मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

?जीवनरंग ?

☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं. मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता. रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती. बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो. मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती. पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता. फटाक्यांचा माळा वाजत होत्या. ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता. तासभर धिंगाणा सुरूच होता. त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली. झोप लागत नव्हती. भूक लागली होती. उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.

विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला “क्या कालू झोपला नाहीस अजून”. “अगं बच्चन अजून आला नाही”… असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली. ओठावर दोन बोटं गच्च दाबून थुकलो. पिचकारी फ्लॅटफार्मच्या बाहेर गेली. हा माझा छंद होता.

बारा वाजले होते जय हिंद थिएटर जवळ होतं. शेवटचा खेळ संपत आला तशी मंगल उभी राहत म्हणाली, ”चल आलेच मी तासाभरात”. असं म्हणून ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक कटाक्ष टाकला आणि तोंडातला विडा बोटाने धरून भिरकावला. मंगल कोण कुठली माहीत नाही. आसऱ्याला एकत्र जमलेल्या गर्दीला एकच नातं असतं ते म्हणजे परिस्थितीचं. आणि म्हणाल तर फक्त ओळखीचं. मंगल इथं धंदा करत होती. शरीर विकून फक्त पोट भरत होती. मी बॅचलर मुलगा. दिवसभर काम आणि कॉलेज करून रात्र काढायला स्टेशनवर येणारा. इथं मी खरी जिंदगी जगलो. फार नाही पण तीन साडे तीन महिने तर नक्कीच.

अर्ध्या तासाने मंगल पुन्हा आली. चिडलेली आहे हे लगेच ओळखलं. आल्या आल्या तिने इशारा केला आणि मी तंबाखू मळायला लागलो. तिच्यासाठी विडा मीच मळत असे. विडा तिच्या हातावर देत म्हणालो “आज लवकर आलीस.. ” “अरे आज निकाल लागला ना, थिएटर रिकामच सालं. गिऱ्हाईकच नाही. जे रोजचे दोघेजण असतात तेपण दिसले नाहीत. तो नालायक नवीन आलेला पोलीस दोनशे रुपये फुकटचे घेऊन गेला. साला… हफ्ता आम्हाला पण द्यायला लागतो काळू “… तिचं बोलणं थांबवत मी आवंढा गिळत विचारलं “जेवलीस?”. मान झटकत छया करत खूप उपाशी असल्याचा इशारा तिने दिला. पण त्यातूनही ती म्हणाली “ तू खाल्लस काय?” मी नाही म्हणालो. त्यावर तिने पुन्हा विचारलं “बच्चन कुठाय” (शिवी)….. ? मी सांगितलं “आज मिरवणुकीत ताशा वाजवायला गेलाय तो”. मंगलने पण तंबाखू थुकली आणि म्हणाली, “थांब कायतरी बघते खायला.. काही नाही मिळालं तर आत्ता महालक्ष्मी येईल पुणे स्टेशनला जाऊ”. तेवढ्यात गाडीचा आवाज आलाच. मंगल म्हणाली, “चल त्या बाजूला जायला हवं नाहीतर उपाशी राहायला लागल आज चल उठ लवकर “.. मी चादर गुंडाळून हातात घेतली आणि आम्ही निघणार तेवढ्यात बच्चनचा आवाज आला. “ये काळू ये मंगला, अरे रुखो मुझे छोडके कहा जाते. ” या दोघांची हिंदी अशीच.

खांद्यावर ताशा अडकवलेला आणि हातात काळी पिशवी घेतलेला ताशेवाला बच्चन दिसला की मला बाप भेटल्यागत वाटायचं. त्याचं वय असेल चाळीस पंचेचाळीस. कधीतरी बोलण्यात परभणीच्या कोणत्यातरी भागातला आहे एवढंच कळलं होतं. बाकी काहीच माहिती नव्हती. त्यादिवशीपण हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी दाखवत आम्हाला दोघांना म्हणाला “चलो खाना खाते है”

आम्ही लगेच बाकड्यावर बसलो पिशवी फोडली. गरम बिर्याणी तिघांसाठी आणली होती त्याने. मटण कशाचं म्हणून मी कधीही विचारलं नाही. मंगल म्हणाली “काय बच्चन आज लय खूष.. ‘ त्यावर ताशावर हात मारत बच्चन बोलला “बडी सुपारी मिली दो सो रुपया मिला. सौ का बिर्याणी लाया तेरे लिय.. ” बिर्याणी कधी संपली आणि पोट कधी भरून ढेकर आला कळलं नाही. रेल्वेच्या नळावर हात धूवून पाणी प्यालो आणि बाकड्यावर येऊन बसलो.

बराच वेळ तिघांच्या गप्पा चालायच्या. झोप आली की, मग आपापल्या बाकड्यावर जाऊन आम्ही झोपायचो.

त्याच फ्लॅटफॉर्मवर माझ्या बऱ्याच कवितांचा जन्म झालाय. आणि माझासुद्धा…

ताशेवाला बच्चन या बच्चन बरोबर गप्पा मारत असताना तो एकदा म्हणाला होता की, “काळ्या एक दिवस मी असा ताशा वाजवीन की या दफणभूमीतले मुडदे पण बाहेर येऊन नाचतील. ” त्याच्या या एका वाक्याने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला. साला साधा ताशा वाजवणारा माणूस पण हा सुद्धा एक ध्येय ठेऊन आहे आणि त्याच्या कलेशी किती इमान राखून आहे. कधी कधी मंगलपण लावण्या ऐकवायची. सोलापूरच्या तमाशात कामाला होती असे सांगायची. नंतर नवरा वारल्यावर तमाशा बंद झाल्यानंतर एका मुलाला भावाकडे ठेऊन ती या धंद्यात आणि पुण्यात आली होती. आम्हां तिघा कलाकारांची भेट रोज रात्री इथेच व्हायची. त्याचा ताशा तिची लावणी आणि माझी कविता असायची. त्यावेळी मी कधीच सभागृहात किंवा स्टेजवर कविता म्हणली नव्हती. फक्त लिहायचो आणि बडबडत बसायचो. माझं पब्लिक ही फक्त दोन माणसं. त्यांनी दिलेली जी दाद असायची ती दाद जगातल्या कोणत्याच कवीच्या वाट्याला आली नाही हे मी फार अभिमानाने सांगीन.

रात्री साडेअकरा वाजता मी हजेरी लावायचो ती उपाशी पोट घेऊनच. कारण कोणतंही नातं नसणारी पण हक्काची ही दोन माणसं मला उपाशी झोपू देत नव्हती. आणि मी जे म्हणेल ते ते मला खायला देत गेली. रूमची सोय झालेली असतानासुद्धा मी यांच्यासाठी फ्लॅटफॉर्म सोडायला तयार नव्हतो.

एकदा वर्तमान पेपरला सरस्वती विद्या मंदिर येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धा असल्याची जाहीरात वाचली. बक्षीस तीन हजार रुपये होतं. मी बच्चनला आणि मंगलला ती वाचून दाखवली. माझी जायची कोणतीच इच्छा नव्हती पण बच्चन बोलला “तू जा इथं. ” मंगलनेही तेच वाक्य पुन्हा गिरवले. मला हुरूप चढला. पण घाबरलो होतो म्हणलं, “मला जमणार नाही बोलायला. आपला काय नंबर येणार नाही. आणि मी काय स्टेजवर जाणार नाही. ” त्यावर बच्चन म्हणाला, “देख जितने केलिय मत खेल. तू सिर्फ इधर जैसे बोलता है वैसेच उधर बोल. ” त्यावर मंगल म्हणाली “आणि अजून पंधरा दिवस वेळ आहे. प्रॅक्टिस कर. ” ती तमाशात काम केलेली असल्यामुळे प्रॅक्टिस वैगेरे तिला माहीत होतं.

मी तयार झालो. माझे लाडके मराठीचे प्राध्यापक रोकडे सर यांच्याकडून शिफारस पत्र घेतलं आणि नाव नोंदणी झाली. मग प्रॅक्टिस सुरू झाली. अनेक कवितांमधून माझी भारत माझा देश आहे ही कविता बच्चनला आवडायची त्याने तिच म्हणायला सांगितली. झालं तयारी झाली आणि स्पर्धेच्या आदल्या रात्री दोघांनीही शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं उद्या भेटू काळू. आणि दोघेही अंधारात गेले. एकाच वयाचे होते दोघेही. तिला गिऱ्हाईक मिळालं नाही किंवा मिळालं तरीसुद्धा ते शारीरिक एकत्र येत होते. दोघांमध्ये प्रेम होतं का नव्हतं ते त्यांनाच माहीत. पण दोघेही कुणाला यायला उशीर झाला तर एकमेकांबद्दल काळजी करायचे. मी त्यांना चिडवायचो सुद्धा. अर्थात भाषा कमरेखालची असायची. जी मी इथेच शिकली होती.

स्पर्धेचा तो दिवस आठवतोय. शंभरच्यावर स्पर्धक आले होते आणि मंगेश पाडगावकर प्रमुख पाहुणे होते त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होतं. माझा नंबर आला मी जीव लावून कविता सादर केली. डोळ्यासमोर फक्त फ्लॅटफार्म आहे असे मनावर गोंदवून आणि समोर फक्त बच्चन आणि मंगलच आहेत असा विचार करून मी माझी आयुष्यातली पहिली कविता सादर केली. स्पर्धक संपले होते. अर्धा तास ब्रेक होता. त्यानंतर बक्षिस वितरण होतं. मी थांबावं का निघावं असा विचार करत होतो. कामाला सुट्टी टाकली होती. म्हणलं जाऊन तरी काय करायचं बसू इथंच. निदान पाडगावकरांना तरी बघून होईल. अर्धा तास खूप जीवघेणा गेला. पुन्हा हॉल गच्च भरला.

 प्रमुख पाहुणे पाडगावकर आणि इतर स्टेजवर स्थानापन्न झाले. कार्यक्रम सुरू झाला एक दोन मनोगतं झाली. नंतर पाडगावकर बोलले. आणि त्यानंतर बक्षिस वितरण सुरू झालं. उत्तेजनार्थ दोन बक्षिसं जाहीर जाहीर झाली. हॉल टाळ्यांच्या गजराने घुमत होता.

– क्रमशः भाग पहिला

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सहानुभूति…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘सहानुभूति…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

मी एका घराजवळून जात असताना अचानक मला त्या घरातून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्या मुलाच्या रडण्याच्या आवाजात एवढी वेदना होती की आत जाऊन ते मूल का रडत आहे हे जाणून घेण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.

आत गेल्यावर एक आई तिच्या दहा वर्षाच्या मुलाला हळूवारपणे मारतांना दिसली आणि ती स्वतःही मुलासोबत रडत होती. मी पुढे होऊन विचारले की, “ताई, या लहान मुलाला तुम्ही का मारताय? आणि तुम्ही स्वतःही का रडत आहात. “

ती म्हणाली, “भाऊ, याचे वडील देवाघरी गेले आहेत आणि आमची परिस्थिती खूपच नाजूक आहे. याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी लोकांच्या घरी धुणं, भांडी, साफसफाई ची कामं करते आणि घराचा व याच्या शिक्षणाचा खर्च कसाबसा भागवते. आणि हा नालायक दररोज शाळेत उशीरा जातो आणि घरीही उशीरा येतो. कुठेही भटकत फिरतांना तो मुलांसोबत खेळण्यात गुंगून जातो आणि अभ्यासाकडे ही लक्ष देत नाही. त्यामुळे त्याचा शाळेचा गणवेश दररोज घाण होऊन जातो ज्यामुळे शाळेत शिक्षकही रागावतात. “

मी त्या मुलाला आणि त्याच्या आईला कसंतरी थोडेफार समजावून सांगितले आणि तेथून निघालो.

ही घटना होऊन थोडे दिवस उलटले होते आणि एके दिवशी सकाळी मी काही कामानिमित्त भाजी मंडईत गेलो होतो. तेव्हा अचानक माझी नजर त्याच दहा वर्षाच्या मुलावर पडली ज्याला घरात मार खाताना मी बघितले होते. मला दिसले की, तो मुलगा बाजारात फिरत होता आणि दुकानदार त्यांच्या दुकानासाठी भाजी विकत घेऊन पोत्यात भरतांना त्यातील थोडीफार भाजी खाली जमिनीवर पडलेली राहिली की, हा मुलगा लगेच ती उचलून आपल्या पिशवीत ठेवत होता.

हे बघून माझी उत्सुकता ताणली गेली व हे काय प्रकरण आहे असा विचार करत मी त्या मुलाच्या मागे गुपचूप जाऊ लागलो. त्याची पिशवी या खाली पडलेल्या व त्याने वेचलेल्या भाजीने भरल्यावर तो रस्त्याच्या कडेला बसला आणि जोरजोरात ओरडून ती भाजी विकायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर धुळ व चिखलाचे पुट जमा झाले होते, गणवेश धुळीने माखलेला होता आणि डोळे पाणावलेले होते. असा दुकानदार मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो.

त्याने बाजारात ज्या दुकानासमोर आपले छोटेसे दुकान मांडले होते, अचानक त्या दुकानातून एक माणूस उठला आणि त्याने लाथेने या मुलाचे दुकान लाथाडून टाकले आणि ओरडत शिव्या देत त्या मुलाला दूर ढकलून दिले.

मुलाच्या डोळ्यात अश्रू आले व मुकाट्याने पुन्हा त्याने तो विखूरलेला भाजीपाला गोळा करायला सुरुवात केली आणि काही वेळाने घाबरत त्याने आपली भाजी दुसऱ्या दुकानासमोर विकायला ठेवली. यावेळी ज्याच्या दुकानासमोर त्याने आपले छोटेसे दुकान मांडले होते तो चांगला माणूस असावा, कारण ती व्यक्ती त्या मुलाला काहीच बोलली नाही.

थोड्याशाच भाज्या होत्या आणि त्या इतर दुकानांपेक्षा कमी भावाने विकत होता म्हणून लवकरच त्याच्या जवळची भाजी विकली गेली. तो मुलगा उठला आणि त्या बाजारातील कपड्याच्या दुकानात गेला. माजी विकून आलेले पैसे त्या दुकानदाराला दिल्यानंतर दुकानात ठेवलेलं शाळेचं दफ्तर उचललं आणि काहीही न बोलता तो परत शाळेत गेला. मी पण त्याच्या मागे मागे जाऊ लागलो होतो.

मुलाने वाटेत रस्त्यावरील नळावर तोंड धुवून तो शाळेत गेला. मी पण त्याच्या मागे शाळेत गेलो. मुलगा शाळेत गेला तेव्हा त्याला एक तास उशीर झालेला होता. त्याच्या शिक्षकाने त्याला छडीने जोरदार फटके दिले. मी पटकन वर्गात जाऊन शिक्षकांना विनंती केली की या निरागस मुलाला मारू नका.

शिक्षक म्हणाले की तो रोज दीड तास उशिरा येतो, आणि भीतीपोटी त्याने शाळेत वेळेवर यावे म्हणून मी त्याला दररोज शिक्षा करतो. मी त्याच्या घरीही अनेकवेळा हे कळवले आहे.

मार खाल्ल्यावर तो मुलगा बिचारा वर्गात बसून अभ्यास करू लागला. मी त्याच्या शिक्षकाचा मोबाईल नंबर घेतला आणि घराकडे निघालो. घरी पोहोचल्यावर लक्षात आले की मी ज्या कामासाठी भाजी मंडईत गेलो होतो तेच नेमके मी विसरलो होतो. सायंकाळी तेथून परतताना मी बघितले की ते निरागस बालक घरी गेले आणि त्याच्या आईने त्याला पुन्हा मारहाण केली. रात्रभर माझं डोकं भणभणत होतं.

सकाळी उठल्यावर मी ताबडतोब मुलाच्या शिक्षकाला फोन करून विनंती केली की थोडा वेळ काढून त्यांनी मंडईला पोहोचावे. शिक्षकाने होकार दिला. सूर्य उगवला आणि मुलाची शाळेत जायची वेळ झाली. मुलगा आपले छोटे दुकान थाटण्यासाठी घरातून थेट बाजारात गेला.

मी तिच्या घरी गेलो आणि त्याच्या आईला म्हणालो, “ताई, माझ्यासोबत चला. तुमचा मुलगा शाळेत उशिरा का जातो हे मी तुम्हाला दाखवतो. “

“आज मी याला सोडणार नाही…. आता याला दाखवतेच… ” असं बडबडत ती लगेच माझ्यासोबत निघाली. मुलाचे शिक्षकही बाजारात आले होते. आम्ही तिघेही बाजारात तीन ठिकाणी जाऊन उभं राहिलो, आणि गुपचूप त्या मुलाकडे बघायला लागलो. आजही त्याला नेहमीप्रमाणे अनेक लोकांकडून फटकार आणि धक्काबुक्की सहन करावी लागली होती. आणि शेवटी तो मुलगा भाजी विकून कपड्याच्या दुकानात गेला.

अचानक माझी नजर त्याच्या आईवर पडली. तीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या. मी त्याच्या शिक्षकाकडे पाहिले. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावरून मला असे जाणवले की जणू त्यांच्या हातून त्या निरपराध बालकावर अन्याय झाला होता आणि आज त्यांना त्यांची चूक कळाली होती.

त्याची आई रडत रडतच घरी गेली आणि शिक्षकही पाणावलेल्या डोळ्यांनी शाळेत गेले. आजही मुलाने आलेले पैसे दुकानदाराला दिले आणि जाऊ लागला तेव्हा दुकानदाराने त्याला लेडीज सूट चे कापड दिले आणि म्हणाला, “बाळा, तू जमा केलेल्या सर्व पैशांचे हे कापड आहे. त्यांचे सर्व पैसे मिळाले. हे कापड आता तू घेऊन जा. “

मुलाने ते सूटचे कापड घेऊन शाळेच्या दप्तरात टाकले आणि शाळेत गेला. मी ही मागावर होतोच. शाळेत यायला आजही त्याला एक तास उशीर झालेला होता. तो थेट शिक्षकाकडे गेला, त्याचे दफ्तर बेंचवर ठेवले, आणि छडी ची शिक्षा स्वीकारण्यासाठी त्याने हात पुढे केला. शिक्षक आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी मुलाला कवेत घेतले आणि ते रडू लागले. त्यांना पाहून मलाही अश्रू अनावर झाले. मी स्वतःला सावरत पुढे झालो, शिक्षकांना शांत केले आणि मुलाला विचारले की पिशवीतील सूट चे कापड कोणासाठी आणले आहेस.

मुलाने रडून उत्तर दिले की, “माझी आई श्रीमंत लोकांच्या घरी मजूर म्हणून काम करते. तिच्याकडे चांगले कपडे नाहीत व जे आहेत ते फाटलेले आहेत, शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे नाहीत आणि माझ्या आईकडे पैसे नाहीत, म्हणून मी माझ्या आईसाठी हा सूट विकत घेतला आहे. “

“मग आज हे सूट चे कापड घरी नेऊन आईला देणार का?” मी मुलाला प्रश्न विचारला.

त्याच्या उत्तराने माझ्या आणि त्या मुलाच्या शिक्षकाच्या पायाखालची जमीन सरकली. मुलगा म्हणाला, “नाही काका, सुट्टी झाल्यानंतर मी शिंप्याला ते शिलाईसाठी देईन. ” शाळा सुटल्यावर दररोज काहीना काही काम करून त्याने शिंप्याकडे थोडे पैसे जमा केले होते. ते ऐकून आमचा कंठ दाटून आला.

आपल्या समाजातील कितीतरी गरीब आणि विधवा स्रियांच्या बाबतीत असे किती दिवस चालणार, त्यांची मुले सणाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी किती दिवस तळमळत राहणार, असा विचार करून मी आणि शिक्षक रडत होतो.

अशा गरीब विधवांना देवाने दिलेल्या आनंदात काही अधिकार नाही का? आपण आपल्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या इच्छेतील काही पैसे काढून आपल्या समाजातील गरीब आणि निराधारांना मदत करू शकत नाही का?

आपण सर्वांनी एकदा शांतपणे विचार करावा. आणि हो, जर तुमचे डोळे अश्रूंनी भरले असतील तर ते बाहेर पडू देण्यास अजिबात संकोच करू नका. शक्य असल्यास, ही प्रेरणादायी कथा त्या सर्व कर्तबगार लोकांना सांगा जेणेकरून आमच्या या छोट्याशा प्रयत्नाने कोणत्याही कर्तृत्ववान व्यक्तीच्या हृदयात गरीबांबद्दल सहानुभूतीची भावना जागृत होईल. आणि ही कथा कोणातरी गरीबाच्या घरात आनंदाचे कारण बनू दे.

मुळ हिंदी कथा लेखक- अज्ञात.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मॉ’र्ड’न मम्मा… श्री मंदार जोग  ☆  प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ मॉ’र्ड’न मम्मा… श्री मंदार जोग  ☆  प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

रविवारचा दिवस. गर्दीने लडबडलेला एक मॉल जणू काही फुकट वस्तू वाटप सुरू आहे अशी गर्दी. त्यात एक चौकोनी कुटुंब. नवरा जीन्स आणि टीशर्ट घालून खाली सँडल्स किंवा लिंकिंग रोड crocs वगैरे घालून टिपिकल कंटाळलेला चेहरा घेऊन फिरत. मुलं वारा प्यायलेल्या वासरासारखी उधळलेली. बहुतेक बाग, मैदान, चौपाटी अश्या गोष्टी फार बघितल्या नसाव्यात. अर्थात हल्ली सज्जन, पांढरपेशे लोक अश्या ठिकाणी सहकुटुंब जाऊ शकत नाहीत इतकी गलिच्छ गर्दी तिथे असते ही गोष्ट वेगळी! तर ह्यांच्या दोन मुलांमधे अंतर साधारण पाच ते सात वर्षे. म्हणजे पहिली मुलगी असल्याने किंवा लग्नानंतर लगेच “डिफॉल्ट सेटिंग” मध्ये झाली असल्याने पुढे कॉन्फिडन्स आणि अनुभव जमा झाल्यावर “planned” असा नशिबाने सेकंड attempt मध्ये(च) झालेला वंशाचा दिवा. टिपिकली अश्या वृत्तीचे बिनडोक लोक वंशाचा दिवा पेटे पर्यंत आपली मेणबत्ती इतकी घासतात की शेवटी तीन चार पणत्या पदरात पडून त्यांची मेणबत्ती संपून जाते! असो ह्यांची पणती… आपलं.. ह्यांची मुलगी साधारण आठ ते नऊ वर्षांची आणि दिवा साडेतीन ते चार वर्षांचा. पण गोष्ट ह्यापैकी कोणाचीच नाहीये. गोष्ट आहे अजून एकही शब्द न लिहिल्याने लेट एन्ट्री घेणाऱ्या नायिकेची. त्या मुलांच्या आईची. सॉरी मम्माची ! 

तर ही मुलांची मम्मा, नवऱ्याला जान म्हणून आपल्याला जानू म्हणवून घेणारी ही “मॉर्डन” (हो त्यांच्या बेश्टी ग्रुपच्या इंग्रजी डिक्शनरी मधे मॉडर्न ऐवजी मॉर्डन म्हणायची प्रथा आहे. ) नारी अतिशय प्रातिनिधिक आणि टिपिकल आहे. मग ती कितीही कसोशीने आपले वेगळेपण जपायचा प्रयत्न करत असली तरीही! तिचं असं झालं की चाळीस पन्नास वर्षांपूर्वी मुंबईतून स्थलांतरित होऊन बोरिवली आणि मुलुंड ह्या मुंबईच्या सीमेपल्याड (आमच्या दृष्टीने शिवाजी पार्कचा सिग्नल ओलांडला की मुंबई संपते हा भाग वेगळा. असो!) एखाद्या वसई, नालासोपारा, डोंबिवली, ठाणे, कल्याण, बदलापूर, विरार, भिवपुरी किंवा पनवेल वगैरे सारख्या ठिकाणी बिऱ्हाड थाटलं. त्यांनीही दिव्याच्या प्रयत्नांत आपली मेणबत्ती वितळवत जन्माला घातलेल्या तीन पणत्या पैकी ही एक. नंतर अखेर वंशाला दिवा मिळाल्यावर वडील बोअरवेल ला पाणी लागल्यासारखे थांबले! असो! तर तिच्या सरळमार्गी वडिलांनी आयुष्यभर कॉलर घामाने भिजू नये म्हणून त्यावर रुमाल ठेऊन लोकलला लटकत सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करून यथाशक्ती संसार रेटलेला असतो. फारसा बुध्यांक नसलेली चारही मुलं जेमतेम ग्रॅज्युएट होतात. हिने टिपिकली फर्स्ट attempt सेकंड क्लास बीए वगैरे केलेल असत. एक बहीण लग्न करून पुण्याला, दुसरीने गावातच रिक्षावाल्याशी लफड केल्याने तिला तिच्या मावशीच्या ओळखीने आणलेल्या स्थळी एकदम लखनौ किंवा पंजाब मध्ये पाठवलेली असू शकते. हिच्या भावाने म्हणजे वंशाच्या दिव्याने बहुतेक वेळेला दहावी नंतर विविध पर्याय जोखाळून शेवटी “हार्डवेअर डिप्लोमा” नामक अत्यंत जटिल कोर्स रेल्वे स्टेशन समोरच्या इमारतीत असलेल्या अनेक इन्स्टिट्युट पैकी एकात केलेला असतो आणि लग्नानंतर हिच्या घरातील पहिला “असेंम्बल्ड कॉम्प्युटर” त्यानेच बनवलेला असतो! आज साधारण बत्तीशीचा तो “मामा, मामी कधी आणणार” हा प्रश्न ऐकून कसनुस तोंड करून भाचरांच्या तोंडात डेअरी मिल्क कोंबून आपल्या तोंडातील गुटख्याची चुळ थुंकावी लागणार नाही ह्याची काळजी घेत असतो!

हिने मात्र नशीब काढलेल असत. हिचा नवरा मुळात हुशार, अनेकदा एकुलता एक, मुंबईत पार्ले पूर्व किंवा हिंदू कॉलनी किंवा गिरगाव अश्या ठिकाणी येथे वडिलोपार्जित घर असलेला, प्रेमळ आईवडील असलेला, उच्चशिक्षित, आयटी, bfsi किंवा एखाद्या सर्व्हिस सेक्टरशी संबंधित नोकरीत असलेला, नियमित परदेश वाऱ्या करणारा अथवा उत्तम चालणाऱ्या फॅमिली बिझनेसच्या तयार सिंहासनावर आरूढ झालेला सुस्वभावी आणि निर्व्यसनी अथवा लपून हळूच व्यसन करणारा “गुड बॉय” असतो. लपून हळूच व्यसन म्हणजे मित्रांबरोबर सिगारेट ओढली की घरून खिशातून आणलेली कोथिंबीर हातावर घासायची म्हणजे वास राहात नाही. मित्रांबरोबर एखादी बिअर घेतली तर बॅगेत कॅरी करत असलेल्या मिनी टूथपेस्टने हॉटेलच्या सिंक मध्ये दात घासायचे असे चाळे करणारा महाभाग!

तर त्यांचं लग्न होत. मुळात अग्रेसिव्ह असलेल्या हिला काही महिन्यात आपल्याला काय लॉटरी लागली आहे हे सहज लक्षात येत. मग हिच्या बापाच्या “quest for वंशाचा दिवा” ने जेरीस येऊन चार मुलांना वाढवणारी हिची ढालगज आई रोज दोन तास होणाऱ्या फोन कॉल्स दरम्यान “संसारावरची पकड” ह्या तिच्या आईने तिच्या आईकडून घेऊन हिच्या सुपूर्त केलेल्या अनुभवाच्या पुस्तकातील एकेक धडा तिला वाचून दाखवते आणि मुलगी तो व्यवस्थित इम्प्लिमेंट करते! नव्या नवलाईत नवऱ्याला मुठीत ठेवायला जे काही लागत ते ती त्याला बरोब्बर देत असते आणि नवरा त्या क्षणभराच्या आनंदासाठी नकळत आयुष्यभराच्या गुलामीकडे ओढला जात असतो! मग काही महिन्यांनी एक क्षण किंवा प्रसंग असा येतो की मुलगा आपली शिफ्ट झालेली लॉयल्टी (पक्षी गुलामी) दाखवून देतो आणि मुलाच्या आईवडिलांना आपला मुलगा आपला राहिला नाही हे लक्षात येत! 

मग ह्यांची पहिली मुलगी दीडेक वर्षांची झाल्यावर प्ले स्कूल मध्ये जाऊ लागते. तिथे भेटणाऱ्या अनेक “समविचारी” आणि “समबुध्यांक” आणि समपार्श्वभूमी मम्माज बरोबर हिची ओळख होते आणि मग अचानक जिम, महागडे पार्लर, झुंबा, किटी पार्टी, सोशल मीडियावर गॉगल लावलेले फन विथ बेष्टीज छाप फोटो असा हीचा प्रवास सुरू होतो. सुरवंटाचे फुलपाखरू होते ! म्हणजे फुलपाखरू कसं हातात धरलं की त्याचे रंग हाताला लागतात तसंच हिचंही असतं ! हुशार माणसाला हिच्याशी दोन मिनिटे संवाद झाल्यावर वरचे रंग उडून आत असलेला मठ्ठ सुरवंट लगेच लक्षात येतो! मग सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पहिली मुलगी असल्याने किंवा लग्नानंतर लगेच “डिफॉल्ट सेटिंग” मध्ये झाली असल्याने पुढे कॉन्फिडन्स आणि अनुभव जमा झाल्यावर “planned” असा वंशाचा दिवा first attempt मध्ये होतो! आणि आयुष्य कृतार्थ होत!

मुलं हळूहळू मोठी होत असतात. नवरा आपल्या पदरी पडलं पवित्र झालं ह्या नात्याने कॅरी ऑन करत म्हातारा होत असतो आणि ही मात्र दर वर्षी अधिकाधिक तरुण आणि “मॉर्डन” दिसायच्या प्रयत्नात विनोदी दिसत असते. त्यात तो शोभत नसलेला खोटा श्रीमंती ऍटीट्युड आणि इंग्रजी बोलणे हिचं कचकड्याची बाहुली असणं ओरडून ओरडून जगाला सांगत असतात!

तर रविवारची संध्याकाळ. मॉल मध्ये गर्दी. नवरा आणि मुलगी शांत उभे. ही थुलथुलीत पोट दाखवणारा घट्ट स्लिव्हलेस टॉप, खाली मांड्यात रुतणारी स्ट्रेच जीन्स, त्याखाली हाय हिल सँडल्स, धारावी मेड प्राडा बॅग, लालसर डाय मधून अगोचर पणे दिसणाऱ्या काही पांढऱ्या केसांना झाकत डोक्यावर सरकवलेला महाकाय गॉगल, मेकअप चे थर लिंपलेला चेहरा अश्या गेटप मध्ये! नवरा कॉलेज गँगच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये गप्पा मारत. मुलगी बापाचा हात धरून आजूबाजूला बघत. ही आणि वंशाचा दिवा किड्स सेक्शन मध्ये. ही मुलाला एक टीशर्ट घालते. मग त्याला घेऊन नवऱ्याजवळ येते. नवऱ्याला म्हणते “Jaan see no is this t-shat happening to anshil?” नवऱ्याला मेल्याहून मेल्यासारखं होत. आजूबाजूला असलेल्या हुशार लोकांना अजून एक कचकड्याची बाहुली बघायचा आणि तिचं इंग्रजी ऐकल्याचा अनुभव येतो ! चांगल्या शाळेत शिकणारी तिची लहान मुलगी डोक्याला हात लावते. ते बघून बहुतेक आपल्या घरातील कचकड्याच्या बाहुल्यांची परंपरा संपून “संसारावर पकड” ह्या ग्रंथाचे विसर्जन करायची वेळ भविष्यात येणार असते हे जाणवून नवरा थोडा सुखावतो आणि परत मोबाईल मध्ये डोकं खुपसतो! आणि आपली नायिका, मॉर्डन मम्मा एक सेल्फी काढून तिच्या किट्टीपार्टी बेस्टीच्या ग्रुपमध्ये सेल्फी पोस्ट करते “एन्जॉइंग फन विथ फॅमिली इन अमुक तमुक मॉल”!- 

लेखक : श्री मंदार जोग

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन आणि दोन बावीस… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ दोन आणि दोन बावीस… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

(अचानक मला जाणीव झाली की हे घर कोणा दुसऱ्याचं आहे, अशा अवस्थेत पाहून मला कोणीतरी ठार वेडी समजतील. माझ्या  वजनदार कपड्यांना पाहून कोणीतरी मला चोर किंवा डाकू  समजलं तर नवल नाही. मी  जरा भानावर आले.) – इथून पुढे —- 

जरा बुद्धीने  काम केले पाहिजे.  नेमकं काय करू, कागदावर फोन नंबर लिहून इथे तो ठेवून जाते.  पण माझ्याजवळ ना कागद होता ना पेन.  अशा बेचैनीच्या अवस्थेत पाय लटपटत होते.  काही हरकत नाही, घरी परत जाऊन कागद आणि पेन घेऊन यायचा  होता.  कित्येक वेळा बर्फात  पडता- पडता, वाचता – वाचता  कशीबशी मी घरी परत आले.   कागद पेन आणला त्यावर मेसेज लिहिला, कुरिअर कंपनीची चूक सांगितली  आणि माझा फोन नंबर दिला.  त्यांच्या दरवाजाच्या  कडीवर तो कागद फोल्ड करून ठेवून दिला आणि आपल्या घरी परत आले. 

घरी आल्यानंतर  दर दहा मिनिटांनी फोन चेक करत राहिले,  दरवाजा टक जरी वाजला तरी कान टवकारून ऐकत राहिले. संपूर्ण दिवस हयाच गोंधळात  गेला. माझ्या त्या चिट्ठीचं उत्तर संध्याकाळपर्यंत देखील मिळालं नाही.  ना माझा फोन वाजला ना कोणी दरवाजा वाजवला.  डोळे आणि कान  पुरते व्याकुळ झाले होते. माहित नाही काय झालं  होतं. साधारणतः  पाच वाजेपर्यंत  प्रत्येकजण कामावरून घरी येतो.  त्या घरातील लोकं पण आली असतील. कदाचित जेवण जेवत असतील,  जेवण जेवू  देत त्यानंतर जाते. 

वेळेच मोजमाप करता त्यांच्या जेवणाचा  व मेल चेक करण्यापर्यंतचा  वेळ जोडल्यानंतर  २ एवेन्यू रोडवरची माझी तिसरी चक्कर मारण्यासाठी मी ‌साडेसात  वाजता घरातून  निघाले.  ह्या वेळेस खूप आशेने बेल वाजवली परंतु आता पण काही उत्तर आलं नाही!  निराश होऊन परत निघणारच होते तेवढ्यात वरच्या खिडकीत ‌लाईट दिसून आली.  ह्याचा अर्थ घरात कोणीतरी आहे. आशेच्या ह्या किरणांनी माझ्या चेहऱ्यावर  एक वेगळीच चमक पसरली.. आता मला माझी पुस्तके मिळूनच जाणार. 

पुन्हा बेल वाजवली. काहीच उत्तर नाही.  इकडून तिकडून  फिरून यायचे.. बेल वाजवायचे आणि जोरात दरवाजा  ठोठवायचे.  साहजिकच आता माझा धीर सुटत चालला होता.  सभ्यपणाचा बुरखा फेकून माझ्या ज्या हरकती चालल्या होत्या त्या आजूबाजूचे दोन शेजारी खिडकीतून पहात होते. 

मोठालं  जॅकेट आणि कानटोपीमधून कोणीच ओळखू शकत नव्हते की ह्या पेहरावात स्त्री आहे की पुरुष,  एक चोर आहे की एक कादंबरीकार (लेखक)! आता मी उड्या मारून मारून वरती  घरात  कोणी  माणूस  किंवा माणसाची  सावली तरी दिसते  का ते पहाण्याचा प्रयत्न करत होते.  तीन मिनिटे पण झाली नसतील… पी.. पी… पी.. असा सायरन वाजत पोलिसांची गाडी येऊन थांबली. तेच झालं  ज्याची शंका होती.  त्या  घरातील  लोकांनी मला चोर-डाकू समजून पोलिसांना फोन केला होता. ह्या आकस्मिक घडणाऱ्या बदलामुळे मी अजिबात घाबरले नाही, उलट ह्या गोष्टीचा आनंद झाला की आता तरी हे लोक दरवाजा उघडतील आणि मला माझे पॅकेज देतील.  हा माझा हक्क होता.  त्या पॅकेजमध्ये जी पुस्तके  आहेत , त्यांची मी मालकीण आहे, तोच आत्मविश्वास माझ्या चेहऱ्यावर झळकत होता. 

पोलिस आॅफीसर माझ्या जवळ आला….” “काय प्रॉब्लेम आहे मॅडम,  मी असं ऐकलं आहे की, तुम्ही इथे वारंवार आला आहात. मला सांगाल कशासाठी?”

मी एकदम आरामात…”हॅलो सर ”  म्हणून त्यांना घटित घटना सांगू लागले….” सर, मी ह्याच गल्लीत २२ नंबरच्या घरात राहते.  माझं एक पॅकेज चुकून यांच्या घरी डिलीवर केलं गेलं आहे.  मला फक्त माझं पॅकेज घ्यायच आहे. हे लोक घरात आहेत तरीही दरवाजा उघडत नाहीत.  जर यांच्या घरी माझं  पॅकेज आलं नसेल तर तसं त्यांनी मला सांगावं. मी लगेच निघून जाईन. “

मी एका दमात माझी दयनीय अवस्था पोलिसांना सांगितली. पोलिस हसायला लागला.  त्याचं  हास्य खूप बालिश होतं..  जसं की बाॅम्ब फुटण्याची बातमी मिळावी ‌आणि  माहित पडावं की  छोट्या मोठ्या फटाकड्या पेटवून लोक आपला सण साजरा करत आहेत.

त्याचवेळी आतून एक सभ्य गृहस्थ आले. मी त्याला अशी टवकारून  बघू लागले जणू कोणत्या तरी भित्र्या माणसाला चांगलाच धडा शिकवण्याचा प्रयत्न  मी  केला आहे.  एवढा धडधाकट माणूस आतमध्ये होता आणि माझ्याशी बोलायची हिम्मत नाही केली ! घाबरट कुठचा ! विनाकारण पोलिसांना बोलावलं. ह्याच्यापेक्षा तर मी चांगली आहे जी  धाडसाने इथे उभी आहे. अचानक माझ्या पायामध्ये स्थिरतेचा आभास होत होता आणि अनायास चेहऱ्यावरचा रुबाब वाढला होता. 

पोलिसांनी त्याला विचारलं…” मॅडमचं एखादे पॅकेज तुमच्या घरी आले आहे का जरा बघाल.? “

तो लगेचच आत गेला आणि पाच -सात मिनिटांनी एक पॅकेज घेऊन आला आणि पोलिसांना दिलं. पोलिसाने पॅकेजला मागून -पुढून, खाली – वर पाहून मला विचारलं…” काय ह्या तुम्ही आहात”  त्यावर माझ नाव लिहिलं होतं. मी म्हटलं….” हो सर, ही माझी पुस्तके आहेत. हे बघा माझं ड्राईव्हिंग लायन्सेस.”

पोलिसाने ड्राईव्हिंग लायन्सेस आणि पॅकेजवरील नाव चेक केलं आणि माझ्या हाती सोपवलं. 

“खुप खुप धन्यवाद सर”  असं म्हणत मी त्या पॅकेजला छातीशी कवटाळलं व पोलिसांचे असे काही आभार मानले जसंकाही  कुठल्या तरी आईचं हरवलेलं  मूल मिळवण्यासाठी  त्यांनी मदत करावी.  हे असे अचानक पोलिसांच्या येण्याने आजूबाजूच्या घरातील खिडक्यामध्ये हालचाली दिसू लागल्या होत्या. 

पोलिस आपली गाडी स्टार्ट करून निघून गेले.  मी पण माझी पावलं तेजगतीने चालवत तिथून निघाले.  घरात येऊन मी पुस्तके उघडली, त्यांना आलटून पालटून पाहिलं आणि कपाटात रीतसर ठेवून दिली.  एक संपूर्ण दिवस एका वेगळ्याच त्रासात निघून गेला होता. तणाव, बेचैनी – घालमेल आणि  अविश्वासात. 

ह्या घटनेला पूर्ण एक वर्ष झालं. कपाटात ठेवलेल्या त्या दोन्ही पुस्तकांना उघडून पाहण्याची  पण वेळ आली नाही. पण ज्या दिवशी ह्या पुस्तकांना प्राप्त करण्यासाठी एवढी प्रयत्नांची शिकस्त केली होती की त्याची आठवण आजही तेवढीच डोळ्यासमोर जिवंत  होती. आज पुन्हा त्या दोन्ही पुस्तकांवर सहजच नजर पडली तेव्हा चेहऱ्यावर आपोआप हास्य झळकलं….तेच  परिचित  हास्य जे त्या दिवशी पोलिसाच्या व माझ्या चेहऱ्यावर आणि आठवणीत कैद होतं. 

दोन आणि दोन बावीसच्या मध्ये  माझ्या घरापासून ते त्या घरापर्यंत  चक्कर मारणं म्हणजे कोणा मोठ्या यात्रेपेक्षा कमी नव्हतं. बावीसच दोन मध्ये रूपांतरित होणं किती सोप्पं होतं..  परंतु दोनाचे  बावीस होणं किती कठीण !  साधं – सोप्प गणित,  आयुष्यभराचं ज्ञान किंवा एक नवीन कोडं. 

पुस्तकांना  स्पर्श  करताना  निरंतर  मोजमाप करत ; भाषा आणि अंकामध्ये  समाविष्ट  असलेल्या जीवनातील  एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर, जे मृगजळाप्रमाणे  आयुष्यभर  पळवत राहतं आणि प्रथमा पासून अंतापर्यंताच्या  मध्यावर  झुलवत  ठेवतं. 

– समाप्त – 

मूळ हिंदी कथा : दो और दो बाईस

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

अणुशक्ती नगर मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन आणि दोन बावीस… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ दोन आणि दोन बावीस… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

शेजारी आलेल्या पोलिसांच्या गाडीने मला पुरतं सावध केलं. दोन पोलिस बाहेर आले, इकडे -तिकडे त्यांनी पाहिलं आणि निघून गेले. ते निघून जाताच सहजच ते क्षण डोळ्यासमोर तरळले जेव्हा माझा पोलिसांशी प्रत्यक्ष सामना झाला होता. दोन आणि दोन बावीस ह्या अंकानी पुर्ण एक दिवस माझ्या आयुष्यातील भुतकाळात कायमचा लिहून ठेवला होता. त्या दिवशी माझ्या दोन पुस्तकांचं एक पॅकेज भारतातून टोरंटोला येणार होतं. मी सकाळपासून आॅनलाईन ट्रैक करत होते. आता इथे पोचलं, मग तिथे पोचलं. आॅनलाईनचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान पण कमी नाही. कुरिअर तिथेच आहे की पुढे निघाले आहे हे पाहण्यासाठी, दर अर्ध्या तासांनी मी चेक करायची. आणि शेवटी वेब सर्च केल्यानंतर माहित पडलं की ते पॅकेज घरामध्ये डिलीवर झालं आहे. कोणत्या घरात ! मी तर इथे आहे, इथे तर ‌कोणीच आलं नाही ! 

सुशीमचा टोमणा मला जिव्हारी लागला…. ” तुझं आणि कुठे दुसरं घर आहे काय?”

मी आधीच डोळ्यात तेल घालून वाट पहात असताना या टोमण्याने माझं अंतर्मन खूपच दुखावलं गेलं. मी अशा काही नजरेने सुशीमकडे बघितलं की त्याने गप्प बसण्यातच आपलं भलं आहे हे तो समजून गेला. पुन्हा पुन्हा ट्रैकींग नंबर चेक केला. कदाचित मी चुकीचा नंबर दिला असेल आणि नवीन सुधारणा केल्यानंतर रिझल्टचा हा मार्ग नक्की बदलेल. मी सतत क्लिक करत राहिले. ट्रैकींगचा रिझल्ट तोच येत होता. कोणताच बदल नाही. हिरव्या रंगाचा टिकमार्क ओरडून ओरडून ‌सांगत होता की पॅकेज तुमच्या घरी पोहचले आहे.

“नसत्या उपद्रवाला मी स्वतः हून आमंत्रण देते” हा आरोप घरातल्यांनी कित्येक वेळा माझ्यावर. लावलेला आहे, परंतु माझा काही दोष नसताना येणाऱ्या संकटाकडे मी कधी लक्ष दिलं नाही. आज पण हेच झालं. म्हणूनच ह्या समस्येतून निघणे माझीच जबाबदारी होती.

बाहेरचा व्हरांडा तर बर्फाने भरून गेला होता. असं वाटत होतं की कुणीतरी पोती भरभरून बर्फ आमच्या घरासमोर ओतला आहे. ह्या बर्फाच्या ढिगाऱ्यावर जरी पुस्तकांचे पॅकेज ठेवले असते तरी वरच्यावर दिसून आले असते. परंतु सहा नंबरचा चष्मा असूनही डोळ्यावर विश्वास न ठेवता मी त्याचं शोधकार्य चालू ठेवलं. दरवाजातून बाहेर जाईपर्यंतच कित्येक अडचणी आल्या. खोऱ्याने बर्फ काढून काढून आधी रस्ता बनवला. दरवाजा मोर साचलेल्या बर्फात उकरून -उकरून पाहिलं की कुठे ताज्या, बर्फाच्या थरांमध्ये पॅकेज दबून तर गेलं नसेल.

परंतु पॅकेज कुठे नव्हतंच, तर ते मिळणार कसं ! बर्फाचे इवलेसे कण इकडून तिकडे पडत असताना माझ्या हातावर पडून जणू हसत होते. असं ग्लोव्हज न घालता बर्फात हात घालण्याची कधी मी हिम्मतही करू शकत नव्हते. पण आता पॅकेज शोधण्याचं असं काही भूत माझ्या डोक्यात शिरलं होतं की माझे नाजूक हात बर्फाच्या ढिगाऱ्यात वारंवार जाताना जराही कचरत नव्हते. डोक्यातील उष्णता सरळ हातापर्यंत पोहचून थंडीलाही मात देत होती. का कोण जाणे राहून राहून मनात हीच शंका येत होती की कदाचित पॅकेज पाठवलंच नसेल.

तरीही तात्काळ ह्या शंकेचं खंडनही झालं कारण.. जर पॅकेज पाठवलंच नसतं तर आॅनलाईन ट्रैक कसं झालं असतं ! आता, जर ट्रैक होत आहे तर हयाचा अर्थ सरळ आहे की पॅकेज पाठवलं गेलं आहे आणि डिलीवर पण केलं गेलं आहे.

माझ्या रागाने आणि चिंतेने घरात भूक हरताळची वेळ आली होती. किचनमध्ये जाऊन खाना बनवण्याचे तर लांबच.. मी त्याबाबत विचार देखील करत नव्हते. आता एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे, कंपनीच्या १- ८०० नंबर वर फोन करून विचारावं.

गडबडीत फोन डायल केला. साधारणतः अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर माझा फोन उचलला. तो अर्धा तास माझा ब्लडप्रेशर न जाणे कुठुन कुठे घेऊन गेला होता. माझ्या रक्तवाहिन्या फुटण्याच्या मार्गावर होत्या. पायात एवढं बळ आलं होतं की पॅकेजच्या सर्व मार्गावर चालत, भटकत भटकत पुन्हा फोनच्या जवळ आले होते. काही वेळ रेकॉर्डेड मेसेज वाजत राहिला आणि पुन्हा म्युझिक.. नंतर कोणीतरी खूपच सुसभ्य आवाजात बोललं -‌” माझं नाव स्टीव आहे, मी आपली काय मदत करु शकतो?”

घाईगडबडीत मी त्याला भारतातून टोरंटोला पोहचणाऱ्या पॅकेजबद्दल सविस्तर सांगितले आणि अगदी शब्दांना जोर देऊन सांगितले की, ” सर, माझं पॅकेज माझ्यापर्यंत अजून पोहोचले नाही. मी घरातच होते. आपल्या आँनलाईन साईटवर ट्रैकिंगची पुर्ण माहिती नाही आहे. “

“असं होऊच शकत नाही मॅडम, तुमच्या पत्यावर, २ एवेन्यू रोडवर पॅकेज डिलीवर केलं गेलं आहे. “

“२ एवेन्यू रोड? परंतु सर, मी २२ एवेन्यू रोडवर राहते. ” 

“तुम्ही जो पत्ता दिला आम्ही तिथेच डिलीवर केलं आहे मॅडम. फोन करण्यासाठी आपले धन्यवाद. “

म्हणजे, हे चुकीच्या पत्त्यावर गेले आहे! २ एवेन्यू रोड इथेच आहे काॅर्नरवर. मी सुटकेचा निःश्वास टाकला. आता मात्र मला २ एवेन्यू रोडवर लगेचच जायला हवं आणि पॅकेज त्यांच्याकडून परत आणायला हवं. बाहेरच्या सर्दीपासून सुरक्षित राहण्यासाठी जॅकेट, ग्लोव्हज, टोपी, आणि गमबूट घालून मी निघाले. फार दूर नव्हते ते घर, परंतु बर्फाच्या घसरगुंडीवरून चालता चालता खूप वेळ लागला तिथे पोहचायला. गल्लीच्या काॅर्नरवर, २ एवेन्यू रोडवर पोहचल्यावर बघितलं.. घराच्या आजूबाजूला सगळीकडे शांतता होती. कशीबशी बर्फाचे ढिगारे पार करून मी दरवाजा जवळ पोहचले. घंटी वाजवली, दरवाजा थोपटला. चारी बाजूला पांढऱ्याशुभ्र बर्फा व्यतिरिक्त तिथे काहीच दिसल नाही. कोणताज आवाज नाही.. असं वाटत होतं की तिथे कोणीच रहात नाही, कोणी का नसेना मला फक्त पॅकेजशी मतलब आहे.

हे भगवंता, जर इथे कोणी रहातच नाही आहे तर पॅकेज घेतलं कोणी असेल! आता मात्र माझ्या पुस्तकांविरूद्ध कोणतं तरी हे षडयंत्र दिसून येत होतं… असा विचार करणे मुळात मुर्खपणाचे होते. परंतु अशा भयानक परिस्थितीत एखादा मनुष्य आणखीन काय विचार करू शकतो बरं ! डोकं अगदी वाऱ्याच्या वेगाने विचार करत होतं, आतल्या लोकांपर्यंत हा मेसेज कसा पोहचवायचा. कदाचित ह्या घरातील सगळी लोकं कामावर गेली असतील. पण जर असं असतं तर पॅकेज इथे दरवाजाजवळ असतं. आता मी माझ्या घरासारखा कोण्या दुसऱ्याच्या घराबाहेरचा बर्फ उकरून -उकरून पाहू लागले. अचानक मला जाणीव झाली की हे घर कोणा दुसऱ्याचं आहे, अशा अवस्थेत पाहून मला कोणीतरी ठार वेडी समजतील. माझ्या वजनदार कपड्यांना पाहून कोणीतरी मला चोर किंवा डाकू समजलं तर नवल नाही. मी जरा भानावर आले.

– क्रमशः भाग पहिला.

मूळ हिंदी कथा : दो और दो बाईस

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

अणुशक्ती नगर मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सामान… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ सामान… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकतीच दिवाळी होऊन गेली आणि दिवाळी निमित्ताने भारतात आलेली कीर्ती परत अमेरिकेत जायला निघाली.

आई- वडिल, सासू -सासरे इतर काही नातेवाईक यांच्या गोतावळ्यात बसलेली कीर्ती एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू घेऊन रमलेली होती.

सगळे तुला जाताना हे हवे का? ते हवे का? विचारत होते. आई- सासूबाई वेगवेगळी पिठे लोणची इ. खायचे पदार्थ द्यायची तयारी करत होते.

 कीर्ती म्हणाली किती सामानाची अदलाबदल करत असतो ना आपण••• लहानपणची भातुकली बाहुला बाहुली लग्नाचे वय झाले की सोडतो, लग्न झाले की माहेर, माहेरच्या काही गोष्टी सोडतो, लग्नानंतरही नवर्‍याची बदली, दुसरे घर बांधणे, ई काही कारणाने नेहमीच सामान बदलत रहातो. आणि मग बदल हा निसर्ग नियम आहे असे वाक्य कीर्तीला आठवले आणि आपण सतत सामान बदलतो आहे म्हणजे नैसर्गिक जीवन जगतो आहे असे वाटले.

आता सुद्धा भारतात यायचे म्हणून अमेरिकेहून काही सामान मुद्दाम ती घेऊन आली होती आणि जाताना ते सामान तिकडे मिळते म्हणून येथेच सोडून नव्याच सामानासह ती अमेरिकेला निघाली होती.

आपल्या माणसांचे प्रेम जिव्हाळा पाहून ती सुखावली असली तरी यांना सोडून जायचे म्हणून मन भरून येत होते.

कितीही निवांत सगळी तयारी केली, आठवून आठवून आवश्यक सामानाने तिची बॅग भरली तरी ऐनवेळी जाताना लगीन घाई होऊन कोणी ना कोणी अगं हे असू दे ते असू दे म्हणून तिच्या सामानात भर घालतच होते.

जाण्याचा दिवस आला आणि सगळे सामान घेऊन ती बाहेर पडली आणि गोतावळा भरल्या अंत:करणाने तिला निरोप देत होते. बायबाय टाटा करत होते आणि अरे आपले खरे सामान म्हणजे हा गोतावळा आहे आणि तेच आपण येथे ठेऊन अमेरिकेत जात आहोत या विचाराने तिच्या काळजात चर्रर्रss झाले आणि ते भाव तिच्या डोळ्यातून गालावर नकळत वाहिले.

काही जण विमानतळापर्यंत तिला सोडायला आले होते. तेथेही पुन्हा यथोचित निरोप घेऊन कीर्ती एकटीच आत गेली. फ्लाईटला अजून उशीर असल्याने वेटिंगरूम मधे बसली आणि आपली मुले नवरा तिकडे अमेरिकेत वाट पहात आहेत. तिकडे आपले घर आहे आपल्याला त्यासाठी तिकडे जावेच लागणार••• नाईलाज आहे याची जाणिव होऊन कीर्ती सावरली.

तरी तिच्या मनातून इथले क्षण, इथला परिवार त्यांचे बोलणे हसणे वागणे हे जातच नव्हते. तिकडच्या आठवणींनी जबाबदारी तर इकडच्या आठवणीतून जपलेली आपुलकी माया प्रेम दोघांची सरमिसळ होऊन मन हेलकावू लागले असतानाच तिला तिचे कॉलेजचे दिवस पण आठवू लागले•••

ती आणि विजय एकाच कॉलेजमधे वेगवेगळ्या शाखांमधे शिकत असले तरी स्पर्धांच्या निमित्ताने एकत्र येत होते. दोघांचे विचार जुळले आणि नकळत ते प्रेमात गुंतले. पण लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्या घरून कडकडून विरोध झाला आणि विजयनेही तिला सॉरी म्हणून विसरून जा म्हटले.

किती भावूक झाली होती ती••• त्यातून नकळत तिच्या तोंडून पूर्ण गाणेच बाहेर पडले होते•••

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

ओ ओ ओ ! सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं

और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है

वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

 

पतझड़ है कुछ… है ना ?

ओ ! पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट

कानों में एक बार पहन के लौट आई थी

पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है

वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

 

एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे – २

आधे सूखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी

गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो ! 

वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो।।

एक सौ सोला चांद कि रातें एक तुम्हारे कां0धे का तिल – २

गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ

झूठ-मूठ के वादे सब याद करा दूँ

सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

खरंच असे कितीतरी सामान आपण आपल्या मनातही ठेवत असतो नाही का? पण परिस्थिती आली तर अवघड असूनही ते सामानही फेकून देता आले पाहिजे. आणि तेच कीर्तीने केले असल्याने ती नव्या माणसाचे नव्या घरातले सामान त्यामधे ठेऊ शकली होती.

मग अध्यात्माने तिचे मन नकळतच भरले आणि आपल्या मनाची सफाई जो नेमाने करतो त्याचे जीवन सौख्य शांती समाधानाने भरून पावते हे वाक्य आठवले. काही लोकांबद्दलचा राग, मत्सर, हेवा ई. अनेक विकारांचे सामान मनात साठले तर शांती समाधान सौख्य ठेवायला जागा उरत नाही म्हणून वेळीच हे नको असलेले सामान बाहेर फेकून दिले पाहिजे तरच सगळे व्यवस्थित होऊ शकते. याचा अनुभव तिने घेतलाच होता.

फ्लाईटची वेळ आली आणि ती सगळे सोपस्कार करून विमानात बसली मात्र, तिला जाणवले साधा प्रवास म्हटला तरी आपण किती सामान जमवतो? आधारकार्ड, पासपोर्ट, व्हिसा, एअर टिकेट••• प्रवास संपला तर टिकेट फेकून देतो पण इतर सामान जपूनच ठेवतो.

अमेरिकेत पोहोचायला २२ तासांचा अवधी होता. कीर्तीचे विचारचक्र चालूच होते.                                                                                                                                                                                                                                                                                                                                         तिच्या बाजूच्या सीटवरील व्यक्ती सांगत होती, त्या व्यक्तीचे वडील काही दिवसांपूर्वी वारले आणि त्यासाठी सगळी महत्वाची कामे सोडून त्या व्यक्तीला भारतात यावे लागले होते.

पल्याच विचारात गर्क असलेली कीर्ती अजून विचारात गढली गेली. जाणारी व्यक्ती निघून गेली पण तिने जमा केलेली माया मालमत्ता स्थावर जंगम हे सगळे इथेच सोडून गेली की••• हौसेने, जास्त हवे म्हणून, आवडले म्हणून, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून, आपल्या माणसांना आवडते म्हणून आयुष्यभर माणूस कोणत्याना कोणत्या कारणाने सामान जमवतच जातो पण तो••• क्षण आला की सगळे सामान येथेच ठेऊन निघूनही जातो•••

तेवढ्यात तिला आठवले कोणीतरी सांगितले होते की परदेशात जायचे तर तिथली करंन्सी न्यायला लागते. मग इथले पुण्यकर्म हीच परलोकातील करन्सी असल्याने हे पुण्यकर्माचे सामानच जमवले पाहिजे.

ती अमेरिकेत पोहोचली होती पण आता ती पुण्यकर्माचे आधारकार्ड, स्वर्गाचा व्हिसा आणि सुगुणांचा पासपोर्ट हे सामान जमवण्याच्या विचारातच

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गरज संवादाची… ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ गरज संवादाची… ☆ श्री मयुरेश देशपांडे

“काय गं आज इकडची वाट कशी चुकलीस?”

“म्हणजे काय? येते मी आधनं मधनं”

“हो का! आणि मग इथे बाहेर काय करतीयेस? आत नाही यायचं?”

“आतल्याशीच तर झगडा मांडून बसलीये इथे बाहेर. तुम्ही करा त्याची आरती. पण माझी मात्र माती केली आहे त्याने. “

“अगं ए अस काही बाही बोलू नये. तो कोपला की काय होतेय माहितीये ना. “

“आणखी काय कोपायचा बाकी आहे? इतका चांगला अभ्यास केला, इतकी मेहनत केली, एकीकडे संसार, एकीकडे व्यवहार आणि एकीकडे अभ्यास अशा तीन तीन दगडांवर पाय ठेवून, सॉरी पाय रोवून उभी होते मी. पण हाती काय लागले? आज तीनही दगड लाटांबरोबर दूर वाहून गेले आहेत. आणि मी मात्र किनाऱ्यावर वाळूशी खेळत बसली आहे. “

“ए वेडा बाई, काय झालं आमच्या झाशीच्या राणीला? अगं अख्ख्या पंचक्रोशीची आदर्श तू आणि तूच असे अवसान गाळून बसलीस तर कसे चालेल? काय झाले सांग पाहू. “

“तू ऐकशील माझे? बोलशील माझ्याशी”

“हो! का नाही! सांग काय अडचण आहे तुझी?”

“माझ्याशी कोणी बोलायला नाही हीच माझी मोठ्ठी अडचण आहे. “

“परिक्षा जवळ आली म्हणून जरा घराकडे दुर्लक्ष झाले तर ह्यांची चीडचीड. परिक्षेनंतर चार दिवस कुटुंबाबरोबर घालवले तर तिकडे बॉसची चीडचीड. परिक्षेचा निकाल आला, गरजे इतके मार्क नाही मिळाले, पदोन्नतीची संधी हुकली, म्हणून स्वतःशी चीडचीड. आता तूच सांग काय करू? जगणे नकोसे झाले आहे? जीव द्यावासा वाटतो. मी सगळ्यांनाच नकोशी झाली आहे, अगदी स्वतःलासुद्धा. “

“बापरे तुझ्या समस्या तर त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा मोठ्या. बरे आत गेली नाहीस, नाहीतर तोही चक्कर येऊन पडला असता. “

“ए तू चेष्टा करू नकोस माझी. म्हणूनच मी कोणाला काही सांगत नाही आणि माझेही कोणी ऐकत नाही. “

“असे नाही गं, तुझाच जरा ताण हलका व्हावा म्हणून चेष्टा केली. आता हे बघ, आपण म्हणतो ऐकावे जनाचे करावे मनाचे. बरोबर?”

“हो पण त्याचे काय इथे?”

“होते काय, आपण करावे मनाचे लक्षात ठेवतो पण ऐकावे जनाचे हे विसरून जातो. मग आपण कोणाचे ऐकत नाही आणि म्हणून कोणी आपले ऐकत नाही. “

“आता हे काय नवीन?”

“कसं असत ना बघ भले आपण समोरच्याच्या मनाप्रमाणे करो अथवा ना करो पण त्याचे ऐकून घेत आहोत हे दाखवणे व त्याची जाणीव करून देणे गरजेचे असते. आता तुझेच बघ, तू निराश आहेस कारण कोणी तुझे ऐकत नाही, तुझ्याशी कोणी बोलत नाही. “

“बघ नां!”

“हो पण तू सगळ्यांचे ऐकून घेतेस का? संवाद साधतेस का? अगदी आत्ता माझ्याशी मन मोकळे करत आहेस तसे. आपल्या माणसाशी मन मोकळे करणे महत्वाचे बघ. एकदा का मनातले बोलून टाकले की मन कसे हलके होते. आणि हो या हलक्या झालेल्या मनाला समोरच्याच्या सुचना वजा सल्ल्यांनी भरून टाकायचे. कृती करताना त्यांचाही विचार करायचा. “

“पण तेच कसे जमणार. “

“सोपे आहे. आता इथून घरी जा. नवऱ्यासमोर बस. आणि त्याला तुझ्या पुढच्या नियोजनाविषयी सांग. अगदी या आत्ताच्या अपयशापासून. यात त्याची बाजू ऐक. तुझी बाजू सांग. आणि दोघे मिळून पुढचे नियोजन करा. मग उद्या कामावर गेलीस की बॉसशी पण थोड्या वेळ बोल. कामात दिरंगाई कशामुळे झाली ते सांग. त्यांच्या अपेक्षा विचार. तुला त्यांचे हवे असलेले सहकार्य सांग आणि मग नव्या जोमाने कामाला सुरूवात कर. तुझ्या या दोनबाजू पक्क्या झाल्या की मनाला कशी उभारी येईल बघ. या नव्या उभारीतुनच अभ्यासासाठी तयारी कर. पुन्हा प्रयत्न कर. यावेळी नक्की यश मिळेल बघ. “

“ताई तू किती छान शब्दांत समजावलेस. नाहीतर आज मी स्वतःला संंपवून टाकायचे ठरविले होते. अगदी त्याच विचाराने इथे आले होते. किंबहुना म्हणूनच आत जायची हिंमत होत नव्हती. त्या विध्यात्याकडेच पाठ फिरवून बसले होते. पण मी आत आले नाही, म्हणून तोच बाहेर आला तुझ्या रूपाने. “

“तुझे आपले काहीतरीच. “

“नाही ताई. मी आत्ता आत जाते. त्याला नमस्कार करते. आणि बाहेर येऊन नव्याने सुरूवात करते. अगदी तू सांगितलीस तशी.”

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किरण… – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ किरण… – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे

(आजारावर नियंत्रण मिळालेय ही खात्री झाल्याने मलाही धीर वाटला आणि याचा परिणाम म्हणून माझी शारीरिक रिकव्हरी वेगाने होऊ लागली.) – इथून पुढे — 

कॅन्सर चोर पावलाने प्रवेश करीत असतो, ही या रोगाची विशेषता जाणूनच डॉक्टरांनी दोन डोस रेडिएशन (अर्थात किरणोपचार) चा सल्ला दिला. पण किरणोपचार किंवा रसायन उपचार दोघेही अतिशय तीव्र वेदनादायी उपचार असल्याने माझे तर अवसानच गेले. “नाही, नकोत मला हे उपचार. वाटल्यास मला मारून टाका. पण या उपचारांना सामोरे जायला सांगू नका. ” – माझा आक्रोश सुरू झाला होता.

“ताई घाबरण्याचं कारण नाही. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने आधुनिक उपचार पद्धती ही बऱ्याचशा सुकर झाल्या आहेत, कमी त्रासदायक आहेत. पण तुमची इच्छा नसेल तर आपण दर तीन महिन्यांनी पहिल्या वर्षी सोनोग्राफी रिपोर्ट करूया आणि पुढील चाल वर्षे दर सहा महिन्यांनी. आमच्या फॉलोअप रेग्युलर राहिला तर आजाराचे निदान आजाराची कुणकुण आमच्या सहजपणे लक्षात येईल. त्यामुळे काळजी करू नका. आज तुम्ही रोगमुक्त आहात. पुढेही तसेच घडेल. आता तुम्ही तुमच्या कामावर रुजू ही होऊ शकता. मी मेडिकल व फिटनेस सर्टिफिकेट तयार करून देतो. “

माझे दैव बलवत्तर होते, म्हणून स्वर्गाकडे एक पाऊल पुढे पडूनही मी पुन्हा पृथ्वी तळावर परतले होते. एकाच जन्मात पुन्हा नव्याने जन्मण्याचा अनुभव मी घेतला होता. आयुष्याचा बोनस मिळाला होता. आता आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा. कोणतीही चिंता, काळजी करायची नाही हे मी मनोमन ठरवले. पण माझं मन, माझ्या अंतरात्मा मला आवाज देऊ लागला. “तू तर या आजारातून बरी झालीयेस, कॅन्सरला हरवलेस, आयुष्याचा बोनस मिळवला आहेस, आता या आयुष्याचा उपयोग तुझ्या सारख्या कर्करोगाने त्रस्त लोकांसाठी का करत नाहीस?” आणि माझ्या या अंत:स्थ प्रेरणेतूनच “कॅन्सर ची लढा एक पाऊल पुढे” चा जन्म झाला. माझ्यासारखे पीडित कर्करोगग्रस्त बंधू भगिनीं ही हळूहळू या संस्थेची जोडले जाऊ लागले. प्रत्येकाचे अनुभव कथन, आजाराशी दिलेली झुंज याची देवाण-घेवाण होऊ लागली. अर्थात कर्करोगा विषयी जनजागृती होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण भारतासारख्या देशात कर्करोगग्रस्तांचं वाढलेलं प्रमाण व त्यायोगे होणारे मृत्यू अधिक प्रमाणात असल्याचं कारण कर्करोगाचे उशिरा होणारे निदान. आजार वाढल्यानंतर किंवा शारीरिक त्रास अधिक प्रमाणात वाढल्यानंतरच आपण डॉक्टरांकडे जातो. कर्करोगाचे निदान होईपर्यंत या रोगाने शरीरात आपले स्थान खूपच मजबूत केलेले असते. साधारणपणे तिसऱ्या व चौथ्या ग्रेड मधील कर्करोगावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. यासाठी कर्करोगाचे लवकर निदान होणं गरजेचं आहे. यासाठी जनजागृती महत्त्वाची. तेच काम आमची संस्था करते. यासाठी विविध प्रकारचे कर्करोग, त्यांचं स्वरूप, त्यांची होणारी वाढ, हे स्लाईडशो अर्थात चलचित्रद्वारे आम्ही विविध कार्यक्रमातून दाखवतो. कर्करोगावरील विविध चर्चासत्रांचे आयोजन आमची संस्था करते. यासाठी कर्करोग तज्ज्ञांना निमंत्रित केले जाते.

तसेच प्रत्येक वयाची चाळीस वर्षे पार केलेल्या व्यक्तीने मग ती निरोगी असली तरी त्यांनी आपली शारीरिक तपासणी वर्षातून एकदा तरी अवश्य करावी. अनेकदा आपल्याला काही शारीरिक व्याधी न जाणवताही गंभीर आजाराचे निदान या तपासणीतून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

समाज प्रबोधन होण्यासाठी जागतिक कर्करोग दिनी आमच्या संस्थेने मॅरेथॉन स्पर्धेचे ही आयोजन केलं होतं. शालेय विद्यार्थ्यांपासून तर अनेक ज्येष्ठ नागरिक ही या मॅरेथॉन मध्ये सामील झाले होते.

“खूपच छान तुमचं समाज प्रबोधन, जनजागृती, निश्चितच कर्करोगग्रस्तांना तर उपयोगी आहेच पण कर्करोगाला रोखण्यात ही फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रेमाताई तुमचा हातभार फार महत्त्वाचा आहे. “

“नाही माधुरीताई, मी खूप काही मोठं काम करतेय असं नाही. पण खारीचा वाटा मात्र जरूर उचललाय. ” माधुरीताई अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न असतात आजाराविषयी, उपचार पद्धती विषयी, त्यास जाणून घ्यायचे असते. कर्करोग म्हणजे काय? तो कशामुळे होतो? तो ओळखावा कसा? त्याच्यावर प्रभावी उपचार कोणते? या उपचारांचे दुष्परिणाम कोणते? यासारखे अनेक प्रश्न रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात गर्दी करतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी डॉक्टरांकडे पुरेसा वेळ नसतो. प्रश्नांची उत्तरे टाळली जातात किंवा सविस्तरपणे दिली जात नाहीत. मिळालेल्या उत्तरांनी रुग्णांचे, नातेवाईकांचे पूर्ण समाधान होत नाही. आणि रुग्णांची ही अडचण ओळखूनच आमच्या संस्थेने विविध प्रकारचे कर्करोग व त्यावरील प्रभावी उपचार सांगणारी पुस्तक मालिकाच तयार केलीय. अनेक कर्करोगग्रस्त रुग्ण व नातेवाईकांनी त्यांना या पुस्तकांचा बराच उपयोग झाल्याचे अनेकांनी कळविले आहे.

“प्रेमाताई, हे फार मोठे कार्य करीत आहे आपली संस्था. कर्करोग ग्रस्तांना या पुस्तक मालिकांचा उपयोग निश्चित होतोय. “

“माधुरीताई, सांगायला मला आनंद होतोय की, मी लिहिलेले “कर्करोग काळोखातून प्रकाशाकडे’ हे मी व माझे सहकारी यांचे स्वानुभवावरचे पुस्तक लवकरच प्रकाशित होतंय. कर्करोग ग्रस्तांना ते निश्चितच प्रेरणा देणारे ठरणार आहे. “

प्रेमाताईंचे कर्करोग व त्यावरील विवेचन त्यांची संस्था करीत असलेले कार्याविषयी आपण जाणून घेतले. आपणास त्यांच्याशी संपर्क करायचा असल्यास त्यांचा दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक आम्ही देत आहोत. ते आपण टिपून ठेवावे.

प्रेमाताई आपण व आपली संस्था करीत असलेले कार्य कर्करोगाच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे. कर्करोगापासून व कर्करोग्यांपासून ही लोक चार हात लांब राहणचं पसंत करतात. कर्करोगाचा संशय देखील मनाचा थरकाप उडवतो. कर्करोग हा अप्रिय शब्द कानावरही पडू नये असेच सर्वसामान्यांना नेहमीच वाटते. तरीही काहींना कर्करोग हा गाठतोच. अशावेळी रुग्णांनी गर्भगळीत न होता कर्करोगाला सामोरे जाणे हे त्यांच्याच हिताचे असते. सर्वसामान्यांकडून नाकारल्या जाणाऱ्या कॅन्सर ग्रस्तांना आपण मदतीचा हात देतात, त्यांचे मनोधैर्य वाढवतात हे खरोखरीच अतुलनीय कार्य आहे. कर्करोग्यांसाठी प्रेमाताई व त्यांचे सगळे सहकारी प्रकाशाची एक एक किरण ज्योती आहेत ज्या या रुग्णांच्या जीवनात पुनश्च आशेचे किरण जागवून कर्करोगाला सामोरे जाण्यात त्यांची मदत करतात. त्यांचे मनोधैर्य वाढवितात. समाज प्रबोधन, विचार जागृती करून कर्करोगाचे लवकर निदान, उपचार आणि कर्करोगा चे नियंत्रण यावर प्रभावी मार्गदर्शन करतात. अशा प्रत्येक शहरात, गावात किरण ज्योती निर्माण झाल्यास आपण या आजारावर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी होऊ शकतो हे आजच्या “स्वस्थ भारत” या कार्यक्रमातून आपण जाणून घेतले आहेच.

“प्रेमाताई, आपण येथे आलात कर्करोग, व त्याविषयीची जनजागृतीसाठी आपण स्वतः व आपली संस्था करीत असलेले कार्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत जी आमच्या प्रेक्षकांना निश्चितच मदत करणारी आहे; अनेक कर्करोग ग्रस्तांना यातून दिलासा मिळाला असेलच. मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करते. दूरदर्शनचे व हजारो प्रेक्षकांचे मीही आभार मानते. “

…. फुलांचा बुके माधुरीताईंनी माझ्या हाती दिला. एक विजयी हास्य माझ्या चेहऱ्यावर होते.

— समाप्त —

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किरण… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ किरण… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे

(“शोभाताई, तुम्ही स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्या. तुम्ही सांगितलेली लक्षणे सर्वसाधारण आजाराची ही असू शकतात. पण रक्तस्त्रावासाठी स्त्री रोग तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यातून काही निष्पन्न झाल्यास आपला इलाज अवश्य करून घ्या”.) – इथून पुढे 

प्रेमाताई, “स्त्रियांना गर्भाशय आणि स्तन कॅन्सरला फार मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते ? नाही का?”

होय माधुरीताई, स्त्रियांना गर्भाशय! गर्भाशय मुख, स्त्री विजांड कोश, आणि स्तन कॅन्सरचा सामना करावा लागतो तर पुरुषांना तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसांचा कॅन्सर होतो. विशेषतः व्यसनी व्यक्ती ज्या तंबाखू बिडी सिगारेटचे सेवन करतात. दारू आणि तत्सम पदार्थांचे सेवन करतात. त्यांना तोंडाचा, जबड्याचा, घशाचा कॅन्सर हमखास होतो. म्हणून तंबाखूचं सेवन टाळणं, धूम्रपान न करणं, दारू वर्ज्य करणं फार गरजेचं आहे. यासाठी विचार जागृती, समाज जागृती होणं गरजेचं तर आहेच पण प्रत्येक व्यक्तीनं सामाजिक जबाबदारी म्हणून हे कार्य हाती घेतलं तर उद्दिष्ट गाठणं सुकर होईल. सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा लिहून सरकार मोकळे होते आणि दुसरीकडे बराच महसूल या उत्पादनांमुळे मिळत असल्याने त्याला खुली बाजारपेठ ही देते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहून स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे.

कॅन्सरच्या कोणत्या प्रकारांमध्ये मृत्यू ओढवतो हे आमच्या प्रेक्षकांना सांगा प्रेमाताई.

खूप छान प्रश्न विचारलात माधुरीताई. काही कॅन्सर जीव घेणे असतात किंवा त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण असते ते आहेत, प्रथम क्रमांकाच्या कॅन्सर फुफ्फुसांचा असतो. दुसरा क्रमांक लागतो जठराच्या कॅन्सरचा. माधुरीताई तिसरा क्रमांक लागतो यकृताच्या कॅन्सरचा. चौथा क्रमांक लागतो तो आतड्यांच्या कॅन्सरचा. पाचवा क्रमांक लागतो तो अन्ननलिकेच्या कॅन्सरचा. त्यामुळे या प्रकारच्या कॅन्सरचे लवकर निदान होणे आणि त्यानुसार रुग्णांचा इलाज होणे गरजेचे ठरते की जेणेकरून या आजारावर नियंत्रण मिळवता येईल. याव्यतिरिक्त मेंदूतील ट्युमर, शरीरावर होणाऱ्या गाठी, युरीन ब्लॅडर, गुद् मार्गाचे कॅन्सर ही असतात. जवळ जवळ दोनशे प्रकारचे कॅन्सर असतात. काही जलद गतीने वाढणारे असतात तर काही धीम्या गतीने वाढणारे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरचं लवकर निदान होणं फार गरजेचं. जेवढं निदान लवकर तेवढं या रोगांवर नियंत्रण मिळवणं सोपं आणि रुग्णांचे आयुष्य वाढणं सहज शक्य होतं.

“प्रेमाताई आपण स्वतःही या जीवघेण्या आजारावर मात केलीय आणि या स्वानुभवातूनच तुम्ही “कॅन्सरशी लढा विजयाकडे एक पाऊल” या संस्थेची स्थापना केलीत. तुम्ही स्वतः आणि या संस्थेची जोडली गेलेली प्रत्येक व्यक्ती एक किरण बनून हजारो कॅन्सर रुग्णांच्या जीवनात नवप्रकाश फैलावत आहात त्यांची मदत करीत आहात. याविषयी थोडं विस्तारांनं सांगा.

अवश्य माधुरीताई. मला कॅन्सर होणं हा माझ्यासाठी ही जीवघेणा अनुभव होता. आणि मी भूतकाळाच्या उदरात शिरून एक एक अनुभव कथन करू लागले.

आम्हा स्त्रियांचा पिंडच तसा. दुखणे अंगावर काढण्याचा. जवळजवळ एका वर्षापासून मला बरं नव्हतं. तापाची कणकण वाटणं, भूक मंदावणं, अतिशय थकवा जाणवणं, निरूत्साही वाटणं, रात्री शांत झोप न लागणं आणि या सगळ्यात महत्त्वाचं मला रक्तस्राव होत होता. सुरुवातीला हे रक्तस्त्रावाचं प्रमाण कमी होतं. त्यात सातत्यही नव्हतं. काही दिवस कोरडेही असत. पण नंतर माझा त्रास वाढू लागला तसे माझे धैर्यही सुटू लागले. मार्च एंड मुळे माझ्या ऑफिसातील कामातून सवड मिळत नव्हती. माझी रजा ही मंजूर होत नव्हती आणि त्यामुळे जास्तच हतबल झाले होते. मार्च महिना संपला. यावेळी आमच्या बँक शाखेला चांगला घसघशीत नफाही झाला होता.

“सर, माझी तब्येत बरी नाही आणि या एप्रिल महिन्यात मला सुट्टी हवी. मुंबईला जाऊन माझं चेकअप करायचंय. “

“ओके मॅडम, आता काही अडचण नाही. आपण पाहिजे तेवढी रजा घ्या. आपलं चेकअप करून घ्या. इलाजही करून घ्या. आणि महत्त्वाचं काळजी करू नका. चिंता सोडा. सगळं चांगलं होईल. ” 

“थँक्यू सर, आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. “

सोनोग्राफीतच माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. गर्भाशयात पाच सेंटीमीटर ची लांब, रुंद अशी मोठी गाठ होती. पण ही गाठ कॅन्सरची आहे की अन्य कशाची यासाठी एमआरआय करणं किंवा बायोप्सी करणं गरजेचं होतं. एम आर आय मध्ये हे चित्र अधिक सुस्पष्ट झालं. ती गाठ कॅन्सरचीच असून दुसऱ्या ग्रेडची होती.

माझा हा मेलीग्नन्स युटेरियन कार्सिनोमा जीव घेणा आहे की नियंत्रणात येण्याजोगा याचे निदान तर शस्त्रक्रिये नंतरच ठरणार होतं. आजार कितपत पसरलाय किंवा नाही यासाठी लिम्फनोड्स अर्थात लसिका ग्रंथींचं परीक्षण होणं गरजेचं होतं.

आजाराचं निदान ऐकताच तर माझ्या पायाखालची जमीन जणू सरकली होती. मृत्यूच्या पूर्वीचं स्टेशन लागलं होतं. आता माझ्या हातात माझ्या आयुष्याचा किती काळ शिल्लक होता हेच पाहणं महत्त्वाचं होतं. माझे कुटुंबीय, माझे हितचिंतक, शुभचिंतक, माझा मित्र परिवार मला धीर देण्यासाठी एकवटला होता.

कामगार कल्याण केंद्र संचालक विलास पाटील म्हणाले – “मॅडम, तुमच्या आजाराविषयी अतुल चित्रे माझे सहकारी यांनी कळविले. मॅडम, तुम्ही तर आम्हाला शॉकच देताय हा. पण मॅडम तुम्ही घाबरून जाऊ नका. लवकर बऱ्या व्हा. आणि पुन्हा आपल्या कामगार कल्याण केंद्राच्या विविध कार्यक्रमात सामील व्हा. आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या बरोबर. ” “धन्यवाद पाटील सर, तुमच्या प्रेम आपुलकीने भरलेल्या शुभेच्छा नक्कीच माझ्या कामी येतील. ठेवते फोन. “

माझे कवी मित्र सदानंद गोरे म्हणाले होते; “मॅडम, घाबरून जाऊ नका. अहो कवी जवळ तर मनाच्या कणखरपणा, आत्म्याची शक्ती असते. या संकटातून तुम्ही नक्कीच सही सलामत बाहेर याल असा विश्वास आहे माझा. ” “सर, तुमच्या विश्वासावर विश्वास आहे माझा. परमेश्वर कृपेने तसेच घडो. ” “घडणारच मॅडम जीवनाकडे पाहण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमची हार, तुमचा पराजय नक्कीच होऊ देणार नाही. “

“माई, रडू नकोस तुझ्यासाठी जगातील प्रत्येक डॉक्टरांना मी इंटरनेटवरून हाक देईन आणि तुझ्या आजारावर कशी मात करता येईल शोधून काढील. भलेही या कामात माझ्या आयुष्याची सगळी जमापुंजी खर्च पडली तरी बेहतर पण माझी बहीण माझ्यासाठी अनमोल आहे. ” माझ्या मोठ्या भावाचे हे धीरोदत्त शब्द माझे बळ वाढवीत गेले आणि ऑपरेशन टेबलवर जाण्यासाठी माझे मनोधैर्य वाढत गेले.

ऑपरेशन नंतर पाच-सहा दिवसांनी माझ्या शरीरापासून विलग केलेल्या अवयवाचा रिपोर्ट मिळाला. लसिका ग्रंथी नॉर्मल होत्या. म्हणजे रक्त प्रवाह पर्यंत कॅन्सर पसरला नव्हता. तो फक्त स्थानिक त्या अवयवापुरताच मर्यादित होता. रिपोर्टचे विश्लेषण वाचल्यानंतर कुटुंबीयांसह मलाही धीर आला. आणि गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून मनावर आलेले दडपण कमी झाले. आजारावर नियंत्रण मिळालेय ही खात्री झाल्याने मलाही धीर वाटला आणि याचा परिणाम म्हणून माझी शारीरिक रिकव्हरी वेगाने होऊ लागली.

– क्रमशः भाग दुसरा 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किरण… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ किरण… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

” नमस्कार, आजच्या आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. विविध आजार व त्यावरील उपचार मार्गदर्शन आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन औषधोपचार. झाले की आजार बऱ्यापैकी नियंत्रणात येतो. कॅन्सर एक जीवघेणा आजार. साक्षात मृत्यूदंडाची शिक्षा विधात्याने दिलीय असे वाटते. परंतु आजकाल विविध संशोधित औषधे. केमोथेरेपी, रेडिएशन, ऑपरेशन, स्टेमसेलद्वारे केले जाणारे उपचार, बर्‍याच प्रमाणात विकसित झालेलं आधुनिक तंत्रज्ञान. यामुळे हा आजार. बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात आला आहे. आणि कॅन्सर हाही एक आजार आहे. मृत्यूदंड नाही. हे आपण म्हणू शकतो. या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी. आज आमच्या भेटीला आल्या आहेत, प्रेमाताई. प्रेमाताई कोणी डॉक्टर किंवा कॅन्सर तज्ज्ञ नाहीत. त्या स्वतःच या जीवघेण्या आजारातून गेलेल्या आहेत. तर आपण स्वागत करुया प्रेमाताईंचं.

प्रेमाताई नमस्कार. “स्वस्थ भारत”च्या आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत.

“नमस्कार माधुरीताई आणि सर्व श्रोतुवर्गाला”

प्रेमाताई आज आपण कॅन्सरविषयी बोलणार आहोत. आपण कशा काय या सामाजिक कार्याकडे वळलात, आणि आपण कशाप्रकारे कार्य करतात हे आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे.

माधुरीताई, कॅन्सरचे निदान झाले म्हणजे भल्याभल्या लोकांची भीतीने गाळण उडते. मला कॅन्सर झालाच नाही? मला कॅन्सर होईलच कसा? मला कॅन्सर होऊच शकत नाही. ? हीच प्रतिक्रिया सर्वसामान्य रुग्णांची असते. सत्य पचवणं कोणालाही सहजी शक्य होत नाही. या जीवघेण्या आजाराचे निदान झाले की रुग्ण चिंतेने,साक्षात मृत्यू समोर पाहून ग्रस्त होतो. “माझं सगळं संपलंय. काय करावं मी?” ही त्याची धारणा होऊन बसते. रुग्ण शरीराने तर थकतोच पण त्याहीपेक्षा तो मनाने थकतो. अशा स्थितीत रुग्णांना सर्व समजावून सांगणं त्यानुसार त्यांची मनोभूमिका तयार करणं गरजेचं असतं. आजकालच्या वाढत्या शहरीकरणातील प्रत्येकाचं जीवनाचं घाईगडबडीचं झालंय. रुग्णांना डॉक्टर पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे रुग्ण हतबल होतो. मात्र मनात अनेक प्रश्नांचं जाळं पसरलेलं असतं आणि त्याचं मन त्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटत जातं. अशावेळी त्याला गरज असते धैर्याची, प्रेमाची, मायेच्या ओलाव्याची आणि त्या आजाराविषयी जाणून घेऊन त्याचे मनोधैर्य वाढवण्याची, जेणेकरून या आजाराचा सामना तर रुग्ण करेलच व गरजेनुसार सगळ्या औषधोपचार व अन्य थेरेपीसाठी तो तयार होईल. आणि या उदात्त हेतूने “कॅन्सरशी लढा विजयाकडे एक पाऊल” या संस्थेचा उदय झाला.

माधुरीताई, मी स्वतः या कॅन्सरशी लढा दिला आहे. आणि माझ्यासारख्या अनेक भगिनी आणि बंधूं देखील ज्यांनी कॅन्सरशी लढा देऊन विजयी मात केली आहे. त्या सगळ्यांच्या सहकार्यातून या संस्थेची निर्मिती झालीय.

अगदी छान प्रेमाताई. संस्थेची स्थापना आणि कार्य, माहित झाले. पण तुमच्या कामाचे स्वरूप आपल्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगाल का?

होय माधुरीताई. पहिल्यांदाच मी स्पष्ट करू इच्छिते की या संस्थेचे कार्यकारिणी नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य असे पदाधिकारीही नाही. संस्थेला येणारी प्रत्येक व्यक्ती संस्थेत. समसमान असेल तिच्या कार्याचे स्वरूपही समान असेल. विशेषता त्या व्यक्तीने कॅन्सरशी दिलेला लढा आणि त्याचा सामना करून मिळालेला विजय, या दरम्यानचे त्या व्यक्तीचे कटु-गोड अनुभव जे दुसर्‍यांना प्रेरणादायी ठरतात यांचा समावेश असतो.

डॉक्टर रुग्ण यांच्यात पाहिजेत तसा संवाद होत नाही. रुग्णांच्या प्रत्येक प्रश्नांचं समाधानकारक उत्तर मिळेल याची अपेक्षा नसणं आणि एकंदरीतच भांबावलेला, हवालदिल झालेला, नैराश्यानं ग्रासलेला, रुग्ण शेवटी काय होणार माझं? कसं होणार ? किती दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे माझं ? अशा अनेकविध प्रश्नांनी चिंतीत होतो, पण उत्तर शून्य. अशा रुग्णांचं काउंसिलिंग आम्ही करतो. त्यांचे मनोधैर्य वाढवतो, कॅन्सर हा जीवघेणा नसून तो पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो हे आम्ही त्याला पटवून देतो. तशी त्याची मनोभूमिका तयार करतो जेणेकरून ती व्यक्ती या आजाराचा धैर्याने सामना करून त्यात यशस्वी होईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.

प्रेमाताई कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असं विधान आपण केलंत, ते कितपत शक्य आहे ?

माधुरीताई, कॅन्सरचे लवकर निदान होणं यासाठी फार गरजेचं असतं. साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्या ग्रेडच्या कॅन्सरमध्ये हे शक्य होतं. तिसऱ्या ग्रेडच्या कॅन्सरमध्ये चॅन्सेस सर्व साधारणपणे 50:50 होतात. आणि चौथी शेवटची ग्रेड मात्र जीवघेणी ठरू शकते. म्हणूनच कॅन्सरचं निदान लवकर होणं फार गरजेचं आहे. पण होतं काय की रुग्णाला काही त्रास न होता, हा रोग शरीरात छुप्या पद्धतीने आगमन करून आपलं साम्राज्य हळूहळू फैलावत राहतो. जेव्हा रुग्णाला त्रास होऊ लागतो, वेदना जाणवू लागतात तोपर्यंत या आजाराने बरीच पुढची मजल गाठलेली असते. आणि आपले निदान उशिरा झाले अशी पेशंटची धारणा होते.

यासाठी मी एवढंच सांगू इच्छिते की वयाच्या चाळिशीनंतर प्रत्येक स्त्री पुरुषाने वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण शारीरिक तपासणी करून घ्यावी जरी काही त्रास होत नसला तरी. विशेषतः आमच्या भगिनी की ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते त्या मात्र प्रकृतीची हेळसांड करतात. दुखणे अंगावरच काढत राहतात. अनेकदा गर्भाशय,स्तन कॅन्सरशी संबंधित आजार लज्जेपोटीही लपविले जातात आणि जेव्हा तीव्र स्वरूपाचा त्रास होऊ लागतो तेव्हा आजाराने डोके बरेच वर काढलेले असते की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. म्हणून “कॅन्सरचे जितक्या लवकर निदान तितकं त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं” म्हणता येईल. इतकंच नव्हे तर कॅन्सरला रुग्णाच्या शरीरातून हद्दपार करण्यात यश येऊ शकते; आणि रुग्ण पुन्हा आपले नव जीवन आनंदानं जगू शकतो. आयुष्याच्या हा बोनस त्याचा आनंद द्विगणित करीत असतो. बोनसचा आनंद आपणा सर्वांना जसा मिळतो तसा हा जीवनाचा बोनस त्या व्यक्तीच्या जीवनी नवी पहाट, नवी उमेद,नवी आशेची किरणे, एक नवं संजीवनी बनून येत असतो.

खूपच छान प्रेमा ताई तुम्ही सविस्तर विश्लेषण करून प्रेक्षकांना पटवून दिलेले आहे. आमचे सूज्ञ प्रेक्षक याचा नक्कीच विचार करतील. प्रेमाताई “अहमदनगरहून शोभा कानडे चा फोन येतोय आपण हा फोन कॉल घेऊ या”, “अवश्य”

“नमस्कार” 

“नमस्कार- तुमचा प्रश्न विचारा” “नमस्कार शोभाताई तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत तुमचा प्रश्न विचारा. ” “ताई मला तापाची बारीक कणकण वाटते भूक मंदावली आहे. शारीरिक थकवा जाणवतोय आणि थोड्या प्रमाणात रक्तस्त्रावही होतोय. “

“शोभाताई, तुम्ही स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्या. तुम्ही सांगितलेली लक्षणे सर्वसाधारण आजाराची ही असू शकतात. पण रक्तस्त्रावासाठी स्त्री रोग तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यातून काही निष्पन्न झाल्यास आपला इलाज अवश्य करून घ्या”.

क्रमशः भाग पहिला

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares