☆ जीवनरंग ☆ माया आभाळाची… भाग-2 ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆
एके दिवशी तिन्ही सांजेच्या करकरीत वेळी माय ला अचानक तिच्या सुनेचा फोन आला. त्या फोनने माय हादरली. हेलपाटली. बापाने बघताच तो माय ला सावरायला धावला. त्याला तो निरोप समजताच बाप थरारला. भीतीने गारठून गेला… केविलवाणा होत निःशब्द झाला. माय सुनेशी दोन वाक्य बोलली आणि ती ही गंभीर झाली. बापाच्या चेहऱ्यावर उमटलेली व्याकुळता माय ला स्पष्ट दिसली. तिने विचार केला आणि त्याला घेऊन माय निघाली. पाचव्या मिनिटाला माय आणि बाप त्यांच्या सुने समोर उभे होते. तिची सून समोर शांत बसली होती…. हॉस्पिटल मध्ये.
लेकाला भयंकर अपघात झाला होता.काय आणि कसं घडलं हे त्या दोघांनी सुनेकडून सविस्तर जाणून घेतलं. बापाला सगळं कळताच तो मूक झाला. शेवटी काहीही झालं तरी बाप तो बापच … प्रत्यक्ष जन्मदाता. आता मात्र बापाने सगळी सूत्र आपल्या हातात घेतली.डॉक्टरांना भेटून एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला. अत्यंत धीराने बायको आणि सुनेला सावरून धरलं. ट्रीटमेंट दरम्यान लेकाला रक्ताची गरज पडली. आज बापाने आपल्या शरीरातील अर्ध्याहून अधिक रक्त लेकाच्या धमन्यांत घातलं. शेवटी रक्त बापाचंच होतं. रक्ताला रक्त जुळलं. बापाचं नशीब आणि माय ची पूर्व- पुण्याई थोर… .लेक मरणाच्या दारातून परत आला.
आज त्या माय-बापाचा लेक घरी येणार होता; त्याच्या जन्मघरी. माय त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. त्या गच्च भरलेल्या आभाळाखालच्या हिरव्या पानापानात लपलेल्या पायवाटेवर आभाळ कोसळत होतं आणि पाना पानांत लपलेल्या वळणदार पायवाटेकडे तिचे डोळे खिळले होते. इतक्यात अस्पष्टशा आकृत्या हलताना दिसल्या. काही मिनिटात ते तिघेही समोर उभे राहिले.लेक एका हातात कुबडी घेऊन तर दुसरा हात बापाच्या गळ्यात टाकून उभा होता. आज तो बाप त्याच्या लेकासाठी कुबडी झाला होता. हळूहळू बाहेरील झड थांबली आणि धूसरलेलं वातावरण स्वच्छ झालं. घरात मात्र त्या चौघांच्या डोळ्यांतील सरीला खंड नव्हता. आभाळातली सोनेरी किरणे आता काळ्या ढगांना भेदून त्या माय बापाच्या घरात प्रसन्नपणे विखुरली होती. आज बापच आभाळ झाला होता …
लेक पूर्णपणे बरा होईपर्यंत डोळ्यांच्या नेत्रज्योती त्या बापाने चार महिने अखंड तेवत ठेवल्या होत्या. चार महिन्यात बापाने लेकाला तळहातावर झेलले होते आणि घरात सुनेला मुलीचा मान देऊन त्या बापानेच त्रिकोणाचा चौकोन पूर्ण केला होता. शेवटी बाप तो बाप असतो आणि त्याची अव्यक्त माया..?
☆ जीवनरंग ☆ माया आभाळाची… भाग-1 ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆
गच्च भरलेल्या आभाळाकडे ती माय तिच्या गच्च भरलेल्या डोळ्यांतून पहात होती. आभाळ आणि डोळे कधीही कोसळतील अशी स्थिती. तशातही ओथंबून फुटू पाहणाऱ्या आभाळात एक सोनेरी किरण प्रकटला आणि त्याने भोवतालच्या गर्द काळ्या मेघांना आभेत लपेटून टाकले. क्षणभरच … पण तेवढ्या क्षणांत त्या माय च्या काळ्याभोर डोळ्यांतसुद्धा एक आशेच्या किरणाची लकेर उमटून गेली. हळू हळू धूसर असलेलं विरत गेलं आणि धुक्याचा पडदा हटावा तसं गत आयुष्य लक्ख दिसू लागले…
लेकराच्या ट्याहाने तिच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं. लेकराचा बापही खुश होता. तिघांचं तीन कोनी आयुष्य सुखनैव पणे दौडत होतं. लेक दिसामाजी मोठा होत होता. तो आपलंच ऐकेल आणि आपल्या मताप्रमाणे वागेल ह्याबद्दल बाप निश्चिन्त होता. परंतु लवकरच लेकाचे स्वतंत्र विचार बापाला ठळकपणे जाणवू लागले होते. लेकराने त्याच्या करियरचे निर्णय स्वतः घेऊन मग बापाला सांगितले, मात्र बापाच्या कपाळावरची आठी आणि चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेली नाराजी मायला कळून चुकली. पुढच्या आयुष्यात आता काय भोगावं लागणार ह्याची कल्पना माय ने उराशी बांधली. तिला एखाद्या निर्णयात सहभागी करून घ्यायचं अशी त्या बापाची पद्धत आणि सवयही नव्हती. बाप लेक समोर आले की मायचं काळीज लककन हलायचं. त्या क्षणी पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्या विचाराने तिचा मेंदू भिरभिरायचा. बाप, लेक आणि माय तिघे जणू त्रिकोणाच्या तीन कोनाच्या पॉईंट वर जगत होते. लेकाने ठरवल्याप्रमाणे त्याचं करियर घडवलं. त्याची नोकरी सुरु झाली… आणि बापाने हिशोब मांडायला सुरवात केली. माय च्या आयुष्याची चव अजूनच बेचव आणि अळणी झाली. अगतिकपणे माय सगळं सहन करीत होती… उद्याच्या आशेने. तिच्या हातात फक्त तेवढंच उरलं होतं…
आता पावेतो बाप लेक दुरावले होतेच, त्यातच एके दिवशी लेकाने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे अमलातही आणला. आज मात्र माय हरली. दैवा पुढे आणि नशिबापुढे तिने हात टेकले. हतबलतेने ती दिवस ढकलत राहिली. अचानक एके दिवशी लेक एका मुलीला घेऊन माय ला भेटायला आला. माय समजली. तिने निमूटपणे सुनेची खणानारळाने ओटी भरली आणि आपल्या लग्नात मिळालेल्या स्त्री धनातून सोन्याचा एक हार आणि दोन बांगड्या तिच्या ओटीत टाकल्या. बापाची धुसपूस सुरु झाली होतीच ती अजून वाढली. त्या मुली मुळे तो नात्यापुरता का होईना पण सासरा झाला होता. माय मोठ्या आशेने बापाकडे पहात होती. अपेक्षा होती लेक व सुनेला त्याच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादाची. 5-10 मिनिटे शांततेत गेल्यावर लेक दहाव्या मिनिटाला त्याच्या बायकोला घेऊन घरातून बाहेर पडला. केवळ बायकोच्या हट्टाखातर तो घरी आला होता. माय ने तिच्या सुनेला तेवढ्या वेळात जोखले होते. ती सुनेच्या समंजसपणावर खुश होती. बाप नेहमी प्रमाणे माय लेकरांपासून अलिप्त होता. काळ वेळ आपल्या गति प्रमाणे आणि त्या लेकाचा बाप त्याच्या गतित. माय ला मात्र काळवेळच काय पण कशाचच बंधन नव्हतं. तिच्या दृष्टीने सगळंच थांबून राहिलं होत.आता तर कशाचाही फरक माय ला पडत नव्हता. माय नेहमी म्हणायची, देव एका हाताने काढून घेत असेल तर दुसऱ्या हाताने नक्कीच काहीतरी देत असतो. पण तो काय देतोय ते उमजून समजून प्रसाद म्हणून स्वीकारलं पाहिजे. माय असं काही बोलायला लागली की लेकाला ती शापित यक्षिणी वाटायची . अहो, खरंच होतं ते … तिच्या संसारातली शापित यक्षिणीच होती ती… तिच्या लेकाला एकच समाधान म्हणजे सासू- सुनेचे सख्य. पण तो तीन कोनांचा त्रिकोण .. त्रिकोणच राहिला होता. चौकोन व्हायची सुतराम शक्यता नव्हती.बाप बदलायला तयार नव्हता आणि लेक? त्याचा तर प्रश्नच नव्हता . कालाय तस्मै नमः … कदाचित काळच त्रिकोणाचा चौकोन करेल ह्या आशेवर माय जगत होती आणि…
“मि. भागवत, मी काय सांगणार आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे. आता त्याचे फारच थोडे दिवस राहिलेत. किती, ते सांगता येणार नाही. तो हॉस्पिटलमध्ये राहिला, तर आम्हाला फायदाच आहे. पण त्याच्याकडे बघून जीव तुटतो. म्हणून सांगतो, त्याचे उरलेले दिवस घरच्या वातावरणात जाऊ देत. तो आनंदी राहील, याची काळजी घ्या. ही इज अ ब्रेव्ह बॉय! मला कधीही कॉल करा. मी लगेचच येईन.रोज रिपोर्ट करत जा.”
“थँक यू, डॉक्टर.”
त्याला पार्टी आवडते, म्हणून मॉम -डॅडनी पार्टीज अरेंज करायचं ठरवलं. रोज वेगवेगळे ग्रुप्स, रोज वेगवेगळ्या थिम्स, रोज वेगवेगळे मेन्यू, रोज त्याच्या आवडीचे वेगवेगळे केक. आमंत्रणं देताना ‘त्याच्या तब्येतीचा विषय काढू नका, प्लीज.’अशी विनंती करायला विसरायचे नाहीत ते.
अशीच धमाल चालली होती. तोही व्हीलचेअरवरून पार्टीत सामील होत होता.लोक मॉम -डॅडच्या अपरोक्ष त्यांच्या धैर्याची प्रशंसा करत होते.
“खर्च वाढतोय ना रे?”
“जाऊदे गं. लोन घेऊ लागल्यास. पुढे आयुष्य पडलंय लोन फेडायला. पण त्याचा क्षण- न- क्षण आनंदात गेला पाहिजे.”
“हो रे. खुश असतो तो या जल्लोषात.”
त्या दिवशी सर्वांत शेवटी निघाली, मॉमची आतेबहीण. तिला निरोप देताना दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या.
ती निघाल्यावर तोंड धुवायला जाण्यापूर्वी मॉम त्याच्या खोलीत डोकावली.
तसा उशीर झाला होता ;पण तो जागाच होता.
“मॉम, डॅडलाही बोलव ना.”
तेवढ्यात रुमालाने तोंड -डोळे पुसत डॅडही आलाच.
“मॉम, डॅड, मला ठाऊक आहे-डेथ कोणत्याही मोमेन्टला मला घेऊन जाईल. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे. मला उरलेले दिवस, उरलेल्या मोमेन्ट्स तुमच्याबरोबर घालवायच्या आहेत. फक्त तुमच्याबरोबर. पार्टीत तुम्ही दोघं हरवूनच जाता. मला मिळतच नाहीत.
आजपासून तुम्ही दोघं माझ्याबरोबरच थांबा. मॉम, आजपासून सिस्टर नाही, तू मला भरव. डॅड, तू मला बुक्स वाचून दाखव. आपण तिघं गेम्स खेळूया. प्लीज.
सिस्टर खूप चांगली आहे. शी केअर्स फॉर मी. शी टेक्स गुड केअर ऑफ मी. पण तिला रूमच्या बाहेर थांबायला सांगा. इकडे फक्त आपण तिघंच राहूया. तिघंच.”
(नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ”) इथून पुढे —
हो- ना करता, कळलं ते असं—-
—-ही आजी आपल्या यजमानांसह रहात होती. यजमान नोकरीला…ही गृहिणी !
मूलबाळ होत नव्हतं— खुप वर्षांनंतर तिच्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी मूल झालं…!
या वयात झालेल्या मुलाला जन्मजात व्यंग होतं… कमरेखाली त्या बाळाला संवेदनाच नव्हत्या… हा धक्का तिनं पचवला.
पुढे कळलं बाळाच्या हृदयाला छिद्र आहे… तो ही धक्का तिने पचवला… आणखी काही काळानं कळलं… मूल मतिमंद आहे… !
——-आता मात्र ती ढासळली !
गाडी कशीबशी सुरु होती. पुढे हार्ट अॕटेकने यजमान गेले… एक मोठा आधार गेला.
मतिमंद मुलाचं करता करता दिवस सरत होते, पेन्शन पुरत नव्हती. मुलाचं दुःखं पहावत नव्हतं… तरीही मनोभावे त्याचं सर्व ती करत होती. …अशातच अचानक मुलगाही गेला तिला सोडून …!
—सगळीकडेच अंधार… ! ती एकटी …!—
आजीची बहीण टी बी ने आजारी होती, तिच्या शेवटच्या काळात ती आजीला म्हणाली…
” बिनबापाचं माझं पोरगं पदरात घे… मी जास्त दिवस राहणार नाही…”—–
तो शब्दही खरा झाला. बहीण गेली…बाप नसलेल्या तिच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी आता आजीने घेतली त्यावेळी… !
बहीण गेल्याचं दुःखं होतंच… पण तिच्या मुलाच्या रुपानं पुन्हा आजीला मातृत्व मिळालं…
बहिणीमाघारी तिनं त्या मुलाचं सर्व काही केलं. त्याच्या शिक्षणासाठी दागदागिने मोडले, राहतं घर विकलं, स्वतः भाड्याच्या घरात राहून मुलाला बाहेरगावी होस्टेलला ठेवलं. त्या वयातही चार घरची कामं करुन मुलाचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण झाल्यावर मुलानं परस्पर तिकडेच नोकरी पाहिली, घरोबाही केला. तो हिच्याकडे परत आलाच नाही. म्हणायचा, ‘ तू काय खरी आई आहेस का माझी… ? ‘
आजीनं इतके मृत्यु पाहिले होते, इतकं दुःखं पचवलं होतं… या सा-या धक्क्यांतुनही ती सावरली …
पण या वाक्याचा आघात सहन झाला नाही—-” तू काय खरी आई आहेस का माझी… ?”
“ मी खरी आई नव्हते तर कोण होते रे बाळा तुझी ? “—-ती प्रश्न विचारायची… पण उत्तर द्यायला कुणीच नसायचं…!
आई होण्याचं भाग्य दोन्ही वेळा लाभलंच नाही… !
दिवस सरत होते, मृत्यु नेत नव्हता आणि आयुष्यं जगु देत नव्हतं… ! बहिणीच्या मुलाला स्वतःचाच समजून, त्याच्यासाठी होतं नव्हतं ते सर्व आजीनं घालवलं होतं… नंतर मुलानं नातं नाकारलं—–
आजी आता राहते कुठल्याशा चाळीतल्या एका खोलीत—-
पंधरा दिवसांपुर्वी हिला खोकतांना चाळीत कुणीतरी पाहिलं, यंत्रणेला कळवलं… सरकारी कर्मचाऱ्यांनी आजीला दवाखान्यात नेलं, कोरोनाची तपासणी केली, दोन दिवस दवाखान्यात ठेवलं… हिला घरी सोडलं… !
हिला खूप आशा होती– आपल्याला कोरोनाचा आजार व्हावा, त्यातच आपला अंत व्हावा… पण इथंही निराशाच पदरी आली… टेस्ट निगेटिव्ह ! —हिला घरी सोडलं… !
जगण्याने छळलं होतं… !!!
ती परत चाळीत आली होती… !
“ आजी, वाईट वाटलं ऐकून…. “ पाणावलेल्या डोळ्यांनी मी तिला म्हणालो.
“ वाईट काय वाटायचं डाॕक्टर ? भोग असतात, ते भोगावेच लागतात.”
“ पण तुम्ही सांभाळलेल्या मुलानं योग्य नाही केलं हे…”
“ असू द्या हो, आपण आपलं कर्तव्य करायचं… गीतेत सांगितलं आहे… मोह नको… कर्म करत रहा… फळाची अपेक्षा नको…”
(नव्ह कुणी मागितला जरी असता तरी स्वतः शिवाच गेला असता पण सुंदरला दिला नसता !) — इथून पुढे —
त्यादिवशी असाच बैलगाडीला जुंपून त्याला नेहमीप्रमाणं शेतात नेला . शेंगांच्या रानातून शेंगाची पोती आणायची होती. निम्या रस्त्यात गेल्यावर ठेच लागल्याचं निमित्त होऊन सुंदर रस्त्यात कोसळला .शिवाचा जीव हलला , गाडीवरून उतरून त्याला त्यानं चुचकारल ,पाठीवरून हात फिरवला पण सुंदर उठायचं नाव घेईना .तिथंच बैलगाडी सोडून दुसरा बैल रस्त्याकडेला बांधून तो सुंदरला उठवायचा प्रयत्न करू लागला.पायात काटा मोडलाय का पाहिला पण कुठं काहीच झालं नव्हतं .शिवाच हातपाय गळून गेलं .तिथंच गळ्याला मिठी मारून त्यांन हंबरडा फोडला . निरव शांततेत शिवाचा हंबरडा दूरवर घुमत राहिला .रस्त्यावरून येणा-जाणाऱ्यांनी बातमी घरात पोहचवली.जागेवरच डॉक्टर आणला .डॉक्टरनं इंजेक्शन दिलं .हा -हा म्हणता गाव गोळा झाला ,पण शिवाला काही सुचत नव्हतं.तो नुसता सुंदर …सुंदर करत उसासे टाकत होता . संध्याकाळी हळू हळू चालवत कसा तरी सुंदरला घरापर्यंत आणला .सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं . कुणी म्हणलं करणी झाली ,कुणी म्हणलं दिष्टवला .शिवा तर सुंदर जवळून रात्रंदिवस उठलाच नाही .सुंदरच्या टपोऱ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तसा त्याचा धीर सुटला .त्यान पण अन्नाचा कण घेतला नाही .अंगारा ,धुपारा ,दृष्ट काढून ,औषधं बदलून झाली पण सुंदर शांत होता .केविलवाणे तो मालकाकड पाहत राही आणि एका सकाळी जमिनीवर मान टेकून सुंदर शांत झाला .शिवाने हंबरडा फोडला. कुणाचंही मन पिळवटून जावं असंच आक्रीत घडलं होतं .शिवा वेडा व्हायचाच बाकी होता .
त्यादिवसापासून त्याची झोप उडाली .जेवणावरून स्वत:वरून ,शिवारावरून मन उडलं .जिथं तिथं सुंदरच्या आठवणी त्याचा पाठलाग करत .रात्री अपरात्री उठून तो गोठ्यात जाई आणि सुंदरच्या जागेवर विमनस्क बसून राही .लोकांनी समजूत काढली ,शालुच्या माहेरच्यांनी समजूत काढली पण तो स्वतःच्या मनाला समजावू शकत नव्हता की सुंदर त्याच्या गोठ्यातून जीवनातून गेलाय .
शालूला रात्रंदिवस धन्याची चिंता लागून राहिली .त्याचं मन तिलाही वळवता येत नव्हतं कारण सुंदर त्याचं काळीज होतं अन काळजाशिवाय मनुष्य कसा जगेल ? चालतं बोलतं आत्माहीन प्रेतवत अवस्था होती शिवाची . तिला धास्ती लागून राहिली होती त्याच्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना होणार ? देवाचा धावा रात्रंदिन चालूच होता.
गेल्या राखीपौर्णिमेला राखी बांधायला माहेरी गेल्यावर सहजच तिचं लक्ष गोठ्यातल्या वासराकड गेलं अन तिच्या सर्वांगातून एक अनामिक लहर चमकली .सुंदरचंच दुसरं रूप होतं ते ! अन तिच्या मनात एक कल्पना आली .हा शेवटचा उपाय होता धन्याला सुंदरच्या आठवणीतून भानावर आणायचा .
तिनं भावाला -महादूला सविस्तर कल्पना दिली .बहिणीच्या संसाराची त्याला पण काळजी होतीच .प्रयत्न किती यशस्वी होणार हे तिला माहीत नव्हतं पण शिवाला दुःखातून सावरण्याचा हा एकच मार्ग तिच्याकडे शिल्लक राहिला होता .आणि म्हणूनच ती महादूची वाट बघत अस्वस्थपणे आत -बाहेर फेऱ्या घालत होती .
घुंगराच्या आवाजाने ती भानावर आली अन पटकन आरतीचं ताट आणायला आत गेली . लगबगीनं तिनं पाटीत खिचडा ओतला आणि उंबऱ्यावर येऊन सुंदर ss म्हणून हाक दिली. नवा कोरा रंगीत कंडा , कासरा अन घुंगुर बांधून महादू दारात वासराला घेऊन हजर होता .घुंगराचा आवाज अन ‘सुंदर’ हाक ऐकून शिवा दचकून गोठ्यातून बाहेर आला. शालून वासराला ओवाळून तोंडात खिरीचा घास दिला डोक्यावर हात फिरवला अन खिचडा खायला दिला .शिवा निश्चल होऊन पहात होता . शालू वासराच्या पाठीवर हात फिरवत त्याच्याशी बोलत होती ,”सुंदर तुझ्या धन्यान काय अवस्था करून घीतल्या बघ ,तूच समजवून सांग बा मी कुणाकड बघून जगू ? झालं ती वाईटच! आम्हाला तर काय बरं वाटतय का र? पण त्याचा आपल्याजवळचा शेर तेव्हढाच हुता तेला आपण काय करणार ?आपण प्रयत्न केलंच ना ? आता सावरायला हवं ,तूच सावर तुझ्या धन्याला ! ती बघ तुझी जागा ” म्हणत शालून गोठ्यात त्याच्या जागेकडं बोट केलं तिचा कंठ दाटून आला; तिनं वासराच्या गळ्यात हताशपणे हात टाकले तिचे डोळे भरून वाहू लागले.
शिवाला त्याचं लहानपण आठवलं असाच तो सुंदरच्या गळ्यात हात टाकून बोलायचा. थेट सुंदरच होता तो दुसरा !तेच डोळे ,तीच पांढरी शुभ्र सशासारखी गुबगुबीत अंगकांती …”सुंदर sss “पुन्हा एकदा त्यानं आर्त हाक दिली .. गळ्याला मिठी मारली लहान मुलासारखी अन अश्रूला वाट दिली .महादू गळ्यातल्या टॉवेलन डोळे पुसत राहिला .सुंदर शिवाचे हात प्रेमाने चाटू लागला अन मघापासून गच्च दाटून आलेलं आभाळ आता धाडधाड कोसळू लागलं …
तिन्हीसांज झाली होती ,अस्वस्थपणे शालू उंबऱ्यातून स्वैपाकघरात अन पुन्हा अंगणात येरझाऱ्या घालत होती .आकाशात ढगांची गच्च दाटी झालेली अन अजूनच अंधारून आलेलं .गोठ्यात अंधार भुडुक होता अन शिवा -तिचा कारभारी गुडघ्यात मान घालून बसला होता .शेजारी सापती ,घुंगुरमाळ उदास पडलेली बघून तिच्या पोटात कालवून येत होतं पण ..पण ती हतबल होती .चूल पेटली होती . घरोघरी जनावरांच्या अंघोळीचा अन सजावटीचा कार्यक्रम सुरू होता .आज खिचडा ! तिनेही चुलीवर खिचडा शिजत घातला होता ,करडई उखळात कुटून दूध काढून ठेवले होते , खीर रटरटत होती ; जनावरं ओढ्यावर नेऊन धुवून आणली होती ,शिंगांना हुरमुस लावून रंगवली ,पण तिला कशातच आनंद वाटत नव्हता. घरधण्याची तसली अवस्था बघून तिला उदास वाटत होते ,तिच्या परीनं तिनं समजूत काढली होती पण ..पण त्याच्यात काय फरक पडत नव्हता आणि कुणी समजूत काढून ती निघणारही नव्हती .गेलं आठ दहा महिने झालं त्याचं शिवारातून ,जितराबावरून लक्ष उडल होतं ,इतकंच काय स्वत:वरून सुद्धा त्याचं लक्ष उडलं होतं . सगळी काम शालूनच पार पाडली होती ,औंदा पेरणी पण शालूनच पार पाडली होती पण पिकं कितकीशी वाढलीत ? हे बघायला सुद्धा तो शेतापर्यंत गेला नव्हता .अन का नाही अशी अवस्था होणार ?त्याजागी कुणी असता तर त्याचीही अवस्था अशीच झाली असती शालू विचारात गढली .सुंदर आणि धन्या बरोबरच वाढलं होतं आत्या सांगायच्या सुंदरच्या आणि तिच्या कारभाऱ्याच्या साऱ्या कहाण्या !
घरच्या गाईपासूनच सुंदर झाला होता .नावाप्रमाणच सुंदर देखणा होता . पांढऱ्या शुभ्र सशासारखी कातडी ,टपोर डोळ ,गुबगुबीत शरीर .. शिवाला त्याचा खूप लळा होता .दिवसरात्र तो सुंदरला जपायचा ,कुठून कुठून गवत आणायचा ,कणिक खुराक ,गोठ्यात बसायला स्वच्छ जागा ..एखाददिवशी जरी सुंदर उदास वाटला तर शिवा शाळेतच जायचा नाही ,सुंदरला माळावर पळवल्याशिवाय त्याला चैन पडायचा नाही, सुंदरन काही खाल्ल्याशिवाय शिवा तोंडात घास घ्यायचा नाही .सुंदर मोठा धष्टपुष्ट झाला अन शेतीची काम करू लागला .शालू अन त्याच्या लग्नाच्या वेळीसुद्धा त्यानं सुंदरकडं एव्हढंस पण दुर्लक्ष केलं नव्हतं .वरातीच्या गाडीला तो सजून धजून ओढत होता . तिथंच तिची सुंदरशी ओळख झाली होती .
सकाळी उठल्या उठल्या पहिलं तो सुंदरचच दर्शन घ्यायचा ,त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा ,तोही धण्याचं हात चाटायचा ,तोंड वर करून लाड करून घ्यायचा . त्याच्यामागचं शेण सारून त्याला कोरड्या जागेत बांधून मगच धन्याच्या दिवसाची सुरुवात व्हायची .काळजाचा तुकडाच होता जणू ! शिंगांना सुबक आकार ,त्यांचा लाल रंग , कंडे ,घुंगुरमाळ ,बैलपोळ्यासाठी रंगीत झूल ,रंगीत गोंडे कित्ती कित्ती हौस! सुंदरला काही झालं की शिवाचा जीव खालवर व्हायचा .सुंदरला चारापाणी केल्याशिवाय तो तोंडात घास घ्यायचा नाही .
दिवाळीत गोठा साफ करून रंगरंगोटी व्हायची ,गोठ्यालाच दिव्याच्या माळा लावायच्या .वसुबारसेला पूजा ,पुरणपोळीचा घास असायचा सुंदरला.सुंदर जणू धाकटा भाऊच होता धन्याचा ! बैलपोळ्याची तर त्याला कित्ती हौस ! आठ दिवसापासूनच तो त्या तयारीत असायचा . लाडक्या सुंदरला सगळ्या माळावर हुंदडू द्यायचे. हिरव्यागार कुरणावर मनसोक्त चरून झालं की मग आपोआपच त्यो ओढ्याकडं जायचा मनसोक्त पाणी प्यायचा , मग कंबरभर पाण्यात उतरून शिवा सुंदरला स्वच्छ धुवायचा .आधीच स्वच्छ पांढरी त्याची कात अजूनच झळाळायची .आठ दिवस त्याला कुठल्याच कामाला लावत नसे. रस्त्यानं सुंदर निघाला की सगळे बघत उभं रहात .दररोज संध्याकाळी मीठ मिरच्यांनी दृष्ट उतरून चुलीत फेकायची .तिला पण सुंदरला जपावं लागायचं ,सुंदरचा दु:स्वास धन्याला अजिबात खपायचा नाही .
खरे तर सुंदर दिसायला देखणा होताच पण तो कष्टाळू अन गुणी पण तितकाच होता .त्याला कधी चाबूक ओढलेला तिनं बघितलं नव्हतं .शेतीच्या कामाला नेहमी सुंदरच्या जोडीला दुसऱ्याचा बैल भाड्यानं असायचा ,गाडी जुपताना पण भाड्याचाच बैल असायचा सुंदरच्या जोडीला ;पण सुंदरला कुणी भाड्यानं मागायचं धाडस केलं नव्हतं ;नव्ह कुणी मागितला जरी असता तरी स्वतः शिवाच गेला असता पण सुंदरला दिला नसता !
मैफिलीची वेळ झाली होती.. झुंबर आणि दिवे प्रज्वलित झाले होते.. गालिचा व्यवस्थित अंथरला होता.. लोड, तक्के.. सारी बैठक व्यवस्था सज्ज झाली होती.. कळीदार पाने, सुपारी, चुना कात, लवंग, वेलदोडे यांनी भरलेली पानांची तबके बैठकांसमोर ठेवलेली होती.. तिच्या येण्याचे प्रवेशदाराला लागूनच साजिंद्यांची बैठक.. सारे काही जय्यत तयार होते. तिच्या नृत्य- गायनावर, सौंदर्यावर फिदा असणारे, तिच्यावर जीव ओवाळून टाकणारे रसिक येऊन विराजमान झाले होते, वाद्ये जुळवली गेली होती. फक्त तिच्या येण्याची प्रतीक्षा होती. साऱ्या रसिकांचे डोळे ती यायची त्या प्रवेशदाराकडे लागून राहिले होते. तिचे आरसपानी सौन्दर्य पिऊन डोळ्यांत साठवायला अनेक डोळे आतुर झाले होते.
जशी वेळ पुढे पुढे सरकत होती तशी रसिकांमध्ये अस्वस्थता ,कुजबुज, चुळबूळ वाढू लागली होती पण अजून ती काही आली नव्हती. सखी तिच्या जागेवर बसून होती.. ‘ खरे तर असे कधी होत नाही. बाईजी अगदी वेळेवर बैठकीत येतात.. अगदी रसिक आल्यावर लगेच..’ तिच्या न येण्याने मनात काळजी दाटून आली तशी सखी अस्वस्थपणे उठली आणि तिच्या खोलीकडे गेली .
” बाईजी, चला खूप उशीर झालाय, सगळेजण तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतायत.”
हलकेच दार वाजवत सखीने तिला हाक मारली. तिने दार उघडले. सखीने पाहिले. ती रोजच्यासारखीच तयार झाल्याचे दिसत होते. ‘ बाईजी तयारच आहेत… पण काहीशा वेगळ्या का वाटतायत ?’ सखीच्या मनात तिला पाहताच विचार आला.
” आज मैफिल नाही होणार. सगळ्यांची माफी मागून जायला सांग .”
एवढेच बोलून तिने दार दडपून बंद केले होते. बंद दारापुढे सखी काही क्षण थबकली होती. सखीला तिच्या वागण्या- बोलण्याचा धक्काच बसला होता.
सखीने हात जोडून माफी मागत, बाईजींना बरे वाटत नसल्याने मैफिल होणार नसल्याचे सांगितले.
पानांची तबके पुढे सरकवत पान घेण्याची आणि दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली. कुणी पान घेऊन, कुणी तसेच निराश मनाने परतले. साजिंदेही गेले तसे मुख्य दार पुढे करून ‘ बाईजींकडे विचारपूस करायला जावं की नको ?… नकोच. बाईजीं जरा अस्वस्थच वाटल्या .. पण नको जायला.. त्यांना वाटलं तर बोलावतीलच..’ असा विचार करून सखी स्वतःच्या खोलीकडे गेली.
सखी बोलवायला आल्यानंतर दार लावून ती कसल्यातरी विचारात भान हरपून गेल्यासारखी मंचकावर येऊन बसली… ‘ आज तरी तो यावा ..’ तिचे मन म्हणत होते. तिला तो यावासा वाटत होता पण त्या दिवसापासून तो कधीच आला नव्हता.
तिच्या मनात तो दिवस..दिवस नव्हे ती रात्र वारंवार एखाद्या चलचित्रासारखी तरळून जात होती.
त्यादिवशी नेहमीप्रमाणेच मैफिल मस्त रंगली होती. रसिक तिच्या नृत्य-गायनाचा आस्वाद घेत होतेच पण त्याचबरोबर तिचे आरसपानी सौन्दर्य, कमनीय काया कवेत घेण्याची आस बाळगत डोळ्यांत साठवत होते. तिने भैरवी रागातील ठुमरी गायला सुरवात केली..
*आ जा सावरिया,
रसके भरे तोरे नैन, सावरिया ।
दिन नही चैन मोहें, रात नही निंदिया,
तडपत हूँ बिन रैन, सावरिया ।।
सारी मैफलच मंत्रमुग्ध झालेली. तिने भैरवी घेतलीय याचेही भान कुणाला राहिले नव्हते. सारे भावशब्दांत रंगलेले असतानाच ती मैफलीचा निरोप घेऊन आपल्या खोलीत आली. स्वर थांबले, सतार मूक झाली. हळूहळू एकेकजण भानावर येऊन तृप्त मनाने स्वरांच्या लहरीवर स्वार होत त्या संमोहनातच बाहेर पडू लागला. सारे परतले. दिवे मंद केले गेले. इतकावेळ नृत्य-नादात रमलेली, रुणझुणणारी पैंजणेथकून विसालीी..काही क्षणातच सरल्या मैफिलीचे उदास अस्तित्व बैठकीच्या खोलीत भरून राहिले. थकलेले साजिंदे बाहेर पडले तसे सखीने दार पुढे लोटले, बैठकीतील दिवा मालवला आणि आपल्या खोलीत गेली.
ती रतिक्लांत होऊन एकटीच मंचकावर पहुडली होती. तिच्या खोलीतला प्रकाशही थकल्यासारखा मंद झाला होता. ती स्वतःच्याच विचारात गढून गेली होती. जीव जगवण्यासाठी आपला देह विकावा लागावा, आपल्या चारित्र्याचा असा बाजार मांडायची वेळ आपल्यावर यावी याची खंत एकटेपणात तिच्या मनाला जाळत असायची. स्वतःच्या विचारात असताना तिला कुणाची तरी चाहूल लागली तशी तीखोलीच्या दाराशी आली. समोरून अंधारातून कुणीतरी येत होते. तिला आश्चर्य वाटलं. ही वेळ कुणी येण्याची नव्हती. तन-मन तृप्तीच्या नशेत परत जाण्याची होती. तो समोर आला. नवख्यासारखा बुजलेला… ती त्याला धीर येण्यासाठी छानशी हसली.
तो काहीसा दबकतच तिच्याजवळ आला आणि म्हणाला,
” माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,राणी…”
कमलदलासारखे ओठ जरासे विलगून ती हसली. अनेकजण तिला असेच म्हणायचे, अजूनही म्हणतात. अगदी सुरवातीच्या काळात तिला ते खरं वाटायचं, मन फुलून यायचं. पण नंतर मात्र तिला त्या वाक्याचा अर्थ मनाशी, हृदयाशी नसून देहोपभोगाशी आहे हे कळून चुकले होते.
ती हसत म्हणाली,
” थांबा, विडा देते ,तो घ्या आणि उद्या या.. थोडा जास्त दाम घेऊ यान..”
तिने विडा बनवायला पान हातात घेतले आणि वर पाहिलं. तो काही न बोलता झटकन अंधारात विरून जावा तसा गेला होता. काही क्षण ती त्याला इकडे-तिकडे शोधत राहिली. दुसऱ्या दिवशी त्याची वाट पाहिली. वाट पहातच राहिली. तो आलाच नाही.
तिच्या भांग भरल्या मनात, जीवनात तोप्रीतीची तुळस लावून गेला होता. आपण त्याला नीट पाहिलेही नाही ही जाणीव तिच्या मनाला खात राहिली. एकटेपणात त्याच्या शब्दांची, नीट न पाहिलेल्या त्याच,ी आठवण तिला सतावत राहिली. आसावल्या डोळ्यांनी ती त्याची वाट पहायची त्याने, एकदा… एकदा तरे यावे, भेटावे असे तिला वाटत होत.पण तो आलाच नाही.
वर्षे लोटत राहिली पण तो मात्र ध्रुव ताऱ्यासारखा तिच्या मनाकाशात अढळ स्थानी राहिला होता. तो दिवस हाच.. ती सारे काही सोडून याच दिवशी व्रतस्थ राहून त्याची वाट पाहत राहायची.
सखी बोलवायला आली तेंव्हा तिने खोलीचे दार दडपून बंद केले होते पण मनाची दारे मात्र सताड उघडली गेली होती.. फक्त त्याच्यासाठी. फक्त त्याच्यासाठीच तिने विडा बनवला. तो येणार नाही हे जाणवत असूनही ती मंचकावर त्याची वाट पाहत बसली होती.. सारी रात्र ती तशीच त्याची वाट पाहत बसून राहिली होती. आतुर झालेले मन त्याला साद घालत होते.
आन मिलो इकबार सजनवा ।
याद में तोरी रैन बिताई
सून लो जिया की पुकार ।।
तिच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या होत्या.. गालावरून आसवे ओघळत होती.. तिचे आर्त स्वर तिच्या मनात आणि खोलीत भरून राहिले होते.असा जोगीया कधीच रंगत नव्हता..कधीच रंगला नव्हता.
☆ जीवन रंग ☆ दांपत्य स्वप्न.. अनुवाद ☆ सुश्री सुमती जोशी ☆
एक
सुधीर आला होता. त्याच्या हातात गुलाछडीच्या फुलांचा गुच्छ. चेहऱ्यावर हसरा भाव. पंख पसरून मन जणू उडू उडू पहात होतं.
आल्याबरोबर सुधीर म्हणाला, “हासी, आज एक खुशखबर आहे. काय देशील सांग. नाहीतर सांगणार नाही.”
हासी म्हणाली, “सांगा ना प्लीज.”
“मला काय देशील ते आधी सांग.”
“मी आणखी काय देणार? तुमच्या रुमालावर छान कशिदा काढून देईन. मला एक सुरेख नमुना मिळालाय.”
“नाही, ते मला पसंत नाही.”
“मग काय हवंय तुम्हाला? चॉकलेट आहे. ते देऊ शकेन.”
“चॉकलेट घेऊन संतुष्ट व्हायला मी लहान बाळ आहे का?”
हासी हसू लागली. म्हणाली, “मला ऐकायचं नाही. कशिदा काढून द्यायला तयार होते, चॉकलेट द्यायची इच्छा होती, त्यामुळे जर आपलं…”
सुधीर म्हणाला, “आता मी निघतो.”
हासीनं पुन्हा विचारलं, “सांगत का नाही?”
“एक वस्तू मिळाली तर सांगू शकेन. तीच, जी त्या दिवशी मागितली होती.” असं म्हणून अर्थपूर्ण नजरेनं तो हासीकडे बघू लागला.
हासी लाजली पण तिने सावरून घेतलं. म्हणाली, “आपल्याला सांगून ठेवतेय, ते जमणार नाही.”
सुधीरच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर तिला भीती वाटली. सुधीर म्हणत होता, “मला वाटलं होतं हसत हसत मी बातमी सांगेन. पण जमलं नाही. मला क्षमा करा. तुझं लग्न साँतरागाछीच्या त्या तरुणाशी ठरलाय.”
असं सांगून सुधीर निघून गेला.
हासीनं पुन्हा हाक मारली, “सुधीरदा ऐकून जा.”
सुधीर परत आला नाही.
दोंन
अलका आलीय.
तीच अलका जिला भेटण्यासाठी अजय दिवसभर वाट बघत राही – केव्हा संध्याकाळ होईल आणि ती येईल!
अलका येऊन म्हणाली, “अजयदा इंग्लिशमध्ये ‘पेट’ या नावाची एखादी कथा आहे का?”
अजय म्हणाला, “आहे. पेट म्हणजे माथा.”
“खरं आहे का हे?”
“डिक्शनरी काढून बघ. पेट म्हणजे माथा.”
“आमची वरुणादी बरोबर सांगतेय ना!”
अजय म्हणाला, “ठीक आहे, मुंडकं याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?”
अलका डोळे मिचकावत म्हणाली, “हेड.”
“हेड म्हणजे माथा.”
“मुंडकं म्हणजेही माथा.”
अजय हसून म्हणाला, “हेच का तुझं बांगला भाषेचं ज्ञान! माथा आणि मुंडकं म्हणजे एकच वस्तू!”
अलकानं हसून विचारलं, “फरक काय?”
गंभीर होत अजय म्हणाला, “तुझ्यात आणि पाँची धोपानी यांच्यात काही फरक आहे का सांग पाहू. दोघीही मुलीच आहेत.”
अलका विचारू लागली, “पाँची धोपानी कोण?”
“तुझ्या गल्लीच्या वळणावर धोब्याची मुलगी आहे ना! लहान वयाची – तुझ्याच वयाची असेल.”
मी आशा बाळगून होते कधीतरी दयाळची माणसं येतील .जीकेला सामानासकट रस्त्यावर आणतील.
त्यांना घाबरुन जीकेची दातखीळ बसेल.तो लोटांगण घालुन पपांची माफी मागेल.
पण धक्का यालाही बसायचा होता…
दयाळच्या वेटींग हाॅलमधे मी बराच वेळ बसुन होते.
दुसर्या दिवशी केस होती .कुणापुढे होती ते सांगायचं होतं.आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच.
तिथे अनेक लोक होते. क्षणभर वाटलं आपण यातले नाही.. का आलो आपण इकडे..?
भेटीची ठरवलेली वेळ उलटून गेली होती. मी आल्याची सूचनाही आत गेली होती.तरी इतका वेळ?
बेचैनी उदासी ताण वाढत होता.क्षणभर वाटलं,दार ढकलुन आत जावं…
अन् तेव्हढ्यात..
चक्क जीकेच आतून बाहेर आले.तेही रूबाबात.
त्यांनी मला पाहिलही पण दुर्लक्ष केलं.ते दयाळच्या माणसांशी लगटीने बोलत होते.जणु ही सारी माणसं त्यांच्या किती जवळची आहेत हे जाणूनबुजुन मला दाखवत होते…
मी आजारी असताना मला स्वत: डाॅक्टरकडे घेउन जाणारे, हाॅस्पीटलमधे रोज फुलं घेउन येणारे हे जीके…
आणि बंद दारापलिकडचा माझा बालमित्र दयाळ.
कोण खरं? कोण खोटं? कोण आपलं? कोण परकं..?
हे शहाणपण आपल्याला मिळवता आलं नाही याची खूप खंत वाटली.. सत्य श्रद्धा निष्ठा भावना चारित्र्य नीति हे सारं किती बेगडी आहे ..कांटेरी कुंपण आहे भोवती. कसे जाणार आपण या पलिकडे..
काळ वहात राहिला.सत्याला एका किनार्यावर ठेवून.
“कर्माची फळे याच जन्मी फेडावी लागतात…!!”
अक्षरे. वाळुतली.
पपा गेले. जीजीही गेली.पापांच्या पाचपाखाडीच्या प्राॅपर्टीवर जीके सौख्यभरे नांदताहेत.
दयाळचाही गूढ मृत्यु झाला.अपघात की खून…? सत्य बाहेर आलेच नाही…
अशाच सुन्न क्षणी,माझंही जीवन निवृत्तीच्या वाटेवरच आता..
मीनाचा फोन आला.
“अग! परवा जीके आले होते…”
पपांच्या अंत्यदर्शनाला जीके आले असताना याच मीनाने दु:खाच्या आवेगात त्यांना अक्षरश: हकलवुन लावले होते..!!
“आता काय हवंय् त्यांना?”
“अग! आईजवळ बसले..खूप रडले .मी माझा चांगला मित्र गमावला…”वगैरे बरच बोलत होते.”
“काही खरं नाही .जीके म्हणजे सापाची जात..आईला म्हणाव काही विश्वास ठेवु नकोस ..”
“अग! ऐक तर खरं..”
नंतर जीके खूप डबघाईला आले..धंदा बुडाला. देणी थकली.मुलीनं आत्महत्या केली.मुलगा विचारत नाही,.
सुन शिव्या देते…”
“मग..भोग म्हणाव कर्माची फळे आता..”
“त्याने एक प्रस्ताव आणलाय. दहा लाख रुपये मागतोय् तो..सर्व रिकामं करुन निघुन जाणार आहे..”
“पण आई कुठून देणार दहा लाख?चोर..घुसखोर..वरुन आपणच पैसे द्यायचे? हा कुठला न्याय?”
“अजय म्हणतोय् ही प्राॅपर्टी आता कमर्शीयल एरीयात येते.विकली तर जबरदस्त किंमत येईल..आईही म्हणतेय्
तिच्याही आयुष्याची किती वर्षे राहिली आहेत.!
या कोर्ट कचेर्या किती वर्षे चालणार ..सगळीच अनिश्चितता! अशा पद्धतीने जर मिटत असेल हे प्रकरण
तर संपवा हे सारं…”
मीना बरंच पटवत होती.
मला पटत होतं म्हणण्यापेक्षा वैचारिक बैठक बदलणं
क्रमप्राप्त होतं…
किंतु होतेच.
हे तरी कशावरुन खरे?
ही नवी फसवणुक कशावरुन नसेल..
आणि समजा नसली तर सत्याचा विजय झाला असे म्हणायचे का?जीकेला जे क्लेश भोगावे लागले ती त्याच्या गुन्ह्याची मिळालेली शिक्षा का?
मग कुठलाच गुन्हा न केलेल्या,संस्कृतीच्या नीतीच्या तत्वांच्या वर्तुळात असलेल्या आपल्याला ही इतकी वर्षे
मन:स्तापाची शिक्षा का झाली…?
पपा एकदा म्हणाले होते..”जीके माझा मागच्या जन्मीचा घेणेकरी आहे….”
वाटा वेगळ्या झाल्या. कळलेही नाही. एकेकाळचा मळक्या कपड्यातला, अर्धी चड्डी घालणारा ,गोट्या खेळणारा दयाळ एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष होतो काय, वेगवेगळ्या ऊलाढालीतून प्रचंड वृत्तपत्रीय प्रसिद्धी मिळवून एका मोट्ठ्या जनसमुदायाचा विश्वासार्ह नेता होतो काय..सगळंच अकल्पित..!
कित्येक वर्षांनी मी त्या गल्लीत जात होते…आपलं जुनं बालपणीचं नंतर कुणालातरी विकलेलं घर या निमीत्ताने पहायला मिळेल याची सुप्त ओढही होती.
पण ती गल्ली, अवतीभवतीचा परिसर परिसर पूर्ण बदलला होता.ओळखीच्या काहीच खुणा ऊरल्या नव्हत्या. दयाळचे चाळवजा घरही पार बदललं होतं..
तिथे एक इमारत उभी राहिली होती.एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाचा नवा दिमाखदार चेहरा त्याला लाभला होता.
दयाळला मी बदलेल्या रुपात पाहण्याचा प्रयत्न करत होते!!
एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं.दयाळनं मला चटकओळखलं.
निवांत वेळ दिला. बाळपणीच्या आठवणींनी दोघही मोहरलो…
मग म्हणाला,
“बोल आता काय सेवा करु तुझी?..”
मग मी त्याला माझ्या येण्याचा उद्देश सांगितला.
घडलेली सगळी घटना सविस्तरपणे कथन केली.
त्याने शांतपणे ऐकून घेतली.म्हणाला,
“पपांसारख्या व्यक्तिच्या बाबतीत असे घडायला नको होते.किती सच्च्या दिलाचे तत्वनिष्ठ सरळ रोखठोक!! खूप आदर आहे माझ्या मनात त्यांच्याबद्दल…”
“दयाळ यातून काही मार्ग निघेल का?”
“निघेल ना! जीकेसारख्या माणसाला समज देउन सर्वसामानासह रस्त्यावर आणणं तसं आम्हाला काहीच कठिण नाही..”
“मग कर ना तसेच…”
“हो! करुच ग तेही. पण थोडे दिवस जाउदेत. कोर्टात दाखल केलेली केस कुणाच्या न्यायालयात ऊभी राहते ते बघू. सगळे लोक आपल्या हातातले आहेत .निकाल आपल्याच बाजुने लागेल. नाहीतर अखेर आमचे मार्ग आहेतच. तू नको काळजी करूस. ही समस्या माझ्याच घरची…आता..”
दयाळकडुन परतताना मी थोडीशी “ना इथे ना तिथे.” या मन:स्थितीत होतेच….
दयाळचं अश्वासन मला आशावादी बनवत होतं!
खरं म्हणजे सरळ मार्गाने. खाचखळगे टाळून जगणारी आपण माणसं. गुंडगिरी, दादागिरी, दडपशाही हे काही आपल्या जगण्याचे घटक नाहीत.पण कुणीतरी आपल्यासाठी परस्पर हे करणार आहे आणि तेही केवळ आपल्या मैत्रीखातर या जाणीवेनं मला कुठेतरी सुरक्षित
वाटत होतं. दुनियेत टिकून रहायचं असेल तर कधीतरी हाही पर्याय स्वीकारावा लागतो असे स्वत:चीच समजुत घालणारे विचार मनात गर्दी करु लागले होते….
दयाळच्या भेटीचा सर्व वृत्तांत मी पपांना सांगितला.
त्यांची प्रतिक्रिया शून्य…
जीजी म्हणाली “याची जन्मी भोगेल तो…”
त्यानंतर मी वेळोवेळी दयाळला फोन केले. तो व्यस्तच असायचा. म्हणायचा “मी करतो तुला दहा मिनीटात फोन…”
दहा मिनीटांनी दयाळ कुठल्या मीटींगमधे अडकलेला असायचा.. नाहीतर एखाद्या खेड्यावर निघुन गेलेला असायचा. कुठे दंगली, मारामार्या राजकीय, पक्षीय पेच सोडवण्यात तो गुंतलेला असायचा.
आणि त्याने म्हटल्याप्रमाणे त्याने मानल्या प्रमाणे त्याची ही घरचीच समस्या सोडवायला त्याला वेळच नव्हता……….
लहानपणचा गोट्या खेळणारा, मळक्या चड्डीतला माझ्याबरोबर कधी भांडणारा, कधी मजेत
भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाणारा दयाळ आता बदलला होता… हे जाणवत होतं..
आपलं राजकारणातलं ज्ञान पेपर वाचण्यापूर्त..
प्रत्यक्षात एखादी राजकीय व्यक्ती खरोखरच जनतेसाठी किती असते.. किती खरी असते, किती खोटी असते याचा अनुभवच नसतो….