मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंदरजित सिंह की दुकान – ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

इंदरजित सिंह की दुकान  ☆ डॉ. जयंत गुजराती

गेली तीस वर्षे मी हेच नाव वाचत आलोय, इंदरजित सिंह की दुकान, मोठ्या ठळक अक्षरात ते लिहीलेले. दुकानावरच्या पत्र्याला गंज चढलाय, पण त्यावरील अक्षरे अजूनही मिरवतात स्वतःला ठळकपणे. दुकानाच्या मालकाने स्वतःचेच नाव दिलंय दुकानाला त्याचं अप्रूप नवख्यांना बरेच दिवस पुरतं, मात्र एकदा दुकानाची सवय झाली की तो दुकानाच्या प्रेमातच पडतो.

काय नसतं या इंदरजितच्या दुकानात? रोजच्या वापरातील वस्तुंचा खचच पडलाय म्हणाना! शाळेत जाणाऱ्या मुलाने खोडरब्बर मागितलं तर मिळेल. घरातील बल्ब उडालाय तर तोही मिळेल. कुणा षौकिनाने टाय मागितली की तीही हजर. स्त्रियांच्या मेकप सामानाचे तर ते माहेरघरच. मागाल ते मिळेल ही पाटीच दर्शनी भागात! दुकान तसं छोटंसंच. पण कॉलनींच्या नाक्यावरचं. होय, तीन कॉलनी एकत्र होतील अशा हमरस्त्यावरचं दुकान. लंबचौरस आत आत जाणारं. दुकानात शॉकेसेसची भरमार, शिवाय लहानमोठे कप्पेच कप्पे. सगळं ठासून भरलेलं. वरती पोटमाळा. तोही मालाने खचाखच भरलेला. इतकं असूनही इंदरजितने दुकान नीटनेटकं छानपैकी सजवलेलं. काहीही ओबडधोबड, अस्ताव्यस्त वा गबाळं दिसणार नाही. अधिकचा फॅन्सीपणा न करता आकर्षक मांडणी कशी करावी हे इंदरजितकडून शिकावं! गेली तीस वर्षे हे मी पाहत आलोय. इंदरजित एकदा ओळखीचा झाला की त्याला दुकानात पाऊल टाकल्या बरोबर सांगावसं वाटणारच की ‘दिल जीत लिया!’

दुकान उघडलं की सकाळपासून जे त्याचं बोलणं सुरू होतं ते रात्री दुकान वाढवेपर्यंत. तो शिकलेला किती हे आजतागायत कुणालाही ठाऊक नाही पण त्याच्या जीभेवर सरस्वती नाचते हेच खरं! सकाळीस वाहे गुरूची अरदास म्हणत तो दिवसाची सुरूवात करतो व जसजसे गिऱ्हाईक येईल तसा तो खुलत जातो. कोणत्याही वयाचं गिऱ्हाईक येवो, महिला असो, पुरूष असो, मूल असो वा युवा वृद्ध कोणीही, त्याला विषयांचं वावडं नव्हतं. इतक्या गोष्टी होत्या ना त्याच्याकडे. किस्से तर त्याच्या तोंडूनच ऐकावेत इतके मजेशीर असायचे. त्याचं मधाळ बोलणं व हसतमुख चेहेरा हे वेगळंच रसायन होतं.

आलेल्या गिऱ्हाईकांना हातचं जाऊ न देता आपलंसं करण्याचं त्याचं कसब वादातीत. माझ्यासाठी तो इंदर कधी झाला हे मलाही कळलं नाही. दिवसभरात दुकानात जाणं झालं नाही तर संध्याकाळी काही वेळेसाठी का होईना त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नसे. क्वचित तेही घडायचं नाही तर येताजाता हात उंचावून रस्त्यावरूनच ख्यालीखुशालीची देवघेव होत असे. हे इतकं सवयीचं होऊन गेलं होतं की घरी गेल्यावर बायको हमखास विचारायची, “इंदरला भेटून आलात की नाही?”

फाळणीच्या वेळेस त्याचे वडील आपलं घरदार पाकिस्तानात सोडून नेसत्या वस्त्रानिशी भारतात आले. पंजाबमधे बस्तान बसवलं. मुलं मोठी केली. त्यातला हा इंदरजित. फाळणीची जखम खोलवर वडिलांकडून इंदरजितने उसनवारी वर घेतली. फाळणीचे किस्से ऐकून ऐकूनच लहानाचे मोठे झालो हे तो दर्दभरल्या आवाजात सांगायचा तेव्हा आपलं ही काळीज तुटेल की काय ही भीति वाटायची. पंजाबी, हिंदी उर्दूवर त्याची हुकूमत होती. शेरोशायरी हे जीव की प्राण. जर त्याने दुकानदारी केली नसती तर तो उत्तम कवी लेखक झाला असता इतकी त्याची जाण.

पन्नाशी उलटली पण त्याचा रंगेल व मिश्कील स्वभाव काही बदलला नाही. तसा तो होता मोना शीख. गुरूद्वारात मथ्था टेकण्यासाठी नेहेमीच जात असे. प्रसंगी कारसेवाही करायचा. इंदरजितला जे खरोखर ओळखत होते त्यांना तो कौतुक मिश्रित कोडंच वाटत असे. सकाळीस सश्रद्ध असणारा इंदरजित संध्याकाळ उलटल्यावर शायराना होऊ जायचा, शिवाय पंजाबी असल्याने खाण्यापिण्यात अव्वल. विशेषतः पिण्यात तर खास. कुठला ब्रांड खास आहे व तो कुठे मिळतो याची तर तो विकिपीडियाच.

एक भरभरून संपन्न आयुष्य जगलेला इंदरजित व क्वचित दिसणारी त्याची देखणी बायको पम्मी या दोघांचं एकच दुःख होतं. त्यांना मूल नव्हतं. याचं अपार वैषम्य तो उघड उघड बोलून दाखवत असे. त्यामुळेच की काय, दुकानात मूल आलं की तोही मुलासारखा होऊन जायचा. त्यांना हवं ते लाडेलाडे द्यायचा. एरवी सुद्धा मालसामान काढताना एखाद्या मुलाने बरणी उघडून गोळ्या चॉकलेट घेतले तर तो कानाडोळा करायचा. वरतून म्हणायचा वाहे गुरूने चिडीयांना चुगण्यासाठी अख्खे खेत सोडून दिले होते ही तर बरणी आहे! 

एके दिवशी इंदरजित सिंह की दुकान बंदच दिसली. चौकशी केली तर इंदरजित पंजाबला गावी गेल्याचं कळलं. वाटलं येईल परत. आठवडा झाला. महिना झाला. सहा महिने झाले. इंदरजित आलाच नाही. मोबाईल स्वीच ऑफ तर कायमचाच. मी लावणंच सोडून दिलं. रस्त्यावरनं जाताना त्याचं बंद शटर पाहून गलबलायला होतं. संध्याकाळी येताना त्याच्या बंद दुकानाच्या पायऱ्यांवर रेंगाळणं होतं. ही तर रोजच विचारते, “इंदरची काही खबरबात?” माझं गप्प राहणं पाहून तीसुद्धा खंतावते. मग मनात एक कळ उठते व मनातच बोल उठतात, “ये रे बाबा इंदर, परत ये, मागाल ते मिळेल हे तुझं ब्रीदवाक्य होतं ना? दुकान जरी बंद असलं तरी ती पाटी आत अजून तशीच असेल ! तर हेच मागणं की ये, किंवा जिथे कुठे असशील तेथे सुखात रहा !” 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मराठवाडा मुक्ती-संग्रामाचा इतिहास…”  लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मराठवाडा मुक्ती-संग्रामाचा इतिहास”  लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पूर्वपीठिका…

संत ज्ञानेश्वरांच्या कालात आपल्या मराठवाड्यावर आपलेच राज्य होते. देवगिरी ही राजधानी होती आणि रामदेवराय हा राजा होता.

अल्लाउद्दीन खिलजी या परकीय आक्रमकाने इ. स. १२९४-९५ ला आपल्यावर स्वारी केली, रामदेवरायास हरवले आणि आपण परतंत्र झालो. मराठेशाहीत आपल्यावर राज्य करणार्या निजामास थोरला बाजीराव आणि माधवराव पेशवे यांच्याक्डून पराभूत करून मांडलिक तर बनवण्यात आले.

पण मराठवाडा काही हिंदवी स्वराज्यास जोडण्यात आला नाही.

मराठेशाहीचा अस्त होण्यापूर्वीच निजामाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले.

इंग्रज गेल्यानंतर निजामाने स्वत:चे भारतापासून वेगळे असे स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. १७सप्टेम्बर१९४८पर्यंत आपण त्याच्या गुलामीत होतो.

निजाम घराण्यात सात निजाम झाले. त्यापैकी सातवा निजाम मीर उस्मान अली हा १९११साली गादीवर आला.

त्याने अलीगढ मुस्लीम विद्यापीठात शिक्षण घेतले होते. या निजामाने राज्यातील शाळांची संख्या एकदम कमी केली व १९२२पासून धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी सुरु केली. आमिष दाखवून किंवा बळजबरीने धर्मांतरे करण्यास सुरुवात केली. मजलिसे मुत्तेहादिल मुसल्मिन[एम आय एमMIM] य़ा सैनिकी संघटनेची स्थापना करून तिच्याकरवी जनतेवर अत्याचार सुरु केले. याच संघटनेचे पुढे रजाकार मध्ये रुपांतर झाले. रझाकार प्रमुख कासिम रझवी हा लातूरचा असून अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचाच विद्यार्थी होता. विशेषत: १९४६ ते १९४८ या काळात भयंकर अत्याचार झा्ले. गावे जाळणे, महिलांवर बलात्कार करणे, बळजबरीने धर्मांतर करणे, दलितांना धमकावून सरकारी बाजू घ्यायला लावणे असे प्रकार रझाकारांनी केले.

आर्यसमाज

निजामाच्या या अत्याचारास सर्वप्रथम विरोध आर्यसमाजाने केला व शेवटपर्यंत त्यासाठी लढा दिला. यात अनेक आर्यसमाजी हुतात्मा झाले. सत्याग्रह, जेल भरो, ध्वमस्फोट असे सर्व प्रकार आर्यसमाजाने हाताळले. हुतात्म्यांमध्ये उदगीरचे भाई श्यामलालजी, भीमराव पाटील, शंकरराव सराफ, लोहार्याचे रामा मांग, गुंजोटीचे वेदप्रकाश, शंकर जाधव, एकनाथ भिसे, बहिर्जी वाप्टीकर, धारूरचे काशिनाथ चिंचालकर, किल्ल्रारीचे माधव बिराजदार, जनार्दनमामा, फकीरचंद्रजी आर्य, कल्याणानंदजी, मलखानसिंह, रामनाथ असाना, सुनहराजी, ब्रह्मचारी दयानंद, मानकरणजी, लक्षैयाजी, सत्यानंदजी, विष्णूभगवंत तांदूरकर, इत्यादि. नांवे प्रमुख होत. या सत्याग्रहाचे नेतृत्व एकाच्या अटकेनंतर दुसरा अशा साखळी पद्धतीने पं नरेंद्रजी आणि स्वामी स्वतंत्रानंद यांच्या मार्गदर्शनात महात्मा नारायण स्वामी, श्री चांदकरणजी शारदा, श्री खुशहालचंद खुर्संद, राजगुरु धुरेंद्र शास्त्री, देवव्रत वानप्रस्थ, महाशय कृष्ण, द्न्यानेश्वर सिद्धांतभूषण, विनायकराव विद्यालंकार यांनी केले. गोदावरीबाई किसन टेके यांच्यासारख्या महिलांनीही निजामी अत्याचाराचा प्रतिकार केला. नारायणबाबू यांनी प्रत्यक्ष निजामावर ध्वम फेकला होता पण निजाम बचावला.

स्वा. सावरकर आणि हिंदुमहासभा.

१९३५साली इंग्रजांनी भारतास टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्याचे मान्य करून प्रांतांना स्वायत्तता दिली. त्यानुसार १९३७ला मुंबई प्रांतात कूपर-मेहता मंत्रिमंडळ सत्तेवर आले व त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्त केले. यानंतर सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले व त्यांनी आर्यसमाजाच्या निजामविरोधी लढ्यास मोलाचे साह्य केले. सावरकरांनी भारतभर दौरे करून या विषयावर व्याख्याने दिली व निजामशाहीत घुसण्यासाठी सत्याग्रही तयार केले तसेच या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमवला. सत्याग्रहींचे जत्थेच्या जथे निजामशाहीत घुसले. यांपैकी एका जत्थ्याचे नेतृत्व पंडित नथुराम गोडसे यांनी केले. त्यांना निजाम शासनाने एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला. सावरकरांनी निजामी अत्याचाराबाबत अनेक लेख लिहून जागृती केली आणि निजामाला अत्याचार बंद करण्याचे आवाहन केले. सत्याग्रहींसाठी निजामाचे तुरुंग अपुरे पडू लागले तेव्हा १९३९साली निजामाने सावरकर आणि आर्यसमाज यांना त्याम्च्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले व सत्याग्रह थोड्या काळासाठी स्थगित झाला.

डॊ. आम्बेडकर

निजामाने बाबासाहेबांची धर्मांतराची घोषणा ऐकली. त्याने बाबासाहेबांना दोन कोटी रूपये देऊ केले, त्या बदल्यात मराठवाड्यातील दलित जनतेसोबत इस्लाम कबूल करण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी ते दोन कोटी रूपये ठोकरले. इतकेच नव्हे तर आमिष दाखवून किंवा बळजबरीने धमकावून धर्मांतरित झालेल्या दलित बंधूंना स्वधर्मात परतण्याचे आवाहन केले, आवाहनाचे हे पत्रक त्यांनी नैशनल हेराल्ड या दैनिकात प्रसिद्धीस दिले. बाबासाहेबांचे समविचारी बौद्ध भिक्षु उत्तम यांनी काही काळ बंगाल हिंदुसभेचे प्रदेशाध्यक्ष भूषवले होते. ब्रह्मदेशातून तेरा सत्याग्रही निजामविरोधी लढ्यात सहभागी होण्यास आले होते.

वंदे मातरम आंदोलन

निजामी राज्यात वंदे मातरम हे गीत गाण्यास बंदी होती. महाविद्यालयीन तरुणांनी ही बंदी मोडण्याचे आंदोलन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या आंदोलनास प्रोत्साहन दिले. बंदी मोडणार्या विद्यार्थ्यांना निजामाने विद्यापीठातून काढले तेव्हा विदर्भ प्रांतातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन सावरकरांनी त्यांना केले. त्यानुसार अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नागपूरला आले. या आंदोलनात रामचंद्र राव यांनी पोलीसांचे फटके खात असताना सुद्धा वंदे मातरम च्या घोषणा चालूच ठेवल्या. त्यामुळे त्यांचे वंदे मातरम रामचंद्र राव असेच नांव पडले. ते पुढे हिंदुमहासभा आनि आर्यसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. या आंदोलनास पंडित नेहरूंनीही पाठिम्बा दिला होता. त्यांचे अनुयायी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव याच आंदोलनातून पुढे आले.

मुस्लीम सत्याग्रही

अनेक मुस्लीम बांधवांनीही निजामविरोधी लढ्यात आपले योगदान दिले. त्यात शहीद शोएब उल्ला खान आणि सय्यद फय्याज अली हे प्रमुख होत. शहीद शोएब उल्ला खान हे इमरोज या वृत्तपत्राचे संपादक होते. ते आपल्या सम्पादकीयांतून निजामी अत्याचारांवर कठोर टीका करीत. रझाकारांनी २१ औगस्ट १९४८ला रात्री १वाजता पाठीत गोळ्या घालून त्यांची हत्या केली. सय्यद फय्याज अली हे अजमेरचे निवासी. अजमेर आर्यसमाजाच्या प्रेरणेने त्यांनी पुसदच्या आर्य सत्याग्रहात भाग घेतला आ्णि तुरुंगवास भोगला. कताल अहमद, मौलाना सिराजुल हसन तिरमिजी, पंजाबचे मुंशी अहमद्दीन, कराचीचे मियां मौसन अली, सातार्याचे मौलाना कमरुद्दिन यांनीही निजामविरोधी लढ्यात आपले योगदान दिले.

स्वामी रामानंद तीर्थ आणि स्टेट कांग्रेस

स्वामी रामानंद तीर्थ यांनी विविध कारणांसाठी १९२८, १९३८, १९४०, १९४३ या वर्षी कारावास भोगला. स्टेट कांग्रेसवर तिच्या स्थापनेपूर्वीच बंदी घालण्यात आली होती. भारत स्वतंत्र झाला तरी निजामाने आपले राज्य त्यात विलीन न करण्याची घोषणा केली. स्टेट कांग्रेसने या घोषणेविरुद्ध ७ औगस्ट १९४७ ला खूप मोठे मोर्चे काढले. आ. कृ. वाघमारे, शेषराव वाघमारे, अनंत भालेराव, भाई बंशीलाल, दिगंबरराव बिंदू, राजूर तालुक्यातील विधिद्न्य निवृत्ती रेड्डी, कलिदासराव देशपांडे, माणिकराव पागे, राजाराम पाटील, इत्यादि नेते हे त्यावेळी स्वामीजींचे सहकारी होते. १५ औगस्ट १९४७साली लोकांनी आपल्या घरांवर तिरंगे फडकवले. स्वामीजींना पुन्हा तुरुंगात धाडण्यात आले. रझाकारांचे अत्याचार वाढले. सावरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना सशस्त्र लढा देण्याचे आवाहन केले. ना. य. डोळे यांनी लिहिले आहे की महात्मा गांधींनीही या लढ्यात शस्त्र वापरण्याची अनुमती दिली होती.

रझाकार आणि जनता यांच्यात सशस्त्र लढा पेटला.

सैनिकी कारवाई

भारत सरकारने संघराज्यात विलीन होण्याचा विचार करण्यासाठी निजामास १५ औगस्ट १९४८ पर्यंतची मुदत दिली होती. पण निजाम या मुदतीनंतरही विलीन होण्यास तयार नव्हता. जनता आणि रझाकार यांच्यात संघर्ष पेटला होता. १२सप्टेम्बर १९४८ या दिवशी जिनांचे पाकिस्तानात निधन झाले. त्याच दिवशी मध्यरात्री सरदार पटेल यांनी पं. नेहरूंना बजावले की सैनिकी कारवाईची मान्यता दिली नाही तर आपण मंत्रिमंडळातून बाहेर पडू. तेव्हा नेहरूंनी निजामाविरुद्ध सैनिकी कार्रवाईच्या आदेशावर स्वाक्षरी केली. पटेलांनी १३सप्टेम्बर १९४८ला आपले सैन्य तीन दिशांनी निजामशाहीत घुसवले. रझाकारप्रमुख कासिम रझवी हा चारच दिवसांत पाकिस्तानला पळून गेला. १७सप्टेम्बर १९४८ या दिवशी निजामाने संध्याकाळी ५ वाजता आपले राज्य भारतीय संघराज्यात विलीन केले. त्याने विमानतळावर सरदार पटेलांना वाकून नमस्कार केला. अशा प्रकारे ६५३ वर्षांच्या पारतंत्र्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला.

सर्व नागरिकांना मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या ” हार्दिक ” शुभेच्छा !! 💐

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भाकरी – – लेखक : डॉ. दीपक रानडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भाकरी – – लेखक : डॉ. दीपक रानडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

सर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट. आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9. 30 ला सुरुवात केलेली केस, अखेर संध्याकाळी 5. 45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला होता. ह्या कोविड प्रकरणामुळे ऑपरेशन थिएटरच्या मजल्यावर असलेले कॉफी शॉप बंद होते.

सेकंड शिफ्टच्या मावशी आलेल्या दिसल्या. त्यांना बिनधास्त विचारलं- ” मावशी, डब्यात काय आणलंय?”

मावशीनं प्रेमाने उत्तर दिलं- “सर, आज कांद्याची भाजी आणि चटणी भाकर हाय डब्यात. भाज्या लयी महाग झाल्यात. ”

मी तिला “सर्जनस रूममध्ये डबा घेऊन ये, ” म्हणालो. भूक अनावर झाली होती.

तिने एक छोटासा स्टीलचा डबा आणि कागदाची वळकटी तिच्या पिशवीतून काढून माझ्या पुढ्यात दोन्ही मांडले.

त्या कागदाच्या वळकटीत 4 घट्ट रोल केलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या होत्या. स्टीलचा डबा उघडला, तर तिखट तांबड्या रंगाची तेलात परतलेली कांद्याची भाजी आणि एका कोपऱ्यात हिरव्या मिरचीचा ठेचा होता. त्या अन्नावर मी अक्षरशः तुटून पडलो. ती भाजी भाकरी, ठेचा अमृताहूनी गोड लागत होता. बघता बघता दीड भाकरी डीचकली, आणि मावशीने आणलेल्या गार पाण्याचा ग्लास गटागटा प्यायलो. तेव्हा कुठे पोट शांत झाले.

भाकरी!काय ताकद आहे ह्या अन्नात!

भाकरीला न तुपाचे, तेलाचे लाड. बनवताना तिला धपाटे घालुन, डायरेक्ट विस्तवावर भाजणे. कुठे पोळपाटाची शय्या नाही, की लाटण्याचे गोंजरणे नाही की तव्याचे संरक्षण नाही. भाजीचा आगाऊ हट्ट न करणारी, चटणीलासुद्धा तेवढ्याच प्रेमाने कुशीत घेऊन पोट भरणारी ही माऊली. कित्येक चुलींवर ही भाकरीच फक्त पोट भरण्याचे काम करते.

काय सामर्थ्य आहे ह्या भाकरीचे!

कष्ट करणाऱ्या मंडळींचे साधे, कष्टाळू अन्न.

कुठेतरी, रस्त्याच्या कडेला, तान्हे मूल कापडी पाळण्यात बांधून, कित्येक माऊलींच्या ममतेची ही भाकरीच पोशिंदी. ह्या भाकरीच्याच जीवावर, रस्ते, बिल्डिंगस, सोसायट्या, बंगले उभे आहेत. त्या भाकरीच्या प्रत्येक घासात, कष्टाचा सुगंध आणि गोडवा जाणवतो.

ती कांद्याची भाजी म्हणजे भुकेने व्याकुळ झालेल्या जिवाला पर्वणीच.

त्या माउलीला पोटभर आशीर्वाद दिले.

त्या भाकरीमध्ये कष्ट करणाऱ्याचेच पोट भरण्याची क्षमता असते. कष्ट करणाऱ्या हातांनाच त्या भाकरीचा घास तोडण्याची ताकद असते. त्या माउलीला तिचा डबा पुढे करण्याची उदारता त्या भाकरीनेच बहाल केली असावी. त्या भाकरीमध्ये केवळ पोट भरण्याचे सामर्थ्य नसून, कष्ट करणाऱ्या व्यक्तीमध्ये कणखरता, चिकाटी, आत्मबळ आणि सोशिकता निर्माण करण्याचे अद्भुत रसायनदेखील असते. भाकरी केवळ खाद्य पदार्थ नसून, जीवनशैलीचे, संस्कृतीचे प्रतीक आहे.

उगाच जिभेचे फाजील चोचले न करणारी, दंतपंक्तीला भक्कम करणारी, पोट भरण्याची विलक्षण संपन्नता असणारी ही भाकरी म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्णब्रह्म आहे.

मला जेव्हा जेव्हा शक्य होते, तेव्हा तेव्हा मी मावशी- मामांच्या जेवणात घुसखोरी करतोच. त्यांच्या स्वयंपाकामध्ये प्रामाणिक कष्टाची रुचकरता तर असतेच, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चार घास वाटून खाण्याची उदार भावना, प्रेम, हे खरोखर मनाला स्पर्शून जाते आणि ते दोन घास खरेच स्वर्गीय आनंद देऊन जातात. त्यांच्या डब्यातल्या भाकरीची बातच काही और आहे.

खाऊन झाल्यावर डोळ्याच्या कडा ओलावल्या. तो मेला कांदा कितीही शिजवला, तरी डोळ्यात पाणी आणतोच.

लेखक :डॉ दीपक रानडे

प्रस्तुती : अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ व्यथेला शब्द लाभावे… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ व्यथेला शब्द लाभावे… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ कविता ☆ व्यथेला शब्द लाभावे

व्यथेला शब्द लाभावा,

अशी बांधीव ती नाही 

तुला देऊ कशी लाही? 

तशी आटीव ती नाही…

 *

मनाच्या खोल अंधारी 

स्मृतींचा कालवा दाटे 

तमा पिंजून एखादा 

दिठीला काजवा भेटे…

 *

क्षणाला लख्ख बिल्लोरी 

उजेडा, अर्थ दे ना तू 

धुनीसाठी हवी ऊर्जा,

असे अंतस्थ हा हेतू…

 *

नको वरपांग काहीही,

उरातिल आर्त उसळू दे 

मनाच्या मंथनापोटी 

खरा उद्गार मिसळू दे…

 *

व्यथेला शब्द लाभाया,

युगे तिष्ठूनिया पाही

लिपीला भार का व्हावा?

अनर्था, बोल ना काही…

 *

— आश्लेषा महाजन.

Mob. 9860387123

रसग्रहण 

 व्यथेला शब्द लाभावा,

अशी बांधीव ती नाही 

तुला देऊ कशी लाही? 

तशी आटीव ती नाही..

“व्यथेला शब्द लाभावे “हे काव्यशीर्षक वाचताच स्मृतींचा कालपट क्षणाचा कालावधी न सरताच नजरेसमोर तरळतो. प्रत्येकाच्या काळजात व्यथेची कथा नांदतच असते. या व्यथेला बोल, शब्द लाभावेत व ती तिच्या परिमाणासकट परिणामांना व्यक्त करणारी असावी असा आंतरिक घोष कानी निदादतो. व्यथेची भावना तशी सार्वत्रिकच आहे. प्रत्येक जण कधी ना कधीतरी तिला सामोरा गेलेला असतो. व तो दाहक अनुभव, ती अनुभूती माणसाच्या काळजाला निरंतर छळत राहते. साहजिकच कवितेच्या अंतरंगाकडे हृदय आकृष्ट होते. कवयित्रिच्या शब्दभात्यातले सुयोग्य शब्दबाण आपल्या व्यथेला घायाळ करतील आणि तिचे ते शब्दरूप पाहायला मिळेल अशी सुप्त इच्छा वाचकाच्या मनात मूळ धरू लागते. व्यथेची व्याप्ती व्यक्त करायला शब्द लाभावेत, ते पुरेसे यथार्थ व अर्थपूर्ण असावेत ही भावना कवितेत व्यक्त होताना दिसते. असामान्य वाटणारी प्रत्येकाची व्यथा निराळी! तिचा भार अर्थवाही शब्दांनी वाहून न्यावा ही कामना प्रत्यक्षात येणे सहज सोपे नाही हे वास्तव कविता वाचताना ध्यानात येते. कवयित्री म्हणते व्यथेला शब्द लाभावा, ती अबोल राहू नये, तिने व्यक्त व्हावे, तिला व्यक्त करावे. व्यथा भोगणाऱ्याला ती व्यक्त करण्यासाठी तसेच खुद्द व्यथेलाही शब्द लाभावेत असा अर्थ अभिप्रेत असावा. मनातली ही इच्छा फलद्रूप व्हावी. पण यासाठी तिचे रूप, स्वरूप व्यक्त करण्याजोगे दृष्यमान असायला हवे ना ! तिचे मनात वसत असलेले रुप कल्पनेच्या कुंचल्यातून व शब्दमाध्यमातून व्यक्त करणे वा तिचे वर्णन करणे हे कठीणच! ही व्यथा बांधीव, एकसंध नाही. विस्कळीत, दुभंगलेली, पसरलेली, इत:स्तत: विखुरलेली आहे. जणू काही ती सर्वव्यापी आहे. तिची जमवाजमव करून तिला शब्दरूप देणे गरजेचे आहे. हे आकळले तरी ते प्रत्यक्षात कसे घडवून आणावे, कसे घडावे? व्यथेला शब्दात बांधणे म्हणजे शब्दांकित करणे तसेच “बांधून टाकणे” हाही अर्थ अभिप्रेत असावा. व्यथेला शब्द लाभावा असे जरी वाटत असले तरी तिच्या रूपामुळे तिला तो लाभणार नाही असा काहीसा सूचक निर्देश निदर्शनास येतो. या व्यथेची लाही, तिचा लहानसा कण कसा कुणाला द्यावा?कारण ती आटीव म्हणजे आटलेली, घट्ट झालेली, संपृक्त नाही. अजून ती धगधगती आहे, लाहीसम तडतडणारी आहे, बेचैन करणारी आहे, प्रवाही आहे. नानाविध व्यथा असल्याने तिचे रूप एकसमान नाही.

मनाच्या खोल अंधारी 

स्मृतींचा कालवा दाटे 

तमा पिंजून एखादा 

दिठीला काजवा भेटे…

कुठेही कसेही न सामावणाऱ्या अदृश्य, अथांग अशा मनाच्या आत आत अगदी तळघरात, खोल खोल अंधारात स्मृतींचा कालवा दाटलेला आहे. कालवा या शब्दाचा सुंदर अर्थ मनाला भावतो. मानवनिर्मित प्रवाह म्हणजे कालवा. येथे व्यथेचा प्रवाह हा कालव्यासम आहे हा अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात ही व्यथा मानवनिर्मित आहे हे लक्षात आणून दिले आहे. तसेच अंतरंगात कालवाकालव करणारा तो कालवा. व्यथेचे मूळ व कूळ, तिची उत्पत्ती व व्याप्ती दर्शवणारा हा शब्द!! व्यथेचा हा काळाकुट्ट तम अंतरंगात व्यापून उरलेला आहे. तो काळोख अगदी पिंजून काढला तर नजरेला एखादा काजवा जो क्षणिक आणि स्वयंप्रकाशी आहे तो कधीतरी भेटतो. येथे “पिंजून काढणे” हा वाक्प्रचार म्हणजे खूप प्रयत्न केल्यावर गवसणे. कवितेतील आशयाला हा एकदम समर्पक आहे. एखादा आशेचा किरण व्यथा भोगताना अथक प्रयत्नाने कधीतरी खुणावतो ही भावना व्यक्त केली आहे. तसेच व्यथा दूर करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांचे महत्त्व सांगितले आहे.

क्षणाला लख्ख बिल्लोरी

उजेडा, अर्थ देना तू 

धुनीसाठी हवी ऊर्जा,

असे अंतस्थ हा हेतू…

काजव्याच्या सानुल्या उजेडाकडे कवयित्री याचना करते आहे की हे उजेडा! त्या विविक्षित क्षणाला लखलखीत बिल्लोरी अर्थ दे. अर्थात त्या अंधारात लाभलेल्या उजेडाने आयुष्याला चमक, झळाळी लाभो. बिल्लोरी या शब्दातून केवळ चमकदार उजेड अंतर्भूत नाही तर तो इंद्रधनु सम सतरंगी असावा अशी भावना व्यक्त केली आहे. या प्रकाशामुळे जगण्याचे अर्थपूर्ण भान येऊ दे, आयुष्याला चांगला मार्ग मिळू दे असा भावार्थ!! आणि हे सर्व गरजेचे आहे कारण ही धुनी पेटती राहावी, यासाठी तिला ऊर्जेची गरज आहे. येथे धुनी ही शरीराची आहे. ती पेटलेली आहे, धगधगती आहे हे लक्षात येते. तसेच जगण्याचा जो यज्ञ, धुनी आहे त्यात समिधा म्हणून अर्पण करण्यासाठी जगण्याचीच ऊर्जा लाभावी. आशेच्या अर्थपूर्ण ऊर्जेचा एखादा तरी किंचितसा स्त्रोत लाभावा अशी मनीषा व्यक्त केली आहे, कारण अंतरंगात स्थित असणारा, नेहमी वसणारा हा आंतरिक हेतू आहे. अंतस्थ म्हणजे आतला, खोल मनाच्या गाभ्यातला हेतू!!जगण्याची इच्छा सोडलेली वा सुटलेली नाही. व्यथेच्या अटळ स्थानाचे भान राखून जीवन आशेच्या किरणावर जगण्याचा प्रयत्न आहे.

नको वरपांग काहीही 

उरातील आर्त उसळू दे 

मनाच्या मंथनापोटी

खरा उद्गार मिसळू दे….

कवयित्रीला कुठले ही काही ही वरवरचे, उथळ, वरपांगी, सकृतदर्शनी आहे असे दिसणारे, खोलवर विचार न करणारे काहीही नकोय. दुसऱ्याच्या व्यथाभावनेला लाभणारे वरवरचे सहानुभूतीपर शब्द ही नकोत. अर्थात व्यथा भोगताना कुणाच्या अर्थहीन निरुपयोगी सहाय्याची अपेक्षा कवयित्रीला नाही. आपल्या वेदनेवर तिला स्वतःच आधार शोधायचा आहे. यासाठी उरातील, काळजातील आर्त भावना उसळून येऊ देत. व्यथा या नेहमी उरात दडलेल्या, दडविलेल्या असतात हे सत्य लक्षात घेतले आहे. त्या उसळून येऊन एक प्रकारे त्यांचा उद्रेक व्हावा व तसे झाल्याने व्यथेच्या भोगातून बाहेर पडण्याची प्रखर व तीव्र जाणीव स्वतःला असल्याशिवाय व झाल्याशिवाय व्यथेपासून सुटका नाही, यावर दुसरा उपाय नाही. मनाचे मंथन यातून सखोल चिंतन अपेक्षित आहे. जीवनात समाधान मिळावे व ते मिळवण्यासाठी व्यथेच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा. काय करायचे याचे विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढणे हे गरजेचे आहे. असे झाले तर तो खरा अर्थपूर्ण उद्गार लाभेल. उद्गार या शब्दाचा अर्थ अभिव्यक्ती करण्यासाठी योग्य वचन, बोल उक्ती मिळणे हा आहे. या शब्दयोजनेतून मनाच्या मंथनाप्रती मनात असलेली कवयित्रीची तळमळ किती प्रांजळ आहे हे लक्षात येते. ताकदीचा व खरा उद्गार लाभला व मनाच्या मंथनात मिसळला तरच मार्ग मिळेल, मार्ग दिसेल याची खात्री आहे.

व्यथेला शब्द लाभाया 

युगे तिष्ठूनिया पाही 

लिपीला भार का व्हावा?

अनर्था, बोल ना काही…

व्यथेची भावना, तिची तीव्रता व खोली सापेक्ष आहे. तिची जाण संपूर्णपणे होणे सर्वथा अशक्य आहे याचे सजग भान कवयित्रीला आहे. त्यामुळे व्यथा व व्यथेला स्वतःला व्यक्त करण्यासाठी, बोलके होण्यासाठी यथार्थ शब्द लाभावेत अशी अपेक्षा केली आहे. यासाठी व्यथा युगानुयुगे तिष्ठत उभी आहे असे कवियत्रीने म्हटले आहे. यातून कालातीत असलेली व्यथा काळाशी सुसंगतपणे व्यक्त होणे अशक्यप्राय आहे हे कळते. व्यथेला अभिव्यक्त करण्याची घाई न करता योग्य शब्द-भाव-रसनिष्पत्ती होईपर्यंत थांबायची तयारी आहे. अगदी युगानुयुगे वाट पाहायची तयारी आहे. वाट पाहत राहून ही, तिष्ठत असूनही ते शब्द, ते बोल मिळू शकत नाहीत. “तिष्ठत” शब्दातून आतुरतेने बराच काळ वाट पाहणे हे जाणवून दिले आहे. लिपीला म्हणजे लिखाणाच्या सूत्रबद्ध पद्धतीला, अक्षरांना व्यथेचा भार होतोय. अर्थात ती अक्षरेही असमर्थ ठरत आहेत व्यथा व्यक्त करण्यासाठी !कवितेतील आशय अगदी खोलवरपणे लक्षात येतो व मनाला भिडतो ही. तसेच लिपीने का व कशासाठी व्यथेचा भार वाहायचा असा मूलभूत प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत कवयित्री मनात व जीवनात भरून राहिलेल्या अनर्थालाच काही बोलायची विनंती करते आहे. लिपी तर बोलत नाही, बोलू शकत नाही तर अनर्था आता तूच बोल असे अतिशयोक्तीपूर्ण मागणे कवयित्रीने केले आहे.

व्यथेची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द लाभणे अत्यंत अवघड आहे कारण व्यथा ही भावना समजून घ्यायची आहे, तिचे दृश्यरूप दृष्टीस पडत नाही. अत्यंत संवेदनशील मनाचा आविष्कार या कवितेत जाणवतो. उचित, वेचक व वेधक शब्दांचा समर्पक प्रयोग, भावनेचा स्तर कळावा म्हणून योजलेले विविध साहित्यिक अलंकार कवितेतील आशयाला पूरक व पुष्टी देणारे आहेत. व्यथेला शब्द लाभावा, मनाचा खोल अंधार अशी अनेकानेक चेतनागुणोक्तीची उदाहरणे या कवितेत सुंदर रीतीने मांडली आहेत. त्यांना चेतना प्रदान करून त्यांचे व्यक्ती स्वरूप वर्णिले आहे. काळोखाला पिंजणे मधील अतिशयोक्ती अलंकार, स्मृतींचा कालवा मधील रूपक तसेच कवितेला असलेली लयबद्धता असे अनेक काव्यविशेष मनाला मोहविणारे आहेत. हे वियद्गङ्गा वृत्त आहे. कवितेचा “काव्यप्रकार” म्हणून मोल वृद्धिंगत करणारे आहेत. कवयित्रीने कवितेतून व्यथेला शब्द लाभावा असे म्हणताना तिला बोलके केले आहे. तिच्या मूकपणात तिचे अस्तित्व प्रकर्षाने लक्षात येते.

मनाचा वेध घेणारी ही कविता आहे. वाचक जेव्हा आपल्या मनाची नाळ कवितेशी जुळवतो तेव्हा ती सार्वत्रिक होते आणि यातच त्या कवितेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अशी ही नितांत सुंदर भावपूर्ण कविता मनात रेंगाळत राहील व निरंतर स्मरणात राहील या बद्दल दुमत होणे नाही.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अक्षर… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ अक्षर…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

विश्वातील अनादी काळापासून, अक्षरशः अक्षर निर्मिती ! न क्षरती इति 

अक्षर ! ज्याचा नाश कधीच होत नाही असे अक्षर ! अक्षर कुठून तयार झाली ? भाषा व लिपी कोणती जरी असली तरी , अक्षर ही प्रथम नाद निर्माण करतात ! नाद हा परत दोन प्रकारचा आहत आणि अनाहत !  आहत नाद 

मुखातून वा कोणत्याही आघातजन्य पदार्थापासून निर्मित असतो अनित्य असतो. अनाहत नाद हा स्वर्गीय नित्य असतो. मुखातील जिव्हा, टाळू, दंत ओष्ट, नासिक ह्यांच्या आघातामुळे नाद किंवा अक्षर तयार होत असते. 

अ उ म – म्हणजेच ओम  हा आकार, उकार, मकार ह्या तीन धातूंपासून तयार झाला आहे . 

अक्षर हे मानवाचे प्राण आहे ! बघा हं विचित्र वाटेल पण त्रिकालाबाधित सत्य आहे ! जन्मतः प्रसव झाल्यापासून को s हं ? किंवा को अहं ! ह्या अक्षरांना किती महत्व आहे हे तुम्ही जाणताच . बाळ रडले ह्याचा अर्थ त्याचा पहिला श्वास चालू झाला ! रडणे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडणे , म्हणजेच त्याचा श्वासोच्छ्वास चालू झाला ! ह्यांचाच अर्थ त्याचे फुफ्फुसे व ह्रदय क्रिया चालू झाली !त्याला जीव प्राप्त झाला ! मंडळी  हाच तो अनाहत नाद ! इथे कुठलाच आघात न होता अक्षर तयार झाले ! ईश्वर निर्मित नाद ! अक्षरे देऊन गेला ! प्राण व्यानं उदान ह्या वायूची गती इथे प्राप्त झाली .  प्राण ह्रदयस्थित व्यानं फुफ्फुस स्थित , उदान कंठ स्थित !

आपण बोलताना वरील तिन्ही वायूंचे चलनवलन होत असतेच . अपान वायू मलमूत्र विसर्ग होत असताना कार्य करते . तर समान वायू 

अग्निवर्धन करून अन्न पचन करते. आघात होण्यासाठी वायू व आकाश ह्याची गरज आघात मुखात होतो व तोंडातील वा श्वास मार्गातील पोकळी किंवा अवकाश अक्षर , शब्द निर्मिती करत असते . माणूस सजीव असेपर्यंत अक्षर आवाज जन्मापासून मृत्यू पर्यंत अव्याहतपणे चालू असते ! आघात अक्षर शब्द हे जेव्हा थांबतील तेव्हा जीव नाहीसा होतो ! जीव जात  असताना पण घश्यात घुरघुर लागते व श्वास थांबतो – त्यालाच मृत्यू म्हणतात ! 

अनेक अक्षर मिळून शब्द तयार होतो , परा – पश्चन्ती मध्यमा – वैखरी ही त्याचे सूक्ष्म रूपे होत ! बेंबीच्या देठापासून ते कंठातून – मुखापासून बाहेर पडण्याच्या क्रियेला खरतर फुफ्फुसे व कंठ श्वासपटल मुख ही सर्व कार्यरत असतात ! त्यासाठी वरील तिन्ही वायूचे साक्षात प्राणाचे कार्य अव्याहतपणे चालू असते . शरीरांतर्गत ह्या सूक्ष्म क्रिया असतात . तो सजीव बोलत असतो आहत नादामुळे , मुखातील आघातामुळे ! ह्याच आघातामुळे नादमय संगीत पण तयार होत असते .

अक्षर ही सरस्वती कृत निर्मित ! तर चौदा विद्या चौसस्ट कला ह्या श्री गणेशाधीन श्री गणपती ही त्याची देवता . मग सरस्वती पूजन का ? सरस्वती ही प्रत्येक्ष्यात प्रतिभा ! उत्स्फूर्तता ! सृजनशील ! वाक् – बोलणे , ईश्वरी – अनाहत नाद निर्माण करणारी बीज मंत्र !

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ आं 

यरळवष श स हं ळ क्ष ज्ञ 

क ख ग ग इत्यादी मुळाक्षरे 

काही भाषेत बाराखडी, तर काही भाषेत चौदाखडी

उदा. कानडी भाषा चौदाखडी ( ह्रस्व आणि दीर्घ ए ) असो. 

पाणिनीला मात्र वेगळीच बीजमंत्र मिळाले . शंकराच्या डमरूतुन त्याला चौदा शब्द समुच्चय मिळाला ! त्यावरच पाणिनीने लघुसिद्धांत कौमुदी हे व्याकरण शास्त्राचे नवीन प्रबंध निर्माण केला . जे आजही व्याकरण शास्त्राचे आधारभूत ग्रंथ म्हणून पाहिले जाते . चार चार अक्षरांचा चौदा समूह तयार करून त्यांनी , अक्षरपट मांडला . विस्तार भयास्तव येथे देत नाही ! तरीपण ह्या शास्त्राला नाद संरचना ( phoneticks ) म्हणून जगात मान्यता आहे ! 

कर्ण बधिर शास्त्रात उपयोग केला गेला ! महत्वाचे म्हणजे मला अस प्रश्न पडतो की ? 

सुदृढ माणूस ऐकू शकतो , बोलू शकतो . मूक बधिरांचं काय ? ? अक्षर समूह म्हणजे शब्द , शब्द समूह म्हणजे वाक्य . नाम क्रियापद कर्म , इत्यादी . 

ही मुळाक्षरे, तसेच संगीत शास्त्रातील , “सा रे ग म प ध नी सा”  सप्तसूर कोमल स्वर 

“मंद्र मध्य तार सप्तक” ह्यांचा  कंठातून होणारा आघात – नादमय ध्वनी इथे मुळाक्षरे सप्तस्वरच राज्य करतात !

अस असलेतरी मुखातून आलेला ध्वनी कर्ण पटलावरच कार्य करतात, किंबहुना कर्ण अबाधित असेलतरच ह्याचे ज्ञान होणार . 

मुळाक्षरे जशी आहेत तशीच बिजाक्षरे पण वेदानी प्रमाणभूत मानली आहेत. हीच बिजाक्षरे देवांच्या प्राण प्रतिष्ठासाठी ग्राह्य मानली जातात. 

आपण वार्षिक गणपतीचा उत्सव दहा दिवस आनंदाने साजरा करतो . दहा दिवस  आपण मनोभावे पूजा करतोच बाजारातून   आणलेला गणपती, घरी पूजेसाठी ज्यावेळी मांडतो त्यावेळी, बिजाक्षरानी त्यात प्राण व्यान उदान अक्षरांनी प्रतिष्ठा केली जाते. ती अक्षरे खालीलप्रमाणे.

ओं आं ह्रिम क्रोम् । 

अं यं रं लं वं शम वं सं हं लं इत्यादी — सर्व अनुनासिक अक्षर 

जन्मतः बाळ रडत ते पण अनुनासिक अक्षर !

को ss हं किंवा टँहै टँह्या ही अशी अनादी अनंत प्रक्रिया सृष्टीत अव्याहत चालू आहेच. बऱ्याच वनस्पतीमध्ये पण ही क्रिया चालू असतेच उदा. केळीचा कोका ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आवाज येतो. तो अक्षरशः अक्षरांनी. तस बरेच काही अक्षराबद्दल सांगता येईल. ह्या जगात तुम्ही आम्ही असू वा नसू पण अक्षरे ही अबाधित असतील एवढं मात्र खरे !

तेच प्रांजळ सत्य आहे . 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘प्रिय सुदामा…‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय सुदामा… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

प्रिय सुदामा,

तुला लिहिलेलं माझं पहिलंच आणि बहुदा शेवटचं पत्र…!

तसा खूप उशीर झाला आहे,  पण आजची एकूण परिस्थिती बघून माझे मनोगत तुझ्यापाशी व्यक्त करावेसे वाटले. मूठभर पोह्याचे तुझे ऋण होतं माझ्यावर, म्हणून तू जास्त लक्षात राहिलास….!

माझी नरदेह सोडून सुमारे पाच हजार वर्षे झाली…!

माझ्या संपूर्ण जीवनात मी ‘स्वार्था’पोटी एकही गोष्ट केल्याचे आठवत नाही..!

गावाच्या भल्यासाठी घराचा त्याग करावा, राज्याच्या भल्यासाठी गावाचा त्याग करावा आणि देशाच्या भल्यासाठी जीवाचाही त्याग करावा असे आपल्याकडे मानले जाते. मी तसेच आचरण केले, नाही का… ?

माझ्या जन्मानंतरचे सोडून देऊ, पण जन्माच्या आधीपासूनच माझ्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती…!

जन्म झाल्या झाल्या मला जन्मदात्रीला सोडून दुसऱ्यांच्या घरी राहावं लागले…!

जन्माला आल्यावर पुतना मावशी मारायला टपली होती…!

त्यानंतर कालिया नाग….!!

माझ्या मामाने तर मला मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला….!

धर्मरक्षणासाठी मला माझ्या मामाला मारावे लागले….!

तिथे जरी मला बलराम दादा होता, तरी जबाबदारी माझ्यावरच जास्त होती….!

मित्रांना लोणी, दूध, दही खायला मिळावे म्हणून मी अन्नाची चोरी करायचो, मी कधीही संपत्तीची चोरली नाही, पण सर्वांनी मला ‘चोर’ ठरवले….!

माझी यशोदामाई सुद्धा मला चोर म्हणाली,तेव्हा मला खूप वाईट वाटले….!

पण एक सांगतो, गोकुळात मला जे प्रेम मिळाले ते नंतर मला कुठेच मिळाले नाही. सगळे गोपगोपी लोण्यासारखे मृदूल…!

गोपींनी तर मला ‘सर्व’ ‘स्व’ दिले….!

तरीही मला कर्तव्यपालनासाठी माझ्या प्रिय गोकुळाचा कायमचा त्याग करावा लागला.

नंतरच्या बऱ्याच गोष्टी तुला माहीत आहेतच….!

तुम्हा सर्वांना त्यातील राजकारण दिसले असेल…!

कधी मला ‘कृष्ण’शिष्ठाई करावी लागली तर कधी मला ‘रणा’तून पळून जावे लागले..!

अनेक राक्षसांचे वध करावे लागले…!

नरकासुराच्या बंदी खान्यातील सोळा सहस्त्र नारींना मी सोडविले, पण त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देण्यास समाज पूढे येईना, शेवटी मीच त्यांच्याशी विवाह केला….!

द्रौपदीला मी वस्त्रे पुरवली, अर्जुनाला गीता सांगितली अशा अनेक गोष्टी माझ्याकडून नियतीने करवून घेतल्या….!

मग लोकं मला ‘अवतार’ मानू लागले….!

मला देवत्व प्रदान केले गेले…! 

आणि कोणालाही देवत्व प्रदान केले की सामान्य लोकांचे काम सोपे होते. कशीतरी रोजची पूजा करायची, (खरं तर उरकायची !), मंदिरात ‘भंडारा’ करायचा. ‘उत्सव’ साजरा करायचे. हल्ली जो गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात. ना त्यात गो (गाय)  असते, ना गोपाळ असतात ना त्या हंडीत दही असते……!

जे असायला नको ते मात्र सर्व असते….!

मला तुम्ही लोकांनी देव केले, माझी भक्ती करायला सुरुवात केलीत. पूजा अर्चा जमली तर अवश्य करा पण माझी खरी भक्ती करायची असेल तर मी जसा प्रत्येक संकटात वागलो तसे वागण्याचा प्रयत्न करावा. मला तुम्ही पुरुषोत्तम म्हणता पण ‘पुरुषोत्तम’ होण्यासाठी प्रयत्न करणारे फार कमी लोकं आहेत. तुम्हाला मनमोहन व्हायला आवडते पण ‘कालियामर्दन’ करण्याची कोणाची तयारी दिसत नाही. आज अनेक ‘नरकासुर’ आहेत, अनेक ‘कालिया’ आहेत पण त्यांचा बंदोबस्त कोण करणार ? विचार करा.

प्रत्येकाने जेव्हा आपापली काठी लावली तेव्हा माझ्या करंगळीने गोवर्धन उचलला गेला, हे आपण विसरून जात आहात. गीता सांगायला तुम्हाला कोणीही भेटेल पण त्यासाठी तुम्हाला अर्जुनासारखे भक्त व्हावे लागेल…!

भक्ती तशी प्राप्ती असे म्हणतात, पण आज सुचवावेसे वाटते, जशी भक्ति तशी प्राप्ती!!.

आज माझा ‘जन्मोत्सव’ तुम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा कराल, तेव्हा याचाही विचार कराल, असा विश्वास वाटतो. 

तुझा सखा,

कृष्ण

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆जड झालेले आई-बाप… साभार : श्री राकेश जगताप ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ जड झालेले आई-बाप… साभार : श्री राकेश जगताप ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

नेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा ‘राजेशचा’ मला फोन आला… म्हणाला, “मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच..!”

मी “हो थांबतो” म्हटलं. 

मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.

एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, “ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल…!”

ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं..

अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, “आजोबा तुम्हाला भूक लागलीय? हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते..!” 

ते म्हणाले, “नको बाबा नको.. पैसे नको.. एक वडापाव घेऊन दे तेवढा”

मी म्हटलं, “थांबा इथेच मी घेऊन येतो.”

एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले.

मला म्हटले, “वर नको बसू , पडशील… इथं बस माझ्या बाजूला, कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास !”

मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली… कुठून आलात? कुठे जायचंय? कोणाला शोधताय? वैगेरे वैगरे.

“मी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे…

इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर,  वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला.

पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!”

मी म्हणालो, “बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही, सांताक्रुज ला आहे Airport.

आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, “परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं… फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा…त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून”

आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली… मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं… 

मी विचारलं, “तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?”

“मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त” ते म्हणाले.

मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला…

मग मी तो कागद उघडून पाहिला… त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.

मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता… मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं.

तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश… 

आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो…

मला कळत नव्हतं, मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती?  कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल.. 

आजोबांना मी म्हणालो, “आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.

अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं, “मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये? “

म्हणाले, “मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी…

आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो….

तेवढ्यात मित्राचा आवाज आला, “चल ना ऐ…!” 

आणि मी भानावर आलो… त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो… 

घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता…

‘आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस.. आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता…? इतकं प्रेम ??? 

साभार : श्री राकेश जगताप, मुंबई

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “विज्ञान गड”: “इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना” – लेखक : इंजि. राम पडगे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ “विज्ञान गड”: “इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना”लेखक : इंजि. राम पडगे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

(आशिया खंडामधला पहिला प्रकल्प आकाराला येतोय महाबळेश्वर तालुक्यामध्ये “कोट्रोशी” या ठिकाणी.) 

नमस्कार अभियंता मित्रांनो,

आपणा  सर्वांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अभियंता दिनाच्या निमित्ताने आपणाला एका नवीन प्रकल्पाची ओळख करून द्यावी अशा उद्देशाने या प्रकल्पाची थोडक्यात माहिती आपणाला पाठवत आहे.

“विज्ञान गड” गेली १८ वर्ष या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एक वेगळी संकल्पना, वेगळा विषय आणि विज्ञान आधारित ही थीम असलेले अत्यंत नाविन्यपूर्ण आणि इंजिनिअरिंग मधला एक अद्भुत  नमूना या ठिकाणी उभारला जात आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये शासनाच्या सर्व परवानक्या प्राप्त होऊन हा प्रकल्प  सर्वांसाठी खुला होईल. आशिया खंडा मधला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाहनांसाठी रस्ता उपलब्ध नाही. डोंगराच्या पायथ्याला आपली वाहने लावून या ठिकाणी जवळपास १५० मी उंच   असलेल्या डोंगरावर  माथ्यावर, वायरच्या मदतीने खेचली जाणारे रेल्वे मधून जावे लागते. याला फिन्यूक्युलर असे म्हटले जाते. सर्वसाधारण ४० लोकांची क्षमता असलेले दोन डबे बॅलन्सिंग पद्धतीने एकावेळी वर खाली होत असतात. सर्वसाधारण सात मिनिट ते दहा मिनिटांचा कालावधी या ठिकाणी जाण्यासाठी लागतो. डोंगराचा तिव्र  उतार सर्वसाधारण ३५ डिग्री ते ४० डिग्री च्या आसपास आहे. आपली ही फिनिक्युलर वरती असलेल्या गोल इमारतीच्या आत मध्ये थांबते. प्रत्येक दरवाज्याच्या पुढे फ्लोरिंग येईल अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.

आणि इथून पुढे तुमचा सुरुवश होतो….. एक अद्भुत प्रवास!!! आपण नक्की काय पहावे व कोणते प्रथम पाहावे अशा प्रकारची आपली परिस्थिती होते. या इतक्या उंच ठिकाणी, इतका भव्य प्रकल्प असेल असे रस्त्यावरून वाटत नाही. समुद्रसपाटीपासून सर्वसाधारण बाराशे पन्नास मीटर उंचीवर असलेला हा प्रकल्प महाबळेश्वर आणि पाचगणी यांच्या उंची पेक्षाही जास्त आहे. या इमारतीच्या माथ्यावर गेल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी कोणताही अडथळा राहत नाही. 

या ठिकाणाहून सह्याद्रीच्या अवाढव्य गगनाला भिडणारया रांगा, कोयना जलाशयाचा विस्तीर्ण नजरेत न सामावणारा पसारा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमार्ग ,कासचे नयनरम्य पठार, वासोटा किल्ला, उत्तेश्वराचं पुराणतन मंदिर, मकरंद गड, महाबळेश्वर, पाचगणी, लिंगमळा, भिलार हा सगळा परिसर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये येतो आणि हे तुम्ही , आशिया खंडा मधला पहिल्या रोटेटिंग  डोम मध्ये बसून पाहत असता. 

या ठिकाणी अत्यंत मोठ्या क्षमतेचे कॅमेरे बसवून, या सर्व ठिकाणांचे दर्शन स्क्रीन वरती आपणाला पाहता येते. याशिवाय आपली वेळ संध्याकाळची असेल तर आकाशातले ग्रह तारे या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येतात.  या ठिकाणचे  फिरणारे हॉटेल आणि या ठिकाणी बसून घेतलेल्या जेवणाचा आस्वाद आपणाला आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे. तुम्ही ३६० डिग्री मध्ये फिरत, निसर्गाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचे दर्शन घेत जेवणाचा आनंद घेत असता. या ठिकाणी आहे अर्थक्वेक मधले सर्व प्रकारचा अभ्यास, या ठिकाणी आहे अभ्यासण्यासाठी विंड एनर्जी प्रोजेक्ट,सोलर एनर्जी प्रोजेक्ट आणि हायड्रो प्रोजेक्ट सुद्धा.  पाण्यामध्ये होत असलेले बदल आणि त्यासंबंधीची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहता येतात. सुनामी प्रत्यक्ष होते तरी कशी? व तिचा इफेक्ट नक्की असतो कसा? हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल या ठिकाणी .लाटा मधलं सायन्स आहे तरी काय? हे अभ्यासायचे असेल तर या ठिकाणी भेटायलाच हवं. भारतीय सैन्य दलामध्ये अत्याधुनिक शस्त्र वापरण्यात येतात. ती प्रत्यक्ष असतात कशी व ती वापरली कशी जातात ? याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच असते . या ठिकाणी शिकण्यासाठी , अभ्यासण्यासाठी आणि पाहण्यासाठी भरपूर काही आहे. अभियंता म्हणून या प्रकल्पाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.  मी या प्रकल्पाची अत्यंत थोडक्यात माहिती दिली प्रत्यक्षात बरेच काही आहे .

तुम्ही कदाचित याल त्यावेळी शिवाजी महाराजांचे अभियंते हिरोजी इंदुलकर यांचं अत्यंत सुंदर शिल्प या ठिकाणी तयार झालेले असेल. या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या तीव्र बुद्धीमतेने अभियंता म्हणून आपले नाव इतिहासाच्या पानावर कायमचे कोरून ठेवलेले आहे. या अभियंत्याची स्मृती म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सह त्यांचाही पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे.

वयाच्या ६८ व्या वर्षी रात्रंदिवस काम करणारे, या प्रकल्पाचे मालक आणि अभियंते जोशी सर यांची भेट म्हणजे  स्फूर्ती आणि संकल्पना याचा अनोखा मिलाफ. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने स्वतःचे स्थान निर्माण करणारे व अभियंता म्हणून नक्की कसे असावे याचे हे जिवंत उदाहरण आहे.

प्रकल्प मालक व अभियंता – इंजि. वसंत जोशी सर 

प्रकल्प सल्लागार. – इंजि. राम पडगे

आर्किटेक्ट –   आर्कि. विक्रांत पडगे 

आर सी सी सल्लागार. –  इंजि. अनिल कदम

अभियंत्यांनी एकदा आवर्जून भेट द्यावी असा हा प्रकल्प आहे. या ठिकाणी ज्याला पाहायचे आहे ते भरपूर काही पाहू शकतात ,ज्याला शिकायचं आहे तो भरपूर काही शिकू शकतो. एक अभियंता म्हणून निश्चितच चॅलेंजिंग असा हा प्रकल्प आहे, म्हणूनच आज अभियंता दिनाच्या निमित्ताने आपल्यासमोर मी हे थोडक्यात मांडत आहे.

आपला,

इंजि. राम पडगे

९६८९३५९४७८

प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ आनंदी जीवनासाठी, लिमिटेड होतं तेच बरं होतं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंदी जीवनासाठी, लिमिटेड होतं तेच बरं होतं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा…..

टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.

दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षा-दीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.प्रवासाचा आनंद मिळायचा.

गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.

शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडणघडण नीट व्ह्यायची.

बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची.

अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते.

पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय.आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय !

“बाबा, तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात?”

“बेटा, काळ खूप बदलला बघ.

तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.

तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोरं दिवसभर बसून ‘कॉम्प्युटर गेम्स’ खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.

तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांच्या डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.

तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड, त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन, ते म्हणतील ते खाऊ घालतात.

तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.

तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला, तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

मुळात काय की,

तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं

            आता

बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यावरील सेमिनर्स अटेंड करावे लागतात.”

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मला भावलेला श्रीकृष्ण” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “मला भावलेला श्रीकृष्ण” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

 (‘shopizen.in‘ यांच्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या “ माझ्या मनातला श्रीकृष्ण “ या विषयावरच्या एका उपक्रमाअंतर्गत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांच्या लेखाला “ सर्वोत्कृष्ट लेखन “ म्हणून गौरविण्यात आलेले आहे. याबद्दल आपल्या सर्वांतर्फे ज्योत्स्नाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. आज हा लेख सर्वाना वाचण्यासाठी उपलब्ध करत आहोत.

हे श्रीकृष्णा, नव्हे नव्हे युगपुरुष भगवान श्रीकृष्णा नमस्कार !

पण तुला बाळकृष्ण म्हणावे, माधव म्हणावे, मुकुंद म्हणावे, मुरलीधर म्हणावे, कन्हैया म्हणावे, वासुदेव म्हणावे का योगेश्वर म्हणावे ? नक्की काय म्हणावे असा मोठा प्रश्न पडतो. कारण तुझ्या प्रत्येक रूपाची मोहिनी वेगळी आणि लीलाही वेगळ्या. पण प्रत्येकच रूप तितकेच लोभस अन् हवेहवेसे.

हे युगंधरा,

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम 

धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

असे वचन तू दिले होतेस आणि ते पूर्ण करण्यासाठी द्वापरयुगात श्रीविष्णूंचा आठवा अवतार म्हणून वसुदेव देवकी यांचा पुत्र म्हणून अवतार घेतलास.

हे देवकीनंदना, तुझ्या बालरूपाने तर चराचरावर मोहिनी घातली. अवघ्या गोकुळाला तुझे वेड लागले. अगदी बालपणापासून तू अनेक खोड्या केल्या, पराक्रम केलेस. ते सर्व कृष्णलीला म्हणून प्रसिद्ध आहेत.

अगदी बालपणातच तू पूतना राक्षसीचा वध केलास. यशोदा मातेने उखळाला बांधून ठेवले असताना रांगत जाऊन दोन झाडे पाडून नलकुबेर आणि मणिग्रीव या दोन कुबेर पुत्रांना शापमुक्त केलेस. यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये विश्वदर्शन घडवलेस. कालिया मर्दन करून कालिया नागाला यमुनेच्या डोहातून निघून जायला लावलेस. केवळ हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे मुसळधार पावसापासून रक्षण केलेस.

हे बाळकृष्णा, अशा अनेक घटनात तुझे देवत्व प्रकट होत गेले. पण प्रत्यक्षात मानव रुपातले तुझे मोहक हसरे रूप सर्वांना आकर्षित करणारे होते. कारण कृष्ण म्हणजेच आकर्षून घेणारा. डोळ्यात प्रेम, करुणा, वात्सल्य दाटलेले, चेहऱ्यावर आपुलकीचे लोभस भाव आणि तुझे ते खट्याळ लडीवाळ हसू प्रत्येकाला आपलेसे करून घेणारे म्हणूनच प्रत्येक जण तुझ्यावर जिवापाड प्रेम करणारा.

हे कन्हैया, तुझे तरुणपणातले मुरलीधर रूप सर्वांचेच अतिशय लाडके. तुझ्या बासरीचे सूर चराचराला धुंद करीत. त्या सुरांनी माणसेच नव्हे तर अवघे गोधन, पशू, पक्षी तुझ्या भोवती जमा होत असत.

हे योगेश्वरा, तू शूरवीर पराक्रमी योध्दा, न्यायनिपूण कुशल प्रशासक, दुर्बलांचा तारणहार, दुष्टांचा संहारक होतास. कौरव पांडवांचे युद्ध होऊ नये, संहार टळावा म्हणून तू शेवटपर्यंत प्रयत्नशील होतास. कौरवांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास. पण ही ‘कृष्णशिष्टाई’ अखेर विफल ठरली.

पुढे कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धात शस्त्र हाती न धरता एका उदात्त हितोपदेशकाची भूमिका उत्तम रीतीने पार पाडलीस. त्यामुळेच पांडव धर्मयुद्धात विजयी झाले. याचवेळी सर्व मानवजातीला मार्गदर्शक असा गीतोपदेश तू अर्जुनाला केलास. जीवनात प्रत्येक गोष्टीत ही गीतातत्वे आजही मार्गदर्शक ठरत आहेत. हे गीता तत्वज्ञान जीवनाची गाथा आहे.

हे वासुदेवा, तू मानव देहधारी अवतरलास. मानवाप्रमाणे जीवनातले सुखदुःखांचे चढ उतार सहन केलेस. सर्व भोग उपभोगलेस आणि भोगलेसही. दुःख, कष्ट, तिरस्कार, पीडा सहन केल्यास. आयुष्यातील सर्व नात्यांना योग्य न्याय देत सर्व नाती उत्तम निभावलीस. माता, पिता, सर्व वडिलधाऱ्यांना योग्य सन्मान, प्रेम दिलेस.

गुरूकुलात सर्व शिष्यांसमवेत त्यांच्यातला एक होऊन राहिलास. मित्र असावा तर असा म्हणत गरीब सुदामाशी आयुष्यभर मैत्री निभावली.

गोकुळवासी गोधन सांभाळायचे. पण कंसाच्या धाकाने सर्व दही, दूध, लोणी मथुरेच्या बाजारात जायचे. खरे तर त्यावर पहिला हक्क गोकुळातल्या बालगोपालांचा. त्यांच्यासाठी तू दहीहंडी फोडण्याला सुरवात केलीस. सर्वांमधली एकात्मता टिकवण्यासाठी गोपाळकाला करायला लागलास.

हे गोविंदा, तू कालियाला दुसऱ्या वनात पाठवून यमुनेचे जलशुद्धीकरण केलेस. गोधनाची अतिशय मायेने काळजी घेतलीस. गोवर्धन पूजेच्या निमित्ताने निसर्ग पूजनाचा पायंडा पाडलास. सगळ्यांना निसर्ग रक्षण, संवर्धन, प्राणी प्रेमाची महती शिकवलीस.

हे माधवा, द्रौपदीला बहीण मानून अखंड पाठीराखा झालास. नरकासुराच्या बंदीवासातून १६००० जणींना मुक्त केलेस आणि त्यांना सन्मानाचे जिणे प्राप्त व्हावे म्हणून त्यांना आपल्या पत्नीपदाचा दर्जा दिलास. स्त्रियांचा सदैव आदर केलास.

अगदी कंस, जरासंध, शिशुपाल यांना चुका सुधारण्याची संधी दिलीस. शंभर अपराध भरल्यानंतर वध केलास. अनन्यभावाने शरण आलेल्यांना अभय देत दुष्टांच्या दुष्कृत्यांना शिक्षा केलीस. सदैव नीतीचे, न्यायाचे अनुसरण केलेस.

हे मोहना, विश्व कल्याणासाठी दुष्ट शक्तींचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी विविध रूपात तू लीला केल्यास. या तुझ्या देवत्वाबरोबरच तुझ्यातलं मनुष्यत्व अतिशय मोहक आणि सर्वांना अगदी जवळचं वाटणारं आहे. सर्व नात्यांना जपणारं तुझं कुटुंबवत्सल रूप मला जास्ती आवडतं.

तुझ्या कृती उक्तीतून तू आपल्या वागण्याला अध्यात्मिक, सामाजिक, नैतिक अधिष्ठान कसे हवे हे दाखवून दिलेस. जीवनात आसक्ती आणि विरक्ती कशी असावी हे दाखवलेस. भक्ती कशी असावी, दुसऱ्याला नेहमी माफ करावे, परोपकार, संरक्षण करावे, नेहमी सत्याची बाजू घ्यावी, त्याचा लगेच परिणाम दिसला नाही तरी सत्याचाच शेवटी विजय होतो अशा अनेक गोष्टी तू कृतीतून दाखवत होतास.

हे दीनबंधो, राजसभेत दु:शासनाने तिच्या वस्त्राला हात लावताच द्रौपदीने तुझ्या असंख्य नावाने तुझा धावा केला. पण तू आला नाहीस. शेवटी तिने, ” हे दीनदयाळा, भक्तवत्सला, आत्मारामा मी तुला अनन्यभावाने शरण आले आहे. माझे रक्षण कर, ” अशी विनवणी करताच तू प्रकट झालास. कारण नुसती स्तुती नव्हे तर अंत:करणापासून मारलेली हाक तुझ्यापाशी पोहोचली. अशी समर्पण भक्ती तुला आवडते. तू आम्हाला निष्काम कर्मयोग, निरपेक्ष प्रेम, नि:स्वार्थ भक्ती शिकवलीस. म्हणूनच तुझी तुला करताना सत्यभामेच्या जडजवाहीराने नव्हे तर रूक्मिणीच्या एका तुळशीपत्राने पारडे खाली गेले. तिचा अनन्यभाव तुला प्रिय होता.

तू शिकवलेल्या या गोष्टी आचरणात आणून सुखाने जगणे शक्य आहे. पण आज कलियुगात माणूस पुन्हा उद्दाम, बेफाम बनू लागला आहे. आपलं माणूसपण विसरला आहे. मायबाप आणि लेकरांचे पवित्र नाते दुरावते आहे. कुटुंबांमधे मतभेदाच्या भिंती उभारल्या आहेत. स्त्री आज सगळीकडेच असुरक्षित झाली आहे. समाजातले दु:शासन राजरोस तिच्या वस्त्राला हात घालत आहेत. समाजातला एकोपा संपत चालला आहे.

हे पुरूषोत्तमा, आज तुझी प्रकर्षाने आवश्यकता आहे. तुझ्या कृपेने प्रत्येकाच्या मनातला निद्रिस्त कृष्ण जागा कर. प्रत्येक स्त्रीच्या मनातली दुर्गा जागृत होऊ दे. अन्याय, अत्याचार लयाला जाऊ देत. पुन्हा सर्वत्र सुधर्माचे राज्य येऊ दे.

हे मधुसुदना, पुन्हा एकदा साऱ्या विश्वाला आश्वस्त करणारे, सर्वांवर कृपेची पाखर घालणारे तुझ्या बासरीचे मधुर स्वर चराचरात घुमू दे. श्रीकृष्णाय नमः ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares