मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ओंजळ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ओंजळ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, करतल भिक्षा घेत असत’

‘करतल ‘ म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी..

मला हा शब्द खूपच आवडला..

म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त माप म्हणजे ‘करतल’ असावे असे मनात आले.

करतल म्हणजे ओंजळभर !

आता हेच पहा ना.. 

खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते.

इतकंच काय ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.

आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते..

 

म्हणजे खूप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा..

आणि कधी एखादा सुलज्ज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करतो..

 

बाप रे… केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे..

 

म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये असेच पटकन मनात आले.

 

दुसऱ्या च्या ओंजळीने पाणी पिऊ नये वगैरे वगैरे ह्या विचाराशी विरोधाभास दाखवणारे शब्द प्रयोग आहेत म्हणा…

 

पण आपण नेहमी राजहंस होऊन मोत्यांचा चारा टिपावा असे वाटते त्यामुळे त्या कडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केलेले बरे!

 

ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि ‘पसायदान’ मागितले…l

आज लिहायला बसलो आणि माझ्या ओंजळभर शब्दांना दाद देणाऱ्या तुमच्या सगळ्यांची आठवण आली..

म्हणजे माझे ओंजळभर शब्द मी तुमच्या ओंजळीत टाकतो आणि तुमची भरभरून दाद मिळाली की त्याचे सोने होते..

 

आज तुमच्या हातात ओंजळ रिती केली आणि आपसूक हात मिटले गेले..

परमेश्वरासमोर जोडतो ना तसेच!

आणि मग मन भरून आनंदाची अनुभूती झाली हे वेगळे काय सांगू?

 

लेखक :  अनामिक

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ औषध ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ औषध ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशापयशासकट जर कोणी स्वीकारत असेल, तर ते म्हणजे फक्त आपले आईबाबा. नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो. ते त्याचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दु:खं सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले, तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका…

एक मेडिकलचे दुकान होते. औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता. त्याचवेळेस रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुदा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली. 

आजीने त्याला पाहिले. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे, असे विचारले. आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, `काय झाले आजी, औषध घ्यायला पैसे नाही का?’आजी म्हणाली, `पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का?’

मेडिकलवाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, `लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो,  दर सुटीत मला भेटायला येतो. पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच, वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. म्हणून मला एकच औषध हवे आहे, मला मूल आहे हे विसरण्याचे…आहे का तुझ्याकडे तसे औषध???’

मेडिकलवाला नि:शब्द झाला. कारण, या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे, अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले, तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील…!’

——मित्रांनो, सगळ्यात मोठे कोणते पाप असेल, तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही, याची अवश्य काळजी घ्या !  

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उकडीचा मोदक.. ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ उकडीचा मोदक ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

उकडीचा मोदक करणे हा एक मोठा सोहळा आहे.

हा पदार्थ – पाव इंच आले, एक टेबलस्पून मीठ, ओव्हनचं टेम्परेचर, कुकरच्या शिट्ट्या … असं लिहिणार्‍या पुस्तकात बघून करता येत नाही त्यासाठी उगीच एवढंसं चिमटीभर मीठ, एक तारी पाक, मंद आच, दोन उकळ्या आणणे, कणीक थोडीशी सैलसर भिजवणे … ही भाषा यावी लागते. नारळ किसणे, कापणे, तुकडे करणे वगैरे म्हणणार्‍या मंडळीनी जरा सांभाळूनच यात पडावे. 

—-नारळ गुहागरी असतील तर चव वेगळी ….

—-राजापुरी असतील तर चव वेगळी ….

—-दापोली आसूद या बाजूची गोडी वेगळी ….

—-नारळ तारवटी असेल अजून वेगळी ….

तर हे सगळे समजून गूळ कमीजास्त करायचा असतो. 

मुळात नारळ उत्तम खवता यायला हवा. त्यात करवंटीची साल येता कामा नये. खवणीवर उकिडवं बसून खवल्यास खोबरं अधिक गोड लागतं. मधून मधून खोब-याचा तोबराही भरावा.

—-तांदूळ हा नवा असावा–.नव्या नवरी सारखा ! म्हणजे उकड ‘लग्न झाल्यानंतर पहिल्या काही दिवसातील नवरा बायकोच्या नात्यासारखी’ छान चिकट होते. आंबेमोहोर वा बासमती तांदूळ असेल तर मोदकालाच मोद होतो—-.तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व ते शक्यतो सावलीत फडक्यावर वाळवावेत ….. ही पिठी आता जात्यावर घरी करणे अशक्य, म्हणून गिरणीत स्वतःच्या देखरेखीखाली—- भैय्याला, ” अरे भय्या, ये गहू पे मत डालो. दुसरा तांदूळ आयेगा ना पिसनेको उसके उप्पर डालो” वगैरे सांगून बारीक दळून घ्यावी.

—–गूळ अश्विनातल्या उन्हासारखा, लग्नात मामाने नेसवलेल्या अष्टपुत्रीसारखा पिवळाधमक असावा.  किसल्यानंतर ताटात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची पखरण  झाली आहे असे वाटले पाहिजे.

—-खोबरे आणि गूळ यांना मंदाग्नीवर शिजत ठेवावे. खोबर्‍याच्या संगतीत गूळ हळूहळू 

विरघळत जातो व दोघे एकजीव होतात. 

—-हे होताना— चमचाभर तांदळाची पिठी व थोडी प्रत्येक दाणा वेगळा असलेली खसखस भाजून घालावी.आणि वेलदोड्याची पूड करून थोडी पखरावी. ह्या सर्व पदार्थांचे सारण तयार करावे.

—-यातील ‘कुठल्या गोष्टी किती प्रमाणात’ ते आई, आज्जी, सासुबाई, आजेसासूबाई यांनी सांगावे व नवीन सुनेने ते एकत्र परतावे.

—–जेवढे तांदळाचे पीठ तेवढेच पाणी घ्यावे. त्यात चवीला मीठ, दोन चमचे साजूक तूप व एक छटाकभर तेल घालावे. नंतर मंद आचेवर ठेवून ते ढवळावे. दोन वाफा आणाव्यात. 

—–पीठ अंतर्यामी भिजले आणि तूप-तेल यांच्या मर्दनाने शिजले पाहिजे.

—–सगळ्यात यापुढे खरी कसरत चालू होते. 

—–ही उकड मळणे हा एक खास प्रकार आहे. त्यात एकही गाठ राहता कामा नये. कुठेही आणि कशीही वळणारी या उकडीची गोगलगाय व्हायला हवी.

——लिंबाएवढी उकडीची गोळी घ्यायची आणि या गोळीवर हाताने संस्कार करायचा. मध्यभागी  ‘पुढील संसाराची जबाबदारी वाहू शकेल’ अशी थोडी मजबूत कणखर जाड ठेवून बाजूने संस्कारांचा, शिक्षणाचा दाब देऊन –तिला नाजूक, सुंदर मुलीसारख्या चिमटीने कडा दाबून चुण्या करुन सौष्ठव द्यावे.–आत सारण भरावे आणि सारणाचा भुंगा आत अडकला की कमळासारख्या पाकळ्या –म्हणजे नऊवारी नेसलेल्या या पापडीच्या नि-या अलगद, नाजूक 

हाताने मिटत न्याव्यात.

—-स्वतःचे नसले तरी मोदकाचे नाक चाफेकळी हवे. नंतर या जोडीला मोदक पात्रात घालून मस्त वाफ आणावी.

—-असा लुसलुशीत मोदक पानात वाढला की या फुलाचे नाक रूपी देठ काढून टाकावे व मगाशी वाफेमुळे गुदमरलेल्या मोदकाच्या श्वासनलिकेत साजूक तूप ओतावे. मग हळूच पूर्ण मोदक उचलून तो आपल्या अन्ननलिकेत सरकवावा——.

——-तृप्तता म्हणजे काय … याचा याची देही याची डोळा प्रत्यय घ्यावा !!!

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, एका रात्रीत तयार झालेल्या गाण्याचा किस्सा!!

श्री गणेश पुराणात अनेक चित्र विचित्र कथा आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यापासून अनेकांनी गणपतीवर काहीतरी नाविन्यपूर्ण चित्रपट काढण्याचे प्रयत्न केले आहेत. चित्रपट निर्माते शरद पिळगावकर त्यापै़कीच एक! पिळगावकरांच्या लक्षात आले की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही चित्रपट आजपर्यंत आलेला नाही. विषयाचं नाविन्य ही कोणतीही कलाकृती यशस्वी होण्याची पहिली खूण असते. चित्रपट निर्मिती हा इतका अवघड विषय आहे की प्रत्येक निर्मात्याला नवनव्या अडचणींना तोंड द्यावे लागते. निर्माता या आव्हानांना कसे सामोरे जातो यावर चित्रपट निर्मितीचा संकल्प पूर्णत्वाला जातो अथवा नाही हे ठरत असतं.

अष्टविनायक हा चित्रपटही याला अपवाद नव्हता. सुरुवातीला नायक म्हणून विक्रम गोखले यांची निवड करण्यात आली होती. पण त्यांच्या अटी आणि सूचना पाहून पिळगावकरांनी त्यांचा नाद सोडला. आता प्रश्न होता की नायक कोण होणार? सचिन पिळगावकर यांचे त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत काम जोरात होते त्यामुळे घरीच नायक असूनही पिळगावकरांना नायक कोण हा प्रश्न पडला होता.

वडीलांची तारांबळ बघून सचिन एक दिवस म्हणाला, “मी अष्टविनायकमध्ये काम करतो. पण माझी एक अट आहे.”

आधीच विक्रम गोखलेंच्या अटींनी वैतागलेले शरद पिळगांवकर आपल्या मुलाला म्हणाले, “आता तुझ्यापण अटी? बरं, तरीपण तुझ्या अटी तर सांग.”

तेव्हा सचिन म्हणाला, “अष्टविनायक गाण्याच्या शूटींगच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मी येणार. कटिग पेस्टिंग करून गाणं करायचं नाही.”

“डन”, शरद पिळगावकर म्हणाले. त्यांच्या दृष्टीने ही फार मोठी अडचण नव्हती.

आता नायिकेचा शोध सुरु झाला. भक्ती बर्वेंपासून अनेक नावं समोर आली. पण काही केल्या ते गणित जमेना. तेव्हा सचिनच्या मातोश्रींनी नाव सुचवलं- वंदना पंडित! आता ही वंदना पंडित कोण? असा प्रश्न अनेकांनी विचारायला सुरुवात केली. वंदना पंडित तेव्हा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम करायची. झालं ठरलं, वंदना पंडित नायिका!

पण याच काळात तिचं लग्न ठरलं. त्यामुळे ती चित्रपटात काम करणार नाही असं तिचं उत्तर आलं. निर्मात्यांना अशा अडचणी फारशा कठीण वाटत नाहीत बहुतेक! कारण शरद पिळगावकरांनी निरोप पाठवाला, “लग्नाआधीच शूटिंग संपवलं तर?”

वंदना पंडित राजी झाली. होकार मिळाला. मुलीच्या वडीलांची भूमिका पंडित वसंतराव देशपांडे यांना द्यायचं ठरलं. पण तेव्हा वसंतरावांचे “कट्यार काळजात घुसली” चे प्रयोग जोरात चालू होते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. पण पिळगावकर माणसांना राजी करण्यात हुषारच होते. त्यांनी पंडितजींना कसतरी पटवलं.

शूटिंग मार्गी लागलं.

“आली माझ्या घारी ही दिवाळी”, ‘”दाटून कंठ येतो” ही गाणी रेकॉर्ड पण झाली. पण यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला, ज्याच्यासाठी भर मध्यरात्री पिळगांवकर दादरच्या ‘राम निवास’वर पोहचले आणि त्यांनी खालूनच हाका मारायला सुरुवात केली.

“अहो खेबुडकर. अहो खेबुडकर … “

जगदीश खेबुडकर राम निवासमध्ये राहत नव्हते. पण मुंबईत आले की त्यांचा मुक्काम रामनिवासवर असायचा हे पिळगांवकरांना माहिती होतं . आणि त्या रात्री खेबुड्कर मुंबईत आहेत हे पिळगावकरांना कळल्यावर ते थेट पोहोचलेच! पिळगावकरांना पाहून खेबुडकर खाली आले आणि चिंतेच्या सुरात विचारलं, “एवढ्या रात्री काय काम काढलंत?”

“गाडीत बसा. मग सांगतो”, पिळगांवकर म्हणाले. खेबुडकर आणखीच चिंतेत पडले.

“अष्टविनायकचं एक महत्वाचं गाणं आहे, आणि ते तुम्हीच करायचं.”

“पण अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? “

“हो, पण त्यांच्याच्यानं अष्टविनायकाचं गाणं होईना. ते तुम्हीच करणार ह्याची मला खात्री आहे.”

“अहो, पण मला अष्टविनायकांची काहीच माहिती नाही. मी त्यांपैकी एकही गणपती पाहिलेला नाही.”, खेबुडकरांनी त्यांची अडचण मांडली.

“त्याची काळजी करू नका.”, असं म्हणत पिळगावकरांनी अष्टविनायकांची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली.

तोपर्यंत ते पिळगावकरांच्या घरी पोहोचले होते.

गाडीतून उतरता उतरता पिळगावकर म्हणाले, “खेबुडकर हे काम आज रात्रीच व्हायला हवे. उद्या रेकॉर्डिंग करायचं आहे. गणेश वर्णन लोक संगीताच्या बाजाचं करा म्हणजे झालं.”

एकेकाळी नमनाचं गाणं न ऐकलेल्या खेबुडकरांनी फक्कड लावणी लिहिली होती आणि ती गाजली पण होती. तेच खेबुडकर आता अष्टविनायकाचं गाणं लिहायला बसले होते ज्यांचं त्यांनी कधीच दर्शनही घेतलं नव्हतं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं. कागदावर श्रीकार टाकला आणि लिहायला सुरुवात केली.

कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन

काळजात सिंहासन मधोमधी गजानन,

दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना,

अष्टविनायका तुझा महिमा कसा,

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा,

अष्टविनायका तुझा महिमा कसा,

जय गणपती, गणपती गजवदना!!

बघता बघता एकेक गणपतीचं वैशिष्ट्य-विशेष सांगता सांगता ते आठव्या गणपतीपर्यंत येऊन पोहोचले.

पाली गावच्या बल्लाळेश्वरा,

आदिदेव तू बुद्धीसागरा,

स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख,

सूर्यनारायण करी कौतुक,

डाव्या सोंडेचे रूप साजिरे,

कपाळ विशाळ डोळ्यांत हिरे,

चिरेबंद या भक्कम भिंती,

देवाच्या भक्तीला कशाची भीती,

ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा….

आणि ही महती लिहिता लिहिता सकाळ झाली होती. खेबुडकरांनी पेन खाली ठेवलं. पिळगांवकर त्याचीच वाट बघत होते. “आता चालीत म्हणून दाखवा.” ते म्हणाले आणि हे म्हणेपर्यंत अनिल-अरुणही येऊन पोहोचले.

सगळे प्रभादेवीच्या बाँबे साऊंड लॅबोरेटरीत पोहोचले. अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मनिष वाघमारे असे गायक आधीच येऊन बसले होते. ळगांवकर खेबुडकरांना म्हणाले, “आज गायकाची जबाबदारी पण तुम्हीच पार पाडायची …”

आणि खेबुडकरांनी खडा आवाज लावला. सातव्या गणपतीपासून सुरुवात केली.

महड गावाची महसूर, वरदविनायकाचं तिथं एक मंदिर..

मंदिर लई सादसूदं, जसं कौलारू घर..

घुमटाचा कळस सोनेरी, नक्षी नागाची कळसाच्यावर..

सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं आहे तळं..

मूर्ती गणाची पाण्यात मिळं, त्यानी बांधलं तिथं देऊळ..

दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो,

वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो,

चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा!!

गाणं झकास झालं. तब्बल १३ मिनिटाचं गाणं!! आधी केलेलं शूट रद्द करून गाण्याचं पुन्हा चित्रीकरण करण्यात आलं. हा चित्रपटाचा क्लायमॅक्स होता आणि तो सुपरहिट झाला. चित्रपटाचा रौप्य महोत्सव झाला.

अष्टविनायकाचा महिमा आणखी दुमदुमतच राहीला!! अशी ही कहाणी एका रात्रीत निर्माणा झालेल्या गीताची!

संग्राहिका –  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 14 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 14 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[७३]

पाखरांच्या पंखांवर

जडवला एकदा

सोन्याचा वर्ख

तर

कधीच

नाही सूर मारणार ते

पुन्हा आभाळात

 

[७४]

छोट्या छोट्या गोष्टीच तर

सोडून जाईन मी

माझ्या जीवलगांसाठी

फार मोठ्या गोष्टी काय

प्रत्येकासाठीच आहेत. ]

 

[७५]

मृत्यूला अवघड करणारा

मला चिकटून राहणारा

हा माझा निष्फळ भूतकाळ

सोडव माला यातून

 

[७६]

तुला शतश; धन्यवाद

यासाठी की

कोणतेच गतिमान चक्र

झालो नाही मी

होतो मी त्यांच्यापैकी

जे चिरडले गेले

तशा चक्राखाली    

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाराधना…अभय आचार्य ☆ संग्राहिका : सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ समाराधना…अभय आचार्य ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

समाराधना 

गोविंदरावांच्या समाराधनेच कौतुक हा गावातल्या गप्पांचा नेहेमीचा विषय. नित्य अन्न संतर्पण होत असे . दुपारी बारा वाजता पहिली पंगत बसली की  चार वाजून जाईस्तोवर पंगती सुरूच असत. स्वतः गोविंदराव पंगतीत फिरून सावकाश होऊ द्यात म्हणत असत . मोठे दत्त भक्त असा गोविंदरावांचा लौकिक होता . दत्त महाराजांच्या कृपेने मला काही कमी पडलं नाही, तेव्हा मी देखील दानधर्मात काही कमी करणार नाही हा त्यांचा विचार असे .

पंगतीत दत्त महाराजांची पदे म्हटली जात आणि अनेकदा स्वतः गोविंदराव गुरुचरित्रातील एखादा कथाभाग पंगतीत येऊन सांगत असत . त्याच गावी एक अत्यंत गरीब अशी म्हातारी राहत असे . फाटकं  तुटकं नेसून ती त्या वाडयाच्या दाराशी येऊन बसे. सर्व पंगती झाल्यावर उरलेले पदार्थ ती घेऊन जात असे .ती अन्न घेऊन जाताना नेहेमी म्हणे, “अरे दोघाना पुरेल इतकं दे रे बाबा. “  ती झोपडीत एकटीच राहणारी, मग दुसरा कोण हा प्रश्नच असे .असेल कोणा प्राण्यासाठी म्हणून सर्व दुर्लक्ष करीत . 

ती झोपडीत आल्यावर दार लावून घेत असे . झोपडीत एक जीर्ण अशी दत्त महाराजांची तसबीर होती . दत्त महाराजांना त्या अन्नाचा नैवेद्य दाखवीत असे. आणि म्हणे, “ दत्ता, दमला असशील ! ये S खा दोन घास माझ्या बरोबर “  एक मंद अशी चंदन सुगंधाची झुळूक त्या झोपडीत शिरे . एक दिवस चुकून दार लावायला म्हातारी विसरली आणि हे सर्व एका मनुष्याने पाहिले . त्याने ताबडतोब ही  बातमी गोविंरावांपर्यंत पोहोचवली . ‘ आपल्या अन्नातील उरलेल्या अन्नाचा नैवेद्य दत्त महाराजांना ???’  ही  कल्पनाच त्यांना सहन होईना . 

त्यांनी त्वरित  मुदपाकखान्यातील सर्व सेवकांना फर्मान सोडले, उद्यापासून त्या म्हातारीला काहीही देऊ नये. झाले — म्हातारीला दटावून सेवकांनी हाकलून दिले . आपल्याला खायला काही नाही 

यापेक्षा दत्त उपाशी या जाणिवेने म्हातारी कळवळली. इकडे दत्त महाराजांची नित्य पूजा करणाऱ्या पुजारीवर्गाला त्याच रात्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला, “ अरे मला उपवास घडतोय ,त्या गोविंदाला जाऊन सांग. “ गोविंदरावांना हा दृष्टांत निरोप मिळाला ,त्यांनी पुजारी आणि सेवक वर्गाला विचारले “ काल नैवेद्य होता ना ? “ ‘ हो ‘ असे उत्तर सर्वांकडून मिळताच ते विचारात पडले . 

दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दृष्टांत आणि ह्या खेपेस दत्त महाराजांची मुद्रा क्रोधव्याप्त अशी . सकाळ होण्याची वाट न बघता पुजारी रात्रीच धावत वाड्यात आला . घामाने ओलाचिंब आणि अत्यंत घाबरलेला– हा काय प्रकार असावा हे जाणून घेण्यासाठी गावातील सर्वांना  सकाळी गोविंदरावांनी बोलावणे केले, तेव्हा तो म्हातारीच्या नैवेद्याची बातमी देणारा मनुष्य दिसला . तात्काळ काही तरी उमगून गोविंदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते तडक म्हातारीच्या झोपडीकडे गेले . उपवासाने क्षीण अशा अवस्थेत म्हातारी निजूनचं होती.  तिचे पाय अश्रूंनी  धुवत गोविंदराव म्हणाले “ आजपासून नित्य नैवेद्य दाखवत जा–”.  झोपडीतील जीर्ण दत्त महाराजांच्या तसबिरीत एक बदल मात्र झाला होता. महाराजांच्या चेहेऱ्यावर मोहक हास्य दिसत होते– श्रीगुरुदेव दत्त !!!—

 – अभय आचार्य

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजीची स्टेमसेल बॅंक….डाॅ.प्रेमेन बोथरा ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ आजीची स्टेमसेल बॅंक….डाॅ.प्रेमेन बोथरा ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

आज्जीची स्टेमसेल बॅंक !

माझी आज्जी..बहुदा पहिली स्टेमसेल बॅंकेची मुहुर्तमेढ रोवणारी स्री असेल..!

भारत खरंच बुद्धीवंताचा देश ! कित्येक पुरावे मिळतात त्याचे ! त्यापैकीच हा एक ! 

आज्जीची स्वत:ची स्टेमसेल बॅंक होती..आजी शंभरी गाठलेली !पण गाडग्यांच्या ऊतरंडीत नाव,वयाप्रमाणे सर्वांची नाळ साठवलेली ! कित्येक वर्षे ! कुठलंही प्रिजरवेटीव न वापरता ठेवलेली ! त्या प्रत्येक गाडग्यात अर्ध्यावर गवर्‍यांची राख असायची !आणि त्यात  वाळवून ठेवलेली नाळ असायची ! घरात कुणी जन्माला आलं की त्याची कापलेली नाळ सावलीत स्वच्छ पांढर्‍या कापडावर वाळविली जायची !आणि नंतर ती या राख भरल्या गाडग्यात जपून ठेवली जायची..त्याची ऊतरंड स्पेशल असायची..घुप्प अंधार्‍या खोलीत कोपर्‍यात ! अगदी माळवदाच्या थंड घरात ! मडक्यावर चुन्याने नावं लिहीलेली असायची प्रत्येकाची ! त्या ऊतरंडीला कुणाला हात लावायची मुभा नसे ! काय आहे त्यात विचारलं तरीही ऊत्तर रागातच यायचं !! 

तर अशी स्टेमसेल बॅंक गावातल्या प्रत्येकाच्या घरी तिनं सुरु केली..आणि घरात कोणाला कोणताही आजार जो पंधरा दिवसापेक्षा जास्त असला की,लोक तिला विचारायला यायचे !! मग ती ज्याची नाळ असेल ते गाडगं मागवायची अनं त्या कोरड्या नाळेला आमच्या घरी एक शाळीग्राम सदृष्य दगड होता..त्यावर ती पाण्याचे चार थेंब टाकून घासायची !आणि त्या रुग्णाला चाटण्यासाठी द्यायची !! आणि रुग्ण कांही दिवसात पुर्ण बरा व्हायचा !! 

माझ्या मोठ्या भावाला रिकेटस झालेला..!अर्थात डाॅक्टरांची ट्रीटमेंट घेऊनही फरक नव्हता..वडिल माॅर्डन सायंन्सला मानणारे !पण जेव्हा औषधांनी फरक पडत नव्हता तर त्याला त्याची नाळ ऊगाळून दिलेली..आणि तो लवकरच बरा झालेला ! (मी डाॅक्टर आहे ! कुणाला हे चुकीचं ज्ञान असेल असं वाटण्याची दाट शक्यता)..असे कितीतरी प्रसंग आलेले.तो हाय ग्रेड फिवर असो की अजून कोणता आजार..औषध एकच ! नाळेची एक मात्रा ! माझ्या आईला डिलेवरी नंतर परप्युरियल मॅनिया झालेला..!औषधोपचार झाले ! फरक नव्हता.आज्जीने आईकडच्या आज्जीकडून आईची नाळ मिळविलेली ! आणि त्याची मात्रा आईला दिलेली..आई त्यातून सुखरुप बाहेर आली !!पण आज्जीने हा प्रयोग कदाचित अशा आजारासाठी पहिल्यांदाच केलेला ! 

हे सगळे संदर्भ मला माझ्या वडिलाकडून मिळालेले ! मी माझ्या मुलांची नाळ अशीच जपून ठेवलीय !! अजून तशी गरज पडलेली नाहीये !! 

सो काॅल्ड नवे ज्ञानी मला आर्थोडाॅक्स विचारांचा म्हणतीलही हे लिहीलेलं वाचून !असं कांही नसतं हे ही म्हणतील पण सद्यस्थितीला स्टेमसेल स्मरुन ही प्रिजरवेशनची पद्धत जुनी असेलही पण त्यामागील वापराचे ज्ञान नक्कीच सारखे आहे !!स्टेमसेल अॅडव्हान्स असेलही..त्याचा बहुअंगी वापर आता खुप असेलही पण त्या जुन्या पद्धतीला जरी आज अडगळीत टाकलं गेलं असेल..तरीही त्यामागे नक्कीच खुप मोठं सायन्स होतं,आहे…ते खरंच एक पाऊल होतं जुन्या पिढीचं ! आजाराला सहज जिंकण्याचं ! विशेष माझ्या आईकडील आज्जी आणि वडीलांकडील आज्जीला दोघींनाही हे  ज्ञान होतं..पण काळाच्या ओघात हे ज्ञान मागे जरी पडलं असेल तरीही त्यातील गुढ अजून कोणी शोधलेलं नाही…आणि ते पुर्णत:विकसित होतं यात शंका नाही..त्या त्या काळाची आपली एक ओळख असतेच तसेच त्या त्या काळात गरजेनुसार विकसित झालेले सायन्सही ! 

केशरबाई अन रतनबाईंचा हा वारसा खरंच वाखणण्याजोगा आहे !! 

असे काही अनुभव आपले असतील तर जरुर शेअर करा ! स्टेमसेलचा हा जुना अवतार तितकाच भारी आहे जितका आजची सुधारित स्टेमसेल बॅकेचा आहे !!

#आज्जींनो तुम्ही आजही तुमच्या कतृत्वाने जिवंत आहात#

डाॅ. प्रेमेन बोथरा, हिंगोली.

मो 9518522393

(विचार करायला लावणारे– काहीतरी. प्रयोग करुन बघायला हवा– असे काहीतरी.) 

संग्राहक :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैफल तालांची… शंतनु किंजवडेकर ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ मैफल तालांची… शंतनु किंजवडेकर  ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

(एक अल्लड बोल-अभिनय गीत)

असे एकदा     स्वप्नी आले

तबला डग्गा    बोलु लागले 

नवथर बोटें     नाचु लागली 

तालांची मग   मैफल सजली 

               ***

त्रिताल बोले     ‘धा धिं धिं धा’

जसा चमकतो   रुपया बंदा

टाळी आणिक   ‘खाली’ मधला 

सम-प्रमाणी      शासक खंदा 

               ***

झप-तालाचे    रूप-आगळे 

दोन-तीनचे      छंद-वेगळे  

जणु-संवादे     वंदी-जनांना

धीना-धीधीना  तीना-धीधीना 

               ***

 रूपक   हसे-गाली

 पावलें   सात-चाली

 मारीतो  गोड-ताना

 तिंतिंना धीना-धीना   

                 ***

दादरा करीतो       भलता नखरा 

सहाच मात्रांत      मारीतो चकरा 

लाडीक स्वभाव   मोहक दागीना

धाधीना-धातीना  धाधीना-धातीना

                  ***

केहेरवा म्हणे       मी रंगीला

नर्तनातुनी           करतो लीला

चला नाचुया      एकदोन दोनतिन्

धागेनतिनकधिन् धागेनतिनकधिन् 

                  ***

एकताल मग   हसुन बोलला

राजा मी तर    मैफिलीतला  

मी तर देतो     भक्कम ठेका

चलन देखणे   माझे ऐका 

                ***

ताल-मंडळी   खुशीत सगळी

तबल्यामधुनी  बोलु लागली

समेवरी मग     अचूक येता

स्वप्न संपले      जाग जागली 

स्वप्न संपले      जाग जागली 

                ***

– शंतनु किंजवडेकर

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 13 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 13 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[६९]

शांत… नि:शब्द हो

माझ्या मना

हे विशाल वृक्ष म्हणजे

प्रार्थना आहेत.

 

[७०]

सुंदरते,

स्वत:ला शोधताना 

कशाला विसंबतेस

या तोंडापुज्या आरशावर

शोध ना स्वत:ला

प्रीतीमधून

 

[७१]

कुठली अज्ञात बोटे

हलकेच फिरतात

रेंगाळणार्‍या झुळकीसारखी

माझ्या काळजातून

उठवत तरंग गीतांचे

 

[७२]

नदीचं पात्र

भरभरून टाकणारे

हे जलद मेघ

लपवतात स्वत:ला

दूरातल्या डोंगरात

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजय ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजय ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मृत्युंजय– लेखक.शिवाजी सावंत.

कर्ण — ( हस्तिनापुरची राजसभा. द्यूतात सर्वस्व हरलेले पांडव. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा दुर्दैवी प्रकार.)

अंशूकांचा ढीग सभागृहात पडू लागला. माझ्या मनात असंख्य विचारांचा ढीग पडू लागला. काय केलं मी ! बालपणापासून कडक नियमांनी आणि कष्टसाध्य प्रयत्नांनी हस्तगत केलेली चारित्र्याची धवल साधना एका क्षणात सूडाच्या काळ्या कुंडात आज मी बुडवून टाकली! कर्ण ! योध्द्यांनी गौरविलेला कर्ण ! प्रेमाच्या धाग्यांनी सगळ्या नगरजनांच्या हृदयावर अधिराज्य करणारा कर्ण ! एकाच क्षणात भावनांच्या राज्यातील दुर्दैवी कर्ण पराजित ठरला ! शिशुपाल आणि मी, दु:शासन आणि मी, इतकंच काय पण कंस आणि मी यात कसलाच फरक नाही की काय ? या विचारानं कधी नव्हते ते माझ्या डोळ्यात टचकन अश्रुबिंदू उभे राहिले ! राजसभेतील माझ्या जीवनातले पहिलेच अश्रुबिंदू ! त्यात कारुण्य नव्हतं, भीती नव्हती, याचना नव्हती, परिणामाच्या भयानं थरथरणारी पश्चातापदग्धताही नव्हती ! आदर्श म्हणून प्राणपणानं जीवनभर उराशी कवटाळलेल्या नीतितत्वांना उरावर घेऊन अंशुकांच्या ढिगार्‍यात सूर्यशिष्य कर्णाचं कलेवर पाहताना खंबीर मनाचे बांध फोडून आलेली ती वेदनेची आणि यातनेची तीव्र सणक होती. अश्रुबिंदूंच्या स्वरूपात ती सणक उभी राहिली होती – तीही सूतपुत्र कर्णाच्या नेत्रांत ! सूर्यशिष्या साठी सूतपुत्राच्या डोळ्यांत अश्रू ! एक क्षणभरच मला वाटलं, मी सूतपुत्र झालो नसतो तर! कसं झालं असतं माझं जीवन !श्रीकृष्णासारखं ?  का नाही ? झालंही असतं ? संस्काराच्या संघातांनी सामान्याचा असामान्य होतो. उलट कुसंस्कारांच्या कर्दमात कमलपुष्पाच्या पाकळ्यांचंही घृणामय शेवाळ होतं ! कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. मी एका क्षणात या सर्व मर्यादा आज ओलांडल्या होत्या !

माझ्या डोळ्यातले ते पहिलेच अश्रुबिंदू कुरूंच्या राजसभेत घरंगळून हातांतल्या उत्तरीयावर पडून असेच विरले! ज्यांचा अन्वय सभागृहातल्या कुणालाही लागला नसता. निवळलेल्या डोळ्यांसमोर पांचाली उभी होती. घामानं डवरलेला, थकलेला दु:शासन क्षणभर थांबला. शेकडो योजनांचा प्रवास करून आलेल्या घोड्यासारखा तो धापावत होता. अंशुकांचा ढिगारा त्या दोघांपेक्षाही उंच दिसत होता. सर्व वाद्यांचा आवाज एकाएकी थांबला आणि केवळ मुरलीचेच स्वर भयाण भेदक शीळ घालू लागले. पांचालीच्या अंगावर पीतवर्णी अंशुक झळाळत होतं ! सुवर्णधाग्यांनी गुंफलेल्या वस्त्रासारखं ! मला ते पूर्वीही कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं ! सर्व शक्ती एकवटून त्या पितांबरालाही हात घालण्यासाठी दु:शासनानं हात उचलला ! पुढचे खूर उचलून मध्येच उसळणाऱ्या शुभ्र घोड्यासारखे दोन्ही हात उंचावून पितामह खाडकन उठून गरजले.

“दु:शासन,  एक सूतभरही आता पुढं सरकू नको ! शिशुपालासारखा एका क्षणातच दग्ध होशील. लक्षात ठेव ते पितांबर आहे ! “

अंगी त्राण  नसल्यामुळे हात खाली सोडून दु:शासन रखडत – रखडत कसातरी आपल्या आसनाजवळ आला. क्षणभर आसनाच्या हस्तदंडीवर हात टेकवून कमरेत खाली वाकला.त्याच्या स्वेदानं डवरलेल्या मस्तकावरचे दोन थेंब टपकन त्याच्याच आसनावर ओघळले. त्या स्वेदबिंदूवर तो उभ्यानंच शक्तिपात झाल्यासारखा कोसळला.आसनावर स्वेदबिंदू,  स्वेदबिंदूवर दु:शासन ! शिसारीने मी मान  फिरविली. माझ्या हातातील उत्तरीय केव्हाच गळून पडलं होतं. पितांबराच्या तेजस्वी वर्णापुढं त्या उत्तरीयाचा वर्ण काहीच नव्हता ! खिन्न मनानं मी खाली बसलो. कायमचा !

(अंशुक म्हणजे स्त्रियांचे वस्त्र)

श्रीकृष्ण — ( रणभूमीवर अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन कर्ण पडला ती वेळ. )

त्याची अंतिम इच्छा विचारण्याचं सर्व-सर्व नैतिक उत्तरदायित्व आता केवळ एकट्या माझ्यावर येऊन पडत होतं ! केवळ एकट्या माझ्यावरच !!

झटकन मी पुढे झालो ! त्याच्या पाळं तुटलेल्या कानाजवळ तोंड नेत हळूच पुटपुटलो.”  कौंतेया, तुझी अंतिम इच्छा ? “

त्यानं झापडणारे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले ! दोन अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यात तरळलेले मला स्पष्ट दिसत होते ! कसले होते ते !

दुःखाचे ? पश्चातापाचे ? ते ; धन्यतेचे !!  कृतार्थतेचे !! मी – स्वतः मी त्याला ‘कौंतेया’ म्हटलेलं ऐकून धन्य झाल्याचे! तोही हळूहळू पुटपुटू लागला, ” द्वारकाधीशा… माझी अंतिम इच्छा! इच्छा की… तू – तूच माझा अंत्यसंस्कार… एका… एका… कुमारी-भूमीवर करावा!!  कुमारी-भूमी!! ” त्याच्या आवाज अत्यंत क्षीण झाला होता.

“कुमारी-भूमी!! म्हणजे ?” त्याला अचूक काय पाहिजे होतं ते मला नीटपणे कळलं नाही म्हणून मी पुटपुटलो.

“होय…कुमारी! ज्या भूमीवर… कधी – कधीच…तृणांकुरसुद्धा… उगवले नसतील… उगवणार नाहीत! माझी दुःखं…ती…ती पुन्हा – पुन्हा या मर्त्य भूमीवर – कोणत्याही रूपात उगवू नयेत!!! म्हणून… ही – ही पंचमहाभूते… कुमारी-भूमीत –  लय – लय…!”

त्याचा आवाज आता अत्यंत क्षीण आणि अस्पष्ट होत चालला होता. त्याची ती धक्का देणारी विलक्षण अंतिम इच्छा ऐकून मीही स्तिमित झालो! तो अर्धवट बोलत होता. त्याला आणखी काही सांगायचं तर नसेल म्हणून मी माझे कान त्याच्या अगदी ओठांजवळ नेले. टवकारून ऐकू लागलो. एकचित्तानं!

तो अस्पष्ट अर्धवट शब्द उच्चारत होता-

” ली… ली… माता… माता… ण … न!”

तो काय म्हणू इच्छित होता ते माझ्याशिवाय कुणालाच स्पष्ट सांगता आलं नसतं! तो वृषाली म्हणत होता की पांचाली! तो कुंतीमाता म्हणत होता की राधामाता!!  शोण म्हणत होता की अर्जुन!!! मी ताडलं – तो दोन्ही म्हणत होता!!!

आता त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्दही बाहेर पडेनासे झाले! सूर्यबिंबावर खिळलेल्या निळ्या बाहुल्या कणभरही चळत नव्हत्या. त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो काय म्हणत होता ते मी ओळखू शकत होतो! अर्ध्यदान करणाऱ्या एका एकनिष्ठ सूर्यपुत्राचे ते शेवटचे शब्द होते. ओठांच्या हालचालींवरून नक्कीच सवितृ मंत्राचे, गायत्री छंदातले ते दिव्य बोल होते!!

“ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यंऽऽऽ!”  एकाएकी त्याच्या ओठांची तीही हालचाल क्षणात थांबली!  सर्वांनी श्वास रोखले! त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला! छातीवरचं स्पंदणारं लोहत्राण आता शांत झालं! स्थिर झालं.

 महान तेजस्वी असा, डोळे दिपवणाऱ्या एका प्रखर तेजाचा प्रचंड स्त्रोत क्षणात सर्वांसमक्ष त्याच्या हृत्कमलातून बाहेर पडून आकाशमंडलातील पश्चिम क्षितिजावर अमीन टेकडीच्या माथ्यावर रेंगाळणाऱ्या विशाल अशा लाल-लाल सूर्यबिंबाकडे प्रचंड गतीनं झेपावला! क्षणात त्या रसरशीत तप्त हिरण्यगर्भात लय पावला!! त्या जात्या महान तेजानं सभोवतीच्या सर्वांचे डोळे दिपले! अंधारले!

 त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं!!!

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print