मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३८ परिव्राजक १६. बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३८ परिव्राजक १६. बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी १६ ते २७ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगांवमुक्कामी आले. महाराष्ट् म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत ! तेव्हा बेळगांव मुंबई प्रांतात होते. कोल्हापूरहून भाटे यांचे नावाने गोळवलकर यांनी परिचय पत्र दिलं होतंच.  श्री. सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचं अत्यंत अगत्यपूर्वक स्वागत झालं. त्यांना पाहताक्षणीच हा नेहमीप्रमाणे एक सामान्य संन्यासी आहे अशी समजूत इथेही झाली असली तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे हे ही त्यांना जाणवत होतंच. भाटे कुटुंबीय आणि बेळगावातले इतर लोक यांना कधी वाटलं नव्हतं की काही दिवसांनी ही व्यक्ती जगप्रसिद्ध होईल. बेळगावचे हे श्री भाटे वकिल यांचे घर म्हणजे विदुषी रोहिणी ताई भाटे यांच्या वडिलांचे घर होय.

मराठी येत नसल्यामुळे भाटे कुटुंबीय स्वामीजींशी इंग्रजीतच संवाद साधत. त्यांच्या काही सवयी भाटेंना वेगळ्याच वाटल्या म्हणजे खटकल्या. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा मागितला. त्याबरोबर थोडी तंबाखू असेल तरी चालेल म्हणाले. संन्याशाची पानसुपारी खाण्याची सवय पाहून भाटेंकडील मंडळी अचंबित झाली. आणखी एक प्रश्न भाटे यांना सतावत होता तो म्हणजे, स्वामीजी शाकाहारी आहेत मांसाहारी? शेवटी न राहवून त्यांनी स्वामीजींना विचारलंच की आपण संन्यासी असून मुखशुद्धी कशी काय चालते? स्वामीजी मोकळेपणाने म्हणाले, “मी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीधर आहे. माझे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यामुळे माझे जीवन जरी संपूर्ण बदलले असले तरी, त्याधीचे माझे आयुष्य मजेत राहणार्‍या चारचौघा तरुणांप्रमाणेच गेले आहे. संन्यास घेतल्यावर इतर सर्व गोष्टी सोडल्या असल्या तरी या एक दोन सवयी राहिल्या आहेत. पण त्या फारशा गंभीर स्वरुपाच्या नाहीत. म्हणून राहू दिल्या आहेत. पण आपोआपच सुटतील”. आणि शाकाहारीचं उत्तर पण भाटेंना मिळालं. “ आम्ही परमहंस वर्गातील संन्यासी. जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा. काहीही मिळालं नाही तर उपाशी राहायचं”.

खरच असं व्रत पाळणं ही कठीण गोष्ट होती. मनाचा निश्चय इथे दिसतो. स्वामीजी सलग पाच दिवस अन्नावाचून उपाशी राहण्याच्या प्रसंगातून गेले होते. भुकेमुळे एकदा चक्कर येऊन पडलेही होते. तर कधी राजेरजवाडे यांच्या उत्तम व्यवस्थेत सुद्धा राहिले होते. पण त्यांना कशाचाही मोह झाला नव्हता हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे. जातीपातीच्या निर्बंधाबद्दल ही शंका विचारली तेंव्हा, आपण मुसलमानांच्या घरीही राहिलो आहोत आणि त्यांच्याकडे जेवलोही आहोत असे सांगितल्यावर, हे संन्यासी एका वेगळ्या कोटीतले आहेत हे समजायला वेळ लागला नाही.

आज लॉकडाउनच्या  काळात दारूची दुकाने उघडली तर परमोच्च आनंद झाला लोकांना. जणू उपाशी होते ते. १०ला उघडणार्‍या दुकानांसमोर सकाळी सातपासूनच उभे होते लोक ! दुकानांसमोर दारू घ्यायला रांगाच रांगा लागल्या होत्या. यात स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. खांद्याला खांदा देऊन लढत होत्या !  हे दृश्य पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीची किती आवश्यकता आहे हे जाणवून मन खिन्न होते. 

एकदा भाटेंचा मुलगा संस्कृत भाषेचा अभ्यास करताना पाणीनीच्या अष्टाध्यायीतील सूत्र म्हणत होता. त्यातल्या चुका स्वामीजींनी दुरुस्त करून सांगितल्या तेव्हा या अवघड विषयाचे ज्ञान असणे ही सामान्य गोष्ट नाही असे भाटे यांना वाटले. एक दिवस काही परिचित व्यक्तींना एकत्र करून त्यांनी स्वामीजींबरोबर संभाषण घडवून आणले. त्यात एक इंजिनियर होते. ‘धर्म हे केवळ थोतांड आहे, शेकडो वर्षांच्या रूढी चालीरीती यांच्या बळावर समाजमनावर त्याचे प्रभूत्त्व टिकून राहिले आहे किंबहुना लोक केवळ एक सवय म्हणून धार्मिक आचार पाळत असतात’, असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजींनी बोलणे सुरू केल्यावर त्यांना ह्या युक्तिवादाला तोंड देणं अवघड जाऊ लागलं. आणि अखेर शिष्टाचाराच्या मर्यादेचा  भंग झाल्यावर भाटेंनी त्यांना (म्हणजे एंजिनियर साहेबांना) थांबवलं. पण स्वामीजींनी अतिशय शांतपणे परामर्श घेतला. ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. कोणाच्याही वेड्यावाकड्या बोलण्याने सुद्धा स्वामीजी अविचल राहिले होते. याचा उपस्थित सर्वांवर परिणाम झाला.या चर्चेचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, “ हिंदुधर्म मृत्युपंथाला लागलेला नाही हे आपल्या देशातील लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. एव्हढच नाही तर, सार्‍या जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. वेदान्त विचाराकडे एक संप्रदाय म्हणून पहिले जाते हे बरोबर नाही. सार्‍या विश्वाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्या विचारात आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे”. स्वामीजींची ही संभाषणे आणि विचार ऐकून बेळगावचा सर्व सुशिक्षित वर्ग भारावून गेला होता.                                                         

बेळगावातील मुक्कामात रोज सभा होऊ लागल्या. शहरात स्वामीजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर सभांमध्ये वादविवाद व चर्चा झडत असत. स्वामीजी न चिडता शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत. कोपरखळ्या मारत विनोद करत स्वामीजी समाचार घेत असत.

या बेळगावच्या आठवणी वकील सदाशिवराव भाटे यांचे पुत्र गणेश भाटे यांनी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजी त्यांच्याकडे आले तेंव्हा ते (गणेश)  बारा-तेरा वर्षांचे होते. स्वामीजीच्या वास्तव्याने पावन झालेली त्यांची ही वास्तू भाटे यांनी रामकृष्ण मिशनला दान केली आहे. स्वामी विवेकानंदांनी या मुक्कामात वापरलेल्या काठी, पलंग, आरसा या वस्तू ते राहिले त्या खोलीत आठवण म्हणून जपून  ठेवल्या आहेत, त्या आपल्याला आजही  पाहायला मिळतात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘आधार आणि सोबत’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

 

? विविधा ?

☆ ‘आधार आणि सोबत’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

एखादा शब्द माणसाला आधार देत असतो सतत सोबत करीत असतो असं कुणी म्हंटलं तर ते खरं नाहीच वाटणार पण असा एक शब्द आहे.देहबोली!

जन्माला आल्यापासून एखाद्याला शब्दांनी जर झिडकारुनच टाकलेलं असेल तर  त्याला कायमस्वरूपी सोबत करते ती त्याच्या देहाशीच एकरूप असलेली देहबोली! आणि याचा ‘याची देही याची डोळा’ मला साक्षात्कार झाला तो जगाचा फारसा अनुभव नसलेल्या आणि नोकरीनिमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत वास्तव्यास जायला लागलेल्या माझ्या नुकतीच विशी ओलांडलेल्या वयात. तेव्हा भयंकर गर्दीतला लोकलचा प्रवास म्हणजे मला एक अतिशय कठोर शिक्षाच वाटायची. पण तोही हळूहळू अंगवळणी पडत असताना त्या लोकलच्या प्रवासानेच मला अतिशय अनपेक्षित असा तो ‘दृष्टांत’ घडवलेला होता!

त्यादिवशी लोकलमधे माझ्या समोरच्या सीटस् वर पाच-सहा मुलांचा एक ग्रूप बसलेला होता. स्वतःशी अगदी हसतखेळत गप्पा मारताना एकमेकाला उत्स्फुर्त टाळ्या देणे, एखाद्याच्या पाठीत धपाटा मारणे, कुणी एखादा विनोद केला असेल तर त्याला हसून दाद देणे, त्यातल्याच कुणी एखाद्याने खोडी काढली असेल तर रुसल्याच्या अविर्भावात त्याबद्दल हसरा निषेध नोंदवणे, हे सगळं त्यांचं एकही शब्द न बोलता सुरू होतं. त्या वयापर्यंत मूकबधिरांचे प्रश्न आणि त्यांचं भावविश्व याबाबत मी पूर्णत: अनभिज्ञच होतो.त्या दिवशी मनाला झालेला अस्वस्थतेचा स्पर्श इतक्या वर्षांनंतर आजही मी विसरलेलो नाहीय!

संजीवकुमार आणि जया भादुरी यांचा ‘कोशिश’ मी मुंबईत तेव्हा पाहिला होता तो या पार्श्वभूमीवर. तो बघताना त्या दोघांच्यातल्या संवादाची विशिष्ट खूणांची देहबोली माझ्या मनाला अधिक उत्कटतेने स्पर्शून गेली ती त्याआधी मी घेतलेल्या लोकलमधील त्या अस्वस्थ अनुभवामुळेच! त्यादिवशी लोकलमधल्या प्रवासात माझी त्या विशिष्ट देहबोलीशी ओझरती ओळख झाली होती फक्त आणि आता ‘कोशिश’ने मूकबधिरांच्या त्या देहबोलीच्या मुळाशी असणाऱ्या अंतरंगाचीही मला ओळख करून दिली होती!

कोशिशचा अनुभव उत्कट होताच पण त्याहीपेक्षा मला जास्त अस्वस्थ करून गेला तो नाना पाटेकर आणि सीमा विश्वास अभिनित ‘खामोशी! ते दोघेही मूकबधिर. कनिष्ठ आर्थिक स्तरातले. त्यांच्या संसारात जेव्हा त्यांच्या लेकीचा जन्म होतो तेव्हा ती आपल्यासारखी नाहीय ना या आशंकेने ते अस्वस्थ. पण ती आपल्या चुटक्या, टाळ्यांना तात्काळ प्रतिसाद देतेय हे लक्षात येताच त्या दोघांच्या भरून आलेल्या तुडुंब नजरेतून पूर्ण चेहऱ्यावर पसरलेला अत्यानंद..! हा प्रसंग खरोखरंच सर्वच प्रेक्षकांना हेलावून सोडणारा होता.त्याच चित्रपटात आपल्या आई-बाबांची सावली बनून त्यांना आधार देणाऱ्या त्या मुलीची मोठेपणीची भूमिका केली होती मनीषा कोईरालाने. ती शिकते, यश मिळवते.आपल्या मूकबधिर आई-वडिलांनी शारीरिकदृष्ट्या हतबल असूनही प्रचंड कष्ट करुन, प्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून, आपल्याला लहानाचं मोठं केलंय ही जाणीव ती विसरलेली नसते. तिच्या सत्काराच्या प्रसंगी तिचे ते मूकबधिर आई-वडील अर्थातच पहिल्या रांगेतील खुर्च्यांवरच बसलेले असतात. सत्कार स्वीकारल्यानंतर ती भाषण करायला उभी रहाते तेव्हा समोरच्या सर्व उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबल्याचे समजणे शक्यच नसणारे ते दोघे अश्रूभरल्या अवस्थेत देहभान हरपून पुढे टाळ्या वाजवतच रहातात ते मोजके क्षण त्या दोघा मूकबधिरांचे दु:ख आणि अगतिकता अतिशय हळुवारपणे अधोरेखित करून जातात. या सगळ्यामुळे मनोमन अस्वस्थ झालेली त्यांची मुलगी आपलं भाषण सुरु करते तेव्हा ती काय बोलतेय हे आपल्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत आई-बाबांच्या डोळ्यांत तरळून जाते आणि ती त्याचक्षणी  त्यांच्या मुलीपर्यंत पोचतेही. त्यानंतरचं तिचं पुढचं संपूर्ण भाषण म्हणजे समोरच्या इतर सर्व श्रोत्यांसाठी शब्द आणि त्या शब्दांच्या उच्चारांबरोबरच त्या शब्दांचा अर्थ आपल्या कर्णबधिर आई-वडिलांपर्यंत पोचावा ‌ यासाठीच्या त्या शब्दांच्या अर्थाच्या मूकबधिरांच्या विशिष्ट देहबोलीतल्या अनुरुप खूणा यांच्या एकत्रित प्रवासासारखे सुरु रहाते.याद्वारे तिने व्यक्त केलेली आपल्या आई-वडिलांबाबतची कृतज्ञता त्या देहबोलीतून त्या दोघांच्या हृदयाला भिडताच आवाज भरुन आलेल्या मुलीच्या आवाजातील थरथर आणि त्या दोघांचेही भावनातिरेकाने नस न् नस हलणारे  चेहरे म्हणजे बोलीभाषा आणि देहबोली यांनी परस्पर सहकार्याने घेतलेला संबंधितांच्या मनातील भावनांचा ठावच ! आणि त्या क्षणांचा तो पूर्ण ऐवज त्याला साक्षीभूत असणाऱ्या प्रेक्षकांच्या काळजाचाही ठाव घेत असे !

इथे मूकबधिरांच्या देहबोलीचा इतका सविस्तर आढावा घेण्याचं एकमेव प्रयोजन म्हणजे माणसाच्या आयुष्यातली देहबोलीची भूमिका समजावी हेच. इथे श्रवणशक्तीच्या अभावी जन्मतःच वाचाशक्तीही मूक होऊन राहिलेल्या वंचितांना जन्मभराचा ‘आधार’ देते ती देहबोलीच ! त्यांच्यासाठी ही देहबोली खंबीर आधार देणारी तर ठरतेच आणि निशब्द राहूनसुद्धा संपर्क-संवादातलं सुख काय असतं याची प्रचितीही त्यांना देते.

आपल्या शरीराच्या अंगांगामधे देहाची ही बोलीभाषा अतिशय बारकाव्यांसह निसर्गतःच पेरली गेलेली असते. त्यामुळेच नैसर्गिक प्रेरणेनेच त्या देहबोलीतल्या  नि:शब्द भावना अगदी तान्ह्या बाळालाही उमजत असतात. म्हणूनच एखाद्या रडक्या बाळाला झोपवतानाचं त्याच्या आईचं ‘थोपटणं’ बाळ रडणं थांबवत नाहीय हे लक्षात येताच जेव्हा ‘धोपटण्या’त परावर्तित होतं तेव्हा ते त्या तान्हुल्याला आपसूक समजतं. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून ते एकतर घाबरुन रडणं थांबवतं तरी नाहीतर चिडून रडण्याची पट्टी वाढवतं तरी !

जन्मतःच असलेली ही देहबोलीची जाण मग पुढे आयुष्यभर आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दात लपलेल्या भावनांना सावली सारखी ‘सोबत’ करतच असते. किंबहुना आधी देहबोली आणि मग त्या देहबोलीचे बोट धरूनच आल्यासारखे शब्दांचे उच्चार असंच आपल्या संवादाचं स्वरूप असतं.’नाही’ या नकारात्मक उच्चाराआधी मान नकारसदृश आधी हलते न् मग ‘नाही’ या शब्दाचा उच्चार होतो. ‘होs नक्कीच’ हा होकार आधी होकारार्थी हललेली मान देते आणि नंतर त्याचे शब्दोच्चारण होत असते. देहबोलीचा मूकबधिरांना जसा ‘आधार’ तशीच आपल्यासारख्या अस्खलित बोलणाऱ्यांच्या    शब्दांनाही देहबोलीचीच ‘सोबत’!

‘नाटक’ म्हटलं की देहबोलीसंबंधी मला सर्वप्रथम आठवतो तो ‘माईम’ हा नाट्यप्रकार! केवळ हावभाव,अविर्भाव आणि हालचालीतून आकाराला आलेलं कथानाट्य म्हणजेच ‘माईम! चित्रपटातील मुकाभिनय म्हटलं की ठळकपणे नजरेसमोर येतो तो ‘चार्ली  चॅप्लीन’! या संदर्भात विशेषत्त्वाने उल्लेख करायलाच हवा तो कांही दशकांपूर्वीच्या ‘पुष्पक’  या चित्रपटातील कमल हसनच्या मुकाभिनयाचा!

चित्रपट असो वा नाटक बोलीभाषेला अनुरुप देहबोलीची जोड नसेल तर अभिनय परिणामकारक होऊच शकणार नाही.

भरतमुनींनी त्यांच्या अतिशय प्राचीन अशा ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात अभिनयकलेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.’देहबोली’च्या विवेचनात भरतमुनींनी सांगितलेल्या चार अभिनय प्रकारांपैकी ‘आंगिक अभिनय’ या अभिनयप्रकाराचा उल्लेख       अपरिहार्यच.मुखज, शरीर आणि चेष्टाकृत हे ‘आंगिक अभिनयाचे’  तीन उपप्रकार म्हणजे अनुक्रमे १)चेहरा, २)शरीराची खांदे,मान, हात, पाय यासारखी मुख्य अंगे, आणि ३)शरीरावयवांच्या विविध हालचाली. या खेरीज विशिष्ट भूमिका साकारताना त्या पात्रानुसार(तरुण,प्रौढ,वृध्द इत्यादी) नटाने कसे चालावे, उठावे, बसावे, याबाबतचे नियमही नाट्यशास्त्रात सांगितलेले आहेत.

अतिशय परिपूर्ण आंगिक अभिनय कसा उत्कट नाट्यानुभव देऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी स्वतः प्रेक्षक म्हणून अनुभवलेल्या भूमिकांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात खालील भूमिकांचा आवर्जून उल्लेख करेन.

हत्तीरोगाची सुरुवात झाल्याने जडावलेला आपला एक पाय ओढत चालणारी ‘संध्याछाया’ या नाटकातील म्हातारी (विजया मेहता), अर्धांगाचा झटका आल्याने संपूर्ण शरीराची हळूहळू वाढत जाणारी वृध्द प्रो.भानूंच्या उभ्या शरीराची थरथर आणि अखेरचे त्यांचे उभेच्या उभे खाली कोसळणे! प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप उडवणारे हे दृश्य अभिनित

केले होते डाॅ. श्रीराम लागू यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकात! पुढे दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकार म्हणून नावारूपाला आलेले ‘दिलीप कोल्हटकर’ आणि नुक्कड या हिंदी मालिकेमुळे वेगळी ओळख मिळालेले ‘सुरेश भागवत’ यांच्या ‘जास्वंदी’ या नाटकातल्या केवळ देहबोलीतून जिवंत केलेल्या दोन बोक्यांच्या अविस्मरणीय भूमिकाही खासच.आंगिक अभिनयातील देहबोलीचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रातिनिधिक भूमिकांचे संदर्भ  पुरेसे बोलके ठरतील !

अशी ही देहबोली! नि:शब्द,अबोल.. तरीही खूप कांही सांगू पहाणारी मूकभाषा! शब्द हरवून बसलेल्या वंचितांना भक्कम आधार देणारी जशी तशीच आपल्यासारख्या सर्वांनाही जन्मक्षणापासून अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करणारीही..!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जमापूंजी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जमापूंजी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

माणूस म्हंटला की त्याला “संचय करणं” ह्याची आवड असते,सवय असते आणि त्याचं खूप महत्वही असतं. थोड्याफार जबाबदा-या उरकल्या की आपणच आपला सगळा हिशोब घेऊन बसतो. ह्या सगळ्या उलाढालीतून आपल्या जवळ काय उरलयं ह्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष देतो.

आपल्याजवळ किती उरलयं वा आपल्याजवळ  शिल्लक किती ह्याकडे वळून बघतांना प्रथम आर्थिक बाबीकडे लक्ष जातं, नव्हे जवळपास त्याच निकषावर आपलं लक्ष केंद्रीत असतं. पण आपण जमा किती केलयं हे माणसं जोडणं, माणसं जपणं ह्या बाबीशी सुद्धा पडताळणं तेवढचं महत्त्वाचं असतं पण दुर्दैवाने तरुणाईच्या, यशाच्या धुंदीत बरेचवेळा ह्याचा विचार देखील आपल्याकडून होत नाही ही खेदाचीच बाब आहे.

माणसं, जोडणं, जपणं  ह्याला पण आपण “जमापूँजी” म्हणूच शकतो. काल एक “जमापूँजी “नावाची खूप मस्त शाँर्टफिल्म बघण्यात आलीयं. अर्थातच ती प्रत्यक्ष बघण्यातच खरी मजा आहे.कथानक तसं नेहमीचचं.बापलेकाच्या जनरेशन गँप मुळे गमावलेल्या खूप काहीबद्दल ही शाँर्टफिल्म सांगून जाते.नेहमीप्रमाणे “आई” नावाचा  हा दोघांना जोडणारा दुवा आपल्या परीने शक्यतोवर समेटाचा प्रयत्न करीतच असतो.

ही शाँर्टफिल्म बघतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, संवाद न साधणं, आणि त्यामुळे निर्माण झालेले गैरसमज ह्यामुळे आपण खूप काही गमावून बसतो आणि हे कळतं ते ही वेळ निघून गेल्यावरच ही आणखीनच दुर्दैवाची बाब. परस्परांशी घडघड मनमोकळं न बोलण्याने खरोखरच न भरून निघणारं नुकसान होतं हे ही शाँर्टफिल्म बघून जाणवलं.

मनमोकळे संवाद साधणे ही बाब खास करून  पुरुषांनी आवर्जून शिकून अंमलात आणण्याची बाब आहे कारण घडाघडा न बोलणा-या स्त्रिया ह्या अभावानेच आढळतील.

ह्या शाँर्टफिल्म मध्ये वडिलांबद्दल ओलावा, प्रेम नसलेल्या मुलाच्या डोळ्यातून त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजामुळे त्यांच्या मृत्यू नंतर एकही अश्रुचा टिपूसही येत नाही अर्थातच टाळी एका हाताने कधीच वाजत नसते म्हणा. ही परिस्थिती उद्भवायला वडिलांचे सारखे तुलना करणे, संवाद न साधणे, आतून खूप असलेलं प्रेम मुलासोर अजिबात प्रदर्शित न करणं ह्या बाबी सुद्धा तेवढ्याच कारणीभूत असतात. वडीलांच्या मृत्यूनंतर आई काही प्रमाणात मुलाला वास्तविकतेची जाण देऊन मनातील किल्मीष दूर करण्यास सांगते.परंतु मुलाला ही एक प्रकारची रदबदली वाटते.

परंतु सामान आवरतांना मुलाला जेव्हा वडीलांना त्याच्याबद्दल वाटणा-या प्रेमाचा दाखला जेव्हा नजरेस पडतो तेव्हा मात्र मुलाच्या मनातील कटूता गळून पडते.  मुलाने लहानपणी काढलेलं चित्र, मुलाने वडीलांना गिफ्ट म्हणून पाठवलेलं रिस्टवाँच वडीलांनी जपून ठेवलेलं असतं ही बाब मुलाला एखाद्या इस्टेटीपेक्षाही भारी आणि महत्वपूर्ण वाटते. आणि वर्षानुवर्षे न साधलेली किमया हे चित्र, ते घड्याळ करतं आणि मुलाच्या डोळ्यातून त्याच्याही नकळत टपटप अश्रू ओघळायला लागतात.

कदाचित ह्या गोष्टींचे महत्त्व तरुणाईच्या जोषात लक्षात येत नाही परंतु आपल्या सगळ्यांनाच उत्तरायणाच्या दिशेने केव्हा ना केव्हा वाटचाल ही करावीच लागते. तेव्हा ह्या “जमापूँजी”च्या संकल्पनेत आर्थिक या बाबी बरोबर माणसं जोडणं, ती कायम जपणं ह्या संकल्पनेचा पण  समावेश असतो हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे कारण  पुढे मिळणाऱ्या सुख, समाधान, संतोष ह्याची ती  जणू गुरुकिल्लीच आहे. सोबत शाँर्टफिल्म ची लिंक देते आहे.

👉 https://youtu.be/JgvrQCxGepU

©  सौ.कल्याणी केळकर बापट

06/09/2022

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘या सम हा’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ ‘या सम हा’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

इतर कोणत्याही शब्दांसाठी त्यांच्या अर्थदृष्ट्या अनुरुप असे पर्यायी शब्द सहज सुचतात. सांगता येतात. चित्र हा शब्द मात्र याला अपवाद आहे. चित्र या शब्दाची असंख्य विविध आकर्षक रूपे सामावून घेणारा पर्यायी शब्द सहज सांगता येणार नाही.

चित्र या शब्दाची विविध रूपे आणि त्यात सामावलेल्या अर्थरंगांच्या वेगवेगळ्या छटा हेच या शब्दाचे सौंदर्य आहे.चित्रांचे जितके प्रकार तितकी त्याची रुपे.रेखाचित्र,रंगचित्र,तैलचित्र, जलरंगातलं चित्र, भित्तिचित्र, निसर्गचित्र, स्थिरचित्र, अर्कचित्र, व्यक्तिचित्र, छायाचित्र, त्रिमितिचित्र,हास्यचित्र,व्यंगचित्र असे असंख्य प्रकार.प्रत्येकाचं रुप, तंत्र, व्याकरण,निकष परस्पर भिन्न. तरीही ही सगळीच रुपं भावणारी ! हे सगळं सामावून घेणारा पर्यायी शब्द शोधून तरी सापडेल का?

चित्रकला ही निसर्गाने माणसाला दिलेली एक अद्भूत देणगी आहे.चित्र या शब्दाची व्याप्ती अधोरेखित करणारी जशी विविध रुपे आहेत,तशीच चित्रकलेद्वारे होणाऱ्या अविष्कारातही वैविध्य आहे.त्यातील प्रत्येक आविष्कारासाठी लागणाऱ्या कॅनव्हासचेही अनेक प्रकार.ड्राॅईंग पेपर,चित्रकलेच्या विविध आकाराच्या वह्या,अक्षरं गिरवण्यासाठी जशा सुलेखन वह्या तशीच रेखाटनांच्या सरावासाठीच्या सराव चित्रमाला!

हीच चित्रं जमिनीवर रेखाटली जातात ती रांगोळीच्या रुपात.या रांगोळ्यांच्याही कितीक त-हा.ठिपक्यांची रांगोळी,गालीचे, देवापुढे काढायची गोपद्म, शंख, स्वस्तिकांची रांगोळी,उंबऱ्यावरची रांगोळी,जेवणाच्या ताटाभोवतीची,औक्षण करण्यासाठीच्या पाटाखाली काढली जाणारी रांगोळी, आणि मग पाटाभोवती काढलेली सुबक महिरप, तसेच चैत्रागौर, ज्ञानकमळ  यासारखी वैशिष्ट्यपूर्ण रेखाटने ही सगळी चित्राचीच तर रुपे!

चित्रं मातीच्या झोपडीवजा घरांच्या भिंती सारवून त्या भिंतीवरही काढली जात.आदिवासी संस्कृतीतली वारली पेंटींगची कला ही तर आपला अमूल्य असा सांस्कृतिक ठेवाच आहेत!

चित्रं कागदावरच नाही तर कापडावरही काढली जातात.ती ‘फॅब्रिक पेंटींग’च्या विविध रुपात आविष्कृत होतात आणि वस्रप्रावरणांचं रुप खुलवतात.

चित्रकलेचं अनोखं असं एक वैशिष्ट्य म्हणजे ती एक स्वतंत्र कला जशी आहे तशीच इतर अनेक कलांचा अविभाज्य भागही बनलेली आहे. चलतचित्रांच्या सलग एकत्रीकरणातून निर्माण होणाऱ्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही रंगसंगती जपलेली आणि क्षणकाळात विरुन जाणारी  चित्रचौकटच असते.पूर्वीच्या काळात रंगभूमीवर वापरले जाणारे प्रसंगानुरुप स्थळं सूचित करणारे रंगीत पडदे,आणि आधुनिक रंगभूमीवरील नेपथ्य,रंग-वेशभूषेमधेही चित्रसौंदर्य अभिप्रेत आहेच. भरतनाट्य, कथ्थक यासारख्या शास्त्रीय-नृत्यप्रकारातल्या रंग-वेशभूषेने अधिकच खुलवलेल्या प्रत्येक मुद्रा या जिवंत चित्रेच म्हणता येतील.नृत्य सादरीकरण करता करता  नृत्याविष्कार करीत असतानाच क्षणात कॅनव्हासवर कुंचल्याच्या अलगद फटकाऱ्याने चित्रं रेखाटण्याची अचंबित करणारी कला नृत्य-चित्रकलेचा अनोखा मिलाफच म्हणावी लागेल.

नुकतीच समज आलेले लहान मूल प्रत्येक गोष्ट हाताळून बघण्याच्या औत्सुक्यापोटी एखादं पेन किंवा पेन्सिल असं कांही हाती लागलं की दिसेल तिथं रेघोट्या मारुन गिरगटा करीत बसते.हे करत असतानाची त्याची तल्लीनता भान हरपून चित्रात दंग होणाऱ्या कसलेल्या चित्रकाराच्या तल्लीनतेपेक्षा कणभरही कमी नसते.लहान मुलांचं हे गिरगटणं नेहमीच वेळ जायचं साधन असतं  असं नाही.अनेकदा मनातल्या सुप्त भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यमही असतं.म्हणूनच  अजाण मुलांनी भिंतीवर किंवा कागदांवर रेखाटलेल्या वरवर निरर्थक वाटणाऱ्या चित्रातही त्यांच्या त्या त्या वेळच्या मनोवस्थांचे ठसे लपलेले असतात.ते शोधून काढण्याचे तंत्रही आता विकसित झालेले आहे जे वैद्यकीय क्षेत्रात मानसिक बालरुग्णांच्या बाबतीत योग्य निदान आणि उपचारांसाठी पूरक ठरते आहे.

व्यक्तिचित्र काढताना प्रत्यक्ष ती व्यक्ती किंवा  तिचं छायाचित्र पुढे ठेवून रेखाटन केलं जातं.अशी प्रत्यक्ष व्यक्तिप्रतिमा उपलब्ध नसेल तेव्हा त्या व्यक्तीचं वर्णन ऐकूनही त्याबरहुकूम हुबेहूब चित्र काढण्याची कलाही कांहीना अवगत असते.एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगाराच्या वर्णनाबरहुकूम काढलेली अशी रेखाटने गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी नेहमीच सहाय्यभूत ठरतात.

चित्र हा शब्द चित्रकलेचा अविभाज्य भाग जसा आहे तसाच अनेक अर्थपूर्ण शब्दांचा जन्मदाताही. चित्रकार,चित्रपट, चित्रकाव्य, चित्रदर्शी, चित्रमय, चित्ररथ, चित्रविचित्र, चित्रशाळा, चित्रीकरण,चित्रमाला,चित्रतारका असे कितीतरी शब्द !प्रत्येकाचे अर्थ,भाव,रंग,संदर्भ वेगवेगळे तरीही त्यात चित्र या शब्दातली एक रंगछटा अंतर्भूत आहेच.

असा चित्र हा शब्द!अल्पाक्षरी तरीही बहुआयामी !अनेक कंगोरे असणारा.म्हणूनच सुरुवातीला मी म्हंटलं तसं चित्र या शब्दाचा हा एवढा पैस सामावून घेणारा पर्यायी शब्द शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच चित्र या शब्दाला या सम हा असेच म्हणणे उचित ठरेल !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र उत्सव व त्याचे बदलते स्वरूप… ☆ सौ. अर्चना देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ नवरात्र उत्सव व त्याचे बदलते स्वरूप… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

भक्ती, शक्ती ,बुद्धी आणि माया यांचा अनोखा संगम असलेल्या आदिशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. भक्तिमय वातावरणात आणि तेवढ्याच उत्साहाने शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये साजरा केला जातो. रास, गरबा, श्री सूक्त, दांडिया बरोबरच इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल या दिवसात असते.

महिषासुरमर्दिनी, महिषासुर राक्षसाला मारणारी रणरागिनी! अनेक राक्षसांना मारणाऱ्या देवांची आपण पूजा करतो पण या राक्षसाला  मारण्यासाठी देव का पुढे आले नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण उत्तर अगदी सोपे आहे.

कोमल मनाच्या, नाजूक शरीराच्या आत केवढी प्रचंड शक्ती सामावलेली असते ही समाजाला दाखवून द्यायचे होते.

नवरात्र सोहळा म्हणजे स्त्री शक्तीची ,स्त्रीने स्वतःला व समाजाला करून दिलेली आठवण आहे. एक जन्मदायिनी प्राण हरणी सुद्धा होऊ शकते हे जगाला दाखवून देण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.

आदिशक्तीचा जागर म्हणजे नवरात्रीचा सण रात्रीचाच साजरा करण्याची प्रथा आहे .याला धार्मिक व पौराणिक आधारही आहेत. या दिवसात देवीची भजने, गोंधळ, श्री सूक्त पठाण असे कार्यक्रम केले जातात . स्त्रियांचयासाठी तर मंतरलेले दिवस असतात.नवरात्रोत्सव आपला धार्मिक तसाच सांस्कृतिक ठेवा आहे

नवरात्र म्हणजे वास्तविक घरगुती धार्मिक सोहळा. देवीच्या मंदिरात पूजा, उपासना, भजन ,गोंधळ आधी माध्यमाद्वारे चालणारा सोहळा! देवतांची मनापासून उपासना हीच आपली खरी संस्कृती .आपल्या संतांनी विविध धार्मिक मार्गांनी आदिशक्तीचा जागर केलेली उदाहरणे आपल्या ऐकिवात आहेत. नवरात्राचे धार्मिक महत्त्व मोठे आहे.

अत्यंत पवित्र वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. स्त्रिया घराची रंगरंगोटीकरून घरातली भांडी स्वच्छ घासून घेतात तसेच अंथरूण , पांघरूण  धुतलीजातात. स्त्रिया नऊ दिवस उपास करतात ,गादीवर झोपत नाही एवढेच काय पायात चप्पल न घालता नऊ दिवस देवीच्या दर्शनाला जातात. घटस्थापने दिवशी घट बसवूनअखंड नंदलाल नंदादीप तेवत ठेवतात. देवीच्या जागराचा म्हणजेच स्त्री सन्मानाचा हा उत्सव आहे. 

पण आता मात्र त्याचे स्वरूप बदलले आहे. गणेश मंडळाप्रमाणेच नवरात्रोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे., मंडळामध्ये स्पर्धा निर्माण  झाल्या आहेत, मोठमोठ्या वर्गण्या सक्तीने वसूल केल्या जातात. रस्त्यावर मोठमोठे मांडव घातले जातात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.  सगळीकडे झगमगाट करून कानठळ्या बसणारी गाणी लावली जातात एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत दांडिया खेळला जातो. त्यावेळी रुग्ण, विद्यार्थी ,वृद्ध व्यक्ती यांचा विचार केला जात नाही .तरुण मुले मुली न शोभणारी वेशभूषा करूनहुललडबाजी करतात. दहा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरावीत हा कायदा मोडून, पोलिसांना न जुमानता बेधुंदपणे गोंधळ सुरू असतो. हा प्रकार वाढत चालल्यामुळे उत्सव ही सामाजिक समस्या होत चालली आहे.

काही वेळा गणेशोत्सवाला घातलेला मंडप न काढता त्याच ठिकाणी दुर्गामातेचे प्रतिष्ठापना केली जाते. परंतु अनंत चतुर्दशीनंतर पितृपंधरवडा येतो व त्यानंतर नवरात्राला सुरुवात होते त्यामुळे जवळजवळ एक महिना रस्त्यावरील जागा अडवून ठेवली जाते ,वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे थकल्या भागलेल्यांना दूरच्या रस्त्याने घरी पोहोचावे लागते ..काही वेळा कार्यक्रम सुरू असेल तर आहे त्यावेळी तिकडची वाहतूक दुसरीकडून वळवली जाते त्यावेळी घरी परतणाऱ्या व्यक्तिंना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

काही मंडळे  तिसरी माळ पाचवी माळ सातवी माळ….. असा मुहूर्त पाहून तोरणाची मिरवणूक करतात .रस्त्याचा बराच भाग व्यापत ही मिरवणूक मंद गतीने पुढे सरकत राहते .त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो .नाचण्यात दंग असलेल्या कार्यकर्त्यांना याची जाणीव नसते .बँडचा ताफा, ध्वनिवर्धक भिंती ढोल ताशांचा मोठा आवाज यामुळे कोलाहल माजतो.त्यावेळीइमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होतो याचा विचार होत नाही तसेच अशा मिरवणूकीत दंगा होऊ नये म्हणून पोलिसांवर येणारा ताण वेगळा!

आपला समाज उत्सवप्रिय आहे मान्य पण नियमांचे पालन केले गेले तर विविध सणाद्वारे आणि उत्सवा द्वारे समाजात चैतन्य निर्माण होईल, आणि आनंद द्विगुणीत होईल असे मला वाटते.    

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 10 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

 

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 10 ☆ सौ. अमृता देशपांडे  

” श्यामची आई ” या साने गुरुजींच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आचार्य प्र.के.अत्रे लिहितात,” साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहून काढले. त्यातले प्रत्येक अक्षर न् अक्षर गुरुजींनी गहिवरल्या अंतःकरणाने आणि डबडलेल्या डोळ्यांनी लिहिले आहे. त्यातले प्रत्येक वाक्य गळ्यातून अन् दाबून ठेवलेल्या हुंदक्यातून निर्माण झाले आहे.

गुरुजींच्या जीवनाचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवण्याची आटोकाट काळजी तिने घेतली. मन कशाने स्वच्छ करता येईल ? अश्रूंनी…म्हणून अश्रूंचे हौद परमेश्वराने डोळ्यांजवळ भरून ठेवले आहेत.’ असुवन जल सींच सींच प्रेमवेलि बोई ‘ हा अश्रूंच्या पाण्याने मन शुध्द करून त्यात प्रेम आणि भक्ती ची वेल वाढवण्याचा मीराबाईचा मंत्र गुरूजींना त्यांच्या आईनेच शिकवला. आपल्या जीवनवेलीला आत्मशुद्धीच्या आसवांचे शिंपण घालावयाला आईने गुरुजींना लहानपणापासून शिकवले. अश्रूंचा इतका उदात्त आणि सुंदर अर्थ कालातीत आहे,
” मिळतिल कवने, मिळतिल दुर्मिळ तत्त्वांचे बोल
दिव्य अश्रूंनो! तुम्हांपुढति परि
ते सगळे फोल……

समाप्त 🙏🏻

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प,भाग ३८ परिव्राजक १६.बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प भाग ३८ परिव्राजक १६.बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी १६ ते २७ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगांवमुक्कामी आले. महाराष्ट् म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत ! तेव्हा बेळगांव मुंबई प्रांतात होते. कोल्हापूरहून भाटे यांचे नावाने गोळवलकर यांनी परिचय पत्र दिलं होतंच.  श्री. सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचं अत्यंत अगत्यपूर्वक स्वागत झालं. त्यांना पाहताक्षणीच हा नेहमीप्रमाणे एक सामान्य संन्यासी आहे अशी समजूत इथेही झाली असली तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे हे ही त्यांना जाणवत होतंच. भाटे कुटुंबीय आणि बेळगावातले इतर लोक यांना कधी वाटलं नव्हतं की काही दिवसांनी ही व्यक्ती जगप्रसिद्ध होईल. बेळगावचे हे श्री भाटे वकिल यांचे घर म्हणजे विदुषी रोहिणी ताई भाटे यांच्या वडिलांचे घर होय.

मराठी येत नसल्यामुळे भाटे कुटुंबीय स्वामीजींशी इंग्रजीतच संवाद साधत. त्यांच्या काही सवयी भाटेंना वेगळ्याच वाटल्या म्हणजे खटकल्या. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा मागितला. त्याबरोबर थोडी तंबाखू असेल तरी चालेल म्हणाले. संन्याशाची पानसुपारी खाण्याची सवय पाहून भाटेंकडील मंडळी अचंबित झाली. आणखी एक प्रश्न भाटे यांना सतावत होता तो म्हणजे, स्वामीजी शाकाहारी आहेत मांसाहारी? शेवटी न राहवून त्यांनी स्वामीजींना विचारलंच की आपण संन्यासी असून मुखशुद्धी कशी काय चालते? स्वामीजी मोकळेपणाने म्हणाले, “मी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीधर आहे. माझे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यामुळे माझे जीवन जरी संपूर्ण बदलले असले तरी, त्याधीचे माझे आयुष्य मजेत राहणार्‍या चारचौघा तरुणांप्रमाणेच गेले आहे. संन्यास घेतल्यावर इतर सर्व गोष्टी सोडल्या असल्या तरी या एक दोन सवयी राहिल्या आहेत. पण त्या फारशा गंभीर स्वरुपाच्या नाहीत. म्हणून राहू दिल्या आहेत. पण आपोआपच सुटतील”. आणि शाकाहारीचं उत्तर पण भाटेंना मिळालं. “ आम्ही परमहंस वर्गातील संन्यासी. जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा. काहीही मिळालं नाही तर उपाशी राहायचं”.

खरच असं व्रत पाळणं ही कठीण गोष्ट होती. मनाचा निश्चय इथे दिसतो. स्वामीजी सलग पाच दिवस अन्नावाचून उपाशी राहण्याच्या प्रसंगातून गेले होते. भुकेमुळे एकदा चक्कर येऊन पडलेही होते. तर कधी राजेरजवाडे यांच्या उत्तम व्यवस्थेत सुद्धा राहिले होते. पण त्यांना कशाचाही मोह झाला नव्हता हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे. जातीपातीच्या निर्बंधाबद्दल ही शंका विचारली तेंव्हा, आपण मुसलमानांच्या घरीही राहिलो आहोत आणि त्यांच्याकडे जेवलोही आहोत असे सांगितल्यावर, हे संन्यासी एका वेगळ्या कोटीतले आहेत हे समजायला वेळ लागला नाही.

आज लॉकडाउनच्या  काळात दारूची दुकाने उघडली तर परमोच्च आनंद झाला लोकांना. जणू उपाशी होते ते. १०ला उघडणार्‍या दुकानांसमोर सकाळी सातपासूनच उभे होते लोक ! दुकानांसमोर दारू घ्यायला रांगाच रांगा लागल्या होत्या. यात स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. खांद्याला खांदा देऊन लढत होत्या !  हे दृश्य पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीची किती आवश्यकता आहे हे जाणवून मन खिन्न होते. 

एकदा भाटेंचा मुलगा संस्कृत भाषेचा अभ्यास करताना पाणीनीच्या अष्टाध्यायीतील सूत्र म्हणत होता. त्यातल्या चुका स्वामीजींनी दुरुस्त करून सांगितल्या तेव्हा या अवघड विषयाचे ज्ञान असणे ही सामान्य गोष्ट नाही असे भाटे यांना वाटले. एक दिवस काही परिचित व्यक्तींना एकत्र करून त्यांनी स्वामीजींबरोबर संभाषण घडवून आणले. त्यात एक इंजिनियर होते. ‘धर्म हे केवळ थोतांड आहे, शेकडो वर्षांच्या रूढी चालीरीती यांच्या बळावर समाजमनावर त्याचे प्रभूत्त्व टिकून राहिले आहे किंबहुना लोक केवळ एक सवय म्हणून धार्मिक आचार पाळत असतात’, असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजींनी बोलणे सुरू केल्यावर त्यांना ह्या युक्तिवादाला तोंड देणं अवघड जाऊ लागलं. आणि अखेर शिष्टाचाराच्या मर्यादेचा  भंग झाल्यावर भाटेंनी त्यांना (म्हणजे एंजिनियर साहेबांना) थांबवलं. पण स्वामीजींनी अतिशय शांतपणे परामर्श घेतला. ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. कोणाच्याही वेड्यावाकड्या बोलण्याने सुद्धा स्वामीजी अविचल राहिले होते. याचा उपस्थित सर्वांवर परिणाम झाला.या चर्चेचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, “ हिंदुधर्म मृत्युपंथाला लागलेला नाही हे आपल्या देशातील लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. एव्हढच नाही तर, सार्‍या जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. वेदान्त विचाराकडे एक संप्रदाय म्हणून पहिले जाते हे बरोबर नाही. सार्‍या विश्वाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्या विचारात आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे”. स्वामीजींची ही संभाषणे आणि विचार ऐकून बेळगावचा सर्व सुशिक्षित वर्ग भारावून गेला होता.                                                                          

बेळगावातील मुक्कामात रोज सभा होऊ लागल्या. शहरात स्वामीजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर सभांमध्ये वादविवाद व चर्चा झडत असत. स्वामीजी न चिडता शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत. कोपरखळ्या मारत विनोद करत स्वामीजी समाचार घेत असत.

या बेळगावच्या आठवणी वकील सदाशिवराव भाटे यांचे पुत्र गणेश भाटे यांनी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजी त्यांच्याकडे आले तेंव्हा ते (गणेश)  बारा-तेरा वर्षांचे होते. स्वामीजीच्या वास्तव्याने पावन झालेली त्यांची ही वास्तू भाटे यांनी रामकृष्ण मिशनला दान केली आहे. स्वामी विवेकानंदांनी या मुक्कामात वापरलेल्या काठी, पलंग, आरसा या वस्तू ते राहिले त्या खोलीत आठवण म्हणून जपून  ठेवल्या आहेत, त्या आपल्याला आजही  पाहायला मिळतात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्रावणातील इंद्रधनुच्या कमानीखालून पुढे सरकत सृष्टीने भाद्रपदाच्या अंगणात पाऊल टाकलेले असते. कॅलेंडरवरील ऑगस्ट चे पान बाजूला सारून सप्टेंबरचे पान झळकू लागते. एकीकडे ऑगस्ट महिन्याला टा टा बाय बाय करत असताना दुसरीकडे ‘कम सप्टेंबर’ चे स्वर ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असतात. हे स्वर हवेत विरतात ना विरतात तोच लेझिम, झांज पथके सरावासाठी बाहेर पडतात आणि अवघा परिसर दुमदुमवून टाकतात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सक्रीय होतात आणि पावती पुस्तकाना पाय फुटून घराघरांचे उंबरे झिजवू लागतात. गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवणा-या मूर्तीकारांची लगबग चालू असते. इकडे गौरी बरोबर घरात प्रवेश मिळावा म्हणून गौरीची रोपे दाटीवाटीने उभी असतात. प्रत्येक फुलझाडाला बहर आलेला असतो. जरा बाहेर नजर टाकली तर पांढ-या, पिवळ्या, तांबड्या, निळ्या, गुलाबी अशा विविध रंगांनी बागा, माळरान नटलेले दिसतात. श्रावणातील उरलेल्या जलधारा अंगावर ऊन घेण्यासाठी अधूनमधून येत असतात. अशा या मंगल वातावरणात श्रीं चे आगमन होते. आरत्या आणि भक्तीगीतांचीचढाओढ सुरू होते. अकरा दिवसांचा मुक्काम आटोपून, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्विकारून, गणराय लाटांवर आरूढ होऊन बघता बघता दृष्टीआड होतात. सजावटीची टेबले आणि भिंती रिकाम्या करताना मन उदास होत असते.

या भाद्रपद म्हणजेच सप्टेंबर महिन्यात असे काही दिवस असतात ज्यांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्व आहे. आपण पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाळतो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची पुण्यतिथि असते. 14 सप्टेंबर  1949 ला हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून आपल्या संसदेने मान्यता दिली. तेव्हापासून 14 सप्टेंबर हा हिंदी दिन आहे. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करून भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे स्मरण आपण करत असतो. शिवाय 17 सप्टेंबरला पारंपारिक पद्धतीने विश्वकर्मा दिनही साजरा होतो. मराठी माणसासाठी महत्वाची घटना म्हणजे मराठवाड्याची निजामशाहीतून मुक्तता. तो दिवस ही 17 सप्टेंबर हाच आहे. याशिवाय शेगावचे संत गजानन महाराज यांची पुण्यतिथि व संत मुक्ताबाई यांची जयंती भाद्रपद महिन्यातच असते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही सप्टेंबर महिन्यात काही दिवस विशेष म्हणून साजरे केले जातात. चांगल्या उत्पन्नाद्वारे गरीबी कमी करणा-या नारळाच्या पिकाचे महत्व जाणून 2 सप्टेंबर हा नारळदिन म्हणून साजरा केला जातो. सप्टेंबर 12 हा पालक दिन, 15 हा लोकशाही दिन, 16 हा ओझोन दिवस, 18हा बांबू दिवस असे साजरे होत असतात. उद्देश एकच, त्या त्या विषयाचे महत्व सर्वांना समजावे व तिकडे लक्ष वेधून घ्यावे. याप्रमाणेच सप्टेंबर 22 हा कॅन्सर पेशंट कल्याण दिन, 23 सप्टेंबर विषुव दिन, 26 हा कर्णबधीर दिन व पर्यावरण रक्षण दिन तर 27 सप्टेंबर हा पर्यटन दिन म्हणून ओळखला जातो. अशा विविध कारणांसाठी दिवस साजरे करून समस्या, वैशिष्ट्ये, आठवणी यांकडे विशेषत्वाने पाहिले जाते.

सणासुदीचे दोन महिने यथेच्छ ताव मारून श्रावण, भाद्रपद… ऑगस्ट-सप्टेंबर… आता जरा सुस्तावलेले असतात. आनंदाचे एक पर्व काही काळासाठी थांबलेले असते. त्यातून बाहेर पडताच स्मरण होते ते पूर्वजांचे. पितरांचे पुण्य स्मरण करून त्यांच्या शांती मिळावी साठी प्रार्थना आणि त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा व्यक्त करण्याचा पितृपंधरवडा श्रद्धेने पाळला जातो. सर्वपित्री अमावस्येची रात्र संपून नवरात्रीचा जागर करण्यासाठी मन पुन्हा उभारी घेते आणि सर्व अनिष्टांचे उल्लंघन करण्यासाठी दस-याच्या सोनेरी सणाची वाट पहात असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र…नवा विचार ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ नवरात्र…नवा विचार ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नवरात्राची सुरवात म्हणजे घटस्थापना! नवरात्री चा हा उत्सव असतो मांगल्याचा, उत्साहाचा. अमरावती मध्ये तर ह्या सगळ्या नऊ दिवसांना सोहोळ्याचं रुपं येतं. अशा उत्सवांमुळे घरोघरी, गावोगावी चैतन्याचं वातावरण प्रस्थापित होतं.

नवरात्राचे नऊ दिवस म्हणजे ह्या देवीरुपी शक्तीची निरनिराळी रुपं, वेगवेगळे साज आणि कर्तृत्वाचे झळाळते तेज ल्यायलेले ते मुखवटे ह्यावर नजर पडली तरी दिपून जाते ती नजर.

नवरात्रात घटस्थापनेपासून ते दस-यापर्यंत नऊ दहा दिवस उत्साहाचे आणि लगबगीचे. अमरावती आणि यवतमाळ ह्या दोन्हीही गावांमध्ये नवरात्राचा अनुपम सोहळा हा असतो पण त्याचं स्वरूप मात्र अगदी वेगवेगळं.

अमरावती मध्ये अंबादेवी आणि एकवीरादेवी ह्यांची जागृत देवस्थानं आहेत.आणि अमरावती मध्ये गुजराती समाज भरपूर असल्याने त्यांचा नऊ दहा दिवस टिप-यांचा आणि गरब्याचा खेळ असतो. त्यामुळे संपूर्ण अमरावती नवरात्रमय झालेली असते.

सध्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामूळे सगळे सणंवार साजरे करण्याची गणितचं बदललीत. परंतु खूप बदाबदा कोसळून गेल्यानंतर उघडीप मिळाल्यानंतर झपाट्याने वर्दळीला सुरवात होते तशी स्थिती ह्या नवरात्रात बघायला मिळतेयं.नवरात्रात अंबादेवी व एकवीरा देवीच्या दरबारात खूप मोठमोठी दिग्गज कलाकार मंडळी आपली कला वा आपली गायकी पेश करतात. खूप दुरदुरून बाहेरगावांहून देवीच्या दर्शनासाठी लोकं गर्दी करतातच. देवीरोडवर जणू जत्राच भरलेली असते.

नवरात्रात आमच्या घरीही नवरात्र असतं.रोज नऊ दिवस देवीला फुलांची माळ आणि अखंड नंदादीप असतो.नवरात्र उठताबसता म्हणजेच घटस्थापना आणि दस-याला जेवायला सवाष्ण असते.

यवतमाळ चे नवरात्र दुर्गादेवींच्या प्रतिष्ठापनेमुळे प्रसिद्ध आहे.खूप लांबूनलांबून लोक यवतमाळला देवी आणि त्यांच्याजवळील आरास, देखावे बघायला गर्दी करतात. असंं म्हणतात की बंगालमधील कलकत्त्यानंतर दुर्गादेवींच्या उत्सवात दुसरा क्रमांक यवतमाळचा लागतो. यवतमाळला जवळपास दीडदोनशे दुर्गादेवींची स्थापना केली जाते आणि विशेष म्हणजे सगळ्या मूर्ती एकसे एक सुंदर,तेजःपुंज पण तरीही सगळे मुखवटे एकसारखे न दिसता अगदी वेगवेगळे.

..नवरात्रात कुणी नऊ दिवस ऊपास, कुणी नऊ दिवस मौनव्रत तर कुणी नऊ दिवस अनवाणी राहून आपली श्रध्दा प्रकट करतात.

संपूर्ण नवरात्रभर  महिला वर्ग वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करतात. अमरावती चे कपडामार्केट खूप प्रसिद्ध. नवरात्रात येथे कपड्यांच्या व्यापारात खूपमोठी उलाढाल होते.

ह्या नऊ दिवसाच्या देवीच्या नवरात्रात स्त्रीयांना, कुमारिकांना देवीचे प्रतीक समजून सन्मान दिल्या जातो, त्यांचे पूजन केले जाते.

पण खरतरं नवरात्रातच फक्त देवीलाच मखरात बसवायचे असे नव्हे तर देवीरुपात आपल्या अवतीभवती असणाऱ्या महिलांनाही तेवढाच सन्मान प्रदान करणे हे जास्त संयुक्तिक.

अर्थातच महिलांचा आदर करणारे असतात त्याचप्रमाणे महिलांना कस्पटासमान समजणारे लोकही असतात.काही महिलांना न्याय देणारे असतात तर काही फक्त महिलांवर अन्याय करायलाच जणू जन्म घेतात. काही जणं महिलांवर कौतुकाची बरसात करतात तर काही जणं फक्त महिलांच्या पायाखाली निखारेच फुलवितात. शेवटी काय तर हो उडदामाजी काळेगोरे हे असणारच.

नुसता नवरात्र म्हणून महिलांचा उदोउदो करायचा की संपूर्ण आयुष्य महिलांकडे देवीच्याच आदरयुक्त नजरेनं बघायचं ह्याचं प्रत्येकाचं समीकरणचं वेगवेगळं असतं बघा.

मी मागे केलेल्या रचनेने आजच्या पोस्ट ची सांगता करते. ती रचना खालीलप्रमाणे.

फक्त नवरात्र आले की मगच मानसिकता बदलायची,

      सवय आहे ही माणसा तुझी फार जुनी 

देवी समजून नऊ दिवस पुजायचे

आणि मग वर्षभर तिला गृहीत धरून चालायचे

त्यापेक्षा नको मानूस तिला देवी,नको बसवूस मखरात

अरे ती फक्त आधी माणूस आहे हे ठेव आधी ध्यानात

एकदा का तिला देवीत्व बहाल केलंस की

तुझं मात्र सगळं पुढील खूप सोप्पं झालं

देवीत्वाच्या ओझ्याखाली बिचारीचे मनोगत

मौनव्रताने अलगद मूक झालं 

बनविलीस तिला मूर्ती त्यागाची, तुझी झोळी मात्र कायम ठेवलीस भरलेली 

त्याग, समर्पण करता करता ही मात्र रिक्त होऊन स्वतः थकलेली. म्हणून माणसा देवीत्व बहाल करायच्या ऐवजी आधी तिला माणूस म्हणून जाणायला शीक

समजून उमजून तिला घेतलसं तर स्त्री च्या अस्तित्वाचे संतुलन होईल नीट, अस्तित्वाचे संतुलन होईल नीट.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

25 सप्टेंबर…बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस निमित्त :

Image result for फोटो बॅरिस्टर नाथ पै

? विविधा ❤️

☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान

‘पाहू चला रे हिरवे डोंगर, हिरवी झाडी,

कोकणात आली बघा ही रेल गाडी.’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1996 साली सर्वप्रथम कोकण रेल्वे अवतरली. तिच्या स्वागतासाठी लिहिलेली ही कविता! कोकण रेल्वेच्या रूपाने एक नवा अध्याय कोकणवासियांच्या आयुष्यात सुरू झाला. हा अध्याय बॅ. नाथ पै यांच्याच स्वप्नाचा एक भाग होता.  बॅ. नाथ पै यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सत्यात उतरवले. असे म्हणतात ‘जर स्वप्न द्रष्ट्या माणसाने पाहिले तर स्वप्न सत्य बनून जाते’ असा द्रष्टा नेता म्हणजेच बॅ. नाथ पै! तत्कालीन रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण असलेल्या जिल्ह्यातील चमकता हिरा!

बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म 25 सप्टेंबर 1922 रोजी वेंगुर्ले या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ल्यातच झाले. उर्वरित शिक्षण बेळगाव आणि पुणे या ठिकाणी झाले आणि उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी कायद्याचा व संसदीय लोकशाहीचा अभ्यास केला.

बॅरिस्टर नाथ पै यांचे बालपण कोकणात गेल्यामुळे त्यांनी येथील जीवन अनुभवले होते. परशुरामाच्या या भूमीला निसर्ग सौंदर्याचे भरभरून दान लाभले असले तरी दारिद्र्याचे चटके तितकेच सोसावे लागतात, हे नाथांनी पाहिले होते. कोकणचा समृद्ध निसर्ग डोळ्यात साठवत ते लहानाचे मोठे झाले. या भूमीने त्यांना संस्काराची शिदोरी दिली. येथील समुद्रकिनाऱ्यांनी त्यांच्या विचारांना सखोलता आणि भव्यता दिली. समुद्राच्या गाजेचे गांभीर्य आणि माधुर्य त्यांच्या वाणीत होते. उंच उंच माड फोपळी त्यांच्या कर्तुत्वाला साद घालीत. त्यांनी त्यांच्या व्यक्तीमत्वाला ताठ कणा दिला, त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षेचे बीज रोवले. रानावनातील फुलांनी कलासक्तपणा दिला. एकीकडे निसर्गाचे श्रीमंतरूप आणि दुसरीकडे कमालीचे दारिद्र्य असा विरोधाभास त्यांनी लहानपणीच अनुभवला. ‘येथील लोकांचे दारिद्र्य दूर करण्याचा मी प्रयत्न करीन’ अशी त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली. बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणचे पालकत्व स्वखुशीने स्वीकारले व निभावलेही!

बॅरिस्टर पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मायदेशात परत आल्यावर नाथ पै राजकारणात उतरले. राजापूर मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. निवडून आल्यावर त्यांनी केवळ मतदारसंघाचेच नेतृत्व केले नाही तर देशाचेही नेतृत्व केले. लोकशाहीच्या या पुजाऱ्याचे, समाजवादाच्या वारकऱ्याचे कोकणवर फार मोठे ऋण आहे. समाजवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या या कोकणपुत्राने समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविली. कोकणविषयक प्रश्नांची जाण आणि अमोघ वाणीने त्यांनी साऱ्या मतदारांची मने जिंकून घेतली. ‘नाथ येती घरा तोची दिवाळी दसरा’ अशी कोकणवासियांची अवस्था होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सत्ताधारी पक्षाचे मोरोपंत जोशी होते. त्यांच्याशी टक्कर देणे ही सामान्य बाब नव्हती. जाणकार असे म्हणतात की, कुणकेश्वरच्या जत्रेतील जाहीर सभेने निवडणुकीच्या निकालाचे पारडे नाथांच्या बाजूने झुकविले.

सन 1957 पासून बॅ. नाथ पै सलग चौदा वर्षे राजापूर मतदार संघाचे अनभिषिक्त सम्राट होते.’ सौंदर्य उपासना म्हणजेच राजकारण’ ही त्यांची राजकारणाची व्याख्या होती. म्हणूनच ते अन्यायाविरुद्ध पेटून उठत. लोकसभेच्या त्यांच्या पहिल्या अधिवेशनात ‘तो आला, तो बोलला आणि जिंकून घेतले सारे’ अशी सभागृहाची स्थिती होती. मतदारसंघातील प्रश्नांबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर ते तुटून पडत असत. त्यांच्या समतोल, सडेतोड व अभ्यासपूर्ण भाषणांमुळे त्यांना तत्कालीन प्रधानमंत्री पं. नेहरूंनी ‘असामान्य संसदपटू’ हा किताब बहाल केला.

अमोघ वक्तृत्वाबरोबरच विवेक, प्रखर देशभक्ती आणि समाजवादावर ठाम निष्ठा असणारे नाथ दीनदलित जनतेवर अपार प्रेम करत. ‘कठीण वज्रास भेदू ऐसी’ संसदेतील विरोधी पक्षावर हल्ला करताना असलेली बॅरिस्टर नाथ पै यांची भाषा सामान्य लोकांशी बोलताना ‘मऊ मेणाहूनी मुलायम’ असे. त्यामुळे त्यांनी कोकणी माणसाच्या हृदयात राज्य केले.

संसदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी मतदार संघाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या खासदारकीच्या काळात कोकणात तीनदा वादळे  झाली. संपर्काची त्यावेळी कोणतीही साधने उपलब्ध नसताना मिळेल त्या साधनाने ते कोकणात पोहोचले. सरकारी मदत पोहोचण्यापूर्वी लोकांच्या मदतीने वादळग्रस्त भागात काम केले. वाड्यावस्त्यांवर पोचून नुकसानीची पाहणी करून राज्य शासन व केंद्र शासनाची अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. 1961 साली झालेल्या वादळात रस्ते मोकळे नसल्यामुळे नाथ पै डोक्यावर सायकल घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले. सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता ग्रामस्थांच्या सहाय्याने रस्ते मोकळे केले. पंतप्रधानांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागांना भरपाई मिळवून दिली.

दशावतार ही कोकणची लोककला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची खास ओळख. मंदिरांच्या परिसरात मध्यरात्रीनंतर लोकरंजनातून सुसंस्कारासाठी ही दशावतारी नाटके साजरी केली जातात. पौराणिक कथांवर उस्फूर्तपणे संवाद सादर केले जातात. पण त्याकाळी या दशावतारी कलाकारांची स्थिती ‘रात्रीचा राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा’ अशी हलाकीची होती. दशावतार ही कोकणची लोककला असूनही त्याला शासनमान्यता नव्हती याची नाथ पैना खंत वाटत होती. नाटककलेविषयी त्यांना जिव्हाळा होता, कलाकारांविषयी त्यांच्या मनात अआत्यंतिक प्रेम होते. दशावतारी नाटकांना व कलाकारांना शासन मदत व प्रोत्साहन देणार नसेल तर आपण द्यायला हवे, या भूमिकेतून त्यांनी दशावतारी नाटकांच्या स्पर्धा आयोजित केल्या. अजूनही या स्पर्धा घेतल्या जातात.

वेंगुर्ले ते शिरोडा या मार्गावरील मोचेमाडच्या खाडीत होडी उलटून वधू-वरांसह लग्नाचे वराड बुडाले. काही व्यक्तींचा अंत झाला. ही बातमी नाथांना दिल्लीत समजली. त्यांनी तात्काळ वेंगुर्ले गाठून मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केलेच, पण मुंबईला जाऊन बांधकाम सचिवांची भेट घेतली.” आणखी किती लोकांचे बळी गेल्यावर सरकार मोजेवाडच्या खाडीवर पूल बांधणार?” असा खडा सवाल विचारला. पंधरा दिवसात जागेची पाहणी करून फुलाचा आराखडा तयार करण्यात आला. पण जमीन संपादनासाठी अनावश्यक विलंब झाल्यामुळे नाथ यांच्या हयातीत पूल पूर्ण होऊ शकला नाही.

गणेश चतुर्थी हा कोकणवासीयांचा मुख्य सण. वाडीवस्त्यांमधून या काळात भजनांना उधाण येते. भजन हा उपासनेचाच एक मार्ग मानला जातो. कोकणात ठिकठिकाणी भजन डबलबारीच्या स्पर्धा होतात. भजनाला जात असताना कणकवली गडनदीनजीक भजनी मंडळाच्या ट्रकचा अपघात होऊन मृत्युमुखी 20 जण मृत्यूमुखी पडले. नाथांना ही बातमी समजताच त्यांनी दिल्लीहून कणकवली गाठली व अपघातग्रस्तांना मदत केली.

कोयनानगर परिसरात 11 डिसेंबर 1967 ला भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपात मोठ्या प्रमाणात हानी झाली. भूकंपाचा काही भाग देशावर तर काही भाग कोकणात होता. तरीही सरकारी मदत फारशी कोकणच्या दिशेने वळताना दिसली नाही. ही तफावत दूर करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी आवाज उठवला. स्वयंस्फूर्तीने घेतलेले कोकणचे पालकत्व त्यांनी जबाबदारीने निभावले.

कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश! पण निसर्गाची श्रीमंती अनुभवणारा कोकणी माणूस मात्र अर्धपोटी! बुद्धिमंतालाही कोकणाबाहेर पडल्याशिवाय धन सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे घरातील पुरुषमंडळी रोजगारासाठी मुंबईकडे धावत.’ मनीऑर्डर वर जगणारा जिल्हा’ अशी जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकण विकास परिषदेची स्थापना केली.

मुंबईला जोडणारा महामार्ग त्यावेळी नव्हता. त्यामुळे कोल्हापूर मार्गे प्रवास करावा लागे. त्यामुळे बोटीची वाहतूक परवडणारी होती. रहदारीच्यामानाने बंदरे अविकसित होती. बंदराची देखभाल व सुधारणा आवश्यक होती.त्यांनी कोकण किनाऱ्यावर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आगबोट कंपन्यांना भाग पाडले. बारमाही बंदरांचा शोध घेऊन बारमाही करण्यासाठी कोकण विकास परिषदेमार्फत काम केले.  बंदरांना जोडणारे रस्ते, मुंबई गोवा महामार्ग, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी नदीवर पूल व साकव यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोकण विकास परिषदेमार्फत त्यांनी समविचारी लोकांना एकत्र करून शासनावर दबाव टाकला.

बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणच्या विकासाचा ध्यास घेतला होता.  कोकणची उपेक्षा थांबवण्यासाठी ते सतत झटत असत. कोकणच्या डोक्यावरून जाणाऱ्या कोयनेच्या विजेचा कोकणवासियांना लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. काजू धंद्याच्या विकासाला चालना दिली. कोकणातील शेतीनंतरचा दुसरा प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. मासेमारी व इतर छोटे उद्योग संघटित व सहकारी क्षेत्रात सुरू करण्यास प्रोत्साहित केले. पोस्ट व तार ऑफिसे अधिकाधिक असावीत यासाठी ते प्रयत्न करत होते. ते एक सुजाण लोकप्रतिनिधी होते. त्यांनी लोकांच्या गरजांच्या प्राथमिकता निश्चित करून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची योजना केली. आदर्श लोकप्रतिनिधीचा ते एक मापदंडच बनले.

बॅरिस्टर नाथ पै यांना ‘कोकण रेल्वेचा शिल्पकार’ असे म्हटले जाते. लोकसभेत नाथ पै यांनी कोकण रेल्वेचा प्रश्न मांडला. त्यासाठी 1969 साली एक रुपयाची कपात सूचना मांडली. संसदीय लोकशाहीत एक रुपयाच्या कपातीला खूप महत्त्व आहे, पण तांत्रिक कारणाने ती फेटाळली गेली. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाथ पै यांच्याशी चर्चा करून कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाचे आश्वासन दिले. कोकणात रेल्वे धावली की विकासाची गंगाच अवतीर्ण होईल असे नाथांना वाटे. डोंगरद-यातून रेल्वे धावणे हे स्वप्नरंजनच होते. कोकण रेल्वे प्रकल्पाचा पाया घालण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या हयातीत कोकण रेल्वे कोकणात धावू शकली नाही तरी जॉर्ज फर्नांडिस व मधू दंडवते या त्यांच्या सहकाऱ्यांनी समयबद्ध कालावधीत कोकण रेल्वेचे काम पूर्ण केले.

सरकारी पडजमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करावे यासाठी नाथांनी सत्याग्रहाचे आयोजन केले. माणगाव खोऱ्यातील शेकडो एकर जमीन कसवटधारकांना वाटावी असा ठराव घेतला.

बॅरिस्टर नाथ पै आपल्या भाषणात सांगत ‘देवाने  जर मला पुनर्जन्म दिला तर त्याला मी सांगेन कोकण भूमीतच जन्म दे’. नाथ पैचं कोकणप्रेम असं बावनकशी होतं. एक माजी खासदार एवढी मर्यादित नाथ पै यांची ओळख असूच शकत नाही.  एक राजा माणूस, कोकण रेल्वेचा शिल्पकार, देशातील एक नंबरच्या मतदार संघाचा एक नंबर खासदार अशी त्यांची ओळख आहे.

शूर सैनिकाची अखेर रणांगणात, नटसम्राटाची अखेर रंगमंचावर, तशीच या तेजस्वी वक्त्याची अखेर व्यासपीठावर झाली. बेळगाव येथील भाषणानंतर ते झोपी गेले ते उठलेच नाही. कोकणी जनतेच्या काळजाचा तुकडा विधात्याने हिरावून घेतला. त्यांचे स्मरणही आपल्याला बळ देईल. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना सार्थक करील.    

तव स्मरणाने जागृत होई आज पुन्हा अभिमान

 लोकशाहीच्या नम्रसेवका तुझेच मंगलगान…

© सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print