मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

शब्द☆ सौ शालिनी जोशी

आज काहीतरी लिहिण्याची हुक्की आली. पेन व कागद घेऊन बसले. पण काय लिहावे? विषय कोणता असावा? निसर्गावर लिहावे का अध्यात्मावर लिहावे? मन एकच पण त्याचेही एकमत होत नव्हते. आपण लिहितो ते शब्दात. शब्द तयार होतात अक्षरातून. अक्षरे म्हणजे स्वर आणि व्यंजने. त्यालाच वर्णमाला म्हणतात. प्रत्येक भाषेत त्याची संख्या वेगळी मराठीत 52 तर इंग्रजीत 26. हे वर्ण कशातून तर ओंकारातून असे सांगितले जाते. ओंकार म्हणजे तीन मात्रा (अ, उ, म )आणि अर्ध मात्रा म्हणजे वरचा चंद्राकार. यातून सर्व वर्णमाला. पण ओंकार तरी कुठून आला? तर हा परब्रह्मवाचक शब्द. त्या निर्गुण निराकाराचे व्यक्त रूप. म्हणून त्याला परब्रम्हची सही म्हटले जाते. आपलीही सर्व कामे सहीनेच होतात. म्हणजे शब्दाचे मूळ त्या परब्रम्हाचे ठिकाणी. तोच शब्दाचा अर्थ. आपण मात्र त्याला वेगवेगळ्या अर्थ देतो.

येथे एक गोष्ट आठवली. एक छोटी मुलगी होती, पाच सहा वर्षांची असेल. रोज नित्य नेमाने देवळात जाऊन देवापुढे उभी राहत असे. हात जोडून डोळे मिटून काहीतरी हळू आवाजात तुटपुटत असे. पुजार्याला उत्सुकता होती, ही रोज काय म्हणत असेल? देवाकडे काय मागत असेल? म्हणून त्याने त्या मुलीला सहज प्रश्न विचारला’ बाळ तू देवाकडे रोज काय मागतेस?काय म्हणतेस?’ तिचे उत्तर आपणा सर्वांनाच विचार करायला लावणारे आहे.

ती म्हणाली, ‘मला स्तोत्र, मंत्र म्हणजे काय कळत नाही. मला काही येत नाही. म्हणून मला येणारी सर्व अक्षरे अ आ इ ई….. आणि क ख ग…. मी रोज देवापुढे शांतपणे म्हणते. आणि देवाला सांगते यातून तू तुला पाहिजे तो आवडेल तो मंत्र किंवा स्तोत्र तयार करून घे. ‘आणि देव माझ्याकडे पाहून हसतो. मला आनंद होतो. गोष्ट छोटीशीच पण केवढे तत्त्वज्ञान सांगून गेली.

पूजेची तयारी नाही, देवाला आवडती फुले नाहीत, आरती येत नाही म्हणून आपण पूजा करायचे टाळतो. पण देवाला कशाचीच गरज नाही. तोच सर्व निर्माण करणारा, त्याचे त्याला देऊन आपण काय साधतो? तेव्हा त्याची पूजा म्हणजे आपला भाव आपला अहंकार त्याला अर्पण करणे. त्यासाठी शब्दांची गरज नाही. मी पेन खाली ठेवले.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४३ ☆श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- लिलाताईच्या आई सहज बोलण्याच्या ओघात बराच वेळ लिलाताईच्या वाचासिद्धीच्या

अनुभवांबद्दलच सांगत होत्या. ते सगळं आरतीला अचंबित आणि मला निश्चिंत करणारच होतं! सगळं ऐकता ऐकता माझ्या नजरेसमोर लिलाताईच्या पत्रातला शब्द न् शब्द तरळत होता. तो प्रत्येक शब्द खरा होणाराय हा माझ्या मनातला विश्वास आरतीपर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला होता!)

तिथून बाहेर पडल्यावर पुत्रवियोगाच्या दुःखातून आरतीला सावरायची हीच योग्य वेळ आहे असंच मला वाटत राहिलं. ती मात्र गप्प गप्पच होती.

“लीलाताईच्या आईना भेटायला आलो ते बरं झालं ना?” मी विषयाला हात घातला. तिने होकारार्थी मान हलवली. मला तेवढं पुरेसं होतं.

“तुला.. एक सांगायचं होतं.. “

“कशाबद्दल?”

“हेच. समीरबद्दल. “

“त्याचं काय.. ?”

“.. जे तुला माहित नाहीय असं.. बरंच कांही… “

“म्हणजे?”तिने आश्चर्याने विचारले.

“म्हणजे जे मी फक्त तुलाच नव्हे तर कुणालाच सांगितलेलं नाहीय असं.. “

तेवढ्यांत समोरून रिक्षा येताना दिसताच मी रिक्षा थांबवली. एकतर रस्त्यात सगळं सांगणं शक्य नव्हतं न् योग्यही. जे सांगायचं ते मनात जिवंत होऊन मलाच अस्वस्थ करत राहिलं होतं.

डाॅ. जोशींकडून त्यांच्या मनाविरुद्ध डिस्चार्ज घेऊन बाहेर पडल्यानंतर जवळजवळ महिनाभर समीर डाॅ. देवधरांच्या निगराणीखाली होता तेव्हाची गोष्ट. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे कणाकणानं कां होईना समीर सुधारु लागला होता. तरीही तेव्हाचे त्याचे हाल आणि अवस्था सातत्याने सुरु असलेल्या ऍलोपॅथी औषधांच्या अपरिहार्यतेमुळे अतिशय नाजूक आणि केविलवाणी होत चालली होती. त्या दरम्यानचा एक अतिशय करूण प्रसंग आठवला तरी अजूनसुध्दा अंगावर सरसरून काटा येतो.. !

डाॅ. देवधरांकडे ट्रिटमेंट सुरु झाली तेव्हा सुरुवातीला समीरला सलाईन लावल्यावर ‘थेंबभर पाणीही त्याच्या पोटात घालू नका’ असं नर्सने बजावून सांगितलं होतं. मी तिथे गेलो तेव्हा आरतीने मला अजिबात आवाज न करण्याची खूण केली.

“का?” मी हलक्या आवाजात विचारलं.

“खूप रडत होता. सलाईन

लावल्यामुळे त्याचा हातही दुखत असेल. सकाळपासून थेंबभरही पाणी पोटात नाहीये. त्यामुळे तहानही लागली असेल. बघा ना हो किती सुकून गेलाय.. ” आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली. ते ऐकणंही मला वेदनादायी वाटत होतं. समीरच्या चेहऱ्यावरचं थिजून गेलेलं दुःख आणि केविलवाणेपण मला त्रास देऊ लागलं. तिथेच मागे टेबलवर भरून ठेवलेल्या तांब्याभांड्याकडे सहजच माझं लक्ष गेलं आणि तहानेने कधीपासून आपल्या घशाला कोरड पडलीय हे मला प्रथमच जाणवलं. मी उठलो. ते तांब्याभांडं अलगद उचललं. तांब्यातलं पाणी भांड्यात ओतत असताना त्या बारीकशा धारेच्या आवाजानेच जणू संकेत दिल्यासारखे समीरने इवलेसे डोळे उघडून त्या आवाजात लपून राहिलेल्या तृप्तीच्या हव्यासानेच जणू आपली व्याकुळ नजर त्या दिशेला वळवली. त्या नजरेचा त्या पाण्याच्या धारेला स्पर्श झाला मात्र.. तळपत्या उन्हातल्या तहानलेल्या कुत्र्यासारखी त्याची जीभ आत बाहेर लवलव करु लागली. तहानेने व्याकुळ झालेल्या माझ्या बाळाला मी

थेंबभर पाणीही देऊ शकत नसताना भांड्यातलं ते पाणी माझ्या घशाखाली उतरणं शक्य तरी होतं का? समीरची अगतिक अवस्था पाहून मी तहान विसरलो. भांड्यातलं पाणी न पिताच तसंच तांब्यात ओतून ते तांब्याभांडं कोरडेपणानं बाजूला सारलं. पाणी दृष्टीआड होताच बाळाच्या जिभेची लवलव मार खाल्ल्यासारखी थांबली, पण ती कासावीस करणारी तहान मात्र त्याच्या केविलवाण्या नजरेतून झिरपतच होती.. !

“बोला ना.. गप्प कां असे? काय सांगत होतात?”

घरी येताच आरतीने विचारले.

“हो.. सांगतो. पण तू शांतपणे ऐकून घेणार असशील, तेच मनात ठेवून त्रास करून घेणार नसशील तरच सांगतो.. ” मी बोललो आणि पाय धुवायला आत निघून गेलो.

मला सांगणं टाळायचं तर नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं. डॉक्टरांच्या औषधोपचारांनी समीरची तब्येत थोडीफार सुधारु लागली होती. त्याचं किरकिरणं, रडणं बऱ्याच प्रमाणात कमी होत चाललं होतं. अधूनमधून घोटभर पाणी, अंदाज घेत दिलेलं दोन-तीन चमचे दूध हळूहळू पचू लागलं होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना आणि समीरबाळाच्या सहनशक्तीला यश मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आमच्या मनावरचं भीतीचं सावट विरु लागलं. त्याला सलग शांत झोप लागू लागली तसं मी जमेल तसं दोन-तीन तास बँकेत जाऊन साचत राहिलेली महत्त्वाची कामे हातावेगळी करू लागलो. आरती न् मी जवळजवळ दोन महिने अक्षरशः जागून काढले होते. घरी माझी आई, लहान भाऊ, सासूसासरे सर्वजण मदतीला होतेच. तेही आता आलटून पालटून दवाखान्यात येऊन आम्हाला थोडावेळ रिलिव्ह करु लागले.

पण… हे सकारात्मक बदल, हा दिलासा हे सगळं एक चकवाच होतं याचा प्रत्यय पुढं चार-सहा दिवसातच आम्हाला आला आणि तोही अतिशय धक्कादायक पध्दतीनं! तो आजारी पडला तेव्हापासूनचे हे दोन अडीच महिने तेव्हाचे माझे ब्रॅंच मॅनेजर श्री. घोरपडेसाहेब यांनी मला अतिशय मोलाचा असा भावनिक आधार दिला होता. आता त्यांचं कामाचं ओझं कमी करणं हे माझं कर्तव्य होतं. त्यामुळेच समीरची तब्येत थोडी सुधारु लागल्यानंतर मी बँकेत हजर झालो. एक-दोन दिवस निर्विघ्नपणे गेले. तो शनिवार होता. रविवारी आमच्या पुण्यातल्या रीजनल ऑफिसमधे ब्रॅंच मॅनेजर्स मीटिंग होती. त्यासाठी घोरपडे साहेबांना संध्याकाळी उशिरा बसून मीटिंगची तयारी करण्यासाठी मी मदत करत होतो. मिटींगला जाताना एक महत्त्वाचं लोन प्रपोजल त्यांना तयार करुन अॅप्रूव्हलसाठी न्यायचं होतं. ते तयार करत आम्ही त्यांच्या केबिनमधे बसलो होतो. टायपिस्ट घरी गेल्यामुळे आता हे प्रपोजल स्वतःच लिहिणे आवश्यक होते. घोरपडे साहेबांचा हात लिहिताना थरथरत असे. त्यामुळे मला ते डिक्टेट करीत आणि मी ते लिहित होतो. ते पावसाळ्याचे दिवस होते. सगळं काम आवरत आलं. खूप अंधारून आलंय हे लक्षात आलं ते केबिनच्या खिडकीबाहेर उभं राहून धुवांधार पावसात कशीबशी छत्री सावरत उभ्या माझ्या आईने आणि लहान भावाने मला हाक मारली तेव्हा!

“बाळ खूप सिरीयस आहे. डॉक्टरनी तुला लगेच बोलवलंय. ” आई सांगत होती.

“आम्ही रिक्षानेच आलोय. रिक्षा थांबवलीय.. चल लगेच ” भाऊ म्हणाला. मी मनातून थोडा हबकलो. समीरच्या काळजीने व्याकुळ झालो. पण नेमक्या त्या क्षणीचं माझं घोरपडे साहेबांच्या संदर्भातलं माझं कर्तव्य मी विसरूही शकत नव्हतो.

” हो.. मी.. मी आलोच. लग्गेच निघतो. पण तुम्ही थांबू नका. त्या रिक्षानं तुम्ही पुढं व्हा. मागोमाग मीही पोचतोच.. “

आई आणि भाऊ क्षणभर घुटमळले.

“आरती तिथं एकटी असेल.. खरंच निघा तुम्ही.. मी आलोच.. “

ते घाईघाईने निघाले. लोन प्रपोजलमधली शेवटची ओळ मी पूर्ण करू लागलो.

“एs.. वेडा आहेस का तू? काय करतोयस हे ? जा.. ऊठ मुकाट्यानं.. थांबव त्यांना.. नीघ तूही.. ” घोरपडे साहेब ओरडले. माझ्या हातातलं पेन काढून घ्यायला त्यांनी हात पुढं केला. मी अजिजीनं त्यांच्याकडं पाहिलं.

“साहेब, मी हे रिकमंडेशनचं शेवटचं एक वाक्य राहिलंय फक्त ते पूर्ण करतो न् निघतोच लगेच. तुम्हाला सलग लिहिता येणार नाही. अक्षरात फरक पडू नये म्हणून. झालंच. “

मी माझी सही करून प्रस्ताव त्यांच्यापुढे सरकवला आणि ताडकन् उठलो. तो स्वतःच्या ब्रिफकेसमधे ठेवून घोरपडे साहेबही घाईघाईने उठलेच.

” एक.. एक मिनिट. मीही आलोच. पाऊस थांबलाय तोवर मी तुला बाईकवरून हॉस्पिटलमधे सोडतो न् मग घरी जातो ” ते म्हणाले.

मी घड्याळ्याकडे पाहिलं.

“नाही सर. तुमचं जेवण व्हायचंय अजून. ट्रेन चुकेल. मी जाईन रिक्षानं. खरंच. “

बोलता बोलता मी ब्रॅंचचं ग्रील ओढून कुलूप लावलं. तोवर घोरपडेसाहेबांनी त्यांची बाईक गेटच्या बाहेर काढलीही होती.

“बैस लवकर.. “

हॉस्पिटल येताच मी पटकन् उतरून निघालो तोवर बाईक लॉक करून तेही माझ्या मागून येत होते.

” मी जाईन. तुम्ही नका येऊ… खरंच. “

“हो.. मी थांबणार नाहीय.. पण डॉक्टरांना भेटतो न् निघतो लगेच.. “

आम्ही आत गेलो तेव्हा आरती, माझी आई आणि भाऊ केबिनच्या बाहेर खुर्च्यांवर बसले होते. तिघांचेही डोळे भरून वहात होते. मी आरतीजवळ गेलो..

“काय झालंय.. ?कसा आहे समीर.. ?”

तिला हुंदकाच आला.

“तो सिरियस आहे.. डाॅक्टर तुझीच वाट बघतायत. जा लगेच.. बोल त्यांच्याशी… “आई म्हणाली.

आत माझ्यापुढे काय वाढून ठेवलं असेल या आशंकेनेच मी कसंबसं स्वत:ला सावरत डाॅक्टरांच्या केबिनकडे धाव घेतली…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘जग’ ‘जग’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ ‘जग’ ‘जग’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

शीर्षक वाचल्यावर वाचकांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की कोणाला ‘जग’ ‘जग’ म्हणून सांगितले जातेय. अहो, आपल्यालाच. आता दुसरा प्रश्न पडला असेल की आम्ही जगतोय आहोत मग आणखी कसे जगायचे ? हा प्रश्न मात्र अधिक खरा आणि आपल्या विषयाशी निगडित आहे असे मला वाटते. या जगात अनेक जीवजंतू, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आणि स्वाभाविक मनुष्य जगत असतात. यातील मनुष्य वगळता इतर सर्व योनीतील जीव प्रारब्धक्रमाने लाभलेला जीवनक्रम नैसर्गिकरित्या जगत असतात. मनुष्य मात्र या सर्वांस अपवाद आहे. त्यालाही प्रारब्धक्रमाने लाभलेला जीवनक्रम असतोच परंतु मनुष्याला बुद्धीचे/ विचार करण्याचे विशेष वरदान लाभल्यामुळे मनुष्य कधी सुखी तर कधी दुःखी होताना आपण पाहतो.

हे जग (सृष्टि) भगवंताने निर्माण केली आहे असे आपण मानतो. जर ती भगवंताने निर्माण केली असेल तर ती नक्कीच आनंददायी असली पाहिजे. पण दैनंदिन जीवनात मनुष्य आनंदी असल्याचे आपल्या दृष्टीस पडतेच असे नाही. असे का होत असावे ? आपल्याला कोणी विचारले की तुम्हाला सुखात जगायला आवडेल की दुःखात ? तर माझ्यामते येथील प्रत्येक जण सुखात जगायला आवडेल असेच सांगेल. मग तरीही बरीचशी माणसे दुःखात असल्याचे आपल्या निदर्शनास येते, असे का व्हावे ? जग भगवंताने निर्माण केलेले असूनही बरीचशी माणसे दुःखात आहेत याचा अर्थ कोणीतरी नक्की चुकत असलेच पाहिजे. एकतर भगवंत किंवा मनुष्य. भगवंत चुकणे शक्यच नाही म्हणजे जर चुकी असेलच तर ती फक्त मनुष्याची असली पाहिजे.

शिर्षकातील पहिला ‘जग’ हा सृष्टी (जगाचा) दर्शक आहे. म्हणून आपण त्या ‘जगा’बद्दल चिंतन करू. दैनंदिन जीवनात ‘जग काय म्हणेल’?, जगाची चिंता करू नये ? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न एकतर आपल्याला पडतात किंवा कोणीतरी असे प्रश्न विचारेल याची आपल्याला सतत भीती वाटत असते. आणि विशेष म्हणजे आपल्या कसोटीच्या क्षणी, आपल्या पडत्या काळात या ‘जगा’तील फार थोडी मंडळी आपल्याला मदत करायला पुढे येतात आणि तरीही मनुष्याला ‘जग काय म्हणेल याची चिंता असते हे नवल नव्हे काय ?

‘जिवो जीवस्य जीवनम्’ असा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वाभाविकपणे प्रत्येक मनुष्यास लागू पडतो. याचा सरळ अर्थ असा आहे की या जगातील प्रत्येक प्राणी कोणत्या न कोणत्या स्वरूपात एकमेकांवर अवलंबून आहे. बाकीच्या प्राण्यांचे सोडून दिले आणि आपण फक्त मनुष्याचा विचार केला तरी मनुष्य ‘सामाजिक’ प्राणी असल्यामुळे तो एकटा राहू शकत नाही. त्यामुळे जगण्यासाठी त्याला अनेकांची मदत घ्यावी लागते. आदिम काळापासून तो समूहानेच राहत आलेला आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे मनुष्याला ‘विचार’ करण्याची विशेष देणगी प्राप्त आहे. त्यामुळे मनुष्याने आपली सर्वच क्षेत्रात प्रगती करून घेतली आहे आणि स्वतःची सर्वांगीण उन्नत्ती करून घेतली आहे. समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात मनुष्याने उत्तुंग आदर्श निर्माण करून ठेवले आहेत. इतके सारे असूनही मनुष्य खऱ्या अर्थाने ने आनंदी झाला, ‘जगायला’ शिकला असे मात्र आपण छातीठोकपणे म्हणू शकत नाही. आता ‘जगणे’ आणि ‘जगणे’ यात काय फरक असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.

एकदा शांत बसून मनाला प्रश्न विचारला की आपण आज खरंच जगलो की नाईलाजाने दिवस ढकलला ? उत्तर आपल्यापाशीच आहे. सर्वसामान्य मनुष्य रोजच्या धकाधकीमुळे गांजून गेला आहे असे आपल्याला जाणवेल. श्रीराम

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नेत्रदान.. एक राष्ट्रीय गरज… लेखक : श्री. वि. आगाशे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ नेत्रदान–एक राष्ट्रीय गरज :👁️👁️ – लेखक : श्री. वि. आगाशे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जगातील एकूण नेत्रहीन व्यक्तिंपैकी २० टक्के म्हणजे सव्वा कोटी नेत्रहीन भारतात असून त्यातील ३० लाख नेत्रहीन व्यक्तिंना नेत्ररोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. सगळ्याच नेत्रहीनांना नेत्ररोपणाने दृष्टी मिळू शकत नाही. ज्यांची पारपटले निकामी झाली आहेत, परंतु बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे, त्यांनाच दृष्टी प्राप्त होऊ शकते कारण नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्याचे रोपण नव्हे तर फक्त ह्या पटलाचेच रोपण होय. ह्यालाच सर्वसाधारणपणे आपण नेत्ररोपण म्हणतो. मृत व्यक्तींच्या नेत्रदानामुळेच हे नेत्ररोपण करणे शक्य होते. नेत्रदान हे रक्तदानाप्रमाणे जिवंतपणी नव्हे तर ते मरणोत्तरच करावयाचे असते. कुठल्याही जिवंत व्यक्तीस नेत्रदान करता येत नाही.

तीस लाखांना दृष्टी देणे आपल्याला सोपे वाटेल, पण तसे नाही, कारण आपली भयानक, तिडीक आणणारी निंद्य अनास्था आणि मला काय त्याचे ही वृत्ती!😪

दरवर्षी भारतात सुमारे ८० लाख मृत्यु होतात. परंतु ह्यातील फक्त सुमारे ३० हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते. भारतात जी नेत्ररोपणे होतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात दान केलेले नेत्र हे श्रीलंकेसारख्या आपल्या छोट्याशा शेजारी राष्ट्राकडून आलेले असतात. भुवया उंचावल्या ना? ही भयानक वस्तुस्थिती आपल्यासारख्या १४० कोटी लोकसंख्येच्या मोठ्या राष्ट्राला आत्यंतिक लाजिरवाणीच नव्हे काय?

आपला देश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण होत आहे. तो ह्या आघाडीवरही स्वयंपूर्ण व्हावा असे आपल्यासही नक्कीच वाटेल. म्हणूनच ही एक राष्ट्रीय गरज ठरते.

नेत्रदान कोण करू शकते?

* जन्मजात बालकापासून अगदी १०० वर्षांच्या स्त्री-पुरुषांपर्यंत कोणाचेही नेत्रदान होऊ शकते.

* कोठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले, मधुमेही आणि रक्तदाब पिडीतही नेत्रदान करू शकतात.

* मृत व्यक्तिस एड्स, अलार्क (रेबीज), कावीळ, कर्करोग, सिफीलीस, धनुर्वात किंवा विषाणूंपासून होणारे रोग, तसेच नेत्रपटलाचे रोग असल्यास अशा व्यक्तिंचे नेत्र रोपणासाठी निरुपयोगी ठरतात. परंतु ही नेत्रपटले सराव आणि संशोधनासाठी वापरतात. तेव्हा अशा व्यक्तिंचे नेत्रदान व्हावे की नाही हे कृपया नेत्रपेढीच्या डॉक्टरांनाच ठरवू द्यावे. आपणच काहीतरी ठरवू नये.

* अपघातात मृत झालेल्या व्यक्तिंचे डोळे, म्हणजेच नेत्रपटल चांगल्या स्थितीत असल्यास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेत्रदान होऊ शकते.

* ज्यांचे पारपटल चांगले आहे, परंतु इतर काही दोषांमुळे अंधत्व आलेले आहे अशा अंधांचेही नेत्रदान होऊ शकते. म्हणजेच अशा अंध व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.

* *मृत्युनंतर लवकरात लवकर, ३ ते ४ तासांपर्यंत (अपवादात्मक स्थितीत ६ तासांपर्यंत) नेत्रदान होणे आवश्यक असते. म्हणूनच नेत्रदानाची इच्छा मृत्युपत्रांत व्यक्त करु नये. ते निरर्थक असते. कारण मृत्युपत्र काही दिवसांनंतरही उघडले जाते.

* नेत्रदानासाठी जवळच्या नेत्रपेढीचे प्रतिज्ञापत्र मात्र जरुर भरावे. त्यातून आपली इच्छा लेखी स्वरुपात व्यक्त होऊन ती साक्षीदार म्हणून सही करणाऱ्या जवळच्या नातलगांना वारसांना माहीत होते. आपली इच्छा जवळचे नातलग, शेजारी, मित्र-मैत्रिणी ह्यांनाही आवर्जून सांगावी, किंबहुना प्रतिज्ञापत्र भरताना ते सामूहिकपणे, एकत्र बसून चर्चा करून भरणे सर्वोत्तम होय! त्यातून आपली इच्छा आणि ह्या कार्यासही एक सामूहिक बळ प्राप्त होते. तसेच आपली इच्छा फलद्रुप होण्याची शक्यता वाढते.

* नेत्रपेढीकडून आपल्यास डोनर कार्ड मिळते. आपण नेत्रदान केलेले असल्याचे दर्शविणारे हे कार्ड कायम आपल्यासोबत बाळगावे.

* आपल्या डायरीत आसपासच्या सर्व नेत्रपेढ्यांचे दूरध्वनी क्रमांक ठळकपणे नोंदवून ठेवावेत तसेच भिंतीवरही लावावेत.

* नेत्रदात्याच्या मृत्युनंतर नेत्रपेढीला लगेच नेत्रदानाविषयी कळविणे महत्त्वाचे असून हे काम नातलग, शेजारी, मित्र-मैत्रिणी करु शकतात. त्या वेळेच्या भावनात्मक स्थितीचे कारण काही जण सांगतात परंतु ते लटके आहे. अशा स्थितीतच जेव्हा आपण नातलग, ओळखीच्यांना वगैरे दूरध्वनीवरून कळवितो तसेच नेत्रपेढीलाही दूरध्वनीवरुन कळवायचे एवढेच!

* मृत व्यक्तिने ज्या नेत्रपेढीचे प्रतिज्ञापत्र भरले आहे त्याच नेत्रपेढीला कळविणे आवश्यक नाही. त्या ठिकाणच्या जवळच्या नेत्रपेढीला कळविणे वेळेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

* मृत व्यक्तिने प्रतिज्ञापत्र भरलेले नसतानाही वारसदार व्यक्ती मृत व्यक्तिचे नेत्रदान नेत्रपेढीला कळवून करु शकतात. ह्या दृष्टिने नेत्रदानाचे महत्त्व, राष्ट्रीय आवश्यकता पाहता कळकळीचे आवाहन करावेसे वाटते की आपल्या परिसरात, नात्यात कुणाचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तिच्या नातलगांना नेत्रदानाविषयी जरुर सुचवावे, त्यासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करावेत. अशा प्रकारे जिवंतपणीच आपण नेत्रदानविषयक मोठे काम करु शकाल.

* नेत्रदानास धार्मिक बंधन नाही. कोठला धर्म अशा महान कार्यास विरोध करेल ?

नेत्रपेढीला कळवितानाच खालील बाबी पार पाडाव्यात –

* डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्र त्वरित मिळवावे. शक्यतो त्यांनाच १० सी. सी. रक्ताचा नमुना घेऊन ठेवण्यास सांगावे.

* मृताचे डोळे व्यवस्थित बंद करुन पापण्यांवर बर्फ अथवा ओल्या कापसाच्या/कापडाच्या घड्या ठेवाव्यात. शक्य असल्यास डोळ्यात जरुर आयड्रॉप्स टाकावेत.

* पंखे बंद करावेत तसेच वातानुकुलन यंत्र असल्यास ते जरुर चालू ठेवावे. जवळ प्रखर दिवे नसावेत.

* मृत व्यक्तिस शक्यतो कॉटवर ठेवावे आणि मृत व्यक्तिचे डोके २ उशांवर ठेवावे.

* नेत्रपेढीला कळविल्यावर नेत्रपेढीचे डॉक्टर मृत व्यक्ती जेथे असेल तेथे येऊन अर्ध्या तासात नेत्र काढून नेतात, त्यासाठी जंतुविरहित खोलीची आवश्यकता नसते. नेत्र काढल्यावर कृत्रिम नेत्र किंवा कापसाचे बोळे ठेवून पापण्या व्यवस्थितपणे बंद केल्या जातात त्यामुळे मृत व्यक्तिचा चेहरा विद्रूप दिसत नाही.

* हे नेत्र खास फ्लास्कमधून नेत्रपेढीत नेले जातात. त्यावर काही प्रक्रिया करून ४८ तासांच्या आत नेत्रपेढीच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे दोन ते सहा नेत्रहीन व्यक्तींना बसविले जाऊन त्यांना नवजीवनच देण्याचे महान कार्य करतात.

* आपणही हे अमूल्य दान करु शकतो. कदाचित जीवनभर समाजाच्या उपयोगी पडलो नाही तरी मरणोत्तर नेत्रदानाने दोन ते सहा दृष्टिहिनांच्या रंगहीन जीवनात अमूल्य दृष्टिचे रंग भरु शकतो, त्यांना नवजीवनच देऊ शकतो.

 

लेखक… श्री. वि. आगाशे

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “जागा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

 जागा हि प्रत्येक गोष्टींची आणि आपलीच असते. शब्द एक आणि रुप अनेक.

राहण्याची असते. राबण्याची असते.

प्रवासात बसण्याची असते.

बाहेर गेल्यावर दुचाकी किंवा चारचाकी लावायची असते.

राजकारणात तर असतेच असते. पण. . . . कार्यक्रमात सुध्दा असते.

 जागा. . . . . . .

सर्वसामान्य लोकांसाठी यात जिव्हाळा आहे.

मित्र, नातेवाईक यांच्यासाठी आपुलकी आहे. तर. . . . . .

राजकारणात प्रतिष्ठा आहे.

राजकारणात मिळाली तर टिकवायची, आणि नाही मिळाली तर बळकवायची असा दोनसुत्री कार्यक्रम असतो. मग ती जागा मोक्याची किंवा धोक्याची कोणतीही असो.

राजकारणात जागेसाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर सहज होतो. तर नात्यांमध्ये यांचा विचार गौण असतो. किंबहुना नसतोच.

जागा घेण्यासाठी संघर्ष असतो. तर  जागा सोडण्यासाठी तडजोड असते.

व्यक्तीचे वय, वागणं, विचार, आणि ज्ञान यानुसार तो जागा मिळवत असतो.

काही वेळा जागेमुळे माणसाला किंमत असते. तर काही वेळा माणसाला आपली जागा कोणती?. . . . याची किंमतच नसते.

आदराने आणि सन्मानाने बोलवून दिली जाते ती जागा. तर अपमान करुन दाखवली जाते ती सुद्धा जागाच.

गाण्यात असते, नाटकात असते. या जागा बरोबर घेतल्या तर दाद सुद्धा मिळते.

जागा, प्रेक्षणीय असते, पवित्र असते, शांत असते, आणि भयावह सुध्दा असते.

सुपीक असते, नापीक, आणि पडीक सुध्दा असते.

लहानपणी लपंडाव खेळताना आपण सापडूनये म्हणून, आणि आता बऱ्याच ठिकाणी अपराध केल्यावर पोलीसांनी पकडूनये म्हणून शोधली जाते ती जागा.

काही सुरक्षित असतात. तर काही आरक्षित. काही अतिक्रमण केलेल्या असतात, तर काही पुनर्वसन करण्यासाठी देऊ असं आश्वासन असतं. पण असतात जागा.

इतकच काय. . . . मेल्यानंतर सुध्दा नेतात ती सुध्दा एक ठराविक जागाच असते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

एखादी कल्पना सुद्धा कल्पकतेनेच कागदावर मांडताना वास्तवाच्या घटनेची गती वेगळ्या वळणाने वास्तवाचा हात न सोडता ज्याला अंतीम नैसर्गिक सत्यापर्यंत लिलया पोहोचवता येते तोच खरा साहित्यिक बनतो.

पाळलेले कबूतर अवकाशात उंच उंच गिरक्या मारताना नाविन्याचा शोध घेत नाही. किंवा कुठल्याही लक्षाचा वेध घेत नाही. कारण त्याला माहीत असतं आपल्या दाण्यापाण्यची व्यवस्था आपल्या मालकाने आपल्या खुराड्या जवळच करून ठेवली आहे.

पण गरूडाला गगनभरारी घेतच आपलं लक्ष निश्चित करून त्यावर झडप टाकून ते मिळवावं लागत. कारण त्याला पुन्हा निसर्गाच्या कुशीतच परतायच असतं आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी म्हणूनच गरूड कबुतर, चिमणी वास्तवतेच्या वेगळ्या साच्यात आपला जीवनक्रम व्यतीत करताना आपापला प्रवर्ग वेगळा वेगळा आहे. हे ओळखून असतात त्यानी आपल्या वेगळ्या वेगळ्या तपसाधनेने वेगळी वेगळी सिद्धी साध्य केलेली असते. विधात्याने ही त्यांना तसेच घडवलेले असते.

हे नैसर्गिक सामर्थ्य आजपावेतो निसर्गाने कठोर साधना करणारानाच स्वखुशीने बहाल केले आहे. म्हणून साधना महत्वाची केवळ उसनवारी करून यातले काही साधता येत नाही. ऊर्जाश्रोत मुळात नैसर्गिक आहे. तो मिळवायला माणसाला निसर्गालाच शरण जावे लागते. स्तुतीचे भाडोत्री डोलारे भाडे थकताच पोबारा करतात आणि आपण उघडे पडलो आहोत याची जाणीव होते. म्हणून निसर्ग दत्त सामर्थ्य हेच अखेरचे वास्तदर्शी सत्य असते. 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… भाग – ७ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ गीता जशी समजली तशी… भाग – ७  – गीता — श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती ☆ सौ शालिनी जोशी

मूर्ती ही एखाद्या व्यक्तीची प्रतिमा असते. तिला रंग, रूप, आकार असतो. त्यावरून त्या व्यक्तीचे बाह्य रूप समजू शकते. ती निर्जीव असते. आचार, विचार कळू शकत नाहीत. तेव्हा एखाद्या व्यक्तीने तिच्या वाणीने म्हणजे तिच्या शब्दांत सांगितलेले विचार म्हणजे त्या व्यक्तीची वाणीरूप मूर्ती. म्हणजे संत महात्म्यानी केलेला उपदेश, त्यांचे विचार ते गेले तरी ग्रंथ रूपाने लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणून त्यांच्या ग्रंथांना त्यांची वाङ्मय मूर्ती म्हणतात. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांची, आत्माराम- दासबोध समर्थांची आणि गाथा ही तुकारामांची वाङ्मम मूर्ती होय. म्हणून समर्थ रामदास शिष्यांना सांगतात, ‘ आत्माराम दासबोधl माझे स्वरूप स्वतः सिद्धll असता न करावा खेदl भक्तजनीll’ तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हणतात, ‘ पुढती पुढती पुढतीl इया ग्रंथ पुण्य संपत्तीll सर्व सुखी सर्व भूतीl संपूर्ण होईजोll’ (ज्ञा. १८/१८०९)

तशीच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती. त्याविषयी सांगण्याचा हा प्रयत्न.

श्रीकृष्ण कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी अर्जुनाचा सारथी म्हणून रणांगणावरती उतरले. युद्धात भाग घेणार नाही अशी प्रतिज्ञा. पण पांडवांच्या बाजूने त्यांनीच प्रथम पांचजन्य शंख फुंकला. आणि ते ऋषिकेश (इंद्रीयांचा स्वामी, ऋषिक- इंद्रिय) अर्जुनाच्या इंद्रियांचा स्वामी झाले. रणांगणावर नातेवाईकांना व गुरुना पाहून अर्जुनाला त्यांच्याविषयीच्या मोहाने ग्रासले. पापा पासूनचे विचार धर्मनाशापर्यंत पोहोचले. तरीही श्रीकृष्ण शांत होते. त्यांनी अर्जुनाचे म्हणणे ऐकून घेतले. अर्जुनाच्या हातातील धनुष्य गळून पडले. तो संन्यासाची भाषा बोलू लागला आणि शेवटी श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. तेव्हा श्रीकृष्णानी आपले प्रयत्न सुरू केले. अर्जुनाची वीरश्री जागृत करायचा प्रयत्न केला. पण अर्जुन मोहरूपी चिखलात अधिकच रुतत आहे असे पाहून, असा मोहरुप रोग त्याला कधीच होऊ नये या दृष्टीने उपदेशाला सुरुवात केली. विचार केला, आचरण केले आणि मग सांगितले असा हा उपदेश.

आत्म्याचे अविनाशित्व, देहाची क्षणभंगूरता, स्वधर्माची अपरिहार्यता, क्षत्रियांचे कर्तव्य व जबाबदारी, निष्कामकर्माची महती अशा वरच्या वरच्या श्रेणीत उपदेश सुरू केला. लोकसंग्रहाचा विचार, यज्ञाच्या व संन्याशाच्या जुन्या कल्पनात बदल, ज्येष्ठांचे आचरण, निष्काम कर्म सांगून मी स्वतः असे आचरण करतो, दृष्टांच्या नाशासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. असे सांगून आपला आदर्श त्याच्या पुढे ठेवला. हळूहळू आपल्या भगवंत रूपाची जाणीव करून दिली. निर्गुण निराकार असून जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा, भक्तांचा योगक्षेम चालविणारा, सृष्टीचे चक्र चालवणारा, सर्वांचे गंतव्य स्थान मीच आहे. सर्व व्यापकत्व स्पष्ट केले. विश्वरुप दाखवले. दैवी गुणांचे श्रेष्ठत्व पटवून दिले. स्थितप्रज्ञ, जीवनमुक्त, ज्ञानी भक्त यांचे आदर्श त्याच्या समोर ठेवले. त्यामुळे मोहाच्या पलीकडे जाऊन अर्जुन युद्धाला तयार झाला. तशी कबुली त्याने दिली. गीतोपदेशाचे सार्थक झाले. सर्वांसाठी सर्वकाळी अमर असा हा उपदेश, युद्धभूमीवर केवळ ४० मिनिटात श्रीकृष्णाने अर्जुनाला केला. आणि ‘यथेच्छसि तथा कुरु’ असे स्वातंत्र्य ही त्याला दिले.

आपल्याही जीवनात असे मोहाचे प्रसंग येत असतात खरं पाहता आपण सारे अर्जुन आहोत. तेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्यासमोर नसले तरी हृदयात आहेत, मार्ग दाखवण्यास सज्ज आहेत, त्यांची गीता समोर आहे. तिचा आधार घेऊन जीवनाचे सूत्र त्या श्रीकृष्णाच्या हाती देवून संकट मुक्त व्हावे. अशी ही गीता म्हणून भगवंतांची वाङ्मय मूर्ती होते. साधकाने जीवन कसे जगावे सांगणारी जीवन गीता.

शंकराचार्य गीता महात्म्यात म्हणतात, ‘ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन:l पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्ll उपनिषद या गायी, श्रीकृष्ण हा दोहन करणारा गवळी, अर्जुन गीतामृत पिणारे वासरू. हा दृष्टांतच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती आहे सांगायला पुरेसा आहे. गीता ही श्रीविष्णूच्या मुखकमलातून निघालेले शास्त्र आहे. त्यामुळे इतर शास्त्रांच्या अभ्यासाची गरज नाही. हेच सर्व शास्त्रांचे शास्त्र. खचलेल्या मनाला उभारणी देणारं, मन बुद्धीचा समन्वय साधणार मानसशास्त्र आहे. योग्य सात्विक आहार व त्याचे फायदे सांगणार आहारशास्त्र आहे. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणारे आचरण शास्त्र आहे. नेत्यांची जबाबदारी आणि समाजातील सर्व घटकांना त्यांची कर्तव्य सांगणारं, सर्व जाती, धर्म, स्त्रिया यांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. पंचभूतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र, ‘उतिष्ठ, युद्धस्व’ सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणारे विवेक शास्त्र आहे. तसेच सर्वाभूती ईश्वर सांगणारे समत्व शास्त्र आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे आत्मज्ञान करून देणारं आत्मशास्त्र आहे. सर्व योगही कर्म, ज्ञान, भक्ती येथे एकोप्याने नांदतात. कारण व परिणाम सूत्र पद्धतीने मांडले आहेत. कोणतीही सक्ती नाही. अंधश्रद्धा नाही. पण शास्त्राप्रमाणे कर्तव्य करायचा आग्रह आहे. अर्जुनाचे दोष सांगण्याचा स्पष्टपणा आहे आणि स्वतःचे कर्तव्य ही सांगितले आहे. स्वतः केले, आचारले मग सांगितले असा हा उपदेश. अर्जुनाच्या मनात कधीही परत संभ्रम होऊ नये असा रामबाण उपाय. सर्व द्वंद्वातून मुक्त करून नराचा नारायण करणारा हा संवाद. वरवर प्रासंगिक वाटला तरी तसा नाही. सर्वकाली, सर्व जगाच्या कल्याणाचा आहे. श्रीकृष्ण योगेश्वर अर्जुनाचे निमित्त्य करून सर्व जगाचे साकडे फेडतात. कर्म बंधनात न अडकता कर्म करण्याची वेगळी दृष्टी जगाला देतात. कर्म हीच पूजा झाली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत म्हणतात, ‘म्हणौनि मज काहीl समर्थनी आता विषो नाही l गीता जाणा हे वाङ्मयीl श्रीमूर्ति प्रभूचीll (ज्ञा. १८/१६८४)

अशी ही गीता ५००० वर्षे झाली तरी तिचे महत्त्व कमी झाले नाही. सर्व काळी सर्व लोकांना ती मार्गदर्शक आहे. सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. मानवाच्या आयुष्यातील कसोटीच्या वेळी योग्य मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ म्हणजे भारताची वैचारिक संपत्तीच आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य, धैर्य देणारी गीता हातात घेऊन अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान केले. यशाची प्रेरणा देणारी तीच आहे. म्हणून अनेक खेळाडूही यशाचे कारण गीता सांगतात. कितीतरी विद्वान, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ गीतेचा अभ्यास करतात व केला आहे. देशी-परदेशी विद्वानांवर तिचा प्रभाव आहे. विविध भाषेत भाषांतर होत आहे. झाली आहेत. असे हे अध्यात्म प्रधान, नीतिशास्त्र भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. अभिमानाने गीता ग्रंथ आपण परदेशी पाहुण्यांना भेट देतो. पंतप्रधान मोदींनी ही पद्धत सुरू केली. कारण गीता ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयमूर्ती!

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – १०. काय काय करावे ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – १०. काय काय करावे ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. त्यात काय करू नये हे विशेषतः सांगितले होते. आज आपण काय करावे यावर लक्ष देऊया. या गोष्टी आपण रोजच आचरणात आणल्या तर त्याचा स्वतः सहित सर्वांनाच फायदा होणार आहे. उपनिषदामध्ये एक थोर वचन आहे. या विश्वातील वस्तुमात्र ईश्वराने व्यापलेले आहे. त्यामुळे त्यागपूर्वक (जीवनावश्यक) भोगाचा स्वीकार करावा. कोणत्याही धनाचा लोभ करू नये हा सिद्धांत म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे. त्याग पूर्वक भोग आणि लोभाचा त्याग यामुळे आपले जीवन समृद्ध बनू शकते. त्यासाठी मनाचे सामर्थ्य वाढवावे लागते. आपल्या बलवंत मनाला अंतर्मुख बनवण्यासाठी व्रते फार महत्त्वाची असतात. व्रत म्हणजे निश्चयाने सतत अखंडपणे करायची कृती. त्यासाठी निष्ठा धैर्य सहनशीलता असे गुण असावे लागतात.

आत्ता पर्यंत आपण सोपी व्रते बघितली. आजही सहज अंगीकार करता येतील अशी व्रते बघू या. यात रोज आचरणात आणण्याची व्रते आहेत.

१) रोज व्यायाम करणे. ज्याला जो जमेल त्याने तशा पद्धतीने करणे. रोज प्राणायाम करणे.

२) रोज ध्यान करणे.

३) चेहेऱ्यावर एक स्मितहास्य कायम असावे. त्यामुळे बघणाऱ्या व्यक्तीला आनंद मिळतोच. पण याचा फायदा आपल्याला जास्त होतो. हसण्या मुळे शरीरात एंडॉरफिन नावाचा अंतस्त्राव स्त्रवू लागतो. तो पेनकिलरचे काम करतो.

४) कायम वर्तमानात रहावे. काल काय झाले हे आठवू नये.आणि उद्या काय होणार याचीही चिंता करु नये.

५) प्रत्येक घटना, व्यक्ती यातील सकारात्मकता शोधून त्याकडे लक्ष द्यावे. आणि सकारात्मक बोलावे.

५) जमेल तेवढे कोणत्याही स्क्रीन पासून लांब रहावे. आवश्यक तेवढाच वापर करावा.

६) सामाजिक संपर्क ठेवावा. त्यामुळे आपली मनस्थिती नक्कीच बदलते.

७) तुलना करण्या पासून लांब रहावे. कोणाचीच कोणाशी अगदी स्वतःची सुद्धा इतर कोणा बरोबर तुलना करू नये.

८) अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी. साधारणपणे अपेक्षा दुसऱ्या व्यक्ती कडून ठेवली जाते. आणि अपेक्षा या शब्दाला जोडून येणारा शब्द बहुतांशी भंग हा असतो. आणि अपेक्षा भंग झाला की त्याच्या बरोबर दुःख, मानसिक ताण येतोच.

९) शक्य तेवढा आनंद द्यावा. आपण जे जे दुसऱ्याला देतो ते आपल्याकडे कित्येक पटींनी परत येते. आनंद हवा असेल तर तो वाटावा. म्हणजे सगळेच आनंदी राहतील.

१०) महत्त्वाचे म्हणजे यातील जमतील तेवढी व्रते अंगीकारण्याचा प्रयत्न करावा.

 व्रते वैकल्ये कायमच असतात. फक्त त्या त्या काळानुसार त्यात बदल होत असतो. त्याप्रमाणे आजच्या काळाला अनुकूल व अनुरूप अशी काही व्रते सांगितली आहेत अर्थात हे माझे विचार आहेत. पण त्याचा फायदा मात्र नक्कीच आहे.

व्रतोपासना  एक ते दहा वाचल्याबद्दल धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्कूल तो बहुत सीख लिया, अब…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्कूल तो बहुत सीख लिया, अब…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“स्कूल तो बहुत सीख लिया, कुछ दिन तो बिताये इन्सानियत सीखनें के लिए !”

काॅलेजात असताना गाडीची किल्ली हातात असणं म्हणजे चैन वाटायची. खिशात फारसे पैसेही नसायचे. अर्थात, खूप पैसे लागतही नसत. सगळीकडे सायकल दामटत फिरायचं आणि मिळेल ते खायचं, असं खूप भटकलो. 

मी सांगतोय तो काळ काही फार जुना नाहीय. पण तेव्हा स्वस्ताई जास्त होती की देणाऱ्यांचे हात मोठे होते, यात उजवं-डावं करणं कठीण आहे. 

रोज सकाळी ६ वाजता पर्वतीवर जायचा आमचा शिरस्ता. सदाशिव पेठेत राहत होतो, तिथून चालत निघायचं आणि थेट पर्वतीवरच जाऊन थांबायचं. सकाळच्या गारव्यात दोनदा पर्वती चढायची-उतरायची आणि मग पायथ्याला गरमागरम पोहे किंवा उपीट खाऊन चहा प्यायचा. दहा रूपयांत काम ओके..! एखाद्या दिवशी पैसे विसरले-बिसरले तर कुणी उपाशी जाऊ दिलं नाही आम्हांला. चहा-नाश्ता विकणारी तरी अशी कुठं श्रीमंती ऊतू जाणारी माणसं होती? शाळेत चार बुकं कमी शिकली असतील कदाचित, पण माणूसपणात मात्र तरबेज एकदम. 

दर रविवारी सिंहगड ठरलेला. पहाटे अंधारातच सायकलला टांग मारून सुटायचं, खडकवासल्यापाशी अर्धा-अर्धा कप चहा घ्यायचा. आतकरवाडीत सायकली लावून पायवाटेनं गडावर जायचं. एखाद्या मेटीवर थकून थांबलं आणि पाणी मागितलं तर नुसतं पाणी यायचं नाही. चमचाभर साखर यायची. ‘पोरांनो,चहा घ्या घोटभर’ अशी हक्काची ऑर्डर असायची. ‘पैसे किती?’ असं विचारल्यावर ‘मोठा साहेब होशील तेव्हा घेईन पैसे’ असं म्हणणारी माणसं..

गडावर पिठलं-भाकरी खायला बसावं आणि एकाच भाकरीत पान उचलायला जावं तर जमायचंच नाही. ‘एका भाकरीतच पोट कसं काय भरतंय तुमचं? खावा अजून येक भाकर’ असा आग्रह व्हायचा. कांदा बुक्कीनं फोडावा लागायचा. चुकून कच्ची मिरची दाताखाली आली की पाणी-पाणी व्हायचं. चुलीशी बसलेली बायका-माणसं लगोलग दह्याची वाडगी पुढं करायची. थंडगार ताक खरोखरच आत्मा शांत करायचं. पातेल्यात लावलेला भात हे प्रकरण चवीला अफलातूनच असतं, शिवाय पौष्टीकही. तेव्हा दह्या-ताकाचे पैसे मोजून घेत नसत. नेहमी गडावर येणाऱ्यांकडून तर नाहीच. 

गडावर सरबत विकणारा एक मित्र होता. दहावीत शाळा सोडलेला. पाच रूपयांना लिंबाचं सरबत विकायचा. चांगला दोस्ताना जमलेला. मग दोन-तीन-चार ग्लास सरबत पोटात गेलं तरी हा मात्र पाच रूपयेच घ्यायचा. का? तर ‘मित्र’ म्हणून..! मी त्याला एकदा विचारलं होतं, ‘किती कमाई होते रोजची?’ २००५ साली त्याचं उत्तर होतं, ‘रोजचे पंचवीस-तीस रूपये सुटत्यात आणि रविवारी चांगली कमाई हुती शंभर-सव्वाशे रूपये..!’ महिन्याकाठी हजार-दीड हजार रूपयांची मिळकत असणारा तो माझा मित्र मला दोन-दोन ग्लास सरबत फुकट का बरं देत असेल? 

गडावर एकवेळ मागाल तितकं ताक मिळेल पण पाणी मिळणार नाही अशी स्थिती होती. पाणी मर्यादीतच असायचं. वीजेचा पुरवठा अगदी नियमितपणे अनियमित. अशा स्थितीत पायात प्लास्टीकच्या चपला अडकवून हा दिवसभर गडावर फिरून सरबत विकायचा. संध्याकाळी खाली उतरायचा. कधी कधी त्याचा अंदाज चुकायचा अन् नुकसान व्हायचं. गडावर राबता नसला की, केलेलं सरबत वाया जायचं. दिवसही वाया जायचा, पायपीट व्हायची, पैसेही मिळायचे नाहीत आणि मालाचंही नुकसान ! मग त्याची फार चिडचिड व्हायची. पण, दोन-तीन तासांत गडी नाॅर्मल..! खिशात पैसे नव्हते, पण त्याच्याकडे दानत होती हे निश्चित. 

कलावंतीण-प्रबळगड सारख्या ट्रेकमध्ये किंवा वासोट्यासारख्या ट्रेकमध्ये आपले सगळे नखरे अक्षरश: हवेत विरून जातात. ‘कुठलंही द्या, कसलंही द्या, पण पाणी द्या’ अशी स्थिती होते तेव्हा गडावरच्या झोपड्यांचं महत्त्व समजतं. इतक्या दुर्गम ठिकाणी, जिथं दिवसाला पाच-पंचवीस माणसं येण्याचीसुद्धा शाश्वती नाही, अशा  ठिकाणी स्टाॅलसदृश दुकान मांडून बसायचं, हा केवळ व्यवसाय असेल असं वाटत नाही. त्याही पलिकडे काहीतरी असणार..! कैऱ्या, जांभळं, करवंदं, बोरं, पेरू, आवळे, काकड्या, दही, ताक, सरबतं,चहा अशा गोष्टी विकून त्यांना श्रीमंती येत असेल का? 

महाबळेश्वरमध्ये कुल्फी विकणं वेगळं आणि माहुलीसारख्या गडावर चहा-सरबत विकणं वेगळं.. पाण्याचं महत्व आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा घोटभर पाण्यासाठीसुद्धा प्रचंड तंगडतोड करावी लागते. खिशात भरपूर नोटा असूनही उपयोग नसतो, जवळ उरलेली दोन-चार पारले बिस्कीटंसुद्धा सोन्याच्या बिस्कीटांइतकीच मौल्यवान वाटायला लागतात. एरवी आपण या गोष्टींकडे ढुंकूनही पाहणार नाही. तिथं गेल्यावर आपल्याला याची जाणीव आपोआपच होते. 

सिंधुदुर्गाला जाण्यासाठी पाॅवर बोटी आहेत. पण जंजिऱ्याला जाण्यासाठी शिडाच्या बोटी आहेत. त्या वल्हवाव्या लागतात. ते शारीरिक कष्टाचं काम आहे. वाऱ्याचा अचूक अंदाज घ्यावा लागतो. ते कौशल्य ही माणसं कुठून आणि कशी शिकत असतील? समुद्रातून वाहतूक करण्याचा व्यवसाय करणं हे मुळीच सोपं काम नाही. पावसाळ्यात चार-पाच महिने जंजिरा पर्यटकांसाठी बंद केला जातो, तेव्हा ही माणसं काय करत असतील? याचा विचार आपण कधी करत नाही. ती माणसं शिकलेली नसतील पण, समुद्राच्या घडण्या-बिघडण्याचा अंदाज घेण्यात मात्र हे बहाद्दर निष्णात असतात. 

एखाद्या गडावर आपल्याला चहा २०₹, पोहे ३०₹, भजी ५०₹ असं दिसलं की ते फार महाग वाटतं. पण, जो गड चढताना स्वत:च्या पायातल्या बुटांचंसुद्धा ओझं वाटायला लागतं, तिथं ती माणसं हे खाण्या-पिण्याचं साहित्य किती कष्टानं वर नेत असतील, हे डोळे, बुद्धी आणि मनं उघडी ठेवून पहायला हवं. जिथं घोटभर पाणीसुद्धा पायथ्यापासून घागरी-कळशांतून आणावं लागतं, तिथं लोकं ‘३०-३०₹ घेता आणि पोह्यांवर साधी कोथिंबीर-लिंबाची फोडही देत नाही तुम्ही’ अशी तक्रार करतात, तेव्हा त्यांच्या बौद्धिक पातळीची मला कीव कराविशी वाटते. ‘शी, काय हा चहा.. यात आलं सुद्धा नाही आणि २०₹ घेतात. नुसती लूट आहे ही’ असं म्हणणारी माणसं काही कमी नाहीत. त्यांनी चार दिवस त्याच ठिकाणी राहून चहा विकून दाखवावा आणि मगच असली बडबड करावी, असं मला वाटतं.

आपल्याला तर स्वयंपाकघरातून घराच्या दारापर्यंतसुद्धा सिलिंडर उचलून नेणं जमत नाही आणि ती माणसं सिलिंडर्स डोक्यावर-खांद्यावर वाहून नेतात..! स्त्रीसक्षमीकरण म्हणजे काय असतं ते गडकोटांवर जाऊन पहावं, त्याचा अभ्यास करावा, त्यावर प्रबंध तयार करून परिषदांमध्ये वाचावेत. पद्मपुरस्कारांकरिता गडकोटांवर वर्षानुवर्षं पर्यटक, इतिहासप्रेमींना सेवा देणाऱ्या एकाचंही नाव आपल्यापैकी कुणालाही सुचवावंसं वाटलं नाही. हा आपल्या सगळ्यांच्याच अज्ञानाचा, अपुऱ्या माहितीचा, अक्षम्य दुर्लक्षाचा आणि जगण्यावागण्यातल्या ओतप्रोत भरलेल्या स्वार्थीपणाचाच परिपाक नव्हे का? नारीशक्ती सन्मानाकरिता महाराष्ट्रातल्या शेकडो गडकोटांवर वर्षानुवर्षं भाकरी खाऊ घालणाऱ्या अन् पाणी देणाऱ्या एकाही माऊलीचं नाव आपण सुचवू शकलो नाही, याची आपल्याला खंतच नव्हे तर लाजही वाटली पाहिजे. 

ही लोकं गडोगडी दिसतील. या माणसांकडे पहा जरा. व्यावहारिक जगतापासून पूर्ण लांब असलेली आणि जगण्यासाठी रोजची धडपड करणारी ही माणसं.. त्यांचा परिसर सोडून शहरांकडे गेलेली नाहीत. यांची घरंदारं कशी असतील? यांची मुलं-बाळं दिवसभर काय करत असतील? ती कोणत्या शाळेत जात असतील? असे अनेक प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत. दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत घरापासून दूर डोंगरावर चौदा-पंधरा तास राबायचं, हे काम फार कठीण आहे. पण त्या बदल्यात त्यांना काय मिळतं? किती पैसे मिळतात? याचा जरा शोध घ्यायला हवा. शोधलंत तर निराळ्याच जगाचा शोध तुम्हांला लागेल.. 

मोबाईल फोन्स, इंटरनेट गेम्स, सोशल मीडीया, फुटकळ टीव्ही सीरीयल्स, रिॲलिटी शोज्, भुक्कड काॅमेडी शोज्, यांच्या विळख्यात अडकून आपण खरंखुरं जग पहायचं विसरूनच गेलो आहोत. त्यामुळेच, आपण कितीही संपन्न असलो तरीही आपल्याला ते कमीच वाटणार. आणखी मिळवण्याची लालसा कमी होणारच नाही. बहुतांश समस्यांचं मूळ हेच आहे. 

उन्हाळ्याच्या सुटीचा काळ ह्या निराळ्या जगाचा शोध घेण्यासाठी वापरायला हरकत नाही. बाहेर रखरखीत उन्हाळा पेटलेला असताना आपण घरात मस्त गार हवेत बसून ह्या माणसांविषयी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. हे जग प्रत्यक्ष जाऊन, जवळून अनुभवायला हवं. जाणून घ्यायला हवं. शक्य तितकी मदत करायला हवी. माणसांमधल्या माणूसपणाचं हे संचित जपलं पाहिजे..! 

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- समीर जिवंत राहिला तरी कधीच बरा होणार नाही हे डॉ.देवधर यांनी मला अतिशय सौम्यपणे समजावून सांगितलेलं होतं. त्यावेळी त्यांच्या केबिनमधे माझ्याबरोबर आलेले माझे ब्रँचमॅनेजर घोरपडे साहेब होते फक्त. ही गोष्ट घरी किंवा इतर कुणालाच मी मुद्दाम सांगितलेली नव्हती. असं असताना हे लिलाताईला कसं समजलं? मला प्रश्न पडला.)

विशेष म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी कुणाला न विचारताच त्याच दिवशी मला परस्पर मिळणार होतं आणि माझ्या दुःखावर फुंकर घालत मला

दिलासाही देणार होतं हे त्या क्षणी मात्र मला माहित नव्हतं. सगळं घडलं ते योगायोगाने घडावं तसंच.

‘ समीर पृथ्वीवरील औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेल्यामुळे तो बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि बरा होऊन परत येणाराय ‘

हे लिलाताईच्या पत्रातील वाक्य पुत्रवियोगाच्या धक्क्यातून मला अलगद बाहेर घेऊन आल़ं होतं. ही अंतर्ज्ञानाची खूणगाठच होती जशीकांही! एका क्षणार्धात माझं पुत्रवियोगाचं दु:ख विरुनच गेलं एकदम…

“कुणाचं पत्र..?”

“लिलाताईचं. घे. बघ तरी काय लिहलंय? वाच”

ती न बोलता उठली. ‘चहा करते..’ म्हणत आत जाऊ लागली.

“आधी वाच तरी.. मग चहा कर.”

“सांत्वनाचंच पत्र असणार. काय करू वाचून? आपला समीर गेलाय हे कटू सत्य बदलणाराय कां?” तिचा आवाज भरून आला.

“हो बदलणाराय. बघशील तू. आधी वाच..मग तूही कबूल करशील.”

तिने ते पत्र घेतलं. वाचलं. निर्विकारपणे मला परत दिलं.

“तुला हे वाचून खरंच काहीच वेगळं वाटलं नाही?”

“नाही. लिलाताईंचं मराठी भाषेवर प्रभुत्त्व आहे म्हणून त्यांनी चांगल्या भाषेत आपलं सांत्वन केलंय एवढंच. बाकी वेगळं काय आहे त्यात?” ती म्हणाली.

तिचंही बरोबरच होतं. समीरच्या आजारपणाच्या बाबतीतल्या कांही गोष्टी तिला त्रास होऊ नये म्हणून मी त्या त्या वेळी मुद्दामच सांगितल्या नव्हत्या. आता सगळं घडून गेल्यानंतर ते तिला सांगण्यात कशाचाच अडसर नव्हता. ते नाही सांगितलं तर या पत्रातलं मला जाणवलेलं वेगळेपण तिला कसं  जाणवावं….? पण ती ते सगळं समजून घेण्याइतकी सावरलेली नाहीय. सगळं ऐकल्यानंतर ती बिथरली तर? नकोच ते‌. जे सांगायचं ते तिचा मूड पाहून तिच्या कलानेच सांगायला हवं. तरीही ती केव्हा सावरतेय याची वाट पहात आता गप्प राहून चालणार नाही. लवकरात लवकरात लवकर तिला या एकटेपणातून बाहेर काढायलाच हवं….’

कितीतरी वेळ असे उलट सुलट विचार माझ्या मनात गर्दी करत राहिले. तिने चहाचा कप माझ्यापुढे ठेवला आणि मी भानावर आलो. डोळे पुसत ती किचनमधला पसारा आवरु लागली.

“आरती, ऐक माझं. पटकन् जा आणि आवर तुझं. मी तयार होतोय..”

“कां ? कुणी येणार आहे कां?”

“नाही..” मी हसून म्हटलं “कुणीही येणार नाहीय, आपणच जायचंय..”

“आत्ता? कशाला? कुठं जायचंय..?”

मला एकदम लिलाताईच्या माहेरघराची आठवण झाली.ते सर्वजण किर्लोस्करवाडी सोडून कोल्हापूरला आले त्याला दहा वर्षं होत आली होती. सुरुवातीची एक दोन वर्ष कष्टात गेली तरी आता त्यांचं छान बस्तान बसलं होतं.स्वत:चं घर झालं. कोल्हापूरला उद्यमनगरमधे स्वतःचं वर्कशॉप होतं, दोन लेथ होते, मशिनरी स्पेअर पार्टसचं स्वतःचं दुकान होतं. सगळे भाऊ स्वतः राबत होते. दोन वर्षांपूर्वीपासून लिलाताईचे वडिल प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व पसारा मुलांच्या हवाली करून अलिकडे घरी अंथरुणाला खिळून असायचे. क्वचित मधे कधीतरी एक दोनदा कामानिमित्ताने त्या भागात गेल्यानंतर मी उभ्या उभ्या त्यांच्या घरी जाऊन आलो होतो. पण त्यालाही बरेच दिवस गेले होते. शिवाय सगळी हालहवाल लिलाताई वाडीला भेटली की वेळोवेळी तिच्याकडून समजायचीच. माझा लहान भाऊ कोल्हापूरमधेच असल्याने नेहमी त्यांच्या संपर्कात असायचा. त्याच्याकडून चार दिवसांपूर्वीच लिलाताईचे वडील गेल्याचे समजले होते. या रविवारी मी त्यांच्या घरी भेटून यायचे ठरवले होतेच.त्यापेक्षा आरतीलाही बरोबर घेऊन आजच गेलो तर…? हा विचार मनात आला तेव्हाच आरतीने मला पुन्हा विचारले…”सांगा ना, कुठं जायचंय..?”

उद्यमनगरमधे. लिलाताईचे वडील नुकतेच गेलेत. तिच्या आईला भेटून तरी येऊ.” मी म्हणालो.

आरती गप्पच झाली एकदम.

“का गं? काय झालं?”

“नाही… नको.”

“का ?”

“आपला समीर अडीच तीन महिने दवाखान्यात अॅडमिट होता. त्यांच्यापैकी कुणी आलं होतं कां बघायला? तो गेल्याचंही समजलं असेलच ना त्यांना? त्यानंतरही कुणी आलं नाही.आपणच कां जायचं?”

मी निरुत्तर झालो. ती बोलली यात तथ्य होतंच.पण तरीही मला ते स्विकारता येईना.

हे बघ, त्यांनी केलं ते न् तसंच आपणही करायचं कां? लिलाताईचे वडीलही झोपून होते. त्यांचा कांही प्रॉब्लेम असेल. इतर कांही अडचणी असतील. त्यामुळे येणं जमलं नसेल. पण ती अगदी साधी माणसं आहेत गं. माणुसकी सोडून वागणारी तर अजिबातच नाहीयत.आणि आपण रहायला जातोय कां तिकडे? घटकाभर बसून बोलून येऊ. त्यांनाही बर वाटेल.”

ती न बोलता स्वतःचं आवरू लागली. मला तेवढं पुरेसं होतं. ती यायला तयार झालीय

हेच खूप होतं माझ्यासाठी.  

त्यांच्या घराचं दार उघडंच होतं. हॉलमधे दारासमोरच्या भिंतीला टेकून लिलाताईच्या  आई नेहमीसारख्या बसून होत्या.

मला दारात पहाताच त्यांना गलबलून आलं.

“ये रेss माज्या लेकरा..ये…” रडवेल्या आवाजातच त्यांनी अतीव मायेनं आमचं स्वागत केलं.आम्ही आत जाताच आरतीकडं पाहून त्यांचे डोळे भरुन आले.त्यांनी तिला जवळ बोलावलं..

“तू कां उबी? ये माझ्याजवळ.बैस अशी..” म्हणत तिला जवळ बसवून घेतलं.

” खूप आजारी होते कां हो बाबा?”

” हां तर काय? तरण्या वयापासून घाण्याला बांदलेल्या गुरासारका राबराब राबल्येला जीव त्यो. दोन वर्सं झाली आंथरुन सोडलं नव्हतं बग ल्येका. मी ही अशी.लांबून बघत बसायची निस्ती. पण समद्या पोरांनी लै शेवा केली बग त्येंंची.”

बोलता बोलता आरतीकडं लक्ष जाताच त्या बोलायचं थांबल्या.

” हे बघ बै.झालं गेलं गंगेला अर्पण करुन टाकायचं बग.त्यातच रुतून बसायचं न्है.कळतंय का? यील त्ये पदरात घ्यायचं न् पुढं जात -हायचं बग.” त्यांनी तिला समजावलं. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द त्यांच्या अंत:करणातूनच उमटलेला असावा इतका आपुलकीने ओथंबलेला होता.”गप.रडू नको. तुजा इस्वास नाई बसनार,पन इतं गेटभाईर जीप हाय नव्हं , तिची डिलीवरी कवा मिळालीती सांगू?तुजं बाळ देवधर डाकतराकडं अॅडमीट झालंय त्ये आमाला समजलं त्याच दिवशी. मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दरसन घ्यून लई वर्सं झाली बग.पोरं म्हनत हुती ‘चल.तुला उचलून नव्या जीपमंदी बशीवतो न् अंबाबाईच्या दरसनाला बी तसंच उचलून घ्यून जातो म्हणून.तवा म्या काय म्हनले ठाव हाय? मी म्हनले, त्या म्हाद्वार   रस्त्यावरच अरविंदाचं बाळ हाय नव्हं दवाखान्यात? अंबाबाईचं दरसन राहूं दे.. मला उचलून त्या दवाखान्यात नेताय का सांगा.तरच मी जीपमध्ये बशीन. त्येच्या बाळाला बगून तरी येते यकडाव. पन दोन अवगड जिनं चढाय लागत्यात म्हनली पोरं.त्ये कसं जमणार हुतं? म्हनून मग जीपमदे बसनं न् देवीचं दरसन दोनी बी नगंच वाटलं. आज तुमी दोगं आला झ्याक वाटलं बगा…

आरती थक्क होऊन ऐकत होती. तिच्या मनातल्या प्रश्नाचं प्रश्न न विचारताच तिला परस्परच उत्तर मिळालं होतं!

“तुझ्या आईला न् तुला बी माजी लिलाबाई भेटती न्हवं वाडीत न्हेमी? ती सांगत असती मला…”

“हो.बऱ्याचदा भेट होते आमची”

” तिची पन लई सेवा झालीय बग दतम्हाराजांची.तुला म्हनून सांगत्ये..,तुझ्या बाबावानी लिलाबाई बोलती त्ये बी खरं व्हाय लागलंय बग.”

त्या सहज बोलायच्या ओघात बोलून गेल्या न् मग लिलाताईबद्दलच कांहीबाही सांगत राहिल्या.तिच्या वाचासिध्दीबद्दलच्या अनुभवांबद्दलच सगळं. त्यातला प्रत्येक शब्द मला निश्चिंत करणारा होता! सगळं ऐकत असताना लिलाताईच्या पत्रातला मजकूर माझ्या नजरेसमोर तरळत राहिला होता! त्यातला शब्द न् शब्द खरा होणाराय हा विश्वास आरतीपर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न मात्र त्याक्षणीतरी अनुत्तरीतच राहिला होता..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares