मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाचे डोही आनंद तरंग… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ आनंदाचे डोही आनंद तरंग… ☆ सौ ज्योती विलास जोशी

आनंदाचे डोही आनंद तरंग…..

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो

क्या गम है जिस को छुपा रहे हो

ही गझल ऐकता ऐकता विचारांचा भुंगा मनाभोवती पिंगा घालू लागला. दुःखाचा विसर होण्यासाठी हास्याचा धबधबा हवा. इतकं साधं आणि सोपं  दुःखावर सोल्युशन आहे

असाच अर्थ लावला माझ्या मनानं …. हा धबधबा अर्थातच नैसर्गिक हवा ना?…. त्याचा उगम कसा? त्याची व्याप्ती किती? तो किती वेगाने आणि किती उंचावरून पडणारा आणि किती मोहक असावा? या सर्व प्रश्नांचं उत्तरं एका वाक्यातंच….तो आनंदाचा स्त्रोत असावा.

होय! हास्यातून आनंद आणि आनंदातून हास्य निर्माण होतं, जे नैसर्गिक आनंद देतं.आनंदाची बेरीज म्हणजे दुःखाची वजाबाकी.आनंदाला दुःखाची झालर आणि दुःखाला आनंदाची किनार असतेच म्हणून तर आनंदा मागून दुःख आले तरी ते पचवायची क्षमता येते आणि त्यानंतर येणाऱ्या आनंदाची ग्वाही आपल्याला मिळते.

जीवनाच्या आनंदयात्रेवर दुःखाचे स्पीड ब्रेकर असणारच!आपल्या प्रत्येकाला निसर्गदत्त अशा परीसाच वरदान आहे.त्या परीसास सुखाचे आनंदाचे क्षण चिकटत असतात. परिसस्पर्श होताच या क्षणांचं सोनं होत असतं आपला हेतू साध्य होत असतो परंतु याकडे आपलं लक्ष नसतं. आपण नुसतं धावत असतो. ते सुवर्णक्षण वेचायचा आनंद आपण उपभोगत नाही. प्रत्येक क्षणात ओतप्रोत भरलेला असतो आनंद… परंतु आपल्याला तो कणाकणानं क्षणाक्षणानं वेचायची सवय नाही आपल्याला तो तात्काळ भरभरून हवा…. या आपल्या अट्टाहासापायी आपण आनंदाला मुकतो.

लहानपणी  ‘आई माझं पत्र हरवलं’ह्या खेळात ‘ते मला सापडलं’ असं म्हणून पत्र लगेच सापडायचं….. कारण ते कुठंच हरवलेलंच नसायचं… तसंच सुखही आपल्या अवतीभवतीच आहे. फक्त शोधण्याची कला हवी.नाही का? लपाछपीचा खेळ ही तसाच! एका ठराविक कक्षेत सगळेच गडी असायचे. ते कुठेच हरवलेले नसायचे. शोधले की सापडायचे आणि मग कोण आनंद मिळायचा. आनंदाचं ही तसंच आहे. तो इतस्ततः विखुरला आहे.तो गोळा करायची ताकद हवी, संयम हवा एवढंच!

आपलं घर हेच आपलं आनंद निधान आहे, हेच आपण विसरतो आहोत.आपलं काम सुकर व्हावं म्हणून आपण यंत्र विकत घेतली आहेत .थोडक्यात आनंद विकत घ्यायचा प्रयत्न केला आहे. या यंत्रांच्या हप्त्यासाठी पैसे गोळा करण्याचा छंद आपल्याला लागलेला आहे आणि ती तडफड आपले सुखाचे क्षण हिरावून घेतेय.

चिमण्यांचा किलबिलाट हा सत्य आणि शाश्वत आनंद आहे पण आपण त्याकडे कानाडोळा करतो आहोत. ट्विटरवरील नैसर्गिक असं चिमणीचं आपल्याला आनंद देते आणि आपण नैसर्गिक आनंदाला मुकतो आहोत आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे हे ठाऊक असूनही इकडे तिकडे चोहिकडे बघण्यास आपणाला वेळ नाही.

आनंद कुठे कुठे आहे तो कुठे शोधायचा हे एकदा सापडले की  मग…..आनंदाचे डोही आनंद तरंग…….आनंदलहान मुलाच्या निरागसतेत आहे. आनंद आपल्या मनात आहे .अंतरंगात आहे. आपल्या अस्तित्वात आहे.आपल्या श्वासात आहे. आनंद निसर्गात आहे. धुंद हवेत, गुलाबी थंडीत ,रिमझिम श्रावणात, चांदण्या रात्रीत, हिरव्या रंगात ,इंद्रधनुष्यात ,संगीताच्या सात सुरात,लताच्या आवाजात, छंदाच्या वेडात वाचनाच्या धुंदीत……

परमेश्वराला देखील सच्चिदानंद म्हटलं आहे. समर्थ रामदासांनी ‘आनंदवनभुवन’ असं परमेश्वराला संबोधलं आहे. अहो माणसाचा जन्मच आनंदातून झाला आहे हे आपण कसे विसरतो? ‘अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक’ ही अमृतवाणी आहे. ‘तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे’ म्हणून आनंदाचा साठा वाटत संत फिरतायेत. तो भरभरून घ्यावा असे आपल्याला का बरे वाटत नाही?

जीवन हे आनंदाचं  वरदान आहे. तो एक आनंदोत्सव आहे,हे विसरता कामा नये.आनंद भरून घ्यायचा असेल तर मनाची कवाडं उघडी हवीत .एकदा का तो रोमारोमात संचारला की मग अगदी हलकंफुलकं पिसासारखं वाटायला लागेल. आणि मग आनंद पोटात माझ्या माईना म्हणून उंच उडावसंही वाटेल. ….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -7 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:)

गुरूंकडून संकेत मिळताच, वेणास्वामी कीर्तनासाठी उभ्या राहिल्या .समर्थांनी स्त्रियांपैकी, फक्त वेणास्वामींनाच, उभे राहून कीर्तन करण्याची आज्ञा दिली होती.  वेणास्वामींनी आपल्या गुरुंना ,रामपंचायतन यांना वंदन केले .आणि आता झांजा वाजवायला सुरुवात केली. कीर्तनाचा पुर्वरंग सुरू झाला. श्रीराम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र की जय. मैंने राम रतन धन पायो।। वस्तू  अमोलिक  दी मेरे सतगुरू, करि करपा अपनायौ।। जनम जनमकी पूंजी पायी जगमे सबै  खोवाऔ ।।

सद्गुरूंनी मला अमूल्य वस्तू दिली आहे. राम नाम रुपी रत्न हा जन्मजन्मांतरीचा ठेवा आहे. कीर्तन चालू असताना, समोर रामचंद्र आणि सद्गुरु दोघेही आहेत. सद्गुरूनी रामाची ओळख करून दिली ,त्यामुळे त्यांनी प्रथम गुरुदेवांना वंदन केले. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु ।।गुरूचा महिमा असा की त्याच्यासारखा सख्खा सोयरा कोणी नाही. त्यांच्याच कृपेने, रामनामाची अपार संपत्ती मला मिळाली  आहे. ती अखंड अक्षय कुंभा सारखी आहे. पुढे कीर्तनात वेणास्वामींनी एक गोष्ट सांगितली. एक साधू बाबा होते .दुःखी लोक त्याच्याकडे येत. तेव्हा ते कागदावर राम नाम लिहून देत. व तो कागद पाण्यात घोळवून, आजाऱ्याला द्यायला सांगत. एकदा साधू नसताना त्यांच्या शिष्याने त्याप्रमाणे उपाय केला. साधू परत आले .त्यांना ही गोष्ट कळली .आणि राग आला. त्या साधूने  शिष्याला सांगितले की, कोपऱ्यातला रंगीत दगड घे.इ आणि बाजारात जाऊन किंमत कर. एका बाईने, दोन मेथीच्या जुड्या ,बनिया ने एक रुपया, सोनाराने एक हजार रुपये, एका जवाहिऱ्याने एक लाख रुपये, दुसऱ्याने पाच कोटी, आणि राजाचा रत्नपारख्याने सारे राज्य अशी किंमत केली. अखेर त्या दगडाने लोखंडाचे सोने व्हायला लागले. साधूने सांगितले, तो पारसमणि आहे .त्याची किंमत कशी करता येणार!  तसेच रामाचे नाम हे भव रोगाला नष्ट करणारे आहे .राम नाम मणि दीप धरू,जीह देहरी द्वार । तुलसी भीतर–बाहरी जो चाहसी उजियार ।।रामनामाचा दीप जिभेवर ठेवला तर आत बाहेर सर्वत्र प्रकाश पसरेल, असे तुळशीदास म्हणतात .कीर्तनाचा पूर्वार्ध संपला. समर्थांनी स्वतः वेणास्वामींना बुक्का लावला. आणि हार घातला .श्रीराम जय राम जय जय राम.

त्यांनी स्वतः विपुल काव्य रचना केलेली आहे. त्यांनी  चार पाच पदे हिंदीतही केलेली आहेत. उत्तर भारतात ,आपल्या यात्रेत, हिंदुस्थानी भाषेत कीर्तन करून, अगणित लोकांना राम भक्ती मध्ये दीक्षित केले होते .त्यांनी मराठीमध्ये सीतास्वयंवर सारखे खंडकाव्य लिहिले आहे. भारतीय भक्ती साहित्यामध्ये खंड काव्याची रचना करणाऱ्या त्या प्रथम स्त्री साहित्यिक  होत. इतकच काय तर त्यांनी मंगल, संकेत ,लवकुश, सुंदर, शब्द व भाषा नावाची सात रामायणे लिहिलेली आहेत. त्यांनी गुहाख्यान  व कौल अशी आख्या नात्मक काव्येही लिहिली आहेत. कौल ही  राम कथेमधील नवीन कल्पना आहे. त्यामध्ये  त्यांची अनन्य भक्ती ,अध्यात्मिक उंची, तत्वज्ञानातील हुषारी, आणि सुरू दयता दिसून येते. यांच्या कीर्तनाचा उत्तररंग सुरू झाला. उत्तर रंगात सीतास्वयंवराचे वर्णन केले आहे. विश्वामित्रांचा यज्ञ यशस्वी होण्यासाठी, राम लक्ष्मण यांना  ते घेऊन जातात, येथून सुरुवात केली आहे. वाटेत त्राटिका  वध, अहिल्येचा उद्धार, मिथिले चे वर्णन ,आणि जनकाच्या दरबारातील शिवधनुष्य उचलण्याचा रामाचा पराक्रम या सर्व गोष्टी वेणा स्वामींनी ओघवती काव्यात लिहिल्या आहेत. ते वर्णन वाचताना डोळ्यासमोर सर्व गोष्टी उभ्या राहतात. स्वयंवराचे वर्णन तर अप्रतिम केले आहे. मंगल वाद्ये, वधू-वरांचे हळदी लावून स्नान ,नाना प्रकारची पक्वान्ने, फळांचे रस, वेगवेगळ्या वस्त्रालंकारांनी नटून आलेली सभा मंडळी, देवी, देवता ,वराती सह श्रीराम रथावर होते  हे सांगताना त्या म्हणतात, ते कनक मणीची मिथिलापुरी। शृंगारिलिसे  बहुपरी । राम पहाया नरनारी । मंदिर मस्तकी  दुभागी ।।  (सी. स्व  ९..६६ ). शुभ प्रसंगी विवाह झाला. अगदी प्रत्येक घटनेचे वर्णन वेणास्वामिनी अत्यंत सुंदर शब्दात  केले आहे .तीन दिवसांच्या पाहुणचारा नंतर एकमेकांना मोठमोठे आहेर दिले गेले .जनक पत्नी सुमेधा हिने विरहाने अश्रू पुसत, सीतेला उपदेश केला. सर्वांचे रथ आयोध्ये ला आले. आयोध्या नगरीचे वर्णनही  खूप छान केले आहे. वेणास्वामी संपूर्ण वर्णन करण्यात रममाण झाल्या. त्या अखेर म्हणाल्या, या रामकथेचा कर्ता रामच आहे, हे  गुह्य मी स्वतःच जाणते.” हे बोलणे येथार्थ । कर्ता राम याचा  समर्थ । कोणा सांगो हा गुह्मार्थ । माझा मीच जाणे। (  सी. स्व. १४..१४९ ) . हे राघवाची कथा । कर्ता मी नव्हे सर्वथा । सत्य आवडले समर्था । ग्रंथ प्रसिद्धी पावला ।। (सी. स्व.१४..१५० ).

वेडा स्वामींनी गर्जना केली, “जय जय रघुवीर समर्थ “आणि “श्रीराम जय राम जय जय राम” असा जप करत त्या तल्लीन होऊन नाचू लागल्या. डोळे मिटले. पखवाली च्या तालावर त्यांची गती वाढू लागली. राम नाम घुमू लागले. स्वतःला त्या विसरून गेल्या. थकून खाली कोसळल्या. त्या जागी समर्थांचे चरण होते. आपले प्राण गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीने, आत्मा परमात्म्यात मिळून गेला. सीतास्वयंवराच्या अख्ख्यानाच्या कीर्तनाचा पूर्णविराम झाला. ( चैत्र वद्य  १४ शालिवाहन शके  १६०० इसवी सन   १६७८ )श्री समर्थांनी वेणास्वामींच्या देहास अग्नी दिला.

संत वेणास्वामी लेखमाला

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ.व्यंकटेश जंबगी

 

?  विविधा ?

☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“समर्थाचिया सेवका वक्र पाहे

असा सर्व भूमंडळी कोण आहे

जयाची लीला वर्णिति लोक तिन्ही

नुपेक्षी कदा रामदासाभिमानि”

समर्थांच्या कार्याची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.वास्तविक “समर्थ”हे विशेषण रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांना दिले आहे.परंतु स्वामींचे कार्य पाहून लोकांनीच त्यांना समर्थ ही उपाधि दिली.

शक्ती आणि भक्ती दोन्ही समर्थांच्या ठिकाणी होते. छत्रपति शिवाजी महाराज हे स्वामींचे समकालीन होते.त्या काळात रयतेवर,महिलांवर अन्याय होत होता.हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे राजे आणि स्वामी दोघांचे कार्य समकक्ष होते.दिशा समांतर होत्या.राजे युद्ध, स्वारी,तह, राजकारण यात व्यस्त असत,पण त्यांनी ठिकठिकाणी योद्धे सिद्ध केले होते.समर्थांनी श्रीरामावर श्रद्धा ठेवून युवकांना बलोपासना शिकविली.अनेक मारूती मंदिरांची स्थापना शक्तिची देवता म्हणून स्थापन केली.समर्थ अनेक पातळ्यांवर एकाच वेळी यशस्वी होत होते.त्यांनी महाराष्ट्रभर रामदासी सिद्ध केले होते. समर्थ निर्भय, निर्भीड,स्पष्ट होते.ब्रम्हांडापलिकडे रामकथा गेली पाहिजे असे ते म्हणत.. ते सांस्कृतिक अधिकारी होते.. लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्याची त्यांची क्षमता होती… छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी समर्थांची राजकारणाबरोबर तत्वज्ञानावरही होत असे.दोघांचे मार्ग वेगळे पण लक्ष्य एकच…..

हिंदवी स्वराज्य स्थापन करणे !

दोघांनी एकमेकांच्या क्षमतेची जाण होती…आदर होता… विश्वास होता…”.रामदास स्वामी नावाचा कोणी साधू महाराष्ट्रात आहे,त्यांचा दरारा राज्यात आहे”असे पोर्तुगीज लेखक कास्पोर्दि गार्डा याने लिहिले आहे.

“संत” या कक्षात समर्थ बसणारे नव्हते.संत म्हणजे सहिष्णु,नम्र, क्षमाशील, सोशिक…..पण समर्थ तसे नव्हते ते जिथे आवश्यक तिथे शांत,पण तेवढेच आक्रमक होते:-

“सुभटासि व्हावे सुभट

ठकासि व्हावे महाठक”

असे त्यांनी सांगितले. छत्रपति शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि समर्थांमध्ये हे विलक्षण साम्य होते ईश्वरभक्तांनी उगीच मिळमिळीत राहू नये,नेटका प्रपंच करावा,संपन्न जीवन जगून ही भक्ती करता येते.असे त्यांचे मत होते.भक्तांनी लाचारी, गयावया का करावी ?, प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास कसा असावा? सज्जन भक्तांचे रक्षण आणि शत्रूंचा बीमोड त्यांनी करून दाखविला: –

“सामर्थ्य आहे चळवळीचे,

जो जो करील तयाचे

परंतु तेथे भगवंताचे

अधिष्ठान पाहिजे”

हा महान संदेश महाराष्ट्र संकटात असताना त्यांनी दिला.

समर्थांचा शिष्यगण आणि भक्तगण प्रचंड होता.मठ ऐश्वर्यवान होते..त्या ऐश्वर्याचा विनियोग त्यांनी स्वराज्यासाठी केला.ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो म्हणतो,”समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तत्वज्ञानी आणि राज्यकर्ता असा पूरक संयोग होता.

स्वामी एकांतप्रिय आणि अनेकांतप्रियही होते.म्हणून दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके हे लोकप्रिय झाले.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती शंभूराजेंना

लिहीलेल्या पत्रात समर्थ प्रारंभी लिहितात :-

“शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भू मंडळी…”

अशा अनेक उपदेशाने छत्रपती संभाजी महाराज यांना समर्थांनी धीर तर दिलाच,पण कर्तव्याची जाणीव करून दिली.

यापेक्षा मोठे कार्य काय असेल ?

लिहीण्यासारखे अनंत आहे पण लेखनसीमेचा आदर करून इथेच थांबतो.

! !जय जय रघुवीर समर्थ!!

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! सोनेरी उपाय ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

 ? सोनेरी उपाय ! ?

“गुड मॉर्निंग पंत ! आज मॉर्निंग वॉक लवकर झाला का तुमचा ?”

“लवकर वगैरे काही नाही, माझ्या सगळ्या गोष्टींच वेळापत्रक ठरलेलं असतं आणि मी माझ्या रोजच्याच वेळेला घरी आलो आहे आणि माझा चहा सुद्धा झाला आहे, त्यामुळे तुला चहा…. “

“असं काय पंत रोज तुमच्यकडेच चहा घेवून माझी सकाळ…. “

“सुरु व्हायची, आता ते विसर.”

“असं करू नका पंत, अहो ही अजून उठली नाही, ती उठणार कधी, चहा करणार कधी ?”

“मोऱ्या, ते सगळं खरं असलं तरी आजपासून तुझा चहाचा रतीब बंद म्हणजे बंद !”

“पंत, एव्हढे नका निष्ठुर होऊ, एक कप चहाचा तर प्रश्न आहे !”

“प्रश्न नुसत्या एक कप चहाचा नाही मोऱ्या, गॅसचा पण आहे आणि कालपासूनच गॅस आणखी महाग झाला आहे, माहित आहे ना? “

“हो पंत, मी पण वाचलं काल पेपरात. पण सरकार तरी काय करणार ना?”

“काय करणार म्हणजे, निवडणुका जवळ आल्यावर सगळी कशी स्वस्ताई होते ? मग आत्ताच काय…. “

“पंत निवडणूक आणि गॅसचे दर यांचा काहीच संबंध नाही ! जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कमी जास्त ….. “

“होण्यावर ते दर अवलंबून असतात हे ठाऊक आहे मला, तू नको अक्कल शिकवू ! तुझ्या पेक्षा जास्त पावसाळे पहिले आहेत मी, हे विसरू नकोस !”

“हो ना, मग तुम्हीच सांगा त्यावरचा एखादा उपाय आता !”

“अरे माझ्याकडे यावर, निदान आपल्या दोन चाळींसाठी तरी पर्मनंट उपाय आहे, आता बोल !”

“मी काय बोलणार पंत ? तुम्ही उपाय सांगितलात, तर चाळीच्या भाडेकरू संघाचा अध्यक्ष या नात्याने तो लोकांना सांगून, लोकांना तो पटला तर त्याची अंमलबजावणी करीन एव्हढे मात्र नक्की !”

“हो ना, मग ऐक ! आपल्या दोन चाळी मिळून एकूण  किती बिऱ्हाडे आहेत ?”

“काय पंत, तुम्ही सर्वात जुने भाडेकरू, तुमच्या ओळखीनेच तर आम्हाला इथे खोली मिळाली, अशी आठवण बाबा सांगायचे ते आठवतंय मला.”

“ते सगळे सोड, बिऱ्हाड  किती ते सांग.”

“असं बघा, तळ मजला आणि चार मजले धरून साधारण एका चाळीत पंच्याहत्तर प्रमाणे दोन चाळीत दीडशे !”

“बरोब्बर आणि एका कुटुंबात साधारण नातेवाईक धरून, राहणाऱ्यांची संख्या सरासरी आठ धरली तर दोन चाळीत मिळून बाराशे लोक राहतात, पै पाहुणा सोडून, बरोबर ?”

“बरोबर, पण त्याचा गॅसशी….”

“सांगतो सांगतो, जरा धीर धरशील का नाही ?”

“पंत तुम्ही असा सस्पेन्स क्रिएट करताय की, तो उपाय मला कळला नाही तर मलाच गॅसवर ठेवायची वेळ येईल आता !”

“हां, तर आपल्या दोन चाळीतल्या बाराशे लोकांचं जे रोज सोनखत तयार होत, ते वापरून दोन चाळींच्या मधे एक बायोगॅसचा प्लँट उभा करायचा आणि पाईपने सगळ्यांना गॅस पुरवायचा, कशी आहे आयडिया माझी ?”

“फँटॅस्टिक आयडिया पंत, खरच मानलं तुम्हाला !”

“मानलं ना, मग आता लगेच भाडेकरू संघाची मिटिंग बोलाव आणि हा प्रस्ताव मांड बर त्यांच्या पुढे.”

“हो लगेच लागतो त्या कामाला, पण पंत यात मला एक प्रॉब्लेम दिसतोय !”

“कसला प्रॉब्लेम ते आत्ताच वेळेवर सांग, म्हणजे लगेच त्यावर उपाय पण सांगतो !”

“असं बघा  पंत, बायोगँस प्लॅन्ट उभा करायचा तर सुरवातीला भरपूर खर्च येणार आणि आपले भाडेकरू तर सहा सहा महिने घराचे भाडे भरत नाहीत तर या प्लँट साठी कुठून पैसा…. “

“देणार, असच ना ?  मग ऐक, त्यावर सुद्धा माझ्याकडे जालीम उपाय आहे मोऱ्या !”

“सांगा, सांगा पंत, म्हणजे मिटिंग मधे हा मुद्दा कोणी काढला, तर मी तसे उत्तर द्यायला मोकळा !”

“अरे पैशाची चिंता अजिबात करू नकोस तू मोऱ्या, आपल्या नॅशनलाईज बँका बसल्या आहेत ना कर्ज द्यायला !”

“पंत अहो त्या बँका भले कर्ज देतील, पण ते फेडणार कोण? आपले लोक सहा सहा महिने घरभाडे…… “

“देत नाहीत हे मला तू मगाशीच सांगितलंस आणि तेच तर त्यांचे क्वालिफिकेशन आहे !”

“असं कोड्यात नका बोलू पंत, नीट काय ते उलगडून सांगा बघू.”

“अरे असं बघ, बँकांची घेतलेली कर्ज ही परतफेडीसाठी नसतातच मुळी, ती बुडवण्यासाठीच घेतलेली असतात असाचं लोकांचा धृढ विश्वास आहे आणि लोक त्या प्रमाणे वागून तो अगदी सार्थ ठरवतात !”

“तुम्ही म्हणता ते कळतंय मला, पण उद्या बँक जर कोर्टात गेली तर… “

“तर काय ? आपण हात वर करायचे आणि आम्ही कंगाल आहोत हे कोर्टात जोरात ओरडून सांगायच, म्हणजे आपले पण कर्ज माफ होईल !”

“कसं शक्य आहे हे पंत, तुमच आपल काही तरीच असतं !”

“का, का शक्य नाही ? अरे अनिल अंबानी सारखा करोडपती उद्योगपती आपण कंगाल आहोत, हे भारतातल्या नाही, तर परदेशातल्या कोर्टात ओरडून ओरडून सांगतो, तर आपल्या सारख्या मध्यमवर्गीयांनी तसे भारतातल्याच एखाद्या कोर्टात ओरडून सांगायला कसली आल्ये लाज ?”

“तुम्ही म्हणता ते खोटं नाही, पण मध्यमवर्ग मुळातच कर्ज काढायला घाबरतो आणि त्यात ते बुडवणे म्हणजे… “

“तू म्हणतोयस ते खरच आहे ! मग कसं करायचे ते तूच सांग आता.”

“पंत, माझ्या पण डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे !”

“बघ माझ्या संगतीचा परिणाम ! बर सांग तर खरी तुझी आयडिया मोऱ्या.”

“सांगतो ना ! आपण काय करू या, आपल्या प्लॅन्ट मधे जो जास्तीचा गॅस तयार होईल तो आपण आपल्या शेजारच्या चाळकऱ्यांना विकून, त्यातून मिळणाऱ्या पैशातून, आपण बँकेचे कर्ज फेडू !”

“मस्त, ही खरी मध्यमवर्गीय मानसिकता !  एक रुपया सुद्धा कर्ज नको डोक्यावर त्याला ! मग कशी गोळया न घेता रोज शांत झोप लागते ! हे स्वर्गसुख त्या उद्योगपतींच्या नशिबात नाही, हेच खरे ! काय बरोबर ना मोऱ्या ?”

“अगदी बरोब्बर पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असा बॉस होणे नाही…. श्री प्रभाकर जमखंडीकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

असा बॉस होणे नाही…. श्री प्रभाकर जमखंडीकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर तेव्हा जोरात काम चालू होतं. शास्त्रज्ञांची एक मोठी टीम या प्रोजेक्टवर काम करत होती. एके दिवशी त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की, “सर मला आज संध्याकाळी थोडं लवकर घरी जायचं आहे, चालेल का?”

कलाम सर हसत म्हणाले, “शुअर, एनी प्रॉब्लेम?”

“नाही सर, म्हणजे काय आहे की गावात सर्कस येऊन महिना झाला. मुलं रोज सर्कस पहायला जाऊ या म्हणतात. पण मला ऑफिसमधून घरी जायलाच उशीर होतोय, त्यामुळे ते जमलंच नाही. आता, उद्या सर्कस दुसऱ्या गावी जाणार आहे. आणि, पुन्हा वर्षभर तरी गावात सर्कस येणार नाही. तेव्हा आज लवकर घरी जाऊन मुलांना सर्कस दाखवून आणावी म्हणतोय.”

“अरे मग जा ना तुम्ही, जरुर जा. मी तर तुम्हाला आत्ताच घरी जाण्याची परवानगी देतोय. अल्वेज पुट युअर फॅमिली फर्स्ट.”

“नाही सर, मी हातातलं काम आटोपून दुपारी 4 वाजता जाईन.” एवढं बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि कामाला लागले.

साडेचार वाजता कलाम साहेबांनी सहज त्या ज्यु. सायंटिस्टच्या केबिनमध्ये पाहिलं तर ते खाली मान घालून त्यांच्या कामात व्यग्र होते. कलाम साहेब लागलीच ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ते तडक त्या सायंटिस्टच्या घरी गेले. मुलांना घेतलं. स्वतः सोबत बसून मुलांना सर्कस दाखवली आणि येताना छान हॉटेलमध्ये नेऊन मुलांना जे हवं ते खाऊ दिलं आणि नऊ वाजता मुलांना पुन्हा गाडीतून घरी सोडलं.

इकडे साडे सात वाजता ज्यु. सायंटिस्टला आठवलं की आपल्याला साडे चारला जायचं होतं. घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते. कामाच्या व्यापात आपण याही वर्षी मुलांना सर्कस दाखवू शकलो नाही याचं त्यांना प्रचंड वाईट वाटायला लागलं. हिरमुसल्या चेहऱ्याने त्या दिवशीचं काम आटोपून ते घरी पोहोचले तर घर एकदम शांत. पत्नी निवांतपणे टीव्ही पहात बसलेली. त्यांनी घाबरतच तिला विचारलं, “मुलं कुठे गेलीत?”

“अहो, असं काय करता? तुम्हाला वेळ लागणार होता म्हणून तुम्हीच नाही का तुमच्या बॉसना पाठवून दिलं आपल्या घरी? ते येऊन मुलांना घेऊन, केव्हाच गेले सर्कस पहायला. आणि काय हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपली घरगुती कामं तुम्ही कशी काय सांगू शकता?”

ज्यु. सायंटिस्ट काय समजायचे ते समजले. कलाम साहेबांना मनोमन धन्यवाद देत सोफ्यावर बसले. इतक्यात मुलांचा दंगा त्यांच्या कानावर आला. मागोमाग हसत, बागडत मुलं आणि कलाम साहेब घरात आले. कलाम साहेबांना पाहून ते खजिल होऊन उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवत खाली बसण्याची खूण करत कलाम म्हणाले, “अहो, साडे चार वाजून गेले तरी तुमचं काम चालूच होतं. तुमची एकाग्रता पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सर्कसचा विषय पूर्णपणे विसरुन गेला आहात. मुलांची सर्कस बुडू नये म्हणून मी त्यांना घेऊन सर्कसला जाऊन आलो.”

कलाम साहेबांचे आभार मानावेत की त्यांना आपण कामाला लावलं याबद्दल सॉरी म्हणावं हे त्या सायंटिस्टना कळेना. पण स्वतःला पट्कन सावरत, हात जोडत ते म्हणाले, “थॅंक्यु व्हेरी मच सर!”

“नो, नो. ऑन द कॉन्ट्ररी आय शुड से थॅंक्यु टू यू.” असं म्हणत कलाम साहेबांनी त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते पुढे म्हणाले, “कित्येक वर्षांनी आज मीही तुमच्या मुलांसोबत सर्कसचा आनंद लुटला. खूप मजा आली आम्हाला. कितीतरी दिवसांनी मीही आज मुलांसोबत बागडलो.”

मुलांच्या चेहऱ्यावरुन तर आनंद ओसंडून वहात होता. कलाम सरांच्या हातातील आपले हात त्या सायंटिस्टने हळूच सोडवून घेतले आणि आपले डोळे रुमालाने पुसले. बॉस आणि ज्युनिअर मधील प्रेम पाहून बाजूला उभ्या असलेल्या मातेचे मात्र ओलावलेले डोळे आपल्या साडीच्या पदराने पुसणे कितीतरी वेळ चालूच होते.

(ही कथा डॉ. कलाम यांच्यासोबत इस्रोमध्ये काम केलेल्या एका शास्त्रज्ञाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली आहे.)

 

श्री  प्रभाकर जमखंडीकर

संचालक, स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूर

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -6 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग – 6 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:)

रामनवमीच्या उत्सवासाठी वेणास्वामी चाफळला आल्या. आल्यानंतर दोन-चार दिवसातच त्यांना ताप भरला. थंडी तापाने गाठले. तशाच अवस्थेत नदीवर जाऊन, त्या स्नान  करून आल्या. त्यामुळे तब्येत आणखीच बिघडली. औषधे घेतली ,पण औषधांचा काहीही परिणाम होईनासा झाला. त्यांना आता काळजी लागली. रामाचा उत्सव कसा होणार! मनाची तळमळ सुरू झाली. काय करावे काही सुचत नव्हते. रामनवमीचा उत्सव होणार याची मात्र खात्री होती. तरीही काळजी लागून राहिली होती .शेवटी त्या खुरडत, खुरडत रामाच्या मंदिरात गेल्या. अशक्तपणामुळे उभे राहणेही कठीण जात होते. खांबाला धरून उभे राहायला येते का, ते पहात होत्या. पण तेही कठीण झाले. शेवटी स्वतःला त्यांनी आपल्याच लुगड्याच्या पदराने, खांबाला बांधून घेतले. अश्रू गळत होते. श्रीरामाची प्रार्थना करायला लागल्या .अंतकरण भरून आले. श्रीरामाच्या मूर्तीकडे पाहिले, आणि त्यांना दिसले की, श्रीरामाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले आहे. माझ्या भक्तवत्सल रामाला माझ्यामुळे किती दुःख सोसावे लागले, असे म्हणून त्या दुःखी झाल्या .रामभक्त आणि राम यांचे नाते जुळले .अत्यंत हृदयस्पर्शी असे काव्य त्यांना सुचभले. पतित पावना जानकी जीवना। अरविंद नयना रामराया। ——- आता पुन्हा पुन्हा उत्सवाचे कसे होणार याची काळजी लागली .

रमाबाई नावाची एक बाई, “मला उत्सवाची कामे करण्यास,आक्कास्वामींनी पाठविले आहे”, असे सांगून वेणा स्वामींकडे आली. तिने वेणा स्वामींना औषधोपचार केले. तापही उतरला. त्यांच्या देखरेखीखाली रमाबाई सर्व कामे भराभर करू लागली. उत्सवाचा दिवस उजाडला .समर्थ, आक्का स्वामी आणि दूरदूरचे लोक उत्सवासाठी यायला लागले. वेणास्वामीनी अक्का स्वामी व समर्थांना, रमाबाईंनी केलेल्या कामाचा तपशील सांगितला. आक्का स्वामी म्हणाल्या, “मी तर कोणालाच पाठवले नव्हते”. रमाबाईंचा शोध घेतला. पण रमाबाई  गायब झाली होती. भक्तांच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने, श्री रामप्रभूनीच काम केले,अशी खात्री झाली.

आजारपण, उत्सवाची जबाबदारी, कामे यामुळे वेणा स्वामींना अशक्तपणा जाणवत होता .बरेच दिवसात त्या माहेरी कोल्हापूरला गेल्या नव्हत्या. समर्थांकडे तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण समर्थांनी सांगितले की,” उद्या आपल्याला सज्जनगडावर जायचे आहे. तुमचा थकवा कमी झाला ,बरे वाटू लागले की ,मग बघू “.दुसरे दिवशी अक्कास्वामी आणि प्रभू रामचंद्राचा निरोप घेऊन सर्वजण सज्जनगडावर जायला निघाले.  अशक्तपणामुळे वेणास्वामींची पावले हळूहळू पडत होती. थांबून, थांबून चालावे लागत होते. वर पोहोचल्यानंतर कल्याण स्वामींनी आपल्या गुरु  भगिनीची औषध पाणी ,खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली. आठ दहा दिवसात त्यांना बरेही वाटू लागले. समर्थांनी घोषणा केली .”चैत्र वद्य चतुर्दशीला, दुपारी चार वाजता वेणा स्वामींचे कीर्तन होईल. आणि मग त्या माहेरी जातील. स्वतः  वेणास्वामींना खूप आनंद झाला. त्याचबरोबर आजूबाजूचे लोकही आनंदित झाले .कारण बरेच दिवसात त्यांनी वेणा स्वामींचे कीर्तन ऐकले नव्हते. आज आपण आपल्या गुरुं समोर कीर्तन करणार ,त्याचा त्यांना अभिमान आणि धन्य धन्य वाटत होते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडगावचे शहाणे की वेडे..? ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ पेडगावचे शहाणे की वेडे..? ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

वेड पांघरून पेडगावला जाणे किंवा पेडगावचे शहाणे हे वाक् प्रचार कसे आले???

६ जून १६७४, शिवराज्याभिषेक संपन्न. एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च लागला ह्या अद्वितीय सोहळ्याला. आता हा खर्च मुघलांकडून वसूल कसा केला आपल्या राजाने, त्याची गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे उत्कृष्ट उदाहरण ऐका.

अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव नावाचं गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा सुभेदार; महा मुजोर. आपल्या शिवाजी महाराजांना खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा असत, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. पण तिथे आरक्षणास तैनात फौजही मोठी होती. ही सगळी मालमत्ता दिल्लीस रवाना होणार होती. महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य चढाई करेल बहादुरगडावर आणि लुटून आणेल ते बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे ही.

कोणासठाऊक कशी पण खानाला ही बातमी मिळाली, आणि चेष्टेने हसत मजूर्डा म्हणाला,

“सिर्फ २००० मराठा मावळे! उनके लिये तो किले के दरवाजे खोल ही दो.  अगर आ जाए पास भी तो खदेड देंगे, काट देंगे.”

तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादुरगडातून मुघल सैनिकीला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे लक्षात आलेच. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या गडावर, आणि आधीच तयार बसलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्या किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तोच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. २००० मावळे बिथरले, अनपेक्षित झालेलं ना हे सगळं! जीव वाचवायला ते मागे फिरले पण त्यांचे घोडे जोर पकडत नव्हते. खानाची संपूर्ण फौज जवळ येऊ लागली, खूप जवळ आली त्यांच्या. नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून धूम ठोकली. बहादुरखान स्वतः त्यांना आडवायला, नव्हे छाटायला, मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली, कारण माजूर्ड्या बहादूरखान कोकलताशला मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती चेव आणीत होती. मावळे पसार झाले, संपूर्ण २००० ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे!

शेवटी खानाची फौज थांबली, आणि एकच जल्लोष झाला. मग सगळे परतू लागले. ही जीत औरंगजेबास कळाली की काय इनाम असेल ह्या आनंदाने बहादूरखान छाती फुगवून घोड्यावर डौलात होता. का नसावं त्याने, शेवटी शिवाजीच्या फौजेला पळायला लावलं हे काही छोट काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला! आणि तितक्यात सगळ सैन्य शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठे लोट किल्ल्यातून येत होते.

खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं,

“अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”

“कोई नही जहांपन्हा. आपका हुकुम था सबने चढ़ाई करनी है शिवाजी के उन २००० मावलो पर”, किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा अंदाज त्यांना आला, आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि ज्याची भीती होती तेच बोंबलत एक घोडेस्वार आला,

“हुज़ूर, गज़ब हो गया, हम लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओं ने धावा बोल दिया. सब लूट के चले गए हुज़ूर!”?

१ कोटी राज्याभिषेकाचा खर्च ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात भरती.

आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, कदाचित रक्ताचा एक थेंबही सांडला नसेल.

खानाला दोन गोष्टीचं श्रेय त्यामुळे नक्की जातं. लक्षात आलं का, की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणूनच पेडगावचे शहाणे किंवा

वेड पांघरून पेडगावला जाणे वरील सत्य हकीकती वरूनच हे वाक् प्रचार आले.

??छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा?? ?

 

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पतिव्रता सुलोचना… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ पतिव्रता सुलोचना… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : पतिव्रता सुलोचना

रामायणातील बरेच प्रसंग नैमिषारण्यात घडले आहेत. नैमिषारण्य सुरम्य कथा या माझ्या पुस्तकासाठी मला बरेच ग्रंथ वाचायला मिळाले. त्यात मला सगळ्यात आवडलेली व्यक्ती म्हणजे मेघनाद ची पतिव्रता पत्नी सुलोचना. ती वासुकी नागाची कन्या व रावणाची स्नुषा होती. मेघनाद चे तिच्यावर अत्यंत प्रेम होते. तो एक पत्नी व्रती होता. मेघनाद महापराक्रमी होता. त्याने दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्याकडून मायावी विद्या शिकून घेतली होती. त्याने इंद्राशी युद्ध करून इंद्राला जिंकले होते म्हणून त्याचे नाव इंद्रजीत असे पडले होते. राम रावण युद्धा मध्ये फक्त लक्ष्मणच त्याचा वध करू शकत होता. लक्ष्मणाने तशी प्रतिज्ञा केली . त्यावेळी रामाने त्याला सांगितले की तू नक्की त्याचा वध करशील पण त्याचे मस्तक जमिनीवर पडू देऊ नको कारण सुलोचना सारख्या साध्वी च्या पतीचे मस्तक जमिनीवर पडले तर आपल्या संपूर्ण सेनेचा नाश होईल. लक्ष्मणाने ते लक्षात ठेवले व त्याचे शीर उडवले ते हनुमंताच्या हाती पडले. हनुमंताने ते रामाजवळ आणले. त्याच वेळेस मेघनाद चा एक हात उडाला व सुलोचना जवळ ये ऊन पडला. सुलोचना ला खूप दुःख झालं पण तिला त्या हाताला स्पर्श करण्याचे धैर्य होईना कारण कदाचित जर परपुरुषाचा हात असेल तर आपण पापिणी ठरू. सुलोचनाने त्या हाताला विचारलं ” प्राणप्रिय स्वामी हा हात तुमचा असेल तर आणि जर मी खरी पतीव्रता असेन तर तुम्ही या हाताने युद्धाचा सारा वृत्तांत मला लिहून दाखवा.” आणि तिने एक लेखणी त्या हातात दिली. तो हात लिहू लागला” प्रिये सुलोचने, हा माझाच हात आहे. लक्ष्मणा बरोबर माझं तुंबळ युद्ध झालं. लक्ष्मणा सारखा  अत्यंत तेजस्वी व दैवी गुणसंपन्न प्रतिस्पर्धी मला मिळाला. त्याने गेली 14 वर्षे पत्नी निद्रा आणि अन्न यांचा त्याग करून फक्त श्रीरामांची सेवा केली आहे. त्यामुळे त्याच्या अंगात अमोघ शक्ती निर्माण झाली त्यापुढे मी हरलो. हा माझा हात आणि माझे मस्तक मात्र प्रभु श्रीरामांच्या जवळ आहे.” सुलोचना ने सती जायचं ठरवलं पण त्यासाठी मांडीवर पतीचे मस्तक हवे होते. तिने रावणाला सांगितले माझ्या पतीचे मस्तक आणा. तेव्हा रावण म्हणाला,

सुलोचना त्यासाठी तुलाच रामा कडे जावे लागेल. तू बिनधास्त जा कारण तिथे बालब्रह्मचारी हनुमान जितेंद्रिय लक्ष्मण आणि एक पत्नी व्रती प्रभू रामचंद्र आहेत. तुला कसलीही भीति नाही. ते तुझा उचित सन्मान करतील. श्वशुरांची आज्ञा शिरसावंद्य मानून ती पतिव्रता रामाकडे गेली. सर्वांना प्रश्न पडला मेघनाद चं मस्तक रामा कडे आहे हे तिला कसं कळलं? ती एवढी ताकदवान असेल तर हे मस्तक सुद्धा हसेल. सुलोचना ला अंतर्ज्ञानाने हे भाव कळले आणि हात जोडून तिने विनंती केली,” पती देवा मी कायावाचामने तुम्हाला परमेश्वर मानत आहे हे तुम्हाला मान्य असेल तर हसून दाखवा”. आणि अहो आश्चर्यम! मेघनाद च्या निर्जीव मस्तकातून हास्याचे फवारे उडू लागले. श्रीरामाने ते मस्तक तिच्या हाती सोपवले. तिने रामाला विनंती केली आज माझ्या पतीचे अंतिम संस्कार आहेत म्हणून आज युद्ध बंद ठेवाल का? रामाने हो सांगितले. जाता जाता ती लक्ष्मणा समोर आली व म्हणाली” माझे पती अजिंक्य होते. पण त्यांची बाजू सत्याची नव्हती. ज्या सीतेचे अपहरण आपल्या पित्यान केलं त्यांच्या बाजून ते लढले. उर्मिला आणि मी दोघी पतिव्रता आहोत. तुम्हा उभयतांची बाजू सत्याने चालणारी आहे. म्हणून तू जिंकलास.”

पतीचं मस्तक घेऊन ती पतिव्रता लंकेला परत गेली आणि समुद्र किनाऱ्यावर चंदनाच्या चितेवर आपल्या पतीचे मस्तक मांडीवर घेऊन सती गेली.

अशी ही महापतिव्रता सुलोचना. तिच्या तेजाला, धैर्याला, आत्मसमर्पणाला कोटी कोटी प्रणाम.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -5 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग – 5 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:)

रामनवमीच्या उत्सवासाठी वेणास्वामी चाफळला आल्या. आल्यानंतर दोन-चार दिवसातच त्यांना ताप भरला. थंडी तापाने गाठले. तशाच अवस्थेत नदीवर जाऊन, त्या स्नान  करून आल्या. त्यामुळे तब्येत आणखीच बिघडली. औषधे घेतली ,पण औषधांचा काहीही परिणाम होईनासा झाला. त्यांना आता काळजी लागली. रामाचा उत्सव कसा होणार! मनाची तळमळ सुरू झाली. काय करावे काही सुचत नव्हते. रामनवमीचा उत्सव होणार याची मात्र खात्री होती. तरीही काळजी लागून राहिली होती .शेवटी त्या खुरडत, खुरडत रामाच्या मंदिरात गेल्या. अशक्तपणामुळे उभे राहणेही कठीण जात होते. खांबाला धरून उभे राहायला येते का, ते पहात होत्या. पण तेही कठीण झाले. शेवटी स्वतःला त्यांनी आपल्याच लुगड्याच्या पदराने, खांबाला बांधून घेतले. अश्रू गळत होते. श्रीरामाची प्रार्थना करायला लागल्या .अंतकरण भरून आले. श्रीरामाच्या मूर्तीकडे पाहिले, आणि त्यांना दिसले की, श्रीरामाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले आहे. माझ्या भक्तवत्सल रामाला माझ्यामुळे किती दुःख सोसावे लागले, असे म्हणून त्या दुःखी झाल्या .रामभक्त आणि राम यांचे नाते जुळले .अत्यंत हृदयस्पर्शी असे काव्य त्यांना सुचभले. पतित पावना जानकी जीवना। अरविंद नयना रामराया। ——- आता पुन्हा पुन्हा उत्सवाचे कसे होणार याची काळजी लागली .

रमाबाई नावाची एक बाई, “मला उत्सवाची कामे करण्यास,आक्कास्वामींनी पाठविले आहे”, असे सांगून वेणा स्वामींकडे आली. तिने वेणा स्वामींना औषधोपचार केले. तापही उतरला. त्यांच्या देखरेखीखाली रमाबाई सर्व कामे भराभर करू लागली. उत्सवाचा दिवस उजाडला .समर्थ, आक्का स्वामी आणि दूरदूरचे लोक उत्सवासाठी यायला लागले. वेणास्वामीनी अक्का स्वामी व समर्थांना, रमाबाईंनी केलेल्या कामाचा तपशील सांगितला. आक्का स्वामी म्हणाल्या, “मी तर कोणालाच पाठवले नव्हते”. रमाबाईंचा शोध घेतला. पण रमाबाई  गायब झाली होती. भक्तांच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने, श्री रामप्रभूनीच काम केले,अशी खात्री झाली.

आजारपण, उत्सवाची जबाबदारी, कामे यामुळे वेणा स्वामींना अशक्तपणा जाणवत होता .बरेच दिवसात त्या माहेरी कोल्हापूरला गेल्या नव्हत्या. समर्थांकडे तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण समर्थांनी सांगितले की,” उद्या आपल्याला सज्जनगडावर जायचे आहे. तुमचा थकवा कमी झाला ,बरे वाटू लागले की ,मग बघू “.दुसरे दिवशी अक्कास्वामी आणि प्रभू रामचंद्राचा निरोप घेऊन सर्वजण सज्जनगडावर जायला निघाले.  अशक्तपणामुळे वेणास्वामींची पावले हळूहळू पडत होती. थांबून, थांबून चालावे लागत होते. वर पोहोचल्यानंतर कल्याण स्वामींनी आपल्या गुरु  भगिनीची औषध पाणी ,खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली. आठ दहा दिवसात त्यांना बरेही वाटू लागले. समर्थांनी घोषणा केली .”चैत्र वद्य चतुर्दशीला, दुपारी चार वाजता वेणा स्वामींचे कीर्तन होईल. आणि मग त्या माहेरी जातील. स्वतः  वेणास्वामींना खूप आनंद झाला. त्याचबरोबर आजूबाजूचे लोकही आनंदित झाले .कारण बरेच दिवसात त्यांनी वेणा स्वामींचे कीर्तन ऐकले नव्हते. आज आपण आपल्या गुरुं समोर कीर्तन करणार ,त्याचा त्यांना अभिमान आणि धन्य धन्य वाटत होते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वीरु ने लिहिले जयला पत्र… सुश्री प्रभा हर्षे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ वीरु ने लिहिले जयला पत्र… सुश्री प्रभा हर्षे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

प्रिय जय,

तू जाऊन आता जवळजवळ चाळीस वर्षे झाली. आज एका फेसबुक समूहातील एका उत्कृष्ट उपक्रमाच्या निमित्ताने तुला पत्र लिहायची संधी मिळाली!

मित्रा, माझ्या जिवलगा आपल्या मैत्रीच्या वेळेपासून जग खूपच बदलले आहे. आपली साईड कार वाली येझदी आता भंगारात किलोच्या भावाने विकली जाते. तू वाजवत असलेला माऊथ ऑर्गन यांत्रिक वाद्यांच्या कोलाहलात गंज लागून पडून आहे. मारामारीसाठी आपण वापरत असलेले सुरे आणि पॉईंट टूटू रायफल आता फक्त पोलिसांकडे क्वचित आढळतात. घोडे तर आता टांग्याला देखील ओढत नाहीत. फक्त रेसकोर्सवर एखाद्या डर्बीत धावतात!

आपल्या रामगढ मध्ये आता माझ्यासारखी काही म्हातारी खोडं सोडली तर कोणीच राहात नाही. गाव ओसाड झालाय. सगळे शहराकडे गेले आहेत. शहरांचा श्वास घुसमटतो आहे . इथे आता लुटण्यासारखं काही नसल्याने डाकू यायची शक्यताच नाही. तसही आपण दोघांनी गब्बरला संपवल्यावर रामगढकडे वाकड्या डोळ्यांनी बघायची हिम्मत कोणत्याच डाकुत नव्हती. पण मित्रा गब्बर परवडला रे! अगदी त्याने तुला मारला असला तरी! तो दाखवून, सांगून, वागून खुलेआम डाकू होता. घोड्यावरून यायचा आणि गाव लुटून जायचा. पण हल्ली डाकू हसतमुख चेहर्याने कधी पांढरा, कधी काळा, कधी खाकी, कधी इतर कोणत्याही रंगात येतात. हसतमुख चेहरा, महागड्या गाड्या, सोफिस्टिकेटेड रुपात येतात आणि नकळत लुटून जातात. पूर्वी डाकू गावापासून लांब, जंगलात, डोंगरात राहायचे. आता ते आपल्या शेजारच्या घरात, नात्यात, रोजच्या व्यवहारात, रस्त्यात कुठेही असू शकतात. आता सामान्य माणूस डाकुंच्या वस्तीत रहातो आणि रोज विविध गोंडस नावाच्या धाडी पडून लुटला जातो.

असो. पण आपले दिवस खरंच मस्त होते रे मित्रा. खूप साधे आणि सोपे. माणसं काळी किंवा पांढरी होती. हल्ली दिसणारी करड्या रंगाची नरो वा कुंजारोवा जमात महाभारतानंतर हल्लीच परत उदयास आली आहे. त्यावेळी आपण दोस्ती केली ती खुल्या दिलाने आणि गब्बरशी दुश्मनी केली ती पण खुल्या दिलाने. हल्ली छातीत गोळ्या घालणाऱ्या शत्रू पेक्षाही पाठीत विषाच्या सुया टोचणारे मित्र जास्त आढळतात. म्हणून हल्ली कशातच मन लागत नाही. मी आपल्या जुन्या आठवणींच्या आनंदात सुख शोधत असतो. कधीतरी गब्बरच्या त्या अड्ड्यावर फेरफटका मारतो. आता तिथे दगड फोडून खडी बनवायची यंत्र लागली आहेत. ते सर्व कातळ, बसंतीने नाच केला तो दगड, गब्बरने ठाकूरचे हात कलम केले ती वेदी सगळंच नष्ट झालंय!

बाकी ठाकूर दहा वर्षांपूर्वी निवर्तले. राधा वहिनींनी वाड्यात भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्या खोलीत लावलेला, चंदनाचा हार घालेला, तुझा माऊथ ऑर्गन वाजवतानचा फोटो अजून तसाच आहे. वाहिनी रोज तो आसवांनी पुसतात आणि तुझ्या तिथीला त्यांच्याच बागेतील बकुळीच्या फुलांचा हार फोटोला चढवतात!

जेलर साहेब केव्हाच रिटायर्ड होऊन गावाला गेले. मधून मधून पत्र येतात त्यांची. ते पण आता थकले आहेत. सुरमा भोपाली इतका म्हातारा झाला तरी आपल्या कथा अजूनही सांगतो. पण कथेत जय मारला गेला हे सांगताना त्याच्या घशात आजही आवंढा येतो. तो शांतपणे मफलर ने डोळे टिपतो! बाकी रामलाल काका गेल्याच वर्षी गेले. आता राधा वाहिनी एकट्याच आहेत. पण मी किंवा बसंती रोज एक चक्कर मारतो त्यांच्याकडे.

तू मौसिकडे शब्द टाकून जमवून दिलेले माझे आणि बसंतीचे लग्न तू गेल्यावर तीन महिन्यात झाले. डोक्यावर अक्षता पडल्या तेव्हा सर्वांच्या मागे उभा राहून मला आशीर्वाद देत असलेला लंबूटांग तू फक्त मलाच दिसलास आणि ढसाढसा रडलो मी! का गेलास तू मला सोडून? आपलं ठरलं होतं ना की “ये दोस्ती हम नही तोंडेंगे?” मग? तू आम्हा दोघांना फसवलस. मला आणि मृत्यूला. तो माझ्याकडे येणार होता पण तू त्याला ओढून नेलास!

असो. बसंती मजेत आहे. ती गावातल्या उरल्यासुरल्या पोरांसाठी नाचाचे क्लास घेते. मी दारू सोडून आता शेतकरी झालो आहे. तुला म्हणून सांगतो. बसंती आज आजी झाली तरी चाळीस वर्षांपूर्वी होती तितकीच आयटम दिसते. मग तिला हा आजोबा झालेला वीरु आजही काधीतरी आमराईत नेऊन नेमबाजीचा सराव करतो! बाकी जय अमेरिकेत असतो. जय म्हणजे आमचा मुलगा. त्याच नाव आम्ही जय ठेवलंय. तुझ्यासारखाच दिलदार आहे पोरगा. त्यालाही मुलगा झालाय. त्याच नाव आम्ही जयवीर ठेवलंय!

मी गेल्याच आठवड्यात रमेशजींना पत्र लिहिले आहे. त्यांना सांगितलंय की तुमच्या शोले नंतर अनेक भ्रष्ट आवृत्त्या आल्या. पण तुमच्या शोलेच्या नखाचीही सर नाही. तेव्हा रमेशजी फॉर ओल्ड टाईम सेक, अजून एक शोले होऊन जाऊ द्या! फक्त शेवटी जय मारता कामा नये! आमची यारी जगली पाहिजे!

आणि हो मित्रा, आमच्या देव्हार्यात देव नाहीत. एकही मूर्ती किंवा तसबीर नाही. आम्ही रोज यथोचित मनापासून पूजा करतो ती त्या तुझ्या कॉईनची! आणि मागे आरती सुरु असते, “जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सब से दुश्मनी! ये दोस्ती हम नहीं तोंडेंगे!”

तुझा जिगरी,

वीरु.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print