गांधीबाबा कधीकाळी तुम्हाला ओरडून सांगत होते, ” खेड्याकडे चला ” पण ते आता पुन्हा आठवू नका आणि कोणालाही परत सांगू ही नका.
तुम्ही निघून आलात तरी खेडी तगून होती. रडत खडत स्वतःला जपत होती. अर्धपोटी राहून पोट बांधून जगत होती. आपल्या फाटक्या हाताने निसर्गाला अंजारात गोंजारत होती. पण त्यांचे हात तोकडे पडत होते, पूर्वीच त्यांचं संपन्न अवस्थेतल जितंजागत जगणं सावरायला. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर देशोधडीला लावलं . त्यात जितका दोष तुमचा त्याहून अधिक होता शासनकर्त्यांचा. तुम्ही भौतिक सुखाला लाचावलात आणि आधिभौतिकाला संपवायला कारणीभूत ठरलात. आता पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनही पाहू नका, आणि कृपया कोणाला खेड्याकडे चला असं मुळीच सांगू नका. खेडी जगतील कि मरतीत याचा विचार सुद्धा करू नका. दोलायमान झालेल्या भौतिक सुखाच्या डोलाऱ्यात झुलत बसा. पण पुढे जाऊन तुमचा भ्रमनिरास होणार आहे यावरून मात्र तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. सावरा स्वतःला आणि जगण्याच्या नव्या प्रबंधांची आखणी करा. विसरा ती माती तुम्हाला पोसणारी, वाढवणारी. आई बापाची तमा न बाळगणाऱ्या तुमच्या पिढीला एक दिवस नक्कीच “दिवसा चांदण्य दिसतील ” तो काळ आता झपाट्याने तुमच्याकडे झेपावतो आहे. म्हणूनच तुमचं पोट बाजूला ठेवून कसं जगता येईल याचाच विचार करत, आघाशा सारखी भौतिक सुखं लुटता येतीलतितकी लुटा. सोडा विचार खेड्यांचा, तिथल्या अजरामर मातीचा, कारण ती कधीच नाशिवंत ठरणार नाही. आपले गुणधर्म विसरणार नाही काळ नक्की बदलेल. आणि तिला नक्कीच सोन्याचे दिवस येतील. पुन्हा खेड्यांची नंदनवनं होतील. यात तीळमात्र शंका नाही. म्हणूनच सांगू नका कुणाला “खेड्याकडे चला” म्हणून.
महाराष्ट्रात सध्या जे काय चाललंय ते आपण सगळेच बघतोय. मला राजकारणातलं काही कळत नाही पण या सगळ्यामागे जे मूळ कारण आहे ते म्हणजे “संवादाचा” अभाव. ट्विटर / फेसबुक असूनही संवाद काही झाला नाहीये. आपलं तरी रोजच्या जीवनात काय झालंय? हल्ली माझ्या असं लक्षात आलंय कि कोणीही कोणाशीही बोलायला गेलं कि बोलणंच खुंटत कारण पहिल्या एक -दोन वाक्यानंतर प्रतिसाद असतो ” हो.. माहितीये मला.. ” आणि मग संवादच खुंटतो. मग ते नवरा बायको असो , पालक – बालक असो, आजी-आजोबा – नातवंड असो. मित्र असोत. गुरु -शिष्य असोत, तज्ञ-जाणकार आणि शिकाऊ असोत. पण हाच अनुभव.
परवा घरी आलो आणि बायकोला सांगायला लागलो कि चांदणी चौकात ट्रॅफिक जाम जॅम होता..पुढे सांगणार होतो कि कसे हाल झाले…. त्यात आज नेमका ऑफिसला कसा उशीर झाला.. ती ऐनवेळची मिटींग … साहेबांनी केलेलं कौतुक ..प्रमोशन चा चान्स .. वगैरे,वगैरे पण माझं वाक्य कट करून ती म्हणाली “कि हो माहितीये मला..” , मला व्हाट्स ऍप वर व्हिडिओ आलाय..हा बघ .” माझी पुढे बोलायची इच्छाच नाही झाली.
IPL बघत होतो. मुलगा खाली खेळून आला. आल्या -आल्या त्याला आनंदाची बातमी सांगितली कि कोहोली आउट झाला (तो मुंबई फॅन आहे). तो म्हणाला “हो.. माहितीये मला.. . त्यावरचे इन्स्टा वर मिम्स पण आले आहेत कि तो अनुष्काच्या पदरा मागे लपलाय वगैरे.” तो कसा आउट झाला, त्याचा कोणी कॅच कसा अफलातून घेतला, नवीन बॉलरचा गुगली कसला भारी होता वगैरे सांगायचं राहून गेलं.
मुलगी शिकायला अमेरिकेला जायची होती. तिला म्हंटलं चल तुला माझ्या मित्राकडे घेऊन जातो..तो तिथे ४ वर्षे होता. तो तुला सांगेल तिकडे कसं असतं. ती म्हणाली बाबा “हो.. सगळं माहितीये मला.” …मुलगी अमेरिकेला जायच्या आधी मित्राकडे जायच्या निमित्ताने तिच्याबरोबर तास दोन तास घालवायचे ठरवले होते. जरा तिकडच्या कल्चर बद्दल तिच्याशी बोलू ठरवलं होतं ते राहून गेलं.
बाबांना ऐकू कमी येतं. म्हणून परवा म्हंटल त्यांना “मन कि बात” मधे मोदी काय बोलले ते सांगावं . जरा त्यांच्या बरोबर वेळ घालवता येईल. मी सुरवात केली तर तेच म्हणाले “हो.. माहितीये मला..” .. त्यांच्या जेष्ठांच्या ग्रुप वर आल्रेडी भाषण टाईप करून आलं होतं.
बऱ्याच दिवसांनी ४ दिवसासाठी माहेरी गेले होते. आईशी खूप गप्पा मारायच्या होत्या. आईला म्हंटलं “आमच्या शेजारी नवीन बिऱ्हाड आलंय”. आई म्हणाली “हो.. माहितीये मला.. त्यांच्या ट्रक आला तेव्हाच तू फोन करून सांगितलं होतंस कि बहुदा तुमच्या शेजारचेच आले असावेत. मग आर्ध्यातासाने फोन करून तूच नाही का सांगितलंस कि कुलकर्णी म्हणून नगरचे आहेत. स्टेट बँकेत आहेत. दोन मुलं आहेत म्हणून. इ. इ . इ. ” चार दिवसांसाठी गेलेली मी दोन दिवसांनीच परत आले.
परवा नातू धावत धावत आजी कडे गेला. आजी -आजी रिझल्ट लागला. पण पहिल्या वाक्यानंतर आजीचं म्हणाली “हो.. माहितीये मला.. आईने व्हाट्स ऍप केला होता.. गणितात ९४, शास्त्रात ९० … वगैरे वगैरे. नातवाला काय काय सांगायचं होतं, मी कितवा आलो, मित्रांपेक्षा कसे छान मार्क्स पडले, टीचर्स कशा गुड म्हणाल्या , पण त्याच्या फ्लोच एकदम कट झाला आणि नातू मोबाईल खेळायला पळाला.
मला माझं बालपण आठवलं. चौथीत असताना इतिहासात शिवाजी महाराज आले. मी रोज शाळेतून आल्या आल्या इतिहासाच्या तासाला काय झाले ते आजी-आजोबांना , मग संध्याकाळी आई-बाबांना सांगायचो. मला आठवतंय कि मी एक दिवस आल्या आल्या आजीला सांगितलं कि शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाची बोटे छाटली.
आजीने विचारलं “हो का ? का छाटली पण”
मग मी का ,कसं ,कुठे सांगितलं… आजी प्रश्न विचारत राहिली आणि आम्ही थेट स्वराज्याची शप्पथ पर्यंत पोहोचलो. आता हसू येतं कि आजीला काय हे माहित नसेल? पण ती इतक्या निरागसपणे विचारात राहिली कि त्यावेळी मला वाटत होत मी आजीच्या ज्ञानात भर घालतोय.
शेवटी आजोबांनी एक प्रश्न विचारला “का रे पण उजव्या हाताची छाटली का डाव्या ?”
पुढे २ वर्षे मी याचा शोध घेत होतो. त्यादरम्यानच मग बाबांनी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल सांगितलं. मग मी त्यांच्या पत्ता शोधून हा प्रश्न पोस्टाने त्यांना विचारल्याचं पण आठवतंय. त्यावेळी माहित नव्हतं यालाच ध्यास म्हणतात.
२ आठवडयांनी आजीनी विचारलं “मग शिवाजी महाराजांनी पुढची कुठली मोहीम हाती घेतली?”
“अंग इतिहासाचा तासच झाला नाही ..भूगोल शिकवला”
“काय शिकवलं भूगोलात” – आजोबा
“गोदावरी नदी बद्दल”
“हा ते भाक्रानांगल धरण धरण बांधलंय ना पैठणजवळ”
“आजोबा तुम्हाला काहीच माहित नाही…ते जायकवाडी धरण” पहिलं मातीच धरण , मग गोदावरीला दक्षिण गंगा का म्हणतात .. गंगा , यमुना , सिंधू ..सिंधूच्या पार अटकेपर्यंत मराठे कसे गेले..पेशवे .. राजाराम महाराज , संभाजी महाराज ते परत शिवाजी महाराज … आता गंमत वाटते कि आम्ही कुठूनही कुठेही पोहोचायचो.”
“छोटू बाबा ..आम्ही तुझ्या एवढे होते तेव्हा हे धरणच नव्हतं त्यामुळे माहित नाही मला”….. आजोबा
आता माझ्या आजोबांना काय हे माहित नसेल पण आव तर असा आणायचे आणि माझ्याकडून माहिती काढून घ्यायचे..पाहायचे मला किती माहित आहे. नंतर आई -बाबांना सांगत असावेत कारण काही दिवसांनी आमची एक दिवसाची ट्रिप भाटघर धरणावर झाली. आईचा एक चुलत भाऊ तिथे इंजिनिअर होता. मग त्याने धरण , पाणी कसं मोजतात, कॅचमेंट एरिया , धरणाची दारं , वीज कशी बनते , धरणाचं अर्थशास्त्र असं काय काय सांगितलं. कदाचित पुढे मागे नुसतं वाचून माहिती झालं असतही पण कळलं कधीच नसतं. ते धरणावर कळलं. माझा आवाका वाढला हे निश्चित.
आता असं वाटतं कि आजी -आजोबा जर म्हणाले असते कि “हो.. माहितीये मला..” तर कदाचित हे सगळं कळलंच नसतं किंवा कधी तरी मी नुसतं वाचलं असत पण अनुभवलं नसतं. आजी-आजोबांना शिवाजी समजून सांगताना माझ्यात तो चढायचा असं आजोबा म्हणायचे. ते सगळं आता आठवतंय. खरंच ते म्हणले नाहीत “हो.. माहितीये मला..” आणि मी समृद्ध होत गेलो.
माणूस हा मुळात संवादशील प्राणी आहे. संवाद हि त्याची गरज आहे. बऱ्याचवेळा त्याला त्याचा अनुभव शेअर करून दुसऱ्याच्या जाणिवेत व्हॅल्यू ऍड करायची असते. दुसऱ्याला सांगताना आपला अनुभव पडताळून पहायचा असतो. तो बोलतो तेव्हा माहिती सांगतो पण भावना शेअर करतो. पण “हो.. माहितीये मला..” या वाक्याने त्याच्या उत्साहाच्या धबधब्याच्या रूपांतर झऱ्यात होत आणि मग तो आटूनच जातो. आणि मग भावनांचा दुष्काळ वगैरे निर्माण होतो. मग चिडचिड. त्यापासून दूर राहण्यासाठी परत डिव्हाईस ला जवळ करायचं.. मग आहेतच लाईक्स, मिम्स , इन्स्टा स्टोरीज .त्यातून कळलेली अर्धवट माहिती (हे अर्धवट माहिती प्रकरण फार डेंजर आहे ..अफवा, दुस्वास , असहिष्णुता येथेच जन्म घेतात) आणि मग परत “हो.. माहितीये मला..”
एका विचित्र चक्रात आडकतोय आपण. चक्र कसलं ..समाज स्वास्थ्य बिघवडणारा चक्रव्यूव्हच तो. ठेवायचं का आपण “हो.. माहितीये मला..” ला जरा दूर. समोरचा बोलत असताना त्याचं पूर्ण ऐकण्या एवढा वेळ काढू ना आपण. “हो.. माहितीये मला..” ऐवजी “हो का..माहित नव्हतं ..मग पुढे काय झालं” असं म्हणून पाहू ना काही दिवस. नक्की फरक पडेल. मला खात्री आहे. (प्लीज यावर हो.. माहितीये मला..म्हणू नका).
लक्ष्मणाची समजूत घालण्यासाठी तारा त्याच्यासमोर येऊन म्हणाली, “राजकुमार ! येवढे रागवण्याचे कारण काय? आपल्या आज्ञेचे कोणी उल्लंघन केले का? कोण आज्ञेच्या अधीन नाही? शुष्क वनात वणवा पेटला असतांना आत कोण बरं प्रवेश करेल ?” ताराचा संयमपूर्ण आवाज व स्वरांतील माधुर्य, सांत्वनपूर्ण वागणूक, आणि बोलणे ऐकून लक्ष्मणाचा अर्धा राग कमी झाला. स्वतःला सावरत, तो ताराला म्हणाला, ” देवी ! सुग्रीवाचे हित पाहतेस? तो फक्त उपभोगांत दंग झाला आहे. एकमेकांना सहाय्य करण्याची केलेली प्रतिज्ञा, रामकार्याची आठवण तो विसरला. त्याच्या धर्माचा असा लोप झालेला तुला दिसत नाही का? या कार्याचे तत्व, महत्त्व तू चांगल्याप्रकारे जाणतेस ! अशा परिस्थितीत आम्ही काय करावे? सांग ना !”
तारा शांतपणे लक्ष्मणाची समजुत काढत म्हणाली, “कुमार ! ही वेळ क्रोध करण्याची नाही. सुग्रीवाच्या मनात श्रीरामाला मदत करण्याची तीव्र इच्छा आहेच. परंतु अनेक वर्षांपासून कौटुंबिक जीवनाला पारखे झाले असल्यामुळे त्यातच ते गुंग झाल्यामुळे थोडा विलंब झाला खरा ! धर्म व तपस्या यात पारंगत असणारे मोठमोठे ऋषीमुनी देखील मोहाच्या अधीन होतात. आम्ही तर शेवटी वानरच ना ! परंतू त्यांना त्यांची चूक कळली आहे . पश्चातापदग्ध झालेत ते . हनुमानाच्या सल्ल्याने त्यांनी सर्व वानरसेना एकत्रित करण्याची आज्ञा दिलेली आहे. रामकार्यासाठी लाखो वानरसैन्य एकत्र जमा होत आहेत.”
ताराच्या बोलण्याने लक्ष्मण थोडा शांत झाल्यावर दोघेही सुग्रीवाकडे गेले. सुग्रीवाला पाहून लक्ष्मणाचा संताप उसळून आला व तो म्हणाला, ” सुग्रीवा ! ज्या मार्गाने वाली गेला, तो मार्ग अजून बंद झालेला नाही. रामाचा बाण तयार आहे.” सुग्रीवाला लक्ष्मणाने असे अपमानकारक बोलणे, तारासारख्या मानी स्रीला सहन होणे शक्य नव्हते. कणखरपणे ती म्हणाली, ” कुमार लक्ष्मणा, सुग्रीव राजे आहेत, त्यांच्याशी अशा तर्हेने बोलणे योग्य नाही. सुग्रीवांचा स्वभाव दांभिक, क्रूर, असत्यवादी, कुटील, कृतघ्न नाही. जिथे विश्वामित्रासारखे समर्थ ऋषीसुध्दा मोहापासून दूर जाऊ शकले नाहीत, मग आम्ही तर साधारण वानर ! रघुनंदन कृपाळु आहेत. आपण सुध्दा सत्वगुणसंपन्न आहात. असं क्रोधाच्या अधीन होणं बरोबर नाही.”
ताराच्या बोलण्याने लक्ष्मण शांत झाला. सुग्रीव, हनुमानाच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने राम-लक्ष्मणाने मोठे सैन्य घेऊन लंकेवर स्वारी केली. रावणाशी मोठे युध्द होऊन रावणाचा वध झाला. प्रभू रामचंद्रांना सीता परत मिळाली. विमानातून सर्वजण जातांना सीतेला प्रत्येक स्थळांची श्रीराम माहिती देत होते. सीतेच्या इच्छेनुसार तारा व काही स्त्रियांना मोठ्या आदराने विमानात बसवून घेतले. अयोध्येमध्ये या सर्वांचे भव्य स्वागत झाले. रामाचा राज्याभिषेक झाला.
तारासारख्या वानर जातीतील स्त्रीचा सत्कार सीतेने मोठ्या प्रेमाने केला. ताराचे सतीचं वाण काही वेगळंच होतं. ती एक थोर राजमाता, कुशल राजनीतिज्ञ, दूरदर्शी, समंजस व सर्वांना सोबत घेऊन चालणारी एक महान स्त्री होती. पतीच्या निधनानंतर खचून न जाता मोठ्या धैर्याने परत उभी राहून तिने राज्याची घडी नीट बसवली, स्थिर ठेवली.
अशा या ताराला कोटी कोटी प्रणाम…!!!
!! समाप्त !!!
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग 27 – परिव्राजक – ५ . मातृभाषा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
स्वामीजी आणि अखंडांनंद आता वैद्यनाथला पोहोचले होते. कारण ते एक धार्मिक क्षेत्र होत आणि ते अखंडानंदांनी पाहिलं नव्हतं. रस्त्यात लागणारी धार्मिक स्थळांना ते आवर्जून भेट देत असत. तिथे एक ब्राम्ह्समाजी नेते राजनारायण बोस यांची भेट घेतली. स्वामीजी त्यांना ओळखत होते. त्यांचं वय बरच म्हणजे चौसष्ट होतं. पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महर्षि देवेन्द्रनाथ टागोर यांना ते गुरु मानत. मिशनर्यांच्या धर्मप्रसाराला पायबंदची चळवळ, विधवाविवाह सारखी सामाजिक सुधारणा चळवळ यात त्यांचा सहभाग होता. बंगाल मध्ये देशभक्तीची जाणीव उत्पन्न होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी एक संस्था पण काढली होती. इंग्रज आपल्या देशावर राज्य करतात ते आपल्या कल्याणसाठी नव्हे तर त्यांच्या देशाचे ऐश्वर्य वाढावे म्हणून, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर करायला काय हरकत आहे असं त्यांचं मत होतं.
त्यांच्या कुटुंबातच राष्ट्रावादाची परंपरा होती. जगप्रसिद्ध, महायोगी श्री अरविंद घोष यांची आई म्हणजे राजनारायण यांची कन्या होती. क्रांतिकारक कन्हैयालाल दत्त यांच्या बरोबर ऐन तारुण्यात हसत हसत फाशी गेलेला सत्येन्द्रनाथ बोस हा त्यांचा पुतण्या होता. देशभक्तीच्या या परंपरेमुळे त्यांची काही मते ठाम होती. जसे की, आपण आपला पोशाख करावा. आपल्या भाषेतच बोलावे. आपले शिष्टाचार आपण सांभाळावेत. आपण आपले भारतीय खेळच खेळावेत. यावर त्यांचा बारीक कटाक्ष असे. त्यांच्या संस्थेत कोणी एखादा इंग्रजी शब्द वापरला तर त्याला एक पैसा दंड भरावा लागे. त्यांचा हा स्वाभिमान स्वामी विवेकानंदांना माहिती होता म्हणून, इथे त्यांची भेट घेताना स्वामीजींनी अखंडानंदांना आधीच सांगून ठेवले होते की, आपल्याला इंग्रजी येतं हे त्यांना अजिबात कळू द्यायचं नाही.
त्या काळात बंगालमधल्या सुशिक्षितांमध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची खूप मोठी खोड लागली होती. इतकी की आपल्या मातृभाषेत त्यांना कोणत्याही विषयावर धड विचार प्रकट करता याचे नाहीत आणि धड इंग्रजीत सुद्धा नाहीत. भाषेची दैन्यावस्थाच होती.
त्यामुळे राजनारायण यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमध्ये स्वामीजींनी एकही इंग्रजी शब्द येऊ दिला नाही. राजनारायण यांना वाटले की ही संन्यासी मुलं, इंग्रजी कुठल येणार त्यांना? अशाच समजुतीत ते होते. या प्रसंगात अखंडानंद आणि स्वामीजींची मस्त करमणूक झाली होती. ही समजूत करून देण्यात आपण यशस्वी झालो असे दोघांनाही वाटले. पुढे स्वामीजींची किर्ति ऐकून राजनारायण यांना स्वामीजींची भेट आठवली आणि आश्चर्य वाटले की, “केव्हढा चमत्कार आहे हा, इतका वेळ ते माझ्याशी बोलले, पण त्यांना इंग्रजी येतं अशी शंका क्षणभर सुद्धा मला आली नाही. खरोखरच हा विलक्षण चतुर माणूस असला पाहिजे.” खरच स्वामीजींचं केव्हढं प्रसंगावधान होतं.निश्चय होता.
धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली त्या राजनारायण यांना स्वामीजींना वैद्यनाथला भेटावसं वाटलं कारण, ब्राह्म समाजात देशभक्तीचे विशेष महत्व नसताना सुद्धा ,राज नारायण ब्राह्म समझी असूनसुद्धा त्यांनी तरुणांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. हेच वेगळेपण स्वामीजींना भावलं होतं. आपल्या प्रवासात अशा व्यक्तींचीही आवर्जून भेट घेणं हा त्यांचा उद्देश असायचाच. प्रवासात अशी अनेक प्रकारची माणसे त्यांना भेटत. नव्हे स्वामीजीच त्यांना आवर्जून भेटत.
समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं किंवा त्यांना किमत देणं हा स्वामीजींचा गुण कसं वागायचं ते शिकवणारा आहे. राजनारायण यांची स्वदेशी बद्दलची आणि मातृभाषेबद्दलची भावना हे राष्ट्र प्रेमाचं उदाहरण आहे. देशाभिमानाचं उदाहरण आहे त्यामुळे स्वामीजींना ते मनापासून आवडलं होतं असं वाटतं.
मातृभाषेची दैन्यावस्था हा विषय तर आताही आहे. आपण रोजचं पाहतोय, ऐकतोय. पु.ल देशपांडे यांनी उपहासाने म्हटलं होतं, ‘आपल्या मदरटंग मध्ये आपल्या फिलिंग चांगल्या एक्स्प्रेस करू शकतो’. हा गमतीचा भाग सोडला, तर आज रोज अनेक वार्तापत्र झडताहेत वाहिन्यांवर. इतकी मोठी आपत्ती आणि इतकी घाई आहे की आंतर्राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेले शब्दच जसेच्या तसे वापरतोय. मराठी भाषा इंग्रजी शब्दांनी समृद्ध झाली आहे असेच म्हणावे लागेल. त्यात लॉक डाउन, हॉटस्पॉट, व्हायरस, सोशल डिस्टन्स या शब्दांनी तर सामान्य लोकांना काहीच कळत नाहीये असं वाटतं काही काही वेळा. ‘लॉकडाउन’ या शब्दाचा नेमका अर्थ समाजाला स्वत:च्या मातृभाषेत उमगत नाहीये. म्हणूनच याही परिस्थितीत ते कळत नसल्याने बाहेर नेहमीप्रमाणेच फिरत आहेत. जागतिक पातळीवरच्या अशा संसर्गजन्य साथीच्या सूचना, माहिती, आपल्या मातृभाषेत सोप्या शब्दात सांगितली, समजून सांगितली, तर निदान कळेल तरी. तरच ते गंभीरपणे या सगळ्याकडे बघतील. मातृभाषा हृदयाची भाषा.
वालीच्या मरणाचे दुःखाने सुग्रीवाला, अंगद व ताराला शोकावेग आवरेनासा झाला. अखेर श्रीराम त्यांचे सांत्वन करण्यास पुढे आले. श्रीरामाची तेजस्वी मूर्ती पाहुन तारा हात जोडून म्हणाली, ” रघुनंदना ! आपण अप्रमेय जितेंद्र आहात. आपली किर्ती जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यत राहील. आपण क्षमाशील, पराक्रमी, बलवान, संयमी, सत्शील, दीनांचा कैवारी, ऐश्वर्यसंपन्न आहात, म्हणून माझी एक विनंती पूर्ण करावी ! ज्या बाणाने आपण वालीचा वध केला त्याच बाणाने मला मारुन मुक्ती द्यावी. स्रीहत्येचे पातक आपल्याला लागणार नाही, कारण मी व वाली एकच आहोत, आमचा आत्मा एकच आहे. वालीबरोबर मला समर्पण करुन त्याला माझं दान केल्यास मी माझ्या पतीजवळ जाऊन त्यांच्याबरोबर स्वर्गात सुखाने राहीन.”
ताराचा विलापयुक्त विचार ऐकून श्रीराम सद्गदित होऊन म्हणाले, “देवी ! तू वीरपत्नी, वीरमाता, महासती आहेस. तू एवढी विदूषी असूनसुध्दा मृत्युविषयी असे विपरीत विचार कसे करू शकतेस? विधात्याने या जगाचे काही नियम केलेले आहेत. तोच या जगाची रचना करतो. तोच पोषण करतो व संहारही तोच करतो. त्याच्या नियमांचे उल्लंघन कोणीही करु शकत नाही. वालीला वीरमरण, श्रेष्ठगती मिळाली आहे . त्याच्याबद्दल शोक न करता पुढील कर्तव्याची जाणीव ठेव ! अंगदसारख्या शूर, पराक्रमी, सद्गुणी पुत्राला राज्यावर बसवून राज्याची धुरा निष्कंटकपणे चालव. त्यातच तुझे कल्याण आणि मोक्ष आहे. विधात्याची ही आज्ञा समजून कार्य कर !”
“तू खर्या अर्थाने महासती आहेस. तू थोर पतिव्रता असल्याने वालीनंतर राज्याचे शकट हाकण्याचे नवे सतीचे वाण घेऊन हे कार्य सिध्दीस नेणे तुझे परम कर्तव्य आहे.”
श्रीरामांच्या सांत्वनपर शब्दांनी व उपदेशाने ती शांत झाली. धीराने अश्रू आवरुन अंगदला व सुग्रीवला धीर दिला. वालीचा अंत्यसंस्कार सम्राटाच्या इतमाला अनुसरुन साजरा केला.
वालीनंतर सुग्रीवचा राज्याभिषेक करुन त्याला राज्यावर बसविले. त्याची पत्नी रुमा त्याला परत मिळाली. तारा खऱ्या अर्थाने “राजमाता” झाली. प्रजेचे हित व कल्याण कसे होईल याबद्दल ती सतत दक्ष असे.
सुग्रीवाच्या राज्यभिषेकानंतर चार महिने पावसाळा असल्यामुळे रामकार्यात मदत करणे अशक्यच होते. परंतु या दिवसांमध्ये सुग्रीव ऐषारामात तुडुंब डुबून गेला, रामकार्याचा त्याला संपूर्ण विसर पडला. सतत अंतःपुरात राहून मदिरा व मदिराक्षीच्या पूर्ण आहारी गेला. राम अत्यंत अस्वस्थ व अशांत झालेले पाहून लक्ष्मणाचा संताप अनावर झाला. धनुष्याचा टणत्कार काढीतच तो सुग्रीवाकडे येऊन त्याला ललकारु लागला. लक्ष्मणाचा भयानक रोष पाहून सर्व वानरसैन्य व स्वतः सुग्रीवदेखील भयभीत होऊन घाबरले. लक्ष्मणाला शांत करण्यासाठी सुग्रीवाने ताराला पुढे पाठविले. तारा अतिशय सावध, धीरगंभीर होती. ती अत्यंत कर्तव्यदक्ष असून सगळीकडे बारीक लक्ष ठेवून होती.
क्रमशः…
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सती साध्वी ताराचा करुण विलाप ऐकुन आणि तिचा मरणांतीक उपोषणाचा निश्चय पाहून हनुमान पुढे आले. ताराची योग्यता हनुमान जाणून होते. ते ताराला समजावत म्हणाले, “देवी, जन्म मरण प्रत्येकालाच आहे. त्यासाठी शोक करणे कितपत योग्य आहे? आपण तर विदुषी आहात ! जन्म मृत्युची परंपरा जाणता ! वालीराजांचा जीवनाचा अवधी संपल्यामुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली. आपण महासती, महाविद्वान आहात, आपणाला मी काही सांगणे म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखे आहे. आपण ज्ञानसंपन्न विदुषी, विवेकी, विचारी, धीरगंभीर, शांत मनस्विनी आहात.”
” कुमार अंगदच्या भविष्याचा विचार करुन आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. अंगद आणि सुग्रीव दोघेही दुःखी आहेत. त्यांचे सांत्वन आपल्याशिवाय कोण करणार? कोण आधार देणार त्यांना? आता या राज्याची स्वामिनी आपणच आहात. कुमार अंगदची आणि सर्व वानरांची माता होऊन, आपले दुःख, शोक, बाजूला ठेवून खंबीरपणे उभे राहून वानरांचे हे राज्य आपल्याला सांभाळायचे आहे , मार्गदर्शन करायचे आहे. वालीराजांच्या पारलौकिक कार्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते आटोपल्यावर कुमार अंगदला राजसिंहासनावर बसवावे.”
त्यावर तारा म्हणाली, ” मला आता कशाचाही मोह नाही. या सर्व ऐहिक सुखाची विरक्ती आलेली आहे. अंगदसाठी काय करायचे ते, त्याचे काका सुग्रीव पाहण्यास समर्थ आहे. पुत्रमोहात अडकण्यापेक्षा पतीधर्मानुसार त्यांच्यासोबत सती जाणे हेच मी माझे कर्तव्य समजते.”
यावेळेपर्यंत वालीला किंचित शुध्द आली. ही शुध्द त्याची शेवटचीच शुध्द होती. श्वास घ्यायला त्रास होत असतांना खोल आवाजात मोठ्या प्रयत्नपूर्वक तो सुग्रीवशी बोलू लागला. ” माझ्या अंतिम समयी जेव्हा मी यमलोकी महानिर्वाणाला निघालो तेव्हा याक्षणी माझेकडून घडलेले पातक, अविचार, अत्याचार सर्व आठवून माझाच मला धिक्कार वाटत आहे. सुग्रीवा ! तुझे माझ्यावर असलेले अपार प्रेम मी कधी समजून घेतलेच नाही. तुझ्याबद्दल विनाकारण गैरसमजाने आकस ठेवून वैर केले. तुला देशोधडीला लावले. आपण प्रेमाने राहिलो असतो तर अश्या दुर्घट प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. परंतु आता तर पश्चातापालाही अवधी उरला नाही.”
“अंगदला स्वतःचा पुत्र समजून त्याचा सांभाळ कर ! तो तेजस्वी, पराक्रमी, शूर आहे. सुषेन वानरराजाची कन्या तारा, हिच्याजवळ अशी आंतरिक शक्ती आहे की, भविष्यात घडणार्या चांगल्या वाईट घटनांची सूचना तिला आधीच मिळते. निसर्गामधे व मानवी जीवनात अनेक उत्पात होतात. त्याबाबत तिने दिलेला कोणताही सल्ला हितकारक ठरतो, जो मी कधीच ऐकला नाही, त्याचे फळ माझ्या रुपाने तुझ्यासमोर आहे. ताराने दिलेला, केलेला उपदेश आणि सल्ला कोणताही किंतु, संशय मनांत न ठेवता ऐक आणि प्रत्येक कार्य तिच्या सम्मतीनेच कर !”
वालीचे बोलणे तारा ऐकत होती आणि ओक्साबोक्शी रडत होती. वालीने अंगदला जवळ घेतले. त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, ” श्रीरामाचे कार्य देवकार्य समजून त्यांना मदत कर…”
ताराकडे पहातच वालीचे प्राणोत्क्रमण झाले. एक बलशाली तारा निखळला !
क्रमशः…
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वाली-सुग्रीवामधे भयंकर घनघोर युध्द सुरु झाले. वालीच्या पराक्रमापुढे सुग्रिवाचा टिकाव लागेनासा झाला. सर्व वानरसेना एका बाजुला उभे राहुन दोघांचे द्वंदयुध्द पाहत होती. वालीच्या आघाताने सुग्रीव असहाय्य होऊन खाली कोसळला. वाली आतां त्याच्यावर निर्णायक वार करणार एवढ्यात सालवृक्षाच्या बुंध्याआड लपलेल्या रामाने वालीवर बाण सोडला. काय घडले हे कळायच्या आतच वालीचा प्रचंड देह धरणीवर कोसळला. बाजुला अभं राहुन पाणावल्या डोळ्यांनी सुग्रीव हे दृष्य पाहत होता. वालीसारखा बलाढ्य, महापराक्रमी योध्दा कोसळल्याचे पाहतांच सर्व वानरसेना भयाने रणांगणातून पळून जाऊं लागली.
कांही वानरप्रमुख वाली पडल्याचा दुःखद समाचार सांगण्याकरितां धावत ताराकडे आले. हे वृत्त ऐकुन तारा दुःखाने अतिशय व्याकुळ झाली. अंगदसोबत धावत नगरीबाहेर युध्दस्थळी आली. पाहते तो काय… सर्व वानरसेना व मंत्रीगण, सेनापती मरणाच्या भीतीने पळून जातांना दिसले, एवढ्या दुःखातही ताराने सर्वांना थांबायला सांगून संतापाने विचारले, “तुम्ही वीर ना? वाली राज्यावर असतांना त्याच्या बाहुबलाच्या आश्रयाने निश्चिंतपणे सुखाने बिनधास्त राहत होतात! आता हा वीर मरणोन्मुख झाल्याचे पाहतांच भ्याडाप्रमाणे पळून जाताहात! सुग्रीवाकडुन तो पराजीत झाला म्हणुन प्राणभयाने पळ काढतां?”
भयभीत होऊन वानर ताराला म्हणाले, “देवी! प्रत्यक्ष यमधर्मच रामाच्या रुपाने आलेले आहेत, तुम्ही सुध्दा पुढे न जातां अंगदचे रक्षण करा.”
तारा एक श्रेष्ठ वीरपत्नी होती. धैर्यशील होती. ती म्हणाली, “वानरराज वाली गेले, माझे सर्वस्व गेलं. माझं सौभाग्य गेलं. आतां पुत्रमोह, राज्य, जीवन कशाचेच प्रयोजन उरले नाही. मी फक्त माझे पती वालीराजांच्या चरणावर समर्पित होणार!”
राम लक्ष्मण आपली धनुष्ये जमीनीवर टेकवून हे दुःखद दृष्य बघत उभे होते. सुग्रीव अतीव दुःखाने मुर्च्छित होऊन वालीजवळ जमीनीवर पडला होता. तारा अत्यंत विकलावस्थेत धावत ओरडत वालीजवळ आली. वालीला पाहतांच त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली व शोक करुं लागली. अंगदालाही शोक आवरेनासा झाला. सावध झालेल्या सुग्रिवाला तारा अंगदचा शोकविलाप पाहुन त्याचाही शोकपूर वाहु लागला.
तारा विलाप करत, रडत, अविचल वालीला म्हणाली, “वीरा! आपण बोलत कां नाही? आपण मिळवलेल्या सार्या वैभवाचं काय करायचं? माझा सारा आनंद, सौख्य लुटला गेला. माझे हृदय फाटुन कां जात नाही? आपण रुमाचे अपहरण केलेत त्याचे तर हे फळ नसेल ना? मी आपणांस अनेक वेळा, अनेक हितकारी गोष्टी सांगतल्या, दुष्प्रवृत्तीपासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीच माझे ऐकले नाही. श्रीरामाच्या बाणाने मारले गेलात. मला दीनता आली. असे वैफल्यपूर्ण, दयनीय, जीवन मी कधीही जगले नाही. एवढ्या मोठ्या दुःखाचा अनुभव नाही. वैधव्यजीवनच मला कंठावे लागणार ना?”
“बोला ना स्वामी! बोला ना माझ्याशी, आपल्या लाडका पुत्र अंगदशी बोला! सुग्रीव! आता निष्कंटक कर राज्य!”
एवढं बोलुन ती वालीजवळच आमरण ऊपोषणाला बसली.
क्रमशः…
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वाली सुग्रीवचे युध्दाचं आव्हान स्विकारण्यास बाहेर येऊ लागला, त्यावेळी मात्र तारा निश्चयाने वालीला अडवण्याच्य दृष्टीने त्याच्या समोर आडवी येऊन, अत्यंत केविलवाणेपणाने, दिनवाणीपणाने यावेळी न जाण्याबद्दल त्याला विनवून अडवू लागली. म्हणाली, “ही वेळ युध्दासाठी योग्य नाही. उद्या प्रातःकाळी युध्दास जावे, आता धोका आहे.” वाली हेटाळणीच्या स्वरात म्हणाला, ” सुग्रीवापासुन मला धोका….? अगदी हास्यास्पदच गोष्ट आहे. सुग्रीवासारख्या यतःकिंचित भेकडाचे जर मी आव्हान स्विकारले नाही तर संपुर्ण त्रिखंडांत भेकड वाली म्हणुन नामुष्की, दुष्किर्ती होईल. हे तुला चालेल का?”
तारा कळवळून वालीला म्हणाली, “स्वामी! आज सुग्रीव एकटा नाही. त्याच्या बरोबर अयोध्येचे वीर, पराक्रमी, सत्शील राजपुत्र राम-लक्ष्मण आहेत, ज्यांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा वध करुन नायनाट केला. त्यांनी सुग्रीवाला त्याच्या कार्यात मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तुम्ही सुग्रीवाला कमी लेखू नका. तो सबल आहे. म्हणूनच विनवते, ही वेळ टाळावी. ह्या अशुभ वेळी जाऊं नये.”
वाली म्हणाला, “शुभ-अशुभ मी काही मानत नाही. सुग्रीवाने युध्दाचे अव्हान दिले, ते स्विकारणे माझे कर्तव्य आहे. त्याच्यामागे प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी त्याचा मागच्यासारखा पराभव करुन, त्याला लोळवून नक्की परत येईन.”
तारा म्हणाली, “सुग्रीव तुमचा लहान बंधु आहे. विनाकारण कशाला त्याच्याशी शत्रृत्व ठेवायचे? त्याचे तुमच्यावर किती प्रेम होते जाणत नाही का? त्याने राज्य परत केल्यावरही त्याचेवर आकसाने गैरसमजाने उगीचच संघर्ष कां वाढवायचा? निदान आतां तरी प्रेमाने, समझोत्याने त्याची रुमा त्याला परत करुन गुणागोविंदाने राहावे.”
वाली म्हणाला, “आता ते शक्य नाही. त्याचा पराभव करुन रुमाला दाखवुन देतो की, तिचा पती किती नालायक आहे.”
त्यावर तारा म्हणाली, “असे नका हो वागू..! असे वावगे वागल्याने अनर्थ मात्र अटळ आहे. इतिहास साक्ष आहे, अहंकार व अत्याचाराची अनेक उदाहरणे आपल्यापुढे आहेत. असे घडले आहे की, जय तर दूरच राहिला पण शेवटी मानहानी व पराभव पत्करुन धुळीस मिळावे लागले आहे.’
परंतु दुराग्रही, हटवादी वाली बधला नाही. उलट जास्तच चेकाळल्यासारखा होऊन पुढे जायला निघाला. ताराचे प्रयत्न विफल झाले, नाइलाज झाला तिचा. शेवटी म्हणाली, “जाताच आहात तर माझी एक इच्छा पुर्ण करुन तरी जा.”
ताराने आसन मांडले. त्यावर वालीला बसवुन पंचारतीने त्याचे औक्षण करतेवेळी तीने अपाद्विनाशक मंत्र म्हटला, पण तिच्या मंत्रातुन आज शक्ती निर्माण झाली नाही. पुढील घडणारे भविष्य तिला कळून चुकले. हे औक्षण अखेरचेच ठरेल याची तिला कल्पना आली. मोठ्या कष्टाने, विकल मनःस्थितीने वालीला निरोप दिला. वाली त्वेषाने निघून गेला.
ताराने अत्यंत शोक करीत मंचकावर धाडकन अंग टाकले. या पतिव्रतेला भविष्यांतील घडणार्यात घटनांची काळाने सूचना तीला दिली असावी.
क्रमशः…
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“अगं काय हे सुनबाई ? निदान आज तरी माझ्या चहात साखर घालायलाचीस ! आज काय आहे विसरलीस वाटतं ?”
“माझी अजून तुमच्या सारखी साठी थोडीच झाल्ये विसरायला ?”
“नाही नां, मग ?”
“आई, आज तुमचा एक्सष्टावा वाढदिवस आहे, हे माझ्या चांगलं लक्षात आहे आणि म्हणून तर रोजच्या अर्ध्या कप चहा ऐवजी तुम्हांला आज चांगला पाऊण कप चहा दिला आहे ! अर्ध्या कप चहावर पाव फ्री ! एंजॉय युअर बर्थ डे !”
“अगं पण सुनबाई मला तर पाव कुठेच दिसत नाही या चहा बरोबर !”
“आई, मला असं म्हणायचंय की रोजच्या अर्धा कप चहावर पाव कप चहा फ्री !”
“पण त्या पाव कप एक्सट्रा चहा ऐवजी, थोडी साखर घातली असतीस आज चहात, तर तुझे हात काय मोडणार होते का गं ?”
“अजिबात नाही आई, पण डायबेटीसमुळे मी तुम्हांला रोज इन्शुलीनच इंजेकशन देते, हे विसरलात वाटतं तुम्ही ?”
“मी बरी विसरेन ! माझ्या सासूबाई होत्या, तेंव्हा मला येता जाता टोचून टोचून बोलायच्या आणि आज माझी सून मला तोंडाने नाही पण इंजेकशनच्या सुईने रोज टोचत्ये ! काय माझं मेलीच नशीब ! मला कोणाला टोचून बोलायचं भाग्यच मिळाल नाही या जन्मात !”
“पण तुम्ही मला अधून मधून जे तीरकस बोलता, ते आणखी काय वेगळं असतं का हॊ आई ?”
“ते जाऊदे, मला सांग निदान आज तरी माझ्या चहात थोडीशी एक दोन चमचे साखर का नाही घातलीस ?
तेवढ्याने का होईना, पण माझ्या आजच्या स्पेशल डेची सुरवात गोड झाली असती !”
” ए sss क दो sss न चमचे साखर मी तुमच्या कपात घालायची आणि विलासचा ओरडा खायचा ?”
“अगं त्याला कसं कळेल तू माझ्या चहात साखर घातल्येस ते ? ती तर विरघळून जाणार नां कपात !”
“ते जरी खरं असलं, तरी माझ्या मनांत ते कसं राहील आई ? आपल्या बायकांची जीभ पोटात कमी आणि ओठात जास्त ठेवते, हे, मी का तुम्हांला सांगायला हवं ?”
“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सुनबाई ? माझ्या पोटात काही रहात नाही म्हणून ?”
“मी तुमच्या पोटात असं कुठे म्हटलं ? एकंदरीत बायकांच्या बाबतीत एक जनरल स्टेटमेंट केलं इतकंच !”
“पुरे झालं तुझं पोटात आणि ओठात ! मला सांग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय सरप्राईज देणार आहात तुम्ही सगळे ?”
“बघा, स्वतःच म्हणता सरप्राईज आणि वर विचारता पण कसलं सरप्राईज म्हणून ?”
“अगं सांग गपचूप तू मला ते सरप्राईज. ते मिळाल्यावर मी चकित झाल्याचा अभिनय नक्की करीन, तू अजिबात काळजी करू नकोस !”
“बघा हं, नाहीतर मला तोंडघाशी पाडालं.”
“तू काळजीच करू नकोस सुनबाई, कसा मस्त अभिनय करते बघ संध्याकाळी ! हां आता सांग काय सरप्राईज आहे ते !”
“आजच्या तुमच्या एकसष्टीच्या निमित्त, या वर्षीच्या तुमच्या बर्थडे केकवर ६१ मेणबत्या लावायचं आम्ही ठरवलंय आणि तो केक दरवर्षी सारखा शुगरलेस नसणार ! काय, कसं वाटलं आमचं सरप्राईज ?”
“चुलीत घाला त्या सरप्राईजला !”
“म्हणजे काय आई, आवडलं नाही का सरप्राईज ?”
“अगं त्यातली एकच गोष्ट बरी आहे म्हणायची !”
“कोणती ?”
“या वेळचा केक शुगरलेस नसणार आहे, ती !”
“मग झालं तर !”
“अगं हॊ, पण त्या केकवरच्या ६१ मेणबत्या फुकर मारून विझवता विझवता माझा म्हातारीचा जीव जाईल त्याच काय ?”
“अहो आई तुम्हीं अजिबात काळजी करू नका त्याची, आम्ही सगळे तुम्हांला मदत करू नां त्या मेणबत्या विझवायला !”
“नकोच ती भानगड सुनबाई ! त्या पेक्षा तुम्हीं या वर्षी माझी तुला करा !”
“हां ही आयडिया पण छान आहे, मी सुचवते विलासला तसं. पण कशानं करायची तुला तुमची ?”
“अगं सोप्प आहे, ६१ किलो वजनाची मिठाई सगळ्या सोसायटीत वाटून टाका, म्हणजे झालं !”
“अहो पण आई, तुला म्हणजे वजन काट्याच्या एका पारड्यात तुम्हीं बसणार आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या वजना इतकी मिठाई तोलायची बरोबर नां ?”
“हॊ बरोबर !”
“पण मग ते कसं जमणार आई ?”
“का, न जमायला काय झालं?”
“अहो आई तुमचं वजन आहे ८५ किलोच्या आसपास आणि मिठाई तोलायची ६१ किलो ! हे गणित काही जुळत नाही ! शिवाय एवढा मोठा वजन काटा आपल्याला फक्त लाकडाच्या वाखारीतच मिळेल आणि अशी लाकडाची वखार आता मुंबईत शोधायची म्हणजे…… “
“सुनबाई कळली बरं तुझी अक्कल आणि तुझं गणित पक्क आहे ते !”
“आहेच मुळी! मग आई आता कसं करायच म्हणता तुमच्या वाढदिवसाचं ?”
“काही नाही, माझ्या बाबुला म्हणजे तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि सांग या वेळचा केक पण शुगरलेसच आण हॊ आणि त्यावर एकही मेणबत्ती नको म्हणावं !”
वालीचे अन्यायाचे वागणे पाहुन, तारा वालीला म्हणाली, “स्वामी! मतंगऋषींचा शाप आधीच डोक्यावर आहे, त्यात पतिव्रता रुमाचा शाप कां घेता? या मोठ्या पापातून सुटका होऊ शकणारा नाही. हा अविचार सोडून द्या.” पण वालीला ऐकायचे नव्हते, ऐकलेच नाही त्याने. विनाश काले विपरीत बुध्दी..
तारा ही अत्यंत सुंदर, गुणी स्त्री होती. वालीमधील शौर्य, पराक्रम, धाडस अशा त्याच्या अनेक चांगल्या गुणांवर लुब्ध होती. त्याच्यातील गुणांची तिला पारख होती. त्याबद्दल तिला अत्यंत सार्थ अभिमानसुध्दा वाटत असे. परंतु वालीचा आत्यंतिक संतापी, हेकट, अन्यायी, दुर्गुणाकडे कल असणार्याद स्वभावाने तिच्या मनाला सतत काळजी वाटे. हे सर्व पाहुन तिच्या मनांत विचार आला, ‘सुग्रीवाला अधीक दुःख कशाचं झालं? राज्य गमावल्याचं की, पत्नी गमावल्याचं? रुमाच्या बाबतीत ते घडल! शेवटी दुर्दशा भोगावी लागते स्त्रीजातीलाच ना?
राक्षसांचा सम्राट लंकाधीश रावणाने सर्व राजांना जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने प्रत्यक्ष देवराज इंद्रावर स्वारी केली. त्याच्या मुलाने, मेघनादने इंद्राला जिंकले. सर्व राजांना जिंकण्याच्या अभिलाषेने वालीवर देखील आक्रमण केले. पण वालीचा पराक्रम व अतुल ताकद, युध्दकौशल्य एवढे जबरदस्त होते की, रावणाला शस्त्र खाली ठेवुन त्याला शरण जाऊन शस्त्र खाली ठेवावे लागले.
रावणासारख्या बलाढ्य व प्रबळ शत्रुला देखील नमवून आपला पती वालीने त्याला शरण येण्यास भाग पाडले याबद्दल ताराच्या मनांत नितांत, आदर व कौतुक होते आणि म्हणूनच त्याच्या गुणांचे चीज व्हावे, तो सन्मार्गावर यावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची पण यश तिच्यापासुन नेहमीच दूर पळत असे. वाली तिचे कांहीच ऐकत नसे आणि आपल्या हेकट, दुराग्रही स्वभावात बादल करत नसे.
एकदा तारा आपल्या महालांत निवांत बसली असता तिचा पुत्र अंगद येऊन सांगू लागला की, “तो मित्रांसोबत मतंगवनाच्या आजुबाजुला हिंडत असतांना त्रृषमूक पर्वतावर सुग्रीव काका दिसलेत. त्यांच्या मागे वीर हनुमान उभे असुन दोन सुंदर तेजस्वी राजकुमार त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने गप्पा मारतांना दिसले. गुप्तहेरांकरवी चौकशी केली असतां दोन राजकुमार म्हणजे प्रत्यक्ष अयोध्या नरेश दशरथ यांचे दोन सुपुत्र असल्याचे कळले.
श्रीरामाची पत्नी सीताचे हरण करुन लंकाधीशपती सम्राट रावणाने तिला लंकेत नेऊन ठेवले आहे. तिच्या शोधार्थ हे दोन वीर हिंडत हिंडत तिथे आलेत. त्यांची सुग्रीव काकांशी मैत्री होऊन दोघांनी परस्परांना मदत करण्यासाठी अग्निसमोर आणाभाका, शपथ घेऊन वचनबध्द झालेत.
भाग – ६
श्रीराम-सुग्रीवाची युती झाल्याचे वृत्त ताराने ऐकले मात्र ती अतिशय संचित झाली. अंगदला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडलांना अनेक वेळा परोपरीने विनवून सांगीतले की, रुमादेवीला सुग्रीवाकडे पाठवुन द्यावे, परस्त्रीचे अपहरण करणे, तिची अभिलाषा धरणे फार मोठे पाप आहे. अशा पापाचे घोर प्रायश्चित्त भोगावेच लागेल. पण हटवादी स्वभावामुळे माझ्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.”
अंगद म्हणाला, “आई! श्रीराम देवासमान सुंदर, दयाळू, करुणामयी वाटतात.” ती म्हणाली, “श्रीरामाबद्दल सर्व माहित आहे मला. श्रीराम हे आर्त, दुःखी जणांचे आश्रयदाते आहेत. ते यशस्वी, ज्ञानविज्ञान संपन्न, पित्याच्या आज्ञेत राहणारे आहेत. हिमालय ज्याप्रमाणे अनेक रत्नांची खाण आहे, त्याप्रमाणे श्रीराम अनेक गुणांची खाण आहेत. असे श्रीराम सुग्रीवाचे झाले तर…. तुझ्या पित्याचा भविष्यकाळ फार गंभीर आहे. भविष्यातील संकटाची चाहुल लागत आहे.”
तारा अतिशय विकल मनःस्थीतीत अंगदाला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडिलांमधे अनेक सद्गुण असून ते फार पराक्रमी, शूर, धाडसी आहेत. ते वानराचे राज्य उत्तम रितीने चालवत आहेत म्हणूनच आज ते सर्व वानरांचे सम्राट आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी कांही नीतिनियम पाळले असते, कांही धर्म मर्यादा मानल्या असत्या, तर त्यांच्यासारखा पुरुषोत्तम दुसरा कुणी नसता आणि माझ्या सारखी भाग्यवान स्त्री त्रिभुवनात दुसरी कुणी नसती! परंतु विधिलिखीत कुणाला टळले आहे? मातंग ऋषींचा अपमान व शाप, रुमासारख्या पतिव्रतेचा छळ, तिचा तळतळाट, माझ्या संसारसुखा भोवती एखाद्या काळसर्पाप्रमाणे वेटोळे घालुन बसला आहेसे वाटत आहे…..
सुग्रीवाने आपली अत्यंत करूणामय कर्मकहाणी श्रीरामांना सांगून म्हणाला, “हे प्रभु! तुझी पत्नी रावणाने पळवली आणि माझी पत्नी माझ्या मोठ्या भावाने वालीने! शिवाय राज्यातुन निष्कसित केले. माझी अवस्था दोर तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे.” श्रीरामाने सुग्रीवाला आश्वस्त केले. दोघांनी एकमेकांना मदत, सहाय्य करण्याच्या आणाभाका घेऊन आपापल्या समस्या सोडविण्याचे ठरविले.
सुग्रीव रामाला म्हणाला, “वाली भयंकर कोपिष्ट, शिघ्रकोपी, हट्टी व बलाढ्य आहे. त्याचा उच्छेद झाल्याशिवाय माझा मार्ग निष्कंटक होऊ शकणार नाही. तो सुखाने जगू देणार नाही.”
ताराला मिळत असलेल्या भविष्यातील घटनेच्या भाकिताप्रमाणे ती काळरात्र आलीच. रामाने द्वंद्व युध्दासाठी वालीला आव्हान द्यायला सुग्रीवाला सांगीतले. रामाच्या आज्ञेनुसार एका रात्री सुग्रीव किष्किंधेच्या परिसरांत येऊन दंड थोपटून मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत, सिंहनाद करत वालीला आव्हान देऊ लागला. यावेळी वाली ताराबरोबर अंतःपुरात होता. सुग्रीवाचा आव्हानात्मक आवाज ऐकुन प्रथम तर त्याला अतिशय आश्चर्य वाटले. सुग्रीव सारखी साधी, सालस, व्यक्ती युध्दाचे आव्हान देते, हेच मुळी त्याला खरे वाटत नव्हते. नंतर तो अत्यंत संतप्त होऊन, धडा शिकवण्याच्या निश्चयाने सुग्रीवाचे आव्हान स्विकारण्यासाठी अंतःपुरांतुन बाहेर येऊ लागला.
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈