मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं की आज तुझी पुण्यतिथी. 

बायकोला सांगितलं, “अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.”

मग स्वतःलाच विचारलं, “ सावित्रीबाईंची पुण्यतिथी ? कसं शक्य आहे ? अगं, माझ्या गावातली, शहरातली, 

देशातली प्रत्येक मुलगी जेव्हा शिक्षण घेऊन एखाद्या मोठ्या पदावर जाते, शिक्षणाच्या भरोशावर एखादा सन्मान प्राप्त करते, तेव्हा – तेव्हा तूच तर जन्माला आलेली असतेस. यंदा माझी पुतणी पदवी घेईल, म्हणजे यंदा तू माझ्या घरातही जन्माला येणार आहेस.  सुरुवातीला प्रश्न पडला की तुला काय म्हणावं ? बाई म्हणावं की आई म्हणावं ? आमच्याकडे गावात मोठ्या बहिणीला बाई म्हणतात. मग विचार केला, माझी आई शिकलेली, थोरली बहीण शिकलेली, मावशी शिकलेली, माझी पुतणी शिकतेय –म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात माझ्याभोवती आहेस . 

सरकारचं घोषवाक्य आहे ‘ मुलगी शिकली, प्रगती झाली !’– 

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली ‘.

आजही वाटतं तुला भारतरत्न मिळायला हवं होतं. मग लक्षात येतं की या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत. जेव्हा कुठल्या महिलेला भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू ज्योतिबांना सांगत असशील ,  ‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला भारतरत्न मिळालं ‘. 

तुझ्याबद्दलचा मुळातच असलेला आदर सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे. 

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार सहन करीत तू तुझं काम करीत राहिलीस, म्हणजे आतून तू किती कणखर असली पाहिजेस–ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी. तसूभरही ढळली नाही . आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ. 

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने काळाच्या मागे जावं. लहान बनून तुमच्या घरात यावं.  ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्यात. तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत. 

मला एक प्रश्न नेहमी पडतो–’आपण करतो आहोत ते काम क्रांतिकारी आहे याची तुला जराशीही कल्पना नव्हती का ? कारण नखभर ही एटीट्यूड नव्हता तुझ्यामध्ये– नखभर सोडा, अणू – रेणू इतका सूक्ष्म पण नाही . 

हे कसं साध्य करायचीस ? नाहीतर आम्ही बघ– वितभर करतो आणि हात भर, त्याचाही  हल्ला, कल्ला करत ती दुखणी सांगत, ते यश सांगत गावभर हिंडतो. 

कदाचित म्हणूनच तू त्यावेळच्या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी म्हणून जी अक्षरं पाटीवर गिरवलीत, ती काळाच्या पाठीवर गिरवली गेलीत. 

आणि या भारतात जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री शिक्षित होत राहील,  तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील 

— पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील. 

लेखक – गजानन घोंगडे

9823087650

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(समोर पिंपळाचा पार होता . त्याभोवती असलेल्या ओट्यावर बसून घरूनच आणलेला डबा अनेक प्रवाशी खायचे. ) 

इथून पुढे —

बस थांबली की हॉटेलचा हलवाई कढई चा जाळ वाढवायचा तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी तो पाण्याचे छिटे मारायचा त्याचा चर्र चर्र आवाज यायचा, तेल गरम झाले की मग भजी तळली जायची, त्याचा गंध परिसरात पसरायचा, बरेच प्रवाशी गरम भजी घ्यायचे हॉटेलात टेबल वर बसून घरची शिदोरी खायचे. मालक कुणालाही विरोध करायचे नाही उलट पाणी पाठवायचे कधी कांदे मिरची द्यायचे. आई मला कधी भजी घेऊन द्यायची. तो कडकं मिशी वाला  मालक मला आठवतो लहान मुले असली की जिलबी चा एखादा आडा द्यायचा. मला मात्र दोन आडे द्यायचा. त्यामुळे तो मला अधिक आवडायचा. खाणे पिणे आटोपले की ड्रायव्हर ची वाट पाहात सर्व प्रवासी चर्चेत रंगायचे. एकमेकांची चौकशी केली जायची अनेकाचे नातेवाईक गावचेनिघायचे, जुन्या ओळख्या असल्याप्रमाणे लोक आत्मीयतेने  चर्चेत रंगायचे. मदतीची भावना एवढी तीव्र की अनेकांचे अवजड सामान उतरविण्यासाठी लोक बसवर चढायचे. बस लागणाऱ्या लोकांचे कान झापायचे त्यांना पाणी द्यायचे. एखादा प्रवाशी हळूच एखादी गोळी द्यायचा. कुणी आजीबाई पिशवीतून लवंग विलायची काढून द्यायची. तेव्हड्यात कंडक्टर काका जोरजोराने घंटी वाजवायचे. सर्व प्रवाशी धावपळ करीत चढले की ड्रायव्हर काका ला कुणीतरी तंबाखू द्यायचे नी ते चढले की दोनदा  टन टन वाजले की बस निघायची. आता बस ची गती थोडी वाढायची कारण पुढे घाट लागायचा व हळूहळू बस चालवावी लागायची त्यामुळे ड्रायव्हर काका गती वाढवायचे,मला मात्र घाट आवडायचा,रस्त्याची वळणे,तीव्र चढ़ाव उतार कुठे समोरुन येनारी वाहने त्याना साइड देतानाची घसाघिस सर्व मजेशिर वाटायाचे. सर्वात आवडणारी बाब म्हणजे पळसाची केसरी फुले, नी बहाव्याची पिवळी फुले त्यांनी बहरलेली झाडे, मध्येच शेळ्या मेंढ्यांच्या कळप हाकनारे आदिवासी, लभान समाजाच्या लोकांचे तांडे दिसायचे. त्यांच्या स्त्रियांचे रंगबिरंगी पेहराव हातातील पांढऱ्या बांगड्या नी कानातील लोंबकळत असलेली कर्णफुले सर्व पाहत रहावेसे वाटायाचे. सर्वात लक्षवेधक असायचे ते डोंगरावरून पडणारे धबधबे नी पाण्याचे वाहणारे ओहोळ. घाट संपला की एका खेड्यात बस थांबायची दुधाच्या खव्यासाठी हे आदिवासी गाव प्रसिद्ध होते तिथूनच शहराला खव्याचा पुरवठा व्हायचा,खव्यामुळे तिथे गुलाबजामुन ही मिठाई विकणारे हॉटेल होते . लोक मनसोक्त आस्वाद घ्यायचे सोबत खवा व गुलाब जामुन पार्सल घ्यायचे. आई मामासाठी हमखास खवा घ्यायची मला मात्र गुलाब जामून खायला मिळायचे. . . .

आणखी एक महत्वाचे म्हणजे बस थांबली की काही आदिवासी स्त्रिया यायच्या त्यांच्या जवळ विकण्यासाठी  सीताफळे,आवळे,जांभळं, टेंबर, खीरण्या,येरोण्या,बोर,कवठ असा रानमेवा असायचा लोक कमी पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न करायचे मात्र आई त्यांना योग्य किंमत द्यायची,म्हणायची रानावनात फिरून आणतात बिचाऱ्या दोन पैसे मिळालेच पाहिजे त्यांना. मी मात्र त्या स्त्रियांच्या अंगावर गोंदलेली चित्रे न्याहाळीत असो.

 स्पीड बेकरच्या धक्क्याने माझी तंद्री तुटली समोर टोल नाका होता यांत्रिक सुविधेने आपोआप त्याचे पैसे देऊन कार समोर निघाली.

 बस आता दहा मिनिटात माझे शहर येणार होते. नवीन महामार्गांने प्रवास सुकर झाला होता. वेळ वाचला होता. पण लहान असतानाच आलेला तो एकही अनुभव आला नाही. सिमेंटचे महामार्ग बनले काळाची गरज म्हणून पण  अनेक गोष्टींना पारखे करून. मनात विचार घोळू लागले या महामार्गांमुळे खरंच बरेच मिळविले की बरेच हरपले?

— समाप्त —

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गवसले की हरवले – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ गवसले की हरवले – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

नुकत्याच निर्माण झालेल्या चौपदरी महामार्गावरून सदाशिव ड्रायव्हर शंभर, एकशे वीसच्या गतीने कार चालवत होता. बाजूच्या सिटवर बसून मी दूरवर न्याहाळीत होतो. गुळगुळीत सिमेंटचा चौपदरी महामार्ग अगदी सरळ, नजर जावी तोपर्यंत वळण नसलेला ,दोन्ही बाजूस लोखंडी मजबूत कठडे, काठावर पांढरे पेंटचे पट्टे. मध्येच उंच पूल, नजर वळवली तर गावाला बाजूला टाकून मार्ग बनविला गेल्याचे लक्षात आले. अश्या कितीतरी छोट्या गावांना बाय पास करून मार्ग बनविण्यात आला होता . सदाशिवच्या आवाजाने मी भानावर आलो.

“मस्त बनलाय सर रस्ता. काही चिंता नाही समोरून येणाऱ्या वाहनांची, फक्त चालवीत रहायचे बस, तीन तासांत गावाजवळ”.

सदाशिवकडे माझं लक्षच नव्हतं. माझं मन भूतकाळात केव्हाच गेलं होतं .मामाच्या गावाला याच मार्गाने आईसोबत जाण्याचे ते दिवस आठवले. सी.पी. सिख कंपनीच्या बसने सकाळी सातला निघायचे नि दुपारी केव्हातरी मामाच्या गावी पोहचायचे. एकेरी वाहतुकीचा डांबरी रस्ता, लहान मोठे अनेक रपटेवजा पूल, दुतर्फा हिरवीकंच झाडे, त्यात तीस चाळीसच्या गतीने धावणारी, नि प्रत्येक गावाला थांबणारी ती बस आजही डोळ्यासमोर उभी राहते.  खिडकी- -जवळ बसून बाहेरचे दृश्य पाहणे हा माझा आवडीचा छंद होता. पावसाळ्याचे दिवस असले की शेताकडे जाणाऱ्या बायांचे थवे दिसायचे. प्रत्येकीच्या हातात विळा असायचा .कडेवर मूल ,डोक्यावर शिदोरीची टोपली- जलद गतीने जाणाऱ्या बायांकडे पाहून मला कुतूहल वाटायचे.त्यांच्यामागे एखादी बैलगाडी, त्यात भरलेले शेतीपयोगी सामान, ढवळ्या पवळ्यांची  जोडी , त्यांना हाकणारा गाडीवान पाहून आम्हाला चांदोबा मासिकातील चित्रे आठवायची .मध्येच बस अचानक थांबायची नि ड्रायव्हर जोरजोराने पोंगा वाजवायचा. नकळत नजर समोर जायची. गायी म्हशींचा कळप रस्त्यावरून चाललेला दिसायचा. काही लहान वासरे आपल्या आईच्यामागे असायची. एखादी धिप्पाड म्हैस हळूहळू डौलात चालायची, जणू काही चाळीतला दादा चाळीत फिरतोय असे वाटायचे .इतक्यात गुराखी धावत यायचा. हातातील काठीने गुरांना बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा. त्याची धावपळ व तोंडातून काढलेले आवाज ऐकून खूप आनंद वाटायचा. पुढे निघालो की बसला गती घेतांना जो घुरर घुर …..आवाज यायचा त्याची नक्कल आम्ही खेळताना करायचो. 

पुढे एखादे खेडे लागायचे. बाजूला एखादा तलाव दिसायचा. तलावात असलेली कमळाची फुले मन मोहून घ्यायची. काठावर कपडे धुणाऱ्या बाया, नि बैल धुणारे, त्यांना पाणी पाजणारे शेतकरी दिसायचे. तलावात एखादी होडी दिसायची. त्यावर बसलेला कोळी आपले जाळे फेकून मासे पकडीत असायचा. क्षणभर दिसणारी ही दृश्ये. पण मनपटलावर बिंबवली जायची. दिवाळीला मामाकडे जाताना ड्रायव्हर इथे गाडी थांबवायचा .लगेच अनेक स्त्रिया बसला गराडा घालायच्या. त्यांच्या हातात शिंगाड्यानी भरलेल्या परड्या असायच्या. तेव्हा पंचवीस पैशांना वीस शिंगाडे मिळायचे. दोन चार शिंगाडे जास्त मिळावे म्हणून घासाघीस चालायची. आईने घेऊन दिलेले शिंगाडे खाताना चालत्या गाडीतून  टरफल बाहेर फेकण्याची मजा वाटायची. मार्गात रेल्वेचे क्रॉसिंग यायचे. फाटक उघडे असावे असे लोक बोलायचे. पण मला मात्र ते बंद असले की आनंद वाटायचा. काही प्रवासी उतरून लघुशंका उरकून घ्यायचे नि फाटकाजवळ जाऊन उभे राहायचे. मला मात्र आई बसमधूनच पहा म्हणायची. दुरून आगगाडीची शिटी वाजली की तिकडे बघायचे. धडधडत गाडी यायची. त्यातही कोळशाचे इंजिन असले की धडधड आवाज यायचा. गाडी प्रवासी असली की गाडीतील काही प्रवाशी हात हलवायचे. खूप आनंद वाटायचा.

—क्रमशः…

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंढरीच्या वारी निमित्ताने… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

??

☆ पंढरीच्या वारी निमित्ताने… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

काय असेल विठोबाकडे ? इतकी का धाव या माऊलीच्या भेटीसाठी ? पाडुरंग भेटल्यावर समाधानी का होतात हे भक्त ? ही भक्ती  खरी असते का ?

वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत का वाटते ? असे अनेक प्रश्न लहानपणी पडायचे.. आई म्हणायची 

सखू निघाली पंढरपूरा

येशीपासूनी आली घरा !

घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखं दुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तल्लीन होतात.

” पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय ! “

हा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मिणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्यासारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.

माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दुसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडिलांना संकष्टी सुद्धा करू द्यायची नाही. फक्त एकादशी करायची. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होतं, पण आम्हीही वेगवेगळ्या पदार्थांच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरे केले जायचे. आईने सही करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. पण सगळे अभंग तोंडपाठ. तिचं बालपण कर्नाटकात गेलेलं. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडिओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थित करेल हा तिचा विश्वास होता. वडील नोकरीनिमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ।

तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ।।

तुकोबांच्या अभंगात  ” आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे ” होऊन जगायची…

तुकोबांच्या अभंगांनी तिला नवे विचार मिळाले. तिने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला दिसले नाहीत. जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला तोच आपल्याला बळ देईल असे तिला वाटायचे..

सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी 

देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी –

हे तिचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे, ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र तिला माहित नव्हतं, पण जगणं माहित होतं. सगळी सुखंदुःखं तुळशीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती. याचं मला राहून राहून आज आश्चर्य वाटतं. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिली  संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली कामंसुद्धा ती न कंटाळता आनंदाने करायची. ” कांदा, मुळा,भाजी अवघी विठाई माझी.” म्हणत काम चालू असायचं. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा हे गाणं ती नेहमी गुणगुणायची–

कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो ।

हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो ।।

बहिणाबाईची कविता – “ अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर “ –आईला माहीत होती. रेडिओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली तर विठोबा आपल्यालाही नक्की मदतीला येईल.

एकविसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नसे. असे होणे शक्य नाही असे वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसांमागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येतात. यात स्त्रियांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची opd , hospitals तुडुंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ संख्येने तसे खूप कमी आहेत. माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे… आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या  अडचणी समजून घेणं गरजेचं  आहे. त्यांना बोलतं करणं, त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेण्याची गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच आहे. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थित होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे…!

तू नाहीस हे माहित आहे तरीही—– भेटी लागी जीवा | लागलीसे आस || 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘पहिल्याच सरीचा ओला सुवास आला

माहेरच्या दिसांचा, क्षण एक भास झाला…’

होय,आषाढाचे सावळे गच्च मेघ आकाशात दाटी करतात,भिरभिर गार गार वारा चहूबाजूस भिरभिरू लागतो आणि मग मन आपोआपच पंढरीकडे धावू लागते. 

माझे माहेर पंढरी ।  आहे भीवरेच्या तिरी ।।

आषाढ लागताच माहेरची ओढ लागून रहाते.डोळ्यांपुढं पंढरीची वाट दिसू लागते . तन मनात टाळ मृदंग दुमदुमत रहातो अन सुरू होते माहेरी जाण्याची लगबग ! 

सामान ..सुमान ..आवराआवरी ..अहं ! माहेराला जाताना मुळी चिंता कसली? तिथं काळजी घ्यायला आहेत ना मायेची माणसे !आपण फक्त तिथवर जायचं बस्स ! संसारातल्या चिंता,कटकटी ,ताण तणावापासून मुक्त होऊन पुन्हा नव्यानं आव्हान स्वीकारायला सज्ज व्हायला माहेरात थोडे दिवस जावेच नै का ?

मोह मायेपासून थोडे दिवस का होईना अलिप्त व्हावं–संसाराच्या चिंता त्या जगंनीयंत्या विठू माऊलीच्या पायी वहायला…तो घेईल ना आपली काळजी, मग कशाला व्यर्थ चिंता ?आपण फक्त निश्चिन्त मनाने सगळं जिथल्या तिथं टाकून माहेराची वाट चालू लागायची. त्याला डोळे भरून पहाण्यासाठी, त्याला हृदयात जपण्यासाठी,अवघा देह त्याच्या त्या सावळ्या रुपात एकवटण्यासाठी !

एक पोत्याची खोळ , डोईवर तुळस ,चारदोन मोजके आवश्यक कपडे न टाळ– बस्स ! पंढरीचा प्रवास सुरु होतो –वाऱ्याच्या चिपळ्या दुतर्फा पिकांतून ,झाडाच्या पानातून वाजत रहातात—‘ जय जय रामकृष्ण हरी…’ त्यांना सुद्धा वर्षोनवर्षीच्या या जयघोषाची जणू सवय जडलीय.वारकरी चालू लागले की मग झाडांना ,पशु पक्ष्यान्नासुद्धा  त्या तालातच डुलावं ,झुलावं आणि गावं वाटू लागतं .भुरभुर पावसात आनंदाने चिंब होऊन ती सुद्धा विठुरायाशी एकरूप होतात. तहान भूक हरपून पावलं फक्त चालत रहातात ..नामघोष अंतर्मनी निनादत…तू कोण ? मी कोण? कुठला  ? नाव ? गाव ?– स्व विसरून त्या पंढरीच्या वाटेवरील गर्दीतला एक ठिपका ! पाय दुखतात,सुजतात पण पर्वा कसली? चालत रहायचं फक्त. क्षण एक विसावा घ्यावा, एकमेकांचा हालहवाल पुसावा अन झपझप आनंदाने चालू लागावं पाऊस वाऱ्याला झेलत.

माऊली ..माऊली ..येते ग्यानबा तुक्याची पालखी ..अन तल्लीन होतात सारीच गात्रे .. नुरते भान देहाचे मग काही … ओथंबते चिंब चिंब मन भक्ती रसात . मग पावलं चालत नाहीत तर मन चालत रहातं, पीस होऊन तरंगत रहातं  आभाळभर.

टाळांचा आवाज गगनाला भिडतो ,मृदंग खोल खोल काळजाला भिडतो, आणि माहेर  जवळ आल्याची ग्वाही देतो.

अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर..।।

पंढरपुरात घरंगळत घरंगळत कधी दाखल होतो कळतच नाही. चंद्रभागेच्या त्या वाळवंटात जिथं तिथं विठू हसतहसत बाहू पसरून आलिंगन देत रहातो सगळ्यांना आणि क्षेम विचारत रहातो, “ फार त्रास नाही नाझाला येताना ? सर्वजण आलात ना व्यवस्थित ? पाठीमागे नाही ना उरले कोणी? “

गार गार वाऱ्यात रात्री  विठूच्या मायेची सावळी उबदार घोंगडी अलगद सगळ्या लेकरांना कुशीत घेते. शांत शांत सुखाची झोप प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईच्या कुशीत..कशाला हवी मऊ मऊ पिसाची गादी ,उशी अन उबदार दुलई ? आभाळाच्या मंडपाखाली सर्व भेदाभेद मिटून जातात. गरीब-श्रीमंत,उच्च -नीच ,लहान- मोठा…सगळे एकजात एकसारखे !

काकड आरती ,भजन कीर्तन ,नामसंकीर्तन– पावलं मन देह थिरकू लागतो तालासुरात …आनंदाचा पूर ओसंडून वहात रहातो मनामनातून पंढरपुरात. अबीर बुक्का,ओल्या तुळशीमाळेचा  सुगंध आसमंतात दरवळू लागतो. अवघा देह पंढरपूर होतो.

सावळे सुंदर …रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे….. 

झुंबड उडते दर्शनाला ….निमिषार्ध एक चरणावर डोकं ठेवून मागणं  मागायला ..पण काय बरं मागायच होतं ?

मागणे न काही सांगण्यास आलो

आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

आत्तापर्यंत इतकी पायपीट केली ती काही मागण्यासाठी ?छे ! फक्त त्याचं रूप डोळे भरून साठवायला ..आणि तो क्षण येतो ..निमिषार्धात आपलं डोकं चरणांवर विसावतं  अन फक्त ‘ सुखी ठेव सगळ्यांना ‘ अशी विश्वकल्याण आणि विश्वसुखाची याचना होते, कारण मीपण मागेच कुठेतरी गळून पडते. नेत्री अश्रुधारा वाहू लागतात. सोडावे वाटत नाहीत ते चरण ..तरी सोडावे लागतात. गर्दीत पुन्हा कुणीतरी मागे खेचते अन पुन्हा एक जडभार ठिपका घरंगळत घरंगळत जातो वैष्णवांच्या गर्दीत.अणू रेणूत विठ्ठल साठवून.

कुंकू ,अबीर ,प्रसाद, लाखेच्या बांगड्या …आठवत रहातात माहेराला येताना पाय धरलेल्यांच्या मागण्या आणि सुरू होतो परतीचा प्रवास…नको वाटत असतो  तो प्रपंचाचा भार ,पण जावेच लागते माघारी, निदान उपकारापुरता तरी तो पेलण्यासाठी ..जड जड पावलांनी आणि अंतःकरणाने …काहीतरी विसरलेय, चुकलंय ही अनामिक हुरहूर मनात घेऊन …… 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी पाहिलेला सुखी माणूस…व त्याचा ७०% चा मंत्र ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

??

☆ मी पाहिलेला सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

१) दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी लीगल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती, व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा पुरवायचा. तो जर्मनीमध्ये जन्मलेला, त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण जर्मनीमध्ये झाले. त्यानंतर त्याने पार्टटाईम नोकरी करून त्याचे इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले. नंतर तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत CTO म्हणून काम करू लागला. त्याच्यासोबत बऱ्याच वेळा संपर्क होत असल्याने बऱ्यापैकी ओळख झालेली. त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअरफूट इतके लहान आहे. परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे. तरी सुध्दा त्याचे घर लहान आहे, म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात. तो साधी कार व आयफोनचे साधे मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र.. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस– त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला. 

२) महाग फोन : आपल्या देशात बरेच जण स्टाईल व दिखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाखापर्यंत मिळते. परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्सव्यतिरिक्त फोनचा वापर सोशलमीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्ये सुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व aps निरुपयोगी असतात.

३) महागडे घर : आजकाल मोठमोठे बंगले बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा ड्युप्लेक्स खरेदी करण्याचे बऱ्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हप्ते भरण्यासाठी अधिक काम करावे लागते.

४) महागडी कार : हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रॅंडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईतले लोक कार तर घेतात. परंतू सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबियांसोबत बाहेर प्रवास क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.

५) महागडे कपडे : उच्च, आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून लोक ब्रॅंडेड रेडीमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतू हे कपडे खूप कमी, म्हणजे  फक्त ठराविक वेळीच वापरले जातात, एरवी कपाटातच पडून राहतात.  म्हणजे हे कपडे ७०% निरुपयोगी असतात. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत. 

६) मित्र/नातेवाईक : प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात. ते आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्यासोबत सहभागी होतात. परंतु यातले ७०% नातेवाईक निरुपयोगी असतात , कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा त्यापैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत नाही करत. गर्दीपेक्षा दर्दी लोकांत रहा.

७) कमाविलेला पैसा : आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते, ज्या व्यक्तीजवळ प्रचंड संपत्ती असते, तो त्यातल्या केवळ ३०% संपत्तीचाच उपयोग करत असतो. त्यापैकी ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कमवितो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच  खाणार. काही मूर्ख रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षानी मरून जातात. शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधता का? 

८) भांडी व साड्या : आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात. परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बऱ्याच ठिकाणी आधुनिक लाईफस्टाईल म्हणून कितीतरी बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आणि फक्त ठराविक कार्यक्रम समारंभात साड्या नेसतात . त्यामुळे त्यांचाही ७०% वापर होतच नाही.

आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तु वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तु खरेदी करण्याचे वेड असते. परंतु पाश्चात्य देशातील लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुध्दीमत्ता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझे नसते. 

Do not collect assets… Collect happiness,  & achievement, experience  & enjoyment in life… Earn honour… Earn respect… Earn Name. 

CTO च्या वेतनाच्या तुलनेत त्याचा खर्च फक्त २०% होता.  त्यामुळे तो ९९% तणावरहित काम करू शकत होता व खूप आनंदी होता. 

त्याने एकच अत्यंत महत्वाचा संदेश दिला,  ” Do not buy, hold, own anything which you can’t use, consume, monitor. Do not carry any unnecessary weight or burdens on your head, mind and brain.”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Mother’s day – एक शोकांतिका… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ Mother’s day – एक शोकांतिका… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

खरं तर एक स्त्री रोग तज्ञ म्हणून हे प्रसंग मला नवीन नाहीत.  पण हे सगळे मागच्या तीन ते चार दिवसात एकत्रित घडलेत . Mother’s day च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आईप्रती भावनांचा जो काही धुमाकूळ घातला जातोय, आजचा लेख त्यावर शोकांतिका म्हणून नक्की वाचा ! एकच वाटतं, अजूनही २०२२ साली, नको तो जन्म बाईचा….

प्रसंग १

१९ वर्षाची पहिलटकरीण,  बाळाचे ठोके कमी होताहेत  म्हणून सिझरला शिफ्ट करत असताना, नवरा हात जोडून, ” मॅडम, बाळ वाचेल ना? लवकर करा सीझर ….” तोच नवरा मुलगी झाली हे कळल्यावर तोंडावर सांगून गेला, ” आधीच्या दोन बायकांना मुलीच झाल्या म्हणून तिसरं लग्न केलं होतं, हिलाही मुलगीच झाली. माझा आणि हिचा काही संबंध नाही….” 

तिसरं लग्न त्याचं, हिचं पहिलं? कोणी लावलं? इतकी लग्न officially कसं  करू शकतं कोणी? आता ही काय करणार? सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवून तो माझ्या डोळ्यासमोर निघून गेला.

प्रसंग २

प्रचंड सुजलेली , BP वाढलेली, दिवस पूर्ण भरलेली बाई आणि नवरा लेबर रुमला आले. येताच पहिलं वाक्य, पैसे नाहीत, करायला कुणी नाही. हॉस्पिटल मॅनेजमेंटला फोन करून बिलात सवलत मिळवून घेतली. डिलिव्हरी झाल्यावर गुंतागुंतीमुळे पेशंटला ICU त ठेवले. पैशाची सोय करून येतो म्हणून तिला लेबर रूममध्ये सोडून गेलेला नवरा अजूनही परत आलेला नाही. तिला घरच्यांचा नंबरही पाठ नाही. हॉस्पिटलने, डॉक्टरांनी कशी आणि किती जबाबदारी घ्यायची ? आहे उत्तर ? 

प्रसंग ३

२७ वर्षीय बाई, परवा रात्रीपासून ब्लिडिंग होतंय म्हणून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत दाखल. नाडी १३०, bp ८०/५०, पांढरीफटक पडली होती. हिमोग्लोबिन रिपोर्ट आला ३ ग्रॅम. योग्य ते उपचार, रक्त देऊन तिला सेटल केल्यावर रागावले, ” इतकं कशाला अंगावर काढायचं? यायचं ना लगेच… जीवावर बेतलं असतं .” तिचं त्यावर उत्तर, ” ताई, नवऱ्याला दोन दिवस सांगते आहे, दारूला पैसे असतात पण मला दवाखान्यात न्यायला नाही. चक्कर येऊन पडले म्हणून उचलून आणली “

–  काय बोलणार, आहे उत्तर ?

प्रसंग ४

गर्भनलिकेत राहिलेला गर्भ फुटून ( ectopic pregnancy ) पोटात रक्तस्त्राव झाला होता. Emergency ऑपेरेशन करून त्या बाजूची गर्भनलिका काढून टाकली आणि बाईचा जीव वाचला. नवऱ्याची प्रतिक्रिया, ” दुसऱ्या नळीवर प्रेग्नन्सी राहीलच असं लिहून द्या, तरच बिल भरतो. नाहीतर एवढ्या बिलात तर दुसरं लग्न होईल माझं….” 

— चूक डॉक्टरची, तिची की नवऱ्याच्या प्रवृत्तीची ? 

काल २४ तासांची ड्युटी करून हा लेख लिहिण्याचा अट्टहास मी एवढ्यासाठी केला की उद्या mother’s day म्हणून खूप कौतुक करतांना ह्या असहाय्य आयांची तुम्हाला आठवण यावी. अरे, नका देऊ आईला लाखोंचे गिफ्ट्स, द्या एका स्त्रीला सन्मान, काळजी घ्या तिच्या आरोग्याची. बदला दृष्टिकोन तिला creation आणि recreation चे साधन म्हणून बघण्याचा !

एक कळकळीची विनंती, आजूबाजूला अशी महिला दिसली तर जरूर मदत (उपकार नाही) करा. Mothers day ला घ्या ना विकत १०० लोहाच्या गोळ्या आणि वाटा तुमच्या घरातल्या कामवाल्या बायांना, सिक्युरिटीच्या बायकांना किंवा साईटवर काम करणाऱ्या महिलांना. घेऊन जा एखाद्या प्रेग्नन्ट गरीब महिलेला दवाखान्यात किंवा द्या तिला सकस आहाराचं पॅकेट !

— प्रत्येक स्त्री मध्ये आई बघा, आई बघा….

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर (स्त्री रोग तज्ञ)

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग – 5 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 5 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

निखळ, मोकळा आणि अर्थपूर्ण संवाद ही आनंदाची पर्वणीच म्हणायला हवी!

मी एकटी जेव्हा विचार करते तेव्हा एका टप्प्यावर येऊन मला थांबल्यासारखे वाटते. पुढचे दिसत नाही. जेव्हा मी मला काय वाटतं आहे, समजलं आहे ह्या बद्दल मी इतरांशी बोलते तेव्हा माझ्या विचारांमध्ये अगदी वेगळी, अनपेक्षित अशी भर पडू शकते. किंवा माझ्या विचारांमधली तृटी दाखवणारा एखादा मुद्दादेखील हाती लागू शकतो. माझ्या विचारांना चालना मिळते. थांबलेले विचार प्रवाही होतात. अशा देवाणघेवाणीतून, मंथनातून जे आकलन आकार घेते त्याची अनुभूती चकित करणारी असते.

एकाच अनुभवासंदर्भात देखील त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचा प्रतिसाद वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक माणूस हा एकमेवाद्वितीय असतो. त्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, दृष्टीकोन वेगवेगळा असतो. हे वेगळे पण कुठून येते? 

माणूस ज्या सामाजिक – सांस्कृतिक परिवेशात वाढतो आणि त्या अनुभवांचा अर्थ तो त्या त्या वेळी कसा लावतो यावर हे वेगळेपण अवलंबून असते. या Cultural Capital बद्दल जेव्हा मी पहिल्यांदा वाचले होते तेव्हा मला बरेच काही उलगडले होते.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे, तो एकटा जगू शकत नाही. इतरांच्या साथीनेच तो समृद्ध बनत जातो. एकमेकांना पूर्ण करणारे हे परस्परावलंबन सर्वांच्याच  आयुष्यात आनंद फुलवते.

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडेसाती – एक चिंतन – भाग 2 – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साडेसाती – एक चिंतन – भाग – 2 … अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

(अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. ) इथून पुढे —–

कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात —– वेळ नसेल तर भिजत जायचे,—-

वेळ असेल तर थांबायचे,—- ही निर्णयक्षमता साडेसातीत येते.

चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते. 

भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते.

चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही. आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो. 

`मला वाटले,` `माझ्या लक्षात आले नाही ` ` इतकं चालतं,` अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात. 

शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही. अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. 

गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात. 

शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही.

हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात.

डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं. 

स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.

घाबरावे असे शनी काही करत नाही—-

आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे. 

त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही . ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.

माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे. 

गीतेत “ कर्मण्येवाधिकारस्ते “ असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात. 

गीता, आणि एकंदरीतच  संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो. 

ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो. 

खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो.

 अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात.

आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते —- फक्त साडेसातीत नाही , तर एकूण आयुष्यातच…

“ मी म्हणेन ते,—- मी म्हणेन तसे, —-मी म्हणेन तेव्हा —-” असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो.

माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही .– होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही .—तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही . तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही. 

——  एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते. आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते. तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, असे सांगते. मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले.—

त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले. 

ही सत्य घटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ? 

हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. चूक न सुधारता नुसती सांगून  उपयोग नाही.

साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते, त्या संधीचे सोने करावे. 

ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायला लावतात . माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही. 

साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात.

साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम. 

सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????

शुभं भवतु !

— समाप्त —

लेखक : अज्ञात

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडेसाती – एक चिंतन – भाग 1 – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साडेसाती – एक चिंतन – भाग -1… अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका मैत्रिणीने संदेश पाठवला, ” कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहिशील का?”

मी, ” तुला साडेसाती सुरू झालीय का? ” असे विचारले. 

त्यावर ती म्हणाली, ” नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे.”

मी म्हंटले ,” मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल.”

त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, ” झाला तुझा वाह्यातपणा सुरू? “

विनोदाचा भाग सोडला, तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली, 

कोणाची संपली? कोणाची सुरू झाली? काय म्हणून काय विचारता महाराजा, ” साडेसाती ” !     

मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे. शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते, म्हणून त्या कालावधीला

“साडेसाती “असे नाव पडले. ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असले तरी ती कोणालाही टाळता येत नाही.

`ज्योतिष मानत नाही,` असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडा तरी घाबरतो. 

एक गोष्ट आहे—-

शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की “आमच्यातले कोण छान दिसते?”

प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले, ” लक्ष्मी येताना छान दिसते, आणि शनी महाराज जातांना चांगले दिसतात.”

शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही. 

दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते. 

देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की… ” मी सरांशी गप्पा मारून आलोच ,” असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे.

एकदा त्यांना विचारले, ” तुम्हाला सर ओरडत नाहीत का? चुका काढत नाहीत का? “

देशपांडे म्हणाला, “ओरडतात.”

मी: ” तुम्हाला वाईट वाटत नाही का? “

देशपांडे: ” वाटतं…, मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते. 

पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे.”

मी : ” काय? “

देशपांडे : ” एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो. साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो. ते मला म्हणाले, ” देशपांडे चला, चहा पिऊ.”

चहा पितांना ते म्हणाले, ” देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो. जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे. घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते.आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे? गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात. वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते, आणि साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते. त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही .”

शनी महाराज असेच असतात. पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो, त्यात शनीचा दोष नाही. 

शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो. 

साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते. माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो, कारण व्हायचे ते होतेच. कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो. 

कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो. या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो.

टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही , तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला.

अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. 

क्रमशः…

लेखक : अज्ञात

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print