मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.)

(शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली! त्या आनंदातच तोही परतला.) इथून पुढे —

दोघेही गेल्यावर गणपतरावांनी अक्षरश: झडप घालून ते पत्र हातात घेतलं. आपल्या गुरूंचं पत्र ! आपल्या देवाचं पत्र !! साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र !!! — गेले चार दिवस या-त्या सगळ्या लोकांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा येत होत्या. पण आपली नजर लागली होती ती केवळ याच पत्राकडे. कित्येकदा वाटलं होतं की धावत जावं तात्यारावांकडं आणि सांगावं.. —

– ‘तात्याराव… तात्याराव बघा ! मी मेयर झालोय तात्याराव ! या विद्वज्जनांच्या पुणे नगरीने हिंदूमहासभेच्या बाजूने कौल दिलाय ! तात्याराव, तुमचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकारण्याच्या मार्गात आज अजून एक पाऊल पुढे टाकलंय आपण ! आणि त्या पावलात कणभर का होईना पण तुमच्या या शिष्याचा वाटा आहे …  या गणपत नलावड्याचा वाटा आहे, तात्याराव !’

— आणि ज्यावेळी येणाऱ्या संदेशांपैकी एकही संदेश तात्यारावांचा निघत नव्हता, तेव्हा कसे खट्टू झालो होतो आपण ! नुसत्या आठवणीनेच गणपतरावांना एखाद्या लहान बालकासारखे हसू फुटले !

त्याभरातच थरथरत्या हातांनी त्यांनी ते पत्र एकवार भाळी लावले. मग हलक्या हातांनी त्यांनी ते फोडले. आत सावरकरांनी स्वहस्ते लिहिलेला कागद ! पत्राच्या सुरुवातीस सावरकरांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे लिहिलेल्या ‘श्रीराम’ कडे त्यांनी किंचित काळ डोळे भरून पाहिले. सावरकरांची छबी दिसली असावी बहुतेक गणपतरावांना त्यात ! ते अधीर होऊन वाचू लागले —

“प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस,

सप्रेम नमस्कार.

पुण्याची धुरा आता समर्थ हातात आलीये म्हणायची ! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

खरं म्हणजे मी तुमची क्षमाच मागायला हवी. पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीरच झालाय. पण काय करू ! तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण तर ठाऊकच आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याच इंग्रजीला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं? तेही आपल्या देशी भाषा स्वत:च अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसडून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? …. जिथं स्वकीय भाषांतील प्रतिशब्द उपलब्ध आहेत, तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजीचे वा ऊर्दू-फारसीसुद्धा अन्य कुणाही परकीय भाषेचे भलते लाड नकोतच ! मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तिथेही देववाणी संस्कृतला शरण जात सोपे, सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे व ते बोलीभाषेत रुळवणे, हे देखील आपले तितकेच महत्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे !

उदाहरणार्थ – ते ‘स्कूल’ म्हणतात, मला त्यासाठी ‘शाळा’ हा पर्याय सुचतो.

ते ‘हायस्कुल’ म्हणतात – त्याला आपण ‘प्रशाला’ म्हणू शकतो.

ते ज्याला ‘टॉकीज’ अथवा ‘सिनेमा’ म्हणतात, त्यासाठी ‘बोलपट’ अथवा ‘चित्रपट’ असे दोन शब्द सुचताहेत मला – यातला कोणता शब्द वापरायचा ते तेवढे ठरवायचे.

‘अप-टु-डेट’ला ‘अद्ययावत’ म्हणता येईल,

‘ऍटमॉस्फिअर’ला ‘वायुमान’ म्हणता येईल,

‘पोलिस’ला ‘आरक्षी’ म्हणता येईल.

‘तारीख’ला ‘दिनांक’ म्हणता येईल. असे बरेच काही…

मात्र माझे घोडे या ‘मेयर’ शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला ‘मेयर’ म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — ‘महापौर .

साधारण मोठ्या गावाच्या प्रमुखास ‘मेयर’ म्हणतात. अश्या मोठ्या गावांच्या मागे ‘पूर’ लावायची आपल्याकडे पद्धत आहे. अगदी वैदिक काळापासून आहे. आणि अश्या ‘पुरा’त राहाणाऱ्या रहिवाश्यांना म्हणतात, ‘पौरजन’. तुम्ही या पुणे नामक ‘पुरा’चे प्रमुख आहात…  प्रथम नागरिक. त्याअर्थी तुम्ही झालात – महापौरजन ! आणि त्याचेच सुटसुटीत रूप आहे – ‘महापौर’!

असा अर्थपूर्ण शब्द सापडल्या-सापडल्या ताबडतोब पत्र लिहावयास घेतले आणि ताबडतोब धाडलेसुद्धा ! तेव्हा, महापौर गणपतराव नलावडे, तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!”

खाली दिनांक आणि सावरकरांची घुमावदार स्वाक्षरी होती!

— पत्र वाचत असतानाच गणपतरावांचे मन सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता, यांच्यासमोर नत झाले होते. भानावर येताच गणपतराव धावत-धावत आपल्या कार्यालयाबाहेर आले. त्यांना असे आलेले पाहून बाहेर उभे असलेले लोक चमकलेच. शिपाई बिचारा गोंधळून उभा राहिला. तिकडे कुठेच लक्ष न देता त्यांनी दारावर लावलेली पाटी उतरवण्याची खटपट चालू केली.

“काय झालं सायेब”, शिपायाने बावरून विचारले.

“तू लागलीच पळ आणि नवी पाटी बनवायला टाक. अश्शीच नक्षी हवीये अगदी ! फक्त त्यावर लिहिलेलं हवंय — “ गणपत महादेव नलावडे, महापौर “! — समजलं? जा लवकर ”, असे म्हणून त्याच्याकडे वळूनदेखील न पाहाता गणपतरावांनी पाटी उतरवण्याचे काम सुरूच ठेवले !

शिपाई बिचारा काहीच न समजून जागीच उभा होता. बेट्याला काय कल्पना की, तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला होता !

हो, सावरकरांनी मराठी भाषेला अजून एक चिरंतन टिकणारी आणि लवकरच सर्वमान्य होणारी देणगी दिली होती ! आज एका शब्दाचा जन्म झाला होता !!

— समाप्त — 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.) 

दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती – 

— “गणपत महादेव नलावडे, मेयर“!

गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना ! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग ! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच ! 

गणपतरावांनी खिन्नपणे एकवार सगळ्याकडे नजर टाकली. गणपतरावांना सारंच निरर्थक वाटत होतं.

जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला.

“जी…?”

“ही एवढीच पत्रं आलीयेत का रे…?”

“व्हय जी!”

“नीट आठवून सांग… एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या?”

“न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं!”

यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले– 

“कोन्ता खास सांगावा यायचा हुता का?”

“नाही नाही… काही नाही. जा तू.”

“सायेब, माज्याकडनं काई चूक झाली का?”

“नाही नाही… अरे खरंच तसं काही नाही. जा तू.”

गणपतराव चांगलेच वरमले. ‘ आपण जरा अतीच तर करत नाही ना,’ असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना.

शिपाई बावळटासारखा चेहरा करून जायला लागला. तशी गणपतरावांनी त्याला थांबवलं. म्हणाले,

“अरे ऐक… आता मी जरा काम करत बसणार आहे. आज काही कुणाच्या भेटी-गाठी ठरलेल्या नाहीत ना…? ठीक आहे तर ! आता कुणालाच आत सोडू नकोस.”

“जी” म्हणून शिपाई निघून गेला. 

‘आपण स्वत:च करावी का चौकशी?’, गणपतरावांच्या मनात येऊन गेलं. पण ‘नको नको. ते बरं दिसणार नाही’, असं म्हणून त्यांनी तो विचार झटकला आणि समोरच्या कामाकडे लक्ष द्यायला लागले. 

हळूहळू तो विचार मागे पडला. त्यानंतर चांगले दोन-एक तास गणपतरावांनी स्वत:ला कामातच बुडवून घेतलं. समाधीच लागली होती जणू त्यांची.

गणपतरावांची समाधी भंगली ती कसल्याश्या कोलाहलाने. सुरुवातीचे एक-दोन क्षण काही समजलंच नाही. नीट लक्ष देऊन ऐकायला लागले तेव्हा जाणवलं की, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच दोन व्यक्ती वाद घालतायत. गणपतरावांनी जागेवरूनच, “काय चाललंय रे? कोण आहे?” असं विचारलं. त्याबरोबर शिपाई धावतच आत आला. मागोमाग एक कार्यकर्त्यासारखा दिसणारा मनुष्यही आत शिरला. ते पाहून शिपायाच्या कपाळाला नकळतच आठ्या पडल्या. पण साहेबांसमोर चिडणं बरं दिसणार नाही म्हणून तो काही बोलला नाही. गणपतरावांनी इशाऱ्यानेच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्यावर शिपाई सांगू लागला,

“सायेब पाहा ना, तुमीच म्हनले होते ना कुनालाच आत सोडू नको म्हनून. तर ह्ये सायेब ऐकेचनात. काय तर म्हने, टपाल द्यायचंय. म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी मी द्येतो सायबास्नी नंतर. तर म्हनले की, न्हाय, म्हासभेच्या हापिसातून आलोय न् म्हत्वाचा सांगावा हाय. तुमालाच द्यायचा म्हंत्यात…”

गणपतरावांनी आलेल्या व्यक्तीला एकवार आपादमस्तक न्याहाळलं. हिंदूमहासभेच्या कार्यालयातून आल्याचं सांगतोय हा माणूस, पण मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाहीये याला?

त्यांचे भाव ओळखून तो समोरचा तरुण मघाशीच्या भांडणाचा लवलेशही न दाखवता उत्साही स्वरात सांगू लागला,— “ मी रविंद्र जगताप. राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलोय शिकायला. राजापूरला असल्यापासून महासभेचं काम करतो मी. आज कामानिमित्त पुण्यात येणार होतो. तर काल संध्याकाळीच तात्यारावांनी बोलावून घेतलं..”

— ‘तात्याराव? बॅ. सावरकर?’ हा उल्लेख होताच गणपतरावांनी कान टवकारले ! जगतापच्या ते यत्किंचितही लक्षात आलं नाही. त्याचा ओघ चालूच होता,

“…मी म्हटलं, देईन की त्यात काय ! आता साक्षात स्वा. सावरकरांनी काम सांगितलेलं. त्यांची सेवा करण्याची संधी म्हणजे साक्षात स्वातंत्र्यलक्ष्मीचीच सेवा करण्याची संधी की ! घेतलं पत्र आणि आलो इकडे ! तर हे महाशय आत सोडेचनात ! साहेब कामात आहेत म्हणे ! आता मला सांगा, सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्वाचं असणार आहे? घ्या…!!!” – असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकावले. 

गणपतरावांच्या हाताला हलकासा कंप सुटला होता. परंतु तसं जाणवू न देता त्यांनी ते पत्र हातात घेऊन एका बाजूला ठेवले आणि जगतापकडे वळून म्हणाले,

“जगतापसाहेब, चहा घेता ना?”

“छे छे साहेब, चहा नको. घाईत आहे मी जरा. बाहेर मित्र वाट पहात थांबलेयत. ते काय… ते पुण्यात नवा आहे ना मी. कार्यालय माहिती नव्हतं मला.”

यावर गणपतराव म्हणाले, “हरकत नाही. पुढच्यावेळी आलात तर चहाला जरुर या !” मग शिपायाकडे मान वळवून म्हणाले, “ पुढच्यावेळी हे आले तर अडवू नकोस रे यांना. पाहुणे आहेत आपले !”

शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय ’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली ! त्या आनंदातच तोही परतला.

– क्रमशः भाग पहिला 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कूर्मजयंती निमित्त —… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कूर्मजयंती निमित्त — ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. – मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व —

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाचे गुण

१) कासवाला ६ पाय असतात, तसेच माणसाला ६ शत्रू असतात.

काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर 

कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते.  त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे 

२) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातून प्रेम देवून वाढवते. त्याच प्रमाणे देवाने आपल्यावर कृपा दृष्टी ठेवावी ही भावना आहे. 

३) कासव आपल्या अष्ट अंगांनी नमस्कार करते.  त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते, त्याप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही, हे कासव आपल्याला शिकवते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ ‘ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते ‘, असा आहे.

आपणास माहिती आहे का की कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दूध पाजत नसते.  तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते

— त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्या, या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते.

– इदं न मम

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ गीता आणि ज्ञानेश्वरी – ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

वाचतांना वेचलेले

 ☆ गीता आणि ज्ञानेश्वरी – ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

” गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?” सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.

” विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल. ” सखीने उदार मनाने मला सवलत दिली.

मी म्हणाले, “गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. “

सखी: “उदाहरण दे. “

हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून, मनात ठेवून मी म्हटले, ” भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते?”

सखी: “कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो. “

मी: “बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे. पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा.

भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणे अशक्य नाही. परंतु लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ, हे त्याला माहीत असते.

जी गोष्ट आपोआप होणार आहे, त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचे कारण नाही. काही कर्म करावी लागतात, तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो. कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचे, ते कळणे म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे, तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सद्सद्विवेकबुद्धीवर आहे.

ज्या कमळातील मकरंद खाल्ला, त्याला छेद देणे अयोग्य आहे. कमळाच्या कोमल सहवासात राहणे, सकाळ झाली की निघून जाणे, जास्त संयुक्तिक आहे.

गुळाला मुंगळा चिकटून राहतो त्याप्रमाणे पाकळी उमलल्यावर भुंगा कमळाला चिकटून रहात नाही. पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता, दोन्ही गोष्टी माणसात असतात, त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते.

आत्मचिंतन का करावे? हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाचा उपजत कल ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावे. त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्याने, नियमित शांत बसावे. काहीच न करणे म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतः च्याच मन म्हणजे भावना आणि बुद्धी म्हणजे विचारांकडे लक्ष केंद्रीत करावे. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे, पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैश्विक शक्तीशी जोडते.

कमळ म्हणजे बुद्धी,

भ्रमर म्हणजे मन,

पाकळ्या म्हणजे चक्षु,

रात्र म्हणजे अज्ञान,

सकाळ म्हणजे मोक्ष असाही अर्थ होतोच.

प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात. सर्व मिती लक्षात येणे, माणसाला शक्य नाही.

पण माणूस जी प्रतिक्रिया देतो त्यावरून त्याचा कल लक्षात येतो.

ध्यान करावे हे गीता सांगते, का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते.

माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल, हे त्याच्या धारणाशक्तीवर अवलंबून असते. म्हणून लोकांकडे, बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतः च्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे, हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते.

पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावे, हा भ्रमर वृत्तीचा अर्थ माऊली सांगतात.

कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते.

गीता भक्ती शिकवते. डोळ्यांना दिसते त्यावरून, एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये, ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचतांना येते.

गीता वाचली की छान वाटते, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही, ही जाणीव होते. शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी मनन करावे लागते, ही जाग ज्ञानेश्वरी वाचून येते.

गीता शास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते.

सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र रहायला ज्ञानेश्वरी शिकवते.

“काय करावे” ते गीता सांगते. “कसे करावे” हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

….

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला भावलेले अध्यात्म… ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

📖 वाचताना वेचलेले 📖

मला भावलेले अध्यात्म… ☆प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

       अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.

       अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.

       अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे. 

       अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.

       अध्यात्म म्हणजे वेदा बरोबरच  वेदना वाचता येणे. 

       अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.

       अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.

       अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.

       अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.

       अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.

       अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.

       अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.

        अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.

        अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे. 

        अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.

        अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे. 

        अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.   

अध्यात्म म्हणजे …. 

          साधं………

          सोपं……..

          सरळ………

         आणि  निर्मळ ……….असणं – दिसणं आणि वागणं. 

आहार या विषयावर अनेक विद्वानांची मते सर्वश्रुत आहेत  आणि प्रत्येक जाती धर्मात यावर मत भिन्नता आहे माझ्या मते वैचारिक शाकाहारच असणे हेच अध्यात्म आहे महत्त्वाचे.   

        अध्यात्म म्हणजे फक्त पूजा – पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर……

        अध्यात्म म्हणजे केलेली पूजा – पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.

        अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.   

थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य  कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे.

संग्राहिका –  सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ …Mother’s Day म्हणजे… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ …Mother’s Day म्हणजे ….  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

जिने बोट धरून पाटीवर अक्षर गिरवण्यास शिकवले… तिला मोबाईलवर टाईप करायला शिकवणं म्हणजे …Mother’s Day

लहानपणी आपल्या जिभेचे चोचले ज्या आईने पुरवले….. *तिला एखाद्या तांराकित हाॅटेल मध्ये दिलखुलास ट्रीट देणं म्हणजे…*,

…Mother’s Day

लहानपणी साडीच्या निर्‍या करायला जिच्याकडून शिकलो, ..त्या आईला केव्हातरी जीन्समध्ये पाहण्याची गंमत म्हणजे …. …Mother’s Day

ज्या आईने आपल्या चेहरा अगदी पुस्तकासारखा वाचून काढला … तिला या टेक्नोसॅव्ही जगात FB शी ओळख करून देणं म्हणजे … …Mother’s Day

बाबांची नजर चुकवून जिने साखरेच्या डब्यात साठवलेले पैसे आपल्यासाठी withdraw केले त्या आईला ATM..मधून पैसे काढायला शिकवणं म्हणजे … …Mother’s Day

जिचा हात पकडून आपण भरभर जिने उतरलो, आणि चढलो,…तिला आताच्या ESCALATOR …वरून सांभाळून घेऊन जाणं म्हणजे…. …Mother’s Day

Best wishes to  wonderful and powerful mother 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एकटेपणा…” – लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर ☆ प्रा.भारती जोगी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “एकटेपणा…” – लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर ☆ प्रा.भारती जोगी ☆

‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”.  पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे. 

या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज !” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार चे मानकरी आहेत, आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.  त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे. 

*********

“मला आमच्या इथं गावातील बिया वाल्या बाईची गोष्ट आठवते. बिया वाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं.  हा तिचा हात गुण होता की झाडा -कोडावरची माया? माहित नाही. 

मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या  बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं.  ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं.  म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तीने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही. 

बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही.

 तिला एकदा आई म्हणाली होती,

“आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू -पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”

तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती? ” 

” कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा?”

तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली,  “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती? 

होती ग.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली.  म्हणाली, आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना…

दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला.. 

अन तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. 

माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत,  हे एका अर्थी बरंच झालं.! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “

*********

खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने.   

…….

वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं?  एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी 3 सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…

पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा”,  

दुसरं, “आपलं दुःख कुरवळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा”

आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका,  थोडक्यात, detach राह दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या.”

लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर

माहिती संकलक : प्रा. भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत….”  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

नुकतेच – दि ३१ मार्च २०२३ ला माझ्या ज्येष्ठ मुलाचे लग्न झाले .

सोहळा खूप मोठा भव्य करण्याचा मनोदय नव्हता त्यामुळे आपल्या सर्वांना बोलावू शकलो नाही म्हणून क्षमस्व !

परंतु या निमित्ताने आम्ही – (मी – माझी पत्नी आणि मुले आणि वधू आणि त्यांचे वडिलधारे लोक अशा सगळ्यांनी ) मिळून काही गोष्टी लक्षपूर्वक आणि ठरवून करण्याचा प्रयत्न केला आणि तो देवाच्या आणि कुलस्वामिनीच्या कृपेने उत्तम रीत्या सफल झाला तो तुमच्या सगळ्यांशी समभागी (share ) करतो .

आम्ही असे लक्षात घेतले की – विवाह हा एक अत्यंत प्रमुख असा संस्कार आहे .

त्यामुळे हा संपूर्ण विवाह विधी हाच लग्नाचा मुख्य भाग असावा . 

 त्यात – सिनेमा – TV सीरियल – आणि आपले अज्ञान यांमुळे पुष्कळ गैर आणि रसभंग करणाऱ्या गोष्टी घुसल्या आहेत त्या टाळूया .

म्हणून – काही गोष्टी विचारपूर्वक केल्या आणि काही कटाक्षाने टाळल्या .

बँड – म्हणजे रणवाद्ये नकोत . मंगल आणि सुमधुर  वाद्याचे संगीत असावे . म्हणून सनई, सतार, बासरी यांचे आनंद उत्साह वाढवणारे संगीत पार्श्वभूमीवर ठेवले .

या विवाह संस्काराचे विधि अतिशय सुंदर आणि हृदयंगम आहेत .

त्यात सौंदर्य – मांगल्य – पावित्र्य – दूरदृष्टी – सगळं काही आहे .

परंतु आपणच ते विसरून गेलो आहोत .

म्हणून मी स्वतःच चार पाच महिने – विवाह विधींचा अभ्यास केला

त्याचे संकल्प – कृती – मंत्र यांचे अर्थ अभ्यासले – त्याला प्रमाण आणि आधार ग्रंथ वाचले .

ते वाचून मन भरून आले आणि असे प्रकर्षाने वाटले की सर्वांना हे विधी समजले पाहिजेत . 

म्हणून असे ठरवले की हा संपूर्ण विधी समजावणारे एखादे छोटेसे पुस्तक तयार करावे आणि प्रत्येकाला द्यावे . लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाचे आपण स्वागत करतो त्यावेळी हे पुस्तक स्वागताची भेट म्हणून प्रत्येकाला दिले .

आणि सांगितले की आपण इथे लग्नासाठीच वेळ काढून आला आहांत तेव्हा इथे बसल्या बसल्या – हे पुस्तक चाळा – त्यातलाच विधी आपल्या समोर चालू आहे तो बघा . त्याचा अर्थ इथे दिला आहे आणि समोर प्रत्यक्ष कृती होत आहे.

ही कल्पना आलेल्या सगळ्यांनाच आवडली आणि कित्येकांनी त्याच्या अधिक प्रती मागूनही घेतल्या .

प्रत्यक्ष वधू – वर एकमेकांना पुष्पमाला घालताना ऐन वेळी वधूला किंवा वराला उचलून घेऊन एक अनैसर्गिक मजा घेण्याची वाईट कृती लग्नात घुसली आहे . ही कृती करण्यासाठी काही उत्साही तरुण आणि मित्र वाटच पाहात असतात .

त्यांना आधीच फोनवर बोलून विधी किती सुंदर आहे हे समजावले आणि त्यांनाच विचारले की – इतक्या छान भावनांचा संगम होताना – त्या भावनांना विस्कटून टाकणारी – ऐन वेळी पुष्पमाला घालूच न देणारी – उचलून घेण्याची – कृती करायची का?  तेव्हा त्यांनी स्वतःहूनच सांगितले की आम्ही हे करणार नाही .

आपण जेव्हा मंगलाष्टके म्हणतो त्यावेळी अक्षता वाहातो . त्या अक्षता येणार्‍या आप्त स्वकीय – मित्र यांच्या शुभ ईच्छा आणि आशिर्वाद म्हणून – वधू वरांच्या डोक्यावर वाहायच्या असतात . पण ही गोष्ट माहीती असूनही आपण ती त्यासाठी काही आयोजन नसल्यामुळे करू शकत नाही – भावना मनात ठेवून आपण आहे तिथून अक्षता वाहाव्या लागतात आणि त्यामुळे वाहाणे बाजूला राहते आणि जोर लावून फेकाव्या लागतात . मनातील भावना कृतीत व्यक्त करु शकत नाही .

म्हणून आम्ही आणि विधी सांगणार्‍या गुरुजींनी पुढाकार घेऊन एक वेगळी संकल्पना प्रत्यक्षात केली – ती अशी :

मंगलाष्टकांच्या वेळी आलेत्या प्रत्येकाच्या हातात अक्षता असतील पण त्या त्यांनी प्रत्येक वेळी टाकायच्या नाहीत तर हातातच ठेवायच्या .

तसेच आलेल्या सगळ्यांनाच खुर्च्यांवर बसायला सांगितले – वधू वरांच्या बाजूला फक्त उपाध्याय – अंतर्पाट धरणारे आणि करवल्या एवढेच असतील .

त्यामुळे पुढे गर्दी झाली नाही .

बसल्या जागेवरून प्रत्येकाला पाहाता आले.

मंगलाष्टके झाल्यावर वधू – वरांचे पुष्पहार घालून झाले की – ते दोघे गुरुजींसह विधी मंडपातून  उतरून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या जवळ जातील त्यांना नमस्कार करतील . त्या त्यावेळी समोरच्या चार – पाच जणांनी त्यांच्या मस्तकावर त्या अक्षता सोडाव्या . यामुळे लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकालाच त्याच्या सदिच्छा आणि आशिर्वादरूप अक्षता वधू – वरांच्या प्रत्यक्ष डोक्यावर वाहाता येतील .

असे करत अगदी सगळ्यांना सुरुवातीच्या ओळीपासून शेवटी पर्यंत आणि पुन्हा परत शेवटच्या ओळीपासून पुढच्या ओळी पर्यंत येणारे आप्त स्वकीय  जिथे बसले आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांचा वधू-वरांनीच सन्मान केला . आणि भरभरून आशिर्वाद प्राप्त केले .

या सगळ्या कौतुक कृतीला सुमारे २०० जणांच्या जवळ जाण्यासाठी – त्यांना नमस्कार करून शांतपणे पूर्ण करण्यासाठी केवळ पंधरा  मिनिटे पुरली .

यामुळे – वृद्धांना त्यांच्या बसल्या जागी जाऊन नमस्कार करून त्यांचा मान राखता आला आणि नंतर वृद्धांना – रांगेत तिष्ठत उभे राहून वधू वरांना स्टेजवर भेटावेच लागले नाही .

प्रत्येकाला वधू वर जवळून बघताही आले .

आलेल्या प्रत्येकाच्या भावनांना प्रत्यक्ष कृतीची पूर्णता आली – तसे समाधान प्रत्येकाने बोलूनही दाखवले .

गुरुजींनीही विधीतील प्रत्येक कृती – त्याचा अर्थ त्या त्या वेळी थोडक्यात सांगितला .

पाणिग्रहण – कन्यादान – सप्तपदी या मागच्या भव्य आणि उदात्त कल्पना लक्षात आल्या .

त्यानंतर पंगतीमध्ये सर्वांनी सहभोजन घेतले . पंगतीला वाढणाऱ्यांना सुद्धा ही कल्पना आवडली आणि त्यांनीही अगत्याने आणि आग्रहाने वाढले .

आपण सर्व हे विसरून गेलो आहोत की विवाह हा एक उत्साह – चैतन्य – आणणारा समाजाला स्वस्थता देणारा मंगल असा संस्कार आहे . हे विसरण्याचा अजून एक दुष्परीणाम आपणच आणला आहे – तो म्हणजे प्रत्येक विधीमधे फोटोग्राफर आणि व्हिडिओवाले – त्यांना जसे हवे तसे फोटो काढण्यासाठी विधिंच्या मधे घुसून तेच जणू पुरातन कालापासून लग्न लावत आले आहेत अशा थाटात वधू वरांना वेगवेगळ्या पोज घ्यायला लावतात आणि खरे म्हणजे विधी आणि संस्कार यांचा विचका करतात .

अशावेळी यजमान काहीच बोलत नाही त्यामुळे गुरुजी सुद्धा काही करू शकत नाहीत . 

खरे म्हणजे यजमानाने पुढाकार घेऊन या गोष्टी न कळत – शिताफीने टाळता येतात .

आम्ही फोटोग्राफी केलीच पण आधीच ही संकल्पना फोटोग्राफरला समजावून सांगितली आणि त्यांना सांगितले की तुमच्यासाठी म्हणून कोणतीही पोज संपूर्ण विधीत होणार नाही . तुम्ही सर्व बाजूनी फोटो काढा पण विधी तुमच्या साठी थांबणार नाही .

सुंपूर्ण समारंभच – 

“candid photography ” करा .

सगळे विधी झाल्यावर ज्याला जसे हवे तसे एकत्र – ग्रुप फोटो काढून घ्या .

आश्चर्य म्हणजे ही कल्पना फोटोग्राफरला सुद्धा आवडली आणि त्यांनी ही खूप सुंदर आणि भरपूर फोटो काढले .

इतकेच नव्हे तर फोटोग्राफर ने दोनच दिवसांत सर्व फोटोंची एक लिंक तयार करून दिली . आम्ही ती लिंक प्रत्येक कुटुंबाला व्हॉटस्अप वर पाठवली आणि ज्याला जे फोटो हवे आहेत ते डाऊनलोड करून घेतले .

प्रत्येकाला आपले स्वतःचेही – छान फोटो मिळाले .

संपूर्ण समारंभात शांत संयमित आवाजात सनईचे सूर सरु ठेवले होते त्यामुळे वातावरण प्रसन्न तर झालेच पण आवाजही मर्यादित ठेवण्यामुळे प्रत्येकाला एकमेकाशी नीट बोलता आले . 

खूप दिवसांनी भेटणाऱ्या नातेवाईकांना गप्पा मारता आल्या . 

हल्ली संगीताचा आवाज अतिशय मोठा ठेवतात त्याने काय साध्य होते हेच समजत नाही . 

एवढेच नव्हे तर एकमेकांशी धड बोलताही येत नाही .

कानांवर ध्वनीचे अत्याचार सहन करावे लागतात ते वेगळेच . बरे कोणी सांगतही नाही की आवाज मर्यादित ठेवा म्हणून .

आम्ही आधीच ठरवून हे सर्व टाळले . 

त्यामुळे ढणढणाटा ऐवजी उलट प्रसन्नता – उत्साह – गप्पा – हास्यकल्लोळ यांनी समारंभाला जास्त शोभा आली .

तसे लोकांनी बोलूनही दाखवले .

अशा काही गोष्टी सहज साध्य आहेत – करता येतात – अवघड नाहीत .

उगीच प्रवाह पतित होऊन भलत्याच गोष्टी करणे आपण टाळू शकतो .

यात कुठेही कर्मठपणा _ कठोरपणा आणण्याची किंवा आपल्या परंपरांचा वृथा अभिनिवेश दाखवण्याची बिल्कुल आवश्यकता नाही .

योग्य वेळी प्रत्येकाला आपलेसे करून – समजावून सांगितले की छान करता येते – उलट प्रत्येकाचा सहभागही वाढतो .

लग्नाला जाणाऱ्या प्रत्येकाला हे मनातून हवे आहे हे ही प्रकर्षाने लक्षात आले .

मग आपणच आपला अप्रतीम वारसा सांभाळायचा – वाढवायचा आणि भरभरून पुढच्या पिढीला द्यायचा हे आपण निश्चित पणे करु शकतो .

हे सर्व मी लिहीले आहे – ते आधी केले मग सांगितले – या वचनाला जागून आहे.

आपला : नरेंद्र आपटे (ठाणे)

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ समाधान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे….

डोळ्यावर चष्मा आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे….

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत,

कानाला सुरांची जाण आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे,

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

साधे चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत,

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जवळचे नातेवाईक, मित्र आहेत,

मोबाईल वर संपर्कात आहेत,

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत,

दोन वेळा, दोन घास आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे,

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

याहून आपल्याला काय हवे ?

जगातील चांगले घेण्याचा,

आनंदी, आशावादी राहण्याचा विवेक आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे,

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरेसे आहे !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Be a CEO of your own life. ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ Be a CEO of your own life. लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मी आणि ताई आम्ही दोघी बहिणी. मी पुण्यात तर ताई नाशिकला स्थाईक. आज आम्ही दोघी सिनियर सिटीझन आहोत. मी पासष्ट तर ताई सत्तरीला पोचली.

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ कसा गेला? कळलंच नाही. घर परिवार आमच्या नोकऱ्या, मुलांची शिक्षणं, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्नं, नातवंडं, मुलांचे अमेरिकेत स्थायिक होणे, आमच्या अमेरिकेच्या फेऱ्या. म्हणजे आमच्या पारिवारिक सिनेमाच्या सोळा रिळापैकी चौदा रीळं तर जवळपास संपली, म्हटलं तरी चालेल.

आता आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरता आली आहे. वय बोलू लागलं आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड आम्ही घ्यावं, याबद्दल बऱ्याच चर्चेनंतर आता मुलांनी म्हणणं सोडून दिले आहे.

आम्ही अमेरिकेला येऊ, पण राहू आम्ही भारतातच. हे नक्की ठरलंय.

 ताई म्हणजे सौ. अनिता अजय देशपांडे यांचा नाशिकला मोठा बंगला आहे. रिटायरमेंट नंतर मागची पंधरा वर्षं त्यांनी बंगल्याचा पूर्ण उपभोग/ आनंद घेतला. त्यांच्या शेजारीच ताईचे मोठे दीर श्री अनिल देशपांडे यांचा बंगला. दोघी जावांचं छान पटतं. दोघांना एकमेकांच्या आधार आहे. बरोबर मोकळेपणाही आहेच. आता मात्र वयाप्रमाणे बंगल्याचे मेंटेनन्स करणं कठीण होतं आहे. त्यानंतर सेफ्टी, security चा प्रश्नही आहेच.

आतापर्यंतच्या सर्व पारिवारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण झाल्या.

आता पुढे काय ? पुढे काय ?

आता स्वतः ची जबाबदारी स्वतःच घ्यायची वेळ आली आहे.

तरुणपणी बघितलेली स्वप्नं – ‘उच्चशिक्षित मुलांनी उंच भरारी घ्यावी’. ती पूर्ण झाली. आता त्या स्वप्नांचे साईड इफेक्ट दिसतायेत. मुलं जवळ नाहीत. तसं बघितलं तर पुण्यासारख्या शहरात प्रत्येक चौथ्या घरी हाच सीन आहे.

स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आपणच घेतलाय/ भोगलाय. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्वप्नांचे साइड इफेक्ट पण gracefully handle करावेच लागतील.

वयाच्या या नाजूक वळणावर, ‘पुढे काय ?’

या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. आता प्रत्येक दिवस वेगळा निघतो, शरीराचा प्रत्येक अवयव वेगळा रंग दाखवतोय. वेळेवर सावध होणे गरजेचे आहे.

आज ताईचा फोन आला. म्हणाली,

“अग! पुण्यातील जरा चांगल्या old Age Homes बद्दल विचारपूस करून माहिती पाठव. “

मी म्हटलं, “अग ताई !! हे काय आता, नवीन खूळ तुझ्या डोक्यात आलंय ? चांगला बंगला सोडून Old Age Home वगैरे काय ?”

ताई म्हणाली, “अग! का नाही ? आपले final destination old Age Home ठरविण्यात काय हरकत आहे ?

Safety, Security, medical help, डॉक्टरची सुविधा Dining Mess facility, same age group चे आपल्या सारखेच आपल्याला भेटणार, मग काय हरकत आहे ?

अग !!जसं जसं वय वाढत जाणार तसतसे अनेक प्रश्न समोर येऊ शकतात. आयुष्याचा हाही फेज आरामात पार पडावा, ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते. पण तसे होईलच याची काही गॅरंटी आहे का ?

खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा, वास्तविकता लक्षात ठेवून आपली सोय करून ठेवावी. काही बदल, Planned Change ठरवून करायचे असतात.

हिवाळ्यात हीटर, उन्हाळ्यात कुलर / AC ची सोय करतो ना, तसंच काहीसं हे पण.

ही म्हातारपणाची सोय आहे, ” ताई म्हणाली,

Be a CEO of your own life. •••

Be your own BOSS. •••

माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतची जबाबदारी माझीच आहे ना!

अग !मुलांना आपली काळजी असतेच. पण ते आता आपली मदत कशी करू शकतील ? आपण आपली व्यवस्थित सोय केली तर त्यांना पण काळजी राहणार नाही.

बरं ! जेथे आपलीच मुले आपल्या जवळ नाहीत, तेंव्हा दुसऱ्यांवर भार टाकणंही बरोबर नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणाजवळच एवढा वेळ नाही/नसतो ग. अपेक्षा करणंच चूक आहे.

तेव्हा एखाद्या छान म्हणजे व्यवस्थित सर्व सोई जेथे उपलब्ध असतील, तेथे आपण रहायला जायचं, हे आम्ही ठरवलंय.

भविष्याची सोय करून, आपल्या मनाला जर आपण शाश्वत केलं. तर मन खंबीर राहतं. वर्तमान ही मजेत जगता येतं. मनाला खचू द्यायचं नाही.

‘Life is very unpredictable, ‘ हे लक्षात ठेवून हा निर्णय घेतलाय.

आयुष्यातील कोडी आपल्यालाच सोडवायची असतात.

लाइफचं हे प्रोजेक्ट आपल्यालाच successfully complete करायचं आहे. “

ताई एक वाक्य नेहमी म्हणते,

“कोणाच्या आयुष्यात Option म्हणून नाही जगायचं. नेहमी Perfect And Special जगायचं. “

प्रत्येक वळणावर जरा थांबून आपल्या आयुष्याचे Alignment करावं.

ताई म्हणाली,

“अग !!!

आता वृद्धाश्रम किंवा Old Age Home बद्दल विचार बदलले आहेत. ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाही, ते अशा जागी राहतात, हे असं कोणी आता समजत नाही. “

ताईचा हा निर्णय विचारात घेण्यासारखा आहे.

म्हणतात ना,

प्रार्थना ऐसे करें जैसे सब कुछ भगवान पर निर्भर करता है ।

परंतु प्रयास ऐसे करें जैसे सब कुछ आपपर निर्भर करता है।

लेखिका :सुश्री संध्या बेडेकर.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares