मराठी साहित्य – विविधा ☆ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेल्या काही वर्षात पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून शाळा शाळातून साजरा केला जातो. माझा नातू लहान असताना पर्यावरण दिनाच्या दिवशी त्याच्याबरोबर मी शाळेत गेले होते. तेव्हा तेथील वातावरण पाहून मी थक्क झाले! शाळेत प्रवेश करताक्षणी सगळीकडे हिरवाई दिसत होती. हरीत रंगाने विविध प्रकारच्या कलाकृती केलेल्या होत्या.भिंतीवर निसर्ग चित्रे लावलेली होती. मुलांना आधीच सूचना देऊन कुंड्यांमध्ये काही बिया पेरायला सांगितल्या होत्या .कोणी मोहरी,मेथी,हळीव अशा लवकर येणाऱ्या रोपांच्या बिया रूजवल्या होत्या.त्यांची छोटी छोटी रोपे उगवून आली होती.आणि प्रत्येकाला त्या सृजनाचे रूप इतके कौतुकाचे होते की मुले त्या छोट्या कुंड्या मिरवत शाळेत आली होती! वर्गा वर्गातून त्या छोट्या कुंड्या, वनस्पतींची माहिती देणारे बोर्ड तसेच पर्यावरणाचे महत्त्व दाखवणारे प्रसंग आणि ते सांगणारे छोटे विद्यार्थी असे उत्साहाने भरलेले वातावरण होते! त्या वातावरणाने मला भारावून टाकले! लहानपणापासूनच ही जागृती मुलांमध्ये निर्माण झाली तर ही वसुंधरा पुन्हा जोमाने सजेल आणि निसर्गाची वाटचाल चांगली होत राहील, असा विश्वास पर्यावरण दिनाच्या दिवशी माझ्या मनात निर्माण झाला.

घरी येताना मन सहज विचार करू लागले की पन्नास एक वर्षाखाली असा हा पर्यावरण दिन आपण करत होतो का? नाही, तेव्हा ती गरज जाणवली नाही. मनात एक कल्पना आली की, परमेश्वराने पृथ्वीला मायेने एक पांघरूण घातले आहे. त्या उबदार पांघरूणात ही सजीव सृष्टी जगत आहे. पण अलीकडे या पांघरूणाला न जुमानता मनुष्य प्राणी आपली मनमानी करीत आहे, त्यामुळे एकंदरच सजीव सृष्टीचा तोल बिघडू लागला आहे. काही सुजाण लोकांना याची जाणीव झाली आणि साधारणपणे 1973 सालापासून जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अमेरिकेत “पर्यावरण दिन” साजरा होऊ लागला!

पर्यावरण म्हणजे काय? ही  सजीव सृष्टी टवटवीत ठेवण्यासाठी असलेली सभोवतांची हवा, पाणी, माती आणि जमीन या सर्वांचे संतुलन ! ते जर चांगले असेल तर आपले अस्तित्व चांगले रहाणार !

आपल्याला ज्ञात असलेला मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासताना असे लक्षात येते की, आदिमानवापासून ते आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात खूप बदल हळूहळू होत गेलेले आहेत. गुहेत राहणारा मानव निसर्गाशी आणि इतर प्राण्यांची जुळवून राहत होता. माणसाला मेंदू दिला असल्याने त्याने आपली प्रगती केली आणि त्यामुळे आजचा आधुनिक माणूस आपण निसर्गावर मात केली आहे असे समजतो. पूर्वी यंत्र नव्हती तेव्हा प्रत्येक काम हाताने करणे, वाहने नव्हती तेव्हा प्रवास चालत किंवा प्राण्यांच्या मदतीने करणे, गुहेमध्ये किंवा साध्या आडोश्याला घर समजून रहाणे, अन्नासाठी कंदमुळे, तृणधान्ये, फळे यांचा उपयोग करणे हे सर्व माणूस करत असे.अन्न,वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की बास!. पण आज या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे नकळत पर्यावरणावर आपण हल्ला केला आहे !

हवेचा विचार केला तर प्रदूषण ही समस्या आपणच निर्माण केली. विविध प्रकारचे कारखाने वाढले. पेट्रोल, डिझेल यासारख्या पदार्थांच्या वापर वहानात होत असल्याने हवा प्रदूषित झाली. रस्त्यांसाठी, घरांसाठी झाडे तोडणे यामुळे हवेतील गारवा कमी झाला. एकंदरच वातावरणातील उष्णता वाढू लागली. सावली देणारी, मुळाशी पाणी धरून ठेवणारी वड, पिंपळासारखी मोठी झाडे  तोडून टाकली. डोंगर उघडे बोडके दिसू लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडला. वेळच्यावेळी पाऊस पडेना. त्याचा परिणाम इतर सर्व ऋतूंवर आपोआपच होऊ लागला. पाणी पुरत नाही म्हणून नद्यांचे पाणी आडवणे, धरणे बांधणे यामुळे नैसर्गिक रित्या असलेले पाण्याचे स्त्रोत जमिनीखाली विस्कळीत होऊ लागले. हवा, पाणी, पाऊस, जमीन या सर्वांचा नैसर्गिक असलेला परिणाम जाऊन प्रत्येक गोष्ट अनियमितपणे वागू लागली !

माणसाला याची जाणीव लवकर होत नव्हती. घरात गारवा नाही, एसी लावा.. नळाला पाणी नाही, विकत घ्या ! चांगली हवा मिळत नसेल तर ऑक्सिजन विकत घ्या ! माणसाचा स्वार्थी स्वभाव त्याच्याच नाशाला हळूहळू कारणीभूत होऊ लागला. जगभर होणारा प्लास्टिकचा वापर जसजसा वाढू लागला तस तसे हे लक्षात आले की प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी मोठा अडथळा आहे. प्लास्टिक कुजत नाही. त्यातील घटकांचे विघटन होत नाही. प्लास्टिक मुळे नाले ,ओढे यांतून नद्यांकडे वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर प्लास्टिक ही पुढे समुद्राला जाऊन मिळते. दररोज कित्येक टन प्लास्टिक समुद्रामध्ये वाहत जाते, साठत जाते. या सर्वाचा परिणाम नकळत पर्यावरणावर होत असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. गेल्या काही वर्षात प्लास्टिक वापरावर थोड्या प्रमाणात बंदी आली आहे, त्यामुळे नकळतच प्लास्टिकचा वापर थोडा कमी केला जात आहे.

५ जून १९७३ रोजी अमेरिकेत “पर्यावरण दिन” प्रथम साजरा केला गेला आणि आता जगभर हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणसाचे लक्ष निसर्गाकडे वेधले जाते. जर प्रदूषण वाढत राहिले तर नकळत आपणच आपला नाश करून घेऊ याची जाणीव थोड्याफार प्रमाणात होत आहे.या दिवशी एक तरी रोप लावावे, एक तरी झाड वाढवावे आणि पर्यावरण चांगले ठेवायला मदत करावी एवढा जरी संकल्प आपण केला तर खऱ्या अर्थाने या वसुधेची आपण काळजी करतो हे दिसून येईल  !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पासिंग द पार्सल – लेखिका – सुश्री प्रतिभा तरवडकर ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ पासिंग द पार्सल – लेखिका – सुश्री प्रतिभा तरवडकर ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

राजेशने बेलवर ठेवलेला हात काढलाच नाही.बेलचा टिंग टॉंग टिंग टॉंग असा कर्कश्श आवाज घुमतच राहिला.रंजना कणकेने भरलेले हात धुवून येईपर्यंत बेल अधीरपणे वाजतच राहिली.

‘हो हो,आले आले’म्हणत रंजनाने येऊन दार उघडले.राजेश उत्फुल्ल चेहऱ्याने उभा होता.सॅटीनच्या रिबिनचा बो बांधलेले, सुंदर वेष्टनातील एक भलेमोठे खोके त्याच्या पायाजवळ होते.राजेशचे डोळे आनंदाने चमकत होते.’सरप्राईज गिफ्ट?’रंजना कोड्यात पडली.राजेशचा स्वभाव कधीच रोमॅंटिक नव्हता.त्याच्याकडून असं सरप्राईज गिफ्ट वगैरे?रंजनाचा बुचकळ्यात पडलेला चेहरा पाहून राजेशने खुलासा केला,’अगं मागच्या वर्षीचा माझा परफॉर्मन्स बघून ऑफिसने गिफ्ट दिलंय.तसं प्रत्येकालाच गिफ्ट दिलंय पण मला सगळ्यात मोठं मिळालंय.’सांगतांना त्याची छाती आनंदाने फुलली होती.रंजनाच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याच्या कौतुकाने चांदणं फुललं.राजेश आणि रंजनाने मिळून तो खोका घरात आणला.

‘सान्वी,सुजय बाबांनी काय गंमत आणलीये पहा,’बेलचा आवाज कानावर पडूनही न उठलेले सान्वी आणि सुजय ‘  गंमत’ हा परवलीचा शब्द ऐकून पळत आले.नाहीतरी एव्हढं महत्वाचं काम थोडंच करत होते?आईच्या मोबाईलचा ताबा सान्वीने घेतला होता तर सुजय लॅपटॉप वर कार्सच्या मॉडेल्स मध्ये बुडाला होता.दोघेही पळतच आले.त्या आकर्षक अशा वेष्टनात काय बरं दडलं असेल याबद्दलची सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.खोक्याचं वरचं पुठ्ठ्याचं झाकण उघडून सर्वजण आत डोकावले आणि त्यांचे डोळेच विस्फारले.

आत अतिशय सुंदर, नाजूक असा काचेचा डिनर सेट होता.रंजना काळजीपूर्वक एक एक प्लेट काढून खाली ठेवू लागली.उत्कृष्ट दर्जाची पांढरी शुभ्र काच,त्यावर कडेने निळसर फुलांची नाजूक वेलबुट्टी….. सहा मोठ्या प्लेट्स, सहा छोट्या प्लेट्स,छोटे बाऊल्स,मोठे बाऊल्स, सर्व्हिंग बाऊल्स, ट्रे…. प्रत्येक वस्तू काढतांना रंजना अगदी नाजूक हातांनी काढत होती.मध्येच अधीरपणे सुजय एक प्लेट उचलायला गेला तशी रंजनाने त्याच्या हातावर चापट मारली.’उगाच धुसमुसळेपणा करशील आणि प्लेट फोडून ठेवशील.’

‘आई,आज आपण या प्लेटमध्ये जेवायचं का?’

‘गुड आयडिया,आई आपण आज याच प्लेट्स मध्ये जेवू या नं’सान्वी आईला लाडीगोडी लावत म्हणाली.

रंजनाच्या डोळ्यासमोर रात्रीच्या जेवणाचा मेन्यू आला.त्या नाजूक, सुंदर प्लेट्स मध्ये वाढलेली चटणी, कोशिंबीर,शेपूची भाजी, भाकरी आणि बाऊलमध्ये वाढलेली आमटी….. आणि तिने जाहीर केले,’आज नको, काहीतरी स्पेशल मेन्यू केला की या प्लेट्स काढू.’आणि रंजना  सगळ्या काचेच्या वस्तू परत खोक्यात भरु लागली.

‘काय गं आई,’सान्वी हिरमुसली.’बाबांना एव्हढं छान गिफ्ट मिळालंय आणि तू ते वापरत नाहीस’

‘अजिबात नाही.’रंजना आपल्या मतावर ठाम होती.’आपल्या भाजी,आमटीच्या तेल आणि हळदीचे डाग पडून त्या पांढऱ्याशुभ्र प्लेट्स खराब झाल्या तर! शिवाय या प्लेट्स,बाऊल्स आपल्यालाच धुवायला लागणार.तुम्ही तयार आहात का ती क्रोकरी धुवायला?’

त्याबरोबर जादू व्हावी तशी दोन्ही मुलं तिथून अदृश्य झाली.त्यांच्या बाबांनी म्हणजे राजेशने नेहमीप्रमाणे तटस्थ भूमिका घेतली.

डिनर सेटचे खोके कोपऱ्यात पडून राहिले.

‘काय गं,काल राजेश कसलं खोकं घेऊन आला होता?’शेजारच्या अरुणाताईंनी चौकशी केली.

‘त्यांना बेस्ट परफॉर्मन्स साठी ऑफिसकडून काचेचा डिनर सेट मिळाला.’रंजना थंडपणे म्हणाली.’एव्हढी सुंदर,महागडी क्रोकरी कशी वापरणार? धुताना साबणामुळे हातातून प्लेट निसटून फुटली तर? म्हणून तो खोका तसाच ठेवून दिलाय.’

‘बरं केलंस, अजिबात वापरू नकोस!’अरुणाताई गूढपणे म्हणाल्या तशी ‌रंजनाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.अरुणाताईंनी तिला त्यांच्या घरात येण्याची खूण केली.

‘ही बघ गंमत,’एक कपाट उघडत अरुणाताई म्हणाल्या.रंजनाचे‌ डोळे विस्फारले.एखाद्या गिफ्ट शॉप मध्ये शिरावे तसे तिला वाटले.लाफिंग बुद्धाच्या अंगठ्या एव्हढ्या मूर्तीपासून ते फूटभर उंचीच्या सोनेरी मूर्ती, काचेच्या छोट्या ट्रे मधील काचेचे कासव,तोंडात नाणं धरलेला बेडूक, फोटो फ्रेम्स, चिनी तोंडवळा असलेल्या गणपती आणि राधाकृष्णाच्या मूर्ती,स्टफ्ड टॉईज…..

‘हे कपाटभर सामान का बरं ठेवलंय?’रंजनाने आश्चर्याने विचारले.

‘गिफ्टस् म्हणून मिळाल्यात’,अरुणाताई नाक वाकडं करत म्हणाल्या.’मला सांग,यातील एक तरी वस्तू उपयोगाची आहे का?या मूर्ती धूळ बसून एका दिवसात खराब होतात.कोण पुसत बसेल रोज रोज?या फोटो फ्रेम्स तर इतक्या आहेत की सगळ्या लावायच्या म्हटल्या तर घराच्या एकूण एक भिंती भरुन जातील.अजून एक कारंजं मिळालं होतं विजेवर चालणारं.म्हणे समृद्धी येते त्याने.इतकं भलंमोठं की एक कोपरा व्यापेल खोलीचा!’

‘मग कुठंय ते?दिसत नाहीये इथं?’

‘अगं पासिंग द पार्सल केलं त्याचं!’अरुणाताई परत गूढपणे हसत म्हणाल्या.

‘म्हणजे?’

‘म्हणजे इधरका माल उधर करायचं.आपण लहानपणी नाही का तो खेळ खेळायचो, जोपर्यंत गाण्याचा आवाज ऐकू येतो तोपर्यंत आपल्या हातातील वस्तू शेजारच्याकडे सरकवायची.’

‘हां, आलं लक्षात.’रंजनाने‌ मान डोलावली.

‘कपाटावर सगळी खोकी सोडवून,सपाट करून ठेवली आहेत.’कपाटाच्या छताकडे निर्देश करीत अरुणाताई म्हणाल्या.’कोणाकडे काही फंक्शन असलं की यातील एक एक वस्तू पुढे करायची.लहान मुलाचा वाढदिवस असला तर स्टफ्ड टॉय, नवीन घर घेतलंय…. फोटो फ्रेम वगैरे.छानपैकी चकचकीत कागदात गुंडाळून,सॅटीनच्या रिबिनीने सजवून द्यायची.पंधरा वीस ‌रुपये खर्च येतो फक्त आणि महत्वाचं म्हणजे घरातील अडगळ कमी होते.’

रंजनाला अरुणाताईंचा सल्ला एकदम पटला.तिनेही तो डिनर सेट कपाटात ठेवून दिला.

तिच्याच गावातील सुनंदावन्संच्या अनिलचे लग्न ठरले.तसं लांबचं नातं असलं तरी गावातच असल्याने बऱ्यापैकी येणं जाणं होतं.सगळ्यांनाच अहेर करायला हवा होता. रंजनाने‌ डोकं लढवून काचेचा तो सुंदर डिनर सेट अहेर म्हणून पुढे केला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

हळूहळू तिच्या कडे सुद्धा अरुणाताईंसारख्या निरुपयोगी भेटवस्तू जमा होऊ लागल्या पण त्यांची हुशारीने विल्हेवाट लावण्यात रंजना एक्सपर्ट झाली आणि ‘पासिंग द पार्सलचा खेळ’  ती लीलया खेळू लागली.

रंजनाची सान्वी मोठी झाली.शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागली.ऑफिसमधल्याच एका मुलाशी तिचा प्रेमविवाह जुळला.सान्वीला तो सर्वप्रकारे अनुरूप असल्याने नकाराचा प्रश्नच नव्हता.लग्नाचा मुहूर्त काढला,खरेद्या झाल्या.लग्न समीप आले.लग्नाआधी घरी करायचे धार्मिक विधींची गडबड सुरु झाली.बरेच पाहुणे आले होते.रंजना धार्मिक विधी आणि येणाऱ्या पाहुण्यांची उठबस यात पार बुडून गेली.विधींनंतर अहेरांची देवाण घेवाण झाली.पाहुणे आपापल्या घरी गेले.रंजनाला जरा निवांतपणा मिळाला.राजेश,सान्वी,सुजय, रंजना सारेजण उत्सुकतेने एक एक अहेर पाहू लागले.कोणी भरजरी साड्या,शर्ट पँट चं कापड दिलं होतं तर कोणी चांदीच्या छोट्या मोठ्या वस्तू, कोणी काही तर कोणी काही.सारेजण अहेर पहाण्यात पार रंगून गेले होते.

‘हे खोकं अमिताकाकूने दिलं’,सुजयने एक जड खोकं ढकलत आणलं.’बघू बघू,उघड तो खोका,’सारेजण एक्साईट झाले होते.सुजयने कात्रीने त्या खोक्यावरची रिबिन कापली आणि खोकं उघडलं आणि रंजनाचा चेहरा पडला.

तिने सुनंदावन्संना दिलेला काचेचा डिनर सेट फिरत फिरत परत तिच्याकडे आला होता.

‘पासिंग द पार्सल’ चं एक राऊंड पूर्ण झाले होते.

लेखिका – सुश्री प्रतिभा तरबडकर

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिचं मंगलपण…” भाग-1 ☆ सुश्री मृणालिनी चितळे ☆

सुश्री मृणालिनी चितळे

??

☆ “तिचं मंगलपण…” भाग-1 ☆ सुश्री मृणालिनी चितळे 

गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर ! विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची पत्नी. माझी आत्ते नणंद. माझ्यापेखा पंधरा वर्षांनी मोठी, परंतु तिच्याशी गप्पा मारताना, ना कधी तिच्या बुध्दिमत्तेचं आणि प्रसिद्धीचं वलय आड येतं, ना वयातील अंतर. गप्पांच्या ओघात आपण मैत्रीच्या पातळीवर कधी उतरतो हे कळत नाही. हा माझ्या एकटीचा नाही, तर तिच्या सहवासात येणाऱ्या अनेकांचा अनुभव. नुकतीच १७ मे रोजी वयाची ८० वर्षे तिनं पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने तिच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची एक झलक.

गणित म्हणलं की भल्याभल्या हुशार लोकांना धडकी भरते, परंतु गणिताविषयी जन्मजात प्रेम असणाऱ्या मंगलताईसारख्या व्यक्तींच्या दृष्टीनं गणित म्हणजे नुसती आकडेमोड नसते तर पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी वहिवाट असते. या संबंधीची तिच्या लहानपणची एक आठवण. एकदा हौसेनं ती पुऱ्या तळायला बसली होती. तिला कुणीतरी काही विचारलं असता ती पटकन म्हणाली, “मध्ये बोलू नकोस, माझे आकडे चुकतात. पुरी तेलात टाकल्यावर सहा आकडे मोजून झाले की मी उलटते आणि बारा आकडे मोजून झाले की तेलातून काढते. त्यामुळे सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि पाहिजे तेवढ्या खमंग होतात.” आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी अंकगणितामध्ये बसवायची आणि अचूक पद्धतीनं करायची तिला अशी लहानपणापासून आवड होती. 

मंगलताई ही पूर्वाश्रमीची मंगल राजवाडे. शालेय जिवनापासून अनेक बक्षिसे मिळवत ती एम.ए. झाली. मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेमध्ये तिनं संशोधनाला सुरवात केली, परंतु तिच्या करिअरला यू टर्न मिळाला तो १९६६ साली जयंतरावांशी झालेल्या विवाहामुळे. जयंतरावांनी तरुण वयात फ्रेड हॉईल यांच्याबरोबर केलेल्या संशोधनामुळे जगप्रसिध्द शास्त्रज्ञ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते. लग्नानंतर केंब्रिजमध्ये तिनं संसाराचे प्राथमिक धडे गिरवताना गणित विषयातील अध्ययन चालू ठेवले. तिची हुशारी बघून चर्चिल कॉलेजमध्ये टीचिंग फेलोशिपसाठी तिचं नाव सुचवलं गेलं, परंतु जयंतरावांना विविध देशांमध्ये व्याख्याते म्हणून निमंत्रित केलं जात असल्याने हा प्रस्ताव तिनं नाकारला. पुढे १९७२ साली भारतात परत येण्याचा निर्णय दोघांनी मिळून एकमताने घेतला. त्यामागे आपल्या मातृभूमीविषयी वाटणारं प्रेम तर होतंच शिवाय आपल्या वृध्द आईवडलांची जबाबदारी घ्यायला हवी ही जाणीव होती आणि आपल्या मुलींवर भारतीय संस्कार व्हावेत अशी इच्छाही. भारतात आल्यावर जयंतरावांनी टीआयएफआरमध्ये संशोधन आणि अध्यापनाचे काम सुरु केले. मंगलताईनं तिचं पीएच. डी. चे काम हाती घेतलं. १९८१ साली संश्लेषात्मक अंक सिध्दांत या विषयात पीएच. डी. मिळवली आणि पदव्युत्तर आणि एम. फिल.च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम सुरू केलं. अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणितगप्पा, गणिताच्या सोप्या वाटा यासारखी पुस्तकं लिहिली. ही झाली तिची औपचारिक ओळख. कुणाही कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यक्तीची असते अशी; परंतु मंगलताईचं वैशिष्ट्य असं की गणितामुळे आत्मसात केलेलं तर्कशास्त्र आणि जयंतरावांच्या सानिध्यात वृध्दिंगत झालेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तिनं जपला. 

स्वयंपाकघर नव्हे प्रयोगशाळा

अनेकदा वेगवेगळ्या देशांत राहायची संधी मिळाल्यामुळे तेथील पाककृती तिनं शिकून घेतल्या. त्या जशाच्या तशा बनविण्यात ती वाकबगार आहे. चाळीस वर्षांपूर्वी तिच्या विदेशी पाककृतीसाठी लागणारे मालमसाले सहजगत्या उपलब्ध व्हायचे नाहीत. तेव्हा त्यांच्या योग्य देशी पर्याय तिनं निवडले. मॅपल सिरप ऐवजी वेगवेगळ्या स्वादाची काकवी. ओरॅगॅनोऐवजी ओव्याची ताजी पानं तर चीजकेकसाठी पनीर. ‘हर्बल टी’ बनविण्यासाठी बागेतील फुलापानांचा वापर ती करते, तेव्हा ते खाण्यायोग्य आहेत यांची शहानिशा केल्यावरच. घरच्या कुंडीत वाढलेली मोहरीची कोवळी रोपं सँण्डविच आणि सॅलेडमध्ये घातल्यावर स्वाद वाढविणारी कशी ठरतात याचा अनुभव मी तिच्याकडे घेतला आहे. बटाटेवड्याचं सारण हरबरा डाळीच्या पिठात बुडवून तळण्याऐवजी उडदाची डाळ भिजवून, वाटून त्याच्या पिठात बुडवून तिनं तळले तेव्हा वड्यांची चव अफलातून लागत होती. कुठेतरी वाचलेले किंवा कुणाकडे तरी खाल्लेले पदार्थ लक्षात ठेवून त्यात यथायोग्य बदल करण्याची प्रयोगशीलता तिच्याकडे आहे. रोजचा स्वयंपाक करताना किंवा पाहुण्यांसाठी बनवतानाही त्यामध्ये पिष्ठ, प्रथिन, स्निग्ध पदार्थांचा समतोल साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. ठरावीक मोसमात मिळणारी फळं वर्षभर खायला मिळावीत यासाठी त्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करण्यात ती पटाईत आहे. एकदा तिच्या नेहमीच्या फळवाल्यानं ती मोठ्या प्रमाणात संत्री कशासाठी नेते म्हणून कुतूहलानं विचारलं. तेव्हा संत्र्यापासून बनवलेल्या मार्मालेडची बाटली तिनं त्याच्या मुलांसाठी भेट दिली. एवढंच नाही तर बियांमधील पेप्टीनचं महत्त्व त्याला सांगायला ती विसरली नसणार. कच्च्या पालेभाज्यांचा वापर करताना त्या पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेटचा वापर ती करते. पोटॅशियम पाण्यात टाकलं की पाण्यातील प्राणवायू शोषून घेते. त्यामुळे त्या पाण्यात भाज्या बुडवून ठेवल्या की कीड मरून जाते, शिवाय पोषण मूल्य अबाधित राहते हे त्यामागचं शास्त्र! करोना काळात  घराघरातून सॅनिटायझरने भाज्या, फळे धुतली गेली नि करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी ही कृती विस्मृतीत गेली. मंगलताई मात्र कटाक्षाने स्वयंपाकघरातील विज्ञान कायम आचरणात आणत आहे. 

— क्रमशः भाग पहिला

© सुश्री मृणालिनी चितळे

मोबाईल ९८२२३०१७५० 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महाविष्णूंना प्रिय आठ पुष्पे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महाविष्णूंना प्रिय आठ पुष्पे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजोबांनी एक श्लोक शिकवला होता. त्यात, भगवान महाविष्णूंना प्रिय असलेली आठ पुष्पे कोणती याची माहिती दिली होती. आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला. ती शिकवण आयुष्यभर आपल्या आचरणात आणून सुधा मूर्तींनी विष्णूभक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्पे अर्पण केली. ती आठ पुष्पे कोणती, ते आपणही जाणून घेऊ या.

अहिंसा प्रथमं पुष्पम्

पुष्पम् इन्द्रिय निग्रहम् ।

सर्व भूतदया पुष्पम् 

क्षमा पुष्पम् विशेषत:।

ध्यान पुष्पम्

दान पुष्पम् 

योगपुष्पम् तथैवच।

सत्यम् अष्टविधम् पुष्पम्

विष्णु प्रसिदम् करेत ।।

अर्थ : –

१. जाणते-अजाणतेपणी हिंसा न करणे, अर्थात अहिंसा, हे पहिले पुष्प,

२. मनावर नियंत्रण ठेवणे हे दुसरे पुष्प,

३. सर्वांवर प्रेम करणे हे तिसरे पुष्प,

४. सर्वांना क्षमा करणे हे चौथे पुष्प,

५. दान करणे हे पाचवे पुष्प, 

६. ध्यान करणे हे सहावे पुष्प, 

७. योग करणे हे सातवे पुष्प,

८. नेहमी खरे बोलणे, सत्याची कास धरणे हे आठवे पुष्प आहे.

जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्पे अर्पण करतो, तो त्यांच्या कृपेस पात्र होतो. 

ही सर्व पुष्पे कुठे सापडतील? तर आपल्या देहरूपी वाटिकेत ! या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडित आहेत. म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात, ‘आचार बदला, विचार बदलेल.’ कोणतीही कृती, विचारपूर्वक केली पाहिजे. आपले विचार चांगले असले, तर हातून वाईट काम, चुकीचे काम घडणारच नाही. कोणावर हात उगारणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अतिरिक्त माया, संपत्ती गोळा करणार नाही, अनावश्यक गोष्टी साठवणार नाही, मनात कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. कोणाही प्राणिमात्राचा, जीवांचा दु:स्वास करणार नाही. ध्यान, दान, योग याबाबतीत सदैव तत्पर राहीन आणि शाळेतली शिकवण म्हणजे `नेहमी खरे बोलेन.’

देवाच्या आपल्याकडून किती साध्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करता आल्या, तर संपूर्ण आयुष्यच सार्थकी लागेल. तर मग तुम्ही कोणकोणती पुष्पे अर्पण करणार ?

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : काय भुललासी वरलिया रंगा.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : काय भुललासी वरलिया रंगा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“साहेब रागावणार नसाल तर एक सांगु का तुमास्नी ! ह्यो तुमच्या पायातल्या बुटाची जोडी बघा अस्सल चामड्याची हायं बघा… त्येला नुसतं साधं पालीस करत जा..ते जेव्हढं नरम राहिलं तेवढा बुट चांगला टिकंल नि चालताना पायाला बी लै आराम वाटंल… ते चमकणारं पालीस याला बिलकुल वापरू नगा… ते काय वरच्या वर चमकत राहतयं त्येचं काय खरं नस्तया…म्या बी साधंच पालीस करून देतू.. चालंल नव्हं तुमास्नी?.. “

.. ” मालक , पण तो बुट आधीच तसला, त्यातं तुम्ही त्याला साधं पालीस करायला सांगताय… मग तो चमकदार दिसणार कधी? चारचौघात माझी इमेज उठून कशी दिसेल? मालक तुमचा तो पूर्वीचा जमाना गेला, आता सारं काही दिसण्यावर जगरहाटी चाललेय !.. फॅशनबाज कपडा, चेहऱ्याला रंगरंगोटीचा मुलामा, डोक्यावरचे केसांचं कलप केलेलं टोपलं, डोळ्यावर काळा निळा चष्माची झापडं नि पायात भारी किंमतीचे ब्रॅंडेड बुट असा जामानिमा असल्याशिवाय माणूस जगात आपली छाप उमटवू शकत नाही… असा जो नाही तो आजच्या जमान्यात पुवर चॅप, मागासलेला ठरतो.. कुणीच त्याला विचारत नाही.. मग त्याची उपासमार होणार कि नाही… मालक एक वेळ घरात जेवायला नसलं तरी चालतं पण माणसानं दिसायला अगदी भारी असलं पाहिजे..आणि तुम्हाला कसं काय कळलं या बुटाचं चामडं अस्सल आहे ते? “

“साहेब तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे.. आजचा जमाना वरच्या दिखाव्यालाच भुलतो बघा.. त्याला आतला माणूस ओळखता येत नाही…दिखाव्यातचं सारं आयुष्य घालवून आपून काय मिळविलं तर मोठं शुन्य…उगा आपला खायला कार नि भुईला भार होऊन राहण्यात काय मतलब… काही विचारानं चाललं आचारानं वागलं तरचं आपल्या बरोबर समाजाचं बी भलं होईल.. ते जिणं बघा कसं सोन्यावाणी चमचमणारं असतयं… अन जे चमकतयं ते समधं सोनं कुठं असतया… हि ओळखण्याची पारख माणसात असायला हवी… तुमच्या पायातला बुटाचा जोड हा अस्सल चामड्याचा आहे हे म्या वळखणार नाही तर कोण वळखणार ..  तिथं पाहिजे जातीचे ते येरागबाळयाचं काम नोहे… आणि अस्सल असतं तेची किंमत असते… त्येला बाहेरची कशाची जोड लागत नसते.. माणूस दिसायला साधा असला तरी विचारानं  भारी असल्यावर चारचौघात चमकल्याबिगर राहत नसतो… ते चोखोबा  सांगुन गेलं नव्हं का…… 

“ काय भुललासी वरलिया रंगा… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दोन हजारांची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “दोन हजारांची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आज रविवार…… रोज घडाळ्याच्या काट्यानुसार होणारी कामे दर रविवारी जरा हळू हळू होतात. पण आजचा रविवार वेगळाच होता. 

खूप घाईने नसली तरी सकाळपासूनच घरात आवराआवर सुरू झाल्याचे लक्षात आले. प्लास्टिक बरण्यांमध्ये भरलेले कडधान्य, दाणे, तिखट, मीठ हे बरणी उलट सुलट करून बारकाईने बघितले जात होते. डाळ, तांदूळ, रवा इत्यादी वस्तुंच्या डब्यात हात खोलवर घालून हात व्यवस्थित फिरवून पाहिले जात होते. गव्हाच्या छोट्या कोठीत कापडात गुंडाळून टाकलेल्या पाऱ्याच्या गोळ्या चाचपून बघितल्या जात होत्या. शंका आल्यास ती कापडी पुरचुंडी उघडून बघितली जात होती. 

कशातही आपल्याला हवे ते सापडते का? यांची चेहऱ्यावर असणारी उत्सुकता, काहीच मिळाले नाही तर नाराजीचा सूर निघत बदलत होती.  रॅक मध्ये डब्यांच्या खाली घातलेले पेपर देखील काढून पाहिले जात होते. त्या पेपरच्या घडीत चुकून नाही ना याची खात्री केली जात होती.

कशाला हवी दर रविवारी अशी आवराआवर…….. असा कधी कधी निघणारा नाराजीचा सूर अजिबात निघाला नाही. दोघींचे सुर आज चांगलेच जमले होते. तसे जमतेच. पण आज एकदमच छान जमले होते. सुरसंगम…….

पुर्वी घरात पोत्यांमध्ये धान्य असायचे. आता धान्य पाच सात किलोच्या डब्यात आणि पोत्यांमध्ये जास्तीची (केव्हातरी लागतील म्हणून घेतलेली) भांडी आढळतात.  स्वयंपाक घरात अपेक्षित असे हाताला फारसे काही लागले नाही. फक्त डब्यात हात घालतांना जरा घाई झाल्यामुळे हाताला थोडेसे लागले इतकेच. हाताला लागणे याचे दोन्ही अर्थ मला चांगले समजले. पण ज्या अर्थासाठी (पैशांसाठी) ही  आवराआवर सुरू होती ते व्यर्थ ठरले होते.

आता मोर्चा कपड्यांच्या कपाटाकडे वळणार होता. त्यांच्या मोर्चात मला सामील करून घेतले. (मोर्चा असल्याने तुम आगे बढ़ो…. हम तुम्हारे साथ है| अशा घोषणा मी दबक्या आवाजात दिल्या.) कपाटातील खालचे कपडे वर, वरचे खाली. मागचे पुढे, पुढचे मागे. असे सगळे करुन झाले.

काही साड्यांच्या घड्या त्या साड्या घेतल्यापासून मोडल्या नव्हत्या. (हे त्यांच्या बोलण्यावरुनच समजलं) या निमित्ताने त्या साड्यांच्या घड्या (जागेवरच बसल्या बसल्या) मोडून तर झाल्याच. पण साड्या झटकून देखील झाल्या. त्यातही अपेक्षित असे काही मिळाले नाही. फक्त  चार पाच डांबरच्या गोळ्या तेवढ्या घरंगळत बाहेर पडल्या…. माझे सगळे शर्ट, पॅन्ट झटकून तर झालेच. पण त्यांचे खिसे देखील तपासून झाले. (नोटा मिळाल्या नाहीत, पण दुसरेही आक्षेपार्ह असे काही मिळाले नाही. यावर दोघांचा समाधानाचा सुस्कारा तेवढा एकाचवेळी बाहेर पडला.) घेतलेले, मिळालेले शर्टपीस, पॅंटपीस, जास्तीचे टाॅवेल हे देखील मोकळे करून झाले. 

घरात असणाऱ्या सात आठ प्रकारच्या वेगवेगळ्या पर्स, पर्स मध्ये ठेवलेल्या पर्स यांच्या प्रत्येक कप्यांची कसून तपासणी झाली. त्यात एक दोन टाकल्याची पाकिटे, दोन चार चॉकलेट, सोन्याचे दागिने घेतांना त्या माणसाने केलेले आकडेमोडीचे चार पाच छोटे कागद, काही चिल्लर, पाच सहा औषधांच्या गोळ्या सोडल्या, तर हव्या त्या नोटा औषधालाही सापडल्या नाहीत.

दिवाणावरील गाद्यांची उलथापालथ झाली. येवढीच उलथापालथ पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर देखील झाली होती. चादरी सरळ होत्या त्या विस्कटून झाल्या.  दोन चार किरकोळ बिलं, लाईट बिल, कधीतरी काढलेल्या (जास्तीच्या) आधार कार्डच्या झेराॅक्स काॅपीज, एक दोन पुस्तके, बॅंकेचे चेकबुक, पासबुक या शिवाय गादीखाली काहीच पसारा नव्हता. घर आवरण्याऐवजी पसाराच जास्त झाल्याचे लक्षात आले. 

शेवटी आपल्याकडे दोन हजारांची नोट नाही आणि त्यामुळे ती बदलण्याची गरज नाही यावर शिक्कामोर्तब झाले. आणि आता थोडी विश्रांती घ्यावी म्हणून गादीवर पडणार तोच…

अय्या… खरंच… अहो ते देवघरातील पोथ्यांमध्ये तीन चार नोटा ठेवल्याचे मला चांगले आठवतेय…… असे म्हणत दोघींचा (गृहमंत्री आणि राष्ट्रपती, बायको आणि आई) मोर्चा पोथी ठेवलेल्या जागेवर गेला‌…….

दोघापैकी पैकी एकीचा आवाज… ‘ कुठेतरी ठेवल्यासारखे मला सारखे आठवत होते…’  दुसरा आवाज .. ‘ कुठेतरी नाही…… कुठेतरीच ठेवल्या होत्या. ही काही जागा आहे का ठेवायची…’. (घरापरत्वे हे आवाज आपसात बदलू शकतात.) हाताला लागणे याचे वेगळे अर्थ मला समजले, तसे कुठेतरी याचेही वेगळे अर्थ समजले.

अशा रीतीने आवराआवर झाल्यावर दोन चार दोन हजारांच्या नोटा मिळाल्या. सुवर्ण पदक मिळाल्यावर विजेता जसे त्या पदकाला निरखून पाहतो आणि कपाळाला लावतो तसेच या नोटांच्या बाबतीत देखील झाले.

आता उद्या बॅंकेत जाणे आलेच…  

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शाळेतील हुशार “पंचकन्या” ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

??

☆ शाळेतील हुशार “पंचकन्या” ☆ सुश्री प्रभा सोनावणे 

मी १९७३ ला अकरावी पास झाले, या वर्षी आम्ही एस.एस.सी.होऊन पन्नास वर्षे होत आहेत म्हणून शाळेत गेटटुगेदर करायचं ठरवतोय ! त्या निमित्ताने चार तुकड्यातील मिळून १७३ विद्यार्थी /विद्यार्थिनींची यादी शाळेत मिळाली ! त्यातील आम्ही पन्नासजण आधीच एका what’s app group वर २०१५ पासून एकत्र  आहोत ! आम्ही विद्याधाम प्रशाला -शिरूर जि.पुणे चे विद्यार्थी !

आत्ता या १७३ पैकी सुमारे शंभरजण एका what’s app group वर एकत्र आलोय ! मुलांपैकी  सुभाष जैन, डॉ. मारूती ढवळे, ऍडव्होकेट ओमप्रकाश सतिजा हे शालांत परीक्षेत अनुक्रमे पहिले ,दुसरे, तिसरे आलेले ! बँकेत ऑफिसर–नंतर वकिली आणि इतर स्वतंत्र व्यवसाय ! दुसरा एम.बी.बी.एस.डॉक्टर , तिसरा वकील आणि इतरही स्वतःची स्वतंत्र ओळख असणारे तिघे !`

आज मी लिहिणार आहे ते आमच्या बॅचच्या हुशार मुलींबद्दल ! त्या अकरावी अ मधल्या… माधुरी तिळवणकर, निर्मला गुंदेचा, शारदा मुसळे, शशी जोशी आणि फैमिदा शेख, या मुळातच हुशार,बुद्धिमान मुलींबद्दल !

वरील  पंचकन्याही हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ! माधुरी तिळवणकर ही नेहमीच गणितात शंभर पैकी शंभर मार्कस् मिळविणारी म्हणून माझ्या लक्षात राहिलेली ! निर्मला गुंदेचा पण खूप हुशार,या दोघींचा नेहमीच आमच्या अ तुकडीत पहिला दुसरा नंबर असायचा. चढाओढ या दोघींच्यातच पण त्या अगदी सख्ख्या मैत्रीणी, आजही त्यांची मैत्री टिकून आहे ! निर्मल अहमदनगरला असते ! माधुरी पुण्यात.  एस.पी.काॅलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यावर लगेचच तिला सरकारी नोकरी लागली ! खरंतर ती आयएएस वगैरे होण्याच्या गुणवत्तेची. पण लग्नानंतर पतीच्या सांगण्यावरून नोकरी सोडली !

आत्ता माधुरी स्वतःबद्दल म्हणते – ” शाळेत  बरी होते.  पण.घरासाठी  सरकारी नोकरी  सोडली. नंतर आयुष्य  बरे गेले पण फारसे यश मिळाले नाही. हा आपल्या  नशिबाचा भागआहे ..जीवनात  समस्याना तोंड  देत जगावे लागते. आयुष्यात नियोजन  कमी पडले, त्यात आजारपणाचे कारण झाले.असो…..” 

इतकी विनयशीलता पाहून मन भरून आलं म्हटलं, ” माधुरी तू शाळेत बरी नाही उत्कृष्ट होतीस !”

आमच्या प्रगती पुस्तकावर “बरा” तर तिच्या प्रगतिपुस्तकावर “उत्कृष्ट” शेरा असायचा  

निर्मल गुंदेचाचंही लवकरच लग्न झालं पण तिने लग्नानंतर बी.काॅम. एम.काॅम. केले. टेलिफोन एक्सचेंजमधे नोकरी केली, आता सेवानिवृत्त ! शशी आणि शारदा या सुद्धा क तुकडीतल्या हुशार,  स्कॉलरशिप मिळविणा-या ! अकरावीत अ तुकडीत गेलेल्या ! अकरावी अ मध्ये “फिजिक्स केमिस्ट्री” हा विषय घेणारे सगळेच हुशार विद्यार्थी ! या पंचकन्या अकरावीत अ तुकडीत असलेल्या ! दहावी पर्यंत अ तुकडीत असणारी मी अकरावीत अ तुकडीत नव्हते ! आम्ही “शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र” वाले सामान्य विद्यार्थी!

शशी बी.काॅम. झाली.  तिनं तिचा चित्रकलेचा छंद जोपासला आहे. तिच्या पेंटिग्जची प्रदर्शने भरत असतात ! शारदा एम.काॅम. झाली. लग्नानंतर मुंबईत असते ! फैमिदा शेख उर्दू शाळेतून विद्याधाममधे आलेली ! आठवीत असताना ती संस्कृतमधे पहिली आलेली, इंग्लिश/ गणितही चांगलं ! हिंदीच्या सरांना आडलेला ” परहेज” या शब्दाचा अर्थ तिने वर्गात स्पष्ट करून सांगितला होता ! “पथ्य” !

ती परवा म्हणाली “मला टीचर व्हायचं होतं…!” मी तिला म्हणाले,.. ” होय, पण तुझ्या वडिलांनी तुला Rich & Handsome नवरा बघून दिला ” …अकरावी नंतर लगेचच तिचं लग्न झालं ! काही वर्षे ती आबुधाबीला होती,आता मुंबईत आहे !

या पाच मैत्रीणींनी सुखाचे संसार केले ! त्या आदर्श गृहिणी, आदर्श माता आहेत ! पन्नास वर्षानंतर एकमेकींना नव्याने जाणून घेताना हे विशेष जाणवलं की हुशार मुलींच्या बाबतीतही…शिक्षण..करियर पेक्षा लग्नालाच अधिक महत्त्व दिलं जात होतं आमच्या काळात !

माधुरी एकदा मला म्हणाली होती, “राणी तू मराठीची प्राध्यापक झाली असतीस”! तिच्यासारख्या हुशार मुलीकडून असं काही ऐकून मी भरून पावले होते ! मी कधीच हुशार किंवा अभ्यासू नव्हते, अकरावी नंतर लगेचच माझंही  लग्न होईल असं मला वाटत होतं, कारण नववीत असल्यापासून मला “स्थळं” येत होती ! मी अजिबातच महत्वाकांक्षी नव्हते/ नाही. तरीही कुठल्या प्रेरणेतून मी पुणे विद्यापीठाच्या मास्टर डिग्रीपर्यत पोहचले माझं मलाच कळत नाही ! असो…..

आमच्या बॅचच्या या हुशार मुलींचं हे कौतुक आणि अभिनंदनही ! या पाचही जणी शाळेत असताना दिसायच्याही छान ! आजही छान दिसतात ! सलाम तुम्हाला पंचकन्यानो !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कोदंड राम मंदिर”… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(कृपया फोटो मोठा करून पहावा.)

? इंद्रधनुष्य ?

☆ “कोदंड राम मंदिर”…  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश येथील हे कोदंड राम मंदिर…

भारतात सुई सुद्धा बनत नव्हती असं ज्या देशद्रोहीना वाटतं, त्यांनी नीट बघावं म्हणून ही पोस्ट.

कागदावरही जे रेखाटणे अवघड आहे ते दगडात कोरलेले आहे.  आपल्या पूर्वजांच्या हातातून जणू काही देवाने घडवून आणलेले शिल्प आहे हे.

कोदंडराम मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्ह्यातील गोल्लाला ममिदादा येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे . हे मंदिर विष्णूचा सातवा अवतार रामाला समर्पित आहे . हे गोदावरीची उपनदी तुळयभागाच्या (अंतरवाहिनी) काठावर बांधले गेले .

हे मंदिर त्याच्या अद्वितीय स्थापत्यकलेसाठी आणि दोन विशाल गोपुरमसाठी प्रसिद्ध आहे जे १६० – १७० फूट ( ४९ – ५२ मीटर) आणि २०० – २१० फूट (६१ – ६४ मीटर) उंच आहेत. मंदिरातील गोपुरम रामायण , महाभारत आणि भागवतातील दृश्ये दर्शविणाऱ्या गुंतागुंतीच्या कोरीव मूर्तींनी सुशोभित केलेले आहेत . मंदिराचे बांधकाम १८८९ मध्ये सुरू झाले, जेव्हा द्वारमपुडी सुब्बी रेड्डी आणि रामी रेड्डी या भावांनी जमीन दान केली आणि राम आणि सीतेच्या लाकडी मूर्ती असलेले छोटे मंदिर बांधले . एक मोठे मंदिर १९३९ मध्ये बांधले गेले. दोन गोपुरम १९४८ – ५० आणि १९५६ -५८ मध्ये बांधले गेले.

मंदिराला ‘चिन्ना भद्राडी’ किंवा ‘छोटे भद्राचलम ‘ असेही म्हणतात. हे आंध्र प्रदेशातील वोंटीमिट्टा येथील कोडंडराम मंदिरासह दोन सर्वात लोकप्रिय राम मंदिरांपैकी एक आहे. श्री राम नवमी हा मंदिरात साजरा केला जाणारा सर्वात प्रमुख सण आहे आणि त्यात राम आणि सीता यांचा वार्षिक विवाह सोहळा असतो. मंदिरात साजरे होणारे इतर महत्त्वाचे सण म्हणजे वैकुंठ एकादशी आणि विजयादशमी.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.)

(शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली! त्या आनंदातच तोही परतला.) इथून पुढे —

दोघेही गेल्यावर गणपतरावांनी अक्षरश: झडप घालून ते पत्र हातात घेतलं. आपल्या गुरूंचं पत्र ! आपल्या देवाचं पत्र !! साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र !!! — गेले चार दिवस या-त्या सगळ्या लोकांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा येत होत्या. पण आपली नजर लागली होती ती केवळ याच पत्राकडे. कित्येकदा वाटलं होतं की धावत जावं तात्यारावांकडं आणि सांगावं.. —

– ‘तात्याराव… तात्याराव बघा ! मी मेयर झालोय तात्याराव ! या विद्वज्जनांच्या पुणे नगरीने हिंदूमहासभेच्या बाजूने कौल दिलाय ! तात्याराव, तुमचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकारण्याच्या मार्गात आज अजून एक पाऊल पुढे टाकलंय आपण ! आणि त्या पावलात कणभर का होईना पण तुमच्या या शिष्याचा वाटा आहे …  या गणपत नलावड्याचा वाटा आहे, तात्याराव !’

— आणि ज्यावेळी येणाऱ्या संदेशांपैकी एकही संदेश तात्यारावांचा निघत नव्हता, तेव्हा कसे खट्टू झालो होतो आपण ! नुसत्या आठवणीनेच गणपतरावांना एखाद्या लहान बालकासारखे हसू फुटले !

त्याभरातच थरथरत्या हातांनी त्यांनी ते पत्र एकवार भाळी लावले. मग हलक्या हातांनी त्यांनी ते फोडले. आत सावरकरांनी स्वहस्ते लिहिलेला कागद ! पत्राच्या सुरुवातीस सावरकरांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे लिहिलेल्या ‘श्रीराम’ कडे त्यांनी किंचित काळ डोळे भरून पाहिले. सावरकरांची छबी दिसली असावी बहुतेक गणपतरावांना त्यात ! ते अधीर होऊन वाचू लागले —

“प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस,

सप्रेम नमस्कार.

पुण्याची धुरा आता समर्थ हातात आलीये म्हणायची ! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

खरं म्हणजे मी तुमची क्षमाच मागायला हवी. पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीरच झालाय. पण काय करू ! तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण तर ठाऊकच आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याच इंग्रजीला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं? तेही आपल्या देशी भाषा स्वत:च अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसडून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? …. जिथं स्वकीय भाषांतील प्रतिशब्द उपलब्ध आहेत, तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजीचे वा ऊर्दू-फारसीसुद्धा अन्य कुणाही परकीय भाषेचे भलते लाड नकोतच ! मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तिथेही देववाणी संस्कृतला शरण जात सोपे, सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे व ते बोलीभाषेत रुळवणे, हे देखील आपले तितकेच महत्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे !

उदाहरणार्थ – ते ‘स्कूल’ म्हणतात, मला त्यासाठी ‘शाळा’ हा पर्याय सुचतो.

ते ‘हायस्कुल’ म्हणतात – त्याला आपण ‘प्रशाला’ म्हणू शकतो.

ते ज्याला ‘टॉकीज’ अथवा ‘सिनेमा’ म्हणतात, त्यासाठी ‘बोलपट’ अथवा ‘चित्रपट’ असे दोन शब्द सुचताहेत मला – यातला कोणता शब्द वापरायचा ते तेवढे ठरवायचे.

‘अप-टु-डेट’ला ‘अद्ययावत’ म्हणता येईल,

‘ऍटमॉस्फिअर’ला ‘वायुमान’ म्हणता येईल,

‘पोलिस’ला ‘आरक्षी’ म्हणता येईल.

‘तारीख’ला ‘दिनांक’ म्हणता येईल. असे बरेच काही…

मात्र माझे घोडे या ‘मेयर’ शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला ‘मेयर’ म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — ‘महापौर .

साधारण मोठ्या गावाच्या प्रमुखास ‘मेयर’ म्हणतात. अश्या मोठ्या गावांच्या मागे ‘पूर’ लावायची आपल्याकडे पद्धत आहे. अगदी वैदिक काळापासून आहे. आणि अश्या ‘पुरा’त राहाणाऱ्या रहिवाश्यांना म्हणतात, ‘पौरजन’. तुम्ही या पुणे नामक ‘पुरा’चे प्रमुख आहात…  प्रथम नागरिक. त्याअर्थी तुम्ही झालात – महापौरजन ! आणि त्याचेच सुटसुटीत रूप आहे – ‘महापौर’!

असा अर्थपूर्ण शब्द सापडल्या-सापडल्या ताबडतोब पत्र लिहावयास घेतले आणि ताबडतोब धाडलेसुद्धा ! तेव्हा, महापौर गणपतराव नलावडे, तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!”

खाली दिनांक आणि सावरकरांची घुमावदार स्वाक्षरी होती!

— पत्र वाचत असतानाच गणपतरावांचे मन सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता, यांच्यासमोर नत झाले होते. भानावर येताच गणपतराव धावत-धावत आपल्या कार्यालयाबाहेर आले. त्यांना असे आलेले पाहून बाहेर उभे असलेले लोक चमकलेच. शिपाई बिचारा गोंधळून उभा राहिला. तिकडे कुठेच लक्ष न देता त्यांनी दारावर लावलेली पाटी उतरवण्याची खटपट चालू केली.

“काय झालं सायेब”, शिपायाने बावरून विचारले.

“तू लागलीच पळ आणि नवी पाटी बनवायला टाक. अश्शीच नक्षी हवीये अगदी ! फक्त त्यावर लिहिलेलं हवंय — “ गणपत महादेव नलावडे, महापौर “! — समजलं? जा लवकर ”, असे म्हणून त्याच्याकडे वळूनदेखील न पाहाता गणपतरावांनी पाटी उतरवण्याचे काम सुरूच ठेवले !

शिपाई बिचारा काहीच न समजून जागीच उभा होता. बेट्याला काय कल्पना की, तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला होता !

हो, सावरकरांनी मराठी भाषेला अजून एक चिरंतन टिकणारी आणि लवकरच सर्वमान्य होणारी देणगी दिली होती ! आज एका शब्दाचा जन्म झाला होता !!

— समाप्त — 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क – क करियर… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

परिचय 

शिक्षण 

  • पदवी –  मानसशास्त्र आणि पत्रकारिता
  • पदव्युत्तर पदवी – एम. एस. डब्ल्यू.
  • डिप्लोमा  – समुपदेशन
  • व्यवसाय: समुपदेशन तज्ज्ञ, संवाद समुपदेशन केंद्र.सांगली.

विद्यार्थी समुपदेशक — पद्मभुषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजी. इथे महिन्याला ३५ ते ४० विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जातं.

प्रकाशित साहित्य: राज्यातील विविध वृत्तपत्रे, नियतकालिक, मासिक यामध्ये लेख व कवितांना प्रसिध्दी. दै. लोकसत्ता मधून काही लेखाना प्रसिध्दी.

पणती – काव्यसंग्रह प्रकाशित.

वयात येताना – पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर

?  विविधा ?

☆ क – क करियर… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

हजारो पालकांना, मुलांशी संवाद साधत असताना अनेकवेळा असं वाटत राहतं की, भारतात बाळांचा जन्म होतंच नाही.  इथे जन्मतात इंजिनियर्स, डाॅक्टर्स, वकील, मार्केटिंग गुरू, सरकारी नोकर, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, एच आर, एम आर म्हणजे पैसे मिळवणारी जिवंत मशिन्स. कारण गर्भात असताना बाळाच्या कानावर आई वडिलांची स्वप्नंच पडतात. आपलं बाळ मोठं झाल्यावर प्रथितयश डाॅक्टर होणार. तो आय टी कंपनीत नोकरी करणार. यु एस मधे शिक्षण घेऊन तिकडेच स्थायिक होणार. बाळाच्या चाहुली बरोबरच त्याच्या करियरसाठीचं नियोजन सुरू होतं. बाळाचे डोळे आकाराला येण्यापूर्वीच त्याला स्वप्नं दाखवली जातात. जेंव्हा मुलगा क – क कमळ हाताने गिरवत असतो. त्याचवेळी पालकांच्या डोक्यात मुलाचं क – क करियर एखाद्या वादळासारखं चकरा मारत असतं. 

भारतात स्वत:चं करियर पणाला लावून मुलांचं करियर घडवू पाहणारे पालक मोठ्या प्रमाणात आहेत. पोटाला चिमटा काढून मुलांचं करियर घडवण्याचा प्रयत्न करणारे, मुलांना शिक्षणात काहीही कमी पडू नये म्हणून मुलांच्या सर्व मागण्या पुरवणारे, मुलांच्या मुलभूत शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी जिद्दीने कष्ट करणारे, वडिलोपार्जित संपत्ती मुलांवर खर्ची घालणारे असे अनेकविध प्रकारातील पालक दररोज भेटतात. आपल्याकडील जवळजवळ सर्वच पालकांना ठराविक क्षेत्रातील उच्च शिक्षण हे पैसे मिळवण्यासाठी, भविष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी महत्वाचा आणि खात्रीचा मार्ग आहे असंच वाटत असतं. परंतु करियर हे मुलांच्या आवडीच्या क्षेत्रातही होऊ शकतं. त्या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता येऊ शकतं. अशा क्षेत्रावर आणि आपल्या मुलांवरही पालकांचा विश्वास नसतो. त्यानी सुचवलेल्या क्षेत्रातच मुलानी करियर करावं असा अट्टाहास बर्‍याच पालकांचा असतो.

मुलांना हव्या त्या क्षेत्रात स्थिर होऊ दिलं तर कदाचीत पैसे कमी मिळतील पण आनंद केवढा मिळेल. समाधान किती मिळेल. या सुखाच्या कल्पनांना कोणत्या पॅकेजमधे कसं बसवता येईल. याचा  थोडातरी विचार पालकांनी करायला हवा. तसेच करियरच्या मागे धावणार्‍या तरूणांनी क क करियर व्यवस्थित समजून घ्यायला हवं. तरच तरुणांमधले मानसिक घोटाळे संपुष्टात येण्यासाठी मदत होईल.

काही क्षेत्रात मिळणार्‍या एखाद्या पॅकेजचा तुलनेने गाजावाजा होत नाही म्हणून त्या पर्यायांकडे दुर्लक्ष केलं जातं. भारतात असे कितीतरी चित्रकार आहेत ज्यांचं एक चित्र लाखाची कमाई करून देतं. अॅनिमेशन पदवीधारक असणारे कितीतरी तरुण वीस बावीस लाखाचं पॅकेज घेत आहेत. फोटोग्राफर्सची कमाई सुध्दा काही कमी नसते. वाईल्ड फोटोग्राफर्स तरी एक वेगळाच थरार अनुभवण्यात यश मानतात. चित्रपट सृष्टीमधे तर विविध तर्‍हेचं कौशल्य असणार्‍यांना अनेक संधी आहेत. करियरची संधी अजमावण्यासाठी हजारो क्षेत्र उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थी पालकांची नजर ठराविक क्षेत्रावरुन हलतंच नाही. मुलाना वेगळं काहीतरी करायचं असतं परंतु ते वेगळं काय हे शोधता येत नाही. पालकांचा संकुचित दृष्टिकोन मुलाना त्यांची स्वत:ची पायवाट तयार करु देत नाही. मुलांना करियर निवडीचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. 

एका महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणार्‍या एका मुलाने माझं भाषण होईपर्यंत माझंच स्केच काढलं. नंतर मला ते गिफ्ट दिलं.तेंव्हा म्हणाला,”स्केच काढणं ही माझी आवड आहे.आतापर्यंत मी १५० पेक्षा जास्त स्केचीस काढल्या आहेत. वडिलांची इच्छा म्हणून मी इकडे आलोय.”

दुसरा एक मुलगा भाषण होईपर्यंत रडत होता. नंतर जवळ बोलावून विचारलं. तेव्हा म्हणाला,” मला बेस्ट कोरिओग्राफर व्हायचंय.इथे माझा जीव गुदमरतोय. अभ्यासात लक्ष लागत नाही. फेल झालो तरी आई बाबा नाराज होणार पण मला हे करायचंच नाही. आई बाबा माझं काहीही ऐकून घेत नाहीत.”

एका मुलीला प्राण्यांचं मानसशास्त्र शिकायचं होतं. तिने पालकाना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. किती वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण विषय आहे.पण पालकांच्या इच्छेपुढे तिचं काही चाललं नाही.

आज घडीला अशी शेकडो उदाहरणं देता येतील. अशा पालकाना मुलांच्या भविष्याची चिंता असते. परंतु त्यांचा वर्तमान चितेवर ठेवून कसलं भविष्य घडवण्याची भाषा हे पालक करत असतात तेच कळत नाही.  शिक्षण घेतल्यानंतरची आपल्याकडे नोकरीसाठी काय परिस्थिती आहे हे लक्षात यावं याकरता एक उदाहरण पाहूया. तमिळनाडू विधानसभेत १४ सफाई कामगार हवे होते. त्या नोकरीसाठी ४६०० इंजिनियर्स आणि एम बी ए पदवी प्राप्त मुलानी अर्ज केले होते… असं अनेक ठिकाणी घडतंय.

चांगलं शिक्षण घेऊनही जेंव्हा नोकरी मिळत नाही तेंव्हा करियर म्हणायचं तरी कशाला आणि शिक्षण घेऊन करायचं तरी काय असा प्रश्न  सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आणि पालकांना पडणं साहजिकच आहे. खरंतर शिक्षण घेत असतानाच करियरचा विचार व्हायला हवा. मार्कांवरती अवलंबून न राहता आपल्या आवडी निवडी वरही थोडा विश्वास ठेवायला हवा.

यशाची व्याख्येतील विविधता- प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते. भरपूर पैसै मिळवण्यात एखाद्याला यश वाटत असेल. तर कुणाला प्रसिध्दीमधे यश वाटत असेल. एखादा रोजची कामं नीट झाली यातच यश समजत असेल. एखाद्याला आज पोटभर खायला मिळालं यातच यश वाटत असेल. आपलं यश आपण कशात मोजतो हे समजणं महत्वाचं आहे. त्यानुसार यशप्राप्तीसाठी नियोजन करणं आवश्यक आहे.

वेगळी वाट शोधलीच पाहिजे – इतरांनी शोधलेल्या मार्गावर जाणे सहज सोपे असले तरी त्याच मार्गावरून हजारो आधीच पोहोचलेले असतात. त्या गर्दीत हरवून जाण्यापेक्षा वेगळी पायवाट निर्माण करणं कधीही खडतरच असतं. परंतु त्या मार्गावरून हजारो आपल्या मागे येतात. आणि काहीच दिवसात या पायवाटेचा महामार्ग होऊ शकतो. हा विश्वास तरुणांमध्ये निर्माण करायला हवा.

अपयशातही साथ देणारेच खरे पालक- शिक्षणानंतरही मुलांना जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा मुलांपेक्षा जास्त पालकच खचून जातात. चिडचिड करतात. मुलांना अपशब्द बोलतात. मुलांच्या भावना समजून घेण्यापेक्षा स्वत:च्या अनियंत्रित भावना मुलांवर लादतात. मुलांना अपयशाचा सामना करायचा असतो. तिथे पालक साथ देत नाहीत. 

‘स्व’ चा शोध घेता आला पाहिजे – स्वत: मधील क्षमता आणि कमतरता माहित असल्या पाहिजेत. कोणतंही व्यावसायिक क्षेत्र निवडताना आपण हे का निवडत आहोत याची स्पष्टता असायला हवी. कोणत्याही कारणास्तव हे क्षेत्र जबरदस्तीने निवडले गेले असेल तर त्यात जाणीवपुर्वक आवड निर्माण करता येऊ शकते.

भविष्याचा वेध- पैसा,नोकरी, छोकरी सगळं हवंय पण त्यापलीकडे जाऊन आपल्याला आपलं काम मनापासून स्विकारता येतंय का याचा वेध घ्यायला हवा. तर भविष्य सुरळीत होतं. 

कौशल्याधिष्ठीत शिक्षण –  नोकरीसाठी शिक्षण, त्यासाठीच अभ्यास ही संकल्पना बदलली पाहिजे. व्यवसाय, छोटा उद्योग करण्यासाठीचं शिक्षण उपलब्ध व्हायला हवं. आयटीआय, नर्सिंग, आॅटोमोबाईल्स सारख्या शिक्षण संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला हव्यात.

अशा संधींचा विचार करायचा झाला तर फॅशन डिझाईनर,चामड्याच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधन, घड्याळं, दागिने, फरफ्युम्स, गाड्या, मयक्रोसाॅफ्ट, गुगल, फेसबुक, वाॅल मार्ट, फार्मास्युटिकल, इव्हेंट मॅनेजमेंट, फाॅरेन्सिक सायन्स, इंटिरियर डिझाईन, फिजिओथेरपी, नर्सिंग, पत्रकारिता, फोटो पत्रकार, अॅनिमेटर, गुन्हेगारी शास्त्र, मानसशास्त्र, लेखक, खेळाडू, शुज डिझाईनर, चित्रपट, नाट्य,नृत्य, संगीत, खेळातील पंच,ओशियनग्राफी, डिजिटल मार्केटर,ग्राफिक डिझाईनर,आय टी आय अशी अनेक क्षेत्रं लाखो रुपयांची कमाई करुन देऊ शकतात. त्यासाठी आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचं धाडस करायला हवं. नेमकं करियर शोधायला हवं. स्वत:चं निरीक्षण केलं तर निश्चितंच करियर सापडू शकतं.त्याला पालकांची साथ असेल तर मुलांची प्रगती होतंच असते.

क -क करियर म्हणजे फक्त रोजगार मिळवणं नाही तर कोणतंही काम करताना जगण्याचा आनंद घेणं होय. करियर शोधताना योग्य मार्गदर्शन करुन तरुणांची ऊर्जा टिकवून ठेवणं हे आव्हान पालकांनी स्वीकारायला हवं. काॅलेजमधून बाहेर पडल्याबरोबर  सर्वोच्च पद, मान सन्मान लगेचच मिळत नाही हे लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी कष्ट करणं, नविन गोष्टी शिकून घेणं, संबंधित कामाचं ज्ञान आत्मसात करणं, प्रश्न समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास करणं अशा गोष्टी जमायला हव्यात. आपले विचार मुक्तपणे आणि ठामपणे मांडता यायला हवेत. भावनांक चांगला असायला हवा. तरुणांचा देश असणार्‍या भारतात तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी सर्वानी मिळून घ्यायला हवी नाहीतर त्यांच्या हातात व्यसनाधिनतेचे पेले असतील. आणि त्यांचं डोकं मानसिकतेनं खचलेलं, अनेक छिद्र पडलेलं मडकं असेल.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares