मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिकवण… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

 ? जीवनरंग ?

☆ शिकवण… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे, लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसालेभात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे.

छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजीना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही. हसणं तर जाऊदेच पण त्या कायम चिडलेल्या असत. काही बोलायला गेलं की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत. आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजीनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही. न बोलता त्या कामाला लागत. मला त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत असे.

मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी १५ पोळ्या करायच्या. १५ लाडू करा म्डटलं की २०-२२ लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचुप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं.

मला वाटलं की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं. ती म्हणाली, “हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहित आहे.”

“अगं ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना! त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना? मग चोरी का करायची?” मी तडकून विचारलं.

आई म्हणाली, ”नको विचारायला. त्यांना फार वाईट वाटेल. ६५ वर्ष वय आहे त्यांचे. आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्याची गरज असते.”

एरवी राजा हरीश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रीणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रीणीच्या घरी पाठवलं होतं. तिच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती. मला काही उलगडत नव्हतं.

मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते. मनात आलं आजींकडे डोकवावं. म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. “ये की गं आत!” म्हणाल्या. मी पेढे दिले. आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला. 

आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता. 

आजीनी लहानसं घर छान ठेवलं होतं. मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, “तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं? म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा “गुण” त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दानं विचारलं नाही. रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं. पण हातून पाप घडलं हे कबूल करते.

त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या दहावीच्या निकालाची. नाही म्हणू नको.”

“आई तुझी भारी हूशार बघ. मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॅाक्टर मित्राकडे, डॅा. रॅाय कडे तिनं नोकरी लावून दिली. ते डाक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची गरज आहे.” आजीने डोळे पुसले.

मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती पण आजी ऐकेनात. त्या म्हणाल्या, ”क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखे कायतरी आहे हे असं म्हणतात. ते डाक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने वहिनी बोलल्या नाहीत मला.”

मी घरी आले व आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, “आण ती इकडे. मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची बघेन मी.”

मी कौतुकाने आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकरमाणसाला काढून टाकणारे बरेच असतात. पण आईने आजींचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॅा. रॅाय कडे नोकरी लावून दिली व डॅाक्टरांना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं. कुठेही वाच्यता न करता! आजी आमच्या घरचं काम झालं की डॉ. रॉय कडे जात असत.  

आई, तू किती चांगली आहेस ग!” म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली, ”तुला त्या दिवशी वाटलं ना की आई कडे डबल स्टँडर्ड कसं… कुणाला आवडतं का चोरी करायला? ती सुध्दा अन्नाची! मी त्यांना सरळ विचारू शकले असते, पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॅा. रॅाय ना विचारावं. बाबांचंही हेच मत होतं. अपराध्याला काही न बोलता माफ करणं ही पण एक प्रकारची शिक्षाच आहे बघ.” मी चमकून आईकडे बघितले.

“आजी सतत चिडचिड का करायच्या? कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतंय. एखादी सवय अशी असते की आपलं चुकतंय हे माहित असूनही ते बदलता येत नाही.. अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे! म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचं.” आई म्हणाली.

“मग आई, या चेनचं काय करणार आहेस?” मी कुतूहलाने विचारलं.

आईने क्षणभर विचार केला व ती म्हणाली, “ त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली. त्याचा त्यांना आनंद  मिळू दे. डॅाक्टर म्हणाले आहेत की behavior therapy चा आजींना खूप उपयोग होत आहे. एकदा त्यांची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू.”

मी आईकडे अभिमानाने बघितलं.  १० वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणं जेवढे महत्वाचं होतं तेवढंच आजींना माफ करणं महत्वाचं होतं. त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही. माफी मध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागलं. 

मी आईला घट्ट मिठी मारली! “आई गं, तू डॅाक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ञ आहेस ग!”

आईने दिलेले ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे. बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असतं. आत लपलेले बरंच काही आपल्याला सहजी दिसत नाही..

“Before you judge someone, at least walk a mile in his shoes “ असं म्हणतात ते उगीच नाही !

लेखिका : सुश्री  ज्योती रानडे

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज  म्हाई येणार आमच्याकडे,.  एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘.आता इथून पुढे)

दिपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू वस्तू द्यायचा नाही. कारण गेल्या चार महिन्यापासून त्याचे बिल द्यायचे होते. पाच मिनिटात दिपू धावत आला. ” आई वासू काका म्हणतात, म्हाईच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देत नाही.’ तिला अंदाज होताच. आता म्हाई यायला पाच तास बाकी होते.  एवढ्या माणसांचे  जेवणखांन व्हायलाच हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात तीन चार ग्रॅम सोने होते. आता हाच एकमेव उपाय. तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित मानकर यांची ही परिस्थिती. प्रतिष्ठित मानकरी  म्हाईच्या भक्तांना जेवण घालू शकत नाही? ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी  घोडे ठेवले होते, रोज दहा वीस बाहेरची माणसे जेवून जात होती, सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आधन बंदच होत नव्हते, ज्या घरातील शिल्लक अन्नावर तीन चार कुटुंब रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे या कुटुंबाच्या आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार  म्हाईसाठी माल नाही म्हणतो॰ “.

दिपूच्या आईला रडू येत होते. हुंदक्यावर हुंदके येऊन गळ्यावर आदळत होते. पण तिने डोळे पुसले. दिपूला म्हणाली ” दिपू चल माझ्याबरोबर.’

” कुठे आई?

” रघु सोनार कितीपर्यंत दुकान उघडे ठेवतो? तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले.

” सहा पर्यंत ‘.

” मग चल चप्पल घाल ‘.

तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली. डोळे कोरडे केले. केसावरून हात फिरविला आणि पायात चप्पल घातली. चप्पल घालून ती आणि दिपू चार पावले चालली एवढ्याच संज्या डोक्यावरून टोपली आणताना दिसला. ती संजय कडे पहात म्हणाली  ” काय हे संज्या?

” आईने पाठवले तुमच्याकडे,’. संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दिपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली. उतरलेल्या टोपलीकडे दिपूची आई पहातच राहिली. टोपली तीन चार किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या दोन पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते.

” अरे हे कोणासाठी संज्या? दिपूची आई आश्चर्याने ओरडली.

” तुमच्यासाठी काकी, तुमच्याकडे म्हाई येणार ना, मग हा दिपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, ” संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला,  आज आमच्याकडे म्हाई येणार, तिच्याबरोबर वीस पंचवीस लोक असणार त्यांचे जेवण करावे लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही ‘. माझ्या बाबांनी आईला हे सांगितलं. आई म्हणाली” संजय ताबडतोब हे सामान दिपूच्या घरी पोहोचव, आज त्यांना याची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराण्याच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले, आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील. माझ्या आईने ही टोपली भरली आणि  तुमच्याकडे हे सामान पोहोचवायला सांगितलं ‘.

दिपू ची आई रडत रडत खाली बसली. ” काय हे संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू मी. म्हाई रात्री येणार खरी पण संज्याच्या आई मला खरी म्हाई तुमच्या रूपात आत्ताच भेटली.’. दिपूची आई चटकन उभी राहिली डोळे पुसले आणि पुढे येऊन संजयला जवळ घेतले. ” बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपलीतून एवढे सामान आणलंस, तुला द्यायला लाडू पण नाही रे घरात ‘. संजाने आणि दिपू ने सर्वसामान घरात घेतले. आईने त्यांना डबे दाखवले त्या डब्यात भराभर भरले.

आता दिपूच्या आईच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने भराभर दोन चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात फुगत घातले. बटाटे कांदे चिरायला घेतले. कोथिंबीर मोडून ठेवली. एका चुलीवर तेल तापवून पुऱ्या करायला घेतल्या.

इकडे देवळात ढोलांचे ताशांचे आवाज सुरू झाले. ढम… धम..ढम, ताशांचे आवाज ताड ताड ताड, शिंग वाजले पु… उ…. पु……

.म्हाई निघाली, म्हाई निघाली, भक्तांच्या भेटीला  म्हाई निघाली. सगळ्या गावात उत्साह संचारला.

दिपूच्या आईची घाई होत होती. दोन चुली रट्टा रट्टा पेटत होत्या. तिने दोन अडीच तासात सगळा स्वयंपाक पुरा केला. आधी पूजा बाबांनी आंघोळ केली आणि सोवळे नेसून ते तयार राहिले. दिपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली तसेच शेजारची शोभा काकी पण आली. दिपूच्या आईने अंघोळ करून घेतली, आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे ती दिसली. दिपू ही आंघोळ करून तयार झाला.

साडेअकरा वाजले आणि ढोल ताशे जवळ वाजायला लागले. ढम…ढम… ढम, ताड.. ताड… ताड…., शिंग वाजू लागले. दिपूच्या बाबांनी  म्हाईला घरापर्यंत आणलं. दिपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना आत घेतलं. म्हाईची पालखी आत ओसरीवर आली. दिपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजार्यांनी गाऱ्हाणे घातले. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतची मंडळी विसावली. गेले कित्येक वर्षे देवीच्या मानकर यांच्या घरी सर्व भक्तांना जेवण असते. त्याप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांना जेवण वाढले. दिपू च्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्या. भराभर वाढून झाले. मंडळींनी  ” पुंडलिक वरदे ‘ म्हणत जेवणाला सुरुवात केली. वरण-भात, वाटाण्याची बटाट्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी. भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दिपूच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिले आणि म्हाईची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली.

रात्री दिपूची आई अंथरुणावर पडली पण तिच्या डोळ्यासमोर संज्याची आई होती. संजय ची आई  म्हाई सारखी धावली म्हणून गावच्या मानकरांची अब्रू वाचली, नाहीतर……

दिपू च्या आईला झोप येईना. आज दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एक सारखी आठवण येत होती.

सकाळ झाली. म्हाईच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दिपूच्या आईने डब्यात शेवयाची खीर, पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी घेतली. आणि ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. त्याच अळीत शेवटचं घर संज्याच. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केले. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहता दिपूची आई पुढे गेली आणि तिने  संजयच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली  ” संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडाव लागणार होतं. त्यात तरी काय तीन-चार ग्रॅम सोनं. पण गावातील सोनारासमोर घराण्याची अब्रू जाणार होती. सज्यांच्या आई, माझी म्हाई मला काल संध्याकाळीच भेटली.संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई “.

” असं बोलू नका दिपूच्या आई, अश्रू आवरा.’

” कशी आवरू संज्याच्या आई, रात्री आलेल्या म्हाईला आमची काळजी असती, तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेने बुडवले असते का, आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाड्या घेऊन मजेत. आमची म्हाई त्यांना शिक्षा देत नाही. संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई.’.

संजयच्या आईला मिठी मारून दिपूची आई रडत होती आणि संजय ची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे रडणे ऐकून तेथे आलेले संजय चे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.

– समाप्त –

म्हाई – गावदेवीची पालखीतून काढलेली मिरवणूक

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पहिले – आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता पाया पडून पुढची आश्वासने देत होता.दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले. आता इथून पुढे)

” साहेब मी गरीब माणूस. कारखान्यातून मिळालेली सर्व फंडाची रक्कम तुमच्या संस्थेत ठेवली. आम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. आमच्या पैशांचे काय? पंधरा दिवसांवर आमच्या गावातली  “म्हाई ‘ आली. आम्ही देवीचे मानकरी. आम्हाला दरवर्षी मोठा खर्च असतो. तातडीने काहीतरी पैशाची व्यवस्था करा.

” अहो काका, इथे रोज शेकडो माणसे येऊन गर्दी करतात. सर्वांचेच पैसे अडकले. अडकले याचा अर्थ बुडाले असे नव्हे. पैसे मिळणार पण ते केव्हा ते मी सांगू शकत नाही. रिझर्व बँकेने तात्पुरते निर्बंध घातलेत. आपले चेअरमन जाऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांना भेटलेत. सर्व व्यवस्थित होणार काळजी करू नका ‘.

” पण साहेब पंधरा दिवसावर आमची म्हाई आली. खर्चाला आमच्याकडे पैसे नाहीत ‘.

” हो का केव्हा आहे तुमची म्हाई?’

” या महिन्याच्या 22 तारखेला साहेब ‘. 22 तारखेला ठीक आहे, मी 22 तारीख ची तुमची व्यवस्था करतो. तुम्हाला 22 तारीख चा स्टेट बँकेचा चेक देतो. त्यादिवशी येऊन बँकेतून पैसे घेऊन जा ‘. साहेब यांनी 50 हजाराचा चेक लिहून दिला. खाली आपली जोरदार सही केली. दिपूचे बाबा खुश झाले. दुपारच्या एसटीने गावी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी दिपूच्या आईला पन्नास हजाराचा चेक दाखवला. ती पण खुश झाली. आता निर्धास्तपणे 22 तारखेच्या  म्हाईची तयारी सुरु केली.

गावात सगळीकडे लगबग सुरू होती. देवीच्या देवळात झाडलोट केली गेली. देवळाला नवीन रंग दिला. देवीची पालखी तसेच भांडीकुंडी सर्व काही झकपक झाले. गावातील प्रत्येक घराघरात  म्हाईची तयारी सुरू झाली. घरांची साफसफाई झाडलोट सुरू होती.

दिपूच्या घरी दिपूच्या आईने घर वर पासून खालपर्यंत झाडलं. प्रत्येक भांड धुतलं. घरातली अंथरूण पांघरून पुन्हा टाकली. घराकडे येणाऱ्या पानंदी स्वच्छ केल्या. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आपल्या गावात यायला लागले. वर्षभर बंद असलेली घर उघडून साफसूफ करायला लागले. गावाला जाग आली. अनेक चाकरमानी गावात दिसायला लागले.

दिपूचे बाबा परत परत तो 50000 चेक पाहत होते.  त्या खालची ती झोकदार सही पाहत होते. 22 तारखेला सकाळी आठच्या गाडीने दिपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. दिपूच्या घरची तशी सर्व तयारी झाली होती. फक्त घरात धान्य सामान आणि साखर वगैरे नव्हते. पैसे आले की ताबडतोब वासूच्या दुकानातून सर्व सामान आणण्याची तयारी दिपूच्या आईने केली. सामान घरात आले की ताबडतोब जेवण करायला सुरुवात करायची. दिपूच्या आईने दिपूला कागद पेन घेऊन लिहायला सांगितले. दिपूच्या आईने यादी करायला घेतली.

तांदूळ पाच किलो, गव्हाचे पीठ पाच किलो, साखर पाच किलो, वाटाणे दोन किलो, बटाटे दोन किलो, कांदे दोन किलो, गोडेतेल दोन लिटर, शेवया दोन पॅकेट, वेलची 100 ग्रॅम, गूळ दोन किलो.

दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.

दिपूच्या आईने अंगण शेणाने सारवले. पानंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणाऱ्या एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानाचे मन आणतो असे तिला झाले होते.

त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. टिपूच्या घरातून गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षाच्या सरावाने गाडी थांबल्याचा आणि वळण्याचा आवाज कळत असे.

दोन वाजायला आले आणि दिपूची आई आत बाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीने दिपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहित होते चारच्या गाडीने ते येणारच. पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा तिच्या आत बाहेर सुरु झाल. साडेपाचच्या सुमारास गाडीचा आवाज आला तशी ती बाहेर येऊन उभी राहिली. लांबून तिला दिपूचे बाबा येताना दिसले. तसा तिला खूप आनंद झाला, तिने दिपूला हाक मारली  ” दिपू ती सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन ये बाहेर. बाबा आले, त्यांचे कडून तीन चार हजार घे आणि  यादी घेऊन दुकानात जा. आणि सर्व सामान व्यवस्थित आण.’

” हो आई येतो, म्हणत दिपू यादी आणि पिशव्या घेऊन आला. तोपर्यंत दिपूचे बाबा घराजवळ पोहोचले होते. पण तिच्या लक्षात आले त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.

” मिळाले ना पैसे? दिपूच्या आईने विचारले. बाबा रडविले होत म्हणाले  ” नाही, बँकेत त्यांच्या अकाउंट वर पैसेच नाही ‘.

” काय? दिपूची आई रडविली होत किंचाळली.

” सकाळपासून बँकेत होतो, स्टेट बँकेच्या अकाउंट वर त्यांच्या अकाउंटला फक्त 220 रुपये होते, म्हणून परत त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा तेथे मॅनेजर म्हणाले  ” काळजी करू नका, आजच एक मोठा चेक पास होऊन गेला म्हणून पैसे कमी झाले. मी दोन वाजता पुन्हा पैसे भरतो. तुम्ही दोन नंतर तुमचा चेक पास करा. म्हणून न जेवता परत दोन पासून बँकेत उभा. अडीच वाजता चेक बँकेत दिला तर तो बँकेचा माणूस म्हणाला अहो या लोकांनी अनेकांना असे चेक दिलेत, सर्वांचे चेक परत गेलेत, यांच्या अकाउंटला काही रक्कम नाहीच आहे. त्यामुळे कुणाचे चेक पास झालेले नाहीत.’ मी परत या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसला भले मोठे कुलूप. चार वाजेपर्यंत मी तेथे वाट पाहिली आणि शेवटी कंटाळून एसटी पकडली  “.

दिपूच्या बाबांचे शब्द दिपूच्या आईच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. तिच्या लक्षात आले आपल्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आता आपण निश्चित खाली पडणार हे तिला कळत होते.पण तिच्या मनाने उसळी घेतली.” छे छे, मला खाली पडून चालणार नाही. आपला नवरा साधा आहे. तो हातपाय गळून बसेल. आपल्याला धडपड करायलाच हवी ‘. पटकन ती सावरली. खुर्चीला धरून उभी राहिली. आईला बरं वाटत नाही हे पाहून दिपू घरात धावला आणि पाणी घेऊन आला. त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायली. दिपूचे बाबा डोकं धरून बसले. शेवटचा प्रयत्न म्हणून ती दिपूला म्हणाली  ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज  म्हाई येणार आमच्याकडे,.  एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘.

म्हाई – क्रमश: भाग २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दिपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली ” ओ दिपूच्या आई, भाजी घेणार काय?’

तिची हाळी ऐकून दिपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली.

” घेणार का भाजी, कांदापात हाय, माठ हाय, मुळा हाय, कोबी हाय. ”

शांतीला पाहतात दिपूच्या आईला आनंद झाला. तशी दोन दिवसाआड येणारी शांती ही त्यांची मैत्रीणच. दोघी एकमेकांसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या.

” होतीस कुठे इतकं दिवस? लय दिसानं आलीस?’

” ताप येत होता दादल्याला, त्याला डागदर कडे नेत व्हते ‘.

‘आता बर हाय का?’

” व्हय, घेणार का भाजी?’

” लाल माठ दे दोन जुड्या, “.

शांतीने माठाच्या दोन जुड्या दिपूच्या आईच्या हातात दिल्या.

” दिपूच्या आई, म्हाई येणार की आता लवकरच ‘. “म्हाई ‘ म्हटल्याबरोबर दिपूच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला.

“काय झालं, गप का रवला? शांतीने विचारले.

” काय सांगावं शांते, घरवाल्यांची नोकरी राहिली नाही, पैसे मिळाले होते फंडाचे ते त्या संस्थेत ठेवले होते नव्हे ‘

“. कुठल्या?’

‘ ती…. ती बुडाली त्या संस्थेत की काय?

” होय बाई, ‘

” लई लोकांचे बुडाले बघा, मग मग आता म्हणणं काय त्यांचं?’

” पैसे मिळणार, बुडायचे नाहीत म्हणत्यात, पण आता”म्हाई ‘ यायची झाली आणि खिशात पैसे नाहीत अशी परिस्थिती. ’

” होय बाई, आणि दिपू अजून लहान हाय. ’

” हो बाई, खूप दिवसांनी झालाय ना तो. ‘

” पण तुम्ही देवीचे मानकरी, म्हणजे तुम्हास्नी  म्हाईचा लई खर्च असणार?’

” होय बाई, आम्ही मानकरी देवीचे, म्हाई आमच्याच घरी येणार, सोबत वीस पंचवीस देवीचे भक्त पण असतात, एवढ्या मंडळीचे जेवण व्हायला पाहिजे. पन्नास – साठ लोकांचे चहापाणी, देवींची पूजा, ओटी भरणे हायचं. ”

‘मग दिपूच्या बाबांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल?’

” ते काय करतात, साखर कारखान्यातून रिटायर झालेत, त्यात त्यांचा पगार तो कितीसा होता, पेन्शन वगैरे काही नाही, काय फंड मिळाला तो त्या संस्थेत घातला, चार वर्षात डबल होणार म्हणून सांगितलं, ठेवून दोन वर्षे झाली, सहा लाखाचे बारा लाख होणार म्हणून ठेवले, पण आता संस्था बुडाली म्हणे  “.

” अरे देवा, मग फुड काय व्हायचं ‘.

” बघूया ‘ असं म्हणून दिपूच्या आईने माठाच्या दोन जुड्या घरात नेल्या. शांतीला दहा रुपये दिले तशी शांती गेली.

दिपूच्या आईच्या लक्षात आलं, फेब्रुवारी महिना आला म्हणजे, या महिन्यात  “म्हाई ‘ येणार, त्यात आपण देवीचे मानकरी, उत्पन्न काही नसलं तरी खर्च थांबत नाहीत. तिने डबे उघडले. तांदुळाच्या डब्यातले तांदूळ तळाला टेकले होते. पिठाच्या डब्यात जेमतेम चार दिवसापूर्वी पीठ शिल्लक होते. तेल जवळ जवळ संपले होते. वाटाणे हरभरे शेंगदाणे सर्व संपत आले होते. अजून पंधरा दिवस आहेत  म्हाईला. अजून पंधरा दिवसाला खायला तर पाहिजे.

एका महिन्यापूर्वी तिच्या आईने धान्य पाठवलं होतं. जोंधळे, शेंगदाणे, तांदूळ गहू इत्यादी. आता परत तिच्याकडे कसे मागायचे? आता आईचे काही चालत नाही घरात. भावजई चा कारभार. आणि तेथे सुद्धा रयत फारसे देत नाहीत. आपला भाऊ तसा सतत आजारीच असतो. त्यांची परिस्थिती पण आता फारशी बरी नाही. त्यांच्याकडे परत मागायला नको. तिने नवऱ्याला हाक मारली “अहो, ऐकलंत का, घरातलं धान्य तसेच पीठ संपत आलंय. पाच-सहा दिवसा पुरते आहे. या महिन्यात”म्हाई ‘ येणार, तिच्या पालखीसोबत वीस-पंचवीस माणसे असतात. त्यांना दरवर्षी आपल्याला जेवण खाण करावं लागतं. आणि माणसांना चहा पाणी.

” मग मी तरी काय करू? सगळे पैसे त्या संस्थेच्या बोडक्यावर टाकलेत ना?      ” पण मी म्हणत होते, असल्या संस्थेमध्ये पैसे ठेवू नका, ते पैसे घेतात आणि मग  खाका वर करतात, ”

” बघू, आबा म्हणत होता, रिझर्व बँक काहीतरी करेल.

” त्या आबावर विश्वास ठेवून पैसे ठेवलेत ना, मग मग आबाला सांगा आमचे पैसे दे म्हणून ‘.

” आबा काय देतो, त्याचा पोरगा त्या संस्थेत मॅनेजर होता म्हणून तो सर्वांना तेथे पैसे ठेवायला सांगायचा, आता सर्वजण त्याला विचारतात, तेव्हा तो रिझर्व बँकेकडे बोट दाखवतो  “.

” म्हणजे पैसे मिळवले ह्या लबाडानी आणि पैसे कोण देणार म्हणे तर रिझर्व बँक. ते काही नाही, तुम्ही या पतसंस्थेच्या तालुक्याच्या ऑफिसात जाऊन खडसावून विचारा, म्हणावं आम्ही खावं काय? आमचे फंडाचे सर्व पैसे विश्वासाने तुमच्याकडे ठेवले, पैसे तुम्ही खाल्ले आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसलात “.

” जातो मी उद्या’. ”

“जावाच आणि खडसावून विचारा, त्यांना सांगा पंधरा दिवसांनी आमच्याकडे  “म्हाई ‘ येणार आहे, आम्हाला मोठा खर्च आहे, तोपर्यंत आम्हाला काहीतरी पैसे द्या ‘. शेवटी मानकरी ना तुम्ही देवीचे, उत्पन्न काही नसले तरी मानकरी, जमीन सगळी  कुळांना गेली. पण मान फक्त तुम्हालाच. खर्च फक्त तुम्ही करायचे “.

दिपू च्या आईचा संताप संताप झाला. खरं तर ती आपल्या नवऱ्याला जास्त बोलायची नाही. कारण तिला माहीत होते आपला नवरा स्वभावाने गरीब आहे. त्यांचा जन्म झाला जमीनदाराच्या कुटुंबात पण चुलत भावांनी फसविले. घरातील दाग दागिने, सोने, रोख रक्कम घेऊन पळाले. मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. आता ढुंकूनही गावाकडे पाहत नाहीत. कुळांकडे असलेल्या जमिनी आपल्या नवऱ्याकडे आल्या. कुळ कायद्याने त्या जमिनी गेल्या. राहिले फक्त फुकटचे मोठेपण. हे जुने मातीचे पडणारे घर सोडून दुसरे काही नाही. आपल्या नवऱ्याचे शिक्षण फारसे झाले नाही. या जमीनदार कुटुंबाकडे पाहून आपल्या वडिलांनी आपल्याला या घरात दिले. त्यावेळी घर गजबजलेले होते. येणे जाणे होते. कुळाकडून वसुली करण्यासाठी घोडे ठेवले होते. स्त्रियांसाठी मेणे होते. सर्व गेले. राहिली फक्त भोके. उत्पन्न काही नाही.

नशीब त्यावेळी खासदार जयवंतराव नवीन साखर कारखाना काढत होते. आम्ही या गावचे मानकरी म्हणून देवीला नमस्कार करून सरळ ते आमच्या घरी आले. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. आमच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही हे त्यांना सांगितले. त्यांनी नवऱ्याला कारखान्यात नोकरी देण्याचा शब्द दिला. दोन वर्षांनी कारखाना उभा राहिला तेव्हा जयवंतरावांना मी परत भेटले. त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरीला ठेवले. पण शिक्षण जास्त नसल्याने उसाच्या वजन काट्यावर वजन नोंदवून ठेवण्याचे काम दिले. थोडाफार पगार घरात येऊ लागला आणि संसार टुकूटुकू का होईना चालू झाला.

बारा वर्षांपूर्वी दिपू चा जन्म झाला, दोनाची तीन माणसे झाली. पण दोन वर्षांपूर्वी आपला नवरा निवृत्त झाला आणि पगार थांबला. दिपू शाळेत. उत्पन्न काही नाही. फंडाची रक्कम आली ती गावातल्या आबांना कळली. त्यांच्या रोज सायंकाळी फेऱ्या वाढू लागल्या. चार वर्षात डबल पैसे होतील, तुझ्या दिपूच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे येतील अशी आश्वासने देऊ लागले. आम्हाला ते खरेच वाटले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता हा पश्चाताप झाला. नवऱ्याने पतसंस्थेचे सर्टिफिकेट दाखवली तेव्हा आपण पण खुश झालो. आपले शिक्षण पर फारसे नाही. बाहेरच्या लबाड जगाची एवढी कल्पना नव्हती. पैसे डबल झाले म्हणजे दिपूला शिकवायचं, मग घर बांधायचं, मग दिपूला नोकरी मिळेल, मग दिपूचं लग्न….

पतसंस्था अडचणीत आल्याचे कळले, लोकांचे पैसे मिळत नाहीत याची कल्पना आली आणि पायाखालची वाळू सरकली. मग संस्थेत आपल्या नवऱ्याच्या रोज खेपा सुरू झाल्या. आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता पाया पडून पुढची आश्वासने देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले.

म्हाई – क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकीचं दान ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ माणुसकीचं दान ☆ श्री दीपक तांबोळी

“तुषार तू म्हणत होतास ना की तुला काहीतरी समाजसेवा करायचीये म्हणून.ती संधी चालून आलीये बघ.येत्या वीस तारखेला आपण एका आदिवासी पाड्यावरच्या आदिवासींना दिवाळीनिमित्त कपडे देणार आहोत.तुझ्याकडचे जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे काढून ठेव.आणि हो!यावेळी जी माणसं वस्त्रदान करतील त्यांचे फोटो आपण वर्तमानपत्रात देणार आहोत “

तुषारचा सामाजिक कार्यकर्ता असलेला मित्र,प्रताप फोनवर बोलत होता.

“ओके प्रताप.मी तयार आहे.माझ्याकडे बरेच जुने कपडे आहेत.ते काढून ठेवतो” तुषार आनंदाने म्हणाला.

काहीतरी समाजसेवा करावी असं बऱ्याच दिवसांपासून तुषारच्या मनात होत़ं.या कार्यक्रमाने त्या समाजसेवेला सुरुवात होणार होती.शिवाय प्रताप म्हणाला तसे वर्तमानपत्रात फोटो छापून आले तर दुधात साखरच पडणार होती.

” अहो ऐकताय का?”

शितलच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.

” बोल काय म्हणतेय?”

“आपली कामवाली म्हणत होती साहेबांचे आणि आकाशचे काही जुने कपडे असतील तर दिवाळीसाठी द्या म्हणून “

” अगं आताच मी प्रतापला कबूल केलंय आदिवासींना कपडे द्यायचं.यावर्षी राहू देत कामवालीला.पुढच्या वर्षी बघू ” तुषार जरा चिडूनच बोलला.

” अहो.तुम्हांला माहितेय ना,तिचा नवरा टी.बी.च्या आजारामुळे घरीच असतो.मुलं लहान आहेत.कमावणारी ही एकटीच.तेही महिन्याला फक्त दिडदोन हजार कमावणार.काय होत असेल त्यात?आपल्या आकाशचा एक ड्रेस येतो ३-४ हजारात.ती अख्खं कुटुंब चालवते त्या दिडदोन हजारात ” शितल त्याला समजावू लागली.

“असू दे.असंही तू तिला नेहमीच काही ना काही देत असते.यावेळी नाही दिलं तर काय बिघडलं?आणि आता मी प्रतापला कबूल करुन बसलोय.समाजसेवा करायची चांगली संधी आलीये तर त्यात तू विघ्न आणू नकोस “

तुषार चढ्या आवाजात म्हणाला तशी शितल चुप बसली.

शेवटी तो दिवस उजाडला.तुषार त्याचे स्वतःचे आणि आकाशचे जुने इस्त्री केलेले कपडे घेऊन आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी निघाला.मुख्य रस्त्यापासून ७ किलोमीटर आत जंगलात असलेल्या त्या पाड्यावर पोहचायला त्याला तब्बल एक तास लागला इतका तो रस्ता खराब होता.पाड्यावर पोहचल्यावर मात्र तिथलं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होत असेल याची त्याला कल्पना नव्हती.तिथं एक मोठा शामियाना उभारलेला होता.त्यात पन्नास एक खुर्च्या ठेवलेल्या होत्या.त्याने चौकशी केली तेव्हा मंत्री,खासदार,आमदार आणि कलेक्टरपासून सरपंचापर्यंत सारेच झाडून हजर रहाणार असल्याचं त्याला कळलं.गरीब आदिवासींना जुने कपडे देण्याच्या कार्यक्रमात या राजकारणी लोकांची उपस्थिती कशासाठी?असा त्याला प्रश्न पडला पण  व्हि.आय.पी.व्यक्तींसोबत आपले फोटो निघणार या विचाराने तुषार खुश झाला.

पाहुण्यांना यायला उशीर होता म्हणून तिथे उपस्थित असलेल्या आदिवासी तरुणाशी तुषार बोलू लागला.त्या तरुणाच्या बोलण्यावरुन तुषारला कळलं की पाचशे लोकवस्तीच्या त्या पाड्यावर कसल्याही सुविधा नव्हत्या.दोन किलोमीटरवरुन पाणी आणावं लागत होतं.म्हणायला वीजेचे खांब होते पण दिवसातून दोनतीन तासच वीज उपलब्ध असायची.काही बिघाड झाला तर आठवडा आठवडा कुणी तो दुरुस्त करायला येत नव्हतं.पाड्यावर दवाखाना नव्हता.तिथून अठरा किमी.वरच्या गावात सरकारी दवाखाना होता पण तिथे डाँक्टर क्वचितच उपलब्ध असायचे.खराब रस्त्यामुळे शहरात जाणयेणंही खुप त्रासदायक होतं.पावसाळ्यात तर त्या रस्त्यात इतका चिखल व्हायचा की मुख्य रस्त्यावर जाणंही अशक्य होऊन बसायचं.बऱ्याचदा गंभीर रुग्ण रस्त्यातच दगावायचे.अडल्यानडलेल्या गर्भारणी दवाखान्यात पोहचण्या अगोदरच प्रसुत व्हायच्या. कुणीही या पाड्याकडे लक्ष देत नव्हतं.आदिवासींच्या जीवनमरणाशी जणू कुणालाच काही देणंघेणं नव्हतं.मात्र निवडणुका आल्या की महिनाभर राजकीय पुढाऱ्यांची तिथं वर्दळ असायची.अनेक आश्वासनांची खिरापत वाटली जायची.सुधारणांची प्रलोभनं दाखवली जायची.मात्र निवडणुका संपल्या की कुणीही इकडे ढुंकूनही पहात नव्हतं.ते ऐकून तुषार अस्वस्थ झाला.आपण शहरात किती सुखासीन आयुष्य जगतोय याची त्याला जाणीव झाली.

कार्यकर्त्यांची वर्दळ सुरु होती.हळूहळू एकेक पाहुणा यायला सुरुवात झाली.मंत्री महोदय तब्बल दोन तास उशीराने उगवले.त्यांच्यासोबत आलेल्या  आलिशान गाड्यांचा ताफा पाहून तुषारच्या मनात विचार आला की २५-३० लाखाच्या गाडीत फिरणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांना अख्ख्या आदिवासी पाड्याला नवीन कपडे घेऊन देणं सहज शक्य होतं .पण ते खिशातली दमडीही खर्च करण्याची दानत दाखवत नाहीत. सामान्य माणसाला मात्र दानाचं आवाहन करत असतात.निवडणुका आल्या की मग मात्र दानशुरपणाचा आव आणतात.

भाषणांची सुरुवात झाली.प्रत्येक वक्ता आपल्या भाषणात त्याला गरीबांचा किती कळवळा आहे हे मोठ्या हिरीरीने मांडत होता.त्याचबरोबर  प्रतापची स्तुती करत होता.त्या स्तुतीने प्रतापचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.ते पाहून तुषारला मात्र प्रतापसारख्या समाजसेवकाकडे कसलाही उद्योगधंदा न करता सोळा लाखाची गाडी आलीच कशी हा प्रश्न पडला होता.

भाषणं संपता संपत नव्हती. दुपारचे दोन वाजून गेले.तोपर्यंत समोर उन्हात बसलेले आदिवासी कंटाळून गेल्याचं तुषारला स्पष्ट जाणवत होतं.तो स्वतःही कंटाळून गेला होता.कार्यक्रम वस्त्रदानाचा आहे की राजकीय पक्षांच्या प्रसिध्दीचा हेच त्याला कळेनासं झालं.

शेवटी एकदाची भाषणं संपली.मग मंत्री,खासदार ,आमदार आणि प्रतिष्ठितांच्या हस्ते वस्त्रदान झालं.आदिवासींना कपडे देतांना प्रत्येक पुढारी हौसेने फोटो काढून घेत होता. कपडे वाटून झाले आणि ज्याची तुषार आतुरतेने वाट पहात होता तो क्षण आला.सगळ्या वस्त्रदात्यांना बोलावून प्रतिष्ठितांसोबत फोटोसेशन झालं.मंत्री,आमदार, खासदारांसोबत फोटो काढून घ्यायची प्रत्येकाला घाई झाली होती.त्यासाठी प्रचंड रेटारेटी सुरु होती.ही समाजसेवा आहे की पब्लिसिटी स्टंट हेच तुषारला समजेनासं झालं.कपडे मिळालेले आदिवासी केविलवाण्या नजरेने हा तमाशा पहात होते.

वैतागलेल्या अवस्थेत तुषार घरी आला.कार्यक्रम कसा झाला हे शितलला सांगण्याचीही त्याला इच्छा उरली नाही.

दुसऱ्या दिवशी तो उत्सुकतेने सात आठ वर्तमानपत्रं विकत घेऊन आला.बातमी होती पण सर्व वर्तमानपत्रात मंत्री,आमदार,खासदार आणि त्यांच्यासोबत प्रतापचे फोटो होते.एकाही वर्तमानपत्रात तुषारचा फोटो नव्हता.चमकोगिरी करणाऱ्या या लोकांचा त्याला संताप आला.त्या संतापातच त्याने प्रतापला फोन लावला.त्याने तो उचलला नाही. तीन चार वेळा प्रयत्न केल्यावरच त्याने तो उचलला.

” यार प्रताप ज्यांनी कपडे दान केले त्यांचा कुणाचाच फोटो पेपरमध्ये नाहीये.सगळे मंत्री आणि आमदार,खासदारांचेच फोटो आहेत.” तुषार जरा रागानेच बोलला.

” हो मी पाहिले फोटो.आपण तर सगळे फोटो दिले होते.पण जागेअभावी त्यांनी ते दिले नसावेत.आणि हे तर तुलाही माहितेय तुषार की न्युज व्हँल्यू असल्याशिवाय पेपरवाले कोणतेही फोटो आणि बातमी टाकत नाहीत आणि राजकारणी व्यक्तींशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला न्युज व्हँल्यू येत नाही म्हणून त्यांचेच फोटो पेपरमध्ये टाकावे लागतात.हाच कार्यक्रम आपण राजकारणी पुढाऱ्यांना न बोलावता केला असता तर वर्तमानपत्रांनी त्या कार्यक्रमाची दखलसुध्दा घेतली नसती किंवा घेतलीही असती तर ती बातमी अगदी छोटीशी एखाद्या कोपऱ्यात टाकली असती.अशा बातमीला काहीच किंमत नसते “

तुषार काय समजायचं ते समजला.जे खरे दानी होते त्यांना कुणीही किंमत देत नव्हतं.भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या,जनतेच्या पैशावर ऐश करणाऱ्या, गरीबांचा वाली असण्याचं सोंग घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे आणि स्वतःच्या प्रसिध्दीसाठी समाजसेवेचं नाटक करणाऱ्या प्रतापसारख्या समाजसेवकांचे फोटो मात्र वर्तमानपत्रात दिमाखात झळकत होते.तुषारने न बोलता फोन कट केला.या अशा दिखावू समाजसेवेत फक्त वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळते म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्याने स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहीली.

दुसऱ्या दिवशी तो शितलला म्हणाला “अगं,आपल्या कामवालीला तिच्या नवऱ्याचे आणि मुलांचे जुने कपडे मापासाठी आणायला सांग.मी माझ्या काही मित्रांशी बोललोय.ते त्यांचे जुने कपडे देणार आहेत “

शितलला एकदम हायसं वाटलं.

“चला बिचारीची दिवाळी आनंदात तरी जाईल ” ती समाधानाने म्हणाली.

धनतेरसच्या दिवशी तुषारने शितलला सांगून कामवाली आणि तिच्या कुटुंबाला घरी बोलावून घेतलं.त्यांना बसायला सांगून तुषार घरातून कपड्यांच्या पिशव्या घेऊन आला.त्याच्या हातातल्या रेडिमेड कपड्यांच्या  पिशव्या पाहून शितलला आश्चर्याचा धक्काच बसला.

“अहो हे तर नवे कोरे कपडे दिसताहेत.तुम्ही तर जुने कपडे देणार होतात ना?”

” हो शितल.पण माझ्या लक्षात आलं की यांना जुने कपडे द्यायचे आणि आपण मात्र नवीन कपड्यांनी दिवाळी साजरी करायची?माझ्या मनाला ते पटेना म्हणून त्यांच्या मापाचे नवीन कपडेच विकत घेऊन आलो “

कामवालीचे आणि तिच्या नवऱ्याचे डोळे अश्रूंनी भरुन आले.तिच्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.तुषार त्यांना कपडे देत असतांनाच शितल आतून नवीकोरी साडी घेऊन आली आणि कामवालीला देऊन म्हणाली, ‘”सगळ्यांना नवीन कपडे झाले मग तूच कशाला मागे रहातेस?तुही नवीनच साडी घे.”

तेवढ्यात आकाश मोबाईल घेऊन पुढे आला.

” थांबा आई बाबा .कपडे देतांना फोटो काढू या”

तुषार त्याला थांबवत म्हणाला, “नको बेटा फोटो नको काढू.ही काही राजकारण्यांची दिखावू आणि स्वार्थी समाजसेवा नाहीये.हे माणुसकीचं वस्त्रदान आहे “

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

शाळेतून निवृत्त झाल्यावर आयुष्य कसं आनंदात चालले होते. सकाळी पांच वाजता उठायचे, सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक तास फिरून यायचे, आल्यावर बागेतून चक्कर मारायची. तोपर्यंत घरातील सर्वजण उठायचे. मग चहा करून बाल्कनी मध्ये बसून गरम चहाचे घोट घ्यायचे. कधी कधी फुले काढता काढता शेजारच्या काकूंशी गप्पा व्हायच्या. मग घरातील पुढचे व्यवसाय सुरू करायचे. पण आज माझी लगबग पाहून माझी मुलगी सोनू म्हणाली, “का ग आई !आज फार खुशीत दिसते आहेस आज काहीतरी विशेष दिसते “. मिस्टरांनी पेपर बाजूला करून माझ्या चेहऱ्याकडे पाहिले”अगं माझी बाल मैत्रीण’ विद्या तिच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. त्यासाठी कलेक्टर मेधाताई साने प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत आणि त्या सोहळ्याला मला आग्रहाचे निमंत्रण आहे. “त्यावर माझा मुलगा म्हणाला, “कोणाच्या? विद्यामावशीचया पुस्तकाचे का?”त्यावर मी होकार दिला आणि माझे मन भूतकाळात गेले.

आम्ही सांगलीला रहात असताना आमच्या शेजारी जोशींचे बिऱ्हाड राहायला आले. ते जोशी काका जिल्हा परिषद मध्ये नोकरीला होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी व दोन मुली आणि त्यांची आई असा परिवार होता. त्यांची थोरली मुलगी संध्या माझ्याच वर्गात होती व धाकटी विद्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. जोशी आजींना पहिली नात झाली तेव्हा त्या थोड्या नाराज झाल्या, त्यांना नातू हवा होता पण काही दिवसांनी दुसरी नात जन्मली आणि तिच्या दुर्दैवाने काही दिवसांनी त्यांचे यजमान अकस्मितपणे हृदयविकाराने स्वर्गवासी झाले. त्यांच्या जाण्याचे खापर विद्याच्या डोक्यावर फोडले गेले तिचे बारसेही केले नाही. ती दिसायला सुंदर होती. काळेभोर केस, टपोरे डोळे, गौरवर्ण आणि भरपूर बाळसे. इतकी सुंदर की पाहिली की उचलून घ्यावी अशी छान मुलगी होती ती, पण सगळेजण तिलाही हिडीस फिडीस करत. आजीनंतर तिचं नाव “नकोशी “ठेवलं होतं. आईचा मात्र तिच्यावर फार जीव होता. शेवटी मातृ हृदयच ते! आई तिला विद्या नावाने हाक मारत असे. ती अतिशय हुशार होती जणू तिच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. अर्थात या सर्व गोष्टी मी मोठी झाल्यावर माझ्या आईकडून मला कळल्या.

हळूहळू विद्या मोठी झाली. तिला आमच्या शाळेत प्रवेश घेतला गेला. कोणतीही स्पर्धा असो ती कशातच मागे नव्हती. तिचं अक्षर मोत्यासारखं सुंदर होते.

प्रवेशद्वाराजवळील फलकावर सुविचार लिहिण्याचा मान तिलाच मिळायचा. शाळेमध्ये पहिला नंबर तिने कधीच सोडला नाही. दहावी परीक्षेत तर गुणवत्ता यादीत येण्याचे भाग्य तिला लाभले. तिला मोगऱ्याची फुले फार आवडत। कायम मोगऱ्याच्या दिवसात तिच्या शेपट्यावर मोगऱ्याचा गजरा असायचाच.

दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यावर तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गौरवर्ण, बोलके डोळे लांब सडक केसांचा शेपटा व त्यावर मोगऱ्याचा गजरा यामुळे एकदम सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळू लागल्या. हुशारी आणि मनमोकळा स्वभाव या गुणांनी लवकरच “कॉलेज क्वीन “होण्याचा मान तिला मिळाला. कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचे नियोजन तिने केले होते

स्नेह संमेलनाच्या वेळी तिचे सौंदर्य ‘हुशारी व सभधीटपणा पाहून एका गर्भ श्रीमंत गृहस्थांनी माधवरावांनी, आपल्या एकुलत्या एक मुलासाठी तिला मागणी घातली. तिच्या वडिलांनी आनंदाने तिचे कन्यादान केले. लग्न होऊन सोन पावलांनी घरची लक्ष्मी घरी आणली. घरचा व्याप सांभाळून ती घरच्या व्यवसायातही मदत करू लागली. माधवरावांना तिचे खूपच कौतुक होते, आपल्या गुणांनी तिने सर्वांची मने जिंकून घेतली माधवरावांच्या निधनानंतर व्यवसायाची जबाबदारी तिने अंगावर घेतली व सुनीलच्या खांद्याला खांदा लावून ती मेहनत करत होती. अशा रीतीने दोन वर्षे भुरकन उडून गेली. आता मात्र सर्वांना लहान बाळाची चाहूल हवी होती. त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले होते. . खूप डॉक्टरी उपचार करून झाले पण दैव साथ देत नव्हते. तिच्या मातृत्वाचा हक्क दैवाने नाकारला होता तिला मूल होणारच नाही हे समजता क्षणी घरची माणसे बदलली, सगळीच नाती विस्कटली. समारंभाला जाताना सारे जण तिला टाळू लागले पण नणंदेला तिचे कौतुक होते. विद्या मात्र शांत होती समईतील वातीसारखी. माणूस ठरवतो एक आणि नियती घडवते दुसरच आपण तिच्या हातातलं बाहुलं असतो हेच खरे!

पुढे दोन वर्षांनी नणंद बाळंतपणासाठी माहेरी आली. तिच्या डोहाळे जेवणाचा घाट विद्याने पुढाकार घेऊन घातला. तिला प्युअर सिल्कची साडी व गळ्यातील नेकलेस आणला. त्यावेळी सुद्धा ओटी भरताना विद्याच्या मावस सासूला ओटी भरायला सांगितले गेले, जाणून बुजून सुनेला डावलले गेले.

दिवस भरल्यावर नणंदेला मुलगा झाला. तिच्या सोबत सासूबाई दवाखान्यात दोन दिवस राहिल्या. मुलगी व बाळ घरी आल्यावर तिच्या खोलीत जाण्यास विद्याला बंदी केली गेली, बारशाचया दिवशी तर कहरच झाला नणंदेची ओटी भरायला पुढे आलेल्या विद्याला हात धरून मागे ओढले गेले आणि” अगं ‘बाळंतिणीची ओटी लेकुरवाळी स्त्रीने भरायची असते हे तुला माहित नाही का? असे म्हणत सासूबाई डाफरल्या आणि शेजारच्या काकूंना ओटी भरण्याचा मान दिला. प्रत्येक ठिकाणी अपशकुनी ठरवून तिच्या सासूने, एका स्त्रीने एका स्त्रीची अवहेलना केली.

विद्याने कधीही चकार शब्द काढला नाही. येईल ती परिस्थिती निमूट पणे सहन करत होती. माहेरच्या माणसांना वाटे, ” विद्या नशीबवान आहे’ चांगला बंगला आहे, दारात  चार चाकी गाडी आहे, घरात नोकरांचा राबता आहे” आणि विद्या सुद्धा सर्वांच्या पुढे हसतमुख राहून आनंदी असल्यासारखी दाखवायची.

सुनील ‘तिचा नवरा सुद्धा रंग बदलू लागला सरड्यासारखा. ज्याच्या जीवावर आपलं घरदार सोडून, पुढील शिक्षण सोडून ती आली होती याचा विचार न करता तो तिला हिडीस-फिडीस करू लागला, मोलकरणी सारखा वागू लागला. मातृत्वाच्या कमतरतेवर वारंवार टोचून बोलू लागला. असेच दिवस चालले होते. नणंदेच मुलगा पाच वर्षाचा झाला. आजीने त्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. कार्यक्रमासाठी बरेच मित्र नातेवाईक, विद्याची बहिण व मेहुणे मुलासह आले होते.

कार्यक्रमाच्या दुसरे दिवशी घरातली मंडळी, नातेवाईक यांची सरबराई करण्यात विद्या दंग होती, त्यावेळी नणंदेचा मुलगा आणि तिच्या बहिणीचा मुलगा शेजारच्या आमराईत खेळायला गेले. तिथे कैऱ्या पडण्यासाठी आलेल्या मुलांपैकी एका मुलाचा दगड  चुकून उत्सव मूर्तीला लागला आणि कपाळाला खोक पडली. कोणीतरी  घरी येऊन सांगता क्षणीच नवऱ्याने तिच्यावर तोंड सुख घेतले” तू अवलक्षणी आहेस आता इतरांनाही तुझ्या पायगुणाचा प्रसाद मिळू लागला आहे तेव्हा तुझा घरात राहण्याचा अधिकार संपला आहे. तू घरातून चालती हो”

सर्व नातेवाईकांसमोर अपमानित झालेल्या विद्याने दोन कपड्यानिशी घर सोडले. रात्री ती स्टेशन वरील वेटिंग रूम मध्ये बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने तिने पुणे गाठले आणि “हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत” दाखल झाली. तिने आपली कर्म कहाणी तिथल्या संस्थापकांच्या कानी घातली. तिथल्या संस्थापक ताईंनी संस्थेमध्ये राहण्याची तिला परवानगी दिली. संस्थेत राहून तिने बी. एड. केले. तिच्यातील जिद्द पाहून तिला त्यांच्या शाळेत नोकरीत रुजू करून घेतले. नोकरी करता करता तिने पी. एच. डी. पदवी संपादन केली आणि वसतिगृहाच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेतली.

नोकरीतून जमलेल्या पुंजीतून आणि काही कनवाळू लोकांच्या देणगीतून पुण्याजवळ मायेची पाखर घालणारी” स्नेहालय” ही संस्था तिने सुरू केली. त्या संस्थेत अनाथ मुलं, दुर्लक्ष केलेल्या स्त्रियांना आसरा दिला. त्यांच्यासाठी व्यवसायाभिमूख कार्यशाळा सुरू  केल्या, त्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आपलं स्वतःच नाही म्हणून काय झाले संस्थेत येणारी मुले आपलीच आहेत असे मानून यावर मातेप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला आणि आपले जीवन सार्थक केले.

आज तिने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होते. नाव होते “मोगरा फुलला “. समाजामध्ये अनेक सामान्य स्त्रिया आहेत की ज्यांच्या पदरी दुःख आले असताना सुद्धा त्यांनी दुःखावर मात करून यशस्वी वाटचाल केली होती. रूढी अंधश्रद्धा यांना झुगारून प्रयत्नांची कास धरली होती आणि  त्या यशस्वी झाल्या होत्या, अशा स्त्रियांचे उदाहरणे देऊन तिने कथा लिहिल्या होत्या.

मोगऱ्याचे छोटेसे सुंदर ताजे फूल सुगंध देते, गजरा करून डोक्यात माळला तर केसांनाही सुगंधित करते. ते हातात घेतलं तर हातांना सुगंध येतो, आपले सुगंध पसरविण्याचे काम ते सोडत नाही.

प्रकाशनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. प्रखर बुद्धिमत्ता, श्रमाची आवड, मन ओतून काम करण्याची पद्धती या विद्याच्या गुणांमुळे अनेक प्रतिष्ठित लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. कलेक्टर मेधाताईंनीही विद्याच्या कार्याचे कौतुक केले आणि तिच्या कामात सहकार्य करण्याची इच्छा दर्शवली. आता तिचं मित्र मंडळ ही मोठं होतं॰ कुठेच कमतरता,. . न्यूनता नव्हती. चहापानानंतर मेधाताईंना प्रवेशद्वाराशी निरोप देऊन आम्ही परत हॉलमध्ये आलो. त्यावेळी एक मोगऱ्याचा गजरा आणि चिठ्ठी असलेले एक तबक कार्यकर्त्याने विद्याच्या हाती दिले. चिठ्ठी कोणाकडून आली असावी ?असे प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर उमटले. शांत चित्ताने  विद्याने चिठ्ठी उघडली. चिठ्ठीतील मजकूर पुढीलप्रमाणे होता.

विद्या

प्रिय विद्या म्हणण्याचा अधिकार मी केव्हाच गमावून बसलो आहे वर्तमानपत्रात पुस्तक प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचली आणि  आर्जवून समारंभास येण्याचे धाडस केले. पण तुला  भेटण्याचे मनात असूनही पुढें आलो नाही. तसे पाहता माझ्याकडून तुझी अवहेलनाच झाली, मी तुझा शतशः अपराधी आहे. जमली तर मला क्षमा कर. मी माझं राहतं घर” स्नेहालय “संस्थेच्या नावे केले आहे त्याचा   अव्हेर करू नकोस. केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याचा हाच एक मार्ग माझ्यासमोर होता माझ्या या विनंतीचा स्वीकार कर आणि यशस्विनी हो!.

सुनील !

अंधश्रद्धा आणि रुढीला चिकटून राहून सर्वांनी विद्याची अवहेलना केली होती पण त्या दुःखाला कवटाळित न बसता विद्याने पिडीत स्त्रियांना आणि निराधार बालकांना आधार दिला होता. त्यांची ती माय झाली होती. अशा प्रकारे महान कार्य करणारी माझी मैत्रीण खरोखर सर्वांची विद्याई झाली होती.

समारंभ संपता क्षणीच तिनं मला मिठी मारली. त्या मिठीत कौतुकाचा आनंद आणि पती न भेटता गेल्याचे दुःख सामावले होते. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आज खऱ्या अर्थाने विद्याच्या जीवनाचे सार्थक झाले होते.

*साहित्य प्रेमी भगिनी मंडळला पाठवलेली व प्रथम क्रमांक मिळालेली कथा

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मातीची ओढ… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मातीची ओढ… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

(पण एखाद्याला सोन्याचे अंडे खाण्यापेक्षा कोंबडीच कापून खायची असेल तर त्याला कोण काय करणार?)  इथून पुढे —–    

“सदाकाका, आम्हाला शेती करण्यात इंटरेस्ट नाहीय. इथे एकरी चार लाख रूपये भाव चालला आहे असं ऐकलंय. बारा लाख रूपये येतील. विकणेच रास्त ठरेल.” सुधीरने सांगून टाकले.

“ही शेतजमीन बाहेरच्या कुणालाही विकू नये अशी आमच्या आबांची इच्छा होती.”

“ठीक आहे, मग बारा लाख रूपये देऊन तुम्ही विकत घ्या.”

आक्का आणि काशिनाथकडे पाहत सदाभाऊ म्हणाले, “ठरलं तर. पुढच्या आठवड्यात सौदा पूर्ण करू. आमच्या एका भावानं आपला हिस्सा विकून खाल्ला आहे असं गावात बभ्रा व्हायला नको म्हणून विक्रीपत्राच्याऐवजी दानपत्र करून घेऊ. दुसरी अट, यापुढे किसन आमच्याबरोबर इथेच राहील. मंजूर असेल तर बोला.” किसनरावांना एका शब्दानंही न विचारता सुधीर आणि अविनाश यांनी दोन्ही अटी मान्य करून टाकल्या. विशाखाच्या डोळ्यांत पाणी तरारलं. किसनरावांनी मायेनं विशाखाच्या पाठीवर हात ठेवला.

किसनरावांच्या शेतजमीनीची विक्री वा दानपत्र करण्यासाठी सुधीर आणि विशाखाकडून रीतसर संमतीपत्र तसेच किसनरावांच्या नावाने योग्य ते कुलमुख्त्यारपत्र लिहून रजिस्टर करून घेतलं. सदाभाऊ, आक्का आणि काशिनाथ या तिघांनी मिळून बारा लाख दिले. दानपत्र केलंच नाही, किसनरावांचं नांव सातबाऱ्यावर तसंच राहिलं. ते नियमितपणे शेतात जाऊन शेतीची कामं बघायला लागले. अकाउंटिंगच्या आणि बॅंकेच्या कामात काकांच्या रूपाने प्रशांतला मोठा आधार मिळाला.

अविनाशचं क्लिनिक सुरू झालं. सुधीरनं फ्लॅट बुक केला. बघता बघता दोन वर्षे सरून गेली. विशाखा आठवड्यातून एकदा तरी फोन करत होती. सुरूवातीला सुधीरचे येणारे फोन कमी कमी होत गेले. वाड्यावर किसनरावांची सर्वचजण काळजी घ्यायचे. त्यांना त्यांच्या नातवंडांची आठवण यायची.

अलीकडेच त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. एकदा फोनवर बोलताना ही गोष्ट विशाखाच्या लक्षात आली. “बाबा, आधीच फोन करायचं होतं ना. तुमचे जावईच डॉक्टर आहेत. मी तुम्हाला घेऊन जायला आले असते.”

किसनरावांनी सांगितलं, “बेटा, मला काहीही झालं नाही. प्रशांतने शहरात नेऊन सगळ्या टेस्ट्स करवून घेतल्या आहेत. औषधोपचारदेखील चालू आहे.”

विशाखाने सदाकाकांशी बोलून घेतलं. ‘दोनच दिवसात परत पाठवणार असशील तरच किसनला येऊन घेऊन जा.’ असं सदाभाऊंनी स्पष्टच सांगून टाकलं.

विशाखाने लगोलग सुधीरला फोनवर सांगितलं, ‘सुधीर, बाबांची तब्येत बरी दिसत नाहीये. उद्या सुटीच आहे. सकाळी लवकर ये. आपण जाऊन बाबांना काही दिवसासाठी इकडे घेऊन येऊ.’

सकाळी दोघे कारने गावाकडे निघाले. बाबांना परत आणण्याच्या कल्पनेनेच सुधीर अस्वस्थ झाला होता. अखेर त्यानं तोंड उघडलं, “ताई, बाबांच्या तब्येतीच्या दृष्टिने त्यांनी गावातच राहणं चांगलं आहे. इकडे कशाला बोलावते आहेस? तुला माहीत आहे की मी भाड्याच्या घरात राहतो ते. माझ्याकडे जागा कुठे आहे? बाबांना तुझ्याकडेच का घेऊन जात नाहीस? औषधोपचारासाठी तुमच्याकडे क्लिनिकही आहे.”

विशाखाला सुधीरचं बोलणं आवडलं नाही. पण तिने विचार केला, अविनाशने तर रूग्णांच्या सेवेचंच व्रत घेतलं आहे. पितृतुल्य सासऱ्यांना तो थोडंच नाही म्हणणार आहे?  “बरं, मी घेऊन जाईन. झालं.” विशाखा ठसक्यात म्हणाली.

खूप दिवसांनी बाबांना पाहिल्यावर विशाखाच्या डोळ्यांत पाणी आलं. किसनराव म्हणाले, “वेडाबाई मला काहीही झालं नाही. हे रिपोर्ट्स बघ आणि ही औषधे.”

“बाबा तुम्हाला इथे काही कमी आहे म्हणून आम्ही न्यायला आलो नाही. तुमची तब्येत बरी नाही हे ऐकून सुधीरही अस्वस्थ झाला होता आणि तुमचे जावई तुम्हाला घेऊन या म्हणून आग्रह करीत होते म्हणून आम्ही आलो.” विशाखाने रेटून सांगितलं. दुपारच्या जेवणानंतर किसनरावला घेऊन विशाखा आणि सुधीर निघाले.

सुधीरची मुलं आतेभावांना भेटायला म्हणून विशाखाच्या घरीच आली होती. सगळ्यांच नातवंडांना एकत्र पाहून किसनराव खूप सुखावले. थकवा वाटत असल्यामुळे जेवण करून ते झोपायला गेले.

अविनाश क्लिनिकहून उशीरा आले. जेवणं झाल्यानंतर विशाखाने अविनाशला सहज सांगितलं, “अहो, सुधीरचा फ्लॅट लहान पडतो म्हणून मी बाबांना आपल्याकडेच घेऊन आले आहे.”

त्यावर अविनाश एकदम भडकला, “इथे का आणलंस? तुझ्या बाबांना सांभाळण्याची जबाबदारी तुझ्या भावाची आहे. फ्लॅटसाठी पैसे घेताना त्याला लाज वाटली नाही. उद्या सकाळीच त्यांना सुधीरच्या घरी पाठव. त्याला जमत नसेल तर वृद्धाश्रमात दाखल कर म्हणावं. माझे बॅंकेचे लोन फिटताच मी घेतलेले पैसे परत करीन, हे तुझ्या बाबांना सांग. कळलं?”

विशाखा पहिल्यांदाच अविनाशचं हे वेगळं रूप पाहत होती. “अविनाश, तुम्ही रात्रंदिवस रूग्णांची इतकी सेवा करीत राहता म्हणून त्यांना चार दिवस इकडे आणलं होतं. तुमच्या मनांत, घरात माझ्या बाबांच्यासाठी काहीच का स्थान नाही? बरोबर आहे म्हणा, इतर रूग्णांची सेवा केल्याने तुम्हाला पैसे मिळतात. हे मी विसरलेच. आणि हो, माझ्या बाबांचे पैसे परत करायचं म्हणत होता, जेंव्हा त्यांचे पैसे परत कराल त्यावेळी पैसे घ्यायला ते असतील की नाही हे त्या देवालाच माहीत. नोकरी सोडायला लावून तुम्ही माझे पंख कापून टाकलेत. आता एक अगतिक कन्या आपल्या बापासाठी तरी काय करणार म्हणा.” असं म्हणून विशाखा पटकन तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश क्लिनिकला गेल्यानंतर नाष्टा घेऊन विशाखा बाबांच्या खोलीत गेली. किसनराव सामान बांधूनच बसले होते. “बेटा, काल रात्रीचं तुमचं बोलणं ऐकलंय मी. माझ्यामुळे तू आपल्या संसारात विष कालवू नकोस. मायेची ऊब आणि आपुलकीचा ओलावा गवसत नसल्याने शहरातील बरीचशी वृद्धमंडळी मुळातच खुरटल्यासारखी दिसतात. गजबजल्या गोकुळात असून देखील एखाद्या वृद्धाश्रमात असल्यासारखे ते एकाकीच असतात. मला जाऊ दे.

घाबरू नकोस मी काही वृद्धाश्रमात जाणार नाहीय. कुणी शेतकरी बापडा वृद्धाश्रमात असल्याचं मी तरी आजवर ऐकलेलं नाही. गावाकडे माझी भावंडं माझी आतुरतेने वाट पाहताहेत. मला माझ्या मातीच्या मायेची ओढ लागून राहिलीय. टॅक्सी बोलावून घे. मी जाईन.” विशाखा स्वाभिमानी बाबांची संवेदनशीलता जाणून होती.

घरासमोर एक टॅक्सी येऊन थांबली. अगदी अकल्पितपणे टॅक्सीतून प्रशांत उतरला. “ताई, काका आहेत का ग?” असं म्हणत आत आला.

किसनराव बॅग घेऊन हसतच बाहेर आले. “प्रशांत गावाकडे चाललास ना?  बेटा, मला इथे करमत नाही. चल मी येतो.”

विशाखाच्या डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवून किसनराव टॅक्सीत बसले. सुधीरने बाबांच्या तब्येतीची चौकशीही केली नाही. आपलं काळीज ज्या जावयाच्या हातात सोपवलं होतं, तो जावई किमान सासऱ्यांना भेटला  देखील नाही. ‘बाबा इथे आरामात रहा, जायची घाई करू नका’ किमान असं तोंडदेखलं तरी बोलून तरी अविनाशने बाबांचा मान राखायला हवा होता. दोनच दिवसांचा प्रश्न होता. बाबा कुठे इथे आयुष्यभर राहायला आले होते?’ असं विशाखाला वाटून गेलं.

बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता पण या विचारांच्या वावटळीत, अगतिक विशाखाच्या डोळ्यांतला पाऊस मात्र थांबतच नव्हता.

— समाप्त — 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मातीची ओढ… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मातीची ओढ… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

किसनरावांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. वीस वर्षे तरी झाली असतील, त्या गोष्टीला. एका दसरा सणाला गावाकडचा वाडा मुलं, सुना, जावई आणि नातवंडं यांनी गजबजून गेला होता. गप्पागोष्टींना रंग चढला होता. हरिभाऊंच्या नातवंडांनी कल्ला करीत आजोबांना विचारलं होतं, “आजोबा, वडिलार्जित मिळालेलं चार एकराचं रान तुम्ही आपल्या हिंमतीवर बारा एकरापर्यंत वाढवलं आहे म्हणून ऐकलंय. आम्हाला सांगा ना त्याबद्दल.” 

हरिभाऊ मिशीतच हसत म्हणाले. “होय, मी हिंमत केली होती कारण मला फकस्त शेतीचाच नाद होता. काय झालं, त्या काळात शहरात कारखाने उभे राहायला लागले तेंव्हा गावाकडच्या शेतकऱ्यांचं लक्ष शहरातल्या रोजगाराकडे गेलं. कधी कधी वर्षभर राबूनदेखील हातात काहीच पडायचं नाही. दरमहा हमखास मिळणाऱ्या पैश्याच्या मोहापायी त्यांचं शेतीकडे दुर्लक्ष होत गेलं. शहरातच राहायचं असल्यानं त्यांना शेती विकावी लागली. मी मात्र मिळेल तेंव्हा पैसा गाठीला बांधत होतो. आजच्या तरूणांच्यासारखं आम्हाला बुलेट गाड्या मिळायच्या नाहीत. खिल्लारी बैलांची घुंगराची गाडी म्हणजेच आमच्यासाठी चैन होती.” 

इतक्यात आजीनं नातवांना जेवायला बोलावलं. सदरेवर फक्त सदाशिव, काशिनाथ आणि किसन बसले होते. हरिभाऊ म्हणाले, “तुम्ही भावंडं असंच गुण्यागोविंदाने राहा. बहिणीला कधी अंतर देऊ नका. ही बारा एकराची शेती चौघात वाटून घ्या. पंचांना कधी बोलवू नका. एवढंच माझं सांगणं आहे.” 

सदाशिव लगेच म्हणाले, “आबा, अशा निर्वाणीच्या गोष्टी आता कशाला करताय?” 

हरिभाऊ म्हणाले, “पिकलं पान कधी गळून पडंल सांगता यायचं नाही. आज तुम्ही एकत्र जमलात म्हणून मनातलं बोलून टाकलं.”

किसन म्हणाला, “आबा, शेतात भाऊच राबतात. मी कुठे शेती करतोय? तुम्ही मला शिकवलंत हेच खूप झालं. माझाही वाटा त्यांनाच द्या.”

“अरे, मी सगळ्यांनाच शाळेत पाठवलं होतं. ते शिकले नाहीत. किसन तू शिकलास. तुझ्या कर्तबगारीने आता हेडमास्तर झालास. त्यात तुझी मेहनत आहे. एक बाप म्हणून सगळ्या मुलांना समान वाटा देणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या माघारी तुझा हिस्सा कुठल्याही भावाला देऊन टाक. पण मिळालेली ही शेतजमीन मात्र बाहेरच्या कुणाला कधी विकू नकोस, एवढंच माझं कळकळीचं सांगणं आहे.”

किसनरावांना हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कालच जावई अविनाश आणि कन्या विशाखा त्यांना भेटायला आले होते. अविनाशने क्लिनिक उघडायचा विचार बोलून दाखवला. बॅंकेचे लोन मिळणार होते पण मार्जिनसाठी पांच लाख रूपये पाहिजे होते. सुपुत्र सुधीरनेही फ्लॅटच्या मार्जिनसाठी सात लाख रूपयांची मागणी केली होती. ‘आमच्या हातून कधी शेती होणारच नाही तर गावाकडे असलेली शेतजमीन विकून टाकावी’ असं सुधीर आणि विशाखा या दोघांचं मत पडलं होतं. 

गेल्या वीस वर्षात पुलाखालून किती पाणी वाहून गेलं आहे. आबा गेले, आई गेली. आपली मुलं सुधीर आणि विशाखा शिकून सवरून मोठी झाली. किसनरावांचे प्राव्हिडंट फंडाचे पैसे दोन्ही मुलांच्या लग्नांत संपले होते. मुलीचं अन मुलाचं लग्न पार पाडताच आपलं कर्तव्य संपलं असं समजून सुमन एकट्याला अर्ध्यावर सोडून अचानक निघून गेली. मुलगा सुधीर एका प्रायव्हेट फर्ममध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे. कन्या विशाखादेखील चांगल्या नोकरीत होती. पण तिच्या पहिल्या डिलीव्हरी नंतर जावयाने तिला नोकरी सोडायला लावली होती. प्रेमळ जावई लाभल्याने कन्येची चिंता नव्हती. मुलांच्या पुढे हात पसरायला लागू नयेत इतपत तुटपुंजी का होईना, पेन्शन मिळत होती. 

आता शेतजमीन विकायचं म्हटल्यावर किसनराव पेचात पडले. सकाळची बस पकडून ते गांवाकडे निघून गेले. 

गावात पाऊल टाकताच किसनराव भावाकुल झाले. इतकी वर्षे आपल्याला या मातीची कशी भूल पडली होती याची खंत वाटली. झपझप पावलं टाकीत वाड्याजवळ आले. अंगणात तुळशी वृंदावन पाहून त्यांना आईची आठवण आली. 

किसनरावांना असं अनपेक्षितपणे आलेलं पाहून दोन्ही भाऊ आनंदून गेले. दुपारची जेवणे झाल्यानंतर किसनरावांनी येण्याचे कारण सांगत सदाभाऊंच्या कानांवर सगळी हकिगत घातली. 

सदाभाऊंचा मुलगा प्रशांत एका महाविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. सदाभाऊ म्हणाले, “आज शनिवार आहे, सांजच्याला प्रशांत येईल तेव्हा त्याच्याशी बोलू. सध्या शेताचं काम प्रशांतच बघतो. अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे द्राक्ष पीक परवडेनासे झालं होतं म्हणून प्रशांतने गेल्या वर्षी द्राक्षबाग काढून टाकली होती.   

बाजारपेठेची मागणी आणि हंगामानुसार वेगवेगळ्या भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन करतो. आमच्या तिघांच्या हिश्श्यातल्या शेतीपैकी सहा एकर शेतजमीनीत चार एकर टोमॅटो, एक एकर वांगी, एका एकरात कांदा, घेवडा आणि चारापिकांची लागवड केलीय. 

गेल्या वर्षी टोमॅटोपासून एकरी पंचेचाळीस हजार तर वांग्यातून सत्तर हजाराचा नफा निघाला. याशिवाय हंगामानुसार कोबी, फ्लॉवर, ज्वारी पिकांची लागवड करतो. प्रशांत दर रविवारी येतो आणि पुढील आठवड्याचे नियोजन करून जातो. वेळोवेळी फोनवरूनदेखील आमच्याशी संपर्कात असतो, त्यामुळे वेळेवर निर्णय घेणे शक्य होते.” 

संध्याकाळी प्रशांत आला. किसनरावांना पुतण्याचा अभिमान वाटला. प्राध्यापक असूनदेखील त्याचं शेतीवरचं प्रेम कौतुकास्पद होतं. प्रशांतची पाठ थोपटत किसनराव म्हणाले, “प्रशांत तू ग्रेट आहेस. लोकांनी शेतीपुढे हात टेकले आहेत. तू मात्र चांगलीच प्रगती करतो आहेस.” 

“काका, शेतीपुढे हवामानातल्या बदलांचे मोठे आव्हान नेहमीच असते. बाजारभावात सातत्याने चढउतार होतच असतात. पिकांना अपेक्षित भाव मिळत नाही. हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे. या स्थितीत आम्ही बहुपीक पद्धतीकडे वळलो. कारण काही पिकांना जरी चांगला भाव मिळाला तरी इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊन जाते. बाजाराचा अभ्यास करून लागवडीची वेळ ठरविण्यावर आणि आंतरपीक पद्धतीच्या अवलंबावर भर देतो. 

काका, शेतीत ताळेबंद महत्वाचा असतो. बाजारभावावर आपले नियंत्रण नसते हे जरी खरं असलं तरी मी प्रत्येक पिकाचं अंदाजपत्रक तयार करतो. 

पिकानुसार जमा खर्चाचा हिशेब नीट ठेऊन अनावश्‍यक खर्च टाळतो. शेतीत आर्थिक व्यवस्थापन महत्वाचे असते. शेतातून आलेल्या उत्पन्नाचा उपयोग उत्पादक कामांसाठीच खर्च करतो. 

काका, तुम्ही म्हणत असाल तर या वर्षी तुमचंही रान करायला घेतो. मी जमाखर्चाचा हिशेब ठेवीन. सगळा नफा तुम्हालाच देईन. सांगा, मी तयार आहे.” 

प्रशांतच्या म्हणण्यावर किसनराव अंतर्मुख झाले. ‘आपण शेतजमीन पडीक ठेवून, फक्त शाळा एके शाळा करत बसलो,’ याबद्दल त्यांना स्वत:चीच कीव वाटली. ते काही बोलले नाहीत. 

सदाभाऊंनी किसनरावांची खरी अडचण प्रशांतच्या कानांवर टाकली. सदाभाऊंनी रात्रीच फोन करून आक्काला, सुधीरला आणि विशाखाला गांवाकडे बोलवून घेतलं. वाड्यावर बैठक बसली. पीक नियोजन आणि योग्य तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधला तर शेती व्यवसाय कशी किफायतशीर ठरू शकते हे प्रशांतने सांगण्याचा प्रयत्न केला. पण एखाद्याला सोन्याचे अंडे खाण्यापेक्षा कोंबडीच कापून खायची असेल तर त्याला कोण काय करणार?  

— क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-3 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-3 ☆ श्री मंगेश मधुकर 

(पुन्हा पुन्हा फोन वाजत होता. इतक्यात दारावरची बेल वाजली.आईनं दार उघडलं तर समोर…) इथून पुढे — 

आईनं दार उघडलं तर समोर विनीतचे ममी आणि पपा.त्यांना पाहून आईचा पुतळा झाला.ती फक्त एकटक बघतच राहिली.बाबांनी पुढे येऊन परिस्थिती सावरली.त्या दोघांच्या अवेळी,अनपेक्षित येण्यानं नमा,आई-बाबांच्या मनातली धडधड वाढली.

मध्यरात्र उलटून गेली तरी विनीत मोबाईलवर टाइमपास करत होता. तितक्यात मित्रानं  पाठवलेली त्याची अन नमाची क्लिप पाहून विनीतची झोप उडाली. घशाला कोरड पडली. हात-पाय लटपटायला लागले. मित्रांनी कॉल केले परंतु भीतीपोटी रिसिव्ह केले नाही. मेसेजेस वाचून घाम फुटला. अजून टेंशन नको म्हणून फोन स्वीच ऑफ केला. खूप घाबरला. डोक्यात नको त्या विचारांचं थैमान सुरू झालं. बेचैनी वाढली. नक्की काय करावं हेच कळेनासं झालं. येरझरा मारताना स्वतःशीच बोलायला लागला “झक मारली, बागेत गेलो अन नको ते करून बसलो. गावभर बोभाटा झाला. तोंड दाखवायला जागा राहिली नाही. नमा एक्साईट झाली पण मी कंट्रोल करायला हवा होता. इज्जतची माती झाली. ममी-पपांना काय वाटेल. हा कलंक आयुष्यभर सोबत राहणार. ज्यानं क्लिप केली त्याच्या xxx xx, xxxxx, एकदा भेटू दे, क्सक्सक्सक्स ची मजा झाली मी मात्र बरबाद झालो”रा ग अनावर झाल्यानं विनीतला खूप जोरजोरात ओरडावसं, रडावसं वाटत होतं पण तेही जमत नव्हतं. ममी-पपांना सामोरे जायची हिंमत नव्हती म्हणून रूमच्या बाहेर आला नाही. तिकडे क्लिप पाहून ममी-पपांना सुद्धा जबरदस्त धक्का बसला पण त्याहीपेक्षा विनीतच्या विचित्र वागण्यानं दोघं हादरले. दोघांनी खूप समजावलं पण काहीही उपयोग झाला नाही. सैरभैर विनीतला पाहून त्यांचाही धीर सुटत चालला होता त्याचवेळी नमाचा नवीन व्हिडिओ पाहून ममी ताबडतोब विनीतच्या रूममध्ये गेली. (संडे डिश™) 

“विनू,काय रे ही अवस्था.सांभाळ!!”

“ममा,काय करू सुचत नाहीये.डोकं पार आऊट झालंय”

“होऊन गेलेल्या गोष्टीवर जास्त विचार केल्यावर फक्त त्रासच होणार.”

“तोच तर होतोय”

“असं चडफडत स्वतःवर राग काढण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जा”

“हिंमत होत नाहीये.लोक काय म्हणतील”

“काहीही केलं तरी लोक बोलणारच.तुलाच यातून बाहेर याव लागेल.किती दिवस लपून बसणार.”

“लपून??ममा,काहीही काय बोलतीयेस.काय सहन करतोय ते माझं मला माहित.”

“आणि आमचं काय?तुझ्या इतकाच त्रास सहन करतोय”

“काहीच्या काही होऊन बसलयं.पार वाट लागली” 

“असं हातपाय गाळून चालणार नाही.तू फक्त स्वतःचा विचार करतोयेस.पुरुष असून तुझे हे हाल तर नमाची काय अवस्था असेल याचा विचार कर.अशा घटनेत जास्त बदनाम बाईच होते.”

“मग पुरुषांचं काय???त्यांना होणाऱ्या त्रासाचा कोणी विचारच करत नाही.माझा त्रास हा सुद्धा जगाच्या दृष्टिनं चेष्टेचाच विषय…”

“नमाशी बोल.याक्षणी तुम्ही एकमेकांच्या सोबत असलं पाहिजे.तू एवढा डिस्टर्ब तर तिचं काय झालं असेल.”

“माझ्यापेक्षा तुला तिचीच काळजी वाटतीय.”

“असं नाहीये.आधी स्वतःची कीव करणं बंद कर.त्याच त्या विचारांच्या रिंगणात गोल गोल फिरतोयेस.दोघांना झटका बसला पण तिनं यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला”.(संडे डिश™)

“म्हणजे,आता तिनं काय केलं”ममीनं नमाचा व्हिडिओ विनीतला दाखवला.त्यानं पुन्हा पुन्हा पाहिला अन अचानक ममीच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागला.

“साचलेलं वाहून गेलं.आम्हां बायकांना सहज जमतं पण वाटलं तरी रडता न येणं हाच पुरुषांचा प्रॉब्लेमयं.चल,नमाकडे जाऊ” ममी पाठीवर थोपटत म्हणाली.

विनीत आला पण नमासमोर जायची हिंमत होत नव्हती म्हणून कारमध्येच थांबला.ममी-पपा घरात गेले.सगळे हॉलमध्ये असले पण एकमेकांच्या नजेरेला नजर देणं टाळत होते.काय बोलावं,सुरवात कशी करावी हे कोणालाच सुचत नव्हतं.सगळेच अवघडलेले.विचित्र अशा शांततेत काही क्षण गेल्यावर ममी नमाच्याजवळ बसत म्हणाल्या “तुझं खूप कौतुक.धीराची आहेस.तुझ्या हिमतीमुळे मोठा आधार मिळाला.माझ्या इमोशनल लेकासाठी अशीच बायको पाहिजे.जिंकलंस शाबास सूनबाई!!”नमाच्या डोळ्यात पाणी तरारळं.(संडे डिश™) 

“विचित्र परिस्थितीला आपण सामोरे जातोय.काय करावं सुचत नव्हतं.तुमच्यासारखीच आमची अवस्था.कधी कल्पना केली नाही असे अनुभव आले.व्हिडिओ पाहिला.खूप धैर्य लागतं.तिघांचं कौतुक करायला आलोय.”ममी 

“विनीत कसा आहे”नमा. 

“ठीक!!खाली गाडीत बसलाय.जास्त काही सांगत नाही पण आत्ता त्याला तुझी गरज आहे.”

नमा पार्किंगमध्ये गेली.तिला पाहून विनीत गडबडला.चूळबुळ वाढली. 

“शांत हो.मी भांडायला आली नाहीये.”

“कशीयेस”विनीत

“आय एम ओके,हळूहळू सावरतेय.तुझं काय”

“नॉट ओके,खूप डिस्टर्ब आहे”

“ते लक्षात आलं.फोन अजूनही बंद”

“हो,लोक फार छळतात”

“बिनधास्त फोन चालू कर.डिलिटचं बटण आहे ना.मग कसली काळजी”

“काहीही घाणेरडं लिहितात”

“वाचायचं नाही.काही दिवस चिडवतील नंतर विसरून जातील”

“नाही ती क्लिप म्हणजे परमनंट टॅटु”

“होऊ दे.जे झालं ते झालं.सगळे करतात तेच केलंयं”नमा 

“तुला काहीच वाटत नाही”

“खूप सहन केलं.टोकाचा निर्णय घेतला.सुदैवाने वाचले नंतर ठरवून यातून बाहेर पडले.”

“मी अजूनही तिथेच अडकलोय”

“स्वतः प्रयत्न केल्याशिवाय सुटका होणार नाही.मी केलेला व्हिडिओ पाहिलास”

“येस,त्यामुळेच तर भेटायला आलो.त्यामुळेच उभारी मिळाली.तू खरंच भारीयेस.” (संडे डिश™)

“आता,पुढे काय?”

“म्हणजे समजलं नाही,ए बाई मला सोडून बिडून द्यायचा तर विचार नाहीये ना.” नमा मनापासून हसली.  

“पोलिसांकडे तक्रार करू.सोबत येणार.”

“येस,त्या हलकटाला सोडायचं नाही” 

“असले लोक भेकड,पळपुटे असतात सहजासहजी सापडणार नाहीत तरीही प्रयत्न सोडायचे नाहीत परंतु सगळी शक्ती त्यांना शोधण्यात लावायला नको.आपल्या आयुष्यात अजून खूप चांगल्या गोष्टी आहेत.”

“तुला संकटाच्या वेळी एकटं सोडलं याचा फार मोठा गिल्ट आहे.आय एम रियली सॉरी!!” 

“इट्स ओके,खरं सांगू.मलाही खूप राग आलेला पण वस्तुस्थितीच अशी होती की दोघांची अवस्था सारखीच.असल्या घटनेत बदनामी आणि सहानुभूती ही बाईच्या वाट्याला जास्त येते.पुरुष मात्र दुर्लक्षीला जातो.जो बीत गई,सो बीत गई”

“या क्लिपमुळं आपलं नातं हॅंग झालंय”विनीत भावुक झाला.त्याचा हात हातात घेत नमा म्हणाली “मग रिस्टार्ट करु” (संडे डिश™)

– समाप्त – 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-2 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-2 ☆ श्री मंगेश मधुकर 

(आणि दुसरं टोक गळ्याभोवती अडकवून टिपॉयवर उभी राहिली आणि मोठ्यानं ‘धाडकन’ आवाज आला??????)  इथून पुढे — 

“नमेssssss” बाबा जोरात ओरडले.आई-बाबांनी तिला खाली उतरवून पाणी दिलं आणि अचानक आईनं नमाच्या खाडकन थोबाडीत मारली.

“एवढयासाठी जन्म दिला होता का?जीव देत होतीस.आधी आम्हांला मारून टाक मग काय करायचं ते कर”आई संतापानं फणफणत होती.

“नमा,असलं काही करण्याआधी आमचा विचार केला नाहीस”

“तुम्हांला अजून त्रास होऊ नये म्हणून तर…..”

“तुला काही झालं असतं तर आम्ही राहिलो असतो का?”डोळ्याला पदर लावत आई म्हणाली तेव्हा बाबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं.नमा दोघांना घट्ट बिलगली.

“जे झालं ते झालं.वचन दे पुन्हा असा वेड्यासारखा विचार करणार नाही”

“प्रॉमिस!!पण सहन होत नाहीये.आयुष्याच्या रंगीबिरंगी चित्रावर अचानक काळा रंग ओतलाय असं वाटतंय.”

“सगळं व्यवस्थित होईल.हिंमत सोडू नकोस.जे घडलं त्याचा धक्का इतका मोठा होता की आम्ही कोलमोडलो.काहीच सुचत नव्हतं.म्हणून तुझ्याशी बोललो नाही.डोकं शांत झाल्यावर पहिला विचार डोक्यात आला की तुझी काय अवस्था असेल म्हणून धावत आलो.देवाची कृपा म्हणूनच वेळेत पोचलो

“तू एकटी नाहीस.आम्ही सोबत आहोत”आई.

“क्लिप व्हायरल झाली हे बदलू शकत नाही पण आपण गप्प बसायचं नाही.ज्यानं हे केलय त्याला शोधून काढू. पोलिसांकडे तक्रार करू”

“बाबा,पोलिसांकडं गेलं तर अजून बदनामी,अजून त्रास”

“काहीच केलं नाही तर होणारा त्रास त्यापेक्षा जास्त आहे.”

“पण बाबा”

“तुझी अवस्था समजतेय तरीही शांत डोक्यानं विचार कर मगच निर्णय घे.बळजबरी नाही.”

“आता आराम कर नंतर बोलू आणि दार बंद करू नकोस”.

छान झोप काढून काही वेळानं नमा हॉलमध्ये आली तेव्हा फ्रेश वाटत होती.

“थोडं बोलू”

“बाबा,परवानगी कशाला?”

“कारण क्लिप विषयीच बोलायचंय”

“मी ठीक आहे.तुम्ही बोला.”

“क्लिपमुळ झालेला त्रास,जे सहन केलंस,घेतलेला टोकाचा निर्णय.हे जगासमोर यायला हवं”

“का?कशासाठी?”आईनं वैतागून विचारलं.

“बाबा,तुमच्या डोक्यात काय चाललंय”

“बाजू मांडण्यासाठी तू सुद्धा क्लिप तयार कर.”

“अहो काहीही काय,अजून एक क्लिप म्हणजे लोकांना आयतं कोलीत दिल्यासारखं होईल”आई.

“नुसतं घरात रडत बसून तोंड लपवण्यापेक्षा जगाच्या समोर जाऊन चूक मान्य करून माफी मागणं केव्हाही चांगलं.”

“त्यानं काय होईल”नमा.

“नक्की सांगता येणार नाही पण तुझी हिंमत जगाला समजेल हे नक्की.”बाबांच्या बोलण्यानं नमाच्या विचारांना नवी दिशा मिळाली.

“अजून क्लिप-बीप काही नको.चार दिवस शांत राहू.सगळं ठीक होईल.”आई.

“बाबांचं बरोबरयं.तुमचा मुद्दा लक्षात आला.रडारड खूप झाली.पोलिसांकडे जाऊच पण त्याआधी व्हिडिओ करू.”

“ग्रेट,काय बोलायचं त्याचा विचार कर.पॉइंट काढ आणि बिनधास्त बोल.उद्या सकाळी शूट करू.”

दुसऱ्या दिवशी बोलायला सुरवात करण्याआधी नमानं हात जोडून प्रार्थना केली नंतर अंगठा उंचावून तयार असल्याची खूण केल्यावर बाबांनी मोबाईलवर शूटिंग सुरू केलं.

“नमस्कार!! मी नमा,माझ्या खाजगी क्षणांची चोरून केलेल्या क्लिपमुळे सगळ्यांना हा चेहरा माहितेय.कालपासून बदनाम हुये पर नाम हुवा.अशी अवस्था झालीय.भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली.सार्वजनिक ठिकाणी असं वागायला नको होतं.त्याबद्दल सर्वांची माफी मागते.नकळतपणे घडलेल्या चुकीची फार मोठी किंमत मोजावी लागतेय.माझी अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली.राक्षसी आनंदासाठी कोणीतरी लपून व्हिडिओ केला आणि तो व्हायरल झाल्यावर विकृतीचा खेळ सुरू झाला.लहान-थोर,गरीब-श्रीमंत,अडाणी-सुशिक्षित सगळेच यात आवडीनं सहभागी झाले.माणसांतल्या जनावरांनी लचके तोडायला सुरवात केली.क्लिप बघून नंतर फोन केले.घाणेरडे मेसेज केले.खूप निराश झाले त्याच भरात आत्महत्येचा प्रयत्न केला.आई-बाबांमुळे वाचले”.भरून आल्यानं नमाला बोलता येईना.बाबांनी शूटिंग पॉज केलं.नमा पुन्हा बोलायला लागली

“तसं पाहीलं तर मी काही जगावेगळ केलं नाही पण एका मध्यमवर्गीय मुलीची क्लिप म्हटल्यावर सगळ्यांना त्यात इंटरेस्ट निर्माण झाला.कालपासून खूप सहन केलंयं आणि अजूनही करतोय.सिनेमा,वेबसिरिजमध्ये तर यापेक्षा पुढच्या गोष्टी दाखवतात.ते आवडीनं पाहिलं जातं.बोल्ड सीन्स करणाऱ्यांना काहीही फरक पडत नाही उलट पैसे आणि प्रसिद्धी मिळते मात्र माझ्यासारख्या सामान्य मुलींसाठी हे फार भयंकर आहे.क्लिप व्हायरल झाल्यापासून भयानक अनुभव आलेत.इतरवेळी साधी चौकशी न करणारे नेमकं आत्ताच फोन करून क्लिपविषयी बोलतायेत.फुकटचे सल्ले तर चालूच आहेत.म्हणून आम्ही फोन बंद केले तर काहीजण घरी येऊन बळजबरीचं सांत्वन करून गेले.माणसांचं हे वागणं धक्कादायक होतं.जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.असो!! हा नवीन व्हिडिओ करण्या मागचा उद्देश वागण्याचं समर्थन नाहीये तर माझीही एक बाजू आहे.आई-बाबांमुळे मी जिवंत आहे.त्यांनी सपोर्ट केला परंतु अशा कितीतरी दुर्दैवी नमा आहेत ज्यांना कोणाचाच आधार नसतो म्हणून मग त्या टोकाचा निर्णय घेतात.सर्वांना हात जोडून विनंती आहे की या विकृतीच्या खेळात सहभागी होऊ नका.असे व्हिडिओ फॉरवर्ड न करता ताबडतोब डिलिट करा. उलट पाठवणाऱ्याला जाब विचारा.अजून जास्त काही बोलत नाही.थॅंकयू”नमा बोलायचं थांबली.डोळे घळाघळा वाहत होते.काही वेळ शांततेत गेला.

“आता मी बोलतो”बाबांनी मोबाईल नमाकडे दिला आणि आईला शेजारी बसवून बोलायला सुरवात केली.

“आम्ही तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं.साध सरळ चाललेलं आयुष्य अचानक कालपासून बदललं.क्लिपच्या रूपानं आलेल्या वादळानं मूळापासून हादरवलं.माणसातल्या एका गिधाडानं सावज टिपलं आणि बाकीच्यांनी मिटक्या मारत मजा घेतली.एकुलती एक,उच्चशिक्षित,लग्न ठरलेल्या मुलीचं अशापद्धतीनं प्रसिद्ध होणं हे फार भयंकर.पोटच्या मुलीच्या बाबतीतला हा प्रकार सहन करणं पालक म्हणून अतिशय वेदनादायक आहे.अचानक बसलेल्या झटक्यातून सावरतोय.आता गप्प बसणार नाही.पोलिसांकडे तक्रार करणार.याकामी तुमची मदत पाहिजे.

ज्यानं तुम्हांला पाठवली त्याला ही क्लिप कोठून मिळाली एवढंच विचारा.एकमेकांच्या मदतीनं गुन्हेगारापर्यंत पोहचू शकतो आणि आमचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.”

“माझी लेक वाचली.एवढंच सांगते की वेळीच आवर घातला नाही तर आजचे हे दु:शासन कधी घरात घुसतील ते कळणार नाही कारण त्यांच्या हातात अत्याधुनिक साधनं आणि आपल्या घरात आई,बहीण,बायको,मुली आहेत.हात जोडून विनंती आहे की यापुढे असल्या क्लिप फॉरवर्ड करू नका.एखाद्याची थोडक्यातली मजा दुसऱ्याच्या जिवावर बेतू शकते.”आईनंसुद्धा मन मोकळं केलं.

नमानं व्हिडीओ पोस्ट केल्यावर काही वेळानं मोबाईल वाजला,नाव बघून तिनं कॉल घेतला नाही. पुन्हा पुन्हा फोन वाजत होता.इतक्यात दारावरची बेल वाजली.आईनं दार उघडलं तर समोर …

— क्रमशः भाग दुसरा

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares