मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील   स्त्रिया… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील   स्त्रिया…  ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संस्कृत आणि स्त्री म्हटले की बऱ्याच जणांना ‛ न स्त्री स्वातंत्र्यमर्हति|’ हे वचन आठवते. अर्थात ते वेगळ्या संदर्भात म्हटले आहे. पण त्यावर चर्चा करण्याऐवजी या नवरात्रात संस्कृत साहित्यातील नऊ सशक्त स्त्रियांवर लिहायचा मी प्रयत्न करणार आहे.

वास्तविक कोणतेही साहित्य हा त्या त्या काळातील समाजमनाचा आरसा असतो. त्यामुळे अगदी वैदिक काळापासून विचार केला तर अनेक संदर्भ असे आढळतात की त्या काळी स्त्रिया स्वतंत्र विचारसरणीच्या होत्याच, शिवाय अनेक क्षेत्रातही सक्रिय होत्या. खेल राजाची पत्नी विश्पला हिने युद्धात आपले पाय गमावले होते. पण अश्विनीकुमारांनी शस्त्रक्रिया करून तिला वाचवले होते. असा उल्लेख ऋग्वेदात आहे. मुद्गलानी उत्तम धनुर्धारी होती. असाही उल्लेख आढळतो.

अनेक विद्वान स्त्रियाही त्या काळात पुरुषांच्या बरोबरीने चिंतन करत असत. त्यातीलच दोन स्त्रियांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. स्त्रीशक्तीला माझ्याकडून हा अक्षरप्रणाम!

मैत्रेयी

मैत्रेयी ही याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी! त्यांना कात्यायनी व मैत्रेयी अशा दोन पत्नी होत्या. त्यातील कात्यायनी ही त्यांचा संसार अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळत होती. तर मैत्रेयीला तत्वज्ञानाची आवड होती. त्यामुळे तिला ब्रह्मवादिनी असे म्हटले जात असे.

एकदा ऋषींनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास घ्यायचे ठरवले. त्यामुळे दोन्ही पत्नीना जवळ बोलावून त्यांनी आपली इच्छा सांगितली व आपली जी काही मालमत्ता आहे ती दोघीत वाटून द्यायचे ठरवले. ते ऐकून मैत्रेयीने लगेच प्रश्न विचारला,“ या जीवनातील सर्वोच्च सुख म्हणजे संपत्ती का?” तिचा हा प्रश्न महर्षीना लगेच कळला आणि त्यांनी खरे सुख म्हणजे काय आणि आत्मतत्वाचा शोध कसा घ्यायचा याचे ज्ञान मैत्रेयीला दिले.

हा याज्ञवल्क्य- मैत्रेयी संवाद प्रसिद्ध आहे. ज्यांना तो जाणून घ्यायचा आहे त्यांना तो नेटवर सहज उपलब्ध होईल. पण यातील विदुषी असणारी मैत्रेयी हे त्या काळातील स्त्रीशक्तीचे, तिच्या प्रगल्भ विचारांचे आणि स्त्रीस्वातंत्र्याचे उत्तम उदाहरण होते असे मला वाटते.

गार्गी

मैत्रेयीलाच समकालीन असणारी दुसरी विदुषी म्हणजे ‛गार्गी’!

एकदा जनक राजाच्या दरबारात याज्ञवल्क्य व गार्गी यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी गार्गीने ऋषींना अनेक प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता,“ मुनिवर, असे म्हणतात की पाण्यात सर्व पदार्थ एकजीव होऊन जातात. मग हे पाणी कशात मिसळते?” ऋषींनी लगेच उत्तर दिले,“ वायूमध्ये” मग तिने पुन्हा विचारले,“वायू कशात मिसळतो?” ,“ वायू?”- “ आकाश…” – “आकाश?” – गंधर्वलोक—- अशा पद्धतीने प्रश्न विचारत ते ब्रह्मलोकपर्यंत जातात. त्यानंतर मात्र ऋषी तिला म्हणतात, “आता इथेच थांब, कारण ब्रह्मज्ञान हाच सृष्टीचा शेवट आहे.” गार्गीला हेच हवे असते. कारण तिला सृष्टीची उत्पत्ती जाणून घ्यायची असते. त्यानंतर ती दोनच प्रश्न ऋषींना विचारते,“ या अंतरीक्षाच्या वर आणि पृथ्वीच्या खाली काय आहे? आणि जे घडून गेले आहे आणि जे होणार आहे ते काय आहे?” अर्थात तिचे हे दोन्ही प्रश्न म्हणजे सध्याच्या भौतिकशास्त्राच्या भाषेत म्हणायचे तर अवकाश( space) आणि काळ (time) यासंदर्भात होते त्यावर याज्ञवल्क्य ऋषींनी तिला अक्षर म्हणजेच कधीही नष्ट न होणारे म्हणजेच अविनाशी तत्वाचे ज्ञान दिले. तेव्हा त्यांच्या त्या विद्वत्तेला प्रणाम करून तिने त्यांना गुरुस्थानी मानले.

इथे विद्वान असणाऱ्या गार्गीची निगर्वी वृत्ती दिसून येते. ज्ञान मिळवण्याची लालसा आहे. त्यासाठी चर्चा करण्याची क्षमताही तिच्याकडे आहे.  पण त्याचबरोबर ज्ञानवृद्ध व्यक्तीबद्दल असणारा आदर आणि आपल्या ज्ञानातील त्रुटीही ती लगेच मान्य करते.

वेदकाळातील या दोन स्त्रिया हे त्या काळातील समाजाचा आरसा आहे असे मला वाटते.आजही जिथे अनेक ठिकाणी स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत असताना हजारो वर्षांपूर्वीची आपली संस्कृती मात्र स्त्रियांना बरोबरीचे स्थान देत होती ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच माझ्या नवरात्रीतील पहिल्या दोन माळा संस्कृत साहित्यातील या दोन सशक्त स्त्रियांच्या चरणी अर्पण!

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस ?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस … लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच

थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.

दिवसभर खेळून हात-पाय थंडीने उकलायचे.

किल्ला गेरूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर

पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा ‘गड’ राखण्यात !!

फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे-रुपयाची नाणी.फटाके आणायला खारीचा वाटा.

फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.

एकदम ‘श्रीमंत’ झाल्यासारखं वाटायचं.

घरी येऊन छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात

गळालेल्या फटाक्यांचीसुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !!

‘पोरांनो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे’ – आजी सांगायची. पण इथे झोप

कोणाला असायची! कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.

न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून अंगात ऊब

आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.

तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की छान

वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.

मला तो आवडायचा. ‘मोती’ साबण छोट्याश्या हातात मावायचा नाही आणि बादलीतलं पाणी संपूच नये, असं वाटायचं.

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं.

मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो. फक्त एक लवंगी सर वाजवायचा. बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून…त्यातच मज्जा असते.

दिवस हळूहळू

उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा.

आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं शेवटचं?

लहान होऊन, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे.

सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये की

आता आपण खूप पुढे आलोय..?

 

गेले ते दिवस!

उरल्या त्या आठवणी!

 

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सण दिवाळीचा ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सण दिवाळीचा ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दिवाळी हा सगळीकडे साजरा होणारा महत्त्वाचा सण. सणसमारंभ असतातच मुळी उत्साहवर्धक वातावरण निर्मितीसाठी. नुकतचं  नवरात्र होऊन गेलेलं असतं त्यामुळे नवरात्रा पासूनच बाजारपेठा सजायला सुरवात झाली असते. खरचं हे सणसमारंभ असतातच मुळी आपल्यातील मरगळ झटकण्यासाठी. हे सणसमारंभच आपल्या संस्कृतीला घट्ट जखडून ठेवतात त्यामुळेच नात्यानात्यातील एकोपा वाढीस लागतो.

अर्थात पूर्वी आणि आता सण साजरे करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र फरक पडलायं. पूर्वी एकतर संयुक्त मोठे कुटुंब, वेळेची भरपूर उपलब्धी,हौस आणि त्यामानाने महागाई चा भस्मासुर जरा कमी होता.

आताच्या दिवाळीत आणि आम्ही लहान असायच्या दिवाळीत बराच फरक पडलायं. काही गोष्टी ह्या कमावल्या आणि काही गोष्टी ह्या गमावल्यात. सगळ्यातं पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रतीक्षेनंतर, थोड्याश्या हट्टानंतर मिळणाऱ्या छोट्याशा गोष्टी पूर्वी खूप मोठ्ठा आनंद देऊन जायच्या,तेच आता सहज  साध्य झालेल्या मोठ्ठ्या खरेद्या पण अल्प आनंद देऊन जातात. पूर्वी घरगुती फराळ करायचे, तो फराळ बनवितांनाचे आईचे कष्ट, तिने घेतलेली अपार मेहनत आतून खूप जाणवून आणि समजावून जायची हेच आता रेडीमेड पदार्थ आणतांना ती कष्टांच्या भावनेची जाणीवच लुप्त झालीय. पण एक म्हणजे आताच्या सणांमध्ये सुबत्ता आलीय आणि पुर्वीच्या सणांना एक काटकसरीची झालर ही होतीच.

दिवाळीचा उत्साह हा महिलावर्ग आणि बच्चेकंपनी ह्यामध्ये काकणभरं जास्तच असतो जसं पक्वान्नामध्ये पदार्थांचा राजा म्हंटले की पुरणपोळीच,बाकी सगळे पक्वान्न ह्यानंतरच त्याप्रमाणे सणांचा राजा म्हंटले की दिवाळीच बाकी सगळे सणवार ह्याच्याखालीच. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे दिवाळी हा सण अगदी उत्साहवर्धक काळात येतो.नुकताच पावसाळा संपून आँक्टोबर हीट कमी होऊन हव्याहव्याशा वाटणा-या गुलाबी थंडीला नुकतीच सुरवात झालेली असते.ह्या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद मनमुराद घेऊ शकतो कारण हा काळ पचनास सर्वोत्तम काळ असतो.भारत हा कृषीप्रधान देश असल्याने ह्या दिवसात शेतकऱ्यांच्या हातात पहिले पीक येऊन जरा ब-यापैकी पैसा हातात खुळखुळतं असतो. ह्या दिवसात ह्यामुळे व्यापारातील मंदी कमी होऊन व्यापारउदीमासाठीसुद्धा हा काळ उत्साहवर्धक व तेजीचा ठरतो.

दिवाळीचं प्रमुख आकर्षण म्हणजे महिलांना खरेदी आणि धावती का होईना ह्या निमीत्त्याने माहेरी धावती का होईना टाकायला मिळणारी एक चक्कर हे असतं.आपल्या वाटेकडे आईबाबा अगदी डोळेलावून बसलेले असतात. आपण यायच्या वेळेस बरोबर बाबांचे व-ह्यांड्यात खुर्ची टाकून पेपर चाळतं बसणे म्हणजे नजर पेपरमध्ये पण कान मात्र आपल्या आगमनाची चाहूल घेणारे. आईची सारखी आतबाहेर चकरा करीत वाट बघणे सुरुच असते.खरचं हे अविस्मरणीय क्षणं टिपण्यासाठी आणि आठवणींच्या कुपीत कायमचे जपण्यासाठी तरी माहेरी जायला यनं ओढ हे घेतच.

बहिणीबहीणींनी कितीही ठरविले तरी एकमेकींकडे जाणं होतचं असं नाही. पण ह्या माहेरच्या दुव्याने आम्ही बहिणीपण मनमोकळ्या राहू शकतो.आम्ही भावंड एकत्र आलोत की गप्पा संपत नाही, हास्याचे फवारे थांबत नाही आणि जुन्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन देऊन मनं ही भरत नाही. त्यात आता भरीसभर आमची मुलं ही आमच्या टीम मध्ये सामील.हे प्रेमाचे एकत्रीकरण बघून आईबाबांच्या डोळ्यात जे समाधान दिसतं नं त्यापुढे सगळी सुखं फिकीच.

एक मजा वाटते एरवी आपल्याला कोणी लहानशी गोष्ट जरी देऊ केली तरी आपल्याला संकोचाच्या ओझ्याखाली दबायला होतं पण आईबाबांनी दिलेल्या मोठ्याही गोष्टीवर आपला हक्क आहे असा मोकळेपणा माहेरी वाटतो.आईबाबांनी खूप कष्ट करून, प्रसंगी स्वतःचे मन मारून जमविलेली पुंजी हे किती ह्या सणासुदीच्या निमीत्त्याने आपल्याला घसघशीत सहजतेने निर्मोहीपणे देऊन टाकतात हे फक्त आणि फक्त आईवडीलच करू शकतात.

.दिवाळी करून घरी परततांना एका बँगेच्या दोन तीन मोठ्या बँग्ज् झालेल्या असतातच.त्या बँग फक्त सामानानेच नव्हे तर आनंदाने आणि सुखाने सुद्धा गच्च भरलेल्या असतात. त्या सामानात आईच्या हातचा गरम मसाला, वर्षाचे साठवणूक करता येणारे पदार्थ हमखास असतातच ज्यापूढे जगाच्या बाजारात कितीही पैसे ओतून घेतलेल्या ह्या वस्तू आईच्या हातच्या मायेच्या उबेपुढे फिक्क्याच असतात.

अशा त-हेने दिवाळीहुन परततांना जी मायेची,प्रेमाची शिदोरी मिळते त्या आठवणींवर आपण उन्ह्याळ्यापर्यंत सहज मन.रमवितो.मग परत आहेच आमरसाला माहेरी चक्कर.

प्रत्येक श्वासागणिक मनात आठवण असणारे आईबाबा,जीव ओतून प्रेम करणारी बहीण आणि माहेरपणची ओढ टिकवून ठेवणारा भाऊ असल्याने मी खूप नशीबवान आणि श्रीमंत व्यक्ती असल्याचा माझाच मल साक्षात्कार होतो.

परतीची वेळ थोडी अवघड असते.परत तेच पेपर हातात धरून बसलेले बाबा न बोलता जणू नुसते नजरेनेच सांगतात लौकर परत या गं, आई फाटकापर्यंत येऊन परत परत स्वतःची काळजी घ्यायला बजावत असते.अशा वेळी गाण्याच्या ओळी आठवतात,

 “मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं।”

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचा झाला . म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला ‘अहो-जाहो’ करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या ‘नमक’चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा ‘सिलसिला’ सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!

आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकूम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच ‘चिनीकम’ करावा वाटतो वा ‘पा’मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. ‘मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली’, असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला ‘मोक्ष’ मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही.

काय आहे हे?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. “आमच्यावेळी असं होतं!”, असं, माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली, की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केव्हाच संपून गेलेले असतात.

अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या ‘ॲंग्री यंग मॅन’ रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडे ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्याचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे!

परवा लॉ कॉलेज aरस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलीकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती – अमिताभ बच्चन आणि शरद पवार. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या ‘आनंद’नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष हरेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत.

“सध्या काय करताय?” असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- “सेल्फी काढायला शिकतोय!”

हेच ते कारण आहे, ज्यामुळे माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, ‘ॲंग्री यंग मॅन’ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा ‘यंग मॅन’ अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत!

हे दोन्ही ‘बच्चन’ आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत.

शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय. अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे –

“Work in Progress!”

अमिताभला ‘हॅपी बड्डे’ म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून ‘अमिताभ’ होत असतो.

हे ‘अमिताभ’पण लक्षात घ्यायला हवं.

(फक्त माहिती म्हणून सांगतो – अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)

अविरत चालणं हा अमिताभचा ‘पासवर्ड’ आहे’. सो, चालत राहा. मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका.

पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.

तुम्हीही बच्चन व्हाल! माझी गॅरंटी.

लेखक – स्वामी संजयानंद

संग्राहिका -सौ. शशी नाडकर्णी- नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंतरिचे दीप ☆ श्री ओंकार कुंभार ☆

?  विविधा ?

☆ अंतरिचे दीप ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

एकदाची सुट्टी लागली. सत्र १ चे पेपर संपले. दीपावलीच्या सुट्टीला सुरूवात झाली.

आणि मग किल्ला करायची लगबग सुरू झाली असणार. दगडे गोळा करणे, माती आणणे, ती चाळणे, दगडे कल्पकतेनं रचणे, त्यावर चिखलाचा काला लावणे, चिखल ओला असतानाच त्यावर हळीव टाकणे आणि मग काही दिवसांनी किल्ल्यावर त्या हळिवाचं छान घनदाट जंगल तयार होतं. मस्तच.

नंतर जुने आणि नवीन आणलेले छ.शिवाजी महाराज व सैनिक त्यावर ठेवणं… नवनिर्मितीचा आनंद. आनंदीआनंद. सृजनशिलतेचा  सोहळाच जणु.

त्यापूर्वीच घरातल्या फराळात मदत करणं, “अरे करंज्यात एवढच सारण घालायचं, अशा व्यवस्थित चिटकवून कोरणीनं व्यवस्थित कोरायचं.” ” कसलं डिझाईन केलयस हे चकलीचं.” “लाडू दोन्ही हातांनी वळायचे, म्हणजे छान गोलाकार होतात.” “शंकरपाळ्या व्यवस्थित कट करायच्या.” (मदत करताकरता फराळाचा आस्वाद घेणं हे तर ओघानच आलं.😄) हे संवाद घरोघरी ऐकायला येत असतील.  हाही एक आनंददायी सोहळाच असतो.😄

पाहुण्यांना भेटणं, विविध माध्यमांतून दीपावली च्या शुभेच्छा सदिच्छा देणं-घेणं. हे सगळं काही मनाला आनंद देणारं असतं. त्यानंतर हळुहळू दिवाळी संपते. सुट्टी संपण्याच्या दिशेनं काळाचा प्रवास सुरू होतो. मग,  कुठे फँमिली ट्रीपचे नियोजन होते. तर, कुठे वनडे ट्रेकचे नियोजन. घरातून बाहेर निसर्गात भटकंती केली की, एकदम फ्रेश होतो आपण.

दिवाळीत जसे दिव्यांनी- फुलांनी घर सजवतो, प्रकाशित करतो. त्याप्रमाणे आपल्या अंतरीचे दीप ही प्रज्वलित करायला हवेत.

म्हणजेच आपलं स्वत्व हे जपता यायला हवं आपणाला. आपल्या मध्ये असणा-या बेस्ट क्वालिटीज ओळखायला, जपायला आणि वाढवता यायला हव्यात. आपल्यामधील नको असणारा भाग (वाईट गोष्टी) हळूहळू काढून टाकता यायला हव्यात. मग, ती एखादी वाईट सवय असेल.

एखादा छान छंद जोपासता येईल. अवांतर पुस्तक वाचन, छानसं चित्र काढणे, चित्र काढायला शिकणे, डिझाईन काढणे, सुंदर रांगोळी- मेहंदी काढायला शिकणे, एखादी कला आत्मसात करणे, कथा-कविता लेखन करणे. यातलं जे जमेल ते आणि जे अंगभूत(In built) असेल ते करणं-करायला शिकणं. आपल्यातील वेगळेपणामुळे आपल्याला समाजात आदराचं स्थान निश्चितच मिळते.

यातून सृजनशिलतेची, नवनिर्मितीची एक अलौकिक आनंदानुभुती प्राप्त होते. ज्या आनंदाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. जो आनंद दीर्घकाळ टिकतो.

हा अलौकिक आनंद मिळवणं म्हणजेच आपल्या अंतरिचा दीप प्रज्वलित करणं होय. नाही का?

मग करूयात ना प्रज्वलीत आपण आपल्या अंतरीचे दीप या दीपावली निमित्त?

🍁 दीपावलीच्या सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा 🍁

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

‘पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’, गाणे गात एक भिकारी जात होता. आजीने या गाण्यातील तत्त्वज्ञान छोट्या बंड्याला सांगितले आणि म्हटले, “अरे, असे भिक्षा मागून पोटाला भरणार्‍या, हातावर पोट असलेल्या , पोटाचा प्रश्न असणार्‍या , सगळ्यांना मदत करणे आपली संस्कृती आहे. आपल्या पोटासाठी केलेल्या अन्नातील काही अन्न भुकेल्यांना गरजूंना द्यावे म्हणजे मग त्यांचे समाधानाने भरलेले मन पाहून आपले पोट भरते.”

बंड्याला जरी सगळे समजले नाही तरी त्याने काही अन्न पोटात कावळे ओरडणार्‍या त्या भिक्षेकर्‍याला दिले.

नंतर त्याची पोटपूजा चालू झाली तशी आजी अजून त्याच्या पोटात शिरत म्हणाली, “तुला भूक का लागली?” बंडू म्हणाला, “काल पासून पोट उपाशी आहे म्हणून.” “बरोबर. म्हणूनच तुझे पोट खपाटीला गेले ना? अरे, आपल्या लेकरांच्या, आई वडिलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील पोटाला चिमटा घेऊन काम करत असतात बरं.

म्हणून घरात सुखशांती समृद्धी येण्यासाठी, तुला काय सांगते ते ऐक. पोट भरलेले असले ना , किंवा पोटात चारघास घातलेले असले ना की सगळे सुलभ होते. पण त्यासाठी आधी त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत. आधी पोटोबा मग विठोबा करू नये. देवाने सगळ्यांना पोट दिले आहे ना? सगळ्यांचे जीवन हे कशासाठी? पोटासाठी असते. तरी सगळ्यांना सारखे मिळत नसल्याने कोणाला पोट मारावे लागते, कोणाला पाणी पिऊन पोट भरावे लागते याचेच भान ठेऊन पोट तडीला लागेल एवढे खाऊ नये. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणून आपल्या अन्नातील काही भाग कायम दान करावा. दुसरे असे की आपल्यापेक्षा दुसर्‍यांकडे जास्त आहे म्हणून आपले पोट दुखू देऊ नये. कोणाच्या पोटावर पाय देऊ नये. कोणाला शिक्षा करायची झालीच तर एक वेळ पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.

तुम्ही पोटची पोरं रे. तुम्हाला अशी जीवनसुत्रे लहानपणापासूनच समजलेली बरी,”असे सांगून तिने बंड्याला पोटाशी धरले. 

आजी पुढे म्हणाली,”जे सुखवस्तू कुटुंबातले असतात त्यांची पोटे सुटलेली असतात. पोटाचा नगारा झालेला असतो. त्यांना गरीबांची दु:खे समजत नाहीत. ते अप्पलपोटीपणा करतात . आपला हेतू साध्य करण्यासाठी हे लोटपोट लोक पोटात एक ओठात एक नितीने वागतात . स्वत: च्या फायद्यासाठी ते दुसर्‍यांची पोटे जाळतात मग त्यांना पोटा ( कायदा) लागतोच. “

आजीने पोटतिडकीने सांगितलेले सगळे बंड्याला पटले. एका अनामिक हुरहुरीने त्याच्या पोटात कालवले. त्याचे समाधान पोटात न राहता चर्येवरून ओसंडत होते.

तेवढ्यात बंड्याची १३-१४ वर्षाची बहीण सोनी पळत पळत आजीच्या कुशीत शिरली. तिच्या पोटात भीतीने गोळा आला आहे हे समजत होते.आजीने विचारले, “सोनी, काय झालं बाळा?” सोनी म्हणाली, “आजी, मला आताच लग्न नाही करायचे. मला शिकायचंय.”

आजी म्हणाली, “हो की. अगं, अजून तुझं वय पण नाही झालं.”

“पण तो लखूशेठ आहे ना त्याच्या पोटात काही काळंबेरं आहे. तो लग्नाची गोष्ट घेऊन अण्णांकडे आला आणि अण्णांनी पोटदुखीवाला औषधाला आला त्याच्या बेंबीवर आयोडिनचा बोळा सारखे लगेच ‘आमच्या सोनीशी करशील का लग्न?’ विचारले आन तो तयार झाला.”

आजीचाही भीतीने पोटशूळ उठला.उगाच पोट गुरगुरू लागले. आजी म्हणाली, “मी समजावीन हो अण्ण्याला. तू नको भिऊस.”

अण्णाला समजावून आजीने ते संकट दूर लोटले. तर सोनीची चुलत बहीण मोनी-सात महिन्याची  पोटूशी- ती आजीपाशी आली. आजी गमतीनं म्हणाली, “आता जे काय आहे,ते अजून दोन महिने पोटातच ठेव बाई. मग दोन महिन्यांनी ते पोटात मावेनासे झाले की येऊ दे पोटातले मांडीवर.”

सगळेच पोट धरून हसले.

आजी मोनीला म्हणाली, “अगं मोने, तुमचा तसा नवाच संसार आहे. त्यात आता खाणारे तोंड वाढणार. म्हणून तुला पण चार गोष्टी सांगते बाई.  नेहमीच गोगलगाय पोटात पाय, असं असू नये.  तसेच पाठी येईन पोटी येईन पण सूड घेईन असे विचारही पोटात ठेवू नकोस. त्या बाळावर असले संस्कार करू नकोस. पण नवर्‍याला पोटाला न खाता  खर्च करण्याच्या वृत्तीपासून पोटातले ओठावर आणत घडाघडा बोलून दूर करण्याचा प्रयत्न कर.

अगं,प्रेमाचा मार्ग पोटातूनच जातो. तर प्रेमाने पोटात शिरून हे तू सहज साध्य करशील.

बरं, चल. तुला काहीतरी खावंसं वाटत असेल ना? तुझ्या पोटाच्या नावाखाली सगळ्यांच्या पोटाच्या वळलेल्या दामट्या सरळ करू. सगळ्यांनाच पोट खळबळल्याची जाणीव झाली. पोटार्थी असलेले सगळे खाण्यासाठी सज्ज झाले.  खरं तर आजीचं वयाने पाठ पोट अगदी एक झालं होतं.पण काटक आजीने मस्त चमचमीत झणझणीत थालीपिठं केली. हे आजीचं प्रेम सगळ्यांनीच पोटात बांधलं. त्यावर आडवा हात मारताना पोटात जागा नव्हती, तरी चार घास जास्तच खाल्ले. पोट डम्म झालय, म्हणत दिलेल्या तृप्तीच्या ढेकराने आजीच्या पोटात आनंद मावेनासा झाला.

लेखिका: सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुठे शोधीसी…? ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कुठे शोधीसी…? ☆ श्री अरविंद लिमये ☆

आपलं संपूर्ण जगणंच व्यापून टाकणारा, अपरिमित ऊर्जा ठासून भरलेला असा एक शब्द म्हणजे शक्ति ! हा शब्द स्वतःच शक्तिशाली आहे कारण शक्तिची असंख्य रुपे त्याने स्वतःत सामावून घेतलेली आहेत.

शक्ति या शब्दाच्या अर्थात लपलेले विविध बारकावे लक्षात घेतले तर जगरहाटीतलं शक्तिचं आस्तित्व आणि महत्त्व दोन्हींची कल्पना येईल.

शक्ति म्हणजे सामर्थ्य,बळ,जोर ताकत तसंच कुवत,दम आणि रगही.शक्ति म्हणजे प्राबल्य, क्षमता, मातब्बरी जसं तसंच त्राण, जोश, प्रभाव, पात्रता,अवसान,आवेग आणि आवाका सुध्दा!शक्ति म्हंटलं की हे सगळं सहज सुचणारं पण म्हणून फक्त एवढंच नाही तर यापेक्षाही बरंच कांही विचारप्रवृत्त करणारं आणि जगणं सजग करणारंही.

हिंदू धर्मानुसार जागृत देवस्थान म्हणून मान्यता मिळालेली अतिशय प्राचीन अशी नैनादेवी, अमरनाथ, पुष्कर, अमरकंटक, सोमनाथ, वृंदावन, अंबाजी, मानसरोवर.. अशी एकूण पन्नास शक्तिपीठे आहेत.या आणि अशाच श्रध्देने मनात जपलेल्या इतरही विविध  दैवतांची ही शक्तिशाली देवस्थाने म्हणजे दैवीशक्तीची जनमानसातील प्रतिकेच! या श्रद्धेमुळे मिळणारी मन:शांती वादातीत असली तरी जीवन व्यतित करताना रोजच्या व्यवहारांसाठी अशा परस्वाधिन मन:शांतीकडे अनेकदा प्रश्नांची सोडवणूक करणारा एकमेव मार्ग म्हणून पहाणे उचित ठरणारे नाही.खरंतर त्यासाठी  शक्तिची प्रतिकारशक्ती,सहनशक्ती क्रयशक्ती, प्राणशक्ति, आत्मशक्ति,विचारशक्ति अशी इतर रुपेही प्रयत्नपूर्वक अभ्यासून त्यांची प्राप्ती होण्यासाठी प्रयत्नशीलही रहायला हवे.  

इथे दैवी शक्तीला नाकारणे अपेक्षित नाहीय तर तीच दैवी शक्ती कणरुपाने आपल्याठायीही वसते आहे हे लक्षात घेऊन शरीर आणि मनाच्या संदर्भात लिहिण्याच्या ओघात वर उल्लेख केलेली आणि इतरही शक्तिरुपे आपल्या भावनिक, मानसिक, बौध्दीक, शारीरिक आणि आत्मिक उत्कर्षासाठी कशी महत्त्वाची ठरतात हे जाणून घ्यायला हवे.हे साध्य होण्यासाठी, हे  शोधण्यासाठी कुठे बाहेर फिरत बसायची गरज नाहीय तर त्यासाठी फक्त स्वतःच्या आंत जाणीवपूर्वक डोकवायला हवे फक्त ! हे फार अवघड नाही आणि मनावर नाही घेतले तर सोपेही नाही !

‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे खरेच,पण ते फक्त जन्म न् मृत्यू यापुरतेच.या दोन टोकांमधला प्रवासही जर आपण प्रत्येक क्षणी स्वतःला सर्वच बाबतीत पराधीन समजून ‘असेल माझा हरी…’ म्हणत प्रयत्नांची पराकाष्ठा न करता खाटल्यावर झोपूनच रहाणार असू तर परमेश्वराने जे असं इतकं मोलाचं आपल्याला दिलेय त्याची पुसटशीही जाणीव आपल्याला कधी होणंच शक्य नाही!

 हे मोलाचं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर एका शब्दात द्यायचं तर शक्ति!

 शक्ती म्हणजे सामर्थ्य, कुवत,  क्षमता हे झालंच. पण शक्ति या शब्दात सामावलेलं याही पलिकडचं बरंच कांही शक्ति या शब्दाचे अर्थ व्यक्त करणाऱ्या अशा मोजक्या शब्दांत मावणारं नाहीय.

 शक्ति म्हटलं की चटकन् नजरेसमोर येते ती आपली शारीरिक क्षमता. सहजपणे दृश्य रूप असणारी,अनुभवता येणारी ही शरीरक्षमता शरीराच्या स्वाधीन मात्र नसते.ती पूर्णतःपरस्वाधिनच  असते. आपण आपली शरीरक्षमता शिस्तबद्ध आचार आणि प्रयत्न याद्वारे सक्षम ठेवू शकत असलो तरी ते आपल्या मनाची साथ असेपर्यंतच. मन अस्वस्थ असेल तर  मनातील भावनांच्या कल्लोळामुळे निर्माण होणाऱ्या  अस्थिरतेत ही प्रयत्नपूर्वक मिळवलेली शारीरिक क्षमता जशी वेगाने कमीही होऊ शकते तसेच एरवी स्वस्थ,आनंदी असणारे मनही आपल्या शारीरिक आजार,तक्रारी यामुळे निर्माण होणाऱ्या बेचैनीच्या सावल्यांनी ग्रासूनही जाऊ शकते.

 याचाच अर्थ शारीरिक शक्ति आणि मनोबल याचा विचार करता शरीर आणि मन दोन्हीही याबाबतीत पूर्णतः परस्परावलंबी असतात हे ओघाने आलेच. शरीरमनाचा हा एकोपा अबाधित ठेवणं बऱ्याच प्रमाणात आपल्या हाती असेलही कदाचित पण त्यासाठी आवश्यक असणारी सजगता मात्र खूप कमी जणांकडे असते.त्यासाठी आवश्यक आहे ते आनंदी जगण्याचं रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करणं.पण सर्रास भौतिक सुखाला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या आजच्या जीवनशैलीत ही रहस्यउकल सहजशक्य होणं कठीणच.कारण त्यांची निकड जाणवण्याइतकी उत्कट भावना व्यवहारी मन आणि विचारांमुळे निर्माण होणे अशक्यप्राय असते.

 जगणं आनंदी करण्यासाठी स्वतःच्या नैसर्गिक क्षमतांचे यथायोग्य आकलन करून घेऊन त्याचा योग्य वापर करणारे त्यामुळेच हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच असतील.

इथे स्वतःच्या नैसर्गिक क्षमता म्हणजे शारीरिक क्षमता किंवा मनाचा कणखरपणा, मनोबल वगैरे शब्दांतून व्यक्त होणाऱ्या मनाच्या क्षमता अभिप्रेत नाहीयेत. इथे अभिप्रेत आहे ते याही पलीकडचं ‘अंत:प्रेरणा’, ‘आतला आवाज’ वगैरे जिथून उमटतं कसं गृहित धरलेलं असतं ते. चराचर व्यापूनही कणभर उरत असणारं जे परमतत्त्व ते आपल्या अंतरातही जिथं वसलेलं असतं ते ! ते प्रत्येकाच्याच अंतरात असतंच !!

आपल्या विचारांमुळे, कृतीमुळे कुणालाही न दुखावता वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य विचार करून आपल्या      सद्सद्विवेकाला साक्षी ठेवून कार्यमग्न असणारी नास्तिक व्यक्ती देवाचं आस्तित्त्व न मानताही सुखी,आनंदी आणि यशस्वी जीवन जशी व्यतीत करु शकते तशीच एखादी आस्तिक व्यक्तीही देवपूजा,व्रतवैकल्ये, शुचिर्भूत विचार यांची कास धरून परमेश्वरावरील अतूट श्रद्धेने वाटचाल करीत जीवन कृतार्थही करू शकते.याचाच अर्थ वैचारीक बैठक वेगळी असली तरी आपल्या निसर्गदत्त क्षमतांचं महत्त्व जाणून घेऊन त्याचा पुरेपूर वापर करणेही अवघड नसते.या क्षमता हीच खरी निसर्गदत्त शक्ति! ही शक्ति नेमकी असते कुठे ?आणि ती सहजपणे जाणवत कशी नाही? असे प्रश्न पडले तरच त्यांच्या उत्तरांचा शोध सुरु होईल आणि त्या शोधवाटांवरचा प्रवासही!

या प्रश्नांचं उत्तर म्हंटलं तर अगदी सरळ साधं पण ते प्रथमदर्शनी तरी अनाकलनीय वाटेल असंच.

जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी जसा परमेश्वर तशीच ही परमशक्तीही ‘यत्र तत्र सर्वत्र’! त्यामुळेच ती अंशरूपाने आपल्याच अंतरातही वास करीत असतेच. ती सुप्त असल्यामुळे जाणवत नाही. तिला जाणून घेणे, ओळखणे हे जाणिवपूर्वक केले तरच शक्य असते.

आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेल्या असंख्य क्षमतांसारखीच अतिशय मोलाची देन म्हणजे आपलं अंतर्मन! आपलं अंतर्मन म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वाधीन असलेलं एक परमशक्तीकेंद्रच! निसर्गाकडूनच बहाल केलं गेलेलं ज्याचं त्याचं हक्काचं असं एक गूढ शक्तिपीठ! अगदी कलियुगातही थक्क वाटावेत असे चमत्कार घडवण्याची अपारशक्ती या शक्तीपीठातच सामावलेली आहे. वरवर पाहता आपल्या शरीर न् मनाची सूत्रं मेंदूकडे असतात असं आपण समजतो तो मेंदूही खऱ्या अर्थाने अधिकारकक्षेत येतो ते या अंतर्मनरूपी शक्तीपीठाच्याच! सर्वसाधारण दैनंदिन व्यवहार मेंदूच्या स्वाधीन करून अंतर्मन सुप्तावस्थेत रहाते खरे पण अचानक उद्भवलेल्या कसोटीच्या,आकस्मिक आणीबाणीच्या क्षणी आपल्याही नकळत तत्परतेने घडणाऱ्या आपल्या प्रतिक्षिप्त क्रिया घडवल्या जातात ते अंतर्मनाने समयसूचकतेने मेंदूला दिलेल्या तत्क्षणीच्या सूचनांमुळेच. अंत: प्रेरणा म्हणतात ती हीच! आपलं शरीर,मन,बुद्धी या  त्रिशक्तींचं भान सकारात्मक विचार आणि मूल्याधिष्ठित आचार यामुळे जाणिवपूर्वक प्रदूषणरहित ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण असेल तर अशा कसोटीच्या,आणीबाणीच्या, आकस्मिक संकटाच्या क्षणी कार्यरत होणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया एखादा चमत्कार घडावा तशी आपलं सुरक्षाकवच बनून आपल्याला सावरतात.आपलं रक्षण करतात. आणि त्या मागचं रहस्य माहित नसलेले आपण ‘माझी वेळ चांगली होती’, किंवा ‘ही परमेश्वराचीच कृपा’ असे म्हणून आपले समाधान करुन घेतो. पण ती खरंतर आपल्या अंतर्मनाच्या सुप्तशक्तीचीच किमया असते!ही परमशक्ती हाच आपला अंतरात्मा..! पण हे कार्यकारणभाव आपण कधी जाणीवपूर्वक समजून मात्र घेतलेले नसतात.

हे समजून न घेतल्यामुळेच आपल्या आयुष्यभराच्या या जगातल्या वास्तव्यात आपल्या अंतर्मनाच्या सुप्तशक्तीचा वापर फार फार तर एखादाच टक्का केला जात असतो आणि एवढी मोलाची बाकी राहिलेली 99% परमशक्ती मात्र कधी वापरलीच न गेल्याने सुप्तावस्थेतच नाहीशी होत असते!

एरवीची आपली इच्छा कितीही प्रबळ असली तरी ती इच्छाशक्ति आपल्या अपेक्षेनुसार म्हणावी तशी सक्षम असूच शकत नाही. ती जेव्हा आपल्या अंतर्मनातून तिथल्या आंतरिक सशक्ततेने  वर झेपावते तेव्हाच ती इच्छाशक्ति ‘उत्कट’ असते आणि अशी उत्कट इच्छाशक्तिच आश्चर्यकारकरित्या फलद्रूप होऊ शकते!

‘कुठे शोधीसी रामेश्वर अन् कुठे शोधीसी काशी….

हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी..’ अशी आपली अवस्था आहे ते हे अंतर्मनाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न आपण कधीच न केल्याने. ते गूढ उकलण्याच्या असंख्य सहजसोप्या वाटा शोधण्यासाठी निखळ श्रध्देचं बोट धरुन अध्यात्माच्या वाटेवर पडणारं आपलं पहिलं पाऊलच महत्त्वाचं. पुढची वाटचाल अंत:प्रेरणेनेच आपसूक सुकर होईल हे निर्विवाद!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

साधारणतः एखाद्या गोष्टीचा आपण आधी अभ्यास करतो, ती आत्मसात करतो आणि मग आपण त्या गोष्टीला मानायला लागतो. पण शाळेत असतांना एक बाई जणू छोटासा अभ्यासवर्गच घ्यायच्या. तेव्हा खरतरं स्वाध्याय, पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल तसं काहीही आधी माहीती नव्हतं.पण तो वर्ग आवडला आणि मग मी माझ्या परीने स्वाध्याय म्हणजे नेमकं काय, पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्याबद्दलची माहिती अभ्यासायला सुरवात केली आणि त्या माहितीचा, स्वाध्यायचा आवाका बघून अक्षरशः आवाक झाले.

….खूपदा आपल्याला आपल्यात करायच्या सुधारणा, बदल हे कळत असतात खरं, पण ते म्हणतात नं कळतं पण वळतं नाही ह्यानुसार हे बदल, ह्या सुधारणा अत्यावश्यक असूनही आपण चक्क त्याकडे कानाडोळा करतो. मानवी स्वभावच आहे तो. पण कधीतरी ती वेळ येते आणि आपण आपल्यात ह्या बदलांचं आणि  सुधारणांचं बी रोवायला लागतो. हा सकारात्मक बदल आपल्यात खूप चांगलं चिंतन,मनन केल्यानेच होतो हे नक्की. मग ही ऊर्जा आपल्याला अमूलाग्र बदलवते,चांगल्या सुधारणा घडवून आणते.

हे सगळं स्वाध्यायमध्ये पण समजावून सांगितले आहे. १९ ऑक्टोबर– स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन. मा. पांडुरंगशास्त्री हे मराठी तत्त्वज्ञ होते, व्यासंगी होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर ‘ मनुष्य गौरव दिन ‘ म्हणून साजरा करतात.आज स्वाध्यायचे लाखो अनुयायी कॅरिबियन, अमेरिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, मध्य पूर्व आणि आफ्रिका यासह ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये, प्रत्येक राहण्यायोग्य खंडात आढळू शकतात. श्री. आठवले यांचे ” देवाच्या दैवी पितृत्वाखाली वैश्विक बंधुत्व ” हे स्वप्न पूर्ण करणे हे स्वाध्याय परिवाराचे ध्येय आहे.

मा.पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. शास्त्रींनी सरस्वती पाठशाळेत पारंपरिक शिक्षण,संस्कृत व्याकरण, वेदांत,साहित्य, इंग्रजी भाषा साहित्य, ह्यांचा सखोल अभ्यास केला. त्यांना पुढे रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सदस्यत्व देऊन सन्मानित केले होते.

त्यांनी ग्रंथालयातील सर्व शाखेतील प्रमुख लेखकांच्या ग्रंथांचे अध्ययन केले. वेद,उपनिषदे, स्मृती, पुराणे ह्यावर चिंतन,मनन केले.  मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत पांडुरंगशास्त्री यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांच्या तेजस्वी जीवनवादाचा, म्हणजे थोडक्यात जीवन जगणे, जीवनाची आराधना करणे व जीवनावर खोल विचार करणे, ह्याचा प्रामुख्याने पुरस्कार केला.ह्या व्यासंगी व्यक्तीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले.इ.स. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमण्यम म्हणाले  ‘ विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहते. पांडुरंगशास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील देदीप्यमान आशेचा किरण आहेत.” खरचं किती अभिमानास्पद कर्तृत्व नं.

….अनुभवांच्या जोरावर मा.आठवले न्यायव्याकरणशास्त्रात व इंग्रजी भाषेत निष्णात झाले. वयाच्या २२ व्या वर्षी ते दादाजी भगवद्गीता पाठशाळेच्या व्यासपीठावरून रोज सायंकाळी भगवद्गीतेवर व रविवारी सकाळी सकाळी भारतीय परंपरेतील विविध दर्शनांवर व इतर विचारप्रणालींवर तरूणांचे अभ्यासवर्गही घेऊ लागले. दिवसभरातील मधला वेळ ते एशियाटीक सोसायटीच्या ग्रंथालयात आधुनिक मानव्य विद्यांवरील ग्रंथांचे वाचन करू लागले. त्याच बरोवर शरीरशास्त्राचाही अभ्यास केला. हा अध्ययन-अध्यापनाचा क्रम सततच चालू होता. जपानमध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांना जाण्याचा योग आला. या परिषदेतील ‘अवतारवाद ’  व ‘ सामाजिक शक्ती-भक्ती ‘ या विषयांवरील त्यांचे प्रतिपादन अत्यंत प्रभावी ठरले. डॉ. कॉम्प्टन या नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन पदार्थ वैज्ञानिकाने भरघोस आर्थिक प्रलोभनांसह अमेरिकेच्या व्याख्यान दौ-याचे दादाजींना आमंत्रण दिले. दादा अंतर्मुख झाले आणि जागतिक किर्ती व प्रचंड पैशांचे प्रलोभन नम्रपणे नाकारून ते मायदेशी परतले.

भगवंत केवळ आकाशात नाही, मंदिरात नाही, तर माणसा-माणसाच्या ह्रदयात आहे. माणसातल्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा हा  संदेश देणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले हे खरोखरच आदर्श, विचारवंत व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांनी सामान्य  माणसाला स्वतःची ओळख देण्याचं, त्याला उभारी देऊन सक्षम बनविण्याचे उदात्त कार्य पार पाडलं. अंधश्रध्दा, फसवा ईश्वरवाद, व्यसने आणि परिस्थितीपुढे हतबल झालेल्या समाजाला गीता-विचारांची दिशा दाखवणा-या हया स्वाध्याय चळवळीला आणि तिचे  प्रणेते  मा. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांना नुकत्याच झालेल्या जयंती निमित्ताने शतशः प्रणाम.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुसरी आई ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆  दुसरी आई  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

 एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले-

“आपल्याला काय होईल?

काय अपेक्षा आहे तुमची,

 मुलगा की मुलगी?

तुम्हाला काय वाटतं ?”

 

 त्यावर पती म्हणाला:-

“जर आपल्याला मुलगा झाला तर,मी त्याचा अभ्यास घेईन,

त्याला गणितं शिकवीन,

त्याच्याबरोबर मी मैदानावर

खेळायला, पळायला पण जाईन,पोहायला शिकवीन अशाअनेक गोष्टी मी त्याला शिकवीन.”

 

हसत हसत बायकोने

यावर प्रतिप्रश्न केला:-

“आणि मुलगी झाली तर?”

 

यावर पतीने खूप छान उत्तर दिले-

 

“जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही.”

 

 पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले-

 “का?असे का.?”

 

पती म्हणाला,

” मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल.

 

मी कसे आणि कोणते कपडे घालावेत,मी काय खायचं, काय नाही खायचं,कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे,

आणि काय नाही बोलायचं,हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल.

थोडक्यात जणू माझी

‘दुसरी आई’होऊन ती माझी काळजी घेईल.

 

मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन.

 

एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तोही ती आनंदाने समजून घेईल.”

 

पति पुढे म्हणाला-

“तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे.

 मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं, की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे.माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल.”

 

यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले-

“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का,

की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल,

आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही “

यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला:-

“अगं तसं नव्हे गं,कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल,

 पण त्याला हे सगळं शिकावं लागेल ,मुलीचं तसं नाही,

 मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात.

एक वडील म्हणून तिला माझा,आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल”

 

निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली,

“पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे?”

 

यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणाला-

“हो.तू म्हणतीयेस ते खरंय.ती आपल्या सोबत नसेल,पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही.कारण ती आपल्या सोबत नसली तरी,आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू.तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे!!

अगदी तिच्या शेवटच्या श्वासा पर्यंत.

 

 कारण,

 मुली ह्या परी सारख्या असतात,त्या जन्मभरासाठी, आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !

 

खरोखर मुली ह्या,

परी सारख्याच असतात!

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – पुष्प – भाग ४० – परिव्राजक १८. गोमंतक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार– विचार–पुष्प – भाग ४० – परिव्राजक १८. गोमंतक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

बेळगावहून स्वामीजी मार्मा गोवा मेलने निघाले आणि मडगाव येथे उतरले. बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर विष्णुपंत शिरगावकर यांनी गोव्यातल्या व्यवस्थेसाठी मडगाव इथले त्यांचे विद्वान मित्र सुब्राय लक्ष्मण नायक यांना परिचय पत्र दिले होते आणि स्वामीजींची निवास आणि भोजन व्यवस्था करायला सांगितली होती. स्वामीजींना घ्यायला स्टेशनवर नायक स्वत: जातीने हजर होते, तेही शेकडो लोकांच्या समवेत. आणि काय आश्चर्य त्यांनी स्वामीजींना घोडा गाडीतून मिरवणूक काढून समारंभपूर्वक घरी नेले. हे सर्व स्वामीजींना खूपच अनपेक्षित होते. आयुष्यात त्यांना असा अनुभव प्रथमच आला होता. स्वामीजींचा परिचय झाल्यावर त्यांनी सुब्राय नायक यांना आपला गोव्याला येण्याचा हेतु सांगितला. ख्रिस्त धर्माविषयीचे मूळ ग्रंथ त्यांना इथे अभ्यासायचे होते. ज्या ज्या प्रांतात जी जी वैशिष्ठ्ये असायची त्याची माहिती ते करून घेत.  

सुब्राय नायक हे तीव्र मेधाशक्ती असलेले वेदान्त आणि आयुर्वेद शास्त्राचे जाणकार होते. शिवाय संस्कृतमधील न्यायमीमांसा व  ज्योतिष यातही पारंगत होते. नायक हे त्यावेळी धार्मिक आणि सामाजिक नवजागरणाची धुरा वहात होते. त्यांच्यासाठी तर स्वामीजींचे आपल्या घरात वास्तव्य आणि सहवास म्हणजे एक चांगली पर्वणीच होती.

मठग्राम म्हणजेच मडगाव हे पोर्तुगीजांचा प्रभाव असलेले दक्षिण गोव्यातले ऐतिहासिक शहर. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मध्यभागी  पश्चिम घाटात वसलेला गोवा समुद्र तटावरील रमणीय भूभाग म्हणून सर्वांनाच आकर्षित करतो. १५१० पासून हा भाग पोर्तुगीजांच्या हुकूमाखाली जवळ जवळ साडेचारशे वर्ष होता. पोर्तुगीजांनी साम, दाम, दंड, भेद य मार्गाने इथले अनेक तालुके काबीज केले होते. आशियातले सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रा स्थळ, ‘बसिलिका ऑफ बॉम जिझस’ इथे गोव्यात आहे. प्राचीन मंदिरं आहेत. या वास्तू वैशिष्ठ्यपूर्ण वास्तूकलेसाठीही प्रसिद्ध आहेत. विवेकानंदांचा गोव्याला भेट देण्याचा हाच उद्देश होता. देवदर्शना बरोबरच गोव्यातली प्रमुख स्थळे, तिथली धर्मपीठे, जुने चर्च, फोंडा प्रदेशातील मंदिरे, पुरातन देवालये यांची माहिती करून घेणे आणि या प्रदेशातील ग्रामीण आणि शहरी लोकजीवन, समाजावरील धर्माचा प्रभाव व इतिहास जाणून घेणे हा पण दूसरा उद्देश होता.

सुब्राय नायक यांच्या घराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चारशे वर्षापूर्वी धर्मांध ख्रिश्चनांनी मडगावची ग्रामदेवता असलेल्या श्री दामोदर मंदिराचा आणि गावातल्या इतर हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंना गावात एकही मंदिर शिल्लक राहिलं नाही. अशा परिस्थितीत नायक कुटुंबाने श्री दामोदर या आपल्या कुलदेवतेला राहत्या घराच्या मोठ्या गर्भगृहात स्थान देऊन वाचविले आणि पुढे सर्व हिंदूंना ते भक्तीसाठी खुले करून दिले. इथेच नंतर मठग्रामस्थ हिंदू सभेची स्थापना केली गेली. मडगावातल्या आबाद फारीया  रोडवरचं ‘नायक मॅन्शन’ सामाजिक संस्कृतिक आणि नियमित उपक्रमाचं स्थान बनलं. याला दामोदर साल म्हणून ओळखतात. साल म्हणजे हॉल. गोव्यातील काही विशिष्ट घरांपैकी सुब्राय नायक यांचं पारंपारिक चौसोपी वाड्याचे एक प्रशस्त घर जिथे स्वामीजी काही दिवस राहिले होते.

स्वामीजींच्या सहवासामुळे त्यांची समाजोद्धाराची तळमळ, वैदिक तत्वज्ञानाद्वारे लोकांची उन्नती करण्याची त्यांची क्षमता, जीवनातील सर्वोच्च कर्तव्याविषयी असलेली अत्त्युच निष्ठा पाहून सुब्राय नायक प्रभावित झाले . स्वामीजींच्या गायन वादनातल्या परिपक्वतेचा अनुभव सुद्धा यावेळी गोवेकर मंडळींनी घेतला.

इथल्या वास्तव्यात स्वामीजींनी एकदा एक चीज काही रागातून पाऊण तास गायली. सर्वजण आश्चर्य चकित झाले. नायक यांनी, लयकारीची उत्तम जाण असलेले प्रसिद्ध तबला वादक व संगीतातल्या पिढीजात घराण्यात जन्मलेले खाप्रूजी अर्थात लक्ष्मणराव पर्वतकर, यांना बोलवून घेतले आणि स्वामीजींसमोर तबला वादन करायला सांगितले. त्यांनी सफाईदार तबलावादन सादर केले. हे ऐकून स्वामीजी म्हणाले, “लाकडाच्या खोक्याच्या कडेवर बोटे फिरवून आवाज काढता, तसाच आवाज वरच्या चामड्याच्या थरातून काढता आला पाहिजे”. खाप्रुजींना हे काही पटेना. त्यांना वाटलं स्वामी चेष्टाच करताहेत. तोच स्वामीजी उठले, कोचावरून खाली बैठक मारून बसले आणि तबल्याच्या चामड्यातून सुंदर आवाज काढून दाखविला. हा प्रकार पाहून सर्व श्रोते दि:ग्मूढ झाले. पर्वतकर यांनी स्वामीजींची क्षमा मागून साष्टांग नमस्कार घातला. याच खाप्रूमामा पर्वतकरांना पुढे १९३८ मध्ये प्रख्यात गायक अल्लादिया खाँ यांच्या हस्ते ‘लयभास्कर’ पदवीने गौरविण्यात आले. स्वामीजींची भेट ही पर्वतकर मामांच्या आयुष्यातली भाग्याचीच घटना म्हणायला हवी.

स्वामीजींना गोव्यातील ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुरातन लॅटिन ग्रंथातून ख्रिश्चन धर्माचा इतिहास व तत्वज्ञान याचा अभ्यास करायचा होता. तिथल्या समाजावर होणार्‍या धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घ्यायचा होता. असे दुर्मिळ ग्रंथ इथे उपलब्ध होते. रायतूर (राशेल) येथील सेमिनरी १५७६ मध्ये बांधलेले असे प्राचीन होते, तिथे प्राचीन हस्तलिखिते आणि मडगावतील प्रसिद्ध वकील जुजे फिलिप अल्वारीस यांना बोलवून स्वामीजीची ओळख करून दिली आणि सेमिनरी व तिथले ग्रंथ दाखविण्याची सोय नायक यांनी केली. तिथल्या पाद्रींची ओळख करून दिली, स्वामीजी दोन दिवस रायतूरला सेमिनरीत राहिले, स्वामीजींनी त्या सेमिनरीतल्या विद्यार्थ्यांची पण भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. आजही त्या लायब्ररीत स्वामीजींचा फोटो लावला आहे.

रायतूरच्या भेटीनंतर मडगावात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची जिकडे तिकडे चर्चा झाली. दूरदुरून पाद्री लोक तसेच ख्रिश्चन समाजातील अनेक विद्वान, जज्ज, बॅरिस्टर मडगावमध्ये त्यांना भेटायला येत. स्वामीजी फ्रेंच, लॅटिन, इंग्रजी भाषेत त्यांना आपली अभ्यासपूर्ण मतं समजाऊन सांगत. अशी अधिकारसंपन्न व्यक्ती सर्वजण प्रथमच पाहत होते, हे बघून सगळीकडे त्यांचं कौतुक होत होतं. सुब्राय नायक यांनी तर स्वामीजींच्या गुण गौरवासाठी श्री दामोदरच्या प्रांगणात मोठी सभा भरवली. याला लोक प्रचंड संख्येने हजर होते. त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेला जाण्यासाठी स्वामीजींना शुभेच्छा दिल्या. स्वामीजी वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयात ‘संचित,प्रारब्ध व क्रियामाण’ या विषयावर व्याख्यान द्यायला पण गेले होते. वेंगुर्ला हे अरब,डच, पोर्तुगीज या राजसत्तांनी निर्माण केलेलं महत्त्वाच व्यापारी बंदर होतं. इथे १६३८ मध्ये डच वखार होती. हा इतिहास जाणून घेण्यासाठी स्वामीजी प्रत्यक्ष तिथे गेल्याचे दिसते.

गोवा येथील कवळ्याच्या शांतादुर्गा मंदिरात त्यांनी काली मातेचं एक पद खड्या आवाजात म्हणून लोकांना मंत्रमुग्ध केलं होतं. म्हाडदोळच्या म्हाळसादेवी पुढे सुंदर ख्याल गायन केलं, श्री मंगेशाच्या देवळात रागदारीतलं ध्रुपद गायन केलं.

असा भरगच्च कार्यक्रम गोवा इथं पार पाडून स्वामीजी पुढच्या प्रवासासाठी धारवाडला जायला निघाले. तेंव्हा सुब्राय नायकांबरोबर अनेक प्रतिष्ठित लोक, शेकडो नागरिक, कॅथॉलिक पाद्री निरोप द्यायला आले होते. निघण्यापूर्वी नायकांनी स्वामीजींना एक फोटो काढून मागितला होता. हाच फोटो आज पण त्या दामोदर साल मध्ये लावला आहे. ज्या खोलीत ते राहिले ती खोली, त्या वस्तु आजही नायकांच्या वारसांनी सुरक्षित जपून ठेवल्या आहेत. सुब्राय नायकांनी पुढे १९१० मध्ये संन्यास घेतला आणि ते स्वामी सुब्रम्हण्यानंद तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले.  

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares