मराठी साहित्य – विविधा ☆ याला जीवन ऐसे नाव… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ याला जीवन ऐसे नाव… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

जीवनाचा अर्थ अनेकजणांनी वेगवेगळ्या पध्दतीने सांगितला आहे. हे सांगताना, त्यांना आलेले अनुभव आणि एकूणच त्यांचे भावविश्व त्यातून दिसून येते.

भारताचे एक ज्येष्ठ क्रिकेटवीर सुनील गावस्कर एका गीतात हे ‘जीवन म्हणजे क्रिकेट राजा’ असं म्हणतात तर ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे’ असं गीतकार अवधूत गुप्ते यांना वाटतं. कुणाला असं वाटतं की, माणसाचं जीवन हे दैवाच्या हातातलं खेळणं आहे. दैववादी लोक असं ‘प्राक्तन’हे महत्वाचं आहे, असं मान्य करतात तर, प्रयत्नवादी ‘तळहातावरच्या रेघा हे आपलं भविष्य ठरवत नाही तर, त्या तळहातामागील मनगट हे आपलं जीवन घडवतं’ असं म्हणतात.

माणूस हा या पृथ्वीवरील सर्वात बुध्दीवान सजीव आहे. आपली बुध्दी आणि कौशल्याच्या आधारे त्याने अनेक अवघड बाबी सहजसाध्य केल्या आहेत. माणसाच्या या कर्तृत्वाला शब्द देताना, ‘माणूस माझे नाव’ या कवितेत बाबा आमटे म्हणतात,

“बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर,

परी जिंकले सातहि सागर,

उंच गाठला गौरीशंकर…

 साहसास मज सीमा नसती,

नवीन क्षितिजे सदा खुणावती,

दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव,

माणूस माझे नाव”.

अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील ‘बीग बी’ म्हणून ओळखले जाते. एक वेळ अशी आली, जेव्हा अमिताभ बच्चन इतके समस्यांच्या दरीत फेकले गेले की, चित्रपट क्षेत्रात त्यांना प्रचंड अपयश आलं, ज्या राजकारणात त्यांनी उडी घेतली होती, तिथेही ते अपयशी ठरले आणि त्यांनी चित्रपटसंन्यास घेतला, चित्रपट निर्मितीसाठी ए. बी. सी. एल्. नावाची जी कंपनी सुरू केली होती तिही डबघाईला येऊन ते दिवाळखोर बनले. कर्जदार घरी येऊन धमक्या देऊ लागले. अशा बिकट प्रसंगी, अमिताभ बच्चन यांनी, यश चोप्रांकडं जाऊन, “मला काम द्या” अशी विनवणी केली. त्यानंतर जिद्द, प्रचंड काम यातून, त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली. आज भारतीय समाजमनावर राज्य करणारे, शतकातील महानायक म्हणून त्यांचा गौरव केला जातो (१).

फाळणीनंतरची अंगावर शहारे आणणारी आणखी एक सत्यकथा…

सीमेजवळच्या एका खेड्यात(जे खेडं बाहेरच्या जगापासून खूप दूर होतं)काही बाहेरच्या लोकांकडून, या गावातील लोकांवर भीषण हल्ला होतो. या नरसंहारात, तलवारीने घायाळ झालेला एक असहाय्य बाप आपल्या १५ वर्षाच्या लहान मुलाला म्हणतो,

“भाग मिल्खा भाग, जीव वाचव, इथून लगेच पळून जा”. वडलांची ती आज्ञा शिरसावंद्य मानून भेदरलेला लहानगा मिल्खा पळून भारतात येतो. वडलांचे अखेरचे शब्द जीवनासाठीचा संदेश मानून, प्रचंड मेहनतीने भारताचा वेगवान धावपटू बनतो. एका अटीतटीच्या धावण्याच्या लढतीत लाहोरमध्ये एका अव्वल पाकिस्तानी धावपटूला तो हरवतो आणि तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रप्रमुख आयुबखान यांच्याकडून  ‘फ्लाईंग सीख ‘ हा किताब मिळवतो (२).

भारतीय मनांवर प्रभाव पाडणारी दोन तत्वज्ञानं काय म्हणतात?

‘तूच तुझ्या जीवनाचा दीप बन (अत्त दीप भव)’ असं गौतम बुद्ध म्हणतात. तर श्रीमद्भगवद्गीता सांगते की, ‘हे माणसा, तूच तुझा उध्दार कर (ऊध्दरेदात्मनात्मानम्)’.

… अशी महावाक्यं किंवा काही यशस्वी ठरलेल्यांचं जीवन जरी सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायक असली तरी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे, आजचा माणूस हा बेटावर एकटादुकटा रहाणारा प्राणी नाही तर, भोवताल (नैसर्गिक पर्यावरण आणि समाज) त्याचे यशापयश ठरवण्यास कारणीभूत असतात. यादृष्टीने तारतम्य बाळगून, निर्णय घेणे शहाणपणाचं ठरतं.

दोन उदाहरणं घेऊ…..

महाभारत काळातील भारतीय संस्कृतीतील एक यशस्वी नायक म्हणून श्रीकृष्णाचे नाव घेतलं जातं. आपलं अंतिम उद्दिष्ट लक्षात घेऊन श्रीकृष्णानं प्रसंगी, ‘रणछोडदास’ असा उपहासात्मक शेराही ऐकून घेतला. अलिकडच्या काळातील एक द्रष्टा राजा, छत्रपती शिवाजी महाराज. अफझलखान नावाचं महाबलशाली आणि तितकेच क्रूर संकट आल्यावरही, उघड्यावर त्याच्याशी सामना न करता, एका रणनितीने खानाचा पराभवच नव्हे तर, खातमा करण्याचं कौशल्य हे असंच अनुकरणीय आहे. म्हणूनच जगात अनेक ठिकाणी महाराजांचा एक कुशल, मुत्सद्दी व्यवस्थापन कलेतील वाकबगार सेनानी या भूमिकेतून अभ्यास केला जातो.

यासाठी, दुर्दम्य आशावाद, नेमकेपणाने ध्येयाची निवड, प्रयत्न यांचबरोबर, आलेले अपयश हा अनुभव समजून, त्यापासून धडा घेऊन, प्रसंगी साधनांना मुरड घालून, काही तडजोडी, तर कधी परिस्थितीशी जुळवून घेऊन, ध्येयाकडं वाटचाल करणं, हे नैसर्गिक शहाणपण ठरतं.

अखेरीस व्यवहारात माणूस जन्मतो तेव्हा श्वास घेऊन; एकदा का तो श्वास बंद झाला की, माणूस मरतो.

श्रेष्ठ मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या शब्दांत;

‘अरे जगनं मरनं,

एका सासाचं अंतर’.

…… म्हणून लढण्यासाठी, जिवंत रहाणं हे श्रेष्ठ मूल्य ठरतं.

(संदर्भ: १ आणि २- आर. जे. कार्तिक यांची व्याख्याने.) 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझा बाप्पा… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ माझा बाप्पा… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

गणपती बसवायचं ठरवलं तेव्हाची गोष्ट … कोणाला विचारायला गेलेच नाही

रीती रिवाज घराणं परंपरा…… नकोच ते … माझ्या मनालाच विचारलं

 

प्रत्यक्ष देवाला घरी आणायचं मग भीती कशाची? सुबक छानशी पितळी मूर्ती घेऊन आले

लहानगी दोन्ही नातवंड एकदम खुष.. त्यांनी आरास केली.. हौसेनी बाप्पाला सजवलं.

पूजा नैवेद्य आरती अथर्वशीर्ष यथासांग झालं

 

नंतर विसर्जन…..

अहो ते तर मोठ्या पातेल्यातच … ते पाणी घातलं तुळशीला

एक सांगू ? विसर्जन कशाचं करायचं ते आता नीट समजलं होतं…

 

परत बाप्पा जाऊन बसले जागेवर.. राहू देत की घरीच…. नाहीतरी मी काय करते हे बघायला घरात कोणीतरी मोठं हवंच ना..

 

हे करताना विचार केला होता … 

चौकटी असतातच.. वापरून वापरून थोड्या झिजतात खराब होतात.. बेढब दिसायला लागतात

अट्टाहासानी तशाच का ठेवायच्या ? बदल करायला हवा ना.. ‘ राहु दे.. तशाच ‘… म्हणणारे असतील

तरी विचार करून त्या बदलाव्या, नीट नेटक्या कराव्या, नविन कल्पनांनी अधिक देखण्या सुंदर दिसतील

हळूहळू शहाणपण येत जातं. आपल्याही मनाला न दुखवता बदल सुचतो आपला आपल्याला.. अनेक ठिकाणी आवश्यक असलेला … चौकटीत राहुनच आपण केलेला … कुणाला न भिता केलेला … आणि 

तो खराखुरा आनंद देतो

गणपती बाप्पाला आपण काय प्रार्थना करतो….

” प्रारंभी विनती करू गणपती विद्या-दयासागरा 

अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा “

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझी आदर्श उपासना… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

माझी आदर्श उपासना… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

मी माझ्या आज्जीला फार वर्षांपूर्वी विचारले होते की, ‘ तुम्ही कोकणात असताना गणेश उत्सव कसा साजरा करायचात? ‘ 

ती म्हणाली, ‘तो उत्सव नसतो ते एक व्रत असत, चतुर्थीच्या दिवशी स्नान करून नदीवर जायच – 1, नदीतली माती घेऊन – 2 एका स्वच्छ जागेवर यायच- 3. त्या मातीतील जास्तीच पाणी सुकू द्यायच – 4, मातीतला कचरा, कुडा बाजूला करायचा – 5. नंतर त्या मातीतून गणपतीची मूर्ती बनवायची – 6, तीथेच उपलब्ध फुले, दुर्वा, अक्षता, हळद-कुंकू वाहून पूजा करायची – 7. उपलब्ध वेळेनुसार आरती, स्तोत्र, जप, ध्यान करून, 8 त्या मूर्तीचे नदीत विसर्जन करायचे 9 आणि घरी यायचे10. कोकणात सर्वच सणांना मोदक केले जातात तसे सवडीनुसार मोदक करुन, गणपतीचे प्रतिक म्हणून ब्राह्मण भोजन घालावयाचे’.

… आजवर या विषयावर मी विचार केला आणि काही पौराणिक माहितीही वाचली. त्यातून माझे एक मत तयार झाले आहे. ते कदाचित अशास्त्रीय, अतार्किक, अवास्तव आहे असेही काही लोक म्हणतील, पण ते माझे मत – माझे आहे आणि मला ते फार प्रिय आहे.

साऱ्या देवतांच्या पूजा, उपासना किंवा व्रत का केली जातात? 

… त्यांची कृतज्ञता वा आदर व्यक्त करण्याकरता केले जाते. आपण अनेक कारणांनी अनेकांची कृतज्ञता वा आदर व्यक्त करतो, त्याकरता आपण वेळ, काळ व अन्य उपलब्ध साधने यानुसार ते व्यक्त करतो. प्रत्येक माणसाने एकच पध्दत वापरावी हा आग्रह नसतो. ज्याची जशी पात्रता असेल, उपलब्धता असेल तसे आपण स्विकारतो. मग देवांच्या पूजांबाबत, उपासनांबाबत एवढा आग्रह का?….. देवता असोत, आदर्श व्यक्ती असोत त्यांची उपासना नियमितपणे करावी असे माझे मत आहे, पण त्याकरता, बाह्य पूजाविधीचीच जरुरी आहे असे मला तरी वाटत नाही. मानस उपासना जास्त प्रभावी ठरते, कारण बाह्यपूजा अहंकार वाढवतातच शिवाय त्या करताना वेळ, शक्ती आणि अन्य अनेक गोष्टींचा बरेचदा अपव्यय होतो.

(निर्माल्य, देवाला वाहिलेल्या, किंवा सजावट केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करणं – किमान शहरात तरी किती अवघड आहे.) 

याहीपेक्षा आणखी एक गोष्ट मला महत्वाची वाटते, ती म्हणजे प्रत्येक देवता व व्यक्तींच्यातील गुणांचा विकास आपल्यामधे (भक्तांमधे) कसा होईल? प्रत्येक सच्चा धार्मिक मनुष्य स्वत: विकास करुन घेण्यास झटत असतो, आणि हा विकास उत्तम प्रकारे व्हावा याकरताच तर भारतीय परंपरेने चारी पुरूषार्थांची संकल्पना मांडली.

या विकासातील आदर्श तत्वांचा समुच्चय म्हणजे विविध देवता आणि त्यांची चरित्र आणि चारित्र्य होत. अशांची उपासना करायला हवी, आणि माझ्या आज्जीनं सांगितलेली व्रतपध्दती त्या अर्थाने मला फारच मोलाची वाटते…..

1) नदीवर जावे – नदी हे आपल्या सतत वाहणाऱ्या मनाचे प्रतिक आहे. (ओशो रजनिश मनाला ‘minding’ म्हणायचे. ) आपल्याच मनाचे निरीक्षण करावे.

2) नदीतील माती घ्यावी – आपल्याच मनातील काही बाबींचे निरीक्षण विशेषपणे करावे.

3) स्वच्छ जागेवर यायचं – जेथे मन शांत आणि स्तब्ध होण्यास मदत होते अशा ठिकाणी रहावे.

4) जास्तीचं पाणी सुकू द्यायचं – आपण अनेक नको त्या गोष्टींना (आग्रहांना, जाहिरातींना, सजावटींना) बऴी पडतो, अनेक गोष्टींची भुरळ पडते आणि मनामागे, इंद्रिये आणि आपल्या साऱ्या उर्जा धावतात, त्यांची धाव कमी करण्याचा प्रयत्न करायचा.

5) मातीतला कचरा, कुडा बाजूला करायचा – हे सार करताना आपल्यातील दुर्गुणांची ओळख पटू लागली की त्यांना लगेच दूर करण्याचा प्रयत्न करायचा.

6) त्या मातीतून गणपतीची मूर्ती बनवायची – आपल्यातील दुर्गुण (मत्सर, द्वेष, दुर्वासना, पूर्वग्रह, अज्ञान) आणि प्रवाहीपण नाहीसे झाल्यावरच स्वत:तील उत्तम गुणांचा विकास होतो.

 …. आता गणपतीच का? (माझाच जुना प्रश्न) – लंबोदर – अत्युच्च सहनशक्तीचे प्रतिक (so do Happy man) लांब नाक, मोठे डोळे, मोठे कान – ज्ञानेंद्रियांच्या (समजशक्तीच्या) अत्युच्च विकासाचे प्रतीक. ज्यांची सर्व प्रकारची सहनशक्ती व इंद्रियशक्तींचा विकास झाला तरच आपल्यातील गुणांचा पूर्ण विकास होतो आणि आपणच देवांप्रमाणे लोकांकरता आदरणीय व पूजनीय ठरतो.

7) तिथेच उपलब्ध फुले, दुर्वा, अक्षता, हळद-कुंकू वाहून पूजा करायची – आपल्यातीलच नव्हे तर अन्य वस्तूतील उत्तम गुणांची आपल्या व्यक्तीमत्वाला जोड द्यायची, किंवा असेही म्हणता येईल की आपल्याला लाभलेल्या साधनांचा आदराने वापर करायचा.

8) उपलब्ध वेळेनुसार आरती, स्तोत्र, जप, ध्यान करणे – एकदा विशिष्ट स्थान निर्माण केल्यावर, त्या स्थानावर टिकून राहण्याकरता तप करावे लागते. (रामकृष्ण परमहंस याबाबतीत फार आग्रही होते.) स्तोत्र, जप, ध्यानाद्वारे स्वत:लाच परत परत उत्तम गुणांची आठवण करून द्यावी लागते.

9) त्या मूर्तीचे नदीत विसर्जन करायचे – आपल्यातल्या विकासामुळे हुरळून न जाता, आपल्या मर्यादा आणि अन्य सर्वच जीव आणि अजीवांचे भान ठेवायचे

10) आणि घरी यायचे — हे सारे करताना आपले नित्यकर्म सोडायचे नाही.

जगातील अगणित देवतांची अशीच उपासना करता येईल असे मला वाटते.

मला अशी उपासना आवडते, पहा ! तुम्हाला आवडते का ?

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मातृदिन…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “मातृदिन” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस “पिठोरी आमवास्या ” म्हणजेच “मातृ-दिन ” आहे.

ह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा आहे. आई-मुलाच नातं म्हणजे “वैश्विक नाते “. कारण आई मुलांचे सर्वस्व असते, आई मुलांचे विश्व असते. Mothers Day सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी आईच्या पाया पडावे. खरं तर आई- वडीलांच्या रोज पाया पडणे हे मुलांच कर्तव्य. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात ते घडत नाही, त्याची अनेक कारणं आहेत. पण किमान मातृ-दिना निमित्त आपण आपल्या आईच्या पाया पडुन तिचे आशिर्वाद घेऊया. कारण तिच्यासाठी हेच खूप मोठ गिफ्ट असेल❗

श्रावण महिन्यात येणाऱ्या या पिठोरी अमावास्येला कुषोत्पतिनी अमावस्या असेही म्हणतात. तसेच या दिवशी “बैल पोळा ” सण देखील साजरा केला जातो❗

मे महिन्याचा दुसरा रविवार ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करण्याची विदेशी पध्दत. कार्ड, फुले, केक ई. रेडीमेड भेटवस्तूंच्या माध्यमातून ‘मदर्स डे’ साजरा करतात. पण आपला पारंपारीक ‘मातृ-दिन’ म्हणजे श्रावणी अमावस्येचा दिवस, अर्थात पिठोरी अमावस्या. भारतीय मातृदिनाच्या या संकल्पनेत ‘रेडिमेड’ गोष्टींचा समावेश नसतो. म्हणून पिठोरी पूजनात सर्व काही नैसर्गिक असते.

करडू, तेरडा, गाजरा, पेवा, कललावी सह अनेक प्रकारची रानफुले रानातून आणली जातात. पूजेसाठी तांदळाऐवजी वाळू वापरतात, दिवेही पिठाचे बनवतात, घरातील मुलगा पिठोरीचे पूजन मांडतो. त्या वेळी हातात लव्याचा (लव्हाळे )कडा आणि आंगठी घातली जाते. केळी आणि काकडीचा प्रसाद दाखवला जातो. धातूच्या ताटाऐवजी केळीच्या पानांचा नैवेद्यासाठी आणि पंगतीसाठी उपयोग करतात. खिरीचा नैवेद्य असतो….. सर्व काही स्वकष्टाचं आणि निसर्गासह भारतीय संस्कृतीला साजेसं. लोकगीते आणि पारंपारीक फेऱ्यांचा नाच करून रात्र जागवतात❗

विशेष करून आगरी कोळी समाजात हा ‘मातृ-दिन’ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कारण हा समाज पूर्वी ‘मातृसत्ताक’ होता. आईच्या गौरवार्थ अनेक सण आणि उत्सव या समाजात असतात याचे आश्चर्य वाटायला नको. आगऱ्यांच्या प्रत्येक गावी गावदेवीच्या रूपात आईचे मंदिर असते. गावोगावी आईच्या जत्रा मोठ्या उत्साहात होतात❗

रेडिमेड वस्तू भेट देवून साजऱ्या होणाऱ्या ‘मदर्स डे’ पेक्षा आपला पारंपरिक ‘मातृ-दिन’ जास्त अर्थपूर्ण वाटतो. ‘मदर्स डे’ जरूर साजरा करा … पण ‘मातृदिन’ विसरू नका.

“पिठोरी आई ” सर्वांना सुखासमाधानात ठेवो ‼

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

(शिक्षक दिन विशेष) 

शिक्षक आणि समाज, गाव याचे खूपच निकटचे संबंध असतात. पुर्वी खेड्या-पाड्यातून गावातील शिक्षकांना लोक खुप मानत असत. गावात होणाऱ्या अनेक घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचा आवर्जून सहभाग होत असे. अनेक बर्‍या-वाईट प्रसंगात शिक्षकांचा सल्ला घेतला जायचा. इतकेच काय फार पुर्वी गावात एखांद्याचे पत्र आले तरी लोक ते पत्र गावातील शिक्षकांकडून वाचून घेत असत. घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचे आदरातिथ्य पण मोठ्या कौतुकाने होत असे. इतके समाजात शिक्षकांचे महत्त्व होते.

आज बदलत्या काळानुसार लोक बदलले. आणि समाज बदलत चालला आहे. आज समाजात पुर्वी असणारे शिक्षकांचे स्थान कुठेतरी मावळताना दिसत आहे. तरी सुध्दा मला एका गावाची गोष्ट मोठ्या कौतुकाने सांगावी वाटते. सांगली जिल्ह्य़ातील शिराळा तालूक्यात उत्तरेकडे पणुंब्रे-घागरेवाडी हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक गाव आहे. खरोखर या गावाला ‘ आदर्श शिक्षकांचा ‘ गाव असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही. तुम्ही या गावाला भेट द्याल तर प्रत्येक गल्लीत एक तरी आजी -माजी शिक्षक तुम्हास भेटतीलच. आणि या सर्वच शिक्षकांचे गावच्या शैक्षणिक विकासात खूपच मोलाचे सहकार्य आहे.

या गावात जुन्या काळातील शिक्षक बी. एम. पाटील गुरूजी, एम. जी. पाटील गुरूजी, तसेच पांडुरंग घागरे गुरूजी, रंगराव भोसले गुरुजी, तानाजी परीट गुरुजी, आणि आदर्शतेचा वारसा जपणारे, अत्यंत शिस्तप्रिय असे तुकाराम बळवंत पाटील (तात्या गुरुजी) आजही त्यांचा आदर्श आणि शिस्त विद्यार्थ्यांमध्ये आहे, तसेच प्रसिद्ध कीर्तनकार मा. पी. सी. पाटील सर ( मराठीचे प्राध्यापक ), एम. टी. घागरे सर, कै शामराव पाटील गुरूजी, इत्यादी अनेक शिक्षकांचा वारसा या पणुब्रे-घागरेवाडी गावास लाभला. या सर्व गुरुजनांनी घडविलेले अनेक विद्यार्थी व याच गावचे सुपुत्र देशात व देशाबाहेर देखिल चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. गावातील मुले-मुली आज संपुर्ण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, देशसेवेत, क्रिडा, कला, वैद्यकीय, वैज्ञानिक, औद्योगिक अशा प्रत्येक क्षेत्रात या गावातील अनेक युवक-युवती कार्यरत आहेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. हे सर्व श्रेय या गावच्या शिक्षकांचे आहे या सर्व शिक्षकांनी फक्त चार भित्तीच्या आत शाळेतच विद्यार्थी घडविले नाहीत तर ते सदैव गावचा विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, पंचक्रोशीत गावाचे चांगले नाव असावे म्हणून ही सर्व शिक्षक मंडळी सदैव झटत राहिले. आज या सर्व माजी शिक्षकांचे कितीतरी विद्यार्थी सेवानिवृत्त आहेत. पण गावात वावरताना समोरून त्यांचे हे सर्व माजी शिक्षक भेटले तर त्यांच्याबद्दलाचा तोच आदर, आणि आपले गुरूजी म्हणून त्यांच्याबद्दल तोच सन्मान नजरेत असतो. हेच या गावातील सर्व माजी शिक्षकांच्या ज्ञानाचे फळ आहे. पणुंब्रे-घागरेवाडी येथील दोन्ही मराठी शाळांना ‘ स्वच्छ सुंदर शाळा ‘ आणि ‘आदर्श शाळा ‘ असे पुरस्कार प्राप्त आहेत.

आज याच माजी शिक्षकांच्या आदर्शतेचा वारसा पुढे नेणारे याच गावचे अनेक आजी शिक्षक आहेत. या गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा. बाजीराव पाटील सर, पणुंब्रे मराठी शाळेत असणारे शिराळा तालूक्यात आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचा सन्मान आहे ते मा. विलास घागरे सर, तसेच अशोक तातोबा घागरे सर, गावातीलच मा. यटम सर, इ. कितीतरी माजी शिक्षकांचे विद्यार्थी असणारे हे सर्व आजी शिक्षक गावच्या शैक्षणिक, , सामाजिक, तसेच सांस्कृतिक विकासासाठी झटत आहेत. हे सर्व आजी शिक्षक या माजी शिक्षकांचेच विद्यार्थी आहेत.

तसेच पणुंब्रे गावच्या पहिल्या महिला शिक्षिका कै. सावित्री भोसले पाटील मॅडम (पाचुंब्री), घागरेवाडीच्या पहिल्या शिक्षिका सध्या शिराळ्यात कार्यरत असणार्‍या आदर्श शिक्षका सौ. अनुराधा पाटील -घागरे मॅडम(बिऊर), सौ. जयश्री पाटील मॅडम, मुंबई येथे प्रिन्सिपल असणाऱ्या सौ. कविता पवार – भोसले मॅडम(ऐतवडे), प्रा. सौ. गीतांजली पाटील मॅडम या सर्व शिक्षिका याच गावच्या माहेरवाशीण आहेत त्या सुध्दा आपल्या सासरी जाऊन आदर्श शिक्षकेचा वारसा जपत आहेत तो याच गावचा आदर्श ठेवून.

खरोखर या पणुंब्रे-घागरेवाडी गावचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात या सर्व आजी-माजी शिक्षकांचे ज्ञानदानाचे योगदान खुपच अमुल्य आहे. हे सर्वजण शिक्षक म्हणून गावाला लाभले हे या गावचे श्री भैरवनाथ कृपेने मोठे भाग्य आहे. म्हणून म्हणावे वाटते ” ज्या गावाला, समाजाला चांगले शिक्षक लाभले तो गाव विकासापासून कधीच दूर रहात नाही. “

मोठ्या अभिमानाने शेवटी लिहावे वाटते, असे शिक्षकांचे गाव मला माहेर म्हणून लाभले हे मी माझे थोर भाग्य मानते. येथील शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचीच ही माझी शब्दपुष्पे शुभेच्छा म्हणून या सर्व शिक्षकांना देत आहे.

“शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा”

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी  ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸  विविधा  🌸

☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

कृष्णा! तू अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितलीस आणि त्याचा मोह दूर केला व युद्धासाठी प्रवृत्त केलंस. कशाला रे! त्याने तर तुला म्हंटलं होतं नं? मला राज्यही नको व राज्याचा उपभोगही नको! मग तुला का सांगावसं वाटलं “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः।” अन्याय सहन करण्याचा पायंडा पडायला नको. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो, म्हणूनच नं!

आमची पुण्यभू ‘भारतमाता’ अजूनही आम्हाला प्रियच आहे. पण आमच्यात अजूनही हिंमत आलेली नाही की कुणी धर्माचं नाव सांगून आमच्यावर अत्याचार करत असेल तर आमच्याही धर्मातच कृष्णानी सांगून ठेवलंय की अन्याय झाला तर प्रतिकाराला सज्ज रहा म्हणून! तसेच कुठलाही दाखला, आवश्यक कागदपत्र मिळविण्यासारख्या छोट्या छोट्या हक्काच्या गोष्टींपासून लाच देत रहातो आम्ही, अन्याय सहन करत रहातो आम्ही. काही वाटेनासं झालंय आम्हाला त्याचं!

अर्जुनाच्या मिषाने आम्हाला पण सांगितलं आहेस तू; “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”  पण तुला दैवत मानतांनाही कानाडोळाच करतो आम्ही त्याच्याकडे! लोकांचं राज्य आहे म्हणतांनाही आम्हाला मनासारखं ‘खातं’ मिळालं नाही तरी सिंहासन गदागदा हलवतच रहातो आम्ही! आम्हाला पाहिजे ते खातं मिळवून, त्याचं फळ स्वतः खाऊन मुलाबाळांसाठीही राखून ठेवायचंय नं! माखनचोर कृष्णाची दहिहंडी पहा किती उत्साहात साजरी करतो आम्ही?पण अहमहमिका पहा कशाची सुरूं आहे!तू माखनचोरीचा पायंडा घातला कशासाठी?सगळ्या गोरगरीब मुलांना ते माखन मिळून राष्ट्रकार्यासाठी त्यांचं पालनपोषण योग्य व्हावं व समान वाटप व्हावं म्हणून!आम्ही मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायलाही सज्ज आहोत! कुणाकुणाला कौरवांसारखी शिक्षा होते, ते मात्र आम्हाला कधीच कळत नाही. आमचे आजचे गुरूकुलंही भ्रष्टाचारात मागे नाहीत बरं!

दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या द्रौपदीला वस्त्र पुरवायला तू तातडीने धावून गेलास. आज कितीतरी ‘द्रौपदी’ उद्ध्वस्त होतांना दिसताहेत. भर सभेत मान खाली घातलेले तिचे पती, तिचा मान राखायलाही पुढे सरसावले होते नंतर. तिचे पातिव्रत्य नाही नाकारले त्यांनी! आज मात्र अशा अन्याय झालेल्या ‘स्त्री’लाच खाली मान घालून जगावे लागते. नाहीतर ‘अरुणा शानबाग’सारखं उद्ध्वस्त होऊन जगावे लागते तिला.

अशा कितीतरी गोष्टी आहेत रे कृष्णा! पण तू म्हंटलं आहेस नं! 

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।”

मग आम्ही सारे अर्जुन झालो आहोत आणि तुझा जन्मोत्सव साजरा करतोय दरवर्षी. तू जन्म घ्यायची वाट बघत बसलो आहोत. दंग मात्र उत्सव साजरा करण्यातच आहोत. अरे बाबा, तू कृष्ण भगवान म्हणून ज्याच्या पाठीशी उभा राहिलास, ज्याला लढायला प्रोत्साहित केलेस, त्या अर्जुनाच्या अंगात लढण्याची धमक होती. पण आज एखादा कृष्ण उभा राहिला तर त्याला चहूं बाजूंनी घेरून नामोहरम कसे करायचे याची अहमहमिका लागली असते आमच्यात! त्यासाठी आम्ही सारे अर्जुन एक होतो. कारण तुझ्या दहिहंडीतून बाहेर आलेलं दही दुसर्‍या कोणाला घेऊ द्यायचे नसते नं आम्हाला!

त्यापेक्षा आता तू असंच कर!आम्हाला सगळ्यांनाच ठणकावून सांग!”धर्माला ग्लानि यायला तुम्ही सगळ्यांनी हातभार लावायचा. अन मी येऊन धर्माची संस्थापना केल्यानंतर तुम्ही परत गोंधळ घालायचा का? माझ्या एकट्यावर जबाबदारी का टाकता?घ्या सगळेच आपापल्या वाट्याचा जबाबदारीचा हिस्सा! सगळ्यांच्याच अंतःकरणात कृष्ण जन्म घेऊ द्या! मग कृष्ण जन्म घेण्याची तुम्हालाच ‘युगे युगे’ वाट बघावी लागणार नाही. “

कृष्णा तू खरंच असे ठणकावून सांग! आणि हो, या सगळ्यांमध्ये मी पण आहे बरं का? मी तरी कुठे काय करत असते?

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी 

फोनची रिंग वाजली म्हणून फोन उचलला तर पलीकडून अंजूचा आवाज उर्मी उद्या माझ्याकडेबरोबर पाच वाजताभीशि आहे पण वेगळी हं! म्हणजे हिरवी मिशी! सर्वांनी हिरवे पोशाख परिधान करून या सगळे हिरवे! मी पदार्थही हिरवे करणार आहे तिची ती भन्नाट कल्पना ऐकून मी पांढरी फटक पडायची वेळ आली. मी म्हंटल बर बर येते बाई !

फोन खाली ठेवल्यापासून डोक्याला हिरवाईने घेरलं…. साडी हिरवी. कुंकू हिरवं.. कानातले गळ्यातले हिरव्या खंड्यांची अंगठी.. हिरव्या वादीची चप्पल, बांगड्या, हिरवी साडी हिरवी पर्स !माझा हा सगळा जामानिमा पाहून हे म्हणाले, ” आता हिरवी लिपस्टिक लाव म्हणजे ध्यान दिसशील” एवढ काही नको हं हे एवढ छान केलय तुम्हाला मेल कौतुकच नाही! या वाक्याने आमचा संवाद संपला…?

मंजूकडे गेले बंगल्याच्या फाटकासमोर हिरव्या पानांची सुंदर रांगोळी काढली नव्हे गालीचा होता. मध्ये फक्त थोड्याशा रंगीत पाकळया दारावर आंब्याचं तोरण आणि हिरव्या वाटाण्यानी सजवलेली नक्षीदार महिरप… फार सुंदर सजलं होतं दार ! दोन्ही बाजूला सुंदर हिरव्या कुंड्या त्यात डेरेदार उंच मयुर प्लॅन्ट… दारात हिरवी पायपुसणी हॉलमध्ये हिरवे पडदे…. सोफ्याला हिरवे कव्हर हिरव्या नक्षीदार छोट्या उषा खाली हिरवा गालीचा पसरलेला हिरव्यागार छोट्या छोट्या छोट्या पोपटांचे कॉर्नर्स हँग केलेले. एका भिंतीवर हिरव्या फॅनेलचा बोर्ड त्यावर हिरव्या रंगाचे वर्णन असलेल्या गाण्याच्या दोन दोन ओळी लिहिल्या होत्या आणि त्या हिरव्या पानांनी पिनअप केल्या होत्या हिरव्या हिरव्या रानात;

हरियाली और रास्ता; हिरवे हिरवे गार गालीचे…. इत्यादी सारखी गाणी होती ! माझ्या अंजूच्या घराची ती हिरवाई न्याहाळतांना मी थक्क झाले आणि तिचं कौतुकही वाटले. इतक्यात अंजू बाहेर आली बाई ग.. मी तर बघतच राहिले! गोरीपान अंजू.. हिरवी पैठणी.. हिरवे दागिने.. सुंदर हेअरस्टाईल त्यावर हिरवा बो आणि त्यावर हिरव्या पानांची फुल करून माळलेला गजरा मध्ये फक्त चार शुभ्र फुले होती. दागिने सुंदर होते आणि सगळे हिरव्या रंगांना धारण करणारेही होते! मी तर बाई बघतच राहिले….. ! पाठोपाठ तिची मुलगी आली तिनेही हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला. “बाई समद झालया नव्ह” असं म्हणत दोन कामवाल्या बाया बाहेर आल्या त्यांनी हिरवी इरकली लुगडी नेसली होती. हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.

हळूहळू सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या प्रत्येकीच्या एंट्रीला कुतूहल !अय्या काय गोड दिसतेस! किती सुंदर! झकास! टाळ्या काय न वाजणाऱ्या शिट्या काय….. प्रत्येकीची एन्ट्री दणाणून सोडत होती. प्रत्येकीच्या बौद्धिक क्षमतेची जणू परीक्षा होती. इतक्यात हिरव्या टी शर्टचा तिचा मुलगा बाहेर पडला आणि आम्हा सर्वांवर नजर फेरीत म्हणाला, ” मम्मा कोण म्हणतंय कि सोलापुरात यंदा कमी पाऊस झालाय “असं म्हणत त्यांना पोबारा केला. आम्ही खूप हसलो! वेलकम ड्रिंक म्हणून तिने वाळ्याचे सरबत ठेवले होते सुंदर हिरव्या ट्रेमधून हिरव्या रंगाच्या ग्लासामध्ये, त्या ग्लासाला छोट्या हिरव्या छत्र्या हिरवे सुंदर स्ट्रॉ वर्ती हिरव्या पुदिन्याची पानं पेरलेली होती पेय सुंदर रंगतदार होत… !

खूप गप्पा झाल्या काही गेम्स झाले शेवटच्या गेममध्ये एका हिरव्या प्लास्टिकच्या डिशमध्ये खूप नाणी होती ती हातानी उचलायची.. किती प्रयत्न केला तरी एक दोन चार नाण्याच्या वर जास्त मजल जात नव्हती आम्ही जिंकलेली सर्व नाणी एका हिरव्या बटव्यात एकत्र केली.

मग आले खाद्यपदार्थ सुंदर हिरव्या पत्रावळींचे डिझाइन असलेल्या डिशेश त्यात पालक पुलाव त्यावर खोबरं पलीकडे हिरव्या कोथिंबिरीची खोबऱ्याची चटणी हिरव्या मटारची उसळ पालक पुरी आणि हिरव्या रंगाची पिस्ता बर्फी…. अहाहा… बेत चवदार लज्जतदार तसा रंगतदार ही होता !

खाणे पिणे झाले शेवटी पिस्ता आईस्क्रीमचे सुंदर कप त्यावरचा पिस्ता खाताना खूपच मजा आली अंजूच्या कल्पकतेचे कौतुक प्रत्येकजण तोंडभरून करत होता इतक्यात हिरव्या सुबक केळीच्या पानात मस्त हिरवेगार गोविंद विडे आले… मी म्हणाले अंजू पुरे ग किती धक्के देशील? ती म्हणाली थांबा तिने आपल्या सहकारी मावशांना बोलावले आणि मगाचे हिरवे बटवे आमच्या काही ज्येष्ठ भगिनींच्या हस्ते त्या महिलांना बक्षीस म्हणून दिले त्यांनाही खूप आनंद झाला या तिच्या कृतीने आम्ही भरून पावलो म्हणजे या सुंदर प्रसंगाला एक छान भावनेची बाजूही होती आणी ती हिरवी कंच होती अंजूच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करीत मिळालेल्या नवीन कल्पनेचा सुखद हिरवट गारवा अंगावर लपेटत मी घरी आले ओठावर गाणं होतं हिरव्या हिरव्या रानात ——-

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जरासं बदलून बघा ना…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “जरासं बदलून बघा ना…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर दोघेही वकील आहेत. तीनी पितळेचा किंवा चांदीचा गणपती घेऊ म्हटलं तर ते म्हणाले,

” नाही…. मला चालणार नाही. यावर नोऑर्ग्युमेंट”

ती म्हणाली 

“लग्नाला 50 वर्षे झाली आहेत पण घरातल्या निर्णयात कायम तेच जज्ज…. ते म्हणतील तेच फायनल…..

मी बोलू पण शकत नाही. ऊगीच वाद नको. म्हणून गप्प बसायच. “

हं………

 

मीनाचे मिस्टर बहात्तर वर्षाचे आहेत. ते म्हणाले 

“मला एकदम पटलं पण दादा काय म्हणेल?”

दादा म्हणजे त्यांचे भाऊ वय वर्ष 76

मीना म्हणाली 

” दादाला भीत भीतच यांच आयुष्य गेलं. पुढचंही जाणार… यांना निर्णय क्षमता कधी येणार कोण जाणे?

दरवेळेस दादा काय म्हणेल……. “

……..

नानांनी तर डिक्लेअरच केलं

” मी मेलो की काय करायचं ते करा… “

……….

बहुतेकांचं म्हणणं असं की सगळं पटतं पण भितीच वाटते….

काही विपरीत झालं तर…

त्यापेक्षा नकोच ते…..

 

वसुधा म्हणाली” माझा मुलगा आणि सून किती वर्ष म्हणत होते. पण माझाच विरोध होता. खरंतर कारण असं काहीच नाही. पण होता..

पण आता एकदम कसा होकार द्यायचा ? “

 

लिली चा फोन आला

” मावशी यस यु आर राईट.. पण नंतर गर्दी होईल म्हणून मी आधीच ऑनलाईन गणपती बुक केला होता. त्यांनी कालच डिलिव्हरी दिली आहे. आता नेक्स्ट टाईम मी पितळेचा घेईन…. “

 

जया म्हणाली 

“आमच्या पप्पांच मम्मींसमोर काही चालत नाही. त्यांना खरतर हे आवडलं असतं. मी त्यांच्याशी बोलले. पण ते म्हणाले मम्मीला चालणार नाही काही बोलू नकोस…. “

 

चार वर्षांपूर्वीची गोष्ट आशाकडे चांदीचा गणपती होता. तिनी चौरंग आणला. त्यावर गणपती बसवला. हार घातला. समया, निरांजन, लावलं. लाईटची माळ लावली. छान डेकोरेशन करून सजवलं.

पण नणंद बाई रागवल्या,

“हे काय चाललय तुझं ?आपल्याकडे गणपती बसवत नाहीत तू हे काय नवीन सुरू केलेस? इत्यादी……. “

झालं….

तेव्हापासून बंद..

 

अमेरिकेत असलेल्या अमोलंनी आईला विचारलं ती म्हणाली

” गणपती बसव, गौरी कर, नवरात्र घाल, काय वाटेल ते कर तू थोडंच माझ ऐकणार आहेस ?… “

थोडक्यात काय तर……

 

दोन वर्षांपूर्वी सुधानी मेटलचा गणपती आणला.

तिची नात जाम खुश झाली.

बाप्पा बाप्पा म्हणत हातात घेऊन नाचली. मग शेजारी झोक्यावर बाप्पाला घेऊन बसली.

तिच्या बाबांनी बाप्पासाठी छोटा झोपाळा आणला. तिनी तो सजवला. बाप्पाला त्यात बसवल.. फोटो काढले…

नात खुष झाली….

 

बाप्पाला आपण म्हणतो 

“आम्हाला सुखात.. आनंदात ठेव…. ” खरंतर तसं राहणं बरंचस आपल्याच हातात आहे. सगळंच कशाला देवावर सोपवायचं?

थोडा प्रयत्न आपणही करू या की.

 

काय खरं की नाही?

मग म्हणा की

” गणपती बाप्पा मोरया…. “

आणि थोडं बदला की……

ज्यांना जमेल त्यांनी घरी मातीचा गणपती करा. घरीच विसर्जन करा. आता काही शाळेतही शिकवतात. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात.

 

श्री शंकराचार्यांनी लिहिलेलं

” श्री गणेश पंचरत्न स्तोत्र “खूप छान आहे.

यावर्षी ते पाठ करा. मी म्हटलेलं तुम्हाला पाठवत आहे तुम्हाला युट्युब वर मिळेल.

बाप्पाला तुम्ही समोर बसून मनापासुन म्हटलेलं आवडेल.

 

बदल कशाचा, कधी, कसा करायचा हे समजलं की आपले आपण आनंदात राहतो.

बघा प्रयत्न करुन….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आनंदी राहण्याची जादू…” – लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई) ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “आनंदी राहण्याची जादू…” – लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई) ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

हा एक प्रयोग समजा. कोणतंही एक लहानसं काम घ्या.

उदा. एका शर्टाला इस्त्री करणे, कपाटात पुस्तकं नीट लावणे, टिव्ही स्वच्छ पुसणे, सुरेख कांदा चिरणे… अट एकच ते काम तुम्ही मन लावून आपल्याला जितकं चांगलं येतं तितकं चांगल करायचं आहे. बिनचूक… दिसायला सुंदर… !

आता ते काम झाल्यावर आतून जे वाटतं ते अनुभवा, तो असतो आनंद. कधीकधी पहा आपण स्वतःशीच हसतो सुद्धा. आपण थोडं मागे जातो, कामाकडे पहातो आणि आपण खूश होतो. घर आवरल्यावर स्त्रिया घरभर नजर फिरवून तृप्त होतात किंवा आपली कार धुऊन चकचकीत झाल्यावर पुरुष पहात बसतात.. ! लहान मुलं तर काही तयार केल्यावर नाचतातच… !

हे काय आहे ? हा आनंद आतून येणारा… आतल्या चैतन्याला काम आवडल्याचा… !

हा आनंद बेस्ट मोटिवेशन आहे. बाहेर काही शोधायची गरज नाही. मला हा सापडलाय. सुरुवातीला हा आनंद खूप सुक्ष्म असतो; पकडावा लागतो. एकदा दिसू लागला की वाढत जातो आणि आपण अक्षरशः त्यात भिजून जातो. करायचं काय ? तर वरील पध्दतीने काम केल्यावर क्षणभर थांबायचं आणि आत कसं वाटतंय ते पहायचं, अनुभवायचं; मग दुस-या कामाकडे जायचं.

सकाळी उठल्या उठल्या आपण जे पांघरुण घेतलं होतं त्याची सुंदर सुबक घडी करा, आणि शेवटी त्यावर हात फिरवताना काय वाटतं ते पहा. पहिली कमाई झाली, आता दुसरं काम.. तिथल्या तिथे मोबदला तिथल्या तिथे बक्षीस… अशी ही अद्भुत यंत्रणा काम करताना पाहून थक्क व्हायला होईल.

मग हेच सुरु ठेवायचं दिवसभर… थकवा गायब… नैराश्य गायब… उदासिनता, मरगळ पळून जाईल… !

आपण काय करतो, कसंतरी करतो. मग आतून काम कसंतरी झालंय, असा फीडबॅक येतो, त्याने आपण दुःखी होतो. आता पुढचं काम करायला ऊर्जा कमी होते. दिवसभर हे कर्ज वाढत जातं.

उदा. सकाळी चादरीची घडी कशीतरी करुन फेकली तर आपल्याला दंड थोडीच भरावा लागणार आहे ? पण आतमधे कोणीतरी असतं ज्याला हे माहीत आहे की चादरीची घडी कशी करतात; तो नापास करतो. असे आपण स्वतःला नापास करत रहातो. मग माझ्यात आत्मविश्वास नाही, मला नैराश्य आहे… ई. ई. तक्रारी आपण करतो.

यापुढे ‘कसंतरी काम करतोय, त्यामुळे आतलं कर्ज वाढतंय’ हे लक्षात येईल. थोडा वेळ दिला तरी चालेल, पण चांगलं काम करायची सवय लावली तर वेळ वाचेल आणि आनंद मिळेल.

‘भरभर कर… काय खेळत बसलाय… चेंगटपणा नको’ असं आपण ऐकतो. गती वाढवणं म्हणजे काम कसंतरी करणं नाही. काम झाल्यावर मस्त वाटलं पाहिजे. कोणी टाळ्या वाजवणारं नसलं तरी आतून त्या आपल्याला ऐकू आल्या पाहीजेत.

काम उत्कृष्ट करुन ह्या आनंदाचं सायन्स अनुभवून आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. थकवा निराशा टाळू शकतो. आजच्या काळाचे मनोशारिरीक आजार दूर करु शकतो. थकवा आणि आजार म्हणजे हे साठलेलं कर्ज आहे. आनंदच संपलाय करण्यातला !

हवंय एक लहानसं काम पूर्ण… संपूर्ण… आणि सुंदर… आतला आनंद बाहेर आला पाहिजे असं !

लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई)

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “बाप्पा मोरया रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “बाप्पा मोरया रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 बाप्पा तुझा आमच्याकडे यायचा टाईम कि रे झाला…

दरवर्षाला सांगत असतो ना लवकर येशील पुढच्या टायेमाला..

अन तसा तू येत असतोच न विसरता दर वर्षाला… लालचावलास तू सारखा सारखा इथं यायला… भलामोठा मंडपात, सुशोभित मखरात, बसतोस ऐषआरामात… घरच्या, दारच्या यजमानांची उडते किती त्रेधातिरपिट… तूझ्या आगमनाच्या आधीपासून ते तुला निरोपाचा विडा देईपर्यंत.. असते का काही तुला त्याची कल्पना… फक्त भिरभिरते डोळे तुझे शोधती नैवेद्याचे मोदक ताट भरून आहेत ना.. सुपाएवढे कान तुझे आरत्या, पूजाअर्चा, तारस्वरातल्या ऐकून घेती… छचोर गाण्याचा शंख कर्णा त्या फुंकती.. नवल वाटे मजला अजूनही बहिरेपण तुजला कसे न आले… आल्यापासून जाईपर्यंत डोळे टक्क उघडे ठेवशी… साधुचे नि भोंदूचे भाव अंतरीचे जवळूनी पाहशी.. जसा ज्याचा भाव तसा त्याला पावशी… मिस्किल हसू आणून गोबरे गाल फुगवून बसशी… तथास्तू चा हात आशिर्वादाचा तव मात्र सगळ्यांच्या मस्तकी ठेवशी… ज्याची त्याची मनातली मागण्यांची माळेची मोजदाद तरी तु किती करशी… करोडोंची होतसे इथे उलाढाल ती दिखाऊ भक्तीचा भंडारा उधळून देण्यास.. देखल्या देवा दंडवताच्या उक्ती नि कृतीला तूही आजवरी ना विटलास… चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा तू अधिपती… कसा विसरलास भक्तांना अंतर्यामी खऱ्या भक्तीची, सश्रद्ध बुद्धी देण्यास ती… दहा दिवसाचा तो सोहळा रात्रंदिन आमचाच कोलाहलाचा गलका… कधीही चुकूनही नाही तू सोडले मौनाला शब्दाने एका.. जे चालले ते सगळेच चांगलेच होते भावले आहे का तुला?… निदान हे तरी सांगशील का मला!……

.. आणि आणि हो.. माझं ना तुझ्या जवळ एक मागणं आहे!.. या वर्षी तू इथं आलास कि तू मौन बाळगून बसू नकोस… जे जे तुला दिसतयं ते तुला आवडतयं, नावडतयं ते स्पष्ट सांगायचं!.. घडाघडा बोलायचं!… मनात काही ठेवायचं नाही.. नि पोटात तर काहीच लपवायचं देखिल नाही!… तुला काय हवयं ते तू मागायचं.. अगदी हट्ट धरून… आम्ही नाही का तुला नवस सायास करतो तुझ्या कडे हक्कानं!.. मग तु देखील आमच्याकडे मागणी करण्याचा हक्क आहेच कि… टेक ॲन्ड गिव्ह हि पाॅलिसी चालतेय ना श्रध्देच्या बाजारात… मगं कसं सगळा व्यवहार पारदर्शी होईल…. पण त्यासाठी तुला बोलावेच लागेल… मौन धरून गप्प बसण्यात काही मतलब नाही.. आणि आम्हालाही कळेल कि आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत कि नाहीत… आणि समजा मागुनही मिळणार नसेल तर तर दोन हस्तक नि एक मस्तक तुझ्या पायी ठेवून.. ठेविले अनंते तैसेची राहावे.. चित्ती असु द्यावे समाधान अशी मनाची समजूत घालून पुढे चालू लागू… तरी पण यावेळे पासून तू आमच्या बरोबर बोलणार, संवाद साधणार आहेस… अरे तु दिलेल्या चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा आम्ही मानवांनी काय आविष्कार केलाय हे तु पाहिलसं पण ते तुला जसं हवं होतं त्याच अपेक्षेप्रमाणे झालयं का कसं… का तुला काही वेगळचं अपेक्षित होतं.. हे तुला आता सांगावच लागेल… निदान उशीर होण्यापूर्वी चुक दुरुस्ती तर करता येईल…. नाहीतर नाहीतर आम्ही पण तुझ्याशी बोलणार नाही.. एकाही शब्दांनं… कट्टी कट्टी घेणार तुझ्याशी… आणि आणि आरतीच्या, पूजाअर्चाच्या वेळेला तुला दाखवलेला नैवेद्य, प्रसाद आम्ही सगळाच खाऊन टाकू… तुला बिल्कुल देणार नाही… हिच तुला आमच्याकडून पेनल्टी… कितीही गाल फुगवून रूसून बसलास तरी… मग मनात आणूही नकोस फिलिंग स्वत:ची गिल्टी वाटल्यावरी…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares