मराठी साहित्य – विविधा ☆ “सकल उलट चालले….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “सकल उलट चालले…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

सुमारे पन्नासेक वर्षांपूर्वी एक व्यंगचित्र मालिका दिवाळी अंकात आली होती. त्यातील कल्पना होत्या  श्री पु ल देशपांडे यांच्या आणि ती चित्रे रेखाटली होती व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडुलकर यांनी आणि त्याचे शीर्षक होते,

‘सकल उलट चालले’

आज ते शीर्षकच आठवतंय. कारण आज समाजाच्या परिस्थितीत मला समाजाचा उलटा प्रवास दिसतो आहे.

आमच्या प्राथमिक शाळेत आम्हाला एक धडा होता त्याचं नाव होतं ‘गर्वाचे घर खाली’. त्याकाळी गर्व हा एक दुर्गुण समजला जात असे. त्या धड्यात मारुतीने भीमाचे गर्वहरण कसे केले याची कथा होती. थोडक्यात काय तर गर्व हा दुर्गुण समजला जात असे. आज मात्र सर्व प्रसार माध्यमे आणि सगळ्या ठिकाणी प्रत्येक जणच ‘मी अमुक-तमुक असल्याचा मला गर्व आहे’ असे बोलत असतो.  दुर्गुणाला सद्गुण ठरवण्याचा आजचा काळ. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते

‘सकल उलट चालले’

जरा मोठे झाल्यावर आमच्या हायस्कूलमध्ये काही गडबडगुंडा करणारी मुले, त्यांनी काही चुकीचे कृत्य केल्यास आमचे शिक्षक म्हणायचे “का रे,  माज चढला का तुला? दोन छड्या मारून तुझा सगळा माज उतरवून टाकेन”.  म्हणजे  माज हा शब्द दुर्गुण समजला जात असे.  विशेषत: हा शब्द जनावरांसाठी वापरला जात असल्याने, माणसाला पशूच्या जागी कल्पून हे दुर्गुणात्मक विशेषण लावले जात असे.  परंतु आज कित्येक जण स्वतःचा उल्लेख करताना सुद्धा “मला अमुक-तमुक असल्याचा गर्वच नाही तर माज आहे”  असा उल्लेख अभिमानाने करतात म्हणूनच असे म्हणावेसे वाटते

‘सकल उलट चालले’

भाषे मधले अनेक गलिच्छ शब्द पूर्वी असभ्य समजले जायचे. परंतु सर्व असभ्य समजले जाणारे अनेक शब्द आज सर्रास प्रसिद्धी माध्यमांवर मोठमोठ्या सुशिक्षित सुजाण म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या तोंडी दिसतात. त्याच प्रमाणे अनेक प्रकारच्या सोशल मीडियावर विविध मजकूर पाहणारे लोक त्यांना न आवडणाऱ्या मजकुरावर अत्यंत गलिच्छ आणि अश्लील समजल्या जाणाऱ्या भाषेमध्ये स्वतःच्या कॉमेंट करताना आढळतात.  याला ट्रोलिंग करणे असे म्हणतात, असे म्हणे ! काही का असेना परंतु आमच्या काळी चार चौघात उच्चारणे जे असभ्य समजले जायचे तसे आता समजले जात नाही.  ही समाजाची प्रगती ही पीछेहाट की दुर्दैव ?

आज आपण पाहतो आहोत आणि चर्चिलेही जाते की राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे.  परंतु समाजातील विविध प्रकारचे नेते म्हणून समजले जाणारे, त्याच प्रमाणे उद्याचे नेते म्हणून उल्लेख केले जाणारे किंवा गल्लोगल्ली नेत्यांच्या पोस्टरवर त्यांचे कार्यकर्ते म्हणून ज्यांचे फोटो मिरवले जातात, अशांची व्यवहारातली भाषा पाहिल्यास, आमच्या वेळी असभ्य शिवराळ समजली जाणारी भाषा सध्या सर्रास अनेकांच्या तोंडी दिसून येते. त्यामुळे हा समाजाचा प्रवास सभ्यते कडून असभ्यतेकडे चालला आहे असे म्हणावेसे वाटते.

एकूणच संपूर्ण समाजाचेच गुन्हेगारीकरण चालू आहे काय ?  असे विचारावेसे वाटते.

किंबहुना भाषेचेही गुन्हेगारीकरण चालू आहे काय?  सर्वसामान्य माणसाच्या तोंडी गुन्हेगारांची भाषा ऐकू येते काय?  अशी शंका घ्यायला जागा आहे.

हे समाजाचे स्वरूप असेच बिघडत जाणार आहे काय ?

मग सुप्रसिद्ध कवी कै नामदेव ढसाळ यांच्या ‘माणसाचे गाणे गावे माणसाने’ या कवितेचा पूर्वार्ध सतत डोक्यामध्ये रुंजी घालायला लागतो. कै नामदेव ढसाळ यांच्या द्रष्टेपणाला सलाम करावा वाटतो.

अर्थात त्यानंतर त्यांच्या कवितेचा उत्तरार्धही खरा ठरावा असे मनापासून वाटते.  मग आम्ही म्हणतो की नंतर तरी  माणसे गुन्हेगारी सोडून माणसाचेच गाणे गातील काय ?

आमच्या जिवंतपणी तरी ही वेळ येईल असे दृष्टीपथात येत नाही.  परंतु आमची मुले-नातवंडे तरी माणुसकीने वागवली जातील काय हाच प्रश्न मनाला कुरतडत असतो.

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

Email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गांधीजी…एक स्मरणगाथा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “गांधीजी…एक स्मरणगाथा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आज 30 जानेवारी,. गांधीजींची पुण्यतिथी. स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी महात्मा गांधी ह्याचं नाव अग्रस्थानी घेता येईल.आपल्या आधीची पिढी जास्त भाग्यवान. त्यांनी अशा अनेक थोरपुरूषांची कामगिरी स्वतः बघितली, जवळून अनुभवली.आमच्या पिढीपासून बाकी सगळ्यांना त्यांची थोरवी वाचून त्यांची महती कळली.मात्र आमच्या पिढीपासून कोणाला पारतंत्र्याची झळ पोचली नाही.

राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या अहिंसा, सत्यवचन,द्रुढनिर्धार ह्या गुणांपैकी सगळ्यात जास्त मला भावलेला गुण म्हणजे त्यांचे सत्यवादी असणे.

कधी आपण आपल्या स्वतः च्या भुमीकेसाठी स्वतःच्या नजरेतून योग्य असतो,तेव्हा कदाचित दुसऱ्याच्या नजरेतून आपण चुकीचे असतो.पण आपले अंतर्मन आपल्याला सत्य सांगत असते फक्त ती स्विकारण्याची आपल्यात ताकद हवी.खूपदा आपण आपल्या चूका मनातल्या मनात  कबूल करीत असतो पण ती जगासमोर मांडण्याचे धारिष्ट्य आपल्यात नसतं.आणि इथेच आपल्या सारख्या सामान्य माणसापेक्षा ह्या सत्यवादी महापुरूषाचे वेगळेपणं उठून दिसतं.

अगदी कधीही वेळात वेळ काढून महात्मा गांधींचे आत्मव्रुत्त म्हणजेच “सत्याचे प्रयोग”हे पुस्तक वाचा.त्यात त्यांच्या हातून घडलेल्या चूका त्यांनी नुसत्या सांगितल्याच नव्हे तर पुस्तकात छापून जगजाहीर केल्या आहेत.सहसा केलेल्या चूका लपविणारी खूप माणसे बघितली पण आपल्या चूका कोणाला माहीत नसूनही पुढच्या कित्येक पिढ्यांसमोर जगजाहीर होतील हे समजून उमजून देखील पुस्तकांत छापणारा अवलिया आगळावेगळाच.

गांधीजींवरील पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेले पुस्तक पण खुप वाचनीय. वाचले नसेल तर जरूर वाचा एवढच म्हणेन.

खरोखरच अशा वेगवेगळ्या गुणांच्या छटा असलेले अनेक थोरपुरूष या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झटले,लढले म्हणून आजचा हा स्वातंत्र्यात असलेला  सोनियाचा दिन आम्हा लोकांना दिसतोय.अशा ह्या सगळ्या थोरपुरूषांना आमचे कोटी कोटी प्रणाम.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझ्या मनांतील राम” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? विविधा ?

“माझ्या मनांतील राम” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण विश्वात नोंदवला गेला. पाचशे वर्षापासून प्रलंबित असलेले राममंदिर अखेर पूर्ण होऊन त्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनमोहक, सुहास्यवदन, राजीव लोचन असलेली रामलल्ला बालमूर्तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.या अशा एका ऐतिहासिक क्षणाने दाखवून दिले आहे की धर्म आणि श्रध्दा कधीही तसूभर कमी होत नाही.सत्य आणि न्याय यांचाच विजय होत असतो.

ज्याला शब्दरूपी चित्रित केलं महर्षी वाल्मिकींनी, ज्याला मोठ्या कौतुकाने, प्रेमानं गायलं तुलसीदासांनी, समर्थांनी ज्याला आळवलं असा प्रभू श्रीराम, ज्याने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, रावणाचा तसाच कित्येक राक्षसांचा वध केला असा प्रभू श्रीरामचंद्र, सृष्टीवरच्या अवघ्या जीव-जंतुना ज्याने कृतार्थ केले आणि करत राहतो असा प्रभू श्रीरामचंद्र. कित्येक जणांनी त्यावर लिहिलं, गायलं, चित्रित केलं, त्यावर लिहिण्याचा, त्याचा नाम गाण्याचा, त्याच रूप चितरण्याचा तसा कित्येक माध्यमातून अनेक प्रकारे अनुपम आनंद लुटला, तरी तो नेहमीपेक्षा फार फार वेगळा उरतो. त्याच्या नामाची ओढ खुणावत राहते, रूपाची माधुरी भुरळ घालत राहते. दरवेळी नव्याने…

ज्याची तुलनाच होऊ शकत नाही अस सौंदर्य, पराक्रम, कृपा, असणारा प्रभू श्रीरामचंद्र तो मुळी दिसतोच रामासाररखा…

अनेक संत, महात्मे, भक्तांच्या मांदियाळीने ही रामकथा ओघवती प्रवाही नि जीवंत ठेवली. त्यात तुलसीराम, एकनाथ भागवत, समर्थ रामदास, गोंदवलेकर महाराज या सारखे अनेक रामभक्तांचं अपूर्व योगदान आहे.श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर तर अनेक ग्रंथ पूर्वीपासून उपलब्ध आहेत आणि आजही त्यात नव्याने भर पडत असतेच.आजच्या काळाशी, समाजमनाशी, त्यांच्या जीवनव्यवहाराशी सुसंगत जोडली जाते.ते अभ्यासक, लेखक, संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार, प्रभूर्ती आपआपले विचार जेव्हा मांडतात तेव्हा तुमच्या आमच्या जीवनाला एक निश्चित आयाम, दिशा मिळून जाते.इतकच नाही तर त्या प्रभावाने काही वेळा तर जीवनाची दिशा सुध्दा बदलते.आता माझीच बदललेली पहाना…

सर्वसामान्य माणसांप्रमाणेच मी देखील सर्व षड्ररिपुयुक्त, शीघ्रकोपी, संयमाचा अभाव…तरी बर्‍यापैकी वाचन, मनन, असून मन अशांत, अस्वस्थ राहिले होते. एक दिवस सद्गुरुंच्या दर्शनाचा योग आला, त्यांच्या सानिध्यात असताना श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनातल्या अनेक घटनां ते सांगताना म्हणाले,

“सात हजार वर्षानंतरही रामाचे स्मरण केले जात आहे, कारण त्यांनी हजारो पिढ्यांपासून लोकांना चांगुलपणा जोपासण्यासाठी, सत्याला धरून राहण्यासाठी आणि एकमेंकासोबत प्रेमाने राहण्यासाठी प्रेरित केले. रामाचे जीवन आपत्तींची एक शृंखलाच होती. तरी देखील तो अविचल राहिला. त्याने कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याच्या आत राग, संताप, किंवा द्वेष येऊ दिला नाही. राम जगात कृतीशील होता, लढाई देखील लढला, त्यात त्याने हेच दाखवून दिले. त्याच्या याच गुणापुढे आपण नतमस्तक आहोत.म्हणूनच त्याला एक अतिशय श्रेष्ठ मनुष्य, ‘मर्यादा पुरोषत्तम’ म्हणतो, देव म्हणत नाही.त्याचे गुण असे आहेत की तुम्हाला त्याचा आदर करावाच लागेल . तुम्ही सुध्दा तुमच्या जीवनात असे होऊ शकलात, तर तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. ही एक अशी संस्कृती आहे जिथे कोणीही स्वर्गातून उतरले नाही, जिथे मानव दैवी बनू शकतो. कुठेतरी एक देव आहे जो आपल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईल.या ढोबळ विश्वास प्रणालीपासून मनुष्यानी स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. राम आणि रामायण भारतीय परंपरेचे अविभाज्य भाग आहेत. ही अशी एक संस्कृती आहे जिने मुक्तीला सर्वोच्च महत्व दिले आहे. याचा अर्थ जिवंत असताना सर्व गोष्टीपासून मुक्त होणे.तुम्ही रोजच्या जीवनातून माघार घेतली आहे असे नाही, तुम्ही सक्रिय आहात पण मुक्त आहात, तुम्ही संरक्षित कोषामध्ये नाही.’

कालपर्यंत रामायाणातील ढोबळ कथानक ऐकून नि वाचून माहीत असलेल्या माझ्या मनाला या सद्गुरूंच्या आश्वासक विचारांनी मोहिनी घातली नाही तरच नवल.माझ्यासारख्या कैक दिशा भरकटलेल्या युवकांना देशापुढे असलेली आव्हाने पेलण्याची शक्ति आणि बुध्दी श्रीराम देवो.राष्ट्रधर्म, कर्तव्य, नेतृत्व, संवेदनशीलता,

स्वपराक्रम, स्वाभिमान याबाबत तत्वाला मुरड घालून क्षणिक लाभासाठी स्वत्व पणाला लावण्याचा धोका पत्करत असेल, तर तेथे श्री.रामांच्या प्रामुख्याने वनवास काळातील जीवनाचा अभ्यास, युवा पिढीला योग्य मार्गावर आणू शकेल हा माझ्या मनातल्या रामाने दिलेला संदेशच आहे असच म्हणायला हवं.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सारे जहाँ से अच्छा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ सारे जहाँ से अच्छा… ☆ श्री विश्वास देशपांडे

आपल्या साऱ्यांचे हे भाग्य आहे की, या भारतभूमीत आपला जन्म झाला. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आदी नद्यांच्या जलाने पावन झालेला हा प्रदेश हिमालयाचा रुपेरी मुकुट या भारतमातेने परिधान केला आहे. सागर तिच्या पायाला स्पर्श करतो आहे. कन्याकुमारी येथे तिन्ही सागरांचं जल एकमेकांत मिसळलेले आपणास दिसतं. त्या समुद्रात जो खडक आहे. ज्यावर स्वामी विवेकानंद बसले होते, त्या खडकावर सागराच्या लाटा सतत येऊन अभिषेक करीत असतात. जणू सागराचीही देशभक्ती उचंबळून येते आणि लाटांच्या रूपात तो भारतमातेला जलाभिषेक करतो. तिथूनच स्वामी विवेकानंदांना प्रेरणा मिळाली. आपलं जीवनध्येय गवसलं. सागराची हाक आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद यांचा संगम झाला आणि नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदांत झालं. भारतीय संस्कृती जगाला कळली, ती स्वामी विवेकानंदांच्या रूपाने. याच विवेकानंदांनी ‘देश हाच आपला देव आहे. त्याचीच पूजा करा असा प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला.

इंग्लंडमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हृदय मातृभूमीच्या आठवणीनं उचंबळून आलं. सागराच्या सान्निध्यात बसले असताना त्यांच्या ओठी शब्द आले, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला… हे देशप्रेम! जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा देशासाठी तुरुंगात अपार कष्ट, यातना सहन केल्या. कोलू चालवला. चाफेकरांना जेव्हा इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली, तेव्हा सावरकर म्हणाले, “स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन चाफेकर फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाता-जाता चेतविलेली शत्रुजयवृत्ती, महाकुंडात समिधेमागून समिधा टाकून अशीच भडकावीत नेणं असेल, तर त्याचं दायित्व आपल्यावर आहे. देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मारता मरेतो झुंजेन.” चाफेकरांनी जेव्हा देशासाठी बलिदान दिलं, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पोवाडा लिहिला. त्याने तरुणांना त्या काळात अतिशय स्फूर्ती दिली.

स्वजनछळाते ऐकुनी होती तप्त तरुण जे अरुण जणो देशासाठी प्राण देती धन्य धन्य त्या का न म्हणो

शतावधी ते जन्मा येती मरोनी जाती ना गणती देशासाठी मरती त्यासी देशपिते की बुध म्हणती.’

अशा अनेक क्रांतिवीरांचं, देशभक्तांचं देशाच्या स्वातंत्र्ययज्ञात बलिदान पडलं. म्हणून तर सिद्धहस्त कवी ग. दि. माडगूळकर लिहून गेले, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम् अनेक क्रांतिकारक ‘वंदे मातरम् म्हणत हसत-हसत फासावर चढले. कुसुमाग्रजांचं ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार हे गीत अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं. देशभक्तीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. हा सुगंध देता देता स्वातंत्र्ययज्ञरूपी कुंडात अनेकांच्या प्राणांची आहुती पडली, या आहुतीने यज्ञदेवता प्रसन्न झाली. या देवतेने प्रकट होऊन ‘स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हाती दिला. दीर्घकाळाच्या परकीय सत्तेनंतर भारत स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य आम्हाला सुखासुखी मिळालं नाही, याचं भान आम्ही ठेवणं आवश्यक आहे.

३ एप्रिल १९८४. भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा अवकाशात होता. त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. इंदिरा गांधी तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी राकेश शर्माला विचारलं, ‘आपको अंतराल से हमारा भारत देश कैसा दिखाई दे रहा है? राकेश शर्माने तत्काळ फार सुंदर उत्तर दिलं. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. किती सुंदर आणि मन भरून यावं असं हे उत्तर!

असा हा ‘सारे जहाँ से अच्छा असलेला आमचा देश आज प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे. स्वातंत्र्यासाठी सारे देशभक्त, क्रांतिकारक एक होऊन लढले. जातिधर्माची पर्वा न करता. ‘अवघा रंग एक झाला. पण आज त्याच देशाला जातिपातीने, धर्मभेदाने, भाषाभेदाने विभागलं गेलं आहे. संतांची, महापुरुषांची, नेत्यांची जातीपातींत वाटणी झाली आहे. क्षुल्लक कारणांवरून दंगली पेटत आहेत. लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. जाळपोळ, लुटालूट, अन्याय, अत्याचार होत आहेत. आपल्या सगळ्या देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी याचसाठी अट्टाहास केला होता का? ‘हेचि फळ काय मम तपाला’ असं तर त्यांचे आत्मे म्हणत नसतील? म्हणूनच देशभक्ती म्हणजे फक्त १५ ऑगस्टला किंवा २६ जानेवारीला ध्वजवंदन करणं नव्हे. वर्षभर असं वागलं पाहिजे की, आपण जी जी कृती करू, ती देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असली पाहिजे. कोणतीही कृती करताना, निर्णय घेताना ही कृती माझ्या देशाच्या दृष्टीने हिताची आहे ना, याचा विचार केला पाहिजे. या देशाचा धर्म एकच. तो म्हणजे राष्ट्रधर्म! आणि तोच आपल्या सगळ्यांचा धर्म असला पाहिजे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावर लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांचं गीत गायलं. ते गीत ऐकून पं नेहरूंच्या डोळ्यांतही अश्रू आले. आज त्याच गीताची आठवण करून लेखाचा शेवट करू या.

 ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भरलो पानी जो शहीद हुऐ है उनकी जरा याद करो कुर्बानी.’ जयहिंद.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुमनशैली… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ सुमनशैली… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुमन कल्याणपूर

 (जन्म (२८ जानेवारी १९३७))

पद्मभूषण सुमन कल्याणपूर असं आज लिहिताना सुद्धा खूप छान वाटतंय. मागच्या वर्षी भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.त्यात सुमनताईंचं नाव बघून खूपच आनंद झाला. खरं म्हणजे खूप आधीच हा पुरस्कार त्यांना द्यायला पाहिजे होता. पण ठीक आहे, “देरसे आये दुरुस्त आये” अशी माझी भावना आहे.

सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो.

केशवराव भोळे यांच्याकडून त्यांनी हौस म्हणून संगीताचे शिक्षण घ्यायला सुरवात केली.पण त्यात त्यांची वाढणारी आवड बघून त्यांनी उस्ताद खान अब्दुल रहमान आणि गुरुजी नवरंग यांच्या कडून व्यावसायिक शिक्षण घ्यायला सुरवात केली.

त्यांना चित्रकलेचे उत्तम ज्ञान होते म्हणून मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व पुढे चित्रकलेचे शिक्षण घेतले.

त्यांचे लग्न रामानंद कल्याणपूर यांच्याशी झाले व सुमन हेमाडीच्या त्या सुमन कल्याणपूर झाल्या.

भारतीय चित्रपटसृष्टी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते आपल्या सुमधुर गायिकेने रसिकांच्या मनांवर त्यांनी अधिराज्य गाजविले. चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील आघाडीच्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली एकाहून एक दर्जेदार गीते अजरामर आहेत. हिंदीप्रमाणेच मराठी, आसामी,गुजराथी,कन्नड,भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, उरीया, तसेच पंजाबी भाषेत गाणी गायली आहेत.

त्यांनी गायिलेल्या मराठी भावगीतांची मोहिनी आजही  मनांवर कायम आहे. सहज तुला गुपित एक व

रात्र आहे पौर्णिमेची

अशी गाणी ऐकली की

अशी भावगीते ऐकली की आपण त्या काळात जाऊन एखादी तरुणी बघू लागतो.

हले हा नंदाघरी पाळणा

अशी गाणी ऐकली की पाळणा म्हणणारी आई समोर येते.

पिवळी पिवळी हळद लागली ऐकले की लग्नातील नववधू समोर येते.

प्रत्येक गाण्यातील शब्दांचे भाव ओळखून गायिलेली गाणी फारच मनात खोलवर घर करतात.असे वाटते आपल्याच भावना व्यक्त होत आहेत.त्यांची सुमन गाणी ऐकतच आमची पिढी त्या गाण्यांबरोबर वाढली आहे.

कृष्ण गाथा एक गाणे हे मीरेचे व क्षणी या दुभंगुनिया घेई कुशीत हे सीतेचे गाणे ऐकताना मीरा व सीता यांचे आर्तभाव जाणवतात.

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ठराविक गायिकांची मक्तेदारी असलेल्या काळात स्वतःची ओळख पटवून देण्याचे अत्यंत अवघड काम त्यांच्या स्वरांनी केले.चाकोरीबाहेर जाऊन त्यांच्या स्वरांवर विश्वास ठेऊन संगीतकारांनी त्याच्या कडून गाणी गाऊन घेतली व ती यशस्वी करून दाखवली आहेत.

लता मंगेशकरांच्या व सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये विलक्षण साम्य असल्यामुळे ऐकणाऱ्या लोकांची गफलत होत असे.आणि आजही होत आहे. पण त्यांचे नाव देखील मोठेच आहे.

संगीतकार शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, एस.डी. बर्मन, हेमंत कुमार, चित्रगुप्त, नौशाद, एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा मोठ्या संगीतकारांबरोबर काम करून त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.त्यांची हिंदी चित्रपटातल्या गाण्यांची यादी बरीच मोठी म्हणजे ८०० हुन जास्त गाणी आहेत.

१९५४ पासून तीन दशक सुमन कल्याणपूर यांनी पार्श्वगायन केले आहे. आपल्या स्निग्ध,नितळ गळ्यानं व शांत,मधुर शैलीने गायिलेले कोणतेही गाणे ऐकताना आपण ट्रान्स मध्ये जातो.व ते गाणे जगू लागतो.आवाजातील तरलपणा व माधुर्य तार सप्तकात सुद्धा तीक्ष्ण किंवा कर्कश वाटत नाही.

मराठी मध्ये तर एकाहून एक अप्रतिम गाणी त्यांनी गायली आहेत. त्या मध्ये भक्ती गीत,भाव गीत, सिने गीत या सर्व प्रकारांचा समावेश आहे.

त्यांचा ८१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील गणेश कलाक्रीडा येथे मुलाखतीचा कार्यक्रम झाला होता.मुलाखत घेणाऱ्या मंगला खाडिलकर यांनी त्यांचा प्रवास अलगद उलगडून दाखवत त्या त्या काळातील गाणी गाऊन घेतली.त्यात एक जाणवले त्यांच्या चेहेऱ्या वरील समाधान व गोडवा पूर्वी पेक्षा अधिकच गहिरा झाला आहे. तोच तसाच मधूर शांत आवाज, त्यांची हसरी मुद्रा आणि मनावर कायम जादू करणारी तिच सुमनशैली !

त्यांना असेच शांत,समाधानी आयुष्य लाभो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देण्याचा व घेण्याचा दिवस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

देण्याचा व घेण्याचा दिवस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

देण्याचा व घेण्याचा दिवस (Day of GIVING & RECEIVING)

निसर्गा कडे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. निसर्ग आपल्याला द्यायला पण तयार असतो.पण निसर्गाचा एक नियम असतो.जो पर्यंत तुम्ही काही देत नाही तो पर्यंत निसर्ग पण काही देत नाही. निसर्गाची मागणी खूप कमी असते.तुम्ही एक धान्याचा दाणा द्या.निसर्ग हजारो दाणे देतो.एक बी लावा.निसर्ग जंगल देतो.हाच नियम सगळीकडे असतो.थोडक्यात आपल्याला जे हवे असते त्याचे दान करावे.उदाहरण म्हणजे पूर्वीची दानाची पद्धत आठवून बघू.पूर्वी कोणकोणत्या वस्तू दान दिल्या जात असत ?

समजा एखाद्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्याने चष्मे द्यावेत.डोळ्यांच्या हॉस्पिटल साठी दान द्यावे.ज्यांना पायाचा त्रास असेल त्यांनी काठी किंवा पायाचे बेल्ट दान करावेत.

दाना साठी हेतू महत्वाचा असतो.

सवय लागे पर्यंत ती गोष्ट लक्ष पूर्वक करावे लागते. पोहणे शिकताना जसे सुरुवातीला प्रत्येक कृतिकडे लक्ष द्यावे लागते नंतर ती कृती आपोआप होते.तसेच दानाचे पण आहे.एकदा दानाची सवय लागली की ते निर्व्याज होते.

दान हे फक्त पैशाचेच नसते. दान कशाचे करता येईल ते बघू.

▪️फुल,चॉकलेट,पेन, पेन्सिल,रुमाल कोणतीही छोटी वस्तू

▪️ आनंद,कौतुक, सहानुभूती,सदिच्छा.

▪️ जमेल तशी मदत करणे

▪️ सोबत करणे.

▪️ शिकवणे

▪️ रस्त्यात मदत करणे

काही जण एक नियम पाळतात.आपल्या कमाईचा एक दशांश भाग गरजू व गरिबांना दान करतात.त्यातून जी सकारात्मक ऊर्जा व आशीर्वाद मिळतात त्यामुळे पैशाचा ओघ वाढतो.

दानाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

हे प्रकार कनिष्ठ दाना पासून उच्च दाना पर्यंत आहेत.

१) मनात नसताना ( नाईलाजाने ) दान करणे. – सर्वात कनिष्ठ.

२) आनंदाने दान करु शकतो त्या पेक्षा अगदी कमी दान करणे.

३) मागितल्यावर दान करणे.

४) याचना करण्या पूर्वी किंवा मागण्या पूर्वी देणे

५) कोणाला देत आहोत त्याचे नाव माहिती नसणे.

६) घेणाऱ्याला कोण देतो हे माहिती नसणे.

७) देणारा व घेणारा दोघांचेही नाव एकमेकांना माहिती नसणे.

८) असे दान की ज्या मुळे एखादी व्यक्ती स्वावलंबी होणे. हे सर्वोत्तम दान आहे.

एक उदाहरण बघू.आठवड्यातून एक दिवस असे करु शकतो.५०/१०० रुपयाचे ५ किंवा १० रुपयात रूपांतर करायचे.व एकेक नोट कुठेही ठेवायची.थोडक्यात आपण पैसे ठेवले आहेत हे विसरुन जायचे.आणि नोटा ठेवताना मनात एकच भावना ठेवायची ती म्हणजे ही नोट ज्याला मिळणार आहे, त्याचे कल्याण व्हावे व त्याला आनंद मिळावा.

यात देणारा व घेणारा दोघेही एकमेकांना ओळखत नसतात.यातून काय साध्य होईल?तर आनंद आपल्याकडे येईल.कारण त्या प्रत्येक नोटे बरोबर आपण आनंदाचे दान केले आहे. आणि निसर्ग नियमा नुसार एकाचे अनेक पण आपल्याकडे येतात.त्यामुळे अनेक पटीने आनंद आपल्याकडे येणार आहे.अनुभव घेऊन तर बघू या.

जी गोष्ट देण्याची तिच गोष्ट घेण्याची.आपण शक्यतो काही घ्यायला नको म्हणतो.अगदी कोणी नमस्कार करु लागले तरी नाकारतो.तसे करु नये.छान नमस्कार घ्यावा व तोंड भरून सदिच्छांचा आशीर्वाद द्यावा.कोणी काहीही दिले तरी ते तितक्याच चांगल्या मनाने स्वीकारावे.व चांगल्या शुभेच्छा द्याव्यात,धन्यवाद द्यावेत.आपल्याला जर रस्त्यात बेवारस काही वस्तू,पैसे सापडले तर आपण आधी कोणाचे आहे याचा शोध घेतो.जर कोणी आसपास नसेल तर लगेच असा विचार करतो की हे कोणाला तरी देऊन टाकू,पैसे असतील तर दानपेटीत टाकण्याचा विचार येतो.त्या पेक्षा त्या वस्तू/पैसे जवळ ठेवावेत आणि ज्याचे असेल त्याला सुखी व आनंदी ठेवा असे म्हणावे.

हेच ते देण्याचे व घेण्याचे नियम!

हे अमलात कसे आणायचे याची कृती बघू.

▪️ आज भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी भेट देईन.

▪️ जे मिळेल त्याचा मनापासून व आनंदाने स्वीकार करेन.

▪️ आज कोणाच्या विषयी किंतू ठेवणार नाही.

▪️ आज भेटणाऱ्या प्रत्येका विषयी काळजी,सहानुभूती,सहृदयता बाळगेन व तसेच वर्तन करेन.

▪️ आज सगळ्यांशी हसून,मार्दवतेने वागेन.

▪️ आज सगळ्यांशी प्रेमाने वागेन.

असा आठवड्यातून एक दिवस ठेवायचा.आणि येणाऱ्या आनंदाला व भरभराटीला समोरे जाऊन स्वीकार करायचा.

तुम्ही हे नक्की आनंदाने करणार!

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झपूर्झा म्युझियम…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

झपूर्झा म्युझियम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(एक सुंदर सहल….)

 “झपूर्झा “म्हणजे काय हे प्रथम खरोखरच माहिती नव्हतं! आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी केशवसुत यांची”झपूर्झा “ही लोकप्रिय व गाजलेली कविता!

‘झपूर्झा ‘  म्हणजे ‘झपाटले पणाने जगणे’ असा अर्थ घेतला जातो.

‘जा पोरी जा’ हे वाक्य झपाट्याने उच्चारल्यास ‘झपूर्झा’ असा शब्द ऐकल्याचा भास होतो, तसा ध्वनी होतो असे ट्रान्स लिटरेशन फाउंडेशन शब्दकोश नमूद करते.

अर्थाचे असे काही वाद असले तरी ‘झपूर्झा’  खरोखरच आपल्याला ‘जगणे कसे असावे’ हे तेथील प्रदर्शनीतून दाखवून देते. पुण्याजवळ कुडजे, या गावाजवळ हे म्युझियम  आहे. प्रसिद्ध सराफ व्यावसायिक अजित गाडगीळ यांनी जुन्या गोष्टींचा संग्रह करून हे म्युझियम उभे केले  आहे. राजा रविवर्म्याची चित्रं ,१००/१५० वर्षांपूर्वीचे दागिने, साड्या, पैठण्या यांचे आठ वेगवेगळ्या गॅलरींमध्ये प्रदर्शन  आहे. पु. ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे कला, चित्र, नाट्य, शिल्प या सर्वांशी इथे मैत्री जोडली जाते….

७ जानेवारीला योगा सेंटर ची *झपूर्झा*ला ट्रिप नेण्याचे ठरले आणि आम्ही दोघे त्यांंत सहभागी झालो.१७/१८ जणांची ट्रॅव्हलर गाडी बुक केली होती.. सकाळी १० वाजता निघालो.साधारणपणे पाऊण तासात आम्ही तिथे पोचलो.सकाळचे प्रसन्न वातावरण होते.घरून नाश्ता करून निघालो होतो, तरी वाटेत छोटे छोटेखाद्य पदार्थ खाणे चालूच होते.

‘झपूर्झा’ च्या गेटवर पोहोचल्यावर तिकिटे काढली आणि आत प्रवेश केला.( शनिवार/ रविवार रेट जास्त असतो) आत प्रवेश केल्यावर प्रथमच नटराजाच्या मोठ्या मूर्तीचे दर्शन झाले. केशवसुतांची एक कविता आपले स्वागत करताना दिसली. आणि लक्षात आले की हे नुसतेच प्रदर्शन नाही तर इथे चांगल्या वाचनीय अशाही बऱ्याच गोष्टी आहेत.

शिरीष बेरी या प्रसिद्ध आर्किटेक्टने साडेसात एकर जागेत हे संग्रहालय उभे केले आहे. अतिशय निसर्गरम्य असे वातावरण तिथे आहे. खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर जवळ हे ठिकाण असल्यामुळे हवेमध्ये चांगला गारवा असतो!

म्युझियमचा एकूण नकाशा पाहता तिथे आठ गॅलरीज्, ॲम्फी थिएटर, कॅफेटेरिया, ऑडिटोरिअम,सुवेनिअर शाॅप अशी सर्व दालने आहेत.

हे सर्व पाहण्यासाठी तीन-चार तास वेळ लागतो. तसेच इथे” पूना गेस्ट हाऊस”चे नाश्ता आणि भोजन यासाठी चांगले उपहारगृह असल्याने बरोबर खाद्यपदार्थ न्यावे लागत नाहीत आणि तशी परवानगीही नाही.

‘लाईट ॲन्ड लाइफ’ या पहिल्या दालनात सर्व प्रकारचे दिवे बघायला मिळतात. पितळ्याचे, चांदीचे, देवापुढील दिवे, समया, असे विविध प्रकारचे दिवे तेथे बघायला मिळतात.

दुसऱ्या दालनास’ ‘प्रिंट अँड इन प्रिंट ‘असे म्हणतात. तेथे छपाई तंत्राचा शंभर वर्षाचा इतिहास तसेच प्रिंटिंग संबंधी सर्व माहिती आहे. राजा रविवर्म्याची पेंटिंग्ज आहेत. चॉकलेटचे डबे, ट्रे,फ्रेम्स अशा जुन्या वस्तूंचे असंख्य नमुने आहेत.

तिसऱ्या दालना मध्ये 1832 च्या दरम्यान असणाऱ्या चांदी सोन्याच्या वस्तू, दागिने, भातुकली, विविध प्रकारच्या फण्या, सौंदर्य प्रसाधनांचे डबे, अत्तर दाण्या, गुलाब दाण्या इत्यादींचे प्रकार पाहायला मिळतात.

चौथ्या दालनात दुर्मिळ पैठण्यांचा  संग्रह आहे. तिथे प्रवेश करताच इंदिरा संत यांची “पैठणी” कविता वाचायला मिळते. पेशवाईतील विविध पैठण्या तेथे संग्रहित केल्या आहेत.

स्थापत्य कलेशी संबंधित निसर्गाशी मेळ घालणारे असे पाचवे दालन आहे. तिथून जवळच कॅफेटेरिया  आहे. इथे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच उकडीचे मोदक, पुरणपोळी, खास पुणेरी अळू यासह असणारे जेवण मिळते ,त्यामुळे अशा सुंदर जेवणाचा आस्वाद घेऊन पुन्हा फिरायला आणि फोटोग्राफी करायला उत्साह येतो.

बसण्यासाठी सुंदर जागा, समोर दिसणारे धरणाचे पाणी, वाटेत असणारे कमळाचे पाॅड्स आणि शेवटी असणारे शंकराचे मंदिर असा सर्व परिसर बघता बघता वेळ कसा जातो ते कळतच नाही!

साॅव्हनेअर शॉप हे बायकांच्या खरेदीचे आवडते ठिकाण! तिथे विविध प्रकारच्या पिशव्या, टी-शर्टस्, मग्ज्, पेंटिंग्ज, अशा विविध प्रकारच्या वस्तू आहेत.  विंडो शॉपिंग आणि थोडीशी खरेदी तेथे होतेच!

एक दिवस निसर्गरम्य परिसरात आनंदात घालवण्यासाठी हे ठिकाण खरोखरच अप्रतिम आहे! अजित गाडगीळ यांनी  ‘झपाटलेपणाने जगणे’ हा अर्थ खरोखरच सार्थ केला आहे हे  म्युझियम उभारताना!

आमचा सहलीचा दिवस असाच अविस्मरणीय झाला.जेवण आणि फिरणे करून येताना ३ च्या दरम्यान आम्ही सर्वजण योगा सेंटर मधील मनीषा मॅडमच्या घरी चहा, बिस्किटे घेऊन फ्रेश झालो.

लहानशा खेड्यातील त्यांचे घर खूपच छान वाटले. घराभोवती फुलांची झाडे , शेवग्याचे झाड तसेच छोटी छोटी वांग्याची झाडे पाहून आनंद वाटला.. येताना ताजे ताजे मुळे,पालक, चाकवत, शेवगा अशा खास गावाकडच्या ताज्या भाज्या घेतल्या.

निसर्गाचे हे रूप पाहून वाटत होते की, शहराच्या कृत्रिम जीवनापेक्षा हे किती आकर्षक आहे आणि निसर्ग आपल्याला किती देत असतो!

“देता किती घेशील तो कराने..”

अशी आपली अवस्था होते!

संध्याकाळी एकमेकांचा निरोप घेऊन घरी आलो. कालचा   संस्मरणीय दिवस मनामध्ये कायमचा घर करून राहीला!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वर्षाऋतू…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

श्री वैभव चौगुले

? विविधा ?

☆ “वर्षाॠतू…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

खूप प्रेम करतोय मी निसटणा-या वर्षाऋतूवर! रेत मुठीतून निसटून जाते. तसे हे वर्ष अखेर निसटून जाताना मला दिसत आहे. पण या वर्षअखेर मी शून्य होणार आहे. हे माझ्या मनाला सांगून ठेवले आहे. कारण दान देत रहावे. पुण्य कमवत रहावे. कर्म चोख आणि वचन निभवावे. असाच फंडा माझ्या जीवनाचा मी करून ठेवला आहे. सुखाला दु:ख आणि दु:खाला सुख टिकून देत नाही. हे मी खूपदा अनुभवले आहे. म्हणुन सुखदु:खाची नाळ माझ्या संयममय संघर्षाशी बांधून ठेवली आहे.

वेळ आहे. निघून जाणार! हे शेवटी अटळ सत्य! भावनांच्या हिंदोळ्यावर! किती स्वप्नझुले झुलताना मन हसते. चोरपावलांनी आलेल्या आधार शब्दलहरीवर हरेक झुला गगनाला भिडतो! वारा झोका देत असताना सांजवेळी बासरीची धून मारव्यासोबत समीप होऊन माझ्या मनाला साद घालते. वसुंधरेने नेसलेला हिरवा शालू, आभाळाच्या ललाटी दिसणारा सोनेरी टिळा! पाहत पाहत, नववधुचा शृंगार दवबिंदुंचा साज पांघरून इंन्द्रधनुच्या रंगात रंगून जाताना!  माझे मन हरकून जाते. मनाच्या पैलतिरावर उन्मळून आलेल्या माझ्या भावना! मला आता कित्येक प्रश्न विचारू लागतात.

माझ्या खांद्यावरचे ओझे कुणीतरी उचलले! आणि मी मुक्तमोकळा श्वास घेत आहे. हे कल्पनेत नाहीतर! सत्यात उतरत पूर्ण झालेले स्वप्न! खरचं माझे हसून स्वागत करते. मी दिलखुलासपणे पाहत असतो. मी दिले काय? आणि मिळाले काय? याचा हिशोब मला सरते वर्ष देईलच! यात शंका नाही.

मी पूजा करतो. ती वर्षाऋतुची मूर्ती मंदिरातून गहाळ झाली. हे नियतीने दाखवून दिले. तेव्हा मी चोराला दोष दिला नाही. तर मीच ती मूर्ती कोरीव, सुभक आणि सुंदर घडवली. याचा मला खूप अभिमान वाटतो. यात चोराचे काही चुकले असेल! असे मला वाटत नाही. मग ती मूर्ती मनमंदिरी असो, वृंदावनी असो की एखाद्या नदी किनारी कदंबाजवळ असो! त्या मूर्तीसाठी शृंगाराची लेणी मी कोरून ठेवलेली आहेत. नवरसातले अमृत! मी माझ्या काळजात लपवून ठेवले आहे. फक्त मला या वर्षाऋतुसाठी गंधाळायचं आहे. इतकेच समजते! मनातून असा पाझर बाहेर येईपर्यत, अश्रू वाट अडवतात. अश्रूही अमृतमय होऊन जातात. मी एकदा अश्रू चाखून पाहिले आहेत. चव खारटचं! कोणता सागर त्या नयनरम्य परिसरामध्ये उसळत आहे! की वास्तवास आहे. मला अजून कळाले नाही. की त्या सागराचा किनारा कोणता? की किनाराच नाही. कसं सगळं समभ्रमीत ?

मी समर्पीत केलेले हरेक क्षण! माझा हेवा करतात. या वर्षाऋतूवर प्रेम करत असताना! मी खूप गोष्टींचा त्याग केला. या त्यागलेल्या गोष्टीशी तसा माझा कोणता घनिष्ठ सबंध नाही. नव्हता! म्हणून माझ्यापासून दुरावलेल्या गोष्टींची मला कधी साधी आठवणही येत नाही. आणि कधी येणारही नाही. एक ऋतू मनाला भावल्यानंतर नवे ऋतू, दहा दिशा अन् सहा सोहळ्यांच्या भ्रमीष्ठ भानगडीत कधी मी पडलो नाही. पडणारही नाही.

पतझड सावन बसंत बहार

एक बरस के मौसम चार मौसम चार

पांचवा मौसम प्यार का इंतजार का…

असे गुनगुनणारे माझे मन! नेहमी वर्षाऋतुच्या वाटेवर नजर रोखून असते. वचनबध्द, साचेबंध असलेले! माझे मन जरी थोडेफार हेकेखोर, गर्विष्ठ असले तरी ते दगाफटका करणारे नाही. याची खात्री मला आहे. शब्दांनी आधार मिळतो. पण कर्तव्याचं आणि जबाबदारीचे ओझे मात्र कमी होत नाही. त्याला समोर येऊन! हातभारच लावावा लागतो. मनानी करावे गुन्हे! अन् शरीराने भोगावी शिक्षा! हा न्यायनिवाडा मला मान्य नाही. ओंजळीतल्या सरींना! मी खाली पडून देणार नाही. की माझ्या जीवनरेखा कुणाला पुसून देणार नाही. ज्या भावनांनी मी चित्र रेखाटले. ज्या वैभवमय रंगांनी मी चित्र रंगवले. ते चित्र मी कोणत्या प्रदर्शनात मांडणार नाही. त्या वैभवमय झालेल्या चित्राला जगण्यासाठी लागणारा श्वास माझ्या श्वासातूनच देत राहीन! रोज नव्याने रंग भरत राहीन! या चित्राची जागा मनाच्या खोल कँनव्हासवरच  असेल आणि राहील.

जुन्या विचारांची पाने झडून गेल्यानंतर! चैतन्यमय विचारांच्या नवपालवीचे स्वागत करायला! मी सज्ज होणार आहे. ऋतुच्या मनराईतून प्रेमफुलांच्या कळ्या उमलू लागतात. तेव्हा मनभावनांच्या सुगंधी उत्कंटतेला आवर मला घालता येत नाही. हे तितकेच खरे आहे. चोरीला गेलेली मूर्ती पवित्र राहील! कारण तिच्या चरणी मी रोज सत्यफुले वाहिली होती. म्हणतात मूर्ती निर्जीव असते. पण मी माझ्या वर्षाऋतूमध्ये जीव ओतला आहे. त्यामुळे माझ्या भावनांची जाण नक्कीच वर्षाऋतुला असणार कदाचित! गतवर्षाऋतुची कात टाकताना! माझा ऋतू मी वसंतास बहल करेन!  मग तो ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत की शिशिर असो! ऋतू सूर्यावर आणि महिने चंद्रावर ठरतात!  निसर्गाची किमया कुणाला माहीत नाही. वर्षाऋतुचा खेळही असाच! हा खेळ सावल्यांचा! यामधल्या सावल्यांना मुखवटे नसले तरी भावना मात्र मी ओळखत असतो. सावल्यांच्या लपंडावामध्ये नेहमी वर्षाऋतूवर का डाव येतो! हे कळत नाही. की ती टाईमप्लीज म्हणून डाव अंगावर ओढून घेते. हे ही समजत नाही.

पण माझे ऋतू आणि महिने माझ्या स्वाभिमानावर आणि माझ्या वेळेवर, परतीच्या क्षणांवरच  ठरत असतात.. किंभवना मी ठरवत असतो. आणि वर्षाऋतुचा शृंगार करण्यास शिंपल्यातले मोती वेचून भावस्पर्शाच्या ओंजळीत साठवत असतो. वर्षाऋतुच्या प्रतीक्षेत….!!!!!!!

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘माझी सुट्टी…’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ‘माझी सुट्टी’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज.  आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत म्हणा, किंवा अनुभव म्हणा.  त्यावेळी मी डी.एड.कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रामायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात नं, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे , हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय.’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवारा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीचे वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात.  मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठे तरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

आता मला सुट्टी मिळणार मिळणार

खूप खूप मज्जा मी करणार करणार.

आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावार नुसतच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं.  उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या.’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

आता टी.व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी.व्ही.च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला.   शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी.व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’  मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मीटूनच घ्यायचा.

तर असं हे माझं सुट्टीपुराण. जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात… ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात…

मागे एका शाळेत गेलो होतो. ती शाळा खूप प्रसिद्ध म्हणून पाहायला. त्या शाळेच्या ऑफिसमध्ये एक वाक्य वाचायला मिळालं. ‘ एव्हरी चाईल्ड इज  युनिक. ‘ आणि अगदी खरं आहे. प्रत्येक मूल दुसऱ्या मुलापासून वेगळं आहे. बुद्धीनं, रूपानं , विचारानं, भावनेनं. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता वेगवेगळी. जे एकाला खूप चांगलं जमतं , तसं दुसऱ्याला येईलच असे नाही सांगता येत. आपण पालक मात्र ही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नसतो. एखादा मुलगा अभ्यासात हुशार असला तर आपण आपल्या मुलाला त्याचे उदाहरण देतो. तो अमुक अमुक बघ. कसा हुशार आहे. गणितात किती गुण मिळाले त्याला ! नाहीतर तू .. असे म्हणून आपण त्याला हिणवतो. आणि त्याचं फुलू पाहणारं व्यक्तिमत्व कोमेजण्यासाठी हातभार लावतो. अरे, निसर्गातही बघा ना. प्रत्येक फुल वेगवेगळं आहे. गुलाब फुलांचा राजा झाला म्हणून काय इतर फुलांचं सौंदर्य, सुगंध कमी आहे का ? प्रत्येक फुल आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. सगळेच गुलाब झाले तर कसे चालेल ? फुलांच्या हारामध्ये जेव्हा वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात, तेव्हा तो हार शोभून दिसतो.

पण आज मला लहान मुलांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल नाही बोलायचं. पण त्यानिमित्ताने एक विचार मात्र मनात आला. प्रत्येक लहान मूल युनिक असतं तसं आपण मोठी माणसं पण असतो का ? नक्कीच असतो. पण हे आपण समजून नाही घेत. कदाचित समजतं पण उमजत नाही. कळतं पण वळत नाही. अशी आपली अवस्था असते. आणि बऱ्याच वेळा हेच आपल्या दुःखाचं मूळ असतं . मी काय करतो, तर माझी तुलना सतत दुसऱ्याशी करत असतो. एखादा माणूस तब्येतीने चांगला दिसला, दिसायला त्याचे व्यक्तिमत्व छाप पडणारे असले की मी नकळत माझी तुलना त्याच्याशी करतो आणि दुखी होतो. मला वाटतं मी एवढा बारीक आणि अशक्त का ? जे माझ्या बाबतीत तेच एखाद्या लठ्ठ माणसाला सुडौल असणाऱ्या माणसाबद्दल वाटू शकेल. त्या लठ्ठ माणसाला वाटते की मी का नाही असा सडपातळ ? लोक हसतात माझ्याकडे पाहून. एखाद्या बुटक्या माणसाला उंच माणसाबद्दल हेवा वाटू शकतो. एखाद्या आखूड केस असणाऱ्या तरुणीला लांब आणि दाट केस असलेल्या स्त्रीबद्दल असूया वाटू शकते.

अशा अनेक गोष्टींमुळे आपण स्वतःला दु:खी करून घेतो. इथे आपले चुकते ते हे की आपण स्वतःला आहे तसे स्वीकारायला तयार नसतो. पण निसर्ग तुमच्यात जेव्हा तुम्हाला वाटणारी एखादी उणीव ठेवतो, तेव्हा तुम्हाला तो अशी काही गोष्ट देऊन ठेवतो, की जी दुसऱ्याजवळ नसते. एखाद्या धनिकाला सगळ्या गोष्टी उपलब्ध असून शांत झोप लागत नाही. तेच झोपेचे वरदान देव मात्र एखाद्या सर्वसामान्य माणसाला सहज देऊन ठेवतो. तो श्रीमंत माणूस सगळे विकत घेऊ शकतो. पण झोप नाही विकत घेऊ शकत. मनःशांती नाही मिळत पैशाच्या जोरावर. अशा खूप गोष्टी असतात आपल्याजवळ. या अर्थाने आपण गिफ्टेड असतो. पण आपण नेमके आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा विचार न करता आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीचा विचार करतो.

या अर्थाने खरं तर प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. वेगळी आहे. मी मुद्दामच या लेखाचं नाव तुम्ही युनिक आहात असं दिलंय . खरं म्हणजे बरेचदा मी इंग्रजी शब्द वापरायचे टाळतो. पण काही वेळा आपल्याला अपेक्षित असणारा अर्थ एखादा शब्द चटकन स्पष्ट करत असेल तेव्हा मी तो बिनदिक्कतपणे वापरतो. इंग्रजीतला युनिक हा शब्दही असाच. युनिक म्हणजे एकमेवाद्वितीय. इतरांपासून एकदम वेगळा. आपण सगळे या अर्थाने युनिक असतो. इतरांपासून वेगळे असतो. मला गाणी आवडतात, प्रवास आवडतो, वाचायला आवडते, लिहायला आवडते. दुसरा माझा एक मित्र उत्तम चित्रं काढतो आणि लिहितोही. तो फिरत मात्र फारसा नाही. कोणी उत्तम गातो. कोणाला उत्तम स्वयंपाक करता येतो. कोणीतरी उत्तम खेळाडू आहे. किती हे वेगळेपण ! किती या प्रत्येकाच्या तऱ्हा ! म्हणून तर प्रत्येक जण युनिक. हे जेव्हा आम्ही समजून घेऊ ना, तेव्हा आम्ही स्वतःवर प्रेम करायला लागू. (उगवतीचे रंग- विश्वास देशपांडे )

आणि जो स्वतःवर प्रेम करू शकतो, तोच इतरांवरही प्रेम करू शकतो. पण आपल्याकडे ही गोष्ट लहानपणापासून सांगितलीच जात नाही. उलट सांगितलं जातं . की स्वतःचा विचार करू नका. स्वतःवर प्रेम करू नका. दुसऱ्यावर प्रेम करा. पण स्वतःवर प्रेम नाही करता आलं, स्वतःला आहे तसं नाही स्वीकारता आलं , तर तुम्ही दुसऱ्याला काय स्वीकारणार आणि मग प्रेम करणं तर लांबची गोष्ट !

तेव्हा आजपासून स्वतःला सांगू या की मी इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे, युनिक आहे आणि त्यातच माझे सौंदर्य आहे, सामर्थ्य आहे. इतरांना दिल्या त्यापेक्षा परमेश्वराने मला काही गोष्टी नक्कीच वेगळ्या दिल्या आहेत. त्यांचा मी विचार करीन . त्यांचा वापर करून माझे जीवन आनंदी बनवेन. आणि त्याच बरोबर इतरांचेही. आणि मग बघा. तुमच्याही ओठांवर आनंदाचे गाणे आल्याशिवाय राहणार नाही.

लिये सपने निगाहो में, चला हूँ ‘तेरी राहों मे

जिंदगी, आ रहा हूँ मैं ….

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print