मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक २१ ते २८) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक २१ ते २८) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम् ।

यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।२१।।

*

अव्यक्त जे अक्षर तेचि परमगती

तयासी प्राप्त होता ना पुनर्जन्म गती ॥२१॥

*

पुरुष: स पर: पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।

यस्यान्त:स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ।।२२।।

*

सकल भूतांचे वास्तव्य परमात्म्याअंतरी

तयानेच लाभे समस्त विश्वासी पूर्णतापरी 

प्राप्ती तयाची पार्था असावी आंस तुवा अंतरी

समर्पित भक्तीने होतसे प्राप्ती अव्यक्ताची खरी ॥२२॥

*

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिन: ।

प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ।।२३।।

*

ज्या काळामध्ये देह त्यागता पुनर्जन्म गती

देहत्यागाचा काळ ज्यात प्राप्तीस्तव परमगती

भरतश्रेष्ठा जाणुनि घ्यावे या कालखंडांना

कथितो तुजला आज मी तुला अगाध या ज्ञाना ॥२३॥

*

अग्निर्ज्योतिरह: शुक्ल: षण्मासा उत्तरायणम् ।

तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना: ।।२४।।

*

ज्योतिर्मय अग्नी अह शुक्ल उत्तरायण अधिपती 

यांच्या मार्गे देहत्यागुनी ब्रह्मवेत्त्यां होते ब्रह्मप्राप्ती ॥२४॥

*

धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा दक्षिणायनम् ।

तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ।।२५।।

*

धूम्र निशा कृष्णपक्ष दक्षिणायन देवता अधिपती 

यांच्या मार्गे देहत्यागता फला भोगुनी जन्माला  येती ॥२५॥

*

शुक्लकृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते ।

एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुन: ।।२६।।

*

शुक्ल पक्षे मार्गस्थ होता प्राप्ती परम गती 

कृष्ण पक्षे देह त्यागिता  पुनर्जन्माची गती ॥२६॥

*

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।

तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ।।२७।।

*

उभय मार्गांचे तत्व जाणुनी योग्या प्राप्त मोहमुक्ती

योगयुक्त होई अर्जुना निरंतर साधक मम प्राप्ती ॥२७॥

*

वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।

अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ।।२८।।

*

जाणुनिया हे तत्वगुह्य योगी कर्मफला उल्लंघितो

निःसंशय तो परम पदासी सनातन प्राप्त करितो ॥२८॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोग नाम अष्टमोऽध्याय: ।।८।।

*

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी अक्षरब्रह्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित अष्टमोध्याय संपूर्ण ॥८॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त : जगण्याचा आदर्श ती…. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ मातृदिनामित्त : जगण्याचा आदर्श ती….  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

मी जिथं आहे तिथं

‘ती’ मला सोबत करते;

आता नाही भेटत ती ,

‘तिची’ आठवण साथ देते.

*

‘ती’ जवळ नसली तरी,

मला नेहमीच जवळ वाटते..

प्रत्येक क्षणी मला…

‘तिची’ सोबत भासते.

*

मन माझे दुःखी होते,

तेव्हा “ती” स्वप्नात येते;

हलकं करुन मन माझं,

उत्साह देऊन जाते..

*

माझ्या सुखात खूप हसते,

जखमांवर फुंकर घालते;

कुरवाळतं कुरवाळत ‘ती’,

हळूच मला मिठ्ठीत घेते…

*

‘तिचं’ माझं नातं आईचं

एवढंच वाटेल तुम्हाला…

माझी सगळी नाती ‘ती’ च होती

हे सांगायला आवडेल मला..

*

माझी शक्ती ‘ती’

माझी भक्ती ‘ती’

माझा आधार ‘ती’

खरं तर जगण्याचा आदर्श ‘ती”

*

निरोप ‘तिला’ देताना

सावरता येईना मला..

वाटलं, चितेवरुन उठून यावी,

‘ती’ जीवंत आहे हे सांगायला…

*

तिच्या ताकदीनं “तीनं”

मला खूप चांगल घडवंल…

हृदय विकाराच्या झटक्यानं

क्षणात मला पोरकं केलं..

*

भ्रमात जगणं पटत नाही

तिच्याशिवाय करमत नाही

मग काय करावे सांगा ,

इलाज काही  उरत नाही

*

आपल्या मन, मेंदू , हृदयात

“आई” नेहमीच असते;

अंतानंतरही विश्वव्यापून उरते

‘ती’ आपली  “आई” असते.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त : आई… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  कवितेचा उत्सव ?

☆ मातृदिनानिमित्त : आई… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

आज म्हणे मदर्स डे असतो..

पण मला सांगा हो आई,

तिची माया एका दिवसापूर्ती कशी असेल?

ती तर अख्खं आयुष्य व्यापून टाकते..

जन्म तर ती देतेच पण जगणं ही शिकवते..

बोट धरून चालायला शिकवणारी..

आणि वेळ पडतातच

समाजरुपी  सागरात एकट्याला सोडणारी..

तिच तर असते अवघ्या जगाची जननी..

तिच असते पहिली गुरू..

आणि तिच असते एक विद्यापीठ..

तिच्या असण्याने जगाला आधार असतो..

तिच जाणं मात्र पोरक करून जातो ..

तिच्या सावलीत ना कुठली

धग लागते ना पाऊस वारा..

तिच्या मायेच्या पंखाखाली 

रोज बरसतात जणू अमृतधारा..

माय, आई, मम्मी, अम्मा, मॉम

नावानी जरी रूप बदललं..

तरी ममतेचा झरा तोच असतो..

प्रत्येक रुपात भेटलेला साक्षात ईश्वर असतो..

अख्खं जगच जिच अस्तित्व असत..

तिच्यासाठी एक दिवस कसा पुरेल..

रोजच तिचं महत्व थोड जरी 

जाणल तरी आयुष्य सुखाने सरेल..

नकोत कसले डे नकोत कसले सोहळे..

नित्य तिची काळजी घेऊ हेच होईल

सार्थक आपल्या जन्माचे..

ना दिसोत वृध्दाश्रम

ना नकोत कुठल्या संधिछाया..

दिलेल्या प्रेमाला तुमच्या

जन्माला सार्थ केलत,

तरी बहोत पा लिया..

कुठलीच माता एकटी नसावी..

तिच्या आयुष्याची संध्याकाळ

 सुखात जावी..

येवढं जरी जमवलं तरी खूप आहे..

वृद्धश्रमात वाट पाहणारे  डोळे               

    मिटन्या आधी हाकेला ओ द्यारे..

नकोत कुठले डे आणि नकोत सोहळे..

आयुष्याच्या संध्याकाळी तिला

मिळो आनंदी गोकुळ सारे..

एकच मागणे मागते रे ईश्वरा..

सुखी ठेव प्रत्येक जननी, माता..

काळजी तिचं वाहते अख्ख्या जगाची सर्वथा..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त : …म्हणजे आई… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ मातृदिनानिमित्त : …म्हणजे आई… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

सुखाच्या सावलीच वैश्विक

परिमाण आणि वेदनेच

वैयक्तिक अविष्करण

म्हणजे आई.

 

पहिल्या उच्चारा पासून अंतिम

श्वासापर्यंतची  सहवेदना,

संवेदना म्हणजे आई.

 

ज्ञानेश्वर माउली, विठु माउली

ही उच्च पदाची पदवी,

म्हणजे आईच.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अपूर्ण कविता … कवी : श्री पुनीत मातकर ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अपूर्ण कविता … कवी : श्री पुनीत मातकर ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा

आवाज विरत नाही, तोच

सुसाट वेगानं मी पोहोचायचो

घराच्या दारात…

*

पाठीवरलं दप्तर फेकून

घोड्यागत उधळत

पोहोचायचो मैदानात,

मस्तवाल बैलासारखा

धूळमातीत बेभान होऊन

मिरवत राहायचो स्वतःचं

पुरुष असणं..

*

तीही यायची शाळेतून..

चार रांजण पाणी…

घरअंगणाची झाडलोट…

देव्हा-यातला दिवा लावून

ती थापायची गोल भाक-या

अगदी मायसारखीच

अन् बसून राहायची उंब-यावर..

रानातून माय येईस्तोवर

*

ती चित्रं काढायची..

रांगोळ्या रेखायची..

भुलाबाईची गाणी अन्

पुस्तकातल्या कविता

गोड गळ्यानं गायची….

धुणंभांडी..सडा सारवण

उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची

*

मी पाय ताणून निजायचो,

ती पुस्तक घेऊन बसायची….

दिव्याच्या वातीत उशिरापर्यंत…

*

एकाच वर्गात असून मास्तर

माझा कान पिळायचे

कधीकधी हातानं….

कधी शब्दानं …

“बहिणीसारखा होशील तर

आयुष्य घडवशील…” म्हणायचे,

मग करायचो कागाळ्या

मायजवळ…

*

मॕट्रिकचा गड

मी चढलो धापा टाकत..

तिनं कमावले मनाजोगते गुण,

बाप म्हणला

दोघांचा खर्च नाही जमायचा

त्याला शिकू दे पुढं…

टचकन डोळ्यात आलेलं पाणी

तसंच मागं परतवत

ती गुमान बाजुला झाली

पाठच्या भावाच्या रस्त्यातून…

*

ती शेण गोव-या थापत राहिली..

मायसंगं रानात रापत राहिली

काटे तणकट वेचत राहिली…

बाईपण आत मुरवत राहिली

*

तिच्या वाट्याचा घास घेऊन

मीही चालत राहिलो

पुस्तकांची वाट… 

कळत गेलं

तसं सलत राहिलं

तिनं डोळ्यातून परतवलेलं

पाणी…

*

तिला उजवून बाप

मोकळा झाला..

मायला हायसं वाटलं..

मी मात्र गुदमरतो अजूनही

अव्यक्तशा

ओझ्याखाली…

*

दिवाळी..रसाळी..राखीला

ती येत राहते

भरल्या मनानं..

पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..

बोटं मोडून काढते दृष्ट..

टचकन आणते डोळ्यात पाणी..

पाठच्या भावासाठी

जाताना पुन्हा सोडून जाते..

मनभरून आशीर्वाद…

*

ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो

ज्योतीसारखा

जिच्या उजेडात ती

उशीरापर्यंत वाचायची पुस्तकं ,

पाठ करायची कविता…

जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण….

कवी: श्री.पुनीत मातकर

गडचिरोली

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मोगर परडी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मोगर परडी?  सुश्री वर्षा बालगोपाल 

हिरव्या पानात

सुगंधी दरवळ

घमघमाटला

मोगरा निर्मळ

*

मोहवते मला

मोगा-याची झाडी

हिरव्या साडीस

सुगंधी ती खड़ी

*

तुझ्याच हाताने

मोगरा माळला

अंतरात माझ्या

दर्या उफाळला

*

तुलाही आवडे

त्याचा तो सुगंध

प्रतीक प्रेमाचे

करीतसे धुंद

*

स्वतः चा तो गंध

आला उधळीत

गुण द्यावे सर्वां

जगाला सांगीत

*

द्यावा मोद जगा

भरून दुथडी

आयु कर देवा

मोगर परडी

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 230 ☆ मातृदिनानिमित्त : आई गेल्यावर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 230 ?

☆ मातृदिनानिमित्त : आई गेल्यावर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आई गेल्यानंतर..

तिचं कपाट आवरताना,

किती सहजपणे टाकून दिल्या..

तिने  अनेक वर्षे जपून ठेवलेल्या तिच्या वस्तू,

जुनी पत्रे..लग्नपत्रिका…कागदपत्रे…जुने फोटो..विणकामाच्या सुया ..लोकर आणि बरेच काही सटर फटर…. जे तिला खुप महत्वाचे वाटत  असावे!

 

तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या,

त्या लाकडी कपाटाला नेहमीच कुलुप असायचे !

होते त्यात काहीतरी खुप जपून जपून ठेवलेले…

कादंब-या, पाकशास्र, भरतकाम विणकामाची दुर्मिळ पुस्तके….

एक सुलट एक उलट करता करता…संपून गेले आयुष्य!

 

आत्यांनी विचारले,जुन्या आठवणी  काढत…

“वहिनीं ची भावगीतांची पुस्तके आहेत का?,त्या म्हणून दाखवायच्या त्यातली गाणी…”

 

हाती लागलेल्या, “गोड गोड भावगीते” या पुस्तकांवर तिच्या लग्नाची तारीख… कुणीतरी लग्नात भेट दिलेला भावगीतांचा संच… मुखपृष्ठावर बासरी वाजवणारा कृष्ण…  शेजारी राधा… राधेच्या हातावर स्वर्गीय पक्षी!

 

आतल्या पानांवर… वाटवे, पोवळे, नावडीकर, शांता आपटे, माणिक वर्मा, मधुबाला जव्हेरी, ज्योत्स्ना भोळे… यांचे तरूण चेहरे आणि गाणी…

 

एक भला मोठा कालखंड बंदिस्त करून ठेवलेला त्या लाकडी कपाटात !

कपाटातल्या सा-याच भावमधूर स्मृती….किती विसंगत तिच्या वास्तवाशी!

कपाटात कोंडलेले… डाचत होते बहुधा तिला आतल्या आत  !

 

आईचे कपाट आवरताना…

बरेच काही समजले तिच्या अंतर्मनातले….!

 

राधेच्या हातावरचा स्वर्गीय पक्षी,

पंख पसरून तसाच स्थिर….गेली कित्येक वर्षे!

आईचा प्राणपक्षी दूर…दिगंतरा….    !

 

सत्तावन्न वर्षाच्या सासरच्या वास्तव्यातली…फडफड…तडफड….शांत…!

 

आई गेल्यानंतर पाहिले,

कित्येक वर्षे गोठविलेले कपाटातले बंदिस्त विश्व !

आता मनात एक रूखरुख….

किती सहजपणे टाकून दिले आम्ही, तिला महत्वाचे वाटणारे बरेच काही!

(आई गेली. ….तेव्हा ची कविता)

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हसरा वैशाख… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ हसरा वैशाख ☆ श्रीशैल चौगुले ☆

वैशाख हसतो

सत्य वाटते का ?

वैशाख,हसतोच हसतो

असत्य का वाटावे ?

बहावा-गुलमोहर फुलतो

कुठेतरी निर्मळ झरा वहातो

पाणंद झाडातून कोकिळ गातो

तापल्या मातीस आम्रतरु बिलगू पहातो

वैशाख हसतोच.

मनात आठवणी उदास भासती

रणरण उन्हाचे निसर्गही सोसती

तरी सांजवेळी डुंबताना दिवस रंगतो

वैशाख हसतोच हसतो

हे निर्विवाद सत्य….!

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ समस्या… ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ समस्या… ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

बा.भ. बोरकर म्हणतात,

 मी पण ज्यांचे

पक्व फळापरी

सहजपणे गळले हो

 जीवन त्यांना कळले हो!

जीवनाविषयी अगदी नेमकं सांगणाऱ्या या ओळी पण खरोखरच हे इतकं सोपं आहे का?  जीवन म्हणजे नक्की काय हे संपेपर्यंत कळतं का? आपण जन्माला आलो,  जगलो,  म्हणजे नेमकं काय याचा सखोल विचार मनात कधी येतो का?  जीवनाविषयी खूप भाष्ये आहेत.

 जीवन एक रंगभूमी आहे.

 जीवन म्हणजे दोन घडीचा डाव.

 जीवन म्हणजे नदी आणि समुद्राचा संगम.

 जीवन म्हणजे कुणाला माहित नसणारं प्रत्येकाचं निरनिराळं  एक गोष्टीचं पुस्तक.

 यश अपयशाचा लेखा जोखा.

 सुख दुःख यांचे चढउतार.

 जीवन म्हणजे संसार.

 जसा तवा चुल्ह्यावर

 आधी हाताला चटके।

 तेव्हा मिळते भाकर. ।।

जीवनाविषयीचा विचार करताना त्यातली दुर्बोधता जाणवते.  खरोखरच जीवन कोणाला कळले का?  हा अत्यंत मार्मिक प्रश्न डॉ.  निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या समस्या या लघुकाव्यात सुंदरपणे मांडला आहे.  या कवितेचा आपण रसास्वाद घेऊया.

☆ समस्या ☆

 जीवन ही तर एक समस्या

 कुणा न सुटली कुणा उमगली।ध्रु।

 

 कशास आलो कशास जगतो

 मोह मनाचा कुठे गुंततो

 कोण आपुला कोण दुजा हा

गुंता कधीचा कुणाल सुटतो ।।१।।

 

सदैव धडपड हीच व्यथा का

जीव कष्टतो कशा फुकाचा

स्वप्न यशाची दुर्मिळ झाली

मार्ग शोधता नजर पोळली ।२।

 – डॉ.  निशिकांत श्रोत्री

समस्या  या शीर्षकांतर्गत दोनच कडव्यांचे  हे अर्थपूर्ण चिंतनीय गीत आहे.  एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कळली असते असे आपण म्हणतो तेव्हा ती  खरंच का आपल्याला उमगलेली असते?  जो बोध अपेक्षित असतो तो आपणास झालेला असतो का?  उलट जितके आपण त्या प्रश्नात रुततो तितकी त्यातली समस्या अधिक गंभीरपणे जाणवते.  म्हणूनच ध्रुवपदात डॉ. श्रोत्री म्हणतात,

 जीवन ही तर एक समस्या

कुणा न सुटली कुणा उमगली।ध्रु।

या दोन ओळीत जीवनाविषयीचा नकारात्मकतेने विचार केला आहे असेच वाटते पण त्यात एक वास्तव दडलेलं आहे.  सभोवताली जगणारा माणूस जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरोखरच जाणवतं की जीवन हे सोपं नाही. कुणासाठीच नाही.  ते कसं जगायचं, जीवनाकडे नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे आणि ते कसे जमवायचे हीच एक फार मोठी समस्या आहे,  कोडे आहे.  आणि आजपर्यंत हे कोडे ना समजले ना सुटले.

कवीने वापरलेला समस्या हा शब्द खूप बोलका आहे. इथे समस्या याचा अर्थ फक्त संकट,  आपत्ती,  चिंता, एक घोर प्रश्न असा नाही तर समस्या म्हणजे एक न सुटणारे कोडे.  एक विचित्र गुंतागुंत.  एकमेकांत अडकलेल्या असंख्य धाग्यांचे गाठोडे  आणि माणूस खरोखरच आयुष्यभर हा गुंता सोडवतच जगत असतो.  तो सुटतो का?  कसा सोडवायचा याचे तंत्र त्याला सापडते का हा प्रश्न आहे.

 कशास आलो कशास जगतो

 मोह मनाचा कुठे गुंततो

कोण आपला कोण दुजा हा

 गुंता कधीच कुणा न सुटतो ।१।

नेटाने आयुष्य जगत असताना निराशेचे अनेक क्षण वाट्याला येतात.  ही निराशा वेगवेगळ्या कारणांमुळे आलेली असते. अपयशामुळे, अपेक्षा भंगामुळे, अचानक उद्भवलेल्या अथवा अनपेक्षितपणे बदल झालेल्या परिस्थितीमुळे,” काय वांच्छीले अन काय मिळाले” या भावनेतून, फसगतीतून, विश्वासघातातून… वगैरे वगैरे अनेक कारणांमुळे माणसाच्या जीवनात नैराश्य येते आणि मग त्यावेळी सहजपणे वाटते  का आपण जन्माला आलो?  कशासाठी आपण जगायचं पण तरीही यातला विरोधाभास भेडसावतो. एकाच वेळी जगणं असह्य  झालेलं असतं,  मरावसंही वाटत असतं पण तरीही कुठेतरी जगण्याविषयीचा मोह सुटत नाही.  मनाने मात्र आपण या जगण्यातच गुंतलेले असतो.

फसवणूक तर झालेलीच असते. ज्यांना आपण आपली माणसं म्हणून मनात स्थान दिलेलं असतं त्यांनीच पाठीमागून वार केलेला असतो किंवा कठीण समयी साथ सोडलेली असते. मनात नक्की कोण आपलं कोण परकं, कुणावर विश्वास ठेवावा याचा प्रचंड गोंधळ उडालेला असतो.  मनाला जगण्यापासून पळून जावसं वाटत असतं पण तरीही पावलं मागे खेचली जातात कारण मोह, लोभ यापासून मुक्ती मिळालेली नसते.  पलायनवाद आणि आशावाद यामध्ये सामान्य माणसाची विचित्र होरपळ  होत असते. जगावं की मरावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते आणि डॉक्टर श्रोत्रींनी या द्विधा मनस्थितीचा अत्यंत परिणामकारक असा सहज सुलभ शब्दात या कडव्यातून वेध घेतलेला  आहे हे जाणवतं.

कशास आलो कशास जगतो

या ओळींमागे आणखी एक भावार्थ आहे.

माणसाचा जन्म पूर्वसुकृतानुसारच होतो.

जन्मत:च  त्याने करावयाची कर्मेही ठरलेली असतात. पार्थ का भांबावला. कारण युद्ध करणे,अधर्माशी लढणे हा त्याचा क्षात्रधर्म होता. पण तो मोहात फसला. गुरु बंधुंच्या पाशात गुंतला आणि किंकर्तव्यमूढ झाला. माणसाचाही असाच अर्जुन होतो. तो त्याची कर्मं किंबहुना त्याला त्याची कर्मं कोणती हेच कळत नाही. भलत्याच मोहपाशात अडकतो. भरकटतो,सैरभैर होतो.आणि हीच त्याच्या जीवनाची समस्या बनते.

मोह मनाचा कुठे गुंततो या काव्यपंक्तीला एक सहजपणे प्राप्त झालेली अध्यात्मिक झालर आहे. मनुष्य जीवनाला काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर या षड्रिपुंनी  ग्रासलेलं तर आहेच. स्थितप्रज्ञता मिळवणे  किंवा त्या पायरी पर्यंत पोहोचणे  ही फार मोठी तपस्या आहे आणि जोपर्यंत माणूस हा नर असतो नारायण नसतो तोपर्यंत त्याला या सहा शत्रूंचा वेढा असतोच.  त्यात मोहाची भावना ही अधिक तीव्र असते आणि त्यासाठी माणूस जगत असतो आणि जगताना मोहापायी अनेक दुःखांचा वाटेकरी  होत असतो. चिंतित, पीडित असतो. डॉक्टर श्रोत्रींनी या कडव्यात केलेलं भाष्य हे वरवर पाहता जरी नकारात्मक वाटत असलं तरी ते एक महत्वाचा  संदेश देतं. माणसाच्या वाट्याला दुःख का येतात याचे उत्तर या काव्यात मिळतं. विरक्ती, दूरस्थपणा, अलिप्तता या तत्त्वांचा यात अव्यक्तपणे पाठपुरावा केलेला आहे. एकाच वेळी जेव्हा आपण जीवन ही एक समस्या आहे असं म्हणतो त्याचवेळी त्या समस्येला सोडवण्याचा एक मार्गही त्यांनी सूक्ष्मपणे सुचवला आहे असे वाटते. “सूज्ञास जास्ती काय सांगावे?” हा भाव या कडव्यात जाणवतो.

 सदैव धडपड हीच व्यथा का

 जीव कष्टतो कशा फुकाचा

 स्वप्न यशाची दुर्मिळ झाली

 मार्ग शोधता नजर पोळली ।२।

माणूस आयुष्यभर मृगजळापाठी धावत असतो.  तो एक  तुलनात्मक आयुष्य जगत असतो.  तुलनात्मक आयुष्य म्हणजे जीवघेणी  स्पर्धा.  स्पर्धेत असते अहमहमिका, श्रेष्ठत्वाची भावना, I AM THE BEST  हे सिद्ध करण्याची लालसा आणि त्यासाठी चाललेली अव्याहत धडपड.  जिद्द, महत्त्वाकांक्षा स्वप्नं बाळगू नयेत असे मुळीच नाही. SKY IS THE LIMIT.

आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा  या विचारात तथ्य नाही असे मुळीच नाही. झेप घेणं, भरारी मारणं, ध्येय बाळगणं,  उन्नत प्रगत होणं यात गैर काहीच नाही पण त्याचा अतिरेक वाईट.  पंखातली ताकद अजमावता आली नाही तर नुसतेच कष्ट होतात. फुकाची धावाधाव,  पळापळ हेलपाटणं होतं.  स्वप्न पाहिलं पण यश मिळालं नाही अशीच स्थिती होते.  माणूस दिशाहीन होतो भरकटतो आणि अखेर जे साधायचं ते साधता आलं नाही म्हणून निराश होतो. आयुष्याच्या शेवटी प्रश्न एकच उरतो.. काय मिळालं अखेर आपल्याला? का आपण इतकं थकवलं स्वतःला?  ज्या सुखसमृद्धीच्यापाठी आपण धावत होतो तिला गाठले का? मुळात सुख म्हणजे नेमकं काय?  हे तरी आपल्याला कळलं का? सुखाचा मार्ग शोधता शोधता नजर थकली. समोर येऊन उभा ठाकला तो फक्त अंधार. ही वस्तुस्थिती आहे. हेच माणसाचं पारंपारिक जगणं आहे आणि याच वास्तवाला उलगडवून दाखवताना डॉ. श्रोत्री मिस्कीलपणे त्यात दडलेल्या अर्थाचा, प्रश्नाचा आणि उत्तराचाही वेध घ्यायला लावतात. पाठीवर हात फिरवून सांगतात,” का रे बाबा! स्वतःला इतका कष्टवतोस? तू फक्त कर्म कर.  कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. त्या कर्मांवरही तुझा हक्क आहे. पण कर्मातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करू नकोस.  अपेक्षा मग ती कोणतीही असू देत… यशाची, स्वप्नपूर्तीची, सुखाची, समृद्धीची पण अंतिमतः अपेक्षा दुःख देते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मलहेतुर्भूमा ते संङ्गोsस्तवकर्मणि।।

समस्येचे मूळ कसे शोधावे याची एक दिशा या काव्यातून दिलेली आहे.  हे काव्य  अत्यंत चिंतनीय आहे. प्रत्येक कडव्याच्यामागे तात्त्विक अर्थ आहे. हे वाचताना मला सहजपणे विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांच्या भाष्यांची आठवण झाली.  ते म्हणत,

“आपले ईहलोकीचे जीवन— कलह, द्वेष, मत्सर, युद्धे, काळजी, भीती, दुःख्खे यांनी भरलेले आहे.  याच्या मुळाशी मनो बुद्धी विषयीचे अज्ञान आहे.  नेमकं हेच ज्ञानमीमांसात्मक सत्य डॉ. श्रोत्रींनी अत्यंत सुबोधपणे समस्या या त्यांच्या लघुकाव्यातून मांडलेलं आहे. या काव्याबद्दल मी गमतीने म्हणेन मूर्ती छोटी पण कीर्ती महान

असे हे आत्मचिंतनात्मक, समत्व योग असलेले, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे  नेणारे उत्कृष्ट गीत.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त : आई ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ मातृदिनानिमित्त : आई ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

शीतल मोहक चांदण्यामध्ये चल ना आई जाऊ

घोस खुडूनी नक्षत्रांचे जीवनास नटवू ||धृ||

*

शिशुपणी मजला अपुल्या संगे उद्यानाअंतरी

थकली तरीही घेई उचलुनी मजला कडेवरी

कुठे पांग फेडू गे तव मी तुझाच तर सानुला

तव स्वप्नांच्या पूर्तीचा मी वसा मनी धरला   ||१||

*

बालपणीची शुभंकरोति निरांजनीची वात

भीमरूपी अन रक्षण करण्या रामरक्षेचे  स्तोत्र

स्वाध्यायी उत्कर्ष घडावा ध्यास कसा विसरू

ध्येय तुझे हे साध्य जाहले दुजा कुणा ना वाहू  ||२||

*

वियोग कधि ना तुझा घडावा  मनात एकच आंस

सुखशय्येवर तुला पहाणे हाच लागला ध्यास

सारे काही अवगत झाले तुझीच गे पुण्याई

दंभ नको ना अहंकार या संस्कारा तू देई ||३||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares