्याचा  प्लान ठरविला. ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले .

सर्वांच्या सोयीनुसार  दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला. आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी ,असं तिच्या मनात होतं .

घरचे जेष्ठ ,Retired from work जरी असले तरी They are  not retired from fun,

असं तिचं मत आहे . नेहमी आपण बाहेर जातो ,ते काहीही तक्रार न करता घरी राहतात . येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम  आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात .

त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे . बदल, change प्रत्येकाला आवडतोच .

आपण आपल्या  पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल .हा विचार अनिताच्या मनात होताच.

खरंतर दोन चार दिवसांपूर्वी  घडलेल्या एका घटनेनं   हा बदल करण्याचा विचार तिच्या मनात आलेला अजून  दृढ झाला.

परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले, तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला . हे अस वागणं बरोबर नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना  हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे  एवढ करणं तरी  नक्कीच अपेक्षित होतं .

बरं !  आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही .ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही .

मुलांना आपल्यापेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित  वागता आलं पाहिजे . थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .

तेव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले .

जेव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला ,तेव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही . वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या .•••••

“अग ! ते खूप बोलतात . आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही .” “त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते . आपला अर्धा वेळ त्यातच जाईल .”  “मग रोजच्या सारखंच होणार ना , बदल कुठे झाला ?” “त्यांना लवकर जेवायचे असते . रात्रीचे झेपत नाही” वगैरे वगैरे .

अनिता म्हणाली  “अग!  आपण थोडा बदल करून तर बघू . माझ्या घरी सुरुवात करू .अग!  जमेल सर्व .मी करते तयारी . त्यांना ही बरं वाटेल . मुलांनाही मदतीला घेऊ.”

रश्मी कशीबशी या प्लॅनसाठी तयार झाली.

आज देशपांडे आजी आजोबा , कुलकर्णी आजी आजोबा ,जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते .आणि आश्चर्य चकितही  होते.

मुलांबरोबर लग्नाला जाणे , एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते . उत्साह  तर होता, बरोबर थोडं टेंशन ही होतं.

पार्टी छान झाली . सर्वांनी enjoy केलं . लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली .आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले .

सिनीयर्सची आपापसात छान ओळख झाली . गप्पा झाल्या .यंग जनरेशनच्या मनसोक्त गप्पा रंगल्या . हॉटेलपेक्षा हे option छान आहे . छान  हातपाय  पसरून  गप्पा मारता येतात, हे सर्वांना पटलं .

फॅमिली गेटटूगेदर छान रंगलं.

दुपारच्या चहानंतर अंताक्षरीचा कार्यक्रम झाला. तरुण वर्ग, बच्चा पार्टी आणि आजीआजोबा ग्रुप असे तीन गट होते . सर्वांनी  धमाल केली .आजी आजोबांनी जुनी गाणी छान म्हटली .

अगदी अंगाई गीत ,मंगलाष्टक तर

*जा मूली  जा दिल्या घरी तू सुखी रहा .

*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर

*घट डोईवर ,घट कमरेवर •••

शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले .गाणं होतं ••••

*घरात हसरे तारे असता ,मी पाहू कशाला नभाकडे.•••*

शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले ,”धन्यवाद मुलांनो, आज  तुमच्यात सामील केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली . आम्ही  दहा वर्षांनी लहान झालो.

Hope ,We have not troubled you.”

प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याचं तर खूपच कौतुक झालं .

अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले , त्याची सुरुवात  योग्य दिशेने  झाली आहे हे तिच्या लक्षात आले.

म्हणतात ना •••

समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात.

माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे,परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.

लेखिका :सुश्री.संध्या बेडेकर

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कण कण वेचिताना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कण कण वेचिताना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… असं म्हणतात की जो इथं जन्माला आला त्याच्या अन्नाची सोय झालेली असतेच. अर्थात चोच आहे तिथे चाराही असतो.. फक्त ज्याला त्याला तो शोधावा लागतो.. त्यासाठी त्याला जन्मताच मिळालेले हातपाय योग्य वेळ येताच हलवावे लागतात.. असेल माझा हरी देई खाटल्यावरी असे भाग्यवंत खूप विरळे असतात.. अदरवाईज जिथे जिथे दाणा पाणी असेल तिथवर यातायात हि करावीच लागते.. बरं पोटाची व्याप्ती पण एकच एक दिवसाची असते.. होय नाही तर ते एकदा ओतप्रोत.. नव्हे नव्हे तट्ट ( फुटेपर्यंत) भरले एकदा आता पुढे चिंता मिटली असं का होतं. तुमचा आमचा अनुभव असा तर अजिबात नाही ना हे सर्व मान्य अक्षय सत्य आहे. दुसरं त्यात पहाना आपलं एकटयाचंच उदरभरणाची गोष्ट असती तर एकवेळ थोडा पोटाला चिमटा घेऊन रोजची हि दगदग न करता एक दोन दिवसाच्या फरकाने चाऱ्याचा शोधात हिंडता आले असते. पण तसं नशिबात नसतं. आपल्या बरोबर आपलीच रक्तामासाची, आपुलकीच्या वीणेने बांधलेली नाती यांची जबाबदारी …घरटयातला कर्त्याला कर्तव्य चुकत नसतं.. अन मग रोज मिळालेला चारा सर्वांना पुरणारा नसेल तर स्वताच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो तो खऱ्या अर्थाने. तैल बुद्धीच्या माणसांसारखा हा अन्नाचा साठा करून ठेवण्याची क्षमता आमच्या पक्ष्यांच्या घरटयात नाही.. त्यामुळे फार काळ साठवलेले अन्नधान्य नाहक नाशवंत होण्याचा धोकाही होत नाही…उन्हाळ्या असो वा पावसाळा, वा हिवाळयाचा कडाका , दाण्याच्या शोधात गावात करावा लागतोच फेरफटका… हि आम्हाला पक्ष्यांना नैसर्गिक शिकवण दिलीयं.. गरजेपुरते आजचे घ्या आणि इतर भुकेलेल्यांना शिल्लक ठेवा निस्वार्थ बुद्धीने.. त्यामुळे कधीही कमतरता पडलीच नाही, भुकबळी झालाच नाही, ना चाऱ्यासाठी आपापसांत भांडण तंटे, चोऱ्यामाऱ्या झाल्या नाहीत.. जे आम्हाला माणसांच्या जगात नेहमी दिसत आलयं.. जे मिळालयं त्यात तृप्तता आमच्या अंगाखांद्यावर दिसून येते..निसर्गत: सामाजिक बांधिलकीची समज असते ती आपल्या सर्वप्राणीमात्रात फक्त आम्हाला उमजलीय .. नि तुम्हा मानवांना स्वार्थाचा तण जो असतो तो मात्र उमजून घेण्याची तसदी घेत नाही… ती लवकरच उमजून यावी हि त्या जगनियंत्याला प्रार्थना..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विरंगुळा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ विरंगुळा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

“विरंगुळा” या शब्दाचा अर्थ काही कालावधीसाठी दैनंदिन दिनक्रमात केलेला बदल. अर्थात हा बदल मुख्यत्वे मनाशी निगडीत असतो. विरंगुळा म्हणून पूर्वी  महिला वर्ग थोड्या वेळासाठी एकत्र येऊन गप्पागोष्टी करीत. एखाद्या आवडीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी थोडा वेळ काढणे हा विरंगुळा च ठरतो. काही लोक हख विरंगुळा म्हणून एखाद्या नृत्याच्या किंवा करमणुकीच्या कार्यक्रमाला जायचा बेत आखतील. तर काहीजच मित्र-मैत्रिणींसमवेत खाण्याचा कार्यक्रम ठरवितील. विरंगुळा म्हणजेवेळ चांगल्या प्रकारे घालविण्याचे विसावा घेण्याचे “क्षण.” स्नान, गृहकृत्ये, स्वयंपाकपाणी, बाजारहाट या रोजच्या बाबी आहेत च पण मन प्रसन्न, ताजे, टवटवीत ठेवण्यासाठी विरंगुळ्याची गरज असते. म्हणूनच तर अलिकडे. शहरात निरनिराळ्या ठिकाणी विरंगुळा केंद्रे उभारलेली दिसतात.

यापैकी बरीचशी “विरंगुळा केंद्रे ,”ज्येष्ठांसाठी विविध कार्मक्रमांचे आयोजन करतात. या केंद्रात महिन्यातील एखाद्या विशिष्ट दिवशी कधी व्याख्यान तर कधी गाण्याचे/नृत्याचे कार्यक्रम ठरविले जातात.. ज्येष्ठांना तरी याची विशेष गरज असते. महिन्यातून एखाद्या दिवशी सहभोजन आयोजित केलं जातं. त्यामुळे समवयस्क मित्र-मैत्रिणींसोबत आंनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला जातो. इतकच नव्हे तर अनेक सणांच औचित्य साधून त्यानुसार विरंगुळा केंद्रत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सरत्या वर्षाला निरोप किंवा नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी नियोजन केले जाते.

अलिकडे फ्लॅट संस्कृतीत हादगा  जणू हद्दपार झाला आहे. मुलींनाही शाळा, क्लासेस यातून वेळ नसतो. मग ज्येष्ठ महिला सामुहिक हादगा आयोजित करतात नि वेळ आनंदाने घालवितात.

आजी-आजोबांनी नातवंडांना गोष्टी सांगणे हा दोघांसाठी विरंगुळा च. विरंगुळा म्हणूंन आवडीचे छंद जोपासण्याची संधी मिळते.

मृहणजेच निष्कर्ष काय तर “विरंगुळा ” ही प्रत्येकाचीच गरज आहे जी व्यक्ती आपापल्या आवडीनुसार ठरविते नि त्यातून आनंद लुटते.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पोत (बुनावट, Texture)… लेखक : अज्ञात ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ पोत (बुनावट, Texture)लेखक : अज्ञात ☆ डाॅ. शुभा गोखले

.कापडाच्या स्पर्शाशी संबंधित असलेला हा शब्द हल्ली ऐकायलाही मिळत नाही फारसा. 

.हल्ली सगळे कापडाचा Feel घेतात. मात्र लहानपणी निरुपायाने आईबरोबर खरेदीला जावं लागलं की हा शब्द हमखास कानावर पडायचा. 

काल खादी भांडारात हा शब्द अचानक फिरुन समोर आला. एकदम वाटलं, अरे पोत फक्त कापडाला थोडाच असतो !…… 

 पोत आवाजालासुद्धा असतो की. 

– लताजींच्या आवाजाला निर्मळतेचा पोत, 

– जगजीत सिंग च्या आवाजाचा मखमली पोत,

– आमच्या शाळेतील संस्कृतच्या सरांच्या आवाजाचा विद्वत्तेचा पोत, 

– आजीच्या आवाजाचा विशुद्ध मायेचा पोत.

– तर काही जणांच्या खोट्या स्तुतिसुमनांच्या मागे दडलेला किळसवाण्या स्वार्थाचा पोत उघड असतो.

अगदी एकेकाच्या स्वभावालासुद्धा पोत असतो.

– देशस्थांच्या स्वभावाचा पोत घोंगडीसारखा असतो, जरा खरखरीत पण ऊबदार. 

– कोकणस्थांच्या स्वभावाचा पोत मात्र पार्‍यासारखा असतो, कितीही जवळ आलं तरी स्वतःचं अस्तित्व   वेगळं टिकवून ठेवतो. 

– काही जणांच्या स्वभावाला सुरवंटाच्या केसांचा पोत असतो, जवळीक साधायचा प्रयत्न केला की कातडी सोलवटलीच पाहिजे. 

– काही जणांच्या स्वभावाला फणसाच्या सालीचा पोत आहे, दुखवत नाही पण फार जवळही येऊ देत नाही. 

– तर काहींच्या स्वभावाला मात्र, निरांजनाच्या प्रकाशाचा पोत आहे ..  शांत, शीतल, प्रसंगी दाहक, पण तरीही घर उजळून टाकणारा.

एकेका वयालासुद्धा निरनिराळा पोत असतो. 

– बालपणाला सायसाखरेचा पोत असतो,

–  पौगंडाला गुळगुळीत कागदावरच्या देखण्या चित्राचा पोत असतो, जे हवंहवंसं वाटतं पण हाती गवसत नाही. 

– तारुण्याला फुलपाखराच्या पंखांचा पोत असतो, देखणं, सुंदर पण विस्कटून जायला तत्पर. 

– तिशी-पस्तिशीला पाचशे रुपयांच्या कोर्‍या करकरीत नोटेचा पोत असतो, 

तर,

– पन्नाशीला धुऊन वापरून मऊ झालेल्या सोलापुरी चादरीचा पोत असतो.

–  साठीला मातीच्या मडक्याचा पोत असतो, दिसतं कणखर, पण असतं हळवं. 

– सत्तरीपुढे मात्र मिठाईवरच्या राजवर्खाचा पोत होतो,.. पाहताच मनात आदर निर्माण करणारा, मात्र काळजीपूर्वक हाताळायला हवं याचं भान देखील देणारा.

बघता बघता किती तऱ्हेतऱ्हेचे पोत या पोतडीत गोळा झालेत ना ?

स्वतःचा पोत ओळखा….!…. मनस्पर्शी पोत….. 

ह्या ‘पोता’नी अनेक आठवणींचं “पोतं” उघडेल…..अशी आहे बघा भाषेची करामत.!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares