मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वाळवी‘ – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

‘वाळवीलेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एकदा एका ग्रंथालयाला लागली वाळवी..

ती ” ती ” होती म्हणून तिला खायची खूप सवय, दिसेल ते खाsss त सुटली.

कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता संग्रह, स्फुट लेखन, इथं पासून ते महाकाव्या पर्यंत सगळं तिने खाल्लं. व. पु. , पु. ल. , ना. धो. , चिं. त्र्यं. , अहो तिने सगळं खाल्लं, मग मात्र तिचं पोट लागलं दुखायला.

मग ती मेडिकल ची पुस्तकं खायला लागली.

तिला त्याच्यात पोटदुखीवरचे इलाज सापडायला लागले.

” ए, तू कुठं आहेस आत्ता ? ” वाळवीने विचारलं, वाळवा म्हणाला, “वस्त्रहरण”

” बरोबर, मला वाटलंच होत कि, तू आधी वस्त्रहरण च खाणार ” वाळवी उत्तरली, ” पुरुष सगळे सारखेच, महाभारतात पुरुषांच्या दृष्टीने महत्वाचं फक्त वस्त्रहरण, ” 

” अग बाई, पण वस्त्रहरणाच्या वेळी कृष्णानेच साड्या पुरवल्या ना ? बरं तू काय खातेस ? ” 

” मी आत्ता कर्णाची कवच कुंडलं ! ” ” वा !म्हणजे तू आता अजरामर व्हायचा विचार करतेस कि काय ? ” ” अरे बाबा, कर्ण कवच कुंडलामुळे अजरामर होणार असता, तर कवच कुंडलं व्यासांनी आपल्या जवळच नसती का ठेवली ? “

आत्ता मात्र वाळव्याच्या एक गोष्ट लक्षात आली कि ह्या वाळवीने, गुन्हेगारी कथा आधीच हजम केलेल्या आहेत.

महाभारत खाता खाता दोघांनाही थोडी झोप लागली, आणि अचानक एका पुस्तकातून आवाज यायला लागला. वाळवा म्हणाला, ” ए काही घाबरायचं कारण नाहीये ते पुस्तक  धारपांचं आहे, थोडी भुतं असतील अजून जिवंत तीच बडबडत असतील ! बराच वेळ महाभारत खाऊन सुस्तावलेले दोघं विचार करत होते, की महाभारतात लिहिलंय तेच आत्ता सगळीकडं घडतंय – का जे घडणार आहे ते महाभारतात लिहिलंय ? स्त्रियांची विटंबना आजही होतेच आहे की !

” ए, तू विनोदी खाल्लंयस कधी ? “वाळव्यानं विचारलं, ” अरे बाबा हल्ली विनोदी कुठं मिळतंय खायला, त्यालाच जास्त डिमांड आहे. त्रासलेले सगळे लोक विनोदी वाचूनच आपलं आयुष्य सुखी बनवताहेत. सामाजिक साहित्य हल्ली कुणी वाचतच नाही, त्यामुळे ते खूप मिळतं  खायला, पण चव नाहीरे त्याला. ” ते तुझं खरंय ग, पण मला सध्या डॉक्टरांनी विनोदी काही खाऊ नका म्हणून सांगितलंय. ” रोमॅंटिक, विनोदी, गुन्हेगारी, मला सगळं वर्ज्य आहे.

” ए, बाय द वे, तुला खरंच मनापासून कुणाला खायला आवडतं ? ” वाळवा, वाळविला विचारत होता. पण वाळवीचं लक्षच नव्हतं ती आपली मस्त, व. पु. मध्ये दंग होती. बहुतेक वपुर्झा असावं. ” काय रे सारखं सारखं डिस्टर्ब करतोस, छान चव लागली होती मला आत्ता, ” वाळवी ओरडली.

व. पु. वाचणाऱ्यांचं पण असंच होत असेल नाही ? कुणी डिस्टर्ब केलं कि लगेच राग येत असेल ? तो पर्यंत वाळवा भाऊंच्या पुस्तकात घुसला होता.

तो लगेचच वॅक वॅक करत उलट्या करतच बाहेर आला. ” अरे अरे कुठल्याही पुस्तकात घुसताना जरा , प्रस्तावना तरी वाचत जा !”  वाळवी ओरडली. तुला हे असलं पचणाऱ नाही बाबा ! वाळवी ओरडली.

एक दिवस वाळवा सकाळपासूनच हातात, झेंडा घेऊन ओरडत फिरत होता, तेंव्हा वाळवीच्या लक्षात आलं, ती मनातल्या मनात पुटपुटली. बहुतेक विद्रोही साहित्य संमेलनातील पुस्तकांचा स्टॉक आलाय…

इकडे वाळवीला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या आणि तिने ते वाळव्याला सांगितलं, तसा तो हसत हसत म्हणाला ”  म्हणून मी तुला सांगत होतो, ती पक्वान्न रेसिपिची पुस्तकं खाऊ नको, ऐकलं नाहीस माझं, आता जा तिकडे शेवटच्या कपाटात आणि ” कुठलाही आजार दोन मिनिटात पळवा ” ह्या पुस्तकाची दोन पानं खाऊन ये, बरं वाटेल तुला !”

पण वाळवी लाजत लाजत त्याला म्हणाली, अहो वाळवेश्वरराव तुम्ही आता बाप होणार आहात !

आणि वाळवा उडाला, तो मनात विचार करायला लागला ” मी तर नियमितपणे संतती नियमनाच्या पुस्तकाची रोज दोन पानं खातो तरी असं कसं काय झालं ? “

पण नंतर त्याच्याच लक्षात आलं आपण परवा, ” डे ” काकूंच्या गार्डनची थोडी चव घेतली होती आणि नंतर वाळवी कडे गेलो होतो.

नंतर  वाळविला यथावकाश दिवस गेले, एक दिवशी ती हटूनच बसली ” मला वैभव आणि संदीपच्या कविता पाहिजेत ” वाळवा म्हणाला ” अगं बाई, ते दोघं सध्या आघाडीचे कवी आहेत, त्यांच्या कवितांच्या पुस्तकांच्या इतक्या आवृत्त्या खपाखप खपताहेत त्या कशा तुला मिळतील, त्या अजून लोकांनाच मिळत नाहीत, अजून आपल्या लायब्ररीमधे ती पुस्तकं आलेलीच नाहीत “

तुला नवकवींची पुस्तकं देऊ का ? ती बरी असतात, चविष्ट नसतात पण हल्ली आपल्याला फार चमचमीत परवडत पण नाही.

” त्यापेक्षा तु एक काम कर, सरळ राजकारण्यांची आत्मचरित्र वाचत जा, म्हणजे आपली पोरं सगळं काही शिकतील, कारण हल्ली एकमेकाच्या तोंडावर, न बोलता थेट आत्मचरित्रात कथन करण्याची चढाओढ सुरू आहे.

” शि ssss काय हो, तसली पुस्तकं खाऊन पोरांना कशाला बिघडवायचं ? त्यापेक्षा ” वृत्तपत्र ” बरी, आता या यू ट्यूबच्या जमान्यात, पुस्तकांची आवक जरा कमीच झालीय, जो तो येतो आणि ” नमस्कार ! मी….. बोलतोय, तुम्ही बघत आहात….. असं म्हणून सुरू करतो. आपल्याला पुढे अन्नाचा तुटवडा भासणार आहे बरं का ! आपल्या पोरांना सुद्धा फार फालतु आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य खावं लागणार आहे.

पुढे कालांतराने मेडिकलच्या पुस्तकात वाळवीची डिलिव्हरी झाली आणि त्यांची पुढची पिढी अजस्त्र संख्येने बाहेर पडली, पण त्यांना हे साहित्य फारच बेचव वाटायला लागलं, आणि ती पिढी ह्या आपल्या आई बापाना जुन्याच साहित्याच्या वृद्धाश्रमात सोडून, संगणकाच्या मागे लागली. तिथे त्यांना गुगल बाबाच्या आश्रमात ” बग्ज ” नावाने प्रसिद्धी मिळाली, ते मोठे मोठे ” हॅकर ” म्हणून प्रसिद्ध झाले. पूर्वीची वाळवी आता व्हायरस झाली आणि लाखोच्या संख्येने त्यांनी  ॲटॅक सुरू केले.

आज जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने पुस्तकांच्या विषयावर लिहावं असं वाटलं आणि डोक्यातल्या वाळवीने माझं डोकं खात खात, बोटांच्या माध्यमाने ते मोबाईलवर उतरवलं, तेच तुमच्या समोर ठेऊन  जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देतो – – खास जागतिक पुस्तक दिनानिमित्त !

धन्यवाद !

लेखक : श्री सतीश वैद्य

(खास जागतिक पुस्तक दिना निमित्त !) 

 मो 9373109646

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लक्ष ’खेचक‘ मथळे — सौजन्य : ज्येष्ठ पत्रकार श्री अनिकेत कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ लक्ष ’खेचक‘ मथळे — सौजन्य : ज्येष्ठ पत्रकार श्री अनिकेत कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

काही बातम्यांचे मथळेच लक्षखेचक असतात…

उदाहरणार्थ…..

खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते…_

‘तिच्या भाळी , जन्म आभाळी.’

***

वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्कच असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं…

‘मापात पाप’ करणार्‍यांना चाप!

***

एके वर्षी मुंबई पावसात तुंबली.

बातमीचं हेडिंग होतं…

‘तुंबई’!

***

एका बातमीचं हेडिंग भारी वास्तव वाटलं…

“अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!”

***

आता त्याला बरीच वर्षें झाली. छगन भुजबळ तेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने महापौर असताना त्यांना सनसनाटी गोष्टी करायला फार आवडत असे. गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांनी हेलिकाॅप्टरमधून मिरवणूकीतून वाजतगाजत जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. दुसऱ्या दिवशी लोकसत्ताचे हेडिंग होते:

मानवाची आकाशातून देवांवर पुष्पवृष्टी

***

बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं…

‘जीव वाचवण्यासाठी पळताना

खड्ड्यात पडून मृत्यू!’

***

सौरभ गांगुली (डावखुरा) आणि युवराज सिंग यांनी पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी भागीदारी केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली…

लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग…

‘डाव्यांचा तडाखा!’

***

मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा. त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती…

‘नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!’

***

राहुल द्रविडच्या निवृत्ती वेळी

एका इंग्रजी पेपरचा अप्रतिम मथळा होता…

‘Indian team is now bread n butter

but without Jammy’

***

भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा…

‘चारले खडे, आता वानखेडे’

***

मटा ऑनलाइन मथळा…

‘पतंजली कोलगेटचे दात पाडणार!’

***

हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…

गोव्यात ‘पाळी’ नावाचं गाव आहे. विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुसऱ्या दिवशी हेडिंग दिले…

“डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार!”

(बोंबला!)

***

वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे माझा मित्र पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे…

‘खैरनार देवनारचे पवनार करणार !’

***

या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती…

‘मुंबापुरीवर जलात्कार!!!’

***

२००४ साली अटल सरकारचा पराभव करुन काँग्रेस बहुमताने जिंकली. त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं…

‘King Cong… Queen Sonia’ !

(अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.)

***

बुटासिंग २००५ मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते.

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते (बहुधा “सामना”चे)… –

सर्वोच्च न्यायालयाने

केंद्र सरकारला

‘बुटा’ ने हाणले!’

***

मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत की कुठल्याशा वर्तमानपत्राने बातमी दिली होती; त्याचे हेडिंग होते…

‘तांबेचं पितळ उघडं !’

***

मे, २०१४ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते…

‘हाताची घडी, कमळावर बोट!’

***

नवाकाळचे एक हेडिंग…

तेव्हा जयसूर्या जबरदस्त फाॕर्माॕत होता आणि आपण मॕच जिंकलो होतो.

‘श्रीकांतने जयसूर्याला गिळले.

भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली ..

“श्रीलंकेत हनुमान जयंती !”

सौजन्य : ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सैन्यष्टभुजा – ‘आर्मी बिहाइंड दी आर्मी‘ – लेखिका : सुश्री सायली साठे वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

सैन्यष्टभुजा – ‘आर्मी बिहाइंड दी आर्मी– लेखिका : सुश्री सायली साठे वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

सैनिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापासून ते अनेक आव्हाने पेलत तो प्रभावीपणे निभावण्यापर्यंत सैनिकांच्या पत्नी म्हणजे एका अर्थी अष्टभुजाच असतात. सिव्हिल मधल्या बिनधास्तपणे जगत असलेल्या आयुष्यातून एक स्त्री जेव्हा सैन्याधिकाऱ्याची पत्नी बनते तेव्हा तिचे जग संपूर्णपणे बदलते. पीस पोस्टिंग असेल तरी ठीक पण फिल्ड पोस्टिंग असेल तर प्रथम बरोबर राहता येईल की नाही इथपासून तयारी असते आणि राहता आले तरी राहण्याचे ठिकाण कसे असेल, वातावरण कसे असेल इथपासून सगळ्याची मानसिक तयारी करावी लागते. 

नवऱ्याच्या सैन्यातल्या नोकरीच्या स्वरूपामुळे बहुतांश आघाड्यांवर तिलाच लढावे लागते आणि ही एक एक आघाडी  तिची एक एक भुजा बनत जाते. त्यांची ओळख या करून द्यावी असे मला मनापासून वाटते. 

पहिली भुजा –  स्वावलंबी भुजा – आपल्या पतीबरोबर कधीही न गेलेल्या, राहिलेल्या ठिकाणी आपला संसार मांडणे. सैन्याचे बहुतांश तळ जुने आहेत त्यामुळे आजकाल घरे कमी पडू लागली आहेत. कुठेही गेले तरी घर मिळायला वेळ लागतो आणि घर मिळेपर्यंत गेस्ट रूम किंवा 2 रूम सेट मधे राहावे लागते. तेव्हा घरचे जेवण मिळत नाही. मेसमधून जेवण घ्यावे लागते. मुलांना घेऊन अशा गेस्टरूम्स मधे 4-5 महिने राहणे फार अवघड असते. कित्तेकदा पती 2-3 महिने कॅम्प साठी गेलेला असतो तेव्हा तिलाच मुलांना संभाळावे लागते. 

दुसरी भुजा – ये तेरा घर ये मेरा घर -एकदा घर मिळाले की बेसिक फर्निचर असले तरी घर पद्धतशीरपणे लावणे आणि आहेत त्या सोयींमधे, आहे त्या सामानात कल्पकतेने घर सजवणे ही एक जोखीमच असते. कारण घरात कधी काही दुरुस्त्या असतात तर कधी काही बदल करून घ्यावे लागतात. आणि दोन तीन वर्षांनी बदली झाली की परत चंबू गबाळे आवरून पुढच्या ठिकाणी किंवा स्वतःच्या घरी जाण्याची तयारी करणे. विविध ठिकाणाहून जमवलेल्या आपल्या वस्तू व्यवस्थित राहाव्या यासाठी एक एक वस्तू संदुकांमध्ये व्यवस्थित पॅक करणे यामधे सगळ्यात जास्त शक्ती आणि वेळ खर्च होतो पण तेही ती निगुतीने करते. 

तिसरी भुजा – मस्ती की पाठशाला – बदली होणे हे सैनिकांसाठी त्यांच्या नोकरीचा एक भाग असल्यामुळे ते नवीन जागेत लवकर रुळतात आणि त्यांना त्यांच्या कामावर रूजू होणे क्रमप्राप्त असल्यामुळे पत्नीलाच बाकी सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. मुलांच्या शाळा, क्लासेस आणि रुटीन सेटअप या सगळ्याची परत शोधाशोध आणि जोडणी अशा अथपासून इतिपर्यंत सगळ्या गोष्टी नव्याने आवडून घ्यायच्या असतात. मग त्यांना नवीन ठिकाण आवडो ना आवडो. यासाठी मुलांची मानसिक तयारी करण्याआधी ती आधी स्वतःच्या मनाची तयारी करते आणि मुलांना देखील हा बदल सकारात्मकतेने अंगिकारायला शिकवते. 

उच्चशिक्षित असूनही बऱ्याचदा मनासारखी नोकरी तिला करता येत नाही. त्यावेळी बऱ्याचदा बीएड वगैरे पदवीचे नव्याने शिक्षण घेऊन ती शाळेच्या नोकरीत आपले मन रमवण्याचा प्रयत्न करते. काही जणी आपल्या आवडी जपण्याचा प्रयत्न करतात तर काही मात्र दुरावा सहन करून आपल्या नोकरीच्या ठिकाणीच राहण्याचा पर्याय निवडतात. पण या सगळ्यात आनंदी राहणे मात्र ती विसरत नाहीत 

चौथी भुजा – अनोखे रिश्ते – नवीन बदलीच्या ठिकाणी नवीन माणसांशी जुळवून घेणे ही अजून एक मोठी आघाडी या पत्नी सहजपणे हाताळताना दिसतात. आपण आपल्या कॉलनीत राहत असतो तेव्हा ठराविक लोकच आजूबाजूला असतात आणि सगळ्यांशी आपले जमलेच पाहिजे असा काही नियम नसतो. 

पण आर्मीमधे औपचारीक पद्धतीने झालेली ओळख आणि नाते तुम्हाला खूप काळजीपूर्वक निभवावे लागते आणि तेव्हा तुमची खरी कसोटी लागते. अर्थात बऱ्याचदा त्यातूनच काही नाती कायमसाठी घट्ट होतात आणि ती जपण्याचे काम ती उत्तमपणे करते. 

पाचवी भुजा – मी अर्धांगिनी –  सैन्यातल्या कार्यक्रमांच्या पद्धती, काही ब्रिटिश कालीन चालून आलेल्या परंपरा आत्मसात करणे ही फार अवघड गोष्ट असते. अगदी कुठल्या कार्यक्रमाला कुठला पेहराव करायचा, ऑफिसर्स मेस मधे अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना अभिवादन कसे करायचे, टेबल मॅनर्स शिकून घ्यायचे ते जेवण संपल्यावर प्लेट कशी क्लोज करायची इथपर्यंत सर्व काही अगदी योग्य पद्धतीने शिकावे लागते. पण कुठल्याही प्रकारचा बाऊ न करता हे नवे आयुष्य त्या सहजपणे अंगिकारतात.

सहावी भुजा – फॅमिली ट्री – हायरारकी आणि औपचारिकता तंतोतंत पाळणे हे सैन्यात पूर्वीपासून चालत आले आहे आणि ते पत्नीलाही लागू होते. तिच्या नवऱ्याला वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीला उदा (मिसेस सिंघ) आणि कनिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीला नावाने संबोधायची पद्धत सुरुवातीला अतिशय गंमतशीर वाटते पण नंतर सवय होऊन जाते. या औपचारिकेत जर तुम्ही चुकलात तर तुमच्या नवऱ्याचा क्लास लागला म्हणून समजा 

मला आठवतंय आमचे लग्न झाले तेव्हा माझ्या नवऱ्याने शाळेत फॅमिली ट्री कशी शिकवतात तशी आमच्या युनिटची फॅमिली ट्री मला काढून ती लक्षात ठेवायला सांगितली होती. 

सातवी भुजा – फाफा मेरी जान – FAFA म्हणजे फॅमिली फिल्ड अकोमोडेशन. नवऱ्याचे जेव्हा फिल्ड पोस्टिंग येते आणि कुटुंब बरोबर राहणे शक्य नसते. उदा- कधी कधी युनिटची जागा अगदी डोंगरदऱ्यात देखील वसलेली असते जिथे शाळाच काय पण काहीच सोयी नसतात आणि बऱ्याचदा तिथे कुटुंबासमवेत राहणे कदाचित धोक्याचे असते त्यामुळे राहण्याची परवानगी नसते. अशा वेळी काही बायका आपापल्या घरी राहणे तर काही जणी नवऱ्याच्या बदलीच्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या फाफा कॉलनीत राहणे पसंत करतात. 

फाफा मधे राहणे तसे आव्हानात्मक असते कारण घरापासून दूर असतो, नवरा जवळ नसतो शिवाय एकूणएक गोष्ट स्वतः सांभाळावी लागते. अगदी पेट्रोल भरण्यापासून ते एकट्याने प्रवास करण्यापर्यंत सगळे आपले आपणच करायचे. पण त्यात सुद्धा एक वेगळी मजा असते. खूप काही शिकायला मिळते, नवीन मैत्रिणी बनतात, वेगवेगळ्या प्रांताचे रीति रिवाज जवळून अनुभवायला मिळतात. कुटुंबापासून दूर असूनही त्यांच्याशी संपर्कात राहणे, मुलांचे संगोपन करता करता स्वतःचा फिटनेस राखणे हे सगळे या सैन्याधिकाऱ्यांच्या पत्नीच करू जाणोत. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे माझी एक ख्रिस्त मैत्रीण आर्मीच्या प्रभावामुळे कारवाचौथ करू लागली आहे 

आठवी भुजा – कणखरपणा हाच आमचा बाणा 

कुठल्याही सैनिक पत्नीसाठी सण तेव्हाच खऱ्या अर्थाने साजरा होतो जेव्हा तिचा पती तिच्या सोबत असतो. त्यामुळे तिच्यासाठी -जेव्हा पती येई घरा, तोच दिवाळी दसरा हेच सत्य असते. 

सैनिकाला कधी कुठे पाठवतील, जायला लागेल काही सांगता येत नाही. कित्तेक वेळा तर आधीपासून घेतलेली सुट्टी आधल्या दिवशी सुद्धा रद्द होते. त्यावेळी त्याच्या न येण्याने उदास झालेल्या भावना चेहऱ्यावर मात्र ती कधी दाखवत नाही. लग्नानंतर कमावलेला हा कणखरपणाच तिला बळ देत असतो. 

तुम्ही कुठल्याही आर्मी ऑफिसरच्या पत्नीला भेटलात तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आहे त्या परिस्थितीत ती स्वतःला कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते.  कारण कुठले दुःख बाळगणे हे तिच्या स्वभावातून तिने वजा करायला ती एव्हाना शिकलेली असते. बारा गावचे पाणी पिऊन आणि अनेकविध अनुभव घेऊन तिने एक जाणलेले  असते – आजचा दिवस काय तो खरा.. तो आनंदाने घालवायचा. कल किसने देखा है?

तर अशी ह्या अष्टभुजेची एक एक भुजा तिच्या लग्नाच्या प्रत्येक वर्षी भक्कम होत जाते आणि त्यामुळेच त्यांचे वजन ती लीलया पेलू शकते. आणि अशी कणखर आर्मी घरी असल्यामुळेच सैनिक आपले काम निश्चिन्तपणे करू शकतात. 

अशा माझ्या सर्व अष्टभुजा असलेल्या मैत्रिणींना आजचा लेख मी समर्पित करते ☺️ 

लेखिका : सायली साठे -वर्तक

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक बोधकथा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक बोधकथा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात? जाणून घ्या कारणं…

आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो, की कितीही चांगले वागा, पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर दिले एका साधूमहाराजांनी!

एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. 

त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, `पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ये आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!’

प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला, त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपए देतो, पण ही अंगठी मलाच विक! तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही, हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमुल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो.  जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत, योग्यता समजतात.   तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल.

एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा कि…रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते…तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते… माणूस एक अजब रसायन आहे, आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत…आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत…

नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा… कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभ असतं…! 

“माझं चुकलं…”  हे शब्द समोरच्याचा काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं”…हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिंगत होवो हीच आज वारुणी योग दिनी सदिच्छा… 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ढिली है डोरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

📖 वाचताना वेचलेले 📖

ढिली है डोरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

कुठलीही गोष्ट फार काळ ताणून धरली की ती तुटतेच! मग ती पतंग असो,श्वास असो,नात्यातील वादविवाद असो, हट्ट असो काही ताणले की गोष्ट तुटतेच! म्हणूनच “योग्य वेळी योग्य गोष्टींना ढिल देता आलाच पाहिजे.”असे बाराव्या वर्षांपासून शैव पंथीतील काश्मीरमधील संत लल्लादेवी सारख्या म्हणायच्या!

कधीकधी माणसातील अहंकारच काही गोष्टींना ढिल देऊ देत नाही.पण ताणल्यामुळे जर काही तुटले तर दोष मात्र माणूस लगेच देवाला देतो.माणसं कित्येक वेळा वाईट गोष्टींचे खापर देवावर फोडतात.तेव्हा शंकराच्या असीम भक्त लल्लादेवी म्हणतात तुम्ही कितीही देवाचे करा देव तुम्हाला मृत्यू दिल्याशिवाय रहाणार नाही.मृत्यू अटळ आहे. तुम्हाला मोक्ष हवा असेल तर तुम्ही श्रध्दा ठेवा देवावर!

हेच तत्वज्ञान संत लल्लादेवी ढिल हा एक शब्द घेऊन आपल्या  अभंगातून सांगतात. ताणून धरणं हा माणसाचा स्वभाव आहे.आणि आपण ताणून धरल्यावर ढिली डोरी छोडना हा देवाचा स्वभाव आहे.कारण वो शंकर  भोळा आहे.तो कधीच  रागवत नाही. 

हे रब्बा

ढिली है डोरी 

कैसे संभालू गठडी 

मैं ये मिठाई

एक ढिल दिल्यावर सगळ्या गोष्टी  सुरळीत होऊ शकतात.हा ढिल इतर माणसं आचरणात का आणत नाही ह्याचे लल्लादेवींना दुःख होते.

लोंग ढिले है 

ढिल नहीं जानते 

असं म्हणत आपलं दुःख कधीही दुसऱ्याला न सांगता, समाधानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या संत लल्लादेवी ह्या आजच्या काळाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील! संत लल्लनदेवी प्रज्ञावंत होत्या.परंतु शक्ती पेक्षा सहनशक्ती श्रेष्ठ हे तत्व उराशी बाळगून मनाच्या आणि शरिराच्या जखमा कधीच त्यांनी इतरांना दाखवल्या नाहीत.उलट ८० टक्के जखमा ह्या केवळ नामस्मरणाने भरतात हे त्यांनी आपल्या दिवसरात्र नामस्मरणाने दाखवून दिले.तुम्ही जितकं देवा जवळ जाता तितक दुःख कमी होत.कोणत्याही अंधाराला आपण सामोरी जाऊ शकतो.एक अलौकिक उजेड लल्लनदेवींना मिळाला होता.म्हणूच लहान वयात लग्न होऊन काश्मीरला सासरी आल्यावर सासरकरांच्या प्रचंड त्रासाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

रस्सी कच्चे धागे की

खिच रही है नाव

जाने कब सुन मेरी पुकार

करे दे भवसागर पार

आपल्या श्वासांना रस्सीची उपमा देत संपूर्ण काश्मीरी लोकांवर, काश्मिरी पंडितांवर भावनिक शब्दांचे गारूड घातले लल्लनदेवींनी!

जर गुराखी नसेल तर गुरं इकडे तिकडे जाणारच.म्हणून आपल्या इंद्रियांचे आपण गुराखी बनलं पाहिजे म्हणजे वासना इकडे तिकडे जाणार नाहीत.मोह उरणार नाही.असे म्हणत  हजारांहून अधिक अभंग त्यांनी लिहिले.

सासू त्रास देऊन थकली परंतु लल्लनदेवी त्रास सोसून थकल्या नाहीत.लल्लादेवींशा जेवायला वाढायच्या आधी सासू कंकर ( छोटे दगड ) आधी ताटात वाढून त्यावर चावल ( भात ) वाढायची.लल्लन सगळी शीत कंकर मधुन वेचून वेचून खायची.जेवण झालं की लल्लनदेवी ते कंकर टाकून न देता, प्रामाणिकपणे ते सगळे कंकर स्वच्छ धुऊन पुन्हा सासूला नेऊन द्यायची.म्हणजे सासूला तेच कंकर पुढच्या जेवणामध्ये सासूबाईंना सहज टाकता येतील. लल्लादेवींना वाटायचं ज्या गोष्टीने सासुबाईंना आनंद मिळत असेल ,तर तो त्यांचा आनंद आपण का हिरावून घ्यायचा.इतकी साधीभोळी विचारसरणी  लल्लनदेवींची होती.

स्वतःला शिवतत्त्व मानणाऱ्या लल्लादेवींना साक्षात शिवाने ज्ञानबोध दिल्याने त्यांच्या हृदयातही शिवा सारखा भोळा भाव नांदत होता.केवल इश्वरके साथ ही मनुष्य का असली रिश्ता है…वही असली परमसुख है| बाकी तो माया है|….पती मुलं संपत्ती ह्या सगळ्यांवर भरभरून प्रेम करतात स्त्रिया कारण त्यांना ते आपले समजत असतात.पण आपल्याच आत असणाऱ्या आत्म्यावर त्या प्रेम करत नाही.       शिवशंकराचा शोध घेणं हाच त्यांचा ध्यास होता.त्यासाठीच रानावनात भटकंती व्हायची.तासंनतास शिवाच्या नामस्मरणात गुंग असणाऱ्या लल्लादेवींना लोक नंतर वेडी समजायला लागले.एकदा लल्लनदेवींच्या अंगावर फाटकी वस्त्रे पाहून एका व्यापाराने एक चुनरी त्यांना दिली. लल्लनदेवी खांद्यावर चुनरी टाकून निघाल्या! निघताना लल्लनदेवीनीं त्या चुनरीचे वजन केले.दिवसभर त्या इकडे तिकडे ती चुनरी घेऊन फिरत होत्या.कोणी त्यांची निंदा केली की त्या डाव्या खांद्यावरच्या चुनरीला गाठ मारायच्या… आणि कोणी त्यांच्याशी प्रेमाने वागवले की उजव्या खांद्यावरच्या चुनरीला गाठ मारायच्या! दिवसभर त्या कधी डाव्या कधी उजव्या बाजूला गाठी मारत होत्या…. संध्याकाळी लल्लनदेवी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे आल्या…..गाठीच्या चुनरीचे त्यांनी व्यापाऱ्याला वजन करायला सांगितले.व्यापारी म्हणाला वजनात काहीच फरक नाही.सकाळी होत तितकेच वजन आहे.

तेव्हा लल्लनदेवी व्यापाऱ्याला म्हणाल्या… वजनात फरक पडणारही नाही.पण ह्या गाठींच वजन किती मोठं तत्वज्ञान सांगतात आपल्याला की लोकांनी केलेली स्तुती आणि निंदा ह्य दोघांमुळे मुळ वस्तूत काहीच फरक पडत नाही.म्हणून ज्ञानी माणसांनी सुख आणि दुःख ह्या दोघांचा शांतपणे स्विकार केला पाहिजे.

इतक्या सहज तत्वज्ञानाला हात लावणाऱ्या लल्लादेवींचे अभंग लोकांना मौखिक पाठ होते.लल्लालेवीनीं मुद्दाम हे अभंग संस्कृतमध्ये न लिहिता ते काश्मिरी भाषेत लिहिले.आज सातशे वर्षा नंतरही त्यांचे २६५ वर अभंग काश्मीरमध्ये लोकप्रिय आहेत.

काळाचा संघर्ष असला तरी जुम्मा मशिदी समोर आपला देह सोडणाऱ्या लल्लनदेवींनी सुध्दा मुक्ताबाई,जनाबाई सारखीच देवाची आराधना केली.शिवशंकरात समरस होण्याच्या प्रयत्नातच सामान्यांना तत्वज्ञान सांगितले. म्हणूनच सर रिचर्ड टेंपल यांनी द वल्ड ऑफ लल्ला ह्या ग्रंथात आपण भारतीय तत्वज्ञानाकडे केवळ लल्लादेवीमुळे वळलो असे स्पष्ट लिहिले आहे.

सर ग्रीअरसन यांच्या लाल वाखीयनी ह्या ग्रंथरुपी पुस्तका मध्ये म्हंटलेच आहे की जातपात न मानणाऱ्या लल्लादेवींच्या अभंगना प्रत्येक भाषेत प्रसिद्धी मिळाली आहे.ग्रीक,फ्रेंच, जर्मन, उर्दू,सिंधी,कन्नड अशा अनेक भाषांमधून आजही लल्लनदेवी लोकांच्या हृदयात बसल्या आहेत. आजही लल्लनदेवींच्या सिंधी अभंगात योग , देव, धर्म ह्या गोष्टी आढळतात.  

मन का आइना

साफ करोगे

तो अपनीही रूह

शैव धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञान तसेच मुस्लिम सुफी तत्वांचा लल्लादेवींनी सुरेख संगम साधला आहे.

 

लेखिका : प्राची गडकरी

प्रस्तुती : अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोण गोंदवलेकर? … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

कोण गोंदवलेकर? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

माझा एक वाहनचालक मित्र एकदा मोटार बिघडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी एका गॅरेजमध्ये गेला. ती वस्ती तशी टपऱ्याटपऱ्यांचीच होती.

गाडी दुरुस्त व्हायला वेळ होता म्हणून तो दुकानासमोरच्या चहाच्या टपरीत गेला. कळकट लाकडी बाकं, तीच रया गेलेली टेबलं. चहा पिता-पिता त्याचं लक्ष गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे गेलं. काळासावळा असा तो तिशीतला तरुण होता.

मग सहज गल्ल्यामागे भिंतीवर लक्ष गेलं आणि माझ्या मित्राला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला.

भिंतीवर श्रीगोंदवलेकर महाराजांची तसबीर होती.

 

चहा पिऊन झाल्यावर तो गल्ल्याशी आला आणि पैसे देता देता त्यानं विचारलं,

‘‘तुम्ही गोंदवल्याला जाता काय?’’

त्या मालकानं रूक्षपणे विचारलं, ‘‘ये गोंदवले क्या है?’’

 

आता माझ्या मित्राला अधिकच आश्चर्य वाटलं.

त्यानं तसबिरीकडे बोट दाखवत विचारलं,

‘‘यांचं नाव तुम्हाला माहीत नाही?’’

तो म्हणाला,

‘‘नाही.’’

 

मित्राला वाटलं, आधीच्या मालकानं ही तसबीर ठेवली असावी आणि ती यानं काढली नसावी.

म्हणून त्यानं विचारलं, ‘‘मग ही तसबीर इथं कोणी लावली?’’

तो मालक थोडं हळूवारपणे म्हणाला,

‘‘मीच!’’

 

‘ज्या माणसाला गोंदवले माहीत नाही,

गोंदवलेकर महाराज माहीत नाहीत,

त्यानं त्यांची तसबीर आपल्या दुकानात गल्ल्याच्या मागे पूजास्थानी का लावावी?’

हा प्रश्न माझ्या मित्राला पडला आणि त्यानं आश्चर्यभरल्या स्वरात विचारलं,

‘‘मग ही तसबीर तुम्ही इथे का लावलीत?’’

 

त्याचं जे उत्तर आहे ते सर्वच साधकांनी हृदयात साठवून ठेवावं, असं आहे!

 

त्यानं आपली जीवनकहाणीच माझ्या मित्राला सांगितली. जन्मापासून त्याला आपल्या आईबापाचा पत्ता माहीत नव्हता.

कळू लागलं तेव्हापासून तो रस्त्यावरच वाढत होता. खरंच त्या बालपणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुणी दिले तर कपडे होते, कुणी दिलं तर खाणं होतं.. राहणं, झोपणं सारं रस्त्यावरच.

लहान पोराची दया येते, वय वाढू लागलं तसा तो अवचित दयेचा ओघही आटला.

मग चोऱ्यामाऱ्या सुरू झाल्या.

वाढत्या वयानं व्यसनंही शिकवली. त्या व्यसनांच्या धुंदीचीच काय ती जवळीक होती. चोरी करावी, मारामाऱ्या कराव्यात, व्यसनं करावीत, असं आयुष्य सरत होतं. आयुष्य दिशाहीन होतं आणि आयुष्याला काही दिशा असावी, याची जाणीव परिस्थितीही होऊ देत नव्हती.

 

एकदा रात्री दारूच्या नशेत तो रस्त्याच्या कडेला कोसळला होता. सकाळी वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या पावलांच्या आवाजानं जाग आली.

 

सहज त्याचं लक्ष पदपथावरच्या झाडाच्या तळाशी गेलं. तिथं कोणीतरी श्रीगोंदवलेकर महाराजांची त्याच्या शब्दांत सांगायचं तर ‘या बाबाची’ ही तसबीर ठेवली होती.

 

डोळे चोळत त्यानं काहीशा कुतूहलानं ती तसबीर हाती घेतली आणि तसबिरीतल्या ‘बाबा’ कडे नजर टाकली.

 

त्याच्याच शब्दांत पुढची कहाणी सांगण्यासारखी आहे.

तो म्हणाला, ‘‘मी तसबीर उचलली आणि या बाबाकडे पाहिलं.

या बाबानं माझ्याकडे इतक्या करुणेनं आणि दयामय दृष्टीनं पाहिलं की तसं कोणीही कधी पाहिलं नव्हतं.

 

या जगात माझं कोणीतरी आहे, या जाणिवेनं मी हेलावलो.

ती तसबीर छातीशी धरून खूप रडलो.

माझं कुणीतरी या जगात मला भेटलं होतं!

 

मग मी पदपथावर जिथं पथारी टाकत असे तिथं ही तसबीर लावली.

 

त्यानंतर दिवसागणिक आश्चर्यच घडू लागलं.

 

रात्री निजण्याआधी तसबिरीकडे पाहिलं की मला वाटे, आज मी चोरी केलेली या बाबाला आवडलेली नाही.

 

मी फार अस्वस्थ होई. मग हळूहळू मी चोऱ्या करणं सोडलं. मग कधी तसबिरीकडे पाही, तेव्हा जाणवे, मी दारू पितो हे या बाबाला आवडत नाही.. मग दारू सुटली.

असं करता करता सारी व्यसनं सुटली. मारामाऱ्या थांबल्या. शिवीगाळ थांबली.

मग मी छोटीमोठी कामं करू लागलो. कष्टाचे पैसे जमवू लागलो.

या बाबाच्या चेहऱ्यावर रोज वाढता आनंद दिसत होता. असं करत करत या टपरीपर्यंत मी आलोय.”

 

माझ्या मित्राचाही ऊर भरून आला.

तो म्हणाला, ‘‘अरे हे सारं खरं, पण ही यांची जागा नाही. त्यांना अधिक चांगल्या जागी ठेव.’’

 

तो पटकन म्हणाला, ‘‘ते मला माहीत नाही. जिथं मी आहे, तिथं हे असणारच आणि जिथं ते आहेत, तिथं मी असणारच!’’

 

मला सांगा. आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहे.

त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे.

तरी आपल्यात पालट होत नाही.

 

आणि त्यांचं नाव-गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो,

आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते, ते पूर्ण पालटू शकतं!

याचं याइतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही.

 

त्या टपरीला भेट दिली तेव्हा त्या टपरीत आणि त्या चहावाल्याच्या डोळ्यांत मला गोंदवल्याच्या दर्शनाचंच समाधान मिळालं.

 

तेव्हा सद्गुरू सगुण देहात नसले तरी ते बोध करतात.

 

आणि त्या बोधाचं पालन हीच खरी नीती.

 

कारण जीवनातली सर्व अनीतीच ती थोपवते!

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फांदीवरची पिवळी पाने – कवी : श्री.  के. यशवंत ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ फांदीवरची पिवळी पाने – कवी : श्री.  के. यशवंत ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

फांदीवरच्या पिवळ्या पानांना तोडू नका,

एक दिवस ती आपोआप गळून पडतील.

 

बसत जा घरातील वडीलधारी मंडळींबरोबर, बोलत राहा,

एक दिवस ती आपोआप शांत होतील.

 

होऊ द्या त्यांना बेहिशेबी, खर्चू द्या, मनासारखं वागू द्या,

एक दिवस ती आपोआप तुमच्या साठी इथेच सर्व सोडून जातील.

 

नका टोकू त्यांना सारखं सारखं, तेच तेच बोलत राहतात म्हणून,

एक दिवस तुम्ही तरसून जाल, त्यांचा आवाज ऐकायला, जेव्हा ती अबोल होतील.

 

जमेल तेवढा आशिर्वाद घ्या त्यांचा, वाकून, पाया पडून,

एक दिवस ती आपोआप जातील वर तसबीर बनून,

अर्थ नाही मग तुमच्या माफीला, नतमस्तक होऊन, कान धरून.

 

नका बोलू चार चौघात त्यांना,

खाऊ दे थोडं मनासारखं,

मग बघा येणार पण नाहीत जेवायला,

भले करा श्राद्ध, सारखं  सारखं.

कवी: श्री.  के.यशवंत

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आम्ही दोघे…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आम्ही दोघे…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

मुलगी आमची युरोपात असते

आणि मुलगा यूएसमध्ये असतो

इथे मात्र आम्ही दोघेच असतो

 

मुलगा,जावई आॅफिसात राब राब राबतो

मुली,सुनेचाही कामाने पिट्टया पडतो

मदतीला या मदतीला या

दोघींचाही आग्रह असतो

चतुराईने आम्ही टाळतो कारण

इथे मात्र आम्ही एन्जॉय करत असतो !

 

हिच्या खूप हॉबीज आहेत

दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो

मला कसलीच आवड नाही

मी राहिलेल्या झोपा पूर्ण करून घेतो

कारण आम्ही दोघेच

असतो !

 

कधी संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो

येताना बाहेरच जेवून येतो

रोज रात्री मनसोक्त टीव्ही बघत

चवीचवीने जेवण करतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

एकदा मुलाचा फोन येतो

एकदा मुलीचा फोन येतो

वेळ नाही अशी तक्रार करतात

आमचाही उर भरून येतो

तुम्हीही नंतर एन्जॉय कराल

असा त्यांना धीर देतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

नव्या नवलाईने सगळीकडे जाऊनही आलो

स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो

इकडचं – तिकडचं

दोन्ही जगं एन्जॉय करतो

कारण आम्ही  दोघेच असतो !

 

नाही जबाबदारी  कसलीच इथे

आणि नाही कसली तक्रार तिथे

नाही कसली अडचण सुखाची

मस्त लाईफ एन्जॉय करतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

भांडण तंटे आमचेही खूप होतात

नसते तिला स्मरण नि मला आठवण

खरे तर काहीच नसते वादाचे कारण

वाद विसरून गट्टी करतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

तिला मंचुरीयन आवडते

तेही ठराविकच हॉटेलात मिळते

नेहमीच ते मिळते असे नाही

पण ते असले की मी नक्की आणतो

घरच्या स्वैपाकाची कटकट नाही

कारण आम्ही दोघेच असतो !

 

मरणाच्या गोष्टी आम्ही करत नाही

पार्ट्या करतो ट्रिपा काढतो

हाताशी आता पैसे आहेत

वेळ अन मित्रही भरपूर आहेत

मुलांच्यामुळे अडकायचे दिवस संपले

हे जाणून मनोमनी खूश होतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

मुलांना हेवा वाटायला नको

त्यांच्यापासून ही मौजमस्ती लपवून ठेवतो

 

संगनमताने तीही हसते .. साथ देऊन मीही हसतो

कारण आम्ही दोघेच असतो ! 

कारण आम्ही दोघेच असतो !

कवी :अज्ञात

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.

दारात शिवराम.

शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

‘साहेब, जरा काम होतं.’

‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’

‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’

‘अरे व्वा ! या. आत या.’

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.

मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी ‘नको नको’ म्हणाला. आग्रह केला, तेव्हा बसला. पण अवघडून.

मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.

 

‘किती मार्क मिळाले मुलाला ?’

‘बासट टक्के.’

‘अरे वा !’ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.

हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूश दिसत होता.

 

‘साहेब, मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !’

‘अच्छा, म्हणून पेढे वगैरे !’

शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला,

‘साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.’

 

मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, ‘साहेब सॉरी हां, काय चुकीचं बोललो असेन तर.

माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा,

‘आनंद एकट्याने खाऊ

नको सगल्य्यांना वाट !’

हे नुसते पेढे नाय साहेब

हा माझा आनंद आहे !’

 

मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.

आतून मोठ्यांदा विचारलं, ‘शिवराम, मुलाचं नाव काय ?’

‘विशाल.’ बाहेरून आवाज आला.

मी पाकिटावर लिहिलं – ‘प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात राहा – तुझ्या बाबांसारखा !’

‘शिवराम हे घ्या.’

‘साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्टं बोल्लात, यात आलं सगलं.’

‘हे विशालसाठी आहे ! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.’

शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

‘चहा वगैरे घेणार का ?’

‘नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल ? मला वाचता येत नाही. म्हनून…’

‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !’ मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.

खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.

हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.

नव्वद, पंच्याण्णव टक्के मिळवूनसुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.

आपल्या मुलाला / मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.

 

आपण त्यांना नको हसूया. कारण आपण सगळेच असे झालोय- आनंद ‘लांबणीवर’ टाकणारे !

माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?

 

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ? सोप्पं आहे. मस्त चिंब भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?

माणूस जन्म घेतो, त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.

खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.

माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं.

आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.

कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.

काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.

खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.

इतकं असून… आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत !

जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !

इतरांशी तुलना करत आणखीपैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची ‘पोजिशन’, आणखी टक्के…!

या ‘आणखी’ च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !

लेखक – श्री एकनाथ वाघ

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ किती देखणी असतात ना नाती ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ किती देखणी असतात ना नाती ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

‘लक्ष द्या जरा चिरंजिवाकडे

शिंगं फुटलीयेत त्यांना,’

अशा टोमण्याकडे दुर्लक्ष करणारी

आई

आणि

आपल्या बछड्यानं पहिल्यांदाच ‘आत्या’ म्हटलेलं

ताईला फोनवर ऐकवणारा

भाई

 

गळ्यात हात टाकून

‘मावशी, मी मदत करू तुला?’ विचारणारी

ढमी

आणि

‘मुलीला मांडवात घेऊन या’ चा पुकारा झाल्यावर

डोळे भरून येणारी

मामी

 

कसे लोभस असतात ना?

 

मला मामीच्याच हातचे लाडू आवडतात

असं आईदेखत सांगणारी बिनधास्त

सखू

आणि

माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत

भरल्या आवाजात ‘येत जा गं घरी’ म्हणणारी

काकू

 

सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी

मैत्रीण

आणि

‘बाकी काही तक्रार नाही हो

पण फार कमी जेवते तुमची मुलगी ‘

असं फोनवर सांगणारी

विहीण

 

किती प्रेमळ असतात ना?

 

वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा

नवरा

आणि

‘आमटी फक्कड झालीय गं!

माझ्या आईची आठवण करून दिलीस,’ म्हणणारा

सासरा

 

ऑफिसातून परतल्यावर ‘बस घटकाभर’ म्हणत

वाफाळता चहा पाजणारी

शेजारीण

आणि

चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी

सोबतीण

 

कसे गोड वाटतात ना?

 

मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे

बाबा

आणि

सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी

नातीला फिरवून आणणारे

आबा

 

‘काय मग फेसबुक?’ विचारून चिडवणारा

पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा

मेहुणा

आणि

घरच्यासारखे राहून

सुखदुःखात सोबत करणारा

पाहुणा

 

इकडे तिकडे पळत हैराण करणाऱ्या नातवाला

गरमागरम वरण भात मायेने भरवणारी

आजी

आणि

मंत्रोच्चार करत करत सुरेख रांगोळी रेखाटणारे

गुरूजी

 

किती स्मार्ट दिसतात ना?

पांढराशुभ्र युनिफाॅर्म घालून

हाॅस्पिटलमध्ये धावपळ करणारी

सिस्टर

आणि आश्वासक हसत

आपल्या पेशंटचा शब्द न शब्द ऐकणारा

डाॅक्टर

 

ऑफिसात उशिरापर्यंत काम करताना

अचानक घड्याळाकडे लक्ष जाताच,

‘इसे कल निपटाते है, its too late! you want vehicle?’ विचारणारा बॉस…

 

आणि

किती सुखाचा, आनंदाचा असतो ना या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास…!!!

        

मित्रांनो हसत  जगा व नाती जपा आयुष्य खूप सुंदर आहे.

 

कवी :अज्ञात

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print