मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तेरी मिट्टी में मिल जावां ! भाग-2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

तेरी मिट्टी में मिल जावां ! भाग-2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

 (या वीरांचे त्यांनी जे हाल केले होते ते पाहून राक्षसही लाजले असते!) – इथून पुढे — 

दरम्यानच्या काळात भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्यास आरंभ केला होता. घुसखोरांच्या हालाचालींवर नजर ठेवण्यासाठी कारगिल मधील तुर्तुकजवळच्या झांगपाल येथील  पॉइंट ५५९० या पर्वतावरील सैन्यचौकी महत्त्वाची भूमिका बजावू शकत होती. तो पर्वत लवकरात लवकर आपल्या ताब्यात घेण्याची आवश्यकता होती. जमिनीपासून ही चौकी तब्बल १८००० फूट उंचीवर होती. 

कॅप्टन हनीफुद्दीन

सतत उत्साहात असलेल्या कॅप्टन हनीफुद्दीन साहेबांनी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने नेतृत्व स्वीकारले. अत्यंत दाट धुके, प्रचंड बर्फवर्षाव, जीवघेण्या खोल दऱ्या आणि शत्रूची घातक नजर यांना तोंड देत साहेब आपल्या पाच सहकाऱ्यांसह सतत दोन दिवस रात्र हा पर्वत चढत होते… 

अखेर त्या चौकीच्या केवळ दोनशे मीटर्स अंतरावर असताना ते शत्रूच्या गोळीबाराच्या टप्प्यात आले आणि त्यांच्यावर तुफान गोळीबार सुरू झाला. अर्थात साहेबांनी प्राणपणाने प्रत्युत्तर दिलेच. इतर सैनिकांना सुरक्षित ठिकाणी लपून बसायला आणि गोळीबार करायला उसंत मिळावी म्हणून हनीफुद्दीन साहेबांनी आपल्याजवळील दारूगोळा संपेपर्यंत गोळीबार केला. त्यात त्यांना अनेक गोळ्या वर्मी लागल्या आणि साहेब कोसळले!…त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देह त्या बर्फात, वादळात तब्बल ४३ दिवस पडून राहिले… गोठून गेले!

हेमाजींना सात जून रोजीच ही दु:खद वार्ता कळवण्यात आली. त्यांच्या घरी सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांची तोबा गर्दी उसळली होती. पण लेकाचा देहच ताब्यात नाही तर पुढचं काय आणि कसं करावं? किती भयावह परिस्थिती असेल? एकटी बाई! इथं नात्यातल्या कुणाचे निधन झाले तर दहा दिवस दहा युगांसारखे भासतात!

सैन्यप्रमुख अधिकारी महोदयांनी हेमाजींना भेटून परिस्थिती समजावली. त्यावर हेमाजी म्हणाल्या, “माझा लेक तर आता या जगात राहिलेला नाही. त्याचा देह आणण्यासाठी इतर सैनिकांना तिथे पाठवून त्यांचे जीवित धोक्यात टाकण्याची माझी इच्छा अजिबात नाही. मुलाचं जाणं किती क्लेशदायक असतं हे मी आता समजू शकते. ही वेळ कुणाही आईवर यावी, असं मला वाटत नाही. पण ज्यावेळी तिथे पोहोचणं शक्य होईल, त्यावेळी मात्र मला त्या पर्वतावर जायचं आहे, जिथं माझं लेकरू देशासाठी धारातीर्थी पडलं ती जागा मला पहायची आहे.”

भारताने युद्धात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आपल्या सैनिकांनी हनीफुद्दीन साहेब आणि आणखी एका सैनिकाचा मृतदेह पर्वतावरून खाली आणण्यात यश मिळवले. एवढा उंच पहाड चढून जाणे, तिथल्या हवामानाशी टक्कर देणे, बर्फात गाडले गेलेले देह शोधून ते बाहेर काढणे आणि ते कमरेएवढ्या बर्फातून पायी चालत, प्रसंगी खांद्यावर वाहून खाली आणणे हे अतिशय कठीण काम असते… यात सैनिकांच्या जीवावर बेतू शकते… पण या ‘ऑपरेशन शहीद हनिफ’ मध्ये आपल्या सैनिकांनी आपले प्राण पणाला लावले!

हेमाजी आपल्या लेकाचा देह पाहताच काही वेळ सुन्न राहिल्या. अवघ्या पंचवीस वर्षांच्या त्या सुकुमार देहाची ही अवस्था पाहून त्यांचे जग एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. पण ही एका शूराची आई! लगेचच त्या सावरल्या. आपल्या लेकाला निरोप देण्याची तयारी त्यांनी केली. त्याच्या कबरीवर लावायच्या स्मृतिस्तंभावरील वाक्ये त्यांचे स्वत:चे आहेत! 

ज्या ठिकाणी हनीफुद्दीन साहेबांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले त्या सबसेक्टर ला आता ‘हनीफ सब सेक्टर’ असे नाव देऊन भारतीय सैन्याने त्यांचा गौरव केला आहे…. ‘वीर चक्र’ हा सन्मान त्यांना मरणोत्तर प्रदान केला गेला आहे.     

प्रशिक्षणादरम्यान सुट्टीवर घरी आलेले असताना हनीफुद्दीन साहेब यांनी हेमाजींना भारतीय सैन्य बहादूर सैनिकांचा कशा प्रकारे गौरव करते त्याची उदाहरणे सांगितली होती… ते प्रत्यक्ष त्यांच्याच बाबतीत घडेल असे कुणाला वाटले तरी असते कां? 

दिल्लीच्या शहीद स्मारकामध्ये शहीद कॅप्टन हनीफुद्दीन अजीज यांचे नाव कोरलेले पाहून या माऊलीचे काळीज थरथरले असेल. आपला मुलगा देशासाठी कामी आला याचे त्यांना समाधान आहेच. जिथे आपल्या लेकाने देह ठेवला तिथे भेट देण्याची त्यांची इच्छा त्यांनी जिद्दीने पूर्ण केली. त्या पर्वतावर त्या ठिकाणी आपल्या थोरल्या लेकासह त्या जाऊन आल्या… त्याच्या स्मृती मनात साठवत साठवत पर्वत शांतपणे उतरत गेल्या! 

आजही हेमाजी सकाळी रियाजाला बसतात…. त्यांच्या कंठातून भैरवी आणि डोळ्यांतून आसवं ओघळू लागतात… हा आसवांचा ओघ अभिमानाच्या पायरी पर्यंत येऊन थबकतो… मनाच्या गाभाऱ्यात पुत्र विरहाच्या वेदनेला मज्जाव असतो… शूर मातांच्या!

आपण या सर्व मातांचे देणे लागतो… यांच्या कुशीत नररत्ने जन्म घेतात आणि आपल्याच संरक्षणासाठी मातीत मिसळून जातात.. कायमची!

ज्यांच्या कुलाचे दीपक विझून गेले, ज्यांचे पोटचे गोळे देशाच्या सीमा सांभाळत आहेत त्यांचेही आपण कृतज्ञ असले पाहिजे! सैन्यात एकच धर्म… देशसेवा. देव करो आणि असे आणखी हनीफुद्दीन या देशात जन्माला येवोत, ही भारतमातेच्या चरणी प्रार्थना. 

कारगिल युद्ध सुरू होण्यापूर्वी कॅप्टन हनीफुद्दीन साहेबांबाबत ही घटना घडली होती. प्रसार माध्यमांना याबाबत माहिती नव्हती. मात्र क्रिकेट वर्ल्ड कप प्रत्येकाच्या ओठी होता!कारगिल युध्दाचे कव्हरेज नंतर मोठ्या प्रमाणात झाले. पण दुर्देवाने हनीफुद्दीन साहेबांचा पराक्रम सामान्य लोकांच्या नजरेस त्यावेळी येऊ शकला नाही! नंतर मात्र काही लेखक, वृत्तपत्रांनी दखल घेतली. माध्यमांनी कशाची दखल घ्यावी, हे खरंतर जनतेने ठरवले पाहिजे ! असो.

२६ जुलै हा भारताच्या पाकिस्तानवरील युद्धाचा स्मृतिदिन जसा साजरा व्हायला पाहिजे तसा होतो कां? असो. या ‘ऑपरेशन विजय’ ला यावर्षी चोवीस वर्षे पूर्ण झालीत. येते वर्ष हे या पराक्रमाचे पंचवीसावे, अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष असेल… या वर्षात सामान्य लोकांना खूप काही करता येईल ! 

 जय हिंद! 🇮🇳

– समाप्त – 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग आणि आम्ही… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग आणि आम्ही… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

पावसाळा सुरू झाला की ओसाड झालेली वसूंधरा पुन्हा हिरव्या रूपात सुवासिन होऊन सजू लागते.  पण सृष्टीचे सजलेले रूप पाहण्यास वेळ कुणाकडे आहे. आपण आधुनिकतेच्या पिंजऱ्यात अडकून वेळांचे साखळदंड पायात गुंतविले आहेत. आपण काळाच्या अधिन होत आपल्या जीवनाची सगळी सुत्रे मोबाईल, संगणक यांच्या हाती दिलेली आहेत. त्यामुळे ॠतंप्रमाणे बदलत जाणारे सृष्टीचे रूप पाहणे आणि तो वेगळा आनंद घेणे आपण विसरतोच. मोबाईल वरती येणारे निसर्गचित्रण पाहून आपण हा कृत्रिम आनंद घेतो पण निसर्गाच्या जवळ जावून त्याच्या विवीधतेतून सजलेले रूप पाहण्यास आपणास वेळच नाही.

वार्‍याच्या झोकात हिरवी वनराई आनंदाने डुलते. पावसाच्या सरी येऊन हिरव्या रानासोबत जणू झिम्मड घालून जातात. श्रावण आला की , कधी उन तर कधी पावसाचा खेळ रंगतो. कानावर  पक्षांचा किलबिल आवाज येतो. एखांदा पक्षी झाडाच्या शेंड्यावर झुलताना दिसतो , तर एखांदा उंच आकाशात झेपावताना. कुठे दुरवर डोंगर-दरीतून एखांदा ढग उतरतो. आणि पुन्हा उन-पावसाचा लहरी खेळ चालू होतो. ओहळ, ओढ्यात येणारा पाण्याचा खळखळ आवाज मधूर वाद्याप्रमाणेच

कानास मंत्रमुग्ध करून जातो. उंचावरून कोसळणारा शुभ्र धबधबा डोळ्याचे पारणे फेडतो. दुरवर पसरलेली हिरवी राने मनास आनंदी करतात. माळावर फुलणारी रंगबेरंगी फुले नाजूक स्पृर्शानी प्रसन्न करतात.

किती तो आनंद ! मनात मावेना इतका. हिरवा रंग !  नजर भरभरून ओसंडणारा. मधूर सुर ते ! पक्षांचे ,धो धो वाहत्या पाण्याचे ,वाऱ्याच्या सनईचे  ,सळसळ करणार्‍या पानांचे खरच इतका भरभरून आनंद फक्त निसर्ग देऊ शकतो. आणि तोही फुकटात . संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ,

“आनंदाचे डोही आनंद तरंग “

असाच हा डोळ्यांना भरभरून आनंद देणारा निसर्ग आपल्या भोवताली असतो .त्याच्यापासून परके होतो ते आपण  , स्वतःहून जखडलेल्या कृत्रिम यांत्रिक बेड्यात.

मनास खंत आहे की निसर्गाने भरभरून दिलेला आनंद आपणास घेता येत नाही. म्हणतात ना ‘ देव आला द्यायला पदर नाही घ्यायला ‘ असेच आपले आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत की , बहरलेला ,विविधतेने नटलेलेला निसर्ग पाहण्यास आपणास वेळच नाही. मग निसर्गाचे रंग, रूप  जाणून घेणे त्याचे संवर्धन या गोष्टी तर फारच दूर

खरोखर निसर्गाने आपणास दिलेल्या केलेल्या कित्येक गोष्टी आहेत. त्या आपणाला जगण्यातला खरा आनंद देतात. आपण सकाळी उठल्यावर पूर्वक्षितिजावर फुटणारे तांबट आणि रात्रीच्या भयान, निरव शांततेला भेदित करणारे घरट्यातून येणारे किलबिल आवाज अशी अतिशय रम्य पहाट आपल्या दैनंदिन स्वागतास रोजच येते. तिमीरातून तेजाकडे उजळत जाणारे दिवसाचे आगमन मनाला भरभरून उत्साह देते. मनास नव्या साहसाची  ,नव्या आकांक्षांची जाणिव होते. येणाऱ्या नव्या दिवसाची सुरुवात आपण मन प्रफुल्लित आणि चित्त प्रसन्न ठेवून सुर्य नमस्कार घालून स्वतःस येणाऱ्या दिवसाच्या स्वाधीन केले तर  ‘दुधात साखरेची भर पडेल. ‘ सायंकाळी पश्चिमेकडे क्षितिजावर उमलणारे तांबट पिवळे रंग मनाला मोहून टाकतात. दिवसभर थकल्या भागल्या मनाला प्रसन्न करतात. हळदउनात पिवळी झालेली सृष्टी नजर दिपवून टाकते.

येणारा प्रत्येक ॠतू हा आपल्यासाठी आनंदाची ओंजळ भरून आणतो. आपल्या जीवनाची नाळ ही प्रत्येक ॠतूशी जोडलेली असते. कवी मंगेश पाडगावकर आपल्या कवितेत म्हणतात

“सहा ऋतूंचे सहा सोहळे , येथे भान हरावे

या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे “

पानगळ करणारा शिशीर ॠतू सुध्दा जाता जाता आपणास संदेश देतो, ” जीवन संपले नाही उद्या येणारा वसंत ऋतू तुमच्यासाठी पुन्हा नविन कोवळा आनंद घेऊन येणार आहे. मी फक्त जुने आणि जिर्ण झालेले सोबत नेत आहे “

निसर्गाच्या कणाकणात आनंद भरलेला असतो. उत्साह भरभरून वहात असतो. हिरवी झाडे-वेली त्यावर उमलणारी रंगबेरंगी फुले ,डोंगर, दऱ्या,उसळणारा अथांग सागर, खळखळणारे झरे, शांत वाहणारी नदी ,प्राणी, पक्षी, या सगळ्याशी आपण एकरूप झालो तर कळेल, जीवनाचा खरा आनंद निसर्गातच आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील थोडा का होईना वेळ या दानशूर निसर्गाकरिता द्यावाच .निसर्गाचे संवर्धन ही सुध्दा आजच्या काळाची गरज आहे. पण आपण जेंव्हा त्याच्या कुशीत जगायला शिकू,तेंव्हाच त्याची काळजी सुध्दा नक्कीच घेऊ. ‘ सर्व काही विसरून निसर्गाच्या विविधतेत आयुष्य खुप छान जगता येते.’

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लालयेत पंच वर्षांनी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “लालयेत पंच वर्षांनी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लालयेत पंच वर्षांनी, दश वर्षांनी ताडयेत ।

प्राप्तेतु शोडषे वर्षे,  पुत्रं मित्रवदाचरैत ।।

…. असे एक संस्कृत वचन आहे.  मुलांचे पाच वर्षे लाड करावेत, दहा वर्षे धाकात ठेवावे आणि सोळाव्या वर्षानंतर मुलांशी मित्राप्रमाणे वागावे असा सरळ अर्थ…. मूल झाल्यावर पहिली पाच वर्षे लाडाची असतात. त्यावेळी मुलं हा आपला आनंद असतो.  लाडाच्या या पाच वर्षात आपण मुलांपासून मिळवलेला आनंद अवर्णनीय असतो व आपल्या आयुष्याला तो अर्थ प्राप्त करून देत असतो.  नंतरची दहा वर्षे मुलांवर संस्कार करायचे असतात.  अशावेळी मुले ही आपली जबाबदारी असते.  त्यांना जबाबदार समाजघटक बनवण्यासाठी सुसंस्कारित करणे व उत्तम नागरिक म्हणून तयार करणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असतेच असते. त्यासाठी त्यांना धाक दाखवून का होईना परंतू सुसंस्कारित करणे व पुढील आयुष्यासाठी त्यांचा पाया भक्कम करणे ही जबाबदारी असते.  

त्यानंतर मुले पालकांच्या ऐकण्याच्या पलिकडची असतात.  त्यामुळे त्यांच्याशी मित्रत्वाचे म्हणजेच सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय कौटुंबिक संबंध सुरळीत रहात नाहीत. जबाबदारीची दहा वर्षे संपल्यावर मुलांना त्यांच्या पायावर उभे राहून पुढील आयुष्याच्या वाटचालीत त्यांचे मित्र, साथीदार,  भागीदार या भूमिकेतून त्यांच्याशी वागून कौटुंबिक संतुलन टिकवणे हे आपल्या स्वतःच्या सुखा समाधानासाठी आवश्यक असते.  मुलांच्या एकूण जडणघडणीत व पालन पोषणात कुठेही गुंतवणूक हा विचार करणे ही गोष्टच मला चुकीची वाटते.  मुलेही म्हातारपणाची काठी वगैरे जुने विचार आजच्या काळाच्या संदर्भात योग्य आहेत की नाही याचा विचार निश्चितच आवश्यक ठरेल.

पूर्वीच्या पालकांच्या व आत्ताच्या पालकांच्या परिस्थितीत मनस्थितीत तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीत खूपच फरक पडलेला आहे.  चिंतायुक्त पालक पूर्वीचेही होते व आजचेही आहेत.  परंतु त्यांच्या चिंतांमध्ये फरक आहे.  पूर्वी फक्त एकच माणूस कमावत असे.  त्याच्या कमाईमध्ये घरखर्च चालवणे ही तारेवरची कसरत असे.  आवश्यक गोष्टींसाठी उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना नाकी नऊ येत असत. त्यामुळे चैनीच्या गोष्टी करणे अशक्यच असे. आजचे पालक त्यामानाने जास्त कमावतात. बहुतांश घरात आई वडील दोघेही कमावते असतात. स्वतःच्या सुखात फारशी तडजोड न करता त्यामध्ये मुलांचेही कोड कौतुक करणे, सर्व कुटुंबाने मिळून काही किमान चैनीच्या गोष्टी करणे सर्वमान्य झाले आहे. 

यामध्ये स्वतःच्या सुखाला मुरड घालून फक्त मुलांसाठीच काही करणारे पालक अपवादात्मकच.  त्यामुळे मुलांनी म्हातारपणाची काठी बनावी अशी अपेक्षा ठेवणे हीच चुकीच्या विचारांची गंगोत्री ठरावी.  जे पालक अशा गुंतवणुकीच्या अपेक्षेने मुलांसाठी काही करत असतील तर ही रिस्की गुंतवणूक आहे हे ध्यानात ठेवावे.  मुलांनी जर पुढे विचारले नाही तर ज्याप्रमाणे चुकीच्या पतपेढ्या बँका वगैरे मधील अधिक व्याजाच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक कधीकधी बुडीत होते तशी ही गुंतवणूक सुद्धा बुडीत होण्याची शक्यताही गृहीत धरली पाहिजे. नातेसंबंधातील प्रेमळ सहजीवनाच्या विचारापेक्षा व्यावहारिक विचार जेव्हा प्रबळ होतात त्यावेळी त्यात व्यवहारांमधील रिस्क ही सुद्धा गृहित धरली पाहिजे. 

पुराणकाळाचा विचार केल्यास मुले ही म्हातारपणाची काठी वगैरे विचार त्यावेळी नसावेत असे वाटते.  पंचवीस वर्षे गृहस्थाश्रमाची पूर्ण केल्यावर म्हणजे साधारणपणे मुले गृहस्थाश्रमाच्या टप्प्यावर आल्यावर पालकांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची जी समाजव्यवस्था होती असे ऐकिवात आहे ती चांगलीच.   साधारण २५ ते ३० वर्षादरम्यान गृहस्थाश्रम व ५५ ते ६० वर्षादरम्यान वानप्रस्थाश्रमात प्रवेश ही खरेतर आदर्श समाजव्यवस्था म्हटली पाहिजे.  आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास रिटायरमेंटनंतर पालकांनी वानप्रस्थ स्वीकारणे हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह ठरेल.  वानप्रस्थाश्रम म्हणजे आजच्या संदर्भात मुलांच्या संसारात लुडबूड न करता स्वतंत्रपणे राहून समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवणे.  स्वतःचे अनुभव, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन यावर आधारित एखादे  समाजोपयोगी कार्य निरपेक्ष बुद्धीने पत्करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आयुष्याची पुढील वाटचाल करणे.  आज अनेक समाजोपयोगी संस्था कार्यरत आहेत.  अनेक संस्था उत्तम कार्य करतात.  फार मोठ्या धनलाभाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या चरितार्थाच्या गरजेपुरते अर्थार्जन करून अशा संस्थांच्या कार्यात झोकून देण्याची आज गरज आहे.  अशा गरजांची पूर्तता या वानप्रस्थाश्रम संकल्पनेतून आजच्या काळात करता येणे शक्य आहे.  मुलांच्या संसारात लुडबूड न करता समाजोपयोगी कार्याचा आदर्श त्यांचे पुढे ठेवला तर त्यांनाही पालकांविषयी निश्चितच आदर वाटेल. 

यावर कुणी असे म्हणतील की असले फालतू व्यवहारशून्य आदर्शवाद नकोत.  प्रॅक्टिकली बोला. 

ठीक आहे, प्रॅक्टिकली बोलू….. पहिली पाच वर्षे तुम्ही मुलांसाठी काय करता हो ? खरं म्हणजे तुम्ही मुलांच्या कौतुकात येवढे मग्न असता की, सर्व जगाचे भान विसरता.  जळी स्थळी  मुलांचा विषय व कौतुक याने तुमचे आयुष्य भरून व भारून गेलेले असते.  तो आनंद, ते भारलेपण व कौतुकाची नशा आयुष्यामध्ये येवढे विविध रंग भरते की,  तुमचे आयुष्य हे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे झालेले असते. म्हणजे या पाच वर्षात तुम्ही मुलांसाठी जेवढे करता त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक आयुष्यात सुख, आनंद मिळवता.  म्हणजे पहिली पाच वर्षे तुम्ही फायद्यातच असता.  पुढील दहा वर्षांचा विचार करता असे पहा की तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, तुम्हाला अक्षय सुखाचा झरा देणाऱ्या कुटुंबाच्या सौख्यासाठी (म्हणजे त्यात तुमचे सुख सुद्धा आहेच)  पडलेली जबाबदारी तुम्ही स्वीकारली, म्हणजे तुम्ही मुलांसाठी काय केलं ?  जे केलं ते स्वतःच्या कर्तव्य पूर्तीसाठी केलं. म्हणजे ही दहा वर्षे ना नफा ना तोटा या परिस्थितीत.  

पंधरा वर्षानंतर आपण मुलांचे कौटुंबिक भागीदार म्हणजे पुन्हा बरोबरीतच. आता व्यावहारिक विचार असा की, तुम्ही गृहस्थाश्रमाच्या काळात जी काही संपत्ती मिळवली असेल तेवढाच तुमचा भाग. तो जर तुम्ही मुलांना दिलात तरच फक्त ती गुंतवणूक. यात काहीही वडिलोपार्जित इस्टेटीचा भाग नाही आणि जर तुम्ही वडिलोपार्जित इस्टेटसुद्धा खर्च केली असेल तर तुम्ही मुलांचे कर्जदारच . अन् स्वकष्टार्जित संपत्ती मुलांना देतानाच जर तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांचे समोर मांडून अथवा लेखी एग्रीमेंट करूनच त्यांना दिली तर व्यवहाराचा भाग पूर्ण झाला.  आणि ही एवढीच फक्त तुमची म्हातारपणाची काठी झाली.  परंतु या पद्धतीने तुम्ही काही समाजसेवी संस्थांशीही एग्रीमेंट करू शकता. त्यासाठी ते मुलाशीच केले पाहिजे असेही बंधन कुठाय ?  मुलांशी पटत नसल्यास व तुमचेकडे संपत्ती असल्यास म्हातारपणी जगणे कठीण व अशक्य नाहीच.  त्यासाठी म्हातारपणाची काठी विकत घेण्याची तुमची क्षमता असतेच.  ज्यांची अशी काठी विकत घेण्याची क्षमता नाही त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यात झोकून देण्याची गरज व आवश्यकता आहेच.  सहसा सध्या प्रत्येकजणच वृद्धापकाळाची सोय म्हणून काही उत्पन्नाची तजवीज करून ठेवत असतोच.  फक्त सर्वात दुर्दैवी असे पालक की जे दुर्धर रोगाने आजारी आहेत, मुले विचारत नाहीत अथवा प्रॅक्टिकली त्यांना ते शक्य होत नाही व जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही.  या व्यक्ती मात्र खरोखरच दुर्दैवी. त्यांचेसाठी सरकारनेच काही सोय करावी.  एक पर्याय असा की त्यांचा वृद्धापकाळाचा खर्च सरकारने उचलावा.  अथवा त्यांचेसाठी इच्छामरणाचा कायदा करावा.  माझ्या मते मुले ही म्हातारपणाची काठी नव्हेतच.  आणि ती गुंतवणूक तर अजिबातच नाही व जबाबदारी फक्त मर्यादित कालावधी पुरतीच. पालकत्व हे आव्हान नव्हे तर ती कौटुंबिक सुखांसाठी आपण होऊन स्वीकारलेली जबाबदारी. ही जबाबदारी ज्यांना नको आहे व टाळताही येत नाही त्यांना वाटणारे आव्हान.  

शेवटी आपल्या पिढीने तरी असे काय भव्यदिव्य केलंय की ज्यामुळे पुढच्या पिढीने आपले उपकार मानावेत ?  म्हणूनच या एकविसाव्या शतकातील तरुणांना मी म्हणतो —

एकविसाव्या शतकातील तरुणांनो,.. आम्ही तुमचे बाप आहोत,

म्हणूनच,

तुम्हाला मिळालेला जन्मसिद्ध शाप आहोत. आम्हीच दिले तुम्हाला, भ्रष्ट स्वातंत्र्याचे वरदान ? 

सामाजिक अराजकतेचे दान ? ढासळत्या पर्यावरणाचे थैमान…. 

आम्हीही होतो तरुण एकेकाळी,… पण नाही थोपवू शकलो हा प्रवाह, नाही परतवू शकलो या लाटा, 

पराभूत अन्  प्रवाहपतिताचं जिणं…   

जरी जगलो तरी………. 

नाही गेलो भोव-याच्या तळाशी.  

प्रवाहातील पत्थरांना चुकवत, 

कपाळमोक्ष नाही होऊ दिला…. 

म्हणूनच अजूनही अशा आहे, प्रवाह वळवता येईल, बिघडलेलं सावरता येईल,

सुकृताच्या अनुभूतीवर विकृताचा आकृतिबंध सुधारता येईल. 

खरंच येईल तरुणांनो …. 

आम्हाला आशा आहे. आमच्या शापित जीवनाला शिव्या घालत बसण्यापेक्षा, 

आमच्या सुकृताच्या अनुभूतीचं सार जाणून घ्या. विचार करा, कृती करा. 

या कृतीत आमचं जीवन संपून जाणं अनिवार्य असेल तरी कचरू नका, 

पण प्रवाहपतित होऊ नका. इतिहासाची पुनरावृत्ती करू नका. भविष्यकाळाच्या भल्यासाठी, 

भूतकाळाच्या छातीत खंजीर खुपसणं, आवश्यकच असेल तर …  

… हे नव्या पिढीतील ब्रुटसांनो,  हा वृद्ध सीझर, निशस्त्र होऊन, तुमचा वार झेलण्यास सिद्ध आहे, 

अन गर्जना करतोय …. 

…. देन सीझर मस्ट डाय.

…. देन सीझर मस्ट डाय.

(माझी पंधरा वर्षांपूर्वीची ही बहुतेक सारी मते आजही मला जशीच्या तशी मान्य आहेत)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तेरी मिट्टी में मिल जावां ! भाग-1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

तेरी मिट्टी में मिल जावां ! भाग-1 ☆ श्री संभाजी बबन गायके 

हेमाजींनी त्यांच्या घराच्या मागील बागेकडची खिडकी उघडली. सकाळचा थंड वारा आणि फुलांचा गंध घरात अलगद आला. हेमाजींनी नेहमीप्रमाणे तंबोरा मांडीवर घेतला आणि डोळे मिटले आणि रियाज आरंभ केला! 

भैरव… सकाळी शोभणारा राग. भैरवचे स्वर लावण्यात त्यांना महारत हासील होतीच. गेल्या तीन दशकांचा रियाज होता त्यांचा. पण गेले काही दिवस भैरव गाताना आपोआप भैरवीकडे पावलं वळायची त्यांची… आर्ततेने पुरेपूर भरलेली… अंतरीच्या वेदनेची पालखी झुलवत झुलवत श्र्वासांच्या या तीरावरून त्या तीरावर नेणारी!

ही पावलं अशीच पडत होती… गेले काही दिवस, म्हणजे…. गेल्या चाळीस दिवसांपासून खरं तर! 

१९९९ वर्षातील तो जुलै महिना… दिल्लीत पाऊस होताच नेहमीसारखा. त्यांचं मन मात्र सहा जून पासूनच ओलंचिंब होतं!  

कॅप्टन हनीफुद्दीन

६ जून १९९९ रोजी त्यांचा हनीफ त्याच्या ११, राजपुताना रायफल्सचा युद्धानारा ‘राजा रामचंद्र की जय!’ आसमंतात घुमवीत प्रत्यक्ष मृत्यूला सामोरा गेला होता…. कॅप्टन हनीफुद्दीन अजीज हे त्याचं नाव. अवघ्या दोन वर्षांपूर्वी सैन्यात अधिकारी म्हणून भरती झालेला.

हनीफ अवघ्या सात वर्षांचा असेल नसेल तेंव्हा त्याचे वडील अजीज हे जग सोडून गेले. हेमाजी ह्या शास्त्रीय गायिका. संगीत नाटक अकादमीमध्ये सेवा बजावत होत्या. सैन्यासाठीच्या मनोरंजन केंद्रातही त्यांनी काही काळ आपली कला सादर केली होती. हनीफ कुटुंबाचा आणि सैन्याचा एवढाच काय तो संबंध तोपर्यंतच्या काळातला. 

अजीज हे सुद्धा कलाक्षेत्रात होते. त्यातून हेमाजी आणि अजीज यांची मने जुळली आणि ते विवाह बंधनात अडकले. त्यांना दोन मुले झाली. या मुलांनाही आपल्या आईकडून संगीताचा वारसा लाभला. 

अजीज लवकर निवर्तले. हेमाजींनी मुलांना आपल्या मूळच्या हिंदू आणि पतीच्या मुस्लीम धर्मातील संस्कारांचाही वारसा देण्यात कसूर ठेवली नव्हती. नवऱ्याचा आधार गमावलेल्या हेमाजींनी आहे त्या उत्पन्नात घर भागवले. त्या संगीत शिकवू लागल्या. मुलांना कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ दिली नाही.

एकदा हनीफ यांना शाळेतली एका शिक्षिकेने विनामूल्य गणवेश देऊ केला. त्यावर हेमाजींनी त्यांना निरोप पाठवला की.. हा खर्च करण्यास मी समर्थ आहे. कृपया दुसऱ्या एखाद्या जास्त गरजूला हा मोफत गणवेश देण्यात यावा. 

कॅप्टन हनीफ साहेब देशासाठी हुतात्मा झाल्यानंतर सरकारने त्यांना देऊ केलेला पेट्रोल पंप त्यांनी, घरात तो सांभाळायला कुणी दुसरं नसल्याने नम्रपणे नाकारला आणि इतर हुतात्मा सैनिकांच्या परिवारास देण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली.     

वडिलांच्या पश्चात थोरल्या मुलाने शिक्षकी पेशा पत्करला. हनीफुद्दीन अभ्यासात हुशार आणि गाण्यातही उत्तम गती असलेले युवा. दिल्लीच्या शिवाजी कॉलेज मध्ये विद्यार्थीप्रिय. इतके की ‘मिस्टर शिवाजी’ हा किताब प्राप्त केलेले विद्यार्थी कलाकार… शास्त्र शाखेचे पदवीधर. पण कसे कुणास ठाउक हनीफुद्दीन साहेबांना सैन्याच्या गणवेशाने साद घातली आणि ते सैन्यात दाखल झाले. प्रशिक्षण आणि नेमणुकीच्या ठिकाणीही त्यांनी आपले संगीतप्रेम सांभाळले. त्यामुळे ते सर्व सैनिकांत कमालीचे प्रिय ठरले.    

सीमेवर जीवघेणा गारठा असतो. जगणं अत्यंत कठीण असतं.. अगदी तगड्या सैनिकांनाही! दोन्ही सैन्याच्या, अर्थात भारत आणि पाक यांच्या तेथील अतिऊंचीवरील सैन्यचौक्या तात्पुरत्या रिकाम्या केल्या जातात आणि हिवाळा संपला की पुन्हा त्यांचा दोन्ही देशांच्या सैनिकांकडून ताबा घेतला जातो, असा अलिखित करार होता, तोपर्यंत तरी, म्हणजे १९९९ पर्यंत. त्याचाच गैरफायदा घेत पाकिस्तानने एप्रिल मे महिन्यातच त्या रिकाम्या चौक्या ताब्यात घेऊन प्रचंड दारूगोळा जमवून ठेवला होता. परदेशातून खरेदी केलेले अत्याधुनिक तंबू, डबाबंद खाद्य पदार्थ, उबदार कपडे.. सर्व तयारी जय्यत.

पहाडांवर आरामशीर बसून त्यांना खाली भारतीय सैन्यावर अचूक निशाणा साधता येऊ शकत होता. भारतीय सैन्याला रसद पुरवठा करण्याच्या रस्त्यावर पाकिस्तान वरून हुकुमत गाजवू शकत होता. रसद बंद झाल्यावर भारतीय सैन्य गुडघे टेकवील आणि मग कश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा नेता येईल, असा त्यांचा कावा होता. 

मे महिन्यात एका मेंढपाळाने घुसखोरांना पाहिले. त्यावेळी हा एवढा गंभीर प्रकार असेल, पाकिस्तानी सैन्य यात सामील असेल, असे कुणालाही वाटले नव्हते. तरीही प्रत्यक्ष प्रकार नेमका काय आहे हे तपासण्यासाठी कॅप्टन सौरभ कालिया यांच्या नेतृत्वात पाच जणांची एक गस्त तुकडी १५ मे रोजी पहाडांवर पाठवण्यात आली. या तुकडीवर अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ला झाला. आणि हे सहा सैनिक पाकिस्तानने कैद केले. 

पाकिस्तानी सैन्य या प्रकारात सहभागी असल्याचा पाकिस्तान सरकार सतत इन्कार करीत होते. पहाडांवर बंकर बनवून लपून बसलेले ते घुसखोर भारतीय काश्मिरी युवक असल्याचे ते सांगत होते. ते आणि तुम्ही.. तुमचं तुम्ही पाहून घ्या असा त्यांनी धोशा लावला. त्यामुळे या पकडलेल्या सैनिकांची कोणतीही माहिती त्यांनी भारतीय सैन्याला दिली नाही. पाकिस्तानातल्या एका रेडिओ केंद्रावर मात्र भारतीय सैनिक कैद केल्याची बातमी प्रसारित झाली.

पाकिस्तानवर फार दबाव टाकल्यानंतर त्यांनी आठ जून १९९९ रोजी ह्या आपल्या शूर सैनिकांची क्षतविक्षत कलेवरं आपल्या ताब्यात दिली. या वीरांचे त्यांनी जे हाल केले होते ते पाहून राक्षसही लाजले असते! 

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ डोळ्यांची काळजी घ्या… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ डोळ्यांची काळजी घ्या ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

माझ्या मित्राच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली. त्याला डॉक्टरांनी सांगितलेली पथ्यं …

1) डोळा मारायचा नाही,

2) कशावरही डोळा ठेवायचा नाही,

3) डोळ्यात डोळा घालून पहायचं नाही,

4) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ पाहायचं नाही, वर डोळे करायचे नाहीत.

5) दुसऱ्याच्या डोळ्यात अंजन घालायचं नाही,

6) डोळे भरून पहायचं नाही,

7) कानाडोळा करायचा नाही,

8) डोळ्यातले भाव वाचायचे नाहीत,

9) डोळे वटरायचे नाहीत, आणि सर्वात महत्वाचं

10) बायकोने डोळे वटारून पाहिलं तर तिच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही,

नाही तर परिणाम वाईट होऊ शकतात व पुन्हा ऑपरेशन करण्याची वेळ येईल.

तेव्हा

नेत्रदान संकल्प करा

आणि

मृत्यू पश्चात नेत्रदान करा

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अंगाई… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अंगाई…  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

‘आई’ हे आपले परमदैवत. आई म्हटले की आठवतो तो तिचा प्रेमळ उबदार स्पर्श, तिने भरविलेला मऊ दुधभात आणि तिने अंगाई म्हणत आपल्याला निजवणे. तिच्या प्रेमळ आवाजाने आपल्याला छान झोप येई. देव देवतांच्या जन्मोत्सवाचे वेळी जे पाळणे म्हटले जातात त्याच पारंपारिक चालीवरती डॉ. निशिकांत श्रोत्री सरांनी ही ‘अंगाई’ लिहिलेली आहे.

☆ अंगाई…  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

निज निज निज बाळा

पाळणा तुजसाठी झुलविला

करी गाई गाई

तव आई गाई तुज अंगाई 

निज निज निज बाळा ||ध्रु||

खेळ किती रंगे

चिऊ काऊ भू भू माऊ संगे

रांगशी दुडुदुडू

सवंगडी सारे ते प्रेमाने

तुजवरती जीव

थकलाशी लाव पापणी डोळा

निज निज निज बाळा ||१||

ज्योती त्या विझल्या

निरांजनी शांतवुनीया गेल्या

तुजला लडिवाळा

निजवाया येई मिट्ट काजोळा

मनमोहन बाळा

निद्रेचा सगळा का धांडोळा

निज निज निज बाळा ||२||

चांदोबा आला

घेउनिया तारका  नि चांदण्या

चांदणे तुजला

अंगाई गाई निजवायाला 

डोळा पेंगुळला

मिटुनीया पापणीच्या पंखाला

निज निज निज बाळा ||३||

पाडसे निजली

हम्मेच्या शेजारी पहुडली

दूध पाजविले

कपिलेने त्यांना रे निजविले 

तया ना झोपाळा

तरी ही ती शांत कशी झोपली

निज निज निज बाळा ||४||

जादुई दुलई

घेउनी तुज निजवायला आली

तव सखी परिराणी

झोकाळा देई तुज झुलवूनी

वाजवी ना वाळा

नीज अता मिटुनी घेई डोळा

निज निज निज बाळा ||५||

शांत तरूतळा

विसावुनी पाचोळा ही निजला

वारा ही शमला

सैरभरा घोंगावूनी थकला

शिणविसी का डोळा

झुलवीते तुज देउनी हिंदोळा

निज निज निज बाळा ||६||

हे कुलभूषणा

नाव करी दिगंत दाही दिशांना

तव रूप छान

आम्हाला तुझा किती अभिमान

तू अमुचा जीव

श्रीराम कृष्णसखा तू देव

निज निज निज बाळा ||७||

 – डॉ. निशिकान्त श्रोत्री

अंगाई…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे 

निज निज निज बाळा

पाळणा तुजसाठी झुलविला

करी गाई गाई

तव आई गाई तुज अंगाई

निज निज निज बाळा ||ध्रु||

अरे सोनुल्या, माझ्या बाळा, आता गाई गाई कर. शांत झोपी जा. तुझ्यासाठी मी पाळणा झुलवीते आहे. मी तुझी आई तुला अंगाई गाते आहे. आता गाई गाई कर. अगदी मृदू आवाजात आई आपल्या तान्हुल्याला हे म्हणते आहे. या शब्दांमध्ये निज निज, आई, गाई, अंगाई या शब्दांमध्ये छान अनुप्रास साधल्याने या अंगाईला छान लय प्राप्त झाली आहे.

खेळ किती रंगे

चिऊ काऊ भू भू माऊ संगे

रांगशी दुडूदुडू

सवंगडी सारे ते प्रेमाने

तुजवरती जीव

थकलासी लाव पापणी डोळा

निज निज निज बाळा ||१||

अरे छकुल्या, चिऊ, काऊ, माऊ, भू भू हे तुझे सवंगडी आहेत. त्यांच्याबरोबर तुझे खेळ किती रंगतात. तुझे हे खेळगडी पण तुझ्यावर किती माया करतात. त्यांच्याशी खेळताना तू घरभर कसा दुडूदुडू रांगत असतोस. खेळून खेळून तू आता दमला आहेस. तेव्हा आता तुझ्या पापण्या मिटू देत. आता छान गाई गाई कर.

बाळाचे जेवण तर चिऊ-काऊ शिवाय होतच नाही. आजूबाजूला पळणाऱ्या माऊ, भू भू बरोबर बाळ पण भरभर रांगत असते. अगदी बालवयापासून या प्राणी मित्रांशी त्याचे मैत्र जुळत जाते. इथे वापरलेल्या ‘दुडूदुडू’ शब्दाने रांगणारे बाळ आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागते. चिऊ, काऊ, माऊ, भू भू हे शब्द बालकांच्या बोलीभाषेत आहेत.बाळाच्या बोबड्या बोलीत ते शब्द आणखीनच मोहक वाटतात. या शब्दात साधलेला अनुप्रास शब्दांची रंगत आणखीन वाढवतो.

ज्योती त्या विझल्या

निरांजनी शांतवुनीया गेल्या

तुजला लडिवाळा

निजवाया येई मिट्ट काजोळा

मनमोहन बाळा

निद्रेचा सगळा का धांडोळा

निज निज निज बाळा ||२||

अरे माझ्या सोन्या, त्या निरांजनातल्या वाती सुद्धा आता शांत होत विझल्या आहेत. अरे आता तुला झोपवायला मिट्ट काळोख आलेला आहे बघ. तरी सुद्धा न झोपता का एवढी झोपेची वाट बघतोस ? आता शहाण्यासारखा झोपी जा.

इथे काजोळा, धांडोळा या थोड्या अपरिचित शब्दांनी छान स्वरयमक जुळले आहे.इथेही लडिवाळा, बाळा, सगळा, धांडोळा, काजोळा यामधे सुंदर अनुप्रास साधलेला आहे.

चांदोबा आला

घेउनिया तारका नि चांदण्या

चांदणे तुजला

अंगाई गाई निजवायला

डोळा पेंगुळला

मिटुनिया पापणीच्या पंखाला

निज निज निज बाळा ||३||

अरे बघ, तो आकाशीचा चांदोबा तारका आणि चांदण्या घेऊन आला आहे. त्याचे हे चांदणे तुला निजवायला अंगाई गाते आहे. तुझे डोळे सुद्धा पेंगुळले आहेत. बाळा आता पापण्यांचे पंख मिटू देत. आता गाई गाई कर.

इथे गोष्टीतून, गाण्यातून ओळख झालेला चांदोमामा आणि त्याच्या चांदण्या बाळाच्या भेटीला येतात.इथेही छान अनुप्रास साधलेला आहे.

पाडसे निजली

हम्मेच्या शेजारी पहुडली

दूध पाजविले

कपिलेने त्यांना रे निजविले

तया ना झोपाळा

तरी ही ती शांत कशी झोपली

निज निज निज बाळा ||४||

अरे सोनुल्या, गाईची वासरं सुद्धा शहाण्या बाळासारखी तिच्या शेजारी झोपली आहेत. या कपिलेने त्यांना दूध पाजवून झोपविले आहे. त्यांच्यासाठी झोपाळा पण नाही. तरी सुद्धा बघ त्यांना कशी शांत झोप लागली आहे. मी तर तुला झोका देते आहे. तू पण आता शांत झोप.

आता इथे बाळाची समज वाढल्याने हम्मा आणि तिचे बाळ वासरू त्याचे दोस्त झालेले आहेत.

जादुई दुलई

घेउनी तुज निजवायला आली

तव सखी परिराणी

झोकाळा देई तुज झुलवूनी

वाजवी ना वाळा

नीज अता मिटुनी घेई डोळा

निज निज निज बाळा ||५||

अरे तुझी मैत्रीण ती परी राणी आहे ना ती तुझ्यासाठी जादूची दुलई घेऊन आली. तू झोपावंस म्हणून ती पण तुला झोका देते आहे. तेव्हा आता पायाचा चाळा थांबव. वाळा वाजवू नकोस. आता पटकन डोळे मिटून घे आणि शांत झोपी जा.

आता  इथे गोष्टीतली परी राणी बाळाला भेटायला येते. त्याला झोका देऊन झुलवीते  सुध्दा. झोकाळा, वाळा, डोळा, बाळा यात छान अनुप्रास साधला आहे त्यामुळे कवितेची लय आणखीन वाढली आहे.

शांत तरूतळा

विसावुनी पाचोळा ही निजला

वारा ही शमला

सैरभरा घोंगावूनी थकला

शिणविसी का डोळा

झुलवीते तुझ देउनी हिंदोळा

निज निज निज बाळा ||६||

रात्रीच्या शांत वेळी शांत असणाऱ्या झाडाखाली पडलेला पाचोळा सुद्धा शांतपणे निजला आहे. सगळीकडे सैरावैरा घोंगावत धावल्यामुळे वारा सुद्धा खूप थकून आता शांत झाला आहे. मग तूच अजून का जागा आहेस ? मी तुला झोका देत जोजवते आहे. आता शांत झोप.

बाळ आता आजुबाजूच्या निसर्गात रमायला लागते. त्यामुळे झाडे, वारा त्याला समजायला लागतात हे इथे लक्षात येते.

 हे कुलभूषणा

 नाव करी दिगंत दाही दिशांना

 तव रूप छान

आम्हाला तुझा किती अभिमान

तू अमुचा जीव

श्रीराम कृष्णसखा तू देव

निज निज निज बाळा ||७||

अरे सोनुल्या, तू आमच्या कुळाचे भूषण आहेस‌. तुझ्या गुणांनी, कर्तृत्वाने दाही दिशांत तुझे नाव होऊ दे. तुझे रुप हे खूप देखणे आहे. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. कारण तू आमचा जीव की प्राण आहेस. बाळा तू जणू श्रीराम श्रीकृष्णाचे गोजिरे बाळरूपडे आहेस. आता शांतपणे झोपी जा.

इथे गोष्टीतले राम-कृष्ण बाळाच्या भेटीला येतात. बाळ जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याचे विश्व विस्तारत जाते. त्याच्या बालविश्वात हळूहळू परिसरातले सगळे प्राणी, पक्षी, गोष्टीतली पात्रे, आजुबाजूची माणसे बदलत जातात. अंगाईच्या प्रत्येक कडव्यात त्याचा छान उल्लेख आला आहे.

या अंगाई गीतात बाळाला झोपवताना आईच्या मनातील कोमल भावना अचूक शब्दात उत्कटपणे व्यक्त झाल्या आहेत. या भावपूर्ण रचनेतील कवीचे शब्दसामर्थ्य प्रभावी आहे.

कवितेत बहुतेक  सर्व कडव्यात छान अनुप्रास साधलेला आहे. त्यामुळे कवितेची विशिष्ट लय वाढलेली आहे आणि कवितेला नैसर्गिक स्वरूमाधुर्य प्राप्त झालेले आहे. यामुळेच बाळाला आपोआप गुंगी येऊन झोप लागते.

चांदोबा तारका घेऊन आला, चांदणे अंगाई गाते, परी राणी झोका देते, पाचोळा निजला, वारा थकला या वाक्यरचनेत चेतनागुणोक्ती अलंकाराचा छान उपयोग केलेला आहे. त्यामुळे ही सर्व पात्रे गीतामध्ये जिवंत होऊन सामोरी येतात आणि या गीताची रंगत आणखीनच वाढते.

झोपताना शांत झालेले बाळ जास्त संवेदनशील झालेले असते, तशीच बाळाला झोपवणारी आई जास्तच भावनाप्रधान झालेली असते. तिच्या सर्व कोमल भावना उचंबळून येतात. अंगाईतून ती बाळाला आजूबाजूचा निसर्ग, प्राणी, पक्षी यांची माहिती, अगदी स्वतःची ओळख पण सांगते. बाळाच्या मनात ते सर्व कुठेतरी नोंदले जाते. बाळ यातून आईचा आवाज, स्पर्श ओळखायला शिकते. सर्व गोष्टी ओळखायला लागते. शेवटी त्याला देवाच्या बाळरूपात बघणारी आई आपल्या तान्हुल्याचे मोठे झाल्यावरचे, त्याच्या यशाचे, कर्तृत्वाचे स्वप्न बघायला लागते.

या सर्व तरल भावना या कवितेत उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेल्या आहेत. हळव्या मातृ हृदयाचे भावपूर्ण हुंकार अतिशय उत्कटपणे मांडणारी ही डॉ.श्रोत्री यांची भावमधुर अशी अंगाई आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊस अंगणातला… पाऊस मनातला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ पाऊस अंगणातला… पाऊस मनातला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

3     विविधा :

पाऊस  अंगणातला, पाऊस  मनातला

अर्चना देशपांडे

पाऊस अंगणातला….. पाऊस मनातला

व्हाट्सअप वर एक छान संवाद वाचण्यात आला पावसाबरोबरचा. एक माणूस पावसाला विचारतो “पावसा पावसा तुझे वय काय?”पावसाने छान उत्तर दिलं” जर तू पावसात नाचत असशील तर माझे वय दहा वर्षे, जर कविता करत असशील तर माझे वय 18 वर्षे जर तुला ट्रेकिंगला जावेसे वाटत असेल तर 24 वर्षे जर तुला बायकोला मोगऱ्याचा गजरा घ्यावासा वाटेल असेल तर मी तीस वर्षाचा” स्मित हास्य करत पाऊस म्हणाला. तू जसा अनुभवशील तेच माझे वय असेल.

पाऊस म्हटले की पावसाची विविध रूपे डोळ्यापुढे येतात , मृग नक्षत्रातला पहिला पाऊस आपल्याला आनंद देतो. पहिल्या पावसाने येणारा मृदगंध चित्तवृत्ती उल्हसित करतो. आषाढात संत धार तर श्रावणात पावसाची एक सर तर पुढल्या क्षणी ऊन, यावेळी पडलेले इंद्रधनुष्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते ,काही वेळा अतिवृष्टी होऊन माळीन सारख्या गावाचे होत्याचे नव्हते तेव्हा मात्र जीव हळहळतो.

प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या कारणासाठी पाऊस आवडत असतो.

काहींना तो रोमँटिक वाटतो तर शेतकऱ्याला तो अमृतधारा वाटतो.

तसे पाहता प्रत्येकाला पाऊस आवडतो .बालपणात तर मुलांना पावसात भिजायला आवडते, साठलेल्या पाण्यात उड्या मारून इतरांच्या अंगावर पाणी उडवण्यात मजा वाटते मग आपले बूट पायमोजे ओले झाले तरी त्याचे भान नसते .कागदाच्या होड्या करून डबकातल्या पाण्यात सोडण्यात त्यांना आनंद मिळतो.

वय वाढत जाईल तसं पावसाचा आनंद वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतो .धो धो पावसात मित्राबरोबर भिजत आईस्क्रीम खाण्यात मस्त वाटतं, पावसात भिजून आल्यावर उबदार कपडे घालून गरम गरम भजी खाताना तर आनंद द्विगुणीत होतो .वर्षा सहलीत भिजताना तर वेगळीच अनुभूती मिळते. आपल्या थेंबाने चातकाची भूक भागवणारा ,मयूराला नाच करायचा उद्युक्त करणारा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो .अंगणात पाणी साचलं की छान वाटतं .अंगणातल्या झाडं वेली नाहू-माखू.  घातलेल्या लेकरासारख्या टवटवीत दिसतात. पक्षी कुडकुडत वळसणीची जागा शोधतात. पावसाने तुडुंब भरून वाहणारे नदी नाले पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. पावसाची जातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या झोपडीत पाणी गळत असले तरी पीक हाती येणार या विचाराने तो सुखावतो तर असा हा पाऊस सृष्टीला हिरवा शालू नेसवणारा ,धरणी मातेला सृजनाचं समाधान देणारा ,प्रत्येकाची तृष्णा भागावणारा असतो.

पण मनातल्या पावसाचे काय? मनातला पाऊस सतत चालूच असतो. तो कधी ढग होऊन बरसतो तर कधी मनातल्या मनात विरून जातो. पण जेव्हा इशाळ वाडीतील पावसाची कहाणी ऐकली तेव्हा मनातला पाऊस मूकपणे नयनातील…पाऊस ठरला. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधाऱा अशाच असतात, पावसाच्या    ‌ व यासारख्या. कधी लहानपणी हट्टाचे ,रडू,तर कधी टोचणाऱ्या शब्दांनी दुखावलेली कळ तर कधी कौतुकाने आलेले आनंदाश्रू तर कधी विरहाच्या दुःखाने घशात दाटलेला आवंढा. मनातला पाऊस माणसापासून सुरू होणारा आणि माणसापाशी संपणारा असतो.तो मायेच्या माणसाकडे व्यक्त होतो. कधी पावसाच्या पाण्याला पूर येतो तर कधी मनात आठवणींचा पूर येतो.मनात मायेचा ओलावा नाही आणि डोळ्यात अश्रू नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या लोकांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. सध्या एकूण १०० सेवेकरी या टीममध्ये आहेत.

या महिन्यातही खराटा पलटणच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

रस्त्यावर वृद्ध याचक पावसात भिजत आहेत, त्यांना रेनकोट देणे गरजेचे आहे…. परंतु सरसकट हे रेनकोट न वाटता, हे जिथे बसतात तिथली स्वच्छता यांच्याकडून करून घेऊन यांना सन्मानाने रेनकोट दिले आहेत. 

…. हे रेनकोट देताना मी त्यांना सांगितलं आहे की ही रेनकोट भीक म्हणून देत नाही, तुमच्या कष्टाची मजुरी म्हणून देत आहे. 

…. आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा “मजुरी” म्हणून द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

दोन पाच रुपये देऊन पुण्य मिळवण्याच्या मागे लागू नका, पुण्य इतके स्वस्त नाही…! दोन पाच रुपयात पुण्य विकत घ्यायची लोकांची सवय सुटली, तर भीक मागणाऱ्या लोकांची भीक मागण्याची सवय सुद्धा नक्की सुटेल…. ! माझं हे वाक्य कदाचित कोणालातरी बोचेल परंतु माझा नाईलाज आहे, सध्याची हीच वस्तुस्थिती आहे….!!! 

रस्त्यावर भिक्षेकरी दिसायला नको असतील, तर तुम्ही भीक देणे बंद करा !!! 

“एका दिवसात” हे होणार नाही….  परंतु “एके दिवशी” नक्की होईल… 

भीक नको बाई शिक

१. मागील दोन वर्षांची फी भरली नाही म्हणून शाळेने ऍडमिशन देण्यास नकार दिला..  या मुलीची दोन्ही वर्षांची फी भरून पुन्हा शाळेत तिला ऍडमिशन घेऊन दिले आहे. 

२. थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती असलेल्या आणखी अनेक मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य दिले आहे.  शाळा कॉलेजच्या फी भरून झाल्या आहेत. 

दुर्बल घटकातील अशाच आणखी ५२ मुली- मुलांना तुम्हा सर्वांच्या साथीने शैक्षणिक मदत करत आहोत… ! 

यातील आमच्या एका मुलाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये Bsc Computer Science, साठी मागील वर्षी प्रवेश घेऊन दिला, तो प्रथम वर्षात शिकत आहे, हेच मुळात विशेष… !!

आज रिझल्ट लागला आणि तो A+ ग्रेडने उत्तीर्ण झाला…! 

जिचे पालक भीक मागत आहेत, अशी मुलगी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (BBA) करत आहे.  ती सुद्धा A+ ग्रेडने उत्तीर्ण झाली…! 

आनंद व्यक्त करण्यासाठी खरंच माझ्याकडचे शब्द संपले… !!

त्यांचे पालक म्हणून आम्ही जे काही करत आहोत, त्याचे त्यांनी चीज केले… !!!

त्यांना आम्ही जी काही शैक्षणिक मदत केली, खरंतर ती तुम्हा सर्वांकडून आमच्यापर्यंत आली आहे… 

…. आपण सर्वजण त्यांचे आणि आमचे सुद्धा पालक झालात…  आणि म्हणून त्याचं हे यश आपल्या पदरात घालत आहे… 

…… आम्ही आपल्यापुढे नतमस्तक आहोत. 

भिक्षेकरी ते कष्टकरी

१.  भीक मागणारं संपूर्ण एक कुटुंब… कुटुंबातील प्रौढ महिला पूर्णतः अपंग. या ताईला नवीन व्हीलचेअर देऊन, या कुटुंबाला रस्त्यावर खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे.  

२.  अनेक वर्षे आजारी असणारी एक प्रौढ व्यक्ती …यांनाही या महिन्यात खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे. 

३.  पॅरालीसीस झालेली एक प्रौढ व्यक्ती… यांचा पूर्वी सायकल रिपेअरिंगचा व्यवसाय होता…. पुढे आयुष्याचं चाकच पंक्चर झालं…! ‘ मला सर्व साहित्य घेऊन द्या, मी मला जमेल तसं पुन्हा काम सुरु करतो ‘, – त्यांच्या या जिद्दीला सलाम करत सायकल रिपेअर करण्याचं सर्व साहित्य यांना घेऊन दिलं आहे. बाणेर रोड येथे हा व्यवसाय रस्त्यावर सुरू आहे…! एकदा त्यांची कर्मकहाणी सांगत असताना ते मला कळवळून म्हणाले होते,  ‘ माज्याच लोकांनी माजे पायओढले हो…! ‘ 

मी म्हणालो होतो, ‘ हरकत नाही बाबा, आपण आनंद यात मानायचा की,  पाय ओढण्यासाठी का होईना… पण शेवटी आपल्या पायापाशीच बसावं लागलं ना त्यांना… !’ 

– यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पाहून, नव्या दिवसाची सुरुवात करणारा, “सूर्योदय” वाटला मला तो चेहरा…. !!! 

घर देता का घर ?

रेनकोट आणि छत्री —- रस्त्यावर वृद्ध निराधार याचक पावसात भिजत आहेत यांना छत्री किंवा रेनकोट द्यावेत असं वाटलं. पण अशा सरसकट वाटण्याने आपला हात पुन्हा वर राहणार आणि त्यांचा हात खाली…. एकूण काय एक वेगळ्या प्रकारची भीकच ती… ! 

आणि मग ते जिथे बसतात त्या परिसराची स्वच्छता करवून घेऊन त्यांना चांगल्या क्वालिटीचे रेनकोट किंवा छत्र्या सन्मानाने देत आहोत. सफाई भी सम्मान भी….. यांना छत्री आणि रेनकोट ची “किंमत” नाही समजली तरी चालेल… परंतु देणाऱ्याच्या भावनेचं त्यांना “मोल” कळावं … 

…. हात फक्त भीक मागण्यासाठी नसतात, कष्ट करून सन्मानाने जगण्यासाठी असतात, हे बिंबवण्यासाठी आम्ही केलेला हा एक उपक्रम…. !!! 

मनातलं काही …. 

काम करणाऱ्या सर्वांना रेनकोट वाटून झाले…. एक रेनकोट मी स्वतःसाठी ठेवला…. पुढे गेल्यानंतर मला एकाने रेनकोट मागितला… मी मग माझाच रेनकोट त्याला दिला. यानंतर पुढील स्पॉटवर गेलो, तिथे एक व्यक्ती छत्र्या वाटत होती….  काम करत असताना धो धो पाऊस सुरू झाला…. माझा रेनकोट मी दुसऱ्याला दिल्यामुळे माझ्याकडे आता काहीही साधन नव्हते…. ! मी भिजलो…. माझ्याकडचे सर्व साहित्य भिजुन गेले …. ! 

तेवढ्यात एक भीक मागणारे वृद्ध आजोबा आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली आणि छत्री माझ्या हातात देऊन ते स्वतः तिथून भिजत निघाले…. ! 

मी त्यांच्या मागे जात म्हणालो, ‘ अहो, तुम्हाला मिळालेली छत्री तुम्ही मला कशाला देताय ? ठेवा तुम्ही….! ‘ 

ते बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘ मी भीजलो तर मी एकटाच भीजेल… पण तू भिजलास तर हजार लोक भिजतील… माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे…. !’ 

आभाळातल्या पावसाशी माझे अश्रू स्पर्धा करू लागले…. ! 

ती तारीख माझ्यासाठी खूप महत्त्वाची…..  कारण त्या दिवशी कोसळणाऱ्या आभाळाला थोपवणारा मला एक बाप मिळाला…. !!! 

प्रणाम…. !!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “31 जुलै…” – श्री संदीप वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ “31 जुलै…” – श्री संदीप वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

३१ जुलै १९९५ रोजी भारतातील मोबाईल सेवा सुरू झाली, या गोष्टीला २८ वर्षे पूर्ण झाली. 

आज जरी प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसत असला तरी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २४ टक्के लोकांकडे मोबाईल फोन आहे. तर एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के लोकच इंटरनेटचा वापर करत आहेत. 

ज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला, ही घटना ऐतिहासिक योगायोगाची. हा कॉल केला होता एका साम्यवादी नेत्याने. ज्योती बसू यांनी. ते तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्यामध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बिल्डींगमधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल फोन केला. 

भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी मोदी टेल्स्ट्रा (आताची स्पाईस) होती. त्याच्या सेवेचे नाव मोबाईल नेट असे होते. व यासाठी नोकिया-२११० हा हॅंडसेट वापरला गेला होता. त्यावेळी फ़क्त मूलभूत सुविधा असलेला मोबाईल तब्बल २५ ते ४५ हजारांना होता. देशातील पहिला मोबाईल कॉल याच नेटवर्कवरून करण्यात आला होता.  मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा यांच्या भागिदारीतून निर्माण झाली होती. तेव्हा देशात एकूण ८ कंपन्या होत्या ज्या सेल्युलर सेवा देत होत्या. 

अन्य देशांच्या तुलनेत भारतात मोबाईल सेवा अधिक लोकांपर्यंत पोहचण्यास वेळ लागला. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महाग कॉल दर होते.  सुरुवातीच्या काळात एका आऊटगोइंग कॉलसाठी प्रती मिनिटाला १६ रुपये मोजावे लागत.  आऊटगोईंग कॉल्स बरोबरच इनकमिंग कॉल्ससाठी देखील पैसे द्यावे लागत होते. 

जगाचा विचार केला तर पहिला मोबाईल कॉल मोटोरोलाचा कर्मचारी मार्टिन कुपर याने ३ एप्रिल १९७३ रोजी केला होता. भारतात मोबाईल फोन्स यायला ९०चे दशक उजाडावं लागलं होतं.

संदर्भ – इंटरनेट

लेखक : श्री संजीव वेलणकर

पुणे, मो ९४२२३०१७३३

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारतमातेस पत्र… 🇮🇳 ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

🌳 विविधा 🌳

☆ भारतमातेस पत्र… 🇮🇳 ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

हे भारत माते,

……. शि. सा. न. वि. वि.

आई तुझी आठवण नित्यनेमाने येते. तुझ्या पोटी जन्मलो आम्ही खूप भाग्यवान आहोत. रोज तुला नमन करूनच, आम्ही उद्योगाला सुरुवात करतो. चंदेरी मुकुट धारण केलेली निळसर झोपाळ्यावर, हिरवीगार पैठणी नेसलेली तू किती भारदस्त व मोहक दिसतेस.!! अवघ्या विश्वात शोभून दिसतेस.!!

तुझी लेकरे आम्ही सर्व भारतवासी सुखी, आनंदी व समाधानी आहोत. तू दिलेल्या संस्कृतीचा ठेवा जपताना आम्हाला खूप अभिमान वाटतो.तुझ्यामुळे आम्हाला जे निसर्गाचे वरदान लाभले आहे, ते आम्हाला समृद्ध करीत आहे. देवभूमी, रामायण, महाभारत, भगवद्गीता, संत महिमा यामुळे अवघ्या विश्वात तुझेच नाव श्रेष्ठत्वाने घेतले जाते. तू तर विश्व जननी शोभतेस.!!येथे तुझ्यामुळे निर्माण झालेले  दिव्य तेज, शांती, आनंद मनाला  तृप्तता देणारे आहे.

तुझ्याच प्रार्थनेत,  निर्माण होणाऱ्या संस्कारांमुळे आम्ही भारतवासी समृद्धीकडे वाटचाल करीत आहोत. तू निर्माण केलेल्या अन्नरसामुळेच आम्ही बलवान व सामर्थ्यवान झालो आहोत.देशवासीयांची देशभक्ती व बुद्धिमत्ता जगात सर्वांनाच अचंबित करते आहे.

तुझी रक्षा करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. व याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हेच तुला सांगावेसे वाटते.

आई ,आम्ही अथक प्रयत्नांती नित्य नवे सुयश संपादन करीत राहू. सर्व त्रुटींना संपुष्टात आणून, आम्ही सर्व क्षेत्रात विश्वविक्रम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहोत.

ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तूच आम्हाला बळ देतेस. इतिहासातील पाऊलखुणा आम्हाला सतत मार्गदर्शन करतात.

तुझे कृपाशीर्वाद सतत पाठीशी असावेत हीच नम्र विनंती.🙏

इकडील सर्व काही ठीक. काळजी नसावी.

(ता.क…. “वसुधैव कुटुंबकम्” हे मनावर ठसले आहे.)

           तुझ्याच सेवेत हरघडी

             आम्ही भारतवासी.

                   जयहिंद

👳‍♀️👲🏻👷🏻‍♂️🧕👮‍♀️👷‍♀️👱‍♂️👱‍♀️

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares