मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – विचार … भावानुवाद ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग : लघुकथा – विचार … भावानुवाद ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

गीताताई मला मोठ्या बहिणीसारखी होती. तिचे यजमान वारले तेव्हा मी परदेशात होतो. पुढचं एक वर्षही मी स्वदेशी येऊ शकलो नाही. आता मात्र आल्याबरोबर मी तिला भेटण्यासाठी सरळ तिच्या घरी गेलो. ती घरी नव्हती. ती शाळेत गेली आहे असं कळलं तेव्हां मी शाळेत गेलो. ताईच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. उलट तिने माझं हसतमुखाने स्वागत केलं, आणि माझी समजूत घातली. “हेबघ, आपण कितीही रडलो तरी तुझे जिजाजी परत येणार नाहीत. मला दुःखी बघून इतरांना वाईटच वाटेल. म्हणून मी स्वतःला गुंतवून घेऊन आनंदी रहाण्याचा प्रयत्न करते. शाळेची प्रगती करण्याचं ध्येय्य मी ठरवलं आहे. मला स्वतः ला मूल नाही, शाळेतल्या विद्यार्थ्यांनाच मी माझी मुलं मानीन आणि शिक्षकपणाचा धर्म प्रत्यक्षात आणीन.

मूळ हिंदी लघुकथा-‘सोच’ – लेखक – डॉ. नरेंद्र नाथ लाहा

मूळ लेखकाचा पत्ता—२७,ललितपुर कॉलोनी, डॉ. पी. एन. लाहा मार्ग, ग्वालियर—म.प्र.-  ४७४००९ मो.९७५३६९८२४०.

मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणूसकीची हार..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ माणूसकीची हार ..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆

चौधरी सगळ्यांना मदत करायचे,  हे सगळ्या कॉलनीत माहीत होतं. मानवता,  सत्य,  ईमानदारी यांची ते जणू प्रतिमूर्तीच होते. त्यांचं घर कोपर्‍यावर होतं. घर दोन्ही बाजूंनी उघडायचं. घराला दोन दरवाजे होते. मागचा दरवाजा आणि एक खिडकी कायम बंद असायची.

ते सुट्टीचे दिवस होते. त्यांची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. सकाळी सकाळी चौधरी म्हशीचं दूध काढून घरात शिरणार, एवढ्यात एक तरुण तिथे धावत धावत आला आणि म्हणाला,  `भाऊसाहेब मला वाचवा. माझ्यामागे चार गुंड लागलेत. मी हात जोडतो. आपले उपकार मी कधीच विसरणार नाही. कृपया मला कुठे तरी लपवून ठेवा.’

`आपण कोण?  कुठून आलात?   प्रकरण काय आहे? ‘

तरुण म्हणाला. मी ड्रायव्हर आहे. त्यांची गाडी एकदम मधे आली. थोडासा अ‍ॅक्सिडेंट झाला.!  बस!’ चौधरींची माणुसकी उफाळून आली. त्यांनी मागे-पुढे काही बघितलं नाही. त्याला घरात लपून बसायला सांगितलं आणि स्वत: दरवाजात उभे राहिले.

थोड्याच वेळात चार गुंड धावत आले. त्यांनी चौधरींना विचारलं, `कुणी तरुण इथे धावत आला होता का? ‘

चौधरी म्हणाले, `इथे कुणीच आलं नाही. सकाळपासून मी इथेच बसलोय. काय झालं?’ तो माणूस अ‍ॅक्सिडेंट करून इथे पळून आलाय. ‘  चौधरींनी माणुसकीची बाजू घेत त्यांना समजावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. `याचे परिणाम वाईट होतील.’  चारी गुंड त्यांना ताकीद देऊन हसत हसत पुढे गेले.

चौधरींनी कुलुप उघडलं आणि ते आत गेले. बघतात तो काय?  गोदरेजचे कपाट,  पेट्या सगळ्यांनी कुलुपे तोडलेली होती. कपडे पसरलेले होते. दागिने, रोख रक्कम गायब झालेली होती. मागचा दरवाजा उघडलेला होता. त्यांनी आपलं डोकं  बडवून घेत म्हंटल,  `हा माणुसकी दाखवल्याचा परिणाम.  काय करणार?  ते पाचही जण एकमेकांना मिळालेले होते. त्यांच्या योजनेपुढे माझी माणुसकी हरली.

 

मूळ कथा – इंसानियत हार गई  मूळ लेखक – शिवचरण सेन शिवा

 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

 

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लोककथा – पिसाची करामत ☆ डॉ.  मंजुषा देशपांडे

☆ जीवनरंग ☆ लोककथा – पिसाची करामत ☆ डॉ.  मंजुषा देशपांडे ☆

एका जंगलात एक आजी आणि तिचा नातू रहात असे.  आजी दिवसभर फिरुन रानातून फळे,  बिया, मूळ्या गोळा करी  आणि थोडे घरासाठी ठेवून बाकीचे जवळच्या गावात विकून टाकी.  तिचा माल शेलका असल्याने लवकर विकला जाई.

तिचा नातू मात्र भयंकर आळशी होता. सूर्य डोक्यावर येईपर्यंत लोळत पडे आणि फारतर जवळपासच्या काटक्या वेचून आणी. दिवसभरही तो उगीचच इकडे तिकडे करी.  जेवायची वेळ झाली की तो आजीला लाडीगोडी लावी.

आजीच काय पण आसपास रहाणारेही त्याला समजावत. त्याने आता कामधंदा केला पाहिजे म्हणून बजावत.

या आजीचे एक छोटेसे शेत होते,  डोंगराच्या पलिकडे आणि ओढ्याळ ओढ्याकाठी… तिथे ती धान आणि कुटकी, डाळी लावे.  तिथे जायचे म्हटलं की मात्र नातवाला उत्साह येई.  त्या दिवशी मात्र तो लवकर उठे आणि लवकर आवरूनही बसे.

तो तिथेही काही कामे करत नसेच पण तिथे त्याची मैत्रीण होती जीवा.  जीवा  अगदी त्याच्या विरूध्द …शहाणी आणि कामसू..

हा नातू लंब्या चवड्या बाता मारी,  तो म्हणायचा.. ‘तो काही हलकीसलकी कामे नाही करणार तर म्हणे तो एकच काम असे करेल की.. ‘ ..मग तो जीवासाठी काळा अबलख घोडा आणेल.  पाटलाच्या वाड्यापेक्षा टोलेजंग घर बांधेल.. जरीकाठी मुंडासे बांधून घुंगराच्या माळा घातलेल्या पांढ-या शुभ्र बैलजोडीच्या गाडीत बसेल.. आणि शेजारी लाडूचे मोठे ताट..असेल.. . मनात येईल तेवढे लाडू खाईल.

एकट्या जीवाचा त्याच्या या असल्या बोलण्यावर विश्वास होता..

बाकी सगळेजण त्याचे बोलणे करमणूकीसाठी ऐकत आणि टाळ्या वाजवून हसत.  त्याला लोक हसतात ते पाहून आजीला वाईट वाटे.

एक दिवस त्याची आजी त्याला खूपच रागवली,  तिने त्याला कामधंदा शोधण्यासाठी घरातून जवळ जवळ हाकलूनच काढले.

नातू हिरमुसून चालायला लागला,  खिशात बोरं होती..  एकेक बोरं खात खात जंगलात निघाला…असं फिरता फिरता उन्हं डोक्यावर आली.  पोटात भूक जाणवायला लागली.

तो थकून एका झाडाखाली मोठ्या दगडावर बसला तितक्यात त्याला..तिथे जवळच एका दुसऱ्या झाडाखाली त्याला एक मोठे निळ्या रंगाचे पीस दिसले.  हात लांबवून त्याने हातात घेतले तर काय… पीस त्याला म्हणाले… “आज दिवसभर चालून कसं वाटतंय तुला, रोज नुसता लोळत पडतोस ते… ” नातू त्याला म्हणाला… ‘एवढी बोलण्याची अक्कल आहे तर मला खायला घेऊन ये काहीतरी.. पीस म्हणाले, काय हवयं सांग,  लगेच आणतो.. नातू म्हणाला, “चार रोट्या आण आणि भाजी आण बरबटीची.”  लगेच ताट हजर.. वर पाण्याचा गडू पण.. नातवाने आजूबाजूला पाहिलं.

मग तो पिसाला म्हणाला… “लाडू आण बरं.”!. थोडे का चांगले ताटभर लाडू आले.

एवढे खाऊन आणि गटागट पाणी पिऊन नातवाला गाढ झोप लागली.

त्याला स्वप्नात त्या पिसाने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या दिसल्या.  त्याला जाग आली तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती.

त्याच्या आजूबाजूला मात्र आणखी  काही निळीभोर पिसे पडली होती. त्याला एकदा वाटले, उचलावी सगळीच.. पण तो आळशी असला तरी लालची नव्हता.. पण त्याचे पीस कसे शोधावे… सगळी पिसे एकसारखीच होती.

मग त्याने त्यातल्या त्यात आठवून एक पीस उचलले आणि भराभर.. जवळ जवळ पळतच घरी पोचला.  घरी आजी काळजी करत होती,  त्याला म्हणाली, “हात पाय धुवून ये गरम भाकरी खायला..”.

तो म्हणाला,  भाकरी!  अगं लाडू,  पुरणपोळी काय हवं ते सांग.

हा नातू गोष्टी मोठ्या छान सांगे.

आजीने काही एक न बोलता एका थाळीत भाकरी आणि भाजी वाढली.  इकडे नातवाने पिसाला सांगितले.. पुरणपोळी,  लाडू आणि पाण्याचा गडू.. एक नाही दोन नाही.. काहीही आले नाही.

तो अगदी रडकुंडीला आला.

आजी म्हणाली, ” अरे तू ते जादूचे पीस समजून दुसरेच पीस घेऊन आला असशील.

त्या रात्री नातवाला कशीतरी झोप लागली. अगदी पहाटे उठून तो परत जंगलात गेला. सगळीकडे फिरूनही पिस काही दिसेना, शेवटी  आदल्या दिवसासारखेच एका झाडाखाली थकून बसल्यावर त्याला ते निळे पिस दिसले.

त्याने त्या पिसाला सगळी कहाणी सांगितली. तो पिसाला म्हणाला, “आता मी तुला माझ्या जवळच ठेवतो बघ.

पीस म्हणाले,” असं नाही चालत! “मला कुणीच पकडून ठेवू शकत नाही. “बाकीच्या पिसातून तुला मला शोधून काढावं लागेल” पण त्या दिवसाचे त्याला जेवण मात्र मिळाले. पण घरी नेण्यासाठी लाडू घ्यावे म्हटले तर ते पिसाबरोबर गायब.

त्याही  संध्याकाळी परत तसेच .झाले.. बघता बघता महिना उलटला.  हा मुलगा महिनाभर रोज पहाटे उठून जंगलात जाई,  मग जाता जाता फळे,  फूले,  बिया गोळा करी,  एकदा तर भलं थोरलं मधमाशांचे पोळेही घेऊन आला. जंगल एवढे देखणे आहे हे त्याला प्रथमच कळले. किती झाडे… किती फळे …किती पक्षी,..  किती प्राणी!

प्रत्येकाच्या नाना त-हा…हळूहळू त्याला प्रत्येक फूला फळाचे उपयोग कळू लागले. रोज दुपारी झोप येईनाशी झाली.  कोणत्या झाडाखाली ते पीस होते हे ही तो विसरून गेला.

आजी मात्र खूश होती.  आळशी नातू सुधारला.

एक दिवस  जंगलातून त्या गावचा राजा चालला होता.  राजाला जंगलात सुंदर फूले दिसली.  राजा स्वतः घोड्यावरून उतरला.

हया मुलाने डोंगरावरून पाहिले..तो ओरडला.. “अहो ती विषारी फूले आहेत…

पण त्याचा आवाज राजाला ऐकायलाच आला नाही. राजाने एक फूल तोडले आणि तो बेशुद्ध  पडला.  राजाबरोबर त्याचे सगळे मंत्रीमंडळ होते पण नेमके राजवैद्य त्या दिवशी आले नव्हते.

हा बाकीच्यांना म्हणाला.. घाबरु नका… त्याने राजाला थोड्या सपाट जागेवर वाळल्या औषधी पानांच्या गादीवर झोपवले. त्याने कसलासा पाला,  मुंगुसाच्या लाळेत मिसळून वाटला आणि त्याचा रस राजाच्या नाकात थेंब थेंब असे सोडत राहिला.

दोन दिवसानंतर राजाला शुध्द आली तोपर्यंत राजवैद्यही तिथे पोचले होते.

सर्वांनी या मुलाचे कौतुक केले.  राजाने मोठे बक्षीस दिलेच आणि राजवैद्यानी तर त्याला त्यांचे सगळे ज्ञान देऊन त्यांचा वारसच ठरवले.

आता तो आळशी राहिला नव्हता. राजवैद्य म्हणून  त्याचा मोठा लौकीक झाला होता.  त्याची सगळी स्वप्ने खरी झाली.

पण अजूनही कधी तो एकटा जंगलात जातो.  तो त्या झाडाखाली बसला की पीस येतेच. पण घरी मात्र जाताना नेमके पीस सापडत नाही..

खरे तर आता तो मुलगा नाही चांगला उंच निंच माणूस आहे.  त्याला आणि जीवाला चार गोड मुले आहेत.. असे एकट्याने उठून जंगलात भटकणे त्याला आता शोभत नाही. पण त्या पिसाचे कुतुहल मात्र त्याला आजही तिथे घेऊन जाते.

पण बहुतेक आजी आणि जीवाला त्याबद्दल माहिती आहे कारण पिसाबद्दल,  तो जेव्हा कळकळीने बोलतो तेव्हा त्या दोघी आपसात डोळे मिचकावून हसतात.

(एका नाॅर्वेजियन लोककथेचा स्वैर अनुवाद)

© डॉ. मंजुषा देशपांडे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सामाजिक दूरी (अंतर) ☆ डॉ. वसुधा गाडगीळ 

डॉ. वसुधा गाडगीळ 

☆ जीवनरंग  ☆ सामाजिक दूरी (अंतर) ☆ डॉ. वसुधा गाडगीळ  ☆

”  वर्तमानपत्रातही आले आहे  , आता सामाजिक रीत्या सर्वांना एकमेकांपासून दूर राहावेच लागणार आहे. कुठेही येणे नको जाणे नको ! आम्हाला सर्वांना घरात कोंडूनच राहावे लागणार. समजलात का ! कसली नातीगोती  आणि कसलेकाय ! ” दिलीपने अख्या कुटुंबाला ही बातमी वाचवून दाखवली आणि तणावाने म्हणाला

” केवढा कठीण काळ आला आहे ! ”

” अगदी सोपे आहे दिलीप ! तुम्ही सगळेजण  एकमेकांबरोबर बसून जेवणखाण करता ना….. मी तर कित्येक वर्षांपासून बाजूच्या पड़वीत एकटा… ”

वडिलांच्या तोंडून सामाजिक दूरीचे उदाहरण ऐकून दिलीप अचंबितच झाला !

 

© डॉ. वसुधा गाडगीळ 

संपर्क –  डॉ. वसुधा गाडगिल  , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.

मोबाईल  – 9406852480

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सुनमुख (भावानुवाद) ☆ सुश्री माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

परिचय 

एम. ए – इंग्रजी, एम. ए. अर्थशास्त्र बी.एड.

हायस्कूल क्लासेस अध्यापिका, कोचिंग क्लासेसमध्ये इंग्लिश बरोबरच कॉर्मसचेही अध्यापन.

वाचन, लेखन, गायन, वत्तृत्व, अभिनय या क्षेत्रांत आवड व सहभाग ज्यासाठी अनेक बक्षिसे.

आकाशवाणी दिल्ली, पणजी (गोवा) औरंगाबाद येथे विविध कार्यक्रमात सहभाग, अयोजन, लेखन, सादरीकरण, ‘साहित्य संपदा’ कार्यक्रमात काव्यवाचन व मुलाखत.

गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र लेखनाबरोबरच अनुवाद क्षेत्रात कार्यरत दै. वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून ललित लेखन, प्रासंगिक, व्यक्ति परिचय, पुस्तक परिचय, कविता प्रकाशित.

स्वलिखित कविता व लेखांवर आधारित कार्यक्रम ‘शब्द सूरांच्या गाठीभेटी’ चे पंधरावर प्रयोग.

‘मंगळागौरीचा जागर’ या कार्यक्रमासाठी सूत्र संचालन व लेखन 150 वर प्रयोग, स्टार-प्रवाह वाहिनीतर्फे कार्यक्रमास प्रथम क्रमांक व इतर ठिकाणीही बक्षिसे.

पहिल्या ‘मराठवाडा लेखिका साहित्य सम्मेलनात’ काव्यवाचन.

उस्मानाबाद येथे मराठवाडा लेखिका साहित्य सम्मेलनात सन्मान.

पहिल्याच अनुवादित पुस्तकाला (माध्यम) केंद्रिय हिंदी निदेशालयाचा उत्कृष्ट अनुवादाचा  (रु. एक लाख) पुरस्कार ज्यासाठी सह्याद्री वाहिनी (मुंबई) व औरंगाबाद दुरदर्शनवर मुलाखत.

☆ जीवनरंग  ☆ सुनमुख श्रीमती माया सुरेश महाजन 

मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. दुसर्‍या दिवशी लक्ष्मीपूजन आणि सुनमुख पहाण्याचा कार्यक्रम होणार होता. सगळ्या नातेवाईकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. की सासूबाई सुनमुख पाहाण्यासाठी आपल्या सुनेला काय देतील?

सुनबाई जेव्हा तयार होऊन आली आणि सासूबाईंच्या पाया पडली, तेव्हा सासूबाईंनी मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला; नंतर विचारले, ‘‘सुनबाई, तुला काय हवे?’’

‘‘सुनबाई, आज तर तुझा हक्काचा दिवस आहे. चांगले छान जडावाचे तोडे मागून घे.’’ एका नातेवाईकाने सुचविले.

‘‘अरे नाही, हिर्‍याचे नेकलेस मागून घे.’’ दुसर्‍याने सांगितले, थट्टा मस्करी सुरू झाली. तिसर्‍याने म्हटले, स्वत:साठी गाडी मागून घ्या. नवरीदेखील इतरांबरोबर मंद स्मित करत होती आणि सासूसुद्धा पण सासूच्या मनात मात्र धडधड सुरू झाली की नातेवाईकांच्या सांगण्यावरून सून खरोखरीच एखादी अशी मागणी न करो जी आपल्याला पूर्ण करता येणार नाही. मग सासुने म्हटले, ‘‘हं सुनबाई, बोल, काय हवं तुला?’’

‘सासुबाई नव्हे आई! मी खूप लहान असतानाच माझे वडील वारले. वडिलांचे प्रेम काय असते ते कधी अनुभवलेच नाही. आईनेच आम्हा दोघी बहिणींचे पालन-पोषण केले, मोठे केले. माझी अशी इच्छा आहे की, तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासोबतच मला मामंजीचे नव्हे,  बाबांचेही प्रेम मिळावे, जेणेकरुन मला वडिलांच्या प्रेमाची अनुभूती येईल. आणखी काही नको मला!’ सुनेनं मोठ्या विनम्रतेने म्हटले. सगळ्या नातेवाईकांच्या नजरेत सुनेबद्दल स्तुतीचे भाव दिसू लागले. सासुने सुनेच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या मस्तकाचे चुंबन घेतले आणि तिला आपल्या मिठीत घेतले.

 

मूळ हिंदी कथा – मुंह दिखाई  – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धोका ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

श्री भगवान वैद्य प्रखर

☆ जीवनरंग : लघुकथा : धोका –  श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆

मोबाइल वाजला. घरात पोछा लावित असलेल्या बाईनी मोबाइल उचलला आणि घाई-घाईत चालत जाऊन बाहेर झाडांना पाणी देत असलेल्या वयस्क गृहस्थांना म्हणाली, ‘‘बाबूजी…फोन…!’’

वयस्क गृहस्थ अलजाइमरनी आजारी.  थरथरत्या हातात फोन घेऊन नांव बघू लागले. नंतर संयमी स्वरांत बोलू लागले, ‘‘हैलो…हैलो…हैलो…आवाज येत नाही आहे…।’’

तिकडून पुन्हा आवाज आला, ‘‘हैलो…हैलो…बाबा…! तुम्ही लोकं घरी आहात काय बाबा…! हैलो…हैलो…बाबा…माझी घरी यायची इच्छा आहे बाबा…’’ उत्तराखातर वयस्क गृहस्थ फक्त हैलो…हैलो…हैलो करीत राहीले. ‘‘हैलो…हैलो…मला कांहीच ऐकायला येत नाही आहे…हैलो…!’’ आणि वयस्क   गहस्थानी मोबाइल बंद करुन टाकला.

थोड्या वेळानी पुन्हा बेल वाजली. वयस्क व्यक्तिने नाव वाचले आणि स्वत: बंद होईपर्यंत बेल वाजू दिली.

‘‘आवाज तर येत होता. स्पीकर सुरु होता न! मी ऐकला. अनुरागचाच आवाज होता. तो घरी येतो म्हणतो. तिथे कोणत्या परिस्थितीत आहे आपला मुलगा कोण जाणे? …तुम्ही असं कां बरं केलं?’’ शेजारी मनी-प्लांट सावरत असलेली वयस्क स्त्री जवळ येऊन उभी झाली होती.

‘‘गौरी…पंचायतीनं कालच निर्णय घेतला आहे की जो पर्यंत हे कोरोना वायरस संपत नाही तोवर बाहेरुन कोणालाच गावांत येऊ दिलं जाणार नाही. आपला मुलगा ज्या शहरात आहे तिथे सर्वात जास्त केसेस पॉजिटिव निघालेल्या आहेत. अशा स्थितित त्याचे इथे येणे संपूर्ण गावाकरिता धोक्याचे ठरू शकते. ’’

‘‘आणि त्याचे तिथेच राहणे..?’’ थरथरत्या आवाजात एक प्रश्न हवेत गुंजारव करित राहीला.

वयस्क गृहस्थानी ऐकले खरे पण कांहीच उत्तर दिले नाही. बंडी च्या खिशातून एक रुमाल काढला आणि बाहेर आलेल्या अश्रुंना वाट मोकळी करुन देत पुन: झाडांकडे वळले.

© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

संपर्क : मो. 9422856767, 8971063051  * E-mail[email protected] *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गणपतीबाप्पा,उंदीर आणि चांदोबा.. ☆ सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी

सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी

शिक्षण:M.Sc.B.ed.

अनुभव: २० वर्षे ज्युनिअर कॉलेज ला अध्यापक, मेडिकल एन्ट्रन्स परीक्षा कोचिंग

वाचन व लिखाणाची आवड, दिवाळी अंकात प्रसिद्ध

कोल्हापूर आकाशवाणी वर प्रसारित

☆ जीवनरंग : गणपती बाप्पा , उंदीर आणि चांदोबा सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी

आजी गोष्ट सांगत होती. अमेय समरसून ती ऐकत होता.

‘एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून फिरायाला निघाले होते. त्यांना पाहून च्ंद्राला हसू आवरेना….’ इटुकल्या पिटुकल्या उंदरावर बसलेले तुंदीलतनु गणपती बाप्पा डोळ्यापुढे येताच अमेयही हसू लागला.

‘दात काढू नकोस. चंद्राने दात काढले, म्हणून गणपती बाप्पा त्याला रागावले आणि शाप दिला’ आजी पुढे गोष्ट सांगू लागली.

गोष्ट ऐकता ऐकता त्याला एकदम आठवलं, आई म्हणते, गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. सकळ जगाचं ज्ञान त्यांच्या ठायी आहे.

बाबा म्हणतात, कॉम्प्युटरच्या मेमरीत सर्व जगाच्या ज्ञानाचा साठा आहे. माऊसच्या एका क्लिकवर तो आपल्याला खुला होतो.

अमेय विचार करू लागला. म्हणजे… म्हणजे… जगातले सगळे कॉम्प्युटर म्हणजे गणपती बाप्पाच झाले की! आणि त्यांना चालवणारे माऊस म्हणजे उंदीरच. मग इतके सगळे गणपती बाप्पा पाहून चांदोबा कुणाकुणाला हसेल? इतक हसला तर त्याचं पोट नाही दुखणार? आणि हसून हसून दात नुसते दुखणारच नाहीत, तर सैल होऊन खाली पडतील. मग तो तूप रोटी कशी खाईल? मग कोजागिरीच्या दुधावरच त्याला संतुष्ट व्हावं लागेल!‘  या सगळ्या आपल्या कल्पनेचं त्याचं त्यालाच हसू आलं.

‘अरे, झालं काय तुला हसायला?’ आजी विचारात होती, पण आपली कल्पना आईला सांगायला अमेय स्वैपाकघरात पळालादेखील.

 

© सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी

मो. – 9665669148

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अग्नी -पद्मिनी ☆ सौ.डाॅ. मेधा फणसळकर

☆ इंद्रधनुष्य : अग्नी -पद्मिनी ☆ सौ. डाॅ. मेधा फणसळकर 

हे अग्निदेवा, तुझ्याच साक्षीने सात फेरे घेऊन मी विवाहबंधनात अडकले. अतिशय पराक्रमी “राजा रतनसिंह” यांची पत्नी म्हणून   चितोड साम्राज्याची “राणी पद्मिनी” झाले.मी इकडे आले त्यावेळी तुझ्या असंख्य ज्योतीनी औक्षण करताना तू मला माझ्या मातेची आठवण करुन दिलीस आणि जणू काही माहेरहून आलेला माझा सखाच असल्यासारखा तू मला वाटलास. मग ठायी ठायी मी तुला शोधू लागले आणि तुझ्या दर्शनाने सुखावू लागले.

राजवाड्यातील देवघरातील समईच्या ज्योतीत प्रकाशित होणाऱ्या तुझ्या सान्निध्यात परमेश्वराची आराधना करताना मन प्रसन्न होत होते.

शयनगृहातील तुझ्या मंद प्रकाशाच्या साथीने आम्ही पती-पत्नी एकरुप झालो आणिआमच्या उभयतांच्या प्रेमाचा तू साक्षीदार झालास.

दिवाळीत तुझ्या लक्ष लक्ष  पणत्यांच्या उजेडाच्या नक्षीकामाने चितोड  गड न्हाऊ लागला.गडावरील दारुकाम बघताना तुझी असंख्य रुपे मनामनात उत्साहाचे दीप पेटवू लागले.

पाकगृहात तर तुझेच साम्राज्य!सर्वांना चवीचे खाऊ घालणे तुझ्याशिवाय अशक्य होते.उत्सवाच्या वेळी तर एकावर एक उठणाऱ्या पंक्ती आणि चुलीखाली सुरू असणारे तुझे सततचे नर्तन नवनवीन पदार्थाना जन्म देत होते आणि खवय्यांची रसना तृप्त करत होते.

दीपदानाच्या उत्सवाच्या  वेळी  हलक्या हलक्या लाटांवर तुला अल्लदपणे झोके घेताना बघून मन प्रफुल्लित होत होते.जणू काही संपूर्ण जलदेवतेने लखलखणाऱ्या अग्नीचे वस्त्र पांघरले आहे असे वाटत असे.

युद्धाला निघालेल्या आणि युद्ध जिंकून आलेल्या पतीला ओवाळताना निरांजनाची वात पेटवणारा तू माझ्या मनातही अभिमानाचे, शौर्याचे आणि धैर्याचे बीज पेटवत होतास.तुझ्या सान्निध्याने मी आश्वस्त होत होते.

मात्र आज अल्लाउद्दीन खिलजीसारख्या बलाढ्य योद्द्यांशी लढताना माझ्या पराक्रमी पतीने वीरमरण पत्करले आहे आणि त्या नराधमाची माझ्यावर नजर पडली आहे.चितोडसह माझाही घास घेण्यासाठी तो इकडेच येत आहे. हे अग्निदेवा,वेगवेगळ्या रुपात सतत माझ्याबरोबर असणाऱ्या तुला मी माझा पाठीराखाच मानते. तुला सोडून मी कोणाला बरे शरण जाणार? माझे किंबहुना आम्हा सर्वांचे रक्षण करण्यासाठी माझ्या सर्व सख्यांसह मी तुझ्या आश्रयाला आले आहे.आतापर्यंत जशी साथ दिलीस तशीच साथ दे आणि आमचे रक्षण कर.

 

© सौ. डाॅ. मेधा फणसळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

शिक्षण- B.A B.Com शालेय शिक्षण ज्युबिली कन्या शाळा मिरज, महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालय

छंद- वाचन, लिखाण, शिवण मैदानी खेळात (खोखो, कबड्डी, ऍथलेटिक्‍स, अनेक बक्षिसे एक वर्ष विलिंग्डन जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड)

पुरस्कार- १) कौशिक प्रकाशन सातारा २) मराठी विज्ञान परिषद इस्लामपूर  ३) ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी ४) रामकृष्ण मिशन

आणखी बरेच लहान-मोठे निबंधातील पुरस्कार (सकाळच्या मुक्तपीठ स्मार्ट सोबती मध्ये आलेले लेख, राष्ट्रसेविका समितीच्या हस्तलिखितासाठी गेली पाच वर्षे लेखकांची निवड, नवरत्न नाथ नगरी दिवाळी अंकांमधून आलेले लेख)

☆ मनमंजुषेतून : मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

आम्ही शेतात रहात असल्यामुळे साप, विंचू, चोर यांच्यापासून रक्षण होण्यासाठी कुत्र्याची गरज होती. योगायोगाने सुंदर ठुसक्या बांधण्याची, पिवळे ठिपके असलेली कुत्री कुठून तरी अचानक आली आणि आमची होऊन राहिली. नामकरण झालं पिंकी. टॉमी कुत्रा आणि पिंकी परिसराचे राखण छान करायचे. आमच्या लहान मुलांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते आणि आणि ते दोघे मिळवून मुलांना छान सांभाळायचे. आता पिंकी छान रुळली होती. आता तिला पहिल्यांदाच पिल्लं होणार म्हणून तिची बडदास्त चालली होती. लवकरच तिला दहा पिल्ल झाली. अगदी गोंडस पिल! त्यांच्यासाठी एक छोटसं घर तयार केलं. बाळंतिणीची व्यवस्थाही छान चालली होती. पिंकी  बाहेरून आली की पिल्ले धावत जाऊन पिण्यासाठी तिला झुंबा याची. एक दिवस अचानक पिंकी गायब झाली. खूप शोध घेतला, पण नाही कुठेच नाही. पिल्लांना आम्ही खाऊ घालून वाढवत होतो. एके दिवशी अचानक दुपारी एका कुत्र्याचा आक्रोश ऐकायला आला. पिंकीचा होता तो आक्रोश. पोट खपाटीला अंगावर गोमाशा, गळ्यात नायलॉन च्या कुरतडून तोडलेल्या दोरीचा थोटुक अशी अवस्था पाहिली आणि खात्री पटली की तिला कोणीतरी पळवून नेल होत. दुरून आल्याने ती धापा टाकीत होती. पिलांच्या जवळ जात होती. पिल तोपर्यंत आईला विसरली होती. तिचा रागरंग बघून पिल्ल दूर जायला लागली. रात्री बाळासाठी कडा उतरून येणारी हिरकणी मला आठवली. आम्ही पिंकीला खायला देत होतो, जवळ घेत होतो. पण तिला फक्त पिल जवळ हवी होती. मी एक आई असल्याने मला कल्पना सुचली. दोन  पिलांना उचलून तिच्या पोटाजवळ नेल आणि (अहो आश्चर्यम्) पिलानी आईला ओळखलं. माया, वात्सल्य, प्रेम, करुणा, अत्यानंद सगळ्या भावना ओसंडून वहायला लागल्या. बिन दुधाची कोरडीच, पण सगळ्या भावनांनी तट्ट भरलेली आचळ पिल्ल चुकू चुकू ओढायला लागली. मोकळ्या पोटी प्रेमाचा पान्हा फुटला होता. आता पुन्हा ती पिलां बरोबर आपल्या घरात रहायला लागली. पिल्ल मोठी झाली. त्यांचा सर्वांना जीव लागला होता. चांगलं घर बघून, त्यांना ओवाळून, ‘नीट सांभाळा हो’ असो सांगून हळूहळू दिली गेली. प्रत्येक पिल्लू देताना डोळ्यात पाणी उभ रहायचं पण कुठंतरी भावनांवर नियंत्रण ठेवायला हवच ना! मातृ मंदिरात पिंकी एकटीच राहिली. दिवस रहात नाहीत.

आता टॉमी आणि पिंकी दोघेही म्हातारे झाले. टॉमी कॅन्सर होऊन देवाघरी गेला. दोघांनीही आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. न फिटणारे. आता पिंकीचे ही खाणेपिणे कमी झाले. तिला डोळ्याला ही कमी दिसायला लागले. तिचे हाल होऊ नयेत, अशी आम्ही रोज प्रार्थना करीत होतो. दिवाळीचा आनंद सर्वांना मिळवून दिलान. दिवाळीतला लाडू खाल्लान. आणि दुसरे दिवशी सकाळी शांत पणाने प्राण सोडलान.

मातृमंदिर ओसाड झालं. मोकळं झालं. तेथेच तिची उत्तरक्रिया करून वर चाफ्या च झाड लावलं आणि त्या झाडावर पाटी लावली “मातृमंदिर”

 

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निष्ठा..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग : निष्ठा..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

आपल्या समाजसेवा अरणार्‍या पत्नीमुळे पतीदेव जाम वैतागले होते. वेळी-अवेळी ऑफीसमधून घरी यायचे, तर घराला आपलं कुलूप. किती तरी वेळा घराला कुलूप असल्यामुळे मित्रांच्या समोर त्यांना लज्जित व्हावं लागलं होतं. एके दिवशी अगदी दृढपणेत्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं , ‘समाजसेवेच्या निमित्ताने कुठे कुठे भटकत असतेस कुणास ठाऊक? आजपासून तुझं घराबाहेर जाणं बंद.’

पत्नीने कुठल्याही प्रकारे वाद न घालता मान हलवून मूक संमती दिली. दोन –  तीन दिवसांनंतर एकदा त्यांची सेक्रेटरी कुठल्या तरी गाण्याच्या धूनवर मान हलवताना त्यांना दिसली. त्यांना एकदम पत्नीच्या मौन स्वीकृतीची आठवण झाली.. तत्काल त्यांनी काम थांबवलं आणि खरं काय आहे, ते जाणून घेण्यासाठी ते अचानक घरी आले.

घरात त्यांना जे दिसलं, ते पाहून त्यांचे डोळे जसे फाटलेच. घरात पाच – सहा गरिबाची, फाटक्या-तुटक्या कपड्यातील घाणेरडी वाटणारी मुले पाटी आणि पेन्सील घेऊन बसली होती. त्यांची पत्नी त्यांना आकडे मोजायला शिकवत होती आणि ती मुले तन्मयतेने शिकत होती.

 

मूल कथा – निष्ठा   मूळ – लेखिका – हंसा दीप

[email protected]

1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON-M2N2W7 Canada

+647 213 1817

 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print