मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

??

☆ माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

….. काल 19 ऑक्टोबर 22 हा अख्खा दिवस फारच आनंदात गेला. कोथरूडला कमिन्स कंपनी समोर, मुलींच्या अंधशाळेच्या शेजारी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान आहे. त्यांच्यातर्फे २१ तारखेला धन्वंतरी पूजनाचा मोठा कार्यक्रम असतो. त्यासाठी त्यांनी हा संपूर्ण आठवडा दिनांक २३ पर्यंत तेथील जंगल पाहण्यासाठी आवाहन केले होते. आम्ही मैत्रिणी काल सकाळी नऊ वाजताच घरातून उत्साहाने निघालो. खूप लांबून लांबून कोणी कोणी आल्या होत्या. साडेदहापर्यंत तिथे सगळ्या एकत्र जमलो. सौ पल्लवी जमदग्नी ही माझी मैत्रीण आहे. तिने उत्साहाने आमचे स्वागत केले .त्यानंतर संपूर्ण जंगल पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी सुसज्ज आधुनिक कॅमेरा देऊन एक पुरुष आणि एक महिला आमच्याबरोबर दिली. त्या ठिकाणी खूप मोठे जंगल आहे. त्याला “ मियावाकी जंगल “ म्हणतात. 

मियावाकी हा जपानी शास्त्रज्ञ आहे. त्याने पडीक जमीन जिथे असेल तिथे औषधी वनस्पती लागवड करावी अशी सूचना केली. त्याप्रमाणे या संस्थानने या ठिकाणी भरपूर आयुर्वेदिक झाडे लावली. काही आपोआप देखील आली. पण अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडांची त्या ठिकाणी रेलचेल आहे. सुदैवाने काल वरुणराजाची कृपा झाली. चक्क ऊन पडले होते. त्यांनी आम्हाला मोठ्या मोठ्या छत्र्या दिल्या, ऊन लागू नये म्हणून. पण जंगलात शिरताच खूप सावली होती. तेथील सेवक अतिशय उत्साहाने प्रत्येक झाडाची माहिती देत होते. आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले पण त्यांनी न कंटाळता आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. तेथील आवळ्यांनी डवरलेले झाड पाहताच किती वय झाले तरी आमच्या महिला एकदम हरकून गेल्या आणि आम्हाला आवळी भोजनाला इथे परवानगी द्याल का असे बिनधास्त विचारले. त्यांनी देखील हसून परवानगी दिली. ते सारे जंगल, त्यातील पायवाटा, त्यातील अनोखे वृक्ष, त्यांना लगडलेल्या वेली, त्यावर आलेली फळे, फुले पाहून आम्ही देहभान हरपून गेलो. 

दोन तास त्या ठिकाणी हिंडत होतो .अधून मधून त्यांचे सेवक ट्रेमधून ग्लासातून स्वच्छ थंडगार पाणी आणून आम्हाला देत होते. अखेर त्यांनी एकच बाजू दाखवली आणि हॉलमध्ये आम्हाला येण्यास सांगितले. तिथे प्रत्येकाला स्वतंत्र बेंच, समोर खूप मोठे डेस्क होते . एकदम शाळेत गेल्यासारखे वाटले. तिथे गेल्या गेल्या अमृततुल्य चहा मिळाला. त्यानंतर काही भाषणे झाली. तेथील एका डॉक्टर महिलेने आयुर्वेदाविषयी अतिशय सुंदर माहिती दिली. आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखील दिली. त्यानंतर सर्वांना राजगिरा लाडू, केळी असा पौष्टिक खाऊ दिला. खूप सुंदर वाटले. खाली धन्वंतरीची सुबक मूर्ती होती. त्याची सुंदर पूजा ,रांगोळी मांडली होती. तो सगळा परिसर भारावून टाकणारा होता. अगदी “आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ” अशी अवस्था झाली होती . त्यानंतर आम्ही घरी परतलो पण येताना पल्लवी म्हणाली, तुम्ही जंगल निम्मेच पाहिले आहे पुन्हा याल तेव्हा उरलेले निम्मे दाखवते. 

हे सारे जंगल त्यांनी अवघ्या तीन वर्षात उभे केले आहे. कमाल आहे की नाही? आम्ही तर फोटो काढलेच पण तेथील सेविकेने भरपूर सुंदर फोटो काढून आज आम्हाला पाठवले. अगदी तृप्त तृप्त वाटले. ज्यांना हे जंगल पहायचे आहे त्यांनी खालील नंबर वर कृपया संपर्क साधून हा आनंद जरूर घ्यावा.

सुश्री पल्लवी जमदग्नी

8668514969

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प, भाग -४१  परिव्राजक १९.  कन्याकुमारी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प, भाग -४१  परिव्राजक १९.  कन्याकुमारी डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत.

महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, यावर महाराजांनी आवश्यक ती सर्व मदत तत्काळ करण्याची तयारी दाखवली होती पण, स्वामीजींनी प्रत्येक वेळेसारखा इथेही नकार दिलेला दिसतो. तरीही महाराजांनी स्वामीजींनी त्यांच्या आवडीची भेटवस्तू आमच्या कडून घ्यावी याचा खूप आग्रह केला आणि बाजारात कारकूनाबरोबर एक हजार रुपये देऊन स्वामीजींबरोबर पाठविले. त्यामुळे स्वामीजी त्यांच्या कौतुकासाठी सर्व बाजार फिरले आणि त्यांना बरं वाटावं म्हणून एक सर्वात उत्तम सिगारेट घेतली. ती एक रुपयाची होती. ती तिथेच ओढून संपवली. असे हे निरिच्छ वृत्तीचे स्वामीजी राजेरजवाड्यात पाहुणचार घेत ठिकठिकाणी राहिले होते पण, तेंव्हाही त्यांच्या डोळ्यासमोर खेडोपाड्यातली दरिद्री जनता आणि राज्यकर्त्याकडून दीन दुबळ्या प्रजेचे काहीतरी कल्याण होईल एव्हढाच विचार असायचा. क्वचित एखादाच राजा हे करू शकतो असा त्यांचा अनुभव होता. त्यातलेच हे म्हैसूरचे महाराज होते.

त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्‍या सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. महाराजांनी स्वामीजींची पाद्यपूजा कराची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी त्यांनी स्वामीजींचा आवाज एखादी आठवण म्हणून ध्वनीमुद्रित करून द्यावा अशी कल्पक मागणी केली. त्याला होकार दिला आणि त्या वेळच्या फोनोग्रामच्या तबकडीवर चार पाच मिनिटांचे बोलणे रेकॉर्ड करून घेतले. बर्‍याच वर्षांनंतर तो पुसट झाला. मग महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले.

त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्‍यांचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत.

(असा स्पष्ट उल्लेख स्वामीजींच्या चरित्र ग्रंथात आहे).

कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.

त्रिवेंद्रमला स्वामीजी सुंदरराम यांच्याकडे राहत असताना घरातील लहान, मोठे, नोकर, चाकर यांच्याशी पण मनमोकळे बोलत असत. एकदा, सुंदरराम यांचा चौदा वर्षांचा मुलगा रामस्वामी याला स्वामीजी म्हणाले, “तू अगदी तरुण आहेस,लहान आहेस. माझी फार इच्छा आहे की तू कधीतरी उपनिषदं, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता यांचा निष्ठापूर्वक अभ्यास कर. या तिन्हीना मिळून प्रस्थानत्रयी म्हणतात. त्याच बरोबर इतिहास पुराणाचा पण अभ्यास कर. या तोलामोलाचे ग्रंथ तुला सार्‍या जगात दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. कोणतीही गोष्ट कशामुळे निर्माण झाली, तिचं पर्यवसान कशात होणार, ती का अस्तित्वात आली आणि तिची दिशा कोणती? हे जाणून घेण्याची जिज्ञासा केवळ मानवप्राण्यातच असू शकते तिचा पूर्ण उपयोग करून घे”.

कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम  या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा  करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते.

स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरातील कालीमातेचं/जगन्मातेचं दर्शन घेऊन परिव्राजक म्हणून प्रवास सुरू केला तो आता कन्याकुमारी मंदिराच्या दर्शनाने संपणार होता.

या मंदिरात स्वामीजी गेले आणि कन्यारूपातील जगन्मातेचं दर्शन घेऊन बाहेर आले. तशी समोर लांबवर नजर गेली, दीड फर्लांग अंतरावर दोन प्रचंड शिलाखंड दिसले. आपल्याच भूमीवरच्या या शिलाखंडावर जायची त्यांना मनोमन इच्छा झाली. तिथे गेलो तर खर्‍या अर्थाने मातृभूमीचे दक्षिण टोक आपण गाठले असा अर्थ होईल. म्हणून कसही करून त्या खडकांवर आपण जाव असं वाटून ते किनार्‍यावर आले. जवळच होड्या होत्या. काही कोळी पण उभे होते. स्वामीजींनी चौकशी केली. त्या नावेतून खडकापर्यंत पोहोचविण्यास नावाडी तयार होते, फक्त पैसे द्यावे लागणार होते. स्वामीजी तर निष्कांचन होते. एक पैसा सुद्धा जवळ नव्हता. झळ त्यांनी त्या उंच लाटांमध्ये उडी घेतली पोहत पोहत जाऊन ते खडक गाठले. समुद्राला रोजचे सरावलेले असतांनाही नावाडी स्तब्धच झाले. लाटा उसळणार्‍या तर होत्याच पण तिथे शार्क माशांपासून पण धोका होता हे त्यांना माहिती होतं. हे पाहून दोन तीन नावाडी पाठोपाठ गेले. सुखरूप पोहोचले हे बघून, त्यांना काही हवे का विचारले. आम्ही आणून देऊ असे सांगीतल्यावर थोडे दूध आणि काही शहाळी पुरेशी आहेत असे स्वामीजींनी सांगितले. स्वामीजी या शिलाखंडावर तीन दिवस, तीन रात्र राहिले.ते दिवस होते 25,26,27 डिसेंबर 1892

लाटांच्या अखंड गंभीर नादाबरोबर स्वामीजींचे चिंतन सुरू झाले. कलकत्त्यातून बाहेर पडल्यापासुनचे सर्व दिवस, त्यात आलेले अनुभव, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. जगन्मातेचं ध्यान आणि भारत मातेचं चिंतन तीन दिवसात झालं.

प्रश्नचिन्ह – प्राचीन इतिहास असलेला हा विशाल देश, इतिहासाचे केव्हढे चढउतार, सार्‍या जगाला हेवा वाटेल असे प्राचीन काळातील द्रष्ट्या ऋषीमुनींनी दिलेले आध्यात्मिक धन. पण तरीही आज भारत कसा आहे? त्याची अस्मिताच हरवलेली दिसत आहे. सगळ्या मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्यं पूर्वजांकडून लाभली आहेत तरीही त्यातल्या तत्वांचा त्याला विसर पडला आहे. अभिमान वाटावा असं भूतकाळाचा वारसा आहे पण वर्तमानात मात्र घोर दुर्दशा आहे. यातून समाजाचं तेज पुनः कसं प्रकाशात आणता येईल?  अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती. उपाय शोधायचे होते.

आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल?त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ चिंतन करत होते.

प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. पण या दरिद्री देशात पैसे कुठून मिळणार? त्यांना आलेल्या अनुभवा नुसार धनवान मंडळी उदार नव्हती. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी. आता उरलेले आयुष्य भारतातल्या दीन दलितांच्या सेवेसाठी घालवायचे असा संकल्प स्वामीजींनी केला आणि शिलाखंडावरून  ते परतले. तीन दिवस तीन रात्रीच्या चिंतनातून प्रश्नाचं उत्तर स्वामीजींना मिळालं होतं.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 10 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 10 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

सांगावसं वाटलं म्हणून….10

अश्विन शुद्ध एक म्हणजे घटस्थापना!कधी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला सुरू होणारा तर कधी ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारा अश्विन महिना घेऊन येतो नवरात्रोत्सव आणि जाता जाता दीपोत्सव देऊन जातो.

घटस्थापनेला घटांची स्थापना केली जाते. शारदीय नवरात्रीला प्रारंभ होतो. ललितापंचमी, दुर्गाष्टमी, खंडेनवमी असे एक एक दिवस साजरे होत असतात. नऊ दिवसांचे, नव्हे नव्हे नऊ रात्रींचे, नवरात्र संपते आणि विजयादशमीचा दिवस उजाडतो.विजयादशमी म्हणजेच दसरा,दशहरा!असूरीय वृत्तींचा वध करून सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस.पारंपारिक सीमोलंघनाबरोबरच वैचारिक सीमोलंघन करण्याचा दिवस. अन्यायाचा प्रतिकार करून मानवतेचा संदेश पसरवण्यासाठी मानवी मनाचे परिवर्तन करण्याचा दिवस!नवरात्रीतील लक्ष लक्ष दीपज्योतीच सांगत असतात आता तमाचा नाश फार दूर नाही. या दीपाप्रमाणेच आकाशातील पूर्णचंद्राचा दीपही उजाळून निघतो आणि को जागरती,कोण कोण जागे आहे हे पाहण्यासाठी अश्विन पौर्णिमेला सहस्त्ररश्मी तेजाने उजळून निघालेला असतो.आकाशाचा तो नीलमंडप जणू काही मोग-याच्या फुलांनी बहरून जावा असा फुललेला असतो. चांदण्याची ही फुले प्रत्येक क्षण उल्हसित करत असतात. जणू काही ही पुढच्या आनंदमयी दिवसांची सुरूवातच असते.

अश्विनातील अमावस्येचा अंधःकार विरत जातो आणि कार्तिकातील पहिल्या पहाटेच घरोघरी दारापुढे पणत्यांच्या मंद ज्योती प्रकाशाचा निरोप घेऊन येतात. कधी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तर कधी नोव्हेंबरच्या सुरूवातीला सुरू होणारा हा प्रकाशोत्सव म्हणजेच दीपावली! दिवाळी. आनंद, उत्साह, तेज घेऊन येणारा हा सण. गोवत्स द्वादशी म्हणजेच वसूबारस, गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान,  लक्ष्मीचे पूजन करून समृद्धी आणि संपन्नता मिळावी म्हणून प्रार्थना करण्याचा लक्ष्मीपूजनाचा दिवस!. त्यानंतर येणारा, नवे व्यावसायिक वर्ष सुरू करणारा  आणि पती पत्नीतील प्रेम आणि विश्वास दृढ करणारा दिवाळी पाडव्याचा दिवस. दिवाळीतील पाडव्यालाच विक्रम संवत व महावीर जैन संवत या नववर्षांचा प्रारंभ होत असतो. 

भाऊ आणि बहिण यांच्यातील स्नेहाच्या मोत्यांच्या माळा गुंफणारी भाऊबीज. दीपांच्या मालिकांप्रमाणे एका मागोमाग एक  येणा-या या मंगलमयी दिवसांमुळे दीपावलीचे हे  पर्व सर्वत्र चैतन्य पसरवित जाते. नवे कपडे, भेट वस्तू, नवी खरेदी, फराळाच्या पदार्थांनी भरलेली ताटे, आतषबाजी, रोषणाई या सगळ्याची लयलूट करणारा हा दिवाळीचा सण मनाला एक वेगळीच उर्जा देऊन जातो.

हा ऑक्टोबर महिना अन्य काही कारणांसाठी लक्षात राहणारा असतो. महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती असते.तर हाच दिवस अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, पहिले अर्थमंत्री व साहित्यिक श्री.चिंतामणराव देशमुख यांचा हा स्मृतीदिन. याच ऑक्टोबर महिन्यातील दसरा  हा क्रांतीकारक सीमोलंघन करणारा ठरला तो धम्मचक्र प्रवर्तनामुळे. तर दुसरीकडे ईद-ए-मिलाद मुळे मुस्लिम धर्मियांसाठीही हा महिना तितकाच महत्त्वाचा.

जागतिक स्तरावर एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळला जातोच पण त्याशिवाय तो काॅफी दिन, संगीत दिन आणि रक्तदान दिनही आहे. पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन व सात ऑक्टोबर हा जागतिक वन्य पशू दिन आहे. आठ ऑक्टोबर हा भारतीय हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोबरला तर दहा ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल दिन पाळून टपाल खाते व कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेतली जाते. अंधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून त्यांना मदत करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर हा अंध सहायता दिन म्हणून पाळला जातो.जागतिक पोलिओ दिन चोवीस ऑक्टोबरला असतो तर तीस ऑक्टोबरला  बचत दिन साजरा करून बचतीकडे लक्ष वेधले जाते. एकतीस ऑक्टोबर या दिवशी भारतात राष्ट्रीय एकता दिवस  पाळला जातो.

याच महिन्यात महर्षि वाल्मिकी, श्री जलाराम तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते; तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राजे यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथि ऑक्टोबर महिन्यातच येते.

सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा विविध कारणांनी गजबजलेल्या या ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी हवेतही बदल होत जातो. थंडीची चाहुल लागते. दिवाळीच्या सुट्ट्या संपत आलेल्या असतात. त्या संपण्यापूर्वी पर्यटनाला उत्सुक असणारे पर्यटक घराबाहेर पडत असतात. त्याच वेळेस निसर्ग एक पाऊल पुढे टाकून आपला प्रवास चालूच ठेवत असतो.व र्षा ऋतुला पूर्ण निरोप देऊन शरद आणि हेमंत ऋतुचा आल्हाददायक अनुभव घेण्यासाठी काळ पुढे पुढे सरकत असतो.एका नव्या महिन्यात प्रवेश करण्यासाठी !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टर्निंग पाॅइंट…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ टर्निंग पाॅइंट…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

“ १० वर्षापूर्वी नुकत्याच लागलेल्या नवीन नोकरीवरून घरी परत येताना तो भयानक ॲक्सीडेंट झाला. डॉक्टरांनी दोन्ही हात कोपरापासून काढण्याशिवाय पर्यायच नाही हे सांगितले.फार मोठा धक्का होता तो घरच्यांसाठी.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही घटना घडल्याने भविष्याचा विचार केला की फक्त अंधार दिसायचा.

किती मेहनतीने, हुशारीने प्रतिष्ठीत आय आय टी मधे कॉम्प्युटर इंजिनीरिंग मिळवून मी सर्वोत्तम संस्थेत शिरलो होतो.. खूप सारी स्वप्न घेऊन !

ही घटना माझं पूर्ण आयुष्यं हादरवून टाकणारी होती.

अनेक शस्रक्रियांनंतर शेवटी दोन्ही हात कृत्रिम बसवायचा सल्ला दिला डॉक्टरांनी.. घरात एकच भयाण वातावरण पसरलं होतं पण दुसरा पर्यायच नसल्याने कृत्रिम हात रोपण शस्त्रक्क्रिया करावीच लागली.

रोज स्वत:चे असे हात बघून आयुष्यं खरंच जगायचं का ?हाच विचार मनात येऊन जायचा. 

मनातून  तर जवळजवळ संपलो होतो मी. दोन महिने झाले आणि त्या सततच्या परावलंबित्वाची, त्या सहानभूती भरलेल्या नजरांची अक्षरशः किळस यायला लागली होती. अनेक मित्र,नातेवाईक समजवायला यायचे.आयुष्यं असं थांबवून चालत नाही, जगावंच लागतं वगैरे सगळं. दुसऱ्याला सांगणं सोपं असतं. पण वेळ स्वतःवर आली की कळतं, हे मला पूर्ण समजलं होतं.आता त्या सूचनांचा रागही येणं बंद झालं होतं.आयुष्यं संपवण्याचा विचार हजारदा मनात येऊन गेला. पण आईबाबांकडे बघितलं की वाटायचं माझे हात गेले तर माझी अशी अवस्था झाली, मी तर त्यांचं  सर्वस्व आहे. मी त्यांना आयुष्यातून उठवू शकत नाही.

कुठलाही संकटकाळ असो जग पुढे जातंच राहतं….तसंच आषाढ संपून श्रावण महिना आला आणि घरोघरी सणाचे वेध लागले होते…

घरात कोणालाच काही साजरं करायची आतून पूर्ण इच्छा संपली होती. पण बाकी काही असलं तरी गौरी गणपती आले की त्यात काही हयगय आईला चालायची नाही. देवावर प्रचंड श्रद्धा आईची. ‘आपलं काहीतरी चुकलं असणार मागच्या वेळेस म्हणून आपल्या शेखरच्या बाबतीत असं झालं’ हीच चुटपुट तिचं मन खात होती. त्यामुळे ह्यावर्षी श्रद्धेचं रूपांतर थोड्या भीतीत झालं होतं.घराची साफसफाई करण्यापासून आईने सगळं करायला घेतलं. बघता बघता श्रावण संपत आला. घरी बाप्पा येण्याची सर्व तयारी झाली.

आज बाप्पा घ्यायला जायचं होतं….आम्ही ३,४ कुटुंब एकत्रच जायचो. मोठमोठ्या दुकानात न जाता थेट मूर्तिकारांकडून गणपतीची मूर्ती घ्यायचा आमचा नियम होता. मला मुळीच जायची इच्छा नव्हती, मनातल्या मनात त्या देवाशी रोज भांडायचो मी. ज्या हातांनी इतके वर्ष पूजा करून घेतली होती आईने, तेच हात देवाने माझ्यापासून  नेले होते. ‘गणपती आणायला म्हणून नाही निदान चक्कर मारून होईल म्हणून चल’ असे म्हणून सगळ्या मित्रांनी,आईबाबांनी बळजबरी गाडीत घातलं. मी जगतच माझ्या घरच्यांसाठी होतो, त्यामुळे झापडं लावल्यासारखा खिन्न मनाने त्यांच्याबरोबर निघालो.. 

दरवर्षी प्रमाणे मूर्तीकार शंकर काकांकडे पोहोचलो आम्ही. शंकर काका हे नाव लोकांनी खास दिलेलं होतं त्यांना त्यांचं मूळ नाव काय हे आता बहुदा त्यांनाही आठवत नसावं. गणपती बाप्पाची जन्मदात्री देवी पार्वती असली तरी त्याला गणपतीरूप देणारे भगवान शंकर होते.त्यामुळे गावातले सगळ्यात उत्तम गणपती कारागीर म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना शंकरकाका म्हणायला सुरुवात केली.

माझ्या अपघातानंतर ते पहिल्यांदाच मला बघणार होते. मला परत एकदा अनेक प्रश्नांना सामोरं जायचं होतं. मी बाजूला पडलेली एक खुर्ची घेऊन तिथे बसलो होतो. बाकीचे सगळे गणपती बघत होते. तेवढ्यात काका आले आणि शिल्पकाराची नजर ती- ताबडतोब माझ्या कृत्रिम हातावर गेली. ते काही विचारणार तेवढ्यात मी म्हणालो, “ ज्या हातांनी इतके वर्ष गणपती उचलून नेले ते हातच बाप्पा घेऊन गेला काका माझ्याकडून.आता हे उसने हात घेऊन जमेल तसं जगायचं ”

” शेखरभाऊ नशीबवान आहात तुम्ही बाप्पाच्या पंक्तीतले झाले आता… बाप्पाकडेपण त्यांचा मूळ चेहरा नाहीच की,

तो काळ असा होता की रागाच्या भरात शंकराने शीर धडावेगळं केलं त्यामुळे हत्तीचं तोंड बसवावं लागलं गणपती बाप्पाला .पण आजच्या काळात किती प्रगती झाली बघा. तुम्हाला कृत्रिम का होईना हाताच्या जागी हात बसवले आहेत. गणपती बाप्पाची सगळं जग आज बुद्धीची देवता म्हणून पूजा करतं कारण आपल्यात निर्माण झालेलं व्यंग त्यांनी वैशिठ्य असल्यासारखं जगासमोर ठेवलं. सगळे देव मानव साच्यात असतांना फक्त गणपती गजमुखात आहे पण जगात सगळ्यात जास्त घरांमधे सापडणार लाडकं आराध्य दैवत आहे.. दादा बघा, तुम्ही तुमच्यावर आलेली ही आपत्ती संधी म्हणून वापरायचं ठरवलं तर तुम्हीसुद्धा घरोघरी पोहोचाल. तुमचे फक्त हात कृत्रिम आहेत माणूस अजूनही तुम्ही तोच आहात.”

माझ्या अपंगत्वावर इतकी सकारात्मक प्रतिक्रिया त्या दिवशी मी पहिल्यांदा ऐकली.. मूर्ती घडवताना अवयवांना आकार देणाऱ्या त्या हातांनी माझ्या मनावर संजीवनी फिरवली होती. अचानक मला माझे हात न दिसता बाकीचं शरीर जाणवायला लागलं होतं. त्या जीवघेण्या अपघातात वाचलेलं ते अख्ख शरीर मला गेलं वर्षभर जाणवलंच 

नव्हतं .दोन हात सोडले तर मी बाकी पूर्णपणे धडधाकट होतो हे अचानक माझ्या लक्षात आलं होतं. इतके दिवस रोज उठून नसलेल्या हातांकडे बघण्यात मी माझ्या बाकी वाचलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करत आलो होतो.

कृत्रिम का होईना आज हाताच्या जागी हात होते. बाप्पाला तर गजमुख असूनही ते साजरं होतं, हा विचार कोणी शिकलेल्या माणसाने मला दिला नव्हता. तर असंख्य गणपतींना मूर्तरूप देणाऱ्या शंकर काकांनी दिला होता.

त्या विचारांनी जागी झालेली ही सकारात्मक ऊर्जा,आयुष्य जगायची इच्छा घरोघरी पोहोचवायचा प्रण केला मी.

दोन कृत्रिम हात आणि कॉम्पुटरचं  घेतलेलं ज्ञान ह्याच्या मदतीने वेगवेगळे कार्यक्रम बनवायला सुरुवात केली. आज १० वर्ष झाली, साडेअकराशेच्यावर शोज मी इन्फ्लुएन्सर म्हणून केले आणि आज ज्या नामांकित शिक्षण संस्थेत मी माझं शिक्षण घेतलं त्या संस्थेने मला सन्मानाने इथे तुमच्यासमोर बोलावलं आहे. करोडो लोकं त्यांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी आवर्जून माझ्या कार्यक्रमांना येतात. प्रत्येकात बाप्पाचा अंश आहे. गरज असते ती त्याची जाणीव व्हायची….. ‘ एखादी गोष्ट वेगळी असणं आपलं व्यंग नसून वैशिष्ठ्य आहे ! ’ ह्या विचाराने सुरुवात केली तर आयुष्यात खूप मोठी झेप घेणं अशक्यं नाही. माझा तो अपघात झाला नसता तर एखाद्या कंपनीत नोकरी करत कुठेतरी पोहोचलो असतोच .पण आज जी उंची मला मिळाली ती त्या घटनेनंतरच. घरोघरी पोहोचायचं माझं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं.

मित्रमैत्रिणीनो कुठलंही काम अशक्य नाही आयुष्याला दिशा देणारा टर्निंग पाॅईंट कधीही येऊ शकतो. एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणा आणि श्रीगणेशा करा.. ! 

धन्यवाद ! “ 

प्रिंसिपल सरांनी शेखरला कडकडून मिठीच मारली ! हे सर्व ऐकून संपूर्ण सभागृह जागीच उभे राहिले आपल्या दोन हातांनी टाळ्यांच्या कडकडाटात शेखरच्या कृत्रिम हातांची प्रेरणादायी कथा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेली होती.. एका वेगळ्या उर्जेचा संचार झाला होता सगळ्यांच्या मनात..

आयुष्याला कुठल्या दिशेने घेऊन जायचं हे एकदा मनाशी पक्क ठरवावं लागतं. चमत्काराला नमस्कार होणारच 

—- मग तो ईश्वराने घडवलेला असो किंवा सामान्य माणसाने.. नाही का ? 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

अल्प परिचय 

बॅंकेतून रिटायर झाल्यावर काही वर्षे एका खाजगी कंपनीत काम केले.

कामाच्या व्यस्ततेमुळे मागे पडलेली वाचनाची आवड परत सुरू केली. कविता लेखनाची सुरुवात झाली. कवितेचे रसग्रहण हा प्रांत ही आवडू लागला आहे.

? काव्यानंद ?

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहात कवीने प्रेम विषयक विविध भाव वेगवेगळ्या कवितांतून वाचकांसमोर उलगडले आहेत. उदात्त ,शाश्वत ,समर्पित प्रेम तर कधी विरहाग्नीत होरपळणारे तनमन ,प्रतारणेतून अनुभवाला येणारे दुःख ,कधी प्रेमाच्या अतूटपणाबद्दल असलेला गाढ विश्वास आणि त्या विश्वासातून एकमेकांकडे मागितलेले वचन अशा विविध प्रेमभावना अत्यंत तरल पणे व तितक्याच बारकाव्याने आणि समर्थपणे काव्य रसिकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत. या संग्रहातील वचन देई मला ही कविता अशीच प्रेमात गुंतलेल्या, रमलेल्या, प्रेमावर विश्वास असलेल्या प्रियकराचे भावविश्व आपल्यासमोर साकारते.

साधारणतः प्रियकर प्रेयसीला विसरतो अशी मनोधारणा असते.या कवितेचे वैशिष्ट्य असे की येथे प्रेयसी विसरेल अशी शंका प्रियकराच्या मनात आहे.रुढ मनोभावनेला छेद देणारी ही कविता लक्षवेधी ठरते.

कवितेतील प्रेयसी जर  कवितेतील प्रियकराला विसरली तर त्याच्या स्मृतीत तिने एक तरी अश्रू ढाळावा एवढी माफक अपेक्षा करणारा प्रियकर कवीने काव्य रसिकांसमोर शब्दांतून उभा केला आहे .

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

 विसरलीस जर कधी जीवनी एक वचन तू देइ मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।ध्रु।।

 

प्रीत तरल ना देहवासना ही आत्म्याची साद तुला

एकरूप मी तव  हृदयाशी क्षण न साहवे द्वैत मला

पवित्र असता प्रेम चिरंतन विसरणार मी कसे तुला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।१।।

 

जगायचे ते तुला आठवत मरणही यावे तुज साठी

कधी न सुटाव्या शाश्वत अपुल्या प्रेमाच्या रेशिमगाठी

मृत्यूनंतर येउ परतुनि प्रेमपूर्तीची आंस मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।२।।

 डॉ निशिकांत श्रोत्री

निशिगंध – रसग्रहण

प्रेम विश्वात रममाण असणाऱ्या प्रियकराच्या मनात उगीच शंका येते आणि तो प्रेयसीला म्हणतो की जर कधी जीवनात तू मला विसरलीस तरी एक वचन मात्र तू मला दे .ती विसरणार नाही याची खात्री विसरलीस जर या शब्दातून व्यक्त होते. तसेच पुढे तो म्हणतो की तू विसरलीस आणि जर कधी मी तुझ्या स्मृतीत डोकावलो म्हणजे त्याचा आठव जरी तिच्या मनात आला तर एक अश्रू मात्र तू ढाळ. भला हा शब्द अश्रूशी  निगडीत करताना तिच्या मनात त्याच्याविषयी कुठलाही गैरभाव ,गैरसमज नसावा हे सूचित केले आहे. विरह किंवा वियोग जर का झाला तर तो केवळ परिस्थितीमुळे होईल त्याच्या वर्तनाने नाही असा विश्वास या कवितेतून आपल्यासमोर व्यक्त केला गेला आहे .विसरली तरी प्रेयसी कडून वचन मागणारा, कधी तरी तिच्या स्मृतीत डोकावण्याची ,झाकण्याची मनोमन खात्री बाळगणारा हा प्रियकर मनाला मोहवून जातो.

ध्रुवपदामध्ये विसरलीस जर कधी ,तरी एक वचन दे, हा विरोधाभास मनाला भावतो.तसेच अश्रूला भला हे अत्यंत वेगळे विशेषण वापरले आहे.प्रियकराच्या सात्विक प्रेमाची साक्ष पटवणारा हा समर्पक शब्द कवितेतील आशयाला पुष्टी देतो.

 पहिल्या कडव्यात तो म्हणतो माझी प्रीत ही तरल निष्कलंक आहे .त्या भावनेत देहवासना,कामवासना नाही. तर ही आत्म्याची आत्म्याला साद आहे .तो खात्रीपूर्वक म्हणतो की तो तिच्या हृदयाशी एकरूप झाला आहे. ही समरसता, हे तादात्म्य आहे ते मनोमन झालेले आहे. त्यात अंतर नाही. त्यातले बंधन अनाठायी नाही.त्यामुळे कुठलेही ,कसलेही द्वैत अगदी क्षणा पुरते ही त्याला सहन होणार नाही.त्यांच्यातले प्रेम हे पवित्र तसेच चिरंतन आहे याची ग्वाही त्याच्या मनाला आहे त्यामुळे तो तिला कधीच विसरणार नाही हे ही तो स्पष्ट करतो. आणि असे असूनही जर कधी ती विसरली तर तो तिच्याकडून एकच वचन मागतो त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक भला अश्रू तिने ढाळावा.

देह व आत्मा यांचा उल्लेख प्रीतिला आध्यात्मिक उंची देतो.द्वैत व अद्वैत यांचा सुस्पष्ट व सुसंस्कृत विचार प्रेमाचा अर्थपूर्ण आविष्कार घडवतो.जे पवित्र ते चिरंतन हा साक्षात्कार प्रीतीच्या भावनेला पटणारा. एकरूप व द्वैत या विरोधाभासातून प्रीतिचे खरे स्वरूप प्रकटते. तुला, मला, भला अशा यमक सिध्दीने कवितेला सुंदर गेयता लाभली आहे.त्यामुळे कवितेतील भावार्थ सहजपणे लक्षात येतो.कवितेशी वाचकांची समरसता प्रस्थापित होते.

दुसऱ्या कडव्यात  प्रेयसीच्या केवळ एका अश्रूची  माफक अपेक्षा ठेवणारा तो म्हणतो की जे जगायचं ते तिला आठवत जगायचं आणि जर मरण आलं तर तेही तिच्यासाठी यावं असं त्याला वाटतं. सर्वस्व ,आपले जीवन तिच्यावर ओवाळून टाकण्याची त्याची मानसिक तयारी आहे. त्याच वेळी शाश्वत असलेल्या प्रेमाच्या रेशीमगाठी कधी न सुटाव्यात अशी योग्य व रास्त अपेक्षा तो बाळगून आहे .त्यांच्या प्रेमावर त्याची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्याला खात्री आहे जर कधी मृत्यू आला तर परत येऊन म्हणजे जणू काही पुनर्जन्म घेऊन आपण या इहलोकी परतू .कारण त्याला या प्रेमपूर्तीची आस आहे.स्वतः चे प्रेयसी वरील पवित्र,शाश्वत,निरंतर प्रेम याची कल्पना,जाण तिला देता देता प्राक्तनी कदाचित येईल अशा विरहाचा विचार त्याला सर्वथैव बैचेन करतो. त्यामुळे व्यथित तो प्रेयसीच्या प्रेमाविषयी खात्री असूनही साशंकता व्यक्त करतो.पण ती व्यक्त करताना ही त्यात तिच्या शाश्वत प्रेमाचा अर्थपूर्ण उल्लेख करतो.एकमेकांच्या सान्निध्यात जगत असताना चिरंतन प्रेमभावनेची जाण असूनही शाश्वत मरणाचे भान त्याला आहे.मृत्युने वियोग घडला तरी पुनर्जन्मी पुन्हा भेट होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.तुजसाठी, रेशिमगाठी हे यमक साधले आहे.रेशिमगाठी शब्द वापरून प्रीतिची मुलायमता अधोरेखित केली आहे.

 संपूर्ण कवितेत प्रीत भावनेला सुयोग्य पणे व्यक्त करताना समर्पक व सुलभ शब्द योजना कवीने केली आहे.त्यामुळे प्रीतिचा तरल, पवित्र शाश्वत भाव मनाला स्पर्शून जातो.भावनेचा खरेपणा व त्यातली आर्तता मनाला भिडते.साहित्यिक अलंकारांचा अट्टाहास न ठेवता भावनेचा प्रांजळ पणा जपण्याचे भान कवीने ठेवले आहे. कवीची साहित्यविषयक, भाषाविषयक व काव्य विषयक सजगता यातून प्रतीत होते.साधी पण भावुकतेत न्हालेली ही कविता सर्वांना आवडेल अशीच आहे.

© सुश्री नीलिमा खरे

३-१०-२०२२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्ट्रॅटॅजिक प्लॅनिंग…. ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्ट्रॅटॅजिक प्लॅनिंग…☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

Strategic Planning

तुम्हाला ठाऊक आहे का ??जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्याना ‘ Strategic Planning ‘ चा वस्तुपाठ म्हणून कोणत्या लढाई बद्दल शिकवले जाते..???

जगाच्या इतिहासात अशी लढाई पुन्हा झाली नाही…

२५ फेब्रुवारी

तो फक्त २८ वर्षांचा तरुण सेनापती होता.  त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुप्पट, वर कसलेला सेनापती. त्या तरुण वीराकडे सैन्य फक्त २५,००० आणि त्याच्या शत्रूकडे ४०,००० आणि ६५० तोफांचा त्या काळातील सर्वोत्तम तोफखाना.

नेमका तो तरुण सेनानायक राज्यापासून दूर दक्षिण दिशेला असताना, शत्रूच्या राजाने खुद्द राजधानीवर चाल केली, आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह…शत्रूची ही अपेक्षा की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल….पण…पण …घडले भलतेच : तो तरुण वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसता धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. शत्रूला आता त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो राजधानी जिंकण्याचा विचार सोडून त्या तरुण वादळामागे धावला, पण वादळच ते…कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते..त्यातून अचानक बातमी आली – ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूची खाशी राजधानीच मारणार …शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना. 

अन तश्यातच बातमी आली, शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरुण पोराने लुटून नेला…शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे…पाणीच तोडले, आधीच दमछाक आणि आता पाणी तोडले. 

अखेर व्हायचे तेच झाले…तो बलाढ्य, अनुभवी शत्रूराजा एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा सम्पूर्ण पराजय, तोही आपला एकही सैनिक न गमावता…

जगाच्या इतिहासात अशी लढाई झाली नाही…आजही जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांना ही लढाई Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते.

२५ फेब्रुवारी १७२८ – पालखेडची लढाई

तो बलाढ्य शत्रू  :- निजाम उल मुल्क 

वय : ५७,

ते तरुण वादळ :- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे 

वय : २८ फक्त….

आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा असा जाज्वल्य इतिहास माहीत असायलाच हवा…

पण आपले दुर्दैव की पेशवे म्हणजे  बाहेरख्याली. पेशवे म्हणजे मौजमजा करणारे, असं काहीस समोर आणलं जातं. पेशवे ब्राह्मण होते म्हणून त्यांचा  तेजस्वी इतिहास जाणून बुजून झाकून ठेवून विकृतपणा समोर आणला जातो. हे आपल्या गौरवशाली इतिहास असलेल्या देशासाठी घातक आहे…

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. ! …जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…! …जयंत जोशी  ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

“आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. !

….एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. जो जातो तो सुटतो , पण परीक्षा असते मागे राहणाऱ्याची…. कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार ? हे तर भगवंतालाच माहीत… 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं, हे रडणं थांबवायचं कुणी…? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?…. 

निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची….

थोडक्यात काय तर….दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे…..!

लक्षात ठेवा, लहानपणी आई वडिलांनी नेहमी मुलांचे अश्रू पुसलेले असतात, आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात, स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात,

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.

म्हणूनच आता ही आपली जबाबदारी असते… त्यांच्या सारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची….

असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील.  नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही, 

तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच, ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……

म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या ! केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा. त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी त्यांच्याशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

लक्षात असूद्या,आई वडील हेच आपले खरे दैवत, त्यांची जिवंतपणीच काळजी घ्या, ते गेल्यावर तुमचे चारिधाम अथवा लाखोंचे दान देखील तुमच्या कामी येणार नाही…..!!

लेखक : जयंत जोशी 

संग्राहिका : वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूमिका…एक जगणे ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ भूमिका…एक जगणे ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

भूमिका हा शब्द आणि विविध कलाकारांनी साकार केलेल्या,जिवंत केलेल्या असंख्य नाटके आणि चित्रपटांमधील  सकस भूमिका यांचं अतूट असं नातं आहे. या वाक्यात आलेले ‘साकार’, ‘विविध’ आणि ‘जिवंत’ या शब्दांचे अर्थरंग पूर्णतः समजून घेतल्याशिवाय ‘भूमिका’ या शब्दाचा सखोल वेध घेताच येणार नाही.

‘भूमिका’ या संदर्भात विचार करायचा तर भूमिका ‘साकार’ करण्यात त्या व्यक्तिरेखेला योग्य ‘आकार’ देणेच अपेक्षित आहे.’विविध’ हा शब्द इथे एखाद्या कलाकाराने भूमिकांद्वारे साकार केलेल्या व्यक्तिरेखांना उद्देशून आलेला असला तरी या ‘विविध’ शब्दात अंगभूत असणारे एखाद्या भूमिकेच्या संदर्भातले ‘वैविध्य’ही  कलाकाराने त्या व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास करून समजून घेणे आवश्यक असते. विशिष्ट भूमिका साकारत असताना त्या व्यक्तिरेखेची पूर्ण पार्श्वभूमी म्हणजे तिचे स्वरूप, स्वभावरंग, त्याच्या भोवतालची परिस्थिती, त्याचे वय, आर्थिक स्थिती, त्याची विचार करण्याची पद्धत आणि असं बरंच कांही असा त्या व्यक्तिरेखेचा सर्वांगाने केलेला अभ्यास ही त्या भूमिकेची अत्यावश्यक अशी पूर्वतयारी!नाटककाराने नाट्यसंहितेत केलेली व्यक्तिरेखेची बांधणी ही विशिष्ट ठिपक्यांच्या रांगोळीतील रेखाकृतीसारखी असते. दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या सहाय्याने त्या व्यक्तिरेखेच्या रेखाकृती रांगोळीत रंग भरण्याचे काम नटाला करायचे असते. हे रंगभरण म्हणजेच अभिनयाद्वारे भूमिका ‘जिवंत’ करणे! नाट्यसंहितेत त्या भूमिकेचा आलेख विविध घटना, प्रसंग,संवादातून सूचित केलेला असतोच. ते सूचन आणि स्वतःचा अभ्यास याद्वारे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाची अथपासून इतीपर्यंतची एक सलगरेषा नटाने आपल्या मनात ठळकपणे आखून ठेवायची असते. त्या सलगरेषेनुरुप रंगभूमीवर होणारी त्या भूमिकेची वाटचालच ती ‘भूमिका’ जिवंत करीत असते!

हे सगळं रंगभूमी किंवा चित्रपटातील भूमिकांबद्दलचे विवेचन आहे असेच वाटले ना?पण ते ‘फक्त’ तेवढेच नाहीय. कारण नाटक काय किंवा चित्रपट काय वास्तवाचा आभासच. त्यामुळेच त्या ‘आभासा’इतकंच हे विवेचन ज्या वास्तवाचा तो आभास त्या वास्तवालाही पूर्णतः लागू पडणारे आहेच!

रंगभूमीवरील वास्तवाचा आभास हा खरंतर जगण्याचाच आभास! तो आभास जितका परिपूर्ण तितक्या त्यातील भूमिका म्हणजेच संपूर्ण सादरीकरण जिवंत! भूमिका अशा जिवंत म्हणजेच वास्तव भासण्यासाठी जशी कलाकारांना आपापली भूमिका तिच्यातले बारकावे, खाचाखोचा, कंगोरे समजून घेऊन वठवावी लागते तसेच प्रत्यक्षात वेगवेगळ्या भूमिकांतून वावरताना आपल्यालासुध्दा त्या त्या वेळच्या भूमिकांच्या बाबतीत हे करावे लागतेच.

रंगभूमीवर क्वचित कांही अपवाद वगळता एका कलाकाराला एकच भूमिका पार पाडायची असते. पण ते करतानाही त्याच्या भूमिकेचे इतर भूमिकांशी असणारे संबंध, धागेदोरे,भावबंध,देणेघेणे,कर्तव्ये, जबाबदाऱ्या हे सगळं समजून घेऊनच त्याला आपली भूमिका साकार करायची असते. आपल्या आयुष्यात मात्र आपल्याला एकाच वेळी अनेक भूमिका वठवाव्या लागतात आणि त्या त्या वेळी इतरांच्या आपल्या भूमिकांशी असणारे संबंध, धागेदोरे,भावबंध, देणेघेणे, कर्तव्ये,जबाबदाऱ्या हे सगळं आपल्यालाही विचारात घ्यावे लागतेच.आपल्या या सगळ्याच भूमिका चांगल्या वठल्या तरच आपले जगणे कृतार्थ म्हणजेच खऱ्या अर्थाने जिवंत आणि त्या योग्य पद्धतीने नाही पार पाडता आल्या तर मात्र जगणं कंटाळवाणं, निरस आणि असमाधानी!

वास्तव जगण्यात आपल्या भूमिकांचे संवाद लिहायला कुणी लेखक नसतो. हालचाली बसवायलाही कुणी दिग्दर्शक नसतोच. नाटकातील घटना प्रसंग नाटककाराने नियत केलेले असतात आणि आपल्या आयुष्यातले घटना-प्रसंग नियतीने! तिथे नाटककाराने आपले संवाद चोख लिहिलेले असतात. आपल्या आयुष्यात मात्र काय बोलायचे हे आणि कसे बोलायचे हेही आपणच आपल्या बुद्धी आणि कुवतीनुसार ठरवायचे असते. तिथे दिग्दर्शक मार्गदर्शन करत असतो आणि इथे आपलेच अनुभव,आपण जोडलेली माणसे आणि त्या त्या वेळची परिस्थिती हे सगळे दिग्दर्शकासारखेच आपल्याला मार्ग दाखवत असतात. तिथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्यांच्या रुपातल्या प्रतिक्रिया नटाच्या भूमिकेला दात देत असतात आणि इथे आपल्याला मिळणारे कर्तव्यपूर्तीचे समाधानच आपल्याला पुढील वाटचालीसाठी आवश्यक ती उमेद,उत्साह देत रहाते.

वास्तव आणि आभासातलं हे साम्य वरवरचं नाहीय. खरंतर भूमिका वास्तव जगण्यातल्या असोत वा आभासी जगातल्या त्या ‘भूमिका’ या शब्दाच्या मूळ अर्थांची प्रतिबिंबेच असतात.हे कसे हे ‘भूमिका’ या शब्दाचे मूळ अर्थच सांगतील.  

‘भूमिका’  म्हणजे जसा अभिनय, तसंच भूमिका म्हणजे पीठिका,पवित्रा,आणि अवस्थाही.  भूमिका म्हणजे पृथ्वी.भूमिका म्हणजे जमीन,भूमीही.आपल्या वास्तव आयुष्यातल्या भूमिका या जमिनीवर,भूमीवर  घट्ट पाय रोवूनच वठवत गेलो तरच त्या जिवंत वाटतात नाहीतर मग निर्जीव. आभासी जगातल्या भूमिका वठवताना ‘रंग’ही गरजेचे आणि भूमीसुध्दा!म्हणूनच त्या जिथे साकार करायच्या त्या भूमीला ‘रंगभूमी’ म्हणत असावेत!

भूमिका कोणतीही,कुठेही वठवायची असो ती मनापासून वठवायला हवी हे मात्र खरे!कारण ‘भूमिका’ म्हणजे असे एक जगणेच जर, तर ते अगदी मनापासूनच जगायला हवे ना?

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्षणभंगूर…डॉ संजय मंगेश सावंत ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ क्षणभंगूर…डॉ संजय मंगेश सावंत ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी साडेतीन चारची वेळ होती. ओपीडी  संपवून नुकताच जेवणासाठी वर निघालो होतो. कॉरिडॉरमध्ये खुर्चीवर एक पंच्याहत्तरीच्या आसपासच्या आजी बसल्या होत्या. त्यांची  रक्त लघवी चेक केली होती व रिपोर्टची वाट बघत त्या बसल्या होत्या. आजी नेहमी दवाखान्यात यायच्या. शांत स्वभाव, चेहऱ्यावर सात्विक भाव, स्वभाव इतका गोड की त्यांच्या सुनादेखील त्यांचं कौतुक करायच्या. आजीदेखील  सुनांचं कौतुक करायच्या. सून आणि सासू एकमेकींचे कौतुक करतात ही बहुतेक क्वचितच आढळणारी गोष्ट, पण या आजींच्या बाबतीत ते खरं होतं,,,

जिना चढताना मी एक क्षण थबकलो. वाटलं आजी बराच वेळ बसून कंटाळून गेल्या असतील, त्यांना चहाला वर घेऊन जावं. पण  नंतर विचार केला आता वेळ खूप जाईल, जेवण उरकून मावडीच्या ओपीडीला जायचं होतं , चहासाठी आजीना वर  घेऊन गेलं तर पुन्हा दहा-पंधरा मिनिट वेळ जाईल आणि सगळे शेड्युल बिघडून जाईल.  म्हटलं बघू उद्या किंवा पुन्हा कधीतरी ,,, जेवण करून  मग खाली आलो त्यावेळी आजी निघून गेल्या होत्या.  कम्पाउंडरला रिपोर्ट दाखवला होता व तो नॉर्मल असल्याने त्या थांबल्या नव्हत्या. उशीर झालाय, उद्या येईन पुन्हा दाखवायला असे त्यांनी त्याच्याकडे सांगितलं ,,

दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्ता करून खाली साडेनऊ वाजता ओपीडीत गेलो तर खुर्चीवर बसल्याबसल्या कंपाउंडरने सांगितलं की काल लॅबसाठी आलेल्या आजी रात्री हार्ट अटॅकने गेल्या…. मी निस्तब्ध !! क्षणभर काहीच सुचेना ! चालता-फिरता माणूस गेला की धक्का  बसतो. मृत्यू अटळ आहे. तो असा शांतपणे योग्य वेळी आला तर कधीही चांगलीच गोष्ट. परंतु मला खंत या गोष्टीची वाटत होती की काल आजीना चहासाठी घेऊन गेलो असतो तर किती बरं झालं असतं ! मी खूप व्यथित झालो. या घटनेला इतकी वर्ष झाली पण अजूनही ही गोष्ट कायम मला खटकते !         

आपल्याला नेहमी वाटत असतं की आपलं आयुष्य खूप मोठं आहे. एखादी  गोष्ट करायची असेल तर आपण म्हणतो बघू भविष्यात करू,उद्या करू. पण बरेचदा ती वेळ व संधी हातातून निसटून जाते व उरतो तो केवळ पश्चाताप, एक गिल्टी फिलिंग !! देऊ नंतर , करू नंतर , बघू नंतर , जाऊ नंतर, याला काही अर्थ नसतो. कारण तुम्ही आत्ता जो क्षण उपभोगीत असता तोच खरा असतो, दुसऱ्या क्षणावर देखील तुमचा अधिकार नसतो !!

मध्यंतरी ऑगस्टमध्ये माझा थोरला भाऊ covid- ने गेला. उमदा, निरोगी,चालता-फिरता,थोरला असूनही आमच्यापेक्षा ॲक्टिव्ह. हॉस्पिटलमध्ये घेऊन जातानाही एकदम उत्साही. त्याला सगळं टापटीप लागायचं. गाडीत बसण्यापूर्वी मला म्हणाला, “ दाढी वाढली आहे  दाढी करून घेतो “.  मी म्हटलं “ कशाला आता वेळ दवडतोस– हॉस्पिटलमध्ये तर जायचंय !!”   पण शेवटी हॉस्पिटलमधून तो घरी परत आलाच नाही. दोन मिनिटात त्याची दाढी झाली  असती, मी त्याला उगाच अडवलं असं अजूनही मला वाटतं ,, आम्ही चौघं भाऊ– मी धाकटा आमच्यामध्ये.  अजून कधीही वादविवाद भांडणतंटा झाला नाही , इतकंच काय पण आम्ही एकमेकांशी मोठ्या आवाजात देखील कधी बोललो नाही. परंतु तो गेल्यानंतर अजूनही मला सतत वाटत राहते की अजूनही आपण त्याच्याशी चांगलं वागलं बोललं पाहिजे  होतं, जास्त संवाद साधला पाहिजे होता. तो दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्यात किंवा काही फंक्शन असेल तर मूर्टीला  यायचा. स्वभावाने अबोल , कधी कधी भरपूर वेळ असायचा पण मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा त्याच्याशी अजून जास्त गप्पा मारल्या असत्या तर खूप बरं झालं असतं असं आता वाटतं. पण आता वाटून काही उपयोग नसतो. गेलेला क्षण, गेलेली वेळ ही कधीही परत येत नसते !! कटू प्रसंग तर प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. परंतु त्याला बगल देऊन पुढे गेलं पाहिजे. नाहीतर नंतर वाटत राहतं की आपण आपल्या आयुष्यातील बरेच क्षण , वर्ष , दिवस हे विनाकारण वाया घालवले आहेत !!! कारण जर-तर ला आयुष्यात काहीही महत्त्व नसते !

बऱ्याच वर्षापासून आम्हाला आमच्या दहावीच्या बॅचचं गेट-टुगेदर घ्यायचं होतं. अनेक वेळा चर्चा व्हायच्या, तारखा ठरायच्या , कॅन्सल व्हायचं. आम्हाला ज्या सरांनी घडवलं, मार्गदर्शन केलं, कुटुंबातील एक सदस्य असल्यासारख सांभाळलं ,आई वडिलांनंतर त्यांचे स्थान होतं- अशा त्या जे बी  गाडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली है  गेट-टुगेदर व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. मी वैयक्तिक या विषयावर त्यांच्याशी अनेकदा  बोललो होतो , पण  आमचं निश्चित होत नव्हतं …  आणि  एक दिवस सर अचानक अकाली मोठा धक्का देऊन आमच्यातून निघून गेले.  खरेतर या गेट-टुगेदर चे उत्सव मूर्ती हे आमचे सरच  होते. परंतु बघू, नंतर करू, असं म्हणत आम्ही ती संधी गमावली ,, नंतर 1 वर्षापूर्वी आम्ही हे गेट-टुगेदर घेतलं.  सर्व शिक्षकांना बोलवलं , सगळे विद्यार्थी आले होते.  पण गाडेकर सरांची अनुपस्थिती म्हणजे आमच्यासाठी देव नसलेल्या देव्हाऱ्यासारखी स्थिती होती !!!

आपण साधुसंत बनू शकत नाही कारण आपण सामान्य संसारी माणस आहोत , म्हणून माणसासारखंच वागलं पाहिजे. जास्त मित्र नाही जमवता आले तरी चालेल, पण किमान शत्रूंची संख्या तरी कमी करू शकतो– ते आपल्या हातात असतं ,,, आपण बरेचदा एखाद्याला विनाकारण अपशब्द बोलतो, त्याचा अपमान करतो किंवा त्याच्याशी तुटकपणे वागतो. खरंतर या गोष्टींची काही गरज नसते. आपल्या असल्या वागण्याचा पश्चाताप आपल्याला नंतर होतो, पण त्यावेळी त्याचा काही उपयोग नसतो कारण वेळ निघून गेलेली असते. आणि शब्दांनी झालेल्या जखमा या भरून येणार्‍या नसतात व त्याचा परिणाम म्हणजे आपण अनेक मित्र , स्नेही , नातेवाईक गमावतो.  इतकंच काय पण आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आपण बरेचदा विनाकारण बोलत असतो , कळत नकळत अपमान करीत असतो. या गोष्टींमुळे आपण आपले आयुष्य तर कमी करत असतोच पण त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स देखील खराब करीत असतो. प्रत्येक वाईट कृतीमागे, रागावून चिडून बोललेल्या प्रत्येक वाक्यामागे आपण आपलं आयुष्य  काही क्षणांनी , मिनिटांनी  कमी करीत असतो.  

म्हणून मित्रांनो, मिनिमाईज दि एनिमी , मिनिमाईज बॅड वर्ड्स , मिनिमाईज अँगर , डिपॉझिट फ्रेंड्स अँड डिपॉझिट रिलेटिव्हस !! कारण गेलेला क्षण व वेळ परत येत नाही !!!! 

लेखक : डॉ संजय मंगेश सावंत, मुर्टी , बारामती

प्रस्तुती : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 ‘वाटेवर काटे वेचित चाललो

वाटले जसा फुलाफुलात चाललो’

रेडिओवर हे गाणे लागले होते. ऐकताना ती तल्लीन झाली होती आणि तिच्या डोळ्यापुढून तिची वादळवाट गेली. होय अगदी खडतर वाट, बिकट वाट अशी तिच्या आयुष्याची वाट.

हिला जन्म देताच तिची आई देवाघरी गेली आणि तेथूनच दु:ख वाटेत आडवे आले . तिची ही पाऊलवाट खाचखळग्याची वाट झाली.

जणू दु:ख तिच्या वाटेत पडले होते. ते वाटेत अडथळे निर्माण करत होते. शेवटी तिनेच दु:खाशी वाटाघाटी केल्या. त्या अनवट वाटेवरची वाटसरू होऊन वाट भरकटू नये म्हणून ती वाटाड्या शोधत होती.

आता कोणती वाट धरायची हे ठरवायला तिला चारी वाटा मोकळ्या होत्या. थोडा विचार करून तिने एक वाट निवडली.  पण हाय रे दुर्दैव! तेथेही दु:ख वाट वाकडी करून तिच्यापर्यंत आलेच. जणू त्या वाटेवर तिला वाटचकवा लागला होता. पुन्हा पुन्हा ती दु:खापाशी येत होती.

आता तिला वाटेत येणार्‍या दु:खाला वाटेला लावायचे होते. त्याचीच वाट लावून न परतीच्या वाटेवर त्याला सोडायचे होते. दु:खाच्या मागे आनंद सुखे वाटेवर पायघड्या घालून उभे आहेत हे तिला जाणवत होते.

पण आनंद सुखाच्या वाटेला जाणे वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी तिला वाट फुटेल तिकडे जाऊन उपयोगी नव्हत. जवळची वाट, लांबची वाट असा विचार न करता सुसाट वाट तरीही भन्नाट वाट तिला निवडायची होती.

एक दीर्घ श्वास घेताच आत्मविश्वास तिच्याच वाटेत उभा असलेला दिसला. तिला वाट दिसत नव्हती म्हणून तिची वाट तिनेच निर्माण करण्याचे ठरवले. दु:खांची वाट चुकवून त्यांची लागलेली वाट पाहून सुखाच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली होती.

प्रयत्नांचा असलेला वाटेवरचा दगड तिला खुणावत होता. जिद्द, चिकाटी तिचे यशाचे वाटेकरी झाले होते. ही डोंगराची वाट, वाकडी तिकडी वाट, वळणावळणाची वाट असली तरी आता जणू नवी वाट फुटली होती. सगळ्या य़शस्वी लोकांची धोपट वाट त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत असते हे तिला कळले होते. म्हणून हीच निसरडी वाट तिला तिच्या यश फुलांची वाट करायची होती.

म्हणूनच दुसर्‍या कोणाचेही न ऐकता मनाची साद ऐकून दुसरी वाट न स्विकारता दुर्मुखतेची वाट सोडून चोर वाटा , पळवाटा यांना काट देऊन रानवाटेलाच वहिवाट करून मेहनतीने तिने दगडी वाट तयार केली.

आता कोणी तिच्या यशाची, सुखाची वाटमारी करत नव्हते. उलट तिला आपला आदर्श मानून तिच्या वाट दाखवण्या कडे, तिची यशोगाथा तिच्याच मुखाने ऐकण्यासाठी डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघू लागले.

ती सगळ्यांचा अभिमान बनून, एक चांगला आदर्श बनून, उजळमाथ्याने तिची यशोगाथा सगळ्यांना सांगत होती••••

“दु:खाने कितीही वाट अडवली ,आपली वाट मळलेली वाट झाली असली तरी वाईट विचारांच्या आडवाटेने न जाता आपल्या मेहनतीने जिद्द चिकाटीची वाट हीच सरळसोट वाट आहे मानून आत्मविश्वासाला सहवाटसरू करून आपलीच वाट आपल्या पायाखालची वाट केली तर यश किर्ती केवळ तुमची आणि तुमचीच आहे,” या वाक्याने संपलेल्या तिच्या स्फूर्तीकथेने टाळ्यांचा कडकडाट झाला आणि  आनंदाश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली . साश्रू भरल्या नयनाने ती म्हणाली, ” याच खर्‍या प्रकाशवाटा असतात.”

लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares