मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्नाटकी कशिदा… लेखिका – डाॅ.निधी पटवर्धन …संकलन – श्री नितीन खंडाळे ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्नाटकी कशिदा… लेखिका – डाॅ.निधी पटवर्धन …संकलन – श्री नितीन खंडाळे ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

पुण्याहून आलेल्या माझ्या एका मैत्रिणीला मुद्दामून कारवारी जेवण खाऊ घालावे म्हणून कानडी मैत्रिणीकडे गेले. चित्रान्न (विशिष्ट प्रकारचा कानडी तिखट भात), केळ्याच्या गोड पोळ्या, तमळी (बेलाची कढी), कच्च्या पपईची मूगडाळ घातलेली कोशिंबीर, एकही थेंब तेल नसलेलं लोणचं, असं बरंच काही तिने खाऊ घातलं आणि आपली व्यथा व्यक्त केली, ‘‘ मला स्वच्छ मराठी बोलता येत नाही याचं वाईट वाटतं ! मला लोक अजूनही मी ‘कानडी’ आहे म्हणून पाहतात. माझे मराठी हेल कानडी येतात. त्यांनी मला ओळखता कामा नये, मी मराठीच वाटले पाहिजे ’’.

आश्चर्याने केळ्याच्या पोळीचा घास माझ्या हातातच राहिला. तुम्ही जन्माने कानडी आहात तर तसंच ओळखलं गेलात तर वैषम्य कसलं? तुमचे कानडी हेल ही तर श्रीमंती आहे. तसं तर संवादाच्या गरजेतून अनेकदा इतर भाषकांनी केलेले मराठी बोलण्याचे प्रयत्न हा मराठी भाषेचा एक आगळावेगळा साज आहे. त्या त्या भाषिकांच्या मातृभाषांचा गंध, त्या त्या प्रदेशाचे हेल आणि उच्चार घेऊन आलेली मराठीची ही रूपं मला तरी श्रीमंत वाटतात !

कानडी घरात लग्न होऊन गेल्यावर मराठी स्त्रिया किती काळात कानडी शिकतील याचा अंदाज घेतला तर दोन-चार वर्षांत माझी बहीण, मैत्रीण शिकलेय असं पाच-सहा जणांनी सांगितले. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या, खेडय़ापाडय़ातल्या कानडी स्त्रिया मराठी हळूहळू शिकतात आणि सहज बोलू लागतात हा मात्र सर्वांचा अनुभव आहे. भाषेचा जन्म संवादाच्या गरजेतून झाला आहे. अशा इथं आलेल्या, या मातीशी एकरूप झालेल्या स्त्रिया हळूहळू का होईना मराठी शिकतात, हे किती अनमोल आहे. त्यांची मुलं दोन भाषा शिकतात, ही आणखी जमेची बाजू !

भले तुकाराम महाराजांनी ‘ कानडीने केला मराठी भ्रतार एकाचे उत्तर एका न ये ’ असा अभंग रचला असला तरी सुरुवातीचा हा काळ सरल्यावर ही कानडी स्त्री कर्माने मराठी होतेच की ! गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमांचा सहवास मराठी भाषेला आहे. स्वाभाविकपणे त्या त्या सीमावर्ती महाराष्ट्रात जी मराठी बोलली जाते त्यात या भाषा भगिनींचा प्रभाव जाणवणारच.—- जी. ए. कुलकर्णीच्या साहित्यातून कानडी शेजार डोकावतो. तसेच प्रकाश नारायण संत यांचा ‘लंपन’ या भाषेतील अनेक शब्दांची ओळख आपल्याला करून देतो. 

‘तो मी नव्हेच ’ मधील निपाणीचा व्यापारी लखोबा लोखंडे त्याच्या कानडी-मराठीने आपल्या लक्षात राहिलेला आहे. कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात ‘श्री चावुण्डराये करवियलें..’ हे वाक्य आढळलेले आहे.

मराठी भाषेला किमान सात-आठ शतकं झपाटून टाकणारी व्यक्तिरेखा कानडी आहे असं सांगितलं तर काय वाटेल? पण तसं खरंच आहे. मराठी संतकाव्याची सत्त्वधारा ज्या भक्तीपात्रातून वाहते, तिच्या उगमस्थानी तर एक थेट

‘ कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ’ असा कानडी माणूस निघाला ! नुसता माणूस नव्हे, तर थेट राजाच ! तोही पंढरीचा ! 

‘ भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही. तुमच्या कानडी जेवणाइतकीच मधुरता तुमच्या बोलण्यात आहे.’ असे त्या कारवारी मैत्रिणीला सांगितल्यावर 

‘ मुद्दुली चिन्ना ’ म्हणून तिने माझ्यावर जे प्रेम केले ते मला मराठीइतकेच गोड भासले.

डॉ. निधी पटवर्धन 

[email protected]

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्री शंकर महाराजांनी सांगितलेला पत्त्यांच्या खेळातील मथितार्थ… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ श्री शंकर महाराजांनी सांगितलेला पत्त्यांच्या खेळातील मथितार्थ… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ⭐

महाराजांना पत्त्यांचा छंद होता. त्यांना खेळायची लहर आली की ते भेटायला आलेल्या माणसाला पत्ते खेळायला बसवीत. असेच एकदा कोराड मास्तर, श्री. भस्मेकाका आणि रघू यांच्याबरोबर महाराजांनी पत्त्यांचा डाव मांडला होता.

खेळता खेळताच रघूच्या मनात आलं, ‘पत्ते खेळणं काही फारसं चांगलं नाही. मग महाराज का खेळतात ?’

महाराज रागावतील म्हणून त्याने हा  प्रश्न मनातच ठेवला. परंतु त्याच वेळी महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. ते किंचित हसले. त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, “हा पत्त्यांचा डाव वाईटच. होय ना रे ? पण तो त्याचा अर्थ न कळणाऱ्यांना.”

‘अर्थ ? पत्त्यांना कसला अर्थ असणार?’ असा विचार रघू करतो आहे,  तोच महाराज पुढे म्हणाले, “अरे बाबा, याचा अर्थ गूढ आहे.”

महाराजांनी एकेक पान समोर ठेवीत म्हटलं –

“ही दुर्री = म्हणजे पृथ्वी आणि आकाश.

तिर्री = ब्रह्मा, विष्णू, महेश.

चौकी = चार वेद.

पंजी = पंचप्राण.

छक्की = काम, क्रोध हे सहा विकार.

सत्ती  = सात सागर.

अठ्ठी = आठ सिद्धी.

नव्वी = नऊ ग्रह.

दश्शी = दहा इंद्रिये, पाच कर्मेंद्रिये + पाच ज्ञानेंद्रिये.

गुलाम = आपल्या मनात येणाऱ्या वासना, इच्छा. माणूस त्यांचाच गुलाम होऊन राहतो.

राणी = माया.

राजा = या सर्वांवर स्वार होऊन त्यांना चालवणारा.

आणि एक्का = विवेक. माणसाची सारासार बुद्धी. या सर्व खेळाला स्वाधीन ठेवणारा.

काय रे ? डोक्यात शिरलं का काही?”

आता या लहानग्याला काय कळणार ? त्यानं गोंधळून एकदा होकारार्थी मान हलवली. एकदा नकारार्थी मान हलवली.

महाराज हसले. मास्तरांना म्हणाले, “तुम्ही सांगा याची फोड करून!”

“मला सुद्धा नीटसं नाही सांगता यायचं. पण प्रयत्न करतो. दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासनाच इंद्रियांना नाचवते. वासना उत्पन्न होते मायेमुळे, तिच्या नादानं वाहावत जातं ते माणसाचं मन. माणूस. तो राजा, पण या राजालाही मुठीत ठेवू शकतो, त्याला अंकुश लावू शकतो तो विवेक- हुकुमाचा एक्का म्हणजेच सदगुरू!”

“बरोबर.” महाराज म्हणाले, “समोरचा भिडू म्हणजे प्रारब्ध ! त्याच्या हातातले पत्ते आपल्याला माहीत नसतात. पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. जीवन जगतो.”

संग्राहिका : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कल्याणमस्तु… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कल्याणमस्तु… ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘आपले कल्याण देवच करीत असतो’ हा मनातला भाव ‘इदं न मम’ या भावनेतून उमटत असेल तर ते योग्यच आहे.पण आपल्या आयुष्यात खूप कांही चांगलं घडतं, आपल्याला यश मिळतं, आपल्या अपेक्षा पूर्ण होतात तेव्हा सर्वसाधारणपणे ‘माझ्या कष्टांचं फळ मला मिळालं, मी केलेल्या प्रयत्नांना यश आलं’ हाच विचार उघडपणे व्यक्त केला नाही तरी ठळकपणे मनात असतोच. अडचणीच्या, संकटाच्या वेळी मात्र हिम्मत न हारता ती परिस्थिती स्विकारून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द महत्त्वाची असते.पण अशावेळी हतबल होणारे, देवानेच आपल्या मदतीला धावून यावे, अडचणींचा परिहार करावा यासाठी देव देव करणारेच अनेकजण असतात. आपल्या हातून एखादी चूक घडली तर देवानेच मला दुर्बुद्धी दिली अशी सोयीस्कर समजूत करून घेऊन त्याचा दोष स्वतः स्विकारण्याची बऱ्याच जणांची तयारी नसते. अशी माणसे यशाचं, उत्कर्षाचं श्रेय देवाला देऊन ही त्याचीच कृपा असं वरवर म्हणतही असतील कदाचित पण त्या त्यावेळी मनातला त्यांचा अहं मात्र  अधिकाधिक टोकदारच होत जात असतो.

माणसाच्या प्रवृत्तीचं हे विश्लेषण अर्थातच ‘कल्याण’ या शब्दाबद्दल विचार करत असतानाच नकळत घडलेलं. त्याला कारणही तसंच आहे.

‘कुणाचं कल्याण करणारे आपण कोण? परमेश्वरच खऱ्या अर्थाने कल्याण करीत असतो’ हे गृहित, कल्याण या शब्दाचे असंख्य कंगोरे सर्वांचे क्षेमकुशल ध्वनित करणारे आहेत हे आपण समजून घेतले तर ‘ कल्याण करणारे आपण कोण? ते परमेश्वरच करीत असतो’ हे गृहित मनोमन तपासून पहायला आपण नक्कीच प्रवृत्त होऊ.हे व्हायला हवे.अन्यथा ‘कल्याण हे ईश्वरानेच करायचे असते’ हाच ग्रह मनात दृढ होत जाईल.

‘कल्याण ‘या शब्दात लपलेले या शब्दाचे विविध छटांचे अर्थ आपल्यालाही आपल्या गतायुष्यातले अनेक क्षण पुन्हा तपासून पहायला नक्कीच प्रवृत्त करतील.

कल्याण म्हणजे क्षेम. कल्याण म्हणजे मंगल, कुशल शुभ. कल्याण म्हणजे भद्र, श्रेय, सुख आणि स्वास्थ्यही. आनंद, सौख्य, मांगल्य, बरं, भलं म्हणजेही कल्याणच. सुदैव, भाग्य, हित, लाभ, ऐश्वर्य,या शब्दांतून ध्वनित होणारं बरंच कांही ‘कल्याण’ या एकाच शब्दात सामावलेलं आहे. उत्कर्ष, भाग्योदय, अभ्युदय, भरभराट, प्रगती या सगळ्यांनाही ‘कल्याण’च अभिप्रेत आहे!

या वरील सर्व शब्द आणि अर्थ यांच्यामधे जे लपलेलं आहे ते ते आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर वेळोवेळी आपल्याला मिळालेलं आहेच. कांही क्वचित कधी निसटलेलंही. जे मिळालं ते माणसाला वाटतं आपणच मिळवलंय. पण ते मिळायला, मिळवून द्यायला, ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायला आपल्या आयुष्यात त्या त्यावेळी डोकावून गेलेले कुणी ना कुणी निमित्त झालेले असतातच. बऱ्याचदा हे आपल्या लक्षांत तरी येत नाही किंवा अनेकजण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष तरी करतात. खरंतर त्या त्या वेळी निमित्त झालेल्या कुणाला विसरुन न जाता त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण जाणिवपूर्वक मनोमन जपायला हवी. ‘अहं’चा वरचष्मा असेल तर ती जपली जात नाहीच.आणि जे ही कृतज्ञता जपत असतात ते त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांची त्यांची अडचण दूर करायला अंत:प्रेरणेनेच प्रवृत्तही होतात. ही नेमक्या गरजेच्या वेळी आपल्या संपर्कात येऊन आपल्याला मदत करून जाणारी माणसं परमेश्वराची कृपाच म्हणता येईल.

‘त्यांच्या रूपाने परमेश्वरच मदतीला धावून आला ‘असा भाव जेव्हा कृतार्थतेने एखाद्याच्या मनात निर्माण होतो त्याचा हाच तर अर्थ असतो.

एखाद्या मनोमन कोसळलेल्या माणसाला आपण नकळत सावरणं, आपल्या कृतीने, आपुलकीने एखाद्याच्या दुखऱ्या मनावर हळूवार फुंकर घालणं हे त्या त्या व्यक्तिसाठी किती मोलाचं  असतं हे मला माझ्या आयुष्यातले सुखदुःखाचे प्रसंग आठवताना अनेकदा तीव्रतेनं जाणवतं.

खुशालीची, आपुलकीची पत्रं येणं,पाठवणं कालबाह्य झालेलं आहे. पण ती जेव्हा त्या त्या काळातली गरज होती तेव्हा ती गरज निर्माण झालेली होती  परस्परांबद्दल मनात जपलेलं प्रेम आणि आपुलकी यामुळेच. तिकडे सगळं ‘क्षेमकुशल’ असावं ही मनातली सद्भावना इतरांचं ‘कल्याण’ चिंतणारीच असायची.

आदरभावाने नतमस्तक होऊन नमस्कार करणाऱ्यांसाठी मनातून उमटणारा ‘कल्याणमस्तु’ हा आशिर्वाद आंतरिक सदभावना घेऊनच उमटत असल्याने खऱ्या अर्थाने फलद्रूप होण्याइतका कल्याणकारी निश्चितच असायचा.

काळानुसार होणाऱ्या सार्वत्रिक बदलांच्या रेट्यात होणाऱ्या पडझडीमुळे हा सद्भाव त्याची आंतरिक शक्ती हरवत चाललाय असं वाटायला लावणारं सर्वदूर पसरु लागलेलं निबरपण  माणसाच्या मनातल्या हितकारक भावनाही निबर करत चाललाय आणि तोच ‘जनकल्याणाला’

सुध्दा मारक ठरत चाललाय हे आपल्या लक्षातही न येणं हाच सार्वत्रिक कल्याणातला मुख्य अडसर आहे.तो दूर होईल तेव्हाच ‘कल्याणमस्तु’ हा आशिर्वाद सशक्तपणे उमटेल आणि खऱ्या अर्थाने सफलही होईल!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆घरापासून … ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ घरापासून… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

अत्यंत बेताच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले दोघे. उच्च विद्या विभूषित. पदवी घेतल्यानंतर लग्न करतात.. स्वतःवर विश्वास असलेले शून्यातून विश्व निर्माण करायला निघतात. तो पैसे मिळविण्याकरिता करिअर करण्यात रममाण होतो. खूप स्वप्नं उराशी बाळगलेली ती संसारात मुलाबाळांच्यात पूर्ण विरून जाते. कायम सहकाऱ्याच्या रुपात आपली भूमिका बजावत राहते. तिला आवाज असतो पण बोलून उपयोग नसतो. अजून काही दिवस म्हणून शांत राहते.. प्रतिष्ठेला भुकेलेला आणि स्वतःला सगळं समजतंय या अविर्भावात असलेला तिचा जोडीदार, तिच्या मनाचा, करिअरचा विचार करत नसतो. ” तू हवं ते करु शकतेस !” असं म्हणायचं पण घरातली कोणतीही जबाबदारी उचलायची नाही. आपलं काम आणि समाजकार्याचं भूत डोक्यात घेऊन कोणत्या ना कोणत्या कामात गुंतून पडायचं. तिची केविलवाणी धडपड चालू राहते. सगळंच अंगावर पडल्यामुळे तिला काही सुचत नसतं. तिची खूप चिडचिड आणि स्वतःचा त्रागा होत राहतो.

एखाद्या गोष्टीला विरोध केला की, वाद-विवाद भांडण, अंगावर येणं, हात उगारणं ठरलेलं. स्वतःचे आई वडील, भाऊ बहीण यांच्यात रममाण. ” माझेच दोन रुपये घ्या पण मला साहेब म्हणा !” अशी त्याची अवस्था. 

दोन मुलं, त्यांची शाळा, मुलांवरील संस्कार, स्वयंपाक, घरकामाचे नियोजन  सगळं तिनचं पाहायचं..! मुलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात छान प्रगती करतात.. त्यावेळी माझी मुलं म्हणून ओरडून ओरडून सगळ्यांना सांगायला हा पुढे पुढे पळायचा. मुलांना हे नको ते नको म्हणून आडवं पडायचे. त्यांच्याशी भांडणाच्या स्वरात बोलायचे. त्यांच्या वयाचे होऊन त्यांना समजून घ्यायचे नाही. स्वतःचे महत्त्व कायम अधोरेखित करायचे. सगळं श्रेय स्वतःला कसं घ्यायचे याची कला वाखाणण्याजोगी.

एक दिवस हा माणूस आपल्या बायकोला म्हणतो. ” आपली मुलं चांगली घडली. आपण आदर्श पालक आहोत. आपण घरात समतेने, लोकशाहीने वागलो. याचा मुलांवर चांगला परिणाम झाला..!” ती मागचं सगळं आठवते आणि म्हणते, “दहा मिनिट शांत बसून विचार कर ! लोकशाही, समता कशाला म्हणतात याचा अभ्यास कर ! मग बोलू आपण…. “

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थेट चीनमधून…डाॅ.अचल श्रीखंडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ थेट चीनमधून…डाॅ.अचल श्रीखंडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे खरं आहे. परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कुठेही नाही. जगभरात दाखवण्यात येतंय तशी काहीही परिस्थिती चीनमध्ये नाही. कोविडमुळे चीनमध्ये मृत्यूचं थैमान सुरू आहे, अशा आशयाच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या आहेत. 

चीनमध्ये पसरणारा व्हेरियंट हा ओमिक्रॉन आहे. तो वेगाने पसरतो आहे, परंतु अतिशय माईल्ड आहे. तीन दिवसांच्या उपचारानंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत.

बहुसंख्य रुग्ण हे असिम्टोमॅटिक आहेत. मी ज्या आंतरराष्ट्रीय रुग्णालयामध्ये काम करतो, तिथेही अशी स्थिती नाही. रुग्णालये रुग्णांनी भरलेली नाहीत. ॲाक्सिजनची कमतरता नाही. लोकांना व्हेंटिलेशनवर जाण्याची गरज पडत नाही. मृत्युदर हा अत्यंत कमी असून तो केवळ ६० वर्षानंतरच्या काही रुग्णांमध्ये आढळतो. क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.

ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत, त्यांना सात दिवसांसाठी घरातच रहावं लागतं. झीरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने लोक रस्त्यांवर मोकळे फिरत आहेत. मॉल्समध्ये जात आहेत आणि आनंद घेत आहेत. कोणीही कशाही पद्धतीच्या चिंतेमध्ये नाही.

डोकं दुखणं, नंतर ताप येणं ही सर्वसामान्य लक्षणे असून त्यावर पॅरासिटामॉल देणं हाच उपचार करण्यात येतोय. तीन दिवसांपर्यंत लोक बरे होतात. सातव्या दिवशी पुन्हा कोरोना चाचणी केली जाते आणि ती व्यक्ती कामावर परतू शकते.

चीनमध्ये असलेला व्हेरियंट हा ओमिक्रॉन असून त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरियंटमधून भारतीय नागरिक गेले आहेत. त्यामुळे भारतीयांनी कोरोनाबद्दल चिंता करण्याचं कारण नाही.

– डॉ. अचल श्रीखंडे

शांघाय, चीन येथील भारतीय वंशाचे डाॅक्टर.

(माहितीचा सोर्स : एबीपी माझा)

संग्रहिका : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

मुलाने काही कमावले तर ४ पैसे घरात येतील

किंवा

४ पैसे मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस काम करतो.

मग या तथाकथित पैशांमध्ये केवळ ४ पैसे का ?

३ किंवा ५ पैसे का नाहीत हा प्रश्न आहे..?

चला तर मग वडीलधाऱ्यांकडून  तपशील जाणून घेऊन ४ पैसे कमवा ही म्हण समजून घेऊ या.

पहिला पैसा

विहिरीत टाकण्यासाठी.

 दुसऱ्या पैसा

कर्ज फेडणे.

तिसऱ्या पैसा

पुढचे देणे भरणे

चौथा पैसा

भविष्यासाठी जमा करणे

या प्रकरणाची गुंतागुंत सविस्तरपणे समजून घेऊ या.

१.  विहिरीत एक पैसा टाकणे.

म्हणजे – स्वतःच्या कुटुंबाची आणि मुलांची पोटे भरण्यासाठी वापरणे.

२. कर्ज फेडण्यासाठी दुसरा पैसा वापरा.

 आई-वडिलांच्या सेवेसाठी..,

 ते ऋण फेडण्यासाठी त्यांनी आमची काळजी घेतली, आमचे पालनपोषण केले आणि मोठे केले.

३. पुढील (मुलांचे) कर्ज फेडण्यासाठी तिसरा पैसा वापरणे.

तुमच्या मुलांना शिक्षित करा, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे मोजा.

 (म्हणजे – भविष्यातील कर्ज)

४.  चौथा पैसा पुढील (पुण्य) ठेवीसाठी वापरणे.

म्हणजे – शुभ प्रसंग, अशुभ प्रसंग, परोपकाराच्या अर्थाने,  गरजवंतांची सेवा करणे आणि असाहाय्यांना मदत करणे, या अर्थाने..!

 तर.. ही ४ पैसे कमावणारी गोष्ट आहे.  आपल्या प्राचीन कथांमध्ये किती उच्च विचार आहेत..!

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – विरजण ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 🙊 विरजण ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“नमस्कार, नमस्कार ! बोल आज काय काम काढलस ?”

“थोडं दही हव होत विरजण लावायला.”

“ती वाटी खाली ठेव आणि बस बघु आधी खुर्चीवर.”

“पण पंत विरजण… “

“त्याची कसली काळजी करतोस?  मी सांगतो हिला तुला विरजण द्यायला, पण त्याच्या आधी माझ एक काम आहे तुझ्याकडे.”

“बोला ना बोला पंत, तुम्ही माझ्यासाठी एवढं… “

“जास्त मस्काबाजी नकोय, मला गेल्यावेळेस जसा डोंबिवलीच्या करव्यासाठी ट्रेनचा आवाज टेप करून दिला होतास ना…. “

“त्याच आवाजाची आणखी टेप हव्ये का तुम्हाला, देन डोन्ट वरी, संध्याकाळी ….”

“उगाच गुडघ्याला बाशिंग लावलेल्या नवऱ्या सारखा उधळू नकोस, मी काय सांगतोय ते नीट ऐक.”

“सॉरी पंत, बोला.”

“अरे करव्याला त्या ट्रेनच्या आवाजाच्या टेपचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याच्या झोपेचा पण प्रश्न सुटला, पण…. “

“पण काय पंत ?”

“अरे नुसता आवाज ऐकून त्याला झोप येईना. मला फोन करून सांगितलन तस.”

“मग ?”

“म्हणाला ‘या आवाजा बरोबर ट्रेन मधे बसल्याचा फिल यायला हवा, तरच झोप येईल’ आता बोल !”

“मग तुम्ही त्यांचा तो प्रॉब्लेम कसा काय सॉल्व केलात ?”

“अरे त्याला सांगितलं, झोपेच्या वेळेस तू नुसती ट्रेनच्या आवाजाची टेप चालू नको करुस, तुझ्याकडच्या रॉकिंग चेअर मध्ये बस आणि मग टेप चालू कर आणि मला सांग, तुला झोप येते की नाही.”

“मग आली का झोप कर्वे काकांना तुमच्या उपायाने?”

“अरे न येवून सांगते कोणाला, दहा मिनिटात त्याची गाडी खंडाळ्याचा घाट चढायला लागली !”

“पंत, पण कर्वे काका घरी रॉकिंग चेअर मधे बसून ट्रेनच्या आवाजाची टेप ऐकत होते ना, मग एकदम त्यांची गाडी खंडाळ्याचा घाट कशी काय चढायला लागली ?”

“मी गेल्या वेळेसच म्हटले होत तुला, तुमच्या आजकालच्या पिढीचा आणि मातृभाषेचा काडीचाही……. “

“पंत तुम्हीच तर म्हणालात ना की कर्वे काकांची गाडी…. “

“अरे म्हणजे तो गाढ झोपून घोरायला लागला, आता कळलं?”

“मग त्यांची गाडी खंडाळ्याचा घाट… “

“अरे आमच्या पिढीचे ते मराठी आहे, तुला नाही कळायचं.”

“असं होय, पण आता तुमचं नवीन काम काय ते सांगा आणि मला विरजण देवून मोकळ करा !”

“हां, अरे करव्याचा झोपेचा प्रॉब्लेम मी सॉल्व केल्याची बातमी अंधेरीला राहणाऱ्या जोशाला, कशी कुणास ठाऊक, पण कळली.”

“बरं !”

“अरे त्याचा मला लगेच फोन, मला पण हल्ली रात्री झोप येत नाही, मला पण टेप पाठवून दे !”

“ओके, मी आजच संध्याकाळी ट्रेनच्या आवाजाची टेप… “

“अरे असा घायकुतीला येऊ नकोस, त्याला ट्रेनच्या आवाजाची टेप नकोय, विमानाच्या….. “

“आवाजाची टेप हवी आहे ?”

“बरोबर !”

“पण पंत विमानाच्या आवाजाची टेप कशाला हवी आहे जोशी काकांना ?”

“अरे त्याची अंधेरीची सोसायटी एअरपोर्टच्या फनेल झोन मधे आहे आणि…. “

“फनेल झोन म्हणजे काय पंत ?”

“अरे फनेल झोन म्हणजे, जिथे सगळ्या सोसायटया एअरपोर्ट जवळ असल्यामुळे कमी मजल्याच्या असतात आणि त्यांना दिवस रात्र विमानाच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो आणि…….”

“सध्या विमान वाहतूक बंद असल्यामुळे त्यांच्या आवाजा शिवाय जोशी काकांना पण रात्रीच्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, बरोबर ? “

“बरोबर !”

“ओके, नो प्रॉब्लेम, संध्याकाळीच तुम्हाला विमानाच्या आवाजाची टेप आणून देतो, मग तर झालं ! आता मला या वाटीत जरा विरजण द्यायला सांगा बघु काकूंना.”

“अरे हो, हो, विरजण कुठे पळून चाललंय.  आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेस तर लगेच तुला विरजण देतो, बोल विचारू प्रश्न ?”

“हो, विचाराना पंत.”

“मग मला असं सांग, या जगात कोणी कोणाला प्रथम विरजण दिले असेल ?”

“अरे बापरे, खरच कठीण प्रश्न आहे हा आणि मला काही याच उत्तर येईलसे वाटत नाही.”

“मग तुला विरजण…… “

“थांबा पंत, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याच उत्तर तुम्ही बरोबर दिलेत तर मला विरजण नको, ओके ?”

“मला माहित आहे तू मला तुझ्या बालबुद्धीने काय प्रश्न विचारणार आहेस ते.”

“काय सांगता काय पंत, मग सांगा बघू मी कोणता प्रश्न विचारणार आहे ते.”

“तोच सनातन प्रश्न, कोंबडी आधी की….. “

“चूक, शंभर टक्के चूक !”

“नाही, मग कोणता प्रश्न विचारणार आहेस ?”

“आधी मला प्रॉमिस करा, की तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, तर विरजण द्याल म्हणून !”

“प्रॉमिस, बोल काय आहे तुझा प्रश्न.”

“मला असं सांगा पंत, ज्याने पहिले घड्याळ बनवले, त्याने कुठल्या घड्याळात बघून त्याची वेळ लावली असेल ?”

“अं… अं…. अग ऐकलंस का, याला जरा वाटीत विरजण दे पाहू.”

© श्री प्रमोद वामन वर्तक

१०-०१-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५१ – दानशूर जॉन डी रॉकफेलर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५१ – दानशूर जॉन डी रॉकफेलर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मॅडम कॅल्व्हे  स्वामी विवेकानंद यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे पुढचे आयुष्य बदलून गेलेले दिसते .कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी, दु:खाच्या वेळी माणसाला योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आधार वाटतो आणि त्यातून तो सावरायला मदत होते, बाहेर पडायला मदत होते. एव्हढच काय, सर्व काही चांगलं असताना सुद्धा योग्य दिशा तर हवीच ना? तशी योग्य मार्गदर्शन करणारी, योग्य माणसंही आपल्याला माहिती हवीत. आजच्या काळात ती असायलाही हवीत.  

स्वामीजी शिकागो मध्ये इतर ठिकाणी ही फिरत होते. त्यांच्या संपर्कात वेगवेगळी माणसे येत होती. एव्हाना परिषदेपासून त्यांची चांगलीच प्रसिद्धी झाली होती.स्वामीजींच्या भेटीतून आपल्याला चांगले तत्वज्ञान समजू शकते, त्यांच्या चांगल्या विचारांनी योग्य दिशा मिळू शकते असा विश्वास तिथल्या लोकांमध्ये निर्माण झाला होता.जे जे त्यांना भेटत, त्यांच्या विचारात बदल होत असे.

अशीच एका धनवंताची भेट स्वामीजिंबरोबर झाली. ते होते जॉन डी. रॉकफेलर.( जन्म-८ जुलै १८३९ मृत्यू २३ मे १९३७) मोठे व्यावसायिक होते. तेलसम्राट म्हणून ओळखले जात होते.

रॉकफेलर घराणे हे  प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपतींचे दानशूर घराणे. आधुनिक खनिज तेल उद्योगाचा विकास करण्याचा, त्याचप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर परोपकारी व जनहितकारक कृत्ये करण्याचे श्रेय या उद्योगसमूहाला जाते. विशेषत: अमेरिकन वैद्यकशास्त्राला आधुनिकीकरणाचा साज देण्याचे कर्तृत्व या घराण्याचे आहे. जॉन हे या घराण्यातील पहिले उद्योगपती, Standard Oil उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेलउद्योगाचा संस्थापक. शिक्षण पूर्ण केल्यावर १८५९ मध्ये क्लार्क यांच्या भागीदारीत दलालीचा धंदा सुरू केला. १८५९ मध्ये अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया च्या टायटसव्हील मध्ये जगातली पहिली तेल विहीर खोदली गेली. १८६३ मध्ये जॉन यांनी ‘अँड्रूज, क्लार्क अँड कंपनी’ स्थापन करून तेलशुद्धीकरण उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी ‘रॉकफेलर अँड अँड्रूज कंपनी’ स्थापन केली. १८८२ मध्ये ‘Standard Oil Trust’ या मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली अमेरिकेतील ९५% तेलउद्योग, लोहधातुकाच्या खाणी, लाकूड कारखाने, वाहतूक उद्योग यांसारखे अनेक उद्योग होते.

जॉन यांनी १८९५ च्या सुमारास Standard Oil Company चे दैनंदिन व्यवस्थापन आपल्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास प्रारंभ केला होता. तेलउद्योगातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यापैकी बराचसा भाग बाजूला काढून तो लोहधातुकाच्या खाणी व न्यूयॉर्कमधील व्यापारी बँकिंग व्यवसाय या दोन अतिशय विकासक्षम उद्योगांकडे त्यांनी वळविले. मोठ्या प्रमाणावरील लोकोपकारविषयक कार्ये, हे जॉन यांच्या जीवनातील दुसरे मोठे वैशिष्ट्य होते. त्यामुळे ते तेलउद्योगापेक्षा या कार्याबद्दल अधिक ख्यातकीर्त झाले होते. हे किती विशेष म्हटले पाहिजे. आपल्याजवळील अफाट संपत्तीचा काही भाग जनकल्याणार्थ खर्च करणे आवश्यक आहे; नव्हे, ते आपले कर्तव्यच आहे, अशी त्यांची भावना होती. केवळ आपल्या वारसदारांना सर्व संपत्ती मिळणे इष्ट नसल्याचे त्यांचे ठाम मत होते. म्हणून त्यांनी अमेरिकेतील वैद्यकशास्त्र, शिक्षण तसेच संशोधन यांचा विकास व उन्नती यांकरिता लक्षावधी डॉलर खर्च केले. अनेक धर्मादाय संस्था उभारून त्यांचे संचालन सुयोग्य विश्वस्तांच्या हाती ठेवले व त्यांच्या दैनंदिन कार्यवाहीसाठी लोककल्याणाची तळमळ व आस्था असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले. अशा संस्थांद्वारा जॉन यांनी सुमारे साठ कोटी डॉलर रकमेचा विनियोग केला. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमधील अतिशय हलाखीची शैक्षणिक अवस्था सुधारण्यासाठी ‘जनरल एज्युकेशन बोर्ड’ हे मंडळ व ‘शिकागो विद्यापीठ’ या दोन्ही संस्था त्यांच्या प्रचंड देणग्यांमधून स्थापन झाल्या.पुढेही शिकागो विद्यापीठास त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत सुमारे आठ कोटी डॉलर देणगीरूपाने दिले.

जॉन यांनी १९०२ मध्ये स्थापन केलेल्या ‘General Education Board’ या शैक्षणिक मंडळाचा अमेरिकेतील शिक्षणाचा वंश, धर्म, जात, लिंग यांचा विचार न करता विकास करणे हे उद्दिष्ट होते. १९५२ अखेर या मंडळाने आर्थिक अडचणीमुळे आपले कार्य थांबविले. पन्नास वर्षांच्या कालखंडात महाविद्यालये व विद्यापीठे, वैद्यकीय शाळा, शैक्षणिक संशोधन प्रकल्प व शिष्यवृत्त्या अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मंडळाने पैसे खर्च केले. १९०१ मध्ये रॉकफेलर वैद्यकीय संशोधन संस्था न्यूयॉर्कमध्ये स्थापण्यात आली. आरोग्यशास्त्र, शस्त्रक्रिया, वैद्यक व तदनुषंगिक शास्त्रे यांच्या संशोधन कार्यात मदत, रोगांचे स्वरूप, कारणे व निवारण या कार्यात मदत व संशोधन आणि यांविषयी झालेल्या व होणाऱ्या संशोधनाचा व ज्ञानाचा सार्वजनिक कल्याणार्थ प्रसार करणे अशी या संस्थेची उद्दिष्टे होती. पुढे याच संस्थेचे रॉकफेलर विद्यापीठामध्ये रूपांतर करण्यात आले. जगातील मानवजातीच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉकफेलर प्रतिष्ठान या लोकोपकारी संघटनेची १४ मे १९१३ रोजी स्थापना करण्यात आली.

जॉन यांचे सुरूवातीचे दिवस –

खरं तर जॉन अमेरिकेतल्या न्यूयॉर्क जवळील रिचफोर्ड या खेड्यात राहणारा सर्व सामान्य कुटुंबातला मुलगा होता. वडीलही पोटापाण्यासाठी साधं काहीतरी काम करायचे, जॉन मोठा झाल्यावर गावच्या बाजारात भाजी, अंडी असे विकू लागला.मग पुस्तकाच्या दुकानात काम करू लागला. थोडे पैसे साठवून पेनसिल्वेनिया मध्ये जाऊन नगरपालिकेच्या रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरविण्याच काम करू लागला. इथे थोड स्थैर्य मिळालं. इतर गावातही रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरवण्याचे काम प्रयत्न करून मिळवलं. यातून तेलाचं महत्व ओळखून जॉन बरेच काही शिकला होता आणि भविष्यात ज्याच्याकडे तेल त्याचेच हे जग हे त्याने ओळखले. मग ऑइल रिफायनरीत पैसे गुंतवले. तेल विहीरींचे पीक आले. आणि बुडीत तेलविहीर कंपनी रॉक फेलर ने लिलावात विकत घेतली. ती म्हणजेच स्टँडर्ड ऑइल. आता जॉन च्या हातात सगळ आलं. तेलाच्या ऑर्डर मिळत होत्या. त्याला रिफायनारीची जोड दिली. तेल साठवण्यासाठी पत्र्याचे डबे लागत त्याचाही कारखाना स्वत:च घातला. एका राज्यातून हे डबे वाहतूक करायला स्वत:चे  टँकर्स बनवले. पुढे रेल्वे वॅगन ची गरज होती तेही तयार केले आणि त्या वॅगन, ने आण करण्यासाठी स्वत:चा रेल्वे मार्गही टाकला . इतकी मेहनत करून आपल साम्राज्य त्याने उभ केलं होत. सदैव सैनिका पुढेच जायचे या चालीवर …..  हा जॉन पुढे पुढे जातच होता, प्रगती करत होता.  

 एव्हढं माहिती करून देण्याचं कारण म्हणजे इतका हा प्रगती केलेला, श्रीमंत झालेला माणूस एका हिंदू तत्वज्ञानाच्या संपर्कात आल्यावर त्याचे मन कसे परिवर्तन होऊ शकते त्याचं हे उदाहरण आहे. तेही परदेशात हे विशेष.

रॉकफेलर यांचे एक व्यावसायिक सहकारी मित्र होते, त्यांच्याकडे स्वामीजी राहत असताना ते जॉन यांना आग्रह करीत की, ‘एकदा स्वामी विवेकानंदांना तुम्ही भेटा’. पण जॉन स्वाभिमानी होते, त्यांना कुणी सुचवलेले मान्य होत नसे. पण एकदा अचानक त्यांच्या मनात आले विवेकानंदांना भेटायचे आणि म्हणून, ते स्वामीजींना भेटायला त्या सहकार्‍याकडे पोहोचले. कुठलाही शिष्टाचार न पाळता जॉन सरळ विवेकानंद यांच्या खोलीत गेले. स्वामीजी त्यांच्या खोलीत योग अवस्थेत बसले होते. त्यांनी मान सुद्धा वर केली नाही. पाहिले नाही. जॉन बघतच राहिले. थोडा वेळ गेल्यानंतर, स्वामीजी म्हणाले, “तुम्हाला जी संपत्ती मिळाली आहे, ती तुमची नाही. तुम्ही केवळ एक माध्यम आहात. तुम्ही लोकांचं भलं करावं. इतरांना सहाय्य करण्याची, त्यांचं कल्याण करण्याची संधी तुम्हाला मिळावी, म्हणून ईश्वराने ही संपत्ती तुम्हाला दिली आहे”. हे ऐकून मनातून दुखावलेले रॉकफेलर तडक घरी आले ते हा विषय डोक्यात घेऊनच. एक आठवड्याने पुन्हा ते स्वामी विवेकानंद यांना भेटायला गेले. तेंव्हाही स्वामीजी योग अवस्थेतच बसलेले होते. रॉकफेलर यांनी एक कागद स्वामीजींपुढे टाकला. त्यावर, आपण एका सार्वजनिक संस्थेला भरघोस देणगी देण्याचे ठरविले आहे असे लिहिले होते.आणि म्हणाले,आता यामुळे तुमचे समाधान होईल आणि त्यासाठी तुम्ही माझे आभार मानायला हवेत. विवेकानंद यांनी कागदावरून शांतपणे नजर फिरवली पण वर पाहिले नाही आणि म्हणाले, “ठीक, यासाठी तुम्ही मला धन्यवाद द्यायला हवेत”. मनस्वी असलेले रॉकफेलर यांची ही पहिली मोठी देणगी होती. विशेष म्हणजे, १८९५ पासून त्यांच्या गाजलेल्या कल्याणकारी निधींचा प्रारंभ झाला. म्हणजे एका क्षणी स्वामीजींच्या भेटीत लोकांसाठी आर्थिक सहाय्य करावं या सूचनेचा राग आलेले रॉकफेलर यांनी आता कल्याणकारी निधिला सुरुवात केली हा मोठा बदलच होता. पुढे त्यांच्या मानव सेवा कार्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, “मानवी जीवनात केवळ पैशाचा संग्रह करत बसण्यापेक्षा मोलाचं असं काहीतरी आहे, संपत्ती हा माणसाच्या हातात असलेला केवळ एक विश्वस्त निधि आहे त्याचा त्याचा अयोग्य पद्धतीने वापर करणे हे पाप आहे. जीवनात अखेरच्या क्षणाला उत्तम प्रकारे सामोरं जाण्याची तयारी करणं म्हणजेच सतत दुसर्‍यासाठी जगत राहणं होय आणि ते मी करतो आहे”. हाच होता स्वामीजींच्या संपर्काचा प्रभाव.

रॉकफेलर घराण्याने वैद्यक, शिक्षण, कला, सांस्कृतिक घडामोडी इत्यादी क्षेत्रांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक साह्य देऊन मानवजातीचे कल्याण व विकास अव्याहत होत राहील यासाठी प्रतिष्ठाने व विविध निधी उभारून दानशूरतेचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे.

असे अनेक लोक स्वामीजींना भेटत होते. परिषद संपल्यानंतर पावणेदोन महीने आसपासच्या गावांमध्ये त्यांची व्याख्याने पण झाली. त्यांनी व्याख्यानांसाठी एक करार केला होता. स्लेटन लायसियम ब्यूरो या संस्थेशी तीन वर्षांचं करार केला की त्यांनी व्याख्याने द्यायची त्या बदल्यात स्वामीजींना पैसे दिले जातील. असे केल्यास पैसा जमवून तो भारतातल्या कामासाठी उपयोगी पडेल असे स्वामीजींना पटवण्यात आले होते. दौर्‍यातील पहिले व्याख्यान झाल्यावर स्वामीजींना 100 डॉलर्स देण्यात आले. त्यामुळे असा कार्यक्रम सुरू झाल्याने स्वामीजींची धावपळ, सतत प्रवास, मुक्काम सुरू झाले. दमछाक झाली. करार झाल्यामुळे तो एक व्यापार झाला होता ते अनुषंगुन  काम करणे भाग होते आणि हे आपल्याला शक्य नाही असे अनुभव घेतल्यानंतर स्वामीजींच्या लक्षात आले.

दौरा ठरविणारी ब्यूरो व्यवसाय म्हणून त्याकडे बघत असते. जाहिरात, वृत्तपत्रे प्रसिद्धी, व्याख्यानांचे भित्तिपत्रके असा दिनक्रम स्वामीजींना नकोसा झाला. यावेळी मेंफिस इथं आठवडयाभरचा मुक्काम झाला आणि स्वामीजी सुखावले.१३ ते २२ जानेवारी १८९४ मध्ये ते मेंफिसला थांबले.हयू एल ब्रिंकले यांचे पाहुणे म्हणून ते मिस व्हर्जिनिया मून यांच्या निवासगृहात उतरले होते. त्या नुसते निवासगृह चालवीत नव्हत्या तर गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणे हे ही काम करत. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे त्या मेंफिस मध्ये प्रसिद्ध होत्या. इथे त्यांची दोन व्याख्याने झाली. मेंफिसला जरा त्यांना शांतता लाभली. इथे पत्रकारांनी वृत्तपत्रासाठी  मुलाखती घेतल्या, वेगवेगळ्या लोकांच्या घरी भेटी,परिचय, चर्चा झाल्या.  स्वामीजींच्या विचारांनी पत्रकार सुद्धा भारावून गेले होते.

वुमेन्स कौन्सिल मध्ये १६ जानेवारीला मानवाची नियती या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यात ते म्हणाले, “ परमेश्वराची भीती वाटणे हा धर्माचा प्रारंभ आहे. तर त्याच्याविषयी प्रेम वाटणे ही धर्माची परिणती आहे. मानवाचं मूलभूत पाप या सिद्धांतात वाहून जाऊ नका. जेंव्हा अॅडमचा अध:पात झाला, तेंव्हा तो पवित्रतेपासून झाला. त्याच्या पावित्र्याला ढळ पोहोचला,हे पतनाचे कारण. तेंव्हा मूळ आहे ते पावित्र्य. पतन नंतरचं आहे”. हे त्यांचे उद्गार श्रोत्यांची मने हेलावून गेले.मेंफिस च्या आठ दिवसाच्या मुक्कामात कळत नकळत स्वामीजींनी लोकांच्या मनात अध्यात्मिकतेच्या विचारांचे बीज पेरले होते. सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परत आले . तीन आठवडे राहिल्यानंतर, तिथून ते  डेट्रॉईटला आले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मन ! संस्कृत आणि प्राकृतातही एकच शब्द, काय आहे हो याची व्याख्या ?

“The heart is situated at the left side in the human body“–असं हृदयाबद्दल खात्रीशीर सांगितलं जातं मग मनाचं काय? कुठे असते ते वसलेलं ? हृदयात? हृदयाच्या पाठीमागे ? शरीराच्या उजव्या बाजूस ? मेंदूत ? नेमके कुठे? काहीच सांगता येत नाही ना? 

बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात’. असंच काहीसं मनाचं स्थान आहे. शरीरात कधीच स्थिर नसणारे मन, ठावठिकाणा नसणारे मन, आपल्या शरीरावर ,जीवनावर मात्र प्रभावशाली अंमल करते. हृदयाची जागा खात्रीशीर असून देखील ते कधीकधी कमजोर असते ,नव्हे ते कमजोर असले तरी चालते कदाचित ! त्यावर उपचार करता येतात.. पण मन कमजोर असेल तर? तर मात्र माणूस पूर्ण दुबळा होतो. त्याची जगण्याची दिशा बदलते, त्याची आकांक्षा ,उमेद सर्वच नष्ट होते.

A sound mind in a sound body असं म्हटलं आहे ते उगाच नव्हे ! ‘ मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ‘!! असं तुकारामांनी म्हटलंय; कारण माणसाचे मन शुद्ध असेल तर त्यात सर्व भाव शुद्ध येतात, अन कर्मेही शुद्धच होतात.स्वच्छ पाण्यात सभोवतालचा परिसर स्वच्छच  दिसतो. तसेच मनाचे देखील आहे.  मनापासून केलेले कोणतेही काम मनाला आनंद ,उत्साह ,उभारी देते अन मन प्रसन्न करते. आणि त्यावरच त्या कामाची यशस्वीता देखील अवलंबून असते . वरवर केलेले काम भलेही चांगले दिसले तरी स्वतःस समाधान देत नाही . मन लावून केलेली देवपूजा मन शांत करते ,चित्त प्रसन्न करते. मन लावून धुतलेले कपडे ,घासलेली भांडी कशी स्वच्छ ,चकचकीत होतात ! मन लावून केलेला स्वयंपाक रुचकर होतो अन भूक तृप्त करतो .मनापासून केलेला अभ्यास ज्ञान वाढवतो.  मनापासून गायलेलं गाणं हृदयास भिडते ,असे सर्व काही मनाच्या ओलसर भूमीतून अंकुरते .

  एवढ्याश्या मनाची व्याप्ती मात्र खूप मोठी असते. शक्ती तर कितीतरी पट मोठी असते. म्हणून पंगूसुद्धा हिमशिखरे ओलांडतात, नावेशिवाय नदीचा तीर गाठतात. ‘ मन कधी कधी इतके छोटे होते की चिमटीहून लहान जागेत मावते अन कधी इतके मोठे  होते की त्यात सारे अवकाश सुद्धा समावते ‘….. 

‘मन एवढं एवढं जणू खाकशीचा दाणा 

 मन केवढं केवढं त्यात आभाय मायेना !’

मनोव्यापारावर मानवी देह व जीवन अवलंबून आहे. कधी ते आकाशात स्वैर भरारी मारते तर कधी फांदीवर बसून हिंदोळते. कधी चांदणे बनते तर कधी गच्च काळोख ! कधी भिरभिरते तर कधी स्थिर बसते ! अगदी निमिषार्धात ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाते.आपल्या प्रिय व्यक्तीपाशी पोचते. त्याच्याशी हितगुज करते, कधी रुसते तर कधी हसते, कधी खट्टू होते तर कधी लट्टू !

या जगात सर्वात वेगवान काय असेल तर ते मन ! एवढे मात्र खरे की, मन उत्साही असेल तर जीवन उत्साही प्रवाही राहते. मनाला कीड लागली , आजार लागला तर देह कितीही सशक्त असला तरी कमजोर बनतो, आजारी पडतो .

मन तरुण असेल तर ते म्हातारपणही टवटवीत बनवते, आणि मन म्हातारे असेल तर तारुण्यातही म्हातारपण येते. म्हणूनच मनाला हवे जपायला फुलासारखे ! मग बघा या फुलाभोवती किती रंगीबेरंगी आनंदाची फुलपाखरे रुंजी घालतात अन जीवन मधाळ फुलपाखरी होते !…. फुलपाखरू खरेच  छान किती  दिसते !!

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? विविधा ?

☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे

मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे

बाहर उजाला है, अंदर विराना

एखाद्या गाण्यातल्या काही ओळी आपल्याला  आतून बाहेरून हादरून सोडतात, तशा या ओळी आहेत. जेव्हा जेव्हा मी या ओळी ऐकतो तेव्हा तेव्हा मी आतून बाहेरून हादरून निघतो. पुन्हा पुन्हा या ओळींचा विचार करतो. सभोवतार काय चालले आहे पाहतो,  वृत्तपत्रातील मथळा वाचतो, टिव्हीवर मुख्य बातम्या ऐकतो आणि पुन्हा या ओळींकडे येतो. अनेकांच्या कहाण्या या ओळींशी मिळत्या जुळत्या सापडतात. अगदी माझ्या आयुष्यातील काही काळ काही क्षण या ओळींशी मिळते जुळते सापडतात.

सुप्रसिद्ध गीतकार गुलझार यांनी लिहिलेले गीत आहे हे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी याला संगीत दिले आहे तर भारतरत्न लता मंगेशकर यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीकेचा राष्ट्रीय पुरस्कार या गाण्याला मिळाला तर सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार या गाण्याला मिळाला.

आपल्या आयुष्यात असाही काळ येतो जेव्हा कोणीच सोबत नसल्याची भावना होते, अगदी परमेश्वरसुद्धा आपल्यावर रूसून बसला आहे की काय असे वाटू लागते. नेमक्या याच भावनेला गुलझार यांनी शब्दांच्या चिमटीत नेमके पकडले आहे – पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे. या काळात आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयांशी आपण आतून सहमत असतोच असे नाही पण तरीही हे निर्णय घेतोच. याच अवस्थेचे वर्णन करताना गुलझार म्हणतात – मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे. म्हणजे माझ्या सावलीनेही आता माझी साथ सोडली आहे.

बरे हे सगळे घडत असताना आजूबाजूचा सर्व समाजच दुःखी असतो का तर नाही. सुख दुःखाचे गणित न्युटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आहे. जेव्हा एक दुःखी असतो, तेव्हा दुसरा कोणी सुखी असतो. काळाचे चक्र फिरत राहते आणि पहिला सुखी होतो तर दुसरा दुःखी होतो. पण या संक्रमणात आपल्या मनात मात्र वादळे उठतात. कारण बाहेर कोणी दसरा दिवाळी करत असताना आपल्या मनात मात्र सुतक चालू असते. या कडव्याचे शेवट याच भावनेतून  गुलझार यांनी केले आहे – बाहर उजाला है, अंदर विराना. बाहेर सगळीकडे उजळलेले आहे, आनंदी आनंद आहे आणि माझ्या आतमध्ये मात्र अंधार आहे, माझा आतमध्ये जणू ओसाड वाळवंट पसरलेले आहे.

तसे पाहिले तर संपूर्ण गाणेच भारी आहे. त्याला हृदयनाथजींच्या संगीताने सोन्याचेकडे लाभले आहे तर लतादीदींच्या स्वरांनी हे गाणे स्वर्गीय केले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी हे गाणे ऐकलेच असेल. माझ्यासाठी पुन्हा ऐका.

लेखक : म. ना. दे.

(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares