मराठी साहित्य – विविधा ☆ झोका ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा  ☆ झोका ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

गणेश वाडी सारख खेडगाव. बरीच भावंड मिळून झोका खेळत होती वेंण्णाला कोणीतरी मोठा झोका दिला. आणि ती खाली पडली त्या झोक्याने तीच आयुष्यच बदलवून टाकलं डावा हात मोडला. कोणताच उपचार  लागू पडेना.  सात आठ वर्षाची वेण्णा कळा सहन करत होती. अखेर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये  नेलं. डॉक्टरांनी हात  कुमारला लागल्याने तो काढण्याचा निर्णय सांगितला. अर्ध्या दंडापर्यंत हात काढला. मुलीची जात, सगळं आयुष्य जायचं कसं? सगळे काळजीत पडलेप.

रोज वेण्णा आणि आई एकमेकीला धीराचे शब्द देत होत्या. हळूहळू उजवा हात आणि पुढचे दात यांनी परकर बांधता यायला लागला. पोलक्याची बटण लावता यायला लागली. निसर्गनियमाप्रमाणे वेण्णा वयात आली. 9 वारी लुगडं दात पोटाजवळ नेऊन गाठ बांधून, चापून-चोपून नेसायला लागली.

मोठे भाऊ पुण्याला घेऊन गेले. सेवासदन शाळेत घातले. सातवीपर्यंत शिकली. सुंदर मोत्यासारख अक्षर होत . काही दिवसांनी परत आईकडे आली. आणि आणि आता ती भाकरी, पोळ्या, विणकाम, भरत काम पायाच्या अंगठ्याच्या मदतीने करू लागली प्रत्येक काम सुबक करण्यात तिचा कटाक्ष असे. भांडी,धुणं अगदी चकाचक असायचं. आता प्रश्न लग्नाचा.

गजानन गोडबोले नावाचा देखणा, आई-वडील नसलेला मुलगा सांगलीला अग्निहोत्री नातूंकडे रहायला होता. पूजा आणि प्रवचन हेच उत्पन्न. त्याचा आर्थिक प्रश्न आणि देण्याचा व्यंगाचा प्रश्न दोन्ही एकत्र येऊन उत्तर मिळाले. लग्न ठरलं. आणि आणि झालंही. एका हाताने सगळे विधी पार पडले. संसार सुरू झाला. शांत गजाननराव  थोडी तापट वेण्णा. पण रसायन छान आलो होत. कमाईही वाढली होती.वेण्णाला तीन मुली नंतर मुलगा झाला. स्वतः च  घर झालं. दुसरे महायुद्ध झालं आणि आर्थिक सुरु झाली. थोडा भाग भाड्याने दिला.धाकटी मुलगी 8 महिन्याची लहान. गजानन रावांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.वेण्णा हात पाय गाळणारी नव्हती. खंबीर झाली. प्रवचनाला येणारे गुजराती लोक महिना शिधा द्यायला लागले जोडीला घर भाडे होते. मुलींची लग्न, बाळंतपण सगळं सगळं एक हात कष्ट करत होता. मुलगा नोकरीला लागला. आता तिला आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली

आता वेण्णा एका खोलीत एकटीच रहायला लागली. सत्तर वर्ष काम केलेला हात आणि पुढचे दात दुखायला लागले. दोन्ही काम करेनासे झाले तर मी परस्वाधीन म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. सांगलीची नाळ सुटत नव्हती. थोडे दिवस मुलाकडे हरिहरेश्वरला निघाली.

बस भरलेली होती. गाव जवळ आल आणि काय झालं कळायच्या आत बस उतारावरून खाली पडली. आरडा ओरडा चालू झाला. कुणीतरी वेण्णाला उचलून खाली दगडावर बसवले. डोक्याला मार लागला होता. मोडके तोडके शब्द तोंडून बाहेर पडले. ‘सर्वजण सुखी रहा’. दुसरा हात उभा राहू शकत नव्हता. पण पण अर्ध्या दंडा पर्यंतचा थोटुक,लेण्याला परस्वाधीन न करता सर्वांचा कायमचा निरोप घेत होतं. वर खाली वर खाली होत होता. एखाद्या झोक्या सारखा! झोका

गणेश वाडी सारख खेडगाव. बरीच भावंड मिळून झोका खेळत होती वेंण्णाला कोणीतरी मोठा झोका दिला. आणि ती खाली पडली त्या झोक्याने तीच आयुष्यच बदलवून टाकलं डावा हात मोडला. कोणताच उपचार  लागू पडेना.  सात आठ वर्षाची वेण्णा कळा सहन करत होती. अखेर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये  नेलं. डॉक्टरांनी हात  कुमारला लागल्याने तो काढण्याचा निर्णय सांगितला. अर्ध्या दंडापर्यंत हात काढला. मुलीची जात, सगळं आयुष्य जायचं कसं? सगळे काळजीत पडलेप.

रोज वेण्णा आणि आई एकमेकीला धीराचे शब्द देत होत्या. हळूहळू उजवा हात आणि पुढचे दात यांनी परकर बांधता यायला लागला. पोलक्याची बटण लावता यायला लागली. निसर्गनियमाप्रमाणे वेण्णा वयात आली. 9 वारी लुगडं दात पोटाजवळ नेऊन गाठ बांधून, चापून-चोपून नेसायला लागली.

मोठे भाऊ पुण्याला घेऊन गेले. सेवासदन शाळेत घातले. सातवीपर्यंत शिकली. सुंदर मोत्यासारख अक्षर होत . काही दिवसांनी परत आईकडे आली. आणि आणि आता ती भाकरी, पोळ्या, विणकाम, भरत काम पायाच्या अंगठ्याच्या मदतीने करू लागली प्रत्येक काम सुबक करण्यात तिचा कटाक्ष असे. भांडी,धुणं अगदी चकाचक असायचं. आता प्रश्न लग्नाचा.

गजानन गोडबोले नावाचा देखणा, आई-वडील नसलेला मुलगा सांगलीला अग्निहोत्री नातूंकडे रहायला होता. पूजा आणि प्रवचन हेच उत्पन्न. त्याचा आर्थिक प्रश्न आणि देण्याचा व्यंगाचा प्रश्न दोन्ही एकत्र येऊन उत्तर मिळाले. लग्न ठरलं. आणि आणि झालंही. एका हाताने सगळे विधी पार पडले. संसार सुरू झाला. शांत गजाननराव  थोडी तापट वेण्णा. पण रसायन छान आलो होत. कमाईही वाढली होती.वेण्णाला तीन मुली नंतर मुलगा झाला. स्वतः च  घर झालं. दुसरे महायुद्ध झालं आणि आर्थिक सुरु झाली. थोडा भाग भाड्याने दिला.धाकटी मुलगी 8 महिन्याची लहान. गजानन रावांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.वेण्णा हात पाय गाळणारी नव्हती. खंबीर झाली. प्रवचनाला येणारे गुजराती लोक महिना शिधा द्यायला लागले जोडीला घर भाडे होते. मुलींची लग्न, बाळंतपण सगळं सगळं एक हात कष्ट करत होता. मुलगा नोकरीला लागला. आता तिला आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली

आता वेण्णा एका खोलीत एकटीच रहायला लागली. सत्तर वर्ष काम केलेला हात आणि पुढचे दात दुखायला लागले. दोन्ही काम करेनासे झाले तर मी परस्वाधीन म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. सांगलीची नाळ सुटत नव्हती. थोडे दिवस मुलाकडे हरिहरेश्वरला निघाली.

बस भरलेली होती. गाव जवळ आल आणि काय झालं कळायच्या आत बस उतारावरून खाली पडली. आरडा ओरडा चालू झाला. कुणीतरी वेण्णाला उचलून खाली दगडावर बसवले. डोक्याला मार लागला होता. मोडके तोडके शब्द तोंडून बाहेर पडले. ‘सर्वजण सुखी रहा’. दुसरा हात उभा राहू शकत नव्हता. पण पण अर्ध्या दंडा पर्यंतचा थोटुक, लेण्याला परस्वाधीन न करता सर्वांचा कायमचा निरोप घेत होतं. वर खाली वर खाली होत होता. एखाद्या झोक्या सारखा!

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भरली ओंजळ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

संक्षिप्त परिचय 

वेगवेगळ्या दिवाळी अंकातून कविता व लेख प्रसिद्ध,

“मनपंख” हा कथा व लेख संग्रह प्रसिद्ध.

☆ विविधा ☆ भरली ओंजळ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

ओंजळ ती केवढी; भासते छोटी; मात्र ही असते खूप मोठी. आपली सुखदुःख तिच्यात मावतात.मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीतच पेलता येतात. ओंजळीत मायेचं चांदण मावत. आणि ओंजळ भरून आपण जेव्हा धान्य पेरतो. तेव्हा आपल्याला निसर्ग ते राशीच्या रुपाने परत करतो.ओंजळीत आकाश उतरतं व सप्तसागरांच पाणीही मावू शकतं. ओंजळीत म्हणे ब्रम्हांडही मावतं. झोपेतून जाग सकाळी आपण करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे. बोटांच्या अग्रावर लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती, आणि मुळाशी गोविंद आहे. करदर्शन करताना आपण त्यांच स्मरण करतो. मगच आपण उद्योगाला लागतो.दारी आलेल्या अथितीला विन्मुख न पाठवता आपण त्याला पसाभर धान्य /पीठ देतो. आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा आशिर्वाद ओंजळीतूनच घेतो. सुर्याला अर्घ्य अर्पण करतात ते ही ओंजळीतूनच…

साडेतीन हात लांबीच्या माणसाच्या देहाला ओंजळीत मावेल तेवढेच अन्न पुरेसं असत. त्यापेक्षा जास्त खाल्ल तर अजीर्ण होत. तेवढच पाणी माणसाची तहानही भागवतं. उषःपानही ओंजळीनंच करायचं असत. माणसाच्या अनेक क्रुतींशी व भावनांशी ओंजळीच फार घट्ट नात असतं. ओंजळ हे दात्रुत्वाचं रुप आहे. समर्पणाच्या भावनेच द्योतक आहे.  स्रीची लाजही ओंजळीतच मावते. सुवासिनीची ओटी आपण ओंळीनेच भरतो.

ओंजळ स्विकारली तर ती परतही करावी लागते. ओंजळ कधीच रिती होत नाही. ती पुन्हा पुन्हा भरत जाते.ओंजळ सांगते, ‘आधी द्या मगच घ्या’. ओंजळभर रंग द्या, ओंजळभर गंध द्या, झिरझिरत्या सुखाची आभाळभर फुलं घ्या…!

जगणे आता उत्सव व्हावे

आनंदाच्या ओंजळीने भरुन जावे

पैसा अडका याही पेक्षा

ओंजळभर आंनद मिळावा

मन समाधानाने भरुन जावं

दुखरे क्षण सोडून द्यावे

जगणे सारे आनंदी करावे

आनंदाने, समाधानाने  भरल्या ओंजळीने मरण यावे.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झंपूच्या करामत ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ झंपूच्या करामत ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

२०१३ साली कोथरुड भागात वानरांच्या टोळीने लोकांचे मोबाईल चोरण्याचा सपाटा लावला होता. इतका हैदोस घातला होता की शेवटी ’सकाळ’ वाल्यांनाही त्यांची दखल घेऊन मोठी बातमी छापणे भाग पाडले होते. ह्या चौर्यकर्मामध्ये अग्रभागी होता आमचा “झंपू” बालक! बरं, मला झंपू बद्दल एवढी माहिती कशी? ह्याचे उत्तर असे की, झंपू आमच्या घराच्या मागील पेरूच्या बागेतच तर रहायला होता! म्हणजे जवळजवळ आमचा ’सख्खा शेजारी’च म्हणा हवं तर!

सकाळ-सकाळी “हूप..हूप!” अशी दीर्घ आरोळी उठली की आम्ही ओळखायचो, वानरसेना जवळच कुठे तरी आली आहे. आम्ही मोठया उत्सुकतेने गॅलरीत आलो की चार-पाच किंवा जास्त वानरांचा कबिला समोरच फांद्यांवर बसून नीलमोहराची कोवळी पाने खात असलेला दृष्टीस पडायचा. कावळ्यांची एकसारखी हैराण काव-काव सुरु झाली की समजायचे कोणीतरी वानर कुठेतरी घरटयाजवळ धोकादायक अंतरावर आले आहे. एखादा हुप्प्या समोरील गच्चीच्या कठडयावरून मोठया ताठयात शेपटी वर करून निघाला की कावळे त्याच्या आजूबाजूने झडप घातल्यासारखे उडायचे. झंपूला मात्र कावळ्यांच्या कलकलाटाचा राग यायचा. शेजारील इमारतीच्या गच्चीवर हा पठ्ठा मस्तपैकी दोन्ही हाताने डिश टी व्ही केबलला धरून लोंबकळलेला असायचा. कावळे जवळ आले की केबलचा हात सोडून, हवेत हात मारून कावळ्यांना मारायला बघायचा आणि पडतापडता पुन्हा केबल पकडायचा. मधूनच कधी कधी आमच्या गॅलरीत कपडे वाळवायच्या चिमट्यांच्या रिंगला एकाच हाताने धरून लोंबकळायचा. वाळत घातलेले कपडे, रुमाल ओढून खाली फेकून द्यायचा. एका खिडकीच्या सज्जावरून दुसर्‍या सज्जावर उडी मारायचा आणि खारींना घाबरवायचा. उंची, खोली, लांबी असे कसलेही धोके त्याला जाणवत नसत. कळपात नव्याने दाखल झालेल्या एका पिल्लाबद्दल तर झंपूला भारी आकर्षण. पिल्लाला त्याच्या आईच्या पोटापासून हाताने अलग करून त्याला सारखे खेळायला ओढायला बघायचा. एकंदरीतच काय, तर सर्व वानरांच्या आणि विशेषत: झंपूच्या लीला बघताना आमची अगदी हसून-हसून पुरेवाट व्हायची.

ह्याच टोळीला आणि खासकरून झंपूला मोबाईलचे आकर्षण कुठून पैदा झाले हे काही आम्हाला कळले नाही. घरामध्ये घुसखोरी करून मोबाईल फोन पळवायला लागले. ज्याचा फोन गेलेला असायचा ती व्यक्ती फोन करकरून कुठे ’आपली’ रिंग ऐकू येते का हा प्रयत्न करायची. इकडे फोनचा रिंग टोन वाजला किंवा थरथरू लागला की वानरबुवा खुश! मग तर तो फोन जाम सोडायचे नाही. झंपूचे डोके लहान असल्याने तो खिडक्यांस लावलेल्या गजांच्या जाळीमधून सहज आत प्रवेश मिळवायचा. एखाद्या फ्लॅटच्या गॅलरीचे दार चुकून उघडे राहिले की सरळच आत यायचा. अर्थात जिने चढून माणसांप्रमाणे राजरोस येणे सुध्दा त्याला निषिध्द नव्हते. फक्त घंटी वाजवून दार उघडायला लावता येते, तेवढेच शिकायचे बाकी ठेवले होते.

एकदा झंपूने माझ्या समोरच्या घरातील टी. व्ही. चा रिमोट कंट्रोलच मोबाईल फोन समजून पळवला. माझ्या खालच्या फ्लॅटमधील मालकिणबाईंनी मोठया हुषारीने उशाखाली लपवून ठेवलेला ब्लॅकबेरी त्याने एखादा सराईत चोर जसा पाळत ठेवून पळवतो अगदी तसाच पळवला. एके दिवशी आरडाओरड ऐकून मी स्वयंपाकघरात गेलो तर झंपूची स्वारी आमच्या फ्रीजवर चढून बसली होती. काठी उगारल्यावर “चीं…चीं” करत त्याने तिथून उडी मारली ती जेवणाच्या टेबलावर, तिथली भांडी पाडून उडी घेतली ओटयावर, तिथून खिडकीत आणि मग गजांतून बाहेर. एका दुपारी सहज खिडकीबाहेर नजर टाकली तर झंपूसाहेब दोन पाइपांच्या बेचक्यात चक्क झोपलेले दिसले, ते सुध्दा छातीशी कुठला तरी मोबाईल फोन कवटाळून!

झंपूच्या बंदोबस्तासाठी प्राणिसंग्रहालयात फोन केला तर म्हणाले “वानरांना कायद्याने काहीही करता येत नाही. चुकून मेले तर आमच्यावर सदोष मनुष्यवधाचा दाखल होईल ना! अहो, वानर कुणालाही इजा करत नाही. फक्त ते आले की फटाके वाजवा, आवाज करा, त्यांना खायला काहीही देऊ नका, त्यांच्या नजरेस नजर देऊ नका, त्यांना (वानरांप्रमाणे) वाकुल्या दाखवून चिडवू नका!” इ. इ. अशातच एके दिवशी सकाळमध्ये ’मोबाईल-चोर’ वानरास पकडल्याची बातमी छापून आली आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला! फक्त त्या धरपकडीमध्ये वानर जखमी झाले हे वाचून वाईटही वाटले. खरेच ह्या प्रकरणात झंपूचा काय दोष? केवळ मानवी वस्तीत जन्म घेतला एवढाच? असो. सध्या तरी आम्ही ’सुरक्षित दिन आ गए।’ ह्याच आनंदात आहोत!

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी दुपार ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ माझी दुपार  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

रोज सकाळी सूर्यनारायण आपल्या कोटी-कोटी किरणांच्या अनलशरा उधळत क्षितिजावर येऊ लागतो.त्याची कोवळी उन्हं धरेवर पसरू लागतात. ती अंगावर झेलतच दिवसाची सुरुवात होते. हळूहळू उन्हाची तिरीप अंगाला चटके देऊ लागते. तेच ऊन रणरणतं वाटू लागतं आणि दुपार रखरखीत!!

साहित्यिकांना  कवींना सकाळ, संध्याकाळचं जितकअप्रूप तितकं दुपारचं नाही हं! या सर्वांकडून उपेक्षिलेली ही दुपार!

‘वेळ झाली भर माध्यान्ह!माथ्यावर तळपे ऊन!नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला’ असं एखादं कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेलं आर्त गीत जन्माला येते. हा त्याला अपवाद….

सकाळ नंतर येणारी आणि सांजेत विरून जाणारी ही दुपार माझी मात्र प्रियसखी!

‘सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य असलं की जे घरबसल्या मिळतं’  या ओळी मला माझ्या या प्रिय सखीला अर्पण कराव्याशा वाटतात. कारण ती थकलेल्या माझ्या गात्रांना सुखावते.

नव्या रुपात आणि नव्या ढंगात येणारी ही माझी सखी मला रोज नवीन वातावरणात घेऊन जाते.

सकाळी उठल्यापासून कामात गुरफटलेली मी दुपारी स्वतःला तिच्यात गुरफटून घेते. तिच्या उबदार दुलईत मीच परी असते.

ती कधीकधी अलवार स्वप्न सफरीवर  मला नेते. मनावरचं मळभ दूर करून एखाद्या फुलासारखं टवटवीत करते. आणि मग, चहाचा भुरका मारून मी पुन्हा कामाला लागते.

कधीकधी मला शॉपिंग मेनिया जडतो. मी तिच्यासोबत मनसोक्त शॉपिंग करते.

तिच्यासोबत मी मनस्विनी असते. काही मनभावन वाचन करून स्वतःला रिझवते आणि अंतर्मुखही होते.

कधीतरी एखादी कविता सुचते. लिहिता लिहिता मी ती गुणगुणते. माझ्या सुरात ती गाते. तिच्यात तालात मी नाचते. कविता सजते आणि तिचा पदन्यास सुरू होतो.

तिच्यासोबत एखादा लेख लिहिते. आवडलेल्या लिखाणावर खुश होऊन स्मितहास्य करते. कधी लिहिता लिहिता भावूक होते.. डोळेही पाणावतात. मग मी तिला आणखीनच बिलगते.

माझी दुपार मला खूप काही  शिकवते. दुपारच्या शाळेत फक्त मीच शिकते.

माझ्या सर्व सख्यांनाही ती मला भेटवते. मनमोकळ्या गप्पा मारायला लावून खूप हसवते.नातेवाईकांशी संवाद साधून नात्याची वीण आणखी घट्ट करते.

हक्काचा वेळ देणारी ही दुपार मला काही फावली कामं करण्यासाठी निवांतपणाही देते. सांडगे, पापड, कुरडया, लोणची, मसाले यांनी डबे उगीच का भरतात?

कधी कधी हिच्याच संगतीनं मी गाणी गाते, एखादा सुंदर चित्रपट पाहते, स्वतःला आरशात बघून सजते आणि ‘सजना है मुझे सजना के लिए’असे म्हणून गिरकीही घेते.

Kitty party असेल त्या दिवशी  तिला माझ्यासोबत नेते. आजच्या राहिलेल्या गप्पा आम्ही दुसरे दिवशी मारतो.

रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या इतर स्त्रियांसाठी दुर्मिळ असणारी ही दुपार मला रोज भेटते याचा मला आत्यंतिक सुख वाटतं.

रविवारी येणारी ही दुपार थोडीशी निराळी. माझ्याबरोबरच कुटुंबात रमणारी, त्यांनाही स्वतःच्या अस्तित्वानं निवांत करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी असते. पुढील आठवड्यासाठी खूप-खूप ऊर्जा देणारी अशी दुपार!

दुसऱ्या दिवशी येण्याचं आश्वासन देऊन ती तिच्या वेळेला निघून जाते. बाहेर संध्याकाळ तिची वाट बघत असते. तिला ओव्हर देऊन हिला जायचं असतं ना?

प्रत्येकाची दुपार ही ज्याची त्याची वैयक्तिक प्रॉपर्टीअसते प्रत्येकानं आपल्याला हवी तशी ती वापरावी आपल्याला हवी तशी खर्च करावी  नाही का?….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉ.अभिधा धुमटकर ☆ सुश्री संध्या ओक 

☆ विविधा ☆ डॉ.अभिधा धुमटकर ☆ सुश्री संध्या ओक ☆ 

लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या डॉ. धुमटकर या साठ्ये कॉलजमधील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत..!

कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली,उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांचा सुद्धा दांडगा अभ्यास असणाऱ्या अभिधा यांच्या जिद्दीची कहाणी जाणून घेऊया ’लक्षवेधी’ या सदरातून…,

“अभिधा” शब्दाचा अर्थ धारण करणारी पहिली शक्ती..!

ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच वेगळेपणा जपणारी ‘अभिधा धुमटकर’  हिची.!

अभिधा आपल्या पार्ल्यातल्या… शालेय शिक्षण प्रार्थना समाज शाळेत घेतल्यानंतर तिने पार्ले कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.!

पुढे पी.एच.डी.पर्यंत मजल मारली.!

सध्या साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास या विषयाची ती हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत.!

ही सगळी कथा तुमच्यासमोर मांडायचं कारण, ती हे सुंदर जग पाहू शकत नाही.!

ती जन्मतःच दृष्टीहीन आहे.!

या सगळ्यावर मात करुन आज ह्या पदापर्यंत तिची वाटचाल कशी झाली त्याचीच ही लक्षवेधी कहाणी.!

अभिधा आणि तिच्या मावसबहिणी मध्ये अवघ्या 17 दिवसांचा फरक.!

ती हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने पहायची.!

ही मात्र डोळे फिरवायची.!

त्यावरुन आईने डॉक्टरांना हे  सांगितले. तपासल्यावर कळलं की हिला अजिबात दिसत नाही.!

खरी कहाणी इथूनच सुरू होते.!

या कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता तिच्या आईने ज्या पद्धतीने तिला घडवलयं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे.!

त्यांनी अभिधाच्या बाबतीत घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे तिला अंधशाळेमध्ये न घालता सर्वसामान्य शाळेत घातलं.!

त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना समाजात वावरायचं असल्याने सर्वसामान्य शाळेतच त्यांची प्रगती होणार हे आईला पक्कं ठाऊक होतं.!

बऱ्याच शाळेतून त्यांना प्रवेशासाठी नकारघंटा येत होती.!

एका प्रख्यात शाळेतला अनुभव तर मानसिक खच्चीकरण करणारा होता.!

मुलाखतीसाठी गेल्यानंतर मुलीला दिसत नाही हे माहिती असूनसुद्धा तिला रंग व खेळणी ओळखायला दिली होती.!

पण ह्या अनुभवाच्या पाठोपाठच जगात चांगली माणसं असतात ह्याचासुद्धा त्यांना प्रत्यय आला.!

बोरीवलीच्या सुविद्यालयाने तिला आपल्यात सामावून घेतले.! प्रवेश तर मिळाला पण प्रत्येक टप्प्यावर मात्र खूप संघर्ष होताच.!

जिद्दी असलेली अभिधा होमवर्क लिहिण्यासाठी हट्ट करायची.! ‘कमळ’ शब्द लिहिताना आईला खोडरबर घेऊन स्वतः लिहिलेली एकावर एक येणारी अक्षरे खोडून पुन्हा पुन्हा नीट येईतो न थकणाऱ्या 4 वर्षाच्या अभिधाची चिकाटी पाहून थक्क व्हायला होते..! शांत डोक्याने विचार करुन, कल्पकतेने तिच्या आईने पोळपाट घेऊन गोलाची संकल्पना तिच्यासमोर मांडली आणि लाटणे मध्ये घातल्यावर त्या गोल पोळपाटाचा ‘ब’ कसा होतो ते सांगितले.! इथूनच त्यांच्यामधल्या शिक्षिकेचा कस लागला.!

अभिधा वक्तृत्त्व स्पर्धा, खेळ या सगळ्यातच हुशार होती.! आत्मविश्वास तर तिच्यात ठासून भरला होता.! शाळेत खेळाच्या तासाला सरांनी लंगडी खेळू नको, पडशील असं सांगितल्यावर अभिधा निडरपणे म्हणाली, “पडले तरी चालेल सर, माझी आई नाही विचारायला येणार.!

पण मला खेळू द्या.!’ यात मुख्य प्रश्न होता पेपर लिहिण्याचा.. तिच्या आईने पहिल्यापासूनच रायटर ठेवला होता..!

आठवीपासून काही विषय जसं कार्यानुभव, सायन्सचे प्रयोग, गणित हे साध्या शाळेत जमणार नाहीत त्यामुळे शाळेतून काढून टाकण्याचं संकट उभ ठाकलं.! पण आईने त्या सगळ्यातून धैर्याने मार्ग काढत त्याला परतावून लावलं.!

अभिधा दहावीला अंधांमधून पहिली आली.! गणितात पैकीच्या पैकी मार्क… आईच्या ह्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं.!

नववीत असताना नलिनीताई कर्वे यांनी खूप प्रेमाने रिडिंगच काम केलं.! त्या वाचून दाखवायच्या आणि आई ते सर्व रेकॉर्ड करुन ठेवायची.! नंतर अनेक लोकांनी अतिशय प्रेमाने रिडरचं काम केलं.!

अभिधाला पहिल्यापासून भाषेची खूप चांगली समज होती.!

संस्कृत, मराठी, इंग्रजी यांचं व्याकरण तर अतिशय उत्तम.!

याशिवाय इतिहास शिकवणाऱ्या सिक्वेरा सरांमुळे इतिहासाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि ती इतिहासाकडे वळली.! पुढच्या सगळ्या पदव्या तिने इतिहास विषयातच घेतल्या.!

1883 सालीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांची पुस्तकं तिच्या वाचनात आली.!

सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांमुळे HISTORY OF SCIENCE IN MAHARASHTRA बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि तिचा पी.एच.डी चा विषय पक्का झाला.!

हे सगळं शिकत असताना अभिधाने संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच,अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवले.. शिवाय कोकणी, मराठी येतातच. ह्या सगळ्या भाषा तिला अस्खलित येतात.! एम.ए.,बी.एड.,सेट,नेट पूर्ण झालेलं एम.फील.चालूच होतं.! नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते.!

पण अंध म्हणून नकार मिळत होते.! ती खूप खचून जायची.!

पुढे तिने घरी संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला सुरुवात केली.!

नंतर चाटे क्लास मध्ये फ्रेंच शिकवायला सुरुवात केली.!

ग्रँटरोडपासून अंधेरीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर जाऊन अभिधा शिकवत असे.!

रीडर नसल्यामुळे पी.एच.डी. पूर्ण होईल की नाही ही शंका तिला वाटत होती.! पण गाईड डॉ. मरीयम डोसल आणि प्रो.जे.व्ही.नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे अभिधाला पी.एच.डी. मिळाली.!

पुढे 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीसुद्धा मिळाली.! 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी स्वीकारली.!

श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्स साठी आमंत्रण तसेच लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्ट तर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळणं तिच्या यशात मानाचे तुरे खोचत गेलं.!

फेलोशिपसाठी लंडनला जायचं तर इथून रीडर नेण खूपच खर्चिक होणार होतं.! त्यामुळे तिथल्या रीडरची गरज होती.! अगदी जायच्या दिवसापर्यंत रीडरची सोय झाली नव्हती.!

पण अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे ते सुकर झालं.!

लंडनमधील रीडरना मेल पाठवणं, त्यांची नावं, वेळ एक्सेल शीटमध्ये घालणं, सगळ्यांचा व्हॉट्स App गृप करुन त्यांच्या संपर्कात राहाणं आणि अभिधाच्या बॅग्ज भरुन देण्यापर्यंतची महत्त्वाची कामं तिच्या धाकट्या बहिणीनं समिधाने केली.! सांगायची गोष्ट म्हणजे समिधाही अभिधासारखीच दृष्टीहीन आहे.!

ती सुद्धा एसएनडीटीत नोकरी करते.!

सकाळी सगळा स्वयंपाक करुन चर्चगेटला लोकलने जाते. तिचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे.!

दोन दृष्टीहीन मुली पदरात असताना, जोडीदार अकाली सोडून गेला तरीसुद्धा न डगमगता अतिशय हुशारीने, धैर्याने अभिधाच्या आईने ह्या दोन मुलींना समर्थपणे आयुष्यात उभं केलं.! त्यांच्या ह्या जिद्दीला आदरयुक्त प्रणाम.!

आभिधाचे 14 रिसर्च पेपर “इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली”, “इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स”, “इंडियन कॉग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग”, “इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च” अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेले.!

लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टीहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या अभिधाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..!

 

© सुश्री संध्या ओक

मो 9833247387

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उखळ ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ उखळ ! श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

कांडण्यासाठी दगड खोदून अगर लाकडाचा ओंडका पोखरून जो खोलगट भाग तयार करतात त्याला उखळ म्हणतात.प्राचीन काळापासून या उखळाचा वापर होत आहे.यंत्रयुगात उखळाचा वापर साधन म्हणून कमी झाला असला तरी साहित्यातील उखळ मात्र अजूनही अस्तित्वात अहे

परिस्थितीने गरीब असणाऱ्यांच्या घरी उखळाला काम नसते कारण उखळात घालून कुटण्याइतकेसुध्दा त्यांच्याजवळ नसते पण अशा माणसाचे जर दैव उघडले,

अचानक त्याला वैभव प्राप्त झाले म्हणजेच त्याचे उखळ पांढरे झाले तर मात्र त्यांच्या घरात असणाऱ्या उखळाची मुसळाशी बांधलेली गाठ कधीच सुटत नाही म्हणजे त्यांच्या घरात सतत राबता सुरु होतो.

गरिबांची अशी होणारी उखळ प्रगती (भरभराट)काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना बघवत नाही. अशी माणसे उखळ पांढरे झालेल्या लोकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढतात.त्यांच्या अत्याचाराचे घाव गरिबांना सोसावे लागतात.उखळाशी गाठ पडण्याचा हा प्रकार बऱ्याचवेळा घडतो.

सरळमार्गी जीवन जगणाऱ्या लोकांनाही बऱ्याचवेळा उखळात डोके घालण्याची वेळ येते म्हणजे जीव धोक्यात घालावा लागतो.एकदा उखळात डोके गेल्यावर मुसळाला न घाबरण्याच्या स्वभावाची अशी माणसे उखळात घातले तरी घाव चुकविण्याची तयारी ठेवतात,संकटातून सहीसलामत बाहेर पडण्याची तयारी ठेवतात.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

शिक्षण: बी.एस.सी., बी.एड.फर्स्ट क्लास फर्स्ट. PGDEPM.

व्यवसायः सेवानिवृत्त पर्यवेक्षक, पन्हाळा वि. मं.पन्हाळा.

छंद : वाचन, लेखन, व्याख्यान, कथाकथन.

लेखनः 1. चैतन्य काव्यसंग्रह 2. असे शोधः असे संशोधक भाग १ आणि भाग २ ही वैज्ञानिकांची चरित्रे प्रकाशित. 2012.

मराठी निबंधालय, पर्यावरण शिक्षण,लिहू आनंदे -अशा अनेक पुस्तकात लेख.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून काव्यवाचनाचे वीस कार्यक्रम.

पुरस्कार –

राज्यस्तरीय निबंध लेखनात प्रथम, द्वितीय असे पाच क्रमांक.

1. रोटरी क्लब आँफ कोल्हापूर-सनराइज द्वारा सनराइज आदर्श शिक्षक पुरस्कार  2.लायन्स क्लब इंटरनँशनल-कोल्हापूर विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार २००५। 3.जनस्वास्थ्य दक्षता समिती, कोल्हापूर, सन्मान पत्र.

याखेरीज वर्तमानपत्रे,मासिके, दिवाळी अंकातून लेखन चालू.

☆ विविधा ☆ मन ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

दोनच अक्षरी शब्द मन! पण या शब्दाची व्याप्ती मात्र अमर्याद. त्याचा आकार तरी कसा वर्णावा बरे? ते हीअवघडच. कधी मनखसखशीएवढं तरकधी त्याहून सूक्ष्म अणुरेणू एवढं बनतं. तरकधी त्या विशालकाय आकाशातही मावणार नाही इतकं प्रचंड रूप धारण करू शकतं. मन इतकं लहरी असतं कि कोणी त्याचा हातच धरु शकणार नाही. कधी मन स्वच्छंदीपणे विहरतं तर कधी विचारी बनतं. कधी ते गूढ अर्थ शोधण्यास सज्ज होतंनि झपाटल्यासारखं एखाद्या गोष्टीच्या मागं लागतं. कधी हेच मन घमेंडखोर बनतं नि बढायांना गोंजारु लागतं. कधी हेच मन उत्साही बनतं नि नवनिर्मिती करु पाहतं.कधी ते लाडिक बनतं नि प्रिय व्यक्तीस, सवंगड्यास लाडाने हाकारु पाहतं तर काही वेळा तुसडं बनून अगदी सर्वांनाच दूर-दूर लोटू पाहतं. कधी मन स्वप्नाळु बनतं नि दिवास्वप्न रेखाटू लागतं.तर कधी कधी दुःखी बनून अश्रू साठ वित राहातं.असंहे बहुरंगी भावार्थ साठविणारं मन.याविषयी बोलावं तेवढं थोडच म्हणूनच

श्रीसमर्थ सुद्धा करुणाष्टकात म्हणतात-

अचपळ मन माझे नावरे आवरिता।

तुजविण शिण होतो धाव रे धाव आता।।

खरच हे अचपळ मन ताब्यात ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत. कारण असं म्हणतात कि-मन जिंकी तो जग जिंकी.

मनावर चांगले संस्कार होण्यासाठी आपण घरातूनच लहानपणापासून शुभं करोती, देवाची स्तोत्रे, परवचा असे संस्कार घेत आलो आहोत. कुठलीही गोष्ट

प्रथम मनात आली तरच तिचा विचार होऊन पुढे आपण त्याप्रमाणे क्रुती करतो. कोणतीही गोष्ट शक्य होण्यासाठी प्रथम मनात आणावी

लागते.म्हणूनच आपण मनावर सुसंस्कारांचे धडे बिंबविले तरच या सम जात सह्रुदय, संवेदनशील व्यक्ती निर्माण होतील. एकनाथ महाराजांनी गंगेची कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखी सोडली.अशा गोष्टीतून भूतदया कशी दाखवावी हे मुलांना सांगता येते.

म्हणूनच मन चांगल्या संस्कार ांनी विकसित केले तर भावी पिढी सद्वर्तनी ,सुशील आणि सेवाव्रती  बनेल. त्यामुळे लाँकडाउनच्या या काळात घरी बसून काम करण्याची संधी ही सुसंधी मानली तर मुलांशी सुसंवाद साधणे सोपे होईल.वाचनाची आवड त्यांच्या मनात निर्माण करता येईल.श्री समर्थांनी मनाचे श्लोक

रचले आहेत ,यामागे हाच हेतू आहे.आपलं मन स्वच्छ, शुद्ध, पारदर्शक ठेवले नि योग्य विचार मनात आणले तरच आपली योग्य दिशेने प्रगती होईल यात शंकाच नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कोणत्याही वयात मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे त्यामुळे योग्य निर्णय घेता येतो. सकारात्मक विचार ातूनच मनाची उत्तम मशागत होते.चला तर कोणतीही गोष्ट मनापासून करु या नि यश मिळवू या.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्दवेडी – शब्दकोडी ☆ सौ. अमृता देशपांडे

☆ विविधा ☆ शब्दवेडी – शब्दकोडी ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

शब्दकोडी सोडविणे हा छंद म्हणा, आवड म्हणा, सवय म्हणा किंवा वेड म्हणा, काही असले तरी त्याचे फायदेच आहेत. कित्तीतरी  फायदे. वेळ छान जातो, डोक्याला चालना मिळते, नवीन शब्द कळतात, वयाच्या पन्नाशीनंतर आत्मविश्वास वाढायला मदत होते.

मला तर शब्दकोडी सोडविणे हा छंद,सवय, आवड, आणि वेड सगळंच आहे. काही वर्षांपूर्वी मुद्दाम वेळ काढत असे. आवड असली कि सवड मिळतेच. वर्तमानपत्रातली छोटी छोटी शब्दकोडी पट्कन सुटतात. आता तर काय दुपारचा एक तास दोन मोठी म्हणजे 75- 80 शब्दांची कोडी सोडवता येतात. ते आता इतकं सवयीचं झालं आहे की दुपारी वर्तमानपत्र आणि पेन माझी वाट बघत असतात.

हो! डोक्याला चालना मिळते. आडव्या उभ्या शब्दांची एकमेकांशी सांगड घालताना शब्दांची वीण जमू लागली की एक सुंदर चित्र  तयार होते. पण कधी कधी एखादा शब्द इतका खट आणि हट्टी असतो, काही केल्या आठवत नाही. तेव्हा त्याला तिथेच सोडते आणि दुस-या शब्दाकडे जाते. अचानक तो हट्टी शब्द पटकन उतरतो.

काय गंमत असते बघा! एक बंदिस्त चौकोन, त्यात अनेक घरे, प्रत्येक घरात एक शब्द आणि त्यांचं नातं फक्त आडवं किंवा उभं. दोन शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

जबाबदारी या शब्दापासून कामचुकारपणा शब्दापर्यंत, सभ्य, सालस या शब्दापासून कृतघ्न,हलकट, नीच, नराधम शब्दापर्यंत,  नाटककाराचे लांबलचक नाव ते एकांडे शब्द,  उदा. ख,ब्र,भ्रु, व, ठो, शी अशा वैविध्यपूर्ण शब्दापर्यंत, एक म्हण उभी 10 अक्षरांची तर आडवा वाक्प्रचार 12 अक्षरांचा. यापेक्षा ही अधिक range असलेली कोडी म्हणजे एक challenge असते.

हल्ली तर सणवारांप्रमाणे कोडी असतात.श्रावणातले सण, प्रत्येक दिवसाचे महत्त्व उलगडणारी कोडी, गणेशोत्सवात गणपतीच्या नावांची आणि स्थानांची, तसेच नवरात्रीची देवीच्या नावांची कोडी, तर चक्क राजकपूरच्या सिनेमांची, बच्चनच्या सिनेमातल्या त्यांच्या character च्या नावांची सुद्धा कोडी असतात.

मला ही शब्दकोडी बनविणा-यांच्या बुद्धीचं खरंच कौतुक वाटतं. अफाट बुध्दी वापरून करतात हे काम ही मंडळी. शब्दकोडी सोडवताना नवीन शब्दांची भर पडते आपल्या डिक्सनरीत. उदा. वस्तूंची यादी याला ‘ रकमाला’ हा शब्द,  खाट किंवा बाज ला नवार,  शिकलगार, वेठबिगार असे कालबाह्य झालेले शब्द परत समोर येतात.

पन्नाशीनंतर जेव्हा थोडासा विसरभोळेपणा हा गुण वर यायला लागला कि स्वतःवरच ओशाळायला होतं. तेव्हा जर शब्दकोडी सोडविणे हा नियम केला तर कोडी सोडवता सोडवता हा गुण/अवगुण कमी होऊन आत्मविश्वास वाढायला मदत होते. करून बघा!

‘ शब्दकोडी ‘, ‘ करमणूक’,    मनोरंजन अशी तीन मासिके उपलब्ध आहेत बरं का! त्यात 25 ते 50 कोडी असतात, एका कोड्यात 100 शब्द असलेली.

शब्दांचा हा उपलब्ध असलेला खजिना आणि आपला वेळ यांची आडवी – उभी सांगड घाला आणि सोडवा शब्दकोडी.  बघा किती मज्जा येईल.

मस्त रहा..स्वस्थ रहा….

 

© सौ. अमृता देशपांडे

9822176170

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फुशिमी इनारी ☆ सुश्री रूपाली दामले

☆ विविधा ☆ फुशिमी इनारी ☆ सुश्री रूपाली दामले ☆ 

जपानला येऊन एकच आठवडा उलटला होता. कॉलेज सुरू न झालेली आम्ही रिकामटेकडी मंडळी ‘जपान फिरूया’ म्हणून सकाळी दोन तासांचा प्रवास करून क्योतो स्टेशन वर पोहोचलो. क्योतोला फार मोठा इतिहास आहे. टोकयो आधी तब्बल हजार वर्षे क्योतो जपानची राजधानी होती. त्यामुळे साहजिकच राजांचे राजवाडे, मंदिरे, जुनी घरे, बगीचे, स्तूप, इमारती यांनी क्योतो नटलेलं आहे. क्योतोच्या प्रत्येक गल्लीत, तिथल्या प्रत्येक जुन्या घरावर जपानी संस्कृतीची छाप पडलेली दिसते.

पोहोचल्या पोहोचल्या आमचा मोर्चा वळला तो ‘फुशिमी इनारी’ पाहायला. इनारी ही ‘भाताची’ देवता. ‘फुशिमी इनारी’ हे इनारी देवतेचं मुख्य मंदीर. जपानमध्ये भाताचं उत्पादन अमाप असल्यामुळे या देवावर लोकांची विशेष श्रद्धा आहे. जपानमध्ये ‘शिंतो’ नावाचा तिथेच उदयाला आलेला एक धर्म आहे. या धर्मात निसर्गातल्या प्रतिकांचं पूजन केलं जातं. ‘इनारी’ देवता हे त्यातलंच एक प्रतीक आणि कोल्हा हा त्याचा दूत. भाताच्या शेतातून मार्ग काढत हा दूत इनारीचे संदेश पोहोचवतो. मंदिराच्या द्वाराशी प्रचंड कमान आहे. मुख्य मंदीर डोंगरमाथ्यावर आहे. मंदीराकडे जाणारा पायरी रस्ता जंगलातून तर कधी डोंगरकड्यावरून क्योतो शहराचं विलोभनीय दृश्य दाखवत पुढे पुढे जातो. संपूर्ण डोंगराची प्रदक्षिणा या पायवाटेवरून चालल्यावर घडते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या संपूर्ण वाटेवर उभ्या असलेल्या केशरी कमानी. त्यांची संख्या जवळजवळ दहा हजार आहे. रस्त्यावरून चालताना सूर्यप्रकाशात केशरी कमानींचा रंग फार अप्रतिम भासतो.

या मंदिराच्या सुंदरतेमुळे येथे नेहेमीच गर्दी असते. त्यात परदेशी पर्यटकांची संख्या जास्त. त्या गर्दीत किमोनो घातलेली जपानी स्त्री आणि केशरी कमानींसोबत तिचे फोटो काढणारा जपानी माणूस हमखास आढळतात. ‘फुशिमी इनारी’ हे जपानी माणसाच्या हृदयाशी आहे. येथील वातावरण आणि सुंदरता आपल्यालाही मोहात पाडतात.

 

© सुश्री रूपाली दामले

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जन्मकुंडली आणि विवाहयोग ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ विविधा ☆ जन्मकुंडली आणि विवाहयोग ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक या नात्याने “जन्मकुंडली आणि विवाहयोग” यासंबंधीची माहिती मी खाली देत आहे.

कोणत्याही युवा व्यक्तीच्या जीवनात विवाहसंस्कार हा सर्व संस्कारात श्रेष्ठ आणि आवश्यक असतो. वैवाहिक जीवनाची सफलता पतीपत्नीच्या एकमेकांवरील विश्वासावर आणि वचनबद्धतेवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपले वैवाहिक जीवन सुखी, समाधानी, समृद्ध आणि सफल असावेसे वाटते आणि त्यात गैर काहीच नाही. भावी जोडीदारासोबत आपले वैवाहिक जीवन कसे असेल याची प्रत्येकाने विवाहापूर्वीच दोघांच्या कुंडलीद्वारे माहिती करून घेतली तर वैवाहिक जीवन नक्कीच सफल होईल. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा ज्योतिषशास्त्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याद्वारे व्यक्तीच्या सुखद, सुसंस्कृत आणि सफल वैवाहिक जीवनाच्या शक्यतांचे आकलन होते. जेणेकरून भावी जीवनाविषयीचा अंदाज बांधता येतो.

खरे तर ज्योतिषीय दृष्टीकोनाचा अंगीकार करूनच आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम, सौहार्द, संस्कार आणि संवेदनशीलता निर्माण होण्याची आशा आपण करू शकतो.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनास प्रभावित करणाऱ्या  ग्रहांची दिशा आणि दशा यावरूनच विवाहयोग जुळून येतील किंवा नाही हे समजू शकते. जन्म तिथि, जन्म वेळ आणि जन्म स्थान यावर आधारित कुंडलीचे गुणमेलन करूनच वैवाहिक जीवनातील सफलतेविषयी माहिती मिळते.

पुष्कळदा असे पहावयास मिळते की, एखादी मुलगी सर्वगुणसंपन्न असूनसुद्धा तिचा विवाह जमण्यात खूप अडथळे येतात किंवा विवाहास विलंब होतो किंवा अनुरूप जीवनसाथी मिळत नाही. काही लोक तर असे पहावयास मिळतात की त्यांच्या करिअरमध्ये ते खूप यशस्वी असले तरी वैवाहिक जीवनात मात्र असफल होतात किंवा त्याच्या जीवनात लवकरच वैवाहिक संबंध तोडण्याची वेळ येते. पुष्कळदा करीअरच्या बाबतीत यशोशिखरावर पोचलेल्या लोकांनासुद्धा अविवाहित राहण्याची पाळी येते.  अशा वेळी वैदिक ज्योतिषानुसार बनलेल्या कुंडलीतील सकारात्मक प्रभाव असणाऱ्या ग्रहांची गतिशीलता ओळखून नकारात्मक प्रभाव असणाऱ्या ग्रहांचा दोष दूर करणे भाग पडते.

ज्योतिष शास्त्रानुसार उत्तमविवाहयोगासाठी कुंडलीच्या दुसऱ्या, पाचव्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील ग्रहांच्या स्थितीवर ध्यान द्यावे लागते. यामध्ये विशेषत: मंगळ, शनी, सूर्य, राहू आणि  केतु या ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या आधारावरच विवाहासाठीची योग्य वेळ ठरवणे सोपे जाते. कारण विवाहाचे योग तर पंचांगात अनेकदा दिसतात. पण प्रत्यक्ष विवाह केव्हा होईल हे पाहणे महत्त्वाचे असते. पुरुषासाठी विवाहाचा कारक ग्रह शुक्र आहे तर स्त्रीसाठी गुरू हा कारक ग्रह आहे. हे कारक ग्रहच दुसऱ्या ग्रहांच्या प्रभावाखाली येऊन विवाहासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल स्थिती निर्माण करतात.

स्त्रीच्या कुंडलीतील आठवे स्थान तिच्या भाग्याचे निदर्शक आहे तर स्त्री आणि पुरुष या दोघांच्या कुंडलीतील बारावे स्थान सुखद वैवाहिक जीवनाचे अर्थात यौनसंबंधाचे निदर्शक आहे. यानुसारच पतीपत्नीच्या मनात एकमेकांविषयीचे आकर्षण निर्माण करणारी भावना जागृत होते.

कुणीही व्यक्ती स्वत:च्या कुंडलीतील सातव्या स्थानावरील ग्रहस्थिती पाहून आपला आयुष्याचा जोडीदार कसा असेल आणि आपले वैवाहिक जीवन कसे राहिल याचा अंदाज घेऊ शकते. सातव्या स्थानाचा कारक ग्रह शुक्र आहे. पण या स्थानात शनि बलवान असेल आणि गुरू कमजोर असेल तर उत्तम विवाहयोगसुद्धा प्रभावित होऊन अनिष्ट फळे मिळू शकतात. सातव्या स्थानात रवी असल्यास घटस्फोटाची स्थिती निर्माण होऊ शकते. जर सातव्या स्थानात मंगळ असेल तर मांगलिक योग बनतो. मंगळाची कुंडली किंवा मांगलिक योग म्हणजे काय तर कुंडलीमधील प्रथम स्थानी, चतुर्थ स्थानी, सप्तम स्थानी, अष्टम स्थानी किंवा द्वादश स्थानी म्हणजेच बाराव्या घरात मंगळ असल्यास तो मंगळ सदोष असतो आणि ती मंगळाची कुंडली समजली जाते. या स्थानातील मंगळामुळे विवाहास विलंब होणे, वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत कलह किंवा घटस्फोट होण्याइतकी स्थिती बिघडणे असे प्रकार घडू शकतात. ज्या व्यक्तीची कुंडली मंगळाची आहे, त्या व्यक्तीचा विवाह साधारणपणे वयाच्या २७, २९, ३१, ३३, ३५ किंवा ३७ व्या वर्षी होण्याची शक्यता असते.

पण कुंडलीत प्रथमदर्शनी सदोष दिसणारा मंगळ विशिष्ट ग्रहस्थितीमध्ये निर्बली होतो आणि ती कुंडली मंगळाची गणली जात नाही. हेसुद्धा लक्षपूर्वक पाहणे जरुरीचे ठरते. मंगळाची कुंडली असलेल्या व्यक्तीस मांगलिक योग असलेलाच जोडीदार पाहिजे असे मात्र नाही. जोडीदाराच्या कुंडलीत सदोष मंगळ नसला तरी विशिष्ट ग्रहस्थिती असेल तर ती कुंडली मंगळाच्या कुंडलीशी जमते. याव्यतिरिक्त सातव्या स्थानावर बुध निर्बली होऊन जातो. पती आणि पत्नी या दोघांच्या कुंडलीत सातव्या स्थानी जर राहू किंवा केतू असेल तर विवाहानंतर वर्षभरातच घटस्फोटासारखी स्थिती उत्पन्न होते. सातव्या स्थानातील राहूच्या उपस्थितीमुळे जीवनसाथीपासून विभक्त होण्याची इच्छा किंवा विरक्तीचे भाव निर्माण होतात आणि दोघांमधील दुरावा वाढत जातो. त्याचप्रमाणे तिथे केतू असल्यास पतीपत्नी आयुष्यभर अलग अलग राहण्यासाठी विवश होतात. अशा स्थितीमध्ये दोघांमधील वैचारिक मतभेदही खूप वाढत जातात. वास्तविक काही धार्मिक विधी करून अनिष्ट ग्रहांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय योजता येतात हेही तेवढेच खरे.

कुंडलीमध्ये सातव्या स्थानाचा स्वामी जर सातव्या स्थानातच असेल तर अशी व्यक्ती सफल वैवाहिक जीवन व्यतीत करते. त्या व्यक्तीच्या उन्नतीमध्ये कुठलीही बाधा येत नाही. तसेच पतीपत्नीचे संबंध अगदी मधुर बनलेले असतात. याचप्रकारे कुंडलीतील सातव्या घरात जर शुक्र असेल तर अशा व्यक्तीच्या विवाहाचा योग लवकर येतो.

विवाहास विलंब होण्याचे मुख्य कारण म्हणजे कुंडलीत मंगळ षष्ठस्थानी असणे. विवाहासाठी गुणमेलन करण्याआधी स्त्रीच्या कुंडलीत गुरू आणि पुरुषाच्या कुंडलीत रवि यांची स्थिती पाहणे गरजेचे आहे. याशिवाय सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनाचे विश्लेषण करण्यासाठी चतुर्थ स्थानाचे अध्ययन केले जाते. अर्थात विवाहाचा संपूर्ण निर्णय हा कुंडलीतील सातव्या स्थानाव्यतिरिक्त चौथ्या, पाचव्या आणि अकराव्या स्थानातील ग्रहांच्या स्थितीवर घेतला जातो.

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print