मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “साडी पुराण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “साडी पुराण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

साडी हा माझा जरा वीक पॉईंट आहे. तसा तो प्रत्येक बाईचा असतोच…पण माझा जरा वेगळा म्हणजे..इंग्रजीच्या अर्थाने weak आहे. इतकी वर्ष साड्या नेसूनही साडी या विषयावरच माझं ज्ञान अजूनही कच्चचं आहे.

साडीचा पोत बघून तिची किंमत मला कधीच सांगता येत नाही. मैत्रिणी मात्र अगदी परीक्षा घेतल्यासारखे अवघड प्रश्न विचारत असतात.

“नीता सेलमध्ये अगदी स्वस्तात ही निळी साडी घेतली..काय किंमत असेल?”

स्वस्तात म्हणजे दोनशेला घेतली असावी असं समजून मी दोनशे म्हटलं तर ती रागाने नुसती लाल झाली.

“सेल झाला तरी इतक्या कमी किमतीत मिळणार आहे का ?तू आणून दाखव बघू..तुला विचारलं हेच चुकलं..तुला साडीतलं काही म्हणजे काही कळतं नाही. तीनशेला घेतली. बाहेर हीची किंमत पाचशे आहे. ” रागाने ती बोलत होती.

आता या अनुभवावरून मी शहाणी झाले आहे. नंतर एका मैत्रिणीने साडीची किंमत विचारली.

मी लगेच विचारले,

” सातशेला घेतलीस का ग” 

विचारणारीची कळी खुलली. 

ती म्हणाली,

“अग फक्त चारशेला घेतली. तू ही सातशेला घेशील. तुला कोणीही हातोहात फसवेल. तुला साडीतलं ओ का ठो कळत नाही. “

“हो ग काय करू ग..खरचं मला अजूनही लक्षात येत नाही…” मी म्हणाले..

साडीतले लाल, पिवळा, निळा जांभळा, हिरवा हे ठळक रंग मला कळतात. त्या रंगाचे जे उपरंग असतात ते आले की माझा घोटाळा सुरू होतो….

एके दिवशी काॅटनची पिवळी साडी आवडली म्हणून मी ती दुकानातून घेऊन आले. जरा वेळाने सुधाचा फोन आला म्हणून तिला सहज.. साडी घेतली…असे सांगितले.

तिने विचारले,

“पिवळा म्हणजे कुठला पिवळा रंग?”

मला काही अर्थबोध होईना. म्हणून म्हटले,

“अग पिवळा आहे एवढं खरं”

” अग पण..म्हणजे गोल्डन येलो, हळदी का सनफ्लॉवर यलो ?”

समोर साडी असुनही मला काही सांगता येईना…

तोपर्यंत तिचा पुढचा प्रश्न तयार होता….

” मग ब्राऊनिश येलो आहे का?”

साडीकडे निरखून पाहिल्यावर लक्षात आले तो तसाही नव्हता….म्हणून तिला म्हटलं,

” तू प्रत्यक्ष येऊन पहा ग..मला काही समजत नाहीये. “

असं म्हणून मी फोन ठेवून दिला. आणि हुश्श केलं…

दोन दिवसांनी सुधा घरी आली होती. तिनी साडी पाहिली आणि म्हणाली,

“अगं एवढं कसं कळत नाही तुला हा ब्राईट यलो आहे..”

झालं म्हणजे तिसराच रंग होता साडीचा….

मला आवडलेली पटोला मी अठराशेला घेऊन आले. किंमत सांगितल्यावर माझी मैत्रीण किंचाळलीच…

” अगं तुला पटोला घ्यायची होती तर मला सांगायचं नाहीस का ? सेल होता तेव्हा घेतली असतीस..ईतकी घाई का केलीस? बघ आता किती महाग पडली…”

बापरे सुमारे दहा मिनिटें ती मला बोलत होती.

बर एकदा बोलून बाईनी गप्प बसावं की नाही ? 

परत एकदा एका कार्यक्रमात मी ती साडी नेसलेली दिसली की तिचं सुरू झालं….तिनी सगळ्यांना मी किती महागात साडी घेतली याच साग्रसंगीत वर्णन करून सांगितलं.

बाकीच्या बायका अगदी आश्चर्यचकित होऊन तिचं बोलणं ऐकत होत्या. तीला साथ देत होत्या…त्यातील एकीने पटोला चौदाशेला दुसरीनी बाराशेला आणि तिसरीने तर हजारलाच घेतलेली होती…

मला तर वाटतं बायका जास्ती असत्या तर पाचशेलाही पटोला घेणारी कदाचित त्या दिवशी मला भेटली असती….

हिरवी साडी घेऊन आले तेव्हा तर फारच गंमत झाली….

मैत्रिणीला कौतुकांनी ती दाखवली ती म्हणाली,

“अग नीता हा हिरवा रंग नाहीये..हा तर रामा कलर आहे. ” 

खरं सांगते तेव्हा रामा हा रंग आहे हे मला कळले. नंतर तिने मला बराच वेळ समजवून सांगितले तरी हिरवा रंग “रामा ” कधी होतो हे मला कळलेच नाही. शेवटी बिचारीने…हरे रामा…

म्हणून कपाळाला हात लावला.

नंतर घरी आलेल्या मैत्रिणीला कौतुकानी मी सांगितले,

” बघ मी नवीन रामा कलरची साडी घेतली. ” तर तिने विचारलं,

” तू यातला मजिंठा कलर का नाही घेतलास? तो खूप छान दिसतो. “

मला अजिंठ्याची लेणी माहीत होती. हे मजिंठा मी प्रथमच ऐकत होते….तरी अज्ञान ऊघडं पडू नये म्हणून मी म्हटलं,

” अगं त्यांच्याकडे मजिंठा कलरच नव्हता..”

” लाजरीकडून घेतलीस ना ?त्यांनी यातल्या मजिंठा कलरच्या साड्या शोकेस ला लावल्या आहेत “

यावर मात्र मी गप्प बसले.

असे फजितीच प्रसंग माझ्यावर वरचे वर येत असतात…

दुकानातली जी साडी आवडेल ती मी घेऊन येते. देताना दुकानदार त्या साडीचं नाव सांगतो. पण घरी येईपर्यंत मी ते विसरून जाते. मग मैत्रिणींनी विचारले, कुठली साडी आणलीस ?की उत्तर देता येत नाही. त्या दिवशी मात्र मी नांव पक्के लक्षात ठेवले होते. मैत्रिणीला उत्साहाने सांगितले,

” मणिपूर सिल्क घेतली”

तिने साडी हातात घेतली आणि म्हणाली,

“अग ही मणिपूर नाही काही….ही तर ढाका सिल्क आहे. “

” पण दुकानदारांनी ही मणिपूर म्हणून सांगितलं “

” अग त्याला काय कळतंय मी सांगते ना..ही ढाका सिल्कच….”ती ठामपणे म्हणाली.

बघा…म्हणजे दुकानदारांपेक्षा माझ्या मैत्रिणीचं ज्ञान जास्ती आहे.

साड्या बघताक्षणीच फटाफट त्यांची नांवे सांगणाऱ्या माझ्या मैत्रिणींच्या अफाट ज्ञानाचे मला फार कौतुक वाटते.

मी बेळगाव सिल्क घेतली तेव्हा फार गंमत झाली. शेजारच्या काकूंकडे त्याच वेळेस त्यांच्या कानडी वहिनी आल्या होत्या. काकूंना बेळगाव सिल्क दाखवायला गेले. त्यांच्या वहिनी जवळच बसल्या होत्या. साडी हातात घेऊन त्या म्हणाल्या,

“अहो हे बेळगाव सिल्क नव्हे हो..आमचं बेळगाव सिल्क कसं घट्ट असतंय..हे कसले हो पातळं..हे बेळगाव नाहीच बघा “

“वहिनी इथे हेच बेळगाव सिल्क म्हणून विकतात. “

यावर काकू म्हणाल्या,

” तुमच्या पुण्यातले लोक लबाडं बघा..कशालाही काहीही म्हणतात..आणि तुमच्या गळी मारतात फसवतात..”

” वहिनी पुण्यात यालाच बेळगाव सिल्क म्हणतात…” काकूंनी बोलायचं प्रयत्न केला… पण वहिनी ऐकून घेईनात…

” लोक काही म्हणत हो..हे बेळगाव सिल्क नव्हे बघा…माझं आणलं नाही..नाहीतर इथेच फरक दाखवला असता…”

काकू त्यांना परत पटवायला लागल्या पण वहिनी पण ठाम होत्या…

आता हा ” बेळगाव “प्रश्न असल्याने हा लवकर सुटायचे चिन्ह दिसेना तेव्हा मी माझी बेळगाव सिल्क घेऊन तिथून हळूच निघून आले.

साड्यांची नावे लक्षात राहावीत म्हणून मी त्या साडीच्या नावाशी खूणंगाठ बांधून ठेवते.

एका साडीचे नाव आहे वल्कलम्.

हे नांव पूर्वी ऋषी घालायचे त्या वल्कल या शब्दाशी मी जोडलेले आहे. म्हणजे ऋषी..साडी…वल्कलं असं मी मनात ठेवलेल आहे.

खरं म्हणजे साडी आणि ऋषी ही जोडी जरा विजोडच वाटते..पण मला लक्षात ठेवायला सोपे आहे.

मला हलकी भारी कुठलीही साडी आवडते. नवीन साडी मिळाली याचाच आनंद वाटतो. त्या दिवशी ची साडी बघून मैत्रीण म्हणाली,

” नीता साडी दिसायला छान आहे…पण टिकेल असं वाटत नाही. “

इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आता एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. मग तीच तिला सांगितली म्हटलं….

” अगं संत सज्जनांनी सांगून ठेवलेले आहे हा देह नश्वर आहे…मग तिथे त्यावरच्या साडीची काय कथा? टिकेलं तेवढे दिवसं आनंदानी वापरायची..

हा देह आहे तोपर्यंत आला दिवस मजेत घालवायचा मग पुढचे पुढे बघू….”

काय खरं की नाही?..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही जणू आजची हिरकणी … लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ ही जणू आजची हिरकणी … लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. राहणार पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सीमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या आणि दहा बिसलरी बाटल्या घेऊन चढत होती.

थोडावेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरा मध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजीवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातून छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमुरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तिने आवाज दिला “ दादा सरबत, पाणी, ताक घ्या की…” मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं “ बाळा कुठची राहणार. ” पाली गावचं नाव सांगितलं. ‘ शाळेत जातेस का? ‘ २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले.

खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतल्या. व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला.

गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला…..

जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय..

लेखक व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे

माजी सैनिक, खोडद,  ८३९०००८३७०

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Be cool आई ! –  लेखिका: सौ. योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Be cool आई ! –  लेखिका: सौ. योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

लॅपटॉप आहे तो आई..! एवढ्या जोरात बटनं दाबायची गरज नाहीए त्याला….

ठक काय आई? किती वर्ष झाली माॅलला येतेस! तरी काय त्या एस्कलेटरजवळ घुटमळतेस….?

नेट बॅंकिग करत जा ग. किती सेफ आहे आई…

स्मार्टफोन फक्त फेसबुक आणि व्हॉटस अॅप साठीच बनलाय असं वाटतं का तुला..?

अशी वाक्ये फक्त माझ्याच घरात ऐकू येतात, असं नाही, तर सगळ्यांच्याच घरात ऐकू येतात…कारण हल्लीची मुलं टेक्नोस्मार्ट आहेत आणि आपण टेक्नो ढं.

पण डरने का नहीं. Cool रहनेका.

……आणि यांना तर एवढंच येतं, मला तर काय काय येतं! अख्खं घर चालवते मी !

अशी स्वतःचीच समजूत काढायची……

मुलांची काही काही मतं ऐकली की खूप मज्जा येते…..कधी त्यांचे फोटो काढले की लगेच म्हणणार….cool हां आई..टाकू नको लगेच फेसबूकवर किंवा लावू नको स्टेटसला…का रे…?असा प्रश्न आपण विचारला की उत्तर ठरलेलं असतं..Be cool, आई….आपले फोटो आपल्या साठीच असतात…..दुसर्‍यांसाठी नाही..

परवा एक ओळखीच्यांचं लग्न होतं

भरपूर मंडळी नाचून आनंद घेत होती..म्हणून मुलालाही म्हटलं, नाचला का नाही तू?..नाचायचं थोडं…तर म्हणाला, Be cool आई….लग्न करताना एवढं नाचण्यासारखं काय आहे…त्याचं लग्न होतंय….मी का एवढं नाचू…..?

आपली मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्याला लहानच वाटतात….

मुलगी परीक्षेला निघाली तेव्हा हे घेतलं का, ते घेतलं का…? असं विचारताना मला आलेलं टेन्शन बघून तीच मला म्हणाली….Coooooool आई….सगळं घेतलंय…….

गाडी चालवताना पण तेच होतं..

मी शक्यतो मुलांच्या मागे बसत नाही..त्यामुळे कुठे जाताना मुलगा मागे असेल तर म्हणतो….आजच पोचायचंय ना आपल्याला…..? नाही, सायकलवाले पण ओव्हरटेक करुन चाललेत म्हणून म्हटलं…..

हाॅटेलमध्ये गेलं की अन्न गरमागरम असावं, असं सगळ्यांना वाटतं..त्यासाठी त्या वेटरची जास्त ये-जा व्हायला लागली की मी म्हणते जाऊ दे रे. नको बोलावूस आता…हे ऐकलं की मुलं नक्की म्हणतात chill, आई. आपण थंड खाण्यासाठी एवढे पैसे भरणार का..?

आणि तो तुला दहा पैसेतरी सोडणार आहे का..?

फेसबुकवर फ्रेंडशिपबद्दलच्या खुप सार्‍या पोस्ट फिरत असतात. ते वाचून अशा फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नका, असं सांगितलं की मुलं म्हणतात, Cool आई! सगळेच काही आतंकवादी नसतात…

मुलगी तर कुठेही जाणार असेल, तर मी नेहमी सांगते कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलू नको..कुणी काही दिलं तर खाऊ नको….या सगळ्या सूचना तिला आता पाठ झाल्यात. त्यामुळे मी सांगायच्या आधीच ती म्हणते…हो..कळलं…Chill, आई! कुण्ण्णाशी नाही बोलणार….काही नाही खाणार..

एकंदर असं आहे..हल्लीची मुलं खुप clear आणि smart आहेत आणि आपली पिढी खूप मायाळू आणि सर्वांना सामावून घेणारी…

आणि या दोन्हीचा समन्वय साधून अजूनतरी दोन्ही पिढ्या मस्त मजेत चालत आहेत….चालत रहातीलच…

आपण फक्त एकच मंत्र जपायचा…

Be Cool, आई….

लेखिका: श्रीमती योगिता कुलकर्णी

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रागावलेले प्राणी ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ 🐱 रागावलेले प्राणी 🐜 ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज एक मुंगीची इमेज बघितली आपल्या गुगल बाबांची कृपा! आणि ती इमेज बघून एकदम घाबरलेच. आपली साधी घरात वावरणारी वेळेला आपल्या कपड्यांवर,अंगावर फिरणारी हीच ती मुंगी का? असा प्रश्न पडावा आणि भीती वाटावी असा तिचा चेहरा दिसत होता. एक विचार असा आला की देव मुंगी ( आपली गुदगुल्या करणारी काळी मुंगी ) आपल्याला चावत नाही. आपणच बरेचदा तिला त्रास देतो. म्हणूनच या लाल मुंग्यांना राग येत असावा आणि स्वत:ला मिळणारी वागणूक आणि काळ्या मुंगीला मिळणारी वागणूक हे दोन्ही मिळून ती एवढी रागीट चेहेऱ्याने आपल्याला कडकडून चावत असावी. 🐜

असेच सकाळी सकाळी म्हणजे साखर झोपेत असताना कोंबडा इतका कर्कश्श का ओरडत असावा? आमच्या शेजारच्या घरातील कोंबडा तर घड्याळाच्या दर तासाला नियमित पडणाऱ्या ठोक्या प्रमाणे दर तासाला आरवतो. बहुतेक दिवसभर त्याला माणसांच्या आवाजाचा जो त्रास होतो त्याचे उट्टे काढत असावा. 🐔

तीच गोष्ट कुत्र्यांची. कितीही लक्ष ठेवा आपला डोळा चुकवून आपण कंबर मोडून स्वच्छ  केलेल्या दरवाजावर व त्या समोरील स्वच्छतेवर घाण करून जाणार. अनेक उपाय केले पण कुत्र्यांना आमच्या घरा समोरची जागा फारच आवडली होती. जणू मला चिडवायचे ठरवूनच टाकले होते. मग मी गुगल साहेबांची मदत घेऊन उपाय शोधले आणि उग्र वासाच्या फिनाईलची मदत घेतली. त्याचा कुत्र्यांना एवढा राग आला की त्यांनी रात्रभर निरनिराळ्या आवाजात ( प्रत्येक कुत्र्याचा आवाज वेगळाच असतो म्हणा ) ओरडून माझ्या झोपेवर घाला घातला. असेही वाचनात आले होते की, लाल व निळ्या रंगाचे पाणी भरून बाटलीत ठेवले तर कुत्री, मांजरे यांचा त्रास होत नाही. मग मी पण तो उपाय केला. पण बाटल्या गायब होऊ लागल्या. शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी त्यातील एक बाटली चक्क कुत्र्याच्याच तोंडात बघितली. आणि या रंगीत पाण्याच्या बाटल्या कोण पळवत आहे याचे उत्तर मिळाले.🐶

आमच्या काकांच्या घरी एक लाडाची मांजर होती. कोणी आणले नव्हते. तीच आपणहून आली होती. आणि बळेच सगळ्यांच्या पायात येऊन लाड करून घ्यायची. आम्ही कॅरम खेळायला बसल्यावर तिला खूप राग यायचा. ती त्या बोर्ड वर बराच वेळ बसायची. सोंगट्यांचे बराच वेळ निरीक्षण करायची आणि रागाने आपण स्वतःच सर्व सोंगट्या बिळात पंजाने ढकलून द्यायची. ती इतकी शहाणी होती की एखादा पदार्थ आवडला नाही तर पळून जायची. आणि जबरदस्तीने दिला तर जीभ बाहेर काढून उलटी आल्या सारखे करायची आणि तो पदार्थ देणाऱ्याला पंजाचा प्रसाद द्यायची. 🐱

अशीच एकदा आपण जिला गरीब समजतो अशा शेळीची गंमत कसली, रागच बघितला होता. एका शेळीला एक व्रात्य मुलगा शेपटीला हात लावून,ओढून सारखा त्रास देत होता. चार पाच वेळा ती पुढे पळाली. नंतर मात्र ती त्या मुलाकडे वळली आणि त्याला आपल्या छोट्या शिंगाने मारले. जणू तिने अन्यायाचा प्रतिकार करा हीच शिकवण दिली. 🦙

अशा काही थोड्या गमती,काही राग सहज ओरडणाऱ्या कोंबड्या मुळे आठवले. तशा प्राण्यांच्या बऱ्याच आठवणी,अनुभव व गमती जमती आहेत. त्या पुन्हा केव्हातरी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

निवडुंग.

निवडुंग या काटेरी, झुडुप प्रकारच्या वनस्पतीशी माझ्या काही बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. धारदार बोथट मणके असलेल्या निवडुंगाच्या चांगल्या गलेलठ्ठ फांदीचे एक सारखे उभे तुकडे करून, त्याचे सुरेख दिवे आई बनवायची. त्यात तेल वात रुजवायची. आणि चांदीच्या ताटात ते पेटवलेले दिवे लावून दिवाळीच्या धनतेरसच्या दिवशी धनाची पूजा करायची. इतका देखणा देखावा असायचा तो!

आजी म्हणायची प्रत्येक वनस्पतीचा सन्मान ठेवणे ही आपली संस्कृती आहे.

याच निवडुंगाशी माझी एक कडवट आठवणही आहे. आमच्या बागेत सदाफुली, मोगरा, जास्वंदी, जाई आणि जुई सोबत एका कुंडीत कोरफड लावलेलं होतं. काटेरी धारदार गुळगुळीत, मऊ, हिरवागार कोरफडीचा वाढलेला गुच्छ छानच दिसायचा. पण मला खोकला झाला की आजी, या कोरफडीची फणी कापून त्यातला गुळगुळीत गराचा रस करून प्यायला लावायची. खोकला पळायचा पण मनात रुतलेला त्याचा कडवटपणा मात्र नकोसा वाटायचा.

कधी कधी आजी तो गर केसांनाही चोपडायची. माझे कुरळे दाट केस पाहून मैत्रिणी म्हणायच्या,

“इतके कसे ग दाट तुझे केस?” मी त्यांना सांगायची, “कोरफडाचा चीक लावा”. तेव्हां त्या नाकं मुरडायच्या.

ठाण्याला शहराचे स्वरूप गेल्या काही वीस पंचवीस वर्षापासून आलं असेल. पण त्याआधी ठाण्याच्या आसपास खूप जंगलं होती. काटेरी, वेडी वाकडी, मोकाट वाढलेली. प्रामुख्याने तिथे निवडुंगाची झाडे आढळायची. आणि त्या वयात निवडुंग या वनस्पतीविषयी कधी आकर्षण वाटलंच नाही. नजर खिळवून ठेवावी असं कधी झालं नाही.

नंतर कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना या निवडुंगाची पुन्हा वेगळी शास्त्रीय ओळख झाली. कॅक्टेसी, फॅमिली झीरोफाइट्स(xerophytes) अंतर्गत येणाऱ्या या निवडुंगाचे अनेक प्रकार हाताळले. पाहिले. कितीतरी वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी नावे. वई निवडुंग, त्रिधारी निवडुंग, फड्या निवडुंग, बिनकाट्याचा निवडुंग, पंचकोनी निवडुंग, वेली निवडुंग, लाल चुटूक फळं येणारी काही गोंडस निवडुंगं, काही काटेरी चेंडू सारखे दिसणारे..असे कितीतरी प्रकार अभ्यासले. वाळवंटातही हिरवगार राहण्याची क्षमता असलेलं हे काटेरी झाड, फांद्यांमधे कसं पाणी साचवून ठेवतं आणि स्वतःला टिकवतं, याचा वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकातून भरपूर अभ्यास केला. त्याचे पर्यावरणीय आणि वैद्यकीय फायदे जाणून घेतले. पुढील आयुष्यात तर या निवडुंगाच्या छोट्या कुंड्यांनी घरही सुशोभित केलं. एक काळ असा होता की घरात विशिष्ट प्रकारचं कॅक्टस असणं हे स्टेटस झालं होतं! आजकाल तर एलोवेरा जेल, एलोवेरा क्रीम, ऑइल यांनी तर घराघरात ठाण मांडलेआहे. एलोवेरा म्हणजे तेच ना आजीचं कोरफड?

आता माझ्या अंगणात एका कोपऱ्यात, आई ज्याचे दिवे बनवायची ते चौधारी निवडुंग खूप वाढले आहे. कधी कधी ते उपटून टाकावं का असेही माझ्या मनात येतं. पण उन्हाळ्यात जेव्हा काही झाडं सुकून मरगळतात तेव्हा हे हिरवंगार निवडुंगाचं झुडुप मला काहीतरी सांगतं. शिकवण देतं. माझा गुरू बनतं. मला ते काटेरी झाड स्वयंपूर्ण वाटतं. स्वतःची शस्त्रं सांभाळत स्वतःचं रक्षण करणारं सक्षम जैविक वाटतं. वाळवंटातही हिरवेपण जपणारं एक कणखर व्यक्तिमत्त्वाच्या रूपात ते माझ्यासमोर येतं. आणि मनात सहज येतं, आपणही असेच निवडुंग होऊन जावे. जीवनाच्या वाळवंटी, विराण वाटेवरही हिरवेगार राहावे. काटे सुद्धा दिमाखाने मिरवावेत…

आणि जमलं तर आईच्या पूजेच्या ताटातला दिवाच होऊन जावे..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…’ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले  ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…‘ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

ओरडणारी, किंचाळणारी आई…

(‘घरोघरी मातीच्याच चुली’ की हो !)

बाईपण दे गा देवा. ओ के आहे. पण आईपणाचा बोजा नको रे बाप्पा! ऐसे कैसे चलेगा! मान्य आहे, सोपं नाही आहे ते. पण घेतला वसा तर निभावायलाच हवा ना. आनंदाने, सुख, समाधानाने संसार तर करायलाच हवा.

१. आईचे ताणतणाव

आईचे व्यक्तिमत्त्व आणि तिच्या वागणुकीचा मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर फार मोठा परिणाम होतो. आई जर वारंवार ओरडणारी, किंचाळणारी असेल तर मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

२. मुलांमध्ये तणाव आणि चिंता

मुलांना आईकडून हवे असते प्रेम आणि सुरक्षितता. लहान सहान चुकांवर ओरडणारी आई मुलांमध्ये तणाव आणि चिंता निर्माण करू शकते. त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का देऊ शकते.

३. आत्म-संयम, वर्तणूक आणि सामाजिक कौशल्ये:

आईच्या ओरडण्यामुळे मुलं घाबरु शकतात. भेदरू शकतात. स्तब्ध, होऊ शकतात. कॉम्प्युटर हँग होतो तशी. वर्तणुकीत समस्या निर्माण होतात. आईच्या ओरडण्याला उत्तर म्हणून मुलं उलट उत्तर, आक्रमकता, विरोध किंवा विद्रोह करू शकतात. हे साद प्रतिसादाचे प्रकरण आहे. त्यांचे चुकीचे वागणे त्यांच्या सामाजिक कौशल्यांना बाधा पोचवू शकते. आईने संयम बाळगून वर्तणूक केली तर मुलेही संयम बाळगून वर्तणूक करायला शिकतील.

४. भावनिक विकास:

आईच्या ओरडण्यामुळे मुलांच्या भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यात कमी पडू शकतात. त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी होऊ शकते. त्यांना आपल्या भावना दडपून ठेवायला शिकायला लागतं. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

५. आत्मसन्मान:

वारंवार ओरडण्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो. त्यांनी स्वतःबद्दल निगेटिव्ह भावना बाळगायला सुरुवात केली तर त्यांचा आत्मविश्वास खालावतो. “तू तर बॅड बॉयच आहे” हे त्याला वारंवार सांगून पटवून देण्याने काय साधणार? मुलांचा स्वतःचा स्वतःवरच विश्वास नसेल तर शैक्षणिक, सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

६. आईचे मानसशास्त्र:

आईचे वर्तनही तिच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. ताण, चिंता, कौटुंबिक, आर्थिक, वैवाहिक समस्यांमुळे आईचा मूड बिघडू शकतो. आईनी स्वतःची मानसिकता सुधारली तर मुलांचे वर्तणूक सुधारते. मन पावन, पवित्र वातावरणात ठेवा. प्रसन्नतेने मिळवा, परम सुखाचा मेवा. बघायला गेलं तर, यादी मोठी समस्यांची. आवाक्याबाहेरची काळजी कशाला उद्याची. आईचे ताणतणाव पोखरती, तिच्या स्वतःच्या, व मुलाच्या मनाला आणि शरीराला. मनात नकोच जागा, त्यांच्यासाठी उरायला. आईने कायम चिंताग्रस्त राहून, काय साधणार. सशक्त मन, कधीच नाही कोलमडणार.

७. संवाद आणि सामंजस्य:

आई-मुलांमधील संवाद आणि सामंजस्य वाढवणे हे महत्वपूर्ण आहे. आईने आपल्या मुलांशी प्रेमळ, आदराने आणि सहनशीलतेने वागायला शिकायला हवं. जर मुलं चुका करतात, तर त्या चुका सुधारण्यासाठी प्रेमळ मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. कणभर चुकीला मणभर रागवायला नको. जुन्या चुका आठवून, आठवून रागवायला नको. केल्या चुकीला लगेच रागवायला तर हवेच. पण ते एक दोन वाक्यात असावे. पानभर रागवायला नको.

८. सकारात्मक पालनपोषण:

पॉजिटिव्ह पॅरेंटिंग हवे. प्रेम, आदर, आणि सहनशीलता हवी. मुलांना शिस्त लावण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा. मुलं आत्मविश्वासाने, स्वावलंबी आणि सामर्थ्यवान बनू शकतात.

निष्कर्ष:

ओरडणारी, किंचाळणारी आई मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम करू शकते. आईने सकारात्मक पद्धतीने मुलांचे पालनपोषण करणे आवश्यक आहे. त्यानी मुलं सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या स्थिर बनतील. आईने आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामुळे तिच्या वर्तनात सकारात्मक बदल होऊ शकतात. कंट्रोल मॅडम, कंट्रोल.

लेखक : विद्यावाचस्पती डॉ. अनिल मोकाशी

बाल कल्याण केंद्र, मतीमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा. जामदार रोड, काराभारीनगर, कसबा, बारामती, ४१३१०२,

९८२२३०२१३१ —- dranilmokashi@gmail. com

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अवघाचि संसार सुखाचा करीन… – संत ज्ञानेश्वर ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? काव्यानंद ?

☆ अवघाचि संसार सुखाचा करीन… – संत ज्ञानेश्वर ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर 

अवघाचि संसार….

अवघाचि संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक || १ ||

*

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटण माहेरा आपुलिया || २ ||

*

सर्व सुकृताचे फळ मी लाहिन |

क्षेम मी देईन पांडुरंगा || ३ ||

*

बापरखुमादेवी वरु विठ्ठलाची भेटी |

आपुल्या सवंसाठी करुनि ठेला || ४ ||

*

अवघाची संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक ||1||

अवघाची संसार म्हणजे सगळा संसार सुखाचा करिन संसार खूप अवघड आहे तो सोपा नाही वादळ वारे संकट झेलत सावरत संसार करावा लागतो,,,,,,,,

कुटुंबाची मर्यादा पाळत सगळ्यांची मनं सांभाळून हातोटीने संसार करावा लागतो नव्हे नव्हे करावाच लागतो.

“आनंदे भरीन तिन्ही लोक “

आनंदाने, समाधाने राहून तिन्ही लोकांना आनंद देईल,,,,

तिन्ही लोक,,, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या तिन्ही लोकांत आनंद परमेश्वराच्या नामस्मरणाने देणार आहे.

परमार्थ करून प्रपंच करणं म्हणजे संसार सुखाचा होणं आहे.

संसार अवघड आहे तितकाच परमार्थ सोपा आहे पण, आपण सांसाराच्या मागे धावत परमार्थ अवघड करून ठेवतो.

वय झाल्यावर देवाची आठवण येते तेंव्हा लक्षात येत आपण आयुष्यभर विनाकारण पळालो ज्याने आपल्याला या जगात आणलं त्यालाच विसरलो.

तेंव्हा जाणीव होते आणि देवाचा धावा सुरु होतो. भक्ती कशी निस्वार्थी हवी. देव “दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू ” आहे आपल्या भक्तीचं फळ तो लगेच देतो.

संसार करत आनंद देण्याचा प्रयत्न करावा आनंद वाटत राहावा.

जाईन गे माये तया पंढरपूरा* भेटेन माहेरा आपुलिया

संसार करत परमार्थ करायचा आहे पांडुरंगा चरणी लिन व्हायचं आहे..

पंढरपूर माहेर आहे तिथे विठ्ठल रुख्मिणी माय बाप कर कटावर ठेऊन उभे आहेत…..

पंढरपूला माझ्या माहेरी जाऊन भेटून येणार आहे माझ्या माय माऊली, माझ्या मात्या पित्याला डोळेभरून बघणार आहे त्याचं ते सकुमार रूप डोळ्यात साठवणार आहे.

“सावळा तो श्रीहरी, सावळा तो विठ्ठल

रूप त्याचे मनोहर, पाहुनी होई मन समाधान “

सुंदर असे रूप पाहून देहभान हरपून जाते,,,

“पिवळा पितांबर, गळ्यात तुळशीमाळा

भाळी चंदनाचा टिळा, कटेवरी हात उभा वेटेवर”

असा तो पांडुरंग डोळ्यात साठवून मनाला शांती मिळते म्हणून माझ्या माहेरी मला जायचं भेटून यायचं आहे.

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन

क्षेम मी देईन पांडुरंगा

जे मी सत्कर्म केल जे पुण्य मी मिळवलं त्याचं फळ मला मिळेल किंवा मी ते घेऊन येईल मी पांडुरंगाची क्षमा मागेल,,,

रोजचे कर्म करत असताना चूक होतेच अशी काही चूक झाली तर पांडुरंगाची क्षमा मागून प्रायश्चित घेईल,,,

मी विठुराया चरणी नतमस्तक होईल,,,, विठुरायाला अलिंगन देऊन त्याच्या चरणी जागा दे ही विनवानी करेल त्याची दासी होऊन राहीन.

बापरखुमादेवी वरू विठ्ठलाच्या भेटी

आपुल्या संवसाठी करुनी ठेला

विठ्ठल रुख्मिणी आई वडील आहेत.

माता पित्याची भेट हे विठ्ठलाच दर्शन म्हणजे एक वरदान आहे…

आपल्या साठी तो विटेवर उभा आहे.

आपल्या रक्षणासाठी उभा आहे.

एक आषाढीची वारी निमित्य आहे आई बापाच्या भेटीचं संतांचा मेळा भरतो. संत संगत मिळते आणि आयुष्य बदलून जातं.

” दुमदूमली पंढरी, गजर कीर्तनाचा “

” मुखी नाम विठुरायाचे, सोहळा हरीनामाचा “

जय हरी माऊली 🙏🙏

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोखून धरलेली नजर… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

रोखून धरलेली नजर ☆ प्रा. भरत खैरकर 

हे कधी लक्षात आलाय कां काही लोक नेहमी तुमच्या मर्यादा, कमतरता, सीमा दाखवायला, तपासायलाच बसलेले असतात! ते कधीही तुमच्याशी धड बोलत नाहीत. सारखा अपमान करण्याच्या स्थितीमध्ये किंवा तुम्हांला कमीपणा दाखवण्याच्या नादात असतात. तुम्हांला तुच्छ लेखण्यासाठी ते सतत खूप उत्सुक असतात.

त्यांच्या अशा वागण्याला आपण हसून देतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अशाने ते थांबत नाहीत! अशावेळी काय करायचं? जे तुमचा सतत अनादर करतात. तुम्हांला हीन पद्धतीने वागवतात तर मग तुम्ही एक गोष्ट करा. अशा माणसाकडे एकदम डोळ्यात रोखून बघा! काही बोलूच नका!!

अशी माणसं तुम्हांला त्यांच्या नाटकामध्ये, तमाशामध्ये सामील करू इच्छितात. त्यासाठी तुमची प्रतिक्रिया, तुमचं घाबरलेपण, अळखळलेपणा, उत्तर देणं किंवा उलट उत्तर देणं त्यांना हवं असतं. जेणेकरून तुम्ही त्यात ओढले जाल. असं करून ते तुमचा आत्मविश्वास तोडू इच्छितात किंवा तुम्हांला हीन दाखवितात.

मात्र तुम्ही जेव्हा शांत राहून त्यांच्या नुसतं नजरेला नजर भिडवता तेव्हा मात्र त्यांचे सगळे पवित्रे फेल गेलेले असतात.. संपलेले असतात. आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या न मिळालेल्या प्रतिसादामुळे सगळा खेळच उलटफेर होतो. कारण समोरच्या व्यक्तीला हवी असलेली प्रतिक्रिया आपण न केल्याने त्याचा ‘ पोपट’ होतो. आणि तो व्यक्ती आतल्याआत तडफडायला लागतो. ज्यावेळी तुम्ही स्थिर आणि रोखून अशी एक नजर टाकता. तेव्हा तुम्ही कुठलाही शब्द न वापरता स्पष्टपणे सांगत असतात की ‘तुझ्या नाटकात मी सामील होणार नाही!’. किंवा ‘तुला हवा आहे तसं मी वागणारच नाही’.. त्यामुळे समोरच्याचा भ्रमनिराश होतो.

ही अशी एक पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही काहीही न करता समोरच्याला चितपट करू शकता. बऱ्याच वेळा स्थिर नजर आणि शांत राहणे ह्याच गोष्टी ‘कारीगर’ ठरतात.

हा उपाय रोजच्या आयुष्यात कसा उपयोगी पडतो हे बघायचे असेल तर हे ऐका.. मीटिंगमध्ये नेहमी एक व्यक्ती सारखी सारखी माझ्या मतावर प्रतिक्रिया द्यायची.. उलटसुलट रिएक्शन द्यायची. जसं काही त्याचं काहीतरी अडतयं किंवा त्याचा काहीतरी त्यात हेतू आहे.. स्वार्थ आहे.. त्याहीपेक्षा त्याला मला खालीच दाखवायचं होतं.. त्यासाठी तो चढ्या आवाजात बोलायचा.. आणि स्वतःलाच इतरांपेक्षा शहाणा समजायचा.. इतरांपेक्षा मलाच अक्कल आहे.. किंवा ‘मीच हे सर्व घडवून आणलं. ‘ हे दाखवण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.. त्यावेळी मी माझे म्हणणे अत्यंत नम्रपणे किंवा कोणालाही न दुखवता, इतरांचा आदर करत मांडायचो. तरीही त्याचा अट्टाहास काही जात नव्हता. ग्रामीण भाषेत ‘माझीच लाल’ असं बोलल्या जातं. तसा काहीसा तो व्यक्ती होता. त्यामुळे तो प्रत्येक वेळी मलाच नव्हे तर इतरांना सुद्धा मीटिंगमध्ये मधेमधे करून रोखून धरायचा.. व आपण किती हुशार आहोत हेच सांगायचा त्याचा रोख असायचा.. आता हे मात्र अती झालं होतं..

असेच एकदा मिटिंगमध्ये मी खुर्ची थोडीशी मागे केली.. रेलून बसलो.. आणि एकसारखा टक लावून त्याच्याकडे बघत गेलो.. मी शब्दही काढला नाही. माझे दोन्ही हात मी छातीशी बांधून घेतले आणि साधारण तीस-पस्तीस सेकंदापर्यंत त्या व्यक्तीला सारखा न्याहाळत राहिलो. नव्हे त्याला रोखूनच बघत राहिलो.. त्यामुळे हळूहळू मीटिंग मधील वातावरण एकदम ‘गरम’ झाले.. इतरही लोक मला फॉलो करू लागले.. तेही त्याच्याकडे टक लावून बघायला लागले.. कोणीच काही बोलत नव्हतं.. आणि आता सगळे त्याच्या रिॲक्शनची वाट बघत होते तो काय करतो किंवा काय करेल ही उत्सुकता सर्वांना लागली होती.

तो अचानक घाबरायला लागला.. त्याच्या आवाजाला कंप सुटला.. त्याचे शब्द अडखडायला लागले.. तो ततपप करायला लागला.. तो इकडे तिकडे बघायला लागला.. नजरेला नजर मिळवण्याची हिंमत करत नव्हता.. त्यानंतर झालेल्या कित्येक मीटिंगमध्ये त्याने मला मधे टोकलं नाही की रोखलं नाही. एवढंच नाही तर तिथून पुढे तो माझ्याशी इज्जतीत वागायला लागला.. आदर द्यायला लागला.. त्याला हे लक्षात आलं की मी तो व्यक्ती नाही ज्याला तो दाबू शकतो.. त्याच्या इशाऱ्यावर नाचवू शकतो.

बऱ्याच वेळा लोकांना हे दाखविण्यासाठी की तुम्ही नेमके कोण आहात हा पवित्र आजमावला पाहिजे!जेव्हा तुम्ही वरील पद्धत अवलंबता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असता की मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणारा व्यक्ती नाही. तुझ्या हातातली कठपुतली नाही. माझे धागेदोरे माझ्याच हातात आहे. ते तुला देऊन तुझ्या तमाशाचा मी भाग बनू इच्छित नाही. माझ्या भावभावनांशी खेळण्याचा तुला अधिकार मी देणारच नाही. आणि माझी मूल्ये काय आहे, हे तुझ्यासारख्या कडून सर्टिफाईड करून घेण्याची गरज नाही.

खूपदा आपला जेव्हा कोणी अपमान करतो किंवा बदनामी करतो तेव्हा आपण स्वतःला डिफेन्स करण्याचा पवित्रा आजमावतो.. आणि समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे वाव देत असतो.. आपण आपली सफाई.. आपली बाजू मांडत असतो.. जेणेकरून कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये किंवा भांडण होऊ नये. मात्र समोरचा त्या सगळ्या गोष्टींचं ‘पोतरं’ करतो.

अशावेळी तुम्ही रोखून धरलेली नजर ही काही आक्रमक कृती नाही. ती एक सौम्य पण रामबाण अशी कृती आहे! यामधून तुम्ही शांत आणि मजबुतीने उभे आहात खंबीर आहात हे समोरच्याला दिसतं.. तुमचे पाय जमिनीवर आहेत. तुम्ही उडो उडो करत नाही.. किंवा कुठलाही प्रकारचा दाखवेपणा तुम्हांला नको आहे. तुमचं काम आणि तुम्ही हे सांगण्याचा तुमचा रोख ह्यातून दिसतो. तुम्ही जिम्मेदार व्यक्ती आहात. हा सुद्धा संदेश या कृतीतून जातो.

जे लोक इतरांची बेईज्जत किंवा अपमान करत असतात त्यांना आजवर कोणीही रोखलेलं किंवा उलट बोललेलं नसतं. त्यामुळे हे लोक शेफारलेले असतात.

आपली उणीव झाकण्यासाठी असे लोक इतरांचा वापर करत असतात. त्यांना हे कोणी सांगितलं नसतं की तुमच्या अशा वागण्याने समोरच्याच व्यक्तिमत्व किंवा त्याचे सद्गुण दबून जातात.. पण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला शांत आणि रोखून धरलेल्या नजरेने बघता तेव्हा ती कृती एका आरशासारखे काम करते.. तो आरसा.. ती नजर.. त्या व्यक्तीला त्याचं प्रतिबिंब दाखवितं. तुम्ही त्याला काही सांगत नसता फक्त त्याला ‘दाखवत’ असता.

पण विश्वास ठेवा की अशा प्रकारचे लोक या पद्धतीने स्वतःला कधीही बघू इच्छित नाही किंवा त्यांनी तसं स्वतःला कधी बघितलेच नसते.. स्वतःचं असं भयानक रूप जेव्हा ते त्या आरशात बघतात.. तेव्हा ते खजील होतात.. त्यांना त्यांच्या कृतीबद्दल शरम वाटते.. लाज वाटते. त्यामुळे रोखून पाहण्याची ही त-हा.. पद्धत खूप उपयुक्त आणि परिपूर्ण आहे. चला तर मग बघूया रोखून आपला अपमान करणाऱ्याकडे! ज्यामुळे समोरचा व्यक्ती थोडा माघारी जाईल आणि आपण आतल्या आत मजबूत होवू !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती… मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (Retd) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? मनमंजुषेतून ?

महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती… मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (Retd) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

महाकुंभपर्वामध्ये गंगास्नान करण्यासाठी मी अजूनही गेलेलो नाही हे ऐकताच तो म्हणाला, “इतक्या मोठ्या स्तरावर हा महाकुंभमेळा आयोजित करणे म्हणजे पैशांचा आणि संसाधनांचा निव्वळ अपव्यय आहे, दुसरं काय?” तो स्वतः नास्तिक असल्याचे त्याने मला आधीच सांगितले होते.

मी हसतमुखानेच त्याला म्हणालो, “तुझ्या चष्म्यातून तुला सर्व धर्मांमधल्या केवळ वाईट गोष्टीच दिसत राहणार यात काही नवल नाही. पण एका सैनिकाच्या दृष्टिकोनातून मला तरी असे दिसते की, भारताने आपले शत्रू आणि मित्र या दोघांनाही या कुंभमेळ्याद्वारे एक अतिशय स्पष्ट इशारा दिलेला आहे.”

माझे बोलणे ऐकताच त्याने भुवया उंचावून म्हटले, “सैनिकी दृष्टिकोन? पण धर्म आणि सैन्यदलांचा काय संबंध?” 

“अगदी घनिष्ठ संबंध आहे. आता असं पाहा, कोट्यवधी लोक लांबलांबून येऊन प्रयागतीर्थी एकत्र जमले, इथे राहिले आणि सर्वांनी एका सामायिक श्रद्धेने गंगेमध्ये स्नान केले. यामधून किमान चार गोष्टी स्पष्ट होतात: –

  1. कोट्यवधी भारतीयांना अशा प्रकारे एकसंध समूहात एकवटता येणे शक्य आहे.
  2. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी लागणारी योजनक्षमता आपल्यामध्ये आहे.
  3. एखाद्या सांघिक ध्येयावर जर अढळ विश्वास असेल, तर ते उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी, वैयक्तिक स्तरावर अपार कष्ट आणि गैरसोय सहन करण्याचा सोशिकपणा भारतीयांमध्ये आहे.
  4. आपल्या देशाचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कणखर आहे.

अरे, अवकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांनाही दिसू शकेल इतका भव्य सोहळा आपल्या देशात आयोजित होतोय ही गोष्ट तुला अभिमानास्पद वाटत नाहीये का? मी तुला सांगतो, आपले शत्रूदेखील या सोहळ्याकडे आज अचंबित होऊनच, पण अतिशय सावधपणे पाहत असतील!”

त्याने नुसतेच खांदे उडवले आणि म्हणाला, “असेलही. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. सैनिकी दृष्टीकोनाचा इथे काय संबंध?” 

जरासा पुढे झुकत मी म्हणालो, “कल्पना करून बघ, एखाद्या युद्धाच्या प्रसंगी अशा तऱ्हेने संपूर्ण जनसमूह एकवटून जर देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिला तर युद्धावर किती जबरदस्त प्रभाव पडेल? पाकव्याप्त काश्मीर किंवा तिबेटला शत्रूच्या जोखडातून मुक्त करायचे ठरवून जर असा जनसमूह उद्या एकवटला तर? देशावर ओढवलेल्या एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी जर जनता अशा तऱ्हेने एकत्र आली आणि त्यांनी यथाशक्ती दान केले तर केवढी प्रचंड संपत्ती उपलब्ध होऊ शकेल माहितीये? हे बघ, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यातून एक गोष्ट ठळकपणे सिद्ध होते – भारताची युद्धक्षमता केवळ सैन्यदलांचे शौर्य आणि त्यांच्या शस्त्रसामर्थ्यावर अवलंबून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनतेच्या इच्छाशक्तीमध्ये आहे. जगातला कोणीही युद्धनीतिज्ञ माझे हे म्हणणे मान्य करेल.”

आता त्याच्या चेहऱ्यावर काहीसे कडवट आणि कठोर भाव दिसू लागले, “या मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागलेत, आणि तू इथे बसून खुशाल राष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाच्या पोकळ गप्पा मारतोयस? तुझं हे बोलणं तुला विचित्र नाही का वाटत?”

एक सुस्कारा सोडत मी उत्तरलो, “अरे, जरासा व्यापक विचार करून पाहा. ती दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी तर झालीच नाही – उलट वाढलीच. शिवाय, प्रशासनानेही तेथील व्यवस्था अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला. आपली जनता आणि प्रशासन या दोघांचाही निर्धारच यातून ठळकपणे दिसतो. चीनमध्ये जर अशी चेंगराचेंगरीची घटना घडली असती तर काय झालं असतं माहितीये? एकतर त्यांनी हा सोहळाच तातडीने गुंडाळून टाकला असता, किंवा मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी राक्षसी ताकद वापरली असती – जे त्यांनी कोव्हिडकाळात केलंच होतं. त्यांच्या सैनिकांच्या गोळ्यांनी त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडतानाचे व्हिडिओ नाही का पाहिलेस तू?”

आता मात्र तो उपहासाने हसत म्हणाला, “मग काय? इतकं सगळं झालं तरी आपण आपला आनंदसोहळा साजरा करत राहायचं, असं तुझं म्हणणं आहे का?”

“सोहळा तर साजरा करायचाच. पण ही वेळ अंतर्मुख होऊन गंभीर विचार करण्याचीदेखील आहे.” 

“कसला गंभीर विचार?” तो जरा चिडखोरपणेच बोलला.

मी पुन्हा पुढे झुकत म्हणालो, “अरे, आईचं दूध प्यायलेला कोणीही शत्रू अशा वेळी आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील, आणि आपण जर गाफील राहिलो तर तो यशस्वी होईलही. “

माझी परीक्षा पाहत असल्याच्या अविर्भावात तो म्हणाला, “शत्रू आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील? ते कसं काय बुवा?”

त्याचा उपहास मला कळत होता, पण माझा प्रयत्न मी सोडला नाही. “हे बघ, कुंभमेळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे लोकांची आस्था, आणि दुसरं, आपलं कार्यक्षम नेतृत्व. आपला शत्रू एकतर लोकांची आस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न करील, किंवा आपल्या डोक्यावर कमकुवत नेते बसवण्याचा प्रयत्न करेल. भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेल्याबद्दल तू वाचलं नाहीस का?”

तो कुत्सितपणे उद्गारला, “ओहहो! आता मला माझ्यासमोर बसलेला ‘अंधभक्त’ स्पष्ट दिसायला लागला !”

मी नुसतीच मान हलवली. कारण, मुद्देसूद चर्चा सोडून आता तो वैयक्तिक टीका करू लागला होता. स्वतःमधल्या नकारात्मकतेमुळे आंधळा झालेला असूनही, तो मलाच विनाकारण ‘अंधभक्त’ ठरवू पाहत होता. मी मनातून पुरता चडफडलो होतो. पण शक्य तितक्या शांत स्वरात मी म्हणालो, “माझं दुर्दैव इतकंच की अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन असलेला, माझ्यातला एक सच्चा देशभक्त तुला दिसत तरी नाहीये, किंवा तू पाहूच इच्छित नाहीस. असो. “

याउप्पर त्याच्याशी कोणतीच सयुक्तिक चर्चा शक्य नसल्याने, मी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर होते.

‘गुरुवाणी’ मधला एक श्लोक जाता-जाता सहजच माझ्या मनात उमटला, “हम नाहीं चंगे, बुरा नाहीं कोये, प्रणवथ नानक, तारे सोये।” म्हणजेच, “मी चांगला आहे असे नाही, इतर लोक वाईट आहेत असेही नाही, नानक प्रार्थना करतो, तोच (देव) आमचा तारणहार आहे!”

मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (सेवानिवृत्त)

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’… माहिती संग्राहक : संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’… माहिती संग्राहक : संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’…  सुश्री अचला जोशी… जन्म. १९ मार्च १९३८

अचला जोशी या वाइन बनविणाऱ्या राज्यातील या पहिल्या महिला उद्योजिका असल्या तरी आजही त्याच उमेद, प्रामाणिक व पारदर्शकपणे मद्याच्या या दुनियेत ‘वाइनलेडी’ म्हणून काम करत आहेत. वाइन म्हणजे दारू नव्हे आणि ही वाइन महिलांनीच प्यायची असे काही नाही, तसेच ती कोणीही सहजरीत्या घरीही बनवू शकतं. वाइनबाबतीत अशी ठळक वाइनशास्त्र सांगणारी आणि वाइन बनविण्याचा हा व्यवसाय ऋतुमानावर अवलंबून असल्याने त्याला जोडधंदा म्हणून आवळ्याचे ‘च्यवनप्राश’ आणि ‘तळोजा क्वील्ट’ या नावाने सुरू केलेल्या व्यवसायाला लंडनच्या बाजारात पोहोचवणाऱ्या श्रीमती अचला फडके-जोशी यांनी पनवेलमधील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे.

अचला जोशी या माहेरच्या अचला फडके. दादर हिंदू कॉलनीतील कॉलनी नर्सिंग होमचे डॉ. जी. एम. फडके हे त्यांचे पिता, तर मूत्रपिंड-तज्ज्ञे डॉ. अजित फडके हे त्यांचे सख्खे भाऊ होत.

त्या वेळच्या मुंबईतील माटुंग्यासारख्या ठिकाणी डॉक्टर फडकेंचे ते प्रशस्त घर म्हणजे साहित्य संघातील दिग्गजांचा हे मुक्त वावराचे ठिकाण. साहित्य व सांस्कृतिक वातावरण अचला यांची जडणघडण झाली असली तरी स्वत:ची हौस पुर्ण करत करत त्यांनी बीए व एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबत शिवणकाम व साहित्यप्रेम हेसुद्धा कायम ठेवले. शिक्षणानंतर काही वर्षांनी १९६० साली टाटा कंपनीमधील एका अभियंत्यांसोबत सुधाकर जोशी यांच्यासोबत विवाह झाला. नवरा आणि कळायला लागलेली दोन मुले जसजशी मोठी झाली त्याच वेळी संसाराच्या पटलावरील गृहिणीचे पात्र सोडून शिक्षणाचा अजूनही काही लाभ घ्यावा अशीही सल मनात कुरकुर करू लागल्याने एका वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून त्यांनी इंडियन काऊंसिलच्या प्रदर्शनात भारताच्या शिष्टमंडळात समन्वयकाची जबाबदारी मिळवली. याच जबाबदारीतील पहिला सोहळा पार पडताना स्वत:च्या कार्यपद्धतीवर अमेरिकन अधिकाऱ्यांचे मन कामातून जिंकणाऱ्या या शिष्टमंडळाला थेट एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीचे निमंत्रण मिळाले. याच पार्टीतील रेडवाइनच्या पहिल्या घोटातील चवीने तिने मायदेशी हीच वाइन बनविण्याची जिद्द उराशी बाळगली आणि अमेरिका वारीहून भारतात परतताना अचला यांनी वाइनइस्ट सोबत घेऊन भारतामध्ये प्रवेश केला. प्रवासादरम्यान वाइन कशी बनवितात, त्याचे फायदे-तोटे याविषयी पुस्तकी ज्ञान घेतल्यानंतर मुंबईतील एका रविवारच्या दुपारी अचला या माहेरी गेल्या असताना डॉक्टर भावाला आलेल्या भेट वस्तू मधील पाच किलो द्राक्षाच्या पेटीवर अचला यांची नजर गेली. द्राक्षपेटीतून पहिले द्राक्ष जिभेवर विरघळल्यानंतर अचला यांना अमेरिकेतील त्या रेडवाइनशी जुळत्या चवीचा अंदाज आला. माहेरवाशीण आई घरची ही द्राक्षपेटी स्वत:च्या घरात त्या घेऊन गेल्यावर त्यांच्या पतीने तेवढय़ाच तडफेने द्राक्षाची वाइन बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. लगेचच मोहम्मद अली रोडवरून सात लिटर काचेचा कार्गो, एअर लॉक अशा सामग्रीची खरेदी करण्यात आली. घरातील या आईच्या वाइन बनविण्याच्या पहिल्यावहिल्या प्रयोगात लहानग्यांनी पाच किलो द्राक्ष धुण्यापासून इतर कामांची मदत केली. बघता बघता जोशींच्या घरातील एका बाजूला द्राक्ष धुऊन त्यामध्ये इस्ट टाकून ते बनविण्याची प्रक्रिया पार पडली. तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच १९७० सालच्या सप्टेंबर महिन्यातील सुटीच्या दिवशी अचला यांचा भाऊ व पती सुधाकर यांच्या उपस्थितीमध्ये वाइन झाली का याची उत्सुकता म्हणून हा कार्गो उघडून पाहण्यात आला. ५ किलो द्राक्षाची त्या वेळी सुमारे ४ ते साडेचार लिटर वाइन जोशींच्या घरातील एका कोपऱ्यातील कार्गोमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. चव घेण्यासाठी त्या वेळी अचला यांचा भाऊ यांनी पुढाकार घेतला. पहिल्यावहिल्या घरातील वाइनचा हा प्रयोग अगदी छान पद्धतीने यशस्वी पार पडल्याचे पहिले रिमार्क अचलाबाईंना त्यांच्या घरातून मिळाले. त्यानंतर अचलाबाईंचा हा प्रवास सुरूच राहिला. लिकर बनविणारे पाच हजार लिटर क्षमतेपेक्षा मोठे कारखाने मुंबईबाहेर ठेवण्याच्या नियमातून अचलाबाईंच्या प्रवासाची वाट तळोजा औद्योगिक क्षेत्राकडे १९७९ साली वळली. आजही अचलाबाई इन व्हॉगेस क्रिएशन या कंपनीच्या माध्यमातून प्रिन्सेस ही रेड, व्हाइट, पोर्ट व हनी वाइन बनवितात. सुमारे दीड लाख लिटर वाइनची उत्पादन काढताना एका बॅचमध्ये साचून ठेवलेले द्राक्षाचे अर्क गाळून वाइन तयार केली जाते.

घराच्या एका कोपऱ्यात स्वत:च्या कुटुंबासाठी बनविलेल्या वाइनला आज देशभरात मोठी मागणी होत आहे. १९७३ ते २०१६ या काळात आंध्र प्रदेश, केरळ सहित सैनिक कॅन्टिनमध्ये अचला जोशींची प्रिन्सेस रेडपोर्ट वाइन ठेवली जाते.

ऋतुवारीवर विसंबणाऱ्या वाइनच्या या व्यवसायामुळे कामगारांवर गदा न येण्यासाठी त्यांनी तळोजा क्वील्ट या नावाने मिलमधून विकत आणलेल्या संपूर्ण कॉटनच्या कपडय़ाच्या साह्य़ाने आणि विविध रंगसंगतीचा आधार घेऊन ऊबदार गोधडय़ा शिवल्या जातात. अमेरिकेसह लंडनमध्ये मोठय़ा कंपन्या गोधडय़ांचे प्रदर्शन मांडतात.

१९८३ साली अचला जोशी यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजकतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अचला जोशी या ‘द फर्स्ट वाईन लेडी’ सोबतच लेखिका असून An Amazing Grace, आश्रम नावाचे घर, हरी नारायण आपटे (चरित्र), ज्ञानतपस्वी रुद्र (न. र. फाटक यांचे चरित्र), चंद्रमे जे अलांछन : अचला जोशी यांचे बंधू डॉ. अजित फडके यांचे चरित्र अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

नोव्हेंबर २०१३ मध्ये सावंतवाडी येथे झालेल्या कोमसापच्या ४ थ्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अचला जोशी होत्या..

अचला जोशी या मुंबईच्या माटुंग्यामधील श्रद्धानंद आश्रमाच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. या महिलाश्रमाशी त्या चार दशकांहून अधिक काळ जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी या आश्रमातील महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी रजया, मसाले बनवून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ शोधली. तसेच त्या दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी आहेत.

माहिती संकलन : श्री संजीव वेलणकर

(संदर्भ : इंटरनेट/ श्री संतोष सावंत.) 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares