मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 64 – मातृभूमीचे पहिले दर्शन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 64 – मातृभूमीचे पहिले दर्शन डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जहाजाने इंग्लंड सोडले आणि मातृभूमीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. मनात अनेक स्वप्न बाळगुनच. इतकी वर्षे भारताबाहेरचे प्रगत देश पाहिले,पाश्चात्य संस्कृती अनुभवली, तिथले लोकजीवन पाहिले,त्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य पाहिले. तिथल्या लोकांचे त्यांच्या धर्माबद्दलचे विचार ऐकले, समजून घेतले, तिथला सुधारलेला समाज जवळून अनुभवला.वेळोवेळी आपला भारत देश आणि त्याच्या आठवणीने त्यांचे मन भरून यायचे. मनात तुलना व्हायचीच, आपल्या देशातले अज्ञान, काही रूढी,परंपरा, दारिद्र्य आठवले की मन दु:खी व्हायचे. पण आपल्या मातृभूमीचा वारसा, अध्यात्म, धर्म, विचार या बद्दल मात्र आदर वाटायचा आणि गौरवाने मान ताठ व्हायची.

पण बाहेरच्या देशात त्यांना ख्रिस्त धर्म व त्याची शिकवणूक हे आणखी स्पष्ट अनुभवायला मिळत होतं. आता इंग्लंडहून निघून ते फ्रांसला उतरले होते. ख्रिस्त धर्म प्रसाराचा आरंभ जिथे झाला त्या इटलीत . ऐतिहासिक रोमन साम्राज्य आणि तिथल्या परंपरा, जगद्विख्यात चित्रकार ‘लिओ नार्दो द व्हिंची’ च्या कलाकृती, पिसा चा झुकता मनोरा, उद्याने वस्तु संग्रहालये पाहण्याचा त्यांनी आनंद घेतला आणि काय आश्चर्य तिथे उद्यानात अचानक हेल पतिपत्नीची भेट झाली . दोघेही सुखावले. अमेरिकेत उतरल्यावर प्रथम ज्यांनी घरात आश्रय दिला होता त्यांची ही जणू निरोपाचीच भेट असावी.

रोमचा इतिहास त्यांनी अभ्यासला होताच. युरोपातले रोम आणि भारतातले दिल्ली ही शहरे मानव जातीच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेली शहरे होत असे विवेकानंदांना वाटत असे.  त्यामुळे रोम मधील सौंदर्य आणि इतिहासाच्या खाणाखुणा सर्व पाहताना ते चटकन संदर्भ लावू शकत होते.संन्यासी असले तरी ते स्वत: कलाकार होते, रसिक होते म्हणून तिथल्या सौंदर्याचे दर्शन घेताना ते आनंदी होत होते.  योगायोगाने ख्रिस्त जन्माच्या दिवशी विवेकानंद रोम मध्ये होते. मेरीच्या कडेवरील बालरूपातील ख्रिस्त आणि आमच्या हिंदू धर्मातील बाळकृष्ण यात विवेकानंदांना साम्य वाटले. आणि मेरीचा मातृरूप म्हणून आदर पण वाटला. आई मेरी आणि बाळ येशू यांच्या विषयी भक्तीभाव मनात तरळून गेला. हेल पती पत्नी विवेकानंदांबरोबर इथे आठवडा भर होती. आणि ही साम्यस्थळांची वर्णने स्वामीजींकडून ऐकून ते दोघे भारावून गेले होते.विवेकानंदांच्या मनात सर्व धर्मांबद्दल आदरभाव होता तो त्यांच्या भाषणातून सगळ्यांनी अनुभवला होता. तरीही काही प्रसंग असे घडत ,की हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणारे विवेकानंदांना भेटत, याच प्रवासात दोन ख्रिस्त धर्म प्रचारक जहाजावर होते. विवेकानंद त्यांच्याशी अर्थात हिंदू धर्म आणि ख्रिस्त धर्म यांची तुलना आणि श्रेष्ठत्व यावर बोलत होते. विवेकानंद यांच्यापुढे आपला टिकाव लागत नाही असे लक्षात आल्याने ते दोघे आता हिंदू देवदेवता आणि आचार विचार यांची टवाळी करण्यावर आले. स्वामीजींनी या निंदेकडे बराच वेळ दुर्लक्ष केलं.पण आता सहनशक्तीचा अंत झाला आणि स्वामीजींनी एकाची कॉलर पकडून, जवळ जवळ दरडाऊनच दम भरला की आता माझ्या धर्माबद्दल पुढे काही बोललात तर धरून समुद्रात फेकून देईन. त्यामुळे त्या धर्म प्रचारकांचे तोंड गप्प झाले. स्वामीजींना उदार मनोवृत्ती मुळे आपल्या धर्मा बद्दल कोणीही काहीही बोलेल ते आपण ऐकून घ्यायचे मुळीच पटत नव्हते. त्यात त्यांना दौर्बल्य तर वाटायचेच पण, पाश्चात्य देशातील लोकांना धर्मा धर्मातील भेद बाजूला सारून एकाच विश्वधर्माशी पोहोचावे असा विचार त्यांनी दिला होता आणि भारतात मात्र ख्रित धर्म प्रचारकांच्या प्रचारला बळी पडून अनेक हिंदू धर्मांतर करत होते, तर सुशिक्षित समाज याकडे दुर्लक्ष करत होता हे त्यांना अजिबात आवडले नव्हते.

अशा अनेक गोष्टींना, प्रसंगांना विवेकानंद आपल्या भ्रमण यात्रेत सामोरे जात होते. “नरेन एक दिवस सारं जग हलवेल” असा त्यांच्या गुरूंचा रामकृष्णांचा शब्द खरा करून दाखवलेला हा नरेंद्र सहा वर्षांपूर्वी शारदा देविंचा आशीर्वाद घेऊन निघाला होता तो आता विश्व विजेता होऊन भारतात परतत होता. त्यामुळे त्यांच्या गुरुबंधूंना कोण आनंद झाला असेल ना? स्वामींनी सर्वधर्म परिषदेला शिकागो येथे जाण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले होते.ते सर्वजण खूप आनंदले होते. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी चालू होती. विवेकानंद सुधा मातृभूमीला भेटायला उत्सुक होते. हा विचारच त्यांच्या अंगावर रोमांच उभे करत होता. भारताच्या आत्म्याला जाग आणण्यासाठी पुढे प्रयत्न करून हिमालयात अद्वैताश्रम उभा करायचे स्वप्न आणि योजना त्यांचे मन आखत होते. पंधरा जानेवारी चा सूर्योदय पहिला तो श्रीलंकेच्या किनार्‍यावरचा अर्थात तेंव्हाच्या सिलोन चा. जहाज पुढे पुढे जात होते तसतसे किनार्‍यावरीला नारळीच्या बागा दिसू लागल्या. कोलंबो बंदर लागले. भारताचे दर्शन झाल्याने स्वामीजींच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होतेच. आता उतरल्यावर आपल्या बरोबर आलेले तीन पाश्चात्य सह प्रवासी म्हणजेच पाश्चात्य शिष्य यांची उतरल्यावर राहण्याची सोय करायची हाच विचार त्यांच्या डोक्यात होता.

कोलंबो बंदरात जहाज थांबले आणि एक नाव घेऊन स्व्मिजिना उतरवायला गुरु बंधु निरंजनानंद,आणि काही प्रतिष्ठित नागरिक आले. विवेकानंद, सेव्हियर पाती पत्नी, आणि गुडविन यांना त्या नावेतून किनार्‍यापर्यंत आणले. प्रचंड जमलेल्या जन समुदायाच्या साक्षीने पी कुमारस्वामी यांनी भला मोठा पुष्पहार घालून स्वामीजींचे स्वागत केले आणि सजवलेल्या घोडा गाडीत चौघांना बसवून त्यांची स्व्गता प्रीत्यर्थ मिरवणूक सुरू झाली, हे सर्व अनपेक्षित होतं,प्रचंड जल्लोषात स्वामी विवेकानंद यांचे पहिले स्वागत भारतात करण्यात आले

रस्त्यावरून जाताना नयनरम्य स्वागत सोहळा अनुभवत होते ,स्वामीजी, आणि विशेषत त्यांचे पाश्चात्य शिष्य. सुशोभित भव्य कमानी, स्वागत करणारे भव्य फलक, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या पताका, घरांवर केलेली  सजावट,प्रकांड, मंडप, व्यासपीठ, मस्तकावर होणारी पुष्पवृष्टी, मंगल वाद्यांचे स्वर, तामिळ व संस्कृत मध्ये म्हटले जाणारे मंत्र, नागरिकांनी लिहिलेले मानपत्र अहाहा केवढा तो आनंदी सोहळा होता.हा सोहळा उत्स्फूर्तपणे ,प्रेमापोटी होत होता. त्यात उच्च पदस्थापाऊण सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्व जन सहभागी झाले होते. एखाद्या धनाढ्याचा प्रायोजित मॅनेज केलेला स्वागत सोहळा नव्हता, तो निष्कांचन असलेल्या एका सन्याशाच्या स्वागताचा सोहळा होता. या संस्कृतीमधून विवेकानंद यांना भारतीय आत्म्याचा एक सुंदर आविष्कार दिसला होता. यात ते आपल्या महान संस्कृतीचे वैशिष्ठ्य अनुभवत होते आणि ते जतन केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. इथेच सुरू झाली होती त्यांची गौरवयात्रा.

ही तर सुरुवात होती भारतातल्या स्वागताची. छत्री, अबदागिरी, पताका, निशाणे, वाद्ये, मंत्र पठण, या सर्व पारंपारिक प्रकारांचा समावेश या स्वागतात केला गेला होता. जणू भगवान शिवाचा अवतार म्हणूनच विवेकानंद यांची पुजा केली होती. हा सर्व आश्चर्यकारक स्वागत सोहळा स्वत: गुड्विन यांनी पत्राने बुल यांना कळवला होता आणि म्हटले होते की, स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर सेव्हीयर पतिपत्नी आणि मी, आम्हा तिघांच्याही वाट्याला हे जिव्हाळा असलेले स्वागत/सन्मान आले.

त्यानंतर श्रीलंकेतले प्राचीन मोठे शहर  अनुराधापुरम, जाफना इथे भेट दिली. २००० लोकांपुढे त्यांचे व्याख्यान झाले. सार्वजनिक सत्कार, मानपत्र,३ किलोमीटर लांब रस्त्यावर केळीचे खांब दुतर्फा लावून सुशोभित केलेले. शेकडो लोकांची मशाली हातात घेऊन विवेकानंदांना आणण्यासाठी निघलेली मिरवणूक, त्यात पंधरा हजार लोकांचा सहभाग,आणि आसपासच्या लहान मोठ्या गावातून विवेकानंदांना पहाण्यासाठी अमाप उत्साहात आलेले लोक. त्यात गौरवपर झालेली भाषणे, विवेकानंद यांचे व्याख्यान आणि लोकाग्रहास्तव झालेले सेव्हीयर यांचे भाषण. हे सगळं कशाच द्योतक होतं? हा तर स्वामी विवेकानंद यांच्या बद्दलचा व्यक्त झालेला आदरभाव होता. त्यांच्या कामाची पावती होती. आता सुरू होणार होता पुढचा प्रवास … 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तुझी माझी जोडी…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तुझी माझी जोडी…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

माझ्या या कामामध्ये खूप वेळा हृदय पिळवटणाऱ्या घटना घडतात, भावनांचा कस लागेल, अशा गोष्टी हाताळाव्या लागतात… अश्रू बर्फ होतील की काय असं वाटायला लागतं…. ! 

गाण्यातले सूर हरवले की ते गाणं बेसूर होतं…. 

परंतु जीवनातलं मन हरवलं की अख्ख आयुष्य भेसूर होतं… 

असे भेसूर प्रसंग डोळ्यांनी पहावे लागतात… अनुभवावे लागतात…. मन सुन्न होतं… असंही काही असतं यावर विश्वास बसत नाही.,. या परिस्थितीत नेमकं काय करावं बऱ्याच वेळा कळत नाही…! 

असे अनेक करुण प्रसंग पुस्तक रूपानं शब्दबद्ध करून ठेवले आहेत….! माझ्या पुस्तकातल्या पानात हे प्रसंग बंदिस्त झाले आहेत…  पिंपळाच पान ठेवावं तसे … !  या पानाच्या आता जाळ्या झाल्या आहेत… पण हरकत नाही ! … ही सुंदर नक्षीदार जाळी, मला माझ्या म्हाताऱ्या झालेल्या याचकांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची दरवेळी आठवण करून देते… ! 

…. आणि मीच रचलेल्या या जाळ्यात दरवेळी अडकायला मलाच खूप आवडतं….! 

मात्र संपूर्ण दिवसात एक तरी प्रसंग असा घडतो जिथं पोट धरून हसावं…. एक तरी सुखद प्रसंग असा घडतो की तो अनुभवताना वाटतं, धन्य झालो… या प्रसंगाचा साक्षीदार होण्यासाठी निसर्गाने मला जिवंत ठेवलं… ! … संपूर्ण आयुष्य जगून झालं, तरीही सुख आणि समाधान म्हणजे काय हे अनेकांना कळत नाही, अशावेळी रस्त्यात बसलेला माझा एखादा याचक, चार ओळींमध्ये जगण्याचं सार सांगून जातो….! 

हे प्रसंग आणि आशावादी चित्र, मला सुद्धा जगायचं बळ देतं…. उद्या उठून परत तिथेच जाण्यासाठी प्रवृत्त करतं…. हे आशावादी चित्र म्हणजे माझ्या कामाचं टॉनिक आहे..! 

हे सर्व प्रसंग नंतर आठवून शब्दबद्ध करता येतात, परंतु दरवेळी कॅमेऱ्यात ते टिपता येत नाहीत…

पण, असं एक क्षणचित्र चुकून का होईना, पण कॅमेऱ्यात काल शनिवारी २५ मार्च रोजी बंदिस्त करता आलं. 

वरवर गमतीचा वाटावा, असा हा प्रसंग. परंतू  खूप काही शिकवून गेला. भेगाळलेल्या मातीवर पावसाचा टिपूस पडावा, तेव्हा त्या मातीला काय वाटत असेल ….?  नेमकं तेच मला या प्रसंगातून वाटलं…! 

तोच हा प्रसंग…

… एक आजी, वय वर्षे साधारण ७५….तिला माझ्याकडून काही वैद्यकीय साधने हवी होती, पण त्यावेळी ती साधने माझ्याकडे नव्हती. आजी माझ्या प्रेमाचीच, परंतू त्यावेळी मात्र ती चिडली, मला उलट सुलट बोलायला लागली. आमच्यात मग रस्त्यावरच्या रणांगणावर, “शाब्दिक घनघोर युद्ध” झाले…! 

… जुनं खोड हे … म्हातारी काय बोलायला ऐकते का मला ? प्रश्नावर प्रतिप्रश्न …. उत्तरावर प्रतिउत्तर… ! 

…. पट्टीच्या पैलवानाला दहा मिनिटात रिंगणात आसमान दाखवावं, तसं म्हातारीने दहा मिनिटात, मेरे जैसे छोटे बच्चे की बोलून बोलून जान ले ली राव …! 

एक दिन मैं पानी में  “शिरा” फिर “पोहा”…. अशा टाईपचे माझं हिंदी…. 

“गाडी के नीचे कुत्रा बसलाय…”  हे सुद्धा अस्मादिकांचेच वाक्य आहे …. ! 

वरील दोन्ही हिंदी वाक्यांचा मूर्ख (सॉरी, “मुख्य” म्हणायचं होतं….) निर्माता मीच आहे… !

तरीही मी खूप आनंदी आहे, कारण नवनिर्मिती महत्त्वाची ! 

असो….

तर यानंतर, मी पराभूत होऊन, तिला शरण गेलो, मान खाली घातली…! तरीही म्हातारीचा जिंकण्याचा आवेश अजून उतरला नव्हता….तिने उठून उभे राहत, अक्षरशः कसलेल्या पैलवानागत शड्डू ठोकत, मला कुस्ती खेळण्यासाठी आव्हान दिले…! .. आभाळाकडे दोन्ही हात नेऊन आभाळाला गुदगुल्या कराव्या तशी बोटांची ती हालचाल करत होती… मध्येच एका पायावर उभे राहण्याची कसरत करत, शड्डू ठोकत, मला चिडवत, डिवचायची…’.ये की रं… घाबरलास का ? खेळ माझ्यासंगं कुस्ती…ये…!’ 

…. इकडे माझ्यावर इतका “भीषण प्रसंग” उद्भवला होता आणि आजूबाजूची मंडळी पोट धरधरून हसत होती… तेवढ्यात एक जण माझ्या कानाशी येऊन, जोरात हसत म्हणाला, ‘ खेळा डॉक्टर म्हातारीशी कुस्ती….!’

…. चिडलेल्या म्हातारीने नेमके हे ऐकले आणि ती आणखी चवताळली… या मूर्खाला जोरातच बोलायचे होते, तर कानाशी का बरं हा आला असेल ? मूर्ख लेकाचा….पण आता हे बोलून त्याने काळ ओढवून घेतला होता…! ‘ ये मुडद्या तू बी ये, कुस्ती खेळायला….’, म्हातारीने कुस्ती खेळण्याचे आवाहन शड्डू ठोकत त्याला सुद्धा दिले. म्हातारीचा आवेश काही केल्या उतरेना…! 

…. मेलेल्या उंदराला शेपटीला धरून बाहेर फेकावं, तसं म्हातारी आता माझ्या ॲप्रनला चिमटीत धरून, मला हवेत गरागरा फिरवून, चितपट करणार… हे स्पष्ट होते. … “सर सलामत तो पगडी पचास” असा शहाणा विचार करून मी तिच्यापुढे पुन्हा शरणागती पत्करली. “बचेंगे तो और लढेंगे” असा प्रेरणादायी विचार मनात घोळवत… ‘ म्हातारे, मी हरलो ‘ असं जाहीरपणे कबूल केलं. कोंबडीनं मान टाकावी, तशी मान टाकून पराभूत योद्धाप्रमाणे मी तिथून निघालो. 

लटपटत का होईना… परंतु शूर योद्धाप्रमाणे म्हातारी पुन्हा माझ्यासमोर आली . चेहऱ्यावरच्या प्रत्येक सुरकुतीमधून विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता…! …. “आयुष्यभर परिस्थितीशी कुस्ती करून, कायम पराभूत झालेली ही म्हातारी, आमच्या या कुस्तीत मात्र जिंकली होती” 

पण, योग्य वेळी हार मानून आपल्या माणसांना जिंकताना पाहणं यातही वेगळाच आनंद असतो….! 

तर… उंदराला मारलं, तरी मांजर काही वेळ त्याच्याशी खेळत राहतं, त्याप्रमाणे म्हातारी मला पुन्हा डिवचत म्हणाली, ‘का रं… हरलास ना ?’  म्हातारीला तिचा विजय माझ्या तोंडून पुन्हा वदवून घ्यायचा होता….! 

इंजेक्शन टोचल्यागत, कळवळून मी तिला, ‘ म्हातारे, तुच जीतलीस ‘ म्हणालो..! 

माझा पराभूत चेहरा आणि पडलेले खांदे पाहून म्हातारीला आता माझी दया आली असावी….

मला म्हणाली, ‘ चिडलास व्हय लेकरा…? आरं म्या गंमत केली तुजी… जितायची जितं खात्री आस्ती, मानुस तितंच कुस्ती खेळाया जातू…. तू मलाच जितवणार हे मला म्हाईत हुतं ल्येकरा….!’ … आजीच्या डोळ्यात आता पाणी होतं…! ‘ आरं कसली आलीया हार आणि कसली आलीया जीत ल्येकरा ??? बुद्धिबळाचा डाव संपल्यावर राजा,वजीर, हत्ती, घोडे आणि प्यादी एकाच डब्यात गप गुमान बसून असत्यात बग…! ‘ 

… वरवर अडाणी वाटणाऱ्या आजीने, या गमतीशीर प्रसंगातून, अख्ख्या आयुष्याचं सार सांगितलं….!!!

आजीच हे वाक्य ऐकून खरं तर मी अंतर्बाह्य हलून गेलो होतो….खरंच किती सत्य होतं हे ?  

तरीही, आजीची आणखी थोडी गंमत करावी, म्हणून मग मी अजून थोडा “रुसून” बसलो… तिच्यापासून बाजूला सरकून बसलो….

….. “आंतर चालण्यात असावं बाबा…. बोलण्यात आणि नात्यात ठेवू न्हायी” असं समजुतीने म्हणत,  माझ्या जवळ येत, छोट्या नातवाचा रुसवा काढावा, तशी ती माझ्याजवळ आली… म्हणाली, ‘ बाळा, ज्याला कुटं, कंदी, काय हरायचं त्ये कळतं…त्योच खरा जिततो…’

यानंतर, माझे दोन्ही हात हातात घेऊन, झोपाळ्यागत हलवत ठेक्यात ती गाणं गाऊ लागली….

तुजी माजी जोडी…

झालास का रं येडी…

चल जाऊ शिनीमाला…

आणू का रं गाडी…? 

…. आता इतक्या मायेने आजी जर नातवाला विनवत असेल…. तर कुठल्या नातवाचा राग पळून जाणार नाही ? तिचे सुरकुतलेले ते हात अजूनही माझ्या हाती होते… हातावरची आणि चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती ही आयुष्यानं शिकवलेल्या अनुभवांची होती… पचवलेल्या पराभवाची होती…! 

रस्त्यावर एकटी आयुष्य कंठत असताना, समोर येणाऱ्या वाईट परिस्थितीला सुद्धा, या वयात, दरवेळी शड्डू ठोकत, ‘ये खेळ माझ्यासंगं कुस्ती’ असं म्हणत आव्हान देत होती….! 

…. छोट्या छोट्या गोष्टींनी पिचून जात, रडत राहणारे आपण… चटकन हार मानणारे आपण….! 

माझ्यासाठी ती मात्र एक “अजिंक्य मल्ल” होती…! तिच्या कानाशी जाऊन मी म्हणालो, ‘आजी मी तुला जितवलं नाही… तू खरोखर जिंकली आहेस …! 

…. यावेळी मी तिच्या डोळ्याकडे पाहिले आणि सहज आभाळाकडे लक्ष गेलं….. दोन्ही पाण्याने भरले होते…! मी ते माझ्या ओंजळीत घेतलं …

…… तीर्थ ….तीर्थ …म्हणत असावेत, ते हेच असेल काय ???

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ध चा मा ? …लेखक – श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.

त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे,” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “ Coordination cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”

 हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार.

पांचच मिनिटांत पुन्हा  वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला, “Duty manager , please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.”

आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना, की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार, तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.”

यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मैं तुम को जमीन में जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?”

मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले, “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मैं आपकी मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी में ठीक तरह  से बातचीत करने नहीं आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उनकी तरफ से माफी मांगता हूं . ”

माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली, पण चढ्या आवाजांत म्हणाली, “मेरे दांत में बहोत दर्द है . मैं सफर नहीं कर सकुंगी. बस इतना मैंने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये हैं ? मैं उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”

मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.

मी बॅनर्जीला म्हणालो, “यार, पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?”

यावर बनर्जीने जे उत्तर दिले, ते ऐकून मला हसावे की रडावे, ते कळेना.

तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मैं वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैंने लेडी को बोला: टांग उपर करो,” असं म्हणून बॅनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग,’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी, तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिट में दोर्द गायब होता है.”

अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जिभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा.

लेखक : श्री अनिल रेगे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उंदीर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “उंदीर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

त्या तिथे राहणाऱ्या उंदरांची तातडीने बैठक बोलावण्यात आली होती. विषय होता उंदरांची वाढती संख्या आणि त्यांचा मुक्त संचार यांचे झालेले व्हिडिओ चित्रण आणि त्याची बातमी.

बैठकीत (महत्वाच्या उंदीरांसह) सगळ्यांनाच आमंत्रण होते. पण काही (महत्वाचे) उंदीर उपस्थित तर नव्हतेच, पण नाॅट रिचेबल देखील होते. काही तर सहज फिरत फिरत दिल्ली पर्यंत पोहोचले होते अशी चर्चा होती. बैठक कशासाठी होती हे बाजूला राहिले, आणि कोणते उंदीर बैठकीला नाहीत यावर कुजबुज सुरु झाली.

महत्वाचा प्रश्न होता तो व्हिडिओ मध्ये चित्रीत केले गेलेले उंदीर नेमके कोणते होते? आपलेच की दुसरे…

आपली वाढती संख्या आणि आपला इथे असलेला मुक्त संचार याची बातमी किती महत्वाची होऊ शकते. यावर काय करायचे यावर चर्चा सुरू झाली.

करायचे काय? मध्यंतरी वाघांची वाढती संख्या यांचे किती कौतुक झाले. मग आपल्या बाबतीत देखील तसेच व्हायला पाहिजे… अगदी जागतिक पातळीवर वाघांची संख्या किती? पैकी आपल्या देशात किती? यांच्या टक्केवारी सह सगळी माहिती आणि सोबत फोटो सुध्दा छापले होते. आपल्या बाबतीत निदान प्रदेश पातळीवर संख्या दिली पाहिजे. …एक विचार…

अरे वाघ आणि उंदीर यात फरक आहे हे लक्षात येईल का? त्यांची संख्या वाढायला खास प्रयत्न झाले. त्यासाठी निधी होता‌… आपले काय?… आपल्याला पकडण्यासाठी कंत्राट दिले जाते. आणि त्यात देखील भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जाते. म्हणजे त्यांच्या वाढीसाठी निधी, आणि आपल्याला पकडण्यासाठी निधी. हा फरक लक्षात येतो का? आजकाल पकडायला कोणतेही कारण पुरेसे आहे… एक ज्येष्ठ विचार…

ज्येष्ठ म्हणून त्यांचा विचार उघडपणे डावलला गेला नाही. पण आम्हाला देखील थोडे महत्व मिळायला पाहिजे. आपल्यात देखील आता घराणेशाही रूजत चालली आहे. व याचा फटका आम्हाला बसतो. अशी कुरकुर (विचारांना कुरतडणे) लहान उंदरांची सुरू झाली.

फटका म्हणजे काय? चांगलाच बसतो. आपण या इमारतीचे माळे (मजले) वाटून घेतले. पण महत्वाचे मजले ठराविक उंदरांकडेच आहे. आमच्या वाट्याला आलेल्या मजल्यांवर खाण्यापेक्षा जास्त फिराफीर करावी लागते. काहीतर या इमारतीमध्ये कधी यायला मिळेल याच विचारात अजुनही आहेत. याचाही विचार करावा लागेल…

यांच्या वाट्याला नवीन करकरीत कागद. आणि आमच्या वाट्याला जुनाट कागद. असे किती दिवस चालणार. आमचे घराणे नावलौकिक केव्हा मिळवणार… उंदीर असलो म्हणून काय झाले? आपल्यातलेच काही खूपच गलेलठ्ठ झाले आहेत. त्यांचे काय?

किती दिवस काही ठराविक उंदीर चांगले कागद कुरतडणार, आणि आम्ही मात्र फक्त वायर चघळायच्या. आता तर त्या वायरवर देखील वेगळे आवरण असते. काहीवेळा ती सहज कुरतडता येत नाही. काहीवेळा तर वायर कुरतडतांना शाॅक लागायची भिती वाटते. यांच्या कागदांचे बरे असते. हे विचारांचे कुरतडणे थोडे वाढत चालले होते.

तेवढ्यात इमारतीमध्ये उंदराचे पिंजरे आणणार आहेत अशी बातमी एका उंदराने आणली.

आता बाकी सगळे बाजूला ठेवा. आणि सगळे वातावरण शांत होईपर्यंत काळजी घ्या. उगाचच मोकळेपणाने फिरु नका. तुर्तास यावरच आपण थांबू. मग पुढचे  बघू. जे इमारतीच्या बाहेर आहेत त्यांची काही व्यवस्था होते का ते बघू, पण उगाचच येथे येण्यासाठी धडपड आणि घाई करु नका. असा सबुरीचा सल्ला देत बैठक संपवली. आणि सगळेच उंदीर मिळेल त्या बिळात शिरले.

आता त्यांची आपसात कोणत्या बिळात कोणता उंदीर गेला आहे याची चर्चा सुरू झाली आहे…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंद म्हणजे… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंद म्हणजे… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

उदासी म्हणजे भूतकाळ… ! 

तणाव म्हणजे भविष्यकाळ…!!

आणि आनंद म्हणजे वर्तमानकाळ…!!! 

पण भूतकाळात काय घडलं ? ते पुन्हा घडायला नको, याचा विचार करून भविष्य काळाची तजवीज करता करता …आपण वर्तमान काळात जगायचं विसरूनच जातो, खरं तर…!

गंमत अशी आहे, की “आनंद” मिळवायला खूप काही घ्यावं लागतं …. असं आपण आयुष्यभर समजतो, पण  पुढे खूप चालून गेल्यानंतर कळतं, आपण घेताना नाही…. पण ज्यावेळी दुसऱ्याला काही देत होतो, त्याचवेळी खरे “आनंदी” होतो… ! 

हरकत नाही, हे उशिरा का होईना, ज्याला समजलं तो खरा सुखी ! 

माझ्या या कामात, मला नेहमी असं वाटतं, की मी गुलाबाच्या बागेतून फिरून गुलाब गोळा करत आहे… सुखाचे आणि आनंदाचे क्षण झोळीत टाकत आहे… ! 

आपल्याच माध्यमातून जमा केलेले आनंदाचे हे क्षण आणि गुलाबाची काही फुलं, लेखाजोखाच्या निमित्ताने आपल्या पायाशी सविनय सादर ! 

वैद्यकीय

१ .  या महिन्यात एकूण १५ लोक, जे रस्त्यावर असहायपणे पडून होते, वेळेवर ट्रीटमेंट मिळाली नसती तर ते हे जग सोडून गेले असते अशांना, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून पूर्णपणे ते खडखडीत बरे झाले आहेत.

जगण्याचंच भय वाटू लागतं… त्यावेळी मरणाची भीती संपून जाते…! आत्मसन्मान… स्वाभिमान… आत्मप्रतिष्ठा…असे मोठाले शब्द मग पुस्तकांच्या पानातच दबून राहतात…. यानंतर सुरू होते जगण्याची लढाई….! अशावेळी पाया पडून तरी किंवा कोणाचे तरी पाय ओढून तरी, जगण्याची स्पर्धा चालू होते… ! 

पाया पडून /  याचना करून जे जगतात, ते भिक्षेकरी…! 

पाय ओढून हिसकावून घेतात, ती गुन्हेगारी… !! 

— दोघेही मला एकाच तराजूत भेटतात… 

तराजू मग हाताने तोलत, ” हाताची किंमत कळली की कोणाचे पाय धरायची किंवा ओढायची वेळ येत नाही…” या शब्दांचे वजन मी थोडं या तागडीत, थोडं त्या तागडीत टाकत  राहतो…

— ज्याला हे समजलं….त्याचं मोल माझ्या मनात वाढतं… आणि मग त्याला / तिला उभं करण्यासाठी तुमच्या मदतीने प्रयत्न करतो आहे… ! 

२. या महिन्यात भीक मागणारे ९०० लोक…. त्यांच्या सर्व टेस्ट आपण रस्त्यावर करून घेतल्या आहेत,   एक्स-रे, सोनोग्राफी, कलर डॉपलर अशा ज्या तपासण्या रस्त्यावर होत नाहीत, अशा सर्व तपासण्या रेड क्रॉस सोसायटी, पुणे यांच्याकडे करून घेत आहोत. 

— सायन्स कितीही पुढं गेलं, तरी मनातले घाव मात्र कोणत्याही मशीनमध्ये दिसत नाहीत… 

तुम्हा सर्वांच्या साथीने, हे घाव शोधून, त्यावर फुंकर मारण्याचा एक प्रयत्न करत आहे…! 

  1. नेत्र तपासणी

२७ मार्च २०२३ – या दिवशी रस्त्यावर बेवारस राहणाऱ्या अनेकांची डोळे तपासणी केली आणि  डॉ समीर रासकर, माझे मित्र यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन कमीत कमी खर्चात करून दिले.

— “दृष्टी” आल्यानंतर आता व्यवसाय करण्याचा “दृष्टिकोन” ठेवावा, असं या सर्वांना बजावून सांगितलं आहे.  

आता, दिसायला लागल्यानंतर रस्ता ओलांडताना होणारे अपघात टळतील…. पर्यायाने मृत्यू वाचतील. 

… श्वास बंद पडल्यानंतरच मृत्यू होतो असं नाही, तर जगत असताना, चार चौघांनी खांद्यावरून उतरवून, त्यांच्या आयुष्यातून आपल्याला बाद करणे,  म्हणजे खऱ्या अर्थाने मृत्यू !!! 

भिक्षेकर्‍यांनी, “कष्टकरी” व्हावे…. स्वयंपूर्ण व्हावे आणि त्यानंतर सन्मानाने “गावकरी” म्हणून स्वाभिमानाने जगावे, समाजाने आईच्या मायेने त्यांनाही उचलून कडेवर घ्यावे, यासाठी मी काम करत आहे….आणि हा विचार हाच माझा श्वास आहे… ! 

अन्नपूर्णा प्रकल्प

रस्त्यावर असहायपणे पडून असणारे आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे….  असे दयनीय अवस्थेत जगणाऱ्या लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रोज अन्नदान केले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी गोड असतं….. याच धर्तीवर, सणावाराला त्यांना गोडाचे जेवण दिले आहे. 

जी मंडळी भीक मागणे सोडून काम करायला लागली आहेत, त्यांना वेळोवेळी कोरडा शिधा / किराणा दिला आहे. 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकशे दहा वर्षे चाललेली पावलं!… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एकशे दहा वर्षे चाललेली पावलं!… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अर्थात वाळवंटातील वाटाड्या शूर वीर रणछोडदास राबरी !

“साब ! म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टरमध्ये बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्यासोबतच्या लष्करी अधिका-यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं ! सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर, पीळदार आणि अगदी दाट मिशा, आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचे वय होतं १०७ वर्षे फक्त….होय….  अवघे एकशे सात वर्षे !

हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिका-यांसमवेत कसे?—  

आजोबांना महान सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलावणं धाडलं होतं. तामिळनाडूमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले माणेकशासाहेब कधी शुद्धीत तर कधी अर्धवट बेशुद्धीमध्ये सतत ‘पगी…पगी’ असा काहीतरी उच्चार करताना तेथील डॉक्टरांनी ऐकलं होते! “कोण पगी?” असं विचारलं गेल्यावर साहेबांनी ‘पगी’ ची कहाणी अगदी इत्यंभूत सांगितली….आणि त्या ‘पगी’ची भेट व्हावी,अशी इच्छा व्यक्त केली…नव्हे तसा आदेशच दिला ! 

लष्कराने ‘पगी’चा शोध घेतला आणि राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर असलेल्या बनासकांथा येथील ‘निंबाला गावातून या आजोबांना सोबत घेतलं..त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्थाही करण्यात आली होती. माणेकशा साहेबांचं नाव घेताच आजोबांच्या डोळ्यांत निराळीच चमक आली. त्यांनी घरातील महिलांना काहीतरी सांगितलं. त्या महिलांनीही लगबग करून पंधरा-वीस मिनिटांत एक कापडी थैली आजोबांच्या हाती दिली. जवळच्या लष्करी तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं आणि तेवढ्यात आजोबा म्हणाले,”साब  म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टर उतरवलं गेलं, थैली शोधली गेली. सुरक्षिततेच्या कारणांसाठी त्या थैलीत काय आहे? याची तपासणी केली…थैलीत दोन कांदे, दोन बाजरीच्या भाकरी आणि पिठलं एवढंच होतं ! “ सॅम साब को बहोत पसंद है! कभी कभी हमरा खाना चखा करते थे बॉर्डर पर ” –आजोबांनी सांगितलं…हेलिकॉप्टरने पुन्हा भरारी घेतली !

रूग्णशय्येवर असलेले सेनापती माणेकशासाहेब या ‘पगी’ला पाहून उठून बसले.

“आओ, पगी…रणछोडदास…..!” साहेब आपल्या खणखणीत आवाजात उदगारले!  ‘पगी’ने त्यांना ताठ उभे राहून आणि थरथरत्या हातांनी सल्यूट बजावला. साहेबांनी त्यांना जवळ बसवून घेतलं….त्यांच्या हातातील पिशवी घेतली ! त्या दिवशी एक सैनिक आणि एक सेनापती एकत्र बसून जेवले ! कृष्ण-सुदामाची भेट आणि पोहे हीच कथा जणू पुन्हा घडत होती…सुदाम्याच्या शिदोरीत पोहे होते…  या सुदाम्याच्या शिदोरीत कांदा-भाकरी आणि पिठलं !

पग म्हणजे पाय हे समजण्यासारखं आहेच. परंतू ‘ पगी म्हणजे पायांच्या ठशांचा माग काढणारा किंवा वाळवंटातून वाट दाखवणारा !’  क्षितिजापर्यंत वाळूच वाळू, त्यात अंधार….नक्की कोणत्या दिशेला जायचं याबद्द्ल नवख्यांचा गोंधळ होणारच. पण राजस्थानातल्या याच वाळूत जन्मलेली, वाढलेली,गुरे-उंट हाकलेली आणि शेवटी याच वाळूत मिसळून गेलेली राजस्थानी माणसं वाळूचा कण न कण ओळखू शकतात…अंधार असला तरी !

१९०१ मध्ये या वाळूत, पशुपालक कुटुंबात आपल्या या कथानायकाचा जन्म झाला. नाव ठेवले गेले ‘रणछोडदास’! भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या जरासंधाशी झालेल्या युद्धात हे नाव जरासंधाकडूनच प्राप्त झाले…असे म्हणतात. युद्धात जनतेची हानी होऊ नये म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी, युद्ध योजनेचा एक भाग म्हणून, रणांगणातून तात्पुरते पलायन केले म्हणून ते रण सोडून जाणारे….रणछोड ! पुढे जरासंधाचा नि:पात झाला !

पण हे कलियुगातील आणि मानवी अवतारातील रणछोडदास १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारतीय सेनेच्या अग्रभागी राहिले होते ! आयुष्यभर वाळवंट तुडवलेले रणछोडदास उंटांच्या वाळूत उमटलेल्या पावलांच्या ठशांवरून, माणसांच्या पायांच्या खुणांवरून, एक ना अनेक गोष्टींचा अचूक अंदाज बांधायचे. किती उंट असतील? त्यावर किती माणसे बसलेली असतील? त्यांच्यासोबत चालणारे प्रवासी किती असतील? त्यात स्त्रिया किती आणि पुरूष किती असतील? त्यांची वजने आणि उंची किती असेल?….रणछोडदास यांचा अंदाज चुकायचा नाही..दिवस असो वा रात्र !

१९६५ मध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तान्यांनी कितीतरी वेळा भारतीय हद्दीमध्ये, कच्छच्या रणात घुसखोरी केलेली होतीच. युद्धाच्या आरंभी त्यांनी कच्छ भागातील विधकोट ठाणे काबीज केले होते. त्यात जवळजवळ १०० भारतीय सैनिक धारातीर्थी पडले होते. भारतीय सैन्याचे एक मोठे दल त्या भागाकडे पाठवले गेले. अंतर जास्त होते आणि रस्ते अनोळखी. तिथून जवळच असलेल्या छारकोटपर्यंत आपले सैन्य वेगाने पोहोचणे गरजेचे होते. पाकिस्तान्याचे १२०० सैनिक सीमेवरील एका गावाजवळच्या जंगलात लपून बसले होते. रणछोडदास यांनी त्यांचा अचूक माग काढला. आपल्या सेनेला अवघड वाटेवरून अचूकपणे आणि अत्यंत त्वरेने म्हणजे अपेक्षित वेळेपेक्षा बारा तास आधीच शत्रूपर्यंत पोहोचवले. इतक्या लवकर भारतीय सैन्य आपल्याला शोधून काढेल याची पाकिस्तान्यांना शक्यताच वाटली नव्हती. भारतीय जवानांनी पाकिस्तान्यांना धूळ चारली ! रणछोडदास या सामान्य ‘पगी’चा, वाटाड्याचा या विजयात मोठाच हातभार लागला ! बी.एस.एफ.अर्थात बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (अर्थात सीमा सुरक्षा दल आणि अर्थातच सीमा सुरक्षा बल) यांनी बनासकांथा येथील एका सैन्यचौकीला ‘रणछोडदास’ यांचे नाव देऊन त्यांच्या कर्तबगारीचा अनोखा गौरव केला आहे.

फिल्ड मार्शल माणेकशासाहेबांनी रणछोडदास यांची अनोखी क्षमता ओळखून त्यांच्यासाठी लष्करात ‘पगी’ (गाईड,वाटाड्या,पथ-मार्गदर्शक) हे विशेष पद निर्माण केले. या दूरदृष्टीच्या निर्णयाचा १९७१ च्या लढाईतही खूप फायदा झाला. पालीनगर ही पोस्ट जिंकून घेण्याच्या यशस्वी मोहिमेत पथ-मार्गदर्शन करणा-या रणछोडदास यांचाही मोठा वाटा होता. हे काम करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. याबद्द्ल माणेकशासाहेबांनी त्यांना स्वत:च्या खिशातून तीनशे रुपयांचे रोख पारितोषिकही दिले होते आणि त्यांना भोजनासाठीही आमंत्रित केले होते ! संग्राम मेडल, पोलिस मेडल आणि समर सेवा स्टार असे पुरस्कारही भारतीय लष्कराने रणछोडदास यांना प्रदान केले ! शौर्याची कदर करावी ती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांसारख्या जिंदादिल सेनानींनीच आणि भारतीय लष्करानेच !

माणेकशासाहेबांना आपल्या या गुणी, देशप्रेमी, धाडसी सैनिकाची आठवण न आली तरच नवल ! आपल्या अंतिम दिवसांत तर ही आठवण अधिकच तीव्र होत गेली….आणि त्यांनी ‘पगी’ रणछोडदास राबरी (राबडी) यांना अत्यंत सन्मानाने बोलावून घेतले.

२७ जून, २००८ रोजी  माणेकशासाहेब निवर्तले. ‘पगी’ रणछोडदास यांनी लगेचच म्हणजे २००९ मध्ये, त्यांच्या वयाच्या तब्बल १०८ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली….मानवी आयुष्याची १०० वर्षांची मर्यादा ओलांडलेले शरीर काम तरी किती दिवस करणार? वयाच्या ११२ व्या वर्षी अर्थात २०१३ मध्ये हा पगी स्वर्गाची वाट चालण्यासाठी कायमचा निघून गेला ! त्यांच्या पावलांचे ठसे राजस्थानातल्या वाळवंटाच्या मनात अजूनही ताजे असतील. जय हिंद !

आपल्यापैकी अनेकांनी ही माहिती पहिल्यांदाच वाचली असेल….मी ही नुकतीच वाचली. काही सैनिकी ज्येष्ठ अधिका-यांनी ही माहिती इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. ब-याच वृत्तपत्रांनीही रणछोडदास साहेबांविषयी भरभरून लिहिले आहे. मराठीत असे काही (माझ्यातरी) वाचनात आले नाही. मी जे वाचले त्याचाच हा स्वैर अनुवाद आहे. तपशीलात अर्थातच काही कमीजास्त असेल..दिलगीर आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या एका हिंदी युद्धपटात रणछोडदास यांची व्यक्तिरेखा दाखवली गेली, असे म्हणतात. संजय दत्तने ‘पगी’ कसा रंगवला असेल,देव जाणे ! हिंदी सिनेमावाले काय काय आणि कसे कसे दाखवतील याचा नेम नाही. असो. गुजराती लोकगीतांमध्ये रणछोडदास यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख होतो…यापेक्षा अधिक काय नाव मिळवावे एका सामान्य माणसाने? मन:पूर्वक सल्युट …. 

लेखक : संभाजी बबन गायके.

9881298260.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जोडीदार… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ जोडीदार… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

देवाला पण मानलं पाहिजे.

तो माणसांच्या जोड्या पण विलक्षण बनवतो.

 

एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाणं होईल हे त्याला माहीत असतं म्हणून तो

मित्रांच्या, प्रेमाच्या

अगदी

नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना

दोन अशा व्यक्तिमत्त्वांना एकत्रित आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील.

 

अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो,

गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो,

भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो

आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते,

ज्या योगे त्यांचं  कुठे अडणार नाही…

 

खरं तर

दोन व्यक्तींमध्ये फरक हा असणारच.

 

परंतु हा जो फरक आहे, तो ओळखून, तुम्ही कसे निभावता, हे जास्त महत्त्वाचं असतं.

 

कधी कधी आपण हतबल होतो..

कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला कळत नाही..

पण कोण चुकतं, त्यापेक्षा काय चुकतं

हे एकदा कळलं, की उत्तरं सोपी होतात.

 

अनेकदा आपला दूषित दृष्टिकोन हाच एक मोठा अडथळा असतो.

 

आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल,

तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो.

 

पण आपणही समोरच्याच्या * *अपेक्षांमध्ये उतरतो का, हा एक विचार करण्यासारखा विषय आहे.

वेगळेपण आहे म्हणून नात्यांमध्ये सौंदर्य आहे..

 

सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे,

नीरस होईल ?

 

उदास व्यक्तीच्या

सोबत उदास माणूस

कसं वाटतं ?

 

प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा,

एकटं राहू नये ह्यासाठी

मैत्री, जोडीदार, सहचर

अशा गोष्टी उदयास आल्या,

 

पण आपण मात्र आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगूल होतो की त्यांच्या वेगळेपणातील सौंदर्य बघण्याची तसदी कधी घेत नाही.

 

आपलं माणूस थोडसं वेडगळ आहे,

वेगळं आहे पण

गोड आणि प्रिय आहे, असा विचार करायला सुरुवात केली,

की त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जातं .

 

‘अनुरूप’ शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही नं ?

 

एकमेकांना अनुरूप म्हणजेच

जिथे एक कमी, तिथे त्याची कमतरता दुसरा भरुन काढतो.

कधी गुणांनी,

कधी स्वभावाने,

कधी विचारांनी….

 

म्हणूनच विविधतेत एकता असते.

 

ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर , संवेदनशील आणि मोहक नातं निर्माण होतं. जे आपल्याला जपते

आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो ……

 

जीवन सुंदर आहे।

सदा आनंदी रहा

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कुणाच्यही ह्रदयात शिरायचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच जातो अशी आपल्याकडे एक म्हण आहे. खरचं, आपल्याकडील खवैय्येगिरी बघितली की ही म्हण पटते सुद्धा. खाद्यसंस्कृती म्हंटली की त्यात दोन बाजू असतात. एक बाजू खाण्याची आवड असणाऱ्यांची आणि दुसरी बाजू सुगरणगिरी करीत मनापासून आग्रहाआग्रहाने खिलवणा-यांची.

खाण्याची आवड असणाऱ्यांमध्येही प्रकार असतात काही सरसकट सगळेच पदार्थ आवडीने,खाण्याचा मनमुराद  आनंद लुटणारे तर काही चोखंदळपणे नेमकेच विशिष्ट पदार्थ आवडून त्याचा मनापासून स्वाद घेणारे. मी माझ्याच बाबतीत अभ्यास केल्यावर लक्षात आलं,आधी शिक्षण,मग नोकरी ह्यामुळे स्वयंपाकघरात घुसघुस करणा-यातली मी नक्कीच नव्हे. त्यामुळे मला स्वतः ला शक्यतोवर घरचं,ताजं अन्न इतकीच माझी डिमांड मग बाकी नो आवडनिवड. फक्त एक गोष्ट जे काही पदार्थ करते ते होतात मात्र चवदार, सगळ्यांना आवडतील असे.आता ही कदाचित अन्नपूर्णेची कृपा असावी वा आपल्या जवळच्या माणसांच माझ्यावरील प्रेम, मला बरं वाटावं म्हणून गोड पण मानून घेत असतील बिचारे.

खिलविणा-यांमध्येही प्रकार असतात. काही अगदी ओ येईपर्यंत मनापासून आग्रह करून करून खाऊ घालणार तर काही मला आग्रह अजिबात करता येत नाही तेव्हा हवं तेवढं मनसोक्त पोटभर खा असा सज्जड दम देणारे.              

ह्या सगळ्यांमुळे आज अगदी हटकून घराघरात पोहोचलेल्या अन्नपूर्णेची आठवण प्रकर्षाने झाली. 20  एप्रिल ही तारीख खास सुगरण व्यक्तींच्या आणि त्या सुगरपणाला दाद देणा-या खवैय्ये लोकांच्या तोंडची चवच घालवणारी तारीख. 20 एप्रिल 1999 रोजी साक्षात अन्नपूर्णेची छाप असणा-या प्रतिअन्नपुर्णा म्हणजेच कमलाबाई ओगले ह्यांचा स्मृतिदिन.

कमलाबाईंना “सव्वालाख सुनांची सासू”असं म्हंटल्या जायचं.खरोखरच 1970 साली अगदी अल्पावधीतच मेहता पब्लीकेशन्सने प्रकाशित केलेल्या कमलाबाई ओगले ह्यांनी लिहीलेल्या “रुचिरा”ह्या पुस्तकाच्या सव्वालाख प्रती हातोहात विकल्या जाऊन त्यापासून ब-याच जणींना बरचं काही शिकता आलं ही गोष्टच खूप अलौकिक खरी. नवीनच संसाराला सुरवात करणाऱ्यांसाठी रुचिरा पुस्तक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले नवनीत ,बालविद्या डायजेस्टच जणू.

खरतरं कमलाबाई फक्त चार इयत्ता शिकलेल्या. पण दांडेकर घराण्यातून एका लहानशा खेडेगावातून लग्न करून त्या सांगलीच्या ओगले कुटूंबात आल्या आणि त्यांच्या सासूबाईंच्या हाताखाली पाकशास्त्रात एकदम पारंगत झाल्यात.पुढे त्यांचे वास्तव्य काही काळ आँस्ट्रेलियात पण होते.

त्यांच्या “रुचिरा” ह्या पुस्तकात मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे पदार्थांसाठी लागणा-या जिन्नसांची मापं ही चमचा वाटीने मापलेली आहेत.ते ग्रँम,मिलीग्रँम असं आखीवरेखीव मोजमाप माझ्यासारख्या वैदर्भीय खाक्याला झेपणारचं नव्हतं मुळी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकात असलेली साधी,सरळ,सोपी,चटकन डोक्यात शिरणारी भाषा.आणि तिसरी ह्या पुस्तकातील आवडणारी बाब म्हणजे ह्या पुस्तकातील पदार्थ हे आपल्याला नित्य लागणा-या जेवणातील वा आहारातील आहेत.जे पदार्थ आपण वर्षानुवर्षे, सठीसहामाशी कधीतरीच करतो अशा पदार्थांचा भरणा कमी व नित्य स्वयंपाकात लागणा-या अगदी चटण्यांपासून चा समावेश ह्या पुस्तकातं आहे.

मला स्वतःला हे “रुचिरा” पुस्तक बरचं पटल्याने,भावल्याने बहुतेक लग्न ठरल्यावर वा नुकतेच नवविवाहित मुलींना मी हे पुस्तक आवर्जून भेट द्यायचे.आतातर शिक्षणाच्या, नोकरीच्या निमीत्त्याने घरापासून दूर राहणाऱ्या तसेच लग्नाळू मुलांना पण हे पुस्तक भेट म्हणून द्यायला अगदी योग्य आहे.किमान स्वतःच्या उदरभरणाइतके तरी पदार्थ स्वतःचे स्वतः करता यायलाच हवे मग तो मुलगा असो वा मुलगी. कुठल्याही व्यक्तीने स्वतः हाताने आपल्या आवडीनुसार घरच्या घरी रांधणं ह्यासारखी तर उत्तम आणि फायदेशीर गोष्ट नाही. आपल्या घरात आपण जे शिजवू ते आपल्या चवीनुसार असेल,त्यात उत्तम जिन्नस वापरलेले असतील,स्वच्छता सांभाळलेली असेल आणि नक्कीच विकतच्यापेक्षा निम्म्या किमतीत हे पदार्थ घरच्याघरी बनतात.

ज्यांची ह्या रुचिरा वर श्रद्धा वा विश्वास होता त्या आमच्या शेजारच्या काकू कितीही खिळखीळं झालं असलं तरीही त्यांचं जुनं रुचिरा हे पुस्तक वापरायच्या.मला ते बघून कायम भिती वाटायची की खिळंखीळी झालेली ती पुस्तकाची पानं इकडची तिकडं का सरकली तर त्या पदार्थांची काय वाट लागेल कोण जाणे. म्हणून मी त्यांच्या वाढदिवसाला मुद्दाम नवीन रुचीराची प्रत भेट म्हणून दिली. तरीही त्या ग्रेट काकू नवीन पुस्तक छान कव्हर घालून शेल्फ मध्ये ठेवायच्या आणि ते जूनंचं पुस्तक बरोबर असल्यासारख्या वापरायच्या.

काहीही असो आज ह्याच रुचिराकार कमलाबाईंच्या पुस्तकातून वाचून, शिकून कित्येक नवीन सुनांच्या घरची मंडळी “अन्नदाता सुखी भव,अन्नदात्याचे कल्याण होवो”हे आपोआप म्हणायला लागले.

ह्या रुचिरावाल्या आजींच दिनांक 20 एप्रिल 1999 साली निधन झालं. पण आजही त्यांच्या रुचीराच्या रुपांत घरोघरी त्यांच अस्तीत्व जाणवतयं हे खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

??

☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।

निबंधाचा विषयमाझे प्रेरणास्थान “स्फूर्ती देवता)

(वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली.) इथून पुढे —

त्यांनी आम्हा भावंडांना अतिशय डोळसपणे खूप चांगले घडवले. वडील कधी पुण्या मुंबईला गेले की तिथून उपयोगी अशा नव्या वस्तू, पुस्तके, गावात जे  मिळायचे नाही ते आवर्जून आणायचे. आपण खेड्यात राहतो म्हणून मुले नवीन गोष्टींपासून वंचित राहू नयेत हा दृष्टिकोनच खूप मोठा होता.

आईवडील अतिशय धोरणी होते. आम्ही कॉलेजला जायच्या वेळेस त्यांनी पुण्यात घर घेतले होते .आम्ही चार भावंडे तिथेच राहू शिकलो. आम्ही दोघी बहिणी घरी स्वयंपाक करायचो. त्यासाठी आई माळशिरसहून सतत मसाले, चटण्या, पीठे, फराळाचे  पाठवायची. या प्रात्यक्षिकामुळे लग्नापूर्वीच आम्ही बहिणी तयार झालो होतो.

आई-वडिलांचे सहजीवन अतिशय आदर्श होते. दोघांनीही एकमेकांना मान देत कायम योग्य आदर केला. त्यांच्यातही मतभेद असतीलच पण ते कधी उघडपणे सर्वांसमोर आले नाहीत. अगदी आमच्या सुद्धा. कधीच टोकाची भूमिका नसायची. जे करायचं ते एकमेकांच्या साथीनंच. तो काळ एकमेकाबद्दलच्या भावनाज बोलून दाखवण्याचा नव्हताच. पण न बोलताच दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत, कौतुक करीत. आईला जेवायला थोडा जास्त वेळ लागायचा तर स्वतःचं जेवण झाल्यावरही वडील तिच्यासोबत गप्पा मारत बसायचे. ती भाजी निवडत असेल तर ते पण निवडू लागत. ह्या गोष्टी जरी लहान असल्या तरी त्यांचं प्रेम यातून दिसून येतं. त्यामुळंच त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्या काळात  घरातल्या बायकांना नुसतं गृहित धरलं जायचं. त्यांचं मत कुणी विचारायचं नाही तर निर्णय सांगितले जायचे. पण वडील प्रत्येक गोष्ट आईला सांगत असत आणि ती पण त्यांना योग्य साथ देई. ते कुठे गेले तरी तिला बरोबर नेत आणि ती पण त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी टापटिपीत असायची. दोघेही आनंदाचे, सुखाचे सहजीवन  जगले. सुखी संसारासाठी हा आमच्यासाठी वस्तूपाठच आहे.

जिथे जाऊ तिथे आनंद द्यायचा हे धोरण असल्याने आई कधी कुणाकडे मोकळ्या हाताने गेली नाहीच पण तिथे गेल्यावर कामाला हातभार लावायची. हेही अंगीकारण्या सारखेच आहे. आईवडील दोघेही गावातील सार्वजनिक जीवनात एकत्र हिरीरीने भाग घेत असत. गावातल्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले. त्यामुळे दोघेही लोकांमध्ये तितकेच लाडके, हवेहवेसे होते. यानिमित्ताने अनेक नामवंत साहित्यिक, वक्ते, नेते आमच्या घरी आलेले होते.

दुर्दैवाने वडील अचानकपणे ६६ व्या वर्षी गेले त्यांच्या माघारी २३ वर्षे आईने दोघांचीही भूमिका उत्तम निभावली. सगळी कर्तव्यं पार पाडली. आई एवढी कर्तबगार हिंडती फिरती, आनंदी पण शेवटी तिचे हाल झाले. पडल्यामुळे ऑपरेशन झाले. त्यावेळी एक गुडघा आखडल्याने पुढे ती चालू शकली नाही. बरीच वर्षे एका जागेवरच आली. हे परावलंबित्व स्वीकारणे सुरवातीला खूप जड गेले.पण शेवटी या वास्तवाशी तिने जुळवून घेतलं. कोणते भोग वाट्याला यावेत हे आपल्या हातात नसतं हेच खरं.

आपले आईवडील तर प्रत्येकालाच प्रिय असतात. शिवाय त्याकाळी बऱ्याच अशा कर्तबगार बायका होत्या. मग आईत विशेष काय ? तर तिच्यात अनेक चांगले गुण एकवटलेले होते. तिने ते जाणीवपूर्वक जोपासले होते. ती आदर्श गृहिणी, चांगली कलाकार, हाडाची शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती होती. त्यामुळे तिची शिकवणच होती जे काम करायचे ते चांगलंच, सुबक, आखीवरेखीव, परिपूर्ण करायचं. 

आजकाल व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक मार्ग, अनेक साधने उपलब्ध आहेत .पण आई-वडिलांच्या काळाचा विचार करता ही गोष्ट सोपी नव्हती. त्यामुळेच त्यांनी जीवनात अनेक गोष्टींमध्ये एक विशिष्ट आदर्श पातळी गाठली होती  ही कौतुकाची गोष्ट आहे. एकेका क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणारे असंख्य असतात. पण सर्वच क्षेत्रात अशी आदर्श पातळी गाठणारे फार कमी असतात. अशाच लोकांपैकी माझे आई वडील होते हे विशेष आहे.

हिऱ्याला जितके जास्त पैलू तितके त्याचे मोल जास्ती. त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाला शक्य तितके विकसित करावे. त्यासाठी अनेक कला आत्मसात करणे, अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवणे, सतत नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्यांचा अभ्यास करणे, जीवनाच्या सर्व अंगांचा आस्वाद घेणे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी स्वतः ती अंमलात आणलीच पण आम्हालाही ते बाळकडू दिले. आज कोणतीही नवीन गोष्ट करताना त्यांच्या विचारांनी नवीन उभारी मिळते. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते आणि काही अंशी त्यात यशस्वी झाले आहे ही समाधानाची बाब आहे.       

आईवडीलां पैकी फक्त एकाचेच स्वतंत्र कर्तृत्व सांगता येणार नाही. त्यात दुसरा  सहभागी असायचाच इतके त्यांचे जीवन एकमेकांत मिसळून  गेलेले होते. याचा नुकताच आम्ही अनुभव घेतला. २०२२ साली वडिलांची जन्मशताब्दी होती. त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या स्मृतींचे पुस्तक काढले. तर नातेवाईक, स्नेही यांच्या लेखांचा वर्षाव झाला. वडिलांना जाऊन ३४ वर्षे तर आईला जाऊन ११ वर्षे झालीत. पण अजूनही लोक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या आठवणींचे, सहवासाचे वर्णन वाचून मन भरून आले. सर्वांनीच दोघांबद्दल अगदी भरभरून लिहिले आहे. संत कबीरजींचा एक दोहा आहे,

           कबीरा जब हम पैदा हुए 

           जग हॅंसे हम रोये 

           ऐसी करनी कर चलो 

           हम हॅंसे जग रोये |

या उक्तीप्रमाणे आईवडील जगले आणि आमच्यासाठी मोठा आदर्श घालून दिला आहे.

आज समाजात कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत. अशावेळी आई-वडिलांच्या शिकवणीची गरज अधोरेखित होते. म्हणूनच हे स्मरण.

प्रत्येक व्यक्तीमधे अधिक-उणे असतेच. पण ज्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकांची बेरीज जास्ती तेच आदर्श होतात. म्हणूनच माझी आई माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी प्रेरणादायी व्यक्ती आहे.

              माहेरच्या पायरीला

                 टेकविला माथा 

              जिने जीवनविद्येची

                 शिकविली गाथा ||

— समाप्त —

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

इंग्रजांना झुकवणारी स्त्रीशक्ती . 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळं महत्त्व आहे. 

या दिवशी या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.

महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास आहे. ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिल १९२९ रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक २०० ते २५० महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथाला,  बंदी झुगारून शेकडो महिलांनी रथ यात्रा काढली होती. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला.  पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला.

या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा रथावर ठेऊन ” बलभीम हनुमान की जय ” चा जयघोष केला, आणि रथयात्रा व्यवस्थितपणे पार पाडली.  तेव्हापासून ही परंपरा आजही सुरु आहे.

आता या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.

माहिती संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print