सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ सुमनशैली… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुमन कल्याणपूर

 (जन्म (२८ जानेवारी १९३७))

पद्मभूषण सुमन कल्याणपूर असं आज लिहिताना सुद्धा खूप छान वाटतंय. मागच्या वर्षी भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.त्यात सुमनताईंचं नाव बघून खूपच आनंद झाला. खरं म्हणजे खूप आधीच हा पुरस्कार त्यांना द्यायला पाहिजे होता. पण ठीक आहे, “देरसे आये दुरुस्त आये” अशी माझी भावना आहे.

सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो.

केशवराव भोळे यांच्याकडून त्यांनी हौस म्हणून संगीताचे शिक्षण घ्यायला सुरवात केली.पण त्यात त्यांची वाढणारी आवड बघून त्यांनी उस्ताद खान अब्दुल रहमान आणि गुरुजी नवरंग यांच्या कडून व्यावसायिक शिक्षण घ्यायला सुरवात केली.

त्यांना चित्रकलेचे उत्तम ज्ञान होते म्हणून मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व पुढे चित्रकलेचे शिक्षण घेतले.

त्यांचे लग्न रामानंद कल्याणपूर यांच्याशी झाले व सुमन हेमाडीच्या त्या सुमन कल्याणपूर झाल्या.

भारतीय चित्रपटसृष्टी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते आपल्या सुमधुर गायिकेने रसिकांच्या मनांवर त्यांनी अधिराज्य गाजविले. चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील आघाडीच्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली एकाहून एक दर्जेदार गीते अजरामर आहेत. हिंदीप्रमाणेच मराठी, आसामी,गुजराथी,कन्नड,भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, उरीया, तसेच पंजाबी भाषेत गाणी गायली आहेत.

त्यांनी गायिलेल्या मराठी भावगीतांची मोहिनी आजही  मनांवर कायम आहे. सहज तुला गुपित एक व

रात्र आहे पौर्णिमेची

अशी गाणी ऐकली की

अशी भावगीते ऐकली की आपण त्या काळात जाऊन एखादी तरुणी बघू लागतो.

हले हा नंदाघरी पाळणा

अशी गाणी ऐकली की पाळणा म्हणणारी आई समोर येते.

पिवळी पिवळी हळद लागली ऐकले की लग्नातील नववधू समोर येते.

प्रत्येक गाण्यातील शब्दांचे भाव ओळखून गायिलेली गाणी फारच मनात खोलवर घर करतात.असे वाटते आपल्याच भावना व्यक्त होत आहेत.त्यांची सुमन गाणी ऐकतच आमची पिढी त्या गाण्यांबरोबर वाढली आहे.

कृष्ण गाथा एक गाणे हे मीरेचे व क्षणी या दुभंगुनिया घेई कुशीत हे सीतेचे गाणे ऐकताना मीरा व सीता यांचे आर्तभाव जाणवतात.

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ठराविक गायिकांची मक्तेदारी असलेल्या काळात स्वतःची ओळख पटवून देण्याचे अत्यंत अवघड काम त्यांच्या स्वरांनी केले.चाकोरीबाहेर जाऊन त्यांच्या स्वरांवर विश्वास ठेऊन संगीतकारांनी त्याच्या कडून गाणी गाऊन घेतली व ती यशस्वी करून दाखवली आहेत.

लता मंगेशकरांच्या व सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये विलक्षण साम्य असल्यामुळे ऐकणाऱ्या लोकांची गफलत होत असे.आणि आजही होत आहे. पण त्यांचे नाव देखील मोठेच आहे.

संगीतकार शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, एस.डी. बर्मन, हेमंत कुमार, चित्रगुप्त, नौशाद, एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा मोठ्या संगीतकारांबरोबर काम करून त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.त्यांची हिंदी चित्रपटातल्या गाण्यांची यादी बरीच मोठी म्हणजे ८०० हुन जास्त गाणी आहेत.

१९५४ पासून तीन दशक सुमन कल्याणपूर यांनी पार्श्वगायन केले आहे. आपल्या स्निग्ध,नितळ गळ्यानं व शांत,मधुर शैलीने गायिलेले कोणतेही गाणे ऐकताना आपण ट्रान्स मध्ये जातो.व ते गाणे जगू लागतो.आवाजातील तरलपणा व माधुर्य तार सप्तकात सुद्धा तीक्ष्ण किंवा कर्कश वाटत नाही.

मराठी मध्ये तर एकाहून एक अप्रतिम गाणी त्यांनी गायली आहेत. त्या मध्ये भक्ती गीत,भाव गीत, सिने गीत या सर्व प्रकारांचा समावेश आहे.

त्यांचा ८१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील गणेश कलाक्रीडा येथे मुलाखतीचा कार्यक्रम झाला होता.मुलाखत घेणाऱ्या मंगला खाडिलकर यांनी त्यांचा प्रवास अलगद उलगडून दाखवत त्या त्या काळातील गाणी गाऊन घेतली.त्यात एक जाणवले त्यांच्या चेहेऱ्या वरील समाधान व गोडवा पूर्वी पेक्षा अधिकच गहिरा झाला आहे. तोच तसाच मधूर शांत आवाज, त्यांची हसरी मुद्रा आणि मनावर कायम जादू करणारी तिच सुमनशैली !

त्यांना असेच शांत,समाधानी आयुष्य लाभो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments