मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

कॉलेज ची धमाल करता करता परीक्षा कधी संपली समजलेच नाही. काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि मी मराठी घेऊन बीए चांगल्या मार्कांनी पास झाले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सगळ्यांनी माझे कौतुक केले आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

पण आता पुढे काय हे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले. कोणी म्हणाले आता एम ए करून घे. कोणी म्हणाले त्यापेक्षा आवाज चांगला आहे गाणं शिक…

लहानपणापासून मला नृत्याबद्दल,नाचा बद्दल खुपच ओढ होती. मला ना,चवथीपर्यंत चांगलं दिसत होतं. म्हणजे जन्मतः जरी मला मोतीबिंदू असले, तरी ऑपरेशन करून थोडं दिसायला लागलं होतं. पण फार लहानपणी मोतीबिंदू झाल्यामुळे काचबिंदू वाढत गेला आणि चौथीनंतर दृष्टी कमी कमी होत गेली. पुढे बीए झाल्यावर वयाच्या एकविसाव्या वर्षी भरतनाट्यम शिकायला मी सुरुवात केली. तेच का हे सुद्धा मला चांगलं आठवतंय. माझे बाबा विद्या मंदिर प्रशाला मिरज, इथं शिक्षक होते. त्यावेळी दिल्लीमध्ये झालेल्या एका कोर्समध्ये त्यांना प्रोजेक्टर, स्लाईड्स बक्षीस मिळाले होत्या. त्यामध्ये भारतातील प्राचीन मंदिरे, भारतीय नृत्य याची सखोल माहिती होती. परमेश्वर कृपेने त्यावेळी मला दिसत होते आणि तो नाच, तो सुंदर पोशाख,छान छान दागिने माझ्या मनामध्ये इतके पक्के बिंबले होते की माझी नजर नंतर गेली पण मनावरचे ते दृश्य नाहीसे झाले नाही. ते मला सारखे साद घालत होते म्हणतात ना, चांगले बी पेरले ही पोषक वातावरणात ते उगवते, फुलते. माझेही तसेच झाले. अर्थात हे सगळे माझ्या नृत्यातल्या गुरु मुळेच घडू शकले. माझ्या नृत्यातल्या गुरु म्हणजेमिरजेतील सौ धनश्री आपटे.

माझ्या नृत्यातल्या, माझ्या विचारांच्या जडण-घडणीतल्या, माझ्या व्यक्तिमत्व विकासाला उमलू देणाऱ्या, फु लू देणाऱ्या, मला माझ्या आयुष्यातला आनंद मिळवून देणाऱ्या आणि एक प्रकारे माझे जीवन उजळून टाकणाऱ्या या माझ्या ताई म्हणजे सौ धनश्री ताई या माझ्या गुरुच आहेत.

अशा गुरू मला केवळ माझे नशीब,माझ्या आई बाबांचे आशीर्वाद,परमेश्वराची कृपा आणि  ताईचा मोठेपणा यामुळेच मला प्राप्त झाल्या.

मी बी ए झाल्यानंतर माझ्या मनातले नृत्य शिकण्याचे गुपित आई बाबांना सांगितले. माझ्या बाबांनी ते मनावर घेतले आणि मला नृत्य.  कोण शिकवू शकेल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. धनश्री ताई बद्दल समजल्यावर माझे बाबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तो पहिला दिवस मला अजूनही चांगला आठवतोय. बाबांनी माझी ओळख करून दिली आणि हिला तुमच्याकडे नृत्य शिकायचे आहे आहे असे सांगितले. माझ्या चालण्या वरून, वावरण्यावरून ताईंना मी पूर्ण दृष्टिहीन आहे असे वाटले नाही. पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एका आंधळ्या मुलीला नृत्य शिकवायचा विडा आपल्याला उचलायचा आहे, तेव्हा क्षणभर त्याही गोंधळल्या. त्यांना हे अनपेक्षित होतं. थोडा विचार करून म्हणाल्या मी दोन दिवसांनी सांगते. आणि त्यांचा आलेला होकार माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. माझ्या आयुष्याला प्रकाश देणारा ठरला.

फक्त मला एकटीला शिकवण्यासाठी ताईंनी माझ्यासाठी बुधवार आणि शुक्रवार राखून ठेवले होते. एकदा तरी त्यांना जमणार नव्हते,म्हणून मला घरी सांगायला आल्या, आज येऊ नको म्हणून. त्यावेळी. मी एकटी जाऊ शकत नव्हते ना,कोणीतरी माझ्याबरोबर सोडायला आणायला लागायचे. आमची खेप वाचावी म्हणून त्या स्वतः आल्या. त्यांच्यातला तो साधेपणा, खरेपणा इतकी वर्ष झाली, तरी अजून तसाच आहे .

ताईंनी मला नृत्यामधल्या हाताच्या,पायाच्या विशिष्ट हालचाली, हावभाव, चेहऱ्यावरचे भाव कसे आले पाहिजेत ते मला समजून समजावून,शिकवलं. हाताच्या मुद्रा त्या तोंडी सांगायच्या. अंगठा आणि पहिले बोट यांची टोके जुळवून गोल कर, बाकीची तीनही बोटं तशीच राहू दे. पायाच्या हालचाली सांगताना त्या या खाली बसून माझे पाय तसे करून घ्यायच्या,एकदा मला कळलं की त्यांना पाहिजे तसं जमेपर्यंत प्रॅक्टिस करून घ्यायच्या . माझ्या एमएच्या अभ्यासाचं सांगते, धीर गंभीर अशा श्लोकांच्या स्वरांमध्येमला दशावतार करायचे होते. अक्षरश: नाच करत दहा अवतार सादर करायचे होते. कलकी या अवतारामध्ये मी खरंच घोड्यावर बसून करते आहे असेच मला वाटले. मला त्या सगळ्या अभ्यासाची मजा लुटता आली,आनंद घेता आला.

गाण्यांचे विशिष्ट बोल, त्याचा अर्थ, त्यानुसार हावभाव हे सगळं प्रॅक्टिस न जमत गेलं. सुरुवाती सुरुवातीला काय व्हायचं मी नुसती शरीरानं म्हणजे फिजिकली नाचत होते. घरी येऊनही त्याचा सराव करत होते. एकदा त्यांच्या लक्षात आलं  की नाचून नाचूनमाझे पाय सुजले आहेत तेव्हा त्या म्हणाल्या, “नृत्य नुसतं शरीरांन करायचं नसतं. मी काय सांगते ते मनानं, बुद्धीने समजून घे, तसं मनात  उतरु दे.” त्यासाठी त्या मला शंभर गोष्टी सांगायच्या, त्यातल्या मला कशातरी पन्नास समजायच्या. माझं त्यांनी इतकं पक्क करून घेतलं की मी अजून सुद्धा झोपेतही ते विसरणार नाही. त्यांनी नृत्यातल्या सगळ्या अवघड गोष्टीसोप्या करून सांगितल्या. मनापासून कसं करायचं याची ट्रिक सांगितली. मला वेगळच समाधान मिळालं. आपल्यातलं काहीतरी सुप्त असलेलं, मला लागले याची जाणीव झाली.  नृत्या तला आनंद मिळाला.

मी भरतनाट्यम ची विद्यार्थ्यांनी आहे. पूर्ण शिकून झालं असं मी म्हणणार नाही. पण पण गांधर्व महाविद्यालयाच्या सलग सात वर्ष परीक्षा दिल्या मी . शेवटची परीक्षा नृत्य विशारद ची होती.

असाध्य ते साध्य कसं करावं ते मी माझ्या ताई कडूनच शिकले. माझ्या आई बाबांच्या खालोखाल, माझ्यासाठी माझ्या ताईंचं स्थान आहे. त्यांनी मला खूप, माझ्या आयुष्यात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. शिष्याचे प्रगती गुरु कसा भेटतो यावर अवलंबून असते. माझे गुरु प्रगल्भ अध्यात्मिक पाया असणारे, उच्च स्तरावरील विचारांचे आणि खूप प्रेमळ आहेत. ताईंनी मला जवळजवळ वीस वर्ष शिकवले आहे म्हणून मी मी अनुभवान एवढं बोलू शकते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

मी केवढी भाग्यवान कि,  प्राध्यापक श्री पां.ना. कुलकर्णी हे स्वतः ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक,  विवेचक, प्रवचनकार,  मला हा विषय शिकवत होते. त्या वर्षी मराठी विषयाची मी एकटीच विद्यार्थिनी होते.  अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन,रसाळ वाणी, आणि ओघवतं वक्तृत्व अशा मार्गदर्शनात मी अभ्यास करत होते. वेगवेगळ्या असंख्य नोट्स लिहून तयार करत होते. सरांच्या कडून तपासून घेत होते.

वर्ष संपत आलं होतं.  परीक्षेची वेळ आली. मी विट्ठलाचीच प्रार्थना्थ करत होते, ” मला पेपर लिहिताना सगळं आठवू दे आणि लिहायला येऊ दे.” परीक्षा झाली. आणि सरांनी मला सांगितलं, ‘ तुमच्या सर्व नोट्स मला आणून द्या’. मी सगळ्या व्यवस्थित एकत्र केल्या आणि दिल्या. त्यांनी त्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या विभागात संदर्भ वाचन आणि अभ्यासासाठी दिल्या. मला खूप खूप खूप  आनंद झाला. विद्यापीठाते आपलं लेखन संदर्भा साठी असणं ही किती अभिमानाची गोष्ट.  असं असेल,हे  कधी माझ्या  स्वप्नातही  वाटलं नव्हतं. तेव्हा पटलं, संपूर्णं वर्षभर विठ्ठलच तर माझ्या कडून लिहून घेत नसेल?

तेव्हा पासून मला सतत वाटायचं, पंढरपूर ला विठ्ठलाच्या दर्शनाला मला कधी जायला मिळेल? ही 1978 सालची गोष्ट. लगेचच प्रपंचात पडले. नशिबात पुढे काय वाढून ठेवलेले असते, काही कळत नाही. सुखदुःख, त्रास,  अडचणी यांच्याशी दोन हात करता करता 40 वर्षे गेली. वयाची साठी ओलांडली. दरवर्षी आषाढी,  कार्तिकी एकादशीला उपवास करण्याइतकाच विठ्ठलाशी संबंध उरला होता.

आणि….अचानक ओळखीच्या मित्र मैत्रिणींचा अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूरला जायचा बेत ठरला. डिसेंबर 2019,  आम्ही प्रवास सुरू केला. अक्कलकोट ला श्री स्वामी समर्थांचे दर्शन,  महाप्रसाद घेऊन दुसरे दिवशी सकाळी मार्गस्थ झालो. वाटेत तुळजापूर च्या आधी पंढरपूर ला जाऊ असे ठरले. आणि दोन तासात पंढरपूर ला पोचलो सुद्धा.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

तो काळ महाराष्ट्रासाठी फार कठीण होता. यवनांचा धुडगूस माजला होता. परकीयांच्या आक्रमणापेक्षा जनजीवन उध्वस्त झाले होते. बायका मुली पळवल्या जात होत्या. मंदिरांची तोडफोड करून मूर्ती भंग केली जात असे. पांडुरंगा ची मूर्ती यवनांनी पळवून कर्नाटक प्रांतात नेऊन टाकली. अशा वेळी सर्व संतांनी आपापल्या परीने घाबरलेल्या जनतेला एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली. भगवी पताका, भागवत धर्म,  आणि वारकरी संप्रदाय या त्रयींच्या आधारे जनतेला एक सुरक्षा कवच दिले. श्री संत भानुदास म्हणजे एकनाथ महाराजांचे वडील, यांनी पांडुरंगाची मूर्ती कर्नाटकातून आणून पंढरपूरात स्थापन केली. कर्नाटकातून आला म्हणून “कानडा राजा पंढरीचा”.

संत रामदास स्वामी, संत तुकाराम,  संत एकनाथ इत्यादिनी हिंदुधर्म,  हिंदु दैवते, यांचे महत्व पटवून देऊन साध्या भोळ्या शेतकरी, कामकरी वर्गाचे जगणे सुसह्य कसे होईल याची ग्वाही दिली. त्याच काळात शिवाजी राजे दिल्लीच्या पातशाहीशी टक्कर देत होते. स्वराज्य आणि सुराज्य स्थापनेसाठी त्यांची पराकाष्टेची शिकस्त चालू होती. त्यांना समर्थ रामदास व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे पाठीशी राहून उत्तेजन देत होते. मार्गदर्शन करत होते. महाराजांना तुळजाभवानीचा वरदहस्त होता. अवघा महाराष्ट्र संक्रमणाच्या कठिण परिस्थितीतून जात होता. रयतेला, जनतेला एकत्र आणून त्यांच्या वृत्ती,  त्याचे आचार,  त्यांचे विचार , हे विठ्ठलाच्या रूपात असलेल्या परम शक्ती कडे वळवण्याचे महत्कार्य सर्व संतांनी केले आहे.  त्यातूनच भागवत धर्माची गुढी रोवली गेली. भगवी पताका अस्तित्वात आली. वारकरी,  माळकरी संप्रदाय उदयास आला.

भोळी भाबडी रयत विठ्ठलाच्या वात्सल्यपूर्ण कृपेच्या आश्रयाला आली.

अभ्यास करताना माझ्या मनात परत परत विचार यायचे, कि खरंच विठ्ठल भक्तांच्या मदतीसाठी धावून आला असेल का? मग कळलं, ज्याचा त्यावर विश्वास नाही,  किंवा मनात संदेह आहे, त्यांना तो दिसत नाही,  जाणवत नाही. पण ज्यानं विश्वास ठेवला, त्याला तो प्रत्यक्ष दिसतो, मदत करतो, संकटातून बाहेर काढतो. कुठल्याही गोष्टीत विश्वास आणि श्रद्धा महत्वाची. जनाबाईंच्या अभंगातला विठू लेकुरवाळा असतो.  सगळे भक्त विठ्ठल नामाच्या गजरात नाचतात, गातात, धावतात,  उड्या मारतात. स्वतःला विसरून पांडुरंगाच्या पायाशी लोळण घेतात.  पावसापाण्याची, उन्हातान्हाची  कदर न करता पायी पंढरीची वारी करतात. त्यांच्या भक्तीने,  त्यांच्या सेवेने वेडा झालेला विठू सुद्धा आषाढी कार्तिकी एकादशीला त्यांची वाट बघत असतो. असं हे देवाचं आणि भक्ताचं नातं. ‘ देव भावाचा भुकेला ‘ . त्याला फक्त भक्तांच्या ह्रदयीचा खरा भक्ती भाव अपेक्षित आहे. भक्तांची आर्ततेने आलेली ” विठ्ठला, विठुराया, पांडुरंगा ” अशी हाक त्याच्यापर्यंत क्षणार्धात पोचते, आणि तो भक्तांजवळ हजर होतो. हा अनुभव भक्तांचा.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

संत वाङमय, आणि संत साहित्य, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय, संत चरित्रे या सर्वांचा अभ्यास करण्याचा योग मला माझ्या महाविद्यालयीन काळात आला. त्या अनुषंगाने ज्ञानेश्वरी,  अमृतानुभव,तुकाराम गाथा, शेकडो अभंग, ओव्या, भारूडे, लोकगीते यांची ओळखंच नाही तर पक्की दोस्ती झाली .

दरवर्षी आषाढी एकादशी,  कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल रखुमाई च्या दर्शनाला जातात.

कपाळी बुक्का,गळा तुळशीची माळ,  खांद्यावर भगवी पताका, हाती मृदंग टाळ आणि ‘ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ‘ च्या तालावर पडणारी पावले. विठ्ठलाच्या प्रेमात सारं वातावरण भारून गेलेलं असतं. सगळ्यांची वाट एक, नेम एक, ध्यास एक – विठ्ठलाला भेटणे. संत साहित्य वाचताना एक गोष्ट सातत्याने आणि प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे,  ” जगत्जेठी विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेऊन विटेवर उभा आहे,  त्याचं दर्शन झाले की आयुष्यातल्या सगळ्या व्यथा, दुःख,  कष्ट, त्रास  नाहिसे होतात आणि मनात रहातं फक्त त्याचं साजिरं गोजिरं रूप. एकदा त्याच्या पायावर डोकं ठेवलं की पुढं वर्षभर कसलीच काळजी नाही.आपली सगळी दुःख,  संकटं तोच निवारण करतो हा प्रचंड विश्वास. पंढरपूर ला जाताना दर्शनासाठी आसुसलेली मने येताना शांत होतात. असं काय असेल त्या विठ्ठलाकडे?

लहानपणी विठोबा रखुमाई च्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी वाचल्या, ऐकल्या.  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर,  निवृत्ती,  सोपान,  मुक्ताई,  तुकाराम,  एकनाथ,  नामदेव, पुंडलिक,  गोरा कुंभार,  चोखामेळा,  जनाबाई, कान्होपात्रा, सावता माळी अशा अनेक संतांची विट्ठलाचे गुणवर्णन करणारी,  ईश्वरानुभूतिचे अनुभव सांगणारी चरित्रे वाचली आहेत. अभंग,  ओव्या ऐकल्या आहेत.  एक एक अभंग म्हणजे विठुरायाच्या गळ्यातील  तुळशीचे  एक एक  दळच जणु. इतके पवित्र आणि आर्त.

पंढरपुरात विठोबा जरी विटेवर  युगे अठ्ठावीस उभा असला तरी भक्तांची श्रद्धा इतकी दृढ की आपले नित्याचे काम करताना मुखावाटे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जप केला तर कष्ट जाणवल्याविना त्यांचे काम पार पडत असे.

( परीक्षेत पेपर्स लिहायला विठू मदत करेल का? असा प्रश्न मनात आला होता)

विठ्ठल, पांडुरंगा, म्हटलं की दिवसभराचे सर्व क्लेश, कष्ट शरीरातून निघून जाई, आणि रात्री पाठ टेकल्या टेकल्या भक्तांना गाढ झोप लागत असे. तुकोबारायांची अभंगगाथा समाजकंटकानी इंद्रायणीत बुडवली, नंतर ती जशीच्या तशी पाण्यातून वर आली.गोरा कुंभाराचा चिलया बाळ परत जिवंत झाला.अशा अनेक अलौकिक कथा आहेत.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पेस ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ मनमंजुषेतून  ☆ स्पेस ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

असचं एकदा   काही  कारणानं  मला मुंबईला जावं लागलं होतं.माझी एक  जुनी शाळासखी इथं राहते. काम झाल्यानंतर मुद्दाम वेळ काढून मी तिच्याकडं गेले. अर्थातच फोन करुन  तिला इंटिमेट केलं होतंच. मनात मात्र बालमैत्रीणीला भेटण्यासाठी आजकाल हा जो शिष्टाचार पाळावा  लागतो याविषयी थोडी नाराजी होतीच.

बेल वाजवून दारात ऊभी राहिले. दार ऊघडताच गळाभेटीसाठी हात पसरणार इतक्यात..  हाय रे.. कामवालीनं दार उघडलं.  मला बाहेरच थांबायला सांगून ती आत गेली. थोड्या वेळानं येऊन तिनं मला हॉलमध्ये नेलं. तो ऐसपैस, किंमती वस्तूंनी सजलेला दिवाणखाना मालकिणीच्या  सधनतेची जाणीव करुन देत होता. काही मिनिटांनी मॅडम बाहेर आल्या. गळाभेट झाली. दोघीही गहिवरलो. ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिच्या मिस्टरांची कर्तृत्वगाथा समजली. मुलांची चौकशी करुन झाली. तसं सगळं छान होतं. पण कुठंतरी काहीतरी खटकत होतं. भेटीनंतर शाळेत असताना मिळणारा आनंद, गवसणारं समाधान … छे.. छे.. मान झटकून मी मनाला आवरलं. घरी नसतील कुणी.. त्यामुळं कदाचित भेटले नाहीत  आपल्याला.. पण.. गप्पांच्या ओघात समजलं, सगळे घरीच  होते. शेड्यूल  ठरलं होतं. मला भेटायला त्यांच्या जवळ  वेळ नव्हता. मी सकाळी कळवलं होतं ना. त्यांचे प्रोग्राम्स पूर्वीच ठरले होते.

घरी परतल्यावर मी माझ्या  मुलाशी  बोलत होते.मैत्रिणीच्या घराच वर्णन, पण मनातील खदखद जास्त. तेव्हढ्यात माझ्या नवर्‍यानं  माझा मोबाइल  घेतला.” अगं, ते ICICI बॅंकेचं स्टेटमेंट बघायचंय. तुझ्या कडं  मेसेज आला  असेल.”माझा  लेक तिथंच  डायनिंग टेबलवर पेपर पसरुन वाचत बसला होता.मी नुकत्याच भाजून ठेवलेल्या शेंगदाण्याच्या बुट्टीत हात घालत  तो म्हणाला,” आई, याला स्पेस जपणं  म्हणतात. हाय सोसायटीतला हा एक  शिष्टाचार आहे. सगळे आपआपापल्या खोल्यात बंद. आत्ता आपण बसलोय ना तसं बसायचं नाही एकत्र. परवागनी घेऊन, दारावर टकटक करुनच एकमेकांच्या खोलीत जायचं. बाबांनी आत्ता तुझा मोबाइल घेतला ना; तुला न विचारता ; तसा नाही घ्यायचा. आजकाल असं वागणं म्हणजे स्पेस  देणं.कळलं ?”

माझा  वेडा प्रश्न,” म्हणजे, एकत्र बसून जेवायचं  नाही का? सासवा- सुनांनी, मायलेकींनी हसत खेळत गप्पा मारत घरकाम, स्वयंपाक करायचा नाही ?”

“अं हं. आणि तसंही आजकाल स्वयंपाकाला वेळ असतोच  कुणाला? आणि दहा- बारा तास ऑनलाइन काम. ते जास्त महत्त्वाचं नाही का ?”

तो ऊठून आपल्या  कामाला  गेला. माझे हात काम करत होते. पण मन भूतकाळात गेलं  होतं. रोज रात्री एकत्र गप्पा मारत जेवणं हा एक दंडकच होता म्हणा ना. त्यामुळं कोणाचा दिवस कसा गेला हे कळत  असे.दूसर्‍या दिवशीचं सगळ्यांच  वेळापत्रक समजे.बाबांचे ऑफिस ऑफिशिअल नसे. आईच्या शाळेतील विविध कार्यक्रम, स्पर्धा यांचं वेळापत्रक आम्हांला देखील ठाऊक असे. माझ्या भावांच्या मित्रांची मी खास ताई होते. माझे मित्र मैत्रिणी सगळ्यांचे, घरातले झाले होते. आई तर चेष्टेनं म्हणत असे, की माझ्या न पाहिलेल्या कॉलेजातील शिक्षकांनाही  ती रस्यावर सुद्धा ओळखेल. मी तेव्हढी बडबड रोज करतच होते घरात.

भाजी निवडणार्‍या आईला मुलंही हातभार  लावत. भुईमुगाच्या शेंगा फोडणार्‍या आजोबांच्या भोवती नातवंडांचं कोंडाळं असे. पेपर मधील बातम्या,” बरं का गं… ” असं म्हणत  बाबा  मोठ्यानं  वाचून  दाखवत. सकाळच्या  धावपळीत पेपर  हातात  न घेताही आईला, आजीला महत्त्वाच्या घडामोडी कळत. स्वयंपाकघरातल्या  कोपर्‍यात दोन पायांवर बसून आजोबा ताक करत तेंव्हा  घरातलं एखादं लहान नातवंड नाचणार्‍या रवी बरोबर  खिदळत असे. हलकेच लोण्याचा गोळा त्याच्या जिभेवर ठेवला  जाई.

मागच्या पिढीनं स्पेस जपली असती तर सुदृढ भावबंध असलेली नाती कशी  तयार झाली  असती? तेंव्हाच्या आई बाबांची ऑफिसं कशी  बरं  बिनधास्त झाली असती?  मध्यमवर्गीय  संसार कसे बरं  बिनघोर झाले असते? पण छे:, न्युक्लियर फॅमिली ची ही कॅप्सूल समाजात आली, लोकप्रिय झाली. पाळणाघरांची गरज निर्माण झाली. एकमेकांना वेळ देणं एकमेकांच्या  वस्तू शेअर करणंही  जिथं  दुरापास्त  होऊ लागलयं, तिथं मी खुळी  नात्याला भावबंधांचे रेशमी  पदर असावेत  असल्या अपेक्षा करत बसलेय.

अचानक माझ्या गळ्यात मऊ लडिवाळ हात पडले. माझी सहा वर्षांची नात मला  लाडीगोडी लावत होती. “आजी चल ना गं. बागेत झाडांना पाणी घालूया. फुलं काढूया. काल तू प्रॉमिस केलं  होतसं शाळेत जाताना गजरा करुन देईन. माझ्या मॅमना द्यायचाय  गं मला.” मी तिचा गालगुच्चा घेतला. तिचा हात धरून बागेकडं निघाले. ती माझ्या हाताला झोके देत चालत होती. प्रत्येक झोका मला माझ्या कुटुंबातील सगळ्यांना बांधून ठेवतोय, समाधानाचं हसू माझ्या घरकुलात पसरतयं याची सुखद जाणीव करुन देत होता. मी मनात म्हणत होते,’ बरं गं बाई, मी महानगरातल्या हायफाय सोसायटीत रहात नाही.’

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दसऱ्याला टीव्हीवर अनेक ठिकाणचा ‘ रावण- दहन’ सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतांना पाहिला आणि अचानक मनात विचारांची गर्दी झाली. ‘रावण वध’ हे सुष्ट वृत्तीने दुष्ट वृत्तीवर विजय मिळवल्याचे ठळक उदाहरण  असे वर्षानुवर्षे मानले जाते. रावण राक्षसी वृत्तीचा होता- स्वतःच्या बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून त्याने सीतेला पळवले- आणि म्हणून  रामाने युद्ध करून त्याचा वध केला …. एवढेच वर्षानुवर्षे लक्षात ठेवले गेले आहे. पण या  दोन घटनांच्या मधल्या सत्याकडे मात्र कुणीच लक्ष दिले नाही याचे आश्चर्य, आज समाजात घडणाऱ्या घटना पहाता प्रकर्षाने वाटते. आज इतर बातम्यांइतक्याच आवर्जून येणाऱ्या बातम्या असतात त्या स्त्रियांचे अपहरण, बलात्कार, शारीरिक- मानसिक छल …यांच्या, ज्यामध्ये कामवासना – पूर्ती हाच उद्देश बहुतांशी असलेला दिसतो. सामूहिक बलात्कार हा त्याहूनही भयानक प्रकार. मग कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून तिला मारूनच टाकायचे हेही तितकेच सहजसोपे वाटते. एखाद्या मुलीने आपल्याला नकार दिला तर, तिचा जो चेहेरा आवडत असतो तोच एसिड टाकून विद्रूप करणे, तिला आयुष्यातून उठवणे हाही भावनांच्या – विचारांच्या विद्रूपतेचा कळसच. असे असंख्य अत्याचार अनेक प्रकारे सतत होतच असतात. पण बरेचदा लोकलज्जेखातर आणि भीतीने ती त्याचारित स्त्रीच ते समाजापासून लपवून ठेवते हे तिच्याइतकेच पूर्ण समाजाचेही दुर्दैव आहे. अशा-काही घटना व्हाट्यावर येतातही. त्यांचा बभ्रा होतो. कोर्टकचेऱ्याही होतात. आरोपींना शिक्षाही ठोठावली जाते …… पण शिक्षेची अंमलबजावणी? …. ती जास्तीत जास्त लांबणीवर कशी पडेल , माफी मागण्याचे नाटक करून ती रद्दच कशी करता येईल, याचेच जोरदार प्रयत्न सुरू होतात, ज्यात समाजाचे प्रतिनिधीसुद्धा स्वतःचे ‘वजन’ वापरतांना दिसतात. हे पाहून कुणाही संवेदनशील असणाऱ्याचा तात्पुरता संताप होतोच. पण नंतर ती अत्याचारित स्त्री बाजूलाच रहाते, आणि खमंग चर्चा रंगत रहातात त्या फक्त खटल्याच्या……..

हे सगळे चित्रच अतिशय विकृत आहे.. आणि ते पहातांना खरोखरच प्रश्न पडतो की रावणाने सीतेला पळवण्याची मोठीच चूक केली होती, पण आत्ताची परिस्थिती पाहता तो इतका गंभीर गुन्हा म्हणता येईल का, की आज इतकी युगे लोटल्यानंतरही त्याचे आवर्जून प्रतीकात्मक दहन करावे ? समाजाने याचा नक्कीच विचार करायला हवा. आणि तो का ? या प्रश्नाला समर्पक अशी बरीच उत्तरे आहेत ……….

बहिणीच्या अपमानाचा बदला घेणे एव्हढाच तेव्हा रावणाचा हेतू होता, जो भावनेच्या भरात घाईघाईने पूर्ण करण्याची घोडचूक त्याने केली होती. पण सीतेवर कुठलाही अत्याचार करण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता, हे नंतरच्या त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येते. तो तिला कुठल्याही अज्ञातस्थळी घेऊन गेला नाही. त्याने तिला पहिल्यापासूनच अतिशय आदराने वागवले. इतक्या आदराने, की जो आदर आजही स्त्रीला सामान्यपणे दिला जात नाही.  अशोकवनासारख्या निसर्गरम्य जागी त्याने तिची रहाण्याची व्यवस्था केली. तिच्यासाठी आवर्जून स्त्री – सेविकांचीच नेमणूक केली. तिला उत्तम भोजन मिळण्याची व्यवस्था केली. तिथे तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. त्या काळात स्त्रीने परक्या घरी राहणे पाप मानले जायचे. हा नियम आणि स्वतःची चूक लक्षात घेऊन, केवळ माणुसकी म्हणून सीतेशी औपचारिक लग्न  करण्याची तयारीही त्याने दाखवली होती. आत्तासारखा एसिड फेकून , बलात्कार करून सूड घेण्याचा विचार त्याच्या मनात येणेही अशक्य होते हे यावरून नक्कीच सिद्ध होते. रामाने युद्धाआधी पूजा करायचे ठरवले, आणि ती सांगायला , ‘ व्युत्पन्न ब्राह्मण‘ म्हणून रावणालाच बोलावले. आणि रामाचा मान राखत रावणही गेला. असे सगळे घडणे आज अशक्याच्याही पलीकडचे आहे. विशेष म्हणजे मरण्यापूर्वी त्याने रामाची माफी मागितली. आता हा सगळा रावणाचा ‘शुद्ध मूर्खपणा‘ समजला जाईल. पण त्याच्या मनाची शुद्धता, मोठेपणा याचा विचारही कुणी करणार नाही,  जो सगळ्यांनीच करणे  फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आवर्जून असे म्हणावेसे वाटते की रावण- दहन करणे कायमचे थांबवून, आता प्रत्येकानेच स्वतःच्या मनातल्या राक्षसी वृत्तीचे , दुष्ट आणि घातक विचारांचे आणि दुष्ट वासनांचे जाणीवपूर्वक वेळोवेळी दहन करत राहण्याची फार जास्त गरज आहे. आणि  त्यासाठी  ” दसरा” उजाडण्याची गरजच नाही. कारण अशी प्रत्येक वेळ सोने वाटण्यासारखीच असेल………

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 4 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –4 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

शाळेमध्ये असल्यापासून अनेक स्पर्धांमध्ये मला बक्षीसं मिळत होती. सुरूवातीला अर्थातच वक्तृत्व स्पर्धेमध्ये. शाळेतली एक आठवण अजूनही माझ्या लक्षात चांगली राहिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर केले होते. माझा नंबर ही आला होता, कितवा ते आत्ता आठवत नाही. पण बक्षीस समारंभ सुरू झाल्यावर माझे नाव पुकारले गेले. मी खाली ग्राउंड वर बसले होते. मी उठून उभी राहिले आणि मैत्रिणी बरोबर स्टेज कडे जाणार तोच बक्षीस देणारे प्रमुख पाहुणे मला म्हणाले, थांब तू बोलू नको मीच खाली येतो. आणि आश्चर्य म्हणजे स्टेजवरून प्रमुख पाहुणे माझ्यासाठी खाली आले आणि माझी पाठ थोपटून त्यांनी मला बक्षीस दिले. त्यांच्या या मोठेपणाची अजूनही मला आठवण येते.

अशीच एक कॉलेजमधली आठवण. त्यावेळी गॅदरिंग मध्ये माझे नृत्य ठरलेलेच असायचे. एफ वाय ला असताना बक्षीस वितरणासाठी माननीय शिवाजीराव भोसले यांना कॉलेजमध्ये बोलावले होते. त्यावेळी मला तीन_चार बक्षिसे मिळाली होती. माझे ठरलेले वक्तृत्व, कथाकथन, कॉलेजमध्ये अंताक्षरी स्पर्धा होती. आमच्या ग्रुपचे प्रमुख मीच होते. त्यामध्ये वेगवेगळे राऊंड झाले. आमच्या ग्रुप चा पहिला नंबर आला. शिवाय मला प्रश्नमंजुषा मध्ये बक्षीस मिळाले होते. स्टेजवर घेण्यासाठी मी तीन-चार दा गेले होते. गॅदरिंग असल्यामुळे साडी नेसली होते. त्यावेळी शिवाजीराव भोसले सरांनी माझे कौतुक केले आणी म्हणाले,”किती बक्षीस मिळवलीस ग”. अजूनही त्यांचा तो आवाज, कौतुकाचे बोल माझ्या कानात आहेत. त्यांनी दिलेली शाबासकी माझ्या डोळ्यांना ना न दिसता ही मला जाणवली. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये अर्धा भाग ते माझ्यावरच बोलले. माझ्यावर एक छोटीशी कविता सुद्धा केली आणि ती म्हणूनही दाखवली. मला त्याचे शब्द आठवत नाहीत. पण अर्थ आठवतो आहे. परमेश्वर मला म्हणतोय, तुझे डोळे माझ्याकडे आहेत, पण माझं लक्ष तुझ्याकडे आहे. हा मोठा आशय अजूनही माझ्या लक्षात आहे. त्याचा गर्भितार्थ मी कधीच विसरणार नाही.

२००७ च्या एप्रिल मध्ये, रंगशारदा मिरज तिथे मुंबईच्या लोकांनी योगाचे शिबिर घेतले होते. केला मी जात होते. शेवटच्या दिवशी गप्पांमध्ये मी नृत्य शिकते, विशारदची परीक्षा देणार आहे, असं त्यांना सांगितल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. जुलैमध्ये त्यांचा मला फोन आला. गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईला एका कार्यक्रमात नाच करशील का असे विचारले. येण्या-जाण्याचा खर्च आम्ही करतो. बाबांनी होकार दिला. खरंतर माझ्या मनात शंका होती. मुंबईच्या स्टेजवर माझे कसं होईल ही भिती होती, माझाच मला अंदाज नव्हता. पण काय सांग त्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. नाचाचे पूर्ण गाणे संपेपर्यंत टाळ्या थांबल्या नाहीत. माझा मेकअप, आत्मविश्वास यामुळे त्यांना मी अंध आहे, हे पटतच नव्हतं. कितीतरी बायकांनी नंतर माझा हात हातात घेऊन, गालावरून हात फिरवून, अगदी डोळ्यांना हात लावून खात्री करून घेतली. त्यावेळी मुंबई गाजवली. कितीतरी संस्थांमार्फत मला बक्षीस मिळाली.

आणखी एक अनुभव सांगते. सांगलीमध्ये अपंग सेवा केंद्रातर्फे माझा एक कार्यक्रम झाला. तो पाहायला वालचंद कॉलेजचे रिटायर्ड जोगळेकर सर आले होते. त्यावेळी ते 80 वर्षांचे असतील. माझा नाच झाल्यावर मुद्दाम मला भेटून ते म्हणाले,”छान नृत्य केलेस.अग, आम्हाला रस्त्यावरूनही नीट चालता येत नाही.”त्यांचं हे कौतुक ऐकून उत्साह वाढला आणि आपण काही कमी नाही हे जाणवले. नुसतं सहानुभूती म्हणून ते बोलत नव्हते, हे त्यांच्या शब्दातून कळले.

या माझ्या नृत्यासाठी माझ्या मैत्रिणी, शिक्षिका आणि माझी आई या सगळ्यांचे खूपच सहकार्य आणि मदत मिळत होती. माझी ड्रेपरी दागिने घालणे , मेकअप करणे यासाठी त्यांची मदत मोलाची होती. स्टेजवर जाऊन उभ करायलाही कोणी तरी मैत्रीण लागायची. नृत्याचे फोटो आले की त्याच मला वर्णन करून सांगायच्या. असे ते शाळा कॉलेजचे रम्य दिवस होते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन जीव वाचले ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ दोन जीव वाचले ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

अलिबाग, रायगड जिल्ह्यातील, तालुक्याचे गाव! अलिबाग पासून सुमारे तीन मैलावर थळ हे लहानसे खेडं!आगर भागात ब्राम्ह्णाची पन्नास, शंभर घरे, थळ बाजाराकडे कोळी, आगरी, यांची वस्ती! आता आर. सी. एफ.  या रासायनिक खत प्रकल्पामुळे, थळ–वायशेत हे जोडनाव आता प्रसिद्ध झाले.

आशा या गावात, मोरुकाका सुंकले एक नामदार व्यक्ती होत्या.  शेतीवाडी, असलेले, गणपतीकार, आयुर्वेदिक वनस्पती, औषधींची जाण असणारे गावच्या जत्रेत, हलवाई होऊन दुकान मांडणारे, थोडीफार भिक्षुकी करणारे, असे, बहुआयामी व्यक्तीमत्व! गोरेपान, उंच, धोतर आणि वर लांब बाह्याचा पांढरा शर्ट, डोक्याला टक्कल, कानात बिगबाळी अशी त्यांची मूर्ती दिसे. ओटीवर त्यांचेकडे अनेकांची दिवसभर ये जा असे.

त्यावेळी तो चैत्र महिना होता. घरात, आगोटीची (पावसाळ्या पूर्वीची) कामे चालू होती. त्यांची लाडकी लेक सुभद्रा, सुभाताई, पहिलटकरीण, बाळंतपणाला आली होती.

आगारात असलेली, त्यांची शेतीवाडी संपन्नतेत होती. अलीकडे देशाला स्वातंत्र मिळाल्यावर, काही झळाही त्या घराला बसल्या होत्या. त्यात दहा बारा मुले, गाई–गुरे, शेती-वाडी करत, कालक्रमणा चालु होती.

सुभाताई, त्यांची लेक,  गोरीपान, धारदार नाक, लांब केस, बांधेसूद, देखणी होती. बायला काही कमी पडू द्यायचे नाही असे त्या प्रेमळ पित्याला वाटे. आता तिचे दिवस भरत आले होते. त्या दिवशी दुपारपासून पोह्याचे पापड करायला शेजारपाजारच्या बायका आल्या होत्या. उखळात डांगर कुटायला, कांडपीणींची लगबग चालु होती. आणखीन काहीजणी भात कांडत होत्या.

सुभाताई पापड लाटायला बसली होती. हळूहळू, संध्याकाळ होऊ लागल्याने, कामे आवरती घ्यायला सुरवात झाली. इतक्यात, सुभाताई आपल्या पोटाचा भार सावरत उठली. हातात दोर बांधलेला पोहरा आणि काखेत कळशी घेऊन, “मी पलीकडल्या, वाडीतले गोड ढोऱ्याचे पाणी घेऊन येते”!, असे म्हणत,  ती चालायला लागली. सगळ्या म्हणाल्या, “अग, सुभाताई, तू पोटुशी कशाला जातेस इतक्या तिन्हीसांजा. ”पण ती ते ऐकायला ती थांबलीच नाही. आणि ती लांब अर्धाकीलोमीटर असलेल्या वाडीत गेली सुध्दा. तेथे पोहचेपर्यंत तशा तिन्हीसांजेच्या सावल्या पडू लागल्याच होत्या. ताईंने पोहरा विहिरीत सोडला त्या शांत वातावरणात, बुडूबुडू आवाज येत पोहरा आडवा होऊन पाणी भरून आत गेला. मग दोर ओढत ताईने कळशी भरून घेतली. पोहरा व दोरगुंडाळून घेतले. कळशी

घ्यायला वाकली, तर गर्भभाराने जड झालेला देह सावरता सावरता, तिचा पाय घसरला. ती त्या ढोऱ्यात घरंगळत गेली तिलाच कळले नाही. दोन गटांगळया खाल्ल्यावर तिच्या लक्षात आलं पोटाकडे हाताने पाणी ओढले की आपण तरंगू शकू. तिने प्रयत्न केला आणि ती काठाला आली. तिने काठाला वरून आलेल्या वेलींचा ताणा घट्ट पकडला. ती वर येण्याचा प्रयत्न करू लागली. एवढ्यात, वाळलेल्या झाडाच्या पाल्याचा चुरूचुरू आवाज ऐकू आला. कोणीतरी येत आहे ह्याची चाहूल लागली. तिने हाकारले, “कोण आहे? इकडे या”! मी या विहिरीत पडले आहे!” आवाज ऐकून तो गुरे चरायला घेऊन गेलेला कातकऱ्याचा मुलगा विहिरीत डोकावला. त्याने तिला हाताला धरुन वर काढले. विहिरी बाहेर पडलेली सुभा, जराही घाबरली नाही, तिने धीर एकवटून आपली कळशी कंबरेवर घेतली. पोहरा उचलला आणी निघाली घराच्या दिशेने! तो मुलगा आवाक होत पहात राहिला, व तिच्या मागे चालू लागला.

घर जवळ आलं, पायरीवरून अलगद् चढत, ताईने कळशी उतरवली. इतक्यात घरातले सर्व बाहेर पडवीत आले. आगो, ताई, ”हे काय? एवढी कशी भिजलीस!”

कातकऱ्याच्या मुलाने सर्व हकिकत सांगितली. सर्वजण स्तब्द होऊन पाहात राहिले. आण्णा, म्हणाले, ”अग, बायो, काही झाले असते तर केवढा आपेश आला असता आमच्यावर!”, पण, देवाचीच कृपा दोन जीव वाचले.”

ह्या घटनेनंतर काही प्रश्न अनुत्तरीत राहिले. ताईला कोणीच कसे अडवले नाही. की  कामाच्या धांदलीत तितकेसे लक्षात आले नाही.

 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नात्यांचे मोकळेपण ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ नात्यांचे मोकळेपण ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

एक लेख वाचून वाचकाने फोन केला, “लेख आवडला पण ” गढवापुढे गायली गीता… असं मुलगा आईला म्हणतो ते खटकले.”

“आई मुलात मोकळेपणा असल्यावर म्हणू शकतो. त्याने म्हण वापरली. आईला थोडेच गाढव म्हटला?”

लिहिताना असा विचार मनात येत नाही, लोक कसा विचार करतील वगैरे… कल्पनेतली पात्रे घेऊन लेखन करताना कधी कधी एकतर्फी पना येतो. मग वाचक असे कान धरतात. अशा वाचकांचा खूप आदर वाटतो. प्रत्येकाने जाब विचारायलाच हवा. प्रश्न पडायलाच हवेत.

आई मुलाचे नाते वात्सल्यचे असते. एकमेकांचा आदर प्रेम असते म्हणून मुलाने काही सांगू नये का? मुलगा का नाही आईला नव्या विचारांची शिकवण देऊ शकत?

आपल्या शेतकरी, कुनब्यांच्या घरी शिक्षणाची गंगा आता कुठे वीसतीस वर्षांत आलीय. शिकलेली मुलं सांगतात आईला  वैज्ञानिक गोष्टी.  अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, सण, व्रते यांच्यातील फोलपणा त्यांना समजलेला असतो. अशिक्षित, अर्धशिक्षित आईला तो सांगू शकतो. नव्हे सांगतातच!!

शिकले तरी शिक्षणात देव, धर्म, अंधश्रद्धा याबद्दल कुठे काय शिकवतात. मुळात विचार करायला, प्रश्न उपस्थित करायला शिकवत नाहीत. प्रश्न विचारणारा उद्धट ठरतो. आज्ञा पालन करणे हाच सद्गुण ठरतो. नवे काही शोधून काढणाराला विरोध सहन करावा लागतो.

बाईच्या बुद्धीवर सण, देव, धर्म, व्रते यांची एवढी झापडे बांधली आहेत की, या जगात वेगळे काही असू शकते यावरच ती विश्वास ठेवत नाही. ज्या देवीची ती पूजा करते त्या शक्तिशाली देवीचा आपण अंश आहोत हे वैज्ञानिक सत्य तिला कुणी सांगितले नसते, शिकवलेले नसते. पूजा, कर्मकांडे करत राहणे म्हणजेच खरी भारतीय नारी असणे असं शिकलेल्या बाईला ही वाटते.

साधं कुंकवाचा करंडा सांडला तरी तिला सतत अशुभाची चुटपुट काही दिवस लागून राहते. हातात बांगडी नसणे तिला अशुभ वाटते. केस कपण्याबद्दल तर इतक्या टोकाच्या अंधश्रद्धा आहेत, याची शहरी लोक कल्पनाही करू शकणार नाहीत. आताच्या काळात ही.

‘केस कापल्याने तिच्या नवऱ्याचे आयुष्य कमी होते.’

केसांचा कितीही त्रास झाला, जटा आल्या तरी बाई केसाला कात्री लावत नाही.

कुलाचार कुलधर्म या नावाखाली तर बाई वर्षभर पिळवटून जाते. पूर्वीसारखे घर भरलेले नसते. एक किंवा दोन मुले. ती ही शहरात. मग एकट्याने सगळे रेटायचे. भीती पोटी. आपली पोरं असतील तिथे सुखरूप ठेव म्हणून देवापुढे भाकणुक करायची. सणाला नाट लावायचा नाही. अशावेळी आईला होणारा त्रास पाहून कुठलाही शहाणा समंजस मुलगा सात्विक संतापाने , पोटतिडकीने सागणारच की. मग सांगताना आईनेच शिकवलेल्या म्हणी ओठावर येणारच की….

हेच तर जिव्हाळ्याचे नाते असते. आपल्या लोकांना शहाणे करून सोडण्याची कळकळ असते. आता हे बोलताना वडील असते तर भाषा थोडी वेगळी असली. पण आई ही जन्मताच मैत्रीण असते. बाळ तिच्याशी सगळे मोकळेपणाने बोलते. सांगते. मनात काही ठेवत नाही. मैत्री अशीच असते ना…

आईसारखी मैत्रीण कुठे असणार? आईला तरी मुलासारखा विश्वासाचं मित्र कुठे मिळणार?

आईने शिकवलेल्या पायावरच असे प्रश्न निर्माण होतात. गणपतीला आणायची पत्री आता कुठे मिळते का?  साध्या दुर्वा मिळणे मुश्कील झाले आहे. पेपरात येते या पत्री औषधी असतात म्हणून वाहा. पण त्या बाईची किती त्रेधतिरपीट उडत असेल. कारण तिलाच पुण्य मिळवायचं असते पोरा बाळांसाठी….

असे महिन्यातून एक दोन तरी सन व्रते असतात. हे करा म्हणजे ते होईल. असे करा म्हणजे तसे होईल…

एका अमेरिकेतल्या माणसाचा व्हिडिओ आला. सगळे सण कसे आम्ही मंत्र पाठणात करतो. वगैरे…

त्या काहण्यात काय असते, शंकर पार्वतीला सांगतो, ” हे व्रत खूप श्रेष्ठ आहे. जसे चार वरणात ब्राम्हण श्रेष्ठ तसे सगळ्या व्रतात हे व्रत श्रेष्ठ आहे. हे व्रत करणाराला अखंड सौभाग्य प्राप्त होते. पण जे करत नाहीत त्याला वैधव्य, दारिद्य्र येते.”

हे ऐकूनच डोके सटकले. अज्ञानी असताना हे सगळे मी करत होते पण अताही अशा कहाण्या ऐकूण व्रते करायची. तेही अमेरिकेत… व्वा व्वा… तिथे सौख्य मिळवायचे. आम्ही भारतीय परंपरा सांभाळतो याचा झेंडा मिरवायचा.

कशाने अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि कशाने दारिद्र्य येते हे यश प्राप्तीची पुस्तके वाचून कळू येईल. पण परंपरा, संस्कृती याची नशाच भारतीयांना अतोनात आहे. वैज्ञानिक साधने वापरून परंपरा सांभाळतात. पण अशा परंपरा सांभाळण्यासाठी आपण काही साधने निर्माण करावी असं काही भारतीयांना वाटत नाही. पत्री औषधी आहेत ना तर का नाही करत  डोंगर, टेकड्यांवर याची लागवड???

सुबाभूळ, गुलमोहर, सप्तपर्णी, असे झटपट वाढणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करायचे आणि चिमण्या सारख्या पाखरांना दाहीदिशा वनवास आणायचा. संस्कृती, परंपरेचा डांगोरा पिटत रह्याचे.

थोडे विषयांतर झाले. मुलाचे आणि आईचे नाते हा विषय होता.

जात, धरमदेव, परंपरा या मानवाने निर्माण केल्या आहेत. त्याची भीती बाळगू नये असं मुलगा आईला सांगू शकतो. पण आईला लगेच पटत नाही. तिची मानसिकता (त्यालाच म्हणतात निष्ठा) एवढी लवचिक नसते. वाद घालतो मुलगा. आधुनिक विचारांच्या मुलांची घुसमट होते. सण व्रते हे कसे थोतांड आहे. हे सांगताना नवीन पिढीची दमछाक होते. मग मुलगा म्हणतो, ” गढवापुढें वाचली गीता….”

मी माझ्या  लेकसुनेला टिकली लावण्याबाबत सक्ती करत नाही. तिने मंगल सूत्र घातले की नाही याची चौकशी करत नाही. शिकल्या सवरल्या पोरींना कशाला अशी बंधने घालायची. कितीही शिकले , नोकरी केली, बिझनेस केला तरी त्यांना चूल मूल सुटत नाही. आणखी ही जोखडं त्यांच्या खांद्यावर का द्यावीत?

मेल्यावर आमचे म्हाळ वगैरे घालू नयेत असे मी  मुलाला स्पष्ट सांगणार आहे. तेवढे मैत्रीचे नाते आहे आमच्यात. अशा गोष्टींवर वाद घालतो आम्ही.

 

© सौ. सावित्री जगदाळे

१८/९/१८

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बस तुम कभी रुकना मत☆ सुश्री संध्या बेडेकर

☆ मनमंजुषेतून ☆ बस तुम कभी रुकना मत☆ सुश्री संध्या बेडेकर ☆ 

आज आजी उदास आहेत.•••• हे आजोबांच्या लक्षात आल .••काय झालं ग??? आजोबांनी विचारल .•• आजी म्हणाल्या•• अहो, आता थकवा येतो .••आधी सारखं राहिलं नाही.•• आता गडबड ,तडतड सहन होत नाही.•• कुठे जायचं  म्हंटल तर जास्त चालवत नाही. •••अॉटो मधे चढताना त्रास होतो .••• कधी भाजीत  मीठ टाकायला विसरते तर कधी जास्त असत.कशाकरीता हे एवढं आयुष्य देवाने दिल आहे. ••माहित नाही .••

आजोबा म्हणाले,••• देवाचा हिशोब मला माहित नाही.••आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. ••त्याच्या planning मधे  एक क्षणाचाही बदल करणे. आपल्या हातात नाही.•• जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे?? त्याचा विचार करावा.•• अग ,वयानुसार हे सर्व होणारच.••  आधीचे दिवस आठव ना•• किती काम करायची .पूर्ण घर तू खूप छान सांभाळले••. मला कशाची काळजी नव्हतीच कधी .•••  आता  वयामाना  प्रमाणे हे सर्व होणारच  पण त्यातुनच मार्ग काढायचा असतो .•••आलेला दिवस आनंदात काढणे ••आपल्या हातात आहे••. जिवनाच्या प्रत्त्येक फेज मधे थोडे शारिरीक बदल होतातच .•••थोडे आपल्या ला करायचे असतात. ••आपली ‘ lifestyle’reorganize करायची ,••म्हणजे ,आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते •••.कळल का ?

आजोबा पूढे म्हणाले •••• चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ  या  आपण. छान ती नारंगी साडी नीस. •• बाहेरच जेवू ••  .  आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. ••व  जवळच असलेल्या  बसस्टोप वर जाऊन बसले.•• दोघे बराच  वेळ तेथेच  गप्पा मारत बसले . ••आजोबा आजी ना म्हणाले•• अगं, पाय दुखत असतील  तर ,मांडी घालून बस छान ••. . नंतर ,’गणेश भेळ ‘खाऊनच घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला  शोभेसे  outing आज होते दोघांचे .••• आजींची उदासी मात्र कुठे पळाली?? हे त्यांना कळलेच नाही .•• अगदी ‘refresh’ झाल्या . ••आज आजोबांनी आजीसाहेब  साठी  on line  ‘Mobile  stand ‘ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .•••

आज कुलकर्णी आजींनी तर आजोबांना सकाळीच  सांगुन  टाकलं ,की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही .••काही तरी चमचमीत खायला  घेऊन या .••• आजोबांनी आनंदाने समोसे ,ढोकळा , खरवस   दोन पूरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली . ••.ते बघून आजी म्हणाल्याच अहो, एवढ आणलत  ?? अग आज आणि उद्या मिळुन संपेल की .•••  आज कुलकर्णी आजीं आजोबांनी पार्टी छान  झाली. ••••

कोणी तरी खरच  खूप छान म्हंटल आहे •••

“खुशियां बहुत सस्ती है इस दुनिया में ,

हम ही ढुंढतें फिरते हैं, उसे महँगी दुकानों में”।”

देशपांडे आजोबा बऱ्याच वेळा पासुन एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ••ते पाहून अजय म्हणाला , द्या आजोबा मी उघडून देतो. •••तेंव्हा आजोबा म्हणाले••• अरे ,नको मी उघडतो. ••आता आम्हाला प्रत्त्येक  कामात वेळ लागतोच . हे natural आहे . ••पण काही हरकत नाही. जो पर्यंत करू शकतो तोपर्यंत काम करायचे  .हे मी ठरवलं आहे .•••  रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी  चिरणे   ,washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे‌, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशी बरीच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला पण मदत होते. व माझा वेळ जातो . Something new and different .I am enjoying it. And I feel good .

तो तुमचा actor आहे ना, अक्षय  कुमार त्याने एका advertisement मधे म्हंटले आहे

“बस ,तुम कभी  रुकना मत”

अक्षय कुमार ने  म्हंटलेले हे वाक्य  .मला  खूप आवडलं.

एक  छोटंसं वाक्य.••  मोजक्या शब्दात ••.

पण किती अर्थपूर्ण .••जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .•••एक छोटासा उपदेश जिवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची  स्फुर्ती  देतो..••  विचारांत परिवर्तन  आणत. ••••

तो म्हणतो •••••• कधी थांबू नका,•• चालत रहा. •••• म्हणजेच  ‘active’ रहा.  ‘मनाने आणि शरीराने .’

वाहत पाणी बघताना,  एक वेगळीच उर्जा  निर्माण होते .’ धारा ‘ म्हणजे पूढे पूढे जाणारी, वाहणारी .•••• तेच  जमलेल  पाणी म्हणजे अनेक रोगांचा ऊदगम. ••म्हणून    पाण्याला जमू देत नाही आपण.•••  जमलेल्या पाण्यात मच्छर कीडे पडतात•• .पाण्याला  वास येतो डेंग्यू पसरतो.•••

आयुष्याचे पण तसेच आहे. •••शक्य तेवढ active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते •••.जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल  , ते करत रहाणे गरजेचे आहे. •••••

” चलती का नाम ही तो  जिंदगी है “।

आपल्या पीढीने तरूणपणी  एकमेकांचे हात हातात  घेतले नाही  /नसतील  .•••पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजी ने ,विश्वासाने , हातात घेणे  ही काळाची गरज आहे . ••••

“कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हे•••!

इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता  है  •••!

बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है”•••!!!

“ना  थके  कभी  पैर

ना कभी हिम्मत हारी है ।

जज्बा  है परिवर्तन का जिंदगी में ,

इसलिये सफर जारी  है ।

“प्रत्त्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा .”

“बस , तुम कभी  रुकना मत “।

 

(सहजच मनातल शब्दांत )

© सुश्री संध्या बेडेकर

भ्रमणध्वनी:- 7507340231

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print