☆ “आईची आठवण.. आणि राजा केळकर म्युझियम…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
माझी आई सौ. कमल पुरुषोत्तम कुलकर्णी ही कलाकार होती.
ती कापडाच्या बाहुल्या करत असे त्यात मणीपुरी, शेतकरीण, नववधु, भरतनाट्यम् करणारी नर्तकी असे विविध प्रकार होते. अनेक ठिकाणी प्रदर्शनात तिला बक्षीसं मिळाली होती.
ती केप्रच्या कागदाची फुले करुन त्याच्या वेण्या करत असे व तुळशीबागेतल्या दुकानात विकायला ठेवत असे. सिंधुताई जोशी यांच्या कामायनी या मतिमंद मुलांच्या शाळेत ती मुलांना अनेक वस्तू शिकवायला जात असे. आई भरतकाम आणि क्रोशाचे काम फार सुरेख करत असे. तिनी क्रोशानी फुलं विणून, त्याला कडेनी जाड लाल कापड लावून वेगळाच सुरेख पडदा केला होता. दुसरा एक पडदा होता. त्यावर तिने पॅचवर्कनी एक कोळीण केली होती. तो पण अप्रतिम होता. दोन्ही पडदे वेगळेच होते.
बरेच दिवस ते पडदे माहेरी होते. नंतर भावानी ते मला दिले.
मैत्रिणींना आल्या गेलेल्यांना ते दाखवले. नंतर ते कपाटात ठेऊन दिले. इतकी मेहनत घेऊन आईनी केलेल्या ह्या सुरेख पडद्याचे काय करावे हे समजत नव्हते.
एके दिवशी मनात विचार आला की हे म्युझियममध्ये दिले तर….
…. ते पडदे घेऊन मी राजा केळकर म्युझियमला गेले.
त्यांनी ते पाहिले.
ते म्हणाले
“आमची कमिटी असते. त्या कमिटीची मिटींग होते. ते ठरवतात की हे त्या योग्यतेचे आहेत की नाहीत. तुम्ही हे ठेऊन जा “
“हो चालेल.. “अस म्हणून पडदे त्यांना देऊन मी घरी आले.
आणि काही दिवसांनी मला त्यांचा फोन आला.
” तुमच्या आईचे पडदे आम्ही स्वीकारले आहेत. ” तसे पत्रही त्यांनी मला पाठवले.
मला फार फार आनंद झाला.
आज ते पडदे राजा केळकर. म्युझियममध्ये काचेच्या शोकेस मध्ये दिमाखात लावले आहेत.
टेक्सटाइल विभागात जाऊन तुम्ही जरुर पहा.
राजा केळकर म्युझियम खूप छान आहे. एकदा अवश्य पाहुन या.
मी नवी मुंबईहून नाशिकच्या मार्गाला लागलो. रस्त्यामध्ये काही पाड्यांना भेटी देत सायंकाळपर्यंत नाशिकला जावं, हा बेत करून मी जात होतो. शहापूरजवळच्या एका पाड्यावर थांबलो. तिथल्या काही शेतकरी बांधवांशी बोलत होतो. निवडणुका, सरकार, स्थानिक पातळीवरील राजकारण आणि त्यात भरडली जाणारी ही सगळी पाड्यावरची माणसं आहेत, हे मी अनुभवत होतो. त्या पाड्यावर मी काही शेतकऱ्यांशी बोलत असताना एक छोटासा टेम्पो त्या गावात आला. टेम्पोला पाहून सगळे लोक हातामध्ये तांब्या, बाटली, ग्लास घेऊन टेम्पोच्या दिशेने जात होते.
मी माझ्या बाजूला उभ्या असलेल्या शेतकऱ्याला म्हणालो, “ही मंडळी अशी पळतात का? ’’ ते म्हणाले, “काही नाही, दूध आलेय. ते दूध आणण्यासाठी जात आहेत. ’’ मला वाटले, की दूध विक्रीसाठी कोणीतरी घेऊन आले असेल, पण तसे नव्हते. ते दूध तिथे मोफत वाटले जात होते. मी माझ्या बाजूला असलेल्या माणसाला परत म्हणालो, की ही माणसे फुकट दूध देतात का, पैसे घेत नाहीत? तो म्हणाला, ‘मानस’ नावाचा शेतीचा फार्म आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या गाईचे दूध रोज काढून आसपासच्या आदिवासी पाड्यांवर, गावांमध्ये वाटले जाते.
मला त्या व्यक्तीचे ऐकून आश्चर्य वाटले. मी त्या टेम्पोवाल्याला म्हणालो, “तुम्ही हे दूध रोज वाटप करता का? ’’ ते म्हणाले, “नाही, दोन ते तीन दिवसांत आम्ही दूध एकत्रित जमा करून वाटप करत असतो. ’’ तुमचा फार्म कुठे आहे? मी पुन्हा त्याला विचारले, तो म्हणाला, “१५ किलोमीटर अंतरावर आहे. ’’ मी त्या फार्मचा पत्ता घेतला आणि तिथे लोकांशी बोलून त्या फार्मच्या दिशेने निघालो. शहापूरवरून पुढे जाताना साजिवली येथे भातसा धरणाच्या अगदी जवळ असलेले हे `मानस कृषी शेती’ असा मोठा बोर्ड लावलेला आहे. मी ओळख सांगून आतमध्ये प्रवेश केला.
एका झोपडीमध्ये एक व्यक्ती आदिवासी महिलांना धान्य वाटप करताना मी पाहिले. मी तिथं गेलो आणि मागे चुपचापपणे उभा राहिलो. सर्व महिलांना धान्य दिल्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘ ज्या गरजू आणि कुपोषित बालकांच्या आई आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे धान्य देण्याचे काम करत असतो. आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक गरजवंत महिला यांना या संदर्भात सांगा. ’’ त्या महिलांनी डोक्यावर बॅगा उचलल्या आणि त्या आपल्या घराच्या दिशेने निघाल्या.
त्यातल्या मी दोन महिलांशी बोलत होतो, त्यामध्ये गीता नावाची महिला मला म्हणाली, ` या जमान्यात कोण कोणाला मदत करते बाबा, ही माणसे पुढाकार घेऊन काहीतरी चांगले काम करतात, ’ दुसऱ्या जमुनाबाई म्हणाल्या, `गेल्या अनेक वर्षांपासून ही माणसे धान्य वाटप करण्याचे काम करतात. याच शेतामध्ये पिकलेले, इथेच देण्याचे काम त्यांनी हाती घेतले. प्रत्येक वेळेला धान्य देण्यासाठी येणाऱ्या महिला वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या भागातल्या असतात. काळ नेहमी आम्हा गरिबाची परीक्षा घेतो. कधी आजारपण लहान मुलाभोवती असते, कधी म्हाताऱ्या माणसाचा जीव जातो. अशा स्थितीत ही माणसे देव म्हणून आमच्या आसपास असणाऱ्या सर्व पाड्यांवर जातात. सर्वांना भेटून मदत करतात. मी कुपोषणामुळे चार मुलांना मुकले. आता आई-बाबा आणि अपंग असलेल्या पतीला मी सांभाळते. ’
जी व्यक्ती धान्य वाटप करत होती त्या व्यक्तीजवळ जाऊन मी त्यांना नमस्कार केला. त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडून तिथे चालणाऱ्या सगळ्या उपक्रमाविषयी माहिती घेतली. मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचे नाव व्यंकटेश जोशी (९४२३१३६६०४), ते ‘मानस’चे संचालक होते. मूळचे नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे असणारे जोशी यांनी त्यांच्या अनेक सहकारी मित्रांच्या मदतीने २५० एकर शेतीत सजीव शेतीचे प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात स्वतःला वाहून घेतले. जगात शेतीबाबत होणारे सर्व प्रयोग येथे होतात. देशभरातून शेतकरी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.
गुजरात येथून गिरनार महाराज यांच्याकडून आणलेल्या पाचशे गीर गाई आहेत. या गाईचे दूध विक्रीसाठी नाही तर आसपासच्या गावांतल्या गरीब, कष्टकरी यांना वाटण्यासाठी आहे. गोमूत्रापासून पिकासंदर्भात असणारी सर्व औषधे येथे तयार केली जातात. विहिरीत गोमूत्र सोडले जाते आणि ते पुन्हा झाडांना दिले जाते. शंभर एकर शेती येथे पडीक आहे, त्याचे कारण ती जमीन गाईंना चरण्यासाठी ठेवली आहे. गाय, अग्निहोत्र, जैविक खत ही ओळख या प्रकल्पाची आहे. जोशी माझ्याशी बोलत होते आणि मी त्यांचे सारे ऐकत होतो. सारा प्रकल्प जोशी यांनी मला फिरून दाखवला.
एका व्यक्तीची ओळख करून देताना जोशी मला म्हणाले, हे व्यंकटेश कुलकर्णी, माझे मावस भाऊ आणि गुरुसुद्धा आहेत. या प्रोजेक्टचे चेअरमन आहेत. त्यांनीच मला मुंबई दाखवली. मी कुलकर्णी सर यांना नमस्कार केला. एखाद्या साधूच्या चेहऱ्यावर जसे तेज असते तसे तेज कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर होते. जोशीकाका काही माणसांशी बोलत होते, त्या वेळी मी कुलकर्णी यांच्याशी वेगवेगळ्या प्रयोगांविषयी बोलत होतो. कुलकर्णी म्हणाले, शेतीसाठी देशी गाय खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी जिथे शेती आहे तिथे गाय महत्त्वाची आहे. त्याशिवाय शेतीसाठी प्रसन्न वातावरणही महत्त्वाचे आहे, त्यासाठी अग्निहोत्र आवश्यक आहे.
अनादी काळापासून शेतीतून निघणाऱ्या धान्यातून आमच्या पिढ्या धष्टपुष्ट तयार झाल्या. कित्येक माणसे १३० वर्षांपर्यंत जगायची, पण आता सारेकाही सत्त्वहीन, रासायनिक खताचं खाऊन पन्नाशीत माणसांना जगणं नकोसे झाले आहे. कुलकर्णी यांचे शेतीबाबत सारे प्रयोग जबरदस्त होते. तिथला सोनचाफा तर आयुष्यभर आठवणीत राहील असाच होता. जोशी पुन्हा आले आणि माझ्याशी बोलत होते. ते म्हणाले, “माझे वडील नारायण जोशी स्वातंत्र्यसैनिक होते. ते प्रचंड धार्मिक होते. हातात येईल तेवढा तांदूळ ते घ्यायचे, तेवढाच शिजवून खायचे. माझे आजोबा गोविंद आबा भट गावाकडे ज्योतिषी होते, कुणाची गाय चोरीला गेली, घरातून माणूस निघून गेला, तो कुठे गेला, ते बरोबर सांगायचे. त्यांची कार्यपद्धती मी अवगत केली, असे मला जोशीकाका सांगत होते.
मी जोशीकाका यांच्या गाडीत बसलो. त्यांनी प्रोजेक्टवर जितके प्रशिक्षण सुरू होते तिथे आम्ही जाऊन आलो. द्राक्षे, डाळिंब, चिकू, भातशेती, भेंडी अशा सर्व पिकांबाबत प्रशिक्षण सुरू होते. दरवर्षी किमान सात ते आठ हजार शेतकरी येथून प्रशिक्षण घेऊन विषमुक्तीसाठी पुढाकार घेतात. जोशी, कुलकर्णी आणि अन्य मित्रांच्या सहकार्याच्या मदतीने सुरू झालेल्या या प्रयोगाच्या माध्यमातून येत्या दहा वर्षांत राज्यातले किमान अर्धे शेतकरी तरी विषमुक्त शेतीकडे वळवण्याचा ‘मानस’ या बंधूने आखला आहे. “
जोशी आणि कुलकर्णी बंधूंचा निरोप घेऊन मी परतीच्या वाटेने निघालो. जोशी काकांनी मला सोनचाफ्याची फुले बांधून देताना ते मला म्हणाले, तुम्हाला सोनचाफ्यांची फुले फार आवडतात. मला एकदम धक्का बसला, मी म्हणालो, तुम्हाला कसे काय माहिती. त्यावर जोशीकाका हसून म्हणाले, मी ज्योतिषी आहे, काकांच्या बोलण्यावर मीही हसलो.
… त्या सोनचाफ्याचा सुगंध पुढचे चार दिवस माझ्या गाडीत आणि घरात दरवळत होता. त्यापेक्षाही जोशी, कुलकर्णी यांनी निःस्वार्थीपणे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना गायींच्या संवर्धनातून दिलेला विषमुक्त शेतीचा प्रयोग फार महत्त्वाचा होता. `जय किसान’चा नारा या बंधूंच्या समर्पक भावनेतून निनादणारा होता, बरोबर ना…?
उषाच्या स्टडी टेबलावरचा पसारा मी आवरत होते. मनात म्हणत होते, “किती हा पसारा! या पसार्यात हिला सुचतं तरी कसं? शिवाय तो आवरून ठेवण्याचीही तिला जरूरी वाटत नाही. ”
इतक्यात टेबलावरच्या एका उघड्या पडलेल्या वहीवर अगदी ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ओळींकडे सहज माझं लक्ष गेलं तेव्हा प्रथम माझ्या नजरेनं वेचलं ते तिचं सुरेख अक्षर, दोन शब्दांमधलं सारखं अंतर आणि अगदी प्रमाणबद्ध काना मात्रा वेलांट्या. उषाचं अक्षर आणि उषाचा पसारा या दोन बाबी किती भिन्न आणि विरोधाभासी होत्या !
तिने लिहिलं होतं,” मला छुंदा खूप आवडते. ती कशी जवळची वाटते ! मला आणि निशाला अगदी सांभाळून घेते. अभ्यासातल्या अडचणी ती किती प्रेमाने समजावून सोडवून देते ! कधीच रागवत नाही.
ताई बद्दल काय म्हणू? एक तर वयातल्या अंतरामुळे तिच्या मोठेपणाचं तसं दडपण येतंच. शिवाय ती भाईंकडे (आजोबांकडे) राहते, शनिवारी येते, सोमवारी जाते. त्यामुळे या घरातली ती पाहुणीच वाटते. का कोण जाणे पण ती थोडी दूरची वाटते आणि बिंबा (म्हणजे मी) मला मुळीच आवडत नाही. तिचा प्रचंड राग येतो. सतत आम्हाला रागावते. मोठी असली म्हणून काय झालं? तिची दादागिरी का सहन करायची? तिला कधी काही प्रश्नाचे उत्तर विचारले तर सुरुवातीलाच ती ढीगभर बोलून घेते. प्रश्न मात्र देते सोडवून. तसं तिला सगळं येत असतं पण सांगताना, ” तुला इतकं साधं कसं कळत नाही? कसं येत नाही?” असा तिचा माझ्याविषयीचा जो भाव असतो ना तो मला मुळीच आवडत नाही. समजते काय ती स्वतःला?”
बापरे!!
हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनाची नेमकी काय स्थिती झाली असेल? खूप मोठा धक्काच होता तो! क्षणभर वाटलं आत्ता तिच्यापुढे ही वही घेऊन जावं आणि तिच्या या लेखनाचा जाब विचारावा पण दुसऱ्या क्षणी मी काहीशी सुन्न झाले. उदासही झाले आणि किंचित स्थिर झाले. माझ्याबद्दल तिच्या मनात असे विचार असावेत? राग, चीड आणि दुःख या संमिश्र भावनांनी माझं अंतर्मन उकळत होतं. शिवाय उषा—निशा या जुळ्या बहिणी असल्यामुळे जरी उषाने हे स्वतःपुरतं लिहिलेलं असलं तरी तिच्या या भावना प्रवाहात निशाचेही माझ्याबद्दल तेच विचार वाहत असणार. याचा अर्थ या दोघी माझ्याविषयी माझ्यामागे हेच बोलत असतील. त्या क्षणी मला जितका राग आला, जितकं वाईट वाटलं त्यापेक्षाही एक मोठी बहीण म्हणून मला “माझं मोठेपण हरलं” ही भावना स्पर्शून गेली. त्यांच्या जन्मापासून ते आतापर्यंत मी मनोमन त्यांना किती जपलं, किती प्रेम केलं यांच्यावर, यांनी चांगलं दिसावं, चांगलं असावं, चांगलं व्हावं म्हणून जी कळकळ माझ्या मनात सदैव दाटलेली होती त्याचा असा विपर्यास का व्हावा? आत्मपरीक्षण अथवा आत्मचिंतनासारख्या थीअरीज अभ्यासाव्यात असं वाटण्याइतकं माझंही ते वय नव्हतं. माझ्याही विचारांमध्ये परिपूर्णता अथवा परिपक्वता नक्कीच नव्हती. बुद्धीने मी इतकी प्रगल्भ नव्हते की या क्षणी मी तटस्थ राहून काही रचनात्मक विचार करू शकत होते. मी अत्यंत बेचैन आणि डिस्टर्ब्ड मात्र झाले होते हेच खरं. माझ्या या बेचैनीमागे कदाचित ही कारणे असतील. पहिलं म्हणजे उषा— निशांना माझं सांगणं दादागिरीचं वाटू शकतं हा विचार माझ्या मनात कधी आला नाही. त्यावेळी वाटायचं,” मी जे बोलते, मी जे सांगते ते त्यांच्यासाठी हिताचे आहे. ” असे वाटायचे. नकळतच एक मोठ्या बहिणीच्या अधिकाराने त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचा तो माझा प्रयत्न होता आणि या वैचारिकतेवर मी तेव्हाही ठाम होते. शिवाय मी डॉमिनेट करते असं त्यांना वाटू शकते याचा मी कधी विचारच केला नाही. माझ्या मनात फक्त बहिणींचं जपून ठेवलेलं एक गोड नातं होतं पण त्या नात्यात आलेला हा विस्कळीतपणा जेव्हा माझ्या ध्यानात आला तेव्हा मी एखाद्या जखमी हरिणीसारखी घायाळ मात्र झाले. ज्या घरात आई, वडील, आजी आहेत त्या घरात बहीण या नात्याने काही वेगळे संस्कार, विचार बिंबवण्याचा माझा अधिकार किती नगण्य आहे याची मला जाणीव झाली. शिवाय कुठेतरी माझं वागणं अतिरिक्तच आहे असे पुसटसे वाटूही लागले होते.
वास्तविक छुंदालाही मी खूप वेळा माझा हाच बाणा दाखवला होता.
एकदा गणिताचा पेपर देऊन ती घरी आल्यानंतर मी जेव्हा तिला पेपरातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारले तेव्हा जवळजवळ तिची सगळीच गणितं चुकलेली होती हे समजलं. माझा पारा इतका चढला की मी तिला म्हटले,” शून्य मार्क मिळतील तुला या पेपरात. एक भलामोठा भोपळा घेऊन ये आता. शाळेत जाण्याचीही तुझी लायकी नाही. ”
केवळ धांदरटपणामुळे तिची प्रत्येक उदाहरणातली शेवटची स्टेप चुकली होती. पण शाळेत तिची गुणवत्ता इतकी मान्य होती की शिक्षकाने तिचे पेपरातले गुण कापले नाहीत म्हणून ती सुरक्षित राहिली पण त्याही वेळेला मी छुंदाला म्हटले होते.. “ या पेपरात तुला शून्यच मार्क आहेत हे कायम लक्षात ठेव. ” ती काही बोलली नाही पण त्यानंतर मात्र तिला गणितात नेहमीच पैकीच्या पैकी गुण मिळत गेले अगदी इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षीही ती शंभर टक्क्यात होती. त्याचं श्रेय फक्त तिच्या मेहनतीला आणि जिद्दीलाच अर्थात.
पण त्यादिवशी जेव्हा उषाने लिहिलेल्या त्या प्रखर ओळी वाचल्या तेव्हा माझ्या मनावर आघात झाला आणि एक लक्षात आले किंवा असे म्हणा ना एक धडा मी शिकले की एकच मात्रा सर्वांना लागू होत नाही हेच खरे. आणि आपल्या बोलण्याचा परिणाम हा चांगला ते अत्यंत वाईट या रेंजमध्ये कसाही होऊ शकतो. तिथे आपले अंदाज चुकतात. मुळातच कुणाला गृहित धरणं हेच चुकीचं.
काही दिवस तो विषय माझ्या मनात खुटखुटत राहिला. सर्व बहिणींच्याबाबतीत मला या चौघी एकीकडे आणि मी एकीकडे ही भावनाही डाचत राहिली. एकाच घरात राहून मला एक विचित्र एकटेपणाची भावना घुसळत होती. काही दिवसांनी घरात कोणालाही न जाणवलेलं माझ्या मनातलं हे वादळ हळूहळू शांतही झालं याचा अर्थ बदल झाले —माझ्यात किंवा उषा निशांच्यात असेही नाही पण रक्ताच्या नात्यांचे धागे किती चिवट असतात याची वेळोवेळी प्रचिती मात्र येत गेली. मतभेदातूनही आम्ही टिकून राहिलो. तुटलो नाही. आमच्या घरात खर्या अर्थाने लोकशाही होती. तसेच वाढे भांडून ममता याचाही अनुभव होता.
एक दिवस पप्पांना घरी यायला खूप उशीर झाला होता. पप्पांची जाण्याची आणि परतण्याची वेळ सहसा कधीच चुकली नाही पण त्यादिवशी मात्र घड्याळाच्या काट्यांची टिकटिक संपूर्ण घराला अस्वस्थ करून गेली मात्र. का उशीर झाला असेल? त्यावेळी मोबाईल्स नव्हते, संपर्क यंत्रणा अतिशय कमजोर होत्या. फारफार तर कुणाकडून निरोप वगैरे मिळू शकत होता. बाकी सारे अधांतरीच होते. चिंतेचा सुरुवातीचा काळ थोडा सौम्य असतो. संभाव्य विचारात जातो. ऐनवेळी काही काम निघाले असेल, पप्पांची नेहमीची लोकल कदाचित चुकली असेल किंवा उशिरा धावत असेल. व्हीटी टू ठाणे या एका तासाच्या प्रवासात काय काय विघ्नं येऊ शकतात याचाही विचार झाला. त्यावेळी आतंगवाद, बाँबस्फोट वगैरे नव्हते पण अपघात मात्र तितकेच होत असत आणि अपघाताचा जेव्हा विचार मनात आला तेव्हा मात्र आमचं घर हादरलं. अशा कठीण, भावनिक प्रसंगी जिजी माझ्यापुढे तिची तर्जनी आणि मधलं बोट एकमेकांना चिकटवून समोर धरायची आणि म्हणायची,” यातलं एक बोट धर. पटकन मी तिचं कुठलंही बोट ओढायची मग ती म्हणायची,” सारं सुरक्षित आहे. बाबा येईलच आता. ” तिची काय सांकेतिक भाषा होती कोण जाणे! मला तर संशयच होता की “हीचं कुठलंही बोट धरलं तरीही ती हेच म्हणेल पण गल्लीच्या कोपऱ्यावर पप्पांची सायकलची घंटा नेहमीच्या सुरात वाजली आणि आम्हा साऱ्यांचे धरून ठेवलेले श्वास मोकळे झाले. ” पप्पा आले. ”
त्या क्षणी फक्त एकच वाटलं की जगातल्या साऱ्या चिंता मिटल्या आता. प्रतीक्षा, हुरहुर, “मन चिंती ते वैरी न चिंती” या वाटेवरचा प्रवास ज्या क्षणी संपतो ना तो क्षण कसा कापसासारखा हलका असतो आणि त्याचा अनुभव किती आनंददायी असतो हे फक्त ज्याचे त्यालाच कळते.
त्यादिवशी रात्री झोपताना उषा माझ्या कुशीत शिरली आणि चटकन म्हणाली, “काय ग आम्ही अजून किती लहान आहोत नाही का? तुमचं तर बरंच काही झालं की…. शिक्षणही संपेल आता. आई पप्पांना मध्येच काही झालं तर आमचं कसं होईल?” ती खूप घाबरली होती की काल्पनिक काळजीत होती नकळे पण तिच्या मनातली भीती मला कळली. मी तिला जवळ घेतलं, थोपटलं आणि म्हटलं,” झोप आता. असं काहीही होणार नाही. ”
आज जेव्हा मी वयाच्या एका संथ किनाऱ्यावर उभी राहून साक्षी भावांनी या सर्व घटनांचा विचार करते तेव्हा जाणवते की घरात लहान भावंडांचे जरा जास्तच लाड होत असतात. त्यांच्यासाठी आई-वडील आपल्याला लागू असलेले अनेक नियम सहजपणे मोडतात. या तक्रारींच्या भावनेबरोबर एक असेही वाटते की लहान भावंडं मोठी होईपर्यंत आई-वडीलही थकलेले असतात का? त्यांच्याही मनात “जाऊ दे आता” असे सोडून देण्याचे विचार सहजपणे निर्माण होतात का आणि त्याचवेळी थकत चाललेल्या आई-वडिलांना पाहताना धाकट्यांच्या मनात असुरक्षिततेची एक भावना निर्माण होत असेल का? त्यादिवशी नकळत उषाने तिच्या मनातली हीच असुरक्षिततेची भावना व्यक्त केली आणि पुढे तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांना बेपर्वाईने कुणाकुणाला दोषी ठरवताना, तिच्यात हीच असुरक्षिततेची भावना असेल का?
मी अगदी दबकतच तिच्या जवळ गेले आणि नम्र स्वरात म्हणाले, “Can I help you ma’am?
बाकावर जागा करुन देत ती म्हणाली …
“Yess.. Sure ma’am, Please!”
तिने Please म्हटल्यावर मला थोडे बरे वाटले.
उगीचच एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यात शिरायला मला आवडत नाही. त्यातूनही पूर्ण अनोळखी आणि दूसऱ्या गावी, मुंबईसारख्या ठिकाणी. पण तिची घालमेल, तिची अवस्था बघून मला राहवत नव्हते.
सकाळचे पावणे सात- सात वाजले असावेत, के. ई. एम हॉस्पिटलजवळच्या प्रताप घोगडे उद्यानातील ट्रॅकवर मी चालत होते. दूसऱ्या राऊंडलाच ती मला दिसली होती. निराशाजनक चेहरा. डोळे निस्तेज. हुंदका कोंडून ठेवल्यासारखी अस्वस्थता. तिला रडायचे नव्हते पण रडणे थांबवता येत नव्हते. चौथ्या राऊंडला जेव्हा माझी नजर तिच्याकडे गेली, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या मनात खूप काही खदखदत होते, हे तिच्या चेहऱ्यावरुन जाणवत होते. तरी मी तिला काही न बोलता पुढे गेले. तिला विचारावे की नको? आपण तिला मदत करु शकतो हे तिला सांगणे योग्य होईल का? असा विचार करत करत मी चौथा राऊंड पूर्ण केला.
माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. समजा मी तिचे मन मोकळे व्हायला मदत केली तर.. ? बरं होईल ना.. ? पण तिच्या एकांताला धक्का तर मी लावत नाही ना? माझ्यामुळे तिची प्रायव्हसी भंग झाली तर.. ? तर मग काय.. ! It’s none of your business / “इटस् नन ऑफ युवर बिझनेस”. असे म्हणेल. त्यात काय एवढं! पण समजा मी तिच्याशी काहीच संवाद न साधता इथून निघून गेले तर दिवसभर मला स्वतःला दोषी असल्यासारखे वाटेल. या सगळ्या द्वद्वांतून बाहेर पडून मी तिच्याजवळ गेले होते.
“Myself Dr. Soniya Kasture, if you don’t mind, you can share your problems with me, I think I can help you.
“हा मॅम, आईये, इधर बैठीये !” ती हिंदी बोलते हे ऐकून मला बरे वाटले.
“I am from sangli, मेरी बेटी यहाँ केईएम हाॅस्पीटल में एमबीबीएस करती है, दो दिन के लिए मैं यहाँ आयी हूॅं !” हे ऐकून ती चक्क मराठीत, मोकळ्या मनाने बोलू लागली.
ती साधारण पंचवीस, सव्वीस वर्षाची मुलगी, M. com करत होती. तिच्या relationship मध्ये अडचणी होत्या. हल्ली सकाळी प्रेम होते आणि संध्याकाळी म्हणा किंवा दोन चार दिवसात breakup होते. याला अनेक कारणे असतील पण असे आहे. हे ही समजून घ्यायला हवे. तर नवी पिढीला समजून घेणे शक्य होईल.
आईचे आणि तिचे अजिबात पटत नव्हते. तिच्या आईच्या बोलण्याचा, वागण्याचा तिला खूप त्रास होत होता. आईने गोड बोलावे, प्रेमाने जवळ घ्यावे. तिला काय हवे, काय नको हे समजून घ्यावे. खरे तर हे सगळ्याच पालकांचे हे कर्तव्य आहे. पण तिची इतकी अपेक्षा नव्हती. आईने तिला दुखवू नये. टाकून बोलू नये. अपमानास्पद वागणूक देऊ नये ही तिची अपेक्षा होती. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरुन आई तिला टोचून बोलत असते.
“अगदी साधं वारा यावा म्हणून खिडकी उघडली तरी मॅम, तिला प्रॉब्लेम असतो. मी काहीही करु दे, तिला त्या गोष्टीची अडचणच होते. तिला माझी कोणतीच गोष्ट आवडत नाही मॅम.” असे ती सांगत होती.
तिच्या भोवतालच्या परिस्थितीचा, तिच्या वाट्याला आलेल्या गोष्टींचा तिला त्रास होत असावा. ती जेवढे सांगते तेवढेच मी ऐकून घेतले. अशावेळी सल्ला न देता ऐकून घेणारे कुणीतरी हवे असे वाटत असते. मी खूप खोलात गेले नाही. तिला स्वतःला सावरण्यासाठी काही मूलभूत गोष्टी सांगितल्या.
“तू ज्या बागेत बसली आहेस ना, तिथे बघ किती सुंदर झाडी आहेत. फूलं आहेत. आजूबाजूला खूप कचरा आहे. घाण आहे. तरी ते आपलं फुलणं सोडत नाहीत. माणसानं असंच असायला हवं. तुझी सोबत तू स्वतः आहेस. पहिला स्वतःला समजून घे म्हणजे तुला तुझा भावनिक कल्लोळ सावरता येईल. तुझी आई सुद्धा विशिष्ट तणावाखाली असेल. म्हणून कदाचित अशी वागत असावी. दोघी एकमेकीशी एकदा शांत बसून, अतिशय मोकळ्या मनाने मनातलं बोलून बघा. यातून नक्की तुमच्या नात्यातली अडचण दूर होईल.”
मी सांगते ते तिला पटत होते हे तिच्या बोलण्यातून मला समजत होते. पण ती खूपच depression मध्ये दिसत होती. म्हणून तिला Psychiatrist ची मदत घ्यायला सांगितले. तिच्या मित्रमैत्रिणी पण दूरावल्या होत्या. ज्याला अडचण असते अशा व्यक्तीसोबत वेळ द्यायला हल्ली कुणाला नको असते. कारण प्रत्येकाला धावायचे आहे. काहीतरी गाठायचे आहे. प्रत्येकाला व्यक्तीगत स्वतःचे, आणि कुटुंबातील काही अडचणींना तोंड द्यावे लागत असते. शिवाय जिथे आईवडील वेळ देऊ शकत नाहीत तर दूसरे कोण वेळ काढणार ? शिवाय मनाने अडचणीत असणारी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असते. त्यामुळे सोबत असणाऱ्याचा हिरमोड होतो. अशावेळी सगळे सल्ला देवून कटवायला टपलेले असतात. अवस्था समजून घ्यावी, एवढे शहाणपण माणसांत अजून रुजले नाही. मन मोकळे करायला आपले ऐकून घेतले जाईन हा विश्वास वाटल्या शिवाय ते बोलत नाहीत. आपण सांगितल्याची मागे चर्चा होऊ नये असेही त्यांना वाटत असते. अशा साच्यात बसणारी मैत्री अद्वितीयच म्हणावी लागेल. पण काही मित्रमैत्रिणी खरेच खूप समजदार असतात. सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे बरोबर नाही. पण त्या अशा व्यक्तीच्या वाट्याला यावी लागतात.
तिने मला सांगितले की, KEM Hospital मध्ये आई सोबत एकदा ती गेली होती. तिला पाहताच क्षणी डाॅक्टरांनी त्ती sever depression मध्ये आहे असे जाणवते म्हणून काही Psychological टेस्ट करायला सांगितल्या. त्या लगेच तिथे केल्या गेल्या. पण नंतर आईला वेळ न मिळाल्याने ती तिला परत त्या college hospital मध्ये गेली नाही. आणि टेस्टचा रिझल्ट आणि ट्रीटमेंट चालू होऊ शकले नाही. जेव्हा माणूस मनाने विस्कटला असतो तेव्हा तो सकारात्मक विचार करु शकत नसतो. अशा परिस्थितीत पालकांनी गांभीर्याने घेऊन मुलांसाठी वेळ काढावा लागतो. पण पालकच मनाने विस्कटलेले असतील तर.. ! हा खूप मोठा विषय आहे.. असो.. तिला मी तिच्या कॉलेजच्या कौन्सिलरची मदत घेऊन स्वतःला एकटीला हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले.
“तू शिकली आहेस. शहाणी दिसतेस. तू अडचणीत आहेस हे तुला समजते तर आई तुझ्या सोबत येऊ शकत नसली तरी तू तुझी ट्रीटमेंट व्यवस्थित रित्या चालू ठेव. तू स्वतःच, स्वतःचा आधार हो. ” मी असे म्हणाल्यावर तिला बरे वाटले असेल. माझ्याच समोर तिने तिच्या कौन्सिलरला फोन केला. मला हायसे वाटले. आता मी तिथून जायला मोकळी झाले असे मला वाटले आणि मी “ Take care, All the best.. !” असे म्हणून निघाले..
तरुण वयातील मुलांच्या मनामध्ये खूप गोंधळ असतो. मनात अनेक विचार थैमान घालत असतात. त्यात मुलींच्या मनामध्ये तर अनेक असुरक्षिततेच्या भावना असतात. करियर संबंधिचा, रिलेशनशिपचा, मित्र-मैत्रिणीपासून बाजूला गेल्याचा गोंधळ. हातात पैसे नसतात. नोकरीच्या अनेक अडचणी असतात. काम मिळत नसते. स्वतःचे काही विचार ठाम होत असतात पण त्याचवेळी 24-25 वर्षे वय झाले तरी अजून पालकांच्या वर अवलंबून राहावे लागते, याची कुठेतरी खंत वाटत असते. तरुण मन म्हणजे जंगलातून चालताना वाट हरवलेल्या पण वाट शोधण्याचा प्रयत्न करणारी मनोवस्था असते असे म्हणायला हरकत नाही. यातून सगळेच कमी जास्त प्रमाणात जात असतात. प्रत्येकाला भावनिक समतोल साधता येईल असे नसते. आपण पालकही त्यातून गेलेलो असतो. विचार, भावना आणि वर्तन यांच्यातला समतोल खूप महत्त्वाचा.
इकडे 50-60 वय गाठलेले पालक मुलांच्या बाबतीतल्या एका कल्पनेत वावरत असतात. अमुक वय झाले की नोकरी, अमुक वय झाले की लग्न. अमुक वय झाले की मुलंबाळ. या पारंपारिक चक्राच्या पलीकडे मुलांची मानसिक अवस्था आहे हे कुठेतरी पालक म्हणून समजून घ्यायला हवे. त्यांना त्यांच्या विचारांनी जगू द्यावे. त्यांना समजून घेताना आपल्याला व्यक्त होण्यासाठी मिळालेल्या बोलणे या कौशल्याचा, भाषेचा योग्य उपयोग करावा. समजून सांगताना अशी भाषा वापरावी की त्यांना तो सल्ला किंवा उपदेश वाटू नये. काळ खूप वेगाने बदलत असतो. “आमच्यावेळी असं नव्हतं ! असं म्हणून तसा उपयोग होईल असे नाही. पालकांनी स्वतःच्या कष्टाची जाणीव मुलांना जरुर करुन द्यावी पण खूप सहजपणे. संवाद कसा साधावा ही पण एक कला आहे. प्रत्येक घर वेगळे प्रत्येक पालक वेगळे प्रत्येक मूल वेगळे. या वयातल्या पालकांना मात्र जुनी पिढी, नवी पिढी आणि स्वतःचे जगणे यांचा मेळ घालताना तारेवरची कसरत होणारच आहे. पण तरुणांना हे कळेलच असे नाही. हे समजून उमजून आरडा- ओरडा, आकांडतांडव न करता वाक्ये जपून वापरावीत. त्रागा न करता, आवाज न वाढवता संवाद साधला तर इतरांना इजा होणार नाही याची काळजी घेता येईल. सहज सुलभ संवादाने जाणिवा जाग्या करुन देता येऊ शकते. पैसा कमी जास्त असू शकेल पण प्रेम व्यक्त करता आले पाहिजे. ती नितांत गरज असते. आपलं मुलांच्यावर प्रेम आहे हे कृतीतून दाखवता आलं पाहिजे. अर्थात मुलांनीही पालकांना समजून घेणे आलेच. पण त्यांचे वय आणि अनुभव विचारात घेता, पालकांची भूमिका महत्त्वाची. शिवाय कुणी कुणाला गृहीत धरु नये ही हे आलेच. म्हणजेच संवाद किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजून येईल. ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ असे नेहमीच घडेल असे नाही.
माझी आजी म्हणायची समजा एका मळकट घाणेरड्या चिंधीत सोने बांधून टाकले तर आपण त्याला तुडवून पुढे जातो. पण त्याच चिंधींवर सोने पडलेले दिसले तर चिंधी बाजूला सारुन सोने हातात घेतो. ताणतणावाच्या ओझ्यात प्रेम बांधून ठेवू नका. प्रेम मनात ठेवण्या पेक्षा व्यक्त केले तर आनंद उत्साह निर्माण होईल. प्रेम व्यक्त करायला मोठमोठ्या भेट वस्तूची गरज असतेच असं नाही. दोन शब्द कौतुकाचे बोलून प्रेम व्यक्त करता येते.
आणखी एक गोष्ट आवर्जून लक्षात आली. घरात खूप कोंडल्यासारखे वाटल्यास माणसाला बाहेर जावेसे वाटते. तो रस्त्यावर फिरु शकतो. एकांतांत बसावेसे वाटले तर मग कुठे जाणार? अशा वेळी सार्वजनिक बागा बगिचे कामाला येतात. देऊळ, मंदिर, विहार, चर्च, नदीकाठ, समुद्रकिनारा या ठिकाणी माणूस जाऊ शकतो. पण मुलींसाठी ही ठिकाणं सुरक्षित असायला हवीत. ही काळजी सर्व स्तरावर, व्यवस्थेने आणि लोकांनी घ्यायला हवी.
(मृतदेहाचं डिसेक्शन करणे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गरजेचे असल्याने त्याची विटंबना होण्यासारखे काही नाही.) – इथून पुढे
खरं म्हणजे मृतदेह जाळून किंवा पुरून टाकणे किंवा कोणत्याही प्रकारे तो देह नष्ट करणे हीसुद्धा तसं पाहिलं तर त्या मृतदेहाची विटंबनाच आहे. मृत्यूनंतर देहाला तिरडीवर बांधणे त्याची मिरवणूक काढणे त्याला वेगवेगळे विधी करून हळूहळू जाळणे या सुद्धा खरं म्हणजे विटंबनाच आहेत की. मुख्यतः हे लक्षात घेतले पाहिजे की मृत्यूनंतर त्या देहाची कोणत्यातरी पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. हे सर्वांनाच मान्य आहे. देहदान ही सुद्धा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत नव्हे काय ? परंतु ती विल्हेवाट लावण्या अगोदर त्या मृतदेहाच्या डिसेक्शन मधून वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते. संशोधनाला चालना मिळते. ही सगळ्यात मोठी पुण्याचीच (यात ‘पुणे’ या शहराचा कांहीं संबंध नाही) गोष्ट आहे हे जाणून घेतले पाहिजे. सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जेव्हा मृतदेह डिसेक्शन साठी घेतला जातो त्यावेळेला डिसेक्शन सुरू करण्यापूर्वी सर्व विद्यार्थी त्या मृतदेहाला हात जोडून प्रार्थना करतात आणि आदर व सन्मान पूर्वक त्या मृतदेहाला म्हणतात की ‘तुमच्या या त्यागामुळे, दानामुळे आम्हाला ज्ञान मिळत आहे. आमचं शिक्षण पूर्ण होतं आहे, ही तुमची खूप मोठी कृपा आहे. त्याबाबत आम्ही आपले कृतज्ञ आहोत’ अशा प्रकारचा संदेश असणारी ही प्रार्थना असते. जगामध्ये बहुतेक सर्व वैद्यकीय महाविद्यालयात अशा प्रकारच्या विविध प्रार्थना करून मगच डिसेक्शन चालू केले जाते. त्यामुळे कुठल्याही तर्हेचा अनादर किंवा विटंबना त्या मृतदेहाची होत नाही. काही महाविद्यालयांमध्ये विशेषतः नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात वर्षातून एक दिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा करून त्यादिवशी देहदान करणाऱ्या कुटुंबियांचा कृतज्ञतापूर्वक आदरसत्कार आयोजित केला जातो त्यांनी केलेल्या या महान कृत्याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येतो.
याबाबतीत एक आगळे वेगळे व जगातले पहिले आणि आदर्श उदाहरण के.एल.ई. या संस्थेच्या बेळगाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये घडले आहे. त्याचा आदरपूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे असे मला वाटते. २०२० या वर्षी के.एल.ई. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. महांतेज यांनी स्वतः स्वतःच्या वडिलांचे शवविच्छेदन करून विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राची माहिती दिली. डॉ. महांतेज यांचे वडील डॉ. रामण्णावर यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होतीच, परंतु मृत्युपत्रात त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली होती की स्वतःच्या मुलाने त्यांचे शवविच्छेदन करावे. दोन वर्षांपूर्वी डॉ. रामण्णावर यांच्या निधनानंतर त्यांचे देहदान करण्यात आले होते. आणि यावर्षी त्यांचे चिरंजीव डॉ. महांतेज यांनी त्यांच्या देहाचे शवविच्छेदन करून विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राचे ज्ञान दिले. अशा तऱ्हेने त्यांनी वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली. हे जगाच्या इतिहासातील पहिले आणि सध्यातरी एकमेव उदाहरण आहे. डॉ. महांतेश आणि त्यांच्या वडिलांना आमचे शतशत नमन. आमचे भाग्य मोठे म्हणून चौथ्या पदयात्रेच्या शेवटी बेळगाव येथे के.एल.ई. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आमच्या पदयात्रेचा सांगता समारंभ बहारदार रीतीने साजरा झाला. यावेळी डॉ. महांतेश यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. धन्य ते वडील कै डॉ. रामण्णावर आणि धन्य त्यांचे पुत्र डॉ. महांतेश !
देहदानाच्या बाबतीत गैरसमजांना दूर ठेऊन तटस्थपणे आणि धीरोदात्तपणे देहदानाचा आग्रह धरणाऱ्यांपैकी आणखी एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय कै शंतनुराव किर्लोस्कर. त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केलीच होती, परंतु तसा विशेष आग्रहही धरला होता. जेव्हा त्यांनी देहदानाचा संकल्प जाहीर केला, तेव्हा त्यांचे एक स्नेही डॉ. गुजर यांनी तुम्ही देहदान करू नका असे पत्र त्यांना लिहिले होते. त्या पत्राला त्यांनी जे उत्तर दिले ते खरोखरच वाचण्यासारखे आहे म्हणून मुद्दामच मी खाली उद्धृत करीत आहे. विचार करा एक इंजिनियर एका डॉक्टरला हे पत्र लिहितोय लक्षपूर्वक वाचा…..
” प्रिय डॉ. गुजर,
आपले १९ जानेवारी १९९० चे पत्र मिळाले. आपण माझ्याबद्दल दाखविलेल्या आपलेपणासाठी मी आपला आभारी आहे. मागील ४० वर्षात माझ्यावर लहान-मोठ्या बारा ते चौदा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. प्रत्येक वेळी मला आधुनिक वैद्यकशास्त्राचा चमत्कार जाणवला आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डॉक्टरांशी अनौपचारिक चर्चा करत असताना, माझ्या असे लक्षात आले आहे की माझे देहदान हे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या संशोधनासाठी एक संशोधन प्रकल्प म्हणून उपयोगी पडू शकेल. इतक्या वर्षांमध्ये पार पडलेल्या शस्त्रक्रिया कशा झाल्या आणि त्यातून काही शिकण्यासारखे आहे काय यावरही काही संशोधन होऊ शकेल. वस्तुतः या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या एका विशिष्ट धमणी मधील रक्तावरोध सुरु होऊन त्यासाठी कराव्या लागलेल्या शस्त्रक्रियेने झाली. हे सर्व अचानक कसे घडले, कोणत्याही लक्षणां शिवाय कसे घडले, हे सर्वांनाच अनाकलनीय वाटते. कदाचित माझ्या मृत्यूमुळे वैद्यकीय संशोधकांना हे कसे घडले असावे त्याचा माग मिळू शकेल व त्यातून दुसऱ्या कुणाला ते होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय शोधून काढता येऊ शकतील.
“माझ्या देहाची राख होण्यापेक्षा माझ्या देहदानामुळे वैद्यकीय ज्ञानाच्या क्षेत्रात काही भर पडू शकत असेल तर ते नक्कीच जास्त श्रेयस्कर होईल असे माझे ठाम मत आहे”
… हे मूळ पत्र इंग्रजी भाषेत असून वरील मजकूर हा त्याचा मराठी अनुवाद आहे. परंतु एक इंजिनियर एका डॉक्टरला किती ठामपणाने कळवतो यावरून त्यांना देहदानाचे महत्त्व किती मनोमन पटले होते याची साक्ष पटते. देहदान किंवा अवयवदान याबाबत आपल्याला जे पटले आहे ते ठामपणे इतरांना आणि विशेषत: आपल्या कुटुंबियांना तेवढ्याच ठामपणे समजावून सांगता आले पाहिजे. त्यांची मानसिक तयारी करता आली पाहिजे. म्हणजे आपला संकल्प हा नुसता संकल्प न राहता मृत्यूनंतर त्याची अंमलबजावणी होण्याची निश्चिती होते. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री कै. ज्योती बसू व सुप्रसिद्ध साहित्यिक आदरणीय कै विंदा करंदीकर हे सुद्धा असेच देहदान या गोष्टीबाबत आग्रही असत. त्यांचेही मृत्यूनंतर देहदान झाले आहे.
देहदानाच्या बाबतीत कोकणा मधील आमच्या एका कार्यकर्त्याचा अनुभव सांगण्यासारखा आहे. आमच्या पदयात्रेच्या दरम्यान एकदा सभेमध्ये चर्चा करत असता त्या कार्यकर्त्याने हा अनुभव सांगितला. त्याच्या वडिलांनी मृत्यूनंतर त्यांचे देहदान झालेच पाहिजे असे त्याला निक्षून सांगितले होते. त्यांनी देहदानाचा फॉर्मही भरला होताच. पण मुलाला आवर्जून याबद्दल जाणीव करून दिली होती. देहदान नेहमी मेडिकल कॉलेजमध्येच म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालयामध्येच करावयाचे असते. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत देह मेडिकल कॉलेजमध्ये नेऊन द्यावा लागतो. त्यामुळे देहदान करायचे असल्यास बाहेरगावाहून येणाऱ्या कोणत्याही नातेवाईकांची वाट पाहणे शक्य नसते. या मुलाने वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब शववाहिकेची व्यवस्था केली. त्यांच्या गावापासून जवळचे मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे होते आणि कोल्हापूरला जाण्यासाठी किमान तीन ते चार तासाचा अवधी लागणार होता. कुणालाही कल्पना न देता त्याने शववाहिकेमध्ये वडिलांचे शव ठेवले आणि कोल्हापूरच्या दिशेने निघाला. जाण्यापूर्वी त्याने मृतदेहाचा फोटो मोबाईल वर घेतला आणि सगळ्या नातेवाईकांना संदेश पाठवला “वडिलांचे निधन अमुक अमुक वाजता येथे झाले आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यासाठी मी कोल्हापूर येथे घेऊन चाललो आहे. आपल्यासाठी प्रत्यक्ष देहदर्शन शक्य होणार नाही. परंतु मृतदेहाच्या दर्शनाची सोय मी आपल्याला व्हाट्सअप च्या माध्यमातून करून देत आहे. घर बसल्या मृतदेहाचे दर्शन घेऊन वडीलांसाठी प्रार्थना करावी, आणि इकडे येण्याची धावपळ करू नये ही विनंती.” अशा तऱ्हेने सोशल मीडियाचा एक चांगला वापर करून नातेवाईकांची इच्छा आणि वडिलांची इच्छा या दोन्हीचा मान राखत देहदानाची पूर्तता केली. त्या तरुणाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. आजच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये अशा चांगल्या कल्पना येतात त्या कल्पनांना माझा सलाम !
मृत्यूनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या काही पद्धती आहेत. आनंदवनामध्ये आदरणीय बाबा आमटे यांनी प्रचलित करून ठेवली आहे ती पद्धत जास्त पर्यावरण स्नेही आणि सर्वोत्कृष्ट आहे असे मला वाटते. त्या ठिकाणी जमिनीत खोल खड्डा खणून मृतदेहाला केळीच्या पानामध्ये गुंडाळून तो मृतदेह खड्ड्यांमध्ये पुरला जातो. त्या मृतदेहाच्या खाली आणि आजूबाजूला मीठ टाकले जाते आणि नंतर तो खड्डा बुजवून त्यावर एक वृक्ष लावला जातो. ही माझ्या मध्ये सगळ्यात उत्कृष्ट देहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत आहे. लिंगायत समाजामध्ये सुद्धा व्यक्तीच्या मृत्यूनंतर व्यक्तीला जमिनीत पुरण्याची पद्धत आहे. व्यक्तीच्या देहाची माती होऊन जाण्याची प्रक्रिया व त्या मातीवर एखादा वृक्ष जगवणे ही पर्यावरणपूरक पद्धत ही जगात सगळीकडे असावी असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात आपल्या देशामध्ये याबाबतीत बदल होणे अशक्यच. अनेक धर्म, अनेक जीवनपद्धती अनेक प्रचलित समजुती यांचा पगडा आहेच. त्यातही समजा आनंदवनाच्या पद्धतीने मला माझ्या देहाची विल्हेवाट लावायची असली तरी ती होईल का ? प्रत्येक धर्माची वेगवेगळी दफनभूमी आहे. त्या दफनभूमी मध्ये दुसर्या धर्माच्या व्यक्तिचा देह नेला जाऊ शकत नाही. भविष्यात माझ्या मृत्यूनंतर तशी वेळ आलीच तर मला दफनभूमी मिळू शकणार नाही. कारण हिंदूंमध्ये दहनाची पद्धत असल्यामुळे हिंदूंसाठी दफनभूमी नाही. कोणत्याही शहरामध्ये अजून निधर्मी अथवा सर्वधर्मी सर्वसमावेशक दफनभूमी निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे याबाबत सरकार दरबारी समविचारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वाटते. मृत्यूनंतर आपल्या देहाचे काय व्हावे याबाबत, तसेच मृत्युपूर्वीही आपल्या देहावर वेळप्रसंगी उपचार कशा पद्धतीने व्हावेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून वैद्यकीय इच्छापत्र करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न काही सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. अजून त्याला कायदेशीर मान्यता नाही. पण याबाबतीत कायदेशीर मान्यतेचा लढा लढण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीने देहदान अवयवदान या बाबतही जर स्वतःचे खुले वैद्यकीय इच्छापत्र बनवले असेल, त्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीला त्याबाबतचे अधिकार दिले असतील, तर त्याची अंमलबजावणी कायदेशीररित्या झाली पाहिजे. त्याच्या कुटुंबीयांच्या इच्छेपेक्षा त्या व्यक्तीची मृत्यूपूर्वीची इच्छा ही सगळ्यात महत्त्वाची मानली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे मृत्युपत्राने स्वतःच्या संपत्तीचे वाटप व्यक्तीला करता येते आणि त्या पद्धतीने ते होणे ही कायदेशीर जबाबदारी असते. त्याचप्रमाणे शरीरसंपत्ती बाबत सुद्धा वैद्यकीय इच्छापत्र मान्य करून त्याप्रमाणे इतर कोणाच्याही इच्छेचा विचार न करता अंमलबजावणी करता आली पाहिजे. अशा पद्धतीने कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करावयाचे आहेत.
आमच्या सोसायटीत यंदा हनुमान जयंतीचा उत्सव करायचा ठरला. बर्याच दिवसात सार्वजनिक कार्यक्रम सोसायटीत झाला नव्हता, हे एक कारण आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी रविवार होता. लहान-थोर सार्यांनाच सुट्टी होती. बेत ठरला. प्लॅनिंग केलं गेलं. घरटी 25 रु. वर्गणी काढायचं ठरलं. पुरोहितांकडून मारूतीचा फोटो आणला. विधीवत पूजा झाली. गंध, फूल, धूप, दीप, अक्षता सगळं यथासांग पार पडलं. ‘भीमरूपी महारुद्रा… ‘आरती झाली. नारळ फुटले. सर्वांना प्रसाद म्हणून खोबर्याचे तुकडे दिले. दामले वाहिनींनी प्रसादासाठी खोबर्याच्या वड्या करून आणल्या होत्या. त्याही वाटल्या. त्यानंतर स्पर्धा सुरू झाल्या. सूर्य नमस्कार, मनाचे श्लोक, कथाकथन (यात मारुतीच्या किंवा समर्थ रामदास स्वामींच्या कथा सांगणे) इ. कार्यक्रम झाले. सारे वातावरण आनंद, उल्हास, चैतन्य यांनी भरून गेले.
कार्यक्रमात सहभागी होताना स्मृतीवरचा धुराळा उडून गेला आणि मन बालपणात, प्राथमिक शाळेत असतानाच्या काळात भटकू लागले. आमच्या शाळेतही हनुमान जयंतीचा उत्सव दणक्यात साजरा होई.
मी कॅम्प एजुकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. घरापासून शाळा दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर होती. सुरुवातीला माझे धाकटे मामा मला शाळेत पोचवायला येत. आम्ही त्यांना तात्या म्हणत असू. थोड्या दिवसांनी मी एकटी जाऊ-येऊ लागले. तशी आमची शाळा तळा-गाळातली म्हणता येईल अशी होती. पहिली ते चौथी चार वर्ग. प्रत्येकी एक तुकडी. लहानशीच इमारत.
दर शनिवारी शाळा सकाळची असे. शेवटच्या तासाला प्रत्येक वर्गात मारुतीच्या फोटोची पूजा केली जाई. उदबत्ती लावली जाई. फुले वाहिली जात. नारळ फोडला जाई. मग प्रसाद म्हणून खोबर्याचे तुकडे वाटले जात. आपल्याला मोठा तुकडा मिळावा, म्हणून सगळे टपून असत. यासाठी दोन पैसे वर्गणी घेतली जाई. त्यात सगळे बसे.
घरातून निघताना मात्र मी वर्गणीसाठी एक आणा घ्यायची. दोन पैसे वर्गणी. दोन पैसे माझ्याकडे उरत. शाळा सुटली आणि शाळेच्या बाहेर पडले की उजवीकडे पंचवीस-तीस पावलांवर एक चौक लागे. डावीकडे वळले की घरी जायचा रस्ता. सरळ गेले की म. गांधी रोड लागे. तिथून चाळीस – पन्नास पावले चालले की उजवीकडे एक आईस फॅक्टरी होती. एक लालबुंद, गोरे, गोल-मटोल पारशी गृहस्थ त्या फॅक्टरीचे मालक होते. तिथे दोन पैशाला आईसफ्रूट मिळे. आम्ही मैत्रिणी तो घेऊन तिथेच पायरीवर चोखत राहू. मग अबाउट टर्न आणि उजवीकडे वळून घराच्या रस्त्याला. अशी चंगळं मी पहिली ते चौथी चार वर्षे केली.
क्वचित कधी तरी घरात एक आणा गवसे. त्या दिवशी मधल्या सुट्टीत एक आण्याचा दुधाचा आईसफ्रूट ‘काय मस्ताय ना!’ असे म्हणत म्हणत चव घेत घेत तो चोखायचा.
आमच्या शाळेसमोर, गोळ्या, शेंगा, पेरू, चिंचा, आवळे असा माकडमेवा काही काही बायका विकायला बसत. माझ्या मैत्रिणी काही-बाही घेत. मग सगळ्या मिळून शेअर करून खात असू. माझ्याकडे पैसे नसत. घरी मागायची हिंमत होत नसे. त्यामुळे मैत्रिणींकडून फक्त घ्यायचं, द्यायचं काहीच नाही, याची फार खंत वाटायची.
यथावकाश वर्ष संपलं. परीक्षा झाली. आम्ही दुसरीत गेलो. माझे मोठे मामा कॅम्प एजुकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत मुखाध्यापक होते. आम्ही त्यांना आण्णा म्हणत असू. तेच माझे पालकही होते. त्यामुळे मला नादारी होती. तरीही चार आणे फी द्यावी लागे.
मी दुसरीत गेले, तेव्हा माझ्या धाकट्या मामांना, तात्यांना वाटलं की मी वरच्या इयत्तेत गेले, म्हणजे माझी फीदेखील एक आण्याने वाढली असणार, म्हणून त्यांनी मला फीचे पाच आणे दिले. प्रत्यक्षात बाईंनी फीचे चार आणेच घेतले. माझ्याकडे एक आणा उरला. त्या दिवशी मी एक आण्याच्या माशाच्या आकाराच्या भरपूर गोळ्या घेतल्या आणि मैत्रिणींमध्ये वाटल्या. मला त्यावेळी इतका आनंद झाला, काहीसा अभिमानही वाटला. मनात म्हंटलं, गेल्या वर्षीचं उट्टं काढलं. पण हा आनंद फक्त महिनाभरच टिकणार होता.
एक तारखेला प्रगती पुस्तक मिळालं. त्यावर पालकांची सही आणायची होती. मी दप्तरातून प्रगती पुस्तक काढून आण्णाना दिले. त्यांनी सही केली. प्रगती पुस्तकात फीचा कॉलम होता. त्यात चार आण्याची नोंद होती. तात्या म्हणाले, ‘मी तर तुला पाच आणे दिले होते. एक आणा कुठाय? ‘ मग मी प्रथम मोठ्याने गळा काढला. मग रडत रडतच सांगितले, ‘एक आण्याच्या गोळ्या घेऊन मैत्रिणींना वाटल्या.’ हेही संगितले की त्या अधून मधून काही बाही घेतात, बोरं,चिंचा ,शेंगा, गोळ्या…माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला त्यांना आत्तापर्यंत काहीच देता आलं नव्हतं म्हणून मी त्या दिवशी गोळ्या आणून वाटल्या.
मला वाटलं होतं, तसा त्या दिवशी आण्णाचा मार काही खावा लागला नाही. त्यांनी मला कधीच मारले नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, ‘ त्या दिवशीच घरी आल्यावर तसं सांगायला हवं होतंस! त्या दिवसापासून पुढे कायमच मी पैशाच्याबाबतीत अगदी चोख व्यवहार करू लागले. त्यानंतर आणखीही एक गोष्ट घडली. मला घरून गोळ्या, शेंगा, पेरू असं काही-बाही आणण्यासाठी अधून-मधून आणा- दोन आणे मिळू लागले.
सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
सकाळी सकाळी आस्था चॅनलवर प्राणायाम पहात असताना छोटा चेतन म्हणाला “ आई आई त्या बाबांनी नाक मुठीत धरलय बघ.” तसे आई म्हणाली “ नाही बाळा ते प्राणायाम करताहेत.” पण एवढं साधं याला कळू नये का वाटून त्याच्या काकूने नाक मुरडले .तिकडे दुर्लक्ष केलेल्या चेतनचे प्रश्न चालूच झाले. ते नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडत आहेत पाहून त्याने पुन्हा विचारले “ आई तू म्हणतेस ते नाक दाबले की तोंड उघडते ते हेच का? .. नाहीतर असं तरं नाही नाक धरी तो पाद करी ••• म्हणजे या बाबांनी••••• “
आईने आलेले हसू आवरले. म्हणाली “ नाही रे बाळा नाक दाबणे हा येथे एक प्रकारचा व्यायाम आहे. “
तोपर्यंत बाबांनी साष्टांग नमस्कार घातला तर चेतन म्हणाला “ यांनी नाक रगडले का? “
या बाबांची मुद्दामच टर उडवली असे वाटून काकूबाईंच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. आपल्या मुलाला एकदा या काकूंनी पण नावे ठेवली होती आठवून म्हटल्याच काकूबाई .. “ बघा काय आपलं पोरं दिवे लावतय ते••• हंऽऽ याला म्हणतात आपण हसे लोकाला अन शेंबूड आपल्या नाकाला. “ आता कस्स नाकं कापलं मनात म्हणत असतानाच या बाईसाहेबांनीही नाक फुगवल. नाकाचा शेंडा लाल झाला. नाकावरचा राग स्पष्ट झाला.
तिने पण चढवला आवाज आणि म्हणाली, “ उगाच नाकाने कांदे सोलू नकोस हं. कशाला आमच्या मायलेकरां मधे नाक खुपसतेस गं? एरवी नाकावरची माशी उठत नाही . आणि आता नाक उडवून माझ्या लहान लेकराला नावं ठेवतेस होय? हंऽऽ नकटी लावी नाक अन् नाकवालीला लावती धाक••• “
“ ए••• तोंड आवर बरका••• तुझं तरी नाक न्हायी जाग्यावं अन् नखरा तिच्या बिघ्यावं••• एरवी नाका समोर चालणारी तू अनं आज काय असा हडळीचा अवतार घेतीयस आं••••”
दोघींचा असा अवतार बघून सासूबाई आल्या, आणि म्हणाल्या, “ कशाला एकमेकींपुढे नाक खाजवताय गं? असं म्हणतात नाकातली नथ लावते तोंडाला कुलूप पण इथे तर नाकापेक्षा मोतीच जड व्हायला लागलाय की••• “
झालं आता सासूबाईंच्या नाकात कोण वेसण घालणार ? दोघी नाक वेंगाडून बसल्या फुरंगटून .
सासूबाई म्हटल्या “ अगं तुमच्या दोघींची भाडणं सोडवायला माझ्या नाकी नऊ येतं गं . नका उगाच भांडू . दोघींना बोलून आपटलं तरी पडूनही नाक वरच असतय सारखं. अगं बायांनो संसाराच्या प्रवाहात नाका तोंडात पाणी जायची वेळ आणू नका••• अगं बायांनो लेक असती नाकाचा शेंडा अन सून पाठीवरला गोंडा तुम्ही माझे दोन दोन गोंडे आहात गं जरा गोंडस रहायला शिका.”
सासूबाईंचे बोल ऐकून नाकातून पाणी गळायला लागले. डोळ्यातूनही वहायला लागले. नाईलाजाने दोघीही आपापल्या खोलीत निघून गेल्या. सासूबाईंनी उगाच नाकपुड्या फुगवून दीर्घ श्वास घेतला•••
हल्ली आपल्या आजूबाजूला सध्या बर्याच ठिकाणी जुन्या चाळी, जुन्या को- आँप. सोसायट्या रिडेवलपमेंटला जाऊन नवीन नवीन टॉवर होताना दिसताहेत. नुकतीच कानावर अशीच बातमी आमच्या मागच्या ३५ ते ४० वर्षांपूर्वीच्या सोसायटीबद्दल पण ऐकीवात आली. आज दुपारी सहजच खिडकीजवळ उभी राहून पाऊस बघताना ही गोष्ट मनात आली. म्हटले, ” अरे, हो खरच की ! आता या सोसायटीतील लोक पण इथून वेगवेगळ्या ठिकाणी पांगतील. एवढे वर्ष त्यांना पाहत असताना काही चेहर्याने, तर काही आणखीन जास्त परिचित होते. सहजच एका घराकडे लक्ष वेधले गेले. आताशा ते घर मुकं झाल्यासारखे वाटत होते. त्या घरात एक १७-१८ वर्षांची मुलगी पाहिल्याचे आठवले. शाळकरी असताना वडीलांचा हात पकडून जाताना तिला बरेच वेळा पाहिले होते. त्यानंतरसुद्धा तिला अधूनमधून मैत्रिणींच्या घोळक्यात पाहिल्याचे आठवते. शैशवावस्थेतून यौवनावस्थेत शिरताना तिच्यात पण खूप बदल झालेला दिसला होता. हळूहळू त्या खिडकीखाली उभे राहून तिला हाका मारणारे आवाज थांबत चालले होते. वाढदिवसाला ऐकू येणारा तो मुलांचा कलकलाट पण थांबलेला दिसत होता. वाढदिवसाच्या छोटेखानी पार्ट्यांना पूर्णविराम मिळाला होता.
एक सळसळतं जिवंतपण आटत होतं हे ध्यानातच येत नव्हतं. बर्याच वर्षांचा काळ मागे पडला असावा. नंतर जाऊन कळले की त्या मुलीचे लग्न पण झाले. आता तर त्या खिडकीत शांतता जाणवत होती. तिच्या जाण्याने जणू ते घर एक बडबड आणि एक उत्साह हरवून बसले होते.
दिवसाच्या प्रकाशात ते थोडं हर्षभरीत जाणवत असलं तरी पण नंतर सहजच दिवेलागणीच्या वेळेस त्याकडे लक्ष गेले असता दिव्यांच्या कृत्रिम झगमगाटात ते हरवल्याप्रमाणे वाटत होते. पुढे जाऊन टाॅवरमध्ये नवीन रुपडे लाभले तरी त्याचे ते हरवलेपण त्याला गवसेल का ? हा प्रश्न शेवटी मनामध्ये अनुत्तरीतच राहीला.
विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा – हाच या दिवाळीचा सांगावा.
हजारो वर्षापासून मेंदूवर चढलेली अज्ञानाची काजळी खरडून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला
त्यांनाच या अंधाऱ्या संस्कृतीने संपवून टाकले आहे. त्यांनी दिलेला विचार गिळंकृत करून
समाजाला मोडून-तोडून सांगितला जात आहे. विज्ञान तंत्रज्ञानात जगाने अभूतपूर्व मुसंडी मारलेली असताना
भारतात आताच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धर्मग्रंथांची पाने चाळली जात आहेत.
डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग या सगळ्यांना वेड्यांच्या पंक्तीत बसविण्याची सत्तेला घाई झाली आहे. शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे सोवळे परिधान करून मंदिरात घंटा बडवत बसले आहेत.
राफेल सारख्या अत्याधुनिक फायटर विमानांवर निंबू-मिरची उतरवल्या जात आहेत. गाय, गोमुत्र आणि गोपालनाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे….. अशा काळात अज्ञानाची काजळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना शत्रुस्थानी मानले जावून नवे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत.
विवेकाचा एक मंद दीप घेवून मूठभर व्यक्ती चार्वाकाच्या काळापासून चालत आहेत, पण त्यांना ध्येय गाठता आले नाही. कारण अविवेक आजही प्रभावीच आहे… परंतु विवेकाने पराभव अजून पत्करला नाही.
☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
(बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.) – इथून पुढे —-
तीन महिने होऊन गेले. वहिनीने एकही फोन केला नाही. माझं नाव काढलं तरी ती तिथून उठून जायची. तिचा राग शांत होण्याची लक्षणे दिसत नव्हती. आणि त्यातच आमच्या मोठ्या आत्तीच्या मुलीचे म्हणजे सोनालीचं लग्न ठरलं. वहिनीला घाबरून मी लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला. पण सोनालीने स्वतः फोन करून सांगितलं तू मला लग्नात हवा आहेस काहीही करून ये. मी ही मनात ठरवलं. काय व्हायचं ते होऊ दे. असं वहिनीपासून तोंड लपवून कुठवर राहायचं. एकदाच काय असेल ते होऊ दे राडा. जीव तर घेणार नाही ना ती. आणि मी लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट मंडपात हजर व्हायचं. लग्न करून तिथूनच माघारी यायचं असा निर्णय घेतला.
तो दिवस उगवला. मनात धाकधूक घेऊनच प्रवास केला. आज आपल्याला तुडवलं जाणार आहे. हे मनाशी पक्के ठरवूनच मी तिकीट काढलं होतं. मी विवाहस्थळी पोहचलो. लांब थांबून अंदाज घेतला. तोंडाला रुमाल बांधला होता. नवरदेवाला घोड्यावरून नाचवत मंडपात नेलं जात होतं. मंडप गच्च भरला होता. मी लांबून बघत होतो. आई, बहिणी अण्णा चुलते चुलत्या सगळ्याजणी दिसत होत्या. आणि माझी नजर शोधत होती ती फक्त सुनितावहिनीला. तिला पाहण्यासाठी. तिच्या जवळ जाऊन लहान लेकरू होऊन हट्ट करण्यासाठी कायम आसुसलेला मी. आज वहिनी नजरेला दिसूच नये असं वाटत होतं.
अक्षता वाटप सुरू झालं. नवरा आणि नवरीला आत कुठेतरी नटवत होते. मी तोंडाला रुमाल बांधूनच दबकत दबकत मंडपाजवळ गेलो. दोन्ही बाजूला खुर्च्या अगदी व्यवस्थित लावल्या होत्या. मंडप गच्च भरला होता. लग्नात सगळे नातेवाईक खूप दिवसांनी एकमेकांना भेटत असतात. सगळेजण गप्पा मारत बसले होते. मी आल्याचं कुणालाच कळलं नव्हतं. मी मागेच अक्षता हातात धरून उभा राहिलो. आणि तेवढ्यात माझी चुलत बहीण स्नेहा अचानक माझ्या जवळून जात असताना तिने मला ओळखलं. तिने माझ्या तोंडावरून रुमाल ओढला आणि जोरात ओरडली. “नितीनदादा आलाय इथं”. माझ्या पोटात कळ आली. पण मी पळून जायचं नाही असं ठरवूनच आलो होतो. आणि स्नेहल पळतच ‘आला आला आला ‘ असं करत धावत नवरीच्या रूमकडे गेली.
सुनितावहिनी सोनालीला म्हणजे त्या नवरीला तयार करत होती. आणि तिच्याजवळ ही बातमी गेलीच. “एका दमात सात आठ जणींनी तिला सांगितलं “आलाय बघ तुझा नितीनभावजी” वहिनीने सगळं हातातलं काम सोडलं. ती त्याच वेगाने तिथून बाहेर आली. इतर सगळ्या बायका तिच्या मागे. आणि ती माझ्या नजरेसमोर दिसू लागली. दोघी तिघी जणींनी तिला धरायचा प्रयत्न केला. लग्नात भांडू नकोस म्हणून समजावू लागल्या तशी वहिनी जोरात ओरडली “जे कुणी मध्ये येतील त्यांनाही मी सोडणार नाही. ” तिचा तो अवतार पाहून सगळेजण जागेवर शांत उभे राहिले. साउंड सिस्टम बंद झाली. तसं सगळयांना माहीत होतच मी वहिनीसोबत काय केलेल होतं ते. त्यामुळे मला धडा मिळायला हवा अशी तमाम लोकांची इच्छा होतीच. पण यात गंमत अशी झाली होती. जे नवऱ्याकडचे नवे वऱ्हाडी पाहुणे होते त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं. ते माझ्याकडे एखादा पाकीटमार असल्यागत एकटक बघत होते.
दोन्ही बाजूला लोक उभे होते. मी या टोकाला तर वहिनी त्या टोकावरून चालत यायला लागली. तिची एकटक रागीट नजर माझ्यावर रोखलेली. माझ्या पोटात कळ दाटून येत होती. समोरून वहिनी नाही तर तीन महिन्यांपासून आपली बरी न झालेली जखम सांभाळणारी जखमी वाघीणच येत होती. असंच मला वाटत होतं. वहिनी अगदी जवळ आली. मी मान खाली घातली तशी वहिनीने उजव्या हाताने माझ्या डाव्या गालावर खनकन मुस्काडीत वढली. तिच्या हातातल्या दोन तीन बांगड्या फुटून खाली पडल्या. परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या गालावर वढली. तेव्हाही बांगड्या फुटल्या. मी अडवायला हात वरती केला तर हातावर तिच्या मनगटाचा मोठा दणका बसला. आणि एका बांगडीची काच माझ्या हातात घुसली. एक तुकडा तिच्या मनगटात रुतला. वहिनीने जोरात हाणायला सुरवात केली. मी शांत उभा होतो. समोरचं काहीच दिसत नव्हतं. डोळ्यावर अंधारी यायला लागली. वहिनीने वेग वाढवला. मला वेदना सहन होत नव्हत्या. मी खाली बसलो. कपाळाच्या डाव्या बाजूला वर एक काच घुसली होती. तिथून रक्त येत होतं. डोळा मोठा झाला होता. ओठांवर काही दणके बसले होते त्यामुळे दात ओठात रुतल्यामुळे तिथून ही रक्त येत होतं. वहिनीचा राग शांत होत नव्हता. मी खाली बसलो. तर बाजूची खुर्ची तिने उचलली आणि मला मारण्यासाठी दोन्ही हाताने वर उचलली. पण काय झालं कुणास ठाऊक. तिने खुर्ची बाजूला जोरात आपटली. तिचे दोन्ही पाय तुटले.
अण्णा जवळ आले. “वहिनीला म्हणाले आता बास झालं. जा तू आत. “वहिनी शांत झाली आणि आत निघून गेली. मी तसाच तिथंच बाजूच्या खुर्चीत बसून राहिलो. सगळेजण माझ्याकडे केविलवाणे बघत होते. लग्नात आलेल्या नव्या पोरी बघण्याची लै हौस असायची मला. पण आज मानच वर होत नव्हती.
त्याच अवस्थेत अक्षता टाकल्या. सोनालीचं लग्न झालं. आणि सगळेजण जेवायला गर्दी करू लागले. मला भूक लागली होती. पण कोणत्या तोंडाने जेवायचं हेच कळत नव्हतं. नवऱ्याला आणि नवरीला भेटून जावं म्हणून स्टेजवर गेलो तर सगळेजण बाजूला झाले. सोनालीजवळ जाऊन फक्त दहा सेकंद उभा राहिलो. कुणीच माझ्याशी बोललं नाही. आई आणि अण्णा जवळ आले. आई म्हणाली “जेवण करून घे चल. “मी हुंदके देत मान हलवली. आणि मी पुण्याला चाललोय परत असं म्हणून तिथून काढता पाय घेतला. पावलं टाकत मंडपाच्या बाहेर आलो.
जेवढी मस्करी वहिनीची केली होती त्याहून जास्त अपमान झाला होता. पण वहिनीला एका शब्दाने बोललो नाही. तिने एका खोलीत नेऊन हवं तेवढं मारलं असतं तरी चाललं असतं. असं काहीतरी विचार करून मी रुमालाने तोंड पुसत होतो. जेवणाचा वास दरवळत होता. पण जेवायचं तरी कुठं आणि कसं?नकोच म्हटलं, बाहेर जाऊन खाऊ अस म्हणून निघायला लागलो.
तेवढ्यात सुनितावहिनीने मागून येऊन मानेवर अजून एक फटका हाणला. मी दात ओठ खात रागाने मागे बघितलं तर सुनितावहिनीचे दोन्ही डोळे गच्च भरले होते. माझे ही डोळे गच्च भरून आले. मी हात जोडले आणि म्हणलं “वहिनी माफ कर. माझं चुकलं. अजून काय मारायचं बाकी राहिलं असेल तर सांग घे मार मला. सगळा राग शांत करून टाक”. वहिनी काहीच बोलली नाही. मी तसंच हात जोडून म्हणलं “निघतो वहिनी. एकाच दिवसाची सुट्टी काढून आलो होतो. उशीर होईल जायला गाडी मिळणार नाही” असं म्हणून निरोप घेऊन पाठ तिच्याकडे केली आणि चालायला लागलो तेवढ्यात, माझं मनगट वहिनीने हातात घट्ट धरलं आणि आणि हात जोरात मुरगाळात वहिनी म्हणली. “मला उपाशी ठेवून जाऊच कसं वाटतय भावजी तुम्हाला”. खळकन डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. मागे फिरलो, आणि वहिनीच्या गळ्यात पडलो. तिच्यापेक्षा माझी उंची वाढली होती. हुंदके बाहेर पडू लागले. वहिनीही रडू लागली. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
सुनितावहिनी पदराने माझं तोंड पुसत होती. आणि एका हाताने मला धरून जिकडे जेवणाची पंगत बसली होती तिकडे घेऊन चालली होती. आणि मला हळूच म्हणत होती “ओय भावजी ती बघा ती हिरव्या ड्रेसमध्ये जी उभी आहे ना ती लै तुमच्याकडे बघतेय बर का लावा जरा सेटिंग” मला हसूही येत होतं आणि रडूही येत होतं. आणि आमच्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उगवताना दिसत होतं.
वहिनीने एका ताटात वाढून घेतलं. दादा एका बाजूला आणि वहिनी एका बाजूला बसली दोघांच्या मध्ये मी. दादाने एक गुलाबजाम माझ्या तोंडात त्याने स्वतःच्या हाताने कोंबला. इकडून वहिनीने भाताचा घास माझ्या ओठाजवळ केला. आणि फोटू वाल्याला आमची सुनिता वहिनी म्हणत होती “अरे ये फोटूवाल्या काढ की आमचा बी एक फोटू”
कॅमेरावाल्याने क्लीक केलं आणि मंडपात गाणं वाजू लागलं.
“पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा
होम मिनिस्टर… होम मिनिस्टर.. होम मिनिस्टर
वहिनी बांदेकर पैठणी घेऊन आला.. ”
आणि डोळ्यातली आसवं पुसत पुसत सुनितावहिनी मला घास भरवू लागली.
अशा कित्येक सुनीतावहिनी प्रत्येकाच्या घरात आहेत. ज्यांच्यापर्यंत पैठणी पोहचलीच नाही. त्या वहिनीपर्यंत आमच्या नक्षीदार नात्याची पैठणी मात्र पोहचती करा.