मराठी साहित्य – विविधा ☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

शहरातल्या मुलींचा पंचमीचा सण फांद्यांवर बांधलेल्या हिंदोळ्याविना सुना-सुना जातो, तसा आमचाही गेला खरा; पण ती उणीव भरून निघाली श्रावणातल्या श्रवणीय कहाण्यांनी, श्रावणातल्या एकेक दिवसाला संस्मरणीय करण्याच्या घरातल्या श्रध्दामय संस्कृतीनं, स्वरातल्या हृदय कारुण्यानं !

‘पहिल्या आदितवारी मौनानं उठावं, सचैल स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी… ‘

आजीनं कहाणी वाचायला बसवल्यानंतर मी ती एका सपाट्यात वाचून काढत असे; पण त्यातलं काही समजत नसे. मात्र, पुढे ऐकताना व स्वतः वाचताना त्या आवडू लागल्या. त्या सर्व कळेपर्यंत श्रावण संपून जाई; मग पुन्हा पुढच्या वर्षी श्रावणाच्या कहाण्यांना सुरुवात होई.

दिव्याच्या अवसेच्या कहाणीतले दिवे अदृश्यपणे झाडांवर येऊन बसत. एकमेकांत बोलत. शुक्रवारच्या कहाणीतली बहीण दागिन्यांना जेवू घालत असे. पाटमधावराणी, चिमादेवीरांणी, सोमा परटीण, गरिबांना मदत करणारे शंकर-पार्वती जवळचे वाटत. घावनघाटल्याचा, खीर-पोळीचा, लाडवांचा नैवेद्य… साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण करण्याचं आश्वासन, हे सर्व फार आवडे. कहाणी ऐकणं, सांगणं, त्यातली उत्कंठा, चित्रमयता, ओघवत्या भाषेचा डौल, लय, छोट्या तात्पर्यातलं जीवनसूत्र… माझ्या गोष्टीवेल्हाळ मनाला रिझवून जात असे. कहाणी संपल्यावर हुरहूर वाटे.

आता तर कहाण्या सरल्या. त्याबद्दल वाटणारं सुनेपणही उरलं नाही. खूप खोलवर हृदयात मात्र कहाण्यांचे शब्द नांदतात. निर्मळ उदकाचं तळ, सुवर्णाची कमळं कधीतरी थरथरतात. त्यांना कहाणी सांगून मीच जोजवलं आहे. नागचवथीनंतर पंचमी, शिळा सप्तमी, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, श्रावणी सोमवार, जिवतीचे शुक्रवार… श्रावणातले एकेक दिवस भराभर येत आणि जात; पण घरातल्या माहेरवाशिणींच्या, नव्या सुनांच्या पहिल्या मंगळागौरीचा आठव येतो, तेव्हा श्रावण घमघमतो. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला आनंद ओसंडून वाहत असे. पूजेचं साहित्य, फुलपात्री, फराळाची तयारी, मुलींची बोलावणी… याची घाई उडत असे. त्यांचे लग्नातले शालू सळसळत असत. समवयस्क नवविवाहित मैत्रिणींचे हास्यविनोद, दबत्या आवाजातलं काही बोलणं… दोन-चार वर्षांपूर्वी निरोप दिलेल्या शाळेच्या आठवणी… पूजेची सामग्री सावरण्याची घाई… आरती, फराळ, जागरण, खेळ… माझ्या डोळ्यांवर झोप अनावर होई… त्यांच्या सौख्याचा गंध प्राजक्ताच्या फुलांतून, केवड्यातून ओसंडत असे. पतीचं नाव घेताना झक्क लाजणाऱ्या मुलींचे चेहरे घेऊन आलेला श्रावण आता लोपला. मंगळागौर पूजणाऱ्या त्या स्त्रियांचे संसार… त्यातले चढ-उतार पाहिले. त्यांनी धीरानं सोसलेली दुःखंही पाहिली… जीवनकहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी त्यांनी मंगळागौरीला मागितलेलं वरदान किती खरं ठरलं… बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ कवितेतल्या श्रावण महिन्याचं गीत ज्यांच्या चेहऱ्यावरून वाचून घ्यावं, अशा ‘ललना’ मी पाहिलेल्या आहेत… माझ्याच घरातल्या स्त्रियांनी श्रावणमासाचं सुरेल गाणं मला ऐकवलं आहे.

चित्रपटगीतांचा, भावगीतांचा पाऊस बरसत राहिला अन मी त्यातला श्रावण अलगद झेलला.

सावन-भादोची लयलूट असे गाण्यांतून. प्रियकरावाचून श्रावण म्हणजे भर पावसात जणू अग्नी तापतो आहे, श्रावणझडीसारखे डोळे झरत आहेत… अशा अर्थाच्या गीतांनी बहरलेल्या चित्रसृष्टीच्या गाण्यांतून माझ्या हाती पडलेल्या एक-दोन गाण्यांनी माझा श्रावण सजलेला आहे. सैगलच्या ‘देवदास’ मधल्या अजरामर गाण्यातली एक ओळ मला भिडते अन् त्यातल्या कारुण्यानं श्रावण भिजवून जाते……

 ‘सावन आया तुम ना आये… ‘

आजवर ऐकलेल्या श्रावणातल्या विरहगीतांतूनही ओळ नेमकी ओंजळीत येते.

‘बालम आये बसो मोरे मनमें ‘

या गीतातून सहा-सात दशकांचं अंतर पार होतं. ते जणू माझं सांत्वन करण्यासाठीच घडतं.

‘बंदिनी’तल्या शैलेंद्रच्या गाण्यातूनही मी श्रावण ऐकते.

‘अब के बरस भेज, भैय्या को बाबुल,

सावन में ली जो बुलाय के… ‘

लखनौकडे गायल्या जाणाऱ्या पारंपरिक चालीत बांधलेल्या गाण्यात आशाचा स्वर एका ओळीत रुद्ध होतो.

‘बैरन जवानीने छीने खिलौने

और मेरी गुडिया चुरायी

बाबुलजी मैं तेरे नाजोंकी पाली,

फिर क्यों हुई मैं परायी… ‘

सासर-माहेरमध्ये झुलणाऱ्या स्त्रीमनासाठी हिंदोळा नकोच. डोळे भिजायला पंचमीचा सण तरी कशाला हवा ! भातुकलीचा खेळ संपून खरा-खरा डाव हाती आला तरी ही हुरहूर का?

‘ क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे… ‘

… सारखा हा लपंडाव कशासाठी? श्रावण महिन्याची गीतं वाचायला ही आयुष्यं समजायला हवीत— की ती समजण्यासाठी श्रावण अनुभवायला हवा? मरगळलेल्या मनाला मात्र आता दूर रानात न्यायला हवं — बगळ्यांची माळ उडताना पाहायची आहे ना !

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गण ‘पती‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ शिक्षक दिन ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज शिक्षक दिन… सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना माझा सादर प्रणाम !!!

मनुष्य उपजल्यापासून मरेपर्यंत काहीना काही शिकत असतो, ज्ञान प्राप्त करीत असतो. ते ‘ज्ञान’ का ? कसे ? कोणासाठी ? व कधी आचरणात आणायचे हे ‘विवेका’ने ठरवावे लागते असे अनेक ‘महाजनां’नी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. हा ‘विवेक’ अंगी बाणवण्यासाठी अनेक जण आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करीत असतात मार्गदर्शन करीत असतात. ही सर्व मंडळी लौकिक अर्थाने किंवा पेशाने शिक्षक असतातच असे नव्हे!!

आद्यगुरू आई आणि बाबा. त्यांना माझा साष्टांग नमस्कार. पूर्व सुकृत चांगले असावे आणि भगवंताची कृपा झाली असावी, म्हणून मला उत्तम आईबाप लाभले.

सर्ग हा आपला एक उत्तम शिक्षक आहे. या सृष्टीत अनेक प्रकारचे जीव, जंतू, वनस्पती, प्राणी, पक्षी आहेत, ते आपापले जीवन जगत आहेत, परंतु त्यांच्यात वैर नाही, दुजाभाव नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही…

यातील एक गोष्ट जरी आत्मसात करता आली तरी मनुष्याचे जीवन अधिक सुखरूप होईल, नाही का ? एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जो मनुष्य आपल्याशी वाईट वागतो, (खरे तर तो त्याच्या स्वभावानुसार वागत असतो, त्यात चांगल वाईट काही नसते) तोच आपला उत्तम गुरू असतो. “चांगल वागणारी माणसे कसे वागावं हे शिकवतात आणि वाईट माणसे कसे वागू नये ते शिकवतात’. थोडक्यात सर्वजण आपल्यासाठी *गुरू*ची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे या सर्वांप्रति आपण कृतज्ञ राहायला हवे.

आजपर्यंत, मला असे अनेक ‘शिक्षक’ लाभले. त्यांच्यामुळे माझे जीवन समृद्ध होत आले आहे. ‘शिक्षकदिना’चे औचित्य साधून मी या सर्व ज्ञातअज्ञात ‘शिक्षकां’ना वंदन करीत आहे. परमेश्वर कृपेने मला लाभलेला हा अमूल्य वारसा पुढील पिढीला देण्याचा मी प्रयत्न करेन.

सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना ही शब्द सुमनांजली सादर समर्पण !!!

भारतमाता की जय!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

 (शिक्षकदिनाचे औचित्य साधून..) 

आई आपली आद्य गुरू हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नंतर वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या समुहात वेगवेगळ्या क्षेत्रात आपले गुरू बदलत जातात. अर्थात कितीही गुरू बदलले तरी त्या सगळ्यांनी दिलेल्या ज्ञानामुळेच केलेल्या मार्गदर्शनामुळेच आपण घडलेलो असतो. म्हणून त्या सगळ्यांचे स्मरण आज होणे गरजेचे आहे. त्या सगळ्यांना आदरपूर्वक वंदन 🙏🙏

पण या सगळ्यामधे लोक म्हणतात अनुभव हा गुरू मोठा आहे तर कोणी म्हणतात निसर्ग हा गुरू मोठा आहे. किती छान वाटते ऐकायला. हो आहेतच हे गुरू. पण या गुरुंबद्दलचे ज्ञान आपल्याला आपले मन देत असते. त्यामुळे मन हा मोठा गुरू आहे.

अनुभव जेव्हा आपल्याला येतो तेव्हा ती परिस्थिती काय चांगले काय वाईट याचा सारासार विचार करायला आपली बुद्धी आपले मन हे कार्यरत झालेले असते. ते मन आपल्याला त्या अनुभवांची तारतम्यता सांगत असते आणि ते तारतम्य देणारे मन हे अतिशय महत्वाचे असल्याने मन हा एक मोठा गुरू आहे.

निसर्ग हा पण गुरू आहे म्हटले तरी निसर्गातील प्रत्येक गोष्टीत काही चांगले आणि काही वाईट गुण हे असतातच. पण फक्त चांगल्या गुणांकडे बघायला आपले मन आपल्याला शिकवते म्हणून निसर्गातील एखादी गोष्ट आपल्याला आवडते. म्हणून ते शिकवणारे ते जाणणारे मन हा अतिशय मोठा गुरू आहे.

बघा ना फुलावर भिरभिरणारे फुलपाखरू पाहून आनंद नाही झाला असा माणूस विरळाच असेल. पण अशावेळी फुलपाखरू आधी सुरवंट होते किंवा याचे आयुष्य अवघ्या दीड दिवसाचे आहे हे माहित असले तरी त्याकडे कानाडोळा करायला त्या क्षणी त्या फुलपाखराचे स्वछंदी बागडणे बेधुंद होत मधु प्राशन करणे आपले रंगीबेरंगी पंखांनी उघडझाप करत लोकांच्या काळजाच्या फुलावरही अलगद बसणे याचा आनंद घ्यायला मनच शिकवत असते.

मन हा असा गुरू आहे की तो आपल्याला दिसत नाही पण एक क्षणही तो आपल्याला सोडत नाही. म्हणून आपल्या अंतर्मनाचा आवाज त्याची शिकवण जो नित्यनेमाने जपतो त्याला विजयाच्या शिखरावर जाता येते.

तसेच आपल्या हिताचा सर्वात जास्त विचार आपला गुरू करत असतो. मग या वेगवेगळ्या गुरुंपेक्षाही जास्त आपले हित आपले मनच प्रार्थित असतो. म्हणून आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या ज्ञात अज्ञात गुरुंबरोबरच माझ्या मनाच्या गुरूलाही साष्टांग नमस्कार 🙏

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सर.. माघारी या ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सर… माघारी या ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

हाताशी आलेला एकुलता एक मुलगा अकाली दगावला आणि कमल जीत सिंग उर्फ केजे सर सैरभैर झाले! ज्याच्यासाठी कमवायचं तोच आता या जगात नाही तर मग नोकरी करायची तरी कशाला? असा प्रश्न साहजिकच उभा राहिला!

भारतीय वायुसेनेत Warrant Officer म्हणून केलेली कित्येक वर्षांची सेवा अशी तडकाफडकी संपुष्टात आणायचा निर्णय त्यांनी काळजावर दगड ठेवून घेतला आणि वरिष्ठांना तसं कळवून टाकले!

केजे सरांशिवाय नव्या रंगरुटांचे (Recruits) पाय हलेनात! त्यांची passing out parade अगदी तोंडावर आलेली होती. पंचेचाळीस मुला- मुलींची बॅच होती. परेड काही कुणाच्या मनासारखी होईना. नवे instructor आले होते, मात्र पोरा पोरींना केजे पापाजींचा लळा लागला होता. खरं केजे म्हणजे प्रशिक्षणार्थी वायूसैनिकांचा कर्दनकाळ म्हणून कुप्रसिद्ध होते. मैदानात असा रगडा देत की आईचे दूध आठवावे. पण त्यांचे काळीज आईचे होते. जितके उत्तम प्रशिक्षण तेवढी उत्तम कारकीर्द यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे पद कवायत, व्यायाम, पथ संचलन यात जराही चूक त्यांना खपत नसे. तुम्ही भले नंतर माझ्यापेक्षा वरच्या पदावर जाल पण आता तुम्ही माझ्या आज्ञेत आहात.. मी सांगेन तीच पूर्व! असा त्यांचा खाक्या होता. मी तुम्हाला तुम्ही ऑफिसर झाल्यावर कडक salute ठोकेन की… असंही ते सैनिकांना सांगायचे. कुणाला दुखापत झाली, कुणी मनाने खचला की मग मात्र केजे काळजीवाहू आई होत. त्यांच्या तालमीत तयार झालेले अधिकारी याची साक्ष देत असत!

आता के जे सर शिकवायला येणार नाहीत हे समजल्यावर recruits मनातून खट्टू झाले. त्यांनी के जे सरांना एक पत्र धाडले..

प्रिय सर,

सत् श्री अकाल!

तुमच्या विना परेड नीट होत नाहीये. पासिंग आऊट जवळ आली आहे. तुमच्या पोरांची परेड वाईट झालेली तुम्हाला चालेल?

तुमचा एक मुलगा देवाघरी गेला… पण आम्ही पंचेचाळीस जण तुमची मुलेच आहोत की!

सर… please come back… soon!

पत्र वाचून के जे ढसाढसा रडले. आणि तडक परेड मैदानावर हजर झाले. नेहमीच्या पहाडी आवाजात पोरांना order दिली…. आज पोरांची पावलं नेहमीपेक्षा जास्त शिस्तबध्द पडत होती… सबंध संघ डौलात march करू लागला होता!

त्याचवेळी के जे सिंग सरांनी ठरवलं.. पुढील सर्व नोकरी या आपल्या लेकरांसाठी द्यायची… देवाने एक पोरगा हिरावून घेतला पण ही शेकडो पोरं पदरात घातली.. यांना पंखाखाली घेतलं तर त्यांना पंख फुटतील… ते उंच भरारी घेतील… देशाच्या सेवेसाठी सज्ज होतील. एका शिक्षकाला आणखी काय पाहिजे असतं?

(हैद्राबाद येथील भारतीय वायू सेना प्रशिक्षण केंद्रात warrant officer म्हणून कार्यरत असणाऱ्या कमलजीत सिंग यांची ही कहाणी.. आजच्या शिक्षक दिनानिमित्त. ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – २  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

 (जमिनीची कृषी संबंधित उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आहे, पाण्याच्या उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.) – इथून पुढे —-

 Climate change, वाढते तापमान यामुळे चक्रीवादळे, त्सुनामी यासारख्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत, त्याने infrastructure चं प्रचंड नुकसान होऊ लागले आहे, विमा कंपन्यांची आर्थिक गणितं विस्कळीत झाली आहेत.

तापमान वाढल्याने जास्त air conditioning वापरलं जाऊ लागलं आहे, आणि या अधिक वापराने आणखी कार्बन फुटप्रिंट तयार होऊन तापमान आणखी वाढतंय, असं एक कापूसकोंड्याच्या न संपणाऱ्या गोष्टीसारखं दुष्टचक्र सुरू झालंय.

पुढचं विश्वयुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी होईल म्हणतात, या वाढत्या ग्रीन हाऊस गॅसेसने तो दिवस आणखी आणखी जवळ येत चालला आहे. नैसर्गिक साधन संपत्तींसाठी झगडे होणार आहेत, स्थलांतरं होणार आहेत, होऊ लागली आहेत. ” 

मुलगा अत्यंत कळकळीने कैफियत मांडत होता.

 “अरे बाप रे. यातल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या घटना माहीत होत्या, पण यामागे सूत्रधार कार्बन फुटप्रिंट आहे, हे माहीत नव्हतं. पण मग या सगळ्यापासून वाचण्यासाठी उपाय काय ?” एखाद्या ऋषी मुनींनी शाप दिला, की ज्या अजीजीने उ:शाप मागितला जातो, तद्वत मी विचारता झालो.

“बाबा, उद्योगधंदे असोत किंवा तुम्हीआम्ही असोत, कार्बन फुट प्रिंट कमी करण्याचे काही मार्ग कॉमनच आहेत.

कमी इंधन वापरणारी यंत्रसामुग्री वापरणे – घरी मिक्सर, फ्रीज, AC चांगल्या energy rating चे घेणे. कमी ऊर्जा वापरणारे LED बल्ब वापरणे, कारखान्यांमध्ये शक्य असल्यास पवन ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, single use plastic चा वापर टाळणे, घन कचरा व्यवस्थापन (solid waste management), rainwater harvesting या आणि अशा अनेक गोष्टी घर आणि उद्योगधंदे या दोन्ही पातळींवर अतिशय समर्थपणे राबवता येतील.

 विशेषत: व्यवसायांत, जेथे शक्य आहे तेथे कागदाचा वापर कमी करता येईल का हे तपासून पाहणे. एकट्या भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकिटे वापरायला सुरुवात केल्यावर रोजच्या रोज टनावारी कागदाची बचत होऊ लागली आहे. प्रत्यक्ष meetings घेण्याऐवजी जर online meeting घेतल्या, तर प्रवासासाठी देण्याचे कंपनीचे पैसेही वाचतील आणि इंधन जाळणे टाळता येईल.

आयएसओ १४००१ सारखी पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली राबविल्यानेही कार्बन फुटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी करता येईल.” 

माझा चेहरा हळूहळू मी वर्गात बसल्यावर जसा बधीर होऊ लागायचा तसा होऊ लागतोय हे ध्यानात येताच चिरंजीवांनी चाणाक्षपणे चर्चाविषय गृहपातळीवर आणला.

“गरज नसताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे, AC चे तापमान २६° किंवा त्याहून जास्त ठेवणे, गळक्या नळांची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळणे या आणि अशा उपायांनी खर्चही कमी होतील आणि कार्बन फुटप्रिंटही. ” 

ही उदाहरणे माझ्या परिचयाची आणि आवाक्यातली होती, त्यामुळे मला ती चटदिशी समजली. “म्हणजे स्वार्थही साधला जाईल आणि परमार्थही, ” मी अनुमोदन दिले.

“Electric अथवा hybrid गाड्यांचा वापर करणे, शक्यतो सार्वजनिक परिवहन (public transport) चा वापर करणे, दोघा चौघांनी मिळून गाडीतून प्रवास करणे (carpooling), छोट्या अंतरासाठी शक्यतो पायीच जाणे, किंवा चारचाकी गाडीऐवजी दुचाकी वापरणे या सर्व गोष्टीही अवलंबता येतील. “

हा घाव जरा वर्मी लागला. “हो, म्हणजे, morning walkला मी उद्यानापर्यंत मोटारसायकलने जातो, ते उद्यापासून पायीच जात जाईन, ” मी कबूली दिली.

“आईच्या राज्यात असंही आपण पटकन कोणती वस्तू फेकून देत नाहीच म्हणा, ” माझ्या जबाबाकडे काणाडोळा करत चिरंजीवांनी ज्ञानामृत पाजणे सुरूच ठेवले, “जुन्या पँटच्या पिशव्या, जुन्या पिशव्यांची पायपुसणी असं recycling आपल्याकडे चालूच असतं, ” आई आजूबाजूला नाही याची खात्री करून घेत तो म्हणाला, मी मात्र चांगलाच कावराबावरा झालो. “टाकाऊतून टिकाऊ यानेही कार्बन उत्सर्ग कमी करण्यात मदत होते, ” त्याचं चालूच होतं.

“खरंतर, मांसाहार करण्याने कार्बन फुटप्रिंट खूप वाढतो. प्राण्यांचे १ किलो वजन वाढवण्यासाठी त्यांना ६-७ किलो अन्नधान्य खावे लागते. त्यामुळे चिकन मटणापेक्षा शाकाहार केल्याने निसर्गाला कमी त्रास होईल.

जसं ज्यायोगे कार्बन उत्सर्जन वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तसंच ज्या उपायांनी निर्माण झालेला कार्बन शोषला जाईल ते उपाय केले पाहिजे. सगळ्यात सोप्पं म्हणजे खच्चून बेदम झाडं लावली पाहिजेत. गेल्या वेळी म्हणे महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी झाडं लावली होती. अशी झाडं खरंच लावली असतील, तर त्यांचे संगोपन केलं गेलं पाहिजे. ही वृक्षवल्लीच तयार झालेला कार्बन डायऑक्साइड वापरेल आणि कार्बन फुटप्रिंट कमी करेल.

फिलिपाईन्स सरकारने २०१९ सालापासूनच विद्यार्थ्यांना पदवी मिळवायची असेल तर दहा झाडे लावणे आणि त्यांची निगा राखणे अनिवार्य केले आहे. दिल्ली विद्यापीठानेही अशा प्रकारचा उपक्रम २०२१ पासून सुरु केला आहे. राजस्थानमध्ये पिपलांत्री गावाच्या परिसरात प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर ग्रामस्थ १११ झाडे लावतात. ही आणि अशी उदाहरणे आपल्यासाठी आशेचा किरण आहेत.

कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय, तो कमी का व कसा केला पाहिजे याविषयी जनजागृती केली पाहिजे, ” इतकं सगळं बोलून चिरंजीव श्वास घेण्यासाठी थांबले.

मी आता त्याच्याकडे नव्या आदराने पाहू लागलो होतो. आपण समजतो तशी ही नवी पिढी अगदीच वाया गेलेली नाही. सामाजिक विषयांची त्यांना जाणीवही आहे, भानही आहे, आणि त्याविषयी ते कृतीशीलरीत्या जागरूकही आहेत, हे पाहून मी निश्चिंत झालो आणि गाडी, AC आणि अन्नाची नासाडी याविषयी शेजारच्या काकांचे बौद्धिक घ्यायला ताबडतोब निघालो.

(मी एखाद्या गोष्टीचे पैसे भरले आहेत, मग मी त्या गोष्टीचे काय वाट्टेल ते करेन – असा एक उद्दाम मतप्रवाह हल्ली आढळतो. मग यातूनच लग्न कार्यात अथवा हॉटेलांत ताटात भरपूर अन्नाची नासाडी करणे, भांड्यातील अथवा बाटलीतील थोडेसेच पाणी पिऊन बाकीचे फेकून देणे असे प्रकार सर्रास दिसतात.

माझ्या एकट्याच्या अशा कृतीने काय फरक पडणार आहे असं लंगडं समर्थनही केलं जातं, पण आपल्या सर्वांच्या अशा एकत्रित कृतीचा परिणाम भयाकारी असतो.

गाडीच्या आरशावर लिहिले असते त्याप्रमाणे objects in the mirror are closer than they appear – आपण जर वेळीच जबाबदारपणे वागू लागलो नाही, तर आपली व सभोवतालच्या निसर्गाची अपरिमित हानी होईल, ही जाणीव राखली पाहिजे.)

— समाप्त —

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुर्लक्षित राणी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ दुर्लक्षित राणी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एक राजाला चार राण्या होत्या.

!  पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?

!  दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!

!  तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?

!   चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!

!   राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, “मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?”

!  राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.

! राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, “मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.

! राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, “तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?

! तिसरी राणी म्हणाली, “मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.

! आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ? माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?

! तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.

! ती म्हणाली, “तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.

! राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि, जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली. ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.

! कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला.. ? त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला..

! तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.

🔸 आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.

🔸 आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात समाज.

🔸 आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, धन-पैसा आपल्या मृत्युनंतर आपली लगेच दुसऱ्याची होते.

🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे, आणि विना अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतंच असते… !

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कालाय तस्मै नम: ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ कालाय तस्मै नम:  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सुखकर्ता, दु:खहर्ता श्री गणेश म्हणजे, प्राचीन काळापासूनचे हिंदू-धर्मीयांचे आराध्य दैवत. कोणत्याही देवतेचे पूजन करण्याआधी किंवा शुभकार्यास सुरुवात करण्याआधी श्रीगणेशाचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आजही मोठ्या श्रध्देने पाळली जाते. दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी हे दहा दिवस, घरोघरी, गणरायाच्या मातीच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करून, तिची स्वतंत्र पूजा-अर्चा करण्याची प्रथाही गेली कित्येक वर्षे अखंडपणे पाळली जाते आहे. गणपती खरोखरच आपल्या घरी मुक्कामाला आले आहेत असे समजून, सारे घर, सारे वातावरणच त्यावेळी आनंदमय, चैतन्यमय होऊन जाते.

या घरगुती आनंदोत्सवाला, सार्वजनिक उत्सवाचे रूप द्यावे हा विचार सर्वप्रथम, स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांनी केला. तो काळ पारतंत्र्याचा होता. सारा देशच त्यात भरडला जात होता. ब्रिटिश सत्तेच्या जुलुमाविरुध्द आवाज उठवलाच पाहिजे म्हणून टिळकांसारख्या साहसी व देशप्रेमी व्यक्ती निर्धाराने सज्ज झाल्या होत्या. एवढ्या ताकदवान सत्तेविरुद्ध लढणाऱ्यांची ताकदही तितकीच जोरकस हवी हे जाणून, त्या दृष्टीने, समाजातील सर्व थरांतील लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात एकजूट निर्माण करणे, आणि त्या माध्यमातून ती परकीय राजवट उलथवून टाकणे सर्वप्रथम गरजेचे होते, हे लोकमान्यांना तीव्रतेने जाणवले. पण उघड उघड असे लोकांना गोळा करणे म्हणजे सरकारी रोष ओढवून घेणेच होते. म्हणूनच अत्यंत तल्लख बुध्दिमत्ता लाभलेल्या लोकमान्यांनी, देवाच्या नावाखाली समाजाला एकत्र आणता येईल, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांचे प्रबोधन करता येईल, हा एक अचूक विचार केला व तोपर्यंत घरगुतीपणे साजरा होणारा गणेशोत्सव, सार्वजनिकपणे साजरा करण्याची नामी युक्ती शोधून काढली. समाजातल्या प्रत्येक घटकाने त्यानिमित्त एकत्र यावे, जातीभेद विसरून, एकोप्याने, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जनतेचे त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, व स्वातंत्र्याच्या विचाराचे लोण आपसूकच मना-मनांमध्ये पसरून, सर्वांनी मिळून पारतंत्र्याविरुध्द एकजुटीने आवाज उठवावा, असा लोकमान्यांचा यामागचा विचार व उद्देश होता. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभर अनेक दिशांनी प्रयत्न केले जात होते. महाराष्ट्रात लोकमान्यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला असाच एक प्रयत्न होता. स्वातंत्र्याबाबत प्रबोधन करणारे अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अशा उत्सवातून, सरकारला अजिबात शंका येणार नाही, याची व्यवस्थित काळजी घेत राबवले जाऊ लागले. आणि “स्वातंत्र्य” ही संकल्पनाच नव्याने माहिती झालेल्या अनेक देशवासियांसाठी ते अत्यंत प्रेरणादायक ठरू लागले…

यथावकाश भारताला स्वातंत्र्य मिळाले, लोकांचे स्वत:चे राज्य आले, तरी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपली गेली. काही वर्षे खरोखरच खूप साधेपणाने, सोज्वळपणे हा उत्सव साजरा होत राहिला. त्यानिमित्ताने, उत्तम संगीत, उत्तम साहित्य, उत्तम कला यांचा आस्वाद सर्वसामान्यांनाही घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सार्वजनिक असूनही घरगुती वाटावा, अशा पावित्र्याने साजरा केला जाणारा, शब्दश: सर्वांचा, सर्वांसाठी असणारा हा उत्सव आहे असेच तेव्हा वाटत असे…

अर्थात सर्व सजग आणि सूज्ञ नागरिक हे सर्व काही जाणतातच.

पण स्वातंत्र्याचा परिपाक स्वैराचारात झाल्याचे अनेक सार्वजनिक क्षेत्रात जसे ठळकपणे दिसू लागले, तसे त्याचे पडसाद गणेशोत्सवावरही उमटू लागले अणि पहाता पहाता या सार्वजनिक उत्सवातले पावित्र्य, साधेपणा व आपलेपणाही हरवू लागल्याचे चित्र ठळकपणे दिसू लागले. ‘नको हा उत्सव’ असे वाटायला लावणारे त्याचे सध्याचे अनिष्ट रूप सूज्ञांना विचारात पाडणारे असेच आहे. सामाजिक भान ठेवून या निमित्ताने रक्तदानासारखे विधायक उपक्रम राबवणाऱ्या काही मोजक्याच मंडळांचा अपवाद वगळता, गणेशोत्सव म्हणजे धुडगूस, लोकांकडून बहुदा जबरदस्तीनेच गोळा केलेल्या ‘वर्गणी’ ची मूठभर लोकांकडून मनमानी उधळपट्टी, समाजहिताचा निर्लज्ज विसर, दुर्मिळ विजेची अनावश्यक व वारेमाप नासाडी, बेधुंदीसाठी नशेचा राजरोस वापर, आवाज, प्रकाश, धूळ यांचे प्रचंड प्रदूषण, त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या हालांकडे सोईस्कर दुर्लक्ष, असे सर्वच आघाड्यांवरचे भेसूर चित्र पाहून, खरोखरच हतबल झाल्यासारखे वाटते. “ चला.. गणपती आले … आता जरा enjoy करू या “ एवढ्या एकाच उद्देशाने आता लोक गणपती ‘ बघायला’ मुलाबाळांसह आवर्जून बाहेर पडतांना दिसतात …आणि “ सार्वजनिकता “ या शब्दाचा मूळ अर्थच पार पुसला गेला आहे हे ठळकपणे जाणवते. लोकांच्या ‘एकत्र’ येण्याचा असा विघातक अर्थ आणि वापर, विचार करू शकणा-या सर्वांनाच खरोखरच अस्वस्थ करतो. या सगळ्या अनिष्ट आणि पूर्णतः अनावश्यक गोष्टींचा आपल्या मुलांवर तितकाच अनिष्ट आणि नकोसा असा विपरीत परिणाम नकळत होतो आहे, हे हल्लीच्या ‘शिकलेल्या’ पालकांच्या ध्यानीमनीही नसते ही खरोखरच सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.

खरे तर, लोकमान्यांच्या मनातला सार्वजनिक गणेशोत्सवामागचा उद्देश आणि या उत्सवाचे आत्ताचे बीभत्स स्वरूप यातली ही प्रचंड तफावत पाहिली, की ‘ हे पाहण्यास लोकमान्य इथे नाहीत ते बरेच आहे ’ असे वाटल्याशिवाय रहात नाही… आणि असेही खात्रीने वाटते की ते असते, तर ज्या करारीपणाने, धडाडीने आणि देशाच्या तेव्हाच्या परिस्थितीत अतिशय दूरदर्शी अशा विचाराने त्यांनी हा उत्सव सुरू केला होता, तितक्याच.. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त करारीपणाने त्यांनी हा उत्सव बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असते….. अर्थात सतत बदलणारा काळ, प्रत्येक क्षेत्रात अकारण लुडबूड करणारे- स्वार्थाने बरबटलेले ‘ स्वदेशाचे राजकारण (?) ‘, आणि विचार करू शकणाऱ्या प्रत्येक जागरूक पण हतबल, आणि ‘ पण मी एकटा काय करू शकणार ? ‘ असा नाईलाजाने विचार कराव्या लागणाऱ्या नागरिकाला चिंतेत पाडणारी भरकटलेली.. दिशा चुकलेली सामाजिक मानसिकता – या सध्याच्या दारुण आणि दुर्दैवी परिस्थितीत लोकमान्यांना तरी हे काम आधीच्या सहजतेने करणे शक्य झाले असते का.. किंबहुना ( with due respect ) शक्य तरी झाले असते का ? — हा प्रश्न नक्कीच पडतो… वाऱ्याबरोबर तोंड फिरवणारे so called मुत्सद्दी राजकारणीच त्यांना असं करूच देणार नाहीत असं खात्रीने म्हणावसं वाटतं.

तसंही हा उत्सव आता खऱ्या अभिप्रेत अर्थाने “ सार्वजनिक “ राहिला आहे असं म्हणणं म्हणजे धादांत खोटं बोलण्यासारखंच आहे. सामाजिक मानसिकता जराशी तरी बदलू शकेल अशी शक्यता निर्माण करू शकणारा ‘ एक गाव एक गणपती ‘ हा साधा सोपा मार्ग सुद्धा हल्लीच्या तथाकथित दादा-भाऊ-अण्णा-काका-साहेब अशी ‘बिरुदं’ स्वतःच स्वतःला चिटकवणाऱ्या नेत्यांनाच विचारातही घ्यावासा वाटत नाही हे समाजाचे कमालीचे दुर्दैव आहे. आणि त्याची कारणे आता सगळा समाजच जाणतो.. पण.. पण तसे जाहीरपणे बेधडक बोलण्याची हिम्मत असणारा आणि त्याविरोधात लढण्यासाठी स्वतः सज्ज झालेला एकही अध्वर्यू “ लोकमान्य “ स्वातंत्र्योत्तर काळात उदयाला आलेला नाही हेच तर या देशाचे अतीव दुर्दैव आहे.

फक्त सार्वजनिकच नाही, तर घरगुती गणेशोत्सवातही काळानुरूप खूपच फरक पडलेला दिसतो. पूर्वीची एकत्र कुटुंबे विभक्त झाली, घरातल्या स्त्रीला अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागले. या सर्वांचा अटळ असा परिणाम, घरगुती गणेशोत्सवावरही अपरिहार्यपणे झालेला दिसतो. जगण्यासाठीची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत असतांना, एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करण्यातला निखळ आनंद, त्यानिमित्ताने सर्वांनीच एकमेकांना अधिक जाणून घेणे, एकमेकातले आपलेपणाचे बॉंडिंग नकळत वाढवणे, जबाबदारी वाटून घेणे आणि ती पेलण्यास उत्सुक होणे, आणि यातून निर्माण होणारी प्रसन्नता एकत्र साजरी करणे, हे सगळेच आता कुठेतरी हरवल्यासारखे.. खरं तर लोप पावल्यासारखे वाटते आहे.

घड्याळाचे गुलाम झाल्यावर, गणपतीसाठीही आता मोजून मापूनच वेळ उपलब्ध असतो, व तेवढ्याच वेळात या उत्सवाचे सर्व सोपस्कार बसवावे लागतात, ही अपरिहार्य म्हणावी अशी जीवनशैली बहुतेकांना बहुदा मनाविरूध्द स्वीकारावी लागलेली आहे. आणि हळूहळू ती अंगवळणीही पडलेली आहे. मग एकाच गावातले दोन भाऊ, गणपतीला एकमेकांकडे चार दिवस का होईना निवांत भेटतील, एकत्रपणे साग्रसंगीत पूजा-प्रार्थना करतील, घरीच हौसेने बनवलेल्या विविध नैवैद्यांवर ताव मारतील, आणि अगदी मनापासून या उत्सवात रममाण होतील, हे चित्र स्वप्नवत वाटू लागल्यास नवल नाही, आणि यात कुणाचीच, अगदी कळत-नकळत चूकही नाही, असे आजकाल अगदी प्रांजळपणे वाटत रहाते… तरीपण.. अगदीच न सोडवता येण्याइतका हा प्रश्न जटिल आहे का ?.. या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारार्थी असायला हवे… यात अडचण फक्त एकच —- “ मी.. आणि माझे.. “ ही फक्त शरीरानेच नाही तर मनानेही मनापासून विभक्त करायला लावणारी ‘ आधुनिक ‘ आणि so called अत्यावश्यक मानली जाऊ लागलेली व्यक्तिगत मानसिकता… जी खरोखरच चिंताजनक आहे…. मग सामाजिक मानसिकतेचा विचारही सहज वेड्यात काढता येण्यासारखा…. ‘ असो ‘.. एवढेच एखादा सुजाण आणि दूरदर्शी असणारा माणूस म्हणू शकतो नाही का ?…. तर “ असो “.

पण.. पण … नुकत्याच दोन आशादायक आणि आनंददायक बातम्या कळल्या आहेत त्या अशा की…….

१ ) नुकताच अनेक ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा जोरदार कार्यक्रम पार पडला. त्यातली एक हंडी होती पुण्यातल्या मंडईजवळ असलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्यासमोरच्या रस्त्यावर बांधलेली – नेहेमीसारखीच – पण या वर्षी विशेषत्वाने सांगायलाच हवा असा बदल म्हणजे त्या परिसरातल्या चक्क ३५ मंडळांनी एकत्र येऊन एकच हंडी बांधली होती …. आणि हा उत्सव यशस्वीरित्या साजरा केला होता. भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्ट या मानाच्याच मंडळाच्या पुनीत बालन नावाच्या तरुणाने यासाठी पुढाकार घेतला होता आणि अंधारलेल्या सामाजिक मानसिकतेला आशेच्या उजेडाचा एक कोवळा कोंब फुटल्याची आनंददायक जाणीव झाली.

२ ) दुसरी बातमी गणेशोत्सवाची. कसबा गणपती हे पुण्याचे आराध्यदैवत, आणि देवस्थानाचा गणपती हा उत्सवातील मानाचा गणपती. तरी त्या चिंचोळ्या आणि गजबजलेल्या कसबा पेठेत गल्लोगल्ली अनेक मंडळे त्यांचा स्वतंत्र उत्सव साजरा करत होते आणि रहिवाशांना मुकाट त्रास सहन करावा लागत होता. पण या वर्षी देवस्थानाने असा प्रस्ताव मांडला आहे की संपूर्ण कसबा पेठेचा मिळून एकच सार्वजनिक गणपती बसवायचा आणि सहभागी प्रत्येक मंडळाने, त्यांनी गोळा केलेल्या वर्गणीतून एकेक दिवस आरतीचे सर्व नियोजन … सर्व खर्च सांभाळायचा…. आणि तिथल्या इतर सगळ्या मंडळांनी ह्या प्रस्तावाला चक्क मान्यता दिलेली आहे असे समजते. ….

‘सारासार आणि सामूहिक विचार उत्तम काम करायला उद्युक्त करतो ‘.. हा लोकमान्यांचा महत्वाचा विचार आणि उद्देश पुन्हा असा नव्या मार्गाने नव्या प्रकारे रुजू लागला तर त्यापरता दुसरा आनंद तो कोणता ?

… यावर्षी सुखकर्ता दु:खहर्ता या आरतीबरोबरच ‘आता हा नवा सकारात्मक विचार समाजात पक्का रुजू दे.. फुलू दे फळू दे.. ‘ ही प्रार्थना मनापासून करत गणपतीला नमस्कार करता करता, आपण त्या जोडीने असेही आवर्जून म्हणू की- ‘‘कालाय तस्मै नम:”

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रेमाचे अपार आभाळ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रेमाचे अपार आभाळ ☆ श्री संभाजी बबन गायके 

दोन न्यायाधीशांसमोर ‘त्यांची’ सुनावणी सुरू होती! दोन्ही न्यायाधीशांनी एकमुखाने एक आदेश सुनावला…. यावर ‘ त्यांनी’ मोठ्या अदबीने म्हणलं, ” Yes, your honour!…. आपल्या आदेशाचे पालन केले जाईल!”

आणि या निर्णयावर शिक्कामोर्तब म्हणून त्या दोन्ही न्यायाधीशांनी मोठ्या प्रेमाने ‘त्यांचे’ हात हातात घेतले… लहान मुले आई- बाबांकडून एखादी गोष्ट कबूल करून घेताना करतात त्यासारखे! ‘त्यांनी’ही ह्या दोन्ही न्यायाधीशांना लवून नमस्कार केला! 

“ठरलं… यापुढे मी पूर्णपणे शाकाहारी राहीन!”

यावर दोन्ही न्यायाधीश गोड हसले.. आणि खटला निकाली निघाला! न्यायाधीश महोदयांच्या आई या खटल्यात साक्षीदार होत्या… त्या आपल्या या लेकींकडे कौतुकाने पहात होत्या.. किती तरी वेळ!

देशाच्या आदरणीय सरन्यायाधीश महोदयांच्या अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया (Chief Justice of India) श्री. धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या निवासस्थानी हा खटला चालला…. आणि न्यायाधीश होत्या कुमारी प्रियांका धनंजय चंद्रचूड आणि कुमारी माही धनंजय चंद्रचूड! साहेबांनी आपल्या हाताशी आणि हक्काचे दोन मोठे वकील, ॲडव्होकेट अभिनव धनंजय चंद्रचूड आणि ॲडव्होकेट चिंतन धनंजय चंद्रचूड, असतानाही त्यांच्याकडे आपले वकीलपत्र दिले नव्हते… कारण त्या घरात प्रियांका आणि माही यांचाच कायदा चालतो!

अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत असताना, २०१५ मध्ये चंद्रचूड साहेबांनी प्रियांका आणि माही या ‘ विशेष क्षमता ‘ असलेल्या मुलींना दत्तक घेतले.

वडिलांच्या पावलांवर पावले टाकीत न्याय क्षेत्रात नाव कमावलेली आपली दोन मुले अभिनव आणि चिंतन यांना धनंजय साहेबांच्या सोबतीला ठेवून सौ. रश्मी धनंजय चंद्रचूड २००७ मध्ये हे जग सोडून गेल्या… कर्करोगाचे निमित्त झाले!

यानंतर काही वर्षांनी साहेबांनी त्यांच्या क्षेत्रातील वकील कल्पना दास यांचेशी विवाह केला. कल्पना यांनीही प्रियांका आणि माही यांचे मातृत्व मोठ्या प्रेमाने स्वीकारले!

वडील सरन्यायाधीश, आई आणि दोन भाऊ मोठे वकील अशा चतु:स्तंभी न्यायमंदिरात या कन्यका आनंदाने, सुरक्षित रहात आहेत!

 या दोघींनी आपल्या बाबांना एक प्रेमाचा आदेश दिला…. “शाकाहारी व्हा! क्रूरतारहित आहार आयुष्याचा अंगीकार करा!” हुकूम सरआँखो पर… म्हणत गेल्या सहा महिन्यांपासून चंद्रचूड साहेब कसोशीने शाकाहारी झाले आहेत… आणि आयुष्यभर शाकाहारी (vegan) राहणार असल्याचं वचन त्यांनी आपल्या या लाडक्या लेकींना दिले आहे!

साहेब आणि कल्पना मॅडम यांनी रेशमी कपडे, वस्तू, प्राण्यांच्या कातडी पासून बनवण्यात आलेल्या वस्तू इत्यादी विकत घेणे पूर्णतः बंद केले आहे! आणि साहेबांनी मांसाहार पूर्णतः वर्ज्य केला आहे! 

५ ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात मा. सरन्यायाधीश महोदयांनी ही बाब उघड केली.

काही दिवसांपूर्वी धनंजय महोदयांनी प्रियांका आणि माही यांच्या आग्रहाखातर त्या दोघींना आपले कार्यालय दाखवायला आणले होते.. अर्थात सर्व नियमांचे पालन करूनच! आपले वडील एवढ्या मोठ्या कार्यालयात काम करतात याचा त्यांच्या निष्पाप चेहऱ्यांवरचा आनंद अवर्णनीय होता! धनंजय साहेबांना सारा देश your honour म्हणून संबोधित असताना आपल्या या लेकींचा honour साहेबांनी अगदी कसोशीने जपला आहे. त्यांच्या पालनपोषण, शिक्षणात कोणतीही कसर ठेवली नाही आजवर!

सर्वाधिक काळ देशाच्या सरन्यायाधीशपदी कार्यरत राहिलेले महान न्यायाधीश यशवंत चंद्रचूड साहेब यांच्या पोटी धनंजय साहेब जन्मले. वकील झाल्यावरही त्यांच्या वडिलांनी त्यांना वकिली व्यवसाय करू दिला नाही…. न्यायदानात पारदर्शकता रहावी म्हणून! मी देशाच्या सर न्यायाधीशपदी असेतो तुला वकिली करता येणार नाही, ही त्यांची अट होती! नंतर धनंजय साहेबांनीही ‘सवाई’ कारकीर्द केल्याचे जाणकार जाणतात! नोव्हेंबर २०२४ मध्ये साहेबांचा कार्यकाळ संपेल. त्यांनी कार्यकाळात निर्भिडपणे घेतलेले अनेक निर्णय जनतेच्या न्यायालयात नावाजले गेले आहेत. पदामुळे व्यक्तीला श्रेष्ठत्व प्राप्त होते हे जगरीतीस धरून आहेच.. परंतु व्यक्तीमुळे पदाला आणखी प्रतिष्ठा प्राप्त होते, हे धनंजय साहेबांच्या कर्तृत्वावरून सहजी ध्यानात यावे, असेच आहे! मानवी मूल्यांची स्वतःच्या वर्तनातून सकारात्मक जपणूक करण्याच्या वृत्तीची माणसे देशाला लाभली आहेत… त्यांचा आदर्श पुढीलांनी घ्यावा असा आहेच! 

सरन्यायाधीश माननीय श्री. धनंजय चंद्रचूड साहेबांना आणि त्यांच्या पत्नी सौ. कल्पना यांना आदरपूर्वक नमस्कार आणि साहेबांनी केलेल्या देशसेवेबद्दल आभार! Thank you, your honour!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बेस्ट झालं, आपल्यालास्वातंत्र्य मिळालं… – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ बेस्ट झालं, आपल्यालास्वातंत्र्य मिळालं… – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

बरं झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.

ते गोरे, साले रस्त्यामध्ये थूंकू देत नव्हते!

वेड्यासारखे रोज पाण्याने रस्ते धूत होते.

आपण किती भाग्यवान!

गुटका पान तंबाकू खाऊन

रस्त्यात कुठेही थूंकू शकतो!

छान झालं, स्वातंत्र्य मिळालं !!

ते इंग्रज, साले धान्यामध्ये भेसळ करू देत नव्हते.

मूर्खासारखे रेशनवर सकस धान्य देत होते.

आपण किती पुण्यवान

दूध अन्न औषधामध्ये

बेमालूम भेसळ करू शकतो.

बेस्ट झालं, स्वातंत्र्य मिळालं !

🤨

ते ब्रिटीश, साले शिक्षणाचा धंदा करू देत नव्हते!

अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण फुकटामध्ये देत होते !

आपण किती विद्वान!

शिक्षणाचा बाजार मांडून

पिढ्या बरबाद करू शकतो!

चांगलं झालं, स्वातंत्र्य मिळालं!

😱

ते जुलमी, साले अनाथ मुलांना भीक मागू देत नव्हते!

दळभद्र्यासारखे त्यांच्याकरिता अनाथाश्रम चालवित होते!

आपण किती दयावान!

अनाथ मुलांना पांगळे करून भीक मागायला लावू शकतो!

झकास झालं, स्वातंत्र्य मिळालं!

😩

ते मिशनरी, साले गरिब रूग्णांस हलाखीत मरू देत नव्हते!

ईश्वरसेवा समजून त्यांची सेवाशुश्रुषा करीत होते!

आपण किती करूणावान!

डाॅक्टरांचा संप घडवून रूग्णांचे हाल करू शकतो!

उत्तम झालं, स्वातंत्र्य मिळालं!

😟

ते फिरंगी, साले आपणाला लाच खाऊ देत नव्हते!

गाढवासारखे लाचखोरांस बुटांच्या लाथा घालीत होते!

आपण किती सचोटीवान!

लाचखोरांच्या मिळकतीमध्ये आपला वाटा ठेवू शकतो!

😟

बरं झाल, ते इंग्रज गेले !

पण जाता जाता, साले आपलं देशप्रेमही घेऊन गेले!

🇮🇳 एक भारतीय नागरिक 🇮🇳

लेखक : अनामिक

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गण ‘पती‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ गण ‘पती… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांची अधिष्टात्री देवता म्हणजे गणपती. प्रामुख्याने प्रचलित असलेली गणपतीची रूपे खालील प्रमाणे आहेत. कोणी त्याला लंबोदर म्हणतं, तर कोणी वक्रतुंड, कोणी मोरया तर कोणी भालचंद्र, कोणी सुखकर्ता तर कोणी दुखहर्ता, कोणी सिद्धिविनायक तर कोणी वरदविनायक. अशी बरीच नावे आपापल्या श्रद्धेनुसार भक्तांनी गणपतीला बहाल केली आहेत आणि गणपतीने देखील वेळोवेळी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाऊन वरील सर्व संबोधने सार्थ सिद्ध केली आहेत. खरंतर कोणत्याही देवतेचे सर्व गुण हे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, सर्वांगीण उन्नतीसाठी, सकल मंगल साधण्यासाठीच असतात. त्या देवतेच्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा त्या देवतेचे महात्म्य वाढविणे असा त्यामागील हेतू नसतो. थोडा सूक्ष्म विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की साधना किंवा भक्ती वृद्धिंगत व्हायला लागली की त्या त्या उपास्य देवतेचे गुण त्या साधकाच्या/भक्ताच्या अंगात प्रगट व्हायला लागतात आणि त्या गुणांमुळेच त्या भक्तांचे संकट हरण होते. पू. रामकृष्ण परमहंस यांनी अनेक प्रकारच्या साधना /उपासना केल्या. जेव्हा त्यांनी हनुमंताची उपासना केली तेंव्हा त्यांना हनुमंताप्रमाणे शेपूट फुटले होते असे वर्णन त्यांच्या चरित्रात आढळते

मला मात्र गणपतीच्या ‘गणपती’ या नावा बद्दल आणि कार्याबद्दल विशेष आदर आहे. ‘गण’ हा संस्कृत शब्द असून त्याचा समूह असा अर्थ होतो. एका अर्थाने गणपती ही नेतृत्वगुण असलेली सामाजिक देवता आहे. कुशल नेतृत्वगुण दाखविणारे, समाजातील सर्व घटकांना एकसंघ करणारे आणि त्यांना कार्यप्रवृत्त करून विजयी बनविणारी देवता म्हणजे गणपती. सैन्य म्हटले की त्यात अनेक सैनिकांचा समावेश होतो. सैनिकांना अनेक कौशल्ये आत्मसात असावी लागतात, अमुक एक गोष्ट येते आणि अमुक गोष्ट येत नाही, असे सैनिक म्हणू शकत नाही. सैनिकाला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागते आणि म्हणूनच या सर्वांचे नेतृत्व करणाऱ्या गणपतीकडे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपतीपद आले असावे. एक कल्पना अशी करता येईल की गणपती ही देवता असेलही, पण असे समाजाला संघटीत करून, योग्य नेतृत्व देऊन आणि त्याला कार्यप्रवण करणारे नेतृत्व जेंव्हा जेंव्हा आपल्या समाजात पुढे आले किंवा प्रयत्नपूर्वक संकल्पपूर्वक प्रस्थापित केले गेले, तेंव्हा तेंव्हा आपण विजयी झालो असे इतिहास सांगतो. अनेक राजे, महाराजे, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक या गुणांचे निःसंशय आदर्श आहेत.

खरंतर आपले सर्व सण हे सामाजिक अभिसरण, संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाचे प्रतीक आहेत असे म्हटले तर नक्कीच सार्थ ठरेल. मधल्या काळात आपण हे सर्व विसरून गेलो होतो. पण आपल्याकडील सामाजिक आणि राजकीय पुनरुत्थानाचे/ पुढाऱ्यांचे अर्ध्वयु लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सामाजिक बाजू आणि परिणामकारकता बरोबर हेरली आणि ‘माजघरा’तील गणपतीला ‘रस्त्यावर’ आणले ( सार्वजनिक केले) आणि त्यातून सामाजिक उन्नती साधण्याचा, बंधुभाव वाढविण्याचा आणि समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ब्रिटिश सरकार विरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग झाला. एक सामाजिक चळवळ म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना जनमानसात लोकमान्यांनी रुजवली आणि आज सुद्धा अपवाद वगळता ही सर्व मंडळे सामाजिक उत्थानाचे कार्य करीत आहेत.

सार्वजनिक गणपती आणि खासगी गणपती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात प्राण प्रतिष्ठित केले जातात. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले कार्य जर आपण त्या माध्यमातून करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने सामाजिक उत्थापन करणारी सर्वात मोठी चळवळ ठरेल, त्यासाठी कालानुरूप या चळवळीत शिरलेल्या अनिष्ठ प्रथा आपल्याला खंडित कराव्या लागतील. त्या काळात ब्रिटिशांशी लढायचे होते, आज मात्र आपले स्वकीयच शत्रू आहेत. आणि खरं तर आपली लढाई आपल्याशीच आहे. “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” अशी आपली प्रत्येकाची परिस्थिती आहे. पण ही लढाई तशी सोपी नाही, कारण शत्रू समोर दिसत नसल्यामुळे त्याचा प्रतिकार करणं अवघड आहे. मनातील सहा विकारांशी लढायचे आहे. त्यासाठी आपल्याला मन, बुद्धि, चित्त, वित्त, या सर्वांच्या साहाय्याने अंतर्मनातील या विकारांवर विजय मिळवायचा आहे. यात मन हे गणपतीचे प्रतीक आहे. मन गणपती होण्यासाठी मात्र आपल्याला साधना करावी लागेल, त्यासाठी आपल्याकडे अनेक मार्ग आहेत.

‘गणपती उत्सव’ साजरा करीत असताना मी व्यक्तिगत स्वरुपात काय काय करू शकतो याचा आपण थोडा विचार करूया. बहुतेक आपल्याही मनात असेच काही आले असेल. कारण सर्वाना बुद्धि देणारा एक गणपतीचं आहे.

# आजपासून माझा गणपती पर्यावरणानुकूल असेल.

# प्लास्टिक, थर्माकोल, मेणाचे दिवे, चिनी तोरणे यांचा वापर करणार नाही.

प्रसाद म्हणून घरी केलेला कोणताही पदार्थ असेल.

# कर्ण मधुर भारतीय संगीत असेल. (चित्रपट गीते नसतील)

# गणपतीच्या मूर्तीच्या उंचीची स्पर्धा न करता त्याचे गुण आत्मसात करुन माझ्या व्यक्तिमत्वाची उंची वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

# गणपतीच्या आरत्या शुद्ध स्वरूपात आणि तालात म्हणेन.

# माझे गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष तोंडपाठ असेल.

# आजपासून रोज सामूहिक रित्या गणपती स्तोत्राचे पठण करू.

# गणपती विद्येची देवता असल्यामुळे शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मी यथाशक्ती मदत करेन.

# आपण आपल्या कल्पकतेनुसार यात अनेक उपक्रमांची भर घालू शकतो.

आज चतुर्थीच्या निमित्ताने आपण सर्वानी मनाला ‘सबळ’ करण्याचा आणि आपल्याला शरीरातील सर्व इंद्रियांवर मनरुपी गणपतीच्या सहाय्याने विजय मिळवण्याचा संकल्प करूया. सुखकर्ता गणपती आपणा सर्वांना नक्कीच साहाय्यभूत होईल.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares