मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिचडी… सुश्री नीता नामजोशी… ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

? जीवनरंग ❤️

☆ खिचडी… सुश्री नीता नामजोशी… ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

समोरच्या पातेल्यातली खिचडी आपल्या पानात वाढून घेत ती खात बसलेल्या आपल्या सासूकडे ती चकित नजरेनं पहात होती..

नवं नवंच लग्न झालं होतं तिचं..

अगदी आयत्या वेळी नवऱ्याचा नि तिचा बाहेर जेवायला जायचा प्लॅन ठरला.. 

नवरा म्हणाला “ आईबाबांसाठी खिचडी बनवून ठेव..”

तशी तिनं नवथर उत्साहानं तिला बऱ्यापैकी जमणारी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली..

आणि ती निघायच्या तयारीला लागली…

सासूचा निरोप घ्यायला ती स्वयंपाकघरात आली आणि पहाते तर..

सासू  एकटीच शांतपणे खिचडी खात बसलेली..हे दृष्य तिच्या सरावाचं नव्हतं..

आजवर कधी तिची आई तिच्या बाबांच्याआधी अशी एकटीच जेवली नव्हती..

ती एकटक पहात असताना नवऱ्याच्या हाकेनं तिची तंद्री भंग झाली..

ती सासूचा धावता निरोप घेऊन बाहेर पडली..

नवऱ्यासोबत रेस्टॅारंटमध्ये जेवतानाही तिच्या नजरेसमोर सतत  खिचडी खाणारी सासूच येत राहिली..

एका क्षणी न राहवून तिनं नवऱ्यापाशी मन मोकळं केलं.. ते ऐकताना तो तिच्याकडेच विचित्र अविश्वासाच्या नजरेनं पहात राहिला.. बोलला मात्र काहीच नाही..

एव्हाना तिला अंदाज आला होता -सासू नि नवरा मनमोकळं बोलणारे नाहीत..

माहेरच्या मोकळ्या ढाकळ्या दंगामस्तीच्या वातावरणात वाढलेली ती..

या घरात सदासर्वकाळ नांदणारी शांतता तिच्या अंगावर यायची…. ही माणसं मनातलं भडाभडा बोलून मोकळी का होत नाहीत..? न बोलताच एकमेकांच्या मनातलं कसं कळतं यांना..? दोन चार शब्दांची देवाणधेवाण कशी पुरते यांना ?—- हा प्रश्न तिला नेहमी पडायचा..

या संदर्भात बोलताना नवरा कधीतरी बोलून गेला -” अगं तुलाही जमेल.. फार काही न बोलता मनातलं समजून घ्यायला तूही शिकशील ..सूर जुळले की मनांचा सहज संवाद सुरू होतो..”

तिला मात्र ते काही केल्या जमत नव्हतं…. जमत नव्हतं म्हणण्यापेक्षा ते हजमच होत नव्हतं…

सासूचा तर अंदाजच येत नव्हता..

तिला आई म्हणणं जीवावर यायचं…. आतून त्या भावना आल्याशिवाय आई म्हणण्याचा दुटप्पीपणा तिला जमला नसता..

कसं कोण जाणे पण सासूला ते कळलं ..तिनंच तिला सांगितलं, “  तू आपली सासूबाईच म्हण हो मला.. “

आणि तिला हुश्श झालं.. 

नेमकी आपली सासू कशी आहे हे तिला कळत नव्हतं.. आजवर तिचा स्वर उंचावल्याचंही तिनं पाहिलं नाही..

की भावनांचं प्रदर्शन नाही .. कायम शांत संयत नि सौम्य ..

पण आजचं तिचं असं खिचडी खाणं मात्र सासूच्या मनातल्या प्रतिमेशी विसंगत असं वाटलं…

दोघं घरी परतले तेव्हा सासरेबुवा मजेनं तिला म्हणाले–”  बरं का सूनबाई.. आज तुमच्या सासूनं हद्दच केली ..तुम्ही केलेली खिचडी तिला इतकी आवडली की तिनं एकटीनं ती सफाचट केली.. आमच्यासाठी वेगळी बनवून दिली .. आता पुन्हा आमच्यासाठी खिचडी बनवा एकदा “ .. ते ऐकून ती अवाकच झाली…हे कसलं वागणं… ? 

रात्री झोपेतही तिला तेच आठवत राहिलं.. 

अचानक तिला मध्येच जाग आली..पहाते तर काय..नवरा शेजारी नाही..

त्याला पहायला ती बाहेर ड्रॅाइंग रूममध्ये आली…

रात्रीच्या शांततेत सासू नि नवऱ्याचं हलक्या स्वरातलं बोलणंही तिला स्पष्ट ऐकू येत होतं..

सासू नवऱ्याला सांगत होती– “ अरे खिचडी जरा खारट झाली होती.. तुला माहितेय यांना बीपीचा त्रास आहे.. जराही मीठ जास्त झालं की यांची चिडचिड होते.. बोलण्यातलं भान सुटतं.. यांच्याकडून सूनबाईला जरासं काही बोललं गेलं असतं तर ते मला आवडलं नसतं .. अरे आपलं माहेर सोडून आलेय ती..त्यात तिचा स्वभाव आहे हळवा.. आपणच जपायचं, तिला सांभाळून घ्यायचं….” 

 त्यावर नवरा म्हणाला “ अगं मग टाकून द्यायची खिचडी.. तू कशाला खात बसलीस ती.. ?” 

 सासू- “ अरे बाबा खाऊन माजावं पण टाकून माजू नये या संस्कारात वाढलीय मी.. अन्नाचा अपमान करवेना..म्हणून खाल्ली हो…. यांच्यासाठी दुसरी बनवली..” 

 नवरा- “ अगं पण मग फ्रिजमध्ये ठेवायची ..” 

 सासू -” ते यांच्या नजरेतून थोडंच सुटणार होतं.. किती बारीक लक्ष असतं यांचं तुला ठाऊकच आहे .. “

नवरा -” अगं पण तुला त्रास होतोय त्याचं काय… ?”

 सासू- “ घेतलीय मी पाचक गोळी .. बरं वाटेल हो मला.. आता तू जाऊन झोप बरं. आणि हो.. झाल्या प्रसंगाचा चुकून उल्लेखही करायचा नाहीये .. “ 

नवरा- “ हो…” 

आणि आता तिला त्या जागी उभं रहावेना.. ती तशीच बाहेर येऊन सासूच्या मांडीवर डोकं ठेऊन स्फुंदून स्फुंदून रडू लागली… सासू तिच्या डोक्यावर थोपटत राहिली.. 

दुसऱ्या  दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे किचनमध्ये आली ती.. गॅसपाशी उभी सासू चहा करत होती.. तिला पाहून प्रसन्न हसत म्हणाली- ”  बाळा जरा हा चहा नेऊन देतेस बाहेर .. “ 

आणि तिच्या तोंडून “ हो आई “ असं कधी निघून गेलं .. तिचं तिलाही कळलं नाही.. ती चहा घेऊन वळली.. सासू पाठमोऱ्या  तिच्याकडे त्याच शांत सौम्य समाधानी नजरेनं पहात होती.

लेखिका : सुश्री नीता नामजोशी

प्रस्तुती :  सुश्री स्नेहा वाघ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!! ) –इथून पुढे —–

*हा काळ होता अंदाजे इसवीसन १३३० चा ..!! एका पायाने लंगडा तैमुर, दिल्ली उध्वस्त करून पुढे सरकत होता ..!!

पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले .. लुटालूट करायला तो ज्या, ज्या गावात जाई, ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे .. सर्व धनधान्य बाड-बिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत ..!!* 

लुटायचे, मारायचे, बाटवायचे .. पण कुणाला ..??

गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात .. ह्या गोष्टींमुळे, तैमुरच्या सैन्याची उपासमार होऊ लागली .. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई .. त्यावेळी गनिमी कावा करून, अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात ..!! दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात ..!! रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले ..!! ह्या गनिमी हल्ल्यांनी तैमुर हैराण झाला .. सैन्य देखील उपाशी राहू लागले तशी सगळ्यांची चिडचिड ही वाढू लागली ..!!

रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले. रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना त्या काळजी घेत असत, की तैमुरच्या सैन्याला झोप मिळणार नाही ..!! हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो, ब्राम्हणी, रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती..!!

एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे .. तंबूला आगी लावणे, आगींमुळे हत्ती पिसाळणे, सततचे जागरण यामुळे, तैमुरचे सव्वा लाख सैन्य, अक्षरश: जेरीस आणले गेले ..!!

बरेच सैनिक तडफडून मरण पावले .. मेरठवर हल्ला केल्याचा तैमुरला आता पस्तावा होऊ लागला .. नेमक्या ह्याचवेळी, लपून बसलेले जोगराजसिंगचे सैनिक, अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले ..!! 

त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या .. त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे ..!!

तीच कहाणी स्त्री सेनेची होती ..!! रामप्यारीने दिवसा व रात्री लढण्यासाठी, आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडांवर बसून, तैमुरच्या सैन्यावर शर-वर्षाव करे, तर दुसरी तुकडी तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत ..!!

*पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया, लढाईच्या ऐन धुमाळीत, तैमुरच्या दिशेने निघाला ..!! तैमुरच्या  अंगरक्षकाना उडवून, बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारीने पाहिले मात्र, ती आपल्या तुकडीसहित, त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली, आणि सपासप सैनिक कापत, रामप्यारी बाईची स्त्री सेना, तैमुरच्या जवळ पोचली..!!

चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून, तैमुरचे सैनिक पुरते गोंधळले .. हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका, खिजराखानने ओळखला .. त्याने तैमुरचा घोडा खेचून, सटकण्याचा प्रयत्न केला .. त्यात तो काहीसा यशस्वीही होत होता तोच, २२,००० सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन, ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले .. घमासान लढाई पेटली .. तैमुर चक्क पळून जात होता .. रामप्यारीने त्याला पाहिले व पळणाऱ्या तैमूरचा  पाठलाग चालू केला ..!!

रामप्यारी घोड्यावर आणि तैमुर देखील घोड्यावर ..!! तैमुरने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणा-या तैमुरच्या काखेच्या उघड्या भागावर, रामप्यारीने दौड घेतानाच, बाण चालवले. रामप्यारीने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली .. पण विष लावलेले बाण शरीरांत शिरल्याने तैमुर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला ..!!

खिजराखानला मागे येताना बघून रामप्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली ..!!

ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून, तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून, समरकंदला पळून 

गेला ..!! गळा, छाती तसेच बगलेतील जखमांमुळे, तैमुर लवकरच मेला ..!!

अशा ह्या ‘पळपुट्याचे’ तिकडे शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे उभे आहेत ..!!

आणि इथे त्याचे नांव, आपल्या मुलाला दिले जात आहे ..!!

*देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी, एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले ..!!

पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर मात्र लक्षांत ठेवला ..!!

तैमुरसारख्या नराधमाला समोर गाठून, त्याला विदीर्ण करणाऱ्या रामप्यारीबाई चौहानला देखील भारतीय लोक पार विसरून गेले .. कारण हा खरा इतिहास आम्हाला कधीच शिकवलाच गेला नाही ..!!*

तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!

रामप्यारीला मानाचा मुजरा ..!!

—समाप्त— 

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात इयत्ता सातवीत असलेली शांताबाई शेळकेंची ही कविता मला खूप खूप आवडायची. नुसती आवडायचीच नाही तर एक अनामिक हुरहूरही लावून जायची.

लहान मुलांचे एक वेगळेच भावविश्व असते. या भावविश्वात त्यांनी काय काय जपलेले असते!काही समज, भुतांच्या गोष्टी, राजाराणी, परीच्या, राक्षसाच्या गोष्टी, त्यांची खेळणी अन कल्पनाविश्वे !आपण त्यांच्या भावविश्वात डोकावले तर बरेच काही उमगत जाते.

खेळणी त्यांची जिवलग असतात विशेषतः बाहुले, टेडी, बाहुल्या. बाहुलीविना कुठल्याच मुलीचं बाल्य नसेल;अगदी विकतची सुंदर आखीव रेखीव नसेल पण कापडाच्या चिंध्याची घरात शिवलेली का असेना!पण बाहुली असतेच. आपल्या दृष्टीने निर्जीव असलेली खेळणी लहान मुलांना मात्र सजीव असतात. ते त्यांच्याशी बोलतात, भांडतात, परत जवळ घेतात, न्हाऊ माखू घालतात, त्याला सतत आपल्या जवळ ठेवतात, ते जिथं जातील, सोबत घेऊन जातात.

अशीच एक सुंदरशी बाहुली कवयीत्रीला पण लहानपणी आवडायची. दुसऱ्या पण बाहुल्या होत्या तिच्याकडे पण ही खास होती कारण ती अतिशय सुंदर आणि आकर्षक देखील होती.

लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख

अशी ती लाखात एक होती. पुढे कवयित्री तिच्या सुंदर रूपाचे वर्णन करते.

किती गोरे गोरे गाल गुलाबी फुलले

हसते नाचते केस सुंदर कुरळे

टपोऱ्या गुलांबाप्रमाणे गोबरे गाल, सुंदर कुरळे केस, अंगातला रेशमी लाल झगा अन केसांवर बांधलेली लाल फित अर्थात रिबन यामुळं ती अजूनच देखणी दिसायची. कवयित्री पुढे म्हणते की तिच्याजवळ खूप बाहुल्या होत्या पण तीच माझी अतिशय आवडती बाहुली होती.

एके दिवशी अघटित घडलं बाहुलीचं. बाहुलीला घेऊन कवयित्री माळावर खेळायला गेली असता लपंडाव रंगात आला आणि लपलेली बाहुली काही केल्या मिळेना. उशीर झाल्याने हिरमुसली होऊन ती माघारी घरी आली पण बाहुलीशिवाय तिला चैनच पडेना. ते माळरान आणि बाहुली डोळ्यांपुढं नाचू लागली. मन तिला शोधण्यासाठी धावू लागलं पण शरीराने जाता येईना कारण संततधार पावसाला सुरुवात झाली.

पाऊस उघडल्यावर मात्र ती धावतच बाहुलीच्या शोधात  पळाली. पावसाने सारे रान चिंबले होते आणि ओल्याचिंब गवतावर ती दिसली!

पण हाय !तिची दशा दशा झाली होती.

कुणी गाय तुडवूनी गेली होती तिजला

पाहुनी दशा ती रडूच आले मजला

माळरानावर चरता करता कुण्या गायीने बहुलीला तुडवले होते. तिचे  कुरळे सुंदर केस विस्कटून गेले होते. गोरा गोरा रंग फिका झाला होता. ते भयाण दृश्य पाहून कवयित्रीला रडू आले, मैत्रिणीही चिडवू लागल्या “शी ! काय पण ध्यान!” पण तरीही कवयित्रीने तिला तसेच उचलून हृदयाशी घेतले कारण ती बाहुली तिची लाडकी तर होतीच पण तिच्याशी तिचा अतूट स्नेह, भावना जुळलेल्या होत्या म्हणूनच ती कशीपण असली तरी तिला अतिशय प्रियच  होती.

पण आवडली तशीच मजला राणी

लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी

खूपच मनाला भिडणारी ही कविता एक संदेशही नकळत देऊन जाते की जीवापाड जपलेली खेळणी असो, माणसे असो की नाती कोणत्याही परिस्थितीत आपण त्यांना दुरावू देवू नये. सर्वसामान्यपणे मुलं खेळणं खराब झाले की फेकतात, मोडतोड करतात पण कवयित्रीने मात्र असे केले नाही कारण ती बाहुली तिच्या बालविश्वातली सजीवच गोष्ट होती. तिचे भावबंध त्या बाहुलीशी एकरूप झाले होते.

कधी कधी वाटते, लहानपणी खेळण्यांशी खेळुनसुद्धा आपली खेळणी जपून ठेवणारी माणसे पुढे नातीसुद्धा जपत असतील का?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुंदरी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ सुंदरी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

संध्याकाळ व्हायला लागली होती. त्या पांथस्थाला दूरवर एका देवळाचे शिखर दिसले. त्यावरून कुठलेतरी गाव जवळच असणार असा त्याने विचार केला, आणि चालण्याचा वेग वाढवला. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या पलीकडून कुणाच्या तरी कण्हण्याचा आवाज ऐकू आला. पुढे जायचं सोडून तो त्या आवाजाच्या दिशेने जायला लागला– झाडी ओलांडून पलीकडे गेला मात्र – आणि समोरचं दृश्य पाहून एकदम दचकला – घाबरला. कमालीच्या जखमी अवस्थेतली कितीतरी माणसं तिथे तळमळत पडलेली होती. त्याला काही समजायच्या आतच जवळच पडलेल्या एक जखमीने कसंतरी म्हटलं – “ पाणी —” . 

त्या पांथस्थाने आपली पाण्याची बाटली ताबडतोब त्याच्या तोंडाजवळ नेलीही, पण तेवढ्यात दुसऱ्या जखमी माणसाने क्षीण आवाजात म्हटलं —” पाणी —”. लगेच पहिल्या जखमी माणसाने आपलं तोंड दुसरीकडे वळवत, खुणेनेच त्या दुसऱ्या जखमीला पाणी देण्यास सांगितलं. पांथस्थ त्या दुसऱ्या जखमी माणसाकडे वळतच होता, तेवढ्यात तिसऱ्या जखमी माणसाने पाणी मागितलं. आणि दुसऱ्या जखमीने स्वतः पाणी न पिता त्याला  तिसऱ्या  जखमी माणसाला पाणी देण्यास पाठवलं. आणि हाच प्रकार पुढे चालू राहिला. एकाला पाणी द्यायला हात पुढे केला की तो पुढच्या जखमी माणसाकडे बोट दाखवत मान वळवत होता. असं होता होता तो पांथस्थ अगदी शेवटच्या टोकाला पडलेल्या जखमी माणसाजवळ पोहोचला. त्याची अवस्था तर अशी होती की त्याला जर अगदी लगेच पाणी मिळालं नसतं, तर त्याचा जीवच गेला असता. पांथस्थाने त्याला जेमतेम दोन घोट पाणी पाजलं असेल- त्याने घाईघाईने त्याच्या अलीकडच्या जखमीकडे जायची खूण केली. अशा प्रकारे सगळ्यांना घोट घोट पाणी पाजत पांथस्थ पुन्हा पहिल्या जखमी माणसापर्यंत आला.  घोटभर पाणी पाजल्यावर त्याला जरा हुशारी आली. त्या सगळ्याच जखमी माणसांनी एक-दुसऱ्याबद्दल दाखवलेली ती  आश्चर्यकारक आपुलकी पाहून तो पांथस्थ एव्हाना पार चक्रावून गेला होता. त्याला आता त्या सगळ्याबद्दलच  प्रचंड कुतूहल वाटायला लागलं होतं. म्हणून नुकतंच जो पाणी प्यायला होता त्या जखमी माणसाला त्याने न राहवून विचारलं — “ तुम्ही सगळे कोण आहात ? आणि तुमची ही अशी अवस्था कशी झाली आहे ? “ 

––” आम्ही सगळे या जवळच्या गावातच राहणारे आहोत. “  

—-” पण तुम्हाला असं इतकं घायाळ कुणी केलंय ?”

—-” आम्ही सगळे आपापसातच भांडलो आहोत. आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एकमेकांना बेदम मारलं आहे. “ 

—-” पण आत्ताच मी जे काही पाहिलं, त्यावरून तर एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते आहे की तुमचं सगळ्यांचं   एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे – मग ही अशी मारामारी कशासाठी ?”

—-” आम्ही जेव्हा असे भांडतो, मारामारी करतो, तेव्हा आपसातलं प्रेम, आपलेपणा, नातीगोती, माणुसकी, हे सगळं आपोआपच  विसरून जातो. कारण ज्या गोष्टीसाठी आम्ही भांडतो ती गोष्टच अशी आहे जी आम्हाला एकमेकांच्या जीवावर उठणारे शत्रू बनवते. “

—-” म्हणजे ? अशी गोष्ट तरी कोणती आहे ती – जरा मलाही कळू दे की .” 

—-” ती एक सुंदरी आहे. आता गावात पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत, आणि हे अगदी पक्कं ठरलेलं आहे की त्या निवडणुकीत जो जिंकेल, त्यालाच ती सुंदरी वरमाला घालेल .” 

—-” हो का ? पण स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसांना राक्षस बनवणाऱ्या या सुंदरीचं काहीतरी नाव असेल ना–” 

—-” आहे ना–’ सत्ता-सुंदरी ‘ म्हणतात तिला. “ 

————पाणी पिऊन झाल्यावर काही जखमी माणसं कशीतरी उठून बसली होती. काही जण उठण्याचा किंवा उभं राहण्याचा प्रयत्न करत होते. पांथस्थाशी बोलत असलेल्या त्या जखमी माणसाचं इतर जखमी माणसांच्या त्या हालचालींकडे लक्ष जाताच स्वतःही उठण्याचा प्रयत्न करताकरता त्याने आधी आपली काठी हातात नीट धरली.

मूळ हिंदी  कथा – ‘सुंदरी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- “त्ये झालंच. पन सायब, मास्तर द्येवमानूस हाय हो. त्येंच्या जावयानं पुरता धुतलाय बघा त्येनला. तुमचा मेल्याला कर्जदार म्हणजे जावईच की येंचा. जाताना पार धुळीला मिळवून गेलाय यानला. येंच्या पोरीचीबी कशी दशा करुन टाकली बघताय न्हवं?दोन पोरींच्या पाठीवरचं ह्ये एक लेकरु पदरात हाय बगा. सैपाकाची चार घरची कामं करती म्हणून चूल तरी पेटती हाय इथली. मास्तरांच्या पेन्शनीत त्येंचं सोताचं औषदपानीबी भागत न्हाई बगा.. ” बेलीफ सांगत होता. ते ऐकून मी सून्न होऊन गेलो. नाना भिकू कुलकर्णींचं अंधारं म्हातारपण, अर्धवट जळलेल्या वाळक्या  लाकडासारखा त्यांच्या मुलीचा धुरकट संसार, खोलीत भरून राहिलेला कळकट अंधार आणि माझ्या मनात भरून येऊ पहाणारं मळभ… या सगळ्यांच्या नातेसंबंधातला गुंता वाढत चालला होता… !)

विचार करायला वेळ होताच कुठं? मी न बोलता आत आलो. एक कागद घेतला. त्यावर पेन टेकवले. दोन परिच्छेद न थांबता लिहून काढले. खाली सहीसाठी फुली मारली. कागद मास्तरांच्या पुढे सरकवला. थरथरत्या हातानी मास्तरांनी न वाचताच त्यावर सही केली. कागदाची घडी करुन मी ती खिशात ठेवली. जाण्यासाठी वळणार तोच कान फुटक्या दोन कपात घोटघोटभर चहा घेऊन, थकून गेलेल्या चेहऱ्याची मास्तरांची मुलगी समोर उभी होती. तिच्या थकलेल्या मनावरचं ओझं उतरवण्याचा मोह मला आवरता आला नाही. म्हणालो,

“हा व्याज आणि कोर्टखर्च माफीसाठी मी अर्ज लिहून घेतलाय. हेड आॅफीसला हा अर्ज मी रेकमेंड करीन. कांहीतरी मार्ग नक्की निघेल.. ” कृतज्ञतेने भरलेल्या नजरेने माझ्याकडे पहात तिने हात जोडले.

“पोरी, आण तरी तो अर्ज इकडे. त्यांचं शुद्धलेखन एकदा तपासून तरी पहातो.. “

केविलवाणं हसत मास्तर म्हणाले. मी अर्जाची घडी मास्तरांच्या हातात दिली. उलगडून न वाचताच त्यांनी ती एका झटक्यांत फाडून टाकली. मी चमकलो. काय होतंय मला समजेचना.. !

“या उतार वयात एवढं ओझं पेलवायचं कसं हो मला?अहो या वाळक्या कुडीत जीव तग धरुन ठेवलाय तो सगळ्यांची सगळी देणी फेडण्यासाठीच. मी म्हातारा आहे. कंगाल कफल्लकही आहे. पण.. पण.. मला खऱ्या अर्थाने ऋणमुक्त होऊन मगच ‘राम’ म्हणायचंय. “

हे बोलता बोलता मास्तरांच्या विझू लागलेल्या नजरेत अचानक वीज चमकून गेल्याचा मला भास झाला….!

“साहेब, आजवर चालवलेले, माझ्या या चिमुकल्या नातवाचे वारसदार म्हणून नाव लावलेले माझे पोस्टात एक बचत खाते आहे. दात कोरुन, पोटाला चिमटे घेऊन जमवलेले किडूक-मिडूक आहे त्यात‌. नवऱ्याच्या दारूच्या वासापासून वाचवलेले, लपवून बाजूला जपून ठेवलेले पैसेही माझ्या या पोरीने त्यात वेळोवेळी जमा केलेले आहेत. त्या खात्यावर माझ्या नातवाचे नव्हे तर माझ्या त्या कर्मदरिद्री जावयाचेच नाव वारसदार म्हणून लावले होते असे

मी समजतो आणि तुमचं सगळं कर्ज फेडून टाकतो. पोरी, ते पासबुक आण बघू इकडे.. “

काॅटखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढून त्यातलं जिवापाड जपलेलं ते पासबुक मुलींनं मास्तरांकडे सोपवलं. मुलीबरोबर पूर्ण रक्कम बॅंकेत पाठवायचं त्यांनी आश्वासन दिलं. कुणीतरी हाकलून दिल्यासारखी त्यांची मुलगी खालमानेनं आत त्या

विझलेल्या चुलीपुढे जाऊन बसली. मास्तरांकडून पंधरादिवसांची मुदत मागणारा अर्ज घेऊन मी बाहेर पडलो. माझ्याबरोबर बेलीफही.

बेलीफ गप्पगप्पच होता. मी कांही बोलणार तोच खिशातून एक घामेजलेली, कळकट, शंभरची  नोट काढून त्यानी माझ्या हातात कोंबली.   

“.. हे.. पैसे. मास्तरांचे.. “

माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे मी येण्यापूर्वीच सकाळी आगाऊ वर्दी द्यायला जाऊन याने त्या गरीब माणसाकडून बक्षिसी उकळली होतीच तर.. !नुसत्या कल्पनेनेच मला. त्या माणसाची विलक्षण किळस आली.

“सायब, ताईस्नी कर्जाचा हिशेब सांगशीला तवा शंबर रुपै कमी सांगा न् ह्ये त्येंच्या कर्जात आज जमा करुन टाका.. “त्याचा आवाज कळेल न कळेल इतपत ओला झाला होता.

“आवं, आज सकाळच्याला ह्यीच नोट घिऊन मी मास्तरांकडं आलोतो. ह्ये सायेबाना द्यून मुदत मागा म्हण्लंतं. पन त्येनी या पैक्याला हाय बी लावला न्हाई. आवो माज्या ल्हानपनीचं माजं मास्तर ह्ये. मला बुकं शिकायची लई हाव हुती. पन वक्ताला दोन घास खायला मिळायची मारामार असायची. तवा या देवमानसाच्या घरातल्या उरलंल्या अन्नावर दिवस काढलेते आमी. ह्ये पैकं त्येनी घेत्लेतर नाहीतच, पन मला वळख सांगूनबी वळखलं न्हाई. आवं, त्येच्यावानी वाळकुंडा म्हातारा मानूस बी कुणाचं उपकार न ठिवता कर्ज फेडतू म्हनतोय, मंग धडधाकट शरीरपिंडाच्या मी त्येंच्या अन्नाच्या रिणातून कवा न् कसं मोकळं व्हायचं सांगा की… “

मी पैसे ठेऊन घेतले. त्याच्या प्रश्नाचं हेच तर एकमेव उत्तर त्याक्षणी माझ्याजवळ होतं! या माणसाबद्दल माझ्या मनात डोकावून गेलेल्या शंका, संशयाची आठवण होऊन मला माझीच लाज वाटू लागली.

दारिद्र्याशी झगडताना  आयुष्याच्या अखेरच्या  क्षणीही मनाचा कणा ताठ ठेऊ पहाणारे मास्तर आणि खाल्लेल्या अन्नाचं ऋण फेडायला धडपडणारा बेलीफ यातलं मोठ्ठं कोण याचा निर्णय मला घेता येईना.

वसुलीची कांहीही शक्यता नसणाऱ्या कर्जाची पूर्ण वसूली होत असल्याचं खूप विरळाच मिळणारं समाधान का कुणास ठाऊक पुढे कितीतरी दिवस दुर्मुखलेलंच राहीलं होतं!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र-माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली, शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती अलगद तरळून गेली.)

“हं.. चला हतंच ” बेलीफ म्हणाला.

एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. भुसभुशीत भिंतीच्या आधाराने कसंबसं तग धरून उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता बेलीफ अलगद आत शिरला. मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो. 

“साहेब, .. आत या ” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती ! )

पडे निघालेल्या भिंतींसारखं त्या अंधाऱ्या खोलीतलं मलूल वातावरणही बोचणारं होतं. लाकडी फळ्यांच्या काॅटवर कुणीतरी झोपलेलं होतं. मास्तरच असावेत. आतल्या विझू लागलेल्या चुलाण्याजवळ सावली हलल्याचा मला भास झाला.

“ताईसाब, बॅंकेचं सायब आल्यात” बेलीफने मुद्द्यालाच हात घातला.

मांडीवरल्या पोराला खांद्यावर टाकून ती पुढे आली. त्या भग्न वाड्याच्या कृश सावलीसारखा रापलेला रंग, वाळलेल्या अंगकाठीवर लोंबणारं जुनेरं.. त्रासलेल्या चेहऱ्यावर उदासीत कालवलेले .. मला शापणारे भाव.. !

काय बोलावं, कशी सुरुवात करावी मला समजेचना.

एवढ्यात काॅटवरच्या अंधारात थोडीशी हालचाल जाणवली. बेलीफ पुढे झाला.

“मास्तर, ब्याकेचं सायब आल्यात.. “

“या.. या.. “कुलकर्णी धडपडत उठायचा प्रयत्न करु लागले. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा बेलीफ त्यांना सावरायला पुढे झेपावला. 

“या.. बसा असे.. ” पायथ्याजवळची कळकट चादर गोळा करुन लाकडी काॅटचा एक कोपरा रिकामा करुन देत नाना भिकू कुलकर्णीनी मला थरथरते हात जोडत बसायची खूण केली. विरघळू पहाणारी माझी नजर रंग उडालेल्या भिंतींवरुन मास्तरांच्या वाळून गेलेल्या चेहऱ्यावर येऊन स्थिरावली.

“बोला.. काय म्हणताय?”

“हे बेलीफ. यांच्यामागोमाग आम्ही आलो. म्हणजे.. यावं लागलं.. ” मी बेलीफकडे पाहिलं.

“मास्तर, कोरटाचं वारंट निघलंय. तुमाला अटक कराय आलोय आमी.. “

“तुम्ही जामिनदार आहात ‘प्रसन्न इलेक्ट्रीकल्स’च्या कर्जाला. दोन वर्षांपूर्वी कोर्टाचा

हुकूमनामा मिळूनही कर्जखात्यात कर्जदाराने पैसे भरलेले नाहीत. त्यांची कांही मालमत्ताही नाही. आता त्यांच्या कर्जाचे जामिनावर म्हणून त्यांच्या पश्चात तुम्हीच बॅंकेचे एकमेव ऋणको आहात. एकूण व्याज, कोर्टखर्च मिळून वीसएक हजार रुपये भरावे लागतील… ” मी म्हणालो. ते विचारात पडले. गप्प बसले. शून्यात नजर लावून कांहीतरी शोधत राहिले.

मग बेलीफच पुढे झाला.

“मास्तर.. “

“अं.. ?”

“अटकेचा पंचनामा करायला हवा… “

“अं.. ? हो.. रितसर जे असेल, ते करा. तयारी आहे माझी. ”  बेलीफला काय बोलावं कळेना. तो जागचा उठला. दाराजवळ जाऊन मला खूणेनं बोलावून घेतलंन्.

“काय करायचं?” हलक्या आवाजात मला विचारलं.

“कायद्यानुसार जे काही असेल ते करायचं. “

“त्ये झालंच. पन सायब मास्तर द्येवमानूस हाय हो. जावयानं पुरता धुतलाय याला. तुमचा मेल्याला कर्जदार जावईच की ह्येंचा. जाताना सोताचं न् ह्येंचं दोनी घरं पार धुळीला मिळवून मेलाय बगा. हाय खाऊन मास्तरांची बायकू गेली. सोन्यासारक्या यांच्या पोरीची जावयानं पार दशा करुन टाकलीया बगा. दोन पोरींच्या पाठीवरचं त्ये एक लेकरु हाय तिच्या पदरात. दोन घरी सैपाकाची कामं करुन चूल पेटती ठेवतीया. मास्तरांच्या पेन्शनीत  त्येंचं औषदपानीबी भागत न्हाईय” बेलीफ सांगत राहीला. मी ऐकत होतो. नाना भिकू कुलकर्णींचं अंधारं म्हातारपण, अर्धवट जळलेल्या वाळक्या लाकडासारखा त्यांच्या मुलीचा धुरकट संसार, खोलीत भरुन राहिलेला कळकट अंधार.. आणि माझ्या मनात भरुन आलेलं मळभ… या सगळ्यांच्या नातेसंबंधातला गुंता वाढत चालला….. !

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘ऋणमुक्त’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

बेलीफचं ते चार ओळींचं पोस्टकार्ड माझ्या उत्साहावर विरजण ओतायला पुरेसं होतं. एका हुकूमनामा मिळालेल्या कर्जखात्यातील जामिनादारावर अटक वाॅरंट बजावण्यासाठी बॅंकेमार्फत मला केळघर ग्रामपंचायतीत हजर रहायला सांगणारं ते पत्र!

कामाच्या घाईगर्दीतला एक अख्खा दिवस कर्जवसुलीची कांहीही आशा नसलेल्या एका खात्यासाठी  फुकट घालवायचा ही कल्पना मनाला पटणारी नव्हतीच. पण कायद्याचा एकदा उगारलेला बडगा कोणत्याही आदेशाविना शेवट गाठण्याआधी केवळ माझ्या इच्छे न् मतानुसार आवरणं बँकेच्या नियमात बसणारं थोडंच होतं?

मला जाणंच भाग होतं.   

बेलीफच्या पत्रानुसार मी दहा वाजता ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधे हजर रहाणं आवश्यक होतं. पण मी गेलो साडेनऊ वाजताच. कारण ‘बेलीफ’या व्यक्तीपासून मी आधीपासूनच सावध रहायचं ठरवलं होतं.  त्याला कारणही तसंच होतं.  जिथे जायचं त्यांना आधीच भेटून, वर्दी देऊन त्यांच्याकडून बक्षिसी उकळायचं त्यातील काहींचं तंत्र आणि कसब राष्टीयकृत बॅंकेचा मॅनेजर म्हणून मला ऐकून माहिती होतं. आज इथेसुध्दा संशयाला जागा होतीच. कारण माझ्या आधीच बेलीफ हजेरी लावून कामानिमित्त बाहेर गेल्याचं ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधून मला समजलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिनली.  सहजासहजी आपली अशी फसवणूक करायचा त्याचा प्रयत्न असल्याचा संशय मला तिडीक यायला पुरेसा होता. पण डोक्यात राख घालून चालणार नव्हतं.  मी शांत रहायचं ठरवलं.  आता एक तर पुरेसा पुरावा नसताना चिडून संतापून उपयोग नव्हताच.  त्यामुळे त्याच्या कलाने घेणे माझ्या दृष्टीनं सोयीचंच नव्हे तर

आवश्यकसुद्धा होतंच. पाच-दहा रुपयांसाठी स्वत:चं इमान विकायचीही तयार असणाऱ्या या माणसाची मला आता किंव वाटू लागली.

पुढे अर्ध्या-पाऊण तासानंतर बेलीफ आला.

धोतर, वर पांढराच पण मळकट शर्ट,डोक्यावर कळकट टोपी,तोंडात पानाचा तोबरा, ओबडधोबड मातकट चेहऱ्यावरचे दाढीचे खुंट,आणि हातात लोंबती पिशवी. तो माझ्याकडेच पहात थोडा घुटमळलाय हे लक्षात येताच सावध अंदाजानेच त्याच्याकडे पाहून मी ओझरता हसलो.

“मॅनेजर सायब का ?”

“हो. तुम्ही बेलीफ?तुम्ही तर मघाशीच आला होतात ना?”

“हां.. म्हंजी.. तुमच्या म्होरं घटकाभर आधी तर आलोतो.. पन.. ”  

“मग गावात गेला होतात कां?”

तो बावचळला.

“हा़.. म्हंजी काम हुतं वाईच”

“नाना कुलकर्ण्यांकडे ?” मी वर्मावर बोट ठेवल्यासारखं तो दचकलाच एकदम.. थुंकायचं निमित्त करून मला नजर द्यायचं टाळत त्याने मान वळवली.

“म्हंजे त्ये मास्तर व्हय. ? अवं तेंच्याकडं आत्ता तुमच्यासंगट जायचं नव्ह का.. “तो सव्वाशेर निघाला होता. मी स्वतःशीच हसलो. गप्प बसलो. रस्त्यातून जाताना मी विचारलेल्या प्रश्नांना तो न अडखळता मुद्देसूद उत्तरे देत होता.

“नाना कुलकर्णी असतील, भेटतील का हो घरी?”

“व्हय तर. जात्यायत कुटं?हांतरुन सोडता याय नगं?”

“म्हणजे?”

“अवं समद्या हातापायाच्या काटक्या झाल्यात. वाळून कोळ झाल्यालं म्हातारं मानूस त्ये. दिस मोजत पडून आसतंय. “

“अस्सं? मग त्याना अटक कशी करायची. ?”

“आता कायदा म्हणतोय न्हवं अटक करा म्हणून..  आपण करायची. अवं ही काय फौजदारी अटक हाय का ?सादी शिव्हील अटक ही. ततं जायाचं. त्येना म्हनायचं,’मी बेलीफ. ह्ये बॅंकेचं सायब. आन् ह्ये कोरटाचं वारंट. नाना भिकू कुलकरनी , आमी तुमाला अटक केलीय. ‘ त्ये व्हय म्हनतील. पन त्यो वाळका ओंडका उचलून न्याचा कसा न् ठिवायचा कुटं?म्हनून मंग अटकंचा पंचनामा करायचा. त्येचा कोर्टात रिपूर्ट लिवायचा. मंग कोर्ट नोटीस काढंल,पुलीस धाडंल. त्ये समद त्येंचं काम.  कोर्टात हजर नाही झालं तर  पुलीस त्यांना बेड्या घालून नील. त्ये समदं त्येंचं काम. आपनाकडं त्येचं काय नाय. “

मी ऐकत होतो. कायदा कोळून प्यालेला तो बेलीफ किती निर्विकारपणानं सांगत होता सगळं! माझ्या नजरेसमोर अंथरुणाला खिळलेली,शेवटच्या घटका मोजणारी, नाना भिकू कुलकर्णींची कृश मूर्ती नकळत तरळून गेली… माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पहाणारी.. दयेची भीक मागणारी..

“हं.., चला हतंच. “

एका पडक्या वाड्यापुढे आम्ही उभे होतो. अवशेषांच्या रुपात डुगडुगत कसाबसा उभा असणारा दिंडीदरवाजा.. वाळवीनं पोखरलेलं त्यावरचं नक्षीकाम..  पुढचा कोंदट अरुंद बोळ..  वाटेतला गंजका नळ..  धुण्याच्या दगडाजवळची सुकलेली केळ.. वाळून गेलेला आळू..  जांभळाचं वाळत चाललेलं म्हातारं झाड..

भुसभुशीत भिंतीच्या आधारानं कसंबसं तग धरुन उभ्या असणाऱ्या दारांच्या चौकटीला धक्का न लावता, बेलीफ अलगद आत शिरला.  मी घुटमळत बाहेरच उभा राहिलो.

“साहेब, या..आत या” बेलीफ म्हणाला. मी आत गेलो.. पण त्या टिचभर खोलीत टेकायला जागाच नव्हती.. !

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ My father is the best mother… भाग – 2 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? जीवनरंग ❤️

My father is the best mother… भाग – 2 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

(कारण– कारण मी अशी मुलगी होते जिनं जन्माला येतांना आपल्या आईला खाल्लं….) इथून पुढे —

माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न करावे म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले.पण त्यांनी लग्न केले नाही. माझ्या आजी आजोबांनी  नैतिक, अनैतिक, भावनिकरित्या बाबांना प्रवृत्त करण्याचा कसोशीने प्रयत्न केला,पण बाबा ठाम राहिले.. शेवटी तर आजीआजोबांनी  Ultimatum दिला….” तू जर आमचे ऐकले नाहीस तर ही शेती,जमीनजुमला,घर यातला छदामही मिळणार नाही, या सर्वातून  तुला बेदखल केले जाईल. “

बाबा दुसऱ्यांदा विचार करण्यासाठीसुद्धा थांबले नाहीत आणि क्षणार्धात सगळ्यावर पाणी सोडले. सुखी आयुष्य आणि विशेषतः ग्रामीण सुखी जीवनावर पाणी सोडले व मला घेऊन या मोठ्या शहरात एक सडाफटींग माणूस म्हणून अतिशय कठीण, कष्टप्रद जीवन स्विकारलं. रात्रंदिवस काम करुन मला वाढवलं,जपलं, प्रेमानं माझी काळजी घेतली.  .

आता मोठं झाल्यावर माझ्या लक्षात येतंय की अनेक चांगल्या गोष्टी त्यांना का आवडायच्या नाहीत… ज्या मला आवडायच्या !

पानात एखादा तुकडा राहिला आणि मला आवडत नाही असं त्यांनी म्हंटलं की तो मीच संपवायचे…..कारण एकच की हा पदार्थ बाबांना आवडत नाही…

खरी ग्यानबाची मेख इथंच होती….त्यांच्या समर्पणाची.

त्यांच्या आवाक्याबाहेरचे,पण जे जे चांगले आहे ते त्यांनी मला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

या शाळेनं मला आश्रय दिला आणि सर्वात महागडे बक्षीस दिले ते म्हणजे मला इथं प्रवेश दिला.

Love, Care ..defines Mother.म्हणजे प्रेम आणि काळजी ही बाब आईसाठी असेल तर माझा बाबा यात फिट्ट बसतो.

Compassion….म्हणजे करुणा म्हणजे जर आई असेल,तर माझा बाबा यात फिट्ट….

Sacrifice…समर्पण हे आईचे रुप असेल तर माझ्या बाबाचं प्रभुत्व आहे यावर….

संक्षेपात……

आई जर प्रेम,काळजी,करुणा,समर्पण यांची मुर्ती असेल तर…..

  …..   MY FATHER IS THE BEST MOTHER ON EARTH THEN…

On Mother’s day I Salute him and say it with great Pride that, the hardworking GARDENER  working in this School is MY FATHER…

On Mothers day..या पृथ्वीवरचा  एक सर्वोत्तम पालक म्हणून मी माझ्या बाबांना शुभेच्छा देते.

कदाचित शिक्षकांना मी हे लिहलेलं आवडणार नाही,पण ही तर अगदी छोटी गोष्ट आहे माझ्याकडून माझ्या बाबांसाठी, ज्यानी माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम केले.

टांचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता खोलीत पसरलेली….आवाज काय तो फक्त गंगादासच्या कोंडलेल्या हुंदक्यांचाच.

बागकाम करतांना तळपत्या उन्हाने कधीही घामाघुम न झालेला गंगा… आपल्या मुलीच्या या मृदु मुलायम शब्दांनी  त्याची छाती अश्रुंनी भिजून चिंब झाली..तो हात बांधून उभा होता….

शिक्षकाच्या हातातून गंगानं तो कागद घेतला आणि ह्रदयाच्या जवळ धरला.अद्यापही हुंदक्यांनी त्याचं शरीर थरथरत होत…….

प्राचार्य मॅडम खुर्चीतून उठल्या. गंगाला त्यांनी खुर्चीत बसायला सांगितले, पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाल्या….

आवाजातला प्रशासकीय करड्या स्वराची जागा आता मुलायमतेनी घेतली होती..

“ गंगा अरे तुझ्या मुलीला 10/10 गुण मिळाले. शाळेच्या इतिहासात मदर्स डे च्या दिवशी आईवर लिहलेला हा सर्वोत्कृष्ट निबंध आहे. आपल्या शाळेत Mother’s Day निमित्त उद्या एक मोठा समारंभ आयोजित  केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने यासाठी मुख्य अतिथी म्हणून तुला बोलवण्याचे ठरवलेयं. आपल्या मुलांना वाढविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेम आणि समर्पण करणाऱ्या  व्यक्तिचा सन्मान आहे हा. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेळी तुझ्या मुलीनं तुझ्याबद्दल दाखविलेल्या विश्वासाला Appreciate केलं तर तिलाही अभिमान वाटेल आणि शाळेलाही, आपल्याकडे असणाऱ्या सर्वोत्तम पालकाचा….खरंतर एका अर्थाने बागशिल्पकारच तू. A  Gardner…. बागेतील झाडांची काळजी घेतोस,जपतोस.  एवढच नाही तर  तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फुलाचं निरोगी संगोपन, पालन पोषण अप्रतिम पद्धतीने करतोयस……

“So Ganga ….. will you be the chief guest for tomorrow’s event?”

—समाप्त

लेखिका – सुश्री ज्ञानदा कुळकर्णी.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ My father is the best mother… भाग – 1 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? जीवनरंग ❤️

My father is the best mother… भाग – 1 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

“ My Father is the Best Mother on Earth !! ” —-हे वाक्य उच्चारल्या बरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आजूबाजूला पाहिलं तर अख्ख ऑडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेलं होतं .त्या टाळ्यांच्या Rhythm मध्ये मीही सहभागी झाले होते.

पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आढळली ती म्हणजे अनेकांचे पाणावलेले डोळे….माझ्यासह…।।

प्रसंग होता एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत साजरा होणारा….MOTHERS DAY CELEBRATION चा..

इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून असे कार्यक्रम घेतले जातात.

आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या शाळेतल्या हिरवाईनं सजलेल्या, विविध वृक्षसंपदा असलेल्या बगिच्यातील झाडांना उन,धूळ याची पर्वा न करता “तो” पाणी देत होता…..तेवढ्यात शाळेच्या शिपायाने त्याला सांगितले..

“ गंगादास..प्राचार्य मँडमनी तुला बोलवलयं…आत्ता लगेचच.. “ 

शेवटल्या दोन शब्दावरचा  जोर  निरोपाची तीव्रता अधोरेखित करत होता.

हात स्वच्छ करुन गंगा निघाला मँडमच्या केबीनकडे.

त्याची छाती धडधडत होती.रोजचा पायाखालचा रस्ता संपता संपत नव्हता. डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.

कशासाठी बोलवलं असेल  मॅडमने ? खूप शक्यता पडताळून पाहिल्या गंगाने.. All permutations, combinations…पण छे !आपल्या कामात चोख होता तो.

टकटक…टकटक…त्यानं दार वाजविले…

बाहेरुनच विचारले….

“ मॅडम, तुम्ही मला बोलावलंत ? “

“ आत ये.”..आतून एक जरब असणारा आवाज ..

तो आणखीनच Nervous…

दार लोटून तो आत गेला…

करडे,रुपेरी केसांची फ्रेंच नॉट घातलेली आणि धारदार नाकावर आकर्षक फ्रेमचा चष्मा असलेल्या प्राचार्यांनी त्याच्याकडे बघितले आणि टेबलवरच्या एका कागदाकडे बोट दाखवले……

म्हणाल्या….

“ वाच हे ! “

गंगा बावचळला पण लगेच म्हणाला…

“ मॅडम अहो मी निरक्षर माणूस, मला लिहता वाचता येत नाही.. आणि इंग्रजी तर फारच लांबची गोष्ट.

माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा…एक संधी द्या मॅडम मला….मी आजन्म ऋणी राहीन तुमचा. तुमच्या या बड्या शाळेत तुम्ही माझ्या मुलीला फुकटात शिकण्याची संधी दिली. मी तर स्वप्नातही हा विचार केला नव्हता….” 

तो थरथर कापत, स्फुंदून स्फूंदून बोलत होता.

 

“ थांब जरा तू. शांत हो.खूप गोष्टी गृहीत धरल्यास तू. तुझ्या मुलीला शिक्षणाची संधी आम्ही दिली कारण ती खूप हुशार आहे आणि तू आहेस आमच्याकडचा आज्ञाधारक  Gardner…माळी…..थांब जरा.”

बेल वाजवून शिपायाला त्यांनी एका शिक्षिकेसाठी निरोप धाडला… “ ही शिक्षिका आली की वाचून दाखवेल आणि अर्थही सांगेल तुला. “  कागदाकडे निर्देश करीत म्हणाल्या, “ हे तुझ्या मुलीनं लिहलयं आणि मला वाटत होतं  की तू हे वाचावंस…

तेवढ्यात टीचर आल्याच. टीचरने वाचायला सुरवात केली आणि प्रत्येक ओळीचं हिंदी भाषांतर करत वाचलं. 

ते लिहलेलं असं होतं….।

…. “ आज आम्हाला आमच्या “आई “बद्दल लिहायला सांगितले…. कारण Mother’s day…. 

बिहारमधल्या एका छोट्या खेड्यातून मी आले. शिक्षण आणि आरोग्यसुविधांची वानवाच तिथे. कित्येक माता बाळांना जन्म देतांना  मृत्युला कवटाळतात. माझी आई त्यातलीच एक….मी या जगात आल्यानंतर मला कौतुकानं कवटाळताही आले नाही तिला. माझा बाबा हा पहिला व्यक्ती होता ज्यानी मला हातात घेतलं….आणि कदाचित एकमेव… प्रत्येक जण दुःखी होता…

कारण– कारण मी अशी मुलगी होते जिनं जन्माला येतांना आपल्या आईला खाल्लं….

— क्रमशः…

लेखिका – सुश्री ज्ञानदा कुळकर्णी.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मन रिचार्ज – रिचार्ज !! – अज्ञात ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

मन रिचार्ज – रिचार्ज !! – अज्ञात ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच.

रविवार…निवांत, आरामाचा दिवस…आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती. 

सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज ‘लो बॅटरी’..

चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती.

अरे बापरे…?? काय करावे तेच सुचेना…

मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो.

माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”

“नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले.

“मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतोस ,इतके त्याला जपतोस .. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”

—- पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते.

“मनाचे चार्जिंग ?? हे काय नवीन.???”

“नवीन नाही, जुनेच आहे. चार्जिंग, अपडेट हे तुमचे आजचे परवलीचे शब्द. प्रत्येकजण कपडे, राहणीमान, ॲप्स सतत न चुकता अपडेट करीत असतो. परंतु, रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यात दुर्लक्ष होते, ते मनाकडे.”

“भारी, इंटरेस्टिंग बोलत आहात” सहजपणे वडिलांच्या शेजारी बसलो.

लहान असताना बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची कॉपी करायचो. जसजसा मोठा होत गेलो तसे आमच्या दोघात नकळत अंतर पडत गेले, संवाद बंद झाला नाही.. पण, कमी मात्र झाला.

 माझे धावपळीचे आयुष्य,टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवासानंतर खरंतर वर्षानंतर असे शेजारी बसलो. बाबा इमोशनल झाले हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजले.

मीच त्यांची पाठ थोपटली. त्यावेळी मलाही भरून आले. आईची खूप आठवण आली. 

किती साधी गोष्ट ती सुद्धा इतक्या वर्षामध्ये मी केली नव्हती.

बाबांसोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या.

एकदम फ्रेश, मस्त वाटलं.. !!

“मनाचे चार्जिंग सुरु झाले बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का.. लाईट केव्हाच आली.. आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी फुल्ल चार्ज झालो, दोस्ता..!!” 

“दोस्ता…” बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकले. बाबा आपल्या खोलीत गेले. मला भारी वाटत होते.

क्लासवरून नुकताच आलेला मुलगा म्हणाला, “बाबा, चेस खेळणार ?” 

“नको..तू हरलास तर मला बरे वाटणार नाही..”

“चॅलेंज..तू हरणार हे नक्की.. तेव्हा नो टेन्शन..”

बुद्धीबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो.

मुलाने स्पोर्टींगली घेतले. मित्राने बोलावले म्हणून तो खेळायला गेला.

आता काय करायचे…?

अचानक मनात आले.. घर आवरु या.. बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात.. मला थांबायला सांगून, ती घराबाहेर गेली आणि लगेच परत आली.

“कसं शक्य आहे? आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय..” बायकोचा टोमणा.

दोघेही मनापासून हसलो.अत्यंत उत्साहाने कामाला लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतले. बॅगमध्ये भरून ठेवलेली कागदपत्रे चेक करताना शाळेत,कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या, वह्या सापडल्या.त्यातील जुने हिशोब,जपून ठेवलेली पेपरची कात्रणे पाहताना त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचताना गंमत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या.आठवणींचा पेटारा उघडत होता.

जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय..!!!

आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मुलं जसे खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जातात… अगदी तसेच जुने फोटो बघण्यात तसाच हरवून गेलो आणि मनाने त्याकाळात पोहचलो.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली.स्वत:चे तरुण रूप पाहताना हुरळून गेलो. 

चटकन आरशात पाहिले.

“अरे..! फारसा फरक पडला नाही”. 

उगीचच स्वतःला समजावले. अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली, स्थिरावली. तिथे हयात नसलेल्या आप्तांचे हसरे फोटो होते. बराच वेळ पाहत राहिलो.

मन गलबलून आले .खोल खोल कप्प्यात दडपलेल्या सगळ्या आठवणी सर्रकन समोर आल्या.डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडले समजले नाही.नंतरचे फोटो पाहताच आले नाही.

काही वेळ डोळे मिटून शांत बसलो.मनात विचार आले ,’कसं असतं ना आपलं मन..?

अचानक आनंदून जाते..क्षणात गहिवरते, हळवे होते..

एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची गिनती नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर सेव्ह असतात.ती फक्त ओपन/ क्लोज करता येतात.. मात्र डिलीट करता येत नाही.’

—या विचारात असताना पाठीवर थोपटत बायकोने काँफीचा कप हातात दिला. माझी अवस्था बरोब्बर तिच्या लक्षात आली.

“वा..! आज एकदम रेट्रो मूड मध्ये..”

“रोज न चुकता मोबाईलचे करतो, आज मनाचे चार्जिंग चालू आहे”

समोर पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली,“अरे वा..!चला तर मग जोडीने, आपल्या लग्नाचे फोटो पाहू”

मग जोडीने आमच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो.  त्यावेळी घडलेल्या गमती जमती, रुसवे फुगवे सगळे आठवले.

लग्न पुन्हा एन्जॉय केलं.

“आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिले, अगदी खेळकर, स्वच्छंदी पूर्वी असायचास तसा. रागावू नकोस.. पण.. काम, स्टेटस, रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या तसा तू हरवत गेलास. त्यातच गुरफटलास, एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ राहिला नाही. खूप मोठा झालास. पण, आमच्यापासून लांब गेलास . उगीच वाद नको म्हणून आजवर बोलले नाही.. पण, आज पुन्हा पूर्वीचा वाटलास म्हणून हे बोलण्याचे धाडस केले.”—डोळ्यात आलेले पाणी पुसत बायको कुशीत शिरली. काही वेळ विलक्षण शांततेत गेले. दोघांचा मौनातून संवाद चालू होता.

“ थँक्यू सो मच..! इतरवेळी असे बोलल्यावर मी चिडलो असतो.. पण, आज नाही. आजचा दिवस मस्त आहे. करियर, स्टेटस, अॅम्बीशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो होतो. आपण मोठे झालो की मन मारत राहतो.. त्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच विसरतो . रुटीन सोडून आज खूप दिवासांनी काही वेगळे केले. सगळ्यात महत्वाचे ,कशाततरी हरवून गेलो.आज खूप हलकं वाटतंय.”

“ मग, मोबाईल ऑन करू की नको? कारण, कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाही. खरंच आजचा दिवस मस्त आहे.”

“ चल, आता मी तुला किचनमध्ये मदत करतो ” 

—बायकोला जोरात ठसका लागला.

“ मन जरा जास्तच चार्ज झालंय वाटतंय ” बायकोने चिमटा काढलाच….. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print