मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र- “तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकूळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्याने समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला आहे हे मला शप्पथ सांगते, खरंच माहित नव्हतं. ते सगळं

दत्तगुरुंनीच माझ्याकडून लिहून घेतलं हे आज माझ्या लक्षात आलंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा… !” लिलाताई म्हणाली. )

तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते मनात भरुन राहिलेलं समाधान सोबत घेऊनच. समाधानाबरोबरच क्षणकाळापुरती कां होईना पण मनात निर्माण झालेली कांहीतरी राहून गेल्याची भावनासुद्धा होतीच. कारण लिलाताईने बोलून दाखवले होते ते तिच्याच मनातले विचार. पण नेमकं तसंच घडलं असेल? दत्त महाराजांनी खरंच ते त्या शब्दांत लिहायची प्रेरणा तिच्याही नकळत तिला दिली असेल? मनात अशी शंका घेणं मला योग्य वाटेना पण त्याचं समाधानकारक उत्तरही मला सापडेना. तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा मनाला स्पर्शून गेलेल्या समाधानामुळे मन थोडं शांत होतं खरं पण या सगळ्या

अघटितामागचं गूढ मात्र उकललेलं नव्हतंच. माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून ते गूढ अधिकच गहिरं होत चाललेलं होतं.. !

मी घरी आलो. रुटीन हळूहळू सुरू झालं. आरती पूर्णपणे सावरली नसली तरी तिने आता मात्र लवकरात लवकर सावरायला हवं, तिने नव्याने सुरुवात करायला हवी असं मला मनापासून वाटतं होतं. तिच्या स्वास्थ्यासाठी ते गरजेचं होतं. ती तेव्हा आमच्या लग्नानंतर लगेचच मिळालेला युनियन बँकेतला जॉबच करीत असे. सुदैवाने कोल्हापूरमधे तेव्हा आमच्या बॅंकेच्या दोन ब्रॅंचेस असल्याने तिचं पोस्टिंग दुसऱ्या ब्रॅंचमधे सहजपणे होऊ शकले होते. तिची खरंतर शिक्षणक्षेत्रात काम करायची इच्छा होती. म्हणून तिला ही नोकरी अचानक मिळाली तेव्हा ती फारशी आवडलेली नव्हती. आता मात्र एकटेपणातून आणि पुत्रवियोगाच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ही नोकरीच तिला मदतीची ठरणार होती. समीर गेल्यानंतर पुढे जवळजवळ एक महिना बिनपगारी रजा घेऊनही ती स्वस्थ नव्हतीच. म्हणूनच असं एकटेपणात रुतून बसणं हा आपल्या दुःखावरचा उतारा नाहीये हे तिलाही हळूहळू जाणवू लागलेलं होतं.

“चार दिवस का होईना जॉईन हो. तुझ्या प्रदीर्घ रजेमुळे स्टाफ शॉर्टेजचा त्रास ब्रॅंचमधील सगळ्यांनाच सहन करायला लागतोय. आपली गरज होती तेव्हा तेच सगळे मदतीसाठी धावून आलेले होते ना? मग निदान आता तरी त्यांचा त्रास वाढू नये याचा विचार आपण करायला हवा की नको? तुझं मन तिथं नाही रमलं तर एक महिन्याची नोटीस देऊन जॉब रिझाईन करायचं स्वातंत्र्य तुला आहेच. पण यापुढे असं अधांतरी नको राहूस. ” मी माझ्या परीने तिला वेळोवेळी हे सगळं समजावत रहायचो. अखेर तिने प्रयत्न करून पहायचं ठरवलं आणि एकटेपणाच्या खाईतून ती हळूहळू माणसात आली. वेगळं वातावरण, नवे विषय, नवी व्यवधानं यामुळे आपसूक ती नकळत सावरू लागली. तरीही मला बँकेतून घरी यायला तिच्यापेक्षा खूप उशीर व्हायचा. संध्याकाळी ती एकटी घरी आल्यानंतर बंद दाराआड समीरच्या व्याकूळ करणाऱ्या आठवणी तिच्या स्वागताला हजर असायच्याच.. ! त्या तशा रहाणारच होत्या. त्यांनी निघून जावं असं मलाही वाटत नव्हतं. पण त्या आठवणींमधे हिने रुतून बसू नये यासाठी माझे प्रयत्न असायचे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दिवस नवीन बाळाची चाहूल लागली! त्या जाणिवेच्या स्पर्शाने तिचे डोळे पाणावले. पण ते दुःखाचे नव्हे तर आनंदाचे अश्रू होते! समीर नक्की परत येणार आहे ही खूणगांठ माझ्या मनात पक्की होती पण आरतीला मात्र अजून मनापासून ते सगळं स्वीकारता येत नव्हतं.

यथावकाश या खेपेलाही तिच्या काळजीपोटी तिचे आई-बाबा बाळंतपणासाठी तिला आपल्या घरी सांगलीला घेऊन गेले. इकडे मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ. तिकडचाच विचार आम्हा सर्वांच्या मनात सतत ठाण मांडून असायचा. समीरच्या स्वागतासाठी मी मनोमन अतिशय उत्सुक होतो पण ते उघडपणे व्यक्त करता येत नव्हतं तर दुसरीकडे आईच्या मनात सगळं सुखरूप पार पडेल ना याचीच काळजी असे!

बँकेत कामाच्या व्यापात काही काळ माझं मन गुंतून रहायचं खरं पण ते तेवढ्यापुरतंच. सांगलीहून येणाऱ्या निरोपाची वाट पहाणारं माझं मन उत्सुक अस्वस्थतेमुळे सतत बेचैनच असायचं.

असंच एक दिवस मी कामात व्यग्र असताना कुणाची तरी चाहूल लागली म्हणून मी मान वर करुन पाहिलं तर समोर माझे सासरे उभे होते! मी क्षणभर पहातच राहिलो त्यांच्याकडे न् भानावर येताच ताडकन् उठून उभा राहिलो. ते काय सांगतायत हे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले होते पण उत्सुक मन मात्र आतल्याआत थरथरत होतं…. !!

“तुम्ही असे अचानक?”

“हो. खूप आनंदाची बातमी घेऊन आलोय. मुलगा झालाय… “

“आरती कशी आहे? आणि बाळ… ?”

“तिनेच ‘समक्ष जाऊन सांगून या’ म्हणत मला लगोलग पाठवलंय. बाळ गोड आहे. तीन किलो वजन आहे बाळाचं. घरी आईंनाही सांगा लगेच. मला निघायला हवं… “

” नाही नाही.. असं कसं?” मी म्हणालो. “घरी नाही तरी निदान समोरच्या रेस्टाॅरंटमधे काॅफी तरी घेऊया” म्हणत मी ड्राॅवर बंद केला तसं त्यांनी मला थांबवलं.

“नाही… खरंच नको. तुम्ही कामात आहात, व्यत्यय नको. मी शाहुपूरीत माझ्या बहिणीकडे जाऊन हा निरोप सांगणाराय. तिथं खाणंपिणं होईलच. म्हणून नको ” त्यांनी मला समजावलं. जायला वळले आणि कांहीतरी आठवल्यासारखं थांबले. त्यांनी खिशात हात घालून कागदाची एक घडी बाहेर काढली आणि…

” हे तुमच्या बायकोने दिलंय तुमच्यासाठी.. ” ते हसत म्हणाले आणि ती घडी माझ्या हातात देऊन निघून गेले..

 ती घडी उलगडून पाहिलं तर थरथरत्या हातानं लिहिलेली ती मोजक्या शब्दांची फक्त एक ओळ होती….

‘आपला.. समीर.. परत आलाय.. ‘

ते वाचलं आणि एक अनामिक अशी सुखसंवेदना माझ्या मनाला स्पर्शून गेली.. त्या स्पर्शाने मी शहारलो! कसाबसा खुर्चीत टेकलो. ओलसर नजरेने त्या अक्षरांवरून नजर फिरवीत त्या कागदाची अलगद घडी घातली आणि ती खिशात जपून ठेवली.. !

“आपल्याला पुन्हा मुलगा झाला तर आपला समीरच परत आलाय असंच तुम्ही म्हणणार…. पण मी.. ? तुम्हाला कसं सांगू? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले कीं केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तोss.. आहे माहित? त्याचे टपोरे डोळे’ गोरा रंग’, लांबसडक बोटं, दाट जावळ… सगळं मनात जपून ठेवलंय हो मीss. आपल्याला मुलगा झालाच तर तो आपला समीरच आहे कीं नाही हे फक्त मीच ठरवणार… बाकी कुणीही नाहीss…. ” कधीकाळी आरतीच्याच तोंडून बाहेर पडलेले हे शब्द आणि त्यानंतरचं तिचं खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवरचं घुटमळणं मला आठवलं आणि पूर्णतः नास्तिक असणारी तीच आज मला ‘आपला समीर परत आलाय’ हे अतिशय आनंदाने, मनापासून सांगत होती !! यापेक्षा वेगळं मला तरी दुसरं काय हवं होतं?

ही अतिशय करूण आणि तितक्याच भयावह अशा अरिष्टाची अतिशय सूचक अशी सांगताच आहे असं मला त्याक्षणी वाटलं खरं पण ते तेवढंच नाहीये हे मात्र तेव्हा माहित नव्हतं. पुढे जवळजवळ १४-१५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर एक दिवस अतिशय अकल्पितपणे मला समजलं ते या सगळ्या अघटीतामधे लपलेलं गूढ उकलणारं एक रहस्य.. !!

तोवर ‘समीर परत आलाय’ ही भावना आमच्या निखळ समाधानासाठी आम्हाला पुरेशी होती. पण तो कसा परत आला.. सगळं कां आणि कसं घडलं याची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. १५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ती उकल झाली.. आणि.. मी त्यातला थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक झालो… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाय फाय बालपण… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ वाय फाय बालपण… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

पाव चीट्टी मिट्टी घोडा पुक डोळा झूल !! 

एकलम खाजा, डुब्बी राजा तिराण भोजन चार चौकडे पंचलिंग पांडु सायमा गांडू सात कोतडे आष्टिका नल्ली नवी नवं किल्ली दस गुलाबा !!! 

 मंडळी काय आठवतंय का बघा!! नाही आठवत, बरं. अहो हीच तर आमची परिभाषा! हेच आमचे परवलीचे शब्द. होय हे शब्द आता कोणाला माहित पण नसणार. आमच्या बालपणीचा मोबाईल ग्रुप. आम्ही एका ठिकाणी कधीच शांत बसलो नाही. आमचा ग्रुप हा फिरता होता. अगदी पिंपळावरचा मुंजा! आता गल्लीतील खोताच्या कट्ट्यावर असलो तरी, एकदम डोक्यात काय शक्कल येईल, व सगळेच एकदम गप्प होतील सांगता येत नव्हतं.

त्यावेळी मोबाईलचं काय साधा फोन सुद्धा कुठेही नव्हता! फोन फक्त पोस्ट ऑफिस मध्येचं बघायला मिळणार.

आमची चांडाळ चौकडी ह्या गल्लीतून त्यागल्लीत तर कधी चावडीत, तर कधी कुणाच्याही मळ्यात धुडगूस घालणारी.

सुट्टीचे दिवस तर आम्हाला दिवाळी सारखे वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटली की, गल्लीतील चौकात यायचे, मग चिंन्नी दांडू पाव चीट्टी मिट्टी — चालू व्हायचे.

ते अगदी घरातील कोणीतरी बोलवे पर्यंत. अरे ये पांड्या तुला पोटाची काय खबर हाय की नाय असं डबाड्याची काशी वरडत यायची. झाले मग सगळी सावध व्हायची. डबाड्याची काशी म्हणजे, गल्लीतील आग, दिवसा ढवल्या तिच्या समोरून कोण जात नसे. उठ पांड्या तुझं मड मी बसवलं असं आरडत येणारी पांड्या ची आई काशीबाई! आली तुला पटकी आं, असं उद्धार करणारी पांड्याची आईच, भाकर तुकडा गिळ अन म्हसर सोड असं तीन म्हटलं की, सगळेच घरचा रस्ता धरायचे. पण सगळीच जेवण करून प्रत्येक जण आपापल्या घरातील म्हसर सोडून सगळीच जण मोती तळ्या कडे.

गल्लीतून नाही म्हटली तरी पंचवीस जनावर! सगळी जण चावडीला वळसा घालून वेशीत, वेशितून मारुतीच्या देवळा जवळून हम रस्ता. तेथून मिरज रोडवर तीतून खालच्या अंगाला ओढा पार केलं की मग मोती तळ. मोती तळ तस गावंधरीत असल्याल. मोती तळ्याच्या आजूबाजूला गायरान जमीन. तिथे सगळी म्हसर गेली की आम्ही परत रिकामेच.

 म्हसर एकदा सोडली की झाले. परत आमची टोळ की, चिंचेच्या झाडाखाली हजर.

 त्याला झाडाखाली आरामात बसलो की झाले. किरण्या खिश्यात पत्ते घेऊन यायचं. हळूच पत्ते काढले की, पक्क्या डोक्यावरचं खोळ करून आणलेलं पोत झटकून हांतरायचा. खोता चा सागऱ्या, पक्या, हणम्या, किरण्या, राज्या असे सगळेच मिळून पत्ते कुटण्यात गर्क. असा डाव रंगत आला असताना सिद्राम येऊन बोन्म्ब मारायचा.

 सुकाळीच्यानों म्हसर दुसऱ्यांच्या रानात सोडून पत्ते खेळता व्हय असं म्हटला की आम्ही काय ते समजायचो.

नक्कीच जवळच असलेल्या सिद्रामच्या शेतात म्हसर चर्याला गेलेत. म्हटल्यावं सगळी खडकन उभी ते धुमशान सिद्रामच्या मळ्यात दाखल.

 बघतोय तर काय सगळ्या म्हशी गाजरच्या मळ्यात आरामात चरत होत्या. तोपर्यंत सिद्रामची बायको बोंब मारत आलीचं. मड बशीवलं तुमचं, म्हशी आमच्या रानात सोडून, पत्ते कुटत बसता काय? 

 सरळ गावात जाते अन तुमच्या घरात जाऊन सांगते. असं म्हटल्यावर सगळीच तिच्या पाया पडू लागली गया वया करू लागली. काकू आमची चूक झाली, परत असं होणारच नाही. त्यावर ती त्रागा करत म्हणे, ह्या पिकाचे नुकसान तुमचा बाप भरून देणार काय ? असं सगळं रंगात येत असताना पक्या पुढ झाला अन गचकन तीच पाय धरु लागला. कारण ती पक्याची चुलत मावशी लागतं होती. मग सगळं वातावरण थंड झाल्यावर, म्हसरांना सरळ मोती तळ्यात सोडल आणि सुटका करून घेतली. आता म्हशी आणि पाणी ह्यांचं जूनं नातं. एकदा का म्हैस पाण्यात गेली की दोन तास गच्चन्ति. बिनघोर होऊन सगळी परत झाडाखाली आले. पत्ते गोळा करून ठेवले.

राज्या हणम्या दोघेही चिंचच्या झाडावर चढली आणि खाली पिकलेल्या चिंचा खाली टाकू लागले तस आम्ही गोळा करत बसलो. एव्हाना संध्याकाळ झालेली. म्हसरांना पाण्यातून कसबस बाहेर काढून घरी परतत, रविवारी सकाळची खेळण्याची अखणी पण झालेली.

आणलेल्या चिंचेत मीठ लसूण गूळ घालून त्याला उखळात चेचलं आणि जोंधळ्या च्या धाटवर त्याला बांधून सगळ्यांना वाटलं. तशी सगळी परत संध्याकाळी तोंडात घणं घट धरून लॉलीपॉप सारख चोखु लागली. खोताच्या दगडी कट्ट्यावर गप्पा चालू झाल्या.

परत दबड्याची काशी आली आणि बोंब मारायला सुरवात केली. तस सगळीजण घरात पसार झाली. रविवार सुट्टी सकाळ उठून धपाधुपी खेळायचं ठरले. चेंडू कुणाकडं नव्हताच. मीच शेवटी घरात आलो. घरात केळीच्या पानांचे द्रोण होते, त्यावर केळीच्या पानांचा चेंडू होता तो घेतला. त्यावर कपडाच्या चिंद्या गुंडाळून बॉल तयार केला अन धपाधुपी चालू झाली. बऱ्याच वेळा तो चेंडू गटारीत पण पडला तसाच उचलला. आणि कापडं रंगीत व्हायला लागली. चेंडू किरण्याच्या हातात लागला. त्याने समोर असलेल्या हणम्या वर नेम धरला व मारला. नेमक हन्म्याने वार चुकवला तो खाली बसला अन समोरच्या पडवीत पोथी वाचत बसलेल्या मोरे काकांच्या तोंडाला लागला ते गटारीच्या 

शिक्क्या सकट! ते बघून सगळी पोर घरात पसार झाली. तस शिंदडीच्यानों करत मोरे काका काळ तोंड घेऊन बाहेर आले. बघतात तर कोणच नाही. रागात शिव्या देऊन न्हणी घरात तोंड धुवायला गेले.

मुलं पण घरात जाऊन शिळी भाकरी दही चटणी खाऊन परत चावडीत जमा झालेली. चावडीच्या पटांगणात चिरर घोडा खेळायचं ठरले. त्यात दोन पार्ट्या करायला पाहिजे होत्या. दोन कॅप्टन झाले बाकीचे जरा लांब जाऊन एकमेकांना संगणमत करून कॅप्टन जवळ जोड्यानी जवळ आले. आला आला घोडा काय काय फोडा असा त्यांचा वाय फाय शब्द होता. एक जोडी आली म्हणाली तुम्हाला राम पाहिजे की कृष्ण, एकानी राम घेतला दुसऱ्या नी कृष्ण अश्या विविध नावानी जोड्यांचे वरगीकरण झाले व ग्रुप तयार झाला. आता दोन्ही कॅप्टननी टॉस करायचा होता. पण पैसे कुणाकडंच नव्हते. मग नेहमी प्रमाणे पातळ दगड घेतला, त्यावर एका बाजूला थुंकी लावली. त्याचाच टॉस तयार केला. पाऊस पाहिजे का उन्ह! पाऊस म्हणजेच थुंकी लावलेलीली बाजू.

त्याच्या विरुद्ध उन्ह टॉस झाला राज्या वर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.

 – क्रमशः भाग पहिला 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुस्तकंसुद्धा युद्धावर गेली होती त्याची गोष्ट – – ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? इंद्रधनुष्य ?

पुस्तकंसुद्धा युद्धावर गेली होती त्याची गोष्ट – – ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

मध्यंतरी ‘लोकसत्ता’ मधील बुकमार्कच्या पानावर आलेला ‘आणि पुस्तके चालू लागली’ हा लेख वाचल्यावर साहजिकच नुकतंच हाती आलेलं पुस्तक आठवलं. पुस्तकाचं नाव: ‘When Books Went To War’ आणि लेखिका आहे, मॉली गप्टील मॅनिंग. माझी एक सवय आहे पूर्वीपासून, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचत असताना, त्यात कधी, कुठे त्यांनी वाचलेल्या चांगल्या पुस्तकाचं नाव, संदर्भ आला, की मी लगेच ते नाव माझ्या वाचायच्या पुस्तकांच्या यादीत लिहून ठेवते. असंच या पुस्तकाबद्दल मी बहुधा निरंजन घाटे यांच्या ‘मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट’ या पुस्तकात वाचून लिहून ठेवलेलं होतं. हे पुस्तक तेंव्हा माझ्या मुलानं मला पाठवलं होतं.

1933 च्या सुमारास जर्मनीमधे अर्थातच, हिटलर आणि त्याचा लाडका सेनापती गोबेल्स यांच्या डोक्यातून निघालेली आणि शाळा-कॉलेज मधे शिकणाऱ्या उत्साही किशोरवयीन आणि तरुण मुलांमार्फत राबवून घेतलेली एक भयंकर मोहीम होती. दुसऱ्या महायुद्धाबद्दल आपण बरंच काही वाचलेलं असतं, पण या मोहिमेबद्दल मात्र या आधी मी तरी कुठेही, काहिही वाचलेलं नव्हतं.

जर्मनीतील मोठमोठ्या शहरात, मध्यवर्ती चौकात मोठ्ठाल्ले ओंडके चितेसारखे रचून त्यात शेकडो, हजारो पुस्तकांच्या आहुती दिल्या गेल्या! बर्लिन, फ्रॅन्कफर्ट अशांसारख्या शहरातील विद्यापिठांच्या वाचनालयातील उत्तमोत्तम ग्रंथ आणून या होमात त्यांची आहुती देण्यात आली!

हजारो विद्यार्थी आपापल्या विद्यापिठांचे विशिष्ट रंगाचे कपडे घालून, हातात मशाली घेऊन मोठ्या अभिमानाने या मिरवणुकीत सामील झालेले होते. बर्लिनच्या मुख्य चौकात होणाऱ्या या ‘समारंभां’ साठी पावसाळी हवा आणि प्रचंड गारठा असतानाही चाळीस हजार प्रेक्षक हजर होते. आणि अशा पावसाळी हवेतही या मुलांचा उत्साह, आनंद उफाळून ओसंडत होता!

कितीतरी गाड्या “अन-जर्मन” पुस्तकं भरून घेऊन या मिरवणुकीत सामील झालेल्या होत्या. आणि हे विद्यार्थी(?) मानवी साखळी करून एकमेकांकडे देत, ही पुस्तकं त्या चितेत भिरकावत होते. नाझी एकतेच्या विरोधी विचार असलेली सर्व पुस्तकं ही देशद्रोही ठरवून नष्ट केली जात होती. देशाच्या प्रगतीला विरोधी विचारांमुळे अडथळा निर्माण होत आहे, म्हणून, हे विचार असलेली पुस्तकं जाळण्यायोग्य आहेत, असं या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आलेलं होतं. सिग्मंड फ्रॉईड, एमिल लुडविग, एरिक मारिया रिमार्क हे सगळे लेखक, तज्ञ देशविरोधी लिखाण करत आहेत, असं सांगून त्यांची पुस्तकं जाळण्यात आली. एका मागून एक मोठमोठ्या लेखकांची, शास्त्रज्ञांची पुस्तकं जाळली जात होती, आणि गर्दीमधून हर्षनाद, आरोळ्या उठत होत्या. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे घडवून आणलेला आहे, अशा अफवा उठलेल्या असल्या, तरी, या कार्यक्रमात येऊन गोबेल्सने भाषण दिल्याने हा कार्यक्रम कोणाच्या आशीर्वादाने घडवून आणला गेलेलं आहे, हे जाहीर झाले! हिटलरच्या आदर्शवादाशी जुळणारी विचारसरणी समाजात निर्माण करण्यासाठी तो आपली ताकद वापरत असे.

बर्लिनच्या या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळावी म्हणून तो चालू असताना, रेडिओवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि तो चित्रितही करण्यात आला. आणि नंतर देशभरातल्या थिएटर्समधे ही फिल्म मुख्य चित्रपटाआधी दाखवण्यात येऊ लागली. जसजसा हा प्रचार होत गेला, तसतसे ठिकठीकाणी असे पुस्तकं जाळण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. ज्यू विद्वान व लेखकांची तर सर्व पुस्तकं जाळण्यात आलीच, पण समता, बंधुत्व, समन्यायी व्यवस्था यावर लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांनाही तोच रस्ता दाखवण्यात आला!

नंतर तर नाझींनी लेखकांची, पुस्तकांची यादीच जाहीर केली. कार्ल मार्क्स, अप्टन सिंक्लेयर, जॅक लंडन, हेन्रीक मान, हेलन केलर, अल्बर्ट आईनस्टाईन, थॉमस मान आणि ऑर्थर स्च्नित्झलर. प्रत्येक ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तकं जाळण्याच्या कार्यक्रमाला असाच हजारोंचा समुदाय जमलेला असायचा आणि या प्रत्येक कार्यक्रमाची प्रचंड प्रसिद्धी देशभर केली जात असे.

पण हेलन केलर पासून अनेक मोठ्या, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकांनीही या गोष्टीचा विद्यार्थ्यांच्या नावे पत्र लिहून निषेध केला. एच. जी. वेल्सने लंडनमधे निषेधपर जोरदार भाषण केले. 1934 मधे, पॅरीसमधे अशा जर्मनीत जाळलेल्या आणि बंदी घातलेल्या पुस्तकांची लायब्ररी स्थापन करण्यात आली. जर्मनीतून आलेल्या काही निर्वासितांनी देणगी म्हणून अशी पुस्तके या लायब्ररीला दिली. आणि युरोपातील लोकांनीही आपल्याकडे असलेल्या अशा चांगल्या लेखकांची पुस्तकं या लायब्ररीला देणगीदाखल दिली.

अमेरिकेतही वर्तमानपत्रांमधून जर्मनीतील या असंस्कृत मोहिमेचा जाहीर निषेध करण्यात आला.

नंतर हळुहळू हिटलरची मजल पुस्तकांकडून ज्यू लोकांच्या छ्ळापर्यंत, त्यांच्या उच्च्चाटनापर्यंत जाऊन पोचली आणि मग त्याने युरोपातले लहान-सहान देश आक्रमण करून गिळंकृत करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे, तर फ्रेंच रेडीओ वरून त्यांच्या विरूद्धच अपप्रचाराची राळ उडवत आपली वक्र नजर फ्रान्स आणि इंग्लंड वरही असल्याचं जाहीर केलं! आणि मग सगळा युरोपच युद्धाच्या ज्वाळांमधे होरपळू लागला.

हिटलरचा लोकशाही विरोध शेवटी अमेरिकेपर्यंत पोचणार याची निश्चिती वाटू लागल्यावर अमेरिकेलाही खडबडून जागं व्हावं लागलं. पहिल्या महायुद्धानंतर विस्कळीत झालेली सर्व युद्धयंत्रणा परत रुळावर आणण्याचं अवघड काम आधी करावं लागणार होतं.

सुरुवातीला जेंव्हा 1939-40 मधे युरोपात युद्धज्वाळा फैलावू लागल्या होत्या, तेंव्हा अमेरिकन नागरिकांचा या युद्धात सामील व्हायला विरोधच होता. पण बरेच जण असे होते, की ज्यांना यातली अपरिहार्यता कळत होती. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सह अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी लष्करी प्रशिक्षण सक्तीचे करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा अप्रिय सल्ला सरकारला दिलेला होता. त्यांनी हिटलरचे लष्कर किती शक्तिमान आणि यंत्र-शस्त्र सज्ज आहे, आणि त्याने फ्रांसला कसे जेरीस आणले आहे, याचाही दाखला दिला होता. आणि आपण बेसावध असताना जर या सुसज्ज लष्कराला तोंड द्यायची वेळ आली तर कशी दुर्दशा होऊ शकते, याचीही कल्पना दिलेली होती.

हिटलरने स्वतःला लोकशाहीचा कट्टर शत्रू म्हणून जाहीर केले होते आणि अमेरिका ही सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सौम्य-सभ्य अशी लोकशाही नव्हती काय? आणि ‘शत्रू बेसावध असतानाच त्याच्यावर हल्ला करून त्याला गारद करायचा’ हाच हिटलरचा प्रमुख डावपेच असायचा. तेंव्हा आपण वेळीच सावध होऊन तयारीला लागलं पाहिजे, असा त्या वृत्तपत्रांमधील लेखांचा एकूण रोख होता.

1940 च्या सप्टेंबर मधे अमेरिकेच्या कॉन्ग्रेसने ‘सिलेक्टिव्ह ट्रेनिंग अॅन्ड सर्व्हिस’ कायदा मान्य केला. या कायद्यानुसार 21 ते 35 या दरम्यान वय असलेल्या सर्व पुरुषांना लष्करी सेवेत भारती होणे आवश्यक होते. नंतर या कायद्यात दुरुस्ती करून 18 ते 50 वयाच्या पुरुषांना लष्करी सेवेत भरती होणे अनिवार्य करण्यात आले.

लष्करात भरती झालेल्या या लाखो लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी, लष्कराने 46 केंद्र बांधून फर्निचरसकट सज्ज करायचं ठरवलं होतं, पण तेवढा निधीच त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे या सक्तीची भरती केलेल्या लोकांना प्रशिक्षण देणं तर दूरच, उलट त्यांच्या रहाण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे मोठेच आव्हान लष्करापुढे उभे राहिले. अगदी तळामुळापासून करायच्या या तयारीला खूप दिवस लागणार होते. आणि त्यासाठी लागणारा पैसा सरकारकडून मंजूर होऊन मिळायलाही वेळच लागणार होता!

आधी सक्तीची लष्कर भरती आणि नंतर पैसा हातात येईल तेंव्हा कॅम्प तयार करणं यामुळे या भरती झालेल्या लोकांचे विलक्षण हाल झाले. त्यामुळे त्याचं मानसिक धैर्य खूप खच्ची झालं! अनेक कॅम्प्समधे रहाण्याची, जेवणखाण्याची आणि शौचालये किंवा स्नानगृहांची व्यवस्था नव्हतीच जवळपास! आणि या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक अशा युद्धसामग्रीचाही पत्ता नव्हता. लष्कराची अवस्था खरोखरच शोचनीय झालेली होती!

अशा तऱ्हेने उपलब्ध साधनसामग्री मर्यादित कसली, जवळपास नसतानाही, संगीत (गाणा-यांनी गाणे!) आणि मर्दानी खेळ यांनी थोडीफार करमणूक करून घेत असत हे प्रशिक्षणार्थी. पण एकमेकांना अनोळखी असलेल्या या लोकांना इतक्या वाईट परिस्थितीत सतत एकमेकांबरोबर रहावं लागत असल्यामुळे, मोकळा वेळ असेल तेंव्हा शक्यतो एकटं बसावं, घरच्यांना पत्रं लिहावीत किंवा एकट्यानेच काहीतरी वाचत बसावंसं वाटत असे.

लष्करातील वरचे अधिकारी हे जाणून होते, की या कॅम्प्समधील रहाणीचा दर्जा सुधारल्याशिवाय आणि या प्रशिक्षणार्थींना हवी असलेली करमणूक, मनोरंजन याची व्यवस्था केल्याशिवाय त्यांचं मानसिक धैर्य उंचावणार नाही, आणि परिणामकारक प्रशिक्षणही देता येणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची, निर्णायक आहे!

पण जिथे रहाण्यासाठी इमारती आणि चालवण्यासाठी बंदुकी अशा लष्करी प्रशिक्षणासाठी आवश्यक अशा प्राथमिक गोष्टी पुरवण्यासाठीच धडपड चाललेली असताना चित्रपटगृहे आणि खेळांसाठीच्या उत्तम सुविधा पुरवणं अशक्यच होतं! तेंव्हा, त्यांना अशी करमणूक द्यायला हवी होती, की जी लोकप्रियही असेल आणि परवडणारीही! आणि ती म्हणजे पुस्तकंच होती त्या काळात!

मोबाईल फोन नव्हते, आणि टी. व्ही. पण प्रत्येक काना कोपऱ्यात पोचलेले नव्हते असा तो काळ होता. इतके लोक पुस्तकं वाचण्यासाठी इतके उत्सुक होते, हे वाचूनच मन भरून येतं!

पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळीही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पुस्तकं पुरवण्यात आली होती, पण या दुसऱ्या महायुद्धात जितक्या जास्त संख्येने पुस्तकं पुरवण्यात आली, तो जागतिक विक्रम अजून मोडला गेलेला नाही!

या पुस्तकांसाठी एक मोठी मोहीमच अमेरिकेत, देशभरात चालवली गेली! देशभरातील ग्रंथपालांची (लायब्ररीयन्स) एक संघटना होती. तिच्या सभासदांनी एकत्र येऊन, स्वयंसेवकांची मदत घेऊन एक देशव्यापी मोहीम आखली. जागोजागी, ठिकठिकाणी छापील पत्रकं लावली. या पत्रकांमध्ये आपापल्या घरी असलेली पुस्तकं सैनिकांसाठी दान करायचं आवाहन केलेलं होतं. ही पुस्तकं ज्या त्या गावातल्या लायब्ररीत आणून द्यायची होती. मग तिथून ती एका ठिकाणी गोळा करून जिथे जिथे सैनिक लढत होते, किंवा प्रशिक्षण घेत होते, तिथे तिथे पोचवण्यात आली.

जवळपास 40 लाख पुस्तकं अशा प्रकारे गोळा करून सैनिकांसाठी पाठवण्यात आली. या मोहिमेसाठी कित्येक जणांचा हातभार, कष्ट, पैसा सगळंच कामी आलं होतं. हे सगळे तपशीलही मुळातून वाचण्याजोगे आहेत. विस्तारभयास्तव इथे देता येत नाहीत.

या पुस्तकांनी सैनिकांसाठी काय केलं, हे अमेरिकन लष्करातील एका मेजरच्या शब्दात : “आमच्या, आणि आमच्याबरोबर लढणाऱ्या इतर देशांच्याही सैनिकांचं आयुष्य जगण्याजोगं केलं या पुस्तकांनी! अमेरिकन सैनिकांचं ते विलक्षण चैतन्यही जागं केलं या पुस्तकांनी! आणि आमचे सैनिक अजूनही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे राहिलेत तेही या पुस्तकांमुळेच!”

अशा प्रकारे, हिटलरने सुरु केलेल्या फक्त युद्धालाच नव्हे, तर त्यानं प्रत्यक्षात आणलेल्या पुस्तकं जाळण्याच्या अमानुष, असंस्कृत मोहिमेला अमेरिकेने हे सुसंस्कृत, जोरदार उत्तर दिलेलं होतं आणि माणसाविरुद्ध आणि माणुसकीविरुद्ध चालवलेल्या प्रत्यक्ष युद्धात आणि सांस्कृतिक युद्धातही हिटलरचा दणक्यात पराभव केला, त्याची ही कहाणी!

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पिल्लू (सोडणे) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ पिल्लू (सोडणे) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

लेखाचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ! हा ‘ पिल्लू सोडणे ‘ काय प्रकार आहे हे मला खरोखरच काही वर्षांपूर्वी माहिती नव्हतं. पहिल्यांदा माझ्या एका मित्राकडून हा वाक्प्रचार मी ऐकला. मला त्या शब्दाची मोठी गंमत वाटली. मग मी कुतूहलाने त्याचे बोलणे ऐकत राहिलो. माझा हा मित्र एका राष्ट्रीयकृत बँकेत कामाला होता. त्याच्या बँकेत घडलेल्या गमतीजमती तो संध्याकाळी फिरायला जायचे वेळी मला सांगायचा. अमुक एक असं म्हणाला. तो तसं म्हणाला. काही लोकांकडे खूप कामं असायची. नेमून दिलेली कामं करणं त्यांच्या जीवावर यायचं. मग ते काहीतरी पिल्लू सोडून द्यायचे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मॅनेजरला अशी काहीतरी गोष्ट सांगायचे की ती त्याला नाकारताही यायची नाही. म्हणजेच एखादी सांगयाची. ती गोष्ट मॅनेजर खरी मानून चालायचा आणि पुढे चालून ती प्रथा पडायची. म्हणजेच ते सोडून दिलेलं पिल्लू हळूहळू मोठं व्हायचं.

आपल्या अवतीभवती सुद्धा असे अनेक लोक आपण पाहतो. काहीही माहिती नसताना ते एखादं पिल्लू सोडून देतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते अफवा पसरवण्याचं काम करतात. यालाच कोणी कंड्या पिकवणे असेही म्हणतात. असं एखाद्या गोष्टीचं पिल्लू सोडून देऊन हे लोक नामानिराळे होतात आणि मग आपण सोडून दिलेलं पिल्लू मोठं होताना पाहून त्यांना मोठी गंमत वाटते किंबहुना तो त्यांचा एक खेळच असतो. मग त्यामुळे कोणाला मनस्ताप झाला, कोणाचे नुकसान झाले तरी त्यांना पर्वा नसते किंबहुना तसे व्हावे हीच त्यांची सुप्त इच्छा असते. जाणाऱ्याचा जीव जातो पण पाहणाऱ्याचा खेळ होतो अशातला हा प्रकार !

एकदा सोडून दिलेले असे पिल्लू म्हणजे जणू काही अनाथ पोर ! त्याला ना आई, ना बाप ! मग ते हळूहळू मोठे होत जाते. ते कसेही वागले तरी त्याची जबाबदारी कोणावरच नसते. दुपारी माध्यान्हाच्या वेळेला पडणारी आपली सावली लहान असते, पण जसजशी संध्याकाळ होत जाते तसतशी ती मोठी होत जाते. तसेच हे पिल्लू ही सुरुवातीला लहान असते. नंतर मोठे होत जाते. पण सावलीमुळे कोणाचे नुकसान होत असल्याचे ऐकिवात नाही. फक्त भयपटात सावल्या भीती दाखवण्याचे काम करतात तो भाग वेगळा ! पण हे असली पिले मोठी झाली म्हणजे समाजाचे भयंकर नुकसान करतात.

कोरोनाच्या कालावधीत तर कितीतरी भयंकर अफवा पसरवण्यात आल्या किंवा पिल्लू सोडण्यात आले. त्यामुळे काही लोकांचा फायदा झाला असेलही पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. काहींनी नको त्या गोष्टी सांगून लोकांना घाबरवले कोणी अमुक एक औषध उपलब्ध नाही म्हणून अफवा पसरवली. कोणी काही तर कोणी काही. त्रास मात्र सगळ्यांना झाला.

सध्या जे दहा रुपयाचे नाणे चलनात आहे, त्याबद्दलही मध्यंतरी कोणीतरी पिल्लू सोडून दिलं होतं की हे नाणे बंद झाले आहे. आमच्या गावातील तर बऱ्याच लोकांनी ते दहा रुपयाचे नाणे घेणे बंद केलं होतं. बँकेतील लोकांना विचारले तर ते म्हणाले की असा कोणताही निर्णय रिझर्व बँकेने घेतला नाही शेवटी रिझर्व बँकेलाच असं जाहीर करावं लागलं की हे नाणं बंद केलेलं नाही, ते चलनात आहे. पण तोपर्यंत बऱ्याच लोकांना मनस्ताप सोसावा लागला होता.

हल्ली सोशल मीडिया हे कुठले तरी पिल्लू सोडून देण्याचे एक प्रभावी माध्यम झाले आहे लोकांच्या जातीय किंवा धार्मिक भावना भडकतील अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडिया वरून बऱ्याच वेळा पसरवल्या जातात आणि मग पोलिसांना किंवा राज्य शासनाला अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करावे लागते. पूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्यांच्याबद्दलही विविध अथवा उठवल्या होत्या. अमुक एक तेल आरोग्यासाठी चांगलं आहे आणि अमुक एक तेल आरोग्यासाठी घातक आहे अशा प्रकारची खेळी तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या जीवाशी अनेक वेळा खेळली आहे आणि आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. शेंगदाणा तेल आरोग्यासाठी वाईट, खोबरेल तेल आरोग्यासाठी वाईट अशा प्रकारचा अपप्रचार त्यासाठी करण्यात आला. या सुद्धा एक प्रकारच्या अफवाच होत.

काही दिवसांपूर्वी जळगावजवळ एका रेल्वे अपघातात १२ जणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. ही नुकतीच घडलेली घटना आहे. त्यालाही अशा प्रकारची अफवाच कारणीभूत होती. कोणीतरी अशी अफवा पसरवली की रेल्वेच्या डब्यात आग लागली आहे. लागलीच त्या डब्यातील प्रवाशांनी घाबरून रेल्वेबाहेर उड्या मारल्या. त्यावेळी गाडी एका रेल्वे वळणावरून धावत होती. विरुद्ध बाजूने वेगाने येणारी एक्सप्रेस लोकांना वळण असल्यामुळे दिसली नाही. त्यांनी बाजूच्या रेल्वे रुळावर उड्या घेतल्या आणि क्षणार्धात त्या गाडीखाली सापडून त्यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. एखादी अफवा पसरवण्याचे परिणाम केवढे भयंकर होतात ! मग ती जाणूनबुजून पसरवलेली असो की नसो !

बऱ्याच वेळा अशा अफवा पसरवल्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगे घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारची अफवा पसरवणारे हेतूपुरस्सर अशा अफवा पसरवतात आणि आपला अनिष्ट हेतू साधून घेतात. काही राजकीय व्यक्तींचा देखील अशा घटनांमध्ये सहभाग असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. चित्रपटातूनही आपण अशा घटना पाहतो. त्यांनीही अशाच प्रकारे आपली पोळी भाजून घेतली आहे. पण याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागले आहेत त्याशिवाय समाजात दुफळी निर्माण होते ती वेगळीच ! बऱ्याच वेळा गर्दीच्या ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा जत्रेत कोणीतरी काहीतरी अफवा पसरवतं आणि मग चेंगराचेंगरी होऊन हजारो लोकांचे बळी जातात. अशाही अनेक घटना आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. पण समाज शहाणा होत नाही हे दुर्दैव !

म्हणून समाजाचे देखील एक कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे. ती म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवणे. त्यासाठी आपल्याला पोलीस, विविध स्वयंसेवी संस्था, बँका वेळोवेळी आवाहन करीत असतातच. अशी एखादी संवेदनशील गोष्ट आपल्या कानावर पडली तर आपण त्यावर विश्वास न ठेवता त्या गोष्टीची खात्री करून घ्यावी आणि मगच योग्य ती पावले उचलावी. एक जबाबदार नागरिक म्हणून अशी खबरदारी आपण तर घेतलीच पाहिजे परंतु आपल्या मुलांना देखील अशा गोष्टींवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही अशी शिकवण दिली पाहिजे. शाळा, कॉलेजेस मधून सुद्धा अशा प्रकारची जागृती घडवून आणणे आवश्यक आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण अफवा न पसरवण्याचा आणि खात्री केल्याशिवाय अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचा निश्चय करूया.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆‘‘हेलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘हेलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(28 फेब्रुवारी.. राष्ट्रीय विज्ञान दिन.. एक अनमोल आठवण)

माझी मैत्रीण आणि मराठी विज्ञान परिषदेची कार्यकर्ती, डॉ. मानसी राजाध्यक्षने मला बीएआरसीमधील ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदे’च्या, सुवर्णमहोत्सवी अधिवेशनात ‘मंगलदीप’ कार्यक्रमासाठी विचारले नि अत्यानंदाने मी या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमास होकार दिला. तत्क्षणी डोळ्यांपुढे मी सर्व वैज्ञानिकांसमोर गातेय असे मनोहारी दृश्य तरळले आणि एका इतिहास घडवणार्‍या कार्यक्रमाचा वर्तमानपट चालू झाला. हा कार्यक्रम सर्वांच्या चिरंतन स्मरणात रहावा, या ध्येयानं मी झपाटले. गाण्याबरोबर विज्ञानाशी सांगड घालून निवेदनही उत्तम व्हावे, या तळमळीने विज्ञानावरची माहिती जळी-स्थळी, मधुमक्षिकेप्रमाणे गोळा करत गेले.

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून रियाझ करताना ‘मंगलदीप’ डोळ्यांसमोर फेर धरू लागला. कोर्‍या कॅनव्हासवर माझे रंगांचे फटकारे सुरू झाले. संध्याकाळी प्रचंड मोठे आवार असलेल्या जगप्रसिद्ध बीएआरसीमध्ये शिरताना ‘उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा’ असा आनंद होत होता. खचाखच भरलेल्या सभागृहात समोरच बसलेले थोर वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. जयंतराव नारळीकर, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी व अनेक विद्वान मंडळी मला ऐकायला आलेली पाहून मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटला! ‘‘बालपणी शाळेच्या पुस्तकात ज्या दिग्गजांची नावे वाचली त्यांना पाहण्यासाठी, ते दिसतात कसे, बोलतात कसे हे ऐकण्यासाठी हा कार्यक्रम मी त्वरित घेतला, ’’ असे सांगितले. यावर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात देशाच्या खर्‍या हिरोंचे स्वागतच केले. ‘न हि ज्ञानेन सदृशमं, पवित्रं इह विद्यते, ’… ‘‘या जगात ज्ञानाशिवाय इतकी पवित्र आणि सुंदर कुठलीच गोष्ट नाही, ’’ असे सांगून या बुद्धिवंतांसमोर ‘मंगलचरणा गजानना’ या बुद्धिदेवतेच्या वंदनेने प्रारंभ केला. नंतर कविवर्य शंकर रामाणींच्या ‘दिवे लागले रे दिवे लागले’ या कवितेविषयी म्हटले, ‘‘ही एका स्पेशल जागी म्हणजे न्हाणीघरात स्वरबद्ध झालीय! जिथं कॉन्सन्ट्रेशन होतं. ’’ अशाच जागी आर्किमिडीजलाही त्याचा सिद्धांत सुचल्यावर तो ‘युरेका युरेका’ म्हणत ध्यानमग्न अवस्थेत बाहेर आल्याचे सांगताच, छप्पर फाड के टाळ्या कोसळल्या! अक्षरशः लाव्हारस भूगर्भातून उसळल्यासारखा! एकाच वेळी माझ्या नि हजार बुद्धिमंतांच्या मनातले विचार, एक होऊन त्याला अशा टाळ्या येणं याला मी ‘परमेश्‍वरी कृपाप्रसाद’ म्हणेन. मी म्हटलं, ‘दिवे लागले…’ ही कविता शंकर रामाणींऐवजी थोर शास्त्रज्ञ एडिसननेच विजेच्या दिव्याचा शोध लावल्यावर ‘युरेका युरेका’ म्हणण्याऐवजी ‘दिवे लागले रे दिवे लागले… तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले…’ असेच म्हटले असेल.

त्या काळी विजेच्या दिव्याचा अन् अनेक शोध लावून एडिसनने संपूर्ण जग देदीप्यमान केलं, उजळवलं आणि तुमच्यासारख्या विद्वान मंडळींनी समाजाला असं भरभरून दिलंय, की ‘कुणी जागले रे कुणी जागले…’ आपण सारे एकत्र गाऊन हे सभागृह सुरांनी उजळूया… विज्ञानाशी व एडिसन, आर्किमिडीज यांच्याशी नाळ जुळल्याने सारे सभागृह गात गातच टाळ्या वाजवत समरसून गेले.

आत्तापर्यंत संपूर्ण हॉलभर रसिकांनी ‘पद्मजाला’ अलवारपणे ओंजळीत उचलून, एका सुंदरशा कमळाच्या पाकळ्यांवरती स्टेजवर विराजमान केलं होतं.

पुढचे काव्य इंदिरा संतांचे! केवळ सजीवच नाही, तर संपूर्ण निसर्गातल्या निर्जीव गोष्टींनाही जिवंतपणे मांडण्याची ताकद त्यांच्या कवितेत दिसते. तसंच वनस्पतींनाही प्राण्यांप्रमाणे जीव असतो, त्याही श्‍वासोच्छ्‌वास करतात, असं सिद्ध करणार्‍या थोर वनस्पती शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचं कार्य आणि इंदिराबाईंच्या काव्याची गुंफण घालून ‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले, आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…’ म्हणत सोनचाफ्याच्या पावलांनी आलेल्या सर्वांचे पुन्हा स्वागत केले. शास्त्रज्ञ हा कल्पनेची मोठी झेप घेतो आणि त्याचे स्वप्न सत्यात उतरवतो. ‘स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले…’ हेच खरं! परंतु कवीच्या बाबतीत मात्र ‘जे ना देखे रवी ते देखे कवी, ’ असं म्हणतात. मंगेश पाडगांवकरांबद्दल हेच म्हणावे लागेल. कारण मध्यंतरी ‘‘शुक्र हा ग्रह आहे की तारा?’’ असं विचारल्यावर अनेक सुजाण मंडळींनी अगदी सहज तारा असं उत्तर दिलं 

( हशा!) ‘शुक्रतारा मंद वारा ’सारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे शुक्र हा नक्कीच ‘तारा’ आहे, असा सर्वांचा ‘ग्रह’ होतो. पण माझा तसा ‘आग्रह’ नाही. हा श्‍लेष ऐकून प्रत्येकजण खळाळून दाद देत होता. नंतर पाडगांवकरांची ‘मी तुझी कुणी नव्हते’ कविता गायले, ज्यातही शुक्रतारा आहेच!

त्यानंतर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत !… सूर्याच्या आकंठ प्रेमात बुडालेली पृथ्वी (कणखर स्त्री) सूर्याला म्हणते…

‘‘परी भव्य ते तेज पाहून पुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे,

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे…’’

हे संगीतात माळलेलं, पृथ्वीचं परिवलन नि परिभ्रमणही सादर केलं. ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ मांडणारे नि ‘आकाशाशी जडले नाते’ असलेल्या डॉ. नारळीकरांना मी हे गीत अर्पण केलं. टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना स्वीकारताना त्यांच्या चेहर्‍यावर अतुलनीय आनंद दिसत होता.

त्यानंतर ‘केव्हा तरी पहाटे…’ झाल्यावरच्या धो धो टाळ्या म्हणजे ‘उरले उरात काही आवाज चांदण्यांचेच…’ होते. मी म्हटले, ‘‘इथं अनेक स्वयंप्रकाशी, देदीप्यमान तारे या नभांगणात तेजाळत आहेत. ’’ तेव्हा या चांदण्यारूपी टाळ्या म्हणजे अंगावर प्राजक्ताचा सडाच होता !

यानंतर भारताला ‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ हा महामंत्र देणार्‍या, तसंच १९९८ च्या पोखरण अणुचाचणीनंतर भारताची ज्ञान आणि विज्ञानातली प्रगती, यांचं महत्त्व ज्यांनी अधोरेखित केलं, असे भारताचे लाडके माजी पंतप्रधान… अटलजींची कविता ‘गीत नया गाता हूँ…’ किस्सा सांगून सादर केली. अटलजींच्या कवितांचे रेकॉर्डिंग त्यांना ऐकवण्याकरिता आम्ही १३ मे १९९८ ला दिल्लीला गेलो. त्याच दिवशी नेमकी पोखरण अणुचाचणी झाल्याने पी. एम. हाऊस मीडियावाल्यांनी गच्च भरलेले.

भारतावर इतर देशांचा प्रचंड दबाव असल्याने तणावामुळे अटलजींना भेटणे कठीण होते.

शेवटी ३ मिनिटे ठरलेली भेट, ते त्यांच्या कवितेत रममाण झाल्याने २० मिनिटांपर्यंत लाभली… या चाचणीने शांतताप्रिय भारताने, ‘हम भी कुछ कम नहीं’ हे जगाला दाखवून दिले. ‘‘या चाचणीच्या मुख्य चमूचे तसेच थोरियमवर आधारित भारतीय अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक असलेल्या डॉ. अनिल काकोडकर यांना मी अभिवादन करते…’’ 

माझे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच टाळ्यांचा महापूर झाला! 

डॉ. काकोडकरांचा हजार शास्त्रज्ञांच्या साक्षीने त्यांच्याच बीएआरसीमध्ये माझ्या सुरांनी सन्मान करतानाच्या अलौकिक क्षणी, माझा ऊर नि डोळे अभिमानाने भरून आले.

कार्यक्रमाची सांगता मी संगीत नि शास्त्रज्ञांचे नाते उलगडत केली. ‘‘भारतरत्न डॉ. कलाम साहेब उत्तम वीणा वाजवत. ’’ हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या चेहर्‍यावर १००० व्हॅटचा तेजस्वी प्रकाश होता. आज ते असते तर कार्यक्रमाचा मुकुटमणी ठरले असते.

दिल्लीतील माझ्या संसदेच्या कार्यक्रमात डॉ. राजारामण्णांना उत्कृष्ट पियानो वाजवताना जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं. डॉ. राजारामण्णांचे नाव ऐकताच, आपल्याच घरच्या व्यक्तीचे नाव घेतल्याचा आनंद आणि टाळ्या टाळ्या टाळ्या…! (नंतर मला कळले की, ते डॉ. काकोडकरांसारख्या अनेक महान वैज्ञानिकांचे गुरू होते.)

तसेच फॅबियोला गियानोटी ही स्त्री वैज्ञानिकही उत्तम पियानो वाजवते. हर्शेलसारख्या संगीतकाराने सूर्यमालेतील सातव्या ग्रहाचा, युरेनसचा शोध लावून मग खगोल शास्त्रज्ञ म्हणून नाव केले.

‘‘विश्‍वातला प्रत्येक शास्त्रज्ञ हा देश व मानव कल्याणासाठी झटत असतो. ज्ञानेश्‍वरी तर विश्‍वकल्याणाचे सार आहे, ’’ असे सांगत मी संपूर्ण वंदे मातरम्‌ने सांगता केली.

रसिकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर मी डॉ. नारळीकरांना भेटले. ‘‘पृथ्वीचे प्रेमगीत मला परत कुठे ऐकायला मिळेल?’’…. हा प्रश्‍न ‘वन्स मोअर’सारखा आनंद देऊन गेला.

डॉ. काकोडकरांना भेटल्यावर, ‘‘तुमचे शब्द गातात नि सूर बोलतात’’ असा त्यांनी गौरव केला.

संपूर्ण कार्यक्रम नि टाळ्यांचा पूर आजही मनात इंदिराबाईंच्या शब्दाप्रमाणे रुंजी घालतोय… 

‘‘खाली सुगंधित तळे 

उडी घेतात चांदण्या,

हेलावल्या सुवासात,

कशा डुंबती चिमण्या…’’

…. ते क्षण मी पुन्हा पुन्हा जगतेय.

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपली मातृभाषा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ आपली मातृभाषा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

क, ख, ग, घ, ङ – यांना कंठव्य म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो. एकदा करून बघा.

च, छ, ज, झ, ञ- यांना तालव्य म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.

एकदा करून बघा 

ट, ठ, ड, ढ, ण- यांना मूर्धन्य म्हणतात. कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो. एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना दंतव्य म्हणतात. यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.

एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म, – यांना ओष्ठ्य म्हणतात. कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा.

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का, ते पण लोकांना सांगा. एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्याही भाषेत नसेल.

जय मराठी !

यातील क, ख, ग काय म्हणतात बघू जरा….

   * * * * *

क – क्लेश करू नका 

ख- खरं बोला

ग- गर्व नको 

घ- घमेंड करू नका

च- चिंता करत राहू नका

छ- छल-कपट नको 

ज- जबाबदारी निभावून न्या

झ- झुरत राहू नका

ट- टिप्पणी करत राहू नका

ठ- ठकवू नका

ड- डरपोक राहू नका

ढ- ढोंग करू नका

त- तंदुरुस्त रहा 

थ- थकू नका 

द- दिलदार बना 

ध- धोका देऊ नका

न- नम्र बना 

प- पाप करू नका

फ- फालतू कामे करू नका

ब- बडबड कमी करा

भ- भावनाशील बना 

म- मधुर बना 

य- यशस्वी बना 

र- रडू नका 

ल- लालची बनू नका

व- वैर करू नका

श- शत्रुत्व करू नका

ष- षटकोणासारखे स्थिर रहा 

स- सत्य बोला 

ह- हसतमुख रहा 

क्ष- क्षमा करा 

त्र- त्रास देऊ नका 

ज्ञ- ज्ञानी बना !!

 

मराठी बोला अभिमानाने — —

मातृभाषा – दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!! 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

आयुष्याला क्षणभंगुर का म्हणतात हे मला एक अख्खा दिवस मावळण्याच्या आतच कळलं होतं.

वेग, धावपळ लोकांचा घोळका, मित्रांच्या मैफिली, कौतुक, टाळ्या, हशा जाऊन त्याची जागा काळजी आणि सहानुभूतीने घेतली ते कळलच नाही. तरीही दीड वर्ष मी काहीतरी चांगले क्षण हेरत राहिलो, कधी सावधानतेच्या कड्याकुल्पातून हळूच चोरत राहीलो.

गेले दोन सव्वा दोन महिने मी स्वतःला शारीरिक कड्या कुलपात ठेवले 

कागज के फूल या गुरुदत्तच्या सिनेमात कैफी आझमीने लिहिलंय ….

“वक्त है मेहरबा आरझु है जवा

फिक्र किसी बात की करें इतनी फुरसत है कहा “

… या अशा आयुष्यात लोळायला फार बरं वाटतं. त्यावेळी असं वाटायचं वेळ मिळाला की हे वाचायचं, ते पाहायचं आहे, या विषयावर लिहायचय, अनेक संकल्प डोळ्यासमोर असायचे आज वेळ आहे संकल्पही आहेत पण काही करण्याची ती उर्मी कमी झाली. लिखाण करण म्हणजे माझ्यासाठी समाधी लागण असल्यामुळे मी अधून मधून लिहीत असतो. काही गोष्टी करताना आनंदाच् वातावरणात असणं फार महत्त्वाचं असतं.

सध्या कैफीची जागा सुरेश भटांनी घेतली. त्यांच्या कवितेचे शब्द अधून मधून कानामध्ये लाऊड स्पीकर लावल्याप्रमाणे ऐकू येत असतात.

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले 

एवढे मी भोगले की मज हसावे लागले “

ही कविता त्यानी आपल्यासाठी लिहिली का असं वाटायला लागलं.

हळूहळू लक्षात यायला लागला की माणूस बदललेल्या परिस्थितीत आयुष्याशी जुळवून घेतो. आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. मन नावाचा भुंगा फक्त फुल बदलतो. नसेल ते फुल पहिल्या इतक सुंदर, पण त्यातला मकरंद शोधतच राहतो 

मी कुठल्या गोष्टी बंद करायला हव्यात याची लिस्ट डॉक्टर ने दिल्यानंतर चेहरा पडण्यासाठी मला दिलीप कुमारच्या अभिनयाच्या गुणवत्तेची गरज नव्हती.. तो नैसर्गिकपणे पडला माझ्या मुलाने माझ्या चेहऱ्यावरचं नैराश्य पटकन वाचलं आणि तो एक वाक्य उच्चारला.. ते वाक्य करवतीने लाकूड कापत जाव तसं मन कापत गेल. तो म्हणाला “पब्लिक, चाहते, टाळ्या मित्र, घोळका, कौतुक यातच तुम्हाला सुख आहे का?आम्ही तुमचे कोणी नाही का?'”

आयुष्यात कधीतरी आमच्यासाठी जागा ठेवा हे तो सांगत होता आणि त्याचं काही चुकलं नाही. माणूस आजारी एकटा पडत नाही. तो कुटुंबाला घेऊन आजारी पडतो. शारीरिकदृष्ट्या तो त्रास भोगतो पण मानसिक दृष्ट्या सर्व कुटुंबच त्यात गुंतलेल असतं. आता कुटुंब पहिलं बाकी इतर सगळ्या गोष्टी नंतर असं ठरवून टाकलं.

मुलाकडे राहत असल्यामुळे आजोबा आणि नातू किंवा नात हे नातं सगळं विसरायला लावत, हे लक्षात आलं. दहा-बारा दिवसासाठी नात येऊन गेली आणि नात ( स्वरा) आणि नातू ( कियांश)यांच्याबरोबर खेळताना ते दहा-बारा दिवस किती पटकन निघून गेले हे कळलच नाही. पण त्या गोड आठवणी पहिला लेख जपून ठेवावा तशा मी जपून ठेवल्या. मी पुन्हा लहान झालो जवळपास त्यांच्याच वयाचा त्यांच्याबरोबर खेळलो, कधी पत्ते कधी लहानपणी खेळलेला व्यापारसारखा खेळ (सध्या नवा अवतार पाहायला मिळतो). जणू बालपण पुन्हा अवतरल. त्यांच्याबरोबर खेळताना आपण हरायच असतं हे मला उमगलं. आदर्श विचार केला तर हे चुकीच असेल. लहान मुलांना पराभव झाला तर तो स्वीकारायचा हे शिकवायला हवं ही गोष्ट खरी आहे. पण बऱ्याचदा आजोबाचं मन हे आदर्शवादाला जुमानत नाही. ते नात किंवा नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला आसुसलेलं असतं. बऱ्याच गोष्टीने मी घरची शिस्त बिघडवतो. नातवाच्या आई-वडिलांना वाटतं की त्याने जास्त टीव्ही किंवा मोबाईल पाहु नये आणि ते योग्यच आहे पण नातवासाठी आजोबा आणि आजी हे फार सॉफ्ट टार्गेट असते. चेहऱ्यावर अजीजीचे भाव आणून “आबा पाच मिनिटांसाठी मोबाईल दे” असं म्हटल्यावर मी पाघळतो. त्या पाचची पंधरा मिनिटे कधी होऊन जातात कळत नाही.

मला पटतं मी चुकतोय.. पण वळत नाही. माझा नातू सहा वर्षाचा आहे. त्याच्यात मी पूर्ण गुंतून गेलो. सकाळी तो शाळेत जाताना त्याने मला कॉपी दिली नाही तर तो येईपर्यंत मला चैन तू काय दिवसभर माझ्याबरोबर खेळत नाही पण त्याचा आसपासचा वावर माझ्यासाठी भरलेल्या ऑडिटोरियम इतकाच प्रिय आहे. त्यालाही मी हळूहळू मॅच्युअर होताना पाहत आहे. त्याच वाढलेलं प्रेम आणि दिवसागणीक मधासारखं गोड आणि अत्यंत घट्ट होत जाणाऱ् नातं मला सुखावत. अगदी, माझ्या कुठल्याही वैयक्तिक आनंदापेक्षा. पूर्वी आमच्या घरून मुलाच्या घरी आल्यावर परतताना तो सांगायला “आजी येताना काहीतरी घेऊन ये. एखाद टॉय आण. आणि त्याची टॉय ठरलेली असायची, कधी विमान, कधी बोट कधी, बंदूक. मुलांकडून पुन्हा दम यायचा त्याला अशा सवयी लावू नका. मध्यंतरी दहा-बारा दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाताना मी सहज विचारलं, ” काय घेऊन येऊ? ‘

तो म्हणाला ” काहीही आणू नका. फक्त तुम्ही या. तुमची वाट बघतोय” माझे आणि बायकोचे डोळे पाणवले त्याच्यातला हा बदल सुखावत होताच पण मनाला एक वेगळा आनंद देऊन गेला. मध्यंतरी माझ्या व्याहांचा 70 वा वाढदिवस होता. घरातली सगळी मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. मी नाही जाऊ शकलो. माझ्या नातवाने आई-बाबांना भंडावून सोडलं की आबा आणि आजी का नाही आले ?आणि मला भेटल्यानंतर तो म्हणाला, “मी ती पार्टी एन्जॉय नाही करू शकलो कारण तुम्ही दोघेजण नव्हता. ” त्याची एक, दोन मिनिटांची मिठी बरंच काही सांगून जाते. त्या मिठीची उब अचानक अंगावर प्रेमाची वीज पडल्यासारखी वाटते. अंग मोहरून जात. कधीतरी तो माझ्याकडे हट्ट करतो, ” आबा क्रिकेट खेळायला चला किंवा मला बोलिंग टाका. किंवा मी सायकल चालवतोय चला ना खाली चला चला ” या क्षणी त्याच्या मागे मला पळणे शक्य नाही. मन पळायला तयार आहे पण शरीर परवानगी देत नाही. मी त्याला समजून सांगण्याचा एकदा प्रयत्न केला तेव्हा अत्यंत निरागसपणे तो मला म्हणाला, “आबा तू कधी बरा होणार?. लवकर हो. ह्या वाक्याने मनात निर्माण झालेला भावना कल्लोळ यांचे वर्णन मी नाही शब्दात करू *शकत. मी त्याला म्हणालो” अरे लवकरच बरा होईन.. मग आपण क्रिकेट खेळू. सायकल चालवू सगळं करू ” आणि मग आकाशाकडे पाहत परमेश्वराला म्हटलं “अरे माझ्यासाठी जाऊ देत नातवासाठी तरी तथास्तु म्हण. निदान हे नवं बालपण तरी मला पुन्हा नीट उपभोगून दे”

 

लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम केल्याने नेमके काय होते ?? – लेखक – डॉ. शिवानंद बासरे   ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

🫀 प्रेम केल्याने नेमके काय होते ?? – लेखक – डॉ. शिवानंद बासरे  ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

(Valentine’s DaY Special…)

नैसर्गिक निवड प्रक्रियेचा भाग असलेले ‘प्रेम’ हे मनुष्याचे सर्वाधिक निरोगी वर्तन आहे. विज्ञान म्हणते की, आपल्या भाव-भावना हे मेंदू, हृदय आणि शरीराच्या अन्य अवयवांवर थेट परिणाम करतात. असं काय असतं ह्या प्रेमात जे आपल्या आरोग्य-अनारोग्याचा अविभाज्य भाग आहे ? प्रत्येकाचे शरीर वय स्वभाव विचार परिस्थिती यानुसार ‘प्रेम’ वेगवेगळे असले तरी “तुमचं आमचं सेम असतं” असं का म्हणतात ??

रासायनिकदृष्ट्या मेंदूचा मनाशी संबंध असला तरी, प्रत्यक्षात मन हृदयाच्याच अधिक जवळ असते. प्रेमाचे प्रतीक दाखवायचे झाले तर आपण हृदयाचे चित्र काढतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर थेट परिणाम करतात. प्रेमामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाच्या Stress Hormone ची पातळी कमी होते. यामुळे हृदयगती कमी होऊन रक्त प्रवाह सुधारतो. अनावश्यक कॅलरीज बर्न होतात. तणाव दूर होऊन स्नायूंना आराम मिळतो.

प्रेमात Oxytocin चा स्तर वाढतो, जे लोकांना एकमेकांशी बांधण्याचे काम करते. जसं जन्मानंतर ताबडतोब आई आणि मुल एकमेकाशी जोडले जाते, अगदी तसेच नात्यात सुद्धा ऑक्सीटोसिन महत्वाची भूमिका निभावते. शांततेची भावना निर्माण होऊन रात्रीची झोप अधिक चांगली लागते. मनात आनंदाची भावना Dopamine मुळे निर्माण होते. यामुळे ऊर्जा, एकाग्रता वाढते आणि एकाकीपणाची भावना कमी होते. प्रेमात हे अगदी सहज घडते.

आता प्रश्न असा की, हे सर्व घडते ते कोणत्या प्रेमामुळे ? तारुण्यातील प्रेम की अन्य कोणते प्रेम ??

तसं प्रेम हा आजवरचा सर्वाधिक संदिग्ध शब्द आहे. शब्दात व्यक्त करणे अशक्य असले तरी त्यात सौंदर्य, समाधान, समज, निस्वार्थीपणा, परिपक्वता, काळजी, सामर्थ्य, सकारात्मकता यांचा समावेश आहे.

इतरांवरील प्रेमाची सुरुवात स्वतःवरील प्रेमाने होते. जे लोक स्वतःवर प्रेम करू शकत नाहीत, त्यांना इतरांवर प्रेम करणे कठीण जाते. प्रेम कसे करावे ? हे शिकणे तिथून सुरू होते. प्रेम करणे म्हणजे पुढच्या व्यक्तीचा जसा आहे तसा, त्याच्या गुण-दोषांसकट स्वीकार करणे.

असे केल्याने काय होते ? जगातील सर्वात अमूल्य गोष्ट आपल्याला लाभते, ते म्हणजे आंतरिक समाधान ! ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर धडपडतो. जे मिळविण्यासाठी प्रत्येकजण सुचेल त्या मार्गाने अथक प्रयत्न करतो, ती गोष्ट आपल्याला प्रेम केल्याने सहज मिळते.

सध्याच्या बहुतांश जीवनशैलीजन्य आजारांची (उदा- वंध्यत्व, हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश इ. ) अनेकजण अनेक कारणे सांगत असले तरी, ‘प्रेमाचा अभाव’ हेही एक प्रमुख कारण त्यांच्या मुळाशी आहे. प्रेम हे तंत्रज्ञान वा औषध नसल्याने डॉक्टर ते लिहून देऊ शकत नाही, आणि ते विकतही मिळत नाही. अन्यथा या आजारांसाठी आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरजच पडली नसती.

आज ‘व्हॅलेटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमाच्या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुधारण्याची आपल्याला सुसंधी आहे. मनात राम आहे हे दाखविण्यासाठी हनुमंतांनी स्वतःची छाती फाडून दाखविली. प्रेमाच्या मार्गाने असे हृदय आपण विकसित करू शकलो तर जन्माचे कल्याण होते. अन्यथा; जन्माला आला अन् मरून गेला… एवढेच घडते !

HàPPY Vålentine’s DåY

लेखक : डॉ. शिवानंद बासरे

दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड- मो ९४२३२६७४९२

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कोहिलू

१९६०/६१ साल असेल ते. एक दिवस भाईंनी (आजोबा -आईचे वडील) पप्पांना त्यांच्या ग्रँड रोडच्या ईश्वरदास मॅन्शन मध्ये बोलावून घेतले. अनेक वेळा अनेक कामांसाठी भाई पप्पांना असे बोलवायचे आणि पप्पा कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या फिरोजशहा मेहता रोडवर असलेल्या ऑफिस मधून ते बीईएसटी च्या बसेस बदलून ग्रँट रोडला पोहोचत. या वेळच्या त्यांच्या भेटीत भाईंचं नक्कीच काहीतरी विशेष काम असावं.

भाई पपांची वाटच पहात होते. त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला.

“ जना! मी एक प्रस्ताव मांडतोय तुमच्यापुढे. ”

“ मांडा. ”

 “मला असं सुचवावसं वाटतंय की आता किती दिवस तुम्ही त्या धोबी गल्लीत राहणार? मला मालूला भेटायला यावसं वाटलं तर त्या लहानशा गल्लीत माझी गाडी पार्क करायलाही जागा नसते. ”

“ मग तुमचं काय म्हणणं आहे?” पप्पा थेट पण शांतपणे म्हणाले.

“ हे बघा जना, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ठाण्यातच तुम्ही एखादा चांगल्या भागात प्लॉट बघावा आणि बंगला बांधावा असे मला वाटते. ”

“ सुंदर कल्पना!”

 पांढरे स्वच्छ धोतर आणि सदर्‍यातलं, सहा फुटी उंच, गोरंपान, करारी डोळे असलेलं एक आदरणीय ताठ व्यक्तिमत्व! त्यांनी त्यांच्या लेकीसाठी ठेवलेला एक प्रस्ताव आणि होकार किंवा नकाराला टाळून दिलेलं पप्पांचं उत्स्फूर्त उत्तर.

 पण फार घोळ न घालता भाई पुढे म्हणाले, ” जना! तुम्हाला फक्त प्लॉट खरेदी, जागा निवडणे, कायदे, नंतरच्या बांधकामविषयक बाबी आणि यातायात सांभाळायची आहे. एकही पैसा तुम्ही खर्च करू नका. हा बंगला मला माझ्या लेकीला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे. ”

 “तुमचा निरोप मी मालूला देतो. ” इतकं म्हणून काही अवांतर गप्पा मारून, चहा नाश्ता घेऊन पप्पांनी भाईंचा निरोप घेतला.

 या भेटीनंतर पप्पांची मनस्थिती नेमकी काय झाली असेल याचा आता माझ्या मनात विचार येतो.

आमचं रहातं घर जिजीचं होतं. जिजीच्या अपार कष्टातून ते उभं राहिलं होतं. पपांची जडणघडण त्याच घरात झाली होती. अनेक भावनिक आठवणींशी जोडलेलं होतं. शिवाय तसेही

 पप्पा पक्के थीअॉसॉफीस्ट होते. भौतिकतेपासून कित्येक योजने ते कायम दूर होते. कुणीतरी आपल्याला काहीतरी देतोय म्हणून आनंदात वाहून जाणारे ते नव्हतेच पण देणारा आणि घेणारा यांच्या नात्यातला भावबंध जपण्याइतका संवेदनशीलपणा त्यांच्यात होताच आणि तितकाच अलिप्तपणाही ते सांभाळू शकत होते. शिवाय भाईंनी त्यांच्या मनातला हा विचार परस्पर स्वतःच्या लेकीला न सांगता जावयापुढे मांडला होता यातही कुठेतरी त्यांचा समंजसपणा, अदब, नम्रता, कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ न करण्याची वृत्ती स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळे कुणाचाच अभिमान दुखावण्याचा प्रश्न नव्हता. आपापल्या जागेवर दोघांचे श्रेष्ठत्व टिकूनच राहिले.

 परिणामी आमचं कुटुंब बंगल्याचं स्वप्न रंगवण्यात गुंग झालं.

 जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर, क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या घराजवळचा एक प्लॉट खरेदी करण्याचं नक्की ठरलं. हा प्लॉट पॅट्रीक कोहिलू नावाच्या कॅथलिक माणसाचा होता. वास्तविक तो जरी त्याच्या नावावर असला तरी तीन-चार भावांचा वडिलोपार्जित इस्टेट म्हणून कायद्याने त्यावर हक्क होता. दलाला तर्फे अनेक बैठकी, व्यवहारासंबंधीच्या, भाव निश्चित करण्याबाबतच्या पार पडल्या. प्लॉट घ्यायचा, की नाही घ्यायचा यावर कधी बाजूने कधी विरोधात चर्चाही झाल्या. प्लॉटची ही कॅथलिक मालक माणसं अतिशय चांगली आणि धार्मिक वृत्तीची होती. व्यवहारात कोणती फसवणूक होणार नाही याची खात्री झाल्यावर आणि पूर्व -पश्चिम, व्याघ्रमुखी, रस्त्याला लागून वगैरे भौगोलिक आणि पुराणोक्त बाबींचा, संकेतांचा नीट अभ्यास करून या जमीन खरेदीवर एकदाचे शिक्कामोर्तब झाले आणि प्रारंभीचे साठेखत करून पपांनी संपूर्ण किमतीवरची पाच टक्के रक्कमही कोहिलू कुटुंबास कायदेशीर दस्तऐवज करून देऊन टाकली. साधारणपणे वर्षाच्या आत जमीन खरेदी करण्याबाबत नियोजन करण्यात आले. मामला व्यवस्थित, निर्वीघ्नपणे पार पडला. आता पुढील एक दीड वर्षात बंगल्यात रहायला जाण्याची स्वप्नं आम्ही रंगवू लागलो.

 पण हकीकत हवीच. पप्पांचेच हे वाक्य. साधं कुठे प्रवासाला जायचं असलं वा एखादा कार्यक्रम ठरला असेल, कुणाला भेटायचं असेल तरी ठरलेला प्लॅन रुळावरून व्यवस्थित मार्गक्रमण करेलच याची कधीच हमी नसायची. काहीतरी प्रासंगिक छोटं मोठं विघ्न हे यायचंच आणि त्यालाच पप्पा विनोदाने “आपली हकीकत हवी” असे म्हणायचे.

 जमीन खरेदी बाबतची हकीकत मात्र एक अत्यंत कडवट घाव देऊन गेली. अचानक एका रात्री साऱ्या धोबी गल्लीत निजानिज झाल्यानंतर, आमच्या घराच्या खाली, दारू पिऊन पार नशेत असलेला, झिंगलेला एक माणूस जोरजोरात पप्पांच्या नावाने चक्क अत्यंत घाणेरड्या इंग्लिश शिव्या देऊन बोलत होता.

“ यु रास्कल, बास्टर्ड, सन अॉफ ए विच.. मिस्टर ढगे.. आय विल किल यु.. ”

 माझ्या पप्पांसारख्या संत वृत्तीच्या माणसाला अशा कोणी शिव्या देऊ शकतो यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही आणि हे केवळ त्याच दिवसापुरतं नव्हतं. नंतरचे एक दोन महिने तरी याच स्वरूपात ते कायम चाललं. ते दिवस फार वाईट गेले आमचे. रात्र झाली की आमच्या मनात एक भय दाटायचं. पपांना काही झालं तर? या भयाने आम्ही सारेच थरकापून जायचो.

 कोण होता तो माणूस?

 ज्याच्याकडून आम्ही जमीन खरेदीचा वायदा केला होता त्या पॅट्रीकचा हा वाळीत टाकलेला, व्यसनी भाऊ होता. वास्तविक जमिनीच्या या पैशात त्याचा कायदेशीर वाटा होता आणि तो त्याला दिला गेला नसावा म्हणून त्यांनी हा गलिच्छ, हिंसक, त्रास देणारा, धमकावणीचा मार्ग पत्करला होता आणि त्यात कुठेतरी आम्ही आणि आमचं बंगला बांधायचं स्वप्न विनाकारण भरडत होतं. वास्तविक हा त्यांचा कौटुंबिक मामला होता. त्यात आमचा दोष काय होता पण नाही म्हटले तरी एक माणूस रोज रात्री आमच्या घराखाली उभा राहून नशेत बरळतो, शिव्या देतो, नाही नाही ते बोलतो त्यामुळे आमच्या मध्यमवर्गीय, अब्रू सांभाळून, नीतीने जगणाऱ्या कुटुंबाला नक्कीच धक्का पोहोचत होता. गल्लीतले लोक पप्पांना म्हणायचे,

“ तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर. ”

 हो.. खरं म्हणजे करायलाच हवी होती पण त्यातही एक गंमत होती. या कोहिलूला चार-पाच मुलं होती. त्याची बायको कुठेतरी घरकाम करून या दारुड्याचा संसार ओढत होती. रात्री हा माणूस शिव्या देऊन जायचा आणि एखाद्या सकाळी त्याची फाटकी तुटकी, बापुडवाणी दिसणारी बायको घरी येऊन पप्पांचे पाय धरायची, पोलिसात तक्रार करू नका सांगायची, त्याच्या भावांनी त्याला फसवलंय म्हणायची.. म्हणूनच तो असा बेवडा झालाय. त्याच्या मनात तुमच्याविषयी काही नाही म्हणायची. तो हार्ट मध्ये चांगला आहे असे बजावायची.

 कथा कोणाची आणि व्यथा कोणाला असे झाले होते.

 दारू पिऊन शिव्या देणाऱ्या झिंगलेल्या कोहिलूसमोर, खाली उतरून जिजी उभी राहायची.

“खबरदार! माझ्या बाबाला काही बोलशील तर? तुझ्या त्या क्रूसावरचा गॉड तुला कधी माफ करणार नाही. ”

 पप्पा मात्र शांतच असायचे. खरं म्हणजे त्यांनी त्याचा नुसता हात जरी पकडला असता तरी तो कळवळला असता. कदाचित बेशुद्धही झाला असता पण कुठलाही हिंसक मार्ग त्यांना हाताळायचाच नसावा. ते शांत राहिले. आमच्या भयभीत बालमनांवर मायेचं, धैर्याचं पांघरूण घालत राहिले.

 ॥ चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया॥

जणू काही या संस्कारांचाच प्रयोग आमच्यावर होत असावा.

अखेर एक दिवस पॅट्रीक कोहिलूला दलालातर्फे निरोप धाडून त्याला सारी हकीकत सांगितली गेली आणि हा तुमचा कौटुंबिक मामला असल्यामुळे झालेला जमिनीचा सौदा सामंजस्याने रद्द करावा असा निर्णय त्याला कळवण्यात आला.

पॅट्रिक आणि त्याचे इतर भाऊ पप्पांना भेटायला आले. त्यात हाही होता. पॅट्रीकने पप्पांची पाय धरून क्षमा मागितली.

“ हा जॉर्ज दारूत पैसे उडवतो. त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी नाही म्हणून आम्ही त्याच्या हाती पैसे देत नाही पण त्याच्या हक्काची रक्कम बँकेत सुरक्षित ठेवली आहे जी त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी यावी. तुम्ही सौदा रद्द करू नका. त्याला सांभाळून घेण्याची जबाबदारी आमची. ”

अशा रीतीने ते प्रकरण निस्तरलं. आमच्या माथ्यावरच्या आभाळातला तो काळा ढग दूर झाला. वातावरणात विरघळूनही गेला. सारं काही शांत झालं. एक वादळ आलं आणि ओसरलं. मन थोडं ढळलं, पडलं.

आता मागे वळून पाहताना मनात विचार येतो कुठला धडा शिकवण्यासाठी हे घडलं असेल? एखादे कडू औषध प्यायल्यानंतर बराच काळ घशात कडवटपणा टिकून राहतो ना तसं मात्र झालं …

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सदाफुली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ सदाफुली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

उमलावं हिच्यासारखं…

बहरावं हिच्यासारखं…

ना असते ऋतूंची ओढ ना कधी मावळतीचे वेड…

नसते कधी ईश्वराच्या चरणी…

ना कधी कोणी केसात माळत…

तरीही बहरत राहते स्वतः साठी… अनेक रंगात…

कुठे आहे ती कडे कपारीत, तर कधी छान बगीचात, तर कधी एकटीच उंच डोंगरावर…

असतात कधी सोबती तर कधी एकटी…

तरीही बहरायचं एवढंच माहिती असतं…

मिळणार नसतो कधी मानाचा मुकूट…

ना मिळणार असते कधी कौतुकाची थाप…

असेच येतात अनेक प्रसंग तरीही रहायचं सदाफुलीसारखं नेहमी प्रसन्न…

ना उगवतीची आस ना मावळतीची भीती…

लक्षात ठेवायचं आपण नेहमीच बहरायचं…

आयुष्य जगायचं सदाफुलीसारखं…

 

 

… Always Be Happy… Anytime… Anywhere… In Any Condition

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares