मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दिसलीस तू फुलले ऋतू.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “दिसलीस तू फुलले ऋतू…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

भावना त्यालाच कळतात ज्याला त्याची जाणीव असते.

तारुण्याच्या त्या टप्प्यावर तुझं माझ्या आयुष्यात येणं.. हा खरोखरच नियतीचा योगायोग होता… पहिल्या नजर भेटीतच कलिजा खलास झाला होता… कळले नाही कधी मी नजरकैदेत बंदिस्त कसा झालो… हरवले भान स्व:ताचे…. जगणेच विसरून गेलो… बस्स तोच एक क्षण आला नसता आयुष्यात तेव्हा! .. असे त्या भेटीनंतर कैकदा वाटून गेले… मिळणार नाही साथ तिची हेही तेव्हाच कळून चुकले.. सौंदर्यवतीचे चाहते लाखो असले, तरी भाग्यवान तो एकच असतो… पण पण जुनी ओळख ती कुठे तरी हृदयाच्या कप्यात दडून राहीली होती तिच्याही नि माझ्याही.. पुन्हा कधीच न उचंबळून न येणारी… ताटातूट ठरलेली घडलीच काही क्षणातच… अन दोन वळून वळून बघणारे चेहरे काही अनामिक भावनांचे कंगोरे घेऊन समोरून निघून गेले.. दोन ओंडक्यांची पुन्हा कधीच घडणार नसते गाठभेट हे ही तितकेच सत्य असते… अबोल नि असफल प्रीतीच्या वेलीचे सलणारे काटे… मनाला घायाळ करतात.. समजूत घालता घालता मनं थकून जातं.. काळाचं औषध विरहाचं दु:ख विसरायला लावतो… आणि दुसऱ्या प्रेमाच्या तडजोडीने मनाची तगमग दूर करायची मदत घेतो… आता सारं काही आलबेल नि आनंदाच्या लहरीवर जीवनाचे तरंग तुषार उधळण करत जात असतं… आणि आणि एक दिवस नियतीला पुन्हा खोडसाळपणा करण्याची हुक्की येते…

ध्यानीमनी नसताना एक दिवस सकाळी मार्निंग वाॅकला बागेत असताना तिचे माझ्या सामोरी येणे… अगदी तसेच पहिल्या त्या भेटीसारखे… नजरेला नजर मिळताना… ओळख आहे का? असा निशब्द प्रश्न त्यातून विचारला जाताना.. डोळेच ते एकमेकांना भिडल्या भिडल्या अनेक गोष्टी नजरेने नजरेला नजर करूनही गेले… शब्दांची वाट न पाहता… काही क्षणातच आम्ही दोघं एकमेकांच्या समोरूनच गेलो… आणि गुंतलेले हट्टी मन ओढून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहताना मात्र मनाची चलबिचल वाढवत गेले… ती जुनी ओळख कुठे तरी हृदयाच्या कप्यात दडून बसलेली, तिच्याही नि माझ्याही.. पुन्हा एकदा उचंबळून येते… तेही क्षणैक ठरते… आता देहाचं तारूण्य ओसरून कधीच गेलेलं असतं, वार्धक्याची रूपेरी देहावर पसरलेली असते… तरीही अजूनही मनात कोवळे तृणांकूर उमलू पाहतात… आम्ही एकमेकांना पाहिलेलं असतं तेव्हा… भावभावनांची खळबळ उरात उठते.. अजूनही आपण तुला विसरलेलो नाही हेच नजरेतून सांगणे असते… काही गोष्टींमुळे आपण एकत्र जरी आलो नाही, आणि कितीही दूर दूर अंतरावर आपण असलो तरीही मनातल्या प्रेमरज्जूने आपण एकमेकांशी कायमचे बांधले गेलो आहोत… हे ही नसे थोडके… होय ना! …

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

?विविधा ?

☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

वट पौर्णिमा हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे.

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राज्याची कन्या सावित्री हिचा शाल्व राजा धृमत्सेन ह्याचा पुत्र सत्यवान ह्याच्या शी विवाह झाला. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसा होते तेव्हा सावित्रीने उपवास करून व्रत केले. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत करतात.

भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.

पूर्वी बायकांना घराबाहेर जायची परवानगी न्हवती. सणावारांच्या मुळे त्यांना घराबाहेर जाऊन पूजाअर्चा करून चांगले वस्त्र परिधान करून सख्यांना भेटायची संधी मिळावी हा हेतू साधून हे व्रत केले जायचे.

तीस वर्षा पूर्वी मला माझ्या मैत्रिणी बरोबर हे व्रत करायला जायची संधी मिळाली. गणपतीच्या मंदिरात वटवृक्ष असल्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजे साठी बायकांची तिथे खूप गर्दी झाली होती.

मंदिराबाहेर पाच फळे व फुले विकायला विक्रेते बसले होते. खरे तर ती फळे खूप कोवळी होती व खाण्या लायक ही न्हवती तरीही ती सुवासिनींची ओटी भरण्यासाठी विकत घेतली जात होती.

पूजेसाठी रांगा लावून सगळ्या बायका थांबल्या होत्या. मधल्या वेळात काही बायका आपल्या नवऱ्या व सासूबद्दल कुरबुरी व तक्रारी सांगत होत्या. सासरी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ही सांगत होत्या. तिथे आलेल्या काहीजणी आपल्या संसारात तितक्याशा सुखी न्हवत्या व एक रीती रिवाज म्हणून व्रत करत होत्या. भरजरी साड्या, दागिने व गर्दी ह्या मुळे कधी एकदा पूजा संपते असेच बहुतेक जणींना झाले होते. नंतर नंतर गर्दी एवढी वाढली की वडा भोवती प्रदक्षिणा घालतांना एकमेकींचे धागे वडा भोवती गुंडाळून कशीबशी पूजा पूर्ण केली गेली. त्यात काही जणी मनापासून तर काही एक रीत म्हणून किंवा लोकांना काय वाटेल पूजा केली नाहीतर म्हणून तिथे पुजेसाठी आल्या होत्या.

खरतर नवऱ्या बायकोच्या नात्यात संवाद, विश्वास, आणि समजूतदारपणा महत्त्वाचे आहे. नवरा बायकोचे नाते हे प्रेमाने, आपुलकीने, आणि एकमेकांचा आदर करून टिकून राहावे व अडीअडचणीच्या वेळी त्यांनी एकमेकांना साथ द्यावी हे महत्वाचे आहे. नवऱ्यासाठी व्रत करणे उपवास करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

नंतरनंतर ह्या पूजेला बदलते स्वरूप आले. बाजारात वडाच्या फांद्या विकत मिळू लागल्या व सुवासिनी ह्या फांद्या विकत घेऊन त्याची पूजा करू लागल्या. काहीकाही जणी घरात फांदी विकत आणून दहा पंधरा जणी एकत्र जमून पुजा करून फराळ करू लागल्या. काही बायका आपल्या सोयीप्रमाणे कामाच्या ठिकाणी वडाचे झाड शोधून हे व्रत पुर्ण करू लागल्या.

काही घरात ज्यांची मुलगी परदेशात आहे ते आभासी पद्धतीने म्हणजे व्हिडिओ कॉल करून पूजा करून हे व्रत करायच्या.

आता तर ह्या पूजेला एक इव्हेंट म्हणून पाहायला लागले आहेत. सोसायटी मध्ये सुवासिनी एकत्र जमून ही पूजा करतात. सेल्फी, फोटोचा कार्यक्रम व कुठे तरी बाहेर हॉटेल मधे उपवासाचे खाणे हे सगळे आठवड्या पूर्वीच नियोजन करून हे व्रत केले जाते.

ह्या कार्यक्रमात ड्रेस कोड, एका प्रकाराच्या साड्या परिधान करणे एकत्र जमुन गुजगोष्टी करणे हे हि तितकेच महत्वाचे असते.

एकूण काय पूर्वीचे व्रत असो किंवा आत्ताचे सेलिब्रेशन असो ह्यात सुवासिनींनी एकत्र येणे आपले सुखदुःख एक मेकांना सांगणे, आपले मन मोकळे करणे एकमेकींना कठिण प्रसंगी आधार देणे, वेळ प्रसंगी एकमेकींना मदत करणे एवढे साध्य झाले तरी वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली असे म्हणता येईल.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

🔅 विविधा 🔅

देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर  ☆

देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली,  स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’

परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही  अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो.  पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.

आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!

तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच  समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये  लोकप्रिय होण्यामागचे.

प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.

त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या  कथेत खूप बदल केले होते.

मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर,  कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.

कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.

प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!

केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-     

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”

विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला  आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.

त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले  मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!

घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.

जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात- 

‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’

निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे  नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे  आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.

त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे,  सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे. 

(हा लेख दै. प्रहारमध्ये छापून आलेला आहे. कॉपीराईट कायदा लागू. आवडल्यास लेखकाच्या नावासहच शेयर करावा.)

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

मो. 7208633003

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com 

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिंतन… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ चिंतन… ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे मी पहिल्यांदा 1960 मध्ये टीव्ही मध्ये दिसले….

वरील विधान वाचून तुम्हाला नक्की वाटेल की पतकी बाई धादांत खोटं बोलत आहेत 1960 साली सोलापुरात टीव्हीचे प्रसारण नव्हतं महाराष्ट्रात कुठेही नव्हतं मग मी 60 साली टीव्हीवर आली कशी ही बाई… त्याचीच गोष्ट ऐकूयात म्हणजे वाचूया

साधारणपणे जानेवारी महिन्याच दिवस असावे. सकाळी थंडी असायची पण दुपारी रणरण ऊन. शाळेला हुरडयाची सुट्टी होती. त्या काळात सिद्धेश्वर जत्रेला धरून ती सुट्टी असायची… सिद्धेश्वर तळं पूर्णपणे आटलेलं होतं म्हणजे तिथे संपूर्ण तळ्याला भेगा भेगा पडलेल्या मला अजूनही आठवतात आणि मंदिरातून मार्केटमध्ये.. लक्ष्मी मार्केटमध्ये येण्यासाठी माणूस सहज चालत त्या मातीवरून येतो.. शेतात चालावं असं वाटत होतं. चिखल वगैरे काय असेल पूर्वी तो वाळून वाळून गेलेला, पूर्ण भेगा पडलेल्या आणि माणूस आरामात त्याच्यावरून चालत येत होता. आणि मला ते स्पष्टपणे आठवते!

मी माझ्या आजीबरोबर सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. माझं वय तेव्हा 10 ते 11 या दरम्यानच होतं आणि आजी आम्हाला देवळामध्ये, मार्केटमध्ये, भजनाला, कीर्तनाला, रथ बघायला, चित्रपट बघायला घेऊन जायची. तिला सिनेमाची खूप आवड होती त्यामुळे ती चित्रपट बघायला आम्हाला घेऊन जायची. तिला चौफेर ज्ञान होतं.

19 व्या शतकाच्या शेवटाची बाई म्हणजे 1899 /98 चा जन्म असेल. शिक्षण अजिबात नाही पण हुशार इतकी अफाट.. बघून बघून वाचायला शिकली आणि खूप पुस्तकं वाचत होती. गोष्टी सांगायचा तिला छंद होता आणि सांगण्याची शैली पण होती. आता आजीबद्दल जास्त सांगत नाही, प्रसंगाबद्दल आपण बोलूयात. तर ती मला सिद्धेश्वरच्या मंदिरात घेऊन गेली.. दर्शन वगैरे झालं. आजी बरोबर जायचं त्यावेळेला कारण असं होतं की तिथून आम्ही लक्ष्मी मार्केटला जाणार होतो आणि त्या बाजूला गड्ड्याची दुकानं इथपर्यंत लागलेली होती, तिथं आपल्याला आजी काहीतरी घेऊन देईल या विचाराने मी तिच्याबरोबर गेले होते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन तळ्यातून वाट काढीत आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या समोर ओबडधोबड पायऱ्या होत्या.. त्याच्यावरून वर आलो होतो आणि थेट लक्ष्मी मार्केट. लक्ष्मी मार्केटच्या दोन्ही बाजूला आज जे लोक बसतात तिथेच लोक बसायचे, तिथेच काहीतरी थोडेसे पाली वगैरे टाकलेले होत्या आणि त्याच भागांमध्ये काही चार दुकान भरलेली होती किंवा लागत होती. आजी म्हणाली ‘ रस पिऊ यात का’ ‘ बारा वाजले आहेत उन्हात रस पिऊ नये ‘ इती मी..

तिथेच बाजूला एक स्टॉल होता. एक पांढरं कापड.. त्या समोर खुर्ची टाकून एक माणूस बसलेला आणि तो ओरडत होता ‘ अपने खुद को टीव्ही पे देखो.. अपने को टीव्ही पे देखो ‘.. तर आजीला ते जरा कुतूहल वाटलं. काहीतरी नवीन होतं तर आजी म्हणाली ‘काय आहे? ‘ तर तो माणूस म्हणाला तुम्हाला टीव्ही वरती पाहता येईल. म्हणून ‘आम्ही आम्हाला दोघींना पाहता येईल का? ‘ ‘तुम्हाला नाही, अकेला जायेगा और उसको दुसरा देखेगा ‘. ‘ पैसा कितना लगेगा? ‘ तो म्हणाला ‘ चाराने.. कितना टाइम देखेगा ‘ तो. ‘ मला दोन मिनिट ‘.. आजी मला म्हणाली ” तू त्या टीव्हीच्या खोक्याच्या मागच्या बाजूला जा, मशीन समोर उभे रहा, मी तुला टीव्हीवर पाहीन “. मी म्हणलं ” काहीतरी काय मला तर मी दिसणार नाही तुला दिसून काय फायदा आहे? ” तिचं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली ” हे टीव्ही आपल्याकडे येईल पण तू मोठे झाल्यावर… तू हुशार आहेस त्यामुळे टीव्हीवर कुठेतरी दिसशील आहे त्यावेळेला मी कुठे असणार आहे? तेव्हा मी तुला आता डोळे भरून टीव्हीवर पाहते ” या इमोशनल ड्रामावर मला काहीच बोलता आलं नाही आणि मी खूप लहान होते. दहा अकरा वर्षाच्या मुलीला काय कळतंय? फक्त एवढं कळत होतं की चार आणे रक्कम खूप मोठी आहे, त्यात आपल्या घरची सगळ्यांची एक वेळची भाजी येते. पण तिचे हिशोब वेगळे होते तिने त्याला चार आणे दिले. मी तो पडदा टाकला होता त्याच्या मागच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि समोर एक टीव्हीसारखं खोकं होतं तिथे आजी खुर्चीवर बसली आणि ती मला बघत होती. मग त्या माणसाने मला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला सांगितल्या.. आपण फोटो काढताना घेत होतो तशा.. नाच म्हणाला, उड्या मार म्हणाला. मी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आजीने मला डोळे भरून बघितलं आणि चार आणे त्याला दिले. मग रस कॅन्सल केला, भाजी घेतली आणि आम्ही घरी आलो आणि आजीनं सगळ्यांना सांगितलं की तिने मला टीव्हीवर बघितलं.. टीव्हीवर बघितलं. तर सगळी कथा दिवसभर वाड्यामध्ये सांगत होतो आम्ही… सर्वात महत्त्वाचं काय तर तिने आल्यावर माझी दृष्ट काढली. तिला माझ्याबद्दल फार प्रेम होत… मी खूप धीट, हुशार, भाषण करणारी, स्टेजवर उभी राहणारी.. वडिलांबरोबर काम करत होते ना…! अगदी गणपती उत्सवात आमचे दहा दिवस कार्यक्रम असायचे.. तर ती आमच्या दारापाशी झोपलेली असायची आणि आम्ही आलो आहोत की पहिल्यांदा माझी दृष्ट काढून ती तिच्या घरात जाऊन झोपायची. मामा आणि आम्ही सगळे शेजारीच राहत होतो अशा तऱ्हेने माझ्या टीव्हीवरचा पहिला शो त्याचा एकमेव प्रेक्षक माझी आजी होती आणि त्याची किंमत मला चार आणे द्यावी लागली.

नंतर आपल्याकडे वृत्तदर्शन सुरू झालं. अनेकांच्या मुलाखती सुरू झाल्या. स्थानिक चॅनेलवरती येण्याचा योग अनेकदा आला. मला आठवते एक मुलाखत सुनेत्रा पंडित यांनी घेतली होती. एकदा एक मुलाखत रामतीर्थकर मॅडमनी घेतली होती. एकदा माझ्या शाळेमध्ये म्हणजे तडवळकर ट्रस्टच्या नापास शाळेमध्ये माझी मुलाखत माझ्या एका विद्यार्थिनीने घेतली होती. असं अनेकदा मग टीव्ही वरती स्थानिक प्रक्षेपणात दिसायचं… पण चार आणे खर्च करून मी टीव्हीवर दिसण्याचा किंवा मला टीव्हीवर बघण्याचं सुख माझ्या आजीने त्यावेळेला गड्ड्याच्या जत्रेत घेतलं होतं आणि तिचं ते वाक्य नेहमी मला आठवतं.. ” अग तू मोठी झाल्यानंतर खूप ठिकाणी टीव्ही असतील, कदाचित तू त्यात दिसशील, पण मी त्यावेळेला असणार नाही ना? ” म्हणून परिस्थिती नसताना त्या माऊलीने माझ्यासाठी चार आणे खर्च केले. ती चरख्यावर सूत काढून ते पैसे कमवत असे आणि एक पूर्ण सुताचा बिंडा तयार झाला की त्याचे दोन आणे मिळत. खादी भंडारमध्ये आम्हीच नेऊन घालत असू.. इतक्या कष्टाने मिळवलेले चार आणे तिने माझ्यासाठी खर्च केले.

आज लाखो रुपये खर्च होतात.. कोणी करतो.. मी कोणावर तरी करते. पण हे प्रेमच वेगळं होतं आणि त्याच्या मागचा विचारही खूप मोठा. माणसं गरीब होती, पैसा नव्हता, पण माया पोटात खूप होती. आज अगदी सहजच आठवण झाली आजीची आणि त्या निमित्ताने मला तो अगदी विस्मृतीत गेलेला प्रसंग आठवला. अशी प्रेमळ आजी मला मिळाली. परमेश्वरा तू ते भाग्य आम्हाला दिलंस.. खूप प्रेम करणारी माणसं म्हणजे आपण खूप श्रीमंत हे लक्षात ठेवा….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग- ३० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

धन्य ते गुरु शिष्याचे नाते..

जोगेश्वरी ते भावे स्कूल माझा आणि ति. नानांचा प्रवास खूप आनंदात चालला होता. माझे वडील भावेस्कूलला खूप मानत होते तन, मन, श्रद्धेनी त्यांनी विद्यादान केलं.

माझे परमपूज्य वडिल ति. स्व. दत्तोपंतस. माजगांवकर हे सुप्रसिद्ध इतिहासकार शिवशाहीर, पद्मभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे मुलांच्या भावेस्कूलमधले आदरणीय शिक्षक होते. पुण्यभूषण मासिकांत त्यांनी आवर्जून आपल्या सरांचा म्हणजे माझ्या वडिलांचा मानाने उल्लेख केला आहे.

बाबासाहेबांसारखा थोर माणूस आपल्या गुरुंना इतक्या वर्षांनंतर मानवंदना देतो. केवढी ही गुरुनिष्ठा आणि गुरुंवरील श्रद्धा. सारं जग, श्री. बाबासाहेबांपूढे मान देऊन झुकत. जगाची मानवंदना घेणारे हे शिवशाहिर. श्री. माजगावकर सरांचं नुसत नांव ऐकल तरी नम्रतेने त्यांना मानवंदना देतात. प्रत्येक मुलाखतीत आवर्जून सरांचा उल्लेख करायचे. ते म्हणाले, “शिवरायांनी इतिहास घडवला तर माजगावकर सरांनी माझ्या मनात इतिहास जागवला” केवढी ही शालीनता. आज माझे वडील असते तर ते कृतकृत्य झाले असते. बाबासाहेबांनी पण, कुठल्याही कार्यक्रमाला निघतांना पहिला मानाचा मुजरा सर्वप्रथम आपल्या सरांनाच केला असता

शिवाजी राजांची अढळ श्रद्धा आपल्या गुरुंवर श्रीसमर्थ रामदास स्वामींवर होती. तितकीच श्रध्दा या शिष्याची आपल्या गुरुंवर होती. जगापुढे शिवरायांचा आदर्श मांडणारे इतिहासकार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे आपले श्रेय माननीय सरांनाच देतात. त्यांच्या नम्रतेची, श्रध्देची, गुरुभक्तीची प्रचिती आम्हाला एका प्रसंगानें प्रत्ययास आली.

त्याच असं झालं. शरद जोशी हे बाबासाहेबांचे शालेय मित्र होते. आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे, माझ्या बहिणीची कमलची, जवळची बालमैत्रिण. शरद जोशींची एकसष्टी होती. आणि त्या कार्यक्रमाला बाबासाहेब आले होते. बाबासाहेबांनी आपल्या कर्तबगारीनें, सुस्वभावाने लोकांची मने जिंकून किर्तीचं शिखर गांठलं होत. आणि जनसागरांत मानाच पान पटकावल होत. त्यांना इतका मान होता की, त्यांचा प्रवेश झाला. आणि श्री. बाबासाहेब आले, असं नुसतं म्हणाल्यावरही लोकं जागेवरून उठून उभे राहयचे. तर सुप्रसिद्ध इतिहासकार असे हे माननीय, श्री शरद जोशींच्या ६१ ला आले. त्यांच्या उत्साही चपळ कणखर व्यक्तिमत्वानें, आगमनाने त्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली. माझी बहिण पण या कार्यक्रमाला हजर होती. सौ. जोशींनी माझ्या बहिणीशी ओळख करून देतांना बाबासाहेबांना सांगितले,

” बरं का बाबासाहेब, ही कमल, माझी बाल मैत्रिण. म्हणजे तुमच्या श्री. माजगांवकर सरांची मुलगी आहे”. हे ऐकताक्षणी, बाबासाहेबांनी काय करावं! ते ताड्कन उठले. आणि कमलच्या समोर आले. तिच्यासमोर उभे राहून त्यांनी तिला मुजरा केला. माझी बहिण गोंधळून गेली. कार्यक्रमाला आलेले सगळेच पाहूणे आश्चर्य चकित होऊन बघायलाच लागले. अवघडलेल्या माझ्या बहिणीकडे बघून ते म्हणाले, “तुमचे वडिल माजगांवकर सर म्हणजे माझे सन्मानीय, आदरणीय गुरु आहेत. दुदैवाने ते आता नाहीत. हा मानाचा मुजरा, सरांची मुलगी म्हणून तुम्हाला करतोय. पण हा त्रिवार मुजरा माझ्या सरांसाठी आहे. आणि तो त्यांना पोहोचलाही असेल. “

– – केवढी ही नम्रता. आणि केवढी ही गुरुभक्ती! ती बघून कमलचे डोळे वडिलांच्या आठवणीने भरून आले.

तर मंडळी असे होते हे गुरुशिष्याचे अलौकिक अढळ नाते. बाबासाहेबांना बघण्याची, भेटण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण योग येत नव्हता. म्हणून वाईट वाटत होते. आणि अचानक=अचानक

तो योग जुळून आला. मला कम्मालीचा आनंद झाला. खूप दिवसापासूनची माझी मनांतली इच्छा पूर्ण झाली. फोनवर, “बाबासाहेब, मी माजगावकर सरांची मुलगी बोलतेय ” अशी ओळख सांगून भेटण्याची इच्छा दर्शवली. माजगांवकर सरांच नांव ऐकून, श्री बाबासाहेबांनाही खूपच आनंद झाला. माझे जावई श्री. सुजित सु·जोशी खूप उत्साही आहेत. त्यांच्या ओळखीने हा सुवर्ण योग जुळून आला- ते आम्हांला बाबासाहेबांकडे घेऊन गेले. त्यांच्याबरोबर आमचा फोटो काढला. अतिशय दुर्मिळ आजकाल बघायलाही सापडणार नाही, अशी मोडी लिपीतली, बाबासाहेबांची वळणदार, सुरेख सही आम्हांला मिळाली. मी अगदी भारावून गेले होते. सारखा मनात विचार येत होता. बाबासाहेबांची ऐतिहासिक वास्तू, त्यांची कर्तबगारी, त्यांचा लोकसंग्रह आणि समाजांत मिळवलेला मोठ्ठा मानसन्मान बघायला या पट्टशिष्याचें गुरु ति. माजगांवकर सर माझे वडील आज हवे होते,. आज हवे होते.. हया गुरु शिष्याच्या नात्याचा शोध माझा भाचा सतीशमुळे लागला होता. आज तोही हयात नाही. शेवटी हात जोडून मी मनांत म्हणालें “कालाय तस्मै नमः”

निघतांना बाबासाहेब मला म्हणालें ” सरांचा शालेय जीवनातला फोटो असेल ना तुमच्याकडे? मला तो हवा आहे. मी माझे आत्मवृत्त लिहीतोय. त्याच्या मुखपृष्टावर मला माननीय सरांचा फोटो लावायचा आहे. सुदैवाने कोट टोपी धोतर असा ति. नानांचा फोटो भाच्याकडून चि. हेमंतकडून मला मिळाला. तो बघितल्यावर बाबासाहेब प्रसन्न हसले. सतीश माझा भाचा.. त्याच्यामुळे हया गुरु शिष्य नात्यांचा शोध लागला. आणि चि. सुजित जोशींमुळे मला श्री. बाबासाहेब प्रत्यक्ष भेटले. माझ्याशी प्रेमाने बोलले. तो आनंद, तो क्षण माझ्या आठवणीतल्या शिदोरीतला, अत्यंत मोलाचा,.. अत्यंत मोलाचा.. असा क्षण आहे.

तर मित्र-मैत्रिणींनो असे होते हे गुरुशिष्याचे महान, आदर्श आणि वाखाणण्यासारखं नातं, धन्य ते माझे वडील आणि धन्य ती गुरुभक्ती. श्री. बाबासाहेब तुम्हाला माझा मानाचा, त्रिवार मुजरा.

जय शिवाजी, जय भवानी ||

– क्रमशः भाग ३०

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बिघाड…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “बिघाड…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

फ्रिज बिघडला.

टीव्ही बंद.

वाय-फाय डाऊन.

 

शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.

 

“आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं! ” – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.

 

सहा वेळा प्लग काढून लावला.

टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.

नेट कनेक्शन गायब.

 

सगळीकडे जणू “No Signal”.

 

तो चिडून म्हणाला,

“हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय. “

 

त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.

ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,

“काय झालं? “

 

“काय झालं? बघ ना, फ्रिज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये? “

 

ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडा थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.

ती म्हणाली—

“तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का? “

 

क्षणभर तो गोंधळला.

काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एका जाणिवेचा प्रकाश पडला.

त्या एका वाक्यानं तो आत कुठे तरी ढवळून निघाला.

 

फ्रिज बंद झाला, म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं…

टीव्ही बंद झाला, म्हणून क्रिकेटचं स्कोअर समजलं नाही…

नेट गेलं, म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या…

 

पण ती?

ती अजूनही सकाळी उठून सगळं करत होती.

गरम चहा, पोळीभाजी, मुलांची तयारी, सासूबाईंची औषधं…

सगळं ‘नॉर्मल’ चालू.

 

ती बिघडत नाही? ती थकत नाही?

 

ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं, पण त्याचा अर्थ खोल होता.

“तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का? “

 

ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं. जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते,

ती कधी ‘डाऊन’ होते का विचारतो आपण?

 

ती तापातही उठते.

 

पाळीच्या दुखण्यातही काम करते.

मनात राग असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवते.

सासूबाई टोचून बोलल्या तरी चूप राहते.

 

कारण हे घर तिचं आहे… ती ‘चालू’ ठेवते.

 

तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला.

 

काही वर्षांपूर्वी तो नवीन नोकरीला लागला होता.

तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे.

ती लग्नानंतर शहरात आली. नवीन माणसं, नवीन रस्ते, नवीन भाषा… पण एकही तक्रार नाही.

सगळं ती शिकत गेली.

रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पहायची.

त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांचं हसवणं, खेळणं, स्वतः थकलेली असूनही करत राहायची.

 

एकदा ती तापात होती… तरी सकाळी उठून स्वयंपाक केला.

तो म्हणाला होता, “आराम कर ना थोडा…”

ती म्हणाली होती, “तू कामावर जातोस, मी घरी राहते… आराम माझ्या वाट्याला नाहीच. ”

 

 

आणि आत्ताच…

 

तो फ्रिज उघडून पाहतो, “कसं जमवायचं आता सगळं? “

 

पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं—

“माझ्या आयुष्याचं तपमान बिघडत असताना… किती वेळा हिने ‘फ्रिज’सारखं स्थिर राहून सगळं थंड केलंय! ”

 

तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो.

ती पोळ्या लाटत आहे. डोळ्यांत थकवा आहे, पण हात स्थिर आहेत.

 

“कधी बिघडशील गं तू? ” तो हळूच म्हणतो.

 

ती थांबते. थोडा वेळ शांत.

मग म्हणते—

“बिघडले होते… पण तुमच्यासाठी परत चालू केले स्वतःला! “

 

त्याच्या छातीत काहीतरी धडधडतं.

 

दुपारी…

 

तो स्वतः स्वयंपाकघरात जातो.

मुलाला विचारतो, “तुला सॅंडविच खायचंय का? “

 

मुलगा म्हणतो, “पप्पा, तुम्ही बनवाल? “

 

तो म्हणतो, “हो, आई विश्रांती घेत आहे. “

 

ती हसते, पण त्या हसण्यात प्रश्न असतो—

“उद्या काय? पुन्हा मीच चालू? “

 

तो म्हणतो,

“नाही. आता मीही चालू राहीन. “

 

रात्री…

 

ती शांत झोपलेली असते.

तो तिच्या पायाशी चादर घालतो.

लपवून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो.

 

आणि स्वतः मोबाईलच्या नोट्समध्ये लिहितो—

“तू चालू होतीस… म्हणून घर चाललं.

पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू… कारण आता समजलंय—

तू बिघडलीस तर मीही संपलो! “

 

या जगातली सगळी यंत्रं बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो.

पण जी व्यक्ती रोज चालू आहे – आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी… तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का?

तिचा बिघाड टाळायचा असेल, तर अधूनमधून तिला थांबू द्या.

कारण ती जर एक दिवस खरंच “Shutdown” झाली,

तर घर चालणार नाही… फक्त ‘जगणं’ चालू राहील… पण त्यात ‘जीव’ नसेल.

घराच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही, कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर, ज्याला कुणी कधीच ऑफलाईन करू शकत नाही.”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र-“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रुजू व्हा. सगळं छान होईल. ” काकू म्हणाल्या.

मीही हेच ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असं वाटलं आणि मी निश्चिंत झालो!

पण हे वाटतं तेवढं सोपं नसून या नंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारा ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती!)

काकूंचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. बोलाफुलाला गांठ पडावी तसं त्याच संध्याकाळी मला रिलीव्ह व्हावं लागलं. सामानाची बांधाबांध, रात्रीच्या प्रायव्हेट लक्झरी स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन हे व्याप होतेच.. पण सर्व स्टाफ मेंबर्सच्या आपुलकीच्या सहकार्यामुळे सगळं सुरळीत पार पडलं. अकोला ब्रँचचा चार्ज ज्या परिस्थितीत मला घ्यावा लागणार होता याचा विचार केला तर तिथं काय वाढून ठेवलं असेल याच विचाराने मी एरवी अस्वस्थ झालो असतो. पण आश्चर्य म्हणजे रात्रभर मनात या कशाचंच दडपण नव्हतं. उद्या अकोल्याला पोचल्यानंतर तातडीने चांगल्या लॉजचा शोध घेऊन, सकाळी ब्रॅंचला रिपोर्ट करण्यापूर्वी शेगावला जाणं कसं जमवायचं याचेच विचार मनात होते. मी अकोल्याला बसमधून उतरलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. तो गुरुवार असणं हा मला एक शुभशकूनच वाटला. मनानं उभारी धरली तरी आदल्या संपूर्ण दिवसभराची दगदग आणि रात्रभराच्या प्रवासातलं जागरण यामुळे शांत झोप नव्हतीच. सगळं शरीर ठणकत होतं. पण आता झोपून चालणार नव्हतं. मी वेळ न दवडता रिक्षा करून स्टॅंडपासून जवळचंच एक लॉज गाठलं, तेव्हा पहाटेचे सव्वा चार वाजले होते.

“इथून शेगावला पहिली बस कधी आहे? ” चेकइनच्या फॉर्मॅलिटीज सुरू असतानाच मी रिसेप्शनला विचारलं.

“आत्ता पाच वाजता. नंतर साधारण दीड दोन तासांच्या अंतरानं. “

‘आता आराम करायच्या मोहात पडायचं नाही. कांहीही झालं तरी पाचची बस चुकवायची नाही.. ‘ मी स्वतःलाच बजावलं आणि…. ,

“रूमवर गरम चहा पाठवून द्या लगेच आणि गरम पाणी असेलच ना आंघोळीसाठी? ” मी विचारलं.

किमान या दोन साध्या गोष्टी माझ्यासाठी त्या क्षणी तरी अत्यावश्यकच होत्या.

“कॅन्टीन सहाला सुरू होईल साहेब.. आणि गरम पाणी सात नंतर. “

यावर बोलण्यासारखं काही नव्हतंच. नाईलाजाने मी रूम गाठली. पाय धुऊन कपडे बदलले. तातडीनं शेगावच्या बससाठी बाहेर पडणं आवश्यक होतं आणि माझं थकलेलं शरीर तर अंथरुणाला पाठ टेकायला आसुसलेलं होतं! ही बस चुकली तर सगळं वेळापत्रकच विस्कळीत होणार होतं पण त्याला आता नाईलाज होता. कारण आंघोळ न करता शेगावला जाणं योग्य वाटेना. अखेर आता तातडीने शेगावसाठी निघणं शक्य नाही हे मी मनाविरुद्ध स्वीकारलं आणि अंथरुणाला पाठ टेकली. तो एकच क्षण आणि त्यानेच जादूची कांडी फिरवावी तसं झालं! सहजच माझं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं आणि समोर जे पाहिलं त्या दृश्यानेच गारूड केलं. मी भान हरपून पहातच राहिलो! त्या संपूर्ण भिंतीवर गजानन महाराजांचं खूप मोठ्ठं अतिशय जिवंत असं चित्र रंगवलेलं होतं! त्यांच्या मिष्कील हसऱ्या नजरेने ते माझ्याकडेच पहात असल्याचा भास मला झाला न् मी ताडकन् उठून बसलो. घड्याळ पाहिलं. साडेचार वाजून गेले होते. बॅग उचकटून मी घाईघाईने टॉवेल /कपडे घेऊन बाथरूमकडे धावलो. गार पाण्याचे चार तांबे अंगावर घेऊन आंघोळ उरकली. तेवढ्यानंही प्रवासाचा शीण निघून गेल्यासारखं मन प्रसन्न झालं. घाईघाईने कपडे बदलून, सॅक घेऊन बाहेर धावलो. रिसेप्शनजवळ किल्ली दिली आणि गडबडीने बाहेर पडलो. जवळपास रिक्षा दिसत नव्हती आणि रिक्षासाठी थांबायला माझ्याकडे वेळ नव्हता. स्टॅन्ड जवळ आहे हा अंदाज होताच. मी क्षणाचाही विलंब न लावता स्टॅंडच्या दिशेने धाव घेतली तेव्हा पावणेपाच वाजून गेलेले होते. स्टॅण्ड जवळ जाताच त्याक्षणीच्या अनिश्चित परिस्थितीत धीर न सोडता निकराचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून थेट स्टॅंडवर जाऊन चौकशी करून प्लॅटफॉर्म शोधण्यात वेळ न घालवता मी बसेस् बाहेर पडतात तिथून आत जायचा निर्णय घेतला. त्या दिशेने धावत फारतर दोन-चार पावलेही गेलो नसेन तेवढ्यांत समोरून एक बस बाहेर पडताना दिसली. प्रयत्न करूनही अंधारात बस वरचा बोर्ड दिसत नव्हता. पुढे झेपावत हात हलवून मी बस थांबवायचा केविलवाणा प्रयत्न केला. बस थांबली. कंडक्टरने दार उघडलं. बस कुठं जाणाराय याची चौकशी केली. आश्चर्य म्हणजे ती शेगावला जाणारीच बस होती. मी गडबडीने बसमधे चढलो न् पाहिलं तर बस पूर्ण रिकामी होती. बसमधे फक्त कंडक्टर. जणू खास माझ्यासाठीच ती बस सोडलेली असावी तसा मी एकटाच प्रवासी आहे हे लक्षांत येताक्षणी मनाला स्पर्शून गेलेलं अतीव समाधान तोवरच्या धावपळीचा सगळा शीण नाहीसा करणारं होतं! !

आजवरच्या असंख्य प्रवासांमधला तो प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही. तो प्रवास फक्त शेगावचा नव्हता. कारण मी थेट महाराजांपर्यंत जाऊन पोचल्याचा आभास निर्माण व्हावा असे अनेक अनुभव पुढे अकोल्याच्या माझ्या त्या अल्प वास्तव्यात मला आले. अकोल्यातलं जेमतेम सहा महिन्यांचं माझं वास्तव्य. या दरम्यान दर पौर्णिमेला शेगावला दर्शनाला जाण्याचे योग सहज जुळून येत असत. शेगावहून मुद्दाम आणलेली गजानन महाराजांची पोथी मी याच अल्पवास्तव्यात सर्वप्रथम वाचली, तेव्हा.. ‘ तू स्वतःच ती पोथी एकदा वाच म्हणजे तुझं तुलाच समजेल हे गजानन महाराज कोण ते‌.. ‘ हे माझ्या ताईचे शब्द शब्दश: खरे झाल्याची मनाला स्पर्शून गेलेली अनुभूति मला अनेक अर्थाने समृध्द करणारी होती! माझ्या अंतर्मनातला तो आणि गजानन महाराजांसारख्यांचं अवतारी रूप यांच्यामधलं अद्वैत मला लख्खपणे जाणवलं ते ही पोथी वाचल्यानंतरच!

‘आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा राजमार्ग सोडून ताई ही पोथी कां वाचते? ‘ या त्यावेळी केवळ अज्ञान आणि अहंकारातून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर ही पोथी वाचूनच मला मिळालं! किंबहुना माझ्या मनातल्या तेव्हाच्या त्या प्रश्नातली निरर्थकताही मला नेमकी जाणवली. जसा कांही तो प्रश्न मी महाराजांनाच विचारला असल्यासारखं त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर महाराजांनी १९ व्या अध्यायात मला दिलं असल्याचं प्रथम वाचनातच माझ्या लक्षात आलं. या अध्यायात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आपल्याला भेटायला येणार असल्याचा संकेत गजानन महाराजांना मिळतो तेव्हा गजानन महाराज त्यांच्या सेवेकऱ्याला यांची पूर्वकल्पना देताना म्हणतात, ” अरे बाळा, उदयिक माझा बंधू येतो देख मज साठी भेटण्या, त्याचा आदर करावा l” ती भेट कशी तर फक्त कांही सेकंदांची! ‘एकमेकांसी पहाता, दोघे हसले तत्वता l हर्ष उभयतांच्या चित्ता, झाला होता अनिवार ll ‘ असं नेमक्या शब्दातलं त्यांच्या भेटीचे वर्णन!

ही नजर भेट होताच एकमेकांकडे पाहून स्मितहास्य आणि.. ” बंधो, आम्ही निघतो.. ” असे टेंबे स्वामी महाराजांचे अनुमती मागणारे मोजके शब्द आणि त्यानंतर गजानन महाराजांनी होकारार्थी मान हलवताच त्यांचे निघून जाणे… सगळंच अतर्क्य! श्री गजानन महाराज आणि टेंबे स्वामी महाराज दोघेही समकालीन आणि दोघांचेही नियत कार्य पूर्ण होताच त्यांची झालेली अवतार समाप्ती! या अवतारी पुरूषांच्या अवतारकार्याचे प्रयोजन आणि नियोजन या दोन्हींमागचं गूढ म्हटलं तर अनाकलनीय पण तरीही सहजसोपंसुध्दा! आता हेच पहा ना. श्री. टेंबे स्वामी अतिशय कर्मठ आणि गजानन महाराज अतिशय साधे, सोवळ्या-ओवळ्याचा कसलाच विधिनिषेध न बाळगणारे… आणि तरीही त्या दोघांमधे हे सख्य आणि हे अद्वैत कसं? हाच प्रश्न त्यांच्या सेवेकऱ्याच्या मनात निर्माण झाल्याचे जाणवताच त्या शंकेचे निरसन करताना कर्म, भक्ती आणि योग या परमेश्वरापाशी नेणाऱ्या तीनही वाटांचं गजानन महाराजांनी केलेले नेमकं निरूपण मुळातूनच वाचावं असंच आहे. माझ्या अंतर्मनातल्या ‘ तो’ चं खरं स्वरूप मला लख्खपणे जाणवलं म्हटलं ना ते हे सगळं समजून घेतल्यानंतरच, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं!

“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन घ्या आणि मगच रूजू व्हा. सगळं छान होईल” असं काकू मला म्हणाल्या होत्या. मीही तेच ठरवलं होतं. म्हणूनच काकूंच्या तोंडून गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच मला वाटलं होतं. यातल्या ‘सगळं छान होईल’ म्हणजे नेमकं काय आणि कसं याचा प्रत्यय, कलियुगातला एखादा चमत्कार घडावा तसाच माझ्या अकोल्यातील वास्तव्यात लवकरच मला अगदी अकल्पितपणे येणार होता‌, पण त्याबाबतीत मी स्वत: मात्र तेव्हा अनभिज्ञच होतो! !

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमाचे सिंचन… ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

अल्प परिचय 

  • सेवानिवृत्त मुख्याध्यापिका.
  • गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे सन्मित्र मंडळाच्या बैरामजी जीजीभाय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका.
  • महापौर पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
  • सध्या बोरिवली (मुंबई) व पुणे येथे वास्तव्य.

? मनमंजुषेतून ?

 ☆ प्रेमाचे सिंचन☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

विक्रांत मोरे (नाव बदललेले) काल माझ्याजवळ आला, अगदी शेजारी येऊन उभा राहिला. मी शिकवण्यात दंग होते. हळूच तो माझा पदर खेचत होता.

“काय रे? काही सांगायचंय का? ” असं विचारल्यावर अगदी अस्पष्ट आवाजात म्हणाला, “बाई, मला बक्षीस मिळालं. ” 

मी हसून मोठ्याने म्हणाले, “अरे वा, छान! कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळालं? ” माझ्या वाक्यासरशी सगळा वर्ग त्याच्याकडे बघू लागला, बाईंनी दखल घेतली याचा त्याला खूप आनंद झालेला दिसला.

विक्रांत दोन बहिणीच्या पाठीवरचा. तो अगदी लहान असतानाच आई गेली. घरची अगदी गरिबी. वडील कुठेतरी वॉचमन. मोठी बहीण १४-१५ वर्षांची, तीही नोकरी करत होती. दुसरी बहीण असेल दहा-बारा वर्षांची, परिस्थितीने अकाली गृहिणी केलं होतं बिचारीला.

वर्गात अगदी पहिलीपासून “तो अभ्यास करत नाही” अशी बाईंची तक्रार आणि घरी अभ्यास न करता बहिणींना मारतो ही बहिणींची तक्रार. मला मात्र तो कधीच आगाऊ किंवा आक्रमक वाटला नाही. काही विचारलं की खाली मान घालून जमिनीकडे बघायचा.

गेल्या वर्षी नऊ मुलं चौथीच्या वर्गात नापास झाली होती, त्यात हाही होता. सगळेच एककाच्या मार्कांचे धनी. मी हा वर्ग घ्यायचा म्हणजे ७०चा पट होणार, पण पालकांनी खूप आग्रह केला आणि यावर्षी मी चौथीचा वर्ग घेतला. सर्वप्रथम मी नापास झालेल्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं. रोज मनापासून अभ्यास केलात तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्काने पास व्हाल या आत्मविश्वासाचं बीज त्यांच्याते पेरलं. मला जमेल तसं त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले आणि खरं सांगू, मुलांनीही मला निराश केलं नाही. एक ऋजुता सोडता (नाव बदललेलं) सर्व मुलं अत्यंत चांगल्या मार्कांनी पास झाली. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना एवढे छान मार्क मिळाले होते सगळ्यांना.

विक्रांतही खूप चांगल्या मार्कांनी पास झाला होता आणि तेव्हापासून अबोल असणारा विक्रांत माझ्याजवळ बोलू लागला. घाबरत घाबरत बोलणाऱ्या विक्रांतच्या मनावर, आपल्यात काही चांगले नाही आपले कोणी कौतुक करणार नाही हे दडपण असावे हे माझ्या शिक्षकी नजरेने लगेच हेरले आणि मी त्याच्या छोट्या गोष्टींची खूप आत्मीयताने दखल घेऊ लागले.

“अरे वा, विक्रांत, अक्षर छान काढले आहे, ” असं म्हटल्याबरोबर त्याच्या लहान चेहऱ्यावर हास्याचे गुलाब फुलंत. कालच्या प्रसंगाने त्याला खूप आनंद झालेला दिसला.

आज कामाच्या डोंगरात मी बुडून गेले होते. १२:१५ ला ऑफिसच्या दाराशी कोण घुटमळते म्हणून पाहिलं तर विक्रांत. म्हटलं “आत ये रे. ” तो आला. त्याच्या हातात घड्याळाचा खोका होता.

“बाई, हे बघा ते बक्षीस. ” असं म्हणून त्याने खोका माझ्या हातात ठेवला. मी सर्व काम बाजूला सारून त्याचं घड्याळ सर्व शिक्षिकांना दाखवलं, म्हटलं, “बघा ग, माझ्या विक्रांतला बक्षीस मिळालं. छान आहे ना घड्याळ! ” घड्याळ सगळ्यांना दाखवून मी पुन्हा व्यवस्थित त्याच्याकडे दिलं. त्यावेळेचा त्याचा आनंदाने उजळून निघालेला चेहरा अजूनही माझ्या नजरेसमोर तरळतोय.

माझ्या या दोन वाक्यांनी त्याला दिला प्रचंड आत्मविश्वास. त्याच्यातील नकारात्मक भूमिका जाऊन सकारात्मक रोपांची वाढ सुरू झालेली दिसली. नकळत अत्यानंदाने दोन अश्रू बाहेर टपकलेच. खूप खूप आनंद झाला मला. आज माझं रोप सुकत चालले होते परंतु प्रेमाच्या खताने ते पुन्हा मूळ धरू लागले होते, चांगले तरारून वाढीला लागले होते. एका शिक्षिकेला (शिक्षिका कमी पण आईच जास्त) यापेक्षा दुसरं काय हवं?

दिवसभर हा प्रसंग माझ्याभोवती पिंगा घालत होता. आजच्या मुलांना सगळ्यात जास्त गरज आहे ती प्रेमाची पण त्याचाच इतका तुटवडा आहे की विचारू नका. म्हणूनच आम्हा शिक्षकांचे काम जरा वाढलं आहे. शिकवण्याबरोबर थोडे प्रेमाचे खतही या रोपांना आवश्यक आहे, तरच ही रोपं निरोगी आणि टवटवीत होतील.

(हे प्रेम, आपुलकी, मायेचा ओलावा याची गरज आपल्या घरातील सदस्यांना देखील खूप असते. आपण आपल्या कामात मग्न असतो, गर्क असतो, खरंच वेळ नसतो. पण या नात्यांना जगवायचं, फुलवायचं, तर मनापासून घेतलेली दखल आणि प्रेमाच्या शब्दांचं सिंचन या दोन गोष्टींची नितांत गरज आहे.)

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अजोड आठवण ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक अजोड आठवण ☆ श्री जगदीश काबरे ☆

जागतिक कीर्तीचे प्रख्यात शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि फलज्योतिष्याच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी सकाळी कळली आणि त्यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणीने मन उचंबळून आले. त्यांनी त्यांचे गुरु फ्रेड हॉयल यांच्यासोबत ‘स्थिर-स्थिती विश्वाचे’ समर्थन करणारा ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ मांडला होता. तसेच त्यांनी मराठी भाषेत विज्ञान साहित्याचे दालन खुले केले. हे त्यांचे खूपच मोठे काम होते.

मी जेव्हा मराठीतून विज्ञान प्रसार करण्यासाठी लेखक म्हणून लिहिता झालो होतो, त्या सुरुवातीच्या काळात त्यांनी माझ्या ‘कथा ही रक्ताची’ — रक्ताबद्दल वैज्ञानिक माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. तेव्हा त्यांनी मी नवखा असूनही माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे आठवते. एवढे मोठे शास्त्रज्ञ असूनही ते एवढ्या मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते की, मी अचंबित होऊन गेलो. त्यानंतर ‘ज्योतिष शास्त्रावर प्रकाशझोत’ हे माझे पुस्तक मी त्यांना अभिप्रयार्थ पाठवले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रचंड कामाच्या व्यापातूनही तत्परतेने ते पुस्तक वाचून त्यावर त्यांच्या हस्ताक्षरात मला अभिप्राय पाठवला होता. (छायाचित्रात तेच पत्र आहे.) माझ्यासाठी हा अनमोल ठेवा आहे. तो मी मरेपर्यंत जपून ठेवणार आहे. त्यांच्या या प्रोत्साहनपर अभिप्रायामुळेच पुढे मी लिहिता राहिलो.

त्यांच्याबरोबर माझ्या अशा अधून-मधून भेटी होत राहिल्या आणि मी समृद्ध होत गेलो. अशी व्यक्ती आयुष्यातून निघून जाणे म्हणजे आपल्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होणे असते. पण अर्थातच त्यांच्या साहित्यामुळे ती पोकळी भरून निघेल याची मला खात्री आहे आणि ते कायम आपल्या सोबत असतील.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बासरी” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “बासरी” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘ मीपणाच्या ‘ अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, म्हणजे समस्त गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, ‘आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? ‘

बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल. ‘

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं… बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ… ना एखादं वळण… मी पोकळ आहे. त्या पोकळीतूनच माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा छिद्रांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली, तरच मी बोलते.

तो जशी फुंकर मारतो, तशी मी बोलते. ‘ यावर गोपी निरुत्तर झाल्या.

अहंकाररहित शरीर (जीवन)…

हीच श्रीकृष्णाची बासरी होय!

ज्याने आपल्या जीवनातून अहंकार घालवला, ‘मी’पणाला आपल्यापासून दूर केलं, त्याचंच जीवन हे शांतीपूर्ण, सुखमय, आनंदमय व त्यागमय झालंय आहे. आणि तोच मनुष्य अध्यात्माच्या मार्गावर आरूढ झाल्याशिवाय राहत नाही. तो एकनिष्ट श्रीकृष्णभक्ती मध्ये तल्लीन होऊन, नश्वर सुखाचा त्याग करून, खऱ्या सुखाचा, आनंदाचा अनुभव करतो…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares