मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढी एकादशीचे दंडवत ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

आषाढी एकादशीचे दंडवत…  श्री सुहास सोहोनी ☆

अक्कड बक्कड, सख्खे भाऊ

दोघांनी ठरवलं, फिरायला जाऊ

अक्कड म्हणाला, तू वाट दाखव

बक्कड म्हणाला, तू वाट दाखव

*

जायचं कुठे, ठरलंच नव्हतं

रस्ता चुकायचं, कारणच नव्हतं

चाल चाल, चालत राहिले

पाय थकले, मोडुन गेले

*

भरकटल्यावर, संवाद संपला

कारण नसता, विवाद झाला

अक्कड म्हणे, डावीकडची वाट

बक्कड म्हणे, उजवीकडचा घाट

*

चालतच राहिले, अक्कड बक्कड

वाटेत त्यांना भेटला कक्कड

डोळ्यात हुशारी, डोक्यात अक्कल

वागण्या-बोलण्यात एकदम फक्कड

*

थकलेल्या जीवांना आधी

कक्कड देई कांदा भाकर

सुकलेल्या कंठांना सुखवी

थंडगार पाणी लोटाभर

*

कक्कड झाला गुरू तयांचा

अक्कड बक्कड झाले चेले

कक्कड सांगे मेख आतली

अक्कड बक्कड बघत राहिले

*

प्रथम ओळखा स्वतः स्वतःला

जाणुन घ्या तुमच्या शक्तीला

अंतर्मन तू असशी अक्कड

बहिर्मनाचा धनि तू बक्कड

*

स्वभाव भारी चंचल तुमचे

एका जागी नाही बसणे

लगाम तोडून सैरावैरा

भरकटणे अन् धावत सुटणे

*

कुठे जायचे, ठाऊक नाही

वाट कोणती, माहित नाही

हात मिळवुनी जाल पुढे तर

दैवदत्त मग मिळेल काही

*

चालत गेले चालत गेले

रात्री सरल्या दिवस संपले

मैलोगणती अंतर सरले

दैवाने परि काहि न दिधले

*

निराश झाले भाऊ दोघे

तोच कानि ये ध्वनि लयकारी

मृदुंगासवे टाळ वाजला

विठुनामाची हो ललकारी

*

बघता बघता गुंतुनि गेले

नकळत दिंडित सामिल झाले

अबीर बुक्का कुणी लावला

उतावळी जाहली पाउले

*

मंदिरि येता मस्तक लवले

नेत्रामधुनी अश्रू झरले

एक विचारे, एक मनाने

दो बंधुंचे सख्य जाहले

*

दर्शन घेता मुखचंद्राचे

पारावार न आश्चर्यासी

अविश्वासे स्थितीहि अवघड

उभा विटेवरि साक्षात कक्कड !!

उभा विटेवरि साक्षात विठ्ठल !!!

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वागत ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

स्वागत

वर्षाबाईचं लगीन ठरलं,

 वरूणराजाच्यासंग!

 सुपारी फुटली,आवतण देतो,

 मेघ,बिजलीच्या संग!

 गुलाल उधळीत,समीर जाहला

 पहा कसा बेधुंद!

 साथ देतसे धरती तयाला, दरवळतो मृदगंध!

 सुरू जाहली पहा तयारी,

 नटण्या-सजण्याची,

 आली टवटवी,अंगे धुवूनी,

   वेली-वृक्षांसी!

 अलंकार हिरे-मोत्यांचे,

 वैभव मिरविती,

 नाचत,डोलत आनंदाने,

 गुजगोष्टी करती.

 शालू पोपटी,नेसून सजली

  अवघी ही सृष्टी,

रूप खुलविते ,चोळीवरची,

 रंगबिरंगी नक्षी!

 किलबिल किलबिल करती पक्षी,वाजे शहनाई,

 तडतड तडतड घुमला ताशा ,

 घाई मुहुर्ताची!

 कडकड,चमचम,बिजली या, लवलवते  मंडपी !

 लगीन लागलं आकाशी अन्

  जलधारा अंगणी,

 स्वागत करूया,आनंदाने            

    झेलूया पावसाच्या सरी!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असताचे अस्तित्व… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

✍️असताचे अस्तित्व… 💖🌹☆ सुश्री अपर्णा परांजपे

जाणीव नेणीव..

एक तरी ओवी अनुभवावी…

ये हृदयीचे ते हृदयी…

मोगरा फुलला..

गा रे कोकिळा गा….

अश्या असंख्य ओळी ह्या ओळी नसून आत्मस़ंतुष्टी आहे असे जाणवले व शाश्वत आनंदात परावर्तित झाल्या की आपल्याच ह्दयाचा सन्मान झाला असे समजण्यास हरकत नसावी.

पिंडी ते ब्रह्मांडी…या उक्तीप्रमाणे जे बाह्यजगत आहे तेच आत आहे निश्चितच.

व्यर्थ जमवाजमवी दु:खास आमंत्रण देते हे पक्के मनाला समजावयाचे.

“मन चिंती ते वैरि न चिंती” हे “सकारात्मक* घेतले तर मनासारखा सखा नाही. मनाने आपले ऐकावे, आपण मनाच्या आधीन होऊ नये. मग मनासारखा सखा नाही.

मन सत्याकडेच दृढ करावे‌ मग आपल्या अस्तित्वाची “जाणीव” होते, ज्यात हृदयास अग्रक्रम असतो.

“स्वत: च्या हृदयाची साक्ष व साक्षीदार आपण” वा वा वा काय हा दुर्मिळ योग.

नराचा नारायण तोच मी….

तोच मी….

🦋 सुरवंटाचे फुलपाखरात परिवर्तन 🦋

✨भगवंताने कशातच भेदभाव केला नाही. आपापल्या कर्मानुसार काही तरी सहन केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही !! पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी क्लेशदायक प्रक्रियेतून जावेच लागते याचे हे चालते बोलते उदाहरण आहे.

किती यातना होत असतील त्या जीवाला !! पण कोषातून बाहेर पडल्याशिवाय मोकळ्या  आसमंतात भरारी घेता येत नाही व सौदर्याची अफाट उधळणही शक्य नाही.

आपल्याच कोषात राहिलो तर त्याच कोषात मृत्यू अटळ आहे संधीचे सोने करण्यासाठी आपला तो कोष फाडूनच बाहेर पडावे लागते. हे सगळे निसर्ग आपल्याला शिकवत असतो. साप, गरूड अशी उदाहरणे आहेत ज्याकडे पाहून आपला comfort zone सोडणेच आवश्यक आहे हे कळते व मग तटातट पाश‌ तोडून स्वैर बागडण्यास ही सुवर्णसंधी आहे हे लक्षात येते.

या लहानशा जीवाला जर हे आपोआप जमते असे वाटते पण त्यासाठीही त्याचा पक्का निग्रह कारणीभूत ठरतो. त्यांना ती नैसर्गिक देणगी आहे त्याप्रमाणे ते वागतात. आपल्याला ही विशेष देणगी ईश्वराने प्रदान‌ केली आहे  फक्त त्याचा उपयोग करता यावा इतकेच!!

आपला वेगळा अनुभव आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो व इतरांना प्रेरणादायी ठरू शकतो.

सामान्य काम करत राहिलो तर असामान्य अद्भुत असे आपल्या जीवनात परिवर्तन होऊ शकणार नाही.

🥀…🌺🌺

कळ्यांची फुले होणे हेच झाडांचे ही ध्येय असते!!

क्लेशदायक प्रक्रिया पार करून अगदी तसेच परिवर्तन आपल्या जीवनात घडवून आणणे हेच आपले परमकर्तव्य आहे !!

मग सुरवंट फुलपाखरू झाल्यावरचा नितळ परमानंद शिल्लक राहतो..

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन बोधकथा : प्रयत्नांती परमेश्वर… / करावे तसे भरावे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ दोन बोधकथा – प्रयत्नांती परमेश्वर… / करावे तसे भरावे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(१) प्रयत्नांती परमेश्वर…

अजय विजय दोघे मित्र. अभ्यासात खेळात अतिशय हुशार. दोघे मोठे झाल्यावर चांगले नाव कमावतील अशी सगळ्यांना खात्री. दहावी 90 टक्केपेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण झाले. दोघांनीही सायन्स निवडले.

परंतु 10 वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या दोघांनाही ते अवघड वाटू लागले. अजय प्रयत्नवादी असल्याने आजपर्यंतची घोकंपट्टी करून अभ्यास करायची पद्धत त्याने सोडून समजून घेऊन मग स्व अध्यनाची सवय लावून जिद्दीने आपल्या शिक्षण पूर्तीकडे पावले टाकू लागला.

विजय मात्र अवघड आहे… कसे जमणार… समजत नाहीये… अशी कारणे सांगून पहिल्या काही महिन्यातच त्याने शाखाच बदलून कॉमर्स निवडले आणि पुढील शिक्षण सुरु केले.तेथेही अकाउंट्स अवघड वाटल्याने क्लासला जाऊन तो बीकॉम झाला.

अजयही बी एस सी झाला. आवडू लागल्याने पुढे इंजिनिअर झाला. Ms करण्यासाठी परदेशात गेला.नोकरी करत शिक्षण  करत Ms पण पूर्ण केले आणि गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी पण लागली.

विजय मात्र बीकॉम नंतर ca करावे म्हणून त्यासाठी प्रयत्न करू लागला. पण अवघड… जमेना… दिले सोडून. Mba साठी ऍडमिशन घेतली पण तेही जमेना… लॉ करावे वाटून तेही प्रयत्न केले पण ते सुद्धा जमले नाही.

शेवट खूप खटाटोप करून कोणाच्या तरी वशिल्याने एका खाजगी कंपनीत चिकटला एकदाचा. पण पगार कमी म्हणून जेमतेम महिनाखर्च भागवून जीवन जगू लागला.

गावातले सगळे आश्चर्य चकितच झाले. असे कसे झाले? का झाले? दोघेही बुद्धिमान समजत असताना एकावर अशी परिस्थिती का आली?

गावातली एक आजी म्हणाली पडलो झडलो तरी चालेल पण प्रयत्न कधीच सोडले नाही पाहिजेत. ओल्या झाडावर चढू पहाणारे माकड चार फूट वर गेले तर तीन फूट खाली येते. परत प्रयत्न केला तर तसाच अनुभव येऊनही ते दोन फूट वर पोहोचलेले असते. असेच प्रयत्न चालू ठेवले तरच ते शेंड्यावर पोहोचू शकते.

किंवा दह्यात पडलेल्या बेडका प्रमाणे जो प्रयत्न सोडतो तो दह्यात बुडून मरतो पण जो प्रयत्न करत रहातो तो दह्याचे ताक करून त्यावर निर्माण झालेल्या लोण्यावर उभे राहून उडी मारून बाहेर पडून स्वतःची सुटका करू शकतो.

येथे अजयने प्रयत्न सोडले नाहीत. अपार कष्ट घेतले त्याचे फळ म्हणून त्याचे चांगले झाले. तर विजयने प्रयत्नच सोडले दुसरा मार्ग निवडला त्या मार्गावर पण अडचणी येताच जाऊदे म्हणून सोडून देत गेला परिणामी तो त्याच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकला. त्याचे वाईट काही झाले नाही असे म्हटले तरी फार प्रगती झाली नाही ध्येयापासून भरकटला हे सत्यही कोणी नाकारू शकत नाही.

म्हणूनच कोणी कधीच प्रयत्न करणे सोडू नये. त्यामुळे नकळत का होईना थोडी थोडी प्रगती होत असते हे निश्चित. मग ध्येय साध्य होणारच. कितीही झाले तरी प्रयत्नांती परमेश्वर हे खरेच.

(२) करावे तसे भरावे…

राहुल आणि सचिन दोघे जिवलग मित्र. दोघांनाही एक एकच मुलगा. सारख्याच वयाचे. राहुल आणि त्याची बायको रागिणी दोघेही चांगल्या कंपनीत नोकरीला. त्यामुळे त्यांचा मुलगा रोहन लहानपनापासून पाळणाघरात राहिला. अगदी पहिली पासूनच त्याला बोर्डिंग स्कुलमध्ये घातले. अगदी अद्ययावत सुविधा त्याच्यासाठी नेहमीच उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे खूप चांगले शिक्षण त्याने घेतले पण पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला आणि आपल्या आवडीच्या मुलीशी विवाह करून तेथेच स्थायिक झाला.

सचिन पण चांगल्या हुद्द्यावर चांगल्या कंपनीत कामाला. त्याची बायको सुप्रिया पण सुशिक्षित चांगल्या नोकरीत होती. पण मुलगा सर्वेशच्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली. काही दिवस ती घरीच होती. मग सर्वेश शाळेत जाऊ लागला आणि तिने ट्युशन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे ती घर तर सांभाळू शकत होतीच पण सर्वेशकडे लक्ष देतादेता आता अर्थार्जनही करू शकत होती.

सर्वेशही इंजिनियर होऊन अनेक छोटे मोठे कोर्सेस करून त्याने आधी काही वर्ष नोकरी करून स्वतःची इंडस्ट्री उभी केली. आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशी विवाह केला. ती पण त्याला व्यवसायात मदत करत होती.

अगदी दोन्ही मित्रांचे सगळेच उत्तम चालले होते.राहुल सचिन दोघेही रिटायर्ड झाले होते. राहुल रागिणीला मुलाबद्दल खूप अभिमान होता. पण रिटायर्ड झाल्यानंतर काही दिवस ते परदेशात जाऊन राहूनही आले पण परत आल्यावर त्यांना एकटेपण जाणवू लागले. मुलगा आपल्यापाशी नाही ही खंत सतावू लागली. रोहनला त्यांनी भारतात परत ये म्हणून सांगितले पण त्याने नकार दिला.

परंतु सचिन सुप्रिया अगदी समाधानाचे आनंदाचे जीवन जगत होते. नातवंडा बरोबर रमत होते. सर्वेश आई बाबांकडे विशेष लक्ष देत होता काळजी घेत होता.

राहुलला सचिनचा हेवा वाटू लागला. उगीचच मनात तणाव वाढून मैत्रीत अंतर पडू लागले.

काही दिवसात रागिणी देवाघरी गेली आणि राहुल याहूनच एकटा पडला. एकाकीपण खायला उठले तेव्हा रोहन काही दिवसांसाठी आला. त्याने राहुलला परदेशात या म्हटले पण राहुल तयार नसल्याने त्याने निर्विकारपने राहुलची व्यवस्था वृद्धाश्रमात केली आणि तो परदेशात जायला निघाला तेव्हा राहुल म्हटला नको रे रोहन मला असे येथे सोडून जाऊ. रोहन लगेच म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या सोयीसाठी मला पाळणाघरात ठेवले होतेच की. नंतरही तुमच्या पार्ट्या, नोकऱ्या याच्या आड मी येऊ नये म्हणून मला बोर्डिंगमध्ये ठेवलेच होते की. मग मी माझ्या सोयीसाठी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं तर कुठं बिघडलं?

नाईलाजाने राहुल वृद्धाश्रमात राहू लागला.

सचिन पण वयानुसार अशक्त झाला होता. पडल्याचे निमित्त होऊन त्याचे दोन्ही पाय अधू झाले होते. पण सर्वेश रोज रात्री सचिनची सेवा करायचा सुट्टीच्या दिवशी महिन्यातून दोनदा तरी पाटकुली घेऊन बाहेर नेऊन आणत होता.एकदा राहुलला भेटायला सुद्धा घेऊन गेला . सर्वेश सगळे आनंदाने करत असल्याचे पाहून राहुलने विचारले तू कसे हे करतोस? तेव्हा सर्वेश म्हणाला मी लहान असताना बाबांनी नाही का मला शी शू साठी नेले? साफही केले? मला पाठकुली घेऊन इकडे तिकडे फिरवले? अगदी माझ्या मुलासाठी पण केले. मग आता मी तेच त्यांच्यासाठी केले तर कुठे बिघडलं?

सचिन राहुलला भेटून गेला आणि मग त्याला त्याच्या आयुष्यातली मोठी चूक समजली. न कळतं तो बोलून गेला करावं तसं भरावं हेच खरं…

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनातला पाऊस” – लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “मनातला पाऊस” – लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

श्री मयुरेश उमाकांत डंके

॥मनातला पाऊस॥

(देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका ***) 

काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती. 

अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.

पहाटे साडेतीन च्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला)

पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे. 

कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का? 

काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला. 

“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.” 

“मग?”

“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”

“मग तुम्ही काय केलंत?”

“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”

“मग आता?”

“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”

त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं. 

“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो. 

ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”

“मग काय, पैसे कमवू नयेत का?”

“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”

“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी. 

“ पण, ती फसवतीलच हे कशावरून?”

मी पुन्हा सपशेल आडवा. 

“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”

शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं. 

“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं. 

मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं. 

“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले. 

“तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?” 

“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती. 

“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”

आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो. 

“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं. 

“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”

त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक- प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. 

मो 8905199711

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकची विठ्ठल सावळा, ज्याचा त्याचा वेगळा ! – लेखक :  श्री मकरंद करंदीकर ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ एकची विठ्ठल सावळा, ज्याचा त्याचा वेगळा ! – लेखक :  श्री मकरंद करंदीकर ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(विविध व्यवसायाच्या संतांच्या दृष्टीतून)

विठ्ठलाचे रूप म्हणजे शेकडो वर्षाच्या मराठी संस्कृतीचे एक खूपच वेगळे स्वरूप आहे ! सगळ्या  भक्तांचा, जातीपातींचा, व्यावसायिकांचा, बलुतेदारांचा तो देव ! मातीसारखा, अत्यंत वात्सल्याने भरलेल्या धरतीसारखा !! जेवढे तुम्ही पेराल त्याच्या कितीतरी पटीने तो तुम्हाला परत करतो. बरं त्याला तुमच्याकडून हवं तरी काय तर फक्त तुमची भक्ती, तुमचे शब्द, तुमचं प्रेम याचा तो भुकेला..

या विठ्ठलाने शेकडो वर्षे, महाराष्ट्राची अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, संगीत, कला अशी सगळीच क्षेत्रे समृद्ध केली. अठरापगड जातींच्या समाजाला भक्तीसमृद्ध केले. अध्यात्मातील चारीही मुक्तींचा सोपा मार्ग, समाजातील शेवटच्या पायरीवरील माणसांनाही कळला. पुरुषसूक्तात जरी ” ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् ” अशी उपमा दिली असली तरी जगातील कुठलाही हिंदू ( अगदी ब्राह्मणसुद्धा ) हा देवाच्या मुखाला हात लावून नमस्कार करीत नाही. परंतु  ” पद्भ्यां शूद्रो अजायत ” अशी उपमा  दिलेल्या  पायांनाच हात लावून, पायांवर डोके ठेवूनच नमस्कार केला जातो.

संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भगवतगीता प्राकृतात आणली आणि मराठीत एक अध्यात्मिक क्रांतीच झाली. येथे त्यानंतर तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रत्येक जाती व्यवसायात थोर संत होऊन गेले. अनेकांचा विविध कारणांनी छळ झाला तरी त्यांनी विठ्ठलाला सोडले नाही. खुद्द ज्ञानेश्वर माउलींनी, त्यांच्या कुटुंबीयांचा अपरिमित छळ होऊनही कुणालाही शिव्याशाप दिले नाहीत. उलट देवाकडे पूर्ण विश्वाच्या भल्याचे पसायदान मागितले.

नंतरच्या मांदियाळीतील  संतांच्या स्वभाव, व्यवसाय, कार्यानुभवांमुळे एकच विठ्ठल त्यांना कसा कसा दिसला, भावला हे पाहणे आपल्याला भावणारे आहे.

संत गोरा कुंभार आपल्या अभंगात ” देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ” आणि  ” न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ” असे म्हणतात. 

संत नरहरी सोनार तर थेट विठ्ठलाला आपल्या व्यवसायातील वर्णन सांगतात — देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।। देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ।। त्रिगुणाची करून मूस । आत ओतिला ब्रम्हरस ।। जीव शिव करूनी फुंकी । रात्रन्‌दिवस ठोकाठाकी ।। विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।। मन बुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ।। ज्ञान ताजवा घेऊन हाती । दोन्ही अक्षरे जोखिती ।। खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पेंल थंडी ।। नरहरी सोनार हरीचा दास । भजन करा रात्रं दिवस ॥

संत सावता माळी यांना आपल्या मळ्यातील भाजीमध्येच विठ्ठल दिसतो.ते म्हणतात, “आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत, कांदा मुळा भाजी अवघी | विठाबाई माझी, लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि || “

संत तुकाराम महाराज समाजातील जातीभेदाबाबत उपरोधकपणे म्हणतात, बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों II

संत जनाबाई त्यांना पडणाऱ्या तत्कालीन हलक्या कामांबद्दल म्हणतात — तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥ ओझें झालें म्हणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥

संत कान्होपात्रा या महान संत कवयित्री, जन्माने गणिका कन्या. त्यांचे सांगणे कांही वेगळेच ! — 

दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।। मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।। ठाव देई चरणापाशी | तुझी कान्होपात्रा दासी ।।

संत चोखामेळा म्हणजे सर्वात साध्या भाषेत, सर्वात उच्च तत्वज्ञान  —— ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४ II

संत सोयराबाई या सहजपणे सर्वोच्च तत्वज्ञान सांगतात — अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेलें वायां । पाहतं पंढरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥ देही असुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥ पाहते पाहणें गेले दुरी । म्हणे चोख्याची महारी ॥५II 

प्रत्येकाला दिसलेला विठ्ठल हा आपापल्या दृष्टीने दिसलेला आहे. पं. भीमसेन जोशी हे विठ्ठल हा शब्द गातांना दोन टाळ एकावर एक वाजविल्यासारखे ठणठणीत वाटतात तर श्रीधर फडके यांचा विठ्ठल, जरा अधिकच मृदू असतो. ग.दि.माडगूळकरही  विठ्ठलाला विविध घट बनविणारा ” वेडा कुंभार ” असे म्हणतात. जगदीश खेबुडकर ” ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी ( ठिणगी रुपी फुले ) वाहू दे ” असे म्हणतात.

आता आषाढी एकादशी आली आहे. लाखो वैष्णवांचा मेळा माऊलीभेटीला निघाला आहे. सर्वांचा विठ्ठल एकच, पण त्याचे दर्शन मात्र व्यवसाय, समाज, अनुभूती यांच्या विविध खिडक्यांमधून घेतले जाते. वारीमध्ये चालणारा, धावणारा, टाळकरी, माळकरी आणि ज्याला भेटायचे आहे तो, असे सगळेच ”  माऊली “! चंद्रभागेच्या तीरी या माऊलींच्या  रूपातील अवघा भक्ती रंग एकच ” विठ्ठल रंग ” होतो. मग सर्वांचे फक्त एकच काम उरते — बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव II

लेखक :  श्री मकरंद करंदीकर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एपिक्यूरसचा पॅराडॉक्स…” – लेखक – डॉ. विजय रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “एपिक्यूरसचा पॅराडॉक्स…” – लेखक – डॉ. विजय रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

एपिक्यूरस

देवाच्या अस्तित्वाबाबत सर्वात स्पष्ट, परखड आणि समर्पक मत मांडणारा माझा सर्वात आवडता फिलॉसॉफर म्हणजे “एपिक्युरस”.

“देव आहे”  म्हटलं तरीही अन “देव नाही” म्हटलं तरीही , दोन्ही परिस्थितीत ईश्वरवाद्यांना तोंडावर पाडणारा एपिक्यूरस चा पॅराडॉक्स जगप्रसिद्ध आहे. ह्या पॅराडॉक्स ला चॅलेंज करण्याचे अनेक केविलवाणे प्रयत्न जगभरातील ईश्वरवादी दार्शनिकांनी केले आहेत , परंतु असं करताना ते जे तर्क देतात ते अत्यंत हास्यास्पद आणि बालबुद्धी असतात.

एपिक्युरीअन पॅराडॉक्स मर्मभेदी आहे. अचूक आहे. अभेद्य आहे.

काय आहे एपिक्युरिअन पॅराडॉक्स?

एपिक्युरस ईश्वरवाद्यांना पहिला प्रश्न विचारतो. ” DOES EVIL EXIST ? ” (ह्या जगात दुष्ट प्रवृत्ती , दुर्दैवी /वाईट गोष्टी अस्तित्वात आहेत का?

ह्या प्रश्नाचं उत्तर “होय” असंच द्यावं लागतं. ते अन्यथा देता येत नाही. तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक तुम्हाला हे मान्य करावंच लागेल कि ह्या जगात दुष्ट प्रवृत्ती आणि दुर्दैवी घटना (खून बलात्कार दरोडा अन्याय अत्याचार इत्यादी) अस्तित्वात आहेच आहे.

आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर “होकारार्थी” दिल्यावर एपिक्युरस दुसरा प्रश्न विचारतो अन इथूनच आता तो आस्तिकांना लपेटायला सुरवात करतो.

दुसरा प्रश्न.. “CAN GOD PREVENT EVIL ?” अर्थात देव ह्या दुष्टतेला रोखण्यास समर्थ आहे का?

आता ह्या प्रश्नाचं उत्तर “नाही” असं दिलं तर देवाच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह लागतं. देव “सर्वशक्तिमान” नाही हे मान्य करावं लागतं .

पण जर का ह्या प्रश्नाचं उत्तर “होय” असं दिलं तर मग एपिक्युरस तिसरा प्रश्न विचारतो..

“DOES GOD KNOW ABOUT THE EVIL ?” अर्थात देवाला ह्या दुष्टतेबद्दल संज्ञान आहे का?

आता जर “नाही” म्हटलं तर देव “सर्वज्ञ” आहे ह्यावर प्रश्नचिन्ह लागेल.

आणि जर का “होय” असं उत्तर दिलं तर मग एपिक्युरस चौथा प्रश्न विचारतो…

“DOES GOD WANT TO PREVENT EVIL ?” अर्थात जगात दुःख नसावं असं देवाला वाटतं का ?

आता “नाही” म्हटलं तर देव दयाळू किंवा प्रेमळ नाही हे मान्य करावं लागेल. आणि जर “हो” म्हटलं तर मग एपिक्युरस पाचवा प्रश्न विचारतो..

“IF GOD WANT TO PREVENT EVIL THEN WHY IS THERE EVIL ?” अर्थात दुष्टता /दुःख दूर करण्याची इच्छा देवाची आहे तर मग त्याच्या इच्छेविरुद्धहि दुःख अस्तित्वात का बरं आहे ?

ह्याचं उत्तर देताना आता ईश्वरवाद्यांना चलाखी करावी लागते. ती अशी..

पहिला तर्क ईश्वरवादी देतात तो असा ,” दुष्टतेला देव नाही तर सैतान कारणीभूत आहे”

पण मग सर्वशक्तिमान ईश्वर सैतानाला नष्ट का करत नाही ? आता परत देवाच्या सर्वशक्तिमान असण्यावर शंका आली.

दुसरी चलाखी केली जाते हा दुसरा तर्क देऊन, “आपली सत्वपरीक्षा घेण्यासाठी देवाने दुष्ट प्रवृत्ती तयार केल्या आहेत”

पण मग जर देव सर्वज्ञ आहे तर त्याला आपली परीक्षा घेण्याची गरज काय? त्याला तर सर्व माहीतच असते न ?

तिसरी चलाखी ,” दुःख आणि नाकारात्मकतेशिवाय जगाचे अस्तित्व टिकून राहणे शक्य नाही”

म्हणजे दुखविरहित जगाची निर्मिती करण्यात देव “असमर्थ” आहे तर !  आणि जर समर्थ आहे तर मग त्यानं दुखविरहित जगाची निर्मिती केली का बरं नाही?

आता इथं ईश्वरवादी कोंडीत सापडतात . कारण आता त्यांना तेच तेच तर्क घुमून फिरून द्यावे लागतील , “देवाची मर्जी” , “सैतान” “लीला” “सत्वपरीक्षा” इत्यादी इत्यादी.

पण ह्यातला कोणताही तर्क दिला तरी एपिक्युरस म्हणतो कि देव एकतर अस्तित्वातच नाही. किंवा असेलही तरी तो सर्वशक्तिमान नाही, सर्वज्ञ नाही किंवा सर्वव्यापी नाही. आणि जर का तो सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असूनही ह्या जगातलं दुःख दूर करत नसेल तर मग तो स्वतः  दुष्ट असावा.

कोणत्याही परिस्थितीत एपिक्युरसला देवाची भक्ती करणे किंवा त्याला मानणे हे शहाणपणाचे कृत्य वाटत नाही. आणि गरजेचे तर नाहीच नाही.

एपिक्युरस शेवटी म्हणतो.. “ जर देव नसेल तर प्रश्नच मिटला, परंतु तो जर असेलही तरी माझ्यासाठी तो “रिलीव्हन्ट” नाही अन पूजनीय नाही. दूर आकाशात बसून मानवी दुःखांकडे पाहून त्यातून आनंद लुटणारा निष्ठुर देव तुम्हाला लखलाभ असो, मला त्याची गरज नाही “  असे तो ठामपणे सांगतो. 

लेखक : डॉ. विजय रणदिवे

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सदाफुली… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ सदाफुली… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

सदाफुली………… उमलावं हिच्या सारखं.   बहरावं हिच्या सारखं…….. ना असते ऋतूंची ओढ ना कधी मावळतीचे वेड……….. नसते कधी ईश्वराच्या चरणी…… ना कधी कोणी केसात माळत…… तरीही बहरत राहते स्वतः साठी…….. अनेक रंगात……. कुठे आहे ती कडे कपारीत , तर कधी छान बगीचात तर कधी एकटीच उंच डोंगरावर………… असतात कधी सोबती तर कधी एकटी……… तरीही बहरायचं एवढंच माहिती असतं……… मिळणार नसतो कधी मानाचा मुकूट…… ना मिळणार असते कधी कौतुकाची थाप………… असेच येतात अनेक प्रसंग तरीही रहायचं सदाफुली सारखं नेहमी प्रसन्न…….. ना उगवतीची आस ना मावळतीची भिती .. लक्षात ठेवायचं आपण  नेहमीच बहरायचं……….. आयुष्य जगावं सदाफुली सारखं ……….. Be happy anytime anywhere in any condition …….. 

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विठ्ठल विठ्ठल म्हणता… — दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ विठ्ठल विठ्ठल म्हणता… — दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

१ ) 

वारीमधे चालताना

डोईवर वृंदावन

गळा वैजयंती माळ

मुखे विठु गुणगान

*

एकरूप होती सारे

विठुमाऊली ओढीने

विठ्ठल विठ्ठल म्हणता

मिळे मना संजीवन

*

 आषाढाचे मेघ नभी

 सावळ्याचे रूप जणू

 ते  रिमझिम पडताना

  गोडी तया अभंगाची

*

  श्वास येतो आणि जातो

  त्याने मिळे देहभान

  वारीमधे चालताना

 मना ईश्वरीय आश्वासन

*

   विठू माऊलीची माया

   चंद्रभागेच्या पाण्यात

   तिच्या काठावर दिसे

   तीच वाळूच्या कणात

*

   दर्शनाचा लाभ होता

   पायी टेकताच डोई

   एक अनामिक ऊर्जा

   क्षणी संचारते देही

*

   देहातली  स्पर्श ऊर्जा

   जगण्याची साफल्यता

   माऊलीच मायबाप

   पांडुरंग बहिण बंधू भ्राता

*

   सर्व सुकूमार मृदू धागे

   जडलेत विठ्ठलाचे पायी

   पदराची सावली नित्य

   देते माझी रखुमाई

—  कवयित्री : नीलांबरी शिर्के

२ ) 

आली पावसाची सर

 हिंडे साऱ्या दिंडीभर

 पूर्ण दिंडीत ऐकु येई

 विठू नामाचा गजर

*

 सर वारीत फिरली

भक्तिरसात भिजली

 तिच्या थेंबाथेंबातच

 विठू माऊली भरली

*

 आता सरी  बरसणे

 वाटे अभंगाचे गाणे

 आषाढी पालखीचे

 आहे स्वरूप देखणे

—  कवयित्री : नीलांबरी शिर्के

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-27 – भगत सिंह और पाश से जुड़ने के दिन… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग -27 – भगत सिंह और पाश से जुड़ने के दिन… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)

चंडीगढ़ के मित्रों के नाम या उनका काम, स्वभाव बताते संकोच नहीं हुआ। इतने दिन में दो बार  बड़े भाई जैसे मित्र फूल चंद मानव का कहीं कहीं थोड़ा सा जिक्र जरूर आया। आज चलता हूँ उनकी ओर ! फूल चंद मानव नाभा से संबंध रखते हैं और नाभा एक ही बार देखा जब इनकी शादी में एक बाराती बन कर वहाँ से दिल्ली गया था। कब और कैसे परिचय हुआ, यह तो अब ठीक ठीक सा याद नही आ रहा पर ये उन दिनों पंजाब के सूचना व सम्पर्क विभाग में कार्यरत थे। सेक्टर सताइस में आवास मिला हुआ था। इनका छोटा भाई रमेश और मां भी इनके साथ रहते थे। लेखन का जोश, ज़ज्बा और सरकारी नौकरी। फिर वे उन दिनों मुख्यमंत्री ज्ञानी ज़ैल सिंह के पीआरओ भी बने, जिसका नशा आज भी इनकी बातों में झलक जाता है। समझिये कि पत्रकारिता का अनुभव भी यहीं हो गया ! फिर इन्हें पंजाब की हिंदी पत्रिका ‘ जागृति’ के संपादन का सुनहरी अवसर भी मिला, जिस पर मानव अपनी छाप छोड़ने में सफल रहे। उन दिनों मुझे मानव ने प्रसिद्ध व्यंग्यकार व पंजाब विश्वविद्यालय के हिंदी विभाग के अध्यक्ष डाॅ इंद्रनाथ मदान, बलवंत रावत, बलराज जोशी और एक बार दिल्ली से आईं लेखिका देवकी अग्रवाल आदि कितने ही रचनाकारों से परिचय का अवसर दिया। बलवंत रावत डाॅ योजना रावत के पिता हैं जबकि बलराज जोशी कार्टूनिस्ट संदीप जोशी के पिता थे। इस तरह ये फूल चंद मानव का ही कमाल था कि एक ही परिवार की दो दो पीढ़ियों के सदस्यों से मिलने का अवसर बना दिया।

मुख्य तौर पर आज फूल चंद मानव को  एक शानदार अनुवादक व कवि के रूप में जाना जाता है जबकि सबसे पहले इनका कहानी के प्रति जुनून था और इनकी कहानी ‘ अंजीर’ उन दिनों ‘ “धर्मयुग’में प्रकाशित हुई थी और इसी शीर्षक से इनका कथा संग्रह भी आया था। इसी कथा संग्रह की समीक्षा लिखने का अवसर देकर मानव ने मुझ अनाड़ी खिलाड़ी को समीक्षा क्षेत्र में उतार दिया यानी यह रूप मिला ‘अंजीर’ से, जिसका क, ख, ग भी मैं नहीं जानता था। जाहिर है कि यह समीक्षा जागृति में आई।

जब मैं बीए प्रधम वर्ष का छात्र था नवांशहर के आर के आर्य काॅलेज में, तब हमारे हिंदी  प्राध्यापक डाॅ महेंद्र नाथ शास्त्री के स़पादन में मैंने सन् 1970 में लघु पत्रिका का प्रकाशन शुरू किया तो फूल चंद मानव और मैं संपादन सहयोगी बन गये। ‌यह वही पत्रिका है, जिसके पहले अंक में मेरी पहली लघुकथा आई और दूसरा ही अंक लघुकथा विशेषांक रहा, जो हिंदी के पहले पहले लघुकथा विशेषांकों में एक है और वह भी पंजाब जैसे अहिंदी भाषी क्षेत्र से, इसलिए इसकी चर्चा उन दिनों ‘सारिका’ के नयी पत्रिकाओं काॅलम में भी हुई !

उन दिनों पंजाब में नक्सलवादी आंदोलन चल रहा था, जिसके मुख्य केन्द्र खटकड़ कलां व निकटवर्ती गांव मंगूवाल ही थे और मेरी अनियतकालीन पत्रिका ‘प्रयास’ भी सीआईडी के निशाने पर आ गयी ! यह बात मुझे खुद सीआईडी के उस इ़ंस्पेक्टर ने बताई, जिसकी ड्यूटी मेरी डाक से आई चिट्ठियों को गुप्त रूप से पढ़ने की एक माह तक लगाई गयी थी। ‌मैं खुद डाकखाने में अपनी डाक लेने जाता था तो एक दिन हमारे इलाके के डाकिए रामकिशन ने कहा कि एक इंस्पेक्टर तुमसे मिलना चाहता है। वह मुझे इंस्पेक्टर के पास ले गया और इंस्पेक्टर मुझे देखता ही रह गया ! फिर बोला कि आप मुझे जानते नहीं बेटे लेकिन मुझे बताना नहीं चाहिए था फिर भी तुम्हारी उम्र देखकर बताना पड़रहा है कि मैं सीआईडी इंस्पेक्टर हूं और एक महीने तक तुम्हारी डाक सेंसर करने का आदेश था। मैं पहले आप की डाक देखता था और बाद में वैसी की वैसी पैक कर आपको मिलती थी।

– ऐसा क्यों?

– आप नही जानते कि अनियतकालीन पत्रिकाओं का प्रकाशन मुख्य तौर पर आजकल नक्सलवादी विचारधारा के लोग करते हैं लेकिन एक माह तक सेंसर किये जाने के बावजूद आपके खिलाफ कोई ऐसा सबूत नहीं मिला जो रिपोर्ट मैं देने जा रहा हूँ लेकिन आपकी छोटी उम्र देखकर सलाह देता हूं कि यदि पत्रिका निकालनी ही है तो इसे रजिस्टर्ड करवा लो।

– कैसे करवाते हैं?

– जालंधर जाओ और डी सी ऑफिस में रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर के ऑफिस में फाॅर्म भर आओ ! इस तरह मैंने फाॅर्म भरा जालंधर जाकर और अनियतकालीन पत्रिका ‘प्रयास’ से ‘प्रस्तुत’ बन गयी! ऐसे सरकार की नज़र में चढ़ने से पहले पहले उस इंस्पेक्टर ने मुझे अपने बेटे की तरह सही राह बता दी। जिन दिनों मैं एम ए, बीएड कर खटकड़ कलां यानी शहीद भगत सिंह के पैतृक गांव में गवर्नमेंट आदर्श सीनियर सेकेंडरी स्कूल में पहले हिंदी प्राध्यापक और बाद में कार्यकारी प्रिंसिपल बना, उन दिनों खटकड़ कलां व मंगूवाल के दर्शन खटकड़ व इनके छोटे भाई जसवंत खटकड़ , छात्र नेता परमजीत पम्मी व पुनीत सहगल आदि से स्कूल में इनसे परिचय हुआ और इनके नाटक लोहा कुट्ट ( बलवंत गार्गी) को देखने का अवसर अनेक बार मिला और यही खटकड़ कलां में मुझे शहीद भगत सिंह के सारे परिवारजनों से मिलने का अवसर मिला जिसके आधार पर मैंने तेइस पेज लम्बा आलेख लिखा – भगत सिंह के पुरखों का गांव ! इसे तब सबसे लोकप्रिय साप्ताहिक ‘ धर्मयुग’ ने प्रमुख तौर पर प्रकाशित किया, जिसके चलते ‘दैनिक ट्रिब्यून’ के उस समय समाचार संपादक सत्यानंद शाकिर ने मेरी पीठ थपथपाई थी और सहायक संपादक विजय सहगल ने कहा था कि तुमने तो भगत सिंह पर रिसर्च ही कर डाली ! यह भी बता दूँ कि मेरे आलेख वाली प्रतियां राज्यसभा में लहराई गयी थीं, जिसके बाद ही खटकड़ कलां में शहीद भगत सिंह स्मारक बनाने का ख्याल सरकार को आया और भगत सिंह को सही श्रद्धांजलि!! यह मेरा कलम  का कमाल ही रहा।

खैर,  वापस फूल चंद मानव की ओर आता हूँ। मानव बठिंडा में हिंदी लैक्चरर बन कर चले गये और कुछ वर्ष तक हमारा सम्पर्क टूटा रहा !

इधर मैं खटकड़ कलां से जुड़ता गया वामपंथी नाटककार भाजी गुरशरण सिंह से, क्रांतिकारी कवि पाश, दर्शन खटकड़, हरभजन हल्वारवी से ही नहीं बल्कि शहीद भगत सिंह के भांजे प्रो जगमोहन सिंह से, जो उन दिनों ‘भगत सिंह व उनके साथियों के दस्तावेज’ पुस्तक डाॅ चमन लाल के सहयोग से तैयार कर रहे थे, कुछ कुछ मेरा भी सहयोग रहा इसमें ! पाश की कविताओं ने सबको अचंभित कर दिया और

सबसे खतरनाक होता है

हमारे सपनों का मर जाना

जो आज बहुचर्चित और बहुपठित कविता है ! पाश से तीन चार मिलना भी हुआ, इन्हीं दिनों ! मैंने ‘धर्मयुग’ वाले आलेख में लिखा था कि यदि कुरूक्षेत्र की धरती आज भी लाल पाई जाती है तो भगत सिंह के गांव की माटी भी आज तक लाल ही है ! यह विचार की धरती है, क्रांति की धरती है और मै इस रंग में रंगता चला गया ! प्रिंसिपल के साथ एक ऐसा रिपोर्टर जिससे ‘धर्मयुग’ ने लगातार तीन वर्ष भगत सिंह के शहीदी दिवस मेले की कवरेज करवाई ! फिर पाश विदेश चला गया लेकिन एक वर्ष वह भारत लौटा और‌ शहीदी दिवस पर खटकड़ कलां भगत सिंह को नमन्‌ करने आया और निकटवर्ती गांव काहमा गांव में वह उग्रवादियों की गोलियों का शिकार बना। एक ही दिन भगत सिंह और पाश का बन गया ! तब तक मैं दैनिक ट्रिब्यून के संपादक मंडल का हिस्सा बन चुका था और वही बात अपने प्रिय कवि पाश के बारे में लिखने का जिम्मा मुझे ही सौ़प दिया विजय सहगल‌‌ ने , मेरे अतीत को जानते हुए। पाश के तीनों काव्य संग्रह खरीद कर लाया और उसकी मुलाकातों में खोये लिखा ! एक कविता जिसे मैं आज भी अपनी बेटी रश्मि को सुनाया करता हूँ, इसका अंश है :

इह चिड़ियां दा चम्बा

इहने किते नहीं जाना !

इहने ब्याह तों बाद

इक खेत तों उठके

बस दूजे पिंड दे खेत विच

उही घाह कटना!

इह चिड़ियां दा चम्बा

किते नईं जाना!

आज शहीद भगत सिंह और पाश की यादों में खो गया, फूल चंद मानव की बाकी कहानी फिर सही !

क्रमशः…. 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares