मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लिसनर… सुश्री राधा पै ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ लिसनर… सुश्री राधा पै ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

खरे तर त्याच मेन्यू कार्डची त्याला उत्सुकता, प्रतीक्षा असते. दोन्ही कार्डांवर बारकाईने नजर टाकून तो वेटरला ऑर्डर देतो. थोड्या वेळाने तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि सोबत एका सुंदर तरुणीला घेऊन येतो. समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते. ‘हॅव ए गुड टाइम.. एन्जॉय !’ अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो.

 टेबलावर ते दोघेच. अनोळखी. अपरिचित. काही क्षण नि:शब्द जातात. मग दोघेही एकमेकांचा परिचय करून देतात. या जुजबी ओळखीपाळखीनंतर ‘ति’च्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते. दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद हळुवारपणे रंगत जातो. उभयतांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगलेला असतानाच वेटर बिल घेऊन येतो. दोघांचाही हिरमोड होते. ‘पुन्हा भेटू’, म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन तो हॉटेलबाहेर पडतो!

‘लिसनर’ नावाच्या शॉर्टफिल्मचे हे संक्षिप्त कथानक. जगभर ही फिल्म दाखविली गेली आणि तितकीच नावाजलीही गेली. ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता-अमेरिकेतील वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या ‘ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख. ‘संवाद हरवलेली कुटुंबं’ हा त्या लेखाचा विषय. अर्थात, तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर आणि त्यातही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, आयबीएमसारख्या आयटी कंपन्यात काम करणाऱ्या कपल्सवर आधारित. ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं (सोशल मीडिया) जन्माला आली तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, हा त्या लेखाचा निष्कर्ष. या ‘लिसनर’ शॉर्टफिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत, जिथे तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं! मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतात! ते तुमच्यात गुंतत नाहीत; पण तुम्हाला गुंतवून ठेवतात. भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून तासभर संवाद साधायला ‘गिऱ्हायकं’ येतील की नाही, याबाबत हाॅटेलमालक थोडे साशंक होते. पण त्यांची शंका क्षणभंगुर ठरली. बघता-बघता अशा प्रकारची ‘टॉक-टाइम’ हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली!

संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली, राहणीमान उंचावले, पण कामाचा ताण, नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं आपल्या घरात आहेत. ही केवळ नोकरदार वर्गाची समस्या नाही.

विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या मानसिक आजाराचे शिकार आहेत. मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत या विषयावर अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. विशेषत: कोरोना महामारीनंतर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमागे संवादाचा अभाव हे कारण असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ हे त्याचे एक प्रमुख लक्षण. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे, पण ऐकणारेच कुणी नाही, अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकले आहे. हा कोंडमारा जीवघेणा ठरतो आहे. परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी वाचून आई-वडिलांना धक्काच बसला. त्याने लिहिले, ‘मी गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय; पण तुम्ही ऐकूनच घेत नाही. माझ्याच घरात जर कुणी ऐकणारं, समजून घेणारं नसेल तर मी कोणाजवळ मन मोकळं करू?’ या मुलाने लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराने आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे! अन्यथा, पैसे देऊन संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देणारी हॉटेल्स आपल्याकडेही येऊ घातली आहेच!

सारांश : बोला, व्यक्त व्हा, संवाद साधा, कुठेतरी मन मोकळे करा. मित्र, मैत्रिणी असो की नातलग

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सरप्राईज ट्रीप…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सरप्राईज ट्रीप…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा का आपल्या मनाने आस्तिकता स्विकारली की आपली प्रत्येक देवदेवतांवर श्रद्धा ही बसतेच. कुठलीही मुर्ती, फोटो दिसला की आपण आपोआपच नमस्कार करतो. कुठलाही प्रसाद मिळाला की तो लगेच डोळे मिटून भक्तीभावाने ग्रहण करतो. कुठल्याही देवाचा अंगारा कपाळाला लावतो,पण जेव्हा कधी आणीबाणीची परिस्थिती येते, संकटाचा सामना करायचा असत़ो, काही निर्णायक प्रसंग समोर उभे ठाकले असतात, किंवा अतीव सुखाची अचानक अनुभूती झालेली असते तेव्हा मात्र हटकून आपल्या डोळ्यासमोर आपलं परम दैवतच येतं,कठीण प्रसंगी आपण जास्तीत जास्त त्याचाच धावा करतो वा अतीव सुखाचे क्षण उपभोगतांना क्षणोक्षणी त्या परम दैवताचीच आठवण करतो.

अर्थातच आपली प्रत्येकाची श्रद्धास्थान ही वेगवेगळी असू शकतात. कारण ह्या श्रद्धेचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडल्या गेलेला असतो. आपलं परम दैवतं हे आपण अनुभवांनी घरात नित्य बघितल्याने, मनापासून निवडलेलं असतं. काल महाशिवरात्र झाली. माझंही परम दैवत शिवशंभो महादेव. त्यावरून ब-याच आठवणी जाग्या झाल्यात, गाठीशी आलेल्या अनुभवांच्या पुरचुंडीची गाठ जरा सैलसर झाली

महाशिवरात्री ला बँकेला सुट्टी असते त्यामुळे जरा निवांतपणा. ह्या दिवशी दोन्ही वेळी उपास असतो. त्यामुळे फराळाला लागणारी निम्मी तयारी ही अधल्या दिवशी करता येते, नव्हे ती तशी करुन ठेवणचं जास्त सोयीचं पडतं.

तसं तर नेहमीच देवळात वा मंदिरात सकारात्मक उर्जा तेवत असते. शांत व पवित्र वातावरणामुळे मन पण प्रसन्न राहातं. काही विशिष्ट दिवस हे त्या दैवताच्या पूजेसाठी खास असतात अशी आपल्या मनाची धारणा असते. हे दिवस सुखद भावनिकदृष्ट्या आपल्याला पाठबळं देतात. आपल्याला ज्या देवाची ओढ असते,ज्याच्यावर आपली मनापासून भक्ती असते,ज्याचा दर्शनासाठी आपल्याला नित्य जावसं वाटतं तेच आपलं परमं दैवतं असतं.

मागील महाशिवरात्रीला लिहीलेल्या पोस्ट मध्ये मी यवतमाळ व अमरावती मधील प्राचीन जागृत शिवमंदारांबद्दल लिहीले होते. माझे स्वतःचे परमदैवत शिवशंभू महादेव तर आमच्या “अहों”चे परमदैवत प्रभू श्रीरामचंद्र. ज्या नवराबायकोंच्या आवडीनिवडी ह्या विरुद्ध असतात ते “काँमन नवराबायको”. आणि विरुद्ध आवडीनिवडी असून सुद्धा जे परस्परांच्या आवडींचा मान ठेवतात, आदर करतात ते “स्पेशल नवराबायको”. त्यामुळे माझ्या शिवभक्तीचा आदर करीत आठ दहा वर्षांपूर्वी “अहोंनी” मला सरप्राईज ट्रीप म्हणून सोरटीसोमनाथ येथील महादेवाचे दर्शन घडविले तो क्षण माझ्यासाठी अमुल्य क्षणांपैकी एक होता. गुजरात मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रम साठी जायचे असल्याने त्यांनी ह्या ट्रीप चे नियोजन केले होते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे सोरटीसोमनाथ. पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

समुद्रकिनारी वसलेल्या ह्या मंदिरामध्ये खूप प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, प्रसन्न वातावरण ,अद्भुत शांती आपल्याला अनुभवायला मिळते हा माझा स्वानुभव. तेथे देवळाच्या कंपाऊंड वाँलपर समुद्राच्या महाकाय लाटा आदळतात आणि जणू ह्या लाटांचे रुप बघून मनात,संसारात असलेल्या छोट्या छोट्या लाटा अवघ्या काही मिनिटात विरुनच जातात जणू.खूप जास्त माझ्या आवडीच्या ठिकाणां पैकी हे एक ठिकाण. तेथेच अहिल्याबाई होळकर ह्यांनी जिर्णोध्दार केलेलं अजून एक शिवमंदिराच्या दर्शनाचा अभूतपूर्व योग आला.

ह्या महाशिवरात्रीच्या पर्वावर जुनी आठवण परत एकदा जागी झाली. ह्यासाठीच कदाचित सणसमारंभ, उत्सव असावेत असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -3 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -3 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पहिले, मुली आणि सुना यात त्यांनी कधी फरक केला नाही. मुलीही माहेरी आल्या आणि हात-पाय पसरून गप्पा मारत बसल्या असं कधी झालं नाही. आजी म्हणत, ‘कामावे ते सामावे.’ आता इथून पुढे)

आजी नि नातवंडे यांचे भावबंध मायेने थबथबलेले, सायीसारखे स्निग्ध, साखरेसारखे गोड, हे तर शाश्वत सत्य. माझ्या सासुबाईंचेही आपल्या नातवंडांवर- पतवंडांवर खूप प्रेम होते. त्यांना पतवंडेही होती. चांगली मोठी, जाणती होती. ही पतवंडे म्हणजे माझ्या पुतणीची, दादांची मुलगी माधुरी हिची दोन मुले. ती त्यांना पणजीबाईच म्हणत. खेळताना मुले पडली की त्या म्हणत, ‘पडो, झडो माल वाढो.’  आमच्या सुशीताईंची मुलगी सुनंदा भारी हळवी, म्हणून आजींचे तिच्या भावांना सांगणे असे, ‘उगीच तिला चिडवू नका. ती हरीण काळजाची आहे.’ त्यांच्या बोलण्यात अशा म्हणी, वाक्प्रचार नेहमी असायचे.

आजींना नातवंडांचं कौतुक होतंच. नातवंडांनाही या आपल्या आजीचं तितकंच अप्रूप होतं. नातवंडांना आजीचं कोणतं रूप भावलं? यमुताई ही त्यांची पहिली नात. धाकट्या मुलाच्या बरोबरीची. मोठी मुलगी आक्का, हिची मोठी मुलगी. तिचं आमच्याकडे येणं आणि रहाणं सर्व नातवंडात जास्त झालेलं. तिला आजीच्या गृहव्यवस्थापनातले कायदे आठवतात.  सकाळी उठल्यावर प्रत्येकाने पाच घागरी पाणी ओढायचे. त्यावेळी सगळंच काम घरात असे. स्वयंपाक चुलीवर. जेवणं झालं की प्रत्येकाने आपापलं ताट, वाटी, भांडं याबरोबरच चुलीवरचं एक जळकं भांडं घासायचं. पुरुषांनीसुद्धा. शिळं काही उरलेलं असेल, तर सगळ्यांनी वाटून खायचं. पुरूषांना तेवढं ताजं आणि बायकांना शिळं, असा भेदभाव नव्हता. शिळं टाकायचं नाही, हे मात्र नक्की होतं. ‘अन्न हे पूर्णब्रम्ह.‘ त्या म्हणायच्या. आजीच्या व्यवस्थापनाबद्दल तिची धाकटी बहीण कमल सांगते, ‘ सुट्टी असली की आम्ही माधवनगरला जायचो. सांगलीहून माधवनगर फक्त दोन –तीन मैलांवर. त्या काळात शेंगा फोडून शेंगदाणे वापरायची पद्धत होती. मग आजी मुलांपुढे शेंगांची रास ओतायची आणि म्हणायची भांडंभर दाणे काढले की मी एक रुपया देईन. मग जत्रेतून काय हवं ते तुम्ही घ्या. जो जास्त दाणे काढेल, त्याला जास्त पैसे. ‘ दाणे काढल्यावर पैसे मिळणार, म्हटल्यावर आम्ही इरीशिरीनं दाणे काढायचो. मुलांना जत्रेसाठी पैसे मिळायचे. आजीचे काम व्हायचे.’  त्या काळात धुणं- भांडी याव्यतिरिक्त सगळी कामे घरात असत. शेंगदाणे नव्हे, वर्षाची शेंगांची पोती घेतली जात. त्या काळात माधवनगरला विठोबाची, हरीपूरला शंकराची जत्रा भरे. आजी हौसेने नातवंडांना घेऊन जत्रेला जात. टांग्याने हरिपूरला जाण्याचेही आकर्षण असे. मीदेखील तीन-चार वेळा त्यांच्याबरोबर जत्रेला गेले होते.

माझ्या लग्नाच्या वेळी घरी संपन्नता आली होती, पण सासूबाई कधी आपले जुने दिवस विसरल्या नाहीत आणि गरजावंताला मदत केल्याशिवाय कधी राहिल्या नाहीत. त्या काळात आणि एकूणच आयुष्यात ‘जिथे कमी, तिथे मी’ या वृत्तीने त्या जगल्या आणि हाच वसा त्यांनी आपल्या मुली – सुनांनाही दिला. नातेवाईकांमध्ये कुणाची अडचण आहे असं कळलं की त्या निघाल्याच आपली पिशवी घेऊन त्यांच्या मदतीला. गावात कुणाला गरज असेल, तर त्या धावायच्या. गरजवंताची गरज भागवणे, हीच त्यांची दान-धर्माची कल्पना होती. कुणासाठी काही केलं, मग ते नातेवाईक असोत वा परिचित वा आणि कुणी, ते बोलून दाखवायचा त्यांचा स्वभाव नव्हता.

माझ्या जाऊबाईंची बाळंतपणे सांगलीत झाली. डॉक्टर सहजपणे उपलब्ध होणं, हे त्याचं कारण. माझ्या जाऊबाईंची म्हणजे आमच्या वहिनींची माहेरची स्थिती त्या काळात हलाखीची होती. वडील गेलेले. चार भावंडे शिकणारी. आजींना परिस्थितीची कल्पना होती. त्या नातवंडांना बघायला गेल्या की सुनेच्या हातात पैसे ठेवून येत. त्यातही विहीणबाई जवळ नाहीत, असं बघून त्या पैसे देत. त्यांच्या सन्मानाला ठेच लागू न देता मदत करायची, असं धोरण. मला दहा वर्षांनी मुलगा झाला म्हणून त्याचं नाव अमोल ठेवलं. त्या काळात माझं माहेरी करण्यासारखं कुणीच नसल्यामुळे माझं बाळंतपण सासरीच झालं. माझ्या मुलाची मुंज आम्ही त्यांच्यासाठी आठव्या वर्षी केली. मुंज झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘आता मी मरायला मोकळी झाले.’ अर्थात त्यानंतर, त्या नऊ वर्षे जगल्या. वयाच्या ९२ वर्षापर्यंत त्या जगल्या. शेवटची दोन वर्षे त्यांना भ्रम झाला होता. सारखं पोटात दुखतय म्हणायच्या. औषध म्हणून श्रीखंडाची गोळीही दिलेली चालायची. अगदी आजारी, हांतरूणावर पडून अशा त्या फक्त चार-सहा महिनेच होत्या. बाकी त्यांनी आपलं जीवन आनंदात, सुखा – समाधानात, तृप्तीत, इतरांच्या आनंदात आनंद  मानत घालवलं.

आमच्या वहिनींच्या मावशी माधवनगरलाच रहात. त्यांच्या यजमानांना फारसं बरं नसे. त्या स्वत: फारशा शिकलेल्या नव्हत्या. शाळेत जाणार्‍या चार मुली आणि एक मुलगा. घराची शेती भाऊबंदांच्या वादात. त्यांना आजींनी मसाले, पापड, शेवया, तिखट , पुरणपोळ्या इ. करून विकायचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, ‘लोक काय म्हणतील, याचा विचार करू नकोस. लोक जेवायला घालणार आहेत का?’ मावशींचे पहिले ग्राहक आम्ही असू. आजी म्हणायच्या, ‘आपले चार पैसे जास्त गेले, तरी चालतील, पण ती आणि तिच्या घराचे अन्नाला लागले पाहिजेत. आजी त्यांना पोथी वाचून दाखवायला सांगत. त्यासाठी त्यांना पैसे देत. आजींचं हे रूप माझ्या डोळ्यापुढचं. इचलकरंजीला माझ्या दोन नंबरच्या वन्स सुशीताई रहात. त्यांच्यासमोर सौंदत्तीकर म्हणून जावा-जावा रहात. त्यांच्यापैकी धाकटीची स्थिती फारच हलाखीची होती. आजी एकदा त्यांना म्हणाल्या, ‘तुझ्या हातात कला आहे. लोकांचं शिवणकाम, भरतकाम करून दे. हलव्याचे दागिने कर आणि वीक. चार पैसे मिळतील. संसारात ते उपयोगी पडतील.’ त्यांनीही आजींचा सल्ला मानला. चार पैसे मिळू लागले. संसाराला मदत झाली.

सल्ले केवळ दुसर्‍यांनाच असत असं नाही. आम्हालाही असत. संक्रांतीच्या वेळी बायकांना हळदी-कुंकवाला बोलावून काही ना काही लुटायची पद्धत होती. त्या म्हणत,  ‘रुपया – दोन रुपयाची वस्तू तुम्ही लुटणार. त्याचा घेणाराला फार काही फायदा असतो, असं नाही. त्यापेक्षा यासाठी जेवढे पैसे तुम्ही खर्च करणार, तेवढ्या पैशाची एखादी वस्तू, एखाद्या गरजावंताला द्या. साडी म्हणा, एखादा मोठं भांडं म्हणा, चादर वगैर म्हणा, किंवा आणखी काही…. तिला गरज असेल ते.’ गरजू स्त्री ब्राह्मणाचीच असावी, असा त्यांचा हट्ट नसे. दान-धर्म, त्यातून मिळणारं पुण्य यावर त्यांचा विश्वास होता, पण दान-धर्माच्या त्यांच्या कल्पना मात्र आधुनिक होत्या.

शिक्षणाचं महत्व त्यांना होतंच. लग्न झालं, तेव्हा मी फक्त पदवीधर होते. लग्नानंतर बी. एड., एम. ए., एम. एड. हे सारं शिक्षण आजींच्या मान्यतेनं आणि प्रोत्साहनानं झालं. घरचा राबता मोठा. मला नोकरी. त्यातही एम. ए., करायचं ठरवलं. याला होकार देताना आजींनी आणखी एक गोष्ट व्यवहाराच्या दृष्टीने केली. ‘तुझी नोकरी आणि अभ्यास, त्यामुळे तिच्यावर ( माझ्या जाऊबाईंवर ) कामाचा जास्त बोजा नको. तुम्ही वेगळे रहा. मी माझ्या डोळ्यांदेखत तुम्हाला घर मांडून देते. वेगळे रहा. गोडीत रहा. गरजेप्रमाणे एकमेकींना मदत करा.’ या व्यवस्थेमुळे, मला माझ्या सोयीप्रमाणे काम करता आलं आणि अभ्यासाठी वेळ काढता आला. आम्ही दोघांनीही त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागायचा, आमच्याकडून शेवटपर्यंत प्रयत्न केला. आता आजीही नाहीत आणि त्यांचा वसा चालवणार्‍या जाऊबाईही नाहीत. मात्र त्यांनी आणि मी आजींचा वसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला आहे.

क्रमश: – भाग ३

©  सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

मिरज तालुक्यातील गवळेवाडी गावातील घटना. शाळेच्या मैदानात खेळताना, मुलांना पाच फूट लांब आणि दोन इंच जाडीचा भला मोठा नाग दिसला. सदैव संरक्षणात तत्पर असलेल्या ‘ भालू ‘ या कुत्र्याला आणले गेले. नागाला पाहताच ‘भालू ‘ ने नागावर झडप घातली. आणि ‘ भालू ‘ आणि नागाची झुंज सुरू झाली . ‘भालूने ‘ नागाला आपल्या तोंडात धरून फेकून दिले .नागानेही आक्रमक होऊन ,भला मोठा फणा काढून, ‘ ‘भालू ‘ वर हल्ला करून त्याला दंश करण्यास सुरुवात केली. नाग फुसफुस आवाज करू लागला. दोन तासांच्या झुंजीनंतर ‘ भालू ‘ने नागाला जेरीस आणून ठार मारले. ‘भालू ‘ कोणालाही जवळ येऊ देईना. नाग मेल्याची खात्री झाली. आणि मगच तो घरी परतला. नागाच्या दंशाने ‘भालूच्या ‘ तोंडाचा  चेंदामेंदा झाला होता. काही तासातच त्याचे अंग सुजायला लागले. तोंडाला फेस यायला लागला. तो बेचैन होऊन लोळायला लागला .काही वेळाने आपल्या मालकाकडे पहात एका जागी झोपून राहिला. कर्तव्यपूर्ती करून चिरनिद्रेत विलीन झाला. डफळ्या रंगाच्या ,उंच ,सडपातळ, मोठ्या दमाच्या, शिकारी आणि पराक्रमी भालूला आजही गावकरी विसरले नाहीत.

एखादा कुत्रा पराक्रमी असेलच असे नाही.  पण दैवी म्हणावे असे सुंदर रूप आणि उत्तम अभिनय परमेश्वराने त्याला बहाल केलेले असते. त्यावर तो अलोट पैसा आणि जागतिक कीर्ती मिळवू शकतो आणि आपल्या मालकालाही मिळवून देतो १९४२ ते ४४ सालची गोष्ट. कॉलेजातीचा ‘कॉल ‘ त्याचे नाव. अत्यंत हूड असा कुत्रा. त्याच्या हूडपणाला कंटाळल्यामुळे मालकाला नकोसा झाला म्हणून त्याला त्यांनी विदर्भातल्या  डॉक्टरला देऊन टाकला. खरंतर ही जात थोडी अर्धांग आणि भोजरी असून सुद्धा पाच-सहा महिन्यात तो अवघड कामही उत्तमरीत्या करू शकला.  एके दिवशी पेपरमध्ये केली जातीचा कुत्रा पाहिजे अशी हॉलीवुडची जाहिरात आली.  ३०० कुत्र्यांचा इंटरव्यू झाला आणि त्यामध्ये कॉल ची निवड झाली.  ट्रेनरना खूप आनंद झाला.  लसीकरण होम या चित्रपटासाठी त्याची निवड झाली चित्रपटाचा नायक एक कुत्रा असूनही तो चित्रपट खूपच गाजला.  कितीतरी देशात तो चित्रपट दाखवला गेला आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. आणखी चित्रपटांसाठी अनेक देशातून पत्रे आली.  अनेक करारही झाले.  आता त्या 

कॉल ची कमाई वार्षिक ५० हजार डॉलर झाली.  लागोपाठ आणखी पाच सहा चित्रपट निघाले. काही वेळा तो प्रेक्षकात हास्याचे फवारे उडवायचा, तर कधी डोळ्यात अश्रूही उभे करायचा.  लसीकरण होम चित्रपटानंतर तो लसी म्हणूनच प्रचलित झाला.  लोकांनी त्याला डोक्यावर घेतले.  त्याच्या रेखाचित्रांची मासिके निघाली.  शाळेत शिक्षक त्याच्या निष्ठेच्या गोष्टी मुलांना सांगायला लागले.  धर्मोपदेशक त्याच्या निष्ठेवर प्रवचने देऊ लागले.  तो हॉलीवुडचा एक अमोल कुत्रा झाला.  श्वान प्रदर्शनात फक्त उपस्थित राहण्यासाठी एक दिवसाचे एक हजार डॉलर्स मिळत असत.  त्याचे सहा चित्रपट होईपर्यंत त्याने शूटिंग साठी वीस हजार मैलांचा प्रवास केला होता– कधी रेल्वेच्या वातानुकूलित खास डब्यातून, कधी खास बांधणीच्या स्टेशन वॅगनमधून, इतकच काय पण स्वतःच्या विमानातूनही तो प्रवास करीत असे.  एकदा कॅनडामध्ये शूटिंगला गेलेला असताना सैनिकांच्या हॉस्पिटलमधून त्याला पाहण्यासाठी निमंत्रण आले.  त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सैनिकांचे चेहरे एकदम खुलले.  त्याला प्रत्यक्ष पाहून सैनिकांना खूप आनंद झाला, कारण त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्याला पाहिलेले होते.  एक आश्चर्य म्हणजे एक दीर्घकाळ पडून असलेला सैनिक लसी ला पाहून ताडकन उठून बसला.  त्याचा हात चाटून त्याला शेकहॅण्ड  केले.  डॉक्टरांनी आणि औषधांनी जे काम झाले नव्हते ते लसीने केले.  किती कौतुक करावे त्याचे बरं.

आजकाल मेडिकल क्षेत्रात डॉग थेरपी म्हणून कुत्र्याचा वापर केला जातो. परदेशात ज्येष्ठ नागरिकांसाठी कंप्यानियन म्हणून कुत्रा पाळतात. आणि त्याला शिकवतात. ते   ज्येष्ठांचे चोरापासून ,धोक्यापासून रक्षण करतात. एखाद्याला एपिलेप्सीचा त्रास असेल, आणि कुत्रा बरोबर असेल ,तर त्या व्यक्तीला चक्कर येण्यापूर्वी काही क्षण कुत्र्याला अगोदर जाणीव होते. आणि तो त्या व्यक्तीला त्याचे कपडे पकडून खाली बसवतो, आणि सावध करतो… जर्मनीतील म्युनिच शहरातील घटना.  ‘आर्को ‘ हा एक म्हातारा कुत्रा. ५६ वर्षाच्या एकट्याच राहणाऱ्या वालडरमनने  त्याला ठेवून घेतले .एके दिवशी  वालडरमनला रस्त्यातच हार्ट अटॅक येऊन तो खाली पडला. ‘आर्को ‘ ५०  मीटरवर पळत जाऊन पादचाऱ्यांवर भुंकायला लागला. आणि त्यांना घेऊन  मालकाजवळ आला. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले .बरे वाटून परत घरी आल्यानंतर मालकाची सेवा करण्यासाठी आणखी काही वर्षे  तो जगला .” मी म्हातारा झालो तरी काय करू शकतो ” हे त्यांनी दाखवून दिले. मालकावरच्या निष्ठेला शब्दच अपुरे आहेत.

 कधी कधी एखाद्याचे दैव कधी उजळेल सांगता येत नाही. आमच्या  घरापासून ,रस्त्याच्या कडेला  झुडुपात एका कुत्रीने चार पिल्लांना जन्म दिला. आठ दहा दिवसांनी पिलांची आई कुठे गायब झाली समजले नाही. पिले रात्रंदिवस आईसाठी भुकेने ओरडत होती. त्यांची आई आली तर चावेल, म्हणून कोणी पिलांना उचलण्याचे धाडस करत नव्हते. अखेर माझ्या मैत्रिणीने त्याना उचलून घरी आणले. दूध-खाणे सुरू केले. त्यांच्या बाललीलांनी सगळ्यांना लळा लावला. दोन पिलांना कोणीतरी सांभाळायला घेऊन गेले. उरलेल्या दोघांची नावे ‘ बंड्या’  आणि  ‘ गुंडी ‘ अशी ठेवली गेली. काही  कौटुंबिक अडचण आल्याने ‘ बंड्या ‘ आणि ‘ गुंडीला’  ” पीपल फॉर ॲनिमल” च्या संस्थेत पाठवले गेले. इतर प्राण्यांबरोबर दोघेही छान रुळले. संस्थेतील काही गाढवांना उटीला पाठवायचे होते. उटी , (मसिन गुडी)  या ठिकाणी डॉक्टर मिसेस एलिना वोटर आणि डॉक्टर नायजेल वोटर (नॉर्वेचे भारतात स्थायिक झालेले व्हेटर्नरी डॉक्टर ) यांनी २० एकर जागेत “इंडिया प्रोजेक्ट फॉर नेचर” ही संस्था  स्थापन केली आहे. तेथे गाढवांबरोबर गुंड्या आणि बंडी यांनाही पाठवले गेले. परदेशस्थ काही संस्था आणि व्यक्ती अशा प्राण्यांना दत्तक घेतात. बंड्या आणि गुंडीच्या फोटोची जाहिरात झाली. यु .के. मधील एका प्रसिद्ध बँड ग्रुपचे गायक  पाँल प्राणीप्रेमी होते .त्यांनी फोटो, कागदपत्रे यांची पूर्तता केली .त्यांची नावे बदलून त्यांचे ‘ पॉल ‘म्हणजे (स्वतःचे) आणि  नँन्सी (बायकोचे) असे नामकरण केले. दत्तक विधान झाले . ‘बंड्या’ आणि ‘गुंडी’  मराठी जोडी  पाँल आणि नॅन्सी अशी इंग्लिश झाली. रस्त्याच्या कडेला झुडुपात जन्माला आलेली, रात्रंदिवस आईविना भुकेने व्याकुळ होऊन ओरडत राहिलेली ,’बंड्या ‘ आणि ‘ गुंडी ‘  म्हणजेच  पाँल आणि नॅन्सी उटीला आनंदी आणि मुक्त जीवन जगायला लागले. कसं नशीब असतं ना एकेकाचं !

 — क्रमशः भाग तिसरा . 

 ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ आत्मपरीक्षण…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

आपल्या जीवनात आपण योग्य मार्गावर असण्यासाठी वेळोवेळी स्वतःचे तटस्थपणे आत्मपरीक्षण करता आले पाहिजे.एकदा एक गोष्ट वाचण्यात आली…..

एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.

तरुण : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?

तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खूश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो.

तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.

महिला :  नको. मी एका महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.

तरुण: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !

महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?

तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!

महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!

तरुण हसत हसत फोन ठेवून निघाला.

दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, “तू प्रयत्न केलास, पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस.”

यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, “मला नोकरी नकोय. नक्की नकोय.”

दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?

तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो. तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही, हे चेक करत होतो.

असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.

सांगण्याचे तात्पर्य म्हणजे अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकर असा की मालक. ते महत्वाचे नाही. तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का, हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो?तर आपण स्वतः !!

जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ५७ – नवा सूर्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग  –५७ – नवा सूर्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गेल्या दिडदोन महिन्यांची काळरात्र संपून, आता नवा सूर्य उगवला होता.एप्रिलमध्ये मद्रास येथे घडलेल्या घटना विवेकानंद यांना कळता कळता दोन महीने लागले. जुलै प्रसन्नता घेऊन उजाडली. विवेकानंद मनातून सुखावले. त्यांच्या मनात एकच सल होती ती म्हणजे, अमेरिकेत परिचय झालेल्या लोकांसमोर आपली वैयक्तिक प्रतिमा खराब करण्याचा झालेला घृणास्पद प्रकार. पण वैयक्तिक पेक्षाही त्याच बरोबर हिंदू धर्माचीही प्रतिमा ? ती पुसून काढली तरच त्यांना आपल्या धर्माबद्दल पुढे काम करता येणार होतं. नाहीतर सुरू केलेलं काम, त्याचं काय भविष्य? आणि उज्ज्वल भारत घडवायच स्वप्न होतं ते ? म्हणून सत्य काय ते सर्वांना कळलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांचे गुरु बंधु ही कामाला लागले होते. विशेषत: अलासिंगा पेरूमल खूप धडपड करत होते.

मद्रासला एका जाहीर सभेचा आयोजन केलं गेलं . पंचायप्पा सभागृह खचाखच भरून गेलं होतं. अध्यक्ष होते दिवाण बहादुर एस सुब्रम्हण्यम अय्यर. राजा सर रामस्वामी मुदलीयार यांनी सूचना केली आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या परिषदेत केलेल्या उज्ज्वल कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला, सी रायचंद्र रावसाहेब यांनी. त्या बरोबरच अमेरिकेतल्या नागरिकांना धन्यवाद देणारा ही ठराव मांडला गेला.रामनद च्या राजेसाहेबांनी अभिनंदनाची तार पाठवली. किती विशेष गोष्ट आहे की, ज्या व्यक्तीसाठी अभिनंदन म्हणून कार्यक्रम करायचा ती इथे प्रत्यक्षात हजर नाही पण तरी एव्हढा मोठा कार्यक्रम? त्याला मोठ्या संख्येने सर्व थरातील लोक उपस्थित राहिले होते. काय होतं हे सगळं? हिंदू धर्माच्या जागरणासाठी विवेकानंद यांनी केलेल्या कामाची ही तर फलनिष्पत्ती होती.

कलकत्त्यात अजून असं काही नियोजन झालं नव्हतं. पण शिकागो च्या सर्वधर्म परिषदेत उपस्थित असलेले धर्मपाल, आलमबझार मठात गेले आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या सर्व कार्याचे व यशाचे वृत्त त्यांच्या गुरु बंधूंना सांगीतले. शिवाय धर्मपाल यांचे कलकत्त्यात, हिंदुधर्म अमेरिकेत आणि स्वामी विवेकानंद या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले गेले. याला अध्यक्ष होते महाराजा बहादुर सर नरेंद्र कृष्ण, याशिवाय जपान मधील बुद्धधर्माचे प्रमुख आचार्य, उटोकी यांचे ही या सभेत भाषण झाले. हा कार्यक्रम मिनर्व्हा चित्रमंदिरात झाला. याला नामवंत लोक उपस्थित होते. हे सर्व वृत्त इंडियन मिरर मध्ये प्रसिद्ध झाले होते,  आपोआपच विवेकानंद यांच्या विरुद्ध प्रचारा ला एक उत्तर दिलं गेलं होतं.सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी संगितले होते की, ‘हिंदुधर्माला बुद्ध धर्माची गरज आहे आणि बुद्ध धर्माला हिंदू धर्माची गरज आहे आणि हे ध्यानात घेऊन दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेले पाहिजे’. हे म्हणणे धर्मपाल यांना पटले होते हे आता सिद्ध झाले होते.

या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांचे वृत्त प्रसिद्ध झालेले ही वृत्त आणि ठरावांच्या संमत झालेल्या प्रती अलासिंगा यांनी अमेरिकेतिल वृत्तपत्रांना पाठवल्या.प्रा.राइट,मिसेस बॅगले  आणि मिसेस हेल यांनाही प्रती पाठवल्या गेल्या, औगस्टच्या बोस्टन इव्हिंनिंग ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये मद्रासला झालेल्या सभेचे वृत्त आले. हे स्वामीजींना कळले. तसेच शिकागो इंटर ओशन यातही गौरवपूर्ण असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. हजारो मैल दूर,  एकट्या असणार्‍या,सनातनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारकांच्या  विरुद्ध लढणार्‍या विवेकानंद यांना हे समजल्यानंतर हायसे वाटले. थोडा शीण हलका झाला. या नेटाने केलेल्या कामाबद्दल त्यांनी अलासिंगा यांचे कौतुक केले.

आणि ….. मग इतर लोकांना पण जाग आली. आता मद्रास नंतर कुंभकोणम, बंगलोर या ठिकाणी सुद्धा अशा सभा झाल्या. मधल्या दोन महिन्यात सारी सामसुम होती. त्यावेळी विवेकानंद यांनी मिसेस हेल यांना पत्र लिहिले आणि विनवणी केली की, “मला आईसारखे समजून घ्या म्हणून, वात्सल्याची विनवणी! माणूस अशा प्रसंगी किती एकाकी पडतो, त्याची मानसिक स्थिति कशी होते, अशा प्रसंगामुळे नैराश्य आणणारी खरी स्थिति होती. अशाच काळात आधार हवा असतो.अशाच मनस्थितीत विवेकानंद मिसेस बॅगले  यांच्या कडे त्यांनी बोलावलं म्हणून अनिस्क्वामला गेले.जवळ जवळ २० दिवस तिथे राहिले . याचवेळी प्रा. राइट पण तिथे होते. योगायोगाने भारतातील वृत्ते पोहोचली ती या दोघांनंही समजली. या आधी जुनागडच्या दिवाण साहेबांनी प्रा. राइट यांना आणि मिसेस हेल यांनाही पत्रे लिहिली होती ती मिळाली होती. त्यात विवेकानंद यांना असलेला भारतीयांचा पाठिंबा लिहिला होता.पाठोपाठ म्हैसूरच्या राजांचेही पत्र आले. हे राइट आणि बॅगले यांना दिसल्यामुळे विवेकानंद समाधानी झाले.

याला उत्तर म्हणून विवेकानंद मन्मथनाथ भट्टाचार्य यांना लिहितात, “अमेरिकेतील स्त्रिया आणि पुरुष, तेथील चालीरीती आणि सामाजिक जीवन यावर सुरुवात करून ते म्हणतात, मद्रासला झालेला सभेचा वृत्तान्त देणारे सारे कागदपत्र व्यवस्थित मिळाले. शत्रू आता चूप झाला आहे. असे पहा की, येथील अनेक कुटुंबामधून मी एक अपरिचित तरुण असूनही त्यांच्या घरातील तरुण मुलींच्या बरोबर मला मोकळेपणाने वावरू देतात. आणि माझेच एक देशबांधव असलेले मजुमदार मी एक ठक आहे असे सांगत असताना ते त्याकडे लक्षही देत नाहीत, केव्हढ्या मोठ्या मनाची माणसे आहेत ही. मी शंभर एक जन्म घेतले तरी त्यांच्या या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही.हा उभा देश आता मला ओळखतो. चर्चमधील काही सुशिक्षित धर्मोपाध्याय यांनाही माझे विचार मानवतात. बहुसंख्यांना मान्य होत नाहीत. पण ते स्वाभाविक आहे. माझ्याविरुद्ध गरळ ओकून मजुमदार येथील समाजात त्यांना याआधी असलेली, तीन चतुर्थांश लोकप्रियता गमावून बसले आहेत. माझी जर कोणी निंदा केली, तर येथील सर्व स्त्रिया त्याचा धिक्कार करतात. या पत्राची कोठेही वाच्यता करू नये. तुम्हीही समजू शकाल की, तोंडाने कोणताही शब्द उच्चारताना मला अतिशय सावध राहावयास हवे. माझ्यावर प्रत्येकाचे लक्ष आहे. विशेषता मिशनरी लोकांचे”

“कलकत्त्यामद्धे माझ्या भाषणाचे वृत्त छापले आहे त्यात राजकीय पद्धतीने माझे विचार व्यक्त होतील अशा पद्धतीने सादर केले आहेत. मी राजकरणी नाही आणि चळवळ करणारा कुणी नाही मी चिंता करतो फक्त, भारताच्या आत्म्याची, त्याच्या स्वत्वाची, ती जाग आली की सर्व गोष्टी आपोआप होतील.कलकत्त्यातील मंडळींना सूचना द्यावी की, माझी भाषणे व लेखन यांना खोटेपणाने कोणताही राजकीय अर्थ चिटकवला जाऊ नये. हा सारा मूर्खपणा आहे”. असे त्यांनी अलासिंगना कळवले आहे.

यानंतर सप्टेंबरला कलकत्ता येथे ही विवेकानंद यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारि प्रचंड सभा झाली. यासाठी अभेदानंद यांनी घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते.अपार कष्ट घेतले. सर्व थरातील चार हजार नागरिक याला उपस्थित होते .राष्ट्रीय पातळीवरील विवेकानंदांच्या गौरवाचा हा कार्यक्रम होता. अध्यक्ष होते, पियारी मोहन मुखर्जी . कळकतत्यातील थोर व नामवंत व्यक्ति. दुसरे होते कळकतत्यातील नामवंत संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य माहेश्चंद्र न्यायरत्न . याची दखल इंडियन मिरर ने खूप छान घेतली .यात अभिनंदांनचे ठराव तर होतेच, पण कलकत्त्याच्या नागरिकांनी विवेकानंद यांना लिहिलेली पत्रे होती. कलकत्ता ही विवेकानंद यांची जन्मभूमी होती त्यामुळे या घटनेला खूप महत्व होतच .शिवाय असत्य प्रचार केलेल्या प्रतापचंद्र मजुमदार यांचीही कर्मभूमि होती. ब्राह्मसमाजाचे धर्मपीठ पण कलकत्ताच होते. हे वृत्त विवेकानंद यांच्या हातात पडले आणि ते कृतकृत्य झाले बस्स…. जगन्मातेचा विजय झाला होता.आपलीम मातृभूमी आपल्या पाठीशी उभी आहे अशा पूर्ण विश्वासाने स्वामी विवेकानंद यांच्या डोळ्यातून, हेल भगिनींना हे कळवताना अश्रूंचा पूर लोटला होता. मनस्ताप आणि निराशा काळाच्या पडद्याआड गेलं आणि नव्या चैतन्याने. उत्साहाने विवेकानंद ताजेतवाने झाले पुढच्या कार्याला लागायचे होते ना? गुरुबंधूंना ते म्हणतात, “तुम्ही सारे कंबर कसून जर माझ्याभोवती उभे राहिलात तर, सारे जग जरी एकत्र आले तरी आपल्याला त्याचे भय मानण्याचे कारण नाही”. असा यानंतर उगवलेला नवा सूर्य त्यांना आत्मविश्वास देत होता.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -2 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -2 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पहिले, संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’)  आता इथून पुढे )

नाना गेल्यानंतर ओढगस्तीची दोन वर्षे सरली. दादा मॅट्रिक झाले आणि सगळ्यांच्या सांगण्यावरून कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला गेले. ते होते ४३ साल. पुण्याला त्यांचे एक दूरचे नातेवाईक दातार यांच्याकडे ते राहिले. कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा झाली. मग सुट्टीत दोन महिने त्यांनी देहूरोडला नोकरी केली. मग त्यांनी विचार केला, ‘नोकरीच करायची, तर पुण्यात कशाला? सांगलीलाच जाऊ या.’ मग ते पुना ४४साली सांगलीला परतले. इथे त्यांना माधवनगर कॉटन मिल्सला नोकरी लागली. दरम्यान ते कॉलेजची परीक्षा पास झाले. इथेही त्यांनी विलिंग्डन कॉलेजला नाव घातले, पण नोकरी आणि कॉलेज दोन्ही जमेना, तेव्हा त्यांनी शिक्षणाचा विचार सोडून दिला. माधवनगर कॉटन मिल्सला त्यांची ५० वर्षे नोकरी झाली. 

४६ साली दादांना कंपनीच्या व्यवस्थापनाने, माधवनगर येथे कंपनीच्या घरात रहायला येण्याविषयी विचारले. त्यांनी लगेच होकार दिला. तीन खोल्यांचं छोटसं घर . पुढे अंगण. मागे परस. परसात भाजीपाला होऊ लागला. पुढे आपली कार्यनिष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा, दूरदर्शित्व, व्यावहारिक शहाणपण, या गुणांच्या बळावर पदवीधर नसूनही दादा माधवनगर कॉटन मिल्सचे मॅनेजर झाले. दादांना नोकरी लागली. घरात निश्चित असे उत्पन्न येऊ लागले आणि कुटुंबाची विपत्तीतून सुस्थितीकडे वाटचाल सुरू झाली.

परिस्थिती कशीही असली, तरी कोंड्याचा मांडा करायची हातोटी आजींना छान साधली होती. माझ्या चुलत वन्स पमाताई म्हणतात, ‘आम्ही भावंड अधून मधून माधवनगरला राहायला जात असू. काकू स्वयंपाक छान करत असे. साधं पिठलं भाकरीच, पण ती इतकी चविष्ट होत असे, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. मला तर वाटतं, तिच्या हातात अन्नपूर्णेचा वास होता. ‘  कुणाला त्यांनी केलेल्या खव्या-रव्याच्या साटोर्‍या आठवतात, तर कुणाला त्यांनी केलेल्या साध्या भाकरीचा कुस्करा. 

सगळं ठाक-ठीक होतं म्हणेपर्यंत आणखी एक आपत्ती येऊन ठाकली. मात्र ही आपत्ती केवळ केळकर कुटुंबावरच आलेली नव्हती, तर सार्‍या गावावर, किंबहुना सगळ्या महाराष्ट्रावर ही आपत्ती ओढवली होती. ४८ साली गांधीजींचा खून झाला. तो करणारा ब्राम्हण. त्यामुळे ब्राम्हणांच्या विरुद्ध वातावरण अतिशय तापले. ब्राम्हण अन्य समाजाच्या रोषाचेच नव्हे, तर द्वेषाचेही बळी ठरले. त्या निमित्ताने लुटालूट झाली. जाळपोळ झाली.

माझे दीर दादा संघाचे असल्यामुळे त्यांना अटक करून तुरुंगात ठेवले. (कदाचित त्यामुळे ते सुरक्षितही राहिले.) गावात काही जणांची धिंड काढली गेली. त्यांना मारण्याचाही जमावाचा मनसुबा असावा, पण तेवढ्यात गावात मिल्ट्री आली आणि लोक वाचले. दादा तुरुंगात, उषाताई, कुसुमताई, सुशीताई, बाळू ही मुले घरात. माझ्या सासुबाईंची, आजींची ही सत्वपरीक्षाच होती. पण मोठ्या धीराने त्यांनी ते दिवस काढले. त्यांचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास होता. त्यांच्या शेजारी देशिंगचे घोरपडे म्हणून रहात होते. जे काही घरात किडूक मिडूक होतं, ते आजींनी गाठोड्यात बांधलं आणि विश्वासाने घोरपड्यांकडे सुपूर्त केलं. घर लुटलं गेलं, जाळलं गेलं, तरी निदान तेवढं तरी वाचावं, म्हणून धडपड. घोरपडे मंडळींनी तितक्याच खबरदारीने त्याचं जतन केलं आणि सगळं वातावरण निवळल्यावर ते आजींच्या स्वाधीन केलं. माणसांवर असलेला आजींचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. आमचं घर जाळायला लोक आले होते, पण तेवढ्यात कर्फ्यू लागला आणि आमचं घर वाचलं. नंतर लगेचच दादाही तुरुंगातून सुटून आले. त्या काळाबद्दल आणि त्यावेळच्या वातावरणाबद्दल ऐकलं की मला रविंद्रनाथ टागोरांचं एक मुक्तकाव्य आठवतं.  त्यांनी लिहिलंय ,

‘किती कोमल असतो माणूस आणि किती क्रूर असतात माणसं. ‘

निपाणीला आजींचे भाऊ रहात. पंचनदीकर वैद्य म्हणून ते  सुप्रसिद्ध होते. पडत्या काळात त्यांचीही आजींना खूप मदत झाली होती. आमचं सगळं कुटुंबच त्यांच्याबद्दल मनात आदर आणि कृतज्ञता बाळगून होतं. त्यांचे हे भाऊ माझ्या लग्नानंतरही माधवनागरला आमच्या घरी खूपदा आलेले आठवतात. माझ्या मनात संशोधक मामा म्हणून त्यांची प्रतिमा रुजलेली आहे. ते आले, की घरी भट्टया लावत. पार्‍यापासून सोनं करण्याचे त्यांचे प्रयोग चालत. त्यांना हवं असेल ते सगळं, आजी आणि घरातील इतर माणसं तत्परतेने उपलब्ध करून देत. पार्‍यापासून त्यांना सोने काही मिळवता आले नाही, पण ज्या एकाग्रतेने, तन्मयतेने ते प्रयोग करत, त्याचं आणि त्यांच्या प्रयोगाचं आम्हाला खूप अप्रूप वाटे.

५० साली दादांचं लग्न झालं. आजींच्या हाताखाली सून आली. हाताखाली सून आली असं म्हणण्यापेक्षा आजींनी कोठीची किल्लीच सुनेकडे सोपवली. म्हणजे आमच्या घरी कोठीला काही कुलूप नव्हतं, पण पुरवणं-उरवणं, ठेवणं- टाकणं, देणं- घेणं, मुलींची माहेरपणं, हे सगळे व्यवहार त्यांनी मुलाच्या आणि सुनेच्या हाती सोपवले आणि घरात राहूनही त्या वानप्रस्थात असल्यासारख्या राहिल्या. गरज असेल तेव्हा स्वैपाकघरात मदत, एरवी त्यांचे पोथीवाचन वगैरे चाले. भाजी आणणे, निवडणे, चिरणे ही कामे मात्र त्या मोठ्या हौसेने करत. बाहेरच्या सोप्यावर बसून त्यांचे हे काम चाले. बाहेर कुणी आलं गेलं तर लक्ष राही. तिथेच बसून त्या पोथी, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध वगैरे वाचायच्या. देवळात भजन –कीर्तन असे, तेव्हा देवळात जात.

सुनेकडे आजींनी सगळी जबाबदारी सोपवली खरी, पण त्यावेळी असेही ठरले की घरातील मिळवत्या व्यक्तीने दरमहा आजींना शंभर –दीडशे रुपये द्यायचे. मला नोकरी लागल्यावर मीही द्यायला लागले. या पैशांचा खर्च त्यांनी कसाही करावा. त्याचा त्यांना कुणी हिशेब मागू नये. त्याचं काय केलं हे विचारू नये. त्यातून त्यांचा देव-धर्म होई. कुणा गरजू व्यक्तीला पैसे द्यावेसे वाटले, तर त्यातून दिले जात. नातवंडांना त्या पैशातून बक्षिसे मिळत. सणावाराला जो नमस्कार करे, त्याला आशीर्वादासोबत एक रुपया मिळे. आजही आपण आर्थिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा करतो. ६०- ७० वर्षापूर्वी आमच्या आजींनी ते मिळवलं होतं. मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते.

माहेरवाशिणी असोत, किंवा नाती, भाच्या वगैरे असोत, देण्या-घेण्याचे व्यवहार त्यांनी केव्हाच दादा-वहिनी कडे सोपवले होते, पण घरातल्या देण्या-घेण्याव्यतिरिक्त आजींचा एक स्वतंत्र खाऊ असे. तो म्हणजे, शेवया, साबुदाण्याच्या पापड्या, तसेच उकडलेले बटाटे, आणि भिजवलेला साबुदाणा घालून केलेल्या व वाळवलेल्या चकल्या असा तो खाऊ असे. सकाळी शेवयाचं पीठ भिजवायचं किवा साबुदाणा भिजवायचा आणि बटाटे उकडायचे. दुपारी जेवणं झाली की आजींचा हा कारखाना सुरू होई. हा लघूद्योग पैशासाठी नसे. बनवणे आणि घरी आलेल्यांना तो खाऊ म्हणून वाटणे हा आजींचा छंद होता. आम्ही घरातल्या दोघी जणी त्यांच्या हाताखाली असूच. मुली-नातींना आणि आल्या-गेल्यांना हा खाऊ देताना, त्यावर त्यांचं भाष्य असे, ‘आपापली दूध-साखर घाला आणि खा’ किंवा ‘आपापल्या तेला-तुपात तळा आणि खा.’ या शेवया, पापड्या नि उपासाच्या चकल्या केवळ माहेरवाशिणींकडेच नव्हे, तर मी माहेरी निघाले की माझ्या माहेरीही आजींनी त्या दिलेल्या असत. माझ्या वडलांना डायबेटीस होता. त्यांच्यासाठी गव्हाच्या पोह्यांचा चिवडा आणि गव्हाचे पोहे घेऊन जा, असं त्यांचं खास सांगणं असे. एरवी मुली माहेरून आल्या की काही ना काही घेऊन येत, अशी रीत होती. आमच्या घरी उलटं होतं. आम्ही माहेरी जाताना सासरहून काही ना काही घेऊन जात असू. मुली आणि सुना यात त्यांनी कधी फरक केला नाही. मुलीही माहेरी आल्या आणि हात-पाय पसरून गप्पा मारत बसल्या असं कधी झालं नाही. आजी म्हणत, ‘कामावे ते सामावे.’

क्रमश: – भाग २

©  सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

इंद्रधनुष्य

 

” गौरव  गाथा  श्वानांची.”

( क्रमशः भाग दुसरा )

 

‘ एकदा साथ द्यायची ती कधीही न सोडणे ‘, हा कुत्र्याचा धर्म ! सेनादलातील चार अधिकाऱ्यांना ,

(जानेवारी ८१ ) एका कुत्र्याच्या छोट्या पिलाने १६ महिने साथ दिलेली घटना. भूतानमधील बोंगयांग या दरीतून जात असताना, तिबेटी  ‘ मँस्टिफ’ जातीचे पिल्लू त्यांच्या मागे धावायला लागले .दया येऊन अधिकाऱ्यांनी त्याला बरोबर घेतले. ‘ द्रुग ‘ (घोडेस्वार ) असे त्याचे नामकरण झाले. सिक्कीममध्ये १९५०० मीटर उंचीवरून प्रवास करताना, सगळे सहन करत आनंदाने   ‘ द्रुग ‘  प्रवास करत होता .जाताना वाटेत त्याला कसला तरी वास आला. आणि  ‘ द्रुग’  वेगळ्याच दिशेला जायला लागला. अधिकाऱ्यांना शंका आली. म्हणून जवळ जाऊन त्यांनी उकरून पाहिले. तो शाल गुंडाळलेले एक प्रेत त्यांना दिसले. दोन महिन्याच्या पिलाच्या आत्मज्ञानाला काय म्हणावे ! कर्तबगारीच्या वर्णनाला, विशेषणांचे शब्दही कमी पडावेत.

एक जुलै. अमरनाथ यात्रेचा पहिला दिवस होता. लेफ्टनंट जनरल ( चिनार कोर कमांडर ) के. जे .एस. धिल्लन, काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या ‘ के 9   योद्धा  ‘मेनका,’  या श्वानाला सलामी देत असलेला फोटो पाहिला. पाहून नवल वाटलं . धिल्लन पवित्र अमरनाथ गुहेत जात असताना, ५० मीटरवर   ‘मेनका’ श्वान कर्तव्य बजावत होते.  कोअर कमांडर तेथे पोहोचताच, श्वानाने–  ‘ मेनकेने ‘  त्यांना सलामी दिली.  धिल्लन यांनीही सलामीनेच त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या छायाचित्राखाली  धिल्लन यांनी लिहिले, ” अनेकांचे प्राण वाचविलेल्या या जिवलग मित्राला सलाम”.      

२००८ पासून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात मिरज ठाण्यात ‘ निरो ‘  या श्वानाची नियुक्ती झाली होती . दक्षिणेतून आलेल्या एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा स्टेशनमध्ये फोन आला. निरोने संपूर्ण गाडी तपासून धोका नसल्याचा निर्वाळा देऊन, सर्वांना हायसे केले. पंढरपूर यात्रेसाठी मिरजहून हजारो भाविक जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी ‘ निरो ‘ ने वेळोवेळी संपूर्ण गाड्या तपासून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि खूप मोठे काम केले . पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेला श्वान हाच तो

‘निरो’.  निरोचा जोडीदार ‘ सोलो ‘ निवृत्त झाला. आणि मग  ‘निरो ‘ एकटाच कोल्हापूर — सातारा विभागाची जबाबदारी सांभाळत होता. एक तपाच्या कर्तव्यपूर्तीनंतर तो सन्मानाने निवृत्त झाला. एखाद्या क्लास वन ऑफिसरला निरोप द्यावा , तसाच सन्मानाने त्याला निरोप दिला गेला. ” पीपल फॉर ॲनिमल ”  या संस्थेच्या मागणी आणि विनंतीनुसार त्यांच्याकडे तो सन्मानाने राहिला.

विठुरायाच्या दर्शनाचे क्षेत्र पंढरपूर. हजारो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. ते निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून सुरक्षा यंत्रणा राबत असते .या यंत्रणेचा एक भाग म्हणजे, लॅब्रॉडॉर जातीचे ‘ तेजा ‘ हे श्वान. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या बॉम्बशोधक दलातील अव्वल श्वान म्हणून ‘ तेजाला ‘ ओळखत होते .विठ्ठल गाभारा आणि मंदिराच्या सुरक्षेचे काम ‘तेजाने ‘ नऊ वर्षे इमाने इतबारे केले. इतके की त्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ‘ ‘तेजाचे ‘ एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे, नऊ वर्षे, तो विठ्ठल मंदिरात तपासणीला आल्यानंतर, गाभाऱ्यात कोणत्याही इशाऱ्याशिवाय सर्वप्रथम विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचा. आणि मग तपासणीचे काम सुरू करायचा. देवापुढे नम्र होण्याचे शिक्षण खरंतर त्याला दिले गेले नव्हते. हे शिक्षण त्याला कोठून दिलं गेलं असेल बरं ! त्याच्या आत्मज्ञानाने तर नसेल !  प्रशिक्षणानंतर २००९ साली ‘ तेजा ‘ सेवेत दाखल झाला. अव्वल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजाला २०१५, २०१६, आणि २०१७ असे सलग तीन वर्षे ,उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले . वृद्धापकाळाने तो शेवटी विठ्ठलचरणी लीन झाला .पोलीस दलाने त्याला अखेरची सलामी दिली. सलाम.

सांगलीकरांना अभिमान वाटावा असा आणखी एक हिरो म्हणजे ‘ लॅब्रॉडॉर ‘ जातीचा ‘ ‘मार्शल ‘ हा कुत्रा.  सांगली जिल्हा पोलीस पथकात बॉम्बशोधक कार्यासाठी  तो कार्यरत होता. त्याने २००९ ते २०१९ असे प्रदीर्घ काळ काम केले. २०१२ मध्ये जत तालुक्यात गोंधळेवाडी या ठिकाणी, शाळेतील मुलांना खेळत असताना एक बाँब सदृश्य वस्तू दिसली .पोलीस दलाला फोन आला. ‘ मार्शल ‘ ला पाचारण केले  गेले. त्या ठिकाणी

‘मार्शलने ‘ पुन्हा पुन्हा वास घेऊन, धोकादायक बॉम्ब असल्याचे सूचक विधान केले. पथकाद्वारे पुढील कारवाई केली गेली. आणि शाळेचे टेन्शन संपले. त्याचप्रमाणे कवलापूर येथे विहिरीचा गाळ काढत असताना, लोकांना एक संशयास्पद वस्तू दिसली.  मार्शलचे व्यक्तिमत्व सर्वांना ठाऊक होते. म्हणून त्याला बोलावले गेले .मार्शलने आपल्या पथकाला ही वस्तू धोकादायक असल्याचा “शब्देविण संवादू “,असा निर्वाळा दिला. पंढरपूर आणि पुणे येथे राष्ट्रपती दौऱ्याच्या काळात, बंदोबस्त, सुरक्षितता आणि तपासणीचे महत्त्वाचे कर्तव्य त्याने बजावले होते. आणि वाहवा मिळवली होती .पंढरपूरच्या प्रत्येक वारीच्या काळात आणि तुळजापूरला नवरात्राच्या काळात तेथील तपासणी आणि बंदोबस्ताचे जबाबदारीचे काम त्याने यशस्वीपणे केले होते. दहा वर्षे निष्ठेने कार्य करून सन्मानाने तो निवृत्त झाला. वयस्क झाला. वृद्धापकाळाने, पाच जून २०२२ या दिवशी तो विठ्ठलाचा आणि तुळजाभवानीचा वरदहस्त घेऊन, ईश्वरचरणी लीन झाला .आज त्याचे उत्तर अधिकारी म्हणून ‘सनी’ नावाचा लाब्राडोर , ‘तेजा ‘ नावाचा डॉबरमॅन, ‘ लिओ’ नावाचा  लँब्राडोर , ‘ लुसी’  नावाची जर्मन शेफर्ड हे श्वान निष्ठापूर्वक कर्तव्य बजावत आहेत.

सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना ,कौटुंबिकदृष्ट्या कर्तव्य पार पाडलेल्या श्वानांच्या असंख्य घटना सांगता येतील.

कर्जत गावाजवळ टेकडीखालील वाड्यात आरेकर यांचा ‘काळू ‘  हा लाडका कुत्रा होता. त्याचेही आरेकरांवर खूप प्रेम होते. आरेकर काकांच्या निधनानंतर, ‘ काळू ‘ त्यांच्या भोवती फिरत राहिला. कोणालाही त्यांच्याजवळ येऊ देईना. प्रेताला हात लावू देईना. अखेर त्याला घरातल्यांनी साखळीने बांधून घातले. नंतर त्यांचा देह अंत्यसंस्काराला नेला गेला .  ‘काळू’ने हिसडे मारून , आरडा ओरडा करून, साखळी तोडून तो स्मशानात आला. मालकाच्या चितेवर बसून राहिला. बाजूला घेण्याचे सर्वांनी खूप प्रयत्न केले. पण तो ऐकायला तयार नव्हता. सर्वांनी अखेर एकत्रितपणे ताकत लावून, त्याला उचलून घरी आणले . आणि खोलीत बंद केले. त्याचा आरडाओरडा चालूच होता. नंतर काकांचे अंत्यसंस्कार झाले. आठच दिवसात ‘ काळू ‘ आपल्या मालकाला भेटायला गेला.– स्वर्गात ! या प्रेमाला आणि निष्ठेला शब्दच अपुरे आहेत.   

दाविद काकडे यांचा दुग्ध व्यवसाय होता. गायीबरोबर जर्मन शेफर्डची जोडीही त्यांनी पाळली होती. रोज पत्नी आशासह ते गाईला चारा आणायला शेतात जात असत. बैलपोळ्याचा दिवस होता. शेतात जाताना एक कुत्रा बरोबर होता. आशा गवत कापत होती. आणि एक फुटावर असलेल्या नागाने फणा काढला. आशाचे लक्ष्य नव्हते. कुत्र्याने नागावर झडप घातली. नागाने कुत्र्याच्या नाकावर डंख मारला. आशाने आरडाओरडा केला . लगेच कुत्र्याला दवाखान्यात नेले. आशाचे आणि कुत्र्याचेही प्राण वाचले .कुत्र्याने मालकिणीवर होणारा दंश स्वतःवर घेतला. आणि मालकिणीचे प्राण वाचविले.

—क्रमशः भाग दुसरा

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खरं प्रेम… ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? विविधा ?

☆ खरं प्रेम… ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

माणूस जन्मल्याबरोबर पहिलं प्रेम अनुभवतो ते म्हणजे आईचं. इथून पुढे प्रेम नावाची अडीच अक्षरे आयुष्यभर आपली साथसोबत करतात. स्त्रीची पुरुषाबरोबर प्रियकर प्रेयसी सोडून पंचवीस-तीस नाती आहेत. पण रस्त्याने एखादी जोडी बोलत निघाली की आपण उगी कुजबुज करीत रहातो. प्रेम अनेक प्रकारचं असतं पण आपण एकाच प्रेमाला धरून बसतो. ही आपल्या कमकुवत समाजाची मानसिकता आहे.

जशी पोटाची भूक असते तशीच प्रेमाचीही भूक असते हे आपण विसरून जातो. माणसाला आयुष्यात सगळं काही मिळालं आणि प्रेम नाही मिळालं तर त्याचं जीवन यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. प्रेम श्रीमंताचं असतं तसंच गरीबाचंही असतं. प्रेम राजाचं असतं तसंच शिपायाचंही असतं आणि भिका-याचंही प्रेमच असतं. थोडक्यात प्रेम कुणाचं कुणावरही असतं. जीवनात येऊन ज्यानं प्रेम केलं नाही त्यानं जीवनात येऊन काहीच केलं नाही असं म्हणता येईल. प्रेम आहे म्हणून तर या जगातला प्रत्येक माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. प्रेमच असा एक धागा आहे जो प्रत्येक जीवमात्रात गुंफला गेला आहे.

काॅलेज वयातलं प्रेम खूप वेगळं असतं. एखाद्या कसबी शिल्पकाराने मुर्तीला घाटदार कोरीव बनवत जावे तसा नुकत्याच वयात आलेल्या पोरीचा उमलत फुलत येणारा तो दैवी आकार. खरोखरच निसर्गाची किमया अफाट आहे. एखाद्या लहान शेंबड्या पोरीची घडत जाणारी सुंदरी बघत रहावी वाटते. त्रयस्तपणे पहाताना अँजेलोच्या अर्धवट गुढ पेंटींगची सर तिला येईल का? की मोनालिसाच्या गुढहास्य चित्रासारखं तेही गुपितच राहील कुणास ठाऊक? या सगळ्या कलाकृती निसर्गाने मानवाकडून करून घेतलेल्या. एका पोरीची बनलेली सुंदरी हीसुद्धा एक कलाकृतीच. आपोआप घडलेली. कुणाच्या मनात असो कुणाच्या मनात नसो न सांगता सवरता केलेली.

कधी कुरणात मोराचं नाचणं बघतो. प्रियेसाठी त्याचा तो नाच बघण्यासारखा असतो. कुठे बागेत फांदीवर चिमणा चिमणीशी गुलगुल करीत असतो. हिरव्यागार वनराईच्या कुशीत कुठेतरी दाट गवतात एकमेकाला घट्ट मिठी मारून विहार करणारी सापाची जोडी पाहिली की मन व्याकुळ होतं. स्वप्नातल्या जोडीदाराला हाका घालीत राहातं. धनुकलीनं कापूस पिंजावा तसं अंगातला कण नि् कण कुणीतरी पिंजत राहातं. मग एखादी गोरीगोमटी दिसली की मन तिच्यापाठी धावतं. तिचा एखादा नेत्रकटाक्ष झेलण्यासाठी अतुर होतं. नकळत मनातल्या जोडीदाराच्या स्वप्नांना खतपाणी घातलं जातं. एखादी हसून बोललीच तर हीच माझी प्राणसखी असं वाटत राहातं. आतापर्यंत आपण हिलाच तर शोधत होतो. कुठं लपली होती ही? परत एकदा स्वप्नांचं पीक तरारून येतं. पण तात्पुरतंच. पुन्हा मनाला संस्कारांचा दोरखंड लावला जातो. आपल्याला शिकलं पाहिजे. घराचं दैन्य कमी केलं पाहिजे हा विचार मनाला भरकटू देत नाही.

शेक्सपियरच्या प्रेमात प्रश्न नसतात मग तुमच्या माझ्या प्रेमात का येतात? फक्त प्रश्न… पण त्याची उत्तरं कुठं आहेत? गंगेची गंगोत्री तशी प्रश्नांची गंगोत्री. एक करंगळीभर पाण्याची धार… पुढे पाण्याचा विशाल सागर. एक गुंता मग सगळी मनाची गुलाबी गुंतागुंत… कुमार वयात मनाला न सुटणारे प्रेमळ प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कोण देईल?

वि. स. खांडेकरांची ‘पहिलं प्रेम’ कादंबरी वाचली त्यावेळी पण असंच वाटलं, प्रेम हे खोटंच असतं, मग ते पहिलं असुदे अगर दुसरं. या जगातील स्वार्थी माणसं या प्रेमाचा तेवढीच मजा किंवा टाईमपास म्हणून उपयोग करीत असावीत. पण या जगात खरं प्रेम आहे बरंका. राधा-कृष्णासारखं आणि कृष्ण-मिरेसारखं सुद्धा प्रेम आहे. अाणि बायको बर्फासारखी पडली असताना तिच्यावर बलात्कार करणारेही या समाजात आहेत. पण हातावर बोटं मोजण्याइतकं का होईना खरंच खरं प्रेम आहे. मला एवढंच समजलं जे प्रेमासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात बाकी सगळे जगायचं नाटक करतात.

काय होतं, ज्यावेळी आपल्या मनातील प्रेमाला खुरडत जगावं लागतं त्यावेळी खुरडत जगायचीच त्याला सवय लागते. असं जगणं म्हणजेच जीवन असाच एक समज होतो. तोच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहिला जातो. हा भार आपण निर्विकारपणे वाहत असतो. आपण खऱ्या प्रेमाला मनाच्या कोनाड्यात दाबून टाकतो. मग जगणं आणि खरं जीवन यांची ताटातूट होते. अशा तर्‍हेने खरं जीवन आपण कधी जगतच नाही. खरं प्रेम कुणावर कधी करतच नाही. खरं प्रेम खूप थोडे लोक करतात हे प्रेम या गुलाबी अक्षरामागे दडलेलं एक सत्य आहे. ते तुम्हाला नाकारता येणार नाही… मला नाकारता येणार नाही… कुणालाच नाकारता येणार नाही..! पण तरीही खरं प्रेम खर्रच आहे हो..!!

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

बर्‍याच दिवसांनी आम्ही सख्ख्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पांना रंग चढला होता. किती बोलू आणि काय बोलू, असं प्रत्येकीला झालं होतं. बोलता बोलता विषय निघला, ‘आपल्यावर कुठल्या व्यक्तीचा विशेष प्रभाव पडलाय?’

मी एकदम म्हंटलं, ‘मला वाटतं, माझ्यावर माझ्या सासुबाईंचा प्रभाव आहे.’ सगळ्या जणी काहीशा चकित मुद्रेने माझ्याकडे बघू लागल्या. कारण सासू-सुनेचे भावबंध तसे जगजाहीरच. जुन्या बायकांनी तर ओव्या-बिव्यातून ते शीलालेखासारखे शाश्वत केलेले. गाऊन जगजाहीर केलेले. त्यांनी म्हणूनच ठेवलय, ‘माय म्हणता म्हणता ओठालागी ओठ मिळे’ इती वर्षा. ‘आणि सासू म्हणता म्हणता काय ग?’ शुभदाची तत्पर विचारणा. ‘सासू म्हणता म्हणता ओठातून जाई वारे.’ वर्षाचं प्रत्युत्तर.

त्यातून माझ्या सासूबाई जुन्या पिढीतल्या. सोवळ्या. दोन पिढ्यात असावं, तेवढं आमच्यात अंतर. त्यातही त्या श्रद्धाळू. अगदी अंधश्रद्ध म्हणाव्या, इतक्या पराकोटीच्या सश्रद्ध, तर मी आगदी पराकोटीची तर्कवादी. त्यामुळे मैत्रिणींना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. मग मी म्हणाले, ‘सासू’ जर ‘माय’ झाली, तर ओठाला ओठ जुळतीलच ना! आणि ओठाला ओठ जुळल्यावर मायेचे भावबंदही तसेच घट्ट होतील! मग भले तोंडाने ‘माय’ म्हणून हाक थोडीच मारली पाहिजे? माझं लग्नं झालं, तेव्हा हल्लीसारखी सासूला ‘आहो आई’ असं म्हणायची पद्धत नव्हती. पण ही पद्धत मात्र चांगली आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या  सासू-सून जास्त जवळ येत असतील, असं वाटतं.

‘मला असं वाटतं, माझे विचार,व्यवहार, वर्तन, दृष्टिकोन यावर माझ्या सासुबाईंचा खूप प्रभाव आहे. माझ्या लेखनावरही आहे, असं म्हंटलं, तर चूक ठरणार नाही. कारण लेखकाला काही लिहिताना व्यक्तींना खूप समजून उमजून घ्यावं लागतं. मग त्या प्रत्यक्षातल्या असोत किंवा  मनाने सृजित केलेल्या असोत. व्यक्तीचं अंतरंग जाणून घेण्याची माझ्या सासुबाईंची शक्ती अजोड होती. अंतरंग जाणून त्यातील, ’सत्व ते घ्यावे, फोल टाकोनी द्यावे.’ या वृत्तीने त्या जागल्या, बोलल्या.

माझ्या सासुबाईंचं नाव लक्ष्मी. जुन्या पिढीतील थोर लेखिका लक्ष्मीबाई केळकर यांच्याशी नामसाम्य. माझ्या सासुबाईंनी लेखन केलं असतं, तर ‘माणुसकीचे गहिवर’ सारखं पुस्तक हातून लिहून झालं असतं.

‘ऐसी कळवळ्याची जाती । लाभावीण करी प्रीती।।’ या तुकोबांच्या वचनाचं मूर्त रूप म्हणजे माझ्या सासुबाई. त्यातही त्यांचा ‘प्रीती’ करण्याचा परीघ घरातल्या माणसांपुरता मर्यादित नव्हता. सगळे जवळचे, दूरचे नातेवाईक, परिचयातले, गावातले असा तो व्यापक होता.

माझं लग्न १२ मे १९६५ ला झालं. माझे पुतणे-पुतण्या सासुबाईंना आजी म्हणत. होता होता माझे दीर – जाऊबाई, यजमान सगळेच त्यांना आजी म्हणू लागले. मग मीपण त्यांना आजीच म्हणू लागले. नाही तरी त्यांची नात यमुताई, त्यांच्या मोठ्या मुलीची, अक्काची मुलगी माझ्यापेक्षाच नव्हे, तर यांच्यापेक्षाही मोठी होती. म्हणजे तसा विचार केला, तर आमच्यात दोन पिढ्यांचं अंतर होतं. म्हणजे नात्याने नसेना का, पण वयाच्या अंतराने मी त्यांच्या नातीसारखीच झाले होते आणि त्यांनीही तशीच माया माझ्यावर केली. त्यामुळे या पुढील लेखात मी काही वेळा त्यांचा उल्लेख सासुबाई असा न करता ‘आजी’ असाच केला आहे.

माझं लग्न झालं आणि मी माधवनगरला केळकरांच्या घरात आले, तेव्हा केळकरांचं खातं-पितं घर ‘सुशेगात’ नांदत होतं. पण कधी काळी, अल्पकाळ का होईना, या घराने दारिद्रयाचे चटके सोसले होते. विपत्तीचा अनुभव घेतला होता. सासुबाईंचे यजमान गेल्यावर त्यांना आणि त्यांच्या मुलांना  गरिबीत दिवस काढावे लागले होते.

माझ्या सासुबाईंना कुणी वय विचारलं की त्या सांगत , ‘साल तितकं वय’. माझे सासरे १९४१ साली निवर्तले. म्हणजे त्या अवघ्या ४१ वर्षाच्या होत्या तेव्हा. सासर्‍यांना घरात नाना म्हणत आणि ते गावात नारायणभट म्हणून ओळखले जात. ते गेले, तेव्हा सासुबाईंच्या पदरात तीन मुली आणि दोन मुले होती. मोठ्या मुलीचे म्हणजे आक्कांचे तेवढे लग्न झाले होते. त्यांचीही परिस्थिती म्हणजे ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ अशीच. नाना सांगली संस्थानच्या गणपती पंचायतनातील विष्णु मंदिराचे पुजारी होते. त्यांची भिक्षुकी वृत्ती ( व्यवसाय) होता.

नानांचे बिर्‍हाड सांगलीच्या गावभागातील तात्या केळकरांच्या वाड्यात होते. आता सात माणसांचे कुटुंब आणि आला-गेला सांभाळत असणार्‍या एखाद्या भिक्षुकाची मिळकत किती असणार? त्यात शिल्लक किती उरणार? आक्कांच्या पाठचे दादा. ते तेव्हा दहावीत शिकत होते. त्यानंतर सुशीला, कुसुम, उषा या बहिणी, नंतर माझे यजमान अनंत. त्यांना सगळे बाळू म्हणत. ते अवघे तीन वर्षाचे होते तेव्हा. आता पुढे काय? हा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे आला. ‘ आता गंगाधराने (दादांनी) शिक्षण सोडून भिक्षुकी करावी,  असेच अनेकांचे म्हणणे पडले. माझ्या सासुबाईंनी मात्र, ‘मुलाला भिक्षुक करायचे नाही. सध्या या व्यवसायाला मान-प्रतिष्ठा राहिली नाही,’ असे ठामपणे सांगितले. तरीही १० वी आणि ११वी अशी दोन वर्षे शिकत असताना दादांनी दोन देवळातली पूजा केली. देवळातला प्रसाद म्हणून दोन ताटातून भरपूर जेवण घरी यायचे. घरच्यांची एक वेळच्या का होईना, पण जेवणाची सोय व्हायची. नानांनी थोडी जमीन घेतली होती आणि ती खंडाने दिली होती. खंडाचा धान्य घरी यायचं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे सासुबाईंचं केशवपन झालं. त्याबद्दल मी पुढे केव्हा तरी दादांना विचारलं, ‘तुम्ही कसं होऊ दिलत केशवपन?’ त्यावर दादा म्हणाले, ‘ तो आजींचा स्वत:चा निर्णय होता.’ कदाचित त्यांच्यावर झालेले संस्कार, तो काळ, गावातलं वातावरण, सासरे करत असलेला व्यवसाय याचा तो एकत्रित परिणाम असेल.

‘कसं चाललं होतं तुमचं तेव्हा?’ मी एकदा आमच्या कुसुमवन्संना विचारलं होतं. ‘अपरंपार कष्ट आणि अपार काटकसर या दोन चाकांवर आमचा गाडा तेव्हा चालत होता.’ त्या म्हणाल्या.

त्यावेळी कुसुमताई दहा वर्षाच्या होत्या. सुशीताई बारा वर्षाच्या असतील. कुसुमवन्स पुढे म्हणाल्या होत्या,  ‘शेजार्‍या-पाजार्‍यांच्या रेशनचं धान्य आम्ही आणून देत असू. त्यांच्या रेशनवरची बाजारी आम्ही घेत असू. आमच्या रेशनवरची बाजरीही आम्ही घेत असू. बाजरी उष्ण. त्यामुळे घरात आम्ही कुणी ती खात नसू. आमचे चुलत भाऊ गणुदादा यांना आम्ही ती देत असू. त्या बाजरीवर ते रुपयाला दहा आणे कमिशन देत असत. इतरांचं शिवण शिवून शिलाईचे पैसेही आम्ही मिळवत असू. प्रत्येक फ्रॉकला चार आणे शिलाई मिळायची. संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’

क्रमशः …

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares