मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सहावी माळ) – मुक्ता ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सहावी माळ) – मुक्ता ☆ श्री संभाजी बबन गायके 

धृतराष्ट्र आंधळा म्हणून गांधारीने उसनं आणि राजस अंधत्व मिरवलं, तसं मुक्ताबाईंना करून चालणार नव्हतं. लेकीने बापाच्या घरी रहायचं नसतं, ती परक्याची अमानत असते हे तिने लहानपणापासून ऐकलं होतंच. त्यामुळे तिच्या बालमैत्रिणींसारखं तिचंही लग्न ठरलं तेव्हा तिला वेगळं असं काही वाटलं नाही. मात्र लग्नात घरात खूप आनंदी वातावरण असतं याचा अनुभव तिने मोठया बहिणींच्या लग्नात घेतला होताच. त्या बहिणी माहेरी आल्यावर तिकडचं जे वर्णन करायच्या ते मुक्ताबाईच्याही कानांवर यायचंच. माहेरवाशिणी आणि आईचा संवाद म्हणजे ओल्या काळजांचं एकमेकांना दिलेलं मऊ आलिंगनच असतं जणू. सासरच्या गोष्टींचा भला मोठा भारा बांधून आणलेला असतो लेकीने, त्यातील एक एक काडी ती उलगडत राहते अगदी मध्यरात्रीपर्यंत. उबदार गोधडीत आईच्या मऊ हातांवर डोकं ठेऊन तिच्याशी हितगुज करण्यातलं सुख इतर कुणाच्याही वाट्याला येणार नाही. या संभाषणात आईला तिचं स्वत:चं माहेर आठवत असतं. ती वरवर हं हं म्हणत असते आणि लेकीच्या कपाळावरून उजवा फिरवत फिरवत तिला थोपटत असते, तिला एखादा कानमंत्रही देत असते आणि जिवलग मैत्रीण असल्यागत मधूनच फिदीफिदी हसतही असते. मुक्ता पलीकडच्या गोधडीत शिरलेली असली तरी तिचे कान जागे असायचे.

मुक्ताला लग्नात नवरा मुलगा तसा स्पष्ट दिसलाच नव्हता. मुक्ता ठेंगणीशी आणि तो तिच्यापेक्षा जवळजवळ दुपटीने उंच. भटजींनी अंतरपाट दूर केल्यावर तर लज्जेने त्याच्याकडे पाहणे झालेच नाही. हार घालतानाही थोडी नजर वर केली पण जुन्या जमान्यातल्या कागदी झिरमुळ्यांचं बाशिंग…नवरदेवाचं कपाळ मात्र उठून दिसलं. आणि तासाभरात व-हाडाच्या बैलगाड्या घुंगरं वाजवीत निघाल्या.

मुक्ता एकूणात तिसरी मुलगी. आधीच्याच लग्नातली आचा-याची, मांडववाल्याची देणी अजून बाकी होती.  त्यातच नात्यातल्या एकाने मुक्तासाठी त्याच्या दूरच्या नात्यातलं एक स्थळ सुचवलं. नवरदेवाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय, वर्षात लग्न नाही केलं तर पुढे आणखी तीन वर्षे थांबावं लागेल, म्हणून त्यांना घाई आहे. खातंपितं शेतक-याचं घर आहे, मोठं खटलं आहे. मुक्ता संपादून जाईल त्या घरात. सांगणा-याने काही तपशील वगळून तर काही पदरचा घालून त्या स्थळाचं वर्णन केलं. आणि मुक्ताच्या वडिलांनी या स्थळामध्ये डोकं देण्याचं मनावर घेतलं. आणखी एक वावर विकलं तरी फारसं बिघडणार नव्हतं. कारण एकच लेक होता. मुक्ताच्या पाठीवर असलेल्या मुलाच्या लग्नात नाहीतरी सर्व वसुली करण्याची संधी मिळणार होतीच.

सकाळी सुपारी खेळण्याच्या वेळी मुक्ताने नव-याकडे पाहिलं आणि ती पहातच राहिली. नवरा मुलगा मात्र तिच्याकडे डोळे बारीक करून पहात हसतोय असं तिला वाटलं. तेवढ्यात मुक्ताला समोरच्या हळदी-कुंकवाच्या पाण्याने भरलेल्या ताटात अंगठी हाताला लागली. हा खेळ मुक्ता जिंकली होती….पण जिंकण्याचा आनंद तिला तसा झालाच नाही. महिपती नाव होतं नव-याचं. मैत्रिणींनी सांगून ठेवलेल्या उखाण्यांपैकी मुक्ताला एकही उखाणा आठवला नाही .. किंवा तिला आठवायचा नव्हता ! तिने कसाबसा एक साधा उखाणा घेतला. पण या उखाण्यात महिपतीरावांच्या नावाआधी आईवडिलांचा मान राखण्यासाठी मी हा विवाह केला आहे,असा आशय व्यक्त करायला ती विसरली नाही… ‘ चांदीच्या ताटात मोहरा आणि माणिक मोती…माहेरची लाज सारी लेकीच्या हाती…महिपतराव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती ! ‘

दुस-या दिवशी नव-यामुलीची पहिल्यांदा माहेरी पाठवणी झाली. रात्री आईच्या गोधडीत शिरलेल्या मुक्ताला तिला काहीही सांगावंसं वाटलं नाही. गोधडीतला अंधार तिला जास्त जवळचा वाटू लागला होता. दोन दिवसांनी मुक्ताला सासरी पाठवताना वडिलांनी मुक्ताला घट्ट जवळ घेतलं…पोरी महिपतराव डोळ्यांनी अधू आहेत…आंधळे नाहीत. देवभोळा साधा माणूस आहे. तू त्याचे डोळे हो ! मुक्ता बैलगाडीत बसली तेव्हा वडील हात हलवत होते..  पण त्यांचे पाण्याने भरलेले डोळे खाली पहात होते.

संसार सुरू झाला. पहिला मुलगा होईपर्यंत मुक्ताबाई आणि महिपतीरावांचा उघड संवाद झालाच नाही…त्याकाळी असं होणं अगदी सर्वमान्य होतं. जाऊबाईंना आपल्या अशा दीराला इतकी नीटस बायको मिळाली याचा आनंद कमी आणि हेवा अधिक वाटत होता. महिपतराव नजर अधू असूनही वाचणारे होते. कागदाला जवळजवळ पापण्यांचा स्पर्श होईल इतक्या जवळ त्यांना कागद धरावा लागायचा. पण वाचनाचा कंटाळा अजिबात नव्हता. मुक्ताबाईंनी माहेरी अभ्यासाचा कंटाळाच केला होता तसा. इथं महिपतराव मुक्ताबाईंची शाळा झाले.

महिपतरावांकडे शेतीतल्या काबाडकष्टांचा जणू मक्ताच दिला होता थोरल्याने. याचं काही लग्नं होणार नाही, त्यामुळे आपल्या मुलाला आपल्या माघारी मिळणार असलेल्या जमिनीत कुणी वाटेकरी नसणार हे तो गृहीत धरून चालला होता. सारा रोखीचा व्यवहार त्याच्याकडेच आणि घरातल्या किल्ल्यांचा जुडगा त्याच्या बायकोकडे.

मुक्ताबाई पुढे पुढे धीट झाल्या. व्यवहारात लक्ष घालू लागल्या. नवरा बैलगाडी घेऊन निघाला की कासरा आपल्या हाती धरू लागल्या…बैलगाडी गाववाल्यांच्या नजरेच्या टप्प्यापलीकडे गेल्यावर. महिपतरावांची नजर हळूहळू धूसर होत जाणार होती. दैवाने त्यांच्यासाठी मुक्ताबाईंचे दोन सुंदर, टपोरे डोळे पाठवून दिले होते. आणि आता तर हे डोळे अक्षरं वाचू लागले होते.

नावाचा महिमा असेल कदाचित, पण महिपतरावांच्या तशा तापट स्वभावावर त्यांनी प्रेमाने फुंकर घातली होती. आंधळा म्हणून हिणवणारा गाव, व्यवहारात फसवणारा थोरला भाऊ, यांच्याबद्द्ल असणारी नाराजी महिपतरावांच्या शब्दांतून आणि कधी कधी कृतीतूनही व्यक्त होई. पण मुक्ताबाईंनी त्या क्रोधाला संयमाची झालर लावून टाकली.

बापजाद्यांपासून चालत आलेल्या जमिनीच्या वादाच्या न्यायालयीन खटल्यांना कित्येक वर्षे लोटून गेली होती. निकाल काही लागत नव्हता. थोरले भाऊजी या बाबतीत तसे उदासीन होते. मुक्ताबाईंनी स्वयंपाकघरातून हळूहळू ओसरीवर प्रवेश मिळवला. कधी घरी सल्लामसलतीसाठी येणा-या वकिलांशी बोलण्याचं, त्यांना काही विचारण्याचं धाडस मिळवलं.

खटल्यातून यशस्वी माघार घेणं फायद्याचं आहे, असं सर्वांना पटवून दिलं. आणि वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या खटल्यातून सर्वांचीच सुटका केली. वाद तर चुलत घराशीच होता. ती मंडळीही मुक्ताची चाहती झाली. एकादशी, भजन करणारी, पहाटे उठून सडा रांगोळी घालणारी, तुळशीला पाणी घालणारी, जात्यावर दळण दळताना जनाबाई होणारी मुक्ता महिपतरावांच्या घराची लक्ष्मी झाली होती. मुक्ताबाईंना दोन मुलगे झाले. मुलगी हवी होती पण नाही पडली पदरात. मुलांची शिक्षणं व्यवस्थित होतील याकडे त्यांचं लक्ष असायचंच. थोरला शहरात नोकरीस लागला आणि धाकट्याने शेतीत लक्ष घातले. आता पैशांची कमतरता नव्हती. म्हणून गरजू आणि मुक्ताबाईंचं घर अशी जोडी ठरून गेली.

महिपतरावांची आई आणि मुक्ता जणू मैत्रिणीच बनल्या होत्या. म्हातारीची खूप सेवा केली मुक्ताबाईंनी. ‘माझ्या आंधळ्या लेकाचा संसार तुच कडेपतोर नेशील गं माझे बाये !’ असं म्हणून म्हातारी मुक्ताच्या गालांवरून हात फिरवायची आणि तिच्या स्वत:च्या डोक्याच्या उजव्या बाजूवर बोटं ठेवून कडाकडा मोडायची….हा आवाज मुक्ताला टाळ्यांच्या कडकडकटासारखा भासायचा. मुक्ताबाई माहेर तसं विसरूनच गेली होती.

महिपतरावांची दृष्टी आता जवळजवळ गेल्यातच जमा होती. अगदीच प्रयत्नांती त्यांना थोडंफार दिसायचं.  पण बाकी सर्व व्यवहार अंदाजेच. माळकरी असले तरी महिपतरावांना पंढरी काही घडली नव्हती. गावात होणाऱ्या कीर्तनांना, काकड्याला मात्र ते नियमित हजेरी लावत. अनेक अभंग त्यांना मुखोदगत होते. मुक्ताबाईंनाही त्यांनी विठूचा छंद लावला. सूरदास, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची चरित्रे मुक्ताबाईंना खूप जवळची वाटली.

एके दिवशी पंढरीला जायचा हट्टच धरला मुक्ताबाईंनी महिपतरावांपाशी, आणि त्यांनी मुलांना सांगून तशी व्यवस्थाही करवून घेतली. देवापुढे उभी राहिली ही जोडी तेव्हा तेथील रखवालदारांनीही घाई केली नाही..मुक्ताई महिपतरावांना आपल्या डोळ्यांनी देव दाखवत राहिल्या…देवाचिये द्वारी क्षणभर उभं राहून. चारी मुक्ती त्या साधू शकणार नव्हत्या…पण पदरी पडलेलं त्यांनी पवित्र मात्र करून घेतलं होतं.

आज महिपतराव आणि मुक्ताबाई हयात नाहीत. पण प्राप्त परिस्थितीमध्ये जीवनाला सामोरे जाण्याची जिद्द दाखवणाऱ्या मुक्ताबाई स्त्रीशक्तीचं प्रतीकच बनून राहिल्या ..  किमान त्या गावात तरी. नवरात्रात अशा द्विभुज देवींची आठवण येते, यात नवल नाही.

परिस्थितीमुळे, गरीबीमुळे, परंपरांमुळे असे संसार स्वीकारावे लागणाऱ्या अनेक मुक्ताबाई आधीच्या पिढीने अनुभवल्या आहेत. त्या लढाऊ दुर्गांना या सहाव्या माळेच्या निमित्ताने नमस्कार.

(लेखातील नावे काल्पनिक आहेत. आयुष्य मात्र खरे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चौकट आक्रसत चाललीय..” – लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “चौकट आक्रसत चाललीय..” – लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

माझ्या घराजवळच एक लॉन्ड्री आहे. एक 65 वर्षाच्या आजी ती लॉंड्री चालवतात. तशा त्या ‘वेल टू डू’ फॅमिलीतल्या आहेत.त्यांचा मुलगा  इंजिनिअर आहे. पण वेळ छान जावा आणि तब्येत व्यवस्थित रहावी म्हणून त्या काम करतात. आठवड्यातून दोनदा मी लॉन्ड्रीत जातो. बरेचदा आजींच्या मैत्रिणी तिथे गप्पा मारण्या साठी जमलेल्या असतात. कधी कधी आजींची नातवंडं सुद्धा तिथे खेळत असतात. खोड्या करतात, भांडतात. आजी सर्वांना मायेनं सांभाळून घेतात.

असाच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच छान नटून आलेला. कपाळावर अष्टगंधाचा टिळा, छान नवे कपडे. तीन चार वर्षांचा त्यांचा नातू, छान गोरा, गुटगुटीत अन् गोड. तो त्याच्या आजीला सांगत होता, “आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ.” आजीने विचारलं, “का रे, काय केलं त्या आजीनं तुला?”

तो: “काही नाही. असंच.”

आजीनं पुन्हा पुन्हा विचारलं, पण तो काही कारण सांगत नव्हता. त्याचं आपलं एकच पालुपद, “तू त्या आजीबरोबर नाही बोलायचं.” शेवटी आजी म्हणाल्या, “थांब मी त्यांना फोन करून बोलवून घेते अन विचारतेच, काय केलं आमच्या नातवाला म्हणून.”

मग नातू सांगू लागला, “मी त्यांच्या समोरुन दोनदा गेलो. तरी आजी मला ‘हॅपी बर्थडे’ म्हणाली नाही. तू नाही बोलायचं.” अच्छा! म्हणजे आजीनं ‘हॅपी बर्थडे’ म्हटलं नाही याचा त्याला राग आला होता तर.

मला आणि त्या आजींना, दोघांनाही हसू आवरेना. तरीही हसू आवरुन आजी म्हणाल्या, “अरे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्या आता म्हाताऱ्या झाल्यात. तू सांगायचं ना त्यांना, ‘आज माझा बर्थडे’ आहे म्हणून.”

नातू: “मग मागच्या महिन्यात दिदीचा कसा लक्षात आला त्यांच्या? त्यांनी मुद्दाम केलंय. तू त्यांच्याशी नाही बोलायचं आता.”

आजी: “बरं, जाऊ दे. नाही बोलत त्यांच्याशी.” नातू परत आपल्या खेळात रमला. मला गंमत वाटली. एवढ्याशा मुलाला सुध्दा किती इगो, मान – अपमान! मी त्याच्यापाशी गेलो, हात पुढे केला अन ‘हॅपी बर्थडे’ म्हणालो. त्याने हात पुढे केला आणि थँक्स म्हटलं.

तेवढ्यात आजी म्हणाल्या, “अरे काकांना नमस्कार कर.” पण त्याने ऐकलं नाही. आजीचं कपडे मोजणं चालू होतं. मी मग शेजारच्या दुकानातून एक कॅडबरी घेतली आणि त्याला दिली. त्याने ती पट्कन घेतली आणि चट्कन मला वाकून नमस्कार करुन तो पळून गेला.

गोष्ट छोटीशीच, पण मला खूप काही शिकवून गेली. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आज इगो आहे. ‘माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येकानं वागलं पाहिजे. अन्यथा मी त्याला माझ्या आयुष्याच्या चौकटीतून बाहेर काढणार! अथवा माझी चौकट आकसून घेणार. मी दुसऱ्याला सामावून घेण्यासाठी माझी चौकट मोठी करेन’ असं कोणीच म्हणायला तयार नाही.

परिणाम… आज प्रत्येकजण आपापली अरुंद चौकट घेऊन एकटाच जगतो आहे. नातेवाईकांमध्ये तेच, मित्रांमध्ये तेच, ऑफिसमध्ये तेच, समाजात तेच. स्वतःच्या मिळकतीवर अन हिमतीवर फाजील विश्वास असल्यानेच हे सगळं असं घडतंय. पूर्वी लोक एकमेकांवर अवलंबून होते तेच बरं होतं, असं म्हणायची वेळ आलीय. लाखोंच्या गर्दीतही माणूस एकटा पडलाय. पण इगो इतका झालाय, की त्याला तेही समजेनासे झालंय.

स्वार्थ तर इतक्या टोकाला गेलाय की आपला फायदा असल्याशिवाय कोणी कोणाला विचारतच नाही. जिथे फायदा दिसतो, तेथे लोटांगण घालतील. पण फायदा नसेल किंवा फायदा करून झाला असेल, तर ते तुमच्याकडे  पाहणार नाहीत. खरं तर आपण इतके वाईट कधीच नव्हतो. पण मग हे असं का व्हावं? नेमकं गणित कुठे बिघडलं अन आपली संस्कृती, संस्कार असे रसातळाला कसे गेले?

मला वाटतं, आपण पुन्हा नव्याने मुलांना ‘मी आणि माझा’ च्या पलीकडे पहायला शिकवलं पाहिजे. तेही आज आणि आत्ताच. अन्यथा परिस्थिती असहाय्यपणे बघत बसण्याखेरीज आपल्या हातात काही उरणार नाही एवढं खरं.

लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डब्यातील डबे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

☆ डब्यातील डबे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज सकाळी मसाल्याचा डबा घासायला काढला आणि त्याकडे बघतच राहिले.कारण आपली महिलांची सवय!डब्यावरचे नाव वाचले,विशेष म्हणजे बाहेरच्या डब्यावर व आतील छोट्या डबीवर नाव वेगळे.मग डब्याकडेच बघत बसले आणि हळूच आठवणीची एक पुडी सुटली.बाहेरचा डबा मैत्रिणीने दिलेला तर आतील छोटे डबे माझ्या जुन्या डब्यातील होते,जो डबा पूर्वी चिरल्यामुळे मोडीत काढला होता.मग लक्षात आले महिलांचा जीव कुठे कुठे अडकलेला असतो.

अगदी आजचे उदाहरण बघायचे झाले तर डबे घरात बघितले तर किती विविध प्रकारचे डबे सांभाळून ठेवलेले असतात.आई कडे असतो तो पर्यंत याचे महत्व लक्षात येत नाही. पण एकदा स्वतः च्या संसाराला सुरुवात झाली की या डब्यात जीव अडकणे सुरु होते.लग्नात आहेरात आलेले डबे अगदी कायमची सोबत करतात.विविध आकाराचे डबे अगदी व्यवस्थित लावून ठेवणे,दर महिन्याला घासून चकचकित ठेवणे.घासून मगच त्यात सामान भरणे.व्यवस्थित साहित्य सापडावे म्हणून त्यावर छान स्टिकर्स लावणे.अशी उत्तम गृहिणीची कामे सुरु होतात.आणि त्या कामाचे सर्वांकडून कौतुक पण होते.अर्थात लेबल असलेल्या डब्यात तोच पदार्थ असेल याची मात्र खात्री नसते.आणि कोणी शेंगदाणे कुठे आहेत? याच्या उत्तरा दाखल “आहेत ना तिथेच,रवा लिहिलेल्या डब्यात.” हे वाक्य ऐकू येते.काय करणार,तात्पुरती सोय केलेली असते.पण कोणाला समजणार?

काही मैत्रिणी तर डब्यांच्या समोर मुद्दाम सेल्फी काढून आपले वैभव दाखवत असतात.पूर्वी तर किचन मधील एक भिंत म्हणजे डब्यांची मांडणी असायची.आणि त्यात चढत्या किंवा उतरत्या डब्यांच्या उंचीच्या क्रमाने डबे लावलेले असायचे.जणू किचनचे वैभवच!

हळूहळू  हळदीकुंकू, मिळालेले आहेर,भेटवस्तू अशा प्रसंगातून छोट्या,मोठ्या,विविध आकाराच्या,रंगाच्या डब्यांची बहीण,भावंडे घरात येतात आणि ऐटीत जुन्या डब्यांच्या समोर किंवा डोक्यावर जाऊन बसतात.त्यात अगदी सध्याच्या पार्सल मध्ये येणारे डबे पण अपवाद नसतात.अगदी टाकून द्यावेसे वाटले तरी “असू दे, वेळेला उपयोगी पडतील.” असे म्हणून ठेवले जातात.इतके डबे असून एखादा डबा  आला नाही तर जीव हळहळतो.आणि दुकाना समोरून जाताना एखादा नवीन फॅशनचा डबा भुरळ घालतोच!

आणि हो आपला जीव अडकलेले डबे घरातल्यांच्या मात्र डोळ्यात खुपत असतात.मग मी एक युक्तीच केली आहे.एक बॉक्स घेऊन त्यात हे डबे छान ठेवले आहेत.काही दिवसांनी मात्र हे डबे त्यात मावत नाहीत.मग मी डबे एकात एक असे घालून जपून ठेवते.आणि छोट्या छोट्या डब्या मोठ्या डब्यांच्या पोटात लपून बसतात. अगदी कोणाची दृष्ट नको लागायला या तत्वाने!अजून एक गंमत सांगू का? हे झाले निवडक डब्यांचे अजून आठवणींचे डबे उघडलेच नाहीत.म्हणजे लहानपणीचे,आज्जीचे,कड्या कुलुपे असणारे,विविध घाटांचे ( आकार ).

आणि हो या डब्यांच्या  मध्ये यांच्या बहिणी बरण्या राहूनच गेल्या आहेत.बरण्यांची गोष्ट पुन्हा केव्हातरी!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

११/१०/२०२३

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवीचे नवरात्र … ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

देवीचे नवरात्र… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सध्या देवीचे नवरात्र बसले आहे… 

 ती देवी कशी आहे? 

केसापासून नखापर्यंत सर्वांग सुंदर अशी आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. विश्वाची स्वामीनी जगत जननी आहे. अशी ही सुंदरी कोमल शांत नाजूक आहे.

पण इतकच तिचं वर्णन नाही. ती अष्टभुजा आहे. गदा ,चक्र ,शंख, धनुष्यबाण ,शूल ,पाश ,खड्ग अशी अनेक शस्त्रे तिच्या हातात आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे .ती चंडिका आहे देवांनी ही तिची स्तुती केली आहे… अत्यंत शांत कोमल …. पण वेळप्रसंगी भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी ….आणि राक्षसांशी झुंझणारी आहे… अनेक दुष्ट राक्षसांना शासन करून तिने यमलोकात घाडलेले आहे.

या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता एक स्त्री म्हणून बघा….ती पण आपल्यासारखीच आहे…अशा या देवीचा अंश आपल्या ही शरीरात आहे. आपण तिची प्रार्थना करूया.

प्रार्थना करून झाली की आपण काहीतरी तिच्याकडे मागतो… तर विचार करा काय मागायचे? लौकिकात जे हवे आहे  ते आपले सगळे मागून झालेले आहे….

आता थोड वेगळं काही मागूया …. 

राक्षस म्हटलं की अती भयंकर क्रूर अक्राळ विक्राळ असं काहीसं रूप आपल्यासमोर येतं… .. पण लक्षात घ्या राक्षस ही एक वृत्ती आहे…..ती विचारात कृतीतही असू शकते… ते प्रचंड मोठेच असतात असं नाही पण मनाला त्रास देणारे असेही असतात…. काही बहुरूप्या सारखे वेष बदलून येतात. आपण त्यांच्याशी लढूया….

अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात… त्यासाठी देवी सहाय्य करेलच… पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे….. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत….

एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला पण अंगी सामर्थ्य यावं लागतं ते यायला हवं. .. .तो जोश यायलाच हवा….

शत्रूला भ्यायचं नाही तर त्याच्याशी सामना करायचा…  निकरानी आणि सर्व शक्तीनिशी लढायचं असं ती आपल्याला शिकवते….विजय मिळेपर्यंत झुंजायचं…

देवीचं गुणगान करा. ‘ श्री सूक्त ‘, ‘ देवी अथर्वशीर्ष ‘, ‘ सप्तशतीचा पाठ ‘,  हे सर्व काही करा…..आणि तिच्याकडे प्रार्थना करा …. 

“ हे देवी मला निर्भय कर सबल कर……” 

तसेच तिला आश्वासन द्या की “ मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन….” 

दोन भुजा असलेल्या अनेक जणी…. अष्टभुजा असल्यासारख्या अनेक गोष्टींसाठी लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत… त्यांच्याकडून प्रेरणा घेऊया…

आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच…

त्या मातृरूपेण संस्थिता अशा देवीला माझा नम्रपणे नमस्कार.

आईसाहेब काय सांगत आहेत ते लक्षात ठेवा.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (पाचवी माळ) – पंगत ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (पाचवी माळ) – पंगत ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लग्नाच्या पंगतीत आज तिने केटरींगवाल्याच्या मागे लागून मसालेभात वाढण्याचं काम मिळवलं. एरव्ही कायम आचाऱ्यासमोर बसून भाज्या चिरून देण्याच्या, काकड्या खिसून देण्याच्या, पु-या लाटून देण्याच्या कामाला ती वैतागली होती. पंगतीत सुंदर सुंदर साड्या, दागदागिने घालून बसलेल्या आणि झकपक मेकअप करून बसलेल्या बायका -मुली तिला बघायच्या होत्या. झालंच तर नवरा-नवरीचं ताट वाढायला मिळालं तर चार दहा रुपये बक्षिसीही पदरात पडण्याची शक्यता होतीच. शिवाय वाढप्यांसाठी असणारा बऱ्यापैकी नीटनेटका ड्रेस घालण्याची संधी तर होतीच होती.

आचा-याच्या हाताखाली अल्पवयीन मुलांना काम करण्यास तसेही कायदा नाही म्हणतो. पण त्याचं हे नाही म्हणणं कुणाच्या कानांवर जात नाही सहसा. आणि भुकेच्या आवाजापुढे अन्य सर्व आवाज क्षीण पडतात. आपल्या ताटांमध्ये आलेले जिन्नस कुणाकुणाच्या कष्टांच्या निखाऱ्यांवरून आलेले आहेत, हे माहित करून घेण्याची गरज लक्षातही येणार नाही अशीच आहे. कुणी काही म्हटलंच तर ‘ ही लहान मुलगी त्या आज्जींची नात आहे, आज त्यांना बरं नाही म्हणून मदतीला आली आहे,’ असं सांगून वेळ मारून न्यायला केटरींगवाल्यांना जमतेच.

भांड्यांच्या टेम्पोत दाटीवाटीनं बसायचं, कामाच्या ठिकाणी जायचं आणि सगळी तयारी होण्याआधी आचा-याने घाईघाईने आणि काहीशा नाखुशीने बनवलेला सांबार भात भराभरा खाऊन मोकळं व्हायचं. आता सर्व उरकल्यावरच हातातोंडाची गाठ पडणार. त्यात निघताना प्रत्येकाचीच घाई. स्वयंपाकातील उरलेले पदार्थ खाऊन खाऊन त्यांचा कंटाळा आलेला असतो, पण घरी न्यावेच लागतात…घरात त्या अन्नाची वाट पाहणारी काही उपाशी पोटं असतात.

रोशनी आठवी इयत्तेत जाऊन शिकण्याचा प्रयत्न करते. चार सोसायट्यांमध्ये धुणी-भांडे करून घर चालवणारी आई आणि तीन भावंडं आहेत. रोशनी सर्वांत थोरली म्हणून तिची जबाबदारीसुद्धा थोरलीच. वडील वस्तीतील दुस-यांची मारामारी सोडवायला गेलेले असताना जीवाला मुकलेले. वस्तीतली झोपडी भाड्याने घेतलेली. भाडं थकलं की दुसरी झोपडी बघायला लागण्याच्या भीतीने, जे पैसे येतील ते भाड्याच्या रकमेसाठी बाजूला ठेवणं क्रमप्राप्तच होते. रोशनी केटरींगच्या कामाला जाते हे शाळेत तिने माहित होऊ दिले नव्हते. कामाच्या ठिकाणाहून रात्री आणलेले पदार्थ ती डब्याला घेऊन जात नसे. परंतु मेजवान्या रोज रोज थोड्याच असतात? आणि असल्या तरी त्या आपल्या कंत्राटदाराला मिळायला पाहिजेत, आणि कंत्राटदाराने आपल्याला कामाला नेलं तर पाहिजे !

चांगल्याचुंगल्या पदार्थांवरून मात्र रोशनीचं मन उडालं होतं. केटरिंगवाला उरलेले पदार्थ वाढप्यांत वाटून द्यायचा. खास चवदार बनवलेलं, भरपूर तेल-तूप, मसाला घातलेलं ..  ते रोशनीच्या घरी एरव्ही येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि हे अन्न नेहमी नेहमी घरी नेलं तर घरच्यांना त्याची सवय लागेल आणि नेहमीच्या खाण्याकडे वाकड्या तोंडाने बघितलं जाईल, हे रोशनीला माहित होतं. त्यामुळे ती सहसा उरलेलं अन्न घरी घेऊन जायचीच नाही. कधीकधी चार गुलाबजाम, जिलेबी असं काहीबाही मात्र न्यायची..  इतर वाढप्यांनी फारच आग्रह केला तर.

रोशनीला हे काम आवडायचं नाही मनातून. लोकांनी जेवून ठेवलेली ताटं, त्यांच्या नटून थटून आलेल्या, हास्यकल्लोळ सुरू असलेल्या गर्दीतून घेऊन जायची, खरकट्या वाट्या, चमचे ड्रमातून वेचून काढायच्या आणि धुवायला बसायचं हे नको वाटायचं. शिवाय गर्दीतल्या कुणाकडे चोरट्या नजरेने पाहून घ्यायचं. कुणाला धक्का लागता कामा नये. पंगतीत एखादी शाळेतली भेटली म्हणजे? पोटात गोळा यायचा. पण रिकाम्या पोटात आलेला गोळाही भुकेला असायचा.

“ रोशनी, अगं चाल पटापट पुढं. ही आख्खी लाईन वाढून व्हायचीय अजून.”  असं केटरींगवाल्यानं टाळी वाजवून म्हणताच रोशनीने हातातील मसालाभाताचं भांडं एका हातावर पेलत पेलत काळजीपूर्वक वाढायला सुरुवात केली. सवय नव्हती…वेळ लागत होता…वाढून न झालेल्या पानांवर बसलेली मंडळी हात आखडून घेऊन बसली होती. ‘वदनी कवळ घेता‘ म्हणायची प्रतीक्षा करणारी अनुभवी मंडळी…’आवरा लवकर’ म्हणत रोशनीच्या वेगात आणखीनच व्यत्यय आणत होती.

निम्मी पंगत वाढून झाल्यावर का कुणास ठाऊक रोशनी थबकली. तिने भाताचं भांडं टेबलावरच ठेवलं आणि दुस-या वाढप्याला नजरेनेच इशारा केला आणि ती मागच्या मागे आचा-याच्या खोलीकडे जवळजवळ पळतच गेली. त्याने विचारले…” काय गं? काय झालं? “ त्यावर रोशनी म्हणाली, “ काय नाही…हात भाजायला लागला गरम भातानं.”  त्यावर तो म्हणाला…” तुला तर मोठी हौसच नाही का वाढपी व्हायची. एवढासा जीव तुझा…चालली वाढायला !”

आणखी काही पंगती झाल्या. लोक हात धुवायला नळापाशी गेले. नवरा-नवरीची पानंही वाढून झाली. त्यांच्या पानांभोवती फुलांची सजावट. त्यांना वाढणा-यांना नवरीमुलीकडच्या लोकांनी खुशीने काही रुपये दिले. रोशनीला मिळू शकले असते त्यातले काही, पण ती तिथं नव्हती. मेजवानी आटोपायच्या शेवटच्या टप्प्यात वाढपे, आचारी, त्यांच्या सोबतच्या माणसांची पंगत हॉलमधल्या अगदी कोप-यातल्या साध्या टेबलवर बसली. रोशनीचं लक्ष काही जेवणात लागणार नव्हतं. त्यांच्यातलाच एक जण सर्वांना जेवण वाढत होता. तितक्यात किचनमधून मसालेभाताचं पातेलं घेऊन मिरजकर बाई आल्या आणि त्यांनी पहिल्यांदा रोशनीला भात वाढला. बाईंना बघून रोशनी गडबडून गेली. बाईंनी इतरांनाही भात वाढला आणि त्या बाहेर जाऊन थांबल्या. केटररसाठी ही गोष्ट नवी होती…लग्नघरच्या मंडळींपैकीच कुणी तरी मोठ्या मनाच्या बाई असाव्यात, असं सर्वांना वाटून गेलं. रोशनीनं पटापटा चार घास गिळले आणि ती लगबगीनं बाई जिथं बसल्या होत्या तिथे त्यांच्यापाशी जाऊन उभी राहिली.

“ कामाची कसली लाज बाळगायची, रोशनी? तू मला पंगतीत बसलेले पाहूनच मागे फिरलीस ना? ” बाईंच्या या प्रश्नावर, एरव्ही वर्गात पटापट उत्तरे सांगणारी रोशनी आता मात्र शांत आणि मान खाली घालून उभी होती. तिच्या मागोमाग केटरींगवाला आला…म्हणू लागला…” काही चुकलं असंल मॅडम तर सॉरी म्हणतो. पुन्हा नाही मी लहान पोरींना कामावर लावणार !”

“अहो, तसं काही नाही हो दादा. ही रोशनी माझ्या वर्गात आहे. उलट मी तिचं कौतुकच करायला तिला बाजूला घेऊन आलीये. तुम्ही जा तुमच्या कामाला ! “ त्या दोघींकडे एकवार कटाक्ष टाकून तो बिचारा निघाला.

“ रोशनी, ठीक आहे. तुझी घरची परिस्थिती अशी आहे की तुला कोणतं न कोणतं काम हे करायलाच लागेल. तुला आवडत नसलं तरी. पण मग मिळालेलं काम आवडून घेतलंस तर सोपं होऊन जाईल, नाही का? ”

“ हो,मॅडम. स्वयंपाक करायला आवडतं मला. वेगवेगळ्या रेसिपी बनवून बघायला मज्जा येते. माझे पोहे, उपीट सगळ्यांनाच आवडतं ” रोशनी उत्तरली.

“ हो तर, स्वयंपाक तर आलाच पाहिजे प्रत्येकाला !” बाईंच्या या बोलण्यावर रोशनी गोड हसली.

“ पण हे असं वाढप्याचं काम किती दिवस करणार आहेस गं तू?” या प्रश्नावर मात्र ती गडबडून गेली.

“ माहित नाही बाई. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत तर करावंच लागेल !”तिने सांगितले.

बाई म्हणाल्या, ” हे बघ, आवडीच्या क्षेत्रात करीअर करायच्या खूप संधी आहेत आजकाल. तू केटरींगमध्ये जरी नीट लक्ष घातलंस ना तरी खूप चांगले पैसे मिळवू शकशील. पण आधी शिक्षण नीट पूर्ण कर बाई !” 

बाईंनी तास सुरू केला. त्या नेहमीच मुलींना भविष्याची स्वप्नं दाखवयच्या. त्या स्वत:सुद्धा गरीबीतून शिकल्या होत्या. त्यांच्या आई खानावळ चालवायच्या. त्यांनाही केटरिंगमध्ये गोडी होती. हॉटेल मॅनेजमेंट करायचं असं त्यांनाही शाळेत असताना कधीतरी वाटून गेलं होतं.

रोशनी दुस-या दिवशी शाळेत उशीराच पोहोचली, रात्री सर्व आवराआवरी करायला बराच उशीर झाला होता. “ मधल्या सुट्टीत मला स्टाफ रूममध्ये येऊन भेट,रोशनी !” मिरजकर बाईंनी रोशनीला असं म्हटल्यावर वर्गातल्या पोरींना वाटलं की आता रोशनीचं काही खरं नाही.

रोशनी मधल्या सुट्टीत स्टाफ रूमबाहेर घुटमळली आणि ते पाहून मिरजकर बाईच बाहेर आल्या आणि “ चल,हेडबाईंकडे !” म्हणत पुढे चालू लागल्या. ‘ आता हे काय वाढून ठेवलं असेल आपल्या पानात ‘ या विचाराने रोशनी हळूहळू हेडबाईंच्या खोलीकडे चालू लागली.

“ बाई,ही रोशनी माझ्या वर्गातली. हाताला खूप चव आहे हिच्या. आपल्या बारीक सारीक कार्यक्रमाचं केटरींग आपण हिला देऊयात का? ” मिरजकर बाई आणि हेडबाई यांच्यात यावर काही बोलणं झालं. त्यानंतर शाळेतल्या छोट्या समारंभांवेळी लागणारे खाद्यपदार्थ आणि रोशनी असं समीकरण होऊन गेलं. आणि मोठ्या जेवणाचं काम रोशनी ज्याच्याकडे कामाला जाते त्याच केटररला मिळालं…रोशनी आता त्याची मॅनेजर होती. मिरजकरबाईंच्या नातेवाईकांच्या घरच्या स्वयंपाकांची कामेही रोशनीला दिली जाऊ लागली.

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी काय करायचं आणि कसं करायचं याची मिरजकर बाईंना माहिती होतीच.

……. 

आज रोशनीचं लग्न. सेवानिवृत्त झालेल्या मिरजकर बाईंना खास आणि आग्रहाचं आमंत्रण होतंच. त्याही त्यांच्या यजमानांना घेऊन गावावरून लग्नाला आल्या. जेवणाचा मोठा थाट होता. कधीकाळी त्याच्याकडे वाढपी म्हणून असलेल्या रोशनीच्या लग्नात केटररने स्वत:हून सर्व व्यवस्था केली होती. रोशनीचा स्वत:चा केटरींगचा छोटासा व्यवसाय सुरू होऊन बरीच वर्षे उलटून गेली होती…व्यवसाय प्रगतीपथावर होता. तिच्याकडे अनेक रोशनी काम करीत होत्या आणि रोशनी त्यांना कायम वाढपी राहू देणार नव्हती.

तिचे अनेक ग्राहक आज तिच्या लग्नातले खास आमंत्रित होते. तिच्या हॉटेल मॅनेजमेंटचा काही स्टाफही होता. मिरजकर बाई आणि त्यांचे यजमान पंगतीत बसले. वाढप सुरू झालं. मिरजकर बाई यजमानांशी बोलण्यात मग्न होत्या. त्यांच्या पानात मसालेभात वाढणारा हात त्यांना दिसला…मेहंदी लावलेला…हिरवा चुडा भरलेला…बोटात अंगठी असलेला ! रोशनी होती मसालेभाताचं भांडं हातात घेऊन, आणि सोबत तिचा नवरा !

“बाई, मागच्या वेळी वाढायचा राहून गेलेला मसालेभात आता वाढलाय !” 

कुणीतरी वदनी कवळ घेताचा गजर केला आणि मिरजकर बाईंनी आपल्या पानातील मसालेभाताचा एक छोटा घास रोशनीला भरवला !…… 

(नवरात्रीत अशा लढाऊ महिलांच्या कर्तृत्वाचं स्मरण म्हणून ही लेखमाला. यातील ही पाचवी माळ )

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भक्तीचे कर्ज — एक बोध कथा… ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भक्तीचे कर्ज — एक बोध कथा ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सोलापूर जिल्ह्यातील अरणगावी तो रहात असे. सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला. त्या अभंगांचं सार हेच की ‘प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.  

तर हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारक-यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं. सगळे भोजनाने खूश तर  झाले. पण मनोमनी दु:खी होते कारण त्या वारक-यांच्या गावी दुष्काळाने पिकं नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं-थोडं धान्य द्या ना घरी न्यायला.   सावता माळ्याने बायकोला विचारलं तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य. मग आपण वर्षभर काय खायचं. तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आले. तो म्हणाला,”हे बघ,जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का ?”

सर्वांना आनंदाने धान्य वाटणा-या या दांपत्याला पहायला व हसायला सारा गाव लोटला होता. लोकं  नको-नको ते बोलत होते. कुटाळक्या,चेष्टा,टोमणेगिरी.पण हे आपले शांत होते.  सारं धान्य वाटून संपलं. दुस-या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरवात केली सावत्याने. पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते. गावात उसनं मागायला  गेला तरी कुणी दिलं नाही. एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवुन वर्षभर रोज खायला तुला पुरतील. सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरवात केली. सारा गाव हसत होता कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत ! त्यावर्षी सावताच्या शेतात एक माणूस आत बसेल एवढे मोठे मोठे कडु भोपळे लागले वेलींना. साऱ्यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का ? पण मग त्यावरूनही ते सावताची मस्करी करीत असत रोजच.  कडु भोपळ्यांची राखण करण्याची जरूरच नव्हती. कारण कोण चोरणार ते. पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत भजन करीत असे पांडुरंगाचं. थोडी कुठे मोल मजुरी करून दुस-यांच्या शेतावर,मग घरी येत असे. होता-होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार ? एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला. सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपो-या दाण्यांनी भरलेला होता गच्च व ते सगळे गहू सांडले सारवलेल्या जमिनीवर. सावताचे डोळे पाणावले.”किती रे देवा तुला काळजी माझी.” 

मग दुस-या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले. मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सगळे जण हा चमत्कार बघायला येऊ लागले.कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे. ही बातमी त्यावेळेच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वत: आला व सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला,”धन्य तुमची भक्ती!”. यानंतर सावता अधिकच विरक्त झाला. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं. भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी  देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी.  आपण सगळे कडू भोपळेच असतो. कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा ना नामाचा महिमा आहे. तुमच्या मना भावली पंढरी, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी…!

परोपकाराचा एक दाणा पेरला तर त्याची कितीतरी कणसे परतफेड म्हणून परत मिळतात.

परमार्थ हा संसारात राहूनही करता येतो त्यासाठी काही सोडावे लागत नाही. फक्त तो करताना तो भगवंताचा आहे,जे होते ते त्याच्या इच्छेनुसार होते हे ध्यानात ठेवावे.

प्रत्येक काम हे त्याचेच असून ते त्याच्या नामातच करावे. मग आपल्या वाईट संचिताचे,मागील पापाचे कडू भोपळे सुध्दा सात्त्विक पौष्टिक गव्हाने भरुन जातील.

बोध :  देव माझे चांगलेच करेल हा ठाम विश्वास मनी असू  द्यावा !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बुद्धांनी देवत्व का नाकारले ?… ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ बुद्धांनी देवत्व  का नाकारले ?… ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

बुद्धांनी देवत्व का नाकारले ?

सामान्य लोक महापुरूषाच्या अंगात दैवी शक्ती आहे असे मानून त्यांच्या निस्पृहतेच्या कठिण मार्गावर चालण्याच्या खडतर कामापासून स्वतःला सोईस्कर रित्या दूर करून टाकतात. म्हणूनच बुद्धांनी देवत्वच नाकरले. बुद्धांनी अनुयायांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवला नाही. “बुद्ध देव होते. त्यांना जे जमले ते आपल्याला कसे जमेल?” असे बोलायची सोय ठेवली नाही.

आपल्या प्रत्येक समस्येला आपली हाव आणि आळस जबाबदार असताना ते खापर दुसऱ्या कुणाच्या तरी माथी मारून त्यांचा तिरस्कार करणे ही बहुतेक सामान्य माणसांची सहज प्रवृत्ती असते. पण असे का होते?

या जगात काहीही परिपूर्णपणे चांगले नाही. शोधले तर रामात-बुद्धातही दुर्गुण सापडतात. तसेच काही महाभागांनी रावणात आणि म्हैशासुरातही सद्गुण शोधून काढलेले आहेतच. आपण तर सामान्य लोक आहोत. आपण स्वतः परिपूर्णपणे चांगले नसताना जगाकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे. तरी पण आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. अपेक्षित गोष्टी जागेवर उपस्थित असतील तर त्याचे कुणाला फारसे कौतुक वाटत नाही. उदा. जेवणात योग्य प्रमाणात मीठ पडले तर त्याचे कुणी कौतुक करत नाही. तसाच नव-याचा निर्वसणी असणे हा वाखाणण्याजोगा गुणही ब-याच वेळा दुर्लक्षिलाच जातो.

आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टींमध्ये काही अपरिपुर्णता आली तर तो मात्र अनपेक्षित धक्का असतो. उदा.  नेहमी सुग्रण होणाऱ्या जेवणात मीठ कमी वा जास्त पडले. निर्व्यसनी नवरा झिंगत घरी आला. असे नकारात्मक प्रसंग अनपेक्षितरित्या धक्कादायक असल्याने मेंदूत खोलवर नोंदले जातात. अशा तणाव निर्माण करणाऱ्या नकारात्मक गोष्टी परत घडू नये म्हणून अशा गहन चिंतन चालू होते. म्हणजे आपण नकारात्मक गोष्टींचाच विचार करत बसतो. आयुष्यातील सर्व चांगल्या सकारात्मक गोष्टी  अपेक्षित असल्याने दुर्लक्षित राहतात तर प्रत्येक नकारात्मक गोष्टींवर गहन चिंतन होते. अशा प्रकारे बहुतेक व्यक्तीचे बहुतांश विचार नकारात्मक असतात.

आजुबाजूला घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी आणि अपेक्षांचा सरळ संबध आहे. जितक्या आपल्या अपेक्षा मोठ्या तितके अनपेक्षित नकारात्मक गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. तितके जास्त नकारात्मक विचार चिंतन चालू होते. तितके दुःख मोठे होत जाते.

जगात आपल्यासहित काहीच परिपुर्ण नाही. आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्थां यामधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन आनंदी आणि समाधानी होते. याऊलट  यातील केवळ नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन दुःखी आणि असमाधानी होते. 

स्वतःला दुःखी करणारे आत्मघाती नकारात्मक विचार करणारे लोक आता स्वतःच्या मनात खदखदणा-या दुःखाच्या वड्याचं तेल काढायला बाहेर वांगे शोधतात. त्यातून मनात जन्माला येतो राग, तिरस्कार आणि ईर्षा. असे मन एक प्रकारे कचरापेटी होते. दुर्देवाने कचरापेटीला सर्वात जास्त त्रास कच-याचाच होत असतो. रागाचा सर्वात जास्त त्रास कुणाला होतो?  राग, तिरस्कार वा इर्षा या दुःखद भावना आपल्याच मनाला दुःखी करतात.

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागर…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जागर” ☆ सौ राधिका भांडारकर 

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते.

।।नमो देव्यै महादेव्यै

शिवायै सततं नम:

नम: प्रकृत्यै भद्रायै

नियत: प्रणता स्मताम् ।।

अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते. मंत्रजागर आरत्या  यांचा नाद घुमतो. उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात.

नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह ,मांगल्य ,पावित्र्य पसरलेले असते.

लहानपणापासून आपण एक कथा  ऐकत आलो आहोत…महिषासुराची. या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात अत्याचार माजवला होता.आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासुरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात, व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया… आदिशक्ती… दुर्गामाता.

शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप. तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते, व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी…. सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.

नवरात्रीचे महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस .वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर ,सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं,अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची..

तर असा हा भोंडला, भुलाई, किंवा हादगा …. 

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।

अक्कण माती चिक्कण माती .. खळगा जो खणावा

अस्सा खळगा सुरेख बाई .. जातं ते रोवावं…

अस्स जातं सुरेख बाई .. शेल्यानं झाकावं

अस्सा शेला सुरेख बाई .. पालखीत ठेवावा

अश्शी पालखी सुरेख बाई .. माहेरी धाडावी

अस्सं माहेर सुरेख बाई .. खायाला देतं

अस्सं सासर द्वाड बाई .. कोंडून मारतं..

अस्सं आजोळ गोड बाई .. खेळाया मिळतं…

गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी…. 

बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा

गाणे संपले खिरापत आणा..।।

खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची.अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील,असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.

अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री, ही निरनिराळी नऊ नावे असली तरी ती एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे. आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…

दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं मोठ्या भक्तीभावाने पूजन, पठण होते. गरबा,दांडीयाचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..

…. पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं…

आपले सर्वच सण हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण , नैतिक संदेश.

उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?

ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो ,आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??

…… खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे, त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन  नक्की कसा आहे…?

आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?

ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मिती होते, त्या देहावर पाशवी, विकृत वासनेचे घाव का बसतात…?

विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?

समाजासाठी मखरातली देवी आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री..ही निराळीच असते का?

असे अनेक प्रश्न, अनेक वर्षे..  युगानुयुगे, अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.

आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.

स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? …. ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली. तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही  झाली.

…. पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके, तिची घुसमट, तिची होरपळ…. आहेच त्या चौकटीत.

एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच… दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…?

.. मग हा जागर कधी होणार?

तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर …. जेव्हा  धार लावून तळपतील, तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…

नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर  स्त्री जन्माच्या  पावित्र्याचा..मांगल्यांचा… शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…

हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

??

☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

श्री बालाजीची सासू, मग सासरा,  नवरा, मग दीर , नणंद , आई, बाबा, भाऊ ,बहीण, मैत्रिणी, सखा , मामा, मामी, मावशी, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, खापर पणजी, खापरपणजोबा, कसले लाडू, कसल्या वड्या, कसल्या भाज्या, कसल्या उसळी ,कसले मुरंबे, कसले चिवडे, कसल्या चकल्या, कसली शेव ,कसले वेफर्स? 

हादग्याची खिरापत ओळखण्यासाठी असा शॉर्टकट आम्ही मांडत असू. पण एखादी सुगरण सांगे नाऽऽऽऽही.

मग गोड की तिखट?

तळलेले की भाजलेले?

कुठली फळं आहेत का?

बेकरीचे पदार्थ आहेत का? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. चुळबुळ चुळबुळ सुरु व्हायची. पण आता उत्कंठा शिगेला पोचल्यानंतर सगळ्याजणी हार मानायच्या.

“हरलो म्हणा, हरलो म्हणा”. विजयी मुद्रेने आणि उत्फुल्ल चेहऱ्याने यजमानीणबाई  डबा घेऊन उभी असे. पण डब्याचं झाकण उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्फर्म करत असे.

१)लाह्याच्या पिठाचा उपमा कुणी म्हटलंय का?

२) फुटाणे कुणी म्हटलंय का?

३)गुलगुले कुणी म्हटलंय का?

४) शेंगोळी कुणी म्हटलंय का?

५) ढोकळा कुणी म्हटलंय का? 

किंवा एखादी गाणं म्हणायची.

“हरलीस काय तू बाळे?

गणगाची उसळ ही खुळे.”

मग आम्ही सगळ्या “खुळ्या” आनंदाने त्या खिरापतीला न्याय द्यायचो.

डबा उघडला जायचा. सर्वांना खिरापत मिळायची. त्यावेळेला द्रोण, वाट्या, चमचे, डिश यांचे फॅड नव्हते. प्रत्येकीच्या तळहातावर चमचाभर खिरापत घातली जायची. तेवढ्यानेही आमचे समाधान व्हायचे. सगळेच मध्यमवर्गीय. घरात एकटा मिळवता आणि सात आठ  खाणारी तोंडे. तुटपुंज्या पगारात भागवताना नाकी नऊ येत. पण तरीही हादग्याची खिरापत केली जायची च. सगळीकडे खिरापत “परवडणेबलच” असायची. श्री बालाजी ची सासू याचा अर्थ खालील प्रमाणे….. 

श्री=श्रीखंड,

बा=बासुंदी, बालुशाही

ला=लाडू, लापशी, लाह्या

जी=जिलबी

ची=चिवडा, चिरोटे

सा=साटोरी, सांजा साळीच्या लाह्या

सू=सुतरफेणी, सुधारस  सुकामेवा. वगैरे. 

त्याचप्रमाणे श्री बालाजीच्या इतर नात्यांवरून पदार्थ ओळखायचे… 

उदा. भाऊ .. भा=भातवड्या (तळलेल्या किंवा भाजलेल्या), भात, भाकरी.

अक्षरशः फोडणीचा भात ,भाकरी यांना सुद्धा खिरापतीचा मान असायचा. कुणीच कुणाला नावं ठेवत नसे. ओळखण्याचा आनंद आणि हादग्याचा प्रसाद म्हणून गट्टम करायचा.

=उंडे, उपासाचे पदार्थ…  एका केळ्याचे, रताळ्याचे, काकडीचे, छोट्या पेरूचे दहा तुकडे करून एक एक तुकडा हातावर ठेवला जायचा. खिरापत कोणतीही असो ओळखण्याच्या आनंदानेच पोट भरून जात असे. मग आमचा घोळका पुढच्या घराकडे निघायचा.

उगारला आम्ही चाळीतले सगळे मध्यमवर्गीय. घरोघरी असा हादगा साजरा करत असू. भिंतीवर एक खिळा मारून हादग्याचा कागद लावत असू. त्या रंगीत चित्रात समोरासमोर तोंड करून दोन हत्ती उभे असायचे. दोघांच्या सोंडेत माळा धरलेल्या असायच्या. त्याला सोळा फळांची माळ घातली जायची त्यात भाज्या देखील असायच्या. १६ फळं उगारसारख्या खेडेगावात मिळणं मुश्किल. बंगल्यातल्या मुलींच्या घरात फळझाडे भरपूर असायची. बिन दिक्कत आम्ही तोडून आणत असू. हातातली काचेची फुटकी बांगडी विस्तवावर धरून ठेवली की ती वाकडी व्हायची. मग त्यात शेतातली ताजी भाजी म्हणजे वांगी, दोडका कारली, मिरची, काकडी, भेंडी, ढबू मिरची अशा काही भाज्या  त्यात बसवायच्या. हत्तींना रोज ताज्या फुलांचा हार घातला जायचा. त्यासाठी दोन्ही बाजूला खिळे मारलेले असायचे. घरोघरी हादगा रंगायचा. आमंत्रणाची गरजच नसायची. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचेच. फेर धरायचा. मध्ये एक पाट ठेवून त्यावर हत्तीचे चित्र अंबारीसकट काढायचे. हळद, कुंकू, फुलं वाहून सगळ्यांनी पारंपारिक गाणी म्हणायची. पहिले दिवशी एक ,दुसरे दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने १६ व्या दिवशी १६ गाणी म्हणायची. मग खिरापत ओळखायची. 

हादगा समाप्तीचा मोठा समारंभ असायचा. हादग्याच्या सगळ्या मुली,  शिवाय त्यांच्या आयांना देखील आमंत्रण असायचे. घागरीच्या पातेल्यात खिरापत केली जायची. सर्वांनी पोटभर खावे अशा इच्छेने आग्रह करून वाढले जायचे. ती चव, ती तृप्ती वर्षभर पुरायची. मग पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सगळा खेळ रंगायचा.

आता सर्वत्र आर्थिक सुबत्ता आली. पण वेळेअभावी एकच दिवस हादगा किंवा भोंडला खेळला जातो. पण खिरापत ओळखण्याची मजा आजही वेगळा आनंद देऊन जाते. आता घरोघरी चढाओढीने पदार्थ केले जातात. गुगलवर एका किकवर अनेक अनोख्या खिरापतींची रेसिपी मिळते.  लहानपणीची ” श्री बालाजीची सासू ” आता सुधारक पद्धतीने आकर्षक डिशमध्ये मिळते. आणि आम्हा महिलांना तोच आनंद पुन्हा मिळतो.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares