मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कारात् द्विज उच्यते… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ संस्कारात् द्विज उच्यते… ☆ श्री अरविंद लिमये ☆

सर्वसाधारणपणे मानवेतर प्राणी नैसर्गिक प्रेरणेनुसारच प्रत्येक कृती करीत असतात. मानवाला बुद्धीची देणगी असल्याने त्याने मात्र बुद्धीचा योग्य उपयोग करून कोणतीही कृती करणे अपेक्षित असते. त्याची प्रत्येक कृती सर्वांगीण विचार करुन,तिची योग्यायोग्यता विचारात घेऊन कशी आणि कां करायची याचे महत्त्व संस्कारच नकळत मनात रुजवत असतात. ही रुजवण संस्कारक्षम वयातच खोलवर होऊ शकते.म्हणूनच लहानपणापासूनच कौटुंबिक पातळीवर पालकांनी आणि शालेयस्तरावर शिक्षकांनी मुलांच्या मनोभूमीवर संस्कार बीजांची पेरणी करणं आवश्यक ठरतं. या संस्कारांची गुणात्मकता संस्कारांइतकीच ते कसे केले जातात यावरही अवलंबून असते. लहान वयात मुलांनी एखाद्या  गोष्टीचा हट्ट केला तर त्याला पटकन् होकार किंवा नकार न देणे ही संस्कारांच्या रुजवणीतील पहिली पायरी.कारण या दोन्हीही गोष्टींचा दीर्घकाळ टिकणारा नकारात्मक परिणाम हानिकारक ठरणारा असतो. त्याच्या मागणीप्रमाणे एखादी वस्तू देताना ती कशी वापरायची, कशी सांभाळायची, तिची कशी काळजी घ्यायची हे समजावून सांगणं जसं महत्त्वाचं तसंच ती वस्तू देणं त्याच्या हिताचं नसेल तर ते कां हे त्याला समजेल अशा पध्दतीने त्याला सांगणंही!तसेच ती वस्तू आवश्यक असूनही देता येणे शक्य नसेल तर त्याला त्याची कारणे त्याच्या कलाने समजावून सांगणेही अगत्याचेच.

मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावण्यासाठी त्यांना सतत उपदेशाचे डोस पाजत राहिलं तर ते त्याना कडवट औषधासारखेच वाटणार. ‘हे कर’, ‘ते करू नको’ याचा त्यांना आधी नावड मग कंटाळा या क्रमाने अखेर तिरस्कारच वाटू लागेल. ‘हे करायलाच हवं’ असं अट्टाहासाने सांगत राहिल्यास ते तोंडदेखलं तेवढ्यापुरतं करून एरवी ते करणं सातत्याने टाळण्याकडेच बालसुलभ कल रहाणं अपरिहार्यच असतं. म्हणूनच जे मुलांनी करावं अशी आपली अपेक्षा असते ते आपल्या कृतीने त्याला जाणवेल असे सहजपणे आपणही करीत रहाणे महत्त्वाचे ठरते. त्यांना गोडीगुलाबीने एकदा समजून सांगितले तरी आपल्या अनुकरणानेच तसे वागण्यास मुलेही आपसूकच उद्युक्त होतात. म्हणूनच मुलांना खरं बोलावं असं सांगतानाच मोठ्या माणसांनीही खोटं न बोलण्याचं पथ्य आवर्जून पाळायला हवं. लवकर उठणे, दोन्ही जेवणानंतर दात घासणे, जेवताना आनंदी वातावरण ठेवणे, झोपून न वाचणे, मोबाईल व टीव्हीचा अतिरेकी वापर न करणे,पाण्याचा अपव्यय टाळणे, कोणाचाही वावर नसणाऱ्या खोल्यातील लाईटस् वेळोवेळी बंद करणे यासारख्या गोष्टी उपदेशाने नव्हे तर मोठ्या माणसांनी स्वतःच अंगिकारलेल्या पाहूनच मुले सहज सुलभपणे त्या अंगी बाणवण्यास नकळत प्रवृत्त होतात.

संस्कार हे अट्टाहासाने करायचे नसतातच.ते सहजपणेच व्हायला हवेत. एखाद्या चांगल्या गोष्टीचे महत्त्व ती एकदा अंगवळणी पडली की समजतेच. नैसर्गिक उपलब्धीचा काटकसरीने वापर करण्याची सवय,कष्टाने पैसे मिळवता येईपर्यंत ते वाचवण्याची सवय, या गोष्टी स्वतः पैसे मिळवू लागल्यानंतरही बचतीला पूरकच ठरतात. नम्रतेने वागायची सवय कितीही राग आला तरी कुणापुढेही आवाजावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम बनवते, माणुसकीचा संस्कार ‘नाही रे’ वर्गातल्या गरीब मित्राबद्दल तिरस्कार किंवा घृणा निर्माण न करता त्याच्याशी आपुलकीने वागण्यास प्रवृत्त करते.. हे असे संस्कार म्हणजेच कालातीत अशा मूल्यांचे रोपणच.हे मूल्यसंस्कारच घरातील वातावरण निकोप, निरोगी,मनमोकळं ठेवतील.अशा वातावरणातले संस्कार मुलांवर लादले जाणार नाहीत तर ते त्यांच्या मनात आपसूक  झिरपत जातील.आणि तेच मुलांच्या शारीरिक आणि मानसिक सक्षमतेला पूरकही ठरतील. परस्परांमधील संवादातून, सहवासातून, स्वानुभवातून योग्य विचार करायला ती मुले स्वतःच प्रवृत्त होतील.

स्वतः खाताना दुसऱ्याला न देता खाणे ही प्रकृती, दुसऱ्याचे हिसकावून घेऊन खाणे ही विकृती, आणि आपल्या घासातला घास काढून तो दुसऱ्याला देणे ही संस्कृती. मुलांवर संस्कारक्षम वयात केलेले संस्कार त्याना विकृतीपासून दूर ठेवत सुसंस्कृत बनवतील ते या अर्थाने!

माणूस जन्मतः द्विपाद प्राणी म्हणूनच जन्माला येतो आणि उचित संस्कारातूनच त्याचा  दुसरा जन्म होतो तो ‘सांस्कृतिक जन्म’ या अर्थाने! द्विज म्हणजे ब्राम्हणच नव्हे तर असा दोनदा जन्म घेऊन सुसंस्कारित झालेला कुणीही. प्रत्येक धर्माचेच असे विविध संस्कार असतातच. ते महत्त्वाचे मानले तरीही त्यांना जेव्हा अवास्तव महत्त्व दिले जाते तेव्हा माणूस संस्कारीत न होता संस्कारबध्द होतो आणि त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संकोचच होतो.

‘जन्मना जायते शूद्र:

संस्कारात् द्विज उच्यतेl’

या श्लोकाचा व्यापक अर्थ घेतला तर  संस्कारांचे नेमके महत्त्व त्यातच लपलेले आहे हे लक्षात येईल. सखोल ज्ञान प्राप्त करणारा माणूस ज्ञानी,विद्वान म्हणता येईलही पण तो सुसंस्कारित नसेल तर मात्र फक्त शिक्षितच राहील. खऱ्या अर्थाने सुसंस्कारित असणारा माणूस मात्र ज्ञानी, विद्वान माणसाइतका शिक्षित नसला तरीही सत्प्रवृत्त आणि

सूज्ञ असेल आणि म्हणून तोच खऱ्या अर्थाने दोनदा जन्म घेणारा म्हणून ‘द्विज’ बनून संस्कारात् द्विज उच्यते’  या श्लोकाचा अर्थही पूर्णतः सार्थ करेल!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग-४४ – ते … पाच आठवडे ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ४४ – ते … पाच आठवडे ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आलीया भोगासी असावे सादर ! केव्हढा मोठा धक्का? ज्या सर्वधर्म परिषदेत भाग घ्यायला अमेरिकेत आलो ते ध्येय च साध्य होणार नाही? आपल्यासाठी सर्व शिष्यांनी एव्हढी धडपड केली ती सर्व व्यर्थ जाणार? मनातून स्वामीजी नक्कीच खूप अस्वस्थ झाले असतील. आपलीही चूक त्यांच्या लक्षात आली. म्हणजे या विषयीचं अज्ञान जाणवलं. कारण सर्वधर्म परिषद भरवण्याची योजना गेली दोन वर्ष चालू होती. जगातले सर्व प्रमुख धर्म, पंथ,संप्रदाय त्या त्या धर्माच्या विविध संस्था यांच्याशी पत्रव्यवहार चालू होता. त्यामुळे त्या त्या देशासाठी समित्याही स्थापन झाल्या होत्या. एव्हढच काय भारतासाठीही समिति झाली होती. पण याची तिळभरही कल्पना स्वामीजींना आणि त्यांच्या शिष्यांना नव्हती. शिवाय अशी अधिवेशने कशी भरतात,त्याची पद्धत काय असते, हे ही माहिती नव्हते. शिष्यांनाही वाटलं की एकदा अमेरिकेला पोहोचले की पुढचं सगळं आपोआप होईल. या त्रुटी लक्षात आल्या. आणखी एक महत्वाचं कारण होतं, या धर्म परिषदेसाठी केलेल्या भारतीय समितीत परंपरांबरोबर धर्माला विरोध करणारे ब्राह्म समाजाचे आणि सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. की जे स्वामीजींना पण ओळखत होते. त्यांनी महाबोधी समिति आणि जैन समिती च्या प्रतींनिधींना परवानगी दिली होती. भारतातला प्रमुख धर्म हिंदू असला तरी त्याच्या प्रतिनिधित्वाबद्दल विचार केला गेला नव्हता. दुर्दैवच म्हणावं.

परिषदेला अजून वेळ होता तोवर शिकागोतले हे थंडीचे दिवस कसे निघणार?जवळचे पैसे तर भरभर संपत होते. आता सर्वात गरज होती ती पैशांची. थंडीसाठी गरम कपडे घेण्यासाठी शंभर डॉलर्स लागणार होते. स्वामीजी हताश झाले त्यांनी अलसिंगा ना तार केली, ‘सर्व पैसे संपत आलेत उपाशी राहण्याची वेळ आली आहे’. मद्रासला अलसिंगा यांनी भरभर वर्गणी गोळा करून तीनशे रुपये आणि मन्मथनाथ यांनी पाचशे रुपये पाठवले.’ एका दुर्बल क्षणी’ आपण तार केली असे त्यांनी पत्रात म्हटले. पण त्यांचा निर्धार पक्का होता काही झाले तरी मागे हटायचे नाही. परिषदेत भाग घ्यायचाच.

इथली व्यवस्था लागेपर्यंत स्वामीजी वेळ सत्कारणी लावत होते. तिथे जे औद्योगिक प्रदर्शन भरलं होतं ते पहायला रोज जात. ते अवाढव्यच होतं. सातशे एकर जागेवर ते उभं केलं होतं. या कामासाठी दोन वर्ष, सात हजार मजूर काम करत होते. सातशे जखमी झाले, अठरा मृत्यूमुखी पडले. यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येते. त्यात वेगवेगळे विभाग होते, रचना सुंदर होती. अडीच कोटीहून अधिक लोकांनी याला भेट दिली होती. यात विज्ञानातील अद्ययावत संशोधन, त्याचा उपयोग, यंत्रे उपकरणे, हे सर्व मांडलं होतं. यातलं मानवाची बुध्दी आणि कर्तृत्व स्वामीजींना आकर्षित करणारं होतं. त्यांना ते आवडलं होतं. ते आठवडाभर रोज बघायला जात.

त्या प्रदर्शनात स्वामीजींना अनेक अनुभव आले. अमेरिकन वृत्तपत्राची नीतीमत्ता कशी याचा अनुभव आला.  कपूरथळयाचे महाराज प्रदर्शनात फिरत होते. पहिल्याच दिवशी प्रदर्शनात एक वार्ताहर एका भारतीय माणसाची मुलाखत घेत होता, तो भारतीय लोकांची अवस्था सांगू लागला, दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रात ‘ हा महाराज दिसतो तसा नाही ,तो हलक्या जातीचा आहे, हे सर्व राजे ब्रिटीशांचे गुलाम आहेत, ते नैतिकतेने वागत नाहीत असं काही स्वामीजींना उद्देशून सनसनाटी वृत्त दिले, भारतातील एक विद्वान प्रदर्शनास भेट देतो अशी स्तुति करून, ते न बोललेली वाक्ये त्यांच्या तोंडी घातली होती.

त्यांच्या वेषामुळे सर्वांच लक्ष वेधलं जायचं. प्रदर्शन पाहता पाहता एकदा तर मागून कुणीतरी त्यांच्या फेट्याचं टोक ओढलं. स्वामीजींनी मागे वळून इंग्रजीतून आपली नाराजी व्यक्त केली. तसे, सद्गृहस्थ स्वामीजीना इंग्रजी येतं हे ऐकून, वरमून म्हणाले तुम्ही असा पोशाख का करता? कुतूहल म्हणून कुणी विचारलं तर ठीक, पण असा मागून ओढणं हा असभ्यपणाच. प्रदर्शन पाहताना एकदा गर्दीत तर त्यांना मागून ढकललं आणि मुद्दाम धक्का पण मारला गेला होता. असाही अनुभव त्यांना आला. वरच्या वर्गातील सुशिक्षित लोक असे वागतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं.

बोस्टनला तर आणखीनच वाईट अनुभव. स्वामीजी रस्त्यावरून जात असताना त्यांना आपल्या मागून कुणीतरी येत असल्याचा भास झाला. त्यांनी मागे वळून पाहिले तर, काही मुलांचा आणि मोठ्या माणसांचा जमाव मागून येत असल्याचे दिसले ते पाहून स्वामीजी वेगात चालू लागले, तसे ते ही लोक वेगात आले. क्षणात आपल्या खांद्यावर काहीतरी आदळलं  हे कळताच स्वामीजी धावत सुटले आणि अंधार्‍या गल्लीत नाहीसे झाले. थोड्या वेळाने मागे पहिले तर तो जमाव निघून गेला होता. स्वामीजींनी सुटकेचा निश्वास टाकला. स्वामीजींना लक्षात आली पाश्चात्य देशातली वर्णभेदाची विषमता. समतेचं तत्व पाश्च्यात्यांकडून शिकावं असं भारतात अनेक वर्ष शिकवलं जात होतं. तिथेच हे अनुभव आले. पाश्चात्य संस्कृतीतल्या गुणदोषांची आल्या आल्याच जवळून ओळख होत होती. स्वामीजींवरील हा हल्ला परदेशात झाला होता . इथे प्रकर्षाने आठवण झाली ती नुकत्याच पालघर मध्ये झालेल्या निर्दोष साधूंच्यावरील हल्ल्याची. त्यात त्यांना प्राणास ही मुकावे लागले. जी सर्वसामान्य प्रत्येक माणसाला प्रचंड धक्का देणारी होती. आपल्याच देशात घडलेली ही घटना समता बंधुत्वाबद्दल काय सांगते?

आता विवेकानंदांना आर्थिक अडचण सोडवण महत्वच होतं. बोस्टनला राहील तर स्वस्त पडेल असं कळल्याने ते तिकडे जाण्याचं प्रयत्न करू लागले. स्वामीजी प्रथम जहाजातून व्हंकुव्हरला उतरून शिकागोला जाणार्‍या कॅनेडियन पॅसिफिक या गाडीत बसले तेंव्हा, स्वामीजिंना भेटलेल्या केट सॅंनबोर्न यांनी पत्ता दिला होता तो बोस्टन जवळचा होता. या पहिल्याच भेटीत ओळख झालेल्या स्वामीजींचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की, “रेल्वेत मी विवेकानंदांना प्रथम पाहिलं, त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व हा पौरुषाचा एक उत्तुंग आविष्कार होता. त्यांचे इंग्रजी माझ्यापेक्षाही अधिक चांगले होते. प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याशी त्यांचा परिचय होता. शेक्सपियर किंवा लॉङ्गफेलो किंवा टेनिसन, डार्विन, मूलर, आणि टिंडॉल यांची वचने त्यांच्या मुखातून अगदी सहजपणे बाहेर पडत होती. बायबलमधील उतारे त्यांच्या जिभेवर होते. सारे धर्म आणि संप्रदाय याची त्यांना माहिती होती आणि त्या सर्वांविषयीची त्यांची दृष्टी सहिष्णुतेची होती. त्यांच्या सान्निध्यात असणे हेच एक शिक्षण होते”.असा ठसा त्यांच्या मनात पाहिल्याच भेटीत उमटला होता. ही एक चांगली आनंद देणारी बाब होती.

विवेकानंदांनी केट सॅंनबोर्न यांच्याकडे जाण्याचं ठरवलं आणि शिकागोहून रेल्वेने बोस्टनला आले. विश्रांगृहात थांबून त्यांनी आल्याची तार केली त्याला उत्तर आलं की, ‘आजच्या दुपारच्या गाडीने तडक इकडे या’. तिथून त्यांचे घर चाळीस किलोमीटर वर गूसव्हिल इथे होते. त्या स्वता विवेकानंदांना घ्यायला आल्या आणि त्यांना घरी घेऊन गेल्या. इथूनच सुरू झाला त्यांच्यासाठी अनुकूल घटनांचा काळ.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेनापती बापट : आमचे अभिमानास्पद पूर्वज ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सेनापती बापट : आमचे अभिमानास्पद पूर्वज ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नशीब ही गोष्ट आहे की नाही ह्याबद्दल कायमच मतमतांतरे असतात. परंतू  एक गोष्ट नक्की,  तुम्ही कुठे जन्म घेता हे तुमचं नशीबच ठरवतं. आणि एकदा आपण ज्या घरात वा घराण्यात जन्म घेतला, त्या घराण्याचा आपल्याला अभिमान वाटतो. ह्या घराण्यातील आपल्या थोर पूर्वजांचा आपण आदर्श घेतो, त्यांच्या वाटेवरुन चालायचा प्रयत्न करतो.

पुरुषांना आपलं घराणं हे एकदाच, म्हणजे जन्मजातच मिळतं. परंतू स्त्रिया थोड्या जास्त नशीबवान, त्यांना जन्मजात एक घराणं तर मिळतंच, पण विवाहानंतर दुसरं घराणं पण स्वतःच्या मनाने निवडायला मिळतं.—— 

१२ नोव्हेंबर— म्हणजे आज सगळ्यांसाठीच आदर्शवत असणाऱ्या आमच्या पूर्वजांची जयंती—–

—आज सशस्त्र क्रांतिकारक, समाजसेवक, तत्वनिष्ठ, अशा सेनापती बापट ह्यांची जयंती. ते आमचे पूर्वज आहेत ह्याचा आनंद, अभिमान प्रत्येक बापट व्यक्तीला वाटतोच वाटतो.

सेनापती बापटांची प्राथमिक ओळख अशी —– ते महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे पुत्र.  त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना मानाची म्हणून मान्यता पावलेली संस्कृतची ‘ जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती ‘ मिळाली होती. त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि  ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला—-     

— पण तिथेच देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न आणि चक्र त्यांच्या डोक्यात फिरायला लागले. आपली मातृभूमी परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपण प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. या विचाराने ते इतके झपाटून गेले की , कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच १९०२ मध्ये त्यांनी आपल्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी पुढीलप्रमाणे शपथ घेतली. ती त्यांच्याच शब्दांत अशी —-” मी आजपासून देशासाठी आजीवन  काया, वाचा, मनाने झटेन आणि त्याची हाक येताच देशसेवेसाठी धावत येईन. या कामी मला देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून याच भरतखंडात जन्म घेईन व अपुरे राहिलेले काम करून दाखवीन,“.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र  शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. अलीपूर बॉंब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इ. स. १९२१ पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.

इ. स. १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना “ सेनापती “ म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहवासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. संस्थानांतील प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तर काळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

कुठल्याही सुधारणेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून करावी, कारण सांगणं सोप्पं पण आचरणं कठीण, हे सेनापतींचं ठाम मत होतं. म्हणून नोव्हेंबर १९१४ मध्ये त्यांना मुलगा झाल्यावर, त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले. 

एप्रिल १९१५ मध्ये ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या ‘ चित्रमय जगत ‘ या मासिकात नोकरी करू लागले.    

त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत. 

पुढे सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या ‘संदेश’ नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. ‘ झाडू-कामगार मित्रमंडळ ‘ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून, भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती. त्यांना भयंकर यातना सहन कराव्या लागल्या होत्या हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी, डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालवली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’ राजबंदी मुक्ती मंडळ ‘ स्थापन केले होते. इ.स.१९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

मराठी भाषेच्या दृष्टीने एक अत्यंत मोलाचे काम श्री. पां.म.बापट यांनी केले. योगी श्रीअरविंद यांच्या ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे. श्रीअरविंद आश्रम, पुडुचेरी यांच्यामार्फत हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सेनापतींनी लिहिलेल्या या काव्यपंक्तींवरून त्यांचा जाज्वल्य महाराष्ट्राभिमान दिसून येतो. महर्षी अरविंद घोष यांच्या क्रांतिकारी व आध्यात्मिक अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा सेनापती बापटांवर प्रभाव होता. महर्षी अरविंदांच्या 

‘दी लाईफ डिव्हाइन‘ या ग्रंथाचा त्यांनी ‘ दिव्य जीवन ‘ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. याखेरीज ‘ चैतन्यगाथा ’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. संस्कृत, इंग्रजी व मराठी या भाषांतून त्यांनी काव्यरचना केली आहे. हैदराबादच्या तुरुंगात सेनापती बापट यांनी Holy Sung (होली संग) या नावाचा इंग्रजी काव्यसंग्रह लिहिला. 

अशा प्रकारे सशस्त्र क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, तत्त्वचिंतक अशा विविध नात्यांनी भारतमातेची व भारतीय जनतेची सेवा करणारा हा सेनापती बापट यांचा २८ नोव्हेंबर, १९६७ रोजी मृत्यू झाला.

 त्यांचे पारनेर मधील घर “ सेनापती बापट स्मारक “ म्हणून ओळखले जाते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ लाडकी बाहुली… 🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

लहानमोठ्या सगळ्या माणसांना खेळायला आवडतं. खेळ म्हणजे मनोरंजन किंवा शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा, कोणतीही ऍक्टव्हिटी. खेळणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.खेळ आपल्याला व्यथा, चिंता विसरायला लावतात. खेळांमुळे विरंगुळा मिळतो. शरीर आणि मन ताजेतवाने होते. मैदानी खेळांचे फायदे तर पुष्कळ आहेत. कब्बडी, खो खो सारख्या खेळांमुळे भरपूर व्यायाम होतो, शरीर बळकट,काटक बनते. चिकाटी, दमदारपणा, खिलाडूवृत्ती असे अनेक गुण वाढीस लागतात.

आजच्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या लहानपणी भरपूर खेळायला मिळालं. अभ्यास कमी आणि खेळ दंगा जास्त. खरंखुरं निरागस, बिनधास्त बालपण या पिढीनं अनुभवलं. आधुनिक खेळ, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स या पासून अनभिज्ञ राहिलेली ही मुलं छोट्या छोट्या गोष्टीत रममाण होत असत. गोट्या, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे,लगोऱ्या असे खेळ खेळत ही मुलं मोठी झाली. सूरपारंब्या, मामाचं पत्र हरवलं, लपंडाव अशा खेळांना वेगळं साहित्य लागत नसे. पैसे तर बिल्कुल लागत नसत. लागत असे फक्त खेळण्याची, सवंगड्यांची ओढ. या खेळांनी ही पिढी शारीरिक दृष्ट्या सुदृढ आणि मानसिक दृष्ट्या सक्षम झाली. हातात महागडे खेळ नसतानाही आनंद लुटायला शिकली. या पिढीला बडबडगीतांनी, बालकथा, बालगाणी यांनीही समृद्ध केलं. राजाराणीच्या गोष्टीत रमली. ऐतिहासिक, पौराणिक कथा, इसापनीतीच्या बोधकथांनी संस्कारित झाली. आजी आजोबांचं बोट धरून, प्रवचन किर्तनातून, ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी शिकली. घरात बोलायला इतकी माणसं असत की टॉकिंग टॉमची गरज भासत नसे. या मुलींच्या बाहुल्या अबोल होत्या.तरीही भावला भावलींचं लुटूपुटूच्या लग्नात अख्खं घरदार खेळे . चिंध्यांची बाहुली, चिंध्यांचाच बाहुला, पण त्यांना नटवण्यात कल्पकता वापरली जाई. हलू न शकणाऱ्या, बोलू न शकणाऱ्या या बाहुल्या, या ठका, ठकी सगळ्या आळीला बोलकं करत.

‘लाडकी बाहुली होती माझी एक ‘ या कवितेत कवयित्री इंदिरा संतांनी बाहुली हरवली म्हणून झुरणाऱ्या मुलीचं केलेलं वर्णन अविस्मरणीय आहे. खेळायला दिलेली  लाडकी बाहुली  . . .  . बाहुली हरवली म्हणून हिरमुसलेली बालिका, दुसऱ्या कितीही बाहुल्या जवळ असल्या तरी तीच बाहुली हवी , यासाठी झुरणारी बालिका डोळ्यासमोर येते.. माळावर खेळणाऱ्या मैत्रिणी, गवत, पाऊस हे सगळं आज दुर्लभ झालंय. पावसात भिजून खराब झालेली, गायीनं तुडवल्यामुळं आकार बिघडलेली, केसांच्या झिपऱ्या झालेली तीच बाहुली त्या बालिकेला प्रिय आहे हे सांगणारी. .

‘परी आवडली ती तशीच मजला राणी ‘

ही ओळ खूप काही सांगून जाते. आजकालच्या युझ ऍन्ड थ्रो च्या जमान्यात रोज नवा हट्ट, नवा खाऊ, नवं खेळणं, नवे कपडे असा बालहट्ट सहज पुरवला जातो.  मोकळ्या मनानं, मोकळ्या मैदानात, मनसोक्त दंगामस्ती करायच्या वयात आजचे किड्स एसीत बसून फक्त अंगठ्याचा व्यायाम करताना दिसतात.ही पिढी उत्क्रांतीच्या नियमानुसार आधीच्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त हुशार आहे, कुशल आहे. पण टेक्नॉलॉजीच्या जटील जाळ्यात अडकली आहे. टेक्नॉलॉजी वाईट नक्कीच नाही. पण तिचा उपयोग गरजे पुरताच, मर्यादीत स्वरूपातच केला पाहिजे,हे सांगायला जुन्या पिढीनं सरसावलं पाहिजे, गदिमांच्या नाचणाऱ्या मोराला घेऊन, इंदिरा संतांच्या लाडक्या भावलीला घेऊन, गवतफुला बरोबर वाऱ्यावर डोलत, माळावर पतंग उडवत, झुकझुक गाडीत बसून खंडाळ्याच्या घाटातून, निसर्गाच्या कुशीत नव्या पिढीला हळूच घेऊन जायला हवं.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…7 – गंगादेवी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया… 7 – गंगादेवी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

भारतीय इतिहासात ‛विजयनगर साम्राज्य’ असे म्हटले की साहित्य- कला- संस्कृती- पराक्रम अशा वेगवेगळ्या आयामानी परिपूर्ण संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते. विजयनगरची राजसत्ता मुस्लिम आक्रमणे रोखून धरण्यास यशस्वी ठरली. त्यामुळे या काळात हिंदू संस्कृतीचा सर्वांगीण विकास झाला. म्हणूनच भारतीय संस्कृती व कलांचा हा भरभराटीचा काळ मानला जातो. साहित्याच्या विशेषतः संस्कृत भाषेच्या  दृष्टीनेही हा सुवर्णकाळ मानला जातो. स्त्री- पुरुषांना शिक्षणाच्या पण समान संधी होत्या. त्यामुळे पुरुषलेखकांच्या बरोबरीनेच या काळात स्त्री लेखिकांनीही साहित्यक्षेत्रात आपले उत्तम योगदान दिलेले दिसून येते. चौदाव्या शतकातील कम्परायण याची पत्नी गंगादेवी, सोळाव्या शतकात अच्युतराय याची पत्नी तिरुमलांबा यांची नावे प्रामुख्याने यात घ्यावी लागतील. यातील गंगादेवीचा परिचय आपण या लेखात करून घेणार आहोत.

गंगादेवीच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु  ती सामान्य परिवारात जन्मली असे काही इतिहासकार सांगतात. ती धर्मशास्त्र, पुराण, न्यायशास्त्र, नीतीशास्त्र आणि संगीतशास्त्रात प्रवीण होती. तिच्या या पांडीत्यावरच खुश होऊन  राजा कम्परायण यांनी तिच्याशी विवाह केला. एकदा पतीबरोबर ती युद्धासाठी दक्षिणेकडे गेली. त्या युद्धाचे आणि विजयाचे वर्णन करणारे  ‘मधुराविजयम् ‘ हे काव्य गंगादेवीने संस्कृत भाषेत लिहिले.

या काव्याचा अभ्यास करतानाच आपोआप गंगादेवीचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता लक्षात येते. या काव्यात एकूण नऊ सर्ग आहेत. त्यात तिने कवी वाल्मिकी, कवी कालिदास अशा कवींना वंदन करून काव्याची सुरुवात केली आहे. त्यातून तिचा या सर्व कवींच्या साहित्याचा अभ्यास होता असे लक्षात येते.

संस्कृत भाषेत काव्यशैलीचे प्रकार आहेत. त्यातील वैदर्भीय या प्रकारात तिचे काव्य मोडते. शिवाय उपमा, अलंकार यांनी नटलेले पण सुबोध, सरल पदानी युक्त अशी तिची रचना आहे. त्यामुळे तिचा व्याकरणाचा अभ्यासही परिपूर्ण होता.

सूर्योदय, चंद्रोदय, जलचक्र, सहा ऋतूंचे वर्णन, तुंगभद्रा नदीचे वर्णन यातून तिचा भूगोलाचा अभ्यास दिसून येतो आणि कवी कालिदासाचाही थोडाफार प्रभाव तिच्यावर असावा असे वाटते.

पहिल्या काही अध्यायात गंगादेवी विजयनगर साम्राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजा बुक्क याचे उत्कृष्ट राज्यशासन, कुमार कंपन्नाचे बालपण आणि प्रारंभिक जीवनाचे वर्णन केले आहे. पुढच्या काही अध्यायात त्याच्या दक्षिणेकडील आक्रमणाचे आणि कांचीपुरम् च्या विजयाचे वर्णन आहे. आपले काव्य हे एक ऐतिहासिक पुरावा असेल याची जाणीव असल्यामुळे गंगादेवीने विस्ताराने येथे इतिहास मांडलेला दिसून येतो.

तिच्या काव्यातून त्या काळातील राजकीय परिस्थिती, समाजाची मानसिकता, त्या लोकांची आर्थिक – सामाजिक- शैक्षणिक स्थिती, युद्धनीती याचे वर्णन येते. त्यातून तिची सूक्ष्म निरीक्षण शक्ती जाणवते.

आजपर्यंत आपण संस्कृत साहित्यातील लेखक- कवींनी वेद- पुराण याचा संदर्भ घेऊन किंवा काहीवेळा स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेल्या स्त्रीपात्रांचा परिचय करून घेतला. पण आजच्या शेवटच्या भागात मुद्दाम एका अशा स्त्रीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे की जी कोणत्याही साहित्यकृतीतील पात्र नसून स्वतःच लेखिका होती. तिच्या एकाच काव्यातून ती आजपर्यंत जनमानसात आणि संस्कृत साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरली आहे. गंगा नदी ही भारताची मानबिंदू आहे तशीच गंगादेवी ही साहित्यातील स्त्रीलेखकांसाठी मानबिंदू आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच तिच्यातील या प्रतिभाशक्तीला सलाम!

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…6 – वासवदत्ता ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वासवदत्ता ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संस्कृत नाटककार ‛भास’ याने एकूण तेरा नाटके लिहिली. त्याला संस्कृत साहित्यात ‛भासनाटकचक्राणि’ असे म्हणतात. त्यातील ‛प्रतिज्ञायौगंधरायणम्’ आणि ‛स्वप्नवासवदत्तम्’ ही दोन नाटके राजा उदयन आणि अवंतीराजकुमारी वासवदत्ता यांच्या जीवनावर आधारित आहेत.

वासवदत्ता उज्जैनचा राजा प्रद्योत याची कन्या असते. उदयन एका छोट्या राज्याचा राजा असतो. त्याच्याकडे ‛घोषवती’ नावाची एक अद्भुत वीणा असते आणि तो उत्तम वीणावादन करत असतो. त्याची ती ख्याती ऐकून वासवदत्ताला त्याच्याकडून वीणा शिकण्याची इच्छा उत्पन्न होते. ती वडिलांजवळ तसा हट्ट करते. राजा उदयन हे सहज मान्य करणार नाही हे प्रद्योतला माहीत असल्याने तो कपटाने उदयनाला कैद करतो आणि आपल्या वाड्यात आणून ठेवतो आणि त्याला आपल्या कन्येला वीणा शिकवण्यास सांगतो.

उदयन आणि वासवदत्ता त्या निमित्ताने एकमेकांना भेटत राहतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचे लग्न होते. त्याचवेळी उदयनाचा मंत्री यौगंधरायण आपल्या राजाला सोडवून आणण्यासाठी एक उपाययोजना करतो आणि उदयन- वासवदत्ताना सोडवून आणतो. पुन्हा आपल्या राज्यात परत आला तरी उदयन आपल्या पत्नीच्या प्रेमापुढे राज्याकडे दुर्लक्ष करू लागतो. त्यामुळे अरुणी नावाचा राजा त्याचे राज्य हस्तगत करतो. ते परत मिळवण्यासाठी एखाद्या मोठ्या राजाच्या मदतीची गरज असते. मगध राजाची बहीण पद्मावतीशी उदयनाने विवाह केला तर हे शक्य होणार असते. म्हणून यौगंधरायण वासवदत्ताशी सल्लामसलत करून एक योजना आखतो. त्यामध्ये उदयनाला वासवदत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मेली असे भासवण्यात येते व तिला पद्मावतीची दासी म्हणून ठेवण्यात येते. अशाप्रकारे अनेक नाट्यमय वळणे घेत या नाटकांचा सुखांत होतो.

ही एक दंतकथा असली तरी एक प्रकारे त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब या नाटकांमधून निदर्शनास येते असे मला वाटते.

पहिल्या भागात वडिलांकडे वीणावादन शिकण्यासाठी हट्ट करणारी अल्लड वासवदत्ता चित्रित केली गेली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उदयन भेटल्यावर त्याच्या प्रेमात पडलेली प्रेमिका दिसते. आपल्याला अशी तिची दोन्ही रूपे भावून जातात. याशिवाय संगीत- चित्रकला अशा कलांमध्ये स्त्रियांना प्राविण्य मिळवण्याची मुभा होती हेही लक्षात येते.

त्यानंतर पतीच्या घरी गेल्यावर जेव्हा उदयन पत्नीच्या प्रेमात रममाण होऊन राज्य गमावून बसतो आणि त्याचे मंत्री जेव्हा वासवदत्तेला याची जाणीव करून देतात तेव्हा तिच्यातील कर्तव्यदक्ष पत्नी जागी होते. तीसुद्धा एका राजाची मुलगी असते आणि राज्य टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावे लागते याची तिला पूर्ण कल्पना असते. म्हणूनच आपल्या पतीच्या व प्रजेच्या हितासाठी ती यौगंधरायणाच्या योजनेला पूर्ण मान्यता देते आणि राजाचा विवाह पद्मावतीशी करून देण्यासाठी राजी होते. त्या काळी राजांनी अशा पद्धतीने विवाह करण्याची सर्रास प्रथा होती. शिवाजीमहाराजांनीही राज्यविस्ताराच्या दृष्टकोनातूनच आठ विवाह केले होते असे इतिहास सांगतो. म्हणूनच इथेही वासवदत्तामधील चाणाक्ष राजकारणी दिसून येते.

वासवदत्ता इतकेच करत नाही. तर राजाचे आपल्यावर किती प्रेम आहे हे माहीत असल्याने तिच्या मृत्यूची खोटी कहाणी रचल्याशिवाय राजा दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही हे लक्षात येते तेव्हा ती सहजपणे ही योजना स्वीकारते. वास्तविक आपल्याच मृत्यूची बतावणी करणे कितीही अवघड असले तरी ते स्वीकारणारी वासवदत्ता एक कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष स्त्रीच्या रुपात समोर येते.

जेव्हा ती पद्मावतीची दासी म्हणून राहू लागते त्यावेळी सर्व सुखासीन आयुष्य सोडून देते. वास्तविक असे जीवन जगणे एखाद्या राजघराण्यातील स्त्रीला किती अवघड जात असेल याची कल्पनाच केलेली बरी! त्यामुळे आपल्या ध्येयासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारी वासवदत्ता ही त्यागमूर्ती होती असे म्हणावे लागेल.

पद्मावतीशी उदयनाचा विवाह होतो आणि तिला वारंवार आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहावे लागत असले तरी आपल्या पतीच्या व राज्याच्या हितासाठी ते सर्व सहन करत असते. यातून तिच्यातील सहनशील नारी प्रत्ययास येते.

असे सर्व असले तरी शेवटी ती एक स्त्री असल्यामुळे साहजिकच कुठे तरी तिला आपल्या पतीकडून प्रेमाची अपेक्षा असतेच. त्यामुळे एका प्रसंगात विदूषक राजाला विचारतो की त्याचे “सर्वात जास्त कोणावर प्रेम आहे?” तेव्हा तो वासवदत्तेचेच नाव घेतो. हा संवाद नकळत वासवदत्तेच्या कानावर पडतो आणि ती अतिशय आनंदित होते. कारण शेवटी तिचेसुद्धा आपल्या पतीवर तितकेच उत्कट प्रेम असते. शिवाय एकदा नकळत झोपेत राजाला स्वप्न पडते आणि तो वासवदत्तेलाच हाक मारत असतो. त्यावेळी पण वासवदत्ता तिथेच असते.

या दोन्ही प्रसंगातून वासवदत्तामधील पत्नी अतिशय सुखावते. कारण जरी आपल्या राज्यासाठी तिने एकप्रकारे हे व्रत स्वीकारलेले असले तरी तीसुद्धा एक माणूसच असते. 

अशाप्रकारे प्रेमिका, पत्नी, उत्तम कलाकार, कर्तव्यदक्ष राणी अशा वेगवेगळ्या रुपात भेटणारी ही वासवदत्ता काल्पनिक असली तरी त्या काळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीचे एक आगळेच रूप होती.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वसंतसेना ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…5 – वसंतसेना ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

हल्लीच काही दिवसांपूर्वी “गंगुबाई काठियावाडी” चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात गंगुबाईच्या तोंडी एक वाक्य आहे. ती म्हणते, “ वेश्यांशिवाय स्वर्गसुद्धा अधुरा आहे.” शाश्वत सत्यच तिच्या तोंडून सांगितले आहे असे मला वाटते. कारण वास्तविक ज्या वेश्यासमाजाला आपल्या संस्कृतीत एका वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते त्या समाजमुळेच पांढरपेशा समाज सुदृढ आहे. त्यामुळे तो चित्रपट पाहताना मला ‛शुद्रक’ या संस्कृत नाटककाराने लिहिलेल्या ‛मृच्छकटिक’ या नाटकाची आठवण झाली.

या मृच्छकटिक नाटकाची नायिका ‛वसंतसेना’ हीसुद्धा एक गणिका असते आणि थोड्याफार फरकाने समाजाचा अशा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोनही तोच आहे. फक्त त्या काळी गणिका आणि वेश्या यांच्यात किंचित फरक असा होता की गणिका केवळ नृत्य- संगीत या माध्यमातून पुरुषांचे मनोरंजन करत असत. आणि वेश्या शरीरविक्रय करत असत.

संतसेना आणि चारुदत्त यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे. याशिवाय अनेक सामाजिक- राजकीय संदर्भ या नाटकात आहेतच. चारुदत्त हा एक अतिशय श्रीमंत ब्राह्मण असतो. पण आपल्या अति परोपकारी स्वभावाने आपली सर्व संपत्ती गमावून बसतो. याउलट वसंतसेना गणिका असूनही अतिशय श्रीमंत असते आणि सुखासीन आयुष्य जगत असते. चारुदत्ताच्या निर्व्याज स्वभावामुळे ती त्याच्याकडे आकर्षित होते आणि चारुदत्तही तिच्या प्रेमात पडतो. वास्तविक चारुदत्ताचे लग्नही झालेले असते आणि त्याला एक लहान मुलगाही असतो. परंतु त्या काळात पुरुषांनी असे गणिकांशी संबंध ठेवणे अयोग्य मानले जात नसावे. त्यामुळे चारुदत्ताची पत्नीही वसंतसेनेशी मित्रत्वाच्या नात्याने वागत असते.

एकदा काही गुंड मागे लागल्याने अचानक वसंतसेना चारुदत्ताच्या घरी येऊन लपते. तिला ते चारुदत्ताचे घर आहे हे माहीत नसते. पण त्याचवेळी अंगणात खेळणारा चारुदत्ताचा मुलगा आपल्या दासीकडे खेळण्यासाठी सोन्याची गाडी दे म्हणून हट्ट करत असतो. त्याच्या मित्राची तशी गाडी असते. म्हणून त्याला हवी असते. पण विपन्नावस्था प्राप्त झालेल्या चारुदत्ताकडे मुलाला द्यायला सोनेच नसते. त्यामुळे ती दासी त्या बालकाची समजूत काढत त्याला मातीची गाडी खेळायला देते. हा सर्व प्रसंग पाहणारी लपलेली वसंतसेना त्यावेळी लगेच बाहेर येते व आपले सर्व दागिने काढून त्या खेळण्याच्या गाडीत ठेवते.  ते बघून तो बालक अतिशय खुश होतो. वसंतसेनेमध्ये असलेली सहृदयता यात दिसून येतेच. पण धनाविषयी असणारी तिची अनासक्तीही यातून दिसून येते. धनापेक्षाही एखाद्याच्या भावना श्रेष्ठ आहेत असे मानणारी वसंतसेना म्हणूनच अधिक भावून जाते. 

वसंतसेना जरी गणिका असली तरी तिलाही स्त्रीसुलभ भावना होत्याच. कलेच्या माध्यमातून पुरुषांचे मनोरंजन करणे  हा तिचा व्यवसाय असला तरी मनाने ती चारुदत्तावर प्रेम करत असते. आणि आपले हे प्रेम चारुदत्ताकडे व्यक्त करण्याचे धाडसही ती दाखवते. शिवाय एकदा ती आणि चारुदत्त भेटण्याचे ठरलेले असते. पण प्रचंड वादळ होत असतानाही केवळ चारुदत्तावरील प्रेमापोटी ती त्या वादळातही त्याला भेटायला बाहेर पडते. यातून तिची साहसी वृत्ती दिसून येते.

वसंतसेनेशी आई थोडी लोभी असते. त्यामुळे काही धनाच्या बदल्यात ती राजाच्या मेहुण्याला आपली मुलगी द्यायला तयार होते. हे वसंतसेनेला कळल्यावर ती त्यासाठी स्पष्ट नकार देते व आईला सांगते की “जर तू मला जिवंत पाहू इच्छित असशील तर पुन्हा कधीही असे काम करणार नाही.” यातून वसंतसेनेचा निग्रही स्वभाव दिसून येतो. त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्तीही दिसून येते.

तिला नाईलाजाने हा व्यवसाय निवडावा लागलेला असतो. वास्तविक आपले घर, संसार, मुले यामध्ये रममाण होऊन सामान्य स्त्रियांप्रमाणे संसार करण्याची तिची इच्छा असते. तिची ही इच्छा कितपत पूर्ण होईल हे तिला माहीत नसते. पण जेव्हा तिची दासी एका तरुणावर प्रेम करते हे तिला समजते तेव्हा ती तात्काळ तिला दास्यत्वातून मुक्त करते आणि तिला आनंदाने सुखाचा संसार करण्यास मदत करते. आपल्याला असे सुख मिळेल की नाही याची शाश्वती नसतानाही दुसऱ्याच्या सुखात आपले सुख शोधणारी वसंतसेना त्यामुळे अधिक श्रेष्ठ ठरते.

अशाप्रकारे समाजातील एका वेगळ्या स्तरातील स्त्रीचे चित्रण शुद्रकाने या नाटकात केले आहे. अतिशय वेगळ्या संस्कारात वाढलेली असूनही तितकीच सुसंस्कृत, उत्तम नर्तिका, उत्तम गायिका आणि सौंदर्यवती असणारी वसंतसेना म्हणूनच नारीशक्तीचे एक वेगळेच रूप आहे.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…4 – शकुंतला ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…4 – शकुंतला  ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

शकुंतला

संस्कृत साहित्यातील एक अजरामर प्रेमकथा म्हणजे दुष्यंत- शकुंतला यांची कथा म्हणावी लागेल. महाभारतातील आदीपर्वात ही कथा आली आहे. अप्सरा मेनका व विश्वामित्र यांची कन्या म्हणजे शकुंतला! ती शिशुअवस्थेत असतानाच मेनका तिला जंगलात सोडून जाते. त्यानंतर ती कण्व मुनींनी सापडते आणि ते तिचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करतात. जेव्हा ती यौवनात येते तेव्हा अतिशय सुंदर दिसत असते. अशाच वेळी एकदा राजा दुष्यंत शिकारीसाठी तिथे आला असताना तिला बघतो व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यावेळी कण्व मुनी आश्रमात नसतात. पण दुष्यंत- शकुंतला गांधर्व विवाह करतात. त्यानंतर राजा दुष्यंत आपली अंगठी तिच्याकडे खूण म्हणून ठेवून आपल्या राजधानीत परत जातो. मधल्या काळात दुर्वास मुनी आश्रमात आले असता राजाच्या आठवणीत रमलेली शकुंतला त्यांना योग्य तो सन्मान देत नाही. त्यामुळे रागावलेले दुर्वास मुनी तिला शाप देतात की ज्याच्या चिंतनात ती मग्न होती तो तिला विसरेल.

काही दिवसांनी कण्व मुनी परत येतात व शकुंतलेच्या विवाहाचे समजल्यावर तिच्या पाठवणीची तयारी करतात. ती दुष्यंताकडे जाते. त्याचवेळी ती गर्भवती पण असते. पण दुर्वासमुनींच्या शापामुळे तो तिला ओळखत नाही व तिचा अपमान करून तिला हाकलून देतो. ती पुन्हा कश्यप ऋषींच्या आश्रमात राहू लागते. तिथेच एका पुत्रालाही जन्म देते.

काही दिवसांनी एका कोळ्याला माशाच्या पोटात दुष्यंताचे नाव असलेली ती खुणेची अंगठी मिळते आणि तो ती नेऊन राजाला देतो. तेव्हा राजाला सर्व आठवते व तो शकुंतलेच्या शोधास बाहेर पडतो. असे ढोबळ मानाने  कथानक आहे.

महाभारतात दुर्वास मुनींचा उल्लेख नाही. मात्र कालिदासाने आपल्या अभिज्ञान शाकुंतल नाटकात रंजकता निर्माण करण्यासाठी तो प्रसंग घातला असावा. आपल्या प्रतिभेच्या जोरावर कालिदासाने हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.

मात्र यातील शकुंतला ही एक अतिशय सामर्थ्यवान आणि स्वावलंबी स्त्री होती असे म्हणावे लागेल. ज्यावेळी ती राजा दुष्यंताच्या प्रेमात पडते त्यावेळी सहजपणे त्याच्याशी गांधर्वविवाह करून मोकळी होते. आजच्या काळात  ‛live in relationship’ बद्दल अनेक चर्चा घडत असताना त्या काळात केला गेलेला किंवा त्यावेळी जे सर्रास गांधर्व विवाह होत असत ते त्याचेच प्रतीक होते का ? अशी शंका सहज उत्पन्न होते. आजच्या लेखात ही चर्चा अपेक्षित नाही. पण त्यावरून त्या काळातील स्त्री किती स्वतंत्र विचाराची होती हे लक्षात येते. शकुंतला हे त्याचेच एक प्रतीक आहे असे मला वाटते. शिवाय आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्यही त्या काळात होते असे लक्षात येते.

शकुंतला आणि तिच्या सख्या म्हणजे प्रियंवदा आणि अनुसूया याना कण्व मुनींनी उत्तम शिक्षण दिले होते. केवळ मौखिक शिक्षण नव्हे तर त्या सर्वजणी उत्तम लेखनही करत असत. कारण नाटकामध्ये कमलपत्रावर शकुंतला दुष्यंतासाठी पत्र लिहिते असा प्रसंग आहे व तिच्या सख्या तिला यासाठी मदत करत असतात.

वास्तविक शकुंतलेला लहानपणी आई- वडिलांचे प्रेम मिळाले नाही. जंगलातील पशु- पक्षी- झाडे यांच्या सहवासातच ती अधिक वाढली. त्यामुळेच बहुतेक तिचे तिने लावलेल्या झाडावेलींवरही तितकेच प्रेम होते. त्यामुळे ती जेव्हा दुष्यंताकडे जायला निघते तेव्हा वारंवार डोळे भरून आपण लावलेल्या वेलींकडे बघते आणि मैत्रिणींना त्यांची काळजी घ्यायची पुन्हा पुन्हा सूचना देते. शिवाय तिचा सांभाळ ज्या कण्व मुनींनी केलेला असतो त्यांचीही तिला काळजी वाटत असते आणि त्यांना सोडून जाताना तिला अतिशय दुःख होत असते. त्यातून एक सहृदयी, कोमल मनाची शकुंतला आपल्याला भेटते.

मात्र एवढी हळवी असणारी शकुंतला जेव्हा दुष्यंत राजाकडे जाते आणि तो तिला ओळखत नाही. शिवाय तो तिचा अपमान करताना म्हणतो,“ हे तपस्विनी, तू मला आणि तुझ्या कुळाला अशाप्रकारे कलंकित करत आहेस ज्याप्रमाणे एखादी नदी आपलाच बांध फोडून बांधावरील झाडे मोडून टाकते आणि स्वतःचे पाणी पण मालिन करते.” ते शब्द ऐकून स्वाभिमानी शकुंतला गर्भवती असण्याचा विचारही न करता दरबारातून बाहेर पडते आणि जन्माला येणाऱ्या जीवाला एकट्यानेच सांभाळायचे ठरवते. आणि पुढे कश्यप ऋषींच्या आश्रमात राहून ते सिद्धही करते. ही स्वाभिमानी आणि निश्चयी शकुंतला त्या काळातील सशक्त स्त्रीचे उदाहरण आहे असे मला वाटते.

काही वर्षांनी राजा दुष्यंताला ती खुणेची अंगठी सापडते व तो शकुंतलेचा शोध घेऊ लागतो. ती सापडल्यावर तिला आपल्याबरोबर येण्यासाठी मनवतो. पण अपमानित झालेली मानी शकुंतला बराच काळ ते मान्य करत नाही. पण शेवटी स्त्रीसुलभ कोमलतेने ती त्याचा प्रस्ताव स्वीकारते आणि मुलासहित  त्याच्याकडे निघून जाते आणि अनेक वर्षे ते सुखाने संसार करतात. यातून शकुंतलेमधील ती स्त्री दिसून येते जी कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य देणारी होती. म्हणूनच त्या प्रसंगी आपला अपमान बाजूला ठेवून ती राजाबरोबर जाण्यास तयार होते.

त्यामुळेच कदाचित  काल्पनिक असली तरी त्या काळातील भावनाप्रधान पण निश्चयी, मानी, विद्याविभूषित स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी शकुंतला पण एका स्त्रीशक्तीचे प्रतीक होती असे मला वाटते.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ४३ – आशिया ते अमेरिका प्रवास ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ४३ – आशिया ते अमेरिका प्रवास ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

परिव्राजक म्हणून स्वामी विवेकानंद या आधी भारतात हवे तसे फिरले होते. पण हा प्रवास तसा नव्हता, आजही ते परिव्राजक होते, पण ही भ्रमंती ठरल्याप्रमाणेच, ठरलेल्या दिशेने आणि एका शिस्तीनेच करायची होती. तेरा हजार किलोमीटर अंतरावर जायचे होते.भारत भ्रमणात दरवेळी फिरताना त्यांच्याकडे सामान नसे. आता मात्र समान होते आणि पैसेही होते गरज म्हणून. सोय म्हणून. विवेकानंदांना याची सवय नव्हती. जहाजाचा प्रवास, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, वागण्या बोलण्यातले शिष्टाचार पाळणे याला ते हळूहळू सरावले.

त्यांच्या या पी अँड ओ कपंनीच्या पेनिन्शूलर जहाजातून याच वेळी मुंबईचे शेठ छबिलदास जपानला आणि भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक मानले जाणारे सर जमशेटजी टाटा शिकागोसाठीच प्रवास करत होते. एक आठवड्याने पहिला पडाव झाला एक दिवसाचा, सिलोन म्हणजे श्रीलंकेतील कोलंबो इथं.विवेकानंद शहरातून फिरून आले, नंतर जहाज पेनांगला थोडा वेळ थांबून, हाँगकाँगला आले. सिंगापूर, मलाया सुमात्रा यांचे दर्शन जहाजावरूनच झाले होते. हाँगकाँगला त्यांना खलाशी, कामगार, तिथले लोक यांचा व्यवहार पाहून तिथल्या दारीद्र्याची कल्पना आली. स्त्रियांची स्थिति समजली .अनेक गोष्टींची निरीक्षणे त्यांनी केली. चीनी मंदिरे आणि भारतीय मंदिरे पाहिली. कॅन्टनमध्ये चीनमधला पहिला बुद्धधर्मीय सम्राट आणि त्याचे पाचशे शिष्य यांच्या स्मरणार्थ उभे केलेले सर्वात मोठे बुद्धमंदिर पहिले. पण इथला बौद्ध मठ कसा असतो याची त्यांना उत्सुकता होती,

इथे एक मजेदार घटना घडली. गाईडने बुद्ध मठाजवळ विवेकानंदांना नेलं, पण कुणाला आत प्रवेश नव्हता. विवेकानंदांनी कसेबसे त्याला मनवून आत प्रवेश केला तेव्हाढ्यात आतून दंडुके घेऊन काही लोक आले. बरोबरचे प्रवासी बाहेर पाळले, पण विवेकानंद यांनी त्या माणसाचा हात धरून ठेवला आणि त्याला म्हटले, चीनी भाषेत ‘भारतीय योगी’ याला काय शब्द आहे? त्याने शब्द सांगितला. विवेकानंद जागचे हलले नाहीत. ठामपणे उभे राहिले आणि धावत येणार्‍या लोकांना त्या शब्दात आपण भारतीय योगी आहोत हे मोठयाने सांगितले. तसे चमत्कार झाला, सर्वांनी दंडुके खाली घेतले आणि सर्वजण नम्रपणे उभे राहिले.त्या मठवासी लोकांनी विवेकानंदांना हात जोडून विनंती केले की,भुते खेते आणि पिशाच्च यांची बाधा होऊ नये म्हणून तुम्ही ताईत द्यावेत . विवेकानंदांचा यावर अजिबात विश्वास नव्हता. पण हा विचार करण्याची ही वेळ नव्हती. त्यांचे समाधान करणे भाग होते. विवेकानंदांनी जवळचा कागद काढला, दोन तुकडे केले, त्यावर आडव्या उभ्या रेघा मारल्या, मधोमध ओम अक्षर लिहिले. आणि त्यांना दिले. त्याबरोबर त्यांनी आदराने तो घेतला आणि कपाळाला लावला. हे त्यांचे अज्ञान बघून विवेकानंदांना खूप कीव आली. याच जोडीला त्यांचे दारिद्र्य, अस्वच्छता हेही दिसले. नंतर त्या लोकांनी मठाच्या आतील भागात नेले तिथे, जुन्या हस्तलिखित पोथ्या ठेवल्या होत्या.त्या संस्कृतमध्ये होत्या आणि लिपी बंगाली होती. याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. तिथे बुद्ध मंदिरात पाचशे अनुयायांपैकी काहींचे चेहरे विवेकानंदांना बंगाली वाटले होते. मग त्यांच्या लक्षात आले की, बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतातून जे भिक्षू गेले होते त्यापैकी अनेक बंगाल मधून गेले असले पाहिजेत. 

हाँगकाँग सोडल्यानंतर जहाज नागासकी बंदरात थांबले होते. जपान मध्ये शिरताच त्यांना चीन आणि जपान यातला प्रचंड फरक जाणवला होता. त्यांना जपान मध्ये दिसलं होतं, स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीतली सौंदर्य दृष्टी, आधुनिक विज्ञानाचा केलेला स्वीकार, याचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला होता.सरळ आणि रुंद रस्ते, शहराची नीटशी रचना, घराभोवती बगीचे, अशा शिकण्यासारख्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यांना मनोमन वाटलं की जास्तीत जास्त भारतीय तरुणांनी जपानला एकदा तरी भेट दिली पाहिजे, इथेही त्यांना जपानी मंदिरांमध्ये भिंतीवर जुन्या बंगाली लिपीत संस्कृत मंत्र लिहिलेले आढळले. चीन आणि जपान हे दोन्ही देश भारताशी नातं सांगणारे दिसले. भारताकडे आदराने पहाणारे दिसले. पण भारताची आजची स्थिति विवेकानंदांनी पाहिली होती. याची तुलना त्यांनी लगेच केली. त्यांनी इथूनच लगेच शिष्यांना एक पत्र लिहिलं आणि परखडपणे म्हटलं की,  “जरा इकडे या, हे लोक पहा आणि शरमेने आपली तोंडे झाकून घ्या. पण परंपरेने गुलाम असलेले तुम्ही इकडे कसे येणार?तुम्ही जरा बाहेर पडलात की लगेच आपली जात गमावून बसाल. गेली कित्येक शतके आपण काय करीत आलो आहोत?. ”               

आशियामधून अजून जहाज बाहेर पडायचे होते, नव्या जगात पोहोचायला साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास अजून बाकी होता, पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. तोवरच विवेकानंदांनी मनातली ही व्यथा आपल्या शिष्यांना पत्रातून कळवली होती.

चौदा जुलैला योकोहामाला जहाज बदलून ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ या जहाजात ते बसले. आशिया खंडाला मागे टाकून, पॅसिफिक महासागरातून नव्या दिशेकडे जहाज मार्गस्थ होत होते. भारतातून निघताना त्यांची तयारी अनुयायांनी छान करून दिली होती. पण त्यात गरम कपडे नव्हते. त्यामुळे हा थंडीतला प्रवास खूप त्रासदायक ठरला.

पंचवीस जुलै १८९३ला संध्याकाळी जहाज व्हंकुव्हरला पोहोचले. इथून रेल्वेने दुसर्‍या दिवशी शिकागोला जायचे होते. इथे पहिल्यांदा विवेकानंदांनी अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले.

अमेरिकेचा भूप्रदेश, उंच उंच पर्वत, खोल दर्‍या, पांढर्‍या शुभ्र हिमनदया, घनदाट अरण्ये, अशी निसर्गाची अनेक रुपे बघून त्यांचे मन प्रसन्न झाले. शिकागोकडे जाणार्‍या, या गाडीत अनेक देशांचे प्रवासी बसले होते. त्यात केट सॅनबोर्न ही पन्नाशीची बुद्धिवंत लेखिका होती, तिच्याशी विवेकानंद यांचा संवाद झाला. त्यांचा पत्ता घेतला. ओळख झाली. त्यांनी घरी येण्याचं निमंत्रण पण दिलं. ते पुढच्या मुक्कामात कामी आले.

तीस जुलैला विवेकानंद शिकागोला उतरले. इथल्या बारा दिवसांच्या सुरुवातीच्या वास्तव्यात एकामागून एक त्यांना धक्के बसले. पहिलं म्हणजे प्रचंड महागाई, रोज पाच डॉलर खर्च, दुसर म्हणजे सर्वधर्म परिषद सुरू होण्यास अजून पाच आठवडे बाकी आहेत, तिसरं म्हणजे या परिषदेला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे असेल तर, कोणत्या तरी संस्थेचे अधिकार पत्र आवश्यक आहे, चौथं म्हणजे प्रतिनिधी म्हणून नाव नोंदविण्याची मुदतच संपली आहे. आता कोणालाही प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळणार नाही. आता पुढे काय? हे मोठे प्रश्न चिन्ह उभे होते.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

☆ तुळस… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

तुलसी श्रीसखी शिवे । पापहारिणी पुण्यदे |

नमो नारायणप्रिये ! नमस्ते नारदनुते ! नमो नारायणप्रिये ||

प्रत्यक्ष श्रीकृष्णांची सखी असणाऱ्या, पवित्र, पापांचे हरण करणाऱ्या, पुण्य प्रदान करणाऱ्या, नारदाकडून स्तुती केल्या गेलेल्या, नारायणाला प्रिय असलेल्या तुळशीला प्रणाम असो—- सकाळी स्नानानंतर तुळशीला पाणी देऊन प्रदक्षिणा घालण्याचे वेळी हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे. तुळशीत असलेल्या अनेक गुणांमुळे तिच्या सानिध्यात राहण्याने मिळणाऱ्या फायद्यामध्येच या प्रथेचे मूळ असावे.

तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते | तद् गृहं नोपसर्पंति कदाचित् यमकिंकरा: ||

—-स्कंद पुराणात असा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या घरात नेहमी तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात. तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. तिच्या मंजिरी विष्णूला अर्पण केल्या तर मोक्ष मिळतो.

….. एका कीर्तनकाराने तिची कथा सांगितली होती ती अशी…… 

….. एका गावात तुळशी नावाची एक काळी सावळी मुलगी रहात होती. तिची आई लहानपणीच वारली. सावत्र आई तिला खूप त्रास द्यायची. म्हणायची, ” तू इतकी काळी. तुझे लग्नच होणार नाही.” तुळशी मोठी झाली आणि तिने एक दिवस आईला उत्तर दिले ,” पंढरपूरचा विठुराया माझ्यापेक्षा काळा आहे. तो करेल माझ्याशी लग्न.” 

आई म्हणाली, ” जा मग त्याच्याकडेच. नाहीतरी तू भूमीला भार आणि खायला कहार आहेस.” तुळशी देखील रागारागाने घराच्या बाहेर पडली. पंढरपूरला आली. तिथल्या बायका तिला चिडवू लागल्या. ” अग, त्याचे रुक्मिणीशी लग्न झाले आहे, तो तुझ्याशी कसा लग्न करेल? नुसता भुईला भार आहेस.” तुळशी रात्रंदिवस विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिली. तिने अन्न पाणी सोडले. विठुराया काही तिच्याकडे आला नाही. तिने भूमातेला वंदन केले व आर्त विनवणी केली. ” आता माझ्याने सहन होत नाही. तू मला तुझ्या उदरात घे.” आणि खरोखरच भूमाता दुभंगली. तुळशी विठ्ठल विठ्ठल करत गडप होऊ लागली. इकडे विठुरायाला ते समजले. तो धावत धावत त्या  ठिकाणी आला. पण उशीर झाला होता. तुळशी गडप व्हायला लागली होती. त्याने तिचे फक्त केस दिसले तेवढे घट्ट धरून ठेवले. पण  तुळशी गडप झाली. आणि विठोबाच्या हातात फक्त तिचे केस राहिले. त्याने मूठ उघडली आणि त्याच्या डोळ्यांतले अश्रू त्या केसांवर पडले. त्याच्या मंजिऱ्या झाल्या. विठोबाने त्या आपल्या हृदयाशी धरल्या आणि तेथील जमिनीवर पेरल्या. तिथे एक झाड उगवले .त्याला सगळे तुळशी म्हणून लागले. रखुमाईला ते समजले. इकडे विठोबा सारखे तुळशी तुळशी म्हणून उदास होत होता. रखुमाईला राग आला. ती म्हणाली सारखं तुळशी तुळशी करताय. घ्या तिला गळ्यात बांधून. आणि विठोबाने देखील तुळशीचा हार तयार केला आणि आपल्या गळ्यात घातला. तेव्हापासून ती त्याच्या हृदयापाशी रहात आहे…

तुळस अंगणात लावल्यावर दुष्ट शक्ती घरात येत नाहीत. तिच्या बुंध्याभोवतीची काळी माती विषारी माशी, किडा वगैरे चावल्यावर लावली तर उपयोग होतो. मधमाशीने दंश केल्यास त्या जागी तुळशीतील माती लावतात. आराम पडतो. किडा, मुंगी, डास चावल्यास पानांचा रस दंशाचे जागी लावतात. आग थांबते. तिचे खोड, मूळ, फुले आणि मंजिरी अँटिबायोटिक म्हणून वापरतात. ताप आला, घसा खवखवू लागला तर तिची पाने चघळावी. चेहऱ्यावर डाग असतील तर तुळशीचा लेप लावावा. पाण्यात तुळशीची पाने टाकली तर पाणी आपोआप शुद्ध होते. फुफ्फुसे हृदय व रक्ताभिसरणाशी संबंधित असलेली अनेक औषधे तुळशीचा रस व मधाच्या अनुपानासोबत देतात. तुळशीचा रस मधाबरोबर दिला तर सर्दी पडसे नाहीसे होते. तिच्या पानांचा रस लहान मुलांना दिला तर त्यांचा खोकला बरा होतो व टॉनिकप्रमाणे उपयोग होतो. नायटा झाल्यास तिच्या पानांचा रस लावतात. तिचे बी पाण्यात पाच-सहा तास भिजवून, दूध साखर घालून खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते.

….. देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य होते. पण देवाला वाहिलेल्या तुळशीचे निर्माल्य होत नाही. तिची पाने, फांद्या झाडापासून तोडल्या तरी तिच्यातील प्राणशक्ती जिवंत असते. तुळशीमध्ये वनस्पतीज सोने असते. धातू रूपातील सुवर्णापेक्षा वनस्पतीज सोने जास्त प्रभावी असते.

….. तुळशीला इंग्रजीत बासिल म्हणतात. हिंदीत विश्व पूजिता ,विश्व पावन, भारवी, पावनी, त्रिदशमंजिरी, पत्रपुष्पा, अमृता, श्रीमंजरी, बहुमंजरी, वृंदा ,वैष्णवी, अशी अनेक नावे आहेत. विठोबाच्या गळ्यातील तुळशीला वैजयंती म्हणतात.

….. तुळशीवरून काही वाक्प्रचार देखील आपण वापरत असतो.

१) तुळशी उचलणे म्हणजे शपथ घेणे.

२) तुळशी उपटून भांग लावणे म्हणजे चांगल्या माणसाला काढून वाईट माणसाची संगत धरणे

३) तुळशीच्या मुळात कांदा लावावा लागणे म्हणजे चांगले हेतू साध्य करण्यासाठी वाईट साधनांचा  उपयोग करण्याविषयीची सबब सांगणे.

४) तुळशीत भांग उगवणे म्हणजे चांगल्या माणसांच्या समुदायात चुकून एखादा वाईट माणूस आढळणे.

५) तुळशीत भांग व भांगेत तुळस उगवणे म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी एकाच ठिकाणी असणे.

६) तुळशीपत्र कानात घालून बसणे म्हणजे ऐकले न ऐकलेसे करून स्वस्थ बसणे.

७) घरादारावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे घरादाराचा त्याग करणे.

—–तिचा विवाह केल्यास कन्यादानाचे महत्त्व प्राप्त होते. विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात. तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे. 

महाप्रसाद जननी

सर्व सौभाग्यवर्धिनी

आधिव्याधी हरा नित्यं

तुलसी त्वं नमोऽस्तुते ||

 

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares