कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसुत, हे आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जातात. त्या वेळेपर्यंत मराठीत काव्यरचना व्हावयाची ती संत, पंत ( पंडीत) किंवा शाहीरी रचनेच्या स्वरूपाची. ती परांपरा केशसुतांनी मोडली. वास्तव जीवनातील विषयांवर कविता केल्या. ‘नव्या मनुतील नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे.’ अशी ‘तुतारी’ फुंकत त्यांनी घोषणा केली,
‘आम्ही कोण म्हणोनी काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे
देवाने दिधले जग तये आम्हासी खेळावया.’
आणि मग त्यांच्या लेखणीने कागदावर शब्दांचा खेळ मांडला. सौंदर्यवादी दृष्टीकोन त्यांनी मराठी कवितेत प्रथम आणला. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, ती अंत:स्फूर्त असावी. तिच्यावर बाह्य प्रभाव पडू नये, असं ते म्हणत. वर्डस्वर्थ, कीटस, शेली इ. इंग्रजी कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता. इंग्रजी कवितेतील १४ ओळींचे सॉनेट हा रचना प्रकार त्यांनी मराठीत ‘सुनीत’ या नावाने लोकप्रिय केला. त्यांच्या आज १३५ कविता उपलब्ध आहेत. त्यात अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, याला विरोधा करून मानवतावादाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांनी राष्ट्रीयत्व, गूढ अनुभवांचे प्रगटीकरण, निसर्ग इ. विषयांवर कविता केल्या ‘नवा शिपाई, तुतारी, सातरीचे बोल, झपूर्झा , हरपले श्रेय’ इ. त्यांच्या कविता गाजल्या.
मधू मंगेश कर्णिक यांच्या प्रयत्नाने त्यांच्या जन्मगावी मालगुंड इथे त्यांचे स्मारक उभारले गेले. ८ मे १९९४ साली कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
*य.गो.जोशी ( १७ डिसेंबर १९०१ ते ७ नोहेंबर १९६४ )
य.गो.जोशी हे कथाकार, पटकथाकार आणि प्रकाशक होते. त्यांचा जन्म भिगवणइथला. ‘अन्नपूर्णा, वाहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा माझा मुलगा’ इ. यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा त्यांच्याच.
घरातील आर्थिक ओढगस्तीच्या परिस्थितीमुळे त्यांना ५वीतच शिक्षण सोडून द्यावे लागले. त्यानंर, शाई तयार करणे, सुगंधी तेले तयार करणे, वृत्तपत्रे विकणे इ. अनेक कामे त्यांनी केली. पुढे त्यांच्या लेखनास सुरुवात झाली. १९३४ मध्ये त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू केला. त्यांची पहिली कथा ‘एक रुपया दोन आणे’ ही यशवंत मासिकात प्रकाशित झाली. पुढे याच मासिकाच्या कथास्पर्धेत १९२९ साली त्यांच्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नंतर याच कथेवर आधारलेला ‘शेवग्याच्या शेंगा’ हा चित्रपटही खूप गाजला.
त्यांच्या कथांमधून पांढरपेशीय मध्यम वर्गाचे जीवन चित्रण आढळून येते. उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न, अर्थपूर्ण भाषाशैली इ. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. पुण्याहून प्रसिद्ध होणार्या ‘प्रसाद’ मासिकाचे ते संपादक होते.
‘अनंता पारत आला ( कादंबरी) , ‘दुधाची घागर ‘ ( आत्मवृत्त ), अनौपचारिक मुलाखती, आवडत्या गोष्टी, औदुंबर आणि पारिजात, गजरा मोतियाचा ,जाई-जुई, तरंग, तुळशीपत्र आणि इतर कथा, पुनर्भेट भाग- १ ते १० इ. त्यांचे अनेक कथासंग्रह आहेत. महाराष्ट्राचा परिचय – खंड १ व २ ह्या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. सह संपादक होते, चिं. ग. कर्वे आणि सं.आ. जोगळेकर. महाराष्ट्राच्या माहितीच्या दृष्टीने हा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे.
*सुनीता देशपांडे (3जुलै1925 ते ७नोहेंबर २००९)
सुनीताबाई जशा लेखिका होत्या, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. त्यांचे लग्न पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर १२ जून १९४६ रोजी झाले. त्यांनी पु. लंबरोबर अनेक नाटकात कामे केली. ‘वंदे मतरम्’ आणि ‘नवरा-बायको’ या चित्रपटातही त्यांनी कामे केली. ‘राजमाता जीजाबाई’ हा एकपात्री प्रयोग त्यांनी केला. पु.ल. देशपांडे यांनी लिहीलेल्या ‘सुंदर मी होणार ‘ या नाटकात त्या ‘दीदीराजे यांची भूमिका करत.
त्यांनी लिहिलेले ‘आहे मनोहर तरी’ हे आत्मचरित्र खूप गाजले. ‘प्रिय जी.ए.’ हा पत्रसंग्रह त्यांनी संपादित केला. मण्यांची माळ ( ललित ), मनातलं अवकाश’, ‘सोयरे सकळ, (व्यक्तिचित्रण ), . ‘आठवणींच्या प्रदेशातील स्वैर भटकंती’ इ. त्यांची पुस्तके मौज प्रकाशननी प्रकाशित केलीत, ’समांतर जीवन’ हा अनुवादीत लेखांचा संग्रह सन प्रकाशनाने प्रकाशित केलाय.
जी.एं.च्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला पुरस्कार त्यांच्या’ प्रिय जी.ए.’ या पुस्तकास २००८ साली मिळाला.
केशवसुत, य.गो.जोशी आणि सुनीताबाई देशपांडे या तिघाही महनीय व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्मृतीदिंनंनिमित्त विनम्र अभिवादन
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
बालवाडीतल्या माझ्या भावाची फी द्यायची म्हणून शिशु वर्गाची पायरी चढले,आणि पायरीवर पायरीगत दिसणाऱ्या कुत्र्यावर माझा पाय पडला.लगेच ‘सॉरी’ म्हटलं मी त्याला पण कुत्रचं ते… ‘जशास तसे’ या उक्तीनुसार ते चावलं मला अन् मी केकाटले. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून शिरोळे गुरुजी धोतराचा सोगा सावरत बाहेर आले.मला एक जोरदार शिवी हासडून म्हणाले,” तू त्याच्यावरचं कशाला पाय ठेवलीस? पायरी नव्हती तुला पाय ठेवायला?त्याच्या का नादी लागलीस? गप पडलं होतं ना ते?” गुरुजी कुत्र्याची वकिली करत होते. कुत्र्याची खोडी काढायला, त्याचा नाद करायला मी निर्बुद्ध का आहे? पण गुरुजींच्या नादी कोण लागणार?माझ्या हातातले फीचे पैसे काढून घेऊन,”चल हेड बाईकडं..असं म्हणून माझा रट्टा धरून शिरोळे गुरुजींनी मला हेड बाईच्या पुढ्यात उभं केलं. हेडबाईच्या सांगण्यावरून त्यांनी मला माझ्या घरी पोहोचवलं.
कुत्रा चावल्यानं सरकारी हॉस्पिटल मध्ये माझ्या पोटांनं चौदा दिवस इंजेक्शनचा त्रास सोसला. मला कुत्रा चावल्याची बातमी पेपरमध्ये कदाचित येईल या आशेवर मी होते आणि पेपर चाळत होते.”अगं कुत्रा तुला चावला तर ती बातमी होऊ शकत नाही. याउलट तू कुत्र्याला चावली असतीस तर ती बातमी झाली असती” असं बाबा म्हटल्याचं आठवतं मला.
कुत्रा हा बातमीचा विषय नसून जिव्हाळ्याचा विषय आहे.हे माझ्या लक्षात आलं पण जेव्हापासून तो मला चावला तेव्हापासून कुत्र म्हटलं की मी नखशिखांत हादरते.तो माझा वीक पॉइंट झाला आहे. लहानपणी ‘हाथी मेरे साथी’ दोन-चारदा पाहिला…..प्रत्येक वेळी नव्याने पाहतो असा पाहिला…. प्रत्येक वेळी तेवढ्याच संवेदनशीलतेने रडून थिएटर डोक्यावर ही घेतलं.माझं मुसूमुसू रडं पाहून इतरेजन खुसूखुसू हसायचे, पण….. कुत्र्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तेरी मेहरबानियाॅ’ या सिनेमाच्या पोस्टरकडेसुद्धा ढुंकून बघायची माझी इच्छा नसायची. इतका तिटकारा मला त्या कुत्र्याच्या चेहऱ्याचा….
स्वामीनिष्ठ, इमानदार अशा विशेषणांनी सुशोभित आणि रतन टाटा, बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज अशा प्रतिथयश लोकांच्या कुत्र्यावरील प्रेमाने प्रसिद्ध आलेल्या या जातीचा मला कधीकधी हेवा वाटतो. रतन टाटांनी गोव्याहून आणलेल्या ‘गोवा’ नावाच्या आपल्या कुत्र्याला आपल्या ग्लोबल हेडक्वारटर मधील म्हणजेच बॉम्बे हाऊस मधील खास जागेत ठेवलं आहे. शिवाजी महाराजांचा ‘वाघ्या’ तर सगळ्या मराठी माणसात प्रसिद्ध !! बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘टाॅबी’ कुत्रा सर्वश्रुत आहे.अमेरिकेतील एका शहरात एका मालकाने आपल्या मृत्यूनंतरची छत्तीस कोटीची प्रॉपर्टी ‘लुलू’नावाच्या त्याच्या कुत्र्याच्या नावे केली आहे. अहोभाग्य त्या कुत्र्यांचं !!!
कुत्र्यांच्या नावावरून एक गंमत अशी की आमच्या वाड्याच्या मालकिणीनं स्वतःच्या कुत्र्याचं नाव ‘पुराणिक’ठेवलं होतं. मी त्यावेळेस सात आठ वर्षाची असेन….मला आठवतंय मी बाबांना कळकळीनं असं सांगितलं होतं की माझं लग्न ‘पुराणिक’ आडनावाच्या माणसाची होता कामा नये.बाबांना फार उशिरा माझ्या त्या कळकळीच्या विनंतीचं प्रयोजन समजलं होतं…..
प्रेम म्हणजे प्रेम असतं,ते कुणी कुणावर करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कुत्र्याबद्दलची माझी भूमिका स्वच्छ आहे.माझं त्याच्याशी वैर नाही पण त्याच्याविषयी प्रेम बिलकुल नाही. एकदा एका
मैत्रिणीकडे गेले होते. कसं कोणास ठाऊक पण ‘कुत्र्यापासून सावध राहा’ या पाटीकडं माझं लक्ष गेलं नाही. तिच्या घराची पायरी चढणार तो पुनश्च पायरीवर एक पायरीच्याच रंगाचं कुत्र झोपलेलं….. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी अर्थातच मी घेतली.तिला खालूनच फोन केला. “अगं काही करत नाही ते.” प्रत्यक्ष भगवंताला देखील इतक्या गॅरंटीनं सांगता येणार नाही तसं तिनं सांगितलं. “ओलांडून ये त्याला”( तो कोणावरच भुंकत नाही कोणालाच काही करत नाही. तर मग पाळलासंच का बिचारे ?असा प्रश्न मनांत आल्यावाचून राहिला नाही.) घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत मी त्याला ओलांडायला गेले आणि माझा पाय त्याच्यावर पडलाच. सिंहाच्या पिंजऱ्यात लाईट गेलेल्या रिंगमास्टरची काय अवस्था होईल तशी माझी झाली. इतक्यात मैत्रीण खाली आली. “किती घाबरतेस ग ?काही केलं का त्यांनं तुला?भुंकला देखील नाही गं तो!!”असं म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं.”कम हनी, कम टू मम्मा” असं मातृप्रेम दाखवणाऱ्या तीच श्वानप्रेम बघून मी धन्य झाले, पण अप्रूप अजिबात वाटलं नाही त्या गोष्टीचं….
सकाळी फिरायला जाताना टापू टापूत बसलेली भटकी कुत्री आता माझ्या ओळखीची झाली आहेत. अर्थात असा हा माझा दावा…. माहित नाही कधी घेतील ती माझा चावा…. मालकाचं गळ्यात पट्टा बांधलेलं कुत्र दिसलं की संघटितपणे जोरजोरात त्याच्यावर ती भुंकायला लागतात. अगदी थेट ते टापूतून बाहेर पडेपर्यंत… वाघासारखं दिसणारं ते मालकाच्या संरक्षणाखाली ऐटीत चालत असतं. मालकाला जणु ते सांगत असतं आत्ता मला तू संभाळ. नंतर तुझं रक्षण करायची जबाबदारी माझी….तसा त्या दोघांत एक अलिखित करार असावा बहुदा…चार आण्याचा जीव असलेली ती भटकी कुत्री पण त्यांचा आवाज एखाद्या डॉल्बी लाऊड स्पीकर सारखा! आसमंत हादरवून टाकणारा!गांधीजीं सारख्या अहिंसावादी माणसानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर घेतला होता त्या बापूजींना माझे प्रणाम…..
रस्त्यावरच्या सार्वजनिक वाचन केंद्रावरची दोन कुत्री कुठलंही वाहन आली की त्या वाहनाच्या वेगानं फर्लांग भर पळत जातात आणि माघारी येतात. हे मी रोज पाहते. एक दिवस न राहून मी त्याच्या प्रमुखांना म्हटलं,”अहो यांना बांधून ठेवा की! उगा आपलं वाहनांच्या मागे पळत सुटतात.”त्यावर ते म्हणाले.”असुद्या मॉर्निंग रनिंग करतात !एरवी लडदूछाप आहेत. खाऊन खाऊन माजलीत दोघं.पहुडलेलीच असतात दिवसभर…. कोणावर भुंकत नाहीत. एन्जॉय करतात लाइफ झालं”….
जेव्हा मी ह्यांची अर्धागीनी झाले तेव्हा मात्र कुत्रं पाळणं हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न बनला. याचं कारण हे ‘श्वानप्रेमी’ आणि कुत्रा हा माझा वीक पॉइंट… अर्थात लग्नानंतर इतके चांगले विषय आम्हा दोघात होते की कुत्र्यासारखा विषय संभाषणात कधी आलाच नाही. त्यामुळं मला कुत्र्या विषयी इतका आकस आहे हे त्यांना ठाऊक नव्हत. तीन महिन्याची ओली बाळंतीण मी जेव्हा परतले त्यावेळी ह्यांनी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून घरी आणलेलं छोटासं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. मला ह्यांनी दोन बाळाची आई करून टाकलं होतं. पण मला मंजूर असायला हवं होतं ना ते?
मी अजूनही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ह्या गोष्टीचे त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. दोन्ही पिल्लं अखंड कुई कुई करत होती. त्यात भरीस भर म्हणजे मालकिणीचं कुत्रं! एरवी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणणारं ते आज आपल्या टापूत आलेल्या या नवख्या कुत्र्यावर अखंड भुंकत होतं. मालकीण यथावकाश खाली आली. माझं बाळ तिच्या हातात होतं ती म्हणाली,”आजच आलाय.आमचं कुत्र भुकायचं थांबणार नाही तेव्हा तुमच्या कुत्र्याला आजची रात्र घरातच बांधा. उद्या काहीतरी व्यवस्था करू” ……
दोन्ही पिल्लानी रात्र जागवली हे सांगायला नकोच. त्या दोघांकडे पाहात मी यांना माझं सगळं श्वासनपुराण सांगितलं आणि पहाटे पहाटे मी यांच्याकडून मला हवं असलेलं ते एक वचन घेतलं. वचन देता देता, ‘जे लोक कुत्रं पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी येते’असंही माझं समुपदेशन झालं, पण मला ‘लक्ष्मी’ नको होती, ‘शांती’ हवी होती. स्त्रीहट्ट कुणाला सुटलाय ?….सकाळ सकाळी कुत्र्याच्या पिल्लाची गावाकडं रवानगी झाली.. आणि माझं पिल्लू शांत झोपू लागलं.
भविष्यात पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी ह्यांना निक्षून सांगितलं,” एका म्यानात दोन तलवारी कधीच बसत नाही.ज्या दिवशी कुत्रं या घरात येईल त्या दिवशी मी बाहेर पडलेली असेन…..” अजून तरी तशी वेळ आलेली नाही.
सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या करोना काळात कधीतरी कुत्र्याचं रडणं अपशकुनाचा संकेत देतं, तेव्हा हे म्हणतात…
“अगं ,आम्ही जसे कुत्र्याचे शौकीन तसेच कुत्र्यांनाही आमची सवय… आताशा आम्ही त्यांना फारसे दिसत नाही आहोत ना रस्त्यावर म्हणून ती कावरीबावरी होऊन रडतात…..”
ते काही असो. कुत्र्याला ‘श्वान’ किंवा ‘सारमेय’ म्हणावं असं मला कधी वाटत नाही .कुत्रं समोर आलं की या जन्मी तरी हाssssड ……
☆ भाजी मंडई – क्रमश: भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मोहिनी देववंशीची प्रतीक्षा पूर्ण झाली. अखेर तो दिवस आलाच. टोरॅंटो शहरात देशोदेशींच्या साहित्यिकांची गर्दी जमली. त्यांना एयरपोर्टहून घेऊन येऊन, हॉटेलमध्ये पोचवण्यापर्यंतचा सगळा बंदोबस्त केलेला होता. सगळं काही शांतपणे होत होतं. नाही म्हणायला एकच चिंता होती. “नंदन पुरी” नावाचा नाग, मोहिनी आयोजित करत असलेला सगळा कार्यक्रम उधळून न देवो. दोघांची दुश्मनी जगजाहीर होती. शहरातल्या सगळ्या शत्रुत्व असलेल्या गटांमध्ये, पहिल्या नंबरावर होती. आपल्या विश्वस्त सूत्रांनुसार तिला ही बातमी कळली होती की बहुधा नंदनजी एकांतवासात आहेत. तिथे फोनही लागत नाही आणि नेटवर्कही मिळत नाही. शहरापासून गाडीने तीन तास अंतरावर असलेल्या झोपडीत राहायला गेले आहेत. हेतू असा की तिथे त्यांना काही ऐकता येऊ नये आणि मत्सराने जीव जळू नये.
दिवसभरच्या प्रारंभिक भेटी-गाठीनंतर हिंदीवर भाषणं होती. त्यानंतर दुसर्या दिवशी सन्मान समारंभ होता. भारतातून आलेल्या लोकांमध्ये खूप उत्साह होता. स्थानिक लोकांचीही चांगली गर्दी होती. हे लोक म्हणजे तर कार्यक्रमाचा प्राण होता. विदेशातून सन्मान घेऊन घरी परतणं, यापेक्षा दुसरी मोठी कुठली गोष्ट असू शकेल? सगळं काही योजनेनुसार चाललं होतं. मोहिनीचा उजवा हात असलेले ‘अशांतजी’ शांत दिसत होते. त्यांच्या खांद्यावरच समारंभाचा सारा भार होता. सुटा-बुटात, हातात वॉकी-टॉकी घेऊन झुकलेल्या खांद्याने ते इकडे-तिकडे धावपळ करत होते. त्यांना पाहून वाटत होतं की तेच समारंभाचे मुख्य आयोजक आहेत. साडी नेसलेली मोहिनी अगदी आकर्षक दिसत होती. तिच्या शालीनतेमुळे तिचं व्यक्तिमत्व कसं झळाळून दिसत होतं. सगळ्या स्थानिक लोकांची उपस्थिती, एक सुनियोजित कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडण्याची जाणीव करून देत होती. समारंभाच्या भव्यतेची अनुभूती मोहिनीचा चेहरा तजेलदार बनवत होती. यानंतर तिच्या नावापुढे “सफल अंतरराष्ट्रीय सेमिनार आयोजक” अशी मोठीच पदवी लागली असती.
दुसर्या दिवशीच्या सन्मान समारंभासाठी सर्टिफिकेटस तयार केलेली नव्हती. न जाणे कोण येतील… न येतील…विदेशी आणि स्थानिक, निमंत्रण नसलेल्या पण तिथे उपस्थित असलेल्यांची निश्चित संख्या लक्षात येताच लगेच व्यवस्था करण्याची योजना केली होती. त्याच दिवशी चार लोक एकत्र बसून सर्टिफिकेटस तयार करतील, असे ठरवण्यात आले. योजना यशस्वी झाली. कार्यक्रमाच्या जागी सकाळी सात वाजल्यापासून गाड्या लागू लागल्या. चहा -कॉफीच्या कपाबरोबर काम सुरू झालं
लॅपटॉपला कनेक्ट करून लेज़र कलर प्रिंटर, टेबलावर ठेवलला होता. धड़ाधड़ प्रिंट होऊन प्रमाणपत्र बाहेर पडत होती. ‘डॉलर स्टोअर’ मधून विकत घेतलेल्या सजावटीच्या सामानातून प्रमाणपत्र सजवले जात होते. सोनेरी गोल स्टीकर लागताच तो सामान्यसा कागद प्रमाणपत्राचं रूप घेऊ लागायचा. कुठल्या कोपर्यात चादण्या लागायच्या, तर कुठे कुठे चमकत्या धारा… जसजशी सजावट वाढत गेली; तसतसं, प्रमाणपत्र, पूर्णपणे सन्मानाचं द्योतक सन्मानपत्र बनलं. त्यानंतर तयार फ्रेममध्ये घातल्यावर ते अधीकच सुसाज्जित, अधिकारिक सन्मानपत्र बनलं. असं सन्मानपत्र, जे बघता बघता, व्यक्ती आपलं सारं आयुष्य समाधानाने घालवू शकेल. ती असा विचार करील की आपल्या कार्याचं आपल्याला योग्य असं पारितोषिक मिळालय. अशा समाधान देणार्या कागदांची फॅक्टरीच बनला होता हा कलर प्रिंटर. छापखानाच बनला होता तों म्हणा ना! प्रत्येकाचे नाव लिस्टमधून घेऊन, व्यवस्थित टाईप करून ‘प्रिंट’ क्लिक करत राह्यचं. दोन चार वेळा चुकीची नाव पडली. नाव चुकीचं पडलय, हे लक्षात येताच, तत्काळ तो कागद फाडला जात होता. क्षणभर वाटायचं, कागद नाही, सन्मानच फाटलाय. पण तत्काल त्याचा पुनर्जन्म व्हायचा. दोन रमा होत्या. दोघी शर्मा होत्या. दोघींना एकच सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे कुणीही मंचावर यावं, काही फरक पडणार नव्हता.
क्रमश:…….
मूळ कथा – भिंडी बाजार मूळ लेखिका – डॉ हंसा दीप
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मन…कधीच न उलगडणारे कोडे… शब्दात न मांडता येणारे मन वेडे.. आकाशासारखे अथांग… सागरासारखे गहिरे.. क्षणात फुलणारे… क्षणात कोमेजणारे .. सावरणारे …अडखळणारे,
तर कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे हे मन….
किती सांगावी महती या मनाची.. मन चंगा तो कटोती मे गंगा असे म्हणतात म्हणूनच उत्तम शरीराबरोबरच मनही निरोगी असणे तितकेच गरजेचे आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर असते. यासाठी मनाला नेहमी चांगल्या गोष्टीत गुंतवायला हवे.
आपण इतरांची मने जपण्यासाठी खूप काही करतो. स्वतःच्या आशा अपेक्षांना मुरड घालतो पण या सर्वांची मने जिंकताना आपल्यालाही एक मन आहे हे साफ विसरून जातो. कधीतरी आपलेच मन आपल्याला विचारेल की, माझ्यासाठी तू काय केलेस? आहे उत्तर?….
योग्य आहार ,विहार, व्यायाम याने जसे शरीर चांगले राहते तसेच छंदाची जपणूक, चांगले मित्र, छान पुस्तक वाचन, गायन, वादन, बागकाम … मनापासून आवडणारे कोणतेही काम हे भरभरून आणि आनंदाने करायला हवे. थकलेल्या शरीराला जसे स्फूर्ती येण्यासाठी टॉनिक देतात तसेच आपले छंद आपल्या मनासाठी टॉनिक म्हणून काम करतात…
स्वतःचे ही मन जपा. त्याला काय हवे-नको ते बघा. त्याचेही कोड कौतुक करा.सकारात्मक विचारांनी त्याला फुलवा.आनंदी क्षणात भुलवा ..मग बघा जीवनाचे इंद्रधनुष्य कसे सप्तरंगानी बहरून येते…