मराठी साहित्य – काव्यानंद ☆ खरंच कां? …. सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? काव्यानंद ?

☆ खरंच कां? …. सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

 

कविता – खरंच कां? – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

 

खरंच कां?

बघतां बघतां हे काय झालं?

गृहसम्राज्ञीच पद माझ्या हातुन गेलं–

कळलं नाही माझं मला,

असं कसं झालं?

खरंच कां वय माझं उताराला लागलं?

 

आपणही काही चवीढवीचं ,

करावंसं वाटलं

 कसं कोण जाणे ,

भांडं हातातुन निसटलं

आवाज कानी आदळला—

कोण आत कडमडलं?

तेल तर सांडलंच—अन्–

पाठी धुपाटणं आलं—    

खरंच का वय माझं उताराला लागलं?

 

फुलांच्या ठेल्याजवळ

घुटमळले मी जरा,

हळुच,स्वारींना म्हटलं–

“घ्याना गडे –गजरा—“

डोळे मोठे करीतच हे वदले,

“जरा वयाचा विचार करा”

माझी मीच गोरीमोरी,

भोवताली पाहिलं–

खरंच का वय माझंउताराला लागलं?

 

हौसेनं नातवंडांच करायला गेले,

तर सुनबाईनं मान हलवत

नाक की हो मुरडलं—

नात म्हणाली,

 “आजी नको मधे मधे येऊ,

तुझं तू बघ आपलं—“

तुम्हीच सांगा आता—

माझं काय चुकलं–?

खरंच का वय माझं उताराला लागलं?

 

हसतच हे म्हणाले,

“बाईसाहेब,संपली तुमची सद्दी,

स्वखुशीने सोडलीत ना ,

तुम्ही तुमची गादी?

बाहेर पडा यातुन जरा,

पुसा डोळे ,चेहरा करा हसरा

साहित्य-साधनेसारखा

मित्र नसे दुसरा”

मलाही सारं पटलं—

ष्रसन्नपणे हसतच,

कुठे कुठे विसावायचं,

माझं मी ठरवलं–

माझं मी ठरवलं.

 

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

कोथरूड- पुणे. मोबा. 9595557908/02

 

आवडलेल्या कवितेचे रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर

स्थूलमानाने, कवितेचे  २ महत्वाचे पैलु म्हणजे आशय आणि  अभिव्यक्ती. सोप्या भाषेत—

“काय सांगितले?” आणि “कसे सांगितले?”

कोणतीही कविता वाचतांना हे दोन्ही पैलु डोळसपणे ,वेगवेगळ्या अंगाने पारखणे ,आणि त्याच कसोटीवर कवितेचा जनमानसावर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे म्हणजे रसग्रहण.त्यामुळे कवितेचा आस्वादही मनापासुन घेता येतो. दुःख, आनंद,आश्चर्य, भिती, प्रेम, वात्सल्य राग, चीड ,संताप अशा कोणत्या ना कोणत्यातरी भावना मनात निर्माण होतात.कविता मनाची पकड घेते. कविता भावते.

अशीच एक भावलेली कविता.,ज्यावर आज मी माझे विचार मांडणार आहे.

ही कविता आहे शुभदा कुलकर्णी ,पुणे यांच्या भावफुले या काव्यसंग्रहातील. डॉ अमृता ह. मराठे यांनी अभ्यासपूर्ण,सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. अमृताताईंनी म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक, कौटुंबिक,सामाजिक, वैचारिक, निसर्गविषयक, सणांसंबंधी अशा विविध विषयांवरील कवितांनी समृध्द असा हा काव्यसंग्रह आहे.सर्वच कविता मनाला भिडणाऱ्या आहेत.

पण मी ही कविता निवडली कारण ती वाचतांना मला वाटले की मी जणु माझेच प्रतिबिंब आरशात पहात आहे.

विषय तसा साधाच, — सामान्य संसारी स्त्रीचा. ती स्वीकारत असलेल्या  वेगवेगळ्या भुमिका,.

त्या वठवतांना ,कालानुरूप बदलतांना,मनाला जाणवणारी थोडीफार खंत उदास करते.

खरंच ,हे कारण असेल का?

हा संभ्रमही मनात निर्माण होतो. शुभदाताईंनीकवितेला दिलेले नावही साधे पण सार्थ आहे.

खरंच कां?

कवितेच्या आधी व्यक्त केलेल्या मनोगतात त्या म्हणतात, “वय उतारा लागलं ,cहे स्विकारलं की ,सगळं सोपं होत.—थोडा मनःस्ताप—पण आनंदाचे नविन मार्ग शोधावे—“

पहिल्या ४ कडव्यात नेहमीच्या चाकोरीबद्ध पध्दतीने स्वीकारलेल्या भुमिका,अन् त्यामुळे येणारा काहीसा खेदजनक अनुभव मांडला आहे.

स्त्री –घराचा केंद्रबिंदू –सर्वेसर्वा-.-गृहस्वामिनी,–ही तिला आवडणारी भुमिका .पण कळतनकळत ती या भूमिकेतून बाहेर पडते .अन् तिला काय वाटते ते शुभदाताईंनी १ ल्या कडव्यात सांगितले आहे.

“बघता बघता हे काय झालं?

गृहसम्राज्ञीच पद माझ्या हातुन गेलं– कळलं नाही माझं मला,असं कसं झालं?

खरंच का माझं वय उताराला लागलं?””

पुर्ण घराची राणी राहिली नाही तरी ,स्वयंपाक —तिचा हुकमाचा एक्का तरी हातात आहे असे वाटते. त्याच्या वापर करुन खेळात बाजी मारता येईल असे तिला वाटते.. पण तिथला अनुभव–? छान शब्दांत मांडला आहे या दुसऱ्या कडव्यात–

 “”आपणही काही चवीढवीचं,

करावंसं वाटलं,

कसं कोण जाणे ,भांडं हातातुन निसटलं,

आवाज कानी आदळला—

कोण आत कडमडलं?

तेल तर सांडलच–अन्

पाठी धुपाटणं आलं–

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

ठीक आहे.,काम होत नसेल आता.शरीर,भले थकले तरी मन जवानीत रमु पहाते.  . आयुष्यभराचा जोडीदार तरी आपल्या भावना समजुन घेणार ही अपेक्षा असते.आणि तेही रास्तच आहे. पण?

त्याबाबत काय होते ते सांगणारे पुढचे कडवे —

“”फुलांच्या ठेल्याजवळ घुटमळले

मी जरा,

हळुच स्वारींना म्हटलं–‘घ्या ना गडे गजरा’

डोळे मोठे करीतच हे वदले,’जरा वयाचा विचार करा’

माझी मीच गोरीमोरी,भोवताली पाहिलं—

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

नातवंडे —- दुधावरची साय.अन् आजी म्हणुन मनात मायाममतेचा पुर भरुन येतो.त्याची ऊधळण नातवंडावर करावी असे वाटणे स्वाभाविक आहे.पण त्याही बाबतीत

काय होऊ शकते हे ४  थ्या कडव्यात सांगितले आहे.

“”हौसेनं नातवंडांचं करायला गेले ,

तर सुनबाईंनं मान हलवत नाक की

हो मुरडलं—

नात म्हणाली, ‘आजी नको मधे मधे येऊ,

तुझं तु बघ आपलं-‘-

तुम्हीच सांगा आता,माझं काय चुकलं?

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

कोणीही समजुन घेत नाहीत ,मनासारखे होतच नाही मग निराशा येणारच. पण,शुभदाताईंनी शेवटच्या ५ व्या कडव्यात एकदम यु टर्न घेतला.

“”हसतच हे म्हणाले,

‘बाईसाहेब, संपली तुमची सद्दी,

स्वखुषीने सोडलीत ना,

तुम्ही तुमची गादी?

बाहेर पडा यातुन जरा,पुसा डोळे,

चेहरा करा हसरा,

साहित्य-साधनेसारखा मित्र नसे दुसरा

            मलाही सारं पटलं–

 प्रसन्नपणे हसतच,कुठे कसं विसावायचं

माझं मी ठरवलं, —माझं मी ठरवलं

बदलत्या काळाप्रमाणे, वाढत्या वयामुळे जुन्या मार्गावरून चालणे शक्य होणार नाही. तिथे नाकारले गेलो तरी त्याची खंत न करता, नविन मार्गावरून नेणारा कोणीतरी जोडीदार भेटतो. आणि वाढत्या वयातही नव्या मार्गक्रमणाचा आनंद मिळवता येतो.

खरंच, किती सकारात्मक विचार शुभदाताईंनी आपल्या कवितेतुन मांडला आहे.

मला वाटते,काही तरुण मैत्रिणी अपवाद आहेत.पण बर्‍याच ज्येष्ठ मैत्रिणींच्या दृष्टीने  आपला साहित्यसमुह म्हणजे  असाच भेटलेला जोडीदार .आणि आपणही त्याच्या हातात हात घालुन साहित्यसेवेच्या या मार्गावरून आनंदाने विहार करीत आहोत,.

कारण आपले ब्रीदवाक्य

” लिहा आणि लिहित्या व्हा”

हेच आहे.

माझ्या एका मैत्रिणीनेच लिहीलेली ही कविता  मला आवडली, म्हणुनच तुमच्यासाठी  निवडली.

धन्यवाद.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देह आणि मन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ देह आणि मन…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 मनाचा शिंपला,

    विचारांचा मोती!

  तेजस्वी सुंदर ,

    पहाट समयी !

 

 वाटते ते जग,

  अगाध अतर्क्य!

 तुझेच हे रूप,

    करितसे सार्थ!

 

  आत्मा आणि तूच,

     आवरण देही !

   मनाच्या संपुटी,

     नांदतच राही!

 

© सौ. सुहास उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे#66 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 66 ? 

द्यावा घासातील घास… ☆

द्यावा घासातील घास…

खरी मानवता हीच सांगते

ओळख मनुष्याची अशीच होते.. १

 

द्यावा घासातील घास…

जगी अन्नमय असतो

अन्नदान उपाय, श्रेष्ठ ठरतो… २

 

द्यावा घासातील घास…

आत्मा तृप्त होईल

सत्कार्य सहज साधेल… ३

 

द्यावा घासातील घास…

परंपरा अवलोकन करा

ग्वाही देईल पूर्ण ही धरा… ४

 

द्यावा घासातील घास…

तोष सहज मनास होई

फुलते पानोपानी  जाई-जुई… ५

 

द्यावा घासातील घास…

व्यर्थ द्रव्य, कुणासही न द्यावे

प्रभू चिंतन, सतत निर्भेळ करावे… ६

 

द्यावा घासातील घास…

राज हे उक्त केले

शब्द हे असे अवतरले

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३१ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३१– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

माझं सर्वस्व

अगदी मनापासून

उधळून दिलं मी खुशीनं

असेल ते फक्त

ओंजळभरून पाण्याएवढं

पण

एका तरी तृषार्ताची

जळती तहान

थंड केली त्यानं

 

[2]

माझ्या मद्याचा घोट

माझ्याच प्याल्यातून

घे मित्रा

दुसर्‍या प्याल्यात ओतल्यावर

विस्कटून… विरून जाते

फेसाची माळ

 

[3]

वास्तवाचा  पोशाख

फारच घट्ट होतो

सत्याला…

कल्पनेच्या पायघोळ झग्यात

कसं स्वैर फिरता येतं त्याला.

 

[4]

किती इवली इवली

तुझी पावले

चिमुकल्या गवता

पण

त्यांच्या खाली

अफाट पसरलेल्या

आक्षितिज भूमीवर

तुझाच तर असतो

मालकी  हक्क ….

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अल्लड प्रेमास – कविवर्य गोविंदाग्रज ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

२६ मे- कवी गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरींचा आज जन्मदिन - MH20 News : Aurangabad Latest News | Live News | Happenings

कविवर्य गोविंदाग्रज

? कवितेचा उत्सव ?

☆ अल्लड प्रेमास – कविवर्य गोविंदाग्रज ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

क्षणभर वेड्या प्रेमा थांब !

अधिर मनासह जासी कोठे ?

चुकशिल-संकटि पडशिल वाटे

जग हे सारे बा रे खोटे !

हृदय सोडुनी;गड्या म्हणोनी,

जाई न कोठे लांब !

 

क्षणी पांढरा,क्षणीच काळा,

रंग आवडे असा जगाला,

ठाव तयाचा कुणा न कळला !

खुळ्या तुलाची,अशा जगाची

कळेल का कृती सांग ?

 

कविवर्य गोविंदाग्रज

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लाल परी….. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? कवितेचा उत्सव ? 

☆ लाल परी…..☆ श्री विजय गावडे ☆  

एसटी कामगार दुखवट्यात!

कम्बारडा मोडला कचाट्यात!!

 

लाल परी लाल परी

कीत्या बसले डायवर घरी?

कंडक्टरांची झोळी कीत्या

बसली कोनात खुंटेवरी?

 

काय सांगा दादा तुका

लाल परी डोळ्यात खुपा

गरीबाची कोणाक चाड

त्येंची आपली धनात वाढ

 

मंत्री आपल्ये गाडयेत फिरती

सामान्यांची चाल धरतीवरती

कोनाक ठाये कित्येक मेले

वि्लिनिकरणात गडप झाले

 

सुने रस्ते, सुने आगार

गाव पडले गपगार

लुटले जाती गरीब धोंडारी

मंत्री संत्री राजकारण करी

 

इले नेते,  गेले नेते

घोळ घालती अ जानते

एसटी कामगार बाबडो बेजार

कोणी तरी करारे विचार!

 

© श्री विजय लक्ष्मण गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द माझे..सोबती होतात ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द माझे सोबती होतात… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

भजनातून भगवंतापर्यंत नेतात

टाळ मृदंगाच्या तालावर डोलतात

गीत सुरेल बनून ओठी येतात

शब्द माझे..सोबती होतात.

 

काळजात रुतलेल्या भावनांना

अबोल झालेल्या त्या हुंदक्यांना

हळुवार बोलते करून जातात

शब्द माझे..सोबती होतात

 

आधाराच्या शब्दांनी हातात हात देतात

आशीर्वादाच्या सुमनांनी ओंजळ भरतात

अडीच अक्षरांनी जगणे गंधित करतात

शब्द माझे..सोबती होतात

 

कधी मान देतात,अपमान ही करतात

जखमेवरचा ढलपा काढून मोकळे होतात

कधी मलम होऊन अलवार फुंकर घालतात

शब्द माझे…सोबती होतात

 

ज्ञानेश्वरीचे ओवी,कबिराचे दोहे

 नाथांचे भारुड..गीतेचा अध्याय होतात

जगण्यास नवीन दिशा देतात

शब्द माझे..सोबती होतात

 

प्रेमात पडायला शिकवतात

जगण्याचा आनंद देतात

शब्दसरीत न्हावूनी मने तृप्त होतात

शब्द माझे..सोबती होतात

   शब्द माझे..सोबती होतात

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ घर कौलारू ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? घर कौलारू ? ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर  

 

सुंदर कौलारू घरकुल

निवांत श्रास निःशब्द शांतता

श्वास निर्मळ अन् खुला निसर्ग फणस,आंबा,नारळ,पोफळीची शांत छाया

नाही कोठे रोगांची छाया

सोबत येथे नेहमीच व्रुक्षवल्लरीची

सुगंध दरवळतो दोन दारीच्या फुलांचा

अन् मोहरलेल्या आंब्याचा

पक्षांचे मंजुळ गुंजन

अन् कोकीळांचे कुजन

सौंदर्य आगळे तेआभाळीचे

बलाकमाळ,पक्षथव्यांचे

अन् चंद्रसुर्याच्या विविध प्रकाशछटांचे

मिळे खाण्यास रुचकर रानीचा मेवा

स्वछंद पर्यटन अन् निवांत सामाधानाचा वाटे हेवा

पोहचल्या येथे नव्या सुविधा जरी

ओढ नित्य त्या बालपणीच्या आठवणींची परी

रंम्य परीसर नित्य वास

परमात्म्याचा येथे वास

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फिदा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ फिदा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

चुकेन मी,चुकशील तू,माहित होते तुला मला जर

तक्रारीची कशास भाषा,चालून येता इतुके अंतर

 

उणे अधिक जे घडून गेले,तुलाही ठावे,मलाही ठावे

नकळत सारे घडून गेले,मनात नव्हते कुठले कावे

 

क्षमायाचना नकोच , नकोच आता व्यक्तही दिलगीर

खेळ कशाला शब्दांचा हा असेच होते घडायचे जर

 

मुले,माणसे,नाती-गोती,मित्रांचा हा परिवार असे

रमून गेलो त्यातच आपण,थांबायाला सवड नसे

 

शंख शिंपले आठवणींचे किना-यावरी झाले गोळा

जपून सारे ठेवायाचे , हीच असे ती आली वेळा

 

लाटेवरती लाटा झेलत तू ही आलीस, मी ही आलो

जरी सरकली वाळू तरीही कधीच नाही वाहत गेलो

 

असेच राहू चालत आणिक अशीच ठेवू साथ सदा

अताजराशी ओळख झाली चल परस्परांवर होऊ फिदा

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवा गणेश  देवा…. ☆ श्री रविंद्र सोनवणे

श्री रविंद्र सोनवणे

अल्प परिचय

नाव :   रवींद्र प. सोनावणी

कार्यक्षेत्र: राष्ट्रीय संगीत, नाट्य केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

ध्वनी मुद्रण +प्रोजेक्शन शाखेत १९७७-२०१३ कार्यरत

छंद  : वाचन- थोरांची आत्मचरित्र – कविता कै. पु. ल. देशपांडे + कै. अशोक रानडे (या दिग्गजांचा सहवास)

१० फेब्रुवारी – २०१३ निवृत्त

को. म. सा. प पाली बल्लाळेश्वर काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक ( २०१२)अनेक कवि संमेलनात सहभाग.

 

? कवितेचा उत्सव ?

☆ देवा गणेश  देवा…. ☆ श्री रविंद्र सोनवणे ☆ 

देवा गणेश देवा तू सृष्टीचा नियंता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला  अनंता

 

श्वासात तूच आहे

हृदयी तुझाच वास

चोचीत पाखरांच्या

तू भरवितोस घास

स्वामी चराचराचा आदर्श तू विधाता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

दे शक्ती बुद्धी विद्या

दे ध्यास  सद्गुणांचा

वरदान दे प्रभू रे

व्हावी विनम्र वाचा

देतोस मुक्तहस्ते तू एकमेव दाता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

पुष्पातला सुवास

मकरंद तु पराग

झुळझुळ वाहणारा

तू रंग अन तरंग

देहात जागणारा चैतन्यदायी आत्मा

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

माता पित्यास आम्ही,

तुझिया रूपात पाहू,

श्रम शक्तीच्या पूजेला

सारे आयुष्य वाहू

अस्तित्व जाणवावे तव गीत गात असता

आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता

 

© श्री रविंद्र सोनवणे

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

भ्रमणध्वनी : ९२२२०५३४३५/८८५०४६२९९३

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares