मित्र हो, शारदारमणांची सेटी बघितलीत आपण ? थोडी-थोडकी नाही, चांगली पन्नास हजारांची सेटी आहे. एकदा तरी बघून याच आपण!
शारदारमण म्हणजे आपले ते हो, गेल्या वर्षी सर्वाधिक शब्द (४०,४०, ०००) वर्षात लिहिले, म्हणून गिनीज बुकमध्ये ज्यांचं नाव नोंदवलं गेलं. होतं ते. त्यानंतर गप्पा-टप्पा करताना त्यांची मित्रमंडळी म्हणाली, ‘तुमचा कविता संग्रह छापलेला नाही आहे, हे काही बरोबर नाही. जर तो छापला गेला असता, तर जास्तीत जास्त कविता लिहिणारा कवी म्हणून तुमचं नाव गिनीज बुकात छापलं गेलं असतं.’ त्याच बैठकीत शारंचा कविता संग्रह छापण्याची गोष्ट नक्की केली गेली. कविता संग्रह छापायचा आणि त्याचा प्रकाशन समारंभही धुमधडाक्यात करायचा, हे मित्रांनी नक्की केलं. सर्व मित्रांनी आपणहून ती जबाबदारी पत्करली.
शारंच्या १५० कवितांच्या १५-१६ झेरॉक्स प्रती काढल्या गेल्या. वेगवेगळ्या प्रकाशनांकडे पाठवण्यासाठी. त्या मौज, मेहता, राजहंस इ. प्रकाशकांकडे पाठवल्या गेल्या. हे मराठीतले दर्जेदार प्रकाशक मानले जातात ना!
त्यांचे सगळे दोस्त त्यांच्या कवितांच्या झेरॉक्सचा एक एक सेट घेऊन आपल्या परिचयाच्या प्रकाशनाला दाखवायला घेऊन गेले आणि शारं, पुढच्या संग्रहासाठी कविता लिहायला बसले. झेरॉक्सचा आणि दोस्तांच्या जाण्या-येण्याचा खर्च शारंनी करणं भागच होतं.
दुसर्या दिवसापासून शारं. रोज प्रकाशकाकडून येणार्या स्वीकृतीपत्राची वाट बघू लागले.त्यांनी ३६५ x २४ =८७६० इतके तास उत्तराची प्रतीक्षा केली परंतु ‘साभार परत’ शिवाय पोस्टातून काहीच येत नव्हतं. त्यांनी यापल्या दोस्तांना कविता संग्रहाचं काय झालं, म्हणून विचारलं. त्यांनी पुन्हा प्रकाशकांकडे जायचं ठरवलं. यावेळी त्यांनी शारं.कडून भाड्याची अर्धी रककांच घेतले होती. सगळी जण प्रेस कॉपी जशीच्या तशी घेऊन परतले. सगळे प्रकाशक म्हणाले, आम्ही कविता सग्रह फुकट छापत नाही. सुप्रसिद्ध कवींचाही… अगदी साहित्य अॅकॅडमीचे अवॉर्ड मिळालेल्यांचाही फुकट छापत नाही.‘
आता पैसे घालूनच काढायचा तर आपण आपल्या इथेच काढू ना!’ त्या दिवशी जोरजोरात चर्चा झाली आणि नक्की झालं, की आपण आपल्या इथेच संग्रह काढायचा. हजार प्रतींसाठी जास्तीत जास्त बारा- चौदा हजार खर्च येईल. प्रत्येक प्रतीची किंमत २५ रु. ठेवावी. प्रत्येक जण २५ प्रती विकेल. खर्च तर निघून जाईलच, काही फायदाही होईल. सगळ्यांनी सर्व प्रकारच्या सहकार्याचं आश्वासन शारं.ना दिलं कोणी मुद्रकाचा शोध घेईल, कुणी चित्रकाराचा. मुखपृष्ठाबरोबरच आतल्या प्रत्येक कवितेवर रेखाचित्र टाकायचे ठरले. त्यामुळे पुस्तक आकर्षक होईल आणि सहजपणे विकला जाईल. कोणी प्रेस कॉपी तपासण्याचे आश्वासन दिले।
शारं.नी पी.एफ. मधून नॉन रिफंडेबल कर्ज घेतले. नंदू मोरेने नवा नवा धंदा सुरू केला होता. त्याच्याकडे पुस्तके छाण्यास दिली. चर्चा अशी झाली, नवखा आहे. पैसे कमी घेईल. सावलतीने पैसे दिले तरी चालतील. पण नंदू धंद्यात बच्चा नव्हे, त्यांचा बाप निघाला. त्याने कधी कागदांसाठी, कधी प्लेटससाठी, कधी स्कॅनिंगसाठी अॅडव्हान्स म्हणून जवळ जवळ सार्या पुस्तकांचे पैसे आधीच उचलले.
सहा महिन्यांनंतर पुस्तक निघालं प्रकाशन समारंभ संपन्न झाला. हा समारंभ बाकी काही नाही तरी दहा-बारा हजार खाऊन गेला. प्रकाशन समारंभानंतर कवि संमेलंन झाले. त्यासाठी आस-पासचे शंभर कवी उपस्थित होते. उपस्थित कवींना शारं.चे कविता संग्रह भेट दिले गेले. विविध मासिकांना आणि नियतकालिकांना अभिप्रायासाठी पुस्तके पाठवली गेली. २०-२५ पुस्तके परिचितांना नातेवाईकांना भेट दिली गेली. ८००-९०० पुस्तके शारं.च्या बाहेरच्या खोलीत, कोपर्यापासून खोलीची अर्धी जागा अडवून राहिली, शारं.चे आत्तापर्यंत पुस्तकासाठी ५०,००० रुपये खर्च झाले होते. आम्ही तुमची २५ पुस्तके तरी विकूच विकू, असं म्हणणारे त्यांचे दोस्त आता तोंडही दाखवत नव्हते. वितरकांशी संपर्क केल्यावर त्यांनी ८५ते ९५ टक्के कमिशननी पुस्तके मागितली. कुणी तरी तर दीड रुपया किलो या रद्दीच्या भावात पुस्तके मागितली.
दिवस सरत होते. शारं.च्या दहा बाय दहाच्या खोलीत पुस्तकांचा डोंगर उभा होता. शारं. रोज ऑफिसमधून आले की तिकडे पाहून सुस्कारे टाकत.
काही दिवसांनंतर शारं.चं लक्ष त्या डोंगरावरून उडालं. मग त्यांच्या रमणीने मुलांच्या मदतीने तो डोंगर उतरवला. एकावर एक पुस्तक ठेवून, तीन लोक आरामात बसू शकतील, इतकी लांबी, रुंदी आणि ऊंची धरून पुस्तकांच्या ओळी बनवल्या.त्यावर प्लायवूडची पट्टी ठोकली. त्यावर फुलाफुलांचं डिझाईन असलेलं रेक्झीन ठोकलं.
आता कोणी शारं.च्या घरी गेलं, तर गंज चढलेल्या पत्र्याच्या खुर्चीवर बसायची पाळी त्यांच्यावर येत नाही. ते आरामात ५०,००० च्या सेटीवर बसू शकतात.
कुणी विचारतं, ‘काय नवी सेटी घेतलीत?’
‘हो ना!’ शारं.ची रमणी उत्तर देते.
‘पुस्तकांची चांगली कमाई झालेली दिसतीय!’
हो ना! ती उद्गारते. आपण बसलेली सेटी, ५०,००० ची आहे.
तेव्हा, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण एकदा तरी शारदारमणांच्या सेटीवर बसून याच! .
एक व्यक्तिमत्त्व विकास शिबीर.दीदींनीच आयोजित केलेलं.प्रत्येकाने आपापलं होमवर्क वाचून दाखवून त्यावर चर्चा करण्याचं आजचं सत्र. ‘गतायुष्यातले असमाधानाचे प्रसंग आणि त्यांचं विश्लेषण’ हा होमवर्कचा विषय.
“मृणालिनीs”
दीदींनी नाव पुकारलं.मृणालिनी अस्वस्थ.कांहीशी गंभीर. शेजारीच बसलेल्या ओंकार कडे,तिच्या नवऱ्याकडे पहाणारी तिची चोरटी नजर.
“ओंकार,समजव बरं तिला.ती तुलाच घाबरतीय बहुतेक”.दीदी हसत म्हणाल्या. ओंकारने नजरेनेच तिला दिलासा दिला.ती उठली.दीदींनी पुढे केलेले कागद थरथरत्या हातात घेऊन सर्वांसमोर उभं राहून ते वाचताना ती भूतकाळात हरवली….
तिचे सासरे स्वत: इंजिनिअर. स्वत:चं वर्कशाॅप नावारुपाला आणलेलं. ओंकार इंजिनिअर होताच आता सर्व सूत्रं त्याच्याकडे.ओंकारचे कामाचे व्याप वाढत असतानाच त्याचं लग्न झालं. सासरघरची गरज म्हणून मृणालिनीने तिची आवडती नोकरी सोडली. पूर्णवेळचं गृहिणीपद स्विकारलं.तशी कुठलीच गोष्ट मनात घट्ट धरुन ठेवणारी ती नव्हतीच.सासू-सासरे दोघेही नास्तिक. त्यामुळे त्यांचाच (आणि अर्थात ओंकारचाही)हट्ट म्हणून त्याचं लग्न रजिस्टर पध्दतीनेच झालेलं.तेव्हाही तिने स्वतःच्या हौशी स्वभावाला मुरड घातली. सगळं आनंदाने स्विकारलं.
तरीही इथे रोजची देवपूजा नसणंच नव्हे तर घरी देवाचा एखादा फोटोही नसणं तिच्या पचनीच पडायचं नाही. अंघोळ करुनही तिला पारोसंच वाटायचं.
“आपण एक देव्हारा आणू या का छानसा?”ओंकारला तिने एकदा सहज विचारलं.
“भलतंच काय गं?आईदादांना आवडणार नाही आणि मला तर नाहीच नाही.” थप्पड मारल्यासारखी ती गप्प बसली.त्या चुरचुरणाऱ्या ओरखड्यावर तिने स्वतःच फुंकर घातली.
बंगल्याभोवतीची बाग मग तिने नियोजन करुन आकाराला आणली.छान फुलवली.त्या बागेतल्या झोपाळ्यावर घटकाभर शांत बसलं की तिला देवळात जाऊन आल्याचं समाधान मिळायचं.तिचा छोटा सौरभ तर या बागेत हुंदडतच लहानाचा मोठा झालाय.
घर, संसार सांभाळताना तिने अशा तडजोडी केल्या ते आदळआपट करुन देवपूजेचं समाधान मिळणार नाहीच या समंजस विचारानेच.पण गेल्या वर्षीचा तो प्रसंग घडला आणि…
मृणालिनी वाचत नव्हतीच.जणू स्वतःशीच बोलत होती.
‘सौरभ जन्माला आला तेव्हापासून एक हौस आणि संस्कार म्हणून त्याच्या मुंजीचं स्वप्न मी मनाशी निगुतीनं जपलं होतं.त्याला आठवं लागताच उत्साहाच्या भरात मी आईदादांसमोर विषय काढला. आईंनी चमकून दादांकडे पाहिलं आणि दादा आढ्याकडे पहात बसले. त्यांची ही नि:शब्द, कोरडी प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती.
“तू ओंकारशी बोललीयस का?त्याच्याशी बोल आणि ठरवा काय ते”.
रात्री ओंकारकडे मुंजीचा विषय काढला.माझा उत्साह पाहून तो उखडलाच. ‘मुंजीचं खूळ डोक्यातून काढून टाक’ म्हणाला. ‘त्याची कांहीएक आवश्यकता नाहीs’असं ठामपणे बजावलंन्. आणखीही बरंच कांही बोलत राहिला.मला वाईट वाटलं. त्याचा रागही आला.मन असमाधानाने, दु:खातिरेकाने भरुन गेलं. टीपं गाळीत ती अख्खी रात्र मी जागून काढली.
या घटनेला एक वर्ष उलटून गेलंय.या होमवर्कच्या निमित्ताने याच प्रसंगाकडे मी तटस्थपणे पहातेय. मला जाणवतंय की ती रात्रच नव्हे तर पुढे कितीतरी दिवस मी अस्वस्थच होते. कुणीतरी आपलं हक्काचं असं कांहीतरी हिसकावून घेतलंय ही भावना मनात प्रबळ होत गेली होती.
आज मी मान्य करते की माझ्या असमाधानाला फक्त ओंकारच नाही,तर मीच कणभर जास्त जबाबदार आहे.ओंकारने सांगायचं आणि मी हो म्हणायचं ही सवय मीच त्याला लावली होती. मलाही मन आहे,माझेही कांही विचार,कांही मतं असू शकतात हे मला तरी इतकं तीव्रतेने जाणवलं कुठं होतं?सौरभच्या मुंजीला ओंकारने नकार दिला आणि माझा स्वाभिमान डिवचला गेला. हे सगळं नंतर मी कधीच ओंकारजवळ व्यक्त केलं नाही.करायला हवं होतं. ते ‘बरंच कांही’ अव्यक्तसं मनाच्या सांदीकोपऱ्यात धुळीसारखं साठून राहिलंय.आज मनातली ती जळमटं झटकून टाकतेय….!
ओंकार,खरंच खूप कांही दिलंयस तू मला.पण ते देत असताना त्या बदल्यात माझं स्वत्त्व तू स्वत:कडे कसं न् कधी गहाण ठेवून घेतलंस समजलंच नाही मला.त्या रात्री तुझ्या प्रत्येक शब्दाच्या फटकाऱ्यांनी तू मला जागं केलंयस.
आपल्या घरात देव नव्हते.आईदादांनी तुला दिलेला त्यांच्या नास्तिकतेचा हा वारसा. आस्तिक असूनही मी तो स्विकारला.माझ्या आस्तिकतेचे देव्हारे मात्र मी कधीच मिरवले नाहीत. पण तुमच्या लेखी या सगळ्याला किंमत होतीच कुठे?
माझी एकच इच्छा होती. सौरभची मुंज करायची.योग्य ते संस्कार योग्यवेळीच करायचे. त्याच्या जन्मापासून मनात जपलेली एकुलत्या एका मुलाच्या मुंजीतल्या मातृभोजनाची उत्कट असोशी.तू खूप दिलंस रे मला पण ही एवढी साधी गोष्ट नाही देऊ शकलास.तू मला झिडकारलंस. ‘असल्या थोतांडावर माझा विश्वास नाही’ म्हणालास. मग माझ्या विश्वासाचं काय? ‘तो माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्या बाबतीत मी म्हणेन तसंच होणार’ एखाद्या हुकूमशहासारखं बजावलं होतंस मला.मग सौरभ माझा कोण होता रे?माझाही तो एकुलता एक मुलगाच होता ना?पण तू त्याच्या संदर्भातला माझ्यातल्या आईचा हा एवढा साधा अधिकारही नाकारलास. तुझं ते नाकारणं बोचतंय मला.एखाद्या तीक्ष्ण काट्यासारखं रुतलंय ते माझ्या मनात…’
आवाज भरुन आला तशी मृणालिनी थांबली.शब्द संपले. संवाद तुटला.पण आवेग थोपेनाच.ती थरथरत तशीच उभी राहिली क्षणभर.तिच्या डोळ्यातून झरझर वहाणारे अश्रू थांबत नव्हते.दीदीच झरकन् जागेवरून उठल्या आणि तिला आधार द्यायला पुढे झेपावल्या. पण त्यापूर्वीच कसा कुणास ठाऊक पण ओंकार पुढे धावला होता. त्याचे डोळेही भरुन आले होते.ते अश्रूच जणू मृणालिनीचं सांत्वन करत होते…!
अविनाश येताच दोन्ही गाड्या पाठोपाठ बाहेर पडल्या.नुकताच पावसाळा संपत आल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेते वाऱ्याबरोबर डुलत होती, हिरवीगार सृष्टी मन लोभवीत होती.थंडगार हवेमुळे वातावरण प्रसन्न होते, निसर्ग सौंदर्य पाहता पाहता वसुला मागील दिवसाआठवले. गेल्या वर्ष दीड वर्षात कोरोना ने धुमाकूळ घातला होता अख्ख्या जगाची उलटापालट करून टाकली, लॉक डाऊन मुळे शाळा कॉलेज बंद, छोटे उद्योगधंदे बसले, बेरोजगारी वाढली काही लोकांवर उपासमारीची पाळी आली तर काही ना आपले नातेवाईक कायमचे गमवावे लागले.शेखर व वसुधा ने या काळात जमेल तेवढी मदत केली होती आर्थिक आणि शारीरिकही. शहरात या संकटाने हाहाकार माजवला तर छोट्या-छोट्या गावची काय कथा? असा विचार तिच्या मनात तरळून गेला. एवढ्यात विमलमावशींचं गांवआले. गावाच्या सुरुवातीला विमलमावशींनी सांगितल्याप्रमाणे सुविधा दिसत होत्या. जवळच त्यांचं घर होतं.
विमल मावशींचा मुलगा या गावात वडिलोपार्जित मडकी बनविण्याचा धंदा करत होता शिवाय दीड एकर शेत होतं त्यामध्ये जमेल तेवढे पीक काढून घर चालवत होता. त्याला उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या वेळी बऱ्यापैकी काम असे ते सांभाळत सांभाळत आहे त्या परिस्थितीत समाधानात जगत होता.
घरी पोचल्यावर विमल मावशींनी व त्यांच्या सुनेने सर्वांचे आदरातिथ्य छान केले. दुपारी अंबाडीची भाजी व गरम गरम भाकरी असा बेत त्याबरोबर वसूने आणलेला शिरा होताच. दुपारी गावचे सरपंच गणेश भेटायला आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चहा पिता पिता गावच्या सुधारणे बद्दल शेखरने त्यांचे कौतुक केले पण त्यावर ते म्हणाले,” साहेब, पण या कोरोना काळात मात्र मी हतबल झालो . गावात एवढ्या सुखसोयी असून सुद्धा गावातले बरेच लोक दगावले, आमच्या गावात ऑक्सिजन सिलिंडरे कमी पडली. काही मुलांनीआपल्या आईला गमावले तर काहींनी आपल्या बापाला. सविता तर उघड्यावर पडली, कोरोनाने तिच्या आई-वडिलांचा बळी घेतला, ती अगदी पोरकीझाली. हे ऐकून शेखर व अविने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. शेखरने आपल्या गावात तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा मानस बोलून दाखवला सरपंच म्हणाले,”ठीक आहे, आपण तिला विचारू”विमल मावशी सविता ला घेऊन आल्या. गोरी, बोलक्या डोळ्यांची, साधेच पण नीटनेटके कपडे घातलेली सविता मावशी बरोबर आली. तिने सर्वांना”नमस्ते” म्हटले. वसुधाला तिचा चुणचुणीत पण आवडला. अशा या मुलीवर अशी आपत्ती यावी याचे तिला वाईट वाटले. सरपंचांनी तिला शेखरचा मनोदय सांगितला. थोडा विचार करून ती म्हणाली,” काका, या तुमच्या मदतीसाठी मी खूप आभारी आहे तुमच्यासारखे खूप कमी लोक आहेत जबाबदारी स्वीकारणारे.,…. पण या ठिकाणी बरेच जण आहेत की ज्यांनी आई किंवा वडील गमावले आहेत. ते माझे सवंगडी आहेत त्यांनी मला माझ्या दुःखात साथ दिली त्यांना सोडून मी कशी येऊ ? मी तुमच्याबरोबर एकटीच आले तर परमेश्वर मला माफ करणार नाही. इथले गावकरी आणि गणेश काका नक्कीच माझी काळजी घेतील. या बिकट परिस्थितीत एकत्र लढण्याची हिम्मत व ताकद आम्हाला इथल्या गावकऱ्यांनी दिली. माझ्या एकटीची सोय करण्याऐवजी गावाच्या वैद्यकीय सोयी वृद्धिंगत करण्यास मदत करू शकाल का? त्यामुळे गावातील अनेक जणांना त्याचा फायदा होईल. तसेच महिन्या-दोन महिन्यातून आम्हाला मार्गदर्शन केले तर आम्हाला सर्वांनाच त्याचा फायदा होईल हीमाझी इच्छा तुम्ही पूर्ण करू शकाल का? तिच्या या प्रगल्भ विचारांनी शेखर व अविनाश स्तंभित झाले. शेखर,वसु,अवि व अनु यांनी ” आम्ही तुझी मागणी पूर्ण करू” असा तिला शब्द दिला
काही वेळाने ते परतीच्या प्रवासाला निघाले. सविताने विचारलेल्या वचनांची पूर्तता करायची ठरवूनच. त्यांनी हा वसा घेतला आणि पूर्ण करण्याचा निश्चय केला.’ मुलं वयानं लहान असलीतरी कधीकधी ती आपल्याला नवीन काहीतरी सुचवीत असतात, हा विचार मनात येऊन त्यांना सविताचे कौतुक वाटले.
सविताने त्यांना समाजसेवेची नवी दिशा दाखवली होती ,समाजसेवेचा नवासंदेश त्यांना सविता कडून मिळाला होता.
कोरोना काळामध्ये संचारबंदी असल्यामुळे सर्वजण अगदी कंटाळून गेले होते. ऑफिसचे काम घरून असलेतरी कामाला वेळेचे बंधन नसायचे.कधी सकाळी लवकर मिटींग तर कधी रात्री उशिरापर्यंत, दिवस कसा संपला हे कळत नव्हतं.शरीर आणि मनाला बिलकुल उसंत नव्हती.
जवळ- जवळ दीड वर्षांनी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.एक दिवस रात्री जेवताना तनय म्हणाला,” बाबा , इतके दिवसात आपण कुठे ही बाहेर पडलो नाही,माझी शाळा आँनलाईन,माझे मित्र मला भेटत नाहीत मी अगदी कंटाळून गेलो आहे.” यावर वसुधा म्हणाली,” आपण जवळपास कुठे तरी जाऊन येऊ या का? मलाही सतत संगणकापुढे बसून व मिटिंग अटेंड करून उबग आला आहे.” शेखरला ही कल्पना आवडली . त्याने रविवारी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ या गोष्टीला हिरवा कंदील दाखवला.लगेच मित्राला अविनाश ला फोन केला.अवि व अनुने येण्याची तयारी दर्शवली.
रविवारी विमल मावशीच्या गावी जायचे ठरले .त्यांचे गाव शहरापासून वीस मैल दूर होते.
रविवारी सकाळी वसु लवकर उठली. तिने अंघोळ उरकून भरपूर तूप घालून सत्यनारायण प्रसादाला बनवतात तसाच शिरा करून घेतला. पाठोपाठ तनय व शेखर ही तयार झाले.
शेखर व वसुधा संगणक कंपनी उच्च पदावर कार्यरत होते. दोघांनाही पहिल्यापासून समाजकार्याची आवड होती. भूकंपामध्ये बेघर झालेल्या लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये त्यांची ओळख झाली त्यानंतर पूरग्रस्तांना मदत करण्याच्या निमित्ताने ते परत भेटले. आणि भेटीतून एकामेकांच्या कार्यावर फिदा होऊन एकामेकांच्या प्रेमात पडले.. आणि लवकरच लग्नबंधनात बांधले गेले. दोन वर्षांनी त्यांच्या संसार वेलीवर फूल फुलले. तनयचा जन्म झाला. बाळंतपणाची रजा संपल्यावर ओळखीतून तनयला सांभाळण्यासाठी विमल मावशी आल्या आणि बाळाचा सांभाळ करता करता त्यांच्या घरातील केव्हा एक घटक होऊन गेल्या हे कळलेच नाही. त्या आपल्या गावाबद्दल कायम सांगत तिथल्या सुखसोयी, सुधारणा, तिथे राबवले जाणारे उपक्रम याबद्दल त्यांना अभिमान होता आणि या गावचा उमदा सरपंच, याचे तर त्यात सतत कौतुक करत. तो अतिशय प्रामाणिक आहे, त्याने गावात दिवाबत्ती रस्ते यांची सोय केली आहे, ग्रामपंचायतीचा दवाखाना सुरू केला आहे, गावात एक छोटसं उद्यान असून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाके, मुलांसाठी घसरगुंड्या झोपाळे यांची सोय केली आहे आणि या सुविधांची देखरेख स्वतः गणेश करतो. गाव म्हणजे त्याचे जीवन आहे. गावकऱ्यांच्या अडीअडचणीला तो कायम धावून जातो एवढेच नव्हे तर गावातील मुलांना दूर पायपीट करावी लागू नये म्हणून दहावीपर्यंत शाळाही सुरू केली आहे. त्या शाळेत नियुक्त केलेले शिक्षकही अगदी मनापासून ज्ञानदानाचे कार्य करतात अशा अनेक गोष्टी विमल मावशी सांगत. असा हा गाव पहावा आणि आपल्या लेकाला भेटायला गेलेल्या विमल मावशींना घेऊन यावे या विचाराने त्यांनी विमल मावशीच्या गावी जाण्याचे निश्चित केले.
☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆
पूर्वसूत्र- “मीच त्याला म्हंटलं होतं, लग्नानंतरचा सत्यनारायण एकदा होऊ दे मगच जा प्रवासाला “
” बोललाय तो मला”
” मी आपलं मला योग्य वाटलं ते सांगितलं. तरीही तुला वाईट वाटलं असेल तर…”
“नाही आई.ठीक आहे.”
” तोवर मग माहेरी जाऊन येतेस का चार दिवस?”
” नाही. नको. माहेरीही नंतरच जाईन सावकाशीने”
हे ऐकून आईंना बरं वाटलं,..पण प्रभावहिनी…?)
—————–
प्रभावहिनींनी मात्र चमकून नंदनाकडे पाहिलं. ‘ही अशी कशी..?..’ अशा कांहीशा नजरेने..तिची किंव केल्यासारखं. त्यांचं हे असं बघणं नन्दनाच्या नजरेतून सुटलं नाही. प्रभावहिनी एखाद्या कोड्यासारख्या तिच्यासमोर उभ्या होत्या. हाताने पोळ्या लाटत होत्या पण नजर मात्र नन्दनाकडे. नंदना मोकळेपणाने हसली.
” वहिनी तुम्ही लाटून द्या, मी भाजते.”
” नको..नको.. करते मी”
“अहो, पटकन् होतील. खरंच” नन्दनाचा सहजपणा प्रभावहिनींना सहजासहजी झिडकारता येईना. खरं तर त्यांना तिला दुखवावसं वाटत नव्हतं. दोन्ही सूनांची ही जवळीक आईंच्या नजरेतून मात्र सुटली नव्हतीच. त्यांना आणखी वेगळीच काळजी. नन्दना आपली शांत, सरळ स्वभावाची आहे. पण या प्रभाने तिचे कान फुंकले आणि ती बिथरली तर..?
“तिच्यापासून चार पावलं लांबच रहा गं बाई.” एक दिवस न रहावून आईंनी नन्दनाला सांगितलंच.
“एक नंबरची आक्रस्ताळी आहे ती.’सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणत मी आपली गप्प बसते.पण शेजार्यांना तमाशा नको म्हणून जीव टांगणीला लागलेला असतो बघ माझा. दोन गोड नातवंडांकडं पाहून जीव तुटतो माझा. यांचं आणि राहुलचं त्यांना वेगळं काढायचं चाललंय. मीच आपली यांना म्हणते, जरा सबुरीने घ्या.घाई कशाला? जे काही व्हायचंय ते आपले डोळे मिटल्यावर होऊं दे. नंतरचं कुणी बघितलंय? दृष्टीआड सृष्टी.”
सगळं ऐकून नन्दनाच्या तोंडाची चवच निघून गेल्यासारखं झालं. तिला आपलं उगीचंच वाटत होतं ….’ आता या राहुलला कसं समजवायचं? त्यांना वेगळं करायचं तर ते नंतर बघू.आत्ता लगेच तर मुळीच नको. मी लग्न होऊन या घरात आले न् घर मोडून बसले असंच व्हायचं. नकोच ते.राहुलला एक वेळ समजावता येईल पण या प्रभावहिनी? सगळं चांगलं असून अशा कां वागतायत या?..’ ती स्वतःलाच विचारत राहिली. पण या प्रश्नाचे नेमके उत्तर फक्त प्रभावहिनींच्या जवळच होते. ते उत्तर शोधत एक दिवस नन्दना प्रभावहिनींच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन पोचली. पण तो प्रवास आणि मिळालेले उत्तर दोन्ही सुखकर नव्हतेच…!
“मीही आधी तुझ्यासारखीच होते.शांत.समंजस.कधी ‘असं कां?’ म्हणून न विचारणारी. दोन मुलं होईपर्यंत गाफिलच राहिले मी. ‘तुम्ही म्हणाल तसं’ म्हणत दिवस ढकलले. पण माझा पदरच फाटका. पदरात पडणार तरी काय, किती आणि कसं..?” प्रभावहिनी अगदी मनाच्या आतलं मोकळेपणाने बोलत राहिल्या. स्वतःशीच बोलावं तसं.
“सासूबाईंचा बाकी कांही म्हणून त्रास नव्हता. पण त्यांचा कुणावरच वचक कसा तो नव्हताच. त्यामुळे घरचे हे तिन्ही पुरुष शेफारलेले होते. सतत आपली त्यांची नांगी डंख मारायला टपलेलीच. सासुबाईंचं त्यांच्यापुढे काही चालायचं नाही.म्हणून मग सासूबाईंच्या तावडीत मी आपसूक सापडले. रागावणं,टाकून बोलणं हे फारसं काही नव्हतं, पण देव देव फार करायच्या. घरात सारखं पूजाअर्चा,सवाष्ण-ब्राह्मण, सोवळं ओवळं सारखं सुरुच असायचं. माझी पाळी असली की गोळ्या घेऊन पुढे ढकलायला लावायच्या. खूप त्रास व्हायचा त्या गोळ्यांचा. नको वाटायचं. पण सांगणार कुणाला? यांना काही बोलायची सोय नव्हती. लगेच आकांत-तांडव सुरू करायचे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत दिवस ढकलले. राबराब राबत राहिले. परवा सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळीही ‘गोळी घे’ म्हणाल्या. ‘मला त्रास होतो’ म्हटलं तरी ऐकेचनात. मग त्यांना ठणकावण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. तुला वाटलं असेल ना,ही बाई अशी कशी असं?”
“हो.वाटलं होतं. तुमचं आईना तोडून बोलणं मला आवडलं नव्हतंच.”
“पूर्वी बोलणं सोड वर मान करून बघायचीही नाही.आता नाही सहन होत. ताडताड बोलून मोकळी होते.त्याशिवाय बरंच वाटत नाही. राहुलभाऊजीनी आईंचं रूप घेतलंय आणि हे मामंजींवर गेलेत. सतत त्रागा.. आदळआपट..भसाभसा सिगरेटी ओढणं असं सगळं त्यांचं नको तेवढं उचललंय.
मध्यंतरी धंद्यात जबरदस्त खोट आली होती. आत्ता आत्ता कुठं डोकं वर काढतायत. तेव्हा शांतपणे एकत्र बसून चर्चा करून काही मार्ग काढतील असं वाटलं होतं. पण तिघेही ढेपाळून गेले. दोघींच्या अंगावरचे दागिने त्यांनी आधी उतरवून घेतले. आम्ही बिनबोभाट काढून दिले. पण तेवढ्याने भागणार नव्हतं.मग आदळाआपट..चिडचिड सुरु. माझं माहेर पोटापुरतं मिळवून खाणारं पण स्वाभिमानाने जगणारं.पैशांची सोंगं ती माणसं कुठून घेणार? तरीही माझ्या माहेरच्या गरिबीचा मामंजीनी उद्धार केला आणि मी बिथरले. यांनी त्यांचीच री ओढली. सासुबाई घुम्यासारख्या गप्प. आणि राहूलभाऊजी त्या गावचेच नसल्यासारखे. त्या दिवशी सणकच गेली डोक्यात माझ्या.राग दाबून ठेवून घुसमट सुरु झाली न् मी फणाच काढला. मनात साचलेलं भडभडून बोलून टाकलं. ऐकून सगळेच चपापले… त्यांच तिरीमिरीत हे पुढे झेपावत माझ्या अंगावर धावून आले.. मुलं कावरीबावरी झाली होती… मुलांकडे पाहून मी गप्प बसेन असं त्यांना वाटलं होतं.. पण मी गप्प बसूच शकले नाही…यांनी संतापाने माझ्यावर हात उगारला तेव्हा मात्र माझा तोल गेला..तो हात तसाच वरच्यावर घट्ट धरुन ठेवत यांना निक्षून बजावलं,’आज अंगावर हात उगारलात तो पहिला न् शेवटचा. पुन्हा हे धाडस करू नका. पस्तवाल. डोक्यात राख घालून घर सोडणार नाही मी. जीवही देणार नाही. पण लक्षात ठेवा,..पुन्हा हात उगारलात तर मात्र तो मूळापासून उखडून टाकीन….!’
सगळं ऐकून नन्दनाच्या अंगावर सरसरून काटाच आला.
त्या दिवसापासून नन्दना पूर्णपणे मिटूनच गेली. हे घर,ही माणसं, सगळं तिला परकंच वाटू लागलं. तिच्या माहेरी तरी उतू जाणारी श्रीमंती कुठं होती? पण.. आई-आण्णांच्या मनाची श्रीमंती या रखरखाटाच्या पार्श्वभूमीवर तिला अगदी असोशीने हवीशी वाटू लागली…माहेरच्या ओढीने तिचा जीव तळमळू लागला. पण तिने स्वतःचीच समजूत घातली.
आई-आण्णा किती दिवस पुरणार आहेत? आणि या वयात त्यांच्या जीवाला माझा घोर कशाला..? घोर लावायचाच तर तो राहुलच्या जीवाला का नको? सगळंच दान उलटं पडूनसुद्धा प्रभावहिनी पदर खोचून एवढ्या ताठ उभ्या राहू शकल्या,त्यांना निदान आपली साथ तरी द्यायला हवीच. फक्त आपलीच नव्हे राहुलचीसुद्धा..! पण..तो ऐकेल?
नन्दनाचं असं मिटून जाणं राहुलच्या नजरेतून सुटलं नव्हतंच.
“प्रभावहिनीनी तुला काहीतरी सांगितलेलं दिसतंय”
“त्यांनी मला सांगू नये असं आहे कां काही?”
“त्यांनी काय सांगितलय तुला?”
“त्या या घरात समाधानी नाहीत हे सांगितलंय आणि त्या कां समाधानी नाहीत हेसुद्धा.”
” समाधानी नसायला काय झालंय? सुख दुखतंय त्यांचं. दुसरं काय?”
“असा एकदम टोकाचा निष्कर्ष काढायची घाई करू नकोस राहुल.”
“तुला नेमकं काय म्हणायचंय?” त्याचा आवाज नकळत चढलाच.
“राहुल प्लीज.आपण चर्चा करतोय का भांडतोय? प्लीज,आवाज चढवू नकोस”
“पण तू त्यांची तरफदारी का करतेयस? राग येणारच ना?”
“त्यांची नको तर मग कुणाची तरफदारी करू? मामंजीची, भाऊजींची, आईंची की तुझी..?”
“त्यांनी नेमकं काय सांगितलंय तुला तेवढं बोल”
“त्यांनी काय सांगितलंय हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाहीच आहे राहुल.त्या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.तू नीट आठवून अगदी प्रामाणिकपणानं सांग. त्या लग्न होऊन या घरी आल्या तेव्हापासून तू त्याला पहातोयस. पहिल्यापासून त्या अशाच त्रासिक,आक्रस्ताळी, आदळआपट करणाऱ्या होत्या का रे?”
राहुल निरुत्तर झाला. थोडा विचारात पडला.
“राहुल, तुला सांगू?आपलं लग्न ठरत होतं तेव्हा माझ्या आईचा या लग्नाला पूर्ण विरोध होता. इथे एकत्र-कुटुंबात रहावं लागेल आणि ते मला जमणार नाही असं तिला वाटत होतं. पण मी ठाम राहिले.’मला नक्की जमेल’ असं निक्षून सांगितलं. राहुल,पण तेव्हाचा माझा तो आत्मविश्वास आज थोडासा डळमळीत झालाय..”
“नंदना…?”
“होय राहुल. तू ऐकण्याच्या मनस्थितीत आहेस तोवर मला बोलू दे सगळं. तुला सांगू? खूप लहानपणापासून मी अगदी नियमितपणे डायरी लिहायचे. अगदी रोज. लग्नानंतरही त्यात खंड पडणार नाही हे मी गृहितच धरलं होतं. पण….”
“पण काय..?”
“पण लग्नानंतर फक्त पहिल्या दिवशी एकच दिवस मी डायरी लिहू शकलेय. पुढची पानं कोरीच राहिलीत. रोज मनात यायचं, लिहावं.मन मोकळं करावं असं.खूप लिहायचं होतं.पण नाही लिहिलं.. का कुणास ठाऊक..पण भिती वाटायची.. तू कधी चुकून ती डायरी वाचलीस..वाचून बिथरलास…मला समजून घेऊ शकला नाहीस.. तर?.. या..या एका भितीपोटीच मनातलं सगळं मनातच दाबून टाकलंय मी. डायरीची पानं कोरीच राहिली…!पण मनातलं सगळं मनातच दाबून ठेवून आपल्या माणसाशीही वरवर चांगलं वागणं ही सुध्दा प्रतारणाच नव्हे का रे?निदान मला तरी ती तशी वाटते. त्यामुळेच डायरीतल्या त्या कोर्या पानांवर लिहायचं राहून गेलंलं सगळं मला मोकळेपणानं बोलायचंय.
राहुल,तुमचं हे ‘एकत्र कुटुंब’ खऱ्या अर्थाने एकत्र आहे असं मला कधीच वाटलं नाहीये. ते तसं असायला हवं ना सांग बघू.
लग्न ठरलं, तेव्हा आण्णांनी मला खूप छान समजावून सांगितलं होतं. ते म्हणाले होते,
‘नंदना, एका लग्नामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी दुसऱ्या व्यक्तिशी बांधल्या जातात. त्यांना आपण ‘बांधिलकी’ मानतो की ‘बंधन’ समजतो यावर आपलं सहजीवन फुलणार कि विझणार हे अवलंबून असतं.’बांधिलकी’ मानली की आनंदाची फळं देणारं फुलणं अधिक सुगंधी असेल. ‘बंधन’ समजलं तर कालांतराने कां होईना ते जाचायलाच लागेल. आणि तसंही ‘बांधिलकी’ तरी फार अवघड कुठे असते?फक्त एक व्यक्ति म्हणून दुसऱ्याचं स्वतंत्र आस्तित्व मनापासून स्वीकारणं हेच फक्त लक्षात ठेवायचं की सगळं सोपं होऊन जातं.आणि ते सहजपणे स्वीकारलं की जीवनातली वाटचाल अधिकाधिक माणूसपणाकडे होऊ लागते…’ खूप छान वाटलं होतं ऐकताना! छान आणि सोपंसुध्दा. पण बांधिलकी मानणाऱ्यांनासुद्धा ती बांधिलकी एकतर्फीच असेल तर त्याची बंधनंही कशी जाचायला लागतात ते प्रभावहिनींकडे पाहून मला समजलं. राहुल, तुला सांगू? पूर्वी बालविवाह व्हायचे तशा लग्नात लहान नसतो रे आम्ही मुली आता. पूर्वीचं वेगळं होतं. कच्ची माती सासरच्यांच्या हाती यायची. ते तिला दामटून हवा तसा आकार द्यायचे..ते आकार मग त्यांना जगवतील तसे जगायचे. ‘बाईच्या वागण्यावर सासरचा आनंद अवलंबून असतो’ असं म्हणणं किती सोपं आहे..! प्रभावहिनी त्रागा करतात म्हणून मग त्यांच्यावर वाईटपणाचा शिक्का मारून मोडीत काढणंही तितकंच सोपं आहे. त्यांना या घरात आल्यावर आनंद कसा मिळेल हे कुणी आवर्जून पाहिलंच नाही ही तू नाकारलीस तरी वस्तुस्थिती आहेच. उशिरा कां होईना ती स्विकारावीस एवढंच मला मनापासून सांगायचंय. पूर्ण वाढ झालेलं एक झाड माहेरच्या मातीतून मुळासकट उपटून सासरच्या मातीत लावण्यासारखं असतं रे आजकाल आमचं सासरी येणं. त्याची मूळं या नव्या मातीत रुजायला जाणीवपूर्वक मदत करणं, स्वच्छ हवा आणि मोकळा प्रकाश,पाणी त्या मूळांना द्यायची जबाबदारी स्वीकारणं हे काम सासरच्या माणसांनी करायला नको का रे? त्या चौघांना घरातून वेगळं काढणं म्हणजे नेमकं निदान न करता दुखरा अवयव कापून काढण्यासारखं होईल राहुल. या निर्णयाला तुझा आणि माझा विरोध असायला हवा,त्यात सहभाग नको.. तरच या घरी प्रभावहिनींवर झालेल्या अन्यायाचं थोडं तरी परिमार्जन होईल असं मला वाटतं…”
नन्दना कधी बोलायची थांबली ते राहुलला समजलंच नाही.तिनं असंच बोलत रहावं म्हणून तो अधिरतेने तिच्याकडे पहात राहिला..!
नन्दना दिसायला चांगली होती. कुणालाही आवडावी अशीच.नंदनाचं रुप त्यालाही मनापासून आवडलं होतंच की.पण आजची नंदना त्याला नेहमीच्या नंदनापेक्षाही अधिक सुंदर वाटू लागली..! सुंदर आणि हवीहवीशी! …आणि..नंदना? ..डायरीतील कोरी पाने मनासारखी लिहून झाल्याच्या समाधानाने मनावरचं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तशी ती सुखावली होती…!!
“तू म्हणशील तसं” नन्दना म्हणाली. ठरवूनसुद्धा आपल्या बोलण्यातला कोरडेपणा तिला कमी करता आला नाहीच. राहुलच्या सूचक नजरेनेसुद्धा ती नेहमीसारखी फुललीच नाही.)
दोन दिवस उलटले तरी घरी पूजेची गडबड जाणवेचना. थोडा अंदाज घेत एक दिवस कामं आवरता आवरता नन्दनाने थेट आईंनाच विचारलं.जवळच प्रभावहिनी म्हणजे नन्दनाच्या मोठ्या जाऊबाईही कांहीबाही करीत होत्या.
“पूजा रद्द केलीय.पुढे कधीतरी ठरवू..” आई दुखऱ्या स्वरांत म्हणाल्या.
“का..?” नन्दनानं आश्चर्यानं विचारलं.
“योग नव्हता म्हणायचं.. दुसरं काय?”
“योग आणा ना मग. मी ‘नको’ म्हंटलंय कां?” प्रभावहिनी एकदम उसळून अंगावर धावून यावं तसं बोलल्या.
नन्दना त्यांच्या या अवताराकडे पाहून दचकलीच.ती या घरात आल्यापासून प्रभावहिनी मोजकं कांहीसं बोलून गप्प गप्पच असायच्या.धाकट्या जावेला त्यांनी तोडलं नव्हतं तसं फारसं जवळही येऊ दिलं नव्हतं.
आजवरच्या त्यांच्या घुम्या वृत्तीला त्यांचं हे असं खेकसून बोलणं थेट छेद देणारंच होतं. प्रभावहिनींच्या अनपेक्षित हल्ल्याने आई एकदम बावचळूनच गेल्या.काय बोलावं तेच त्यांना समजेना.
“हे बघ,मी नन्दनाशी बोलतेय ना? तू कां मधे पडतेयस?”
“नन्दनाशी बोला, पण जे बोलायचं ते स्पष्ट बोला. मला सांगा, जाऊ कां मी माहेरी निघून? तुमची पूजा आवरली की परत येते..” प्रभावहिनी आईंना ठणकावतच राहिल्या. आई मग एकदम गप्पच झाल्या.
नन्दना बावचळली. प्रभावहिनींचा हा अवतार नन्दनाला अनोळखीच होता. नेमका प्राॅब्लेम काय आहे तेच तिला समजेना.तिनं मग थेट विचारलंच.
“प्रॉब्लेम काय असणाराय..?या..या घरात मी..मीच एक प्रॉब्लेम आहे.”
“कांहीतरीच काय बोलताय वहिनी?”
“खोटं नाही बोलत.विचार बरं त्यांनाच.सांगू दे ना त्यांना.मूग गिळून गप्प नका बसू म्हणावं. काय हो? खोटं बोलत नाहीये ना मी?..सांगाs आहे ना मीच प्रॉब्लेम?”
आई काही न बोलता कपाळाला आठ्या घालून चटचट काम आवरत राहिल्या.नन्दनाला एकदम कानकोंडंच होऊन गेलं.
प्रभावहिनींना एवढं एकदम चिडायला काय झालं तिला समजेचना.
राहुलशिवाय तिच्या मनातल्या या प्रश्नाला नेमकं उत्तर कोण देणार होतं? पण राहुलकडेसुध्दा या प्रश्नाचं नन्दनाचं समाधान करणारं उत्तर नव्हतंच.
“मग जा.जा आणि जाऊन वहिनीच्या झिंज्या उपट तू सुद्धा”
“तू असा त्रागा कां करतोयस?चिडून प्रश्न सुटणाराय कां?”
“प्रश्न आहेच कुठे पण..? असलाच तर तो दादा-वहिनींचा आणि आई-वहिनींचा असेल. आपल्याला काय त्याचं? आपण दुर्लक्ष करायचं आणि मस्त मजेत रहायचं.”
“तू रहा मजेत. मला नाही रहाता येणार.”
“का? अडचण काय आहे तुझी? मला समजू दे तरी.हे बघ, तुझं माझ्याशी लग्न झालंय की त्यांच्याशी? इतरांचा विचार करायची तुला गरजच काय?”
नंदना कांही न बोलता उठली. अंथरूणावर आडवी झाली. राहुलसारखा फक्त स्वतःपुरता विचार करणं तिच्या स्वभावात बसणारं नव्हतं. तिला पटणारं नव्हतं.आणि न पटणारं ती कधी स्वीकारूच शकत नव्हती.
नन्दनाला तिचं लग्न ठरल्यानंतरचं आण्णांचं बोलणं आठवलं.
‘सहजीवन’ कसं असावं हे किती छान समर्पक शब्दांत समजावून सांगितलं होतं त्यांनी. आणि हा राहूल…! कसं स्विकारु त्याला? आणि स्विकारताच आलं नाही तर समजावू तरी कशी?…
‘तिचं जेव्हा जळेल तेव्हाच तिला कळेल.पण तोवर फार उशीर झालेला असेल.’ या शब्दांचा नेमका अर्थ तिला या क्षणी अस्वस्थ करू लागला… लाईट आॅफ करुन राहुल जवळ कधी सरकला तिला समजलंच नव्हतं.त्याचा स्पर्श जाणवला.. आणि..ती एकदम आक्रसूनच गेली. अंग चोरुन पडून राहिली.
“नन्दना..”
“……..”
“गप्प का आहेस तू?”
“काय बोलू..?”
“तुला एक सांगायचं होतं”
“सांग”
“तू रागावशील”
“नाही रागावणार. बोल”
“आपण महाबळेश्वरला पुन्हा कधीतरी गेलो तर चालेल?”
“कधीच नाही गेलो तरी चालेल”
“बघ चिडलीयस तू”
“………”
“का म्हणून नाही विचारणार?”
“तसंच कांहीतरी कारण असेलच ना. त्याशिवाय तू आधीपासून केलेलं बुकिंग रद्द कशाला करशील?”
“आपण पुन्हा नक्की जाऊ.प्रॉमिस.”
“माझी अजिबात गडबड नाही”
“असं का म्हणतेस?”
“महाबळेश्वरला जाऊन भांडत रहाण्यापेक्षा इथे आनंदाने रहाणं मला जास्त आवडेल.”
..हिचं आनंदानं रहाणं महाबळेश्वर-ट्रीपपेक्षा आपल्याला जास्त महागात पडणार आहे या गंमतीशीर विचाराने राहूल हसला. क्षणभर धास्तावलासुद्धा.
————
“हे काय गं नन्दना?महाबळेश्वरचं बुकिंग केलं होतं ना भाऊजीनी?”प्रभावहिनींनी एकटीला बघून नन्दनाला टोकलंच.” त्या आज आपण होऊन आपल्याशी बोलल्या या गोष्टीचं नन्दनाला थोडं आश्चर्यच वाटलं.ती भांबावली.त्यांना काय उत्तर द्यावं तिला समजेचना. प्रश्न सरळ होता मग उत्तर तिरकं कां द्यायचं..?
“हो.बुकिंग केलं होतं”
“मग?”
“कॅन्सल केलं”
“अगं, कमाल आहे. कॅन्सल का केलंस? जाऊन यायचं ना चार दिवस..”
“मी नाही हो.. राहूलनं कॅन्सल केलंय”
“भाऊजींनी? कमालच आहे. पण कां ग? आणि ते सुद्धा तुला न विचारता? आणि तू गप्प बसलीस?”
“हो. गप्प बसले.” नन्दनाला हा विषय वाढू नये असं वाटत राहिलं,म्हणून ती सहज हसत म्हणाली.
“मूर्ख आहेस.” प्रभावहिनी कडवटपणे बोलून गेल्या.
“का मग दुसरं काय करायला हवं होतं मी?”
“गप्प बसायला नको होतंस. हिसकावून घेतलं नाहीस ना तर या घरात तुला कांहीही मिळणार नाही. सुख तर नाहीच,अधिकारसुध्दा नाही.”
प्रभावहिनींचे शापवाणी सारखे शब्द नंदनाच्या मनावर ओरखडे ओढून गेले. तरीही ती हसली.ते हसणं तिला स्वतःलाच कसनुसं वाटत राहिलं. तेवढ्यात आंघोळ करून आई लगबगीने स्वयंपाकघरात आल्या. त्यांच्याकडे पाहून कपाळाला आठ्या घालून प्रभावहिनी गप्प बसल्या.
“नन्दना..”
“काय आई..?”
“राहुल बोलला का गं तुझ्याशी?”
“कशाबद्दल?”
“मीच त्याला म्हंटलं होतं, लग्नानंतरचा सत्यनारायण एकदा होऊ दे मगच जा प्रवासाला”
“हो. बोललाय तो मला.”
“मी आपलं मला योग्य वाटलं ते सांगितलं त्याला.तरीही तुला वाईट वाटलं असलं तर….”
☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆
लहानपणापासून जोपासलेली डायरी लिहायची सवय म्हणजे नन्दनाचा विरंगुळा होता.आपण लग्नानंतरही नियमीतपणे डायरी लिहायची हे तिने मनोमन ठरवून ठेवलेलं होतं !
…’ माहेर सोडताना मळभ भरून आल्यासारखं आण्णांचं मन गच्च होतं.आतल्याआत गदगदत ते स्वतःला सावरत होते. शेवटच्या क्षणापर्यंत मला मात्र आतून असं भरून येतच नव्हतं. राहुल मला आवडला होता. मिळालाही. त्या आनंदाच्या उर्मीच एवढ्या तीव्र होत्या की आता माहेर अंतरणार असल्याचं दु:ख तेवढ्या तिव्रतेने मला जाणवलंच नव्हतं एवढं खरं. पण शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं कुणास ठाऊक..?..पण माझ्याही नकळत मी आईच्या मिठीत गेले..आणि आतून उन्मळून पडले.पहिल्या श्वासापासून गृहीत धरलेल्या या वटवृक्षाचा आधार सोडताना माझ्यातली वेल जणू मुळापासून हलली होती.त्या वेलीला तसाच भक्कम आधार हवा होता.तो राहुलच्या रूपात मिळेल?…’
हे नन्दनाच्या डायरीतलं लग्नानंतरचं पहिलं पान..! ते लिहून झालं आणि नन्दनालाच आश्चर्य वाटलं.’ राहुलच्या रूपात आपल्याला हवासा वाटणारा आधार मिळेल कां?’ हा प्रश्न आपल्याला पडलाच कसा? राहुलने हे वाचलं तर..?..या कल्पनेनेच ती शहारली.मग डायरी तिने मिटूनच टाकली. कायमची. लिहिण्यासाठीसुद्धा पुढे कितीतरी दिवस तिने ती उघडलीच नाही.
—————–
राहुलला तिने प्रथम पाहिलं तेव्हा ते ‘लग्न’ याच उद्देशाने ! पत्रिका देणं , त्या जमणं , एकमेकांना बघणं , पसंत पडणं , मग सविस्तर बोलणी आणि पुढचे सगळे सोपस्कार. सगळं कसं रीतसर , रूढीप्रमाणे झालेलं. आधीची दोन स्थळं मुलं चांगली असूनही नन्दनाने नाकारली होती. ‘कां’ ते तिला सांगता येत नव्हतं.
आई खनपटीलाच बसली तेव्हा नन्दना थोडी चिडली होती. तिच्या नकाराला आईचा आक्षेप नव्हता. पण तिला नन्दनाकडून समर्पक कारण हवं होतं.नन्दना ते नेमक्या शब्दात व्यक्त करू शकत नव्हती.मुलं देखणी होती. रुबाबदार होती.आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतली होती. पण कां कुणास ठाऊक त्यांच्याकडे पाहून हा आपला जन्माचा जोडीदार असावा असं तिला मनोमन वाटलेलं नव्हतं..!
राहुलकडे पहाताच मात्र..? नंदनाला बघताना,तिला जुजबी प्रश्न विचारताना,राहुलचे मिष्किल डोळे हसत होते. त्या डोळ्यांचं ते हसणं नन्दनाला सुखावून गेलं होतं. जाताना त्याची हसरी नजर चोरपावलानं नन्दनाच्या मनात सहवासाची ओढ पेरुन गेली होती..! राहुल बद्दलची प्रेमभावना त्यामुळेच नैसर्गिकपणे फुलणाऱ्या फुलासारखी नन्दनाच्या मनात उमलंत गेलेली होती..!
एरवी नन्दनाने दिलेल्या आधीच्या एक-दोन नकारांच्या वेळी चिडलेली नन्दनाची आई तिच्या या होकाराने मात्र दुखावली गेली होती. नन्दनाचा होकार तिच्यासाठी अनपेक्षितच होता.
” अजून हातात काही स्थळं आहेत नन्दना.ती पाहू या. उगाच होकाराची घाई कशाला?”
” पण या स्थळात वाईट काय आहे ?” आण्णा नंदनाच्या मदतीला धावले होते.
” ते तुम्हाला समजणार नाही. शेवटी तडजोडी बायकांनाच कराव्या लागतात.तिचं जेव्हा जळेल ना,तेव्हा तिला कळेल,पण तोवर खूप उशीर झालेला असेल”
” तुला एवढी भिती कशाची वाटतेय?”
” चार माणसांचं कुटुंब आपलं.जे हवं ते फारसे हट्ट न करता मिळत आलंय तिला आजपर्यंत.तिथं एकत्र कुटुंबात रहावं लागणाराय.तिला जमणाराय कां सगळं?”
“मला जमेल” नंदना स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली.
अखेर आण्णांनीच आईची समजूत घातली.”अगं, घरचा धंदा व्यवसाय असणाऱ्यांची ‘एकत्र कुटुंब’ ही गरज असते.वेगळे संसार त्यांना सोईचे नसतात आणि परवडणारेही नसतात. नन्दना लाडात वाढलीय हे खरं, पण ती लाडावलेली नाहीय हे नक्की. ती जबाबदारीने सगळं नक्कीच निभावून नेईल.” आई निरुत्तर झाली होती. पण तिच्या कपाळावरच्या आठ्या मात्र लग्नाची तयारी सुरू झाली तरी विरलेल्या नव्हत्या.नन्दनाला राहुलची हसरी नजर खुणावत होती. राहुलची आठवण झाली की त्रासिक चेहऱ्याची आई तिला जास्तच कोरडी, व्यवहारी वाटायला लागायची.एकदम कुणीतरी अगदी परकीच..!
——————-
राहुलच्या घरातलं वातावरण नन्दनाला खूप मोकळं, प्रसन्न वाटलं. तिथे परकेपण नव्हतंच. सुगंधात भिजलेला मोकळा श्वास तिथं राहुलच्या रूपानं स्वागताला उत्सुक होता. राहुलच्या मिठीत तो सुगंध नन्दना भरभरून प्याली. तृप्त झाली. पण…? राहुलच्या सहवासातला आनंद, घरातली प्रसन्नता आणि मोकळेपण..ही सगळी तिच्या स्वतःच्या मनोवृत्तीची तिच्या मनात उमटलेली प्रतिबिंबंच होती हे तिच्या लगेच लक्षात आलंच नसलं तरी हळूहळू तिला ते उमगणार होतंच. म्हणूनच नव्या नवलाईचे सुरुवातीचे दिवस असे धुंदीत तरंगतच गेले.
त्या चार दिवसात माहेरची आठवण तिला आलीच नव्हती. त्या दिवशी आईचा फोन आला आणि नन्दनाला हे घरची आठवण न होणं प्रथमच तीव्रतेने जाणवलं. ‘ तिकडे आई अण्णा मात्र आपली आठवण काढत चार रात्री तळमळत राहिले असतील..’ नुसत्या कल्पनेनंच नन्दनाचे डोळे भरून आले. महत्प्रयासाने तिने दाबून धरलेला हुंदका तिच्याही नकळत फुटलाच.
“नन्दना, काय झालं गं..?”
“नाही..काही नाही..”
” कशी आहेस..?”
“मी..मी छान आहे.मजेत..”
” खरं सांगतेयस ना..?”
“हो गं. तुझी शप्पथ.आई, तू..कशी..आहेस?”
“माझं काय गं..मी बरी आहे..” आईचा आवाजही थोडा ओलावला होताच.”तू मजेत आहे म्हणालीस ना,आता बरं वाटलं बघ.जीवाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. माझ्याही आणि यांच्याही..”
” काहीतरीच काय गं?”
” बरं, ते राहू दे. हे बघ, राहुलच्या आई घरी आहेत कां? मी बोलते त्यांच्याशी. चार दिवस माहेरपणाला पाठवा म्हणून सांगते. चालेल ना?”
नन्दनाला काय बोलावं सुचेचना. जावंसं तर वाटत होतं. पाय मात्र निघणार नव्हता. तेवढ्यात राहुलच्या आईच आल्या.
“आईचा फोन आहे. तुमच्याशी बोलणाराय” तिने आपला मोबाईल त्यांच्या हातात दिला आणि त्याच क्षणी तिच्या मनातला ‘तो’ धागा तिला एकदम तटकन् तुटल्यासारखंच वाटलं. आपण जाऊ,मजेत राहूही.. पण राहुल?.. राहुलच्या आईंनी तिला मोबाईल परत दिला पण त्या दोघी काय बोलल्या हे या भांबावलेल्या अवस्थेत नन्दनाच्या लक्षातच आलं नव्हतं. जावं की जाऊ नये या दोलायमान अवस्थेत नन्दना दिवसभर अस्वस्थच राहिली..! पण… रात्री..?
“आईचा फोन आला होता ना ?” राहुलनं विचारलंच.
” हो आईंशीही बोलली ती. माहेरपणासाठी विचारत होती.”
“तू काय ठरवलंयस?तुला जायचंय?”
राहुलचा स्वर थोडा टोकदार झालेला होता.नन्दनालाही ते जाणवलं.तिने चमकून वर पाहिलं. त्याची नजर नेहमीसारखी हसत नव्हती.
“तू तुझ्या आईला काय बोललीयस? येते म्हणालीयस कां?”
राहुलचा चढलेला स्वर,त्याचं हे असं जाब विचारणं सगळंच नन्दनाला अनपेक्षित होतं. त्याच्या तीक्ष्ण नजरेला नजर देऊन ती फार वेळ पाहूच शकली नाही. तिने आपली नजर खाली वळवली. भरून येतायतसं वाटणाऱ्या डोळयांना तिने निर्धाराने गप्प बसवलं.
“मी येते म्हणालेली नाहीये.ती या विषयावर आईंशी बोललीय. त्या काय म्हणाल्या कुणास ठाऊक ” शक्यतो शांत राहायचा प्रयत्न करीत नन्दना म्हणाली. आणि मग राहूलचा स्वर आणि नजर दोन्ही क्षणात निवळली.
” तू विचारलं नाहीस आईला?” त्याने हसत विचारलं.
“अंहं”
“का ?”
“कां असं नाही..पण..”
” ती नको म्हणेल अशी भिती वाटली का?”
“अजिबात नाही”
“आता मी सांगतो ते शांतपणे ऐक.आईने त्यांना ‘मी राहुलशी बोलून घेते’असं सांगितलं होतं. रात्री त्यांना पुन्हा फोन करायलाही सुचवून ठेवलं होतं. हे बघ.रात्रीचे दहा वाजून गेलेत. कुठं आलाय त्यांचा फोन अजून? आला तर काय सांगायचं?”
… तिच्या मनातला तिचा हसरा राहुल तिची नजर चुकवून कुठेतरी दडून बसलाय असंच तिला वाटत राहिलं. लग्नानंतरचं या घरातलं मोकळं आणि प्रसन्न वातावरण तिला एकदम कोंदट वाटू लागलं. तेवढ्यात तिच्या मोबाईलचा डायलटोन.
” बघ तुझ्या आईचाच असणार.”
नन्दनाने न बोलता मोबाईल उचलला.फोन आईचा नव्हता. आण्णांचा होता.
आण्णांचा आवाज ऐकला आणि नन्दनाला एकदम भरून आलं.
” कसे आहात? तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही ना?”आण्णांनी हसत विचारलं.
” नाही हो. काहीतरीच काय?”
” राहुल आहेत ना तिथे? मी बोलू त्यांच्याशी?”
“हो.. देते.”
” राहुल, अण्णा तुझ्याशी बोलतायत.”
” माझ्याशी? कशाला?” मनातली नाराजी लपवायचा प्रयत्न करीत छान प्रसन्न हसून तिने लटक्या रागाने राहुलकडे पाहिलं.
“असं काय करतोयस रे? घे ना..बोल पटकन्.”
“हां आण्णा. हो.आई बोलली मला. आम्हाला कांहीच हरकत नाहीये..पण.. पण एक मिनिट.” मोबाईल वर हात ठेवून राहुल क्षणभर थांबला.मग हलक्या आवाजात नन्दनाला म्हणाला,
” आई सत्यनारायणाची पूजा करायची म्हणतेय आणि मी त्यानंतरची आपली महाबळेश्वरची बुकिंग केलीयत. बघ काय ठरवतेस? माहेर हवंय की महाबळेश्वर?” नन्दनाकडे पहात तो मिष्किल हसत राहिला.
” तू म्हणशील तसं” ठरवून सुद्धा आपल्या बोलण्यातला कोरडेपणा तिला कमी करता आला नाही. राहुलच्या सूचक नजरेनेसुद्धा ती नेहमीसारखी फुललीच नाही….!
मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ? नाही ना ? इथून पुढे —-
लहानपणापासून तर अगदी आता आता पर्यंत कितीतरी वेळा तुला त्यांनी सावरलं असेल. जन्मदाता बाप, तुला वाढवताना ज्याने रक्ताचं पाणी केलं, प्रेमाने मंतरलेला चिऊ काऊचा घास तुला भरवला. वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं. तू दिलेला शी – सू चा आहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला, तुला फ्रिडम दिलं, उच्च शिक्षण, उत्तम करियर, परफेक्ट लाईफ दिली आणि तू मात्र ?… असो तुला हवं तसं वागायला फ्री आहेस तू. पण माझंही जरा स ऐकून घे.
मी ह्या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांची मला साथ लाभली ते म्हणजे नाना. नविन नविन खूप रडायला यायचं. आईची आठवण त्रस्त करायची.
तू कामात बिझी असायचा, अश्या वेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचे ते नाना. एखाद्या वेळी आईंचा ओरडा खाल्ल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच. कधीतरी उदास वाटलं तर जिवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना.
आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे मुळे बरेच थकले, गांगरून गेले. अश्या अवस्थेत त्यांना मी दूर लोटायचं ?
हे मुळीच शक्य नाही अमित. त्यांचा अपमान मी मुळीच खपवून घेणार नाही. उभं आयुष्य मुलांसाठी वाट्टेल तश्या खस्ता खाऊनही आई वडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो.
पण त्यांच्याही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येतं, जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते. मग अश्या वेळी काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं तर कुठे बिघडलं ?
अमितचे डोळे भरून आले. तो नखशिखांत गहिवरला. त्याला त्याची चूक उमगली तसा तो म्हणाला, “मुग्धा, अगं मी काय नानांचा शत्रू आहे का ? पण त्यांच्या अश्या अवस्थेत कुणी त्यांना नावं ठेवलेले किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार. बस ह्याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर.”
“अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची ? आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपसूकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपलाही मान वाढतो अशाने,
आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपलीही पत कमीच होते अमित.”
अमितला मुग्धाच म्हणणं तंतोतंत पटलं. अनावधानाने का असेना पण त्याचं चुकलंच होतं. नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडतच उठला आणि नानांच्या रूम मध्ये शिरला.
नाना अजूनही जागेच होते. अमितची चाहूल लागताच ते उठून बसले. “अरे अमित तू ? ये बाळा, झोपला नाहीस का अजून ? अरे आताशा हात जरा थरथरतात रे माझे म्हणून मघाशी बासुंदी सांडली अंगावर पण आता नाही हं येणार बाळा तुमच्या मित्रमंडळीत मी.”
नानांनी असं म्हणताच अमितचं अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान लेकराप्रमाणे रडू लागला.
“नाही नाना, असं नका म्हणू. मी चुकलो. उलट यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आतापर्यंत जाणते अजाणतेपणी खूप त्रास दिला मी तुम्हाला पण यापुढे फक्त जीवच लाविन नाना तुम्हाला मी.”
लेकाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या नानांना जणू आभाळच ठेंगणं झालं आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातले दोन टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या त्यांच्या लेकाच्या खांद्यावर खळकन निखळले.
रात्री आठ सव्वा आठची वेळ, अमित ऑफिस मधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देवू लागला.
“मुग्धा, ए मुग्धा, अगं ऐक ना, उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरलं आहे आपल्याकडे. प्रतिक आणि प्रिया आले आहेत गोव्याहून एका लग्नासाठी, फक्त दोनच दिवस आहेत ते इथे मग काय आपल्या अख्ख्या गॅंगलाही आमंत्रण देऊनच टाकलं.
अनायसे रविवारच आहे उद्या धम्माल करूया सगळे मिळून. आणि हो, प्रतिकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी काही तरी अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून. खाऊन खाऊन त्याच्या पोटाचं पार गोडाऊन झालंय म्हणे, असं म्हणून अमित खळखळून हसला.
त्याला असं खुश बघून मुग्धाही सुखावली. खरंच किती दिवसांनी असा दिलखुलास हसतोय हा ? नाहीतर नेहमीच कामाच्या व्यापात नको तेवढा बुडालेला असतो.
मैत्रीची जादूच खरं आगळी, सळसळत्या चैतन्याने ओथंबलेलं निखळ निरागस हास्य ही मैत्रीचीच तर देणगी असते ना ?
बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती. एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्यांच्या बायका ह्या सगळ्यांसोबत मुग्धाची छान घट्ट मैत्री जमली होती आणि नेहमीच्या रुटीनला फाटा देवून कधीतरी फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल्ल रिचार्जच. त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता.
हा हा म्हणता रविवारची संध्याकाळ उगवली आणि चांगली दहा बारा जणांची चांडाळचौकडी गॅंग अमित व मुग्धाकडे अवतरली. हसणे, खिदळणे, गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता.
घरात कितीतरी दिवसांनी गोकुळ भरलेलं पाहून अमितचे बाबा, म्हणजेच नानाही खूपच खुश होते. घरी कुणी चार जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे आणि लहान मुलांसारखं अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज मिक्स होत असत.
मुग्धाने मस्तपैकी व्हेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ, वेलदोडा व सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी असा शॉर्ट, स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता.
गप्पा तर रंगात आल्याच होत्या पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव ह्यावरही यथेच्छ ताव मारला जात होता.
सगळेच जण हसण्या – बोलण्यात व खाण्यात मश्गुल असताना अमित जोरात ओरडला, “नाना अहो हे काय, नीट धरा तो बासुंदीचा बाऊल, सगळी बासुंदी सांडवली अंगावर. नविन स्वेटरचे अगदी बारा वाजवले नाना तुम्ही. जा तुमच्या रूम मध्ये जावून बसा पाहू.”
भेदरलेले नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले, तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली. “असू द्या नाना, धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर. काही काळजी करू नका.” असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूच मऊ रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूम मध्ये घेवून गेली.
थोड्याच वेळात मैफिलही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले, तसं प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला व म्हणाला, “वा ! मुग्धा, पुलाव काय, बासुंदी काय, तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय, सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब होत गं.
खरंच खूप छान वाटतंय आज मला. फक्त एक गोष्ट ह्यापुढे लक्षात ठेव मुग्धा, अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आता नको इन्व्हॉल्व करत जावू. काही उमजत नाही गं आताशा त्यांना. उगाच ओशाळल्यासारखं वाटतं मग.”
अमितचं बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून शांत राहिलेली मुग्धा आता मात्र भडकली. “हो रे, अगदी बरोबर आहे तुझं. कशासाठी त्यांना आपल्यात येवू द्यायचं ? पडलेलं राहू देत जावूया एकटंच त्यांना त्यांच्या रूम मध्ये, नाही का ?
मला एक सांग अमित, तू ही कधीतरी नकळत्या वयाचा होताच ना रे ? तू ही त्यांना क्वचित कधीतरी ओशाळवाणं वाटेल असं वागतच असशील, मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ? नाही ना ?
एखादा दिवस असा उजाडतो की,त्या दिवशीचा प्रत्येक क्षण दडपणाखाली असतो फार उदास निराश,चिंतातुर व्हायला होतं.स्वत:वरचा विश्वास उडून जातो.काहीतरी चूक करतोय् असं वाटत रहातं!
कारण नसताना आयुष्यात फार धोका तर नाही ना पत्करला? त्यापेक्षा एखादं सुरक्षित साचेबंद आयुष्य जगणं बरं… स्वत:बद्दलच्या कल्पना नको.निराळ्यावाटा नकोत. काहीतरी टिकवताना मनाची फसवणुक करतोय् का! कशासाठी? काय मिळवण्यासाठी?..
मोनानं रात्रभर झोपू दिलं नाही.सर्दी ,हलका ताप..
रात्रभर बेचैन होती..सकाळी सकाळी तिला झोप लागली.
पण माझा दिवस उगवला होता.त्यातून शेखरला लवकर जायचं होतं.त्याचा लाईन आउट होता.म्हणजे सबंध दिवस त्याचा साईटवर जाणार.मोनाला आज डे केअर मधे पाठवता येणार नाही. मलाही आज रजा घेणं शक्य नव्हतं.घरुनही काम करता येणार नाही.आमच्या कंपनीच नवीन प्राॅडक्ट लाँच होणार होतं. प्रेझेंटेशन माझंच होतं…
शेखरला विचारलं, “तुला आज गेलच पाहिजे कां?”
“अर्थातच!”त्याचं उत्तर.
मनात येतं,कधीतरी याने त्याच्या मीटींग्ज, अपाॅईन्टमेन्ट्स जुळवून घ्याव्यात की..माझंही रजांचं वेळापत्रक बघावं लागतं.अजुन वर्ष संपायला वेळ आहे.
शेखरची तयारी भराभर करुन दिली.तो गेला.
क्षणभर वाटलं..’मी कमावते..खरं म्हणजे शेखरपेक्षा थोडं जास्तच..मला कंपनीत मान आहे.माझ्या शिक्षणाचं करीअरचं चीज होतंय या सर्वांचं महत्व कोणाला आहे?
शेखर तर नेहमीच म्हणतो, “सोडुन दे नोकरी…”
माझ्या धडपडीचा .स्वत्व टिकवण्याचा संसाराला काहीच उपयोग नाही का?हे जे राहणीमान सांभाळलय त्यात माझ्या कर्तृत्वाचा काहीच वाटा नाही का? ही जाणीव त्याला आहे का? असेलही .पण कबुली नाही. ईगो..
प्रेस्टीज ईश्शु…मला मात्र सारखं अपराधी वाटत..प्रचंड गील्ट येतो कधीकधी….
साराला सवयीनं सगळं माहीत झालंय् .मोनाला घरी ठेवायचं असलं की मी तिला बोलावते.ती करतेही
व्यवस्थित..तरीही धाकधुक .साशंक मन…
आॅफीसमधे जायला निघताना सारा म्हणालीही..
“नका काळजी करा ताई .निवांत जावा..मि हाय ना…”
साराच्या या बोलानं कितीतरी धीर मिळाला.
तसा मोनाचा त्रास नसतोच.खूप शहाणी गुणी आहे ती. पण तिचं शहाणपणच मला हळवं करत.माझ्या मागे तिच्या वाटेला येणारं हे काही तासांचं विलगीकरण…ती दिवसभर मजेत असते.खेळते बागडते कारण ती अजाण आहे…तिच्या भावनांना अजुन आकार नाही आलाय्…
आफीसमधे पोचेपर्यंत विचारांची साखळी तुटली नाही….
भाग २
पपांची मेल आली होती.आजीच्या तब्येती विषयी लिहीलं होतं.रजा मिळाली तर येउन जा एखादा अठवडा..तिलाही बरं वाटेल..वर्ष उलटलं तू आली नाहीस..
आधीचं दडपण या मेलनं आणखी वाढलं. जाॅब नसता तर भुर्रकन् उडुन जाउन आजीला भेटुन आले असते…
ऊगीच मोठे झालो. बंधनं वाढली अन् माया दूर गेली.जवळची माणसं दूर गेली.त्यांचा सहवास मिळत नाही…त्यातून व्हीसाचे प्राॅब्लेम्स.वेळ मिळाल्यावर पपांना सविस्तर मेल लिहायचं ठरवलं..
“माझं छान चाललंय्..मोनाही रुटीनशी अॅड्जस्ट झाली आहे.मला लवकरच वरची पोस्ट मिळेल.मागच्या रविवारीच एका सोशल कँपच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली..इथल्या ईमीग्रन्ट्सच्या बर्याच समस्या आहेत.दिसतं तसं, वाटतं तसं, काहीच नाही…दुरून डोंगर साजरे..”पपा खूश होतील मेल वाचून.
प्रेझेंटेशन छान झालं. खूप अभिनंदन.खूप प्रशंसा.!!
थोडं रिकामपण मिळालं.
पुन्हा मनातला कोवळा कोंब हलकेच उघडला. वाटलं इतका वेळ यांत्रिकपणे काम केलं’जणू मी म्हणजे एकच व्यक्ती नव्हते.दोन वेगळ्या व्यक्ति एकाच ठिकाणी एकत्र आल्यासारख्या होत्या.त्यातली एक निरंतर चिंतातुर. सतत टेन्स्. विचारमग्न. आत्मविश्वास हरवलेली. काय चूक काय बरोबर काहीच न समजु शकणारी..
पण दुसर्या व्यक्तीने त्या व्यक्तीलवर वर्चस्व गाजवलं होतं. ती तेजस्वी होती, निराळी होती. स्वत:ची ओळख टिकवणारी..आत्मनिर्भर….
उठले. पटकन घरचा नंबर फिरवला.काही वेळ रिंग वाजली पण फोन ऊचलला गेला नाही. तोपर्यंत मनात हजार शंका…पण पलिकडुन फोन उचलला गेला आणि मी लगेच म्हणाले, “मी बोलतेय्..”
मोनाच्या रडण्याचा आवाज येत होता.पुन्हा कालवाकालव!!!
“मोना कां रडते?”
“आत्ता झोपेतुन उठली”
“भात खाल्ला?”
“हो”
“औषध दिलंस?”
“हो”
“आणि चाॅकलेट मिल्क?”
“सगळं नाही संपवलं…”
बरं. संध्याकाळी तिला वाॅश दे आणि कम्युनाटी पार्क मधे घेउन जा….”मला जरा उशीर होईल.
जरा टेन्शन दूर झाल्यासारखं वाटलं.पण तगमग होतीच.
कदाचित ही तगमग आयुष्यभर राहील. जणु माझा अतुट घटक असल्यासारखी.खरं म्हणजे शेखर जेव्हां म्हणतो “जाॅब सोड..”तेव्हां वाटतही द्यावा सोडून.लाईफ पीसफुल होईल.पण नाही..स्वत:लाच हरवुन बसल्याची एक भलीमोठी रूखरूख कायम राहून जाईल.म्हणजे कुठलीतरी एक शांती मिळवण्यासाठी दुसरीकडे अशांत रहायचं.साराच विरोधाभास.यातूनच सीझन्ड व्हायचं..
संध्याकाळच्या मीटींगला हजर राहण्याची मुळीच इच्छा नव्हती. वाटलं सांगून द्यावं, “माझी मुलगी आजारी आहे, मला नाही थांबता येणार…”पण सगळीकडे बरोबरी करायची.समान हक्कासाठी भांडायचं.आणि मग अपरिहार्य कारणाचं पांघरुण पसरुन सवलत मागायची हे बरोबर नाही….