मराठी साहित्य – विविधा ☆ शांता शेळके आणि बालकविता ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. दीपा नारायण पुजारी

?  विविधा ?

☆ शांता शेळके आणि बालकविता ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

बालगीतं मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडतात. अडगुलं मडगुलं पासून सुरु होणारी ही बडबडगीतं बाळाचं आईबरोबरचं नातं दृढ करतात. बोलता येत नसलेल्या वयापासून आई – आजीची ही बडबडगीतं बाळाला शब्द ओळख करून देतात.

तरल भावगीतं, लावणी, चित्रपटगीतं अशा अनेक प्रकारच्या काव्य शैलीचा सुरेल नजराणा ज्यांनी रसिकांना  दिला, त्या थोर कवयित्री शांताबाई शेळके यांनी  बालकविता ही लिहिल्या आहेत. बालविश्वात  बालिका होऊन शब्दांना गोड बाल बोलीत बांधून ठेवलं आहे.

‘मुंगीबाई मुंगीबाई काम करतेस फार

सदानकदा कामाचा डोईवर भार’

असं म्हणत सहजच ठेक्यात, काम करत राहण्याचं महत्त्व त्या पटवून देतात.

‘हे ग काय आई

थांब ना बाई’

या कवितेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरातील संवाद मांडला आहे.त्यांच्या कविता ताल, सूर, लय, नाद यांच्याशी जवळीक निर्माण करतात.आकारानं लहान, साधी, सोपी रचना यामुळं त्या कविता मुलांना भावतात.सहज लक्षात राहतात.

‘किलबिल किलबिल पक्षी बोलती

पानोपानी फुले बहरती….’

या कवितेत किलबिल, पानोपानी, झुळझुळ, भिरभिर अशी शब्दांची पुनरावृत्ती करून लय, ताल, यांचा सुरेख संगम या गीतात झाला आहे. शब्दांचं बोट धरून त्या मुलांना स्वप्ननगरीत घेऊन जातात.अपेक्षांचं ओझं लादणारी, नियम पाळायला लावणारी, निरागस वयात रॅटरेस मध्ये सहभागी व्हायला लावणारी मोठी माणसं या स्वप्नातल्या गावात नाहीतच मुळी! खेळणारं, बागडणारं, अवखळ बालविश्व चित्र काढल्यासारखं डोळ्यासमोर उभं राहतं.शब्दातून चित्र उभं करणं, तेही बालकल्पनेतलं आणि बालरंगातलं! त्यांना सप्तरंगी शब्दकुंचला गवसला होता.

‘पाकोळी’ या कवितेत,

       ‘गोजीरवाणे करडू होऊन

              काय इथे बागडू?

पाकोळी का पिवळी होऊन

               फुलाफुलांतून उडू?’

स्वैर विहार करताना रानपाखरांशी संवाद साधायला शिकवतात. ओल्या हिरवळीच्या मखमली स्पर्शाचा अनुभव देतात. मखमल, हिरवळ, निळसर अशा अक्षरांच्या आणि शब्दांच्या पुनरावृत्तीमुळं कवितेला गेयता येते तशीच ती कविता मुलांच्या तोंडी सहज बसते.

          ‘कमळफुलांची आणि कळ्यांची

          सळसळ चाले निळ्या तळावर

          झुळुक झुळझुळे वारा येता

          फुले कळ्याही हलती भरभर.’

 

‘अक्षरगाणी अंकउजळणी’ या पुस्तकातून अक्षर ओळख करून देताना ‘ळ’ या अक्षराची ओळख किती लयबद्ध केली आहे. ‘ळ’ ची पुनरावृत्ती झाल्यामुळं ही चारोळी हसत खेळत लक्षात न राहिली तर नवल!

या अक्षर ओळखीतून निसर्ग, तसंच आपले रितीरिवाज, सण, खाद्य संस्कृती यांचीही ओळख त्यांनी करून दिली  आहे.

           ‘ हळदीकुंकू चैत्रामधले

             मखरामध्ये गौर सजते’

हे सांगताना मराठी भाषेचा गौरव करायला त्या विसरल्या नाहीत. ज्ञानदेवांना माऊली म्हणून नतमस्तक व्हायला मराठमोळ्या बालकांना त्यांनी सांगितलं. मराठी भाषेतील अक्षर ओळख करुन देताना ‘ अमृतातेही पैजा जिंके’ हे त्यांनी आठवणीनं सांगितलं. इथं त्यांच मराठी भाषेवरील प्रेम दिसून येतं. भाषेचा अभिमान दिसून येतो.

शांताबाईंच्या बालकविता मोठ्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जातात. आजोळच्या वाटेवरील दाढीवाल्या वडाला सूरपारंब्या खेळायला बोलावतात. पालक आणि मुलं  यांना एकत्र राहण्याचा आनंद देऊ शकतील अशा आहेत. बालक पालक नातं सुदृढ करणाऱ्या आहेत. मुलांच्या कल्पना, भावनिक विकास, संवेदनशीलता यांची वाढ करणाऱ्या आहेत.

आजी – आजोबा, आई – बाबा आणि नातवंडं या तिन्ही पिढ्यांना एकत्र जोडणारा आनंदठेवा आहे.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

९६६५६६९१४८

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-1 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

संक्षिप्त परिचय

शिक्षा  – बी. ए. बी.एड.

सम्प्रत्ति – निवृत्त हायस्कूल शिक्षिका

विशेष – कथा, कविता, ललित लेख, बालकथा वर्तमानपत्रातून आणि मासिकातून प्रसिद्ध, आकाशवाणीरुन प्रक्षेपण, ‘जंगल मंगल’ हा बालकविता संग्रह.

?  विविधा ?

☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-1 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

(जन्म:१२ ऑक्टोबर १९२२ – मृत्यू : ६ जून २००२)

प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, शांता शेळके या तीन शब्दात त्यांचे वर्णन करुन आपल्याला थांबता येत नाही. त्यांच्या साहित्य सेवेचा आलेख खूप विस्तृत आहे.

त्या प्राध्यापिका होत्या. लेखिका, संगीतकार, बालसाहित्य लेखिका, पत्रकार होत्या.मराठी चित्रपटातील त्यांची गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत.

शांता जनार्दन शेळके यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला. पुण्यातील हुजूरपागा येथे शालेय शिक्षण आणि नंतर स. प. महाविद्यालयात पुढील शिक्षण झाले.मुंबई विद्यापीठातून संस्कृत आणि मराठी भाषेत एम्. ए. मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

आचार्य अत्रे यांच्या नवयुग मध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलं. समिक्षा स्तंभ लेखिका, पत्रकारिता यांचा त्यांना चांगला अनुभव मिळाला. हिस्लाप महाविद्यालय नागपूर, मुंबईतील रुईया, महर्षी दयानंद महाविद्यालय येथे मराठीच्या प्राध्यापिका म्हणून ही काम केले. मराठी, संस्कृत, इंग्रजी या तिन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. शिक्षण पुण्यात; जोडीला प्राध्यापिका, पत्रकार, सहसंपादिका म्हणून अनुभव; असे असले तरी महाराष्ट्राचं ग्रामीण जनजीवन त्यांच्या साहित्याचा मूळ आधार होता. कारण बालपणातील बराच काळ खेड मंचरच्या परिसरात गेला. प्राथमिक शिक्षणही तिथंच झाले.त्यामुळं लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय होता.

स्री मनाच्या अनेक अवस्थांचे वर्णन नेमक्या शब्दात व्यक्त करणारी अनेक गाणी लोकप्रिय झाली. तरुण स्रीचा खट्याळपणा असो, धीटपणा असो, अगर सल्लज भावना; त्यांच्या कवितेत सरळ, शुद्ध निरागस आत्मविष्कार दिसून येतो. भाषाप्रभूत्व असल्याने त्या सहजतेने लिहून जातात, तरी त्यातील प्रासादिकता वाढतच जाते. त्यांची काव्य शैली ओघवती आणि लालित्यपूर्ण असल्याने कविता असो किंवा चित्रपटातील गाणी, ती अनेकदा ऐकली तरी परत परत वाचाविशी वाटतात, ऐकावीशी वाटतात.

 

©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

शांता शेळके मराठीतल्या एक सुरेल कवयित्री. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी काव्यप्रवाहात शांता शेळके यांच्या कविता लहरी खळाळल्या. उचंबळल्या. त्यांच्या विलोभनीय नर्तनाने, दर्शनाने रसिकांना मोहीत केलं. त्यांचा खळाळ, त्याची गहन गंभीर गाज श्रोत्यांना नादावत गेली

‘सखे कविते आपुला युगायुगांचा स्नेह’

कविता शांताबाईंची जिवलग सखी. त्या म्हणतात, ‘तिनेच आपल्याला सुख-दु:खात सोबत केली. आपले हर्ष –खेद त्यांनी तिलाच सांगितले. मनीची गूजेही त्यांनी तिच्यापुढेच उलगडली. अमूर्त स्वप्ने मूर्त झालेली तिच्यातच पाहिली.

जीवनमार्गावरती क्षणभर

येती जाती किती सुहृज्जन

सखे आपुला युगायुगांचा

स्नेह परी राहील चिरंतन’

कवितेच्या संगतीतच त्यांनी आपले जीवन रंगवले. काव्यातील जीवनात रंगल्यामुळे, जीवनातील काव्याला आपण मुकलो, अशी खंतही त्या क्वचित व्यक्त करतात पण असा क्षण एखादाच. एरवी त्यांचे मन काव्यरंगी रंगलेलेच असते. अंतरीची दु:खे, विफल प्रीतीच्या वेदना, आपलं एकाकीपण हे सारं बोलून दाखवण्याचं तेच एक विश्वसनीय ठिकाण शांताबाईंना वाटतं म्हणूनच आपल्या प्रीय सखीशी त्यांचं नित्य हितगुज चालतं॰

‘मी कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?’

युगायुगांचा कवितेशी असलेला चिरंतन स्नेह ज्या शब्दांच्या रूपबंधातून समूर्त, साकार होतो, त्या शब्दांचा शांताबाईंना विलक्षण लळा. शब्दातून त्यांची कविता साकारली आणि कवितांतून जागोजागी त्यांनी शब्दांचे कौतुक मांडले. कधी त्या म्हणतात, ‘हे शब्द माझा चेहरा हे शब्द माझा आरसा’ कधी त्या आर्तपणे विचारतात, ‘मी कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?’ आपण शब्दांबरोबरच जन्मलो, वाढलो, म्हणत त्या लिहितात,

‘शब्दांसवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले

हे शाप, हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा

… मी जाणते इतुकेच

की यांच्याविना कंगाल मी

पाषाण हे यांच्यावरी,

मी लाविते मजला कसा…

शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा

हे अंतहीन समुद्रसे, माझा पारी दुबळा पसा’

शब्द ‘अंतहीन समुद्रसे’ हे खरेच ! पण शांताबाईंचा पसाही काही दुबळा नाही. अनेक सुंदर, तेजस्वी, मोहक, मनोहारी शब्द त्यांच्या पशात आहेत. पसा पसरला की घननीळ बरसावा, त्याप्रमाणे शब्द त्यांच्या पशात येऊन स्थिरावतात. शब्द आपसूकपणे त्यांच्या मनात उमलतात. ओठात उमटतात नि लेखणीतून कागदावर उतरतात. पण ही आपसूकता म्हणजे योगायोग किंवा चमत्कार नव्हे. त्यामागे त्यांनी केलेली शब्दब्रह्माची उपासना आहे. संस्कृत अभिजात साहित्याचा अभ्यास, संत-पंत- तंत साहित्याचे त्यांचे वाचन होते. जुने-नवे, जे जे समोर येईल, ते ते त्या वाचत गेल्या. आपल्या व्यक्तिमत्वात मुरवत गेल्या. त्यातून त्यांची सुभग सुंदर शब्दकळा घडत गेली॰ केवळ शब्दकळेवरच नव्हे, तर त्यांच्या एकूण काव्यप्रीतीवरच या सार्‍याचा संस्कार झाला. शांताबाई म्हणतात, ‘जुन्या-नव्या कवींपैकी जवळ जवळ प्रत्येकाच्याच कवितेने माझ्या काव्यप्रेमाला थोडा बहुत हातभार लावलेला आहे.’

पारा चिमटीत पकडता येत नाही. तसेच, उचित नेमके शब्द जाणिवेच्या कवेत कवळणं अवघड पण शांताबाईंनाही किमया साध्य झालीय. रूपरसगंधनादस्पर्शाची लावण्ये शांताबाईंचे शब्द आपल्यापुढे नेमकेपणाने उभे करतात.

‘जोराने नुकतीच ही सडसडा येऊन गेली सर’ शब्दातील, ध्वनीची अनुभूती, किंवा ’रात शितळली’ म्हणताना ‘शितळ’ शब्दातून व्यक्त झालेला हवाहवासा वाटणारा कोवळा गारवा, किंवा ‘किर्र बोलते घाना वनराई’ मध्ये ‘किर्रs’ शब्दातून अंगावर ओरखडणारा चारा नि ‘घन या अगदी साध्याच शब्दातून सुचवलेले वनराईचे निबीडपान असे किती तरी नेमके अर्थवाही शब्द त्यांच्या कवितेत भेटत रहातात.

शांताबाईंनी शब्दाला पाषाण म्हंटले आहे. पण ते काही साधे-सुधे पाषाण नव्हेत. सुवारणाचा कस जोखणारे ते नमुनेदार पाषाण आहेत. या पाषाणावर आपले अनुभव, भावना, कल्पना, विचार, चिंतन त्यांनी कसाला लावलय. शांताबाई अखंडपणे साठ वर्षे लिहित राहिल्या नि या पाषाणांनीही त्यांच्या काव्यमुद्रा बावनकशी सोन्याच्या आहेत, असे दाखवून दिले. मात्र हा झळाळ नेत्रदीपक नाही, नेत्रसुखद आहे. सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणांची झळाळी त्यात आहे. शांताबाई लिहितात, ‘शब्दामागे उभा अर्थ   अर्थामागे उभे मन   

                    मनाच्याही पैलपार     बोले कुणीसे गहन

मनाच्या पैलपार बोलले जाणारे गहन गूढ, त्या बोलीचा अर्थ, त्याचे रहस्य जाणून ते नामक्या शब्दात व्यक्त करणे शांताबाईंना सहजपणे जमून गेलय.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वादळ वारं सुटलं गं….. ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ वादळवारं सुटलं गं… ☆ सौ  ज्योती विलास जोशी

चीनच्या वुहानहून निघालेल्या ‘करोना’ नावाच्या वादळानं आपल्या सर्वांच्या मानसिकतेवर आघात केला. पाठोपाठ अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या ‘तौक्ते’ नावाच्या वादळानं आपली नैसर्गिक संपत्ती जमीनदोस्त केली. आपल्या मातृभूमीचं प्रवेशद्वार घायाळ झालं तसं आपलं मन ही…..

या वादळाचं रौद्र रूप पाहताना, अनुभवताना,आपल्या मनाची किनार उध्वस्त झाली.सागराच्या छातीवर दिमाखानं झुलणारी गलबतं, त्याच्याच पोटात बुडून गेली. कित्येक दर्याचे राजे काळाच्या पडद्याआड गेले.राण्यांना वैधव्य आले.अश्रू परवानगीशिवाय डोळ्यातून सांडू लागले.

समस्त दर्यावर्दीना नेमेची भेटीला येणारं वादळ परिचयाचं असं.. सागराच्या भरती-ओहोटीचा खेळ सुख-दुःखाच्या लाटांगत अंगावर झेलत जीवन जगणारी ही माणसं. जीवनाच्या बोटीवर आनंदाचं शीड फडकवणारी ही जमात… हा विचार मनांत येताच ‘वादळ वारं सुटलं गं, वार्‍यानं तुफान उठलं गं.. या ओळींचं स्मरण झालं. शब्दप्रभू शांता शेळके यांनी लिहिलेल्या या गीतानं वादळाकडं सकारात्मक हेतूनं पाहण्याचा दृष्टिकोन मला मिळाला.

‘प्रतिभा’ हा शब्द थिटा पडावा अशी दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई म्हणजे अनेकविध काव्य प्रकारांची एकाच काव्यशेल्यात गुंफण करणाऱ्या मनस्वी कवयित्री! त्यांची तीन कोळीगीतं म्हणजे बिल्वदलंच जणू! प्रत्येक गीत आनंदाच्या लाटा अंगावर घेत मस्तीत झुलावं अशा अवीट गोडीची….

कथाप्रवण आणि भावप्रवाही असणारी अशी ही तीनही गीतं…..

***वादळ वारं सुटलं गं……

प्रत्येक वेळी समुद्रात जाळं टाकताना जीवाची पर्वा न करणारा निधड्या छातीचा हा ‘दर्याचा राजा’आणि तितकीच निडर अशी ‘कोळीवाऱ्याची राणी’.समुद्राच्या रोजच्या वर्तनाबद्दल अनभिज्ञ असणारी ती, नेहमीच लाटांना आव्हान देत आनंदात गाते.तिचा तिच्या नाखवा यावर प्रचंड विश्वास आहे म्हणूनच हे शक्य आहे. वारं,वादळ, तुफान,दर्याला येणारी भरती,पावसाचा कहर या सगळ्यांचं आव्हान ती स्वीकारते, नारळी पौर्णिमेला दर्याची पूजा करून आपल्या नाखव्यासाठी साकडं घालते, आणि आत्मविश्‍वासानं जगते.

एरवी नाखव्याला भेटीचा निरोप ज्या ढगांकरवी ती देत असते तेच ढग आज बेईमान झाले आहेत. वादळ, वार आणि तुफान या त्रिकुटाची तीव्रता ढगांच्या गडगडल्याने जास्त गंभीर होते आणि नकळत राणीच्या हृदयाची धडधड वाढते. शांताबाईंनी ह्या तिच्या धडधडीला ‘जणू शिडाची फडफड’ असं म्हटलं आहे.

नाखवा कामावर गेल्यावर रोजंच ती एकटी असते.पण तो एकांत असतो. आजचं आहे ते जीवघेणं एकटेपण… त्यामुळे माडांची सळसळ आणि खोपीतलं एकटेपण यामुळं तिचा डोळा लागत नाहीये.स्वप्नभंग होतोय की काय?अशी शंकेची पाल तिच्या मनांत चुकचुकतेय. तिची मानसिकता रंगवणाऱ्या शांताबाईंनी आपल्या काव्य प्रतिभेने येथे सर्वांना मंत्रमुग्ध केलय.

तुफान वारा सुटल्यावर आपल्या डोलकराला साद घालणारी आर्त, अगदी मनाला भिडणारी… हा हा हा रे……म्हणत गानकोकिळेतनं ती अचूक साधली आहे. प्रीतीचा जल्लोष असलेलं हे गीत, केवळ अप्रतिम!!

पाण्याला जसं उधाण येत चाललं तसं गाण्यातला वादळाचा वेगही वाढू लागला.ऋजू स्वभावाच्या शांताबाईंनी राणीच्या तोंडी एक सकारात्मक चारोळी देऊन वातावरण आनंदमयी करून टाकलंय. ‘सरसर चालली होडीची ताल’ म्हणत दर्याची राणी तिच्याच तालात नाचू लागते. नाखवा, त्याची बोट, फेसाळणारं पाणी यांना पाहून ती खूश होते. चांदणस्पर्शानं चमचमत्या झालेल्या मासोळ्या अर्थातच ‘दर्याचं धन’ गोळा करणाऱ्या तिच्या नाखव्याला ती ‘दर्याचा राजा’ म्हणते आणि स्वतःला दर्याची राणी म्हणवण्यात धन्यता मानते. मासळीबाजारात हा ताजा म्हवरा विकायला घेऊन जाताना ती सुखावते……

** राजा सारंगा माझ्या सारंगा….

वरील गाण्याच्या बरोबर उलट्या अर्थाचं हे गीत…. वाऱ्यानं पाण्यात अलगद लाटा उसळाव्यात तसं हळुवार असं! या गीतातील दर्याची राणी वातावरणाची थोडी अनामिक भीती घेऊन जगते आहे. ‘सारंगा’ म्हणजे तिच्या नाखव्याची बोट…. तिला ती स्वतःचा धाकला दीर संबोधते त्याला ती ‘माझ्या डोलकराला अलगद घेऊन चल घरी’ अशी विनंती करते.वातावरणाचा अंदाज नाखवालाही आहे, तरीदेखील ती पुन्हा पुन्हा त्याची जाणीव करून देते. शेवटी अगतिक होऊन तिचे डोळे पाण्याने डबडबतात. शांताबाईंनी तिच्या डोळ्यातील अश्रुंना ‘पाण्याचा पूर’म्हणून विषयाचं गांभीर्य आणखी गडद केलंय…. संबाल संसार सारा… या ओळीतून तिची कळकळ जाणवते.

** डोलकर डोलकर दर्याचा राजा..

पराकोटीची वेगळी जातकुळी असलेला वेलवेट व्हॉइस (मखमली आवाज) असणाऱे हेमंत कुमार आणि लतादीदी यांचं हे द्वंद्वगीत….. बिल्वदलातलं हे तिसरं पान….कोळी भाषेतील शब्दांची साखरपेरणी करत शांताबाईंनी लिहिलेलं हे गीत, कोळीवाड्याचा माहोल डोळ्यासमोर उभं करतं. आपसूकच मन कोळी नृत्य करू लागतं……

लता मंगेशकर यांचं कौतुक ते काय करावं आम्ही पामरांनी? ‘या गो दरियाचा दरियाचा दरारा मोठा……..हे ऐकताना मोठा हा शब्द अवाढव्य होतो. ‘उठतया डोंगर लाटा लाटा लाटा…………..हे ऐकताना डोंगराएवढ्या लाटांची भीती वाटण्याऐवजी त्यावर बसून झुलाव असं वाटतं.

पंडित हृदयनाथ यांचं वादळी पण सुमधुर संगीत, प्रतिथयश गायकांचा आवाज आणि शांताताई यांची शब्दरचना असलेली ही कोळी गीतं ऐकताना मन कोळीवाड्यात भन्नाट फिरून येते…. पदन्यास घालतं….उधाण वारा पिऊन मन तृप्त होतं…

अशा या जीवनगाण्याच्या कवयित्रीला माझे शतशः नमन !

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ आठवणीतील शांताबाई शेळके… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

डाॅ.व्यंकटेश जंबगी

?  विविधा ?

☆ आठवणीतील शांताबाई शेळके… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

साधारणपणे १९९२/९३ सालीची गोष्ट असावी! मी त्यावेळी तळेगाव दाभाडे (जि.पुणे) येथे वैद्यकीय अधिकारी होतो. मला साहित्याची आवड शाळेपासून होती.कविता पाठ करायला आवडायचे.शांता शेळके यांच्या कविता आमच्या मराठीच्या पुस्तकात होत्या.तळेगावातील” चंद्रकिरण काव्य मंडळ” या साहित्य विषयक कार्य करणाऱ्या मंडळाचा मी त्या वेळी अध्यक्ष होतो.एकदा तेथील एका संस्थेने शांता शेळके यांना एका कार्यक्रमासाठी बोलावले होते.त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावले होते.मला अत्यंत आनंद झाला.मला १५ मि.बोलायचे असे सांगण्यात आले. ४ दिवस अवकाश होता.मी वाचनालयात गेलो व त्यांच्या निवडक कविता, भावगीते, चित्रपट गीते यांचा अभ्यास केला.भाषण शांताबाईंसमोर करायचे म्हणजे चांगली तयारी हवी.

कार्यक्रमाचा दिवस आला. शांताबाई वेळेवर आल्या. कार्यक्रमापूर्वी ओळख झाली. मी त्यांच्या पाया पडलो.

चहापाणी झाले. शांताबाईंबरोबर अनौपचारिक गप्पा झाल्या. माझे प्रस्ताविक भाषण झाले. त्यांचे भाषण ऐकताना आम्ही भारावून गेलो.आपली जुनी लोकगीते, त्यांची आवडती गाणी व कविता, प्रचंड वाचन आणि शब्दसंग्रह….सारेच अवाक् करणारे… त्यांनी “तारांबळ” हा शब्द कसा निर्माण झाला असावा ? हे फार मार्मिकपणे सांगितले. त्या म्हणाल्या,”  लग्नामध्ये सगळ्यांची गडबड चालू असते, त्यावेळी भटजी ” तदेव लग्नं सुदिनं तदेव!” ताराबलं” दैवबलं तदेव….!!” असे म्हणत असतात. त्यावेळी ‘आमचं ताराबलं झालं’ (गडबड झाली)असं कोणीतरी म्हणाले असेल, त्यावरून हा शब्द रूढ झाला असावा”. ही एक आठवण..त्या म्हणाल्या,” पाच वर्षे वयाच्या मुलीलाही मी मैत्रीण समजते..मला तिच्याशी छान खेळता येतं. ” ही दुसरी आठवण.

मला भावला तो त्यांचा अत्यंत साधेपणा, ओघवती भाषा, गद्यातून पद्यात आणि पद्यातून गद्यात कधी, कशा जायच्या हे कळायचे नाही. त्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्या आयुष्यातील achievement..! त्यांच्या सर्व प्रकारच्या आणि सर्व काळातील साहित्याचा अभ्यास अचंबित करणारा आहे.

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ शांताबाई..आदरांजली… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

कवयित्री शांता शेळके 

(जन्म: 12 ऑक्टोबर 1922 – मृत्यू: 6 जून 2002)

?  विविधा ?

☆ शांताबाई..आदरांजली… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆

आमच्या लहानपणी गणेशोत्सव असला की गणराज रंगी नाचतो, नाचतो पायि घागर्‍या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो ! व

 गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

ही गीते लाउडस्पीकरवर सतत वाजायची. पुढे मोठे झाल्यावर ही गाणी शांताबाईने लिहिली हे कळले. त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला.  शांताबाई एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक  प्राध्यापिका,  संगीतकार,  लेखिका,  अनुवादक,  बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. त्यांचे पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके आहे. त्यांचा जन्म इंदापूर यथे  झाला. त्यांनी आपले बालपण मंचर येथील खेड येथे घालवले.  त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला (अंबिका वहिनी) वहिनी म्हणत असत.एकूण ही पाच भावंडे त्यात शांतबाई सगळ्यात मोठ्या.आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत-नकळत शांताबाईंवर होत राहिले. शांताबाईचे वडील रेंजर फॉरेस्ट ऑफिसर होते. वडिलांच्या बदलीमुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी येथे राहावे लागले. चित्रकलेचे संस्कार आणि  वाचनाची आवड शांताबाईवर कायमच राहिली.. त्या लहान होत्या, तेव्हा त्यांच्या कानांवर विविध पारंपारिक गाणी, कविता आणि श्लोक पडले. म्हणूनच त्यांचे काव्यप्रेम, वाचनावरचे प्रेम या ग्रहणशील युगात रुजले. १९३० मध्ये शांताबाईच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्या नऊ वर्षाच्या होत्या.चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. 1938 मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. आणि पुणे येथून पदवीधर झाल्या. महाविद्यालयातून बी. ए पूर्ण झाले. प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली.या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले.कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला.प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला.हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. बी.ए. झाल्याबरोबर मुक्ता आणि इतर गोष्टी नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्रा. माटेसरांनी प्रस्तावना लिहिली.१९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम्.ए. झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात दोनतीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथे मिळाली. अनेक साहित्याविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.

आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे  शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.

शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार :- गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६, सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी), केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल

साहित्यसंपदा :- कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी (१९५६) तोच चंद्रमा (१९७३)  गोंदण (१९७५), अनोळख  (१९८६),   कळ्यांचे दिवस,  फुलांच्या राती  (१९८६), जन्मजान्हवी  (१९९०),चित्रगीते (१९९५),पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९८) एक गाणे चुलीचे – स्नेहवर्धन प्रकाशन, कविता विसावया शतकाची – उत्कर्ष प्रकाशन, कविता स्मरणातल्या- मेहता प्रकाशन, गोंदण – मेहता प्रकाशन, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा- सुरेश एजन्सी, निवडक शांता शेळके- उत्कर्ष प्रकाशन, हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

शांताबाईंची भक्तिगीते :-

गणराज रंगी नाचतो, नाचतो

पायि घागर्‍या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो !

कटि पीतांबर कसून भर्जरी बाल गजानन नर्तनास करी

तुंदिल तनु तरि चपल साजिरी लावण्ये साजतो !

नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन

ब्रह्मा धरितो तालही रंगुन मृदंग धिमि वाजतो !

देवसभा घनदाट बैसली नृत्यगायने मने हर्षली

गौरीसंगे स्वये सदाशिव शिशुकौतुक पाहतो !

नादयुक्त शब्दरचना कशी असावी याचे हे गीत आदर्श उदाहरण ठरावे. यातल्या प्रत्येक शब्दाला एक अनोखा झंकार आहे, यातली गेयता कर्णमधुर ठरावी अशी आहे कारण याची टिपेला जाणारी स्वररचना होय. त्याचबरोबर बालगणेशाचा ह्रदयंगम कौतुक सोहळा चपखल शब्दात अवीट गोडीच्या चालीत इथे रचला आहे. या गीतावर आपल्या नकळत आपली मान डोलावते.

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग

बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया

गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा

वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्‍ने नेसी विलया

गणेशोत्सवात हे गाणं ऐकलं नाही असं सांगणारा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही. शांताबाईंनी लिहिलेल्या या भक्तीगीताने मराठी माणसाचे खुद्द गणेशासोबतचे नाते दृढ केले आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. इतकं हे गाणं गणेशोत्सवाशी एकरूप झाले आहे.

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. लता मंगेशकरांनी छान गाईले आहे. राम भजन कर लेना, जय शारदे वागीश्वरी, शोधितो राधेला श्रीहरी, नको रे नंदलाला ही भक्तिगीते आपण वारंवार ऐकली आहेत।

शांताबाईंची कोळीगीते :-शांताबाईंची कोळीगीते कथाप्रवण आहेत, त्यातल्या कथा उत्कंठा वाढविणाऱ्या आहेत त्यामुळे त्याला वेगळीच अनुभूती प्राप्त होते. कोळीगीतातली लयबद्ध गोडी हे या गीताचं विशिष्ट्य ठरावं. या गीतात देखील कथात्मकतेची विण आहे, तिचा बाज प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे. लडिवाळीकतेच्या अंगाने जाणारे हे एक युगलगीत आहे, ज्यात ते दोघेही एकमेकासाठी आसक्त झालेयत अन निसर्गाला साक्षीस ठेवून ते साद घालताहेत.

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा

घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !

आयबापाची लाराची लेक मी लारी

चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी

माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा

वास परमालता वार्‍यानं घेतंय झेपा

नथ नाकान साजीरवानी

गला भरुन सोन्याचे मनी

कोलिवाल्याची मी गो रानी

रात पुनवेला नाचून करतंय्‌ मौजा 

वादलवारं सुटलं गो वार्‍यान तूफान उठलग

तुफानवारं सुटल्यानंतर आपल्या डोलकराला साद घालणाऱ्या कोळीणीची आर्तता मनाला भिडणारी आहे, डोळ्यात पाणी आणून ती म्हणते की, ‘डोलां लोटीला पान्याचा पूर संबाल संसार सारा..’ या गाण्याला सुरसंगीताचा अप्रतिम साज चढवल्याने ते अत्यंत श्रवणीय झालेय.

माज्या सारंगा, राजा सारंगा, डोलकरा रं धाकल्या दीरा रं

चल जावया घरा !

आज पुनवा सुटलंय दमानं दरियाच्या पान्याला आयलंय उदान

पिऊन तुफानवारा  शीड फाटलं धावतं पाठी

तुटलंय्‌ सुकानू मोरली काठी

फेसाल पान्याचा घेरा  कोलीवारा रं राहीला दूर

डोलां लोटीला पान्याचा पूर  संबाल संसार सारा  

माजे रानी माजे मोगा, माजो लवताय डावा डोळा ही गीते कायम स्मरणात राहतात.

शांताबाईने लिहिलेली प्रेमाची गाणी:- शालू हिरवा पाच नि मढवा वेणीत पेढी घाला साजणी  बाई येणार साजण माझा, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, शोधू मी कुठे कशी, सांगू कशी प्रिया मी, पायावरी प्रियाच्या सर्वस्व, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना, प्रीति जडली तुझ्यावरी, घन रानी साजणा, प्रीतफुले माझी सोनेरी, प्राणविसावा लहरि सजण, चित्र तुझे हे सजीव होऊन, अशीच अवचित भेटून जा, असता समीप दोघे हे, तळमळतो मी इथे तुझ्याविण ही गाणी खूप लोकप्रिय झाली.

शांताबाईने लिहिलेली निसर्गाची गाणी:- पाऊस आला वारा आला, श्रावणसरी, ऋतु हिरवा, ऋतु बरवा तर ‘ऋतू हिरवा’ या कवितेत ऋतूंचे इंद्रधनुष्यी रंगातले चित्र त्या आपल्या शब्दकुंचल्यातून साकारतात. भिजुनी उन्हे चमचमती, मधुगंधी तरल हवा, मनभावन हा श्रावण, पुढे त्या म्हणतात   भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण

थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू

गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा…’ अशी मनमोहक शब्दसंगती त्यांनी योजली आहे.

चंद्र चांदण्याचे गाणे :- चांदणं टिपूर हलतो वारा, चांदण्या रात्रीतले ते, शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलव झूला, पुनवेचा चंद्रम आला, चंद्र दोन उगवले, आज चांदणे उन्हात हसले, तोच चंद्रमा नभात ही गाणी अनेकांच्या ओठावर आपसूकच येतात.

बालगीते:- विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा

भातुकलीचा सार्‍या तुम्ही केला चट्टामट्टा !

पसाभर शेंगदाणे, पसाभर गूळ

एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ?

खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा !

कुठुन मेलं बाहुलीचं लग्‍न काढलं आम्ही?

विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही !

बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा !

सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो

भिकार्‍यांशी नातं जोडुन बसलो !

वरमाईचा पोकळ नुसता पाहून घ्यावा ताठा !

बडबडगीताच्या चालीवर आधारित भातुकलीच्या विवाहप्रसंगातलं लोकगीतही शांताबाईंनी मोठ्या तन्मयतेने लिहिले आहे. त्याला तितकीच रसिकमान्यताही मिळाली ! या गाण्याला गाताना आजही बालपणातला आनंद अनुभवता येतो.

बाळ गुणी तू कर अंगाई, बाळा माझ्या नीज ना, टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा, जो जो गाई कर अंगाई, झुलतो झुला जाई आभाळा, किलबिल किलबिल पक्षि ही सारी बालगीत आजही मनाला आनंद देतात.

देशप्रेमाच्या कविता :- ‘शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती?

देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

आईच्या गर्भातच  झुंजायची रीत आम्हाला कळली. तलवारीशी लगिन लागलं

लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !

जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं

लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं

देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती !’

शांता शेळके यांनी लिहिलेले हे गीत शाळकरी मुलापासून ते उतारवयाकडे झुकलेल्या ज्येष्ठापर्यंत सकलांच्या अंगावर रोमांच उठवते. नसानसात जोश भरणारी ही कविता इतकी आवेशपूर्ण आहे की ऐकणाऱ्याच्या मनामध्ये स्फुरण निर्माण होते. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात लता मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम स्वरात हे गाणं गायले आहे.

लावणी:- शृंगाररसाचा अतिरेक न करता देखण्या ढंगाची लावणी कशी लिहावी याचं उत्तम उदाहरण म्हणून शांताबाईंच्या लावणीकडे निर्देश करता येईल. आपल्या साडीचं मनमोहक वर्णन करतानाच आपल्या प्रितमास साडीला हात लावू नको असं लाडे लाडेचं सांगणं अगदी मधाळ शैलीत त्यांनी मांडलंय. यातला ठेका ताल धरायला लावणारा आहे. काव्यरचनेत लावणीचा ठसकेबाजपणा आहे, अगदी कोरीव रेखीव असं हे गाणं आजही रसिकप्रिय आहे.

रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला

हात नगा लावू माझ्या साडीला !

नवी कोरी साडी लाखमोलाची  भरली मी नक्षी फूलयेलाची

गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला हात नगा लावू माझ्या साडीला !

जात होते वाटंनं मी तोर्‍यात  अवचित आला माझ्या होर्‍यात

तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?  हात नगा लावू माझ्या साडीला !

भीड काही ठेवा आल्यागेल्याची मुरवत राखा दहा डोळ्यांची

काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला हात नगा लावू माझ्या साडीला !

इतक्या विविध विषयावरची आशयघन सहजसोपी व तितकीच रसिकप्रिय काव्यरचना मराठी कवितेत अन्य कुणा कवयित्रीच्या हातून प्रसवली गेली नाही. यात शांताबाईंच्या कवितेची वेगळी उंची दिसून येते.

आपल्या अभिजात प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यात स्वतःचं उत्तुंग स्थान निर्माण करणाऱ्या शांता शेळके प्रत्येक रसिकाला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगळ्या अवस्थेत भेटत गेल्यात ; बाल्यावस्थेत बडबडगीते, तारुण्यात प्रेमगीते, पोक्तवयात भावगीते आणि उतार वयात   भक्तिगीते – भावकविता असा त्यांचा प्रत्येकाशी संवाद होत गेलाय.

6 जुन त्यांचा स्मृति दिन त्यांना आदरांजली ?

 

© डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे

प्राचार्य लोक महाविद्यालय वर्धा

ईमेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक पर्यावरण दिन निमित्त – पर्यावरण दिन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆जागतिक पर्यावरण दिन निमित्त – पर्यावरण दिन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज ५ जून – जागतिक पर्यावरण दिन. जसे फादर्स डे, मदर्स डे तसाच … वर्षातून एकदा तरी आईवडील हे शब्द त्यानिमित्ताने नक्की आठवतात, ही आई-वडिलांसाठी समाधानकारक गोष्ट. पण ‘पर्यावरण दिन’? – म्हणजे पर्यावरणाची आठवणही अशीच फक्त एक दिवस काढायची?

“पर्यावरण”… केवढा व्यापक शब्द… हा सकल सजीवसृष्टीचा आधार. क्षणाक्षणाला घेतल्या जाणा-या श्वासाची प्रत ठरवणा-या या पर्यावरणाबद्दलची कृतज्ञता, वर्षातून फक्त एकदाच? तीही फक्त शाब्दिक ? एरवी त्याचे सर्रास हाल करायचे— किती कृतघ्नपणा आहे. निसर्गातल्या  सर्व सजीव घटकांमधला, माणूस हा एकच प्राणी असा आहे, जो त्याच्या जीवनदात्याशी अतिशय बेपर्वाईने, निष्ठुरपणे वागतो. इतर सगळे घटक स्वत:च्या मर्यादा ओळखून जगतात आणि म्हणूनच कदाचित् माणसापेक्षा जास्त आनंदात जगतात.  इथे एक कविता आठवते……

मुक्त विहरती कशी पाखरे

किलबिल किलबिल आकाश भरे

ऐकियला का कधी कुणी हो

कलरव त्यांचा उसासे भरे ….

वृक्ष-वेली अन् बागा फुलत्या

वा-यासंगे नितचि डोलत्या

पाहियल्या का कधी कुणी हो

वैतागती अन् हिरमुसती त्या…

… ही मुक्तपणे जगणारी पाखरं, मिळेल त्या अन्नपाण्यावर होता होईतो फुलून रहाणारी झाडं-वेली, कधीतरी ‘आणखी’ साठी हपापलेत, देणा-यालाच ओरबडताहेत, वेळप्रसंगी त्याला संपवायचा घाट घालताहेत, असं पुसटसं तरी जाणवतं का? अशक्यच. पण माणूस? तो या सगळ्यांपेक्षा अगदीच वेगळा. जन्माला येतानांच श्वासाबरोबरच हव्यासही घेऊन आलेला… ‘आणखी’ मध्ये जाणवणारा असंतुष्टपणा, हाव, हा तर त्याचा स्थायीभावच …

‘इवलीशी जरी चोच, तिने सतत काही टिपतांना, पोटापुरतंच घ्यावं…

हा पोच बघ आहे का?’

……  हा प्रश्न पक्ष्यांना, आणि मतितार्थाने प्राण्यांनाही विचारण्याची कधी गरज पडत नाही. पण माणूस?…  स्वत:च्या पोटाची  गरज तर लक्षात घेतच नाही, उलट त्याला एकट्यालाच वरदान म्हणून मिळालेल्या प्रतिभेचा वापर प्रगतीसाठी करण्याच्या नादात, ज्या पर्यावरणामुळे त्याचे जीवन सुरक्षित, सुखी रहाते, त्याचीच अनिर्बंध नासधूस करतो आहे…

खळखळ झरझर पाणी वाहे

समुद्री आणि नदी प्रवाहे,

पाहियले का कधी कुणी हो

वैतागून ते थांबून राहे …

असं अगदी निर्मळपणे पाण्याचं कौतुक करणा-या कवीचाही पूर्ण भ्रमनिरास व्हावा, असं वागत, आज माणूस काय करतो आहे? या नितळ पाण्यात असंख्य प्रकारचा कचरा, घाण, रासायनिक द्रव्यं, मृतदेहाच्या अस्थी, आणि प्रसंगी पूर्ण मृतदेहही टाकण्यात तो जराही कचरत नाहीये. पाणी म्हणजे जीवन म्हणत, तो स्वत:च ते जीवन निरूपयोगी करायला मागे-पुढे पहात नाहीये, हे फक्त पर्यावरणाचंच नाही, तर त्याचं स्वत:चंच दुर्दैव आहे, हे त्याच्या लक्षात येतच नाहीये, की लक्षात घ्यायचंच नाहीये? त्याची गुर्मी, माज, लोभ-मोह, सगळं इतकं वाढलंय, की स्वत:चं वागणं फक्त स्वत:वरच नाही, तर सगळ्या जगावर उलटू शकतं, हे कळत असूनही वळेनासे झालंय् त्याला … हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा. या विचाराशी थबकल्यावर कवितेतल्या पुढच्या ओळी आठवताहेत…

वाटे मजला रोजच यांना

पहाटेच तो देव भेटतो

षड्रिपु त्यांचे बांधून ठेवून

मुक्त तयांना करून जातो ॥

आम्ही माणसे पाखंडी किती

सुखनिधान ते उरी गाडतो

षड्रिपु सारे मुक्त सोडुनी

सुख शोधत अन् वणवण फिरतो ॥ ….

—खरंच्, पशु-पक्षी, झाडं-वेली अशा निसर्गातल्या इतर गोष्टी लोभ-मोह-मत्सर –सगळ्यापासून दूर असतात, मुक्तपणे जगतात. माणसं मात्र या रिपूंच्या विळख्यात बहुतेक वेळा स्वत:च स्वत:ला अडकवून घेतात, आणि त्या निसर्गाच्या, पर्यायाने पर्यावरणाच्या बाबतीत ‘पाखंडी’पणे वागतात. जगतांना त्याच्या अस्तित्वावाचून पर्याय नाही या सत्याकडेही, स्वत:च्या स्वार्थासाठी सोयीस्कर दुर्लक्ष करतात. पर्यावरणाचा वाढता -हास बघता, ‘प्रगती’ हे नाव गोंडस असले, आणि प्रगती होणे गरजेचेही असले, तरी त्यात दडलेला स्वार्थ, त्या ‘प्रगती’लाच बदनाम करतो, हा विचार माणसाच्या मनात डोकावतही नसेल का? हा प्रश्न वारंवार पडावा, अशीच सध्या सगळीकडची परिस्थिती दिसते. म्हणजे माणसाची मानसिकताच आता अशी झाली आहे का  … की …

‘निसर्ग जणू खेळणेच आम्हा, ओलिस त्याला आम्ही ठेवू ।

फुकट सापडे हाती तर त्या, बिगा-यास मुळी मोल न देवू ॥’

हे आता गृहीतच आहे का ? सिमेंटच्या जंगलांसाठी, आणि अल्पजीवी वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रचंड वृक्षतोड, कधीही विघटन होऊ  शकणार  नाही  अशा  कच-याची अतोनात निर्मिती, स्वत:च्या गरजेनुसार, पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची, प्रवाहांची दिशा आणि गतीही बदलणे, सोय म्हणून नदीत कचरा टाकत पाणी प्रचंड प्रदूषित करणे, उत्पादन प्रक्रियेत निर्माण होणारे प्रचंड विषारी वायू, त्यांचे घातक परिणाम माहिती असूनही वातावरणात मुक्तपणे सोडणे… अशासारख्या, पर्यावरणाची पूर्णपणे वाट लावणा-या गोष्टी जगभर दिवसेंदिवस सर्रासपणे वाढत असतांना, वर्षातला एक दिवस ‘पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करणे म्हणजे,  पर्यावरणाचा घोर अपमान करणेच आहे. स्वत:च्या आईला निलाजरेपणाने कसेही वागवायचे आणि फक्त ‘मदर्स डे’ला, ‘मदर’ हा फार व्यापक अर्थाचा  शब्द केवळ उच्चारायचा, तसंच वाटतं, आज ‘पर्यावरण दिन’ आहे म्हणतांना … हे अहितकारक चित्र बदलायलाच पाहिजे… स्वतःला बुद्धिमान ‘माणूस’ म्हणवणा-यांनीच बदलायला पाहिजे.

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पुणेरी मिसळ – गुंड्याभाऊंचा कोरोना! ☆ श्री अभय जोशी

?  विविधा ?

☆ पुणेरी मिसळ – गुंड्याभाऊंचा कोरोना! ☆ श्री अभय जोशी ☆

प्रिय गुंड्याभाऊ,

स. न. वि.वि.

तुला कोविडबाधा झाल्याचे समजले. मीही दोन दिवस तापलो होतो. पण ते लसीकरणामुळे. तुला सांगणारच होतो. तेवढ्यात तुझ्या बाधेचे वृत्त समजले. घालमेल सुरू झाली. अखेर परवा चि. मोरूने व्हिडीओकॉल लावून दिला. पण तुला खोकल्याची उबळ येत होती. बोलणे शक्य नव्हते. अखेर आज हे पत्र तुला पाठवतोय. त्या दिवशी मोबाईलवर चेहराच दिसला तुझा फक्त. खाली किती वाळला आहेस, याचा अंदाज आला नाही. असो. स्कोअर फारच कमी आहे तुझा, ही आनंदाची बाब. (शाळा-कॉलेजात कधी तुझा स्कोअर वाढला नव्हता, ही चिंतेची बाब होती)  बहुतेक कोरोनाला तुझी बाधा झाली असावी, असो. तू नक्की खडखडीत बरा होणारेस. ज्या वयात ‘मदनबाधा’ व्हायला हवी होती, तेव्हा काही झालं नाही. आता भलत्या वयात ‘कोविडबाधा’ मात्र होतेय. (हास जरा मेल्या. खोकू नकोस). डॉक्टर सांगतील ती सारी औषधे घे. पथ्ये पाळ. ‘मी दणकट आहे, काही होणार नाही,’ या भ्रमांत राहू नकोस. या कोरोनाने भल्या भल्यांना ग्रासलेंय. कोविडबाधेत माझा आधी नंबर लागेल, असं वाटलं होतं. पण तू लावलास. असो. लवकर बरा हो. अशक्तपणा घालवण्यासाठी अति पौष्टिक आहाराचा फार मारा करू नकोस. सुक्यामेव्याचा तोबरा भरणे, वरणभाताच्या ढिगाऱ्याचा फडशा पाडणे, भाकऱ्यांची चळत संपवणे… असले अघोरी प्रकार करू नकोस. मिताहार कर, पण पौष्टिक कर. नाही तर अति आहारानेंही कोविड स्कोअर वाढतो म्हणे. शिवाय गृह विलगीकरणात आहेस. चौदा दिवसांनी त्या खोलीच्या बाहेर यायचेंय. नाही तर लठ्ठपणा वाढल्याने दारातच अडकशील. (हसू नकोस, खोकला येतोय तुला.) ऑक्सिमीटरचा चिमटा जवळ ठेव. नियमित तपास. फक्त त्या चिमट्यात बोटं घालण्याचा नाद लावून घेऊ नकोस. बॅटरी संपेल. मग ते मीटर काहीच दाखवणार नाही. तुला वाटेल ऑक्सिजन संपला की काय? घबराट उडेल. त्यानेंही ऑक्सिजन खालावतो. अशा वेळी पालथा झोप. (ढेरीमुळे ते किती शक्य होईल, शंकाच वाटते. सीसॉ होईल शरीराचा) तरीही झोप तसाच. त्याने ऑक्सिजन वाढतो म्हणतात. असो. बरा झाल्यावर उंडारू नकोस लगेच. भलता अशक्तपणा असतो. आमच्या शेजारचे चिंतोपंत असेच चौदाव्या दिवशी उंडारायला लगेच बाहेर पडले. तर रस्त्यात पँटच घसरली. ते सावरताना त्यांनाही चक्कर आली. आधी चक्कर आली की पँट घसरली, नेमकें आधी काय घडले, ते समजले नाही. पण जे काही झालें ते अशक्तपणामुळेच. असो. तू मात्र हे लक्षात ठेव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. पुढच्या वेळी घरी प्रत्यक्ष भेटू.

– तुझा चिमण.

≡≡≡≡≡≡≡≡≡

प्रिय  चिमण,

स. न. वि.वि.

तुझं पत्र मिळालं. बरं वाटलं. या कोरोना विलगीकरणाच्या वैराण वाळवंटात तुझं पत्र मरुद्यान वाटलें. चिमण, तू काढलेले चिमटेही याही अवस्थेत हसवून गेलें. मला सोडून तू एकटेच लसीकरण केलेंस. त्यामुळेच तापलास लेका. ‘लस नव्हे तर तुला नर्स लक्षात राहिली,’ असें काऊ वहिनी फोनवरून सांगत होती. चावट कुठला. असो. हे विलगीकरण अगदी नकोसें झालेंय बघ. परवा ताप-खोकल्याचं निमित्त झालं नि आप्तेष्टांनी धोशाच लावला. कोरोना चाचणी करून घ्या म्हणून. शेवटी केली एकदाची चाचणी. ती सकारात्मक असल्याचा माझ्यासाठी नकारात्मक अहवाल मिळाला. अन् तोंडचें पाणी पळालें, त्यापाठोपाठ चवही गेली. नंतर वासही येणेंही बंद झालें. आप्तेष्टांनी खोलीत बंद करून टाकलेंय. नाश्ता-दोन वेळच्या जेवणाचं ताट दारातून आत सरकवतात. एखादा कैदी किंवा श्वापद झाल्यासारखा भास मला होतोय. खोलीत नुसता येरझाऱ्या घालत असतो. काळजी करू नकोस. येरझाऱ्या घालण्याने ऑक्सिजन काही कमी होत नाही माझा. उलट ऑक्सिमीटर आधी ९५ असेल तर येरझाऱ्यांनी ऑक्सिजन स्तर ९७ दाखवतो. ऑक्सिमीटरच्या चिमट्यात मी कायम बोट घालून बसतो, हा तुझा गैरसमज आहे. देव करो तुला कोरोना कधीही न होवो. नाही तर तू पाचही बोटांत ऑक्सिमीटर घालून त्या वेगवेगळ्या आकडेवारीची सरासरी काढत बसशील. पाचही बोटांत ऑक्सिमीटरचे चिमटे, काखेत एक अऩ् तोंडात एक थर्मामीटर ठेवून कानटोपी घालून बसलेला चिमण माझ्या डोळ्यांसमोर येतोय. (हास मेल्या. मी खोकतो.) अरे या उन्हाळ्यात वाफारे घेणे, गरम पाणी पिणे, गुळण्या करणे म्हणजे ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा आहे रे. परवा खिडकीतून फळवाल्याला हातवारे करून फळे पाठवण्यास सांगत होतो. तर दाढीतील माझा अवतार ‘खिलौना’ चित्रपटातील खिडकीतील वेड्या संजीवकुमारप्रमाणे भासत होता, असें शेजारी सांगत होते. रस्त्यावरची दोन-तीन माणसे मला पाहून सैरावैरा धावत सुटली. असो. सध्या प्राणायाम सुरू आहे. जलनेतीचा प्रयोग फसला. नाका-तोंडात पाणी गेलं. माझ्या खोलीतच खोलवर बुडाल्याचा भास झाला. माझा सोटा घेऊन कोरोनाला झोडपावेसे वाटतेय. असो झेपेल तेवढें व्यायाम करतोय. लवकरच बरा होऊन उकडीचे मोदक चापायला येईनच तुझ्याकडे.

– तुझा गुंड्या.

 

– श्री अभय नरहर जोशी

[email protected]

(लेखक ‘लोकमत’च्या पुणेआवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असाही शेजारधर्म !! ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले 

? विविधा ?

☆ असाही शेजारधर्म !! ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

आम्ही राहत असलेल्या त्या इमारतीत खालच्या दोन सदनिकाच भाड्याने दिल्या होत्या. वरच्या दोन सदनिका मोकळ्याच होत्या. बँकेतील अधिकारी, सरकारी अधिकारी, अशा व्यक्तींची काही कालांतराने बदली होतेच. त्यामुळे मालकानी अशा व्यक्तींनाच घर भाड्याने देण्याचे ठरविले होते. आम्हीही बदलीमुळे या शहरात आलो होतो. त्या सदनिका ऐसपैस, चांगल्या होत्या. तेथे आम्ही आमचा बाड-बिस्तरा हलवला.

शेजारी एक जण राहतात एवढंच ठाऊक होतं. पुढे सामान लावल्यावर सवड झाली तेव्हा कळले की आपले शेजारी आयकर अधिकारी राहतात. त्यांची मुले माझ्या मुलांपेक्षा वयानं मोठी होती. मुलांच्या आई फारशा कोणात मिसळत नसत. पण बोलक्या होत्या. त्यानंतरही दोन कुटुंबे येऊन गेली.

नंतर खालच्या सदनिकेत एक बँक अधिकारी राहायला आले. वरच्या मजल्यावरची सदनिकाही दिली गेली. शैला, तिची दोन लहान मुले, यजमान, एवढेच मर्यादित कुटुंब होते. ते व्यावसायिक होते. खाली राहणाऱ्या बँक अधिकाऱ्यांशी त्यांची आधीपासून ओळख होती. शैलापेक्षा मी प्रौढ होते. तिचा लहानबाळ श्रेणिक सहा महिन्यांचाच होता. आम्हाला लहान मुलांची आवड असल्याने तो आमच्याकडे बरेच वेळा असे. त्याला आमचा लळा लागला होता. शैला कर्नाटकातील होती. सुरुवातीला तिला मराठी भाषा अवगत नव्हती. हळूहळू बोलायला शिकली.

ती स्वयंपाकात, लहान वय असूनही सुगरण होती. करणं-सवरणं, सर्वच पदार्थ खमंग होत. ती नेहमी असे खमंग पदार्थ घेऊन येई. तिची वांग्याची भाजी अजूनही जिभेवर रेंगाळते. आता स्वत:ची घरे झाली. सहवासात अंतर पडलं. खायचा योग येत नाही. मुले म्हणतात एकदा शेटे काकूकडूनच वांग्याची भाजी करून आण. आमची मनं छान जुळली होती.

सगळ्या जणीच अशा सरमिसळून वागणाऱ्या असतातच असे नाही. नवीन शेजारीण कुलकर्णी वहिनीही अशाच मिसळून जातील असे वाटले होते. आता शेजार मिळाल्याने मी आनंदात होते. सर्वांनी एकत्र यावं. अंगतपंगत करावी. सणासुदीला एकमेकांनी सण साजरा करावा, अशी विचारसरणी मी बाळगून होते.

माझी फार वर्षांपूर्वीची पद्मा ही मैत्रीण ह्याच गावात बदलून आली होती. ती ह्यांच्या ऑफीसमधील मित्राची बहीण होती. ठाण्यात असताना हे मित्र आमचे शेजारीच राहत. तीही मधूनमधून भावाकडे येई. त्यामुळे आमची ओळख मैत्रीत रूपांतरित झाली. तिचा आमचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. आमची बदली कोल्हापूरला झाली. तीही कोल्हापुरात बदलून आली. इथे सांगलीतही आम्ही मागे-पुढे दाखल झालो. त्यामुळे पुन्हा मैत्रीचे धागे जोडत होतो.

पद्मा उत्तम लोकरीचे स्वेटर, मफलर मशीनवर करीत असे. तशी ती कलाकारच होती. आम्ही तिचे कौतुक करीत असू. मी कधीतरी करून आणलेला स्वेटर घातला की सर्व जण विचारीत कोठे घेतला. किती छान आहे.

असेच एकदा शेजारी गप्पा मारताना, स्वेटरचा विषय निघाला. नवीन आलेल्या कुलकर्णी वहिनीही होत्या. त्यांनाही तो स्वेटर आवडला. मी त्यांना माझ्या मैत्रिणीचा स्वेटर करण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यांनी माझ्याकडे पद्माचा पत्ता विचारून घेतला. मधले काही दिवस मी माझ्या दैनंदिन कामात व्यग्र होते. मधल्या काही दिवसांत आम्ही शेजारणींची गप्पाष्टकेही रंगली नाहीत. एके दिवशी, कुलकर्णी वहिनी, येऊ का, म्हणत घरी आल्या. मी म्हटलं, “आवरलं सकाळचं सगळं!” त्या “हो” म्हणाल्या. थोड्या वेळ इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. बोलता, बोलता त्यांनी त्या पद्माकडे स्वेटर करायला दिल्याचेही सांगितले. पुढे आणखीन काहीतरी त्यांना सांगायचे होते. मी चहा करायला आत गेले. चहा पिऊन झाल्यावरही त्या घुटमळत होत्या. त्या पद्मा वहिनी आहेत ना. “त्या तुमच्याविषयी सांगत होत्या!”

“काय सांगत होत्या?” मी विचारले. “तुम्ही ठाण्याला त्यांच्या भाऊ-वहिनी शेजारीच राहत होतात ना!” मी हो म्हटले. मग तेव्हा तू-तुम्ही म्हणे त्यांच्या भावजयीला, नणंदेशी चांगले वागू नका असे सांगत होता. “कशाला चोळी-बांगडी करता, काही देऊ नका वगैरे वगैरे. हे खरंच त्यांनी मला सांगितले. मी म्हटलं, “अहो, असे ती म्हणणार नाही. आमचे खूप वर्षांचे संबंध आहेत. तुमचा ऐकण्यात गैरसमज झाला असेल!” त्या नंतर घरी गेल्या.

मनातून मी अर्धमेली झाले. जिच्याबरोबर एवढ्या वर्षांची ओळख आहे. दोघी शिवण क्लासला बरोबर जात होतो. कोल्हापूरलही जवळजवळ राहत होतो. कशावरून कधीच धुसफूस झाली नाही. ह्या कुलकर्णी वहिनी अंगचेच काही सांगतात की पद्मा तसे…? मी कधीच चुगल्या खाल्ल्या नाहीत असे शिकवायला, त्या वेळी मी नवविवाहित, पोरसवदा होते. तिच्या वहिनी सहा मुलांची आई. हे पटणारच नव्हतं. कळ लाव्या नारदाची भूमिका मी कधीच केली नाही. आजपर्यंत हे तत्त्व पाळलंय. ज्येष्ठ नागरिक असून पुढच्या हयातभर ह्या तत्त्वाशी एकनिष्ठच राहीन.

थोडे दिवस मनस्ताप झाला. काही सुचत नव्हतं. पद्मा, तिच्या वहिनी साऱ्यांचे चेहरे डोळ्यांपुढे नाचत. जे कधीच केले नाही त्याचे बालंट माथी का घेऊ? मग सरळ पद्माकडे जायचे ठरविले. तिला विश्वासात घेऊन, कुलकर्णीबाईंचे वक्तव्य सांगायचे. त्या दिवशी तिच्या घरी गेले. तिचे यजमानही घरीच होते. मी सर्व हकिकत दोघांना सांगितली. दोघांनाही धक्काच बसला. तिच्यावरही हा नसता आरोप केल्यासारखे झाले होते. माझ्याविषयी तिचे असे मत कधीच नव्हते. त्यामुळे, गैरसमजाचं मळभ दूर झाले. मनावर आलेला ताण एकदम ओसरला. आम्हा दोघींत पूर्वीचा जिव्हाळा, आपुलकी व प्रेम तसेच राहिले. पुढे उलट अधिक गडद झाले. पुढे माझ्या बॅडमिंटन ग्रुपला तिला जोडून घेतले. तिची बदली पुण्यात झाली तरी आम्ही भेटत राहिलो. आमचं नातं रेशीमबंधांनी बांधलेलं घट्टच होतं. ते काही कोणाच्या साध्या माऱ्यानं तुटणार होतं थोडंच!

या इमारतीत वरच्या सदनिकेत राहणारी शैला अशीच काही दिवसांकरिता माझ्यापासून दूर केली गेली. तिच्या समभाषिक या भगिनींनी येऊन तिला आपलंसं केलं. पुण्या-मुंबईसारख्या शहरात राहिल्याने नोकरी केल्यामुळे, अंगी तरतरीतपणा बाणला होता. दुचाकीवरून पटापट कामे करायला जाणे, बॅडमिंटन खेळणे, तीन मुलं असूनही उरकून सगळ्यात पुढे असणे, असे इतरांपेक्षा वेगळेपणही काहींना खुपत असते. बायकांचा हेवा, मत्सर करण्याचा अनादिकालापासूनचा स्वभाव, आर्थिक बाबतीत केलेली तुलना इत्यादी अनेक क्षुल्लक कारणांकरिता ‘बायका एकमेकींना पाण्यात पाहतात. त्यामुळे चांगली नाती जोपासणं, बांधणं वेळप्रसंगी अवघड होतं. उलट मनावर तणावच वाढतो.

माझे तसेच झाले. या नव्या शेजारणींनी शैलाला आपलंसं केलं. आपल्या गटात ओढून घेतलं. मला, माझ्या मुलांना बाजूला टाकलं. पण मी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न केला. माझ्या दैनंदिन कामात, खेळात स्वत:ला गुंतवून ठेवले. एकमेकींशी हसत-खेळत वागावे. मोकळेपणे बोलावे. याला काही पैसे पडत नाहीत. पण या नव्या शेजारणीचा दुही पाडण्याचा अनुभव मनाला टोचत राहिला.

पुढे या बदलीवाल्या, आपलं बिहाड-बाजलं घेऊन नवीन ठिकाणी गेल्या. आमच्या स्मरणातूनही त्या गेल्या. आम्ही दोघी मात्र या गावचेच होऊन राहिलो. शैला माझी शेजारीण घरच्या सारखीच राहिली आहे. तिला माझ्या जुन्या भिशीत जोडून घेतलं आहे. लांब राहत असलो तरी भिशीच्या माध्यमातून निदान महिन्यातून एकदा भेटतोच.

मध्यंतरी माझ्या सासूबाई अत्यवस्थ आजारी होत्या. ते इस्पितळ शैलाच्या घराजवळच होते. त्यादिवशी मी रात्री घरी जाऊ शकत नव्हते. हक्काने दोन घास जेवायला तिच्या घरी गेले. पुढचे काही दिवस ती सकाळचा नाश्ता घेऊन माझ्याकडे इस्पितळात येत असे.

मैत्रीची, नात्यातील माणसामाणसांतील प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची रेशीमबंधने विणली जातात. घट्ट धागे जुळतात कधी न तुटण्यासाठी, क्षणैक आलेल्या वादळामुळे, कु-प्रवृत्तीच्या माणसांमुळे थोड्या कारणाकरिता जरी तुटायचे म्हटलं तरी इतके चिवट असतात की ते तुटत नाहीत आणि तुटले तरी पुन्हा जोडले जातात. चरख्यावर सूत काढताना धागा तुटला तर आपण पुन्हा दोन धागे बेमालूम जोडतोच ना. तशी ही मनं पुन्हा सांधली जातात, जुळतात. जगाची रीतंच आहे तशी!

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खाद्यभ्रमंती… ☆ सुश्री परवीन कौसर

? विविधा ?

☆ खाद्यभ्रमंती…… ☆ सुश्री परवीन कौसर ☆

आज मी तुम्हा सर्वांना माझ्या तांबड्या पांढऱ्या नगरीत म्हणजेच कलेच्या नगरीत आई अंबाबाईच्या कलापुर म्हणजेच कोल्हापूर मध्ये खाद्य भ्रमंती करण्यासाठी नेणार आहे.

जेव्हा तुम्ही पुणे मुंबई हायवे वरून आत कोल्हापूर मध्ये दाखल व्हाल तेव्हा तुमच्या स्वागताला एक मोठी कमान सज्ज असेल.

कमानी पासून अगदी थोड्याच अंतरावर बसस्थानक आहे.बसस्थानकाच्या बाहेर नाष्ट्याचे पदार्थ सुसज्जीत आणि सुशोभितपणे उभ्या असलेल्या गाड्या मिळतील.त्या गाड्यांवर पोह्यांचे डोंगर आणि सोबतीला वाफाळलेला चहा मिळेल.पोहे आणि शिरा एकत्र प्लेट मध्ये मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे माझे कोल्हापूर.

चहा, पोहे, शिरा, उप्पीट हे तर आहेतच पण या मध्ये मिसळपाव ला विसरून कसे चालेल.

मिसळ आणि कोल्हापूर एकच समीकरण.कोल्हापूरची झणझणीत, चरचरीत लालभडक कट वाली मिसळ त्यावर शेव,चिवडा आणि सोबतीला लिंबू आणि पाव याचबरोबर त्यावर सजवलेले कोथिंबीर कांदा.आहाहा फक्त नावानेच तोंडाला पाणी सुटले.

खाऊ गल्ली राजारामपुरी आणि भवानी मंडप येथे.संध्याकाळी लोकांचे थवे पहायला मिळतात.

एका पेक्षा एक खाण्याचे पदार्थ.शेवपुरी,पाणीपुरी,रगडा पॅटीस,भंडग,कांदा भजी,बटाटा भजी, मिरची भजी, आणि कोल्हापूरचा फेमस बटाटावडा, अप्पे हे सगळे एकाच जागी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ.

यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन राजाभाऊ ची भेळ.ज्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.

बटाटा वडा खावा तर कोल्हापूरचाच.त्यात दिपक वडा म्हणजे क्या बात.एका पेक्षा एक वड्यांची दुकाने मिळतील.

यानंतर आई अंबाबाईच्या देवळाजवळ विद्यापीठ शाळेच्या आवारात चाट भांडार म्हणजेच मेवाड आईस्क्रीम आणि चाटच्या गाड्या आहेत.त्याच जवळ छुनछुन बैल गाडीचा आवाज येतो तसेच घुंगरू वाजणारे ऊसाच्या रसाचे दुकान.कोल्हापुरला जाऊन उसाचा रस नाही प्यालो हे शक्यच नाही.

शाकाहारी जेवणाचे हाॅटेल म्हणजे झोरबा शाहुपुरी येथे.तेथे अख्खा मसुर,मेथी बेसण अगदी उत्कृष्ट मिळते.तिथेच जवळच असणारे फक्त महीलांनीच चालवत असलेले वहीनी हे दुकान जिथे बाकरवडी,आळूवडी,चकली, डिंकाचे लाडू अतिशय उत्तम आणि घरगुती चवीचे मिळतात.

जसे गुळासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर यामध्ये जोडीला आहे दुध कट्टा.दुधकट्टा कोल्हापूर मध्ये गंगावेश आणि महानगर पालिकेच्या आवारात रात्री गवळी आपल्या म्हशी घेऊन येतात आणि आपल्या समोर ताजे दुध कच्चे दुध काढून ग्लासभर देतात.ती मज्जाच मज्जा आणि चवच न्यारी.

आम्हाला लहानपणी आमचे बाबा तिथे दुध प्यायला घेऊन जायचे.

त्या समोर म्हणजेच महानगर पालिकेच्या समोर प्रसिद्ध असलेले माळकर मिठाई दुकान.यांची जिलेबी उत्कृष्ट आणि त्याच बरोबर खाजा ही मिळतो.एक वेगळीच चव खुसखुशीत असा खाजा.

तिथेच बाजूला असलेले श्री.ढिसाळ काकांचें पेढ्यांचे दुकान.त्यांच्या दुकानात मिळणारा फरसाण एक नंबर.

या सर्व पदार्थांमध्ये कोल्हापूरचा पांढरा,तांबडा रस्सा विसरून चालणार नाही.मटणाचा लाल रस्सा म्हणजे तांबडा रस्सा आणि मटणाचे सुप काढून काजू खसखस पेस्ट घालून केलेला पांढरा रस्सा.

याच बरोबर माशांचे ही प्रकार मिळतात.सुरमई,पापलेट,बांगडा तळलेले आणि आमसुलाची सोलकढी यांचे ताट मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे शाहुपुरी येथील वामन हॉटेल.

याच बरोबर हॉटेल जयहिंद.या हाॅटेलची खासियत बिर्याणी.आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मटण आणि चिकनचे स्वादिष्ट आणि चविष्ट पदार्थ.चवीला ही आणि आपल्या खिशाला परवडेल असेच.

जेवण झाल्यावर पान खाण्याची पध्दत.मग काय चला पद्मा टॉकीज जवळ.सुंदर पान.आहाहा.सर्व प्रकारचे पान.त्यावर खोबऱ्याचा कीस टाकून लवंग टोचून गुलकंद मसाला घालून केलेला तोंडांत न मावणारा इतका मोठा पान.मग काय लै भारीच.

तसेच आईस्क्रीमची एक खासियत आहे बरं का कोल्हापूर मध्ये.काॅकटेल आइस्क्रीम हे इथेच मिळणार.त्यामध्ये ही दोन प्रकार एक साधे आणि एक स्पेशल.यामध्ये मोठ्या ग्लास मध्ये दोन आईस्क्रीमची बॉल आणि फळे,चेरी,जेली,ड्रायफ्रुट्स आणि कधी कधी चवीने खाणारा वरून प्लेन केक पण घालून खातो.आम्ही प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत माहेरी गेल्यावर आईस्क्रीम खायला जातोच.

यात शेवटी आणखीन एका हाॅटेलचे विशेष वाटते म्हणजे बेळगाव येथून येऊन आपले जम बसवलेल्या नियाज हॉटेलचे.मांसाहारी जेवण उत्कृष्ट मिळते.

यानंतर येतो ते आमचा रंकाळा तलाव आणि चौपाटी.तिथे एकि पेक्षा एक गाड्या. आणि त्यावर मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ. भेळ, वडापाव, शेवपुरी, चाट, समोसा, पावभाजी, थालीपीठ,मसाला पापड, आणि आईस्क्रीम.जे जे हवे ते ते मिळणारे एकमेव ठिकाण.

समोर रंकाळा तलाव आणि गरमागरम भाजणारे मक्याचे कणिस क्या बात है.

कोल्हापूरचा माणूस अगदी खव्वय्या बरं का.आणि तितकाच दिलदार.

गुळासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर.गुळाच्या सिझन मध्ये गुऱ्हाळ सुरू झाली कि गरमागरम काकवी खाण्याची मजा काही औरच.

काकवी,ऊसाचा रस आणि ताजे गुळ मग काय बच्चा पार्टी खुशाल.

कोल्हापूर मध्ये धान्य बाजाराजवळच ढवणांचे चिरमुऱ्याचे दुकान आहे.तिथे भाजके शेंगदाणे आणि चिरमुरे उत्कृष्ट मिळतात.तिथेच एक जुने हॉटेल मिलन आहे.ते आता आहे का नाही याची कल्पना नाही मला कारण आम्ही लहान असताना बाबा आमचे तिथून गरमागरम भजी आणायचे.

कोल्हापूरची मिरची आणि गुळ हे दोन्ही प्रसिद्ध.

तर मग जायचं न माझ्या माहेरी आई अंबाबाईच्या कलानगरीत कोल्हापूर मध्ये.

 

©® परवीन कौसर 

बेंगलोर

९७४०१९७६५७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print