गणपतीला शूर्पकर्ण का म्हणतात माहिती आहे का? तर त्याचे कान सूपासारखे आहेत म्हणून आणि डोळे का बरं बारीक? सगळं बारकाईने पहाता यावे म्हणून. माणसानेही नेहमी कमी बोलावं जास्त ऐकावं बारकाईने पहावं आणि सगळं डोक्यात ठेवावं. प्रवचन चालू होते आणि अचानक कानठळ्या बसणार्या आवाजाने तिकडे कान टवकारले गेले.
बाहेर येऊन पाहिले तर काय अंगणात एका मुलाने दुसर्याच्या कानाखाली आवाज काढला म्हणून दुसर्यानेही पहिल्याच्या कानशिलात वाजवली होती.
कारण काय जाणून घ्यायच्या आतच त्यांचा आवाज ऐकू येत होता.
रागाने कानातून धूर निघत होता. आणि पहिला विचारत होता या कानाचे त्या कानाला कळू न द्यायची गोष्ट कानोकानी खबर लागत दूरवर गेलीच कशी?
अरे भिंतीला कान असतात रे बाबा. तर तर म्हणे भिंतीला कान असतात तूच लावत असशील भिंतीला कान. त्यावर दुसर्याने कानावर हात ठेवले. * म्हणाला तुझेच कोणीतरी *कान फुंकलेले दिसताहेत. आता नीट कान देऊन म्हण किंवा कान उघडे ठेऊन ऐक •••
कितीही कानी कपाळी ओरडले तरी कानामागून यायचे आणि तिखट व्हायचे जगाचा नियमच आहे.
तेवढ्यात आई तेथे आली आणि म्हणाली माझ्या कानावर आले ते खरे आहे तर! तुमचे कान फुटले नाहीत हे मला माहित आहे. म्हणून दोघांचीही कानउघाडणी करणार आहे. काहीही झालं तरी मारामारीवर उतरायचं नाही. समजलं? वाईट सगळे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे असते हा कानमंत्र म्हणून काळजावर कोरायचा असतो. हे कान पिरगळून सांगितले. परत मारामारी केली तर कान लांब करीन बरका म्हणून धमकी दिली. शिक्षा म्हणून कान धरायला सांगितले. आईनेच कान टोचलेले दोघांच्याही ध्यानात रहाणार होते.
शेवटी आई ती आईच! ती कान उपटू शकते, कानाखाली जाळही काढू शकते आणि कानात तेलही घालू शकते हे मुलांना कळल्यामुळे मुलांनी लगेच कान धरून माफी मागितली आणि त्यांचे परत सुत जुळले.
मिरची म्हटलं म्हणजे ठसकाच लागतो नाही का! एकेकाळी झणझणीत तिखटाला चटावलेली माझी जीभ आता या वयात मात्र नुसत्या मिरचीच्या दर्शनाने देखील होरपळून निघते. माझ्या पानापासून मिरचीने दूरच रहावे अशी मी मनोमन प्रार्थना करत असतो इतकं आता माझं आणि मिरचीचं वैर झाले आहे.
तरीही या मिरचीनेच नुकतेच माझ्यावर थोर उपकार केले, अगदी इंग्रजीत म्हणतात तसे ब्लेसिंग इन डिसगाईज!
माझ्या पानातला एवढा मोठा मिरचीचा तुकडा मला दिसला नाही हे बघताच माझा मुलगा तडक मला नेत्रविशारदाकडे घेऊन गेला. तेथे माझ्या नेत्रपटलात काही तरी गडबड झाल्याचा संशय आल्याने नेत्रपटलाची सखोल तपासणी करण्यासाठी माझूया डोळ्यात औषध घालून मला डोळे बंद करून बसविले होते.
डोळे बंद करताच संपूर्ण जग पापण्यांच्या पलिकडे गेल्यावर मात्र माझ्या मस्तकात विचारांचे मोहोळ उठले. एक डोळा तर नेत्रपटल फाटल्याने फारसे काहीच काम करू शकत नव्हता. गेली पंधरा-सोळा वर्षे मी या एकाच डोळ्याने सगळे करत होतो. हळूहळू मी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झालो होतो. तथापि माझे साहित्यिक लिखाण एका डोळ्याच्या आधारावर चालू होते. आता याही डोळ्याची दृष्टी अधू झाली तर मी लिहायचे कसे; शब्ददेवतेची आराधना करायची कशी? विलक्षण कासावीस झालो मी!
आणि माझ्या मनात शब्ददेवतेला उद्देशून काही विचार येऊ लागले. त्यांना मूर्तस्वरूप द्यायला मी डॉक्टर कडे कागद मागितला. त्यांना वाटले मला डोळे टिपायला कागद हवा आहे. मात्र मी माझा हेतू सांगताच त्यांनी मला डोळे उघडता येणार नाहीत याची आठवण करून दिली.
अन् मी तशाच बंद डोळ्यांनी शब्ददेवतेला उद्देशून काव्य रचून कागदावर लिहिले. ते तुमच्यासाठी सादर करीत आहे.
मंडळी लेखाचं शीर्षक परत एकदा नीट वाचा ! ते “तोंडी लावणं” असं आहे, “तोंडी लागणं” असं नाही, हे कृपया ध्यानात घेऊन पुढे वाचा, लेख पूर्ण वाचणार असलात तर, 😅 म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही ! “तोंडी लागणं” हा दुसऱ्या स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो, हे आपण सूज्ञ असल्यामुळे, कोणाच्याही तोंडाला न लागता, नक्कीच मान्य कराल. तर त्या “तोंडी लागण्यावर” पुन्हा कधीतरी, पण ते सुद्धा आपण तशी इच्छा प्रकट केली तरच, बरं का ! 😅 नाहीतर मला स्वतःला कोणाच्या(ही) तोंडाला स्वतःहून लागायची सवय अजिबातच नाही, याची खात्री असू दे ! असो !
“चल रे, पटापट पोळी खाऊन घे ! शाळेत जायला आधीच उशीर झालाय. ” आईच असं फर्मान आल्यावर, “तोंडी लावायला काय आहे गं ?” असा प्रश्न लहानपणी आपल्या तोंडून निघाल्याचे, माझ्या पिढीतील लोकांना नक्की आठवेल ! त्यावर “भाजी अजून शिजत्ये, तुला गूळ तूप देवू का ?” असं म्हणून आई गरम गरम पोळीवर लोणकढ तूप घालून, वर गुळाचा चुरा घालत असे !
आमच्या काळी “तोंडी लावण्याचे” सतराशे साठ वेगवेगळे प्रकार होते आणि त्यातला एक जरी प्रकार जेवतांना असला म्हणजे झालं, त्यावर आमचं अख्ख जेवण होतं असे! नुसत्या मेतकूटात दही घाला, लसणीच्या तिखटात दही घाला नाहीतर तिळकुटावर तेल घ्या, “तोंडी लावणं” तयार ! आणि सोबत जर भाजलेला, तळलेला नाही बरं, पोह्याचा किंवा उडदाचा पापड असेल तर काय, सोन्याहून पिवळं! मग त्या दिवशी दोन घास जास्तच जायचे ! कधीतरी नुसतं गावच्या कुळथाच पिठलं पण जेवणाची बहार उडवून जायचं ! जेवतांना तांदूळ किंवा बाजरीची भाकरी असेल तर त्याच्या बरोबर कांदा ठेचून, कापून नाही आणि नाका डोळ्यातून पाणी आणणारी फोडणीची मिरची असली की काम तमाम. त्यातून ती मिरची गेल्या वर्षीची चांगली मुरलेली असेल, तर मग त्या मिरचीतली चढलेली मोहरी त्याचा अनोखा स्वाद, डोळ्यातून पाणी आणि तिचा ठसका दाखवल्याशिवाय रहात नसे ! अचानक रात्री अपरात्री कोणी पाहुणा आला आणि तो जेवायचा असेल, तर आईचा दहा मिनिटात मस्त पिठलं आणि भात तयार ! पाहुणा पण पिठलं भात खाऊन वर मस्त ताक पिऊन खूष व्हायचा ! पिकलेलं मोठ केळ आणि गरम पोळी यांची चव, ज्यांनी हा प्रकार खाल्ला आहे त्यांनाच कळेल ! इतकंच कशाला, गरमा गरम पोळी बरोबर वर म्हटल्या प्रमाणे तूप गूळ किंवा तूप साखर म्हणजे जणू स्वर्ग सुख ! सासुरवाडी गेल्यावर खाल्लेली सासूबाईंच्या हातची दारातल्या टाकळ्याची किंवा शेगटाच्या पाल्याची पौष्टिक भाजी, यांची चव अजून जिभेवर आहे मंडळी ! कधीतरी गावच्या आमसुलाच, नारळाच्या दुधात बनवलेलं सार किंवा रात्रीच्या ताकाची मस्त गरमा गरम कढी, आहाहा ! आणि जर त्या कढीत भजी असतील, तर मग काय विचारायलाच नको ! त्या काळी नुसती मुळ्याची, गाजरची किंवा काकडी टोमॅटोची कोशिंबीर सुद्धा जेवणाची खुमारी वाढवत असे !
तर हा “तोंडी लावणं” काय प्रकार आहे, हे माझ्या पिढीतील लोकांना माहित असला आणि त्यांनी तो माझ्या प्रमाणे चाखला असला, तरी आताच्या नवीन पिढीला हे पचनी पडायला थोडं जडच ! त्यांच्या भाषेत या “तोंडी लावण्याला” हल्ली “साईड डिश” का असंच काहीतरी म्हणतात म्हणे ! त्यात पुन्हा काहींचे चोचले असतातच. म्हणजे पोळी बरोबर एकच सुख्खी भाजी चालत नाही त्यांना, दुसरी कुठली तरी एक रस्सा भाजी लागतेच लागते ! आणि आपण जर म्हटलं, “की अरे आमटी आहे ना, मग ती खा की पोळी बरोबर. ” त्यावर वरकरणी हसत “अहो आमटी भातावर घेईन की” असं उलट आपल्यालाच ऐकायला लागतं !
पण आता, गेले ते दिन गेले, असं म्हटल्या शिवाय माझ्या समोर काहीच पर्याय नाही मंडळी ! आता कसं आहे ना, बेचाळीस वर्ष सुखाचा संसार करून सुद्धा, स्वतःच्या बायकोला, आज आमटी किंवा भाजी बिघडली हे सांगण्याचं धारिष्टय होतं नाही माझं ! 😞 तुमची पण कमी जास्त प्रमाणात हीच अवस्था असणार, पण आपण ती कबूल करणार नाही, याची मला खात्री आहे ! पण ते आपल्या बायकोला आडवळणाने कसं सांगायचं, याच माझं एक गुपित आज मी तमाम नवरे मंडळींच्या फायद्यासाठी उघड करत आहे, ते लक्ष देऊन वाचा आणि वेळ आली की त्याचा उपयोग जरूर करा, हा माझा सगळ्या नवरे मंडळींना मित्रत्वाचा सल्ला ! 🙏
आज काल पुण्या मुंबईत बारा महिने चकली किंवा कडबोळी उपलब्ध असतात. हल्ली या पदार्थांचा दिवाळी ते पुढची दिवाळी हा अज्ञातवास आता संपला आहे ! 😅 त्यामुळे आपल्या आवडत्या दुकानातून, पुण्यात असाल तर कुठून हे सांगायची गरज नाही 😅 पण मुंबईकर आणि त्यात दादरकर असाल तर खूपच चांगले ऑपशन्स तुम्हांला available आहेत ! तर अशा एखाद्या आपल्या आवडत्या दुकानातून, एक एक चकली आणि कडबोळीचे पॅकेट घरी आणून ठेवा. ज्या दिवशी आमटी किंवा भाजी थोडी बिघडली आहे, असं जेंव्हा आपल्याला वाटेल तेंव्हा, “अगं, परवा मी ते चकलीच पाकीट आणलं आहे बघ, त्यातल्या दोन चकल्या दे जरा” असं अत्यन्त नम्रपणे बायकोला सांगावं ! आणि ती चकली किंवा कडबोळी भातात आमटी किंवा भाजी बरोबर खुशाल चूरडून खावी ! मंडळी मी छातीठोकपणे तुम्हांला सांगतो, त्या दिवशी भाजी किंवा आमटी बिघडली आहे हे आपण विसरून जाल आणि दोन घास जास्त खाऊन मला मनोमन धन्यवाद द्याल, याची मला 100% खात्री आहे ! 😅
शेवटी, तुमच्या सगळ्यांवर आणि अर्थात माझ्यावर सुद्धा 😅 अशी स्वतःच्या बायकोकडे वारंवार, जेवतांना चकली किंवा कडबोळी मागण्याची वेळ येऊ देवू नकोस, हिच खऱ्या “अन्नपूर्णा देवीला” प्रार्थना !
ईश्वरदास मॅन्शन, बी ब्लॉक, पहिला मजला, नाना चौक, ग्रँट रोड, मुंबई.
हे माझे आजोळ.
वास्तविक आजोळ हा शब्द उच्चारला की नजरेसमोर येतं एक लहानसं, टुमदार. गाव. झुळझुळणारी नदी, दूरवर पसरलेले डोंगर, हिरवे माळरान, कौलारू, चौसोपी, ओसरी असलेलं घर. ओटीवरचा पितळी कड्यांचा, शिसवी पाटाचा झोपाळा, अंगणातलं पार असलेलं बकुळीचं किंवा छान सावली देणार झाड. सुट्टीत आजोळी जमलेली सारी नातवंडं. प्रचंड दंगामस्ती, सूर पारंब्यासारखे खेळ आणि स्वयंपाक घरात शिजणारा. सुगंधी पारंपारिक स्वयंपाक.
हो की नाही?
पण माझे आजोळ असे नव्हते. ते मुंबई सारख्या महानगरीत, धनवान लोकांच्या वस्तीत, अद्ययावत पारसी पद्धतीच्या सदनिका असलेल्या देखण्या प्रशस्त सहा मजली इमारतीत होतं. गुळगुळीत डांबरी रस्त्यांवर बसेस, काळ्या—पिवळ्या टॅक्स्या, ट्राम्स अविरत धावत असत. अंगण नव्हतं. सदनिकेच्या मागच्या बाजूला फरशी लावलेली मोकळी जागा होती. तिथेच काही आऊट हाऊसेस, आणि सदनिकेत राहणाऱ्या धनवान लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी गॅरेजेस होती.
त्या मोकळ्या जागेत ईश्वरदास मॅन्शन मधली मुलं मात्र थप्पा, आंधळी कोशिंबीर, डबा ऐसपैस, लगोरी, लंगडी, खो खो असे दमदार खेळ खेळत. यात काही मराठी मुलं होती पण बरीचशी मारवाडी आणि गुजराथी होती. ही सारी मुलं मुंबईसारख्या महानगरीत शहरी वातावरणात वाढत होती. विचार करा. त्यावेळी ही मुलं सेंट. कोलंबस अथवा डॉन बॉस्को सारख्या इंग्रजी माध्यम असलेल्या नामांकित शाळेत शिकत होती. फाडफाड इंग्लिशमध्ये. बोलायचे सारे.
मी ठाण्याची. माझा घरचा. पत्ता – – धोबी आळी, शा. मा. रोड, टेंभी नाका ठाणे.
पत्त्यावरूनच कुटुंब ओळखावे. साधे, बाळबोध पण साहित्यिक वातावरणात वाढत असलेली, नगरपालिकेच्या बारा नंबर शाळेत, मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेली मी. सुट्टीत आईबरोबर आईच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे त्यांच्या पाश्चिमात्य थाटाच्या घरी जायला आम्ही उत्सुक असायचो.
माझ्या आजोळीच्या आठवणी वयाच्या पाच सहा वर्षापासूनच्या अजून पक्क्या आहेत. आजोळ. म्हणजे आजी आजोबांचं घर. आजीचा सहवास फार लाभला नाही. तरीही कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी, कानात हिऱ्याच्या कुड्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र मिरवणारी, इंदुरी काठ पदराची साडी नेसणारी, प्रसन्नमुखी. मम्मी अंधुक आठवते. ती मला “बाबुराव” म्हणायची तेही आठवतं. पण ती लवकर गेली.
वयाच्या पस्तीस—चाळीस. वर्षांपर्यंत म्हणजे आजोबा असेपर्यंत मी आजोळी जात होते. खूप आठवणी आहेत. माझ्या आठवणीतलं आजोळ, खरं सांगू का? दोन भागात विभागलेलं. आहे. बाळपणीचं आजोळ आणि नंतर मोठी झाल्यावरचं, जाणतेपणातलं आजोळ.
वार्षिक परीक्षा संपली की निकाल लागेपर्यंत आई आम्हाला आजोबांकडे घेऊन जायची. मी, माझ्या बहिणी आणि आई. वडील आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसला सोडायचे. आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक. तेव्हा व्हीटी म्हणून प्रसिद्ध होतं. ठाणा स्टेशन ते व्हीटी हा प्रवासही मजेदार असायचा. व्हीटीला उतरलं. की सारा भव्यपणा सुरू व्हायचा. समोर महानगरपालिकेची इमारत. तिथे आम्हाला घ्यायला आलेली आजोबांची मरून कलरची, रुबाबदार रोव्हर गाडी उभी असायची. पण त्यापूर्वीचा, व्हीटीला उतरल्यावर पप्पांच्या आग्रहास्तव प्राशन केलेल्या थंडगार नीराप्राशनाचा अनुभवही. फारच आनंददायी असायचा.
आजोबांकडे मावशी आणि माझी मावस भावंडंही आलेली असायची, रंजन, अशोक, अतुल आणि संध्या. संध्या मात्र जन्मल्यापासून आजी-आजोबांजवळच राहायची. सेंट कोलंबस मधली विद्यार्थिनी म्हणून तिच्याबद्दल मला खूपच आकर्षण होतं. आम्ही सुट्टीत तिथे गेलो की तिलाही खूप आनंद व्हायचा. महिनाभर एकत्र राहायचं, खेळायचं, उंडरायचं, खायचं, मज्जा करायची. धम्माल!
धमाल तर होतीच. पण?. हा पण जरा मोठा होता बरं का. माझे आजोबा गोरेपान, उंचताड, सडसडीत बांध्याचे. अतिशय शिस्तप्रिय. बँक ऑफ इंडियात. ते मोठ्या हुद्द्यावर होते. त्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. ब्रिटिशकालीन शिस्तीत त्यावेळी कार्यालयीन कामं चालत. आणि त्या संस्कृतीत माझ्या आजोबांची कर्मचारी म्हणून जडणघडण झाली होती. त्यांची राहणी, आचार विचार सारेच पाश्चिमात्य पद्धतीचे. होते. त्यावेळी आजोबांकडे वेस्टर्न टॉयलेट्स, बॉम्बे पाईप गॅस, टेलिफोन, फ्रिज वगैरे होते. घर म्हणाल तर अत्यंत टापटीप, स्वच्छ. फर्निचरवर धुळीचा कण दिसणार नाही. दिवाणखान्यात सुंदर काश्मिरी गालिचा अंथरलेला, वॉशबेसीनवरचा. पांढरा स्वच्छ नॅपकिन टोकाला टोक जुळवून टांगलेला. निरनिराळ्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटात. सुरेख रचून ठेवलेल्या जगभरातल्या अनेक वस्तू. खिडक्यादारांना सुंदर पडदे, शयनगृहात गादीवर अंथरलेल्या विनासुरकुतीच्या स्वच्छ चादरी आणि असं बरंच काही. असं माझं आजोळ. सुंदरच होतं.
आता आठवत नाही पण आम्ही इतके सगळे जमल्यावरही आजोबांचं घर विस्कटायचं नाही का?
आम्ही कुणीच नसताना आणि आजी गेल्यानंतर त्या घरात आजोबा आणि त्यांची. निराधार बहीण म्हणजे आईची आत्या असे दोघेच राहायचे.. आत्याही तशीच शिस्तकठोर आणि टापटीपीची पण अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. आम्ही सारी भावंडं जमलो की तिलाही आनंद व्हायचा. सखाराम नावाचा एक रामागडी होता. दिवसभर तो आजोबा— आत्या साठी त्यांच्या शिस्तीत राबायचा. आमच्या येण्याने. त्यालाही खूप आनंद व्हायचा. तो आम्हा बहिणींसाठी गुलाबाची आणि चाफ्याची फुले आणायचा.
आजोबा सकाळी दहा वाजता बँकेत जायचे. रामजी नावाचा ड्रायव्हर होता तो त्यांची बॅग घ्यायला वर यायचा. आजोबा संध्याकाळी सात वाजता समुद्रावर फेरफटका मारून. घरी परतायचे. म्हणजे दहा ते सात हा संपूर्ण वेळ आम्हा मुलांचा. पत्ते, कॅरम! सागर गोटे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या एकी-बेकी सगळं असायचं. आत्या रागवायची पण आजोबांना.. ज्यांना आम्ही. भाई म्हणायचो, त्यांना जितके आम्ही घाबरायचो तितके तिला नव्हतो घाबरत. सात वाजेपर्यंत. विस्कटलेलं घर आम्ही अगदी युद्ध पातळीवर पुन्हा तसंच नीटनेटकं करून ठेवायचो.
एकदा एका. सुट्टीत मला आठवतंय, भाईंची शिवण्याची सुई माझ्या हातून तुटली. तुम्हाला खोटं वाटेल पण तीस वर्षं भाई ती सुई वापरत होते. पेन्सिल, सुई यासारख्या किरकोळ वस्तू सुद्धा त्यांना इकडच्या तिकडे झालेल्या, हरवलेल्या, मोडलेल्या चालत नसत. या पार्श्वभूमीवर सुई तुटण्याची ही बाब फार गंभीर होती. पण रंजनने खाली वाण्याकडे जाऊन एक तशीच सुई आणली आणि त्याच जागी ठेवून दिली. सात वाजता भाईंची दारावर बेल वाजली आणि माझ्याच काय सगळ्या भावंडांच्या छातीत धडधड सुरू झाली. जो तो एकेका कोपऱ्यात जाऊन वाचन नाही तर काही करण्याचं नाटक करत होता. सुदैवाने भाईंच्या लक्षात न आल्यामुळे ते सुई प्रकरण तसंच मिटलं पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते. आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.
इतके सगळे जरी असले ना तरी भाई आमचे. खूप लाड करायचे. शनिवारी— रविवारी दुपारी ते आमच्याबरोबर पत्ते खेळायचे. ‘झब्बु’ नावाचा खेळ आम्ही खेळायचो. त्यावेळी. भाई आम्हाला खूप विनोदी किस्से सांगायचे. आम्हाला चिडवायचे, आमच्याबरोबर मोठमोठ्याने हसायचे. संध्याकाळी आम्हाला चौपाटीवर फिरायला. घेऊन जायचे. बिर्ला क्रीडा केंद्रापासून थेट नरीमन पॉईंट पर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पायी चालत जायचो. त्या वेळच्या मुंबईच्या समुद्राचे सौंदर्य काय वर्णू? त्या फेसाळत्या. लाटा, तो थंडगार वारा, समोर. धनवानांच्या सुंदर इमारती, रोषणाई असलेली दुकाने आणि अतिशय वेगात चालणारी दिमाखदार वाहनं. आजोबां बरोबरचा हा समुद्रावरचा पायी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय असायचा. या पायी फिरण्याचा काळातही भाई आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. वेळेचे महत्व, बचतीचे महत्त्व, शिस्त स्वच्छता यांचं महत्त्व वगैरे अनेक विषयावर ते बोलायचे. त्यांची मुख्य तीन तत्त्वे होती. पहिलं तत्व डी टी ए. म्हणजे डोंट ट्रस्ट एनीबडी.
दुसरं— टाईम इज मनी.
आणि तिसरं— इफ यू सेव्ह अ पेनी पाऊंड विल सेव्ह यु.
समुद्रावरून फिरून आल्यानंतर आम्हाला ते कधी जयहिंदचा आईस्क्रीम नाहीतर शेट्टीची भेळपुरी खायला न्यायचे. आम्ही साऱ्या नातवंडांनी सुट्टीत त्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी असा भरपूर प्रवास केलाय. अनेक नाटकं, चित्रपट आम्ही सुट्टीमध्ये भाईंबरोबर पाहायचो. रात्री रेडिओ जवळ बसून एकत्र, आकाशवाणीवरून सादर होणारी नाटके, श्रुतिका ऐकायचो. फक्त एकच होतं या सगळ्या गंमतीच होत्या. तरीही यात भाईंची शिस्त आणि त्यांच्या आराखड्याप्रमाणे घडायला हवं असायचं. माझ्या बंडखोर मनाला ते जरा खटकायचं. मला वेगळंच आईस्क्रीम हवं असायचं. भाईंनी भेळपुरी मागवलेली असायची तर मला शेवपुरी खायची असायची. आता या आठवणी गंमतीच्या वाटतात.
मी कधी कधी आजोळी आले असताना पाठीमागच्या आवारात आऊट हाऊस मध्ये राहणाऱ्या नंदा नावाच्या मुलीशी खेळायला जायची. तिचं घर अंधारलेलं कोंदट होतं. घराच्या पुढच्या भागात तिच्या वडिलांचं पानबिडीचं दुकान होतं. विड्या त्यांच्या घरातच वळल्या. जात. त्यामुळे तिच्या घरात एक तंबाखूचा उग्र वास असायचा. पण तरीही मला तिच्याकडे खूप आवडायचं. तिथे मी आणि नंदा मुक्तपणे खेळायचो. कधीकधी तर मी तिच्याकडे जेवायची सुद्धा. आम्ही दोघी गवालिया टॅंक वर फिरायला जायचो. मी परवानगीशिवाय जायची. नंदाला मात्र परवानगीची गरज वाटायची नाही. तिच्या घरात कसं मुक्त वाटायचं मला आणि हो तिच्याबरोबर मी, ती मडक्यातल्या पाण्यात बुडवून दिलेली चटकदार पाणीपुरीही. खायची. माझ्यासाठी मात्र हा सारा चोरीचा मामला असायचा पण माझ्या आजोळच्या वास्तव्यातला तो माझा खरा आनंदही असायचा. तिथेच दुसऱ्या आऊट हाऊस मध्ये. गुरखा राहायचा. त्याची घुंगट घातलेली बायको मला फार आवडायची. ती, माझे आणि नंदाचे खूप लाड करायची. तिच्या हातचे पराठे आणि लिंबाचं लोणचं! आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटतं.
पाठीमागच्या आवारात अनेक कामं चालायची. पापड वाळवणे, उखळीत लाल मिरच्यांचे तिखट कुटणे, धान्य वाळवणे, निवडणे वगैरे. ही सारी कामं.. सदनिकेतल्या लोकांचीच असायची पण ती करून देणारी. . आदिवासी माणसं. असायची आणि त्यातही बायाच. असायच्या. त्यांचं. वागणं, बोलणं, काम करताना गाणं, त्यांनी घातलेले दागिने, कपडे यांचं. मला फार अप्रूप वाटायचं. माझी त्यांच्याशी मैत्री व्हायची. अद्ययावत संस्कृतीतून बाहेर येऊन या लोकांच्यात मी. रमायची. माझी भावंडं मला चिडवायची. पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही.
शाळेच्या अंतीम परिक्षेच्या निकालाच्या दोन दिवस आधी आम्ही भाईंना निरोप देऊन ठाण्याला परतायचचो. तेव्हा कळत नव्हतं आईच्या डोळ्यातल्या अश्रूंचं नातं. भाईही पाणावायचे. एवढा पहाडासारखा माणूस हळवा व्हायचा. अजूनही सांगते, तेव्हा माझ्या मनात फक्त ठाण्याला, आपल्या घरी परतण्याच्या विचाराचा आनंद मनात असायचा. या वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ तेव्हा नाही कळायचा पण आता कळतो. आता त्या आठवणीनेही. माझे डोळे गळू लागतात. लहानपण आणि मोठेपण यात हेच अंतर असतं.
ठाण्याच्या घरी आजी उंबरठ्यावर वाट पाहत असायची, तिने आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या पसरवलेल्या असायच्या. मी घरात शिरल्याबरोबर आजीला मिठी मारायची आणि म्हणायची,
“ जीजी मला तुझ्या हातचा आक्खा आंबा खायचा आहे. ”
‘आक्खा आंबा’ ही. कल्पना खूप मजेदार आहे बरं का?
भाईंकडे असतानाही आम्ही खूप आंबे खाल्लेले असायचेच. पण खूप आणि मनमुराद. यात फरक आहे ना? तिथे आंबे व्यवस्थित कापून एकेकाला वाटले जायचे. म्हणून हे आक्खा आंबा खाण्याचे सुख काय होतं हे कसं सांगू तुम्हाला?
आणखी एक —घरी आल्यावर जाणवायचं!
”अरे! इथे तर कायम आजी आपल्या सोबतच असते. ” म्हणजे खरंतर आपलं हेच कायमचं आजोळ नाही का? पण एका आजोळा कडून दुसऱ्या भिन्न आजोळाकडे जाणाऱ्या प्रवासात मी जीवनातले विविध धडे शिकले. एक आजोळ मायेचं, उबदार. दुसरं शिस्तीचं, नियमांचं. या दोन भिन्न प्रकृतींनी माझं जीवन नेटकेपणानेच घडवलं. त्या आजोळाकडचे भाई खूप उशिरा कळले, उशिरा जाणवले.
आज पोस्टाच्या पाकिटावर व्यवस्थित पत्ता. लिहितानाही भाईंची आठवण येते. कपड्यांच्या घड्या घालताना भाईंची शिकवण आठवते. मी माणसांना चाचपडत असते तेव्हा आठवतं, भाई म्हणायचे, ” कुणाला घरात घेण्याच्या आधी त्याची परीक्षा घ्या. संपूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नका. ”
“वस्तूंच्या जागा बदलू नका” ही त्या आजोळची. शिकवण आयुष्यभर निरनिराळ्या. अर्थाने उपयोगी पडली. किती आणि काय काय लिहू? थांबते आता.
पण माझ्या आजोळी ज्यांनी माझी झोळी कधीच फाटू दिली नाही त्या सर्वांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक प्रणाम!
दावणीला बांधलेला बैल, जवा दावं तोडून, वारं भरल्यागत, गावातनं मोकाट पळत सुटतो, त्यावेळी शंभर जणांना धडका देत तो विध्वंसच घडवतो…!
या बैलाला वेळीच आवर घातला… चुचकारत योग्य दिशा दाखवली… चारापाणी घातला… याच्याशी प्रेमाने वागलं… की आपण म्हणू ते काम तो चुटकीसरशी करतो…!
मग ती शेतातली नांगरणी असो, पाणी शेंदणं असो, बैलगाडीला जुंपून घेणं असो किंवा आणखी काही…!
पाण्याचंही तसंच…
कशाही वाहणाऱ्या पाण्याला प्रेमानं थोपवून धरलं; की ह्येच पाणी भिंती आड गप गुमान धरण म्हणून हुबं ऱ्हातंय… प्रेमानं चुचकारून पायपात घातलं की घरात नळ म्हणून वाहतंय… पात्यावर गरागरा फिरून वीज बी तयार करतंय…
… इतक्या प्रेमाने पाण्याला सांगितल्यावर, हेच पाणी झुळू झुळू वाहत, शिट्टी वाजवत, मंग त्या मक्याला भेटायला जातंय… बोळक्या तोंडाची साळु आजी तोंडाला पदर लावून मंग आशीं हासती… अन डोळ्यात आस्तंय पाणी… हो पुन्हा पाणीच…!
…अस्ताव्यस्त वाहणाऱ्या या पाण्याला मात्र दिशा दाखवून, त्याचा योग्य वापर करून घेतला नाही; तर पूर ठरलेला… विध्वंस हा ठरलेलाच आहे…!
सांगायचा मुद्दा हा की मस्तावलेला बैल असो किंवा अस्ताव्यस्त वाहणारं पाणी…!
त्यांना आवरून – सावरून योग्य दिशा दाखवून, त्यांच्यातल्या जबरदस्त ताकदीचा उपयोग करून घेता यायला हवा…!
आमचा भिक्षेकरी – याचक समाज…. याचीही ताकद खूप जबरदस्त आहे…!
या सर्वांनी जर एकत्र येऊन ठरवलं… तर उभा डोंगर, ते आडवा करतील…!
बुलडोझर ला सुध्दा जे काम दोन दिवसांत जमणार नाही, ते काम हे लोक एकत्र आले तर दोन तासात करतील…!
गेल्या दहा वर्षापासून मी आणि मनीषा यांच्या या जबरदस्त ताकतीचा उपयोग विधायक कामांसाठी करुन घेत आहोत…! यांच्या ताकदीचा उपयोग;आम्ही यांच्याच विकासासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहोत…! पुण्यातील सार्वजनिक भाग, भीक मागणाऱ्या आज्या / मावश्या यांच्या टीममार्फत (खराटा पलटण – Community Cleanliness Team). स्वच्छ करून घेणे असो की,
वैद्यकीय दृष्टीने फिट असणाऱ्या भिक्षेकऱ्यांकडून रक्तदान करून घेणे असो….
… जे काही करतो आहोत; ते समाजानं यांना दिलेलं “दान” काही अंशी फेडण्यासाठी…
अर्थात् याचं श्रेय माझं किंवा डॉ मनीषाचं नाही… एकट्या दुकट्याचं कामच नव्हे हे… आपण सर्व साथीला आहात म्हणून हे शक्य होत आहे.
‘It’s not “Me”… It’s “We”… !!!’
तर, दान या शब्दावरून आठवलं, सध्या मतदानाचं वारं वाहत आहे…!
ज्यांना मतदानाचे अधिकार आहेत, असे अनेक सुजाण नागरिक मतदान करतच आहेत, मात्र काही लोक; मतदानादिवशी ऑफिसला / कामावर दिलेली सुट्टी हि vacation समजून, मतदान न करता फिरायला जातात.
काही लोक जरा गर्दी कमी हुदे… थोडं ऊन कमी होऊ दे… म्हणत म्हणत मतदान करायचंच विसरून जातात…!
अशा लोकांचं प्रबोधन कसे करता येईल ? असा विचार मनात आला आणि मला माझ्या मागे उभ्या असलेल्या ताकदीची आठवण झाली…!
तर, आज शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणी आमच्या किमान 100 याचकांना एकत्र केलं आणि “चला आपण सर्वजण मतदान करूया” अशा अर्थाचे. हातात बोर्ड दिले…!
… भिक्षेकर्यांना आम्ही रस्त्यात आणि चौका – चौकात हे बोर्ड घेऊन उभं केलं…
आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही मतदानाचं महत्त्व आणि मतदान करण्याची विनंती समाजाला केली…!
सांगतंय कोण…? अडाणी भिक्षेकरी…!
ऐकणार का…? सुशिक्षित गावकरी…??
असो; आम्ही प्रयत्न करतोय… बैलाला आवरण्याचा आणि पाण्याला सावरण्याचा…!
यात अंध अपंग वृद्ध याचक या सर्वांनी सहभाग घेतला… मी या सर्वांचा ऋणी आहे !!!
मला माहित आहे, आमच्या या उपक्रमामुळे एका रात्रीत फार काही दिवे पेटणार नाहीत… पण एखादी पणती लावायला काय हरकत आहे ?
बघू… जे सुचेल ते आपल्या सर्वांच्या साथीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतोय…
☆ असा डोसा नेहमी मिळो… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“मयुरेश, तू जिंकलास. आम्हीं हरलो. त्यामुळं, म्हणशील तेव्हा आणि म्हणशील तिथं डोसा खायला जाऊया. ”
आज सकाळी आठ वाजता फोन आला अन् मी मनापासून हसलो. बायकोनं चेहऱ्यावर नुसतंच प्रश्नचिन्ह आणलं. “तोच ठरलेला फोन. पण आज मी जिंकलो. ते हरले. ” मी हसत हसत म्हटलं.
“अन् ते कसं काय? ”
“देवाची कृपा.. ” असं म्हणून सकाळी मी त्या विषयाला पूर्णविराम दिला.
त्याचं असं आहे की, रोज सकाळी मी चालायला जातो. तेव्हां अनेक परिचित माणसं भेटत असतात. मौन व्रतात चालायचं असल्यामुळं तेव्हां बोलणं होत नाही, पण नंतर चहा घेताना थोड्या गप्पा होतात. जवळपास सगळेच माझ्या वयाच्या दुप्पट किंवा त्याहूनही ज्येष्ठ असतील. रोज “बिनसाखरेचा चहा दे रे” असं ठासून सांगून त्या चहावाल्याकडून दीड चमचा साखर एकस्ट्रा घेणारी महामिश्कील मंडळी सगळी.. तो सकाळचा पहिला चहा फार भारी असतो.
अशीच ती १४ ऑगस्टची सकाळ.. एक काका त्या दिवशी जरा गरम होते. ‘घरातली नातवंडं किंवा मोठी माणसं सुद्धा हातातला स्मार्टफोन सोडतच नाहीत. त्या फोन पुढं त्यांना कुणाचीच किंमत नाही. घरी आल्या-गेल्यांशी चार गोड शब्द सुद्धा ते बोलत नाहीत. ‘ अशी त्यांची तक्रार… “अरे, घरातल्या घरात सुद्धा मेसेज पाठवतात. ” ते रागावून म्हणाले. अशा वेळी आपण काहीही न बोलता नुसतं शांत बसायचं असतं, हे मला चांगलं ठाऊक आहे.
“काल मला माझ्या नातीनं तिच्या खोलीतून मेसेज पाठवला. जेवायला कधी बसायचं म्हणून.. ही कुठली पद्धत? ” ते म्हणाले.
“अरे, मला तर आज सकाळी घरातून बाहेर पडतानाच मेसेज आलाय – फिरून झाल्यावर घरी येताना बूट बाहेरच काढा. पावसामुळं भरपूर चिखल असतो. दारातून आत आणू नका. ” दुसरे एकजण म्हणाले.
“मग बरोबरच आहे ते. ” मी म्हटलं.
“अरे, निरोप बरोबरच आहे. पण तो प्रत्यक्ष द्यायला काय होतं? मुलगा डायनिंग टेबलाशी चहा घेत बसला होता. त्यानंच पाठवला मेसेज. ” ते काका खरोखर चिडलेले होते.
आजकाल हे सगळं नित्याचंच झालंय. साधनं इतकी उदंड झाली की, त्यात संवादच आटला. आता बऱ्यापैकी उरलीय ती औपचारिकता. ‘तुमच्या वेळेला तुम्ही वागलात. आता आमची वेळ आहे. ‘ असं जाणवून देण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे. त्यामुळं, घराच्या उंबरठ्याच्या आत निराळेच प्रश्न उभे राहतायत आणि त्याची रामबाण उत्तरं सध्यातरी उपलब्ध नाहीयत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वाढतायत, त्याचं एक कारण हेच आहे की, ‘त्यांची उपयुक्तता संपली आहे’ असं इतरांना वाटतं आणि त्यांना स्वतःलाही वाटतं.
पन्नास-साठ वर्षं आयुष्य जगलेली माणसं खरोखरच अशी निरुपयोगी होऊ शकतात का? हा खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित नव्याने पैसे कमावण्यासाठीची त्यांची क्षमता उतरणीला लागलेली असेलही, पण तेवढ्या एकाच गोष्टीवर माणसांच्या आयुष्याची उपयुक्तता ठरवता येत नाही. अर्थार्जन करण्याची क्षमता कमी झाली असली तरीही ते निर्धन झालेले नसतात, हेही पक्कं लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यांचा अनुभव, त्यांची जीवनशैली, त्यांचं ज्ञान सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नक्कीच मौल्यवान ठरु शकेल आणि हे मुळीच नाकारता येणार नाही. म्हणूनच, “आता आम्ही अडगळ झालो, जुनं फर्निचर झालो, डस्टबिन झालो” असा समज करून घेण्याचं काहीच कारण नाही आणि गरजही नाही.
“काका, तुमच्या कुटुंबात मुलांनी, नातवंडांनी तुमच्याशी चांगलं वागावं, तुमच्याशी बोलावं असं तुम्हाला मनापासून वाटतं ना? ते शक्य आहे. पण थोडा प्रॉब्लेम आहे. ” मी हळूच माझं प्यादं पुढं सरकवलं.
“मला खरंच वाटतं की, घरातल्यांनी थोडा तरी वेळ आम्हाला दिला पाहिजे. पण कुणाकडेच आमच्यासाठी वेळ नसतो. उलट सगळेच म्हणतात, ‘आम्हीं खूप बिझी आहोत. ‘ आता काय करायचं? ”
“तुमची कष्ट घ्यायची तयारी असेल तर प्लॅन सांगतो. रिझल्ट १००% मिळेल. पण तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर मी सांगेन तिथं पार्टी द्यावी लागेल. मान्य आहे का? ” मी म्हटलं.
सगळे तयार झाले आणि आम्ही प्लॅन ठरवला. १५ ऑगस्ट पासून सुरुवात झाली. प्रत्येकानं एकेक काम वाटून घेतलेलं होतं. फुलवाती तुपात भिजवून त्याचे मोल्ड्स तयार करणं, ‘संपूर्ण चातुर्मास’ मधून निवडक सात आरत्या काढून त्या टाईप करुन घेणं, माळावस्त्रं कशी तयार करतात हे शिकणं, फुलांची तोरणं आणि गजरे करायचा सराव करणं अशा छोट्या छोट्या कृती घरी सुरु झाल्या.
तीन चार दिवसांतच घरात हे सगळं शांतपणे, एकाग्रचित्तानं सुरु असलेलं बघून नातवंडांचे प्रश्न सुरु झाले. “ह्याला काय म्हणतात? हे कसं करायचं? का करायचं? त्याचा उपयोग काय? हे विकत मिळत असताना आपण घरी का करायचं? ” अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. पण कसलीही लेक्चरबाजी न करता, ‘आमच्यावेळी अमुक होतं – तमुक होतं’ असा सूर कटाक्षानं न लावता, त्यांना समजावून सांगायचं आणि त्यांना दररोज थोडावेळ तरी सहभागी करुन घ्यायचं असं आमचं ठरलं होतं. मग आमच्या योजनेत काही आज्या सुद्धा सामील झाल्या. खोबरं किसायला शिकवणं, तांदळाची पारी करायला शिकवणं, पंचखाद्याची तयारी, रांगोळीत काढायची शुभचिन्हं शिकवणं असा एक आणखी नवा योग जुळला.
आजी-आजोबा आणि नातवंडं अशी हळूहळू एक टीम झाली. रोज शाळा-कॉलेज मधून आलं की, एखादा तासभर गणपतीची तयारी सुरू झाली. शिकताना मजा यायला लागली. शिकता शिकता भरपूर गप्पा सुरु झाल्या. कुठलाही प्रश्न आला आणि त्याचं मुलांना पटेल असं उत्तर आपल्याला ठाऊक नसेल तर प्रश्न टाळायचा नाही. “उद्या सांगतो” असं म्हणायचं आणि तो प्रश्न मला पाठवायचा असं ठरलं होतं. त्यानुसार रोज प्रश्न यायचे. मी उत्तरं पाठवायचो. मग दुसऱ्या दिवशी मुलांचं शंकानिरसन..!
कासवगतीनं का होईना पण एक बदल घडत होता. मुलं घरी आल्यावर त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन बसायची, ते कमी झालं होतं. बाहेर हॉलमध्ये बसल्यावर किंवा जेवताना सुद्धा त्यांच्या हातांना चिकटलेले मोबाईल फोन आता थोडावेळ तरी सुटत होते. घरी आल्यावर ” काहीतरी खायला दे” असं म्हणून तडक आपल्या खोलीत निघून जाणारी मुलं आता “चला, आज काय करायचंय? ” असं विचारत होती. त्यांच्या खोल्यांची दारं पूर्वी सगळ्यांसाठी बंद असायची, ती आता उघडी राहायला लागली. आरास कशी करायची याचे प्लॅन्स नातवंडांच्या खोल्यांमध्ये बसून सुरु झाले. हे सगळं घडत होतं, ते नक्की सुखदच होतं. पण ते आळवावरचं पाणी ठरु नये, याचं मला टेन्शन होतं. त्यामुळं, रोज रात्री मी सगळ्यांच्या मेसेजेसची वाट बघत बसायचो.
बघता बघता गणपती आले. घरोघरी उत्सव साजरे व्हायला सुरुवात झाली. कुणाच्या घरी दीड दिवसांचा गणपती होता, तर कुणाकडं पाच दिवसांचा.. पण यावर्षी एक मोठ्ठा चमत्कार झाला, तो आरतीच्या वेळी.. घरातल्या नातवंडांच्या पाच आरत्या तोंडपाठ..! कुणीही हातात पुस्तक घेतलं नाही किंवा नुसत्याच टाळ्या वाजवत “जयदेव जयदेव” असं मोठमोठ्यानं म्हटलं नाही. मुलांनी नैवेद्याची पानं वाढली. अगदीं उजव्या-डाव्या बाजू परफेक्ट वाढल्या. बिल्डिंग मधल्या इतरांना घरी जाऊन दर्शनाला येण्याची निमंत्रणं दिली, तीही व्हॉट्स ॲप न वापरता.. ही मोठी गोष्ट होती. पंधरा दिवसांच्या एका पुढाकारानं घरातलं वातावरण बदललं, नाती घट्ट झाली.
मी आमच्या घरच्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं सोलापूरला होतो. त्यामुळं, या आनंदी उत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव मला घेता आला नाही. पण एक चांगला बदल या निमित्तानं घडल्याचा मला फार अभिमान वाटला.
लावलेली पैज मी जिंकलो होतो. पैज जिंकल्याचा आनंद तर आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त समाधान आहे ते दोन टोकं जुळवल्याचं. एक टोक “आम्ही आता निरुपयोगी” या मनस्थितीतलं, अन् दुसरं टोक “आमच्या हातात फोन, इंटरनेट आणि पैसा असला की आम्हाला कुणाची गरज नाही” या मनस्थितीतलं.. फार अवघड गोष्ट होती, देवाच्या कृपेनं ती साधली. “सत्यसंकल्पाचा दाता नारायण” असं म्हणतात, ते १००% खरं असल्याचा अनुभव मला आला.
आज रविवारी सकाळी फोन आला. उद्या डोसा खायला जायचंय..! उद्याचा डोसा माझ्या आयुष्यातला ‘द बेश्ट डोसा’ असेल…!
ए••• तुला आठवतं? आपण ३५ वर्षापूर्वी कसे चोरून एकमेकांना भेटायचो ते?
कसा विसरेन मी? आणि तुला आठवतं का गं असेच चोरून एका बागेत असताना आपल्याला आपल्याच बॉसने, आपल्या एका कलीगने बघितले ते?
होऽऽऽ आठवतय की. अगदी काल परवाच घडलेय असं वाटावं इतक्या ठळकपणे•••
आता हसू येतय सगळ्याचे. पण मग असे चोरून भेटायलाही नको आणि कोणी पाहिले म्हणून ओशाळायलाही नको म्हणून आपण आपल्या घरच्यांच्या संमतीनेच लग्न केले ना•••
घर दोघांचे आहे समजून त्यासाठी म्हणून तू नोकरी निमित्ताने बाहेर•••
मी पण तुला हातभार म्हणून घरी बसून तरी काय करायचे वाटून नोकरीसाठी बाहेर•••
संध्याकाळी कामाहून आले की दोघांचा मूड एकदम फ्रेश•••
मग संध्याकाळचा स्नॅक्स बाहेर कुठेतरी फिरताना•••
पण रात्रीचं जेवण तुला माझ्याहातचेच पाहिजे असायचे.
मग घरी येऊन त्या एका वातीच्या स्टोव्हवर संध्याकाळी दमून आलेले असतानाही हसत खेळत वेळेत होत असे.
कधी थोडी कुरबूर कधी रुसवा फुगवा तरी सगळे हवे हवेसे वाटणारे•••
आता संसार वेलीवरचे फूलही चांगले उमलले आहे बहरले आहे•••
पण••••
मी तीच आहे. तू तोच आहे••• मग आपल्यामधे तणाव का?
का छोट्या छोट्या गोष्टींमधूनही चिडचिड होते?
का आपण जरा फिरून येऊ म्हणताच त्यावेळी दोघांपैकी एकाला जमत नाही?
का काही चांगले करावे म्हटले तर नकार घंटा वाजते?
का मनासारखे काहीच घडत नाही वाटून मन मारून उगीच सहन करत रहायचे?
तरीही स्पष्टपणे बोलले तर उगाच राग येईल वाटून एकट्यानेच कुढत रहायचे?
काय बदललय? का बदललय? विचार केलायस कधी?
विचार करायला वेळच कुठे? या प्रश्नातूनही इतके वर्ष मला काहीच करायला वेळ मिळाला नाही हे दाखवून देणारा स्पष्टपणे जाणवणारा एक नापसंतीचा सूर•••
खरय••• एकाच घरासाठी काडीकाडी जमवताना आपण आत्मकेंद्रित कधी झालो हे कळलच नाही गं•••
मला त्रास नको म्हणून तू तर तुला त्रास नको म्हणून मी काही गोष्टी एकेकट्यानेच सहन केल्या ना?
तेथेच खरे तर आपण चुकलो. त्या सगळ्या क्षणातून आपल्यामधली आपलेपणाची विण सैल होऊन मी पणाची वीण घट्ट कधी झाली कळलेच नाही•••
मग तू तू मै मै आले आणि हळू हळू हे अंतर आपल्याही नकळत वाढले गं.
दोघांच्या आवडी निवडी एकत्र जपण्याऐवजी एकमेकांना सपोर्ट करण्यासाठीच कोणतीही आडकाठी न आणता वेगवेगळ्या जपल्या गेल्या ना••• तेव्हाच एकमेकांचा खोटा आधार आहे वाटून आपापले विश्व वेगळे निर्माण झाले गं•••
आता या दोन विश्वांना कसे एकत्र आणणार? संसाराचा रथ चांगला उभा राहिलेला लोकांना दिसतोय गं••• पण त्याचे दोन घोडे दोन विरुद्ध दिशेने धावू पहाताहेत म्हणून स्थीरच आहे ••• हे कोणाच्या लक्षातही येणार नाही इतके चांगले नाटक करणारे आपण अभिनेते पण झालो आहोत गं•••
खरचं काय बदललय? कसं बदललय हे सगळं?
आता तू रिटायर्ड झालास••• मग पुन्हा तुला ते दिवस खुणावू लागले••• मग थोडा कमीपणा घ्यायचा मोठेपणा सुचला••• मग पुन्हा एकमेकांची स्तुती आणि विरुद्ध दिशेने धावणारे घोडे एक होऊन मुलाच्या संसार रथासाठी सज्ज झाले.
काही स्मृती मनाच्या पाटीवर लिहिल्या जातात, पुसूनही जातात. काही कातळावरच्या शिलालेखाप्रमाणे कोरल्या जातात. एखाद्या वावटळीने त्या भूमिगत पाषाणावरची माती दूर होते आणि लख्ख दिसू लागते.
वीसपंचवीस वर्षांपूर्वीची अशीच एक गोष्ट ! सिंगापूरच्या ट्रिपमधल्या आमच्या लोकल बसमधला गाइड हिंदुस्तानी वंशाचा होता. त्याचे वाडवडील केरळमधले होते. सिंगापूरमध्ये स्थायिक झालेली ही त्यांची तिसरी पिढी.
उत्तम हिंदी- इंग्रजी बोलणाऱ्या या स्मार्ट अमीरशी आमची चांगली गट्टी जमली. लांबच्या रस्त्याने जाताना आम्हा पर्यटकांचे व त्याचे भरपूर सवालजवाब होत असत.
एकदा कुणीतरी आश्चर्य व्यक्त केले की रस्त्यांवर, चौकात, भर रहदारीच्या ठिकाणीही पोलीस कसे दिसत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर देताना अमीरने जी गोष्ट सांगितली त्याने बसमधले आम्ही सर्व भारतीय थरारून गेलो.
अमीर म्हणाला, “माझी बहीण माझ्या घरापासून साधारण चाळीस मिनिटाच्या रस्त्यावर राहाते. ती एका हॉस्पिटल मध्ये नर्स आहे. जेव्हा तिची नाईट ड्यूटी असते तेव्हा माझी आई तिच्या लहान मुलांसाठी रात्री तिच्या घरी जाऊन राहाते. आईचे आवडते टी.व्ही प्रोग्राम संपले की साधारण आठ वाजता ती आमच्या घरून निघते आणि चालत चालत बहिणीच्या घरी जाते. चालत जाण्याचाच तिचा परिपाठ आहे. या बाबतीत ती आमचे ऎकत नाही.
भारतीय स्त्रियांची दागिन्यांची असोशी तर तुम्हाला ठाऊकच आहे. आम्हा बायकांच्याकडे पाहून डोळे मिचकावत तो म्हणाला. माझ्या आईच्या अंगावर पाचसहा तोळे सोनं कायम असतं. पण ना ती बहिणीकडे गेल्यावर ‘पोहोचले हं’ म्हणून फोन करते आणि ना आम्ही ‘पोहोचलीस ना ग?’ असे विचारायला फोन करतो.”
आमच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून अमीर हसला आणि म्हणाला, “आम्ही तिला अशा वेळी एकटीला कसे पाठवतो? इतके निश्चिंत का असतो याचे कारण जाणून घ्यायचे आहे तुम्हाला?”
आमचा जोरदार होकार आल्यावर त्याने खूप वर्षांपूर्वीची एक घटना सांगायला सुरुवात केली.
“१९६५ साली सिंगापूर मलेशियापासून स्वतंत्र झाले. नवी घडी बसवायची सुरुवात झाली. साधारण तेव्हाची गोष्ट!
सिंगापूरमध्ये एकदा एका महिलेची एका बदचलन माणसाने छेड काढली. तिच्या जवळ येऊन काहीतरी चावट बोलला. तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने लगेचच वाटेवरच्या पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवली.
पोलिसांनी त्याला धरून चॊकीत आणले. खटला झाला. पंधरा दिवसातच शिक्षा जाहीर झाली. फक्त पंचवीस फटक्यांची ! तो गुंड चांगला उंचापुरा, धिप्पाड, बलदंड शरीराचा होता. शिक्षा ऎकून तो हसला. त्याला हजर केले गेले.
या शिक्षेसाठी एक विशेष, कुशल माणूस बोलावला गेला होता. त्याच्याकडे घोड्याच्या मूत्रात भिजवलेला पातळ फोक होता. त्याचे तांत्रिक कौशल्य असे होते की ज्या ठिकाणी पहिला फटका बसला असेल त्याच जागेवर तो नेमका पुढचा फटका मारीत असे.
तो बलदंड माणूस हसत हसत समोर उभा राहिला. आपल्या शक्तीवर त्याचा प्रचंड विश्वास होता. त्याची पँट काढली गेली आणि त्याच्या पुष्ट पृष्ठभागावर, सट्कन वेताचा एक फटका बसला. त्याला काही कळायच्या आतच नेमक्या त्याच जागेवर दुसरा फटका बसला. कातडे फाटून रक्त वाहू लागले आणि कळवळून तो राक्षसी शरीराचा माणूस धाडकन खाली कोसळला. तो किंचाळत होता. नो नो म्हणत होता.
फटके मारणारा थांबला. मलमपट्टी करून त्या गुन्हेगाराला घरी पाठवले गेले. पण जाताना सांगितले गेले की जखम भरली की पुन्हा चौकीत हजर व्हायचे. पंचवीस फटके पुरे होईपर्यंत त्याची शिक्षा पूर्ण होणार नव्हती.
या सर्व शिक्षाप्रक्रियेचा व्हीडिओ केला गेला. शहराच्या चौकाचौकात पडदे उभारून तो आठवडाभर जनतेला दाखवला गेला. भीती अत्तरापेक्षा वेगाने पसरते.”
अमीर पुढे म्हणाला की “पुढच्या शिक्षेचं काय झालं माहीत नाही. त्या माणसाचं काय झालं ते ही माहीत नाही पण त्याचा परिणाम काय झाला ते माहिती आहे. आमच्या स्त्रिया निर्धास्त झाल्या. माझ्या आईप्रमाणे कित्येक स्त्रिया आज रात्रीदेखील बिनधास्त फिरू शकतात. आपले कामधंदे निर्भयपणे करू शकतात.”
अमीरच्या बोलण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मला मायदेशातल्या एका कवीची कविता आठवली की, कोर्टाच्या पायरीवर बसलेल्या सत्तरपंचाहत्तर वर्षांच्या एका वृद्धेला विचारले जाते की तुम्ही इथे कशासाठी बसला आहात? तेव्हा आपले पांढरे केस सावरत ती कोरड्या डोळ्यांनी म्हणते की वयाच्या पंधराव्या वर्षी तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या खटल्याचा आज निकाल आहे.
खिडकीतून बाहेर बघत मी सुन्नपणे बसून राहिले. आमच्या प्रश्नाच्या मिळालेल्या उत्तराने मनात कितीतरी प्रश्नांचे मोहोळ उभे राहिले होते. आज त्यातल्या मधमाशा पुन्हा डंख मारू लागल्या आहेत.
लेखिका : सुश्री संजीवनी बोकील.
प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
त्यांचं नाव..’ पत्रास कारण की..’ अरविंद जगताप त्याचे लेखक आहेत.
झी मराठी वर ‘चला हवा येऊ द्या ‘ नावाचा कार्यक्रम असतो.एकदा अरविंद जगताप यांनी त्या कार्यक्रमात एक पत्र पाठवले.ते त्या कार्यक्रमात वाचून दाखवले. खूप जणांना ते आवडले.अजून एक पत्र लिहा असा त्यांना आग्रह झाला.आणि मग तो सिलसिला सुरू झाला.सागर कारंडे ती पत्र वाचून दाखवायचे. मुळात ती पत्र खूप संवेदनशील..भावनाप्रधान..त्यात सागर कारंडेच्या आवाजाने त्या शब्दांना गहिरा अर्थ प्राप्त व्हायचा.
खूप लोकांचा आग्रह झाला..या पत्रांचे पुस्तक प्रकाशित व्हावं. मग झी मराठीच्या सहकार्याने ग्रंथाली ने हे पुस्तक प्रकाशित केले.खूप विविध विषयांवर लिहीलेली पत्रे त्यात आहेत.
खरंतर पत्रलेखन ही एक कलाच आहे.पण हळूहळू आपण ती विसरत चाललो आहे.पत्र लिहिणं तर दूरच.. आपण लिहिणंच विसरत चाललो आहे.आता फक्त टायपिंग करणं हेच आपल्याला माहीत आहे.पत्र लिहीण्यात..ते पाठवण्यात आनंद तर होताच..पण पत्राची वाट पहाण्यात पण एक मोठा आनंद होता.आपल्या घरुन आलेली पत्र सीमेवर लढणाऱ्या जवानांना जगण्याचं बळ देत होती.गावाहुन आलेली पत्रे होस्टेलवर शिकणाऱ्या मुलांचा जगण्याचा आधार होती.पोस्टाच्या त्या लाल पेटीकडे बघुन एक वेगळी भावना मनात निर्माण व्हायची.
बहुतांश निरक्षरता असलेल्या गावांमध्ये पोस्टमन हाच एक जाणता माणूस असायचा. गावकऱ्यांकडे आलेली पत्र तोच उघडायचा..तोच वाचून दाखवायचा.घरातली माणसं तो काय वाचून दाखवतो.. त्याकडे कानात प्राण आणून बसायचे.पोस्टमन हा सगळ्यांच्या घरातलाच एक माणूस होऊन जायचा.
काही काही पत्रे तर ऐतिहासिक ऐवज म्हणुनच जपली गेली.आदर्श राज्यकारभार कसा असावा, याबद्दल शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रे तर आजच्या राजकारण्यांची वाचणं खूपच गरजेचं आहे.पं.नेहरुंनी इंदिरेला लिहीलेली पत्र आवर्जून वाचण्यासारखी आहे.
पत्रे लिहीणे ही कल्पनाच हळूहळू लोप पावत चालली आहे.या पत्र लेखनावरुन मला एक आरती आठवली.खरंतर ते एक भजन आहे.आमच्या गल्लीत नवरात्र उत्सवात आरत्या म्हटल्या जातात.त्यात हे भजन आरतीप्रमाणे म्हटलं जातं.
… हे आहे विठ्ठलाचं भजन.हे भजन म्हणजे पांडुरंगाला पाठवलेले एक पत्रच आहे.पण आमच्या इथे आम्ही देवीचे भक्त देवीला पत्र लिहीत आहे असं समजून आरती म्हणतो.
त्या आरतीची संकल्पना अशी आहे की एक देवीचा भक्त आहे.त्याला असं वाटतं की आपण देवीला एक पत्र लिहावं.आपल्या भावना..आपलं सुख..आपलं दुःख.. सगळं सगळं त्या पत्रात लिहावं.
*मला वाटते एकदा तुला पत्र लिहावे
माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे*
… असं म्हणून तो पत्र लिहितो.
आता हे एवढं पत्र लिहिले तर आहे..पण ते देवीला पाठवायचे कसे?त्याला थोडीच देवीचा पोस्टल ॲड्रेस माहीत आहे?देवीचं रुप चराचरात भरलं आहे हे तर आहेच..पण पत्रावर पत्ता काय लिहायचा?
*तुजला कसे आठवू
पत्र कोठे पाठवू
पत्ता तुझा ठाऊक नाहीं गं
अंबे..गाव तुझे माहीत नाही गं*
पत्र लिहिल्यावर तो भक्त अगदी आठवणीने देवीच्या घरच्यांना नमस्कार कळवतो.
*साष्टांग नमस्कार देवी तुझ्या चरणाला
साष्टांग नमस्कार तुझ्या कुटुंबाला*
आणि मग शेवटी देवीला पुन्हा विनवितो..
*एवढे पत्र वाचुन पहावे
त्यांचे उत्तर लवकर द्यावे*
आरती लिहिणाऱ्या कवीनं ते पत्र पाठवले का.. पाठवले तर कुठे हे महत्त्वाचे नाही.देवीला..आपल्या लाडक्या दैवताला पत्र पाठवावं ही कल्पनाच किती सुंदर आहे.मनातल्या भाव भावना तिथे किती नि:संकोचपणानं लिहीता येतील.खरंच..मन मोकळं करण्यासाठी पत्र लिहीणं हा सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग आहे
श्रद्धेय बाबा आमटे आणि संपूर्ण परिवाराचं कार्य अतुलनीय आहे. जिद्दीचा अंगार पेटवलेल्या बाबांनी वंचितांच्या सुखदुःखाशी, आंतरिक वेदनेनं जोडलं जात असताना, खडकाळ, ओसाड, जमिनीतून आनंदवन नावाचं नंदनवन फुलवलं. यात तपस्वीनी साधनाताईंचे हात बळकट तर होतेच. त्यांची पुढली पिढीही… सर्व आदरणीय.. डॉ. विकासदादा, डॉ. भारतीताई तसंच, डॉ. प्रकाशदादा, डॉ. मंदाताई आणि त्यापुढील पिढीही आनंदाने या कार्यात सामील झाली, हे ईश्वराने मानवाला दिलेलं वरदानच आहे! विकासदादा आणि या कुणाच्याही बाबतीत त्यांच्या कार्याचा गौरव करणं, म्हणजे सूर्याला पणती दाखवणे होय ! मी आज विकासदादांबद्दल एक छोटीशी, पण अविस्मरणीय आठवण सांगणार आहे.
साधारण १५ एक वर्षांपूर्वी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात विकासदादांचा ‘स्वरानंदवन’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मी स्वतः गाडी चालवत दादरहून ठाण्याला गेले होते.
कार्यक्रम अतिशय रंगला. विकासदादांसह सर्वच जण एकसे एक सुंदर गायले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे प्रत्येक जण सहजसुंदर गात होते. त्यांचं दैवी गाणं ऐकल्यावर त्यांना ‘differently abled’ कोण म्हणणार? विकासदादांनी संगीताच्या क्षेत्रातही, ही अजोड अशीच कामगिरी केलीय ! विकासदादा स्वतः ही खूप सुंदर गायले. सर्वांचंच मला खूप कौतुक वाटत होतं. ते पाहून त्यांनी मला थोडं गायला आणि भाषण करायलाही सांगितलं.
कार्यक्रम संपल्यानंतर विकासदादांना माझ्या घरी शिवाजी पार्कला, नव्या घरी येऊन, पायधूळ झाडण्याची मी विनंती केली. सुनीलनेही फोन करून अगत्याने घरी यायचे निमंत्रण दिले. कुठेही आढेवेढे न घेता ते सहजतेनं ‘हो’ म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. त्या क्षणी मला काय धन्य धन्य वाटले म्हणून सांगू!
आधीच सर्वांच्या गाठीभेटी घेत उशीर झाला होता. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाडी झूम झूम मजेत हाकली. विकासदादांनीही मोकळ्या रस्त्यावर “पद्मजा, काय सुसाट चालवतेस” म्हणून कौतुक केले. पण काय झाले कोण जाणे ! गाडी सायनजवळ आली आणि अचानक बंद पडली ! त्या मिट्ट अंधारात रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना. मोठी पंचाईत झाली ! इतक्या महान व्यक्तीला मी आदराने गाडीत बसवले खरे, पण कधीही बंद न पडणारी गाडी बंद पडली…. आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारीच आली !
इतक्यात विकासदादा गाडीतून उतरले आणि, ” पद्मजा, काही काळजी करू नकोस, ” असं म्हणत त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. मी गचके देत गाडी सुरू केली… परत गाडी बंद… परत धक्का देणे… असे करत करत पाचव्या मिनिटाला गाडी सुरू झाली, आणि आम्ही सुखरुप घरी आलो. सुनील वाट पाहतच होता. मी विकासदादांचं औक्षण केलं. त्यांनी माझ्या घरी पायधूळ झाडल्याने, माझं घर आनंदाने न्हाऊन निघालं !….. त्याआधी त्यांना गाडीसाठीही पायधूळ झाडावी लागली याची मला खंत आणि लाजही वाटत होती. परंतु त्रासाचा, कटकटीचा किंवा क्लेषाचा लवलेशही विकास दादांच्या चेहर्यावर नव्हता. कित्ती सहजपणाचे हे वागणे !
… बाबांसारख्या महान योगी, तपस्व्याचे कार्य पुढे नेणाऱ्या, त्यांच्या आणि साधनाताईंच्या मुशीत घडलेल्या या अत्यंत साध्या, निगर्वी आणि कर्तृत्ववान अशा विकासदादांचे औक्षण करताना बाबांच्याच ओळी मला आठवत होत्या…