मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ माझा नवरा माझी पाहुणी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : माझा नवरा माझी पाहुणी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

साधारण ३४ वर्षांपूर्वीची गोष्ट. १९९० साल असेल. एके दिवशी सकाळी ११ च्या सुमाराला, माझ्याकडे एक तरुणी आली. असेल पंचविशीची. म्हणाली, ‘मी गोव्याहून आले. मला बा. द. सातोस्करांनी तुम्हाला भेटायला सांगितलं, म्हणून इथे आले. आता बा. द. सातोस्करांनी पाठवले म्हंटल्यावर तिची विचारपूस करणं, आदरातिथ्य करणं, माझ्या दृष्टीने ‘मस्ट’च होतं, कारण ते मला आपली मुलगीच मानत. मी म्हंटलं,’तुम्ही गोव्याला राहाता का?’

नाही. मी शहापूरला रहाते. गोव्याला कामाला गेले होते.’

‘कोणतं काम?’

‘मी पीएच. डी. करतेय. त्या संदर्भात काही जुनी वर्तमानपत्रे, , नियतकालिके, पुस्तके मिळतात का, हे बघायला गेले होते.’

‘कुणाकडे राहिलीस तू?’ मी आता ‘आहो’वरून एकेरीवर आले होते.

तिथे मी गोवा विद्यापीठाच्या अतिथीगृहात दहा दिवस राहिले होते. आत्ता इथेही याच कारणासाठी आले आहे.’

‘इथे तुझ्या कुणी ओळखीचे, नात्यातले आहे?’

‘नाही.’

‘मग कुठे रहाणार तू?’ हे विचारायला माझी जीभ काही रेटली नाही.

‘तुझ्या पीएच. डी.चा विषय काय आहे?

‘१९व्या शतकातील निबंध वाङ्मायातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’

‘अरे बाप रे!’

‘का हो?’

अगदी जडजंबाळ विषय आहे.’ माझी प्रतिक्रिया.

तिने स्मितहास्य केले. बोलली काहीच नाही. त्यासाठी तिला इथली वर्तमानपत्रे, नियतकालिके बघायची, अभ्यासायची होती. मी तिला सांगली नगरवाचनालयाविषयी सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. तारा भावाळकर, प्रा. हातकणंगलेकरसर, प्रा. व्ही. एन. कुलकर्णी इ.ची नावे सांगितली. तिच्याकडेही काही व्यक्ती, संस्थांची नावे, संदर्भ होते. या कामासाठी तिला तीन-चार दिवस तरी लागतील, असे तिच्या बोलण्यात आले. माझ्या मनात आलं, ही तरुण मुलगी, एकटी कुठे रहाणार? मग मी ठरवले, तिला आपल्याकडेच ठेवून घ्यायचं.

मी त्यावेळी डी.एड. कॉलेजमध्ये अध्यापन करत होते. मुलगा नववीला. यांचा पॉवरलूमचा व्यवसाय. मी स्वैपाक-पाणी, घर आवरून जेवणं करून बाहेर पडायची. हे यांच्या सवडीप्रमाणे येऊन जेवायचे. उषा कधी माझ्याबरोबर, तर कधी आधी, बाहेर पडायची. घरात असली, तर मला मदत करायची. एकदा तिने विचारलं, ’आमच्या सिंधी पद्धतीचा स्वैपाक करू का? पण ते काही जमलं नाही. तिने विचारलं, याचीच मला अपूर्वाई वाटली. बाहेर पडताना मात्र मी तिला बजावलं, ‘सातच्या आत घरात ये. उगीच आम्हाला काळजी नको.’ त्याप्रमाणे ती खरंच सातच्या आत घरी येऊ लागली. एक दिवस तिला रात्रीचे आठ वाजले, तर ती दोघांना पोचवायला घेऊन आली. ‘तू रागावशील, म्हणून यांना पोचवायला सोबत घेऊन आले.’ ती म्हणाली. 

उषा मला काहीशी गंभीर, थंड प्रकृतीची आणि अबोल वाटली. जेवढं विचारावं, तेवढंच बोलायची. मी तरी इतक्या अपरिचित व्यक्तीला जास्त काय विचारणार? इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण –

हा पण मोठा चमत्कारिक होता. उषा घरात नसली, की हे मला म्हणायचे, ‘कशावरून घरातून पळून आली नसेल?’ किंवा ‘कुणाशी तरी लफडं …..’ किंवा मग ‘कुठल्या तरी टोळीतली…. चोर-दरोडेखोरांच्या ….’ मी म्हणायची, मी माझ्याकडून प्रश्न विचारून खात्री करून घेतलीय. ती मुलगी काही तशी नाही. पण तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही विचारा. हे म्हणाले, ‘मी काही विचारणार नाही. तुझं तू बघ. पेपरला आपण अशा बातम्या वाचतो. कुणी पोलीस कंप्लेंट केली, पोलीस चौकशीला आले, तर  तुझं तू निस्तर. मी काही मदत करणार नाही.’

‘ती मुलगी तशी वाटत नाही’, हे मी पुन्हा पुन्हा म्हणत राहीले, तरीही यांचं बोलणं मला अस्वस्थ करून गेलं. डोक्यात शक्यतेचा एक किडा वळवळत राहिला.

चार दिवसांनी तिचं काम संपलं आणि ती निघून गेली. मी ‘हुश्श्य’ केलं. आमच्याकडून पुढे ती सातारला गेली.

मी यांना म्हंटलं, ‘बघा. चांगली होती ना मुलगी ! तुम्ही काय मुकताफळं उधळलीत तिच्याबद्दल.’ त्यावर हे म्हणाले, मला पण वाटलंच होतं, ही मुलगी चांगली आहे, त्याशिवाय का मी तिला माझ्या घरात राहू दिलं? पण म्हंटलं, तुझी जरा गम्मत करू या.’ म्हंटलं, ‘अच्छा . हे असं होतं का?’ खरं तर घर माझ्या नावावर होतं. कर्जाचे हप्ते माझ्या पगारातून जात होते. पण हे म्हणाले, ‘माझ्या घरात मी राहू दिलं.’ शेवटी आपण पुरुषसत्ताक संस्कृतीचाच भाग बनलेलो असतो ना!

पण या सगळ्या प्रसंगातून गेल्यावर मला एक छान कथा सुचली आणि मी आठ दिवसात ती लिहूनही काढली. ‘माझा नवरा, माझी पाहुणी.’ नंतर ती मासिकात छ्पून आली. अनेकांना आवडली. मी ही कथा काही ठिकाणी सांगितली. मैत्रिणींच्यातही कथेची आणि कथेमागच्या कथेची चर्चा झाली. पुढे पुस्तकातही ती आली. कथा लिहिताना आणि त्याबद्दल बोलताना मला पदोपदी उषाची आठवण येई. ती आली. तिने मला एक चांगली कथा दिली आणि ती निघून गेली. कथेमागची कथा किंवा हकिकत म्हणू आपण, ती तुम्हाला सांगितली. आता मी कथा म्हणून काय बदल केले, हेही तुम्हाला सांगावसं वाटतय, लेख विस्तारणार आहे तरी…..  

मी माझ्या पाहुणीचं नाव बादललं. मीनाक्षी नटराजन ठेवलं. तिच्या प्रबंधाचा विषय बदलला. तो ’मंदिराच्या माध्यमातून झालेला नृत्यकलेचा विकास ‘ असा ठेवला. ती चेन्नईची. माझी मावसबहीण रेखाताईची शेजारीण. रेखाताईच्या मुलीच्या श्रेयाच्या बरोबरीची. दोन्ही कुटुंबात जवळीक. महाराष्ट्रातील मंदिरांबरोबरच, इथल्या वाघ्या-मुरळी, गोंधळी, देवदासी, जोगतिणी यांच्या, परंपरेत टिकून राहिलेल्या नृत्यशैलीचा, गीतांचा अभ्यास तिला करायचा होता. काही लोककलाकारांच्या मुलाखतीही ती घेणार होती. तिला पाच-सात दिवस तरी हे काम करायला लागणार होते. तिने कुठे राहायचं हे ठरवलं नव्हतं. मग मी तिला माझ्याकडेच रहा म्हंटलं.

संध्याकाळी प्रभाकरला तिच्याबद्दल सांगितल्यावर तो म्हणाला, ‘तिला राहायला कशाला ठेवून घेतलंस?’

‘श्रेयाला नसतं का ठेवून घेतलं?’

‘तिची गोष्ट वेगळी.’

तो मिनूशी व्यवस्थित बोले. ती नसताना मात्र नाही नाही त्या शंका उपस्थित करी. अलकडे ऑफिस सुटल्यावर तो थेट घरी येई. म्हणायचा, ‘काही भानगड उपस्थित झाली तर…. तुला एकटीला कशी निस्तरता येणार?’

‘पण मी तिला तिच्या कामाबद्दल विचारलं. रोज विचारते. माझं समाधान होतं.’

‘दुसर्‍याचा विश्वास संपादन करायचा, म्हणजे, एवढं फिल्ड वर्क हवंच!’ तो म्हणे.

तो रोज नाना शंका बोलून दाखवी. घरातून पळून आली असली तर? दागिने, पैसे घेऊन आली असली तर? कुणाशी लफडं करून एक दुजे के लिए म्हणत, किंवा दोघांनी आत्महत्या करण्याचा विचार केला असला तर… कुणा चोर, दरोडेखोरांच्या टोळीतली असली तर… किंवा नक्षलवादी संघटनेतील असली तर… रोज नवीन शंका. मी अस्वस्थ. विचारांचं जाळं त्याभोवती विणत राह्यची.

आमच्या दोघातील संवाद आणि त्यानंतरच्या विचारांची आवर्तनं लिहिताना मी कल्पनेची उंचच उंच नि स्वैर भरारी मारली होती.

एक दिवस तिला यायला रात्रीचे नऊ वाजून गेले. मी अस्वस्थ. कीचन टू बाल्कनी येरझारा मारतेय. शेवटी एकदाची बाल्कनीतून ती दूरवरून येताना दिसली. तिच्याबरोबर दोघेजण. हे पोलीस किंवा सी. आय. डी. ऑफिसर तर नसतील? साध्या वेषातले. तिची बॅग तपासतील का? फायलींखाली काय काय  असेल? पिस्तूल, पैसे-दगदागिने, गुप्त कागदपत्रे, सायनाईडची बाटली…. आम्ही पण त्यांना सामील असू असं वाटेल का त्या दोघांना? माझी कल्पनाशक्ती भन्नाट वेगाने धावत नव्हे उडत होती.

तिने त्या दोघांना आत बोलावले. माझी ओळख करून दिली. ‘उजूआंटी तू रागावशील उशीर झाला म्हणून, म्हणून यांना पोचवायला घेऊन आले.’

त्यानंतर दोन दिवसात तिचं काम संपलं. ती निघून गेली. आणि मी ‘हुश्श्य….’ करत सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर तिची अधून मधून पत्रे, फोन येऊ लागले. आपल्या कामाची प्रगती त्यातून ती सांगे. पुढे तिला पीएच.डी. मिळाली हे सांगणारे, तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाविषयी तिचे फोन येत. प्रत्येक फोनमध्ये आमचे आभार व आम्ही  तिच्याकडे कधी येणार, याविषयी विचारणा. आता तिचा प्रबंध पुस्तक रूपात येणार होता. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण व त्याचबरोबर रेल्वेची दोन तिकिटेही तिने पाठवली होती. मी डिक्लेअर केलं, ‘तू आलास तर तुझ्याबरोबर, नाही तर तुझ्याशिवाय मी जाणारच! ती दर वेळी बोलावते. तू नुसताच ‘हो… हो…’ म्हणतोस.’ मग एकदाचा तो तयार झाला.

आम्ही कार्यक्रमाला गेलो. तो छानच झाला. नंतर आसपासची प्रेक्षणीय स्थळे, छोट्या छोट्या सहली, नृत्याचे दोन-तीन कार्यक्रम…. आठवडा कसा गेला, ते कळलच नाही. तिने चांगलच आदरातिथ्य केलं. माझ्या नवर्‍यानेही आपल्या बोलण्याने, तिच्या आणि रेखाताईच्या घरातील सर्वांना चांगलंच प्रभावित केलं.

घरी परतल्यावर त्याला म्हंटलं, ‘किती चांगली मुलगी….’

‘मला माहीतच होतं ते.’ 

‘कसं?’

‘आतला आवाज…’

आणि तू काय काय तारे तोडलेस…… ‘

‘तुझी जरा गंमत केली. पण मजा आली, तुला असं घाबरताना पाहून!’

‘तुझी मजा झाली, पण माझा इकडे जीव जात होता, तुझ्या शंका-कुशंकांनी…’

‘अग, ती मुलगी चांगलीच आहे, याबद्दल माझी खात्रीच होती. नाही तर माझ्या घरात मी राहू दिलं असतं का तिला?’ 

म्हणे माझ्या घरात… घर माझ्या नावावर . कर्जाचे हप्ते माझ्या पगारातून जातात आणि हा म्हणतोय, ‘माझ्या घरात राहू दिलं असतं का?’ पुरुषी अधिकार आणि अहंकार कसा पेशीपेशीत भिनलेला असतो या पुरुषांच्या.’ इथे मी कथा संपवली.

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सन्मानाने मरणाचा हक्क…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सन्मानाने मरणाचा हक्क…☆ श्री जगदीश काबरे ☆

कितीही कटू वाटले तरी एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे की, जीवन कितीही प्रवाही आणि अमर वाटत असले तरी त्याचा एक अविष्कार म्हणजे आपण मानव पूर्णतः मर्त्य आहोत. आपल्या जगण्याच्या धडपडीचा अविष्कार पुनर्जन्म नसून प्रजनन आहे. आपण माणूस म्हणून एकसंध नसून आपले शरीर हे विविध अवयवांनी बनलेल्या पेशींचा समूह आहे, त्या पेशी ज्या समान गुणसूत्रांनी संचालित होतात, त्या गुणसूत्रांचेच मूर्त रूप आपले शरीर असते. सर्व पेशी त्या गुणसूत्रांच्या एकेक अक्षराबरहुकून वागत असतात, त्या सूक्ष्म पेशींचा एकत्रित भव्य आविष्कार म्हणजे शरीर असते. शरीराचे अवयव म्हणजे मी नाही. पण सजीव शरीर तर मी आहे! घराचे छप्पर घर नसते, घराची फरशी घर नसते, घराच्या भिंती घर नसते, पण ह्या सर्वांनी मिळून घर तयार होते. तसे शरीरसुदधा! फरक येवढाच की, बाहेरून वस्तू आणून माणूस घर बनवतो तर शरीर आतूनच बाहेर वाढत जाते. या शरीरातील हृदयाची धडधड थांबणे म्हणजेच मृत्यू होय. जीवनाची असोशी आणि मृत्यूचे भय माणसाच्या मनात सतत असल्यामुळे माणसाने मृत्यूनंतरचे जीवन कल्पीले आणि वेदनारहित अमर आत्म्याचा जन्म झाला.

असा आत्मा अस्तित्वात नसल्यामुळे वास्तवात शरीर जर्जर झाले असेल तर त्याचा त्रास माणसाला होतो. अशा वेळेस घरातील जवळच्या सुहृद नातेवाईकांनाही त्याचा त्रास होत असतोच. पण बरेचदा आपलेपणाने तर कधी कर्तव्य बुद्धीने ते सगळे सहन करत असतात. जीवनभर स्वावलंबी जगल्यानंतर शेवटच्या काळात परावलंबी होणे हे कोणत्याही स्वाभिमानी माणसाला दुःखदायकच वाटत असते. अशावेळेला त्याने जर इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली तर ते चूक कसे ठरेल? पण अजूनही आपल्याकडे इच्छामरण म्हणजे आत्महत्या असे समजण्यात येते. म्हणून व्याधीग्रस्त माणसाला मरणाची वाट बघत व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. हा सहानुभूतीच्या नावाखाली रुग्णाला जिवंतपणे मरणयातना देणारा अनुभव क्रूरपणाचा नाही का?

हे लक्षात घेऊन न्यायालयाने वैद्यकीय इच्छापत्राला मान्यता दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आता जबाबदारी वाढते ती इच्छामरणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांची. जर एखाद्याने इच्छापत्रात ‘विशिष्ट उपचारानंतर मला शांतपणे मरू द्यावे’, असे म्हटले असेल तर त्याचा सन्मानाने मारण्याचा हक्क आपण मान्य करायला हवा. माणसाला सन्मानाने जगायला हवे असते तसेच सन्मानाने मरायलाही. पण या कायद्यामुळे आत्महत्याही कायदेशीर होईल आणि या कायद्याचा गैरवापर पैसाअडक्यासाठी केला जाईल, अशी भीती बाळगणे म्हणजे नदीला केव्हातरी मोठा पूर येईल आणि आपण त्यात बुडून वाहून जाऊ; म्हणून नदीकाठी घर बांधणे चुकीचे असे समजण्यासारखे आहे. कारण प्रत्येक कायदा हा दुधारी शास्त्रासारखा असतो. त्याचा वापर विधायक करावा की विघातक हे शेवटी आपल्यावर अवलंबून असते.

एवंच आजच्या धकाधकीच्या जीवनात जर एखाद्याने आयुष्य पूर्णपणे उपभोगले असेल आणि शेवटच्या काळात व्याधीग्रस्त होऊन खितपत मरण येण्यापेक्षा जर त्याने इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याला सन्मानाने मरण्याचा हक्क मिळाला पाहिजे. असेही मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करणे हे धर्मसंमत आहेच. तेव्हा आता शासकीय आणि सामाजिक पातळीवर न्यायालयाच्या या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मला वाटते. तुम्हाला?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अभावातले ऐश्वर्य…!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

अभावातले ऐश्वर्य…!!!  ☆ सुश्री शीला पतकी 

आज सकाळी नातीने विचारले “ आजी अभाव म्हणजे काय ग ?.. “ मला जरा कौतुकच वाटले. मराठी काही शब्द जाणून घेण्याची तिला इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे.

मी तिला सांगितलं, “ अभाव म्हणजे एखादी गोष्ट नसणे.. गोष्टीची कमतरता.. त्याला अभाव म्हणतात. म्हणजे म्हणजे वाईटच की.. असं नाही ग. तुझ्यात दुर्गुणाचा अभाव आहे याचा अर्थ तुझ्याजवळ खूप चांगले गुण आहेत.. म्हणजे अभाव म्हणजे नसणे आणि त्या नसल्यामुळे खूप चांगल्या गोष्टीसुद्धा घडत असतात.. “ ती उड्या मारत निघून गेली आणि मी विचार करत राहिले….

आमच्या पिढीमध्ये तर किती अभाव होते. पण त्या अभावाने मला वाटतं आम्ही समृद्ध झालो. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन खोल्यांची घरे, त्या दोन खोल्याच्या घरामध्ये सात आठ माणसे अगदी आरामात एकत्र राहत होतो. स्वयंपाक आणि बसण्याची खोली.. तीच झोपण्याची खोली.. तीच अभ्यासाची खोली.. तेच पाहुणेरावळे येऊन बसण्याची खोली. पण त्यामुळे सर्वांमध्ये सतत संवाद राहिला. वादही झाले पण संवाद होत राहिला, त्यामुळे जवळीक वाढली. त्या संवादातून काही खूप चांगल्या गोष्टी घडल्या. आठवणी राहिल्या, प्रेम वाढलं. आठ बाय आठच्या खोलीमध्ये सहा माणसांनी झोपणं.. मग त्यासाठी केलेली ती तडजोड, सकाळी लवकर उठणे.. या सगळ्या गोष्टींनी उलट एक समृद्धी दिली. जास्त वेळ झोपण्याची मुभाच नव्हती. सकाळी अंथरूण पांघरूण काढून त्या खोल्या पुन्हा बैठकीत सजवून ठेवायचे असायचं. बेडरूमचे पुन्हा स्वयंपाक घर व्हायचे. त्यामुळे गोष्टी वेळेत होत असत. सार्वजनिक बाथरूम अंघोळी पटापट सात-साडेसातपर्यंत आटपून जात असतात त्यामुळे धुणे नऊपर्यंत काठीवर जाणे, साडेदहाला जेवायला बसणे, शाळेला जाणे, आल्यावर अभ्यास करणे, मग शुभंकरोती पर्वचा, आठपर्यंत जेवण आणि नऊला पुन्हा झोपणे … त्यामुळे सर्वांना उत्तम आरोग्य लाभले. डॉक्टरकडे जायची वेळ फारशी आलीच नाही. अभावानेच एक चांगली जीवनशैली दिली आणि त्यामुळे निरामय आरोग्याचे वरदान लाभले.. !

लहानपणी पिझ्झा बर्गर हॉटेलला जाणे ह्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. जे काही असेल ते घरी आणि मग या घरच्या स्वच्छ खाण्याने चणे फुटाणे, शेंगदाणे वाटाणे चिंच निवडून झाल्यानंतर चिंचुके चुलीत भाजून ते खाणे, आंब्याच्या कोईमधील पांढरा भाग भाजून तो खाल्ल्यामुळे कितीतरी कार्बोहायड्रेट किंवा त्यातील उपयुक्त रसायन पोटात गेली. कैरी चिंचा बोरे ही त्या त्या काळातली सहज उपलब्ध होणारी फळे … सोलापुरात तरी फळ नावाची गोष्ट म्हणजे फक्त केळी… आजारी माणसाला द्राक्ष मोसंबी संत्र्याचे दर्शन.. कलिंगड सीजनमध्ये दोन ते तीन वेळा आणलं जायचं. मग ते कलिंगड चंद्रकोरीप्रमाणे कापून एक एक फोड प्रत्येकाला मिळायची, ती पार बुडापर्यंत खायची. आज आता ते सांगतात की त्यातला पांढरा भाग फार उपयुक्त असतो. आम्ही तेव्हा तो खात होतो. त्यानंतर उरलेल्या काळ्या पाठी.. त्या धुऊन आमची आई त्याला मीठ हळद लावून उन्हात वाळवत असे आणि ते तळून त्यावर मीठ तिखट टाकले की उन्हाळ्यात ते खायला खूप सुंदर लागायचे. कोंड्याच्या पापड्या वाफेवरच्या पापड्या, पापडाचे पीठ.. त्याचे गोळे खाणे.. त्यामुळे उडदाचे पीठ पोटात जायचे. विविध डाळींचे सांडगे भाज्या म्हणून ते खाल्ले जायचे. बटाट्याचे घरी केलेले वेफर्स, बटाट्याचा कीस हे सगळं स्वच्छ मटेरियल असायचं. पैशाचा अभाव होताच पण हॉटेलात जाण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे घरी करण्याचे पदार्थ यावर भर जास्त असायचा. लोणच्याच्या बरण्या भरून तयार असायच्या.. मुरंबे लोणची गुळांबा उन्हाळ्यातील पन्हे.. सब्जा घातलेले लिंबाचे सरबत.. याने पोटाला थंडावा मिळायचा. आतासारख्या थम्सअपच्या बाटल्या आणून पिणे हे त्या काळात नव्हतंच. आजच्या तुमच्या समृद्धीचा अभाव आम्हाला बळकट करून गेला. ताजे विटामिन मिळायचे. घरच्या दह्याचे सुंदर ताक.. लोणी काढल्यावर हातावर मिळणारा लोण्याचा तो गोळा.. आतासारखे ते पिवळट कागदातले लोणी नव्हते याला तुम्ही बटर म्हणतात.. अस्सल नवनीत आम्ही खाल्ले आहे.. शेवयाचे नूडल्स करता तुम्ही किंवा न्यूडल्स आणून यात मसाला घालून खाता.. आमच्याकडे शेवयाची मस्त अटीव दुधातली खीर पौष्टिक म्हणून ती उपयोगी पडेल किंवा पडली आहे. कधीकाळी डब्यात प्रिझर्वेटिव्हसह भरलेला श्रीखंड तुम्ही विकत आणता, मनाला आलं की बॉक्स आणायचा, फोडायचा आणि ताटात श्रीखंड… श्रीखंडासाठी दूध आटवून दही लावणे.. त्याचा चक्का आणि मग केशर बदाम पिस्ता घातलेले ते उत्तम श्रीखंड.. त्याची चव अप्रतिम असायची आणि शुद्ध सात्विक.. बाजारी मिळणाऱ्या श्रीखंडाच्या अभावामुळे आम्हाला घरचे सुंदर श्रीखंड खायला मिळाले. तशीच अटीव दुधाची निर्भेळ बासुंदी.. कधीतरी वडील हलवाई गल्लीत नेऊन आम्हाला बासुंदी खाऊ घालत असत, पण पुढे त्यात टीपकागद घालतात असे कळल्यापासून ते बंद झाले. आता सर्रास भेसळीशिवाय काही मिळतच नाही… बोर चिंचा पेरू गोन्या चीगुर याने आम्हाला कुठलंही विटामिन कमी पडू दिलं नाही. उंबराच्या झाडाची उंबरे फोडून किड्यांना बाहेर जाऊ देऊन झटकून झटकून खाण्यामुळे आमची इम्युनिटी वाढली. कच्ची उंबरे खाल्ल्याने आयुष्यभर पुरेल इतके पोटॅशियम मिळाले. सांजा, पुरणपोळी, सांज्याची पोळी या प्रकाराने भरपूर प्रमाणात गुळ पोटात गेल्याने लोहाची कमतरता भासली नाही. आमच्या पिढीत 90% लोकांचे हिमोग्लोबिन 12 /13 च्या पुढेच आहे. बळकट हाडे कणखर आहेत

मुख्य म्हणजे घरात सगळ्यांनी काम करण्याची पद्धत होती. प्रत्येक कामाला बाई नव्हती. पैशाचा अभाव होताच. प्रत्येकाने आपापली कामं करायची, शिवाय घरात वाटून दिलेली कामे करायची.. त्यामध्ये अगदी लहान असणाऱ्यांना कपबशा विसळण्यापासून काम असे… मैदानात खेळायला भरपूर जायचं.. बिन पैशाचे सगळे खेळ.. कुठलेही साहित्य कधी खेळायला लागले नाही. खेळणी विकत आणणे हा प्रकारच नव्हता असल्या गोष्टीवर घालायला पैसाच नव्हता. रद्दीतला कागदसुद्धा व्यवस्थित बांधून ठेवून तो रद्दीमध्ये घालणे आणि त्याचे पैसे करून त्यातून ग्रंथालयाची फी भरणे.. कारण उन्हाळ्यात आपण वाचनालय लावले तर पैसे आपणच या पद्धतीने जमा करावे लागत. पैशाच्या अभावाने कितीतरी गोष्टी आम्हाला शिकवल्या.. त्या वाचनातून आम्ही समृद्ध झालोत. रद्दीच्या वह्या वापरल्यामुळे कागदाची किंमत कळली.. प्रदूषणाला हातभार लावला नाही आम्ही. वापरा आणि फेकून द्या हा प्रकारच आमच्या वेळेला नव्हता त्यामुळे वस्तूंचा पुनर्वापर होत राहिला. प्लॅस्टिकची पिशवी कचऱ्यात गेली नाही. पुड्याला बांधून आलेले दोरे ते लगेच बंडल बांधून घरात एका विशिष्ट ठिकाणी ठेवले जाईल तेच दोरे हार तुरे बांधायला उपयोगी पडायचे. फाटलेल्या कपड्याच्या चौकटी शिवून त्याचे घरामध्ये पुसायला कापड व्हावयाचे. टिशू पेपरच्या नावाखाली भसाभसा कागद पुसून कचऱ्यात टाकणे हे आमच्या वेळेला नव्हतं. पायपुसणी वगैरे नव्हती.. अशाच कापडांचे मिळून एक जाड पाय पुसणे तयार व्हायचे आणि ते सुती असल्याने त्याच्यामध्ये पाणी शोषून घेतले जावयाचे. सोडा साबण घालून आठवड्यातनं फरशी स्वच्छ धुवायची.. कोणतेही डिटर्जंट लागलं नाही कारण तेव्हा ते नव्हतंच. अशा या अभावाच्या जमान्यात घरचं खाण्याची समृद्धी लाभली. उत्तम वाचन झाले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे अवलोकन झाले. नाटक कीर्तन गायन नकला मेळे हे सर्व मनोरंजनाचे प्रकार मोफत उपलब्ध होते ज्याने आमचं आयुष्य समृद्ध केले. ऑनलाइन काही नव्हतं किंवा प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करावी लागायची त्यामुळे शहाणपण आले, चतुराईने खरेदी करता आली. माणसांची संपर्क वाढला. काही जणांचा तर अगदी जन्मोजन्मीच्या ओळखी आणि दृढ संबंध निर्माण झाले.

त्या काळातल्या अभावाने सर्वार्थाने आम्हाला समृद्ध केले एवढे मात्र खरे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीव्ही आणि मोबाईल नव्हते, ॲमेझॉन नव्हतं, ॲप नव्हते. बाप सांगेल ते मुकाट्याने ऐकायचं.. आईच्या चरणाची नतमस्तक व्हायचं.. आजी आजोबांच्या प्रेमात नाहून निघायचं.. भावंडाशी प्रसंगी भांडायचं आणि प्रेम करायचं…..

…. पैशाच्या अभावाने ही केवढी मोठी समृद्धी आम्हाला दिली.. अभावातले ऐश्वर्य लाभणारी आमची शेवटची पिढी … 

असो … ‘ कालाय तस्मैय नमः ‘

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बालकवी…. – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ बालकवी…. – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी ऐकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली.

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती.

पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता.

मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या “त्र्यंबक बापूजी ठोंबरे” यांची ही गोष्ट आहे.

जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस ५ मे रोजी संपन्न झाला.

आनंदी आनंद गडे

इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहिली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही.

आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला

मत्सर गेला

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना. घ. देशपांडे, बा. भ. बोरकर, वा. रा. कांत, ग. ल. ठोकळ, ग. ह. पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा. भ. बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे.

त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते.

त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा

टिक_ टिक् बोलत गोल फिरे

हे धडपडते काळिज उडते

विचित्र चंचल चक्र खरे!

घड्याळातला चिमणा काटा

त्याच घरावर पुन्हा पुन्हा

किति हौसेने उडत चालला

स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !

बालकवींना १०४ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.. !!.. 🙏

┉❀꧁꧂❀┉

लेखक : श्री श्रीकांत उमरीकर

 जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर,

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘घर …. घरातलं.. आणि मनातलं…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘घर …. घरातलं.. आणि मनातलं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

मी घर बांधतो घरासारखं आणि हा पक्षी माझ्याच घराच्या व्हरांड्यात लोंबत्या वायरवर घर बांधतोय त्याच्या मनासारखं…

मी विचारलं त्याला, “बाबारे, ना तुझ्या नावाचा सातबारा, ना तुझ्या नावाचं मुखत्यारपत्र.. ”

तर म्हणतो कसा, “अरे सोपं असतं का कुणाच्या घरात जागा करणं आणि कुणाच्या मनात घर करणं”…

माझं घर तर काड्यांचं आहे. तुझं घर सिमेंटचं आहे.. ”

… नात्यांची घट्ट वीण, विणत गेली नाही, तर माडीचं घरसुद्धा काडीमोलाचं असतं..

मला आधी वाटायचं माझ्यामुळेच त्या पक्ष्यांचं घर झालं.

आता वाटतंय त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लास्टर पक्क झालं.

आता त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी पसायदान असते.

तो डोळे झाकून घरट्यात बसला की समाधिस्त आणि समृद्ध वाटतो.

त्या पक्षाने शिकवलं मला… एका घराची दोन घरं होण्यापेक्षा घरात घर करुन राहाणं आणि दुसऱ्याच्या मनात घर करुन राहाणं कधीही चांगलं…

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळख परिचय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओळख परिचय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

एखाद्या कार्यक्रमात प्रमुख किंवा आमंत्रित व्यक्तींची ओळख करून देताना त्या ओळखीत काही चांगल्या गोष्टीच अपेक्षित असतात. अगदी तसा नियम नसला तरीही. पण अति उत्साहात काही गोष्टी घडतात.

एका फुटबॉल सामन्याच्या उद्घाटनाला एका राजकिय नेत्याला बोलवल होत. त्यांची ओळख पुढिल प्रकारे करण्यात आली.

या महाशयांची जशी ओळख आहे तसा हा माणूस नाहिच. आणि जसा हा माणूस आहे तसं यांना कोणीही ओळखत नाही. आपली खरी ओळख जाणिवपूर्वक लपवण्यात ते आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. व पुढेही यशस्वी होतील.

या सामन्याच्या उद्घाटनाला जे महाशय बोलवले आहेत त्यांचा राजकिय प्रवास आणि फुटबॉल यांचा जवळचा संबंध आहे. खेळावे कसे हे त्यांना माहित नसले तरी तुडवले कसे जाते याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केल्यापासून आज नावाला येईपर्यंत (खरंतर नावारुपाला असंच म्हणणार होतो. पण त्यांच्याकडे पाहून फक्त नावाला येईपर्यंत असच म्हणतो.) पक्षातीलच वेगवेगळ्या मान्यवरांनी वेळोवेळी त्यांना व्यवस्थित तुडवले आहे.

आपल्याच पक्षात आपली प्रचंड घुसमट होत आहे असं त्यांना पदोपदी वाटत असल्यानेच त्यांनी चारपाच वेळा वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला. पण हा पक्षप्रवेश सोहळा म्हणून कधीच झाला नाही. फुटबॉल मध्ये जस पास देतांना झालेल्या चुकीमुळे तो सहज प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पायात जातो, तसेच हे पक्षातील लोकांच्या चुकीमुळेच दुसऱ्या पक्षाच्या पायावर पोहोचले. प्रतिस्पर्धी असलेल्या काही थोड्याच लोकांनी यांना पायात घेण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला असेल. थोडक्यात त्यांना तुडवतांना झालेल्या चुकीमुळे ते प्रत्येकवेळी दुसऱ्या पक्षात (पायाशी) गेले.

फुटबॉल, जस प्रत्येकाला तो आपल्या पायात असावा असं वाटत असलं तरी त्याला समोरच्याच्या जाळ्यात टाकण्यासाठीच धडपड असते तशीच धडपड यांच्या आयुष्यात आली आहे. कितीदा तरी यांना जाळ्यात ढकलण्याचा मनापासून आणि जोर लाऊन प्रयत्न झाला.

फुटबाॅलच्या मैदानात त्याला हात लागला की फाऊल असतो, त्याच पध्दतीने कोणत्याही परिस्थितीत आपला हात सगळ्यांनीच यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी डोक्याच्या वापर केला, पण हात लांब ठेवला. हात दाखवून अवलक्षण याच धर्तीवर हात लावून अवलक्षण कोणालाही नको होतं.

फुटबॉल मध्ये जसं काही चुका मुद्दाम केल्यातर यलो किंवा रेड कार्ड दाखवून एक प्रकारची तंबी दिली जाते, तशाच यांना वेगवेगळ्या नोटीस देऊन तंबी देण्यात आली आहे.

आज स्पर्धेच उद्घाटन करतांना तुडवण्यात काय मजा असते, याचा आनंद त्यांना घेता येईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि यांचा परिचय थांबवून त्यांना मनोगत व्यक्त करायला बोलवतो…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोरुग्णतेच्या दिशेने… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ मनोरुग्णतेच्या दिशेने… ☆ श्री संदीप काळे ☆

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा माझा एक मित्र मराठवाड्यातील लातूर या जिल्हयात वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाला. तो मुंबईला असताना त्याची नेहमी भेट व्हायची. आता तो लातूरला गेल्यामुळे त्याची भेट दुर्लभ झाली आहे. म्हणून मी त्याला भेटण्यासाठी मुद्दाम लातूरला गेलो.

दुपारी डब्बा खात असताना तो एका व्यक्तीची ओळख करून देत मला म्हणाला, ‘हे राजीव कुलकर्णी, अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन खूप वर्ष कसली. आता कुलकर्णी काही कारणास्तव लातूरमध्ये वापस आले आहेत. माझे जवळचे मित्र आहेत’.

मी कुलकर्णी यांना नमस्कार केला. बराच वेळ गप्पा मारल्यावर कुलकर्णी वरिष्ठ अधिकारी असलेल्या माझ्या मित्राला म्हणाले, ‘मी खूप अडचणींत आहे. त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी मी येथे आलो आहे’.

ते वरिष्ठ अधिकारी मित्र म्हणाले, ‘बोला ना’.

माझ्याकडे बघत ते मित्र दबक्या आवाजात म्हणाले, ‘माझा मुलगा समर्थ आता आठवीला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो व्यसनाधीन झालाय. आम्ही अमेरिकेत खूप इलाज केले, पण उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही अमेरिका सोडून पुन्हा गावी लातूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला’.

माझे अधिकारी मित्र त्यांना म्हणाले, ‘तो इतका व्यसनाच्या आहारी गेला, तेव्हा तुम्ही काय करत होतात?’

कुलकर्णी म्हणाले, ‘मी माझ्या शेती उपक्रमात होतो. माझी बायको यमुना नोकरी करायची. तो नाना प्रकारचे व्यसन करायचा. आम्हाला कळू न देता गोळ्या खायचा’.

कुलकर्णी त्यांच्या मुलाच्या व्यसनाधीनतेचे किस्से सांगत होते आणि आम्ही अवाक् होऊन ऐकत होतो. कुलकर्णी यांच्या आपबीतीने माझे हातपाय एकदम गळून गेले. आम्ही एकदम नि:शब्द झालो. सर्व सांगून झाल्यावर कुलकर्णी यांनी खिशातला रुमाल काढून आसवांनी डबडबलेले डोळे पुसले.

माझ्याकडे बघत माझा तो अधिकारी मित्र म्हणाला, ‘या स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडे दररोजच्या आहेत. आईवडीलांना मुलांकडे बघायलाही वेळ नाही, आणि सहज करता येतात म्हणून मुले व्यसनांचे अनेक प्रयोग करतात. ‘

अधिकारी मित्राने बेल वाजवून शिपायाला बोलवले. ते त्या शिपायाला म्हणाले, ‘जरा विजयकुमार यादव सर यांना फोन करून बोलावून घ्या’.

शिपाई गेला. कुलकर्णी यांनी सांगितले की अमेरिकेसह भारतातही पालकांच्या लाडामुळे, दुर्लक्षामुळे लहान लहान मुले खूप मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाली आहेत. अनेक मुले व्यसनाधीनतेच्या मार्गावर आहेत. नशील्या पदार्थांच्या सेवनाबरोबर मोबाईल, टीव्हीच्या अतिवापरामुळे अनेकांचा कसा सत्यानाश झाला. आज दहावीच्या आतमधली ३० टक्के मुले व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचे कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकारी मित्राच्या बोलण्यातून समजले.

इतक्यात यादव सर आले. यादव सरांची ओळख करून देताना अधिकारी मित्राने सांगितले, ‘हे यादव सर. यांनी आजवर तब्बल दोन पिढ्यांना व्यसनाच्या खाईत जाण्यापासून वाचवले आहे. मी अनेक वेळा त्यांच्या व्यसनमुक्ती सेंटरला जाऊन आलो. मी अनेक माणसं त्यांच्याकडे पाठवली. यादव सरांनी अनेकांचे संसार वाचवण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ‘ वरिष्ठ अधिकारी मित्र आणि कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलाची सर्व परिस्थिती यादव सरांना सांगितली.

यादव सर म्हणाले, ‘लहान मुलांच्या व्यसनाचा प्रकार खूप वाढलाय. बरं, या मुलांचे काय करायचे हा प्रश्न आहे. मोठ्या माणसांप्रमाणे त्यांना कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवता येत नाही. लहान मुलांसाठी खूप कडक कायदे आहेत. त्यामुळे या लहान मुलांचं काहीही करता येत नाही. न्यायाधीश, जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, पोलीस अधिकारी या सगळ्यांनाच रोज त्यांच्याकडे येणाऱ्या लहान मुलांच्या व्यसनाधीनतेवर करायचे काय हा प्रश्न पडतो आहे. ‘

वरिष्ठ अधिकारी असलेले मित्र मला म्हणाले, ‘संदीपराव, तुम्ही एकदा जाऊन यादव सर करत असलेलं काम पाहून या. तुमच्या लक्षात येईल, त्यांचं काम किती मोठे आहे!’

अधिकारी मित्र यादव सरांविषयी भरभरून बोलत होते. मलाही यादव सर यांचे काम जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. कुलकर्णी यांना यादव सरांनी त्यांच्या मुलाला व्यसनाधीनतेतून बाहेर कसे काढायचे, याबाबत योग्य तो सल्ला दिला. त्या मुलांचे समुदेशन कसे करायचे, कोणते औषध द्यायचे हे सांगितले. मुलाला वेळ देणे, मुलावर खूप प्रेम करणे, त्यांना समजून घेणे किती गरजेचे आहे, हे यादव सर यांनी समजावून सांगितले. ‘तुम्हाला जर या मुलांना खरंच व्यसनातून बाहेर काढायचे असेल तर, तुम्हाला वैयक्तिक त्यांना वेळ द्यावा लागेल. तरच ती बाहेर येतील, अन्यथा येणार नाहीत. ‘

अधिकारी मित्र आणि कुलकर्णी हे दोघे बोलत बसले. मी उठलो आणि यादव सरांसोबत त्यांच्या आंबेजोगाई रोडवर असलेल्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये जाऊन पोहोचलो. दारू, गांजा अशा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेल्या शेकडो लोकांचे तिथे इलाज केले जात होते.

लातूर मधलं हे व्यसनमुक्तीचं सेंटर कसं सुरू केलं? त्या एका सेंटरचे अनेक सेंटर कसे झाले? राज्यभरातले व्यसनमुक्तीचे यादव सरांचे काम भारतभर कसे पोहोचले? आणि आज एक दोन हजार नाही तर तब्बल साठ हजारांहून अधिक लोकांना व्यसनमुक्त कसे केले, याचा खूप मोठा इतिहास यादव सरांनी माझ्यासमोर ठेवला.

प्रचंड आत्मविश्वास, प्रत्येकाचे चांगले करायची भावना आणि माझा जन्म देण्यासाठीच झाला आहे, ही उदात्त भावना, यातून यादव सरांचे काम कुठलीही प्रसिध्दी न करता देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचले आहे.

डॉ. विजयकुमार यादव (9372346476) उच्चशिक्षित, मोठ्या घरात जन्मलेले, एका शिक्षकाचे सुपुत्र. तरुण वयामध्ये आजूबाजूला असलेली व्यसनाधीन मंडळी यामुळे व्यथित होऊन ‘मी आयुष्यभर लोकांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी कार्य करेन’, या निर्धाराने पेटून उठलेले यादव सर यांनी १९९९ला लातूरमध्ये ‘जीवनरेखा प्रतिष्ठान‘ नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘जीवनरेखा व्यसनमुक्ती केंद्र’, ‘एकात्मिक व्यसनाधीनता पुनर्वसन केंद्र’ आणि ‘व्यसनमुक्तीचे पुनर्वसन केंद्र’ असे दोन सेंटर लातूरमध्ये सुरू केले. पैसे मिळोत वा न मिळोत, व्यसनग्रस्त माणसाला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले.

जसजसं काम वाढत गेलं, तशी काही अंशी शासनाची मदतही मिळू लागली. पण शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर काही भागेना. स्वतःच्या जवळचे जे काही होते ते सरांनी अनेक वेळा विकायला काढले, पण सेंटरच्या माध्यमातून चालत असलेले काम काही थांबू दिले नाही.

दारू, गांजा आणि वेगवेगळ्या रसायनांचे सेवन करून त्याच्या आहारी गेलेले, पेट्रोलचा वास घेणारे, व्हाइटनरपासून ते चप्पल पॉलिश करण्याच्या क्रिमला व्यसनाचे साधन बनवणारे असे अनेक महाभाग त्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये होते. कोणी दारूच्या व्यसनापायी वडिलांची होती नव्हती ती सगळी शेती विकली. कोणी दारूच्या व्यसनातून अनेक ठिकाणी चोरी केली. कुणाला दारूच्या व्यसनामुळे वेगवेगळे आजार झाले होते. गांजाच्या व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद झाले होते.

एक दोन नाही, हजार नाही, तर ६० हजार लोकांना व्यसनांच्या विळख्यातून यादव सर यांनी बाहेर काढले आहे. तिथं असणाऱ्या प्रत्येक माणसावर स्वतंत्र चारशे पानांचा ग्रंथ होऊ शकेल, इतकं व्यसनांमुळे त्यांचे आयुष्य खंगून गेले होते.

प्रत्येकाची करूण कहाणी ऐकून असं वाटत होतं की, या जगात प्रचंड आनंद आहे, पण तुम्हाला जर एखादं व्यसन जडलं तर ते व्यसन कॅन्सरपेक्षाही खतरनाक असतं, हे तिथल्या प्रत्येक माणसाच्या पाणावलेल्या डोळ्यांतील आसवांना पाहून जाणवत होते.

यादव सर त्यांच्या कामात व्यग्र झाले. एका केंद्रात असलेली एक व्यक्ती संपूर्ण ट्रीटमेंट घेऊन घरी निघाली होती. त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी सोबतचे अनेकजण गेटपर्यंत आले होते.

मी त्या माणसाला विचारले, “काय झाले? तुम्ही कुठले? आता सुटले का व्यसन?”

तो माणूस मला म्हणाला, “मी राजीव रस्तोगी. मी ट्रक डायव्हर होतो. मित्रांच्या संगतीने दारूच्या व्यसनात बुडालो. शेवटी ज्या मित्रांची दारू यादव सर यांच्या सेंटरमुळे सुटली, त्याच मित्रांनी मला पैसे गोळा करून इकडे पाठवले. आज निर्व्यसनी बनून एक नवे आयुष्य मी सुरू केले आहे. कपाळावर टिळा आणि गळ्यात माळ हे सारे काही केंद्रात मिळणाऱ्या शिकवणीतून शक्य झाले. माणूस कितीही श्रीमंत किंवा कितीही गरीब असो, तो एकदा व्यसनाच्या आहारी गेला की त्याच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. मला दोन मुली आहेत. त्या कधी मोठ्या झाल्या आणि कधी त्यांचे लग्न झाले, हे मला कळलेच नाही. दारूपायी आयुष्य कसे उध्वस्त झाले, हे समजलेच नाही”, असे म्हणत राजीव रडत होते. बाकी सर्व जण त्यांची समजूत काढत होते. राजीव गेले. त्यांना पाठवताना त्यांचे सर्व मित्र भावुक झाले होते. मी यादव सर यांच्याकडे निघालो.

यादव सर यांच्याकडे असताना एक व्यक्ती तिथल्या सर्वांना घेऊन समुपदेशनाचे धडे देत होती. त्याचे समुपदेशन ऐकत राहावे असेच होते. त्या सेंटरमध्ये औषधाशिवाय वाचन, चिंतन, मनन, कीर्तन, हे सारे काही होते.

मी यादव सर यांच्याकडे गेलो. समुपदेशन करणारे सरही तिथे आले. त्या सरांची ओळख करून देताना यादव सर म्हणाले, “हा माझा मुलगा कृष्णा यादव. सर्व कामं आता हाच पाहतो. “

अजून एका मुलीला यादव सरांनी जवळ बोलावले. तिची ओळख करून देत ते म्हणाले, “ही कान्होपात्रा नखाते. चंद्रपूरची आहे. पुण्याच्या दवाखान्यात अधिकारी आहे. आमच्याच नर्सिंग कॉलेजमध्ये शिकली आहे. नखाते यांच्यासारख्या १५० मुली दरवर्षी आमच्या कॉलेजमधून प्रशिक्षित होऊन बाहेर पडतात. आम्ही जो सेवाभाव ठेवून काम उभे केले आहे, त्या कामाला ह्या सर्व मुली हातभार लावतात. पाचवीच्या मुलांपासून ते ७५ वर्षांच्या व्यक्तीपर्यत सर्वांच्या व्यसनाचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत. “

अतिशय चिंताग्रस्त चेहरा करून यादव सर म्हणाले, “एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने जाण्याचा कानमंत्र दिला खरा, पण प्रचंड प्रगती आणि सहजतेने, निष्काळजीपणाने आम्ही खूप गतीने मनोरुग्णतेच्या दिशेने वाटचाल करतोय. अनेक ठिकाणी हेच चित्र आहे”. यादव सर खूप तळमळीने बोलत होते आणि मी खूप हतबल होऊन ऐकत होतो.

यादव सरांचे काम समजून घेताना रात्रीचे अकरा कधी वाजले, ते कळलेच नाही. यादव सरांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला लागलो. यादव सर, त्यांचे वडील रघुनाथ यादव, सरांची आई भगीरथबाई आणि आता तिसरी पिढी, म्हणजे यादव सरांचा मुलगा कृष्णा यादव हे सर्व कुटुंबीय सुरू केलेले काम खूप नेटाने पुढे नेत आहेत. समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे अनेक यादव परिवार आपल्या आसपास आहेत, ज्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे, बरोबर ना? 

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

मध्यंतरी माझा एका पालकांशी वाद झाला. त्यांची अशी फार प्रबळ इच्छा होती की, त्यांच्या मुलानं सीए व्हावं. पण त्या मुलाच्या एकूण बुद्धिमत्ता आणि क्षमतांचा अंदाज घेता ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. मी त्यांना माझं मत सांगितलं. त्यावर ते उसळून म्हणाले, “रिक्षावाल्याची मुलगी सीए होऊ शकते तर हा का होऊ शकत नाही?” एका उच्चशिक्षित पालकांचा दृष्टीकोन असा असू शकतो, हे पाहून मला आश्चर्य वाटलं.

सीए हे केवळ एक उदाहरण आहे. पण अनेक क्षेत्रांच्या बाबतीतही पालकांचे हेच दृष्टीकोन पहायला मिळतात. पुण्यात शिकायला ठेवलं, मोठमोठे महागडे क्लासेस लावले, ट्यूशन्स लावल्या म्हणजे हवं ते यश मिळतंच, अशा गोड भ्रमात पालक आणि मुलं मस्त डुंबत असतात.

मी त्यांना विचारलं, “मग ह्याच न्यायानं एका गरीब सामान्य नावाड्याचा मुलगा जर जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ बनू शकतो तर अन्य मुलं का बनू शकत नाहीत?” माझ्या प्रश्नाचा त्यांना राग आला. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतच होतं.

“तुम्ही ‘स्लमडाॅग मिलेनिअर’ हा सिनेमा पाहिलाय का?” मी विचारलं.

“हो. मी पाहिलाय. ” ते म्हणाले.

“झोपडपट्टीत राहणारा, कधीही शाळेत न गेलेला, आणि कंपनीत ऑफिसबाॅयचं काम करणारा मुलगा करोडपती कसा काय बनला?” मी विचारलं.

“कसा काय म्हणजे? समोरच्या व्यक्तीनं त्याला जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं त्यानं अगदी अचूक दिली. म्हणूनच तो करोडपती झाला. यात न समजण्यासारखं काय आहे?” ते विजयाच्या सुरात म्हणाले.

“बरोब्बर. आता माझा एक साधा प्रश्न आहे. जर तो अडाणी, गरीब मुलगा १५-२० प्रश्नांची उत्तरं देऊन एक कोटी रूपये मिळवू शकतो, मग तुम्ही तर उच्चशिक्षित आहात. त्याच कार्यक्रमामधून एक कोटी रूपये मिळवणं तुम्हाला अजिबातच अवघड नाहीय. ” मी असं म्हटल्यावर त्यांचा नूरच पालटला. ते खूप अस्वस्थ झाले.

“ह्याच न्यायानं स्पर्धा परिक्षा देणाऱ्या प्रत्येक मुलानं त्यात भाग घेऊन दणादण एकेक कोटी रूपये कमवायला हवे होते ना? दहावी किंवा बारावी पर्यंत शिकलेल्या कुणालाही यात भाग घेऊन ही रक्कम जिंकता आली असती. पण तसं घडलं का?” मी आणखी एक पिल्लू सोडलं. ते गप्प झाले.

स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांचा अभ्यास करणारी मुलं तर दिवसरात्र अभ्यास करत असतात. मग त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या शोज् मध्ये भाग घेणं आणि भरपूर पैसे कमावणं मुळीच अशक्य नाही. एक मिनिटही अभ्यास न केलेला एक मुलगा एक कोटी रूपये जिंकतो आणि वर्षानुवर्षं दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षा पास होता येत नाहीत, ही काय भानगड आहे? 

“तुम्ही तो सिनेमा पुन्हा बघा. त्या मुलानं कार्यक्रमासाठी कसलाही विशेष अभ्यास केला नव्हता. तयारी केली नव्हती. साधं चहावालं पोरगं होतं ते. रोजचा पेपरसुद्धा वाचत नसेल. तर मग जनरल नाॅलेज च्या पुस्तकांचा तर संबंधच येत नाही. ” मी म्हटलं.

“हो ना. पण अशा परिस्थितीतही तो करोडपती झालाच ना?” ते.

“इथंच तर तुम्ही चुकताय. त्याला जे जे प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न सुशिक्षितांच्या दृष्टीने कठीण होते. पण, तो अशिक्षित मुलगा मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कारण, त्यातले प्रश्न त्याच्या रोजच्या जगण्यावागण्याशी निगडीतच होते. त्या प्रत्येक प्रश्नाशी त्याची एकेक आठवण जोडली गेली होती. केवळ तेवढ्याच बळावर तो प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कोणताही विशेष अभ्यास न करता! ” मी म्हटलं.

“मी हा विचारच केला नव्हता! ” ते आश्चर्यानं म्हणाले.

“तेच मी म्हणतोय. गरीब अडाणी माणूस केवळ अनुभवांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं काय देतो आणि चक्क करोडपती काय होतो! यात कष्टांचा किंवा अभ्यासाचा संबंधच कुठं आला? म्हणजे हा एक प्रकारचा जुगारच होता ना?” मी विचारलं.

“हा जुगारच म्हटला पाहिजे. ” त्यांचं उत्तर.

“बिनअभ्यासाचे कुणी एक कोटी रूपये का देईल का?” माझा सरळ प्रश्न.

“खरं आहे. ” ते.

“हेच माझं म्हणणं आहे. आपण नुसत्या दिसण्यावर जाऊ नये. खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. खातरजमा केली पाहिजे. आपण यातलं काहीच न करता मोठी जोखीम पत्करतो आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते. ” 

“मग आता काय करावं?” ते.

“माश्यानं पाण्याबाहेर सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्याला लोक मूर्ख म्हणतात. कारण, काल्पनिक भराऱ्या मारून करिअर होत नाही. त्याला वास्तविकतेचा आधार असलाच पाहिजे. तुम्ही मुलांच्या बाबतीत अवास्तव अपेक्षा करणार आणि नको त्या रेसमध्ये त्यांना पळवणार, हे खरोखरच आवश्यक आहे का? प्रत्येक स्लमडाॅग हा मिलेनिअर होऊ शकत नाही आणि प्रत्येक मिलेनिअर हा स्लमडाॅगच असतो असाही नियम नाही. अपवादांनाच सिद्धांत समजण्याची चूक आपण कधीही करू नये. ” मी.

पालक आणि मुलं ‘मला नेमकं काय जमेल?’ याहीपेक्षा ‘मला काय जमू शकेल?’ याचाच विचार अधिक करतात. म्हणूनच, ज्या गोष्टींचा भरवसा नाही आणि ज्यांच्याविषयी धड माहितीही नाही, असेच निर्णय मोठ्या आशेने आणि धाडसाने घेतले जातात. खरं तर अशी विचित्र रिस्क आपण कधीच घेत नाही. पण शिक्षण आणि करिअर निवडीमध्ये मात्र ती घेतली जाण्याचं प्रमाण मोठं आहे. आपण आपल्या सोयीनं नेमके अपवादच शोधतो आणि त्यांनाच सिद्धांत समजण्याची चूक करतो. ही फार मोठी चूक आहे.

आपण आणि आपल्या मुलांनी फॅन्टसीमध्ये जगणं सोडायला हवं. निदान करिअरच्या बाबतीत तरी..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ W F H…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ W F H… – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

एक विनोदी पण कटू सत्य 

कोरोना जाता जाता आपल्याला Work from home हा एक नवीनच रोग देऊन गेला

…. फार पूर्वी प्रत्येक घरात एक बाळंतीण रूम असायची, just like that आताही बऱ्याच घरी ती रूम असते, तेथे एक आय टी इंजिनिअर दिवाणावर वाकडा तिकडा पडलेला असतो, फक्त बाळाऐवजी लॅपटॉप असतो.

 

कहर म्हणजे बरेचसे जस्ट मॅरीड पोट्टे रात्री दोन पर्यंत लॅपटॉपशी झुंजत असतात, आता त्या घरातील आजीच्या मांडीवर नातू कसा आणि कधी खेळेल?

रिटायर्ड माणूस घरात जड होतो, पण ही बाळंतीण आय टी वाली जड नाही कारण मोठे पॅकेज असते ना आणि घरातील म्हाताऱ्या लोकांना कधीतरी कार मध्ये फिरवतो.

घरात चहा, नाश्ता तयार झाला की अगोदर ह्या आय टी बाळंतिणीला मिळाला पाहिजे, फक्त शेक, शेगडी आणि अळीवाची खीर तेवढी बाकी राहते, डिंक लाडू सुद्धा माऊली तयार ठेवते कारण तिच्या नवऱ्याने एवढे मोठे पॅकेज कधी तिला दिलेले नसते ना

काही असे आय टी वाले तर दिवाळीत नवे कपडे म्हणून ओन्ली बनियन आणि बर्मुडा घेतात म्हणे.

Work from home ही कॉन्सेप्ट आमच्या पुण्यात नवीन न्हाय, लै वर्षापूर्वी विडी कामगारांना विडीची पाने आणि तंबाखू मोजून दिली जायची आणि ते घरून विड्या करून आणायचे.

बऱ्याच ठिकाणी नवरा घरून काम करतो आणि बायको ऑफिसला जाते कार घेऊन, आणि येताना कोथींबिर घेऊन येते.

ही अशी दिवाणवरची दिवाणी मंडळी मग वीकेंड ला जवळच्या एखाद्या वागळीवर जाऊन, वडा पाव खाऊन येतात आणि नायगारा फॉल्स ला गेल्यासारखे बडेजाव करतात

ही आय टी वाली मंडळी लाँग टूर म्हणून कधी कधी सासुरवाडीला निघतात, U S वरून इंडिया ला निघाल्यासारखे आणि मग धुतलेले, इस्त्री केलेले कपडे शोधत बसतात.

कायम स्वरुपी ह्यांना W F H दिले तर पुण्याचे फ्लॅट रेट तरी कमी होतील, एवढेसे खुराडे एक कोटीला म्हणे पुण्यात, कशाला रहायचंय पुण्यात? चितळ्यांची बाकरवडी आणि जोशीचा वडा पाव खायला?

ह्या आय टी वाल्यांना आत्ताच बॅक पेन, मणके, कंबरदुखी, eyesight weak होणे असे प्रॉब्लेम सुरू झालेत, मोठे पॅकेज आणखी पाच दहा वर्षांनी ट्रीटमेंला लागणारच आहे म्हणा

आय टी वाल्याला महिना दोन लाख पगार असतो, पण सोसायटी मध्ये पण कोणी ओळखत नाही आणि सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्याला पन्नास हजार पगार पण अर्धी सिटी त्याला ओळखते आणि त्याचे कुठले काम अडत नाही, हा फरक आहे.

पूर्वी इंग्रजांची वेठबिगारी केली आणि आता अमेरिकेची वेठबिगारी,

काय होणार आहे पुढच्या पिढ्यांचे देव जाणे……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “कानाचे आत्मवृत्त —…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “कानाचे आत्मवृत्त —…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

मी आहे कान!

खरं म्हणजे ‘आम्ही आहोत’ कान! कारण आम्ही दोन आहोत! आम्ही जुळे भाऊ आहोत.

पण आमचं नशीबच असं आहे की आजपर्यंत आम्ही एकमेकांना पाहीलेलंही नाही.

कुठल्या शापामुळेआम्हांला असं विरुद्ध दिशांना चिकटवून पाठवून दिलंय काही समजत नाही.

दुःख एवढंच नाही,

आमच्यावर जबाबदारी ही फक्त ‘ऐकण्याची’ सोपविली गेल्ये.

शिव्या असोत की ओव्या, चांगलं असो की वाईट, सगळं आम्ही ऐकतच असतो.

हळूहळू आम्हाला खुंटीसारखं वागविलं जाऊ लागलं.

चष्मा सांभाळायचं काम आम्हांला दिलं गेलं.

फ्रेमची काडी जोखडासारखी आम्हांवर ठेवली गेली.

(खरं म्हणजे चष्मा हा तर डोळ्यांशी संबंधित आहे. आम्हाला मध्ये आणण्याचा प्रश्नच नव्हता.)

लहान मुले अभ्यास करीत नाहीत किवा त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही तेव्हा मास्तर पिरगळतात मात्र आम्हांला!

भिकबाळी, झुमके, डूल, कुडी हे सर्व आमच्यावरच लटकविलं जातं… त्यासाठी छिद्र ‘आमच्यावर’ पाडावी लागतात, पण कौतुक होतं चेह-याचं!

आणि सौंदर्य प्रसाधने पहाल तर आमच्या वाट्याला काहीच नाही. डोळ्यांसाठी काजळ, चेह-यासाठी क्रीम, ओठांसाठी लिपस्टीक! पण आम्ही कधी काही मागीतलंय?

हे कवी लोक सुद्धा तारीफ करतात ती डोळ्यांची, ओठांची, गालांची!

पण कधी कुठल्या साहित्यिकाने प्रेयसीच्या कानांची तारीफ केलेली ऐकल्ये?

कधी काळी केश कर्तन करताना आम्हाला जखमही होते. त्यावेळी केवळ डेटाॅलचे दोन थेंब टाकून आमच्या वेदना अजून तीव्र केल्या जातात.

कीती गोष्टी सांगायच्या? पण दुःख कुणाला तरी सांगीतले तर कमी होते असे म्हणतात.

भटजींचे जानवे सांभाळणे, टेलरची पेन्सील सांभाळणे, मोबाईलचा ईअरफोन सांभाळणे ह्या मध्ये आता ‘मास्क’ नावाच्या एका नवीन गोष्टीची भर पडली आहे.

आणा, अजून काही नवीन असेल आणा टांगायला. आम्ही आहोतच खुंटीसारखे.. सर्व भार सांभाळायला!

पण तुम्ही हे आमचं आत्मवृत्त ऐकून हसलात ना? असेच हसत राहा. ते हास्य ऐकून आम्हांलाही बरं वाटलं.

हसते रहा, निरोगी रहा! …

टवकारलेत ना कान!

कुठल्या कानान लिवलं म्हाईत नाय 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares