मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कितीतरी तेजस्वी तारे निखळले…

डाॅ.अनिल अवचट हे ही ,पुण्यातील अत्यंत नामांकीत ,साहित्यिक, बहुआयामी व्यक्तीमत्व…!

एक पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ता,प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला….

त्यांची कितीतरी पुस्तकं ..!!

त्यांची पुस्तकं वाचत असताना ,आपल्या मध्यम वर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे,याची जाणीव होते..आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळते…

पूर्णीया  हे त्यांचं पहिलं पुस्तक.आणि माझं आवडतं पुस्तक.त्यांत त्यांनी बिहारचं अंतरंग उलगडलय्.तिथली समाजव्यवस्था,जमीनदारी,अस्पृश्यता,वेठबिगारी,कंगाली यांचं वर्णन वाचून अक्षरश:हादरायला होते.

ते संवेदनशील आणि मनमोकळे होते. लोकांमधे वावरणारे होते. ते नि:संशय मराठीतले महत्वाचे लेखक ठरतात.त्यांनी आयुष्यभर मिशनर्‍यांसारखं, वंचितांचं, गरिबांचं, कष्टकर्‍यांचं, जगणं, समाजासमोर आणण्याचं काम केलं.

आणि हे सर्व लिखाण प्रत्यक्ष बघून,फिरून ,बोलून!लोकांमधे वावरून केलं आहे.त्यामुळे त्यांत रुक्षपणा,बोजडपणा ,अजिबात नाही. जणू वाचकाचं बोट धरून त्यांना काही दाखवावं असं त्यांचं लेखन…मोकळं मुक्त…जसं बोलणं तसं लिहीणं…त्यामुळे अनिल अवचट यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नसली तरी ते कधीही अनोळखी वाटले नाहीत…

धागे आडवे उभे,वाघ्या मुरळी,प्रश्न आणि  प्रश्न, वेध ,छेद, संभ्रम , कोंडमारा,माणसं ,अशा कित्येक पुस्तकांतून  हा पैलुदार साहित्यिक भेटत राहिला…त्यांच्या विचारातला लवचिक पणा ,तसा ठामपणाही सतत जाणवला.अस्तित्व टिकवणारी साहित्यनिर्मीती असंच मी म्हणेन…

दलीत पँथर, छात्र युवा संघर्ष वाहिनी, भूमीसेना, हमाल पंचायत वगैरेंशी त्यांचे संबंध होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, कुमार सप्तर्षी यांसोबत ते काही काळ या चळवळीत राहिले.पण कार्यकर्त्याचा आपला पिंड नाही हे जाणून ते त्यातून बाहेर पडले पण एकाचवेळी लेखनाच्या माध्यमातून जोडलेले ही राहिले.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ही त्यांचीमहत्वाची सामाजिक ओळख!या त्यांच्या कार्याला पुलंसारख्या आणि अनेक नामांकीत श्रेष्ठींने हात दिले.गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी कितीतरी हजार व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन केले.मात्र याचे सर्व श्रेय त्यांनी आपली पत्नी सुनंदाला दिलं.”मी फक्त व्यसनी लोकांच्या जगण्यावर लिहीण्यापुरता…”असे ते म्हणत.

ओरिगामी या कलाछंदांतून ते जगभरच्या बालविश्वाशीही जोडले गेले. त्यांची कित्येक डिझाईन्स ही स्वनिर्मीत  होती… अनेक रुपातले मोर ,गणपती,पक्षी हत्ती घोडे, विदूषक, सांताक्लाॅज्.. त्यांनी स्वत: कागदातून बनवले..जपानमधे ती कायमस्वरुपी प्रदर्शनातही ठेवली आहेत…

ते सुंदर बासरीही वाजवायचे…चित्र काढायचे..

असा हा बहुयामी ,साहित्यिक कलावंत मुक्त मोकळा आणि एक सच्चा माणूस….आज नाही..

विसर्जीत झाला..

त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर…

कागदावरच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.

जंगलात ,ऋतुचक्रात हे सामावलेले असते..

झाडाचे पिकले ,पिवळेपान फांदीवरून निसटते.

हवेत तरंगत,मौनाच्या प्रार्थना सारखे जमिनीवर अलगद टेकते…विसर्जित होते.अगदी हळुवारपणे.विसर्जन ही एक  मौलीक गिफ्ट आहे…!!

साहित्यविश्वातले एक सुवर्णपान गळाले…

ज्यांनी जगणे उजळले…

सर्व साहित्यप्रेमींतर्फे या संवेदनशील व्यक्तीमत्वाला प्रेमपूर्वक वंदन…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मनोहर फार्म हाउस आज अगदी गजबजून गेलं होतं. जिव्हाळ्याचे नातेवाईक,  स्नेही-संबंधित जमले होते. गेल्या चार वर्षापूर्वी सुहासने आपल्या शाळेतल्या वर्गमित्राकडून प्रकाशकडून ही जमीन विकत घेतली होती. त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता आणि तिच्या उपचारांसाठी बर्‍याच पैशांची आवश्यकता होती. उपचाराच्या दरम्यान घरून येण्यासारखे कोणी नव्हते. तिची देखभाल त्यालाच करणं भाग होतं. त्या सगळ्यात त्याची नोकरीही गेली. पाच वर्षापूर्वी सुहासच्या शाळेतील दहावीच्या बॅचने गेटटूगेदर केलं. तेव्हा सुहासला त्याची परिस्थिती कळली. तो पैशासाठी जमीन विकणार असल्याचे तेव्हा म्हणाला. सारखी रजा घ्यावी लागत असल्यामुळे नोकरी कितपत टिकेल, याचीही त्याला शंका वाटत होती. सुहासने मग त्याची जमीन विकत घेतली. पुढे दोन वर्षांनी तिथे फार्म डेव्हलप केला. फार्म हाऊसही बांधलं. त्या सगळ्या इस्टेटीचा व्यवस्थापक म्हणून त्याने प्रकाशलाच नेमलं. जमिनीतून पालेभाज्या,  फळभाज्या,  फुले वगैरे लावून त्याचे उत्पन्नही प्रकाशने घ्यावे, असे त्याने सुचवले. प्रकाशला देवच मदतीला धावून आल्यासारखे वाटले. त्याच्या बायकोची रश्मीची ट्रीटमेंट झाली. आता तिचा धोका टळलाआहे,  असं डॉक्टर म्हणतात. प्रकाश नेहमी म्हणतो, `कृष्ण सुदामाची कथा आपण वाचली होती. सांगतही होतो लहानपणी. पण प्रत्यक्षात असा कृष्ण आपल्या नशिबात येईल, असं कधी वाटलं नव्हतं.’ आता रश्मीची तब्बेतही सुधारलीय.  ती पण भाजीपाला पिकवण्यात,  फुले, हार करणं,  यासारख्या कामात प्रकाशला खूप मदत करते.  सुहासचा एकेकाळचा जिवाभावाचा मित्र त्याचं फार्म आणि फार्म हाऊसचा व्यवस्थापक बनलाय.. त्याच्यावर विश्वास टाकून सुहास गावोगावी, देशोदेशी जायला मोकळा झालाय ॰.

आताशी नातेवाईक, संबंधित म्हणायला लागले होते, `सुहास, तू फार्म हाऊस बांधलंस म्हणे! एकदा बघायला हवं!’  सुहासच्याही मनात येत होतं,  एकदा कुठल्या तरी निमित्ताने आपल्या सगळ्या जिव्हाळ्याच्या माणसांना तिथे बोलवावं आणि सगळ्यांनी एक दिवस मस्त मजेत काढावा. पण काय निमित्त काढावं?  आणि त्याला एकदम आठवलं,  पुढच्या महिन्यात आप्पांना सत्तर वर्षं पूर्ण होताहेत,  तर वहिनींना साठ. शिवाय त्यांच्या लग्नालाही चाळीस वर्षं होताहेत. त्या निमित्ताने एक झकास गेटटूगेदर करू या. याबद्दल सुहास सुखदाशी बोलला,  तेव्हा ती म्हणाली, ‘`याबद्दल माई-आप्पांशी बोलूयात नको! त्यांना एकदम सरप्राईज देऊयात.’ सुहासला ती कल्पना आवडली. रोज वेगवेगळ्या योजना ठरू लागल्या. मिहीर-मिरालाही त्यांनी बजावलं, `माई-आप्पांना काही कळू देऊ नका. त्यांना एकदम…’

`सरप्राईज’ मुलं ओरडली.

मग मुलं रोज एकमेकांशी कानातल्या कानात कुजबुजू लागली. नेत्रपल्लवी, हातवारे होऊ लागले. घरात काही तरी शिजतय,  हे मालतीच्या लक्षात आलं.

`अग, काय चाललय काय तुमचं?’  मालतीनं न राहवूनविचारलं. `काही नाही ग!’ मिहीर मीराला तोडावर बोट ठेवून खुणा करत म्हणाला नाही तर ती पटकन बोलून गेली असती ना! 

 `ती ना, आमची एक गम्मतआहे.’ मीरा म्हणाली.

`आम्हाला पण कळू दे की तुमची गंमत.’

`अंहं! बाबा म्हणाले, कुण्णाला सांगायचं नाही.’

`आई-आप्पांना तर मुळीच नाही.’

`अरे, आम्हाला पण तुमच्या गमतीत घ्या ना!’

`सांगू का?’ मीरा म्हणाली, तशी मिहीरने तिला डोळ्यांनीच ‘गप्प बस’ म्हणुन खुणावले.

`की नाई, या महिन्यात वीक एंडला आपण फार्म हाऊसवर जाणार आहोत. ‘

`असं का? छान! छान!’

`आपणच नाही काही! काका-काकू,  मामा- मामी आणि खूप खूप लोकांना बोलावणार आहेत बाबा’

`हो का? पण का म्हणे?’

बोलता बोलता  मीरा विसरूनच गेली, की आजी आणि आप्पांना काहीच कळू द्यायचं नाहीये. ती पटकन म्हणूनगेली, ` अग, तुझा आणि आप्पांचा वाढदिवस आहे ना! तुझा साठावा. आप्पांचा सत्तरावा. ‘ आणि मग तिने एकदम जीभ चावली.

‘`काय हे मीरा?  सगळं सीक्रेट तू ओपन केलंस.’

 `सॉरी… सॉरी…’ मीरा कान धरत म्हणाली.

`अग, बाबा म्हणाले, त्या निमित्ताने आपण गेटटूगेदर करू या. ‘ 

संध्याकाळी सुहास घरी आल्यावर मालती म्हणाली, `अरे, कसला घाट घातलायस?’

`घाट? कसला?’

`ते काही तरी गेटटूगेदरम्हणत होते मीरा, मिहीर.’

`हां! ते होय?  अग,  बरेच दिवस सगळे म्हणताहेत, सुहास तुझं फार्म हाऊस बघायचंय.’

`ते ठीक आहे. गेटटूगेदर कर तू! पण ते वाढदिवस वगैरे असलं काही नको हं! वाढदिवस आता मुलांचे साजरे कराययचे?  की आमचे? ‘

`बरोबर आहे. आणि पंचाहत्तरी साजरी करतात. सत्तरी नव्हे. ‘ आप्पा म्हणाले.

`आणि लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजराकरतात. चाळीसावा नव्हे. ‘ मालती म्हणाली.

`आम्ही आणखी पाच -दहा वर्षं जगू की नाही,  अशी शंका नाही ना आली तुम्हाला? ‘ आप्पा हसत हसत म्हणाले.

`मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 1 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

 

? विविधा ?

महिनाअखेरचे पान -1 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

महिनाअखेरचे  पान

बघता बघता नवीन वर्षाचा पहिला महिना संपत आला आणि आज तर जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस ! इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा पहिला महिना असला तरी भारतीय कालगणनेप्रमाणे या महिन्यात सुरूवातीला मार्गशीर्ष महिन्याचे काही दिवस येतात व अमावस्येनंतर पौष महिन्याचे दिवस येतात.कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे प्रत्येक महिन्यातच असे काही दिवस येत असतात.पण आपण मात्र या दोन्ही पद्धती विचारात घेऊन त्यांना आपलेसे केले आहे.एकीकडे आपल्या कालगणनेप्रमाणे आपण आपले सण,उत्सव,परंपरा जतन करत आलो आहोत तर दुसरीकडे जागतिक कालगणनेला स्विकारून त्यातील नोंदीनुसारही आपण सर्वांबरोबर वाटचाल करत आहोत.

नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव संपतो ना संपतो तोच आणखी एक गोड संदेश आपल्या कानावर येतो.तो म्हणजे ‘गोड गोड बोला’.संक्रांतीच्या सणाला लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच एकमेकांना ‘ तिळगूळ घ्या,गोड बोला ‘ असा आपुलकीचा संदेश देत तिळगूळ  आणि तिळाच्या वड्या वाटून आनंद,स्नेह,प्रेमच वाटत असतात.लहान मुलांचा उत्साह पाहून आपणही लहान होऊन जातो आणि   ‘ग्गो ग्गो बोला’ म्हणत त्यांच्याबरोबर लहान होऊन जातो. संक्रांतीचा आदला दिवस भोगी व पुढचा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या या दिवसांत तिळ आणि गूळ यांच महत्व सांगणारा हा सण आपल्या पूर्वजांच्या आरोग्यविषयक दक्षतेचे प्रतिक आहे.आपल्या प्रत्येक सणामागील विज्ञान आपण समजून घेतले तरच या परंपरा,सण जतन करता येतील.

या पारंपारिक सणाव्यतिरिक्त अन्य काही महत्वाच्या घटना या जानेवारी महिन्यात घडून जातात.त्या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या आहेत.याच महिन्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊसाहेब ,स्वामी विवेकानंद आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते.सावित्रीबाई फुले यांनी स्त्री उद्धारासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन हा दिवस बालिका दिन व महिला मुक्तिदिन म्हणून  साजरा केला जातो तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन युवादिन म्हणून साजरा होतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी महात्मा गांधी,भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री आणि समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथि याच महिन्यात असते.या सर्वच थोर विभूतींचे स्मरण  या निमित्ताने केले जाते.

या महिन्यातीतल आणखी एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे 26जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन!याच दिवशी 1950 साली आपण प्रजासत्ताक राज्यपद्धती स्विकारली व लोकशाहीच्या मार्गाने आपला राजकिय व सामाजिक प्रवास सुरू झाला.

असा हा वर्षाचा पहिला महिना आज संपत आहे आणि उद्यापासून काळाचा प्रवेश पुढील महिन्यात होत आहे.भेटू पुढच्या महिनाअखेरीला. तोपर्यंत गोड गोड बोला…

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग २ – खरे शिक्षण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग २ – खरे शिक्षण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

मुलांना कोणत्या शाळेत घालायचं हा मोठा प्रश्न आजच्या पालकांसमोर असतो. खरय की शिक्षण आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक असतो. शिक्षण हे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीही. औपचारिक शिक्षण म्हणजे शालेय, महाविद्यालयीन, पुस्तकी शिक्षण, तर अनौपचारिक शिक्षण  म्हणजे घरात कुटुंबात,बाहेर समाजात, आजूबाजूला घडणार्‍य घटना यातून मिळालेले शिक्षण व मोठ्यांनी केलेले  संस्कार सुद्धा. शाळेत घेतलेले पाठ्यपुस्तकांतले शिक्षण म्हणजे निव्वळ  माहिती असते. ब्रिटीशांनी घालून दिलेल्या या शिक्षण पद्धतीमुळे आपल्या देशात जीवनमूल्ये शिकवणार्‍या, व्यवहारज्ञान शिकविणार्‍या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. शिक्षण क्षेत्रातली आजची स्थिति बघता स्वार्थ आणि मानवी मूल्यांची घसरण याच वरचढ होत आहेत.

हे तर स्वामी विवेकानंदांना तेंव्हाच कळलं होत. त्यांचाही या शिक्षण पद्धतीला विरोध होता. शिक्षणविषयी त्यांची मते आजही  डोळे उघडणारी आहेत. ते म्हणतात, “ आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे, व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर चार पाच विचार आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविलेत तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्‍या व्यक्तिपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल. जे शिक्षण सामान्य लोकांमध्ये चारित्र्यबल, सेवा, तत्परता आणि साहस निर्माण करू शकत नाही ते काय कामाचे? यामुळे किल्ली दिलेल्या यंत्रासारखे तुम्ही राबता. ज्यामुळे सामान्य  माणूस स्वताच्या पायावर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हाला हवे आहे”

हे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तंतोतंत लागू आहेत. आजच्या शिक्षण क्षेत्राला आणि देशाला पण .आजच्या घडीला भरकटलेला युवक, टंगळमंगळ करुन वेळ वाया घालविणारा युवक, दिशा नसणारा व ध्येय नसणारा युवक, रस्त्यारस्त्यात, चौकात हास्यविनोद करणारा, छेड छाड करणारा, आंदोलने, मोर्चे यात स्वार्थासाठी व कुणी संगितले म्हणून सहभागी होणारा युवक उद्याच्या भारताची चिंता आहे.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाढदिवस ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

 ? विविधा ?

?वाढदिवस ☘️ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ 

— कॅलेंडरची पानं वा-याने फडफडली,ती नीट करतांना लक्षांत आलं ..उद्या वाढदिवस आहे आपला..! त्या तारखेभोवती आतां लाल वर्तुळाची खूण करणार माणूसच नाही आता..मग आता वाढदिवसाच अप्रुपही फारस वाटत नाही.

–तरीही नेहमीप्रमाणेच साखर झोपेत असतांनाच माझ्या वाढदिवसाला, अंजलिच्या म्हणजे आमच्या लेकीच्या -“वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ग आई..!”

या फोननेच जाग आली.आणि मग दिवसभर नातवंड, जावई, माझी भावंड,मैत्रीणी,यांची शुभेच्छांची बरसातच सुरू झाली.

यानिमित्तानं झालेल्या संवादाच्या आनंदात हा दिवस संपूच नये,असं वाटत राहील ….एक वर्षानं वय वाढलंय आपलं..ही जाणीवही होत नाहीय….

 — खरं सांगायच तर…आयुष्य गिरक्या घेत पुढं सरकलं तरी प्रत्येक वर्षी या दिवसाच्या वळणावर मनं क्षणंभर विसावतच. धुक्याआड गेलेले चेहरे डोळ्यासमोर येतात. ज्यांच्यामुळेआपण आज आहोत, ज्यांचे हात सदैव आपल्या पाठीवर मायेने फिरतात असं वाटत, ते आपले जन्मदाते आईवडील, त्यांचे स्मरण प्रथम होत.अन् नकळत डोळे पाणवतात. स्मृतींचे पंख फडफडूं लागतात. आतांपर्यंत साजरे झालेले-केलेले घरातील सगळ्यांचेच वाढदिवस, -आम्हा उभयतांचे, मुलीचे, नातवंडांचे, सगळे-सगळेच आनंददायी क्षणं,आठवतात. अन् वाटत खरंच…

जीवन किती गतिमान आहे.बालपण, किशोरवयं, तारुण्यं, प्रौढत्व, त्यातून वृध्दत्वाकडे वाटचाल. हा प्रवास चालू असतो. निसर्गाच्या उत्पत्ती, स्थिती, लय, या तत्वाची जाणीवही असते प्रत्येकाला.! ऋतूमागून ऋतू जातात.

हिरव्या पानांचा रंग पिवळा होऊ लागतो.वयाप्रमाणे स्नेही-सोबती बदलत जातात. जुने मागे पडत जातात.नात्या-गोत्यांच रुंदावलेल वर्तुळ थोडं अंतरावरच राहत.अन् मनांत येत..वर्षांनुवर्ष साजरा होणारा वाढदिवस, आतां केवळ उपचार राहीला आहे का?मग वाढदिवसाचा आनंद विरघळू लागतो.भेटकार्डावरच्या शब्दांची भुरळ पडेनाशी होते. फुलदाणीत ऐटीत विसावलेल्या फुलांकडे पाहून, ती उद्या  कोमेजणार याने मनं कोमेजू लागलं तरं योग्य नाही.आपल्या नाठाळ मनाला समजायलाच हवं..आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण मनाने,बुध्दीने,वयाने परिपक्व होत जातो.आपल्या जगण्याला सकारात्मक दृष्टिकोन देत, कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या घेऊन जगणं आनंदाच करायच हे ठरवायचं ते वाढदिवशीच. या वळणावर क्षणंभर विसावतच मागे वळून पाहिलं अन् उत्सवाचे,आनंदीक्षणं, मनाच्या कुपीत हळूंवारपणे जपून ठेवले.नव्या उमेदीने पुढील आयुष्याची वाटचाल करण्यासाठी पाऊलं उचलतांना आतां मनांत वयाचा हिशोब नाही. याक्षणी मनांत फक्त प्रसन्नता झुळझुळतेय. सगळं धुकं विरुन लख्ख कांहीतरी समोर आल्यासारखी..! 

अन् मी कागदावर लेखणी टेकवली….

© सुश्री शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड- पुणे.

मोबा. ९५९५५५७९०८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगणे आपुल्याच हाती..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ जगणे आपुल्याच हाती..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

मानवीजीवन आजच्या तुलनेत पूर्वीचं चांगलं होतं का? आणि उद्याचं कसं असेल? चांगलं की वाईट? यावर चर्चा होत असताना ‘जुनं ते सोनं’ असं सर्रास ठासून सांगितलं जातं. हे खरं तर मला खूप एकांगी वाटतं.चांगलं म्हणजे काय? जे मनाला भावते, आनंद, समाधान देते ते. मन प्रसन्न करते ते.

इच्छा-आकांक्षा मनाशी बाळगून स्वप्नं पहातच प्रत्येक जण जगत असतो. इच्छापूर्ती मनाला समाधान देते. इच्छा पूर्ण नाही झाली तर अर्थातच मन उदास होते.स्वप्नांचंही तसंच. एखादं स्वप्न मनाशी बाळगून त्या दिशेने वाटचाल सुरू केली की माणूस जिवापाड प्रयत्न, कष्ट करीत रहातो.ध्येयपूर्ती स्वप्न सत्यात उतरल्याचं समाधान देते. प्रयत्न प्रामाणिक नसतील, परिस्थिती अनुकूल नसेल, तर या वाटचालीत येणाऱ्या अपयशामुळं स्वप्नभंगाचे दुःख मनात घर करुन रहाते.

जगण्याचे कांही कालातीत नियम आहेत.पेरल्याशिवाय उगवत नाही आणि जे पेरु तेचं उगवतं हा भूत, वर्तमान, भविष्य या त्रिकाळातील जगण्याला सारखाच लागू पडणारा एक महत्त्वाचा नियम.

मानवी जीवन म्हणजे सुखदुःख, यशापयश, अनुकूलता आणि प्रतिकूलता या साऱ्यांचा पाठशिवणीचा खेळच असतो. आणि इतर खेळांसारखाच हा खेळही खिलाडूवृत्तीने खेळणेच अपेक्षित असते. तरच या खेळातील हार किंवा जीत सारखाच आनंद देते.

काळ भूत, वर्तमान,भविष्य कोणताही असो या जीवन प्रवासाचे नियम सारखेच असतात. त्यामुळे मानवी जीवन भूतकाळात कसं होतं?चांगलं की वाईट याचं उत्तर हे किंवा ते इतकं सरळ साधं असूच शकत नाही. शिवाय मानवी जीवन चांगलं कि वाईट हे आपण आपल्या वर्तमानाच्या तुलनेतच ठरवणार असतो. त्यामुळे आजच्या तुलनेत तेव्हा काय चांगलं होतं किंवा वाईट होतं याचा विचार करणे हे ओघानंच आलं.आणि असं झालं तर त्यातून मिळणारं उत्तर फसवंच असणार.कारण भूतकाळातला ‘मी’ आणि वर्तमानकाळातला ‘मी’ दोन्ही एकच व्यक्ती असूनही परस्पर भिन्न व्यक्तिमत्त्वे वाटावीत इतका जमीन-अस्मानाचा फरक आपल्यात पडलेला असतो. काळानुरूप होत गेलेले, स्वीकारले गेलेले जीवनशैलीतील बदल आता अंगवळणी पडलेले असतात. त्यामुळे घराचं घरपण, नात्यांची घट्ट वीण, आपले प्राधान्यक्रम, खानपानाच्या सवयी, या सगळ्यातच आमूलाग्र बदल झालेला असूनही जर आज मी आनंदात असेन आणि आजच्या सुखसोयी,स्वास्थ्य, आर्थिक सुबत्ता, वैचारिक स्वातंत्र्य, हे सगळं इतक्या मुबलक प्रमाणात तेव्हा नसतानाही तेव्हासुध्दा जर मी आनंदात असेन तर तो आनंद नेमका कशामुळे निर्माण होत होता याचा मूलभूत विचारच आपल्यापुढील प्रश्नाचे नेमके उत्तर शोधायला मदत करू शकेल.

काळ कोणताही असो आपण जगतो कसे यावरच आपल्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणूनच मानवी जीवन चांगलं किंवा वाईट हे नेहमीच व्यक्तिसापेक्ष असतं. तरीसुद्धा सर्वांसाठीच आनंदापेक्षाही कृतार्थता जास्त मोलाची असते. आयुष्याच्या संध्याकाळी, मागे वळून पाहताना आपल्या जगण्याचा लेखाजोखा मनोमन मांडत असता जर मनाला कृतार्थ समाधान मिळालं तरच आपलं भूतकाळातलं जीवन चांगलं होतं असं म्हणता येईल.ती कृतार्थता नसेल तर मात्र ते चांगलं असू शकणार नाही.

आपण कसं जगायचं हे आपल्याच हाती असतं. अनुकूल परिस्थिती असूनही जे नाही त्याबद्दल दुःख करत बसणारी माणसं जशी असतात तशीच प्रतिकूल परिस्थितीतही संकटांशी हिमतीने दोन हात करीत जगताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधत, सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करताना त्यांच्याही आयुष्यात आनंद पेरीत समाधानानं जगणारी माणसेही असतात. या दोन परस्पर विरुद्ध प्रवृत्ती म्हणता येतील. या प्रवृत्तींनुसार जीवन चांगलं किंवा वाईट असणार हे ओघानंच आलंच. आणि याच दोन्ही प्रवृत्ती भूत, वर्तमान, आणि भविष्यकाळातही असणारच आहेत.

कृतार्थतेचा आनंद मिळवण्यासाठी आयुष्यभर कालातीत महत्त्व असणारी जीवनमूल्ये असोशीने सांभाळणे अगत्याचे आहे. हे जर घडलं तरच आजच्या बालपिढीचं भविष्यकाळातील मानवी जीवन नक्कीच सुखकर, चांगलं असेल. पण त्या जीवनमूल्यांचे संस्कार करण्याची जबाबदारी मात्र आपल्यासारख्या अनुभवाने ‘शहाण्या’ झालेल्या पिढीचीच आहे हे विसरून चालणार नाही. 

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! साखरभाताची साखर झोप ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? साखरभाताची साखर झोप! ?

“अगं जरा ऐकतेस का !”

“तुमचच तर ऐकत आले आहे जन्मभर !”

“हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.”

“मग काय उत्तर अपेक्षित आहे गुरुवर्यांना ?”

“हे s s च ! मी म्हणतोय नां ते हे s s च ! ते व्हाट्स ऍपवर तुमच्या महिला मंडळाच्या “खुमखूमी” ग्रुपवर सारखे, सारखे पुणेकरांवरचे पुणेरी विनोद वाचून, तुझी भाषा जन्माने जरी तू अस्सल गिरगावकरीण असलीस, तरी आता साध्या साध्या प्रश्नांची उत्तर देतांना पण, पुणेरी भाषेत द्यायला लागली आहेस !”

“आता या विषयावर, बेडवर पडल्या पडल्या, रात्री अकरा वाजता माझं बौद्धीक घेणार आहात कां ?”

“अगं, काही जणांची मराठी जशी इंग्राजळलेली असते, तशी तुझीही मराठी आता साधं साधं बोलतांना पण, मुळा मुठेच्या पात्रात डुबकी मारल्या सारखी बोलायला लागल्ये, कळलं ?”

“इ s s श्श ! हल्ली मुळा मुठेच्या पात्रात चुळ भरण्या इतकं सुद्धा पाणी नाहीये, त्यात मी मेली डुबकी कशी काय मारणार ?”

“हे तुला कुणी सांगितलं?”

“अहो परवा लेले काकी गेल्या होत्या पुण्याला, त्या सांगत होत्या !”

“काय ?”

“त्यांची गाडी नदीच्या पुलावरून जातांना, त्यांनी भक्तीभावाने एक पाच रुपयाचं नाणं, चालत्या गाडीतून नदी पात्रात टाकलं !”

“मग ?”

“मग काय मग, खालून एका माणसाचा किंचाळण्याचा आवाज आला ! म्हणून त्यांनी ड्रायवरला गाडी थांबवायला सांगितली आणि त्या खाली नदी पात्रात डोकावून पाहायला लागल्या आणि बघतात तर काय ?”

“काय ?”

“अहो त्यांनी फेकलेलं ते नाणं पात्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या कपाळाला लागून, त्यातून रक्त येत होतं !”

“बापरे !”

“त्या मग तशाच धावत गाडीत बसल्या आणि त्यांनी ड्रायवरला गाडी हाणायला सांगितली !”

“हा s णा s य s ला ! काय ही तुझी भाषा ? मी मगाशी जे म्हटलं ते काही अगदीच खोटं नाही ! अगं गिरगांवातल्या गोरेगावकर चाळीला स्मरून, निदान दामटवायला, हाकायला असं तरी म्हणं गं !”

“त्यानं काय फरक पडणार आहे ?”

“जाऊ दे, तुझ्याशी या विषयावर आत्ता वाद घालण्यात अर्थ नाही ! गूड नाईट !”

“अरे वा रे वा, असं कसं गुड नाईट !”

“म्हणजे ? मी नाही समजलो !”

“अहो आत्ता माझा चांगला डोळा लागत होता, तर तुम्हीच नाही का, ‘अगं ऐकतेस का?’ असं बोलून माझी झोप उडवलीत ती !”

“अरे हॊ, आत्ता आठवलं. तू उद्यासाठी जो ‘साखरभात’ करून ठेवला आहेस नां, तो जरा चमचाभर आणून देतेस का ?”

“आत्ता ? रात्री अकरा वाजता ? अहो वाटलं तर सकाळी नाश्त्याला घ्या तो आणि जेवतांना पण घ्या की, आत्ता कशाला उगाच रात्री झोपताना तुम्हाला चमचाभर साखर भात हवाय ?”

“अगं त्याच काय आहे नां, आमच्या मास्तरांनी ‘साखरझोप’ ह्या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला आहे !”

“बरं, मग ?”

“मग काही नाही, म्हटलं अनायासे तू आज साखरभात केलाच आहेस, तर तो थोडा खाऊन झोपीन ! म्हणजे रात्री साखरझोप लागून, सकाळी त्यावर काहीतरी लिहिता येईल असा एक सुज्ञ विचार मनांत साखर पेरून गेला इतकंच !”

“अस्स होय ! आता आमच्या ह्या प्रौढ ढ विद्यार्थ्यांची मलाच मेलीला काळजी घेतली पाहिजे ! नाहीतर उगाच मी त्याला आत्ता साखरभात दिला नाही, म्हणून तो जर उद्या परीक्षेत नापास झाला, तर त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडून मोकळा व्हायचा !”

असं बोलून बायको किचन मधे गेली आणि बाउल मधे साखरभात घेवून आली. मी पण विजयी मुद्रेने तो बाउल घ्यायला हात पुढे केला आणि धाडकन बेडवरून खाली पडलो!

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२८-०१-२०२२

ताजा कलम  – या पुढे भविष्यात प्रौढ शिक्षणाच्या मास्तरांनी, ‘झोप’ या विषयाला धरून निबंध लिहायला सांगितला, तरी त्या विषयी आज जागेपणी, काहीही न लिहिण्याचा मी संकल्प करत आहे !

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोडवा बंधनाचा… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ गोडवा बंधनाचा… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

गोडवा बंधनाचा

दिवस संक्रांतीचा

मधुर वाणीचा

रंग उडत्या पतंगाचा

बंद दाटल्या नात्यांचा

संक्रांतीच्या शुभेच्छांच्या अनेकविध चारोळ्या मध्ये ही चारोळी मला उंच आकाशात घेऊन गेली.अगदी आकाशात विहरणाऱ्या पतंगांजवळ. विविधरंगी उडत्या तबकड्याच त्या !! पतंगांच्या हवेत  डोलणाऱ्या  शेपट्याच्या मोहक हालचालींना मीही मनोमन डोलू लागले.

गदिमांच्या ‘बाई मी पतंग उडवीत होते’ या गाण्याची आठवण झाली ‘हसू फेसाळ घुसळीत अंग’ असे म्हणत लावणी गाणाऱ्या जयश्री गडकर चा चेहरा  डोळ्यासमोर आला.

मनातल्या मनात त्या लावणीचं रसग्रहण चालू होतं

काटा-काटीनं आला ग रंग

हसू फेसाळ घुसळीत अंग

दैव हारजीत घडवीत होते

सूर ताल लय आणि लावणीचा ठसका यांचा फेर धरून मनात नाच चालला होता पण मला अचानक ठसका लागला तो त्या गाण्याचा भावार्थ जाणून….

चढाओढीनं चढवलेले, हवेत स्थिरावलेले,मुक्त विहार करणारे ,इंद्रधनुष्याचा सडा टाकणारे हे पतंग शेपटीचा रुबाब दाखवत जेव्हा नयनसुख देतात तेव्हा गाण्यातील एक ओळ काळजाचा ठोका चुकवते…

माझ्या दोऱ्याने तुटला दोरा

एक पतंग येई माघारा

गेला गुंतत गिरवीत गोते

आकाशात स्थिरावलेला अचानक गोते खात माघारी येणारा, पुन्हा जमिनीच्या कुशीत शिरणारा, क्वचित प्रसंगी झाडाच्या कवेत जाणारा, आयुष्याच्या शेवटी गुंतत गोते खाणारा हा पतंग मला विचारांच्या गर्तेत लोटू लागला.

वरवर स्वच्छंदी वाटणारा हा पतंग स्वातंत्र्य उपभोगतो का? नाही..तोही हवेच्या मूडचा गुलाम… त्याचा आधार म्हणजे मांजा. लोकांना पतंग दिसतो पण ज्यामुळे तो आकाशात फिरवतो तो मांजा दिसत नाही.

पतंगाचे आकाशात उडणे हेदेखील मांजा वर अवलंबून असते मांजाची लांबी पतंगाच्या आकाशाच्या गवसणीला प्रतिकार करते.

पतंग जसा जसा उंच जाऊ पाहतो तशी तशी मांजाची शक्ती( लांबी) अपुरी पडू लागते. जोवर तो एकटा तरंगत असतो तोवर तो विहरतो जणू त्याचे साम्राज्य आहे पण हळूहळू तिथे स्पर्धा सुरू होते. आता तो एकटा नसतो इतर पतंग त्याच्याशी काटा-काटी खेळतात .एक प्रकारचे युद्ध सुरू असते. तो मांजाचे ऐकत नाही. मांजाची शक्ती निष्प्रभ ठरते त्याच्या बेताल वागण्या पुढे! मांजा हात टेकतो. दुर्बल मांजाला दुसऱ्या पतंगाचा मांजा कापतो आणि घडायचे तेच घडते.

क्षणार्धात पतंग माघारी येतो मांजाचे बंधनच त्याला मुक्तीचा आनंद देत होते हे त्या मदमस्त पतंगाला कळू नये का?

आकाशात उडत असलेले पक्षी देखील स्वातंत्र उपभोगत नाहीत. त्यांच्याही पंखाखाली हवेचा दबाव आहे. ती त्याना  दाबते.  ठराविक मर्यादेपलीकडे पक्षीसुद्धा आकाशात जाऊ शकत नाही एका ठराविक उंचीपर्यंत एकांत त्याच्यापुढे एकाकीपण……

बंधन हे बंधन न मानता ते सुरक्षाकवच मानून मुक्तीचा आनंद घेतला तर कसे?

थेंब जेव्हा महासागर होतो त्या क्षणी तो सागराचं बंधन स्वीकारतो.

हीच गोष्ट संक्रांत संक्रमित करत असेल का?……..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कार ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ संस्कार ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

राधाबाई गोपाळराव गद्रे हे त्यांचे नाव! गोपाळराव म्हणजेच आप्पा! राधाबाई हे त्यांचे नाव कधी वापरात आलेच नसावे. त्यांच्या लग्नानंतर सुरुवातीला त्या धाकट्या वहिनी होत्या. पण दिरांची जसजशी लग्ने होत गेली,तशी त्या धाकट्या वहिनी पण राहिल्या नाहीत आणि कालांतराने त्यांचे आप्पा वहिनी,आप्पा मामी, आप्पा काकू, किंवा सुनंदा नाहीतर दिलीपची आई ,अथवा वृंदाच्या सासुबाई असे नामाभिधान झाले.

तर हे त्या आप्पा वहिनींचे मी रेखाटलेले चित्र…… अतिशय कमी, कामापुरतेच बोलणाऱ्या… हो-नाही मानेनेच म्हणणाऱ्या , आप्पा वहिनी!… “तिचा शब्द म्हणजे अगदी शंभर रुपये तोळा.”असं कधीतरी मी सासुबाईंकडून ऐकलं होतं.

त्यांना खळखळून हसताना…. जोरजोरात गप्पाटप्पा करताना…. कडाडून भांडताना… दंगा करणाऱ्या आपल्या मुलांवर संतापून ओरडताना…. किंवा सुनेबरोबर आवाज चढवून तू तू मैं में करताना… एकूणच वातावरण कधी कर्कश्य तर कधी नादमय करताना…. बहुतेक कुणी पाहिलं किंवा ऐकलं ही नसेल. चेहऱ्यावर कायम एक हलकसं स्मित हास्य… बस तेवढंच! त्यामुळे त्या एक शांत, संयमी व्यक्तिमत्वाचा धनी वाटायच्या.

माझ्या लग्नाला चार-सहा महिनेच झाले होते. मी दिल्लीहून माझी बँकेतली नोकरी सोडायला सांगलीला आले होते. त्यांनी मला एकदा जेवायला बोलावले होते.’ ‘जावेला मदत करून इम्प्रेशन मारूया,’ असा विचार करून मी जरा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले. स्मितहास्याने  माझे स्वागत झाले. पण बघते तो काय इतर सगळे स्वयंपाकाचे काम संपून स्वयंपाक- काकू पुऱ्या तळत होत्याआणि आम्हा दोघींना करण्यासारखे कोणतेच काम शिल्लक नव्हते. मग कॉफी पिता पिता मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की मी एकटीच बडबडतेय… आमच्यात संवाद होतच नाहीय. कारण समोरची व्यक्ती फक्त ‘ गुड लिसनर’  आहे. हे बघून मूड खराब झाल्याने मी गप्पच बसले….मला जांभया येऊ लागल्या.तेवढ्यात एक मासिक आणून त्यांनी माझ्या हातात ठेवले.”बस वाचत, जेवायच्या वेळेपर्यंत” असं म्हणून त्या तेथून निघूनही गेल्या. जेवताना त्या सहजच बोलून गेल्या कि त्यांना रहस्यकथा,हेर कथा वाचायला खूप आवडतात. तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खूप गुढ, गहन, गंभीर काहीतरी आहे, असं मला सारखं वाटत आलंय.

त्या अशा अबोलीचं फुल होऊन कशा राहू शकतात?.. हा विचार करताना मला असं वाटायला लागलं की भगवद् गीतेतत स्थितप्रज्ञाची जी लक्षणे आहेत, ती त्यांच्यावर बरोबर फिट् बसतात. ‘न उल्हासे न संतापे ‘.. किंवा ‘सुख-दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौ’.. इत्यादी, इत्यादी…..

खरंच, त्या एका स्थितप्रज्ञाचंच आयुष्य जगल्या. संसाराच्या रहाट-गाडग्यात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सर्वांसारखंच त्यांनाही तोंड द्यावं लागलं. पण नेहमीच्या चिरपरिचित हास्यानंच त्या त्यांना सामोऱ्या गेल्या. कधी त्याबद्दल कोणाकडे तक्रारही केली नाही.

वृद्धावस्था आली. पंच्याहत्तरीपर्यंत व्यवस्थितच होत्या. हळूहळू विस्मरण होऊ लागलं. पण वयाचा विचार करतात ते नॉर्मल होतं. खरी दैव लीला पुढंच आहे. तो वरती बसलेला क्रीडाशिक्षक, नाटककार माणसाला काय काय खेळ  खेळायला, नाटकं करायला भाग पडतो ते सगळं अतर्क्यच असतं.

जन्मभर मौन व्रत धारण करायला लावणाऱ्या त्या मातेला देवानं नंतर अखंड बडबड करण्याचं व्रत करायला भाग पाडलं. या खेळाची वेगळीच इनिंग चालू झाली. स्वतः लहान मुलगी असल्यासारखं बडबडणं, मुलाला बाबा बाबा म्हणून भरवायचा हट्ट करणं, अशी नाटकंही सुरू झाली. त्यामुळं त्या एका वेगळ्याच विश्वात वावरत आहेत असं सगळ्यांना जाणवू लागलं. दिवसेंदिवस याची तीव्रता वाढतच गेली.  जाग्या असेपर्यंत अखंड, अविश्रांत बडबड,… प्रथम वाक्यं होती,…नंतर शब्द थोडे तरी कळणारे!… त्यानंतर असंबद्ध बडबड,…. ओरडणे, दूरपर्यंत ऐकू जाईल असे…. आणि थकून गेल्या की झोपी जाणे!…. जवळजवळ अडीच वर्षं या बडबडव्रताचे पालन चालू होतं.

मला सांगायची संस्कार ही गोष्ट या पुढंच आहे.साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट..संक्रांतीचा दिवस…. वडीलधाऱ्यांना त्यांच्याकडे जाऊन तिळगुळ देऊन नमस्कार करायची माझी पद्धत. त्या प्रमाणे त्यांच्या खोलीत गेले…. बसलेल्या होत्या.. थोडासा तिळगुळ त्यांना भरवला आणि नमस्कार करायला वाकले,…. क्षणार्धात एक आशिर्वाद देणाऱ्या हाताने माझ्या डोक्याला स्पर्श केला. चमकून मी वर बघितलं .तर एक नेहमीपेक्षा वेगळेच प्रसन्न हास्य चेहऱ्यावर धारण केलेली ती महिला मला मुकेपणाने खूप चांगलं काहीतरी सांगून गेली होती. जिला शब्दातून भावना व्यक्त करता येत नव्हत्या, तिची देहबोली खूप काही सांगून गेली होती.

हे सगळं माझ्या मनाला इतकं स्पर्शून गेलं आणि जो एक अवर्णनीय आनंद मला झाला त्याला तोड नाही. विचार करणारी बुद्धी आणि भावना व्यक्त करणारं मन ज्या मेंदूत( हृदयात नाही.) असतं, त्या मेंदूनं प्रतिक्रया द्यायलाही त्यांना समर्थन केलं होतं. आणि  त्यांना एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवलं होतं. त्या मेंदूला हुलकावणी देत आणि वाकुल्या दाखवत त्यांनी मी केलेल्या नमस्काराचं डोक्यात हात ठेवून दिलेले उत्तर, मला वेगळाच संदेश देऊन गेलं.याला विज्ञानाच्या भाषेत प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणत असतील ही, पण मला वाटलं की हा एक संस्कार होता. त्यांच्या शरीरावर लहानपणापासून झालेला संस्कार! कितीतरी वेळा असे आशीर्वाद त्यांना मिळाले असतील आणि त्यांनी दिले ही असतील. आणि  सगळं काही विसरून बसलेल्या त्या… पण त्यांच्या शरीरानं त्यांच्या हाता कडून मेंदूला आणि अप्रत्यक्षपणे त्या परमेश्वराला पण हूलकावत आशीर्वाद देण्याचा संस्काराची जणू पूर्तीच केली होती. हे संस्कार कधी शिकून, वाचून, प्रयत्न करून येत नाही तर जीवनानं शरीराला त्याच्या नकळत दिलेली ही एक देणगी असते.

आता आप्पावहिन या जगात नाहीत. पण गेल्या दोन वर्षापासून जेव्हा कधी मला त्यांची आठवण येते तेव्हा तो आशीर्वादाचा हात आणि त्यांची त्यावेळची अतिप्रसन्न मुद्राच माझ्या डोळ्यासमोरून तरळून जाते…. आणि पुढेही जाईल.

* समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पंडीत बिरजु महाराज ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

 

?विविधा ?

☆ पंडीत बिरजु महाराज ☆ सौ राधिका भांडारकर ☆

प्रसिद्ध कथ्थक कलाकार पंडीत बिरजु महाराज यांचे वयाच्या ८३व्या  वर्षी नुकतेच निधन झाले…

जणू भारतीय संगीताची लयच थांबली.

सूर मुके झाले.

भाव शून्य झाले..एक विलोभनीय मुद्रा लोप पावली..

कथक नृत्य हा शब्द उच्चारताच,बिरजु महाराजांचेच नाव ओठावर येते.कथ्थक आणि बिरजु महाराज यांचे असे घट्ट नाते होते.

नृत्याला अभिजात कला न मानता,केवळ अंगविक्षेप म्हणून हेटाळणी केली जायची. त्या काळात,बिरजु महाराजांनी नृत्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.नृत्यकलेतील अस्सलअभिजातता त्यांनी जपली.

शिवाय नृत्य हे स्त्रियांनी करण्याचा प्रकार आहे.

पुरुषांच्या जातीला हे बरोबर नव्हे,अशा मध्ययुगीन मानसिकतेला बिरजु महाराजांचे नृत्यमय  आयुष्य हे एक पद्धतशीर प्रभावी ऊत्तर आहे.

गायन ,वादन, व नृत्य याचा एकत्रित अविष्कार म्हणजे संगीत.पण गायन आणि वादनाकडे प्रतिष्ठेने पाहिले जाते.त्यामानाने नृत्याला ही प्रतिष्ठा फार उशीरा प्राप्त झाली.

बिरजु महाराज हे लखनौ घराण्यातील प्रमुख प्रतिनिधी होते.कालिकाबिंदादीन या घराण्याची गौरवशाली परंपरा त्यांनी जपली आणि जगभर त्याचा प्रसार केला.

बिरजुमहाराजांचे मूळ नाव, ब्रिजमोहन मिश्रा.

४फेब्रुवारी १९३८रोजी त्यांचा कथ्थक कुटुंबात जन्म झाला.त्यांचे वडील अच्छान महाराज आणि काका शंभुराज हे ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध कलाकार होते.वडीलांचे अकाली निधन झाल्यामुळे बिरजु महाराजांवर लहान वयात कुटुंबाची जबाबदारी येउन पडली.त्यांनी कथ्थक नृत्याचे धडे आपल्या काकांकडून घ्यायला सुरवात केली.

त्यांचे आयुष्य म्हणजे एक ध्यास होता. शास्रीय नृत्याचा..कथ्थक नृत्याविषयी त्यांनी समाजभान जागृत केले. कोठीतले नृत्य म्हणून ओळख असणार्‍या कलेला त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले.

त्यांनी अनेक शिष्य घडवले.

या वयातही त्यांचा नृत्याविष्कार तरुणांना लाजवेल इतका लोभस होता..

सरकारने त्यांना पद्मविभूषणाने गौरवले.

पुण्याच्या कला आणि आध्यात्म जगताने त्यांना लक्ष्मी—वासुदेव—कलाभूषण पुरस्कार दिला.

बिरजु महाराज यांनी अनेक बाॅलीवुड चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. उमराव जान,बाजीराव मस्तानी, देढ ईश्कीया या चित्रपटांतील त्यांनी दिलेले नृत्याविष्कार हे अत्यंत प्रेक्षणीय आणि विलोभनीय आहेत…

दिल्लीत कलाश्रम नावाचे नाट्य विद्यालय त्यांनी सुरू केले..या माध्यमातून अनेक शिष्य घडले,घडत आहेत आणि कथ्थक या भारतीय नृत्यकलेची परंपरा जपली जात आहे..

बिरजुमहाराज हे कथ्थक गुरु तर होतेच.

पण ते उत्कृष्ट गायक होते.तबला,सरोद,व्हायोलिन या वाद्यांचे निष्णात वादकही होते.उत्तम दर्जाचे चित्रकार होते.तसेच कोशाकार,लोकसाहित्याचे अभ्यासक,संग्राहक आणि संपादकही होते..

गुरुंकडून मिळालेली विद्या,असामान्य प्रतिभा,आणि अं त:प्रेरणा या त्रयींवर त्यांनी कथ्थक नृत्याचे नवनवे प्रयोग केले.

दरबारातली ही कला त्यांनी रंगमंचावर आणली.

बिरजु महाराज यांचे नृत्य पहाणे म्हणजे स्वर्गीय आनंद असायचा.त्यांच्या मुद्रेवरच्या सहज सुंदर रेषा,अप्रतीम पवित्रे,म्हणजे एक चित्रशिल्पच.

मोराच्या गतीत जेव्हां ते चालत,तेव्हां खरोखरच लखलखीत पिसार्‍याचा डौलदार मोरच आपल्यासमोर नाचतोय असे वाटायचे…इतके सुंदर त्यांचे भावांग…

“मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो.कारण बंगालमधे मी माझ्या कलेचा आरंभ केला.पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिला..”

हे त्यांचे नम्र उद्गार आहेत…

आज हा महान कलाकार ,नृत्य सम्राट,कथ्थक नृत्य कलेचा सरताज अनंतात विलीन झाला..

जातो तो कलाकाराचा नश्वर देह..

पण त्यातला कलात्मा अमर असतो..!!

त्या देवत्वाचा अंश अंतहीन असतो..

या कलेच्या देवतेला आदरयुक्त श्रद्धांजली…???

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares