मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.) – इथून पुढे

यशापयश हे सुद्धा सुखदुःखासारखेच सापेक्ष आहे. अमुक मार्क मिळविले, अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळाला, नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, परदेशात जाता आले, मोठ घर बांधता आले, महागडे वाहन विकत घेता आले किंवा एखादे स्वप्न सत्यात आणता आले तर आपण यशस्वी झालो आणि यामधील मोजक्याच गोष्टी करता आल्या किंवा यातील काहीच जमलं नाही तर मी अपयशी झालो. ही दोन्हीही वाक्ये अर्धसत्य आहेत. जोपर्यंत आपण हिंमत हरलेलो नाही तोपर्यंत आपण अपयशी असूच शकत नाही. जीवनातील यश हे नेहमी कोणते शिखर पार केले यापेक्षा ते पार करताना किती अडथळे आले यावर ठरत असते आणि ठरायलाही हवे. एखादं वेळेस लौकिक दृष्ट्या मनुष्याला अपयश येऊ शकते. पण या सर्व घडामोडीत, धबडग्यात ‘मनुष्य’ म्हणून आपले मूल्य वाढविणे हे सुद्धा यशस्वी होणेच होय. एका वाक्यात यश म्हणजे काय सांगायचे असेल तर खालील प्रमाणे सांगता येईल. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।” तसेच यशाची आणिक एक सोपी व्याख्या आहे. ‘आपल्याला लौकीक जीवनात किती यश मिळालं यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांना यश मिळविण्यासाठी किती मदत करता आली’.

समाधान नावाची कोणतीही वस्तू बाजारात मिळत नाही. ज्याला स्वतःला नक्की काय हवे आहे हे योग्य वेळी कळते, तो ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कधीकधी तो गोष्ट मिळतेच असे नाही. पण तरीही आपण पुरेसे कष्ट घेतले, योग्य ते प्रयत्न केले असे समजून ही माणसे नवीन जोमाने परत कार्यरत होताना दिसतात. यश मिळालं नाही तर रडत न बसता केलेल्या प्रयत्नातून अमुक एक गोष्ट शिकता आली याचेही त्यांना समाधान असते. कोणतेही काम उरकण्यापेक्षा त्यांचे कामाच्या परिपुर्णतेकडे जास्त लक्ष असते.

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”

किंवा

“रण जिंकून नाही जिंकता येत ‘मन’।

‘मन’ जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

आधुनिक विज्ञान असे सांगते की जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती अधिक शक्तिशाली आणि नियंत्रित करण्यासाठी जिकिरीची असते. अणुबाँब किंवा अणुशक्ती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मानवी मन यापेक्षा सूक्ष्म असते. अणू प्रयोगशाळेत तरी दाखवता येईल पण मनाचा थांगपत्ता लागणे अतीमुश्किल !!

म्हणून कोणतेही संत असोत, त्यांनी सर्वप्रथम उपदेश आपल्या मनाला केला असावा. नुसता उपदेश केला नाही तर मनाला प्रसन्न करुन घेण्याचे विविध मार्ग त्यांनी आपल्यासाठी सहज उपलब्ध करुन दिले आहेत. मुळात मन प्रसन्न का करायचे? याचा आधी विचार करायला हवा. मला जीवनाकडून नक्की काय हवे आहे? मनुष्य म्हणून माझा जन्म झाला असेल तर मनुष्य म्हणून माझे काही विहित कर्तव्य असलेच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असे विज्ञान सांगते, तर माझा जन्म झाला याला काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार. ? मनुष्य म्हणून आपण सर्व सारखे असलो तरी आपण एकाच कारखान्यात उत्पादीत केलेले एकाच वजनाचे, एकाच सुगंधाचे ‘साबण’ नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जीवनध्येय वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. ते जीवनध्येय शोधणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. पण मनुष्य देहबुद्धीच्या अधीन जाऊन ‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन’ यालाच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आणि

*”पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं” याच चक्रात फिरत राहतो.

आतापर्यंत आपण सामान्य मनुष्य कसा वागतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यामुळे मनुष्याचे कसे नुकसान होते हे आपण पाहिले. प्रत्येकाला आनंद / समाधान हवे आहे पण ते का मिळत नाही हे सुद्धा आपण पाहिले. आता तो कसा मिळवायचा ते आपण पाहूया.

सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.

आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.

१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते

२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.

३. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.

४. मी आजपासून दृढनिश्चय केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.

५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.

६. सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.

समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.

अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.

आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.

एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.”

हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी अमक्याची आई अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे.

म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींची पेटी… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ आठवणींची पेटी… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

माढ्याच्या काकू.

आता पक्ष पंधरवडा सुरू झाला आहे पितरांचं स्मरण करायचं.. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची.

श्राद्धपक्ष करायचं. गोडधोड करायचं. पितरांच स्मरण करून तर्पण करायचे… म्हणजे त्यांना तृप्त करायचे..

त्यासाठी आई वडील सासू सासरे …. यांच्या बद्दल लेख लिहून झाले.

मनात विचार आला … फक्त पितरंच कशाला? पितरांप्रमाणेच आपल्याला प्रेम, माया, स्नेह देऊन ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं त्यांची थोडीशी आठवण काढू…

म्हणून हा माढ्याच्या काकूंवर लेख लिहिला – – – – 

… लग्न होऊन मी पुण्यासारख्या शहरातून सोलापूर जवळच्या माढा या छोट्याशा गावात गेले. हे तिथल्या स्टेट बँकेत नोकरीला होते. एका डॉक्टरांच्या वाड्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. डॉक्टरांच्या आईंना काकू म्हणत असत. त्यांचा मला मोठा आधार वाटायचा. मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकले.

वाड्याच्या दरवाज्याच्या दारात एक मोठा आडवा कट्टा होता. संध्याकाळ झाली की त्या कट्ट्यावर काकु येऊन बसायच्या. आसपासच्या बायका गप्पा मारायला यायच्या. जाणारे येणारे थांबून बोलायचे.

गावात लायब्ररी होती. पुस्तकं बदलायला, भाजी आणायला मी संध्याकाळी बाहेर जात असे. येताना काकु म्हणायच्या … ” ये बैस थोडावेळ “

तो कट्टा म्हणजे गंमतच होती. अनुभवानी मला तर त्या कट्ट्याच वेडच लागलं. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं.

चार घर पलीकडे टाकून असलेली कमला लहान बाळाला घेऊन आली. “काकु बघा ना. हा नुसता रडतोय झोपतच नाहीये. “

” अग जरीची कुंची घातलीस टोचतीय बाळाला. “

” माझ्या आईनी शिवलीय”

” म्हणून काय झोपताना घालशील? जा साध टोपडं घेऊन ये” 

काकुंनी कुंची काढली. पदरानी बाळाचा चेहरा, मान पुसली. पेपर घेऊन वारा घालायला लागल्या.. काही वेळातच बाळ गाढ झोपलं. जरा वेळाने येऊन ती बाळाला घेऊन गेली.

एक वेडसर मुलगा कधीतरी यायचा.

” ये बस ” काकुंनी म्हटलं की तो जमिनीवरच बसायचा. आत जाऊन त्याला पोळी, भाजी एखादं गोड काही असेल ते घेऊन यायच्या. मला म्हणाल्या,

” अशी माणसं देवाची असतात बघ.. देवानंच त्यांना असं घडवले. त्यांचा कधी राग राग करू नये. मनाने निर्मळ आहे ग ते लेकरू”

एक अतिशय सुंदर, शालीन बाई जरीची साडी नेसलेली डोक्यावरून पदर घेतलेली रस्त्याने जाताना काकुंना ” बऱ्या आहात का “?म्हणाली

” हो मी बरी आहे”

” जरा देवीला जाऊन येते. “

“ये हो”

मी म्हटल “किती सुंदर आहेत ह्या बाई. कोण आहेत”

“तू नवीन आहेस. तुला अजून काही माहित नाही. “

तेवढ्यात एक बाई म्हणाली.. ” खूप मोठं घर आहे तिचं… आणि हंड्या, झुंबर आहेत तिच्या घराला “

मी म्हटलं ” कधीतरी बघायला पाहिजे “

लगेच काकु कडक आवाजात मला म्हणाल्या, ” खबरदार काही बघायला जायची जरूर नाही. तिच्या घरी कधी जायचं नाही. पाटलाची रखेल आहे ती. “

… मी एक धडा घेतला.

पलीकडच्या घरातली नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. ” काकु वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालंय. सासुबाई गावाला गेल्यात. काय करू?”

” चार बटाटे उकडून भाजीत घाल. तिखट, कूट घाल. “

” पण त्यानं वाढीव भाजी होईल.. ” 

” उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर घाल आणि त्याची थालीपिठं कर “

“चांगली होतील का “?

“अग करून तर बघ. आणि लक्षात ठेव अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात”

दुसरे दिवशी ती सांगत आली, ” सगळ्यांना थालपीठं फार आवडली. कोणाला काही कळलं नाही. अगदी तुला मला झालं. “

…. संसाराला सुरुवात करतानाच अन्नाचा मान राखायचा, वाया घालवायचं नाही. हा संस्कार तिला मिळाला आणि मलाही…

एके दिवशी मी खाली कट्ट्यावर गेले नव्हते. शेजारची बायडी मला बोलवायला आली.

” खाली चला काकूंनी तुम्हाला बोलावलंय. बायजा येणार आहे. “

कोण बायजा मला कळेना. खाली गेले तर कट्टा फुल भरलेला होता. खाली मातीत सुद्धा बायका बसल्या होत्या. एक साधीशी बाई डोक्यावरून पदर घेतलेली…. तीच बायजा ओटीवर बसली होती. मला फारच उत्सुकता लागली. सगळ्या जमल्या तस काकूंनी तिला सांगितलं 

” हं कर सुरू “

बायजानी संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग सुरेल आवाजात म्हटले. एक जण म्हणाली,

” ए ते जनीच गाणं म्हण ना, तुझं ते गाणं आम्हाला आवडत. “

मग जनाबाईची गाणी झाली. गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या बायजानी म्हणून दाखवल्या.

आज वाटतं तेव्हा त्या लिहून ठेवायला हव्या होत्या. सगळ्या तिचे कौतुक करत होत्या.

… नंतर लक्षात आलं की तिथे एका गायिकेचा लाईव्ह कार्यक्रम सादर झाला होता. जाणारे येणारे पण ऐकत उभे होते. काकुंनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला…

“देवानी आवाजाची देणगी दिली आहे तुला. भाग्यवान आहेस बघ. ” बायजानी काकूंना वाकून नमस्कार केला. बायजाच्या कलेचा छोटासा सन्मान त्यांनी केला. इतरांना त्याचा आनंद दिला… किती गोड कल्पना… एखाद्याच्या कलेला कशी दाद द्यावी हे मी शिकले.

काकूंचा मुलगा डॉक्टर होता. पण पेशंट काकुंनाच औषधं विचारायचे. घरगुती उपायांची तर त्यांच्याकडे पोतडीच होती.

गुराखी, रात्री येणारा रामोशी जाताना दिसला की त्याला जवसाची, तिळाची, दाण्याची चटणी दे. नाहीतर जे काही घरात असेल ते त्याला बोलवून त्या द्यायच्या.

माझ्या मुलाला आनंदला पहिला भात त्यांनीच भरवला. काकुंनी सांगितलं

“लहान लेकराला सारखं घरात ठेवू नये. सगळीकडे न्यावं म्हणजे लेकराला काही बाधत नाही. “

आज लक्षात येतं … मुलांची प्रतिकारशक्ती सहज कशी वाढवायची हे काकूंनी मला शिकवलं.

ही जुनी जाणती माणसं म्हणजे चालती बोलती ज्ञानाची पुस्तकं असतात. हे आज लक्षात येतं.

जगात वावरताना लागणाऱ्या अनेक गोष्टी नकळतपणे मी त्या कट्ट्यावर शिकले.

रोज काहीतरी तिथं नवं घडत असायचं. कधी तरी काकू एकट्या पण असायच्या…

सुनेला भाकरी करता येत नाही अशी तक्रार करण्याला बाईला त्या म्हणाल्या.. ” लोकाची पोर आपल्या घरी आली आहे. आता ती आपली झाली आहे. घे सांभाळून… पुरुषांच्या चार भाकरी तू कर. तिच्या तुटक्या भाकरी तुम्ही खा. हळूहळू शिकेल ती पोर… “

त्यांच इतकं सहज सोपं तत्वज्ञान होतं. प्रश्न फार पुढे जाऊ द्यायचेच नाहीत. तिथल्या तिथे उपाय सांगायच्या…

अशी निर्मळ मनं, प्रेमळ नाती अनुभवायला मिळाली आजही काकू… आणि त्यांचा तो कट्टा स्मरणात आहे.

एकदा काकू एकट्याच कट्ट्यावर होत्या. म्हटलं 

“आज कोणी नाही तर तुम्हाला करमत नसेल ना ?”

तर म्हणाल्या, ” सांगू का तुला.. कोणी नसेल ना तर मी आपला ‘श्रीराम जय राम जय जय राम ‘ जप करत बसते. तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ. ” 

असं खरखुरं अध्यात्म काकू जगत होत्या……

“ साधं सोपं जगणं हीच श्रीमंती आहे. ”.. हे काकूंच्या वागण्यावरून मी शिकले. अशी माणसं आयुष्य समृद्ध करतात. आणि आयुष्यभर लक्षात राहतात. ही माणसं आयुष्यात आली हे माझ भाग्यच..

… आज त्यांच्या आठवणीने गहिवरूनच आलं आहे … थांबते आता इथं….

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ☆ श्री संभाजी बबन गायके 

(मारता, मारता.. मरे तो झुंजणारा कमांडो ! ) 

03-00-01-10… Three Overs-No Maiden-One Run-Ten Wickets.

ज्यांना क्रिकेटची भाषा समजते त्यांना वरील आकडेवारीचा अर्थ निश्चित समजेल. इतरांसाठी सांगतो… तीन षटके गोलंदाजी केली, त्यातील एकही षटक निर्धाव गेले नाही.. एक धाव दिली आणि दहा बळी घेतले! एकाच डावात सर्वच्या सर्व गडी बाद करायचे म्हणजे दहा बळी घ्यायचे, असे क्रिकेट इतिहासात आजवर केवळ तीन वेळा घडले आहे. १९९९ मध्ये अनिल कुंबळे याने पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली होती आणि त्याची ही कामगिरी अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

– – – पण लढाईच्या मैदानावर खरोखरच्या कसोटीत दहा बळी घेणा-या आणि त्या प्रयत्नात स्वत:ही बळी गेलेल्या एका श्रेष्ठ सैनिकाची कहाणी लोकांच्या लक्षात नाही, कारण ती कुणाला ठाऊक नाही… म्हणून हा एक अल्प प्रयत्न!

वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकीत, आरंभी साधा शिपाई म्हणून सैन्यात भरती झालेला तो नौजवान स्वयंस्फूर्तीने PARA SF म्हणजे PARACHUTE SPECIAL FORCE च्या नवव्या रेजिमेंट मध्ये २००२ मध्ये दाखल झाला आणि बघता बघता लान्स नायक पदावर पोहोचला.

स्पेशल फोर्स खरेच नावाप्रमाणे विशेष असते. यांतील निवड प्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते. आधी निष्णात Parachute Diver (हवाई छत्रीच्या साहाय्याने विमानातून उडी मारणारे) व्हावे लागते, नंतरच्या अधिक कठीण प्रशिक्षणात इतर भयावह कामांसह काही तासांत शंभर किलोमीटर्सचे अंतर पायी पार करायचे, त्यात खांद्यावर दहा किलो वजन आणि सात किलो वजनाचे शास्त्र वाहून न्यायचे, अशी अनेक आव्हाने असतात. थोडक्यात सांगायचे तर, ह्या गटात सामील होऊन ‘Balidaan Badge’ मिळवायला वाघाची छाती, सिंहाची हिंमत, हत्तीचे बळ, घोड्याचे चापल्य आणि पाषाणाचे काळीज लागते. हा मान मिळवण्यासाठी आलेल्या सैनिकांपैकी केवळ दहा ते पंधरा टक्केच सैनिक स्पेशल ठरतात! याचाच अर्थ उत्तमातून सर्वोत्तम सैनिक निवडले जातात. आणि यातील एक सैनिक गमावला जाणे, म्हणजे देशाची केवढी मोठी हानी होते, हे लक्षात घेतले जावे!

भारताच्या इतर सीमांच्या तुलनेत पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू काश्मीर येथील सीमेवर गेली कित्येक वर्षे काही न काही घडत असते. याच भागातून पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसतात आणि स्थानिक युवकांना हाताशी धरून, भडकावून भारत देशविरोधी कारवाया करतात. या अतिरेक्यांना रोखून धरण्याचे काम राष्ट्रीय रायफल्स सारखे सैन्य विभाग करीत असतात. PARA Special Force चे commandos सुद्धा इथे तैनात असतात. गरज पडली तर अतिरेकी सीमेत घुसण्याच्या बेतात असताना त्यांच्या सीमेत घुसून त्यांना संपवण्याचे धाडसी कामही आपले जवान पार पाडतात. हे कमांडो छोट्या छोट्या गटांनी आपली कामगिरी बजावत असतात. आजवर सुमारे आठ हजार अतिरेकी भारतीय सैन्याने यमसदनी धाडले असून सहा हजार जणांना जिवंत पकडले आहे. आणि या प्रयत्नात शेकडो भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे…. यावरून काय ते समजावे! आजही, या क्षणीही हे छुपे युद्ध सुरु आहे. आजही आपली पोरं मारत आहेत आणि मारत आहेत! याची जाणीव आपण सतत ठेवली पाहिजे.

आजचे आपले कथानायक मोहन नाथ गोस्वामी उत्तराखंड मधील नैनीताल मधील लालकुंआ जवळच्या इंदिरानगर गावात ५ मे, १९८४ रोजी जन्मले. त्यांचे वडील सैन्यातच कार्यरत होते. त्यांच्यापासून स्फूर्ती घेउन मोहन नाथ सैन्यात भरती झाले. अतिशय नीडर, शूर आणि पराक्रमी असलेल्या मोहन नाथ यांना काश्मीर मधील खरोखरची लढाई खुणावत होती. अतिरेक्यांना मारण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. २००५ मध्ये त्यांनी para sf स्पेशल फोर्सेस मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज दिला आणि अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करून ते 9, Parachute Battalion Commando बनले. भीती नावाचा शब्द शब्दकोशात नसलेले मोहन नाथ अगदी आरंभापासून सर्व मोहिमांमध्ये आघाडीवर असत. दहा वर्षांत ते लान्स नायक पदावर पोहोचले. 13625566W हा त्यांचा सर्विस क्रमांक होता. खरं तर सेवाज्येष्ठ असल्याने आता त्यांना सतत प्रत्येक मोहिमेवर जाण्याची गरज नव्हती. इतर कनिष्ठ सहकाऱ्यांना ते पुढे पाठवू शकत होते. त्यांचे वरिष्ठही त्यांना तसे सुचवत… पण मोहन नाथ यांना कर्तृत्व गाजवून दाखवायचे होते.. देशासाठी शत्रूला नेस्तनाबूत करण्यात त्यांना जास्त रस होता.. ते कुटुंबियांना नेहमी सांगायचे… मरुंगा तो दस बारा दुष्मनोको मार कर!

“सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ते सिनिअर अधिकारी साहेबांस मोहिमेवर पाठवा असा हट्ट धरीत… आणि म्हणत… मी करून दाखवेन, साहेब!

आणि तसा एक नव्हे तर लागोपाठ तीन प्रसंग घडले. कुपवाडा परिसरात ६, राष्ट्रीय रायफल्स तैनात होती. 9, Para SFसुद्धा इथे सक्रीय होती. अतिरेकी शोध आणि विनाश मोहीम हाती घेतली गेली २२ ऑगस्ट, २०१५ रोजी रात्री. पाकिस्तानातून काही अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. मोहन नाथ गोस्वामी आपल्या तुकडीतील इतर कमांडो साथीदारांसह अतिरेक्यांना भिडले. या धुमाश्चक्रीत आपला एक सैनिक जायबंदी झाला. भीषण गोळीबाराची तमा न बाळगता मोहन नाथ यांनी त्या साथीदाराला खांद्यावर घेतले आणि सुरक्षित जागी पोहोचवले आणि पुन्हा मोर्चा सांभाळत ३ अतिरेक्यांचा खात्मा केला. लगेचच २६ ऑगस्ट, २०१५च्या रात्री ते पुन्हा मोहिमेत सामील झाले आणि विजयी होऊन परतले. आणखी तीन बळी मिळवले होते! यावेळी मूळ पाकिस्तानी असलेला एक कुप्रसिद्ध अतिरेकी जिवंत पकडण्यात आपल्या सैन्याला यश मिळाले. या दोन मोहिमांमध्ये सहा अतिरेकी खलास केले गेले. २ सप्टेंबर, २०१५… तिसरी मोठी मोहीम निघाली… अर्थातच मोहन नाथ गोस्वामी सर्वांत पुढे होते…. कुपवारा जिल्ह्यातील हापरुदा येथील घनदाट जंगलात अतिरेक्यांचा एक मोठा गट घुसल्याची माहिती मिळाली…. या लबाड श्वापदांना सापळा रचून जेरबंद करण्याची योजना होती. रात्रीचे आठ सव्वा आठ झाले असतील… अचानक चार अतिरेकी टप्प्यात आले… दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. मोहन नाथ यांचे दोन सहकारी जबर जखमी झाले.. अतिरेक्यांनी त्यांना पुरते घेरले होते आणि त्या दोघांच्या जीवाला मोठा धोका होता.. मोहन नाथ आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकारी कमांडोसह आडोसा सोडून बाहेर आले… गोळीबार सुरूच होता… चार पैकी एकाला त्यांनी अचूक ठोकले… उरलेले तीन अतिरेकी गोळीबार करीत पुढे येत असतानाच… मोहन नाथ साहेबांनी त्यांच्यावर झेप घेतली… साहेबांच्या मांडीमध्ये गोळ्या घुसल्या… पण त्याची काळजी न करता ते पुढे सरकले… त्यांनी आणखी एक बळी घेतला… त्याच्या थेट काळजात गोळी घातली… दुसऱ्याला गंभीर जखमी करून त्याला मरणपंथावर ढकलला… आता मोहन नाथ यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या… त्यांनी चौथ्या अतिरेक्याच्या अंगावर वाघासारखी झेप टाकली… त्याच्या छाताडावर गन टेकवून ट्रिगर ओढला… आणि आणखी एक अतिरेकी नरकात धाडला. पण तो पर्यंत मोहन नाथ साहेबांच्या जखमांतून प्रचंड रक्तस्राव झाला होता. या मोहिमेत त्यांनी चार अतिरेकी ठार मारण्यात मोलाची कामगिरी बजावली होती आणि शिवाय आपल्या तीन साथीदारांचे प्राणही वाचवले होते.. स्वत:चे प्राण देऊन! सलग ११ दिवसांत हाती घेतलेल्या अतिरेकीविरोधी ३ मोहिमांत commando लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांनी १० अतिरेकी ठार मारण्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता… आणि एकाला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती! “दहा शत्रू तर नक्कीच मारीन” हे त्यांचे शब्द त्यांनी खरे करूनच प्राण सोडले…. सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है? या त्यांच्या प्रश्नाला एकच उत्तर होते.. लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी साहब… आप जैसा बहादूरही इस काम को अंजाम दे सकता है!

या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी, 9, PARA SF Commando यांना मरणोत्तर अशोकचक्र (शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान) प्रदान करून गौरवले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवीची ओटी… लेखिका – सुश्री संजना इंगळे ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 देवीची ओटी… लेखिका – सुश्री संजना इंगळे ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

“मध्ये कुठेही थांबू नकोस, 10 च्या बसने तडक गावच्या लक्ष्मी मंदिरात ये… “

“हो सासूबाई.. “

“आणि काय काय घ्यायचं लक्षात आहे ना. ?”

“हो पण.. परत एकदा सांगता का, चेक करून घेते.. “

“किती गं वेंधळी तू, देवीची ओटी कधी भरली नाहीये का?? बरं एक काम कर, तुपाचा दिवा लागेल… तूप घे एका डबीत.. देवीसाठी एखादी साडी घे, बांगड्या आणि नारळ.. थोडीशी फुलं… आलं का लक्षात??”

“हो हो सासूबाई.. “

नीरा आज ऑफिस ला उशिरा जाणार होती, महत्वाची मिटिंग होती त्यात नीरा चे sugestions वापरण्यात येणार होते… पण सासूबाईंचा हट्ट…

नीरा आणि सूरज नोकरीनिमित्त फ्लॅट मध्ये रहात होते… सासर 30 किमी वर होतं… देवीची ओटी भरायची म्हणून सासूबाई गावच्या मंदिरात जाणार होत्या, सूनबाईनेही ओटी भरावी म्हणून त्यांनी तगादा लावला.. नीरा ने सासूबाईंच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांना प्राधान्य दिलं आणि तयारीनिशी ती निघाली.. धावपळ बरीच झालेली तिची…

अखेर ती बस पकडून मंदिरात पोचली, सासूबाई तिचीच वाट बघत होत्या..

“हे काय?? ड्रेस वर आलीस?? साडी तरी घालायची… “

“अहो आई इथून सरळ ऑफिस ला जायचं म्हणून.. “

“काय बाई आजकालच्या मुलींना देवाधर्माचं काही कळत नाही.. बरं चल ओटी भरून घेऊ.. “

दोघीजणी आत गेल्या… तिथे एक वृद्ध पुजारी होते… देवीसमोर ओटी ठेवली की ते घेत असत.. आणि आत गाभाऱ्यात देवीला ठेवत..

त्यांना पाहून नीरा हसली, त्यांनीही प्रतिसाद दिला..

“तुम्ही ओळखता काय एकमेकांना??”

“हो… आम्ही.. “

“ते जाऊदे, गुरुजी ओटी भरून घ्या देवीला.. “

सासूबाई तिला तोडत म्हणाल्या… सासूबाईंनी साग्रसंगीत एकेक वस्तू परंपरे प्रमाणे देवीला वाहिली… नीरा गोंधळून गेली… तिला काही समजेना नक्की काय करायचं..

“आधी हळद कुंकू वाहा… अगं हे बोट नाही, त्या बोटाने.. आता अक्षता.. आता साडी ठेव, त्यावर पाच मुठा तांदूळ… एक मूठ परत घे… नारळ दे… “

नीरा सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे सर्व करत होती.. सासूबाई मधेच ओरडल्या..

“अगं ही कुठली साडी?”

“मी दिवाळीत काही साड्या घेतलेल्या, ही काही वापरत नाही मी.. “

“अगं एक दीड हजार ची साडी आहे ती… देवीला साधी 100 रुपयाची साडी द्यायची असते.. अरे देवा.. दिवाळी काढणार ही मुलगी… आणि हे तुप कुठलं?”

“घरी कढवलेलं… “

“अगं दिव्यासाठी बाजारातून स्वस्तातलं तूप आणायचं… आणि ह्या बांगड्या??”

“माझ्याच… नवीन घेतलेल्या, पण वापरल्या नाहीत.. “

सासूबाई डोक्याला हात लावतात… देवीला हात जोडतात, “देवी माते… सुनबाई अजून नादान आहे, तिची चुकी माफ कर, आणि ओटीचा स्वीकार करून आम्हाला पाव बाई.. “

गुरुजी सगळं बघत असतात, हे सगळं बघून म्हणतात..

“देवी तुम्हाला नाही पण तुमच्या सूनबाईला पावेल हो.. “

“काय?”

“होय… तुम्ही पूजा करताना स्वस्त, टाकून दिलेल्या, आपल्याला उपयोगात नसलेल्या वस्तू देवाला वाहतात, पण तुमच्या सुनेने घरी काढवलेल्या तुपाचा दिवा लावला, तिचीच एक साडी देवीला दिली, स्वतःच्याच बांगड्या देवीला दिल्या… देवीला तुम्ही जे अर्पण करता त्याच्यामागचा भाव हवा असतो.. तुमचा मोह तूप, साडी, बांगड्यांत आहे… पण तुमच्या सुनेने कसलाही मोह न धरता स्वतःच्याच वापरातील एक भाग काढून देवीला दिला… हेच महत्वाचं असत… एखादा लहान मुलगा आपला आवडता खाऊ खात असताना एक घास हळूच आईला भरवतो तेव्हा आईला किती कौतुक वाटतं, तेव्हा उष्टा घास भरवला म्हणून आई रागवत नाही… तसंच आहे हे… आणि देवीला मिळालेल्या चांगल्या वस्तू मी अनाथाश्रम मध्ये देऊन येतो, तुमच्या सुनेशी तिथेच भेट झालेली, ती दर महिन्याला तिथे देणगी देऊन येते… “

सासूबाईंना खूप वाईट वाटलं, देवाधर्माचं करत नाही म्हणून आपण सूनबाईला किती बोललो, पण खऱ्या अर्थाने तीच खरी भक्ती करतेय.. आपण फक्त स्वार्थीपणाने मोहात अडकून यांत्रिक पूजा करतोय याची त्यांना जाणीव झाली.

लेखिका : संजना सरोजकुमार इंगळे

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘‘लता मंगेशकर : सप्तसुरांच्या गंधर्वगायनाची आकाशगंगा’’– ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘‘लता मंगेशकर : सप्तसुरांच्या गंधर्वगायनाची आकाशगंगा’’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(२८ सप्टेंबर १९२९- ६ फेब्रुवारी २०२२)

नमस्कार प्रिय मैत्रांनो! 

एको अहं, द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति!’

(म्हणजे फक्त मीच आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, ना माझ्यासारखे कोणी आले आहे ना माझ्यासारखे कोणी येणार आहे. ना भूतकाळात असे काही घडले आहे, ना भविष्यात असे काही घडणार आहे!) 

वरील अवतरण गान सरस्वती लता मंगेशकरवर सर्वोपरी उचित रूपाने लागू होते. लता मंगेशकरला शास्त्रीय संगीताचा वारसा महान नाट्यअभिनेता गायक तिचे पिता दीनानाथ मंगेशकर यांच्या कडून मिळाला. लहानग्या लताच्या गायनी कळा दीनानाथांनी ओळखल्या आणि तेव्हापासून तिचा जो रियाज सुरु झाला तो अविरत सुरूच राहिला. शास्त्रीय गायन करण्याची संपूर्ण क्षमता असूनही पित्याच्या अकाली निधनानंतर तिचे वडिलांकडून संगीतदीक्षा अधुरी राहिली. सिनेक्षेत्रात पदार्पण केल्यावर देखील प्रतिभावान गुणी संगीतकारांनी तिचे हे शास्त्रीय संगीतातील प्राविण्य ओळखून तिला अशा कांही संगीतरचना बहाल केल्या की पट्टीचे संगीतकार देखील अवाक झाले. बडे गुलाम अली खान आणि बेगम अख्तर सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी तिला खूप नावाजले आणि तिच्या या स्वरगंधाराची मुक्त कंठाने तारीफ केली.        

मंडळी, लता मंगेशकरवर लिहिणे म्हणजे एखाद्या समुद्रातील रत्ने शोधून त्यांचे मूल्यमापन करणे सोपे, पण लताने गायलेल्या हजारो गाण्यांपैकी कांही निवडक गाण्यांवर लिहिणे त्यापेक्षा दुष्कर कार्य आहे. म्हणूनच या लेखात शास्त्रीय संगीतावर आधारित अशा माझ्या आवडत्या निव्वळ तीन गाण्यांविषयी चर्चा करीन. शास्त्रीय संगीत शिकलेले नसतांना देखील माझ्यासारखी अज्ञ व्यक्ती हे लिहायचे धाडस करीत आहे, कारण लता आमच्या हृदयात सदैव अक्षय संगीतप्रेमाचे प्रतीक अशी लतादीदी म्हणूनच अमर आहे.   

पहिले गाणे आठवले ते ‘ऋतू आये ऋतू जाये सखी री, मन के मीत न आये’ हे ‘हमदर्द’ (१९५३) सिनेमातले गाणे, गायले आहे लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी! चार कडवी चार शास्त्रीय रागात बांधली आहेत बुजुर्ग प्रतिभावान संगीतकार अनिल बिस्वास यांनी! हे चार राग आहेत (क्रमश:) राग गौड़ सारंग (ग्रीष्म ऋतू) , राग गौड़ मल्हार (वर्ष ऋतू), जोगिया (शिशिर ऋतू ) आणि बहार (वसंत ऋतू!) एका मुलाखतीत लताने सांगितले की अनिलदा आमचे ‘मास्टरदाच’ होते. वरील गाण्याच्या रिहर्सल मन्ना डे आणि लता जवळपास दोन आठवडे करीत होते. म्हणूनच हे गाणे शास्त्रीय संगीतावर आधारित सिनेगीतांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे असे मला वाटते. एक अजून माहिती मिळाली की यातील सारंगी पं.रामनारायण यांनी वाजवली आहे. शेखर आणि निम्मी या कलावंतांवर हे गाणे चित्रित झाले. हमदर्द सिनेमा कांही खूप गाजला होता असेही नाही, पण प्रेम धवन, अनिलदा, लता आणि मन्ना डे यांनी हे गाणे अजरामर करून ठेवले. मन्ना डे यांची शास्त्रीय गाण्यांवर किती मजबूत पकड होती हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. 

अनिलदांनी तिला संगीतातले खूप बारकावे समजावून सांगितले. श्वास सोडतांना माईकवर तो कसा जाणवू द्यायचा नाही, हे अनिलदांनीच शिकवले. म्हणूनच कठीण आणि दीर्घ ताना घेतांना लता मध्ये कुठे श्वास घ्यायची हे कोडेच आहे. इतके मात्र वाचले होते की बऱ्याच गाण्यात लता नेमका कुठं अन कसा श्वास घेते हे शोधण्यात बऱ्याच नवोदित गायिकांचे आयुष्य खर्ची पडले, पण दुर्दैवाने त्यांना उत्तर मिळाले नाही. आमच्यासारखे रसिक या भानगडीत पडत नाहीत, सरळ गानशारदेला नमन करायचं, अन गाणं जी भरके एन्जॉय करायचं. 

दुसरे एकमेकाद्वितीय गाणे, सौतेला भाई (१९६२) मधले, यातला हाच एक सगा करिष्मा! लता किती म्हणून रियाज करत असावी याची साक्ष देणारे, शास्त्रीय गायक जे तासनतास गाऊन साध्य करत असतील किंवा नसतील ते या ३-४ मिनिटात लताने साध्य केलंय. ती शास्त्रीय गायन करत होतीच, माध्यम वेगळे होते इतकेच. ‘जा मैं तोसे नाहीं बोलूं’ (राग सहाना बहार) हेच ते अजरामर गाणे, लताच्या रागदारीवर आधारित गाण्यांपैकी एक बेहतरीन पेशकश! पडद्यावर दोन कथक नृत्यांगना, राणीबाला अन रत्ना या दोन दुधारी तलवारीसारख्या, नृत्य काय तर टिपिकल मुजरा, त्यांच्या जीवघेण्या दिलकश अदा, अदब, तहजीब, नृत्याभिनय, इत्यादी इत्यादी तर आहेतच, त्यांच्या कात्रीत सापडलेला नायक गुरुदत्त, पण या सर्वांना पुरून उरलेला लताचा जलप्रपातासारखा अक्षरशः अंगावर कोसळणारा स्वर! स्वरानंदाच्या तुषारात चिंब भिजवणारा! दोन नृत्यांगनांसाठी लताच्या स्वराविष्काराचा वेगवेगळा लहेजा! वाह क्या बात है! तिच्या ताना ऐकून अवाक व्हायला होते. गाण्यातील जादूभरले शब्द शैलेंद्र यांचे आणि संगीत माझे प्रिय संगीतकार अनिलदा यांचेच!    

तिसरे माझे अत्यंत आवडीचे गाणे म्हणजे ‘जा जा रे जा बालमवा!’ हे हिंदी सिनेमातील सर्वसामान्य पठडीतला मुजरा या शीर्षकांत मोडणारे गाणे. चित्रपट ‘बसंतबहार’ (१९५६), पडद्यावर तेव्हाचा नामी खलनायक चंद्रशेखर आणि त्याला भुलवत मुजरा सादर करणारी कुमकुम! मंडळी, मला वाटते की या कुमकुमच्या सुंदर रूपाचा अन अभिनयाचा म्हणावा तितका उपयोग फिल्म इंडस्ट्रीने केला नाही. नेहमी दुय्यम स्थानावरील सहनायिकाच राहिली ती. पण हे गाणे बघाल तेव्हां ही कसलेली अभिनेत्री होती याची आपल्याला खात्री पटेल. या गाण्यात लताचा फिरत घेणारा स्वर्गतुल्य कोमल स्वरगंधार, शैलेंद्र यांचे प्रसंगानुरूप दिलखेचक शब्द, शंकर जयकिशन यांचे राग झिंझोटीवर आधारित एक नंबरचे लाजवाब संगीत तर आहेच, पण कुमकुमचा नखरा, तिचा बोलका चेहरा, भावविभ्रम आणि जबरदस्त शास्त्रीय नृत्याची जाण या गाण्याला अस्मानात घेऊन गेली. या गाण्यातील लताच्या स्वरांचा तो अद्भुतरम्य हँगओव्हर गाणे संपल्यावरही कमी होत नाही हा माझा नेहमीचा अनुभव!  

मैत्रांनो, अशी सर्वांगसुंदर गाणी यू ट्यूब वर बघायची सोय आहे हे आपले परम भाग्यच! बघा ना चित्रपट चालो अथवा न चालो, ही गाणी रसिकांच्या हृदयात कायमस्वरूपाने विराजमान झालीत. श्वेत- श्याम रंगात असूनही या गाण्यांनी आपल्या आयुष्यात आनंदाचे किती रंग भरले त्यांची गणतीच नाही. म्हणूनच आजच्या निमित्याने या गाण्यांची चर्चा करावीशी वाटली!    

२८ सप्टेंबरच्या लताच्या जन्मदिनाचे निमित्य साधत या स्वरशारदेच्या दिव्यचरणी ही भावशब्दसुमने अर्पण करते!💐 

 ( टीप- वरील तीन गाण्यांची लिंक जोडत आहे. लिंक न उघडल्यास गाण्याचे शब्द यू ट्यूब वर टाकावेत. 

https://youtu.be/L8ht_BXmOp4?si=bjAj8WctCbWfV3vA

‘ऋतू आये ऋतू जाये सखी री, मन के मीत न आये’- चित्रपट: ‘हमदर्द’ (१९५३) 

गायक-गायिका: मन्ना डे, लता मंगेशकर, गीतकार: प्रेम धवन, संगीतकार: अनिल बिस्वास 

https://youtu.be/WTcXSp2KvNs?si=hOJDPY4Vi3q7ggSc

‘जा मैं तोसे नाहीं बोलूं’- चित्रपट: सौतेला भाई (१९६२)

गायिका: लता मंगेशकर, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: अनिल बिस्वास

 

https://youtu.be/TwBNRmvwAxA?si=k9GJJYMtvw-rjUrs

‘जा जा रे जा बालमवा!’-  चित्रपट: बसंत बहार 

गायिका: लता मंगेशकर, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: शंकर जयकिशन ) 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

भारतीय संस्कृती ही खूप पुरातन आहे. बऱ्याच परदेशी प्रवाशांनी वर्णन केल्याप्रमाणे आपला देश सर्वच क्षेत्रात नुसता प्रगतीपथावर नव्हता तर प्रगतीच्या शिखरावर होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. इथे सोन्याचा धूर निघायचा असे वर्णन केलेले आढळते. लोकं काठीला सोने बांधून काशियात्रेला जात असत. सर्वच क्षेत्रांत भारत सर्वोच्च स्थानावर होता. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला. यासर्व कालप्रवाहात एकमेव संस्कृती टिकून राहिली ती म्हणजे भारतीय संस्कृती !!! चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा उगम आणि विकास इथेच झाला. या सर्व कला म्हणजे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याकाळात भारताने नुसती भौतिक प्रगती केलेली नव्हती तर आध्यत्मिक क्षेत्रात सुद्धा परमोच्च स्थिती प्राप्त केली होती. मानवी जीवनाचा विकास फक्त मनुष्याच्या भौतिक गरजा भागवून होत नाही हे आपल्या ऋषीमुनींनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी मनुष्याच्या भौतिक गरजांसोबत त्याच्या मनाचाही सखोल अभ्यास केला. आपल्याकडील सर्व ऋषीमुनी उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या संस्कृतीची जडणघडण पूर्णपणे निसर्गानुकूल (ecofriendly) आणि मानवी मनाच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यास करुन केली. भौतिकसुबत्ता किंवा अमर्याद भौतिकसुख हे काही मानवी जीवनाचे अंतिम साध्य असू शकत नाही हे त्यांनी त्या पद्धतीने जगून समजून घेतले. नुसत्या अमर्याद भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या स्पर्धेमुळें अमेरिकेची अवस्था काय झाली आहे आपल्याला ज्ञात आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन शांत होत नाही तोपर्यंत तो कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही, हे आपल्या पूर्वजांनी जाणले. आणि जसा रोग तसे औषध या उक्तीनुसार त्यावर उपाय शोधला. उपाय शोधणे कोणीही करु शकेल पण मानवी जीवनाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे आदर्श जीवनचर्या आखणे आणि तो समाजातील सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होणे हे लिहायला, ऐकायला सामान्य वाटले तरी हे जनमानसात रुजविणे फार अवघड होते. पण आपल्या पूर्वजांनी तेही करून दाखविले. तसेच संवर्धितही केले. थोडक्यात दैनंदिन जीवन जगताना मनःशांती मिळवायची असते हे त्यांनी विसरायला लावले आणि अशी जीवनपद्धती विकसित केली की त्या पद्धतीने मनुष्याची आपसूक मनशक्ती वाढून मन:शांतीचा नकळत लाभ होईल. याविशिष्ट जीवनपद्धतीला त्यांनी ‘अध्यात्म’ असे नाव दिले.

अध्यात्म ही खरं तर भारतीय जीवनपद्धती (आचारपद्धती) आहे, जीवनकला आहे. हजारो वर्षांची राजकीय गुलामगिरी जरी संपली असली तर सांस्कृतिक गुलामगिरीचा पघडा जनमानसावर अजून आहे असे ठळकपणे जाणवते. सध्याची आपली जीवनपद्धती ना धड भारतीय आहे ना पूर्णपणे विदेशी. सरमिसळ झालेल्या संस्कृतीत आपण सर्व अजब पद्धतीने आपले जीवन जगत आहोत. आपले सोडायला मन धजावत नाही आणि पाश्चात्यांचे पूर्ण स्वीकारता येत नाही. अशी द्विधा मनःस्थिती आपली सर्वांची कमीअधिक प्रमाणात आहे. प्रत्येकाला जीवनात आनंद हवा आहे, पण आज माझ्या जवळ आनंद आहे किंवा मी आनंदी आहे असे स्वतःहून, मनःपूर्वक छातीठोकपणे म्हणणारा मनुष्य शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवन पद्धतीची पुनर्रचना करणे. यात आपल्याला कोणतेही कर्म बदलायचे नसून फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाची इथे गरज नाही. दृढनिश्चय मात्र नक्कीच हवा. पूर्वी लोक असेच जगत होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात ‘आनंद’ होता.

आज मात्र प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्याचा ‘आनंदा’चा शोध सुरु आहे. मनुष्य सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करीत असतो. त्यातील बऱ्याचशा गोष्टीत तो कमीअधिक प्रमाणात यशस्वी देखील होतो तर काही गोष्टीत तो अपयशी ठरतो. दिवसभरात त्याच्या आयुष्यात सुखदुःखाचे, जयपराजयाचे अनेक प्रसंग येतात, त्याला मानापमान सहन करावा लागतो. दिवसभरातील प्रेम, माया, मोह, जिव्हाळा, आपुलकी, तिरस्कार, हेवा, मत्सर, राग, द्वेष अशा विविध भावभावनांच्या हिंदोळ्यावर आपले मन सावरण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करीत असतो. भावनांच्या हिंदोळ्यावर मन स्थिर ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम नसले तरच नवल !!!

कोणतीही गोष्ट कुशलतेने करायची असेल तर ते कौशल्य आत्मसात करणे क्रमप्राप्त ठरते. काही माणसे जगायचे म्हणून जगत असतात. काही मरत नाहीत म्हणून जगत असतात. काही माणसे दुसऱ्यासाठीच जगत असतात. तर मोजकी माणसे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फक्त त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी जगत असतात. सर्वांचे ‘जगणं’ हे एकच असले तरी प्रत्येकाच्या जगण्याचे मूल्य मात्र भिन्न भिन्न असते आणि असे होणे स्वाभाविक आहे. स्वाभाविकच त्यांच्या जीवनाची यशस्वीताही वेगवेगळी असते. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जगणे याला आपल्याकडे ‘विकृती’ असे म्हणतात. स्वतःसाठी जगणे याला ‘प्रकृती’ असे म्हणतात तर दुसऱ्यासाठी जीवन जगणे याला ‘संस्कृती’ असे म्हणतात. सर्व संतांनी मानवी मनाचा जितका अभ्यास केला तितका अभ्यास खचितच दुसरा कोणी केला असेल. आत्म्याने गर्भवास पत्करल्यापासून गर्भावासाचा त्याग करेपर्यंत त्या आत्म्यास त्याच्या ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान असते. पण एकदा का त्याने या नश्वरजगात प्रवेश केला (मनुष्याचा जन्म झाला) की मनुष्य देवाला तू कोण आहेस असा प्रश्न विचारु लागतो. ‘सोहं’ म्हणणारा आत्मा ‘कोहं’ असे म्हणू लागतो. संत असे सांगतात की देहबुद्धीमुळे मनुष्य आपल्या ‘स्व’स्वरूपाला विसरतो आणि देहदु:खात बुडून जातो. देहबुद्धीमुळेच त्याला सुख दुःख आणि आनंद यातील सूक्ष्म फरक लक्षात येत नाही आणि मग ज्याच्यात्याच्या सुखदुःखाच्या (मिथ्या) कल्पनेप्रमाणे मनुष्य आयुष्यभर नुसता भरकटत राहतो. बरेच वेळेस ह्या भरकटण्यालाच सामान्य मनुष्य सुख समजतो आणि सुज्ञ लोकं त्यास ‘भ्रम’ असे संबोधतात.

देहसोडून जाईपर्यंत अर्थात मृत्यूपर्यंत मनुष्य सुखच शोधीत असतो. पण खरंच त्याला सुख मिळतं? त्याला समाधानाचा लाभ होतो ? आज आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्रांपैकी एखादा मित्र मैत्रीण सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला जाणवतं का ? मित्रांचे सोडून देऊया, पण एकांतात बसल्यावर आपण सुखी आहोत, समाधानी आहोत असे आपल्याला क्षणभर तरी वाटते ? या प्रश्नाचे खरे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल, हो न? खरंतर आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे की हा माणूस काहीही घडलेले नसताना आमचे का अभिनंदन करीत आहे. आपली शंका रास्त आहे. कारण समोरील मनुष्याचे कौतुक करण्याची संधी आपल्याला अनेक वेळेस अगदी विनासायास उपलब्ध होत असते, परंतु आपण आपल्याच सुखदुःखात इतके गुरफटून घेत असतो की ते आपल्या लक्षात येतच नाही. आता मूळ मुद्यावर येतो. आपले कौतुक करायला हवे कारण आपण मनातल्या मनात तरी कबूल केले आहे की आपण एखादवेळेस दुःखी नसू पण सुखी आहोत असेही नाही. आपण आता एक गृहपाठ करुया. गृहपाठ म्हणण्यापेक्षा आपण त्याला मनोपाठ असे म्हणूया. कारण आपल्याला तो आताच म्हणजे लगेच आणि आपल्या मनातल्या मनातच करायचा आहे. आपण सुखी का नाही? आपल्याला समाधान का मिळाले नाही याची काही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करुया. मी अवघड प्रश्न विचारत नसल्यामुळे कोणालाही आपले उत्तर प्रगट करावे लागणार नाही. असो. तर आता आपण आपले उत्तर मनात शोधले असाल. आपण शोधलेली सर्व उत्तरे अगदी बरोबरच आहेत. त्यामुळे आपल्याला शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत. आपण सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहात. तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊनही आपण समाधानी का नाही? आपण आनंदी का नाही? आपण सुखी का नाही? आपण जगतोय की जगवले जातोय ? की नाईलाजाने दिवस ढकलतोय ? हे जीवन आपल्यासाठी नक्की काय आहे? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक प्रश्न आपल्याला याआधी पडले असतील ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मात मिळू शकतात.

जगातला सर्वात चांगला शब्द म्हणजे आनंद. कारण आनंद सर्वांना हवा आहे. मुख्य म्हणजे आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सामान्य मनुष्य यामध्ये सुद्धा थोडी गफलत करतो. तो सुख आणि आनंद यांची बरेचवेळेस सरभेसळ करतो. सुखदुःख हे कशावरतरी अवलंबून असू शकते किंवा अवलंबून असतेच. पण आनंद हा पूर्णपणे स्वतंत्र आहे. याच्यावर कोणाचे बंधन नाही. खरंतर आनंद आपल्या हातात असायला हवा. माझा आनंद माझ्या हातात! सुखदुःख स्थितीरुप आहे तर आनंद वृत्तीरूप आहे. मनुष्याला कुठेही कधीही कसाही, अगदी जिथे आहे तिथे, आनंद मिळू शकतो. गंमत अशी आहे की आनंद मिळण्यासाठी सर्वात मोठी आणि एकमेव आडकाठी आपली स्वतःचीच असते. कारण ‘आज रोख उद्या उधार’ या धर्तीवर आपण आनंद सुद्धा ‘उद्यावर’ टाकत असतो. अमुक गोष्ट झाली की मला आनंद मिळेल, नोकरी मिळाली की आनंद मिळेल, नोकरीत बढती मिळाली की आनंद मिळेल, अमका मनुष्य भेटला की आनंद मिळेल, अमुक व्यक्ती आयुष्याची जोडीदार म्हणून लाभली तर आनंद मिळेल, असे कितीक ‘तर’ आपण आपल्या आनंदाच्यामागे जोडतो आणि आपला आनंद उधारीवर ठेवतो, एका अर्थाने जगणंच उद्यावर टाकतो. बाहेरील जगात आनंद आहे असे समजून मनुष्य आनंद बाहेर शोधत राहतो. चुकीच्या जागी एखादी गोष्ट शोधली तर ती आपल्याला कशी मिळणार ? त्यामुळे आपण सतत रडगाणं गात असतो. वर्तमानकाळ ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. रोज २४ तासांमध्ये स्वतःसाठी किमान एक तरी गोष्ट करायला हवी. उदा. आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या, स्नानाच्या, जेवणाच्या वेळेचा आनंद लुटा. स्वतः गाणं म्हणा. मग आज आत्ता ताबडतोब अगदी याक्षणी उपलब्ध काय असेल तर तो फक्त आनंद !! आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक क्षणाचा सन्मान राखत त्याचे पावित्र्य जपणे, हीच जीवन जगण्याची कला आहे. सामान्यपणे आपण दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा प्रयत्नात असतो, खरंतर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर राज्य करायला पाहिजे. क्षणावर राज्य करणे म्हणजे तारतम्याने विवेकाने प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता ‘प्रतिसाद’ देणे. आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोठ्या मनाचा छोटा सेल्समन — लेखक : एक सच्चा पुणेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मोठ्या मनाचा छोटा सेल्समन ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता…

‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला.

मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती.

पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा, पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो. कितीला देणार ? 

क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला.

त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस ? 

तर म्हणाला,

पुस्तकच नाही तर मला हातात जे काही मिळत ते सगळं मी विकतो.

मला जाता जाता ‘सेल्स’ मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं म्हणाला ‘दत्तू’, गाव उमरगा.

मनात म्हणलो चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष ‘दत्तगुरूंच ‘आले आपल्याला ज्ञान द्यायला.

त्याला म्हणालो, “काही खाणार ?”

बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला

‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर ?’ 

हसू आलं मला. म्हणलो दे पुस्तकं आणि घे पैसे. १० सेटचे १०० दिले.

वरती शंभरची नोट ठेवली त्याच्या हातात, म्हणलो असुदे तुला बक्षीस.

एक मिनिट तो शांत झाला आणि म्हणाला,

‘चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा भेटतो बोलत्यात’.

अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर ‘मॉर्डन कॅफे’मध्ये शिरलो. त्याच्याबरोबर आत शिरताना मला काऊंटरवरच्या अण्णांनी थोडसं आश्चर्यानी पाहिलं.

आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनुकार्ड दिलं. म्हणलो काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोस्याची ऑर्डर दिली. वरती ‘अमूल ज्यादा मारना’ असही ऐकवलं, माझी ऑर्डर घेत, वेटर त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकत काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या ‘कॉन्फिडन्सचं’ कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती.

आजुबाजूची टेबले आमच्याकडे कुचेष्टेनी बघतच होती.

मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखादा ठेवणीतला पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो. (मला काय किडा कमी नाहीये, पण त्याच्याबद्दल परत कधीतरी)

मग आली आमच्या मुलाखतीची वेळ, म्हणलो, “काय रे दत्तू, पुण्यात कधी आलास ?”

२-३ वर्षे झाली म्हणाला. “आईबा मजुरी करायची, बा वारल्यावर तिला कामं मिळण कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण हाय, मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं पुण्यामुंबैकडे लई कामं भेटत्यान, तिकडच जा, ऱ्हावा आणि खावा. आईनी जरुरीपुरती चार भांडी, होते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला अडसर लावला आणि आलो मंग पुण्याला. ”

विचारलं राहता कुठे ? 

इथेच राहतो म्हणाला. रस्त्याच्या पल्ल्याडच्या झोपडपट्टीत. खोली घेतलिया भाड्यानी.

आई सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामं करते, मी इकडे येतो.

त्याला विचारलं ‘कोण देतं रोज विकायच्या गोष्टी ?’ 

म्हणाला “हाय ना ठेकेदार आमचा”.

रोज सकाळी ‘बॉम्बे’ वरून आलेल्या वस्तू देतो, काय बोलायचं असत ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो. ”

आता धंद्याच्या गप्पा सुरु झाल्यावर पोरगा बोलायच्या मूडमध्ये आला होता.

मी विचारलं ‘म्हणजे कमिशन वर काम करतोस का ?’ 

तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो”

 मी विचारलं, बहिणीचं काय ? तिला तरी शाळेत पाठवता का ? 

हां मंग? ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत. शिकते, अन मलाबी थोडं शिकवते. गावाकडे पन जास्त नाही जायचो शाळेत. पर आई बोलते थोडातरी लीव्ह्याला वाचायला शिक, कुठंतरी उपेगाला येईल. म्हून थोडं शिकतो. सायेब दिवसभर बाह्येर फिरल्यावर लई कटाळा येतो. पर आता धाकल्या बहिनीसमोर गप बसतो. ते पाढे अन इंग्लिश भाषेचे धडे काय केल्या डोक्यात नाही शिरत, पर आईला दाखवायला हो हो करतो. आता एकदोन वर्ष जावूदे, मग बघा आईचे काम बंद करायला लावतो का न्हाई ? पलीकडच्या सोसायटीमध्ये flat घेणार भाड्यानी. तिकडे राहणार.

मी मनात म्हणलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला “कन्व्हिन्स” करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही म्हणता आले तर ? आणि या वयात सगळा घरचा खर्च भागवणाऱ्याला कशाला आले पाहिजेत पाढे यायला ?

तेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूनी एकदा माझ्याकडे हळूच बघत दिलेला काटा-चमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हातानी चटणी, सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्क नि खाता येत नाही, त्यामुळे मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर एकदम मनमोकळ हसला. म्हणला, “साहेब आज तुम्ही आणल ना बरोबर म्हणून हॉटेलवाल्यांनी आत घेतला, नाही तर बाहेरूनच “चल जा असं म्हणत्यात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हून. नाय तर आपणपण इथल्या वेटर एवढंच कमावतो”.

क्षणभर विचार आला; 

श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेलं तरी साधारण एकसारखीच. प्रत्येकाला दुसऱ्या बरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खराखरा पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा.

सहज विचारलं किती सुटतात रे महिन्याचे ? 

म्हणाला, ”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो”

मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार ? 

आयला, माझी आजची ऑर्डर झाली असती तर त्यात मला जेमतेम २० हजार मिळाले असते, ते पण सगळं सुरळीत पार पडल्यावर एक महिन्यानी.

मनात म्हणलं, “लेका तुला सगळ्या वेटर्सपेक्षा जास्ती पैसे मिळतात. कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस ? तू तर स्वतःचा राजा आहेस” 

डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार ? 

म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब ? 

मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे, तर आता तू सांगायचं.

आपण ऑर्डर करू.

दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे ? 

आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी.

मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे ? 

मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना? म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार ?” त्याचा कोमेजलेला चेहेरा समजत होता, म्हणाला, नको साहेब, भूक संपली. आता मला जेवण पण नाय जानार, जाऊ आपण”

बाहेर पडत असताना हॉटेलच्या काऊंटरवरचा अण्णा जरा सलगीत येवून म्हणला, “साब ये बच्चा दिनभर इधर चौकमे क्या क्या बेचता रेहता है, हम लोग हमेशा देखते है उसको । आज पेहेली बार इधर अंदर आके खाना खाके गया ।बहोत अच्छा बच्चा है, गंदे बच्चोसे हमेशा दूर रेहता है । लेकीन क्या करे साब, हम लोगका भी धंदा है ना ? हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा ।” मला त्याचंही पटले.

पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना ? 

जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते, त्यातल्या कित्त्येकांपेक्षा तो पोरगा कितीतरी जास्त कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ‘ते स्टेट्स’ नव्हतं.

बाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जावून थांबला होता. आत बघत होता. त्याला विचारलं, “मारायची का एक चक्कर गाडीतून ?”

तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव पाहिले ना, खल्लास.

त्याला शेजारच्या सिटवर बसवून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडले. गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता. उतरल्यावर बघून समाधानानी हसला.

म्हणाला “साहेब, पुन्हा कवा येनार?” 

म्हणलो अरे मी येत असतो मधूनमधून इकडे, आता तुला बघितलं की थांबीन नक्की.

“हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू एकदम प्रसन्नच झाले” 

नक्की या म्हणाला,

मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन सिधा घरी जानार. सांगनार आज आपण गाडीतून चक्कर मारली, अजून माझ्याबरोबरची कोणी पोरंपन गाडीच्या आत बसली नाय. मीच पहिला. ” मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला.

तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत? 

याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे……

पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते….. !!

हा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली, रेडियो लावला,

नेमकं अनाडीमधलं ‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’ लागलं.

योगायोगच म्हणायचा नाहीतर काय…. !!

लेखक : एक सच्चा पुणेकर 

प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘गरुड भरारी…’ – लेखिका : नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गरुड भरारी…’ – लेखिका : नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

प्राचीन भारतात स्वयंवराची पद्धत होती. स्त्री स्वत:च्या अटींवर पारखून आपला जोडीदार निवडत असे.

सीता, द्रौपदी स्वयंवराची आपल्याला माहिती आहेच.

काळ बदलला. पुरुषप्रधान संस्कृती राज्य करू लागली. जोडीदाराला निवडायचा अधिकार आता पुरुषाकडे आला..

प्राणी पक्षी मात्र अजूनही बदलले नाहीत. निसर्गाने त्यांना जे शिकवले त्यानुसार ते आजही तसेच मार्गक्रमण करीत आहेत.

प्रजननाच्या काळात आजही बहुतांश प्राणी-पक्षी जगतात माद्या आपला नर साथीदार निवडतात.

गरुडांची ही अतिशय रोचक वरपरीक्षा..

गरुडांचा जेंव्हा प्रजननाचा काळ जवळ येतो तेंव्हा अनेक नर गरूड मादीभोवती जमा होतात.

त्यातून बरा दिसणारा नर मादी निवडते आणि त्याला अंतिम निवडप्रक्रियेसाठी आवतण देते.

– – परीक्षा सुरू होते.

मादी स्वत:च्या चोचीत एक काडी धरते नि आकाशात उंच उंच उडत जाते.

नराने तिच्यामागून उडत जायचे… पण तिच्या पेक्षा वर जायचे नाही. खालच्या पातळीवर राहून सगळे लक्ष मादीवर केंद्रित करायचे.

मादी केंव्हाही तोंडातील काडी खाली टाकते. ती नराने पकडायची. ती तो पकडू शकला तर चाचणीच्या पुढच्या पातळीत त्याला प्रवेश.. नाहीतर तो नापास..

 

आता दुस-या पातळीत काडीचा आकार नि वजन वाढतं.. बाकी प्रक्रिया तीच..

 

पुढील प्रत्येक पातळीत काडी मोठी मोठी होत जाते.

 

आता काडीचं रुपांतर काठीत होत जातं.

शेवटच्या पायरीतील काठी साधारण गरुडपिल्लाच्या वजनाइतकी असते.

 

– – परीक्षेच्या सर्व पातळ्यात यशस्वीरीत्या उत्तीर्ण होणा-या नराच्या गळ्यात वरमाळा पडते. वधुवर आकाशात नृत्य करून आपला विवाहसोहळा पार पडतात..

 

सुरक्षित असा उंच वृक्ष शोधून त्यावर घरटं बनतं, दोघांच्याच हिमतीवर.. इतर कुणाच्याही आधाराशिवाय.. त्या सुंदरशा घरट्यात मादीचं बाळंतपण होतं.. फक्त जोडीदाराच्या साथीनं..

ना मादीचे आई वडील मदतीला असतात ना सासुसासरे…

मादी अंडी उबवत असते तेंव्हा नर अन्न मिळवून आणतो मादीसाठी नि स्वत:साठी..

” मी कमावता आहे बरं का, मी सांगेन तसच झालं पाहिजे ” असला कोणताच अहंकार त्याच्यात नसतो..

” माझं कमावणं बंद झालं.. माझी अस्मिता आता धोक्यात येईल का ?” असली असुरक्षितता ना तिच्यात असते..

 

अंड्यातून पिल्लं बाहेर येतात.. तरीही त्यांचे बाबाच अन्नार्जन करीत असतात..

पिल्लं मोठी होतात..

पिल्लांची आई अंडी उबवून उबवून स्वत:च उबलेली असते..

 

” राणी, तू कंटाळली असशील नं? 

तुझे पंख भरारी घेण्याचं विसरण्याआधीच मोकळ्या आकाशात मस्त उड्डाण कर.. खूप उंचावर जा.. पिल्लांचं उदरभरण करायची जबाबदारी आता तुझी…. आणि हो, आपल्या बछड्यांची आजिबात काळजी करू नकोस.. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता माझी.. “

 

गरूडच ती.. तिचे पंख झेप घेणं विसरलेले नसतात. ती मोकळ्या आकाशात विहरत राहते.. पिल्लांना आवडणारं, त्यांना सशक्त बनवणारं अन्न गोळा करते.. पण त्या माऊलीचं लक्ष मात्र त्या विस्तीर्ण आकाशातून तिच्या पिल्लांकडेच असतं!!

” माझे काळजाचे तुकडे भांडत नाहीत नं, त्यांना कुणी त्रास तर देत नाही नं, त्यांना कुठे दुखत खुपत नाही नं ?” सगळ्याचा ते मातृहृदय कोसांवरून अंदाज घेत असतं..

 

पिल्लांच्या पंखांत आता जोर आलेला असतो..

निळ्याशार आकाशात उडण्याची त्यांना घाई झालेली असते..

घरट्याच्या दाराशी यायचं, बाहेर डोकावायचं नि घाबरून आत पळून जायचं…. असले त्यांचे उपद्व्याप त्यांची माय प्रेमानं न्याहाळत असते..

 नि “माझं लेकरू घरट्यातून जमिनीवर पडणार तर नाही ना ?” म्हणून काळजीही करत असते..

 

बच्च्यांचे बाबा या वेळात घरट्याच्या खालच्या फांदीवर बसलेले असतात.. वृक्षाभोवती घिरट्या घालणा-या शत्रुंपासून आपल्या पोरांचं रक्षण करत…

 

पण ते तर त्यांना घरट्याशेजारीही बसूनही करता आलं असतं.. मग खालच्या फांदीवर का?

– – तर एखाद्या पिल्लानं अवखळपणानं घरट्यातून उडी मारली नि ते खाली पडायला लागलं तर त्याला झेलण्यासाठी…

त्याची ही पिल्लांना झेलण्याची, पकडण्याची क्षमता अजमावण्यासाठी म्हणून तर त्या आईने लेकरांना जन्माला घालण्याआधीच भावी पित्याची घेतलेली ती काडी परीक्षा.. !! – – काड्या पकडता आल्या म्हणजे या पात्राला पिल्लांना झेलता येणार….. केवढी ही हुशारी !!

 

“ती आकाशात विहरतेय उंचावर… मी मात्रं खालच्या पातळीवर रहायचं.. इतर पक्षी काय म्हणतील? माझ्यावर हसतील ? माझी प्रतिष्ठा कमी होईल ? गरुडीणबाई मला कमी लेखायला लागेल? माझा अपमान करेल? ” 

…… असले नगण्य, विकृत विचार त्याच्या आसपासही फिरकत नाहीत..

 

” मी फिरून फिरून कष्ट करतेय नि हा ठोंब्या नुसता बसून खातोय ” ना असल्या कोत्या विचारांचा तिच्या मेंदूत शिरकाव होत…

 

त्या दोघांचं एकच लक्ष्य असतं..

” पिल्लांचं संगोपन नि संरक्षण “…. ना त्यांना अहंकार असतो ना जगाची फिकीर..

 

त्या़ना माहीत असतं … आपल्या पिल्लांना आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणीही नाहीये..

आपण जन्म दिलाय तर ते स्वतंत्र होईपर्यंत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी हे आपले एकमेव कर्तव्य आहे.. म्हणूनच ते कर्तव्य ते जगाची फिकीर न करता पार पाडतात..

यात कधी मादी कमीपणा घेते तर कधी नर…

 

एकदा का पिल्लं उंच भरारी मारून जगाच्या पसा-यात नाहीशी झाली की मग दोघे आपापल्या विश्वात गायब होतात..

पण तोपर्यंत दोघांचं फक्त एकच विश्व ” मिशन बाळोबा !! “

गरुडांच्या या शहाणपणाची गोष्ट मी काल माझ्या नव-याकडून ऐकली. नि वाटलं…

गरुडाच्या दसपट मोठा नि प्रगत मेंदू असणा-या माणसाला हे शहाणपण का बरं येत नाही?

वंशसातत्याच्या उद्देशानं केलेल्या विवाहनामक प्रक्रियेत होणा-या बाळांपेक्षा पैसा, शिक्षण, मालमत्ता, नातीगोती यांनाच का महत्त्व दिलं जातं?

 

– – नेहमी नरानं मादीपेक्षा जास्त उंचीवर असलं पाहिजे… दाणा पाणी मिळवण्याची जबाबदारी पुरुषानेच घेतली पाहिजे… असं का?

– – नराएवढी उंची गाठण्याचा मादीचा नि मादीपेक्षा उंच उडण्याचा नराचा अट्टाहास कशासाठी ?

– – कधी मादीनं उंच उडावं तर कधी नरानं..

– – दोघंही अहंकारापोटी उंच आकाशात भरा-या मारत बसले तर त्या बिचा-या लेकरांना कोण सांभाळणार? ती पडायला लागली तर त्यांना कोण झेलणार?

– – उबेची गरज असण्याच्या काळात माऊलीऐवजी कामवाली किंवा पाळणाघरातील मावशी त्यांच्यावर पंखांची पखरण करणार ? त्या विकत घेतलेल्या उबेने त्यांचे पंख बळकट होतील?

– – मी पडलो तर माझा बाबा मला झेलायला खाली उभा आहे, या खात्रीवर मारलेली पहिली भरारी यशस्वी होईल की अहंकाराच्या युद्धात घरटं सोडून निघून गेलेल्या तथाकथित बाप नामक प्राण्याच्या आठवणींचे कढ काढत बिचकत बिचकत आकाशातला प्रवेश सुखकर होईल… ?

लेखिका : नीला महाबळ गोडबोले, सोलापूर….

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्राद्ध पक्ष: एक अंधश्रद्धा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “श्राद्ध पक्ष: एक अंधश्रद्धा☆ श्री जगदीश काबरे ☆

हिन्दू शास्त्राप्रमाणे जोपर्यंत श्राद्ध/पिंड दान होत नाही तोपर्यंत आत्म्याला स्वर्ग प्राप्त होत नाही वा मुक्ती मिळत नाही, असे समजले जाते. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. (१५ दिवसांचा काळ) या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. असे विधी करून जर खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळत असेल आणि त्यांचे आत्मे शांत होत असतील तर मग दरवर्षी हीच कर्मकांडे पुन्हा पुन्हा करण्याची गरज काय, हा प्रश्न आपल्याला का पडत नाही? 21व्या शतकात अशी कर्मकांडे करून हिन्दू समाज अंधश्रद्धेच्या भयाण अंधारात अजूनही जगत आहे, ही वैषम्याची बाब आहे. खरे तर हा लोकांच्या मनात भीती पसरवून स्वत:चे पोट भरण्याचा पारंपरिक उद्योग आहे. ब्राम्हण अणि कावळा जोपर्यंत अन्न खात नाही तो पर्यंत घरातील कुणीही व्यक्ती जेवत नाही. बरे, श्राद्ध/पिंड दान करण्यासाठी पुरुषच लागतो, स्त्रियाना तो अधिकार नाही. काय कारण? कारण काय तर म्हणे, पुराणात असे सांगितले आहे की, पुरुषानेच हे विधी केले पाहिजेत, तरच घरात सुखसमृद्धी नांदते.

१) गरुड़ पुराण :- पुत्राशिवाय मनुष्याला मुक्तता नाही. पितृपक्षात मुलाकडून पिंड दान केले नाही तर आत्मा स्वर्गात जात नाही.

२) मार्कंडेय पुराण :- घरातील मुख्य पुरुषाने आपले मृत पितर यांच्या सोबत भूत, देव अणि ब्रह्मण यांनाही अन्न दिले पाहिजे अणि असे केले तरच त्याला समृद्धी, निरोगी शरीर अणि शेवटी मोक्ष मिळतो.

ह्या तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळकट करणाऱ्या गोष्टी आहेत. पुरुषी मानसिकतेत स्त्रियांना दुय्यम स्थान असते, म्हणूनच स्त्रियांना यातील कुठलाही विधी करता येत नाही. पण खरे पहाता, कावळा तुमचा निरोप घेऊन तुमच्या मृत पितारांकडे जात नाही की पितारांचा आत्मा कावळ्यात येत नाही. हे सगळे कर्मकांड तुमच्या मनातील भीतीचा फायदा घेऊन रचण्यात आले आहे. स्वतःला धार्मिक म्हणवणारे बरेच लोक जिवंत असतांना आपल्या आईबापांना नीटपणे जेवू घालत नाहीत, त्यांना कधी कधी तर सरळ वृद्धाश्रमाचा रस्ता दाखिवला जातो आणि ते मेल्यावर मात्र लोक काय म्हणतील या भीतीपोटी जनरीत पाळत प्रतिष्ठेसाठी जेवण घातले जाते. मग हेच लोक ब्राम्हणाला बोलावून मोठा विधी करतात आणि त्याला दक्षिणा देवून तृप्त करत आपल्या मनातील अपराधगंड शमवण्याचा प्रयत्न करतात. माणसे जिवंत असताना त्यांना छळतील आणि मेल्यावर त्यांच्या नावाने गळे काढत श्राद्ध करुन गोडघोडही खातील. असा दांभिकपणा इतर कुठल्याही नाही, पण हिंदू धर्मातच दिसतो. म्हणून धर्माच्या धंद्याचे सर्वात हास्यास्पद आणि विकृत रूप असेल तर तो आहे पितृपक्ष, श्राद्ध आणि त्यातील विधी.

पुनर्जन्म आहे असे मानले तर घरातील वडीलधारी मंडळी मृत्यूनंतर पुढच्या जन्मात कुठेतरी जन्माला आली असतीलच ना? मग त्याच वेळेस त्यांचे आत्मे अवकाशात लटकून खीर-पुरीसाठी कसे काय तळमळत असतात? जर पुढचा जन्म हा ८४ लक्ष फेऱ्यातून होणारा असेल तर सगळ्यांचे पितर नेमके कावळेच कसे काय होतात? पुनर्जन्म झाल्यावर ते अंतराळात कसे काय लटकू शकतील? हा साधा प्रश्न कुठल्याही शाळेत शिकत असणाऱ्या मुलालाही पडतो, तर मग शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांना तो का पडू नये? धर्ममार्तंडांच्या हातातले ते एवढे मठ्ठ बाहुले कसे काय होतात? 

आता आपले संत पिंडदानाविषयी काय म्हणतात ते पहा…

1) तुकाराम महाराज म्हणतात,

जित्या नाही अन्न | 

मेल्यावरी पिंडदान || 

हे तो चाळवाचाळवी ||

2) एकनाथ महाराज म्हणतात,

जिता मायबापा न घालिती अन्न|

मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ||१||

पहा पहा संसारीचा कैसा आचारु|

जिता अबोला मा मेल्या उच्चारू ||२||

जित्या मायबापा न करिती नमन | 

मेल्यामागे करिती मस्तक वपन ||३||

जित्या मायबापा धड्गोड नाही |

श्राद्धी तळण मळणपरवडी पाही ||४||

जित्या मायबापा गालीप्रदन |

मेल्या त्याचेनी नावे देती गोदान ||५||

जित्या मायबापा नेदी प्यायला पाणी| 

मेल्या पितरालागी बैसती तर्पणी ||६||

प्याया पाणी न घालिती सासरा जिता| 

पिंडापासी येती मग दंडवता ||७||

एका जनार्दनी कृपेचे तान्हे |

विधी निषेध दोन्ही आतळो नेदी माने||८||

3) संत कबीर सांगतात…

जिंदा बाप को रोटी न खिलावे, मरे बाप पछतायो…

मूठ भर चावल दाबे धर के,  कौवा बाप बुलय्यो।

4) गाडगेबाबा म्हणतात,

पिंड दान करू नका.

ही भटा-बमाणांची पोटभरी 

परंपरा बंद करा. गरिबांना अन्न द्या, त्यांच्या मुलांना शिकवा. मृत झालेल्या वाडवडिलांची स्मृति जतन करा, त्यानी केलेल्या चांगल्या कामाचे अनुकरण करा. त्यांचे चांगले विचार आत्मसात करा. हाच त्यांचा योग्य स्मृती दिन होऊ शकतो.

पण आपल्या लबाड पुरोहित पंडितांना दोन्ही हातात लाडू हवे असतात. त्यामुळे मरण्याआधी पुढच्या जन्म सुखाचा जाण्यासाठी ते विधी करायला लावतात आणि मृत्यूनंतरही पितरांचा धाक दाखवून त्यांच्या मुलांच्या सुखासाठी कर्मकांड करायला लावून त्यांच्याकडूनही आपल्या पोटोबासाठी खीर-पुरीची व्यवस्था करतात. असे केल्याने सुख-समृद्धी येईल असा दावा केला जातो. परंतु इतिहास साक्षी आहे की, हजारो वर्षे हे सर्व करूनही ही धार्मिक माणसे गरीबच राहिली आहेत. जे मुळातच श्रीमंत आहेत ते पितरांच्या नावाखाली फक्त आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी श्राद्ध पक्ष करत असतात. म्हणूनच श्राद्धाचे सोंग प्रत्येक घराघरात अत्यंत उसन्या गांभीर्याने केले जाते… तेही सु(?)शिक्षित कुटुंबात! खरंच किती लाजीरवाणा प्रकार आहे हा!!

सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे कावळ्यात आपल्या पितरांचा आत्मा येतो म्हणे! कावळा हा पक्षी मेलेले मासे, उंदीर, बेडूक, सडलेले मांस इत्यादी टाकाऊ घाण खाऊन परिसर स्वच्छ करत असतो. तो मांसाहारी जास्त अन् शाकाहारी कमी, हे सत्य लोकांना माहीत असूनही कावळ्याला शाकाहारी समजून, त्यात पूर्वजांचे आत्मे आल्याची अफवा पक्की करून पितृपक्षाचा खेळ मांडला जातो. जो कावळा 12 महीने घाण खातो तोच कावळा एका दिवसापुरता शुभ आणि शुद्ध कसा होतो? ह़ा विरोधाभास आपल्या लक्षात का येत नाही?

तुम्ही जर पिंडदान विधीचे नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की…….

  1. भटजी कार्यक्रम सकाळी लवकर घ्यायला सांगतात. कारण कावळे भुकेपोटी सकाळी पटकन येतात. एकदा पोट भरल्यानंतर भुक लागल्याशिवाय कोणताही प्राणी/पक्षी लगेच परत परत खात नाही.
  2. भटजींचा दुसरा सल्ला हा असतो की, कार्यक्रम तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घ्या. याचे कारण तेथे दररोजच असे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे तेथील कावळ्यांच्या हे अंगवळणी पडलेले असते. त्यांना सविनय हे कळलेले असते की माणसांची गर्दी असली तरी ते आमचे आपल्याला काही करत नाहीत म्हणून त्यांच्यात गर्दीतही माणसांच्या जवळ येण्याचे धारिष्ट्य आलेले असते. कारण दररोज ठरलेल्या वेळी त्यांना आयते खाणे मिळत असते.
  3. कार्यक्रम घरी घेतल्यास तेथील कावळ्यांना हा विषय परीचीत नसतो. ते अन्नाच्या वासामुळे येतात; पण माणसांचं नक्की काय चाललयं हे त्यांना कळत नाही आणि ते माणसांना भिऊन झाडावरून खाली येत नाहीत. पण माणसं दूर गेली की हेच कावळे पटापट खाली येतात.
  4. कार्यक्रमाला उशीर झाल्यास कावळ्यांनी काही तरी खाल्लेले असतेच, त्यामुळे त्यांचे पोट भरलेले असल्यानेही ते सहजासहजी पिंडाजवळ येत नाहीत.
  5. बरे, कावळ्यात आत्मा असतो असे मानल्यास मुस्लीम, ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या आत्म्यांचे काय? ते कावळे वेगळे असतात काय? आणि तसे असलेच तर भटजींना कसे कळते हा हिंदू कावळा आहे? आणि त्याच यजमानाच्या पितराचा आहे? कावळ्यांनी काय फक्त हिंदुंच्याच आत्म्यांचाच ठेका घेतलाय का?
  6. तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना बघा. एकच कावळा अनेक पिंडावरचा भात खातो. म्हणजे एकाच कावळ्यात अनेक आत्मे आहेत असे म्हणायचे का? दुसऱ्या दिवशी परत कावळा आत्म्यांची आदलाबदल करतो का? भात खाणाऱ्या कावळ्याचा आत्मा स्त्रीचा की पुरूषाचा कसे ओळखायचे?
  7. या अशा निरीक्षणावरून आपल्या हे सहज लक्षात येते की, ही 100% अंधश्रध्दा आहे. भट-पुरोहितांनी धर्माच्या नावाखाली अज्ञाताच्या भीतीपोटी लोकांना या कर्मकांडात गुंतवून स्वत:ची पोटे भरण्यासाठी काढलेली लुटीची दुकानं आहेत. तेव्हा जागे व्हा आणि 21व्या शतकातला वैज्ञानिक विचार जगायला शिका. विज्ञानाची सृष्टी घेतली तशी विज्ञानाची दृष्टीसुद्धा घेतली तरच आपला निभाव लागणे शक्य आहे; हे आपल्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तो सुदिन.

“शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार” या ‘सुधारका’तील लेखात आगरकर म्हणतात, “हिंदूंनो, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक, तोंड, पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय? खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत?” 

विचार तर कराल…!?

(या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. तसेच लेखकाने हा लेख कोणाच्या भावना दुखावण्यासाठी लिहिलेला नसून लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करावा म्हणून लिहिलेला आहे.) 

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आमची आई.. .

आईने केला कोंड्याचा मांडा. माझी आई सौ. इंदिरा द. माजगावकर, दुसरी श्यामची आई होती. इतके दिवस नाही पण आता संसारात पडल्यावर जाणवतय, आईने कसा संसार केला असेल ? घरात आई नाना, आम्ही चौघी बहिणी, एक भाऊ, माझे काका (अण्णा), आत्या (आक्का) इतकी माणसे होती. पण मिळवणारे एकटे नानाच होते. त्यातून शिक्षकांना अगदी अपुरा पगार, पण आईने कोंड्याचा मांडा करून संसार सजवला.

45 ते 50 चा तो काळ, रेशनचे दिवस होते ते! धान्य आणून स्वच्छ करून निवडून रेशनला लाईनीत उन्हातान्हांत उभं राहून जड ओझं घरी आणायचं, घामाघूम व्हायची बिचारी! शिवाय आम्हा मुलांचं सगळ्यांचं आवरून हे सगळं आई एकटी करायची. आई माहेरी धाकटी होती. शेंडेफळ म्हणून लाडाकोडात वाढलेली आई सासरी मोठी सून म्हणून आली, हे मोठेपणाच शिवधनुष्य वेलतांना तिची खूपच दमछाक झाली.

आईचं लग्न अगदी मजेशीर झालं, माझे मामा (दादामामा )आणि माझे वडील नाना दोघे मित्र होते. एकदा नाना अचानक दादा मामांना भेटायला म्हणून आईच्या घरी गेले. बाहेर ओसरीवर माझ्या आईचा सागर गोट्यांचा डाव रंगात आला होता, नाना म्हणाले, “अहो यमुताई (आईचं माहेरचं नाव) दत्तोपंत आहेत का घरात? हे कोण टिकोजी आले मध्येच. ‘ असं पुटपुटत सागर गोट्याचा रंगलेला डाव सोडून आईने गाल फुगवले आणि परकराचा घोळ सावरत दादा मामांना बोलवायला ती आत पळाली. तिला काय माहित या टिकोजीरावांशीच आपली लग्न गाठ बांधली जाणार आहे म्हणून. लग्नानंतर आपल्या मित्राला, म्हणजे मोठ्या मामांना, हा किस्सा आमच्या वडिलांनी आईकडे मिस्कीलपणे बघत रंगवून सांगितला होता. मग काय मामांच्या चेष्टेला उधाणच आलं,

आम्ही मोठे झाल्यानंतर ही गंमत आमच्यापर्यंत मामांनी पोहोचवली होती. तर अशी ही आईनानांची पहिली भेट. नंतर संसाराची निरगाठ पक्की झाली, आणि त्यांचे शुभमंगल झाले. नाशिकच्या जोशांची कनिष्ठ कन्या मोठी सून म्हणून माजगावकरांच्या घरांत आली. कर्तव्याची, कष्टाची जोड देऊन तिने नानांचा संसार फुलवला. आता ति. आई नाना दोघेही नाहीत पण आठवणींची ही शिदोरी उलगडतांना मन बालपणात जात, आणि त्यांच्या आठवणीने व्याकुळ होत… व्याकुळ होतं..

मातृ देवो भव पितृ देवो भव  .

– क्रमशः भाग तिसरा 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares