मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भान…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भान…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी 

(ऑफीसातले काम घरी घेऊन यावे तसे ती त्याच्या आठवणीची फाईल घरी घेऊन येऊ लागली होती. हातातली कामं झटपट आटपून ती त्या फाईलमध्ये डोके खुपसून बसू लागली होती.) – इथून पुढे. .

अचानक एका रविवारी स्वप्नील घरी आला. त्याला असं अचानक समोर पाहून ती गडबडली.

क्षणभर आनंद लपवावा कि गडबड लपवावी या संभ्रमात ती त्याला ‘ या ‘ म्हणायचं ही विसरली.

आतून दीपक येत असल्याची चाहूल लागली तशी ती सावरली आणि दारातून बाजूला होत ‘ या सर ‘ म्हणाली.

स्वप्नील सोफ्यावर विसावला तोच दीपक बाहेर आला. तिने दोघांची ओळख करून दिली आणि ती चहा करायला म्हणून, पण खरंतर स्वतःचं मन आवरा- सावरायला आत गेली. थोड्याच वेळात चहा घेऊन बाहेर आली तर त्या दोघांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. सोनू स्वप्नीलच्या मांडीवर बसून त्याने आणलेला खाऊ खाण्यात गुंग झाला होता. तिला सोनूचं आश्चर्य वाटलंच पण त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य स्वप्नीलचं वाटलं. काही क्षणातच तो संपूर्ण कुटुंबाचा मित्र झाला होता.

दीपक, स्वप्नील गप्पा मारत चहा घेत होते . ती तिथेच दीपकच्या शेजारी उभी होती. समोरच्या सोफ्यावर बसलेल्या स्वप्नीलची नजर अधून मधून आपल्याकडे वळतेय, क्षणभर खिळून राहतेय याची तिला जाणीव झाली होती. तिलाही स्वप्नीलला पाहत राहावे असे वाटत होते. ती पाहत ही होती. नजरेत नजर गुंतत होती.. तो शब्दांनी दीपकबरोबर बोलत होता पण सूचक नजरेने तिच्याशी बोलत होता.. तिच्या नजरेत नाराजी दिसली नाही याने तो सुखावला होता. चहा पिऊन निघताना त्याने दीपकला घरी यायचं आमंत्रण दिले.सोनूला आणि तिलाही तेच सांगितले.. तो निघून गेल्यानंतर कितीतरी वेळ ती त्याच्या नजरेतले अर्थ शोधत बसली होती… तिला उमजले होते तरीही..तिला ठाऊक होते तरीही.

ऑफिसमधले तांतडीचे काम पूर्ण करेपर्यंत तिला खूपच उशीर झाला होता. सारे ऑफिस तर केव्हाच रिकामे झाले होते .काही काळ तिला कामात मदत करून नंतर स्वप्नील काहीतरी दुसरे, त्याचे स्वतःचे काम करत होता. शिपाई त्यांचे काम संपायची आतुरतेने वाट पाहत होता कारण त्यांचं काम संपल्यावर ऑफिसला कुलूप लावून बरेच लांब असणाऱ्या त्याच्या घरी जायला त्याला उशीर होत होता. 

“ मॅडम, झालं काय तुमचं काम ? “

“ हो. संपले. आलेच मी पाच मिनिटात..” 

ती वॉशरूम कडे गेली.

“ सर, तुमचे?”

स्वप्नील ‘ झालेच’ म्हणत टेबलावरची फाईल कपाटात ठेवू लागला होता.

तिने टेबलाजवळ येऊन दीपकला कॉल केला आणि पर्स घेऊन बाहेर पडली. स्वप्नील दारातच उभा होता. दोघेही आपापल्या बाईक वरून  बोलत निघाले. तिच्या घराकडे वळण्याच्या वळणावर निरोप घेण्यासाठी तिने बाईक उभी केली. स्वतःची बाईक उभी करून तो तिच्या जवळ आला. हॅंडेलवरच्या हातावर घट्ट हात ठेवत तो  म्हणाला,

“ मला तू खूप आवडतेस .आय लव्ह यू . मला तू हवी आहेस. “

ती क्षणभर अवाक झाली, अगदी क्षणभरच.. पुढच्याच क्षणी ती जणू या क्षणाचीच आतुरतेने वाट पाहत असल्यासारखी आणि तो क्षण हातातून निसटून जाऊ नये असे वाटत असल्यासारखी ती झटकन म्हणाली,

“ मीही . मलाही तुम्ही हवे आहात..”

क्षणभर ती त्याच्या डोळ्यात पाहत राहिली आणि पुढच्याच क्षणी त्याला ‘ बाय ‘ म्हणून  निघून गेली. तिच्याकडून आलेल्या अपेक्षित उत्तराने सुखावलेला तो स्वतःच्या कानावर विश्वास नसल्यासारखा दिग्मूढ होऊन काही क्षण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे, त्या गडद अंधारात फारसे काही दिसत नसतानाही तिच्या गाडीच्या दूर जाणाऱ्या टेललॅम्पकडे,तो दिसत होता तोवर पाहत राहिला आणि नंतर भानावर येऊन स्वतःची बाईक चालू करून घराकडे निघाला.

हे सारे तिला अपेक्षित आणि हवंहवंसं वाटत असले तरी ती षोडश वर्षीया असल्यासारखी तिचं काळीज धडधडत होतं. आपला श्वासोश्वास वाढलाय असे तिला वाटू लागलं. तिने घराच्या थोडं अलीकडे बाईक उभी केली. दीर्घ श्वास घेतला. उगाचच  चेहरा, गळा रुमालाने पुसला आणि स्वतःला सावरून घरात प्रवेश केला. दीपक, सोनू घरी आलेले होतेच.. त्या दोघांकडे न पाहताच गडबडीने टेबलवर पर्स टाकून ‘ आलेचं ‘ म्हणत वॉशरूम मध्ये शिरली.

मनात विचारांचे वादळ घोंघावत होते. कुठेतरी अपराधीपणाची भावना मधूनच वीज चमकावी तशी मनात चमकत होती आणि दुसऱ्याच क्षणी लुप्त ही होत होती. सोनू जवळ आला तरी तिच्या मनात तेच ते विचार येत होते.

“ कामामुळे डोके दुखतंय फार, मी जरा पडते..”

ती दीपकला म्हणाली आणि बेडरूम मध्ये गेली.

“ डोक्याला बाम लावून चोळून डोकं चोळून देऊ का? कि डोक्याला तेल लावून मसाज करू? जरा बरं वाटेल तुला .” 

काळजी वाटून दीपक आत येऊन म्हणाला पण तिला त्याक्षणी दीपकचा स्पर्शही नकोसा वाटत होता.

“ नको काहीच. पडते मी जरा, जरा पडले की वाटेल बरं . मग उठून कुकर लावते. “

“ पड तू. कुकर नको लावू, मी सोनूला घेऊन जातो आणि पार्सल घेऊन येतो. तुलाही विश्रांती मिळेल.”

दीपक सोनूला घेऊन बाहेर पडला. ती रिलॅक्स झाली. तिला त्या क्षणी त्याच्यापासून दूर असा एकांत, एकटेपणा हवासा वाटत होता. मनात स्वप्नीलचे विचार होते. त्याचा तो स्पर्श हवासा वाटत होता. त्याला फोन करावा, त्याच्याशी बोलावे वाटत होते. तिने कितीतरी वेळा कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला पण करू कि नको या संभ्रमात परत बाजूला ठेवला.

एक वेगळ्याच अस्वस्थतेनं तिला घेरले होतं .

मोबाईलवर मेसेजटोन वाजला. तिने आतुरतेने मोबाईल उचलला. तिच्या अपेक्षेप्रमाणे स्वप्नीलचाच मेसेज होता.

‘ थँक्स . खूप आठवण येतेय. खूप दिवस आतल्याआत अस्वस्थ होतो. बोलावं वाटत होतंच.

खूप मिस करतोय तुला. खरे सांगू ?.. तुला पाहिल्यापासून ,भेटल्यापासून मला दुसरे काहीच सुचेनासे झालंय.खरंच….’

तिने मेसेज वाचला , एकदा ,दोनदा, तीनदा,कितीतरी वेळा. रिप्लाय केला. ‘ मलाही. खूप खूप बोलावं वाटतंय. सेम हियर ’ आणि ती विचारात गढून गेली.

तिचं भावविश्व त्या क्षणापासून ढवळून निघाले होते. त्याआधी ती, दीपक आणि सोनू असेच आनंदविश्व होते तिचे. त्यात त्याचा,स्वप्नीलचा प्रवेश झाला होता.. त्या क्षणापासून की त्याआधीच कधीतरी चोरपावलांनी त्याचा प्रवेश तिच्या मनात झाला होता हे कदाचित तिलाही सांगता आले नसते. तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या विचारांचा, आठवणींचा हिंदोळा झुलत राहायचा, कधी कधी तिच्याही नकळत … 

क्रमशः भाग दुसरा

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भान…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भान…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी 

तिने दुचाकी  उभी केली. इकडेतिकडे पाहिले. दुपारची वेळ असल्याने रस्ता निर्जन होता. सारा परिसरच दुपारी वामकुक्षी घेत असल्यासारखा शांत, निद्रिस्त.. उपनगरातली नवी कॉलनी. सारेच बंगले जणू माणसा-माणसात आलेली अलिप्तता दाखवत होते. मोठे नोकरीला, छोटे शाळा- कॉलेजला. बऱ्याच बंगल्यांना कुलपे. तशी ती काही पहिल्यांदाच तिथं येत नव्हती. नवरा, मुलगा यांच्या बरोबर बऱ्याच वेळा आली होती. तरीही तिला सारे नवखे वाटत होते. तिने खाली उतरून स्वतःचा ड्रेस ठीकठाक केला.

सकाळपासूनच तिचं चित्त थाऱ्यावर नव्हते. चहात साखरच नाही, भाजीत मीठ जास्त तर आमटी आळणी असे काही ना काही सकाळपासून घडतच होतं.

“तुला काही होतंय काय? बरे वाटत नसले तर डॉक्टरकडे जाऊया. उगाच अंगावर काढू नकोस. ”

दीपक, तिचा नवरा तिच्या कपाळावर हात ठेवून ताप नाही ना याची खात्री करत तिला काळजीने म्हणाला तेव्हा त्याच्या स्पर्शाने तिचे मन आक्रसले होते. मनाच्या आक्रसलेपणाची जाणीव होताच तिला कसेसेच झाले होते. मनात अपराधीपणाची जाणीव जागी झाली होती पण पुढच्याच क्षणी तापल्या तव्यावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखी ती जाणीव वाफ होऊन गेली होती.

‘’ डॉक्टरकडे कशाला? मला काय झालंय? उगाचच तुमचं काहीतरी असते. “

“घर, ऑफिसचं काम, त्यात अलीकडे सोनू पण फार हट्टी होत चाललाय. खूपच दगदग होते तुझी. आज रजा घेतेस का? जरा आराम कर.. जरा विश्रांती घेतलीस की बरं वाटेल तुला…”

त्याच्या ‘ रजा घेतेस का ‘ या शब्दांनी तिने दचकून त्याच्याकडे पाहिले. तो स्वतःचं आवरण्याच्या नादात होता. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून तिला हायसे वाटले.

तिच्याशी बोलता बोलता त्याने स्वतःचा, तिचा डबा भरला होता, सोनूची बॅग भरली होती.

“ तू आवर तुझे. आज जरा उशीरच झालाय. आठ वाजत आलेत.. हवं तर सोनूला मी सोडते आईकडे.. ”

तिच्या वाक्याने त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. ती आपल्याच विचारात असल्यासारखी.. स्वतःचा डबा पर्स मध्ये ठेवत होती. त्याला बसने ऑफिसला जावे लागायचं. तिच्या आईचं घर त्याच्या वाटेवर असल्याने रोजच तो सोनूला तिथे सोडून, स्टँडवर जाऊन बसने ऑफिसला जायचा आणि ऑफिस मधून येताना सोनूला घेऊन यायचा. तिचं ऑफिस आईच्या घराच्या नेमके उलट दिशेला होतं. सारे आवरून ऑफिसला जायचं म्हणल्यावर तिची नेहमीच घाई व्हायची. सहसा ती सोनूला सोडायला, आणायला जायची नाही. त्यामुळे तिच्या वाक्याने त्याने तिच्याकडे पुन्हा एकदा चमकून पाहिले होते.

“गेले काही दिवस झाले पाहतोय तुला.. तुझं लक्ष नसतं, स्वतःच्याच नादात, विचारात असतेस… एवढी कसल्या  विचारात असतेस ? ऑफिसमध्ये काही झालंय काय ?“

“ मला काही म्हणालास काय?”

तिने दचकून भानावर येत त्याला विचारले. तिचे दचकणे त्याच्या नजरेतून सुटले नाही. त्याने तिला पुन्हा तेच विचारले.

“काही नाही रे. ऑडिट जवळ आलंय. पेंडिग कामे खूप आहेत त्याचा विचार करत होते. ”

तिने सावरत त्याला उत्तर दिले. त्याला ते उत्तर विचार करून, ठरवून दिल्यासारखं वाटलं. तो पुढे काही बोलला नाही. नुसतं‘ हं ‘ म्हणून स्वतःच आवरायला आत गेला. तिने सोनूचं सारे आवरले.

तिला ‘बाय‘ करून, सोनूला घेऊन तो गेला तशी ती रिलॅक्स होऊन मटकन सोफ्यावर बसली.

काही क्षण स्वस्थतेत गेले आणि पुन्हा अस्वस्थता मनाला बोचू लागली.. मनात द्वंद्व सुरु झाले…’काय करावे ? ‘ प्रश्नाचा भोवरा मनात गरगरु लागला.

मोबाईलची रिंग वाजली तशी ती विचारातून भानावर आली. तिने पाहिले. फोन स्वप्नीलचाच होता. उजाडायला सुरवात झाली की नकळत हळूहळू अंधार हटत जातो तसे तिच्या मनातले विचार, मनाची संभ्रमावस्था हटत गेली.

“ सुप्रभात ! आवरले काय ? सोनू काय म्हणतोय? झाली तयारी?”

स्वप्नीलचा खर्जातला आवाज कानावर पडला.. आणि ती भारावल्यासारखी झाली.

“ सुप्रभात ! दोघेही आत्ताच बाहेर पडले. आत्ता आठवण झाली वाटते?”

“ आठवण व्हायला विसरावे लागते… आणि कितीही, काहीही वाटले तरी तू थोडीच माझ्यासाठी फ्री आहेस ?  तुझी वाट पाहणे हेच आयुष्य झालंय माझे…  वाट पाहतोय.. येतेस ना लगेच ?” 

“हं. ऑफिसला जाऊन येते.. ”

“ऑफिसला जाऊन.. ?”

त्याचा रुसल्यासारखा स्वर.. तिचे मधाळ हसणे. काही क्षणांनी तिने फोन ठेवला. तिचा चेहरा आणि मन खुलून आले होते.. मनात स्वप्नील रेंगाळत असतानाच तिने सारे आवरले.

ती आरशासमोर उभं राहून आवरत असताना तिने स्वतःच्या प्रतिबिंबकडे पाहत, ‘ मॅडम, रागावणार असला तर रागवा.. पण राहवत नाही म्हणून सांगतो.. आज तुम्ही खूप खूप छान दिसताय.. ‘ हे स्वप्नीलचे पहिले वहिले वाक्य  अंगभर लपेटून घेतले.

ऑफिसमध्ये नव्यानेच बदलून आलेला स्वप्नील.. एकाच ऑफिसात असल्यावर ओळख व्हायला कितीसा वेळ लागणार? मुळात त्याचं व्यक्तीमत्व प्रथमदर्शनी प्रभाव पाडणारे होतंच. त्यात त्याचा खर्जातला, सतत ऐकावा वाटणारा आवाज.. , आपलेपणा वाटावा असे बोलणे, मदतीला सतत तत्पर असणे.. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी भरभरून प्रशंसा करणे, प्रोत्साहित करणे.. त्याचं सारेच कसे भुरळ पाडणारे होते… पण भुरळ पडायला ती काही षोडशवर्षीया नव्हती. ती विवाहिता होती. तिचा दीपकशी प्रेमविवाह झाला होता आणि ती एका मुलाची, सोनूची आईही होती..

स्वप्नीलने केलेली तिच्या सौन्दर्याची प्रशंसा तिने काहीही न बोलता फक्त हसून स्वीकारली होती… पण त्याचे ते वेगळे शब्द, बोलण्याची वेगळी पद्धत तिला भावून गेली होती.. नकळत कुठेतरी तिच्या मनात.. अंतर्मनात रुजली होती. मनात त्याच्याबद्दल आपलेपणा रुजू लागला होता.

स्वप्नीलला ऑफिसच्या कामांची माहिती तर खूप होतीच त्याशिवाय इत्तर सर्वसाधारण माहितीही त्याला जास्त होती. त्याचं इंग्रजीवरचं प्रभुत्व खरंच वाखाणण्यासारखं होते त्यामुळे काहीही अडचण आली की सारेच त्याचे मार्गदर्शन घ्यायचे. तो ही हसतमुखाने आनंदाने, आपलेपणाने सगळ्यांना मदत करायचा.

तो तसा सगळ्यांनाच मदत करीत असला तरी आपल्याबाबतीत जरा जास्तच जवळकीने वागतो हे तिच्या लक्षात आले होते.. काळजीने, आपुलकीने चौकशी करणे, प्रोत्साहित करणे, हे सारेच तिला आवडायला लागले होते.. तिची स्तुती करणारे अनेकजण तिला भेटायचे त्यांना ती हसून दाद ही द्यायची पण स्तुतीने हुरळून जायची नाही. स्वप्नीलच्या बाबतीत मात्र वेगळे घडत होते. त्याने  स्तुती केली की ती सुखावत होती. तिला त्याने केलेली स्तुती आवडू लागली होती, सतत त्याने स्तुती करावी आणि आपण ऐकत राहावी असे वाटायला लागले होतं. त्याचे शब्द तिच्या मनात रेंगाळायचे.. ती त्या शब्दांच्याआणि त्याच्या आठवणीत रमायला लागली होती.

ऑफीसातले काम घरी घेऊन यावे तसे ती त्याच्या आठवणीची फाईल घरी घेऊन येऊ लागली होती. हातातली कामं झटपट आटपून ती त्या फाईलमध्ये डोके खुपसून बसू लागली होती..

क्रमशः भाग पहिला

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वेंकीचा सल्ला— भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ वेंकीचा सल्ला— भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(एका वाटणीच्या संदर्भात एक पंच म्हणून गेलो होतो आणि भरीस भर म्हणून ह्याच दरम्यान माझा ‘सल्ला’ मागण्यासाठी तू हे पत्र लिहालंस. नाही तर अस्मादिकांस कोण विचारतो? असो.) – इथून पुढे 

पहिल्यांदाच खुलासा करतो, पत्रातील हा मजकूर म्हणजे एखाद्या पोक्त व्यक्तीचा सल्ला वगैरे आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस. माझा सल्ला फक्त मित्रत्वाचा सल्ला असेल. साप्ताहिकांतून व्यावसायिक दृष्ट्या चटपटीत वाटणारा ‘वहिनींचा सल्ला’ वा ‘ताईंचा सल्ला’ नव्हे हे लक्षात ठेव. केवळ तुझ्यासाठी म्हणून हा पत्र प्रपंच. 

खरं सांगायचं झालं तर, संसाराचा गाडा सुरळीत चालवण्याचा रामबाण उपाय अजूनपर्यंत तरी कुणालाही सापडलेला नाही. प्रत्येक माणसाच्या हाताचे ठसे जसे वेगळे असतात तसा प्रत्येकाचा संसारही वेगळा असतो. अमुक एखाद्याचा संसार सुरळीत चालेल की रखडत राहील हे कधीच सांगता येत नाही. 

कॅलिडोस्कोपमध्ये एखादा काचेचा तुकडा टाकून हलवला तर आतील रंग आणि नक्षीकाम बदलत जातात. माणसांची व्यक्तिमत्वे देखील कॅलिडोस्कोप मधील काचेच्या तुकड्यांसारखे प्रत्येक भूमिकेनुसार रंग बदलत जातात. 

ऑफिसात खडूस म्हणून ख्याति असलेला पुरूष घरात बायको आणि मुलांशी फार प्रेमाने वागतो. आई बाबांची लाडकी, भावाची प्रेमळ बहीण आणि सगळ्याच नात्यांत प्रिय असणारी स्त्री, नवर्‍याची पत्नी म्हणून आदर्श असेलच असे नाही. बाहेर मनमिळावू असलेला पुरूष घरात आदर्श पति असेलच असे नाही. कारण माणूस हा यंत्र नाही. त्यामुळे तो कधी कसे वागेल हे सांगता येत नाही. 

पत्नी किंवा पती ही एक व्यक्ति आहे. तिला आणि त्याला स्वतंत्र भावभावना, आवडीनिवडी, अपेक्षा  असतात बहुतेक लोक हेच विसरतात आणि दोघांमधला ‘स्व’ जागृत झाला की, विसंवाद सुरू होतो. सूर जुळले तर मैफल जशी रंगत जाते, तसंच संसारातही सूर जुळावे लागतात. 

ज्या जोडीदारांत समंजसपणा असतो त्यांच्यात वाद कमी प्रमाणात होतात. पण कधीच भांडण किंवा एकमेकात मतभेद झालेले नाहीत, असे जोडपे या भूमंडलावर सापडणे अवघड आहे हे मात्र नक्की. दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्ती एकत्र आल्या की, प्रत्येक गोष्टीत फरक असणारच. संसार ही एक तडजोड असते. कधी त्याला तर कधी तिला थोडंफार बदलावेच लागते.

यशस्वी वैवाहिक जीवन हे योग्य जोडीदारावर अवलंबून नसून आपण स्वत: चांगला जोडीदार असणं किंवा होण्याचा प्रयत्न करणे यावरही संसाराची यशस्विता असते. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात पण स्वर्ग काही कुणी पाहिलेला नसतो. तो इथेच निर्माण करायचा असतो. हाती आलेला डाव नीट मांडला तर कोणत्याही प्रकारचं लग्न यशस्वी होऊ शकते. मात्र ही आनंद टाळी एका हाताने वाजत नाही.

आज सौ. वहिनी देखील नोकरी करतात. घर आणि नोकरी ही दोन्ही अवधानं सांभाळताना त्यांची किती त्रेधातिरपिट उडत असेल याचा कधी विचार केलायस का? नाही, अर्थात ती तुझी वृत्ती नाही. तुलाही परिस्थितीनुसार थोडं बदलायला हवं. लग्नाआधी तुला प्रत्येक गोष्टीत स्वतःच निर्णय घ्यायची सवय असेल. पण लग्नानंतर मी म्हणेन तीच पूर्व दिशा असं म्हणणार्‍या जोडीदारासोबत कुणाचंच पटत नाही. एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकून निर्णय घेणं तर गरजेचं आहे. तुमची मतं कुठं जुळत नाहीत त्यावर दोघं मिळून चर्चा करा. त्यामुळे कदाचित आपली ताठर भूमिका लवचिक होण्याची शक्यताही असते. 

तुम्ही बोलायला कशी सुरुवात करता त्यावर त्याचा शेवट अवलंबून असतो. उद्धटपणे बोलण्याने समस्येतून तोडगा निघण्याची शक्यताच नसते. कित्येकदा पती-पत्नीतील वादाचं कारण इतकं क्षुल्लक असतं की त्यावर त्यांनी शांतपणे विचार केला की आपण विनाकारण ह्या गोष्टींसाठी भांडत बसलो हे त्यांच्या लक्षात येते.   

जिथे आई-वडीलांमध्ये वैचारिक सामंजस्य असते त्या घरातील मुले मनाने निकोप असतात. पती-पत्नीच्या संबंधातील ताणतणावाचे पडसाद मुलांवर पडतातच. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं ही तुझीदेखील जबाबदारी आहे. काचेच्या वस्तूंना तडा जाऊ नये म्हणून ‘ग्लास, हॅंडल विथ केअर’ अशी सूचना असते, तसंच कुटुंबातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी दोघांनीही काळजी घ्यायला हवी.

कुणाच्या सल्ल्याने कुठलेही संसार तरत नसतात. आपला मार्ग आपणच काढावा. या पत्र वाचनाच्या शिक्षेनंतर यापुढे तरी ‘वेंकीचा सल्ला’ टाळशील अशी अपेक्षा करून रजा घेतो. पत्रोत्तराची वाट पाहतो. 

चार ओळीत या पत्राचं उत्तर आलं. ‘आम्ही उभयता तुमचे आभारी आहोत. यापुढे ह्या विषयावर तुमच्या सल्ल्याची आवश्यकता भासणार नाही ह्याची खात्री देतो. सहकुटुंब नागपूरला या. तुमचे स्वागत करायला आम्हाला आवडेल.’ 

त्यानंतर मात्र माझा सल्ला कुणी मागितला नाही. मागितले असते तर याच पत्राची छायांकन प्रत पाठवून दिली असती.  

मागच्या वर्षी वसंता सहकुटुंब दक्षिण भारत सहलीला चालला होता. आधीच कळवल्याने बेंगलूरू स्टेशनवर त्यांची भेट घेतली. अर्ध्या तासाच्या भेटीत त्या उभयतांना काय बोलू अन काय नको असं झालं होतं. मी सहज विचारलं, ‘वसंता प्रमोशनसाठी प्रयत्नच केला नाहीस वाटतं.’ 

त्यावर वसंता म्हणाला, ‘हे बघ वेंकी, माणसाला काय हवं असतं रे? आम्ही दोघेही कमावतो. वसुधासारखी समंजस जोडीदार मिळाली. चांगल्या मार्कांनी पास होणारी मुलं आहेत, स्वत:चं असं एक छोटेसे घर आणि महत्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांचं कृपाछत्र माझ्या डोक्यावर आहे ह्यातच मी समाधानी आहे.’ 

तितक्यात गाडीने शिट्टी दिली. एवढ्या प्रवासाच्या दगदगीत देखील वहिनींच्या चेहर्‍यावर एक असीम तृप्ती दिसत होती. वसंताचे आई वडील नातवांशी गप्पा मारण्यात मश्गुल होते. गाडीने गती घेतली. थोड्याच वेळेत वसंताचा हेलकावणारा हात माझ्या नजरेआड झाला. त्यानंतर आमची भेट झाली नाही. परंतु वसंता व्हॉट्सअपच्या सौजन्याने, मला कित्येक  उपदेशपर संदेश नियमितपणे पाठवत असतो.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वेंकीचा सल्ला— भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ वेंकीचा सल्ला— भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

पत्र म्हणजे अलगद उलगडत जाणार्‍या एकाद्या रेशमी भावबंधाचा सांगावा असतो…. अशी पत्रे कधी नवी उमेद व अनामिक भावनिक बळ देऊन जातात तर कधी डोळ्यांतून अलगद  आसवं ओघळायला लावतात. कधी भूतकाळात डोकावयाला लावतात. कालमानाप्रमाणे त्यात विविध तरंग उमटलेले असतात. अशी बरीच हस्तलिखित पत्रे मी जपून ठेवलेली आहेत. फुरसतीच्या वेळेत ती पत्रं चाळताना कितीतरी वेळ निघून जातो.

गेल्या रविवारी असंच चाळताना वसंताचे पत्र आणि मी लिहिलेल्या उत्तराची छायांकित प्रत सापडली. त्या पत्राला तब्बल पस्तीस वर्षे झाली आहेत.   

नोकरीच्या निमित्ताने वसंताची पोस्टिंग सोलापूरला झाली होती. कामाव्यतिरिक्त ऑफिसात तो कुणाशी बोलायचा नाही. शांत व गंभीर प्रकृतीचा वसंता आणि मी समवयस्क असल्याने आमची लवकरच गट्टी जमली. नोकरीत कायम झाल्यावर वसंताला स्थळं सांगून येत होती. अखेर त्याच्याच नात्यातल्या एका मुलीशी त्याचं लग्न जमलं. त्यांची एकमेकांशी ओळख होती पण घनिष्ठ परिचय नव्हता. 

वाङनिश्चय झाल्यानंतर वसुधा वहिनींचे प्रेमाने ओथंबलेले एक पत्र त्याने मला दाखवले. दुसर्‍यांची प्रेमपत्रे वाचणे म्हणजे दुसर्‍यांच्या बेडरूममध्ये डोकावण्यासारखे आहे, असं म्हणत मी वाचायला नकार दिला. मी त्याला म्हटलं, “तू ही एक छानसे प्रेमपत्र लिही. कवितेतल्या काही सुंदर ओळी अधून मधून पेरून टाक. मध्येच कुणाची तरी एखादी चारोळी लिही आणि अत्तर शिंपडलेल्या एखाद्या गुलाबी पाकिटातून पाठवून दे.”

वसंता हिरमुसला चेहरा करून म्हणाला, “ते आपलं काम नाही गड्या. मला तसं लिहिता आलं असतं तर वसुधेचं पत्र तुला कशाला दाखवलं असतं? या पत्राचं उत्तर तू लिहावं, म्हणून मी तुला देतोय. तू कच्चं ड्राफ्ट लिहून दे, मी फेअर करून पाठवतो.” 

झालं, त्यानंतर मी वसंताच्या प्रेमपत्रांचा घोस्ट रायटर झालो. खरं तर, दुसर्‍याची मदत घेऊन प्रेमपत्रे लिहिणे आणि फुकटचा भाव मारावा हे वसंताच्या स्वभावाला अनुसरून नव्हतं. ‘हम भी कुछ कम नही’ असं वसुधा वहिनींना दाखवणं एवढाच माफक विचार त्याच्या पत्र लेखनामागे असायचा.

एकमेकांच्या मनाला भुरळ पाडणार्‍या, पुढच्या पत्रासाठी हुरहूर लावणार्‍या, उत्सुकता शिगेला नेणार्‍या या पत्रांच्या आधाराने ते दोघेही काही महिने काव्यात्मक स्वप्निल विश्वात तरंगत होते. आजच्या ईमेलच्या, टेक्स्टींगच्या जमान्यात हस्तलिखित पत्र लिहिणे म्हणजे वेडेपणा वाटेल. परंतु हा वेडेपणा चिरंतन आनंद देणारा असतो एवढं मात्र नक्की.   

एका शुभदिनी त्या दोघांचा या भूमंडली शुभमंगल विवाह संपन्न झाला. काव्यात्मक पत्रे लिहिणारा भावुक नवरा थोड्याच दिवसात सौ. वसुधा वहिनींना एकदम रूक्ष वाटू लागला. त्याकाळी शब्दागणिक पैसे लागायचे म्हणून टेलिग्रामचे मजकूर कमीत कमी शब्दांत लिहायचे. अगदी तसंच वसंताचे संभाषण त्रोटक असायचे. ‘चहा दे. जेवायला वाढ, पाणी दे, ऑफिसला निघालोय. किराणा माल शेजारच्या दुकानातून घे.’ या पलीकडे काही नाही. पत्रांतून रसिक वाटलेल्या वसंताचं असं वागणं वहिनींना अगदी अनपेक्षित होतं. 

वसंताच्या देखतच सौ. वहिनींनी एकदा ही व्यथा माझ्यासमोर निराळ्या पद्धतीने बोलून दाखवली. वसंताच्या अशा वागण्यामागे त्याचं स्वत:चं असं एक तत्वज्ञान होतं. ‘जास्त बोललो तर ती उगाच डोक्यावर बसायला नको!’ त्या तत्वज्ञानाला मी सुरूंग लावला. मी त्याला खूप सुनावलं. त्यानंतर थोडा अपेक्षित बदल झाला असावा. 

इथे असतांनाच त्यांना एक मुलगा झाला. वसंताच्या वागण्यावरून वहिनींचं लक्ष विकेंद्रित झालं. बाळाच्या नादात ते सुखी कुटुंब आनंदात होतं. एका वर्षानंतर त्यांची बदली नागपूरकडे झाली. त्यानंतर आमच्यात खूप मोठी कम्युनिकेशन गॅप राहिली. आणि अचानक एके दिवशी एखादा विद्ध पक्षी पुढ्यात येऊन पडावा तसं वसंताचं पत्र टाकून पोस्टमन निघून गेला. माझ्या संग्रहातले ते पत्र हेच, 

प्रिय वेंकी,         

आपण जवळचे मित्र म्हणवत होतो. दिवाळीच्या ग्रीटींग्जशिवाय आपण एकमेकांना कधी पत्र पाठवतच नाही. पत्र लिहिण्याविषयी माझा ‘उत्साह’ तुला माहीतच आहे. त्यातून मराठीतून लिहिणं तर जवळपास संपल्यातच जमा झाले आहे. असो. 

मध्यंतरी सुनील भेटला होता. त्यानं तुझ्याबद्दल सांगितलं. तू कुठल्यातरी क्लबचा चार्टर्ड प्रेसिंडेट झाला आहेस. एका शाळेच्या बक्षीस समारंभाला तू प्रमुख पाहुणा होतास म्हणे. हे ऐकून मला तुझा अभिमान वाटला. एकंदरीत तू ग्रेटच आहेस. असो. 

मला तुझ्याकडून एक बहुमोल ‘सल्ला’ हवा आहे. तू योग्य सल्ला देशील ह्याची मला खात्री आहे. 

हल्ली तुझ्या वहिनींचे आणि माझे बर्‍याच गोष्टींवर मतभेद होत असतात, त्यामुळे वारंवार खटके उडत असतात. साध्या साध्या गोष्टीवरून ती चिडचिड करते. मुलांनी उच्छाद मांडला आहे. अभ्यासाच्या नावाने बोंब आहे. ऑफिसमधून येऊन ती मुलांचा तासभर अभ्यास घेते परंतु त्यांच्या प्रगतीत फरक नाही. 

माझा स्वभाव तुला माहीतच आहे. वादविवाद टाळण्यासाठी म्हणून मी मूग गिळून बसतो त्यामुळे तिचा त्रागा आणखीनच वाढतो. आम्ही दोघेही कमावतो पण घरात मात्र सुखशांती नाही. 

कृपा करून एक सविस्तर पत्र अवश्य लिही, जेणेकरून तुझ्या वहिनींचा नूर पालटेल व आमच्या संसाराचा गाडा सुरळीत चालेल… वगैरे. 

लगेच समोरचा पॅड घेऊन एक सुदीर्घ पत्र लिहिलं, त्यातील हा मजकूर: 

प्रिय वसंता,

एवढ्या काळानंतर तुझे अशा तर्‍हेचे पत्र येईल अशी अपेक्षा नव्हती. मला काही लिहिण्यासाठी माझ्याबद्दल खोट्या कौतुकाच्या प्रस्तावनेची आवश्यकता निश्चितच नव्हती. असो. 

कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कुंडलीत देखील उच्चीचे ग्रह आले असतील. तालुक्यातल्या का असेना एका शाळेच्या बक्षिस समारंभाला प्रमुख पाहुणा होतो. एका वाटणीच्या संदर्भात एक पंच म्हणून गेलो होतो आणि भरीस भर म्हणून ह्याच दरम्यान माझा ‘सल्ला’ मागण्यासाठी तू हे पत्र लिहालंस. नाही तर अस्मादिकांस कोण विचारतो? असो.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन लघुकथा (१) संध्या-छाया सुखविती हृदया… (२) आनंदाची नशा… (३) भावना जपणार सासु सुनेचं नातं ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

तीन लघुकथा (१) संध्या-छाया सुखविती हृदया… (२) आनंदाची नशा… (३) भावना जपणार सासु सुनेचं नातं ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

(१) संध्या-छाया सुखविती हृदया…

साने आजोबा भाजी घेऊन सावकाश जिना चढत होते.त्याचं ओझं उचलायला मी पुढे सरसावले.आम्ही आजींपर्यंत पोहोचलो.आजोबांनां वेळ लागला म्हणून आजी चिडल्या होत्या. गोळ्या देण्याची वेळ झाली होती. आजोबा टेकले पण नाहीत त्यांनी लगबगीनें गोळ्या आणि पाण्याच्या ग्लास आजींपुढे धरला. एक घोट घेऊन संतापलेल्या आजीने गोळ्या आणि पाण्याचं भांड भिरकावून दिलं. आजोबा पुढे धावले, आजींनी त्यांचा हात झिडकारला. . आजीच्या पाठीवरून हात फिरवत तें, म्हणाले, ” अगं हळू! ठसका लागंला कां तुला?सावकाश ! सावकाश जरा. थांब हं! मी दुसरं पाणीआणतो . धिम्या पावलांनी चालत जाऊन त्यांनी फरशी पुसायचं फडकं आणलं. मला चीडआलीआजींची.थकलेल्या, वाकलेल्या, नवऱ्याच्या वयाचा काही विचारच नाही ह्या बाईच्या मनांत. न राहून मी हंळूच विचारलं, ” आजोबा आजींचा राग नाही का येत तुम्हाला? किती करता तुम्ही त्यांच्यासाठी, दुःख नाही होत का तुम्हाला?” मला शांत करत आजोबा शांतपणे म्हणाले, ” असं बघ पोरी,रागावून कसं चालेल? आपल्या माणसांवर कधी कुणी रागवतं का? अगं कापलं तरी आपलंच असत ना ते ? कापऱ्या हाताने कन्यादान करताना तिच्या वडिलांना, देवा ब्राह्मणांसमोर मी वचन दिल आहे कीं,आजन्म तुमच्या ह्या काळजाच्या घडाला कधीही न, दुखवता प्रेमाने सांभाळीन म्हणून. आता दुखण्याने बेजार झाली आहे ती.तिचं दुःख आणि दुखणं मी घेऊ शकलो नाही,तरी सुखाची सोबत तर देऊ शकतो ना?आजोबांचं तत्व नाही पटलं मला. मी माझं घोडं पुढे दामटलं., ” आजोबा अहो तुमचं वय आणि ह्या वयातलं तुमचं, नवरा असून बायको साठी इतकं करणं म्हणजे’, अवघडचं आहे,नाही का? हसून ते म्हणाले, “वयाच् काय घेऊन बसलीस पोरी? नवरा बायकोचं कर्तव्य निभावत , एकमेकांना सुखदुःखात साथ देत, शांतपणे हिने माझा संसार केलाचं कीं नाही . माझ्या माणसांना आणि मलाही सांभाळले. पण आता दुखणं नाही सांभाळता येत तिला. बेजार झाल्यामुळे चिडचिडी झाली आहे ती. आता तिला सांभाळण्याचे दिवस माझे आहेत.संसाराच गणित तुही समजून घे बाळ.आजोबा म्हणतेस ना मला? मग वडिलकीच्या नात्याने सांगतोय, संसार रथाचं एक चाक डगमगायला लागलं तर,दुसऱ्या चाकाने सांवरायचं असतं. आणि असं बघ तिच्या ऐवजी माझ्यावर अशी वेळ आली असती तर,तिने माझाही तालमाल तोलून धरलाच असताच कीं.,”असं म्हणून साने आजोबांनी हळूवारपणे आजींच्या पाठीवरून हात फिरवला. आजी खूदकन हंसल्या. खरंच कित्ती जादू असते नाही का हाताच्या स्पर्शामध्ये!आधार देणारे हात,समजून घेणारे,प्रेमाने कुरवाळणारे,आजोबांचे थरथरणारे हात, खूप काही सांगून गेले मला. आयुष्याच्या संध्याकाळी,.. आहे ती परिस्थिती स्विकारून धर्म पत्नीला साथ देण्याचं त्यांचं तत्त्वज्ञान ऐकून मी मात्र अवाक झाले होते. प्रसंग साधा,पण आयुष्याच ‘ सार ‘ त्यात सामावलं होतं. मी तिथून बाहेर पडतांना आजींचे शब्द कानावर पडले. त्या विचारत होत्या,”अहो चुकलंच माझ् मघाशी. रागानी पाण्याचं भांड भिरकावले मी.लागलं का हो तुम्हाला? आजोबा गडगडाटी हंसले मिस्किल पणे म्हणाले, ” नाही नाही फुलं पडली माझ्या अंगावर” . , ” अरे पण ते जाऊ दे फुलांवरून आठवलं अरेच्चा! असा कसा विसरलो मी? अगं भाजीवाल्याच्या शेजारी गजरे वाला बसला होता तुझ्या साठी हा गजरा आणला होता., ” आजी लाजल्या. मगाशी रागाने लाल झालेला त्यांचा चेहरा आता गुलाबी झाला होता ! ते संध्याछायेचे प्रेम रंग बघून मी हंसतच घराबाहेर पडले. जाता जाता किती मोलाचा संदेश दिला नाही का आजोबांनी आपल्याला?. धन्यवाद् सानेआजोबा . … 

(२) आनंदाची नशा…

मी चौकात क्रॉसिंगला उभा होतो, आणि ती दिसली. केविलवाण्या चेहऱ्याने ती प्रत्येकाला विनवत होती, 

“दादा बाळाला भूक लागलीया दुधाची पिशवी घेऊन द्या ना “… इतर भिकारी चहा, पाव, तंबाखू साठी भीक मागतात, पण तिची मागणी वेगळीच होती. काय तर म्हणे दूध हवंय आणि ते सुद्धा बाळासाठी. हिलाच प्यायचं असेल, बाळाचं नांव .. लबाड असतात ही लोकं, वेळ पडली तर बाळाची शपथ घ्यायला सुद्धा मागेपुढे बघणार नाहीत. मला तिची जिरवायची होती. कोणीच दाद दिली नाही, तेव्हां ती घाईघाईने बांधकामाच्या दिशेने निघाली. लांबवर नजर गेली तर झोळीतल्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. तिची पावलं वेगाने पडू लागली. माझं कुतूहल जागं झालं. मीही तिच्या मागोमागं गेलो. पळत जाऊन तिने बाळाला जवळ घेतलं, बाळाजवळ बसलेली छोटी मुलगी विचारत होती, ” आई कवाधरनं रडतया बाळ, मिळालं का ग दूध? मला बी भूक लागलीया “ रडकुंडीला येऊन आईने उत्तर दिलं, ” नाही मिळालं बाळा दूध. कुनी पैसं बी देना. कुट काम बी मिळना, एका बाबाच्या हातात दुधाची पिशवी व्हती.मला तुमचा भुकेला चेहरा आठवला, वाटलं हिसडा मारावा आणि घ्यावी पिशवी हिसकावून त्याच्या हातातून. पर मनात इचार आला, चोरी करनं पाप हाये, आपलं पोट आज भरलं पर चोरीचं पाप कायम पोटात फिरल. त्यो पांडुरंग मला माफ नाही करणार. “

मी खजिल झालो,माझी मलाच लाज वाटली. आपण उगीचच एखाद्याबद्दल गैरसमज करून घेतो,दिसतं तसं नसतं एवढं मात्र खरं. मघाशी माझ्या हातातल्या दुधाच्या पिशवीकडे बघून तिने दूध मागितलं होतं आईची माया गहिवरली होती, पण मला ते ढोंग वाटलं होतं.घरी दुधाच्या चार चार पिशव्या फुटत होत्या, पातेल्यातले दूध नेहमी उतू जात होतं,आणि इथे वाटीभर दुधाला ही माय महाग झाली होती.मी तिच्याबद्दल उगीचच गैरसमज करून घेतला होता.घाईघाईने निष्कर्ष काढण्यापेक्षा अशा माणसांची परिस्थिती समजून घेणही महत्त्वाचं असतं. मी मागे वळलो,दुधाची आणखी एक पिशवी,ब्रेड बटर,आणि बिस्किटाचा मोठ्ठा पुडा तिच्या बाळांसाठी घेतला,आणि त्या मुलीला दिला तो घेताना बाळाची ताई हरखली.लेकरांच्या मायची नजर आनंदाने चमकली.आणि मी ? देण्यापेक्षाही घेणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद किती मोठा असतो, या विचारांची सांगड मनात घालू लागलो. दुसऱ्या दिवशी बाळासाठी दुधाची बाटली,चमचा वाटी,आणि दूध गरम राहण्यासाठी,माझ्या मुलांसाठी आणलेला आणि अडगळीत फेकून दिलेला चांगला ग्लास घेऊन मी तिच्या दिशेला निघालो, बाळाला रोज दुधाची पिशवी पुरवण्याचा मी संकल्प केला.मला जणू काही बाळांच्या त्या माऊलीच्या चेहऱ्यावरच्या निर्मळ आनंद शोधण्याची नशा चढली होती.हो!अगदी निर्मळ ‘निष्पाप,निरागस निरामय आनंदाची नशा. आणि मग रस्ता ओलांडून मी पुढे चालू लागलो…

(३) भावना जपणार सासु सुनेचं नातं

वझेआजी आता खूप थकल्यात. इतक्या की कमरेत पूर्ण वाकल्यांत . सूना म्हणतात. आता पूर्ण आराम करायचा. पण आजीचा वेळ जात नाही.मग त्यांच मन उदास होऊन, नको त्या विचाराने भरकटत जातं. आणि माहेर आठवतं. हॊ नां! अहो ! अजूनही त्यांना हक्काच माहेर आहे. आणि मायेच्या वयस्कर दादा वहिनीकडे त्यांचं मन ओढ घेतं. 

आणि एकदम आजींच्या मनात आलं .. बस्स ठरलं. दादाला भेटून ४ दिवस माहेरी जाऊन सुखाचं माहेरपण उपभोगायचं. आणि मग ठरवल्याप्रमाणे सगळी तयारी झाली. पण मनातला गोंधळ संपत नव्हता. काय नेऊ मी दादांकरता ? कपडे? नको. पैसे नको. तर मग काही वस्तु न्यायची.कां ? पण मग पुरेसे पैसे पण नाहीत जवळ .काय कराव बाई? आजी निघाल्या, भावाकडे. रिकाम्या हाताने. मनात रुखरुख होतीच, पण काय घ्यावं तेही सुचत नव्हतं .उदास झाल्या बिचाऱ्या. कित्ती केलंय दादांनी आपल्यासाठी आणि आपण मात्र रिक्त हस्ताने निघालोय. 

एकदम त्यांच्या लक्षात आलं “ अग बाई ! कावेरी कुठंय ? केव्हाची बाहेर गेलीय .मला निघायला हवं आता.” .. आणि इतक्यांत धापा टाकत कावेरी .. त्यांची सून’ आली, आणि मनकवडी कावेरी म्हणते कशी? “आई ही घ्या . मामांसाठी नवीन पद्धतीची काठी. मामांची लाकडी काठी आता जुनी झालीय. आणि 

हे.. मामीसाठी शुगर टेस्ट करायला छोटे मशिन, आता त्यांना दवाखान्यांत जायची भानगडच नाही. आई मामी पण थकल्यात आता. घराबाहेर पडणं होतं नाही त्यांच्याकडून. तुमच्याकडून ही सप्रेम

भेट द्या ना त्यांना. आता या वयात कपडे वस्तू काही नकोस वाटतं. काय द्याव प्रश्न पडला होता ना तुम्हांला ? “ आजी अवाक झाल्या .किती चुटकीसरशी प्रश्न सोडवला हिने. माझ्या मनातल्या भावना किती जपते माझी ही सून.. लाघवी आहे पोर. 

आणि मग सगळं सामान घेऊन आजी समाधानाने माहेर घरी पोहोचल्या . मनाने त्या केव्हाच तिथे पोहोचल्या होत्या. आजींनी आणलेली वेगळी भेट बघून मामी गहिवरल्या आणि म्हणाल्या,” वन्स अगदी योग्य वस्तू आणल्यात तुम्ही आमच्यासाठी.” आणि मग कावेरीचं कौतुक करण्यात दोघी नणंद भावजया रंगून गेल्या. त्यात दादांनी पण भर टाकली. कारण धोरणी सुनेनी त्यांच्यासाठी आगळीवेगळी योग्य तीच भेट आणली होती. 

खरंच किती योग्य भेट आणली होती नाही का कावेरीनी ! मला वाटतं तुम्हालाही ही आयडिया आवडेल. तर मंडळी असं होतं हे सासु-सुनेच ‘ भावना ‘ जपणार नातं.

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ (१) मिल्कपॉट आणि (२) नुकसान – श्री सीताराम गुप्ता (३) अनोखी पद्धत – सुश्री मधूलिका सक्सेना ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

(१) मिल्कपॉट आणि  (२) नुकसान – श्री सीताराम गुप्ता (३) अनोखी पद्धत – सुश्री मधूलिका सक्सेना ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

तीन अनुवादित लघुकथा……

☆ (१) मिल्कपॉट ☆

आज जवळ जवळ एक आठवड्यानंतर घरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं. अरुण प्रकाशाचा मुलगा अमोल, सून आभा आणि दोन वर्षाचा नातू प्रणव उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. ती नसल्यामुळे घर कसं उजाड वाटत होतं. मुलांशिवाय कसलं घर? मुले खोड्या करत नसतील, तर घर, घर वाटतच नाही मुळी. मुलं आपली ट्रीप संपवून घरी परत आली आणि छोटा नातू प्रणव घराला पुन्हा घर बनवण्याच्या मागे लागला. तो येताच त्याच्या खोड्या सुरू झाल्या. सूटकेस आणि बॅगेमधील समान काढून तो बाहेर टाकू लागला. सामान काढता काढता त्याच्या हाताला एक गोष्ट लागली आणि ती दाखवण्यासाठी तो आपल्या आजोबांच्याकडे पळत पळत निघाला. त्याच्या हातात सुरेख असा मिल्क पॉट होता. अरुण प्रकाशला समजायला वेळ लागला नाही. त्यांनी आपल्या मुलाला म्हंटलं, ‘हा हॉटेलचा वाटतोय. ‘

‘होय बाबा, हा हॉटेलचाच आहे. ‘

ते ऐकून अरुण प्रकाशला आतल्या आत भूकंप झाल्यासारखं वाटलं. ते काहीच बोलले नाहीत. शून्यात बघत बसले. त्यांना वाटलं, मुलाने येताना तो पॉट उचलून आणलाय. असं काही घडलं, की त्यांना वाटतं, आपण केलेल्या संस्कारात काही कमतरता राहिलीय आणि ते स्वत:ला दोषी मानू लागतात. त्यांना दु:ख होतं.

नातवाच्या हातात हॉटेलचा मिल्क पॉट बघून त्यांना अंगात जाळ उठल्यासारखं वाटू लागलं. त्यांचं मन तडफडू लागलं.

वडलांच्या मनातील भाव मुलाच्या लक्षात आला. तो म्हणाला, ‘बाबा, दहा हजार रुपये रोजचे खोली भाडे होते. ’

तशी अरुण प्रकाश स्पष्टपपणे म्हणाले, ‘ एवढा खर्च करूनही शेपन्नास रूपायासाठी तू आपलं स्वत्व घालवलंस?’

मुलगा अमोल थेटपणे वडलांकडे बघत म्हणाला, ‘तुम्हाला वाटतं, तसं नाही आहे बाबा! आम्ही हा मिल्क पॉट उचलून आणलेला नाही. ‘चेक आऊट’च्या वेळी आपला लाडका नातू प्रणव हातातला मिल्क पॉट सोडेना, तेव्हा मी त्याची किंमत हॉटेल मालकाला देऊ केली, पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. हा पॉट, आमच्यातर्फे या छोट्याला भेट, ’ ते म्हणाले. गिफ्ट म्हणून त्यांनी हा पॉट प्रणवला दिलाय.

आपल्याला वाटतय, आम्ही हॉटेलमधून हा पॉट उचलून आणला, पण तसं नाही आहे बाबा!’

अरुण प्रकाशने सुटकेचा श्वास सोडला. ‘नाही… नाही… मी दोषी नाही. ’ते मनातल्या मनात म्हणाले. ‘मी माझ्या मुलांनावर योग्य संस्कार केले आहेत. माझी मुलं कधीच चुकीचं वागणार नाहीत. ‘ त्यांना इतकं समाधान वाटलं, वाटलं, कॅन्सरसारख्या रोगापासून मुक्ती मिळालीय.

मूळ कथा – ‘मिल्क पॉट’

मूळ लेखक – श्री सीताराम गुप्ता, दिल्ली

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर  

☆ (२) नुकसान ☆

डॉ. विश्वास यांचा आज या नव्या हॉस्पिटलमधला पहिलाच दिवस होता. मागच्या आठवड्यातच त्याची एम. डी. पूर्ण झाली होती. एका आठवड्यातच त्याला सरकारी हॉस्पीटलमध्ये नोकरी मिळाली होती. हॉस्पिटलमधून परतल्यावर विश्वास मोठा खुशीत दिसत होता. त्याला खूश पाहून त्याचे आई-वडील, बहीण सगळ्यांनाच आनंद झाला. बहीण म्हणाली,

‘दादा, वाटतय, नवी नोकरी आणि हॉस्पिटलचे वातावरण तुला खूप आवडलेलं दिसतय. ‘

‘ते तर आहेच, पण माझ्या खुशीचं आणखीही एक कारण आहे. ’  विश्वास म्हणाला.

‘काय?’

आता तो काय सांगतोय, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती.

विश्वास म्हणाला, ’ आज पाहिल्याच दिवशी दहा हजाराचं नुकसान झालं!’

‘कसं?’ सगळेच एकदम म्हणाले. आई म्हणाली, ‘नुकसान झाल्यावर कुणी खूश होतं का? ‘

‘असं घुमवत फिरवत बोलण्याऐवजी सरळ सरळ सांग ना, काय झालं? मोबाईल हरवला. खिसा कापला गेला? नुकसान कसं झालं?’ वडलांनी प्रश्नांची फैर झाडली.

‘नाही… नाही… आपण घाबरू नका. असं काहीही झालेलं नाही. ‘ विश्वास सगळ्यांना आश्वस्त करत म्हणाला.

‘आज एनजीओने एका फॅक्टरीवर छापा मारला आणि तिथे काम करणार्‍या अल्पवयीन मुलांना सोडवले. त्या मुलांच्या वयाची तपासणी करण्यासाठी पोलीस त्या मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्याच वेळी एक माणूस माझ्या केबीनमध्ये आला आणि टेबलावर काही पैसे ठेवत म्हणाला, ‘हे दहा हजार रुपये आहेत. हे आपण आपल्याजवळ ठेवा आणि असा रिपोर्ट लिहा, की सगळी मुले पंध्रा वर्षाच्या वर आहेत. ’

पण त्या मुलांपैकी कुणीच चौदा वर्षाच्या वर वाटत नव्हता. अनेक जण दहा – बारा वर्षाचीच वाटत होती. त्यांची परिस्थिती बघून मला अतिशय वाईट वाटलं. मी नोटांचं बंडल उचलून त्याच्या हातात देत, त्याला ताबडतोब बाहेर निघून जायला सांगितलं. ’

तो म्हणाला, ‘ डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणाल तितके पैसे देतो. ‘ तो खिशात हात घालू लागला. मला राग आला. शेवटी शिपायाला सांगून त्याला धक्के मारून बाहेर काढलं.

‘जे खरं वय होतं, तोच रिपोर्ट मी लिहिला. नेमक्या वयाची खात्री करण्यासाठी, ऑसिफिकेशन टेस्टसाठी केसेस पुढे पाठवल्या. ’

सगळी घटना विस्तारपूर्वक सांगून  विश्वासने कृत्रीम गंभिरता धरण करत म्हंटलं, ’मग झालं ना पहिल्याच दिवशी दहा हजाराचं नुकसान. ‘

वडील म्हणाले, ‘बेटा, असं नुकसान रोज रोज करत जा आणि आम्हाला सांग. मी खरोखरच खूश आहे, की माझी मुले नुकसान करायला शिकताहेत. असं नुकसान, हाच आमचा सगळ्यात मोठा फायदा आहे. ’ असं म्हणत वडलांनी आपला हात विश्वासच्या डोक्यावर ठेवला आणि विश्वासने आपले डोके त्यांच्या खांद्यावर ठेवले.

मूळ कथा – ‘ नुकसान ‘  

मूळ लेखक -सीताराम गुप्ता, दिल्ली.

अनुवाद – उज्ज्वला केळकर

☆ (३) अनोखी पद्धत ☆

‘काय चाललाय काय तुझं अंकित?’

‘काही नाही ग… ’ त्याने रेवाचं बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला

‘सारखा सारखा मागे पडतोयस. ’ रेवाच्या बोलण्यात तक्रारीचा सूर होता.

‘येतोय ना!’ अंकित पुन्हा म्हणाला.

‘ओहो…. मोठ्या मुश्किलीने बरोबर फिरायला म्हणून बाहेर पडलो. माझ्याबरोबर चल ना!’ रेवा काही बोलणं सोडत नव्हती.

‘अग, येतोय ना!’

‘आता बागेची, रस्त्याची साफ-सफाई पण तुम्हीच करणार का?’

‘हं…. ’ अंकितने जमिनीवरचे कागदाचे तुकडे उचलत म्हंटलं.

‘आता चार तुकडे झाडीत पडून राहू देत नं! सफाईचा तर तुला जसा मॅनिया आहे. ’

रेवा वैतागली.

‘ही काही सफाई नाही. ’ अंकित म्हणाला.

‘मग काय आहे?’

‘सफाई नाही तर काय आहे अंकित? मी आत्ताच पाहीलं, जमिनीवरून उचललेले ते कागदाचे तुकडे तू आपल्या बॅगेत भरलेस….. कुणाचं प्रेमपत्र मिळालं की काय? मला तरी सांग. ‘ रेवाने चिडवले.

‘तसंच समज. ’ अंकितने संक्षिप्त उत्तर दिलं.

‘कसला विचार करतोयस?’

‘ये. स्कूटरवर बस. ’ यावेळी रेवा काही न बोलता स्कूटरवर मागे बसली.

दहा मिनीटानंतर अंकित एका घरापुढे थांबला आणि दारावरची बेल वाजवली. दोन-तीन वेळा बेल वाजवल्यावर दरवाजा उघडला गेला.

‘बोला, कुणाला भेटायचय?’

‘रमेशजी… ’

मीच रमेश…. बोला. काय काम आहे?’

‘या १२ एप्रील २०१५ आणि १६ नोहेंबर २०१८च्या पावत्या आपल्याच आहेत?’

‘अं… हो. पण आपल्याकडे कशा आल्या?’

‘आणा. एक हजार रुपये आणा. ’

‘साहेब, हा माझ्यासाठी कचरा आहे. आपणच ठेवून घ्या. ‘ रमेश काहीशा बेफिकीरीने म्हणाला.

‘मग कचरा गाडीत टाकायचं सोडून आपण हा कचरा झाडीत का फेकलात?’

‘काय म्हणायचय आपल्याला?’ रमेश चिडून म्हणाला.

आपलं ओळखपत्र दाखवत अंकित म्हणाला, ‘मी नगर निगमाचा स्वच्छता अधिकारी अंकित राव!’

मूळ कथा- अनूठा तरीका   

मूळ लेखिका – सुश्री मधूलिका सक्सेना  

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दीनु… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ दीनु… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

दिनुचा काही वेळ जात नव्हता. रोज आपलं सकाळी उठायचं.. बाहेर एक चक्कर मारुन यायचं.. येतांना बीडीचं बंडल घेऊन यायचं.. खायचं.. प्यायचं.. आणि बीडीचं ते बंडल संपवायचं. नातवाशी खेळायचं.. सुन पुढे ठेवील ते खायचं.. बस्स.. दुसरं आयुष्यच नव्हतं त्यांचं.

आयुष्यभर दिनुने सुतारकाम केलं. गावात एका जुन्या वाड्यात भाड्याच्या खोलीत तो रहात होता. आजुबाजुला सगळे जुने वाडे. कोणाकडे ना कोणाकडे काही तरी काम निघायचंच. आणि त्या वेळी हमखास आठवण यायची ती दिन्याची.

हो.. दिन्याच. त्याला कधी कोणी दिनकर म्हणून हाक मारलीच नाही. दिनकर नाही.. आणि दिनु पण नाही. तो सगळ्यांचा दिन्याच होता. कुणाकडे काही काम असो.. नसो.. दिनु आपला हत्यारांची पिशवी घेऊन.. तोंडात बीडी ठेवून सकाळी बाहेर पडणारच. गल्लीच्या कोपळऱ्यावर असणाऱ्या चहाच्या टपरीवर जाऊन उभा रहाणारच.

पण आता ते सगळं संपलं होतं. दिनुचा एकुलता एक मुलगा आता एका कंपनीत नोकरी करत होता. जुन्या वाड्यातली खोली कधीच सुटली होती. पोरानं गावाच्या बाहेर एक छोटंसं रो हाऊस घेतलं होतं. तळमजल्यावर बापासाठी एक सेपरेट रुमही होती. साठी उलटुन गेली होती. आता फक्त आराम.. आणि आराम. आणि तेच दिनुला नको झालं होतं. 

आज समोरच्या बाजुच्या एका रो हाऊस मधुन वेगवेगळे आवाज येत होते. हातोडीचे.. ड्रीलींगचे.. लाकुड कापण्याचे.. त्या आवाजांनी दिनुची तगमग वाढली. कपाटावर ठेवलेल्या हत्यारांच्या पिशवी कडे सारखी नजर जात होती.

काढावी.. का न काढावी.. अश्या विचारात असतानाच त्याने ती पिशवी खाली ओढलीच. ओढताना ती खाली पडली.. आणि धप्प असा आवाज झाला. त्या आवाजानेच बाहेर खेळणारा नातु आत आला. त्यानं पाहीले.. आपले आबा..‌ म्हणजे.. आजोबा त्या पिशवीतुन काही काही बाहेर काढताहेत.

त्यानं कधी ती हत्यारं पाहीलेलीच नव्हती. कुतुहलाने तो आपल्या आबांजवळ गेला. “आबा..काय आहे हे?”

दिनुला असा प्रश्न विचारणारं कोणीतरी हवंच होतं. त्याला आयताच चांगला श्रोता मिळाला. तो सांगु लागला.. “अरे ही पिशवी.. ही हत्यारं म्हणजे माझं सर्वस्व आहे. ही करवत.. हा रंधा.. ही हातोडी.. बघ.. बघ.. आता कशी गंजुन चाललीय. या हत्यारांना माझा घाम.. माझं रक्त लागलंय..”

दिनु बोलत होता.. आणि नातु ऐकत होता.. त्याला काही समजत होतं.. बरंचसं समजत नव्हतं.. दिसत होते फक्त आपल्या आबांचे पाण्यानं भरलेले डोळे.

“जा बरं.. एका वाटीत पाणी घेऊन ये..” दिनुनं असं सांगताच नातवानं एका वाटीत पाणी आणलं. दिनुच्या अंगात आता उत्साह संचारला. त्यानं धार लावायचा दगड पिशवीतुन काढला. मग पटाशी घेतली. दगडावर पाणी टाकुन तो पटाशीला धार करु लागला.

तल्लीन होऊन तो पटाशी घासत होता. नातु जरा वेळानं कंटाळून बाहेर निघून गेला. दिनु कितीतरी वेळ ते काम करत होता. आता त्या गंजलेल्या पटाशीचं रुप बदललं होतं. एकदम चकचकीत.. धारदार.. दिनुनं त्या पात्यावरुन हळुच बोट फिरवलं.. तर बोटातुन टचकन एक रक्ताचा थेंब आला. दिनुला त्यांचं काहीच वाटलं नाही.. वाटला असेल तो आनंदच.. मनासारखी धार झाल्याचा.

मग त्याच मुडमध्ये त्याने हातोडी घासली.. करवतीचे एक एक त्रिकोण घासले.. हत्यारं ठेवलेली ती ताडपत्रीची पिशवी रिकामी करुन झटकली. लाकडाचा भुसा.. बारीक तुकडे बाजुला काढले.. त्यातल्या चुका.. खिळे.. स्क्रु.. असंच काहीसं कामाचं असलेलं वेगळं काढलं.. पुन्हा पिशवी भरून ठेवली.

त्याच्या बापानं त्याला एक गोष्ट सांगितली होती.. काम असो.. नसो.. रोज हातोडी स्वच्छ करायची.. पटाशीला धार करून ठेवायची. ही हत्यारं म्हणजे आपली लक्ष्मी.. तिच्यावर गंज चढु द्यायचा नाही.. तिला स्वच्छ ठेव.. तुला काम मिळत राहील.

आणि या गोष्टीचं प्रत्यंतर इतक्या लवकरच येईल ही अपेक्षा दिनुनं केलीच नव्हती. दुपारी पिशवी काढली.. हत्यारांची साफसफाई केली.. आणि रात्री पोरांनं बापाला विचारलं.. “आबा.. ते आपल्या वाड्यात शिंदे रहायचे आठवतात का?”

“हा.. माहीत आहे ना.. आता ते शिंदे साहेब झालेत.. त्यांचं काय?”

“काही नाही.. त्यांच्या बंगल्यावर काही किरकोळ काम होतं. आज सहज भेट झाली.. तर विचारत होते.. दिनकर काम करतो का म्हणून.”

“मग? तु काय सांगितलं?”

“विचारतो म्हटलं. बऱ्याच वर्षात त्यांनी काम केलेलं नाही.‌. जायची इच्छा आहे का तुमची? होईल का काम तुमच्याकडून आता?”

“जाईन ना मी.. तेवढाच माझाही वेळ जाईल बघ.”

आणि मग दोन दिवसांनी दिनु शिंदे साहेबांच्या बंगल्यावर गेला. नवीनच बंगला होता, फर्निचर पण सगळं नवीनच होतं.. पण बरीच किरकोळ कामं बाकी होती. कुठे हुकस् लावायचे होते.. फ्रेम लावण्यासाठी काही खिळे ठोकायचे होते.. बरीच कामं होती. आणि या अश्या छोट्या कामांसाठी शिंदे साहेबांना कोणी माणूस मिळत नव्हता.

दिनुनं सगळी कामं अगदी मनापासून केली. कामात दिवस कसा गेला हेही त्याला कळलं नाही. संध्याकाळी कामं आटोपली. दिनुनं आपली सगळी हत्यारं गोळा केली.. पिशवीत भरली.. शिंदे साहेबांनी खुशीने त्याला त्याची मजुरी दिली.. चहापाणी झाला.. आणि दिनु बाहेर पडला.

शिंदे साहेबांचा बंगला तसा रोडपासुन बराच आत होता. ‌बरंच अंतर चालायचं होतं.. खिशातुन त्यानं बीडीचं बंडल काढलं. त्यातली एक बीडी ओठात धरुन त्यानं काडी लावली‌. एक खोलवर झुरका मारला. दिवसभराच्या कामानं आलेला शिणवटा थोडा कमी झाला.. हातात जड पिशवी होती. त्या पिशवीत असलेली करवत.. वाकस.. पटाशी.. अंबुर.. हे सगळे त्यांचे जीवाभावाचे सोबती. आजचा पुर्ण दिवस त्यांचा सोबत गेला होता.. 

खिळे ठोकतानाचा तो ठोक ठोक आवाज.. लाकुड कापताना अंगावर उडालेला भुसा.. पटाशीने उडवलेल्या ढलप्या.. या सगळ्यांनीच त्याला आपलं तरुणपण आठवलं होतं. पुर्वीसारखं.. पुर्वीइतकं काम आता आपण करु शकणार नाही हेही त्याला माहित होतं.. पण आजच्या कामामुळे त्याला एक गोष्ट लक्षात आली.. आपण अजुनही काम करु शकतो.. 

काम करुन दिनुचं शरीर जरुर थकलं होतं.. पण मन मात्र खुपच टवटवीत झालं होतं. संपत आलेलं बीडीचं थोटुक पायाखाली दाबत तो मोठ्या आनंदात घराच्या दिशेने निघाला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांगून ठेवते… भाग-३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ सांगून ठेवते… भाग-३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(कारण आम्हा सर्वांवर तिचं अपरंपार प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच ती सारं काही समजून घेईल, निराश होणार नाही.) आता पुढे — 

आज ना उद्या तिला सांगावच लागेल आता उशीर नको. परवाच बायको म्हणाली, दादींना कसं सांगावं समजत नाही. त्या स्वयंपाक घरात येतातच. म्हणतात इतकी काही मी आजारी नाही. एवढे जपू नका मला. आण ती कणीक.मळून  देते.”

“आम्ही काही बोललो तर दादींना वाईट वाटेल. दुःख तर सर्वांनाच होतं आहे. हे असं नकोच  होतं व्हायला. पण आता लवकरच तुम्ही…”

मला बायकोचं बोलणं फारसं आवडलं नाही.  तीव्र वेदना जाणवली पण मग वाटलं तिचं तरी काय चुकलं?

मी खिडकीतून बाहेर पाहिलं. दादी गंगीच्या गोठ्यात होती. गंगीला  हिरवा चारा भरवत होती, गंगीच्या फुगलेल्या पोटावर ती हात फिरवत होती, तिला गोंजारत होती. दादी गोठ्यातून बाहेर येऊन निंबोणीच्या पारावर बसली. आणि मी तिच्याजवळ गेलो. संध्याकाळची शांत वेळ होती. कोण कुठे कोण कुठे होतं. आजूबाजूला सारीच शांतता. हालचाल नव्हती. कसली वर्दळ नव्हती. आसपास कोणीच नव्हतं. इतके दिवस मी तिला जे सांगायचं ठरवत होतो ते आताच सांगूया. हीच योग्य वेळ आहे असं मनाशी ठरवून मी तिच्या जवळ गेलो.

“ दादी..”

पण आताही दादीच म्हणाली,” बाबू! या गंगीची मला काळजी वाटते रे! या खेपेस तिला फार जड जाईल असं वाटतेय्.  एखादा चांगला डॉक्टर बोलाव. हातीपायी  नीट सुटका झाली पाहिजे रे तिची. जनावरांनाही दुखतं  बरं..

सांगून ठेवते.”

दादीला सगळ्यांची काळजी.घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून ते गाई गुरांपर्यँत ती अशी प्रेमाने बांधलेली आहे.ती आमचा खांब आहे.

मी उठलो, घरात आलो आणि मला तीव्रतेने जाणवलं की मला जे दादीला सांगायचं ते मी कधीही सांगू शकणार नाही. ते धाडस माझ्यात नाही. ती शक्ती माझ्यात नाही. पण असं काही होईल का की दादीचं दादीलाच समजेल. तिची तीच माझ्याजवळ येईल आणि म्हणेल,” एवढी काय काळजी करतोस बाबू ?चल ही बघ मी तयार आहे. केव्हा निघायचं ?आणि बरी झाल्यावर परत येणारच आहे की मी. असं समज  मी इतके दिवस कुठेतरी तीर्थयात्रेला गेले आहे त्यात काय एवढं ?”

असं झालं तर किती बरं होईल? साराच प्रश्न चुटकीसरशी सुटेल. सारं काही हसत खेळत सामंजस्यांनी होईल. कुठेही किल्मिष उरणार नाही. गढूळपणा असणार नाही.

धाकट्या भावाचा बाळ आज फार रडतोय. तसा संध्याकाळी तो किरकिर करतोच पण आज जरा जास्तच रडतोय, कळवळतोय. दूध घेत नाही, पाणी पीत नाही. काहीतरी दुखत असेल त्याचं. जोरजोरात हमसून हमसून रडतोय. त्याचं ते रडणं आणि आकाशात पसरणारे गडद नारंगी लाल रंग! विशाल आकाशात चमकणारा एकच तारा कसा भकास एकाकी वाटतोय! असा एकुलता एकतारा दिसला की मनातली इच्छा बोलून दाखवावी ती पुरी होते म्हणे.पण आज मनातल्या साऱ्या इच्छा अशा कोळपूनच गेल्या आहेत. मन निमूट बंद झाले आहे. सारे प्रवाह थंड झालेत, गोठलेत.

दादी घरात आली आणि तिने पटकन रडणाऱ्या बाळाला जवळ घेतलं, कुरवाळलं, त्याच्या हाता, पायावरून पोटावरून, गोंजारलं, त्याच्या गालाचे खारट पापे घेतले, त्याला छातीशी धरलं मग एक पाय दुमडून तिनं  त्याला मांडीवर उपडं ठेवलं,थोपटलं .बाळ हळूहळू शांत झाला. झोपी गेला.

दादीची आणि बाळाची ती जवळीक पाहून माझ्या छातीत चर्र झालं! एक भीती दाटून आली. तीच भीती.. त्याच आकाराची, त्याच रंगाची.

थोड्या वेळाने मला माझ्या डोळ्यासमोर काही दिसेना. पांढऱ्या पांढऱ्या लाटा, काळे काळे ठिपके, त्यावर हळूहळू पसरत जाणारा अष्टवक्री एक जीव भयाण, भेसूर.

दादी नसेल तर या घराचे या परिवाराचे काय होईल?दादी आमच्या कणाकणात सामावलेली आहे.

सकाळ झाली. हळूहळू घर जागं झालं. व्यवहार सुरू झाले, नेहमीचेच. अण्णाही उठले होते, आज बंब अण्णांनीच तापवला. दादी अजून उठली नव्हती. हल्ली तिला सकाळी झोप लागते. आम्हीही तिला उठवत नाही. परवाच म्हणाली,” अरे या गोळ्यांनी मला कशी गुंगी येते रे! बधिर वाटतं, जीव घाबरतो माझा, झोपावसं वाटतं.”

आज गंगीही खूप हंबरत होती. तिचेही दिवस भरलेत. कालच दादी म्हणाली त्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरला आणावं लागेल.

माझ्या टेबलवर श्री देशपांडे यांचं पत्र पडलेलं होतं. जिथे दादीला पाठवायचं होतं त्या संस्थेच्या संचालकाच पत्र होतं ते. मी ते पत्र हातात घेतलं, उलट सुलट केलं आणि मला काय वाटलं कोण जाणे मी ते फाडून टाकलं. तुकडे तुकडे केले आणि कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले. दादी  कुठेही जाणार नव्हती. दादी कुठेही जाऊन चालणार नव्हतं. दादी शिवाय आम्ही जगूच शकणार नाही.

हा आवाज माझ्या मुलीचाच होता. आजी शिवाय तिला करमतच नाही. जोरजोरात ती आजीला उठवत होती. “आजी उठ ना ग! त्या बदामाच्या झाडावर बघ एक वेगळाच पक्षी आलाय. तुर्रेवाला. आणि त्याचे पंख तरी बघ किती रंगाचे.. पिवळे निळे लाल ,.इतका छान गातोय.. आजी उठ ना, चल ना तो पक्षी बघायला. लवकर उठ ना आजी. नाहीतर तो उडून जाईल. आजीss आजीss “

मग आम्ही सारेच आजीच्या खोलीत गेलो.ँंंं

‘दादी’.

तिची गोरी पान तांबूस चर्या. ठसठशीत बांधा. त्यावर उठून दिसणारे तिचे गोठ, पाटल्या, एकदाणी.

शांत  झोपली होती ती. तिचे ओठ किंचित काळसर होऊन विलग झाले होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला पुन्हा एकदा वाटले जगातील साऱ्या भावभावनांना छेदून जाणारी तिची ही शांत मुखचर्या!  जणू बंद ओठातून ती म्हणतेय् “ अरे बाबू! केव्हांच ओळखलं होतं रे मी सारं. मिटवली ना मी तुझी काळजी? सोडवला ना मी तुझा प्रश्न? सुखी राहा रे बाबांनो! सांगून ठेवते..”

माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी आले. भोवती साराच कल्लोळ! दादीss दादीss दादीss

दादी आमच्यातून निघून गेली. अशी सहज, शांतपणे. तिचं प्रेम, वात्सल्य, अपरंपार अजोड, उपमा नसलेलं. तिच्या सामंजस्याला कुठे तोडच नाही. मी तिचे ताठरलेले पाय धरले,

“नाही ग दादी! तू आम्हाला हवी होतीस. सगळ्यांना खूप खूप हवी होतीस,सतत, सदैव आमच्याच सोबत. तू तर आमच्या जीवनाचा कणा होतीस.”

गोठ्यात गंगी हंबरत होती. बदामाच्या झाडावर पक्षी अजून गात होता…

— समाप्त — 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांगून ठेवते… भाग-२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ सांगून ठेवते… भाग-२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(तो संपूर्ण बरा होऊ शकतो. फक्त अवधी फार लागतो. कदाचित तीन—चार— पाच वर्षेही लागू शकतात. घरातील लहान मुले आणि इतरांचा विचार करता दादीला तुम्ही…”) – इथून पुढे —

डॉक्टर जसजसे बोलत होते तस तसे माझ्या नसानसात ठोके घणघणत होते. मी पार ढेपाळून गेलोय्  असं वाटत होतं.  एखादा जुना वृक्ष कडकडून कोसळतोय, नाहीतर दूरच्या त्या पर्वताचा कडाच तुटून घरंगळत खाली येतोय असं भासत होतं.

डॉक्टरांनी माझ्या पाठीवर हात ठेवला होता,” मी तुझी मानसिक स्थिती समजू शकतो. समाजात या रोगाबद्दल अजून खूप गैरसमज आहेत. तो अनुवंशिक आहे,  संसर्गजन्य आहे वगैरे वगैरे.”

पण मी दादीला घरी घेऊन आलो तेव्हा अगदी विचित्र मनस्थितीत होतो.  आमच्या कुटुंबावर आलेलं हे एक धर्म संकटच वाटलं मला.  मी याच समाजाचा एक घटक होतो आणि त्या अनुषंगानं माझ्याही मनात एक अनामिक भय दाटलं होतं.  एकीकडे दादीवरचं अपार प्रेम तर, दुसरीकडे स्वतःचच हित, स्वतःच स्वास्थ, प्रतिष्ठा वगैरे.  खरोखरच काय बरोबर, काय योग्य, काहीच सुचत नव्हतं. आमच्या कुटुंबाचा कणाच डळमळीत झाला होता.

दादीची मात्र गडबड चालूच होती.

“ काय म्हणाले डॉक्टर ?इतका का तुझा चेहरा उतरलाय? आणली आहेस नाही औषधं? मी घेईन हो ती वेळेवर, जरा सुद्धा टाळणार नाही बघ.”

“ दादी ही औषधं तुला बरीच वर्ष घ्यावी लागतील. घेशील ना?”

एवढेच मी कसंबसं म्हणालो.

“ काय झाले  आहे मला?तो  कॅन्सर झालाय का? मरणार आहे का मी?”

मग मात्र दादीला मी कडकडून मिठी मारली.” नाही ग दादी तसं काहीच झालेलं नाही तुला. तू मरणार नाहीस. पण  “

पुढे माझे ओठ उघडलेच नाहीत. मग तिनेच माझ्या केसातून मायेने  हात फिरवला. दादीचा तो मायेचा स्पर्श अजून मला माझं लहानपण आठवून देतो.

“ तू असाच रे बाबा! हळवा लहानपणापासून. पायात बोचलेला काटा हि कुणाला काढू द्यायचा नाहीस. कसा रे तू? चांगली आहे मी. बरीच होईल मी. मला काय झालंय?”

पण त्या दिवशी दुपारभर ती झोपून होती. पोटाशी पाय दुमडून. आज ती खरंच थकलेली वाटत होती त्या सर्व वैद्यकीय चाचण्यांमुळे., कुठे कुठे टोचलेल्या सुयांनी ती बेजार झाली होती. तिच्या अंगावर शाल पांघरली तेव्हा वाटलं दादीने काही पाप केले का? या जन्मी नाही तर मागच्या जन्मी? पाप पुण्याचे हे भोग बिचारीला अशा रीतीने चुकते करावे लागणार आहेत का?

नोकरा चाकरांना आठवणीने कामाच्या पसाऱ्यातही पटकन न्याहारी देणारी, कुणाला जास्त काम पडतंय असं वाटलं की पटकन पुढे जाऊन हातभार लावणारी दादी म्हणजे सगळ्यांचा आधार.

मंदाकाकी वारली तेव्हा तिच्या लहान लहान मुलांना रात्रभर धरून बसली. त्यांच्याबरोबर रडली पण आणि त्यांना समजावलं पण

एक मात्र होतं दादी तशी कंजूष  फार! कुणी पैसे मागितले तर पटकन देणार नाही.  फारच कोणी पाठ धरली तर हळूहळू कनवटी  सोडून एखादं  नाणं अगदी जीवावर आल्यासारखं हातावर ठेवेल.  भाजी बाजारात गेली तर घासाघीस करून भाजी  घेईल आणि प्रवासाला निघाली तर हमाल करणार नाही. जमेल तिथे पायी पायीच  जाईल, नातवंडांवर प्रेम करेल खूप पण कुणी कधी शेंगदाणे घेण्याचे म्हटलं तर म्हणेल ,”अरे !या पावसा पाण्याचे शेंगदाणे खाऊ नये. नरम असतात. पोट दुखेल.”

पण हा काय तिचा इतका मोठा अवगुण होता का की त्याची ईश्वराने तिला एवढी मोठी शिक्षा द्यावी. माझ्या मनाला आता एक चाळा लागलाय— दादी बद्दल चुकीचे, काही अयोग्य, काही दूर्वर्तनाचे शोधून काढायचा.

बऱ्याच वेळा दादी म्हणायची,” रुक्मिणी वहिनीवर फार अन्याय झाला रे आपल्या कुटुंबात. तिचा नवरा मेला.  पण तिचा हक्क होता ना इस्टेटीवर. तिला काही मिळू दिले नाही रे कोणी. कुणीच काही तिच्यासाठी करू शकलं नाही. अगदी मी पण नाही. शेवटी संपत्ती म्हटली की जो तो स्वार्थीस बनतो रे !सांगून ठेवते..”

पण त्या रुक्मिणी वहिनींचे शाप, तळतळाट एकट्या दादीलाच लागावेत का?

मग जो जो माझ्या मनात विचार येतात तो तो वाटतं की दादी वाईट नाहीच. कधी कुणाशी भांडत नाही, कुणाचा हेवा मत्सर करत नाही, कुणावर रागा करत नाही, नाही पटलं तर दूर होते, उगीच कलकल करत नाही, कुणाला वाईट शिकवत ही नाही.

समोरच्या माई आमच्याकडे नेहमी येतात. आल्या की त्यांच्या सुनेबद्दल सांगत बसतात. ही अशी ना ही तशी. “कधी नव्हे तर बेबी माहेरपणाला  आली पण ही स्वतःच माहेरी निघून गेली. शोभतं का हे? कधी तिच्या पोरांना हात लावणार नाही, त्यांच्यासाठी काही चांगलं चुंगलं बनवणार नाही. आपणच उठाव आणि आपणच करावं अशा वेळी.”

दादी मात्र  चटकन म्हणते,” बस कर ग! तुझंच चुकतंय. हे बघ मुली परक्या असतात  सुनाच आपल्या असतात. त्यांनाच पुढे आपलं करावं लागणार असतं. आणि  चांगली तर आहे तुझी सून. सगळं तर करते की नीटनेटकं.  गेली असेल एखादे वेळेस माहेरी. त्यांनाही मन असतं सांगून ठेवते..”

दादीच्या बोलण्यावर माई संतापतात, जाता जाता म्हणतात,” तुझं बरं आहे ग बाई. नक्षत्रासारख्या सुना आहेत तुझ्या. तुझी उत्तम बडदास्त ठेवतात, काळजी घेतात.”

मग माईंच्या डुलत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत दादी किंचित हसते.  हसताना तिचे ओठ विलग होतात. भुवयांच्या मध्ये एक बारीक लाट उमटते.  तिच्या अशा चेहऱ्याकडे पाहिलं की मला असंच वाटतं की जगातल्या साऱ्या भाव-भावनांना छेदून जाणार  तिचं  हे कणखर  मुकेपण आहे. 

भावना, व्यवहार आणि वास्तववादाच्या वेगवान झोक्यावर माझं मन हिंदकळत आहे. आपण करतोय ते बरोबर आहे का ?आपण स्वार्थी तर नाही? तिने आम्हाला लहानच मोठं केलं. आमच्या सुखदुःखाशी ती तन्मयतेने एकरूप झाली. ज्या कुटुंबासाठी तिचं अंत:करण तिळतिळ तुटलं त्यातून तिला निराळं करणं, अगदी तांदळातल्या खड्यासारखं वेचून बाजूला करणं हे माणुसकीच तरी आहे का? हेच आमच्या बाबतीत कुणाला झालं असतं तर ती अशी वागली असती का? देह, मन एक करून ती आमच्या पाठीशी उभी राहिली असती. तिच्यात प्रचंड सामर्थ्य होतं, मग आपण एवढे थिटे का? आपल्या मनात हे भय का? केवळ स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या सुखासाठी! असेच नव्हे का? आपली भक्ती, श्रद्धा, इतकी लुळी आहे की दादीच्या सहवासात राहण्याचं सामर्थ्य आपल्यात असू नये? आपण दादीची पाठवणी करायला निघालो, तिला दूर ठेवायला तयार झालो.

पण मग मन पुन्हा वास्तवतेचा किनारा गाठतो. यात अयोग्य काहीच नाही आणि हे काही कायमस्वरूपाचं नाही. ही योजना फक्त काही वर्षांसाठीच आहे आणि ती दादीला नक्कीच मान्य होईल  कारण आम्हा सर्वांवर तिचं अपरंपार प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच ती सारं काही समजून घेईल, निराश होणार नाही.

– क्रमश: भाग दुसरा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांगून ठेवते… भाग-१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ सांगून ठेवते… भाग-१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गेला संपूर्ण आठवडा मी दादीला जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते नीटसं जमत नाही मला. जे काही सांगायचे ते माझ्या एकट्यासाठीच नसून ते आमच्या कुटुंबाच्या वतीने तिला सांगायचं आहे. हे सारे दिवस मी माझ्या मनाशी वाक्यं जुळवत आहे, शब्द शोधत आहे. कुटुंबातली जबाबदार व्यक्ती म्हणून ही कामगिरी नकळतच माझ्यावर येऊन ठेपली आहे. पण आता समजतं आहे की हे काम सोपं नाही. मी जे तिला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर दादीची नेमकी प्रतिक्रिया काय होईल याचा अंदाज  मला नीटसा घेता येत नाही. कधी वाटतं तिला दुःख होईल, तिला आमच्या विषयी काय वाटेल? ती तळमळेल, कदाचित भांडेल, त्रागा करेल पण तरीही वाटतं तशी दादी समंजस आहे. मी जे तिला सांगेन ते ती शांतपणे नक्की स्वीकारेल.

एक दिवस दादी मला म्हणाली,” का रे बाबा! तुझा चेहरा का असा उतरलेला? कसली काळजी करतो आहेस? माझ्या आजारपणाची ?अरे मी औषधे वेळेवर घेते आहे ना? आणि हे बघ मला इतक्यात तर काहीच होणार नाही. मी खूप जगणार आहे. मला खूप जग  बघायचं आहे. तुम्हा सगळ्यांचं सगळं मी माझ्या हातानं माझ्या मनासारखं करणार आहे. सांगून ठेवते..”

मग मी काय बोलणार? काय सांगणार तिला ?

दादीचा गोरापान, तांबूस  कांतीचा चेहरा,ठसठशीत बांधा, देखणे अवयव, त्यावरचे खुलून दिसणारे गोठ, पाटल्या, एकदाणी आणि चापून चोपून नेसलेले स्वच्छ काठ पदरी लुगडे, आणि साऱ्या घरभर तिचे ते अविरत तुरुतुरु चालणे.

आमच्या कुटुंबावरच दादीचा केवढा मोठा प्रभाव आहे! खरं म्हणजे ती आहे म्हणूनच हे कुटुंब टिकले. आम्ही सारे भाऊ, आमच्या बायका, त्यांच्या विविध आवडीनिवडी, वेगवेगळे स्वभाव, इच्छा आकांक्षा, लग्न होऊन दूर गेलेल्या बहिणींचे माहेरी येणे जाणे, त्यांची मुलं आमची मुलं या सर्वांचा एक सुसूत्र समेट दादीमुळेच जुळून आलाय. तिच्या व्यक्तिमत्त्वातच असा काही चमत्कार आहे की सहसा तिच्यापुढे कुणीच जात नाही. या कुटुंबाची वीण तिने जुळवली आहे. त्यात तिच्या प्रेमाचे धागे अडकले आहेत.ती कुणाला बोलली, तिने कुणाला दुखावलं तर तेही हृदयात प्रेमाचा डोह साठवून.  आमच्या कुटुंबाचा दादी म्हणजे  एक मजबूत कणाच आहे. घरात भांडणं झाली, मतभेद झाले तर दादी गुपचूप ओट्यावर येऊन बसते नाहीतर गंगीच्या गोठ्यात जाऊन गंगीच्या पाठीवर हात फिरवत बसते. जणू तिला सांगते,” उगीच भांडतायेत हे. काही कळत नाही बरं त्यांना. तुला सांगून ठेवते.”

हं! फारच झालं तर निंबोणीच्या पारावर जाऊन वाती वळत बसते. पण कुणाचेही भांडण मिटवायचा प्रयत्न ती करत नाही. काही वेळ जातो, काही दिवस जातात पुन्हा कुटुंबाचा सुसूत्रपणा टिकून राहतो. दादी उगीच कुठेही ढवळाढवळ करत बसत नाही. कुणाची बाजू घेत नाही आणि कुणाला खडसावतही नाही. मात्र कधीतरी माझ्या बायकोला किंवा धाकट्या भावाच्या बायकोला म्हणेल,

“ का ग! आज गंगाफळाची भाजी केली आहेस ना मग बाबू काय जेवेल? त्याला आवडत नाही ती भाजी. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी कर हो .आण तो लसूण मी सोलून देते. लसुण, कांदा घालून केलेला लाल मिरचीचा ठेचा त्याच्यासाठी करून ठेव. सांगून ठेवते ..”

धाकट्या भावाच्या बायकोच्या पाठीवर हात फिरवून म्हणेल,” अगं !आपल्या नवऱ्याची काळजी आपणच घ्यावी. त्याला काय आवडतं काय नाही हे आपणच लक्षात ठेवावं. कंटाळा करू नये ग! असेल हो तुमची स्त्री मुक्ती नाहीतर नारी स्वातंत्र्य आणि ते काय समान हक्क. आता तुम्ही शिकल्या सवरल्या, पैसे मिळवता म्हणून तुम्हाला हे कळतं. तसच  वाटतं. पण खरं सांगू गंगा यमुना आटतील पण स्त्रीचे मन नाही बदलणार. ते असंच पिंगा घालेल बरं तिच्या घराभोवती तुला सांगून ठेवते.”

हे खरं की खोटं, योग्य की अयोग्य, जुनं की नवं हा संघर्ष नंतरचा. पण दादी जे बोलते ते तिला तसंच वाटतं म्हणून ती बोलते. तुम्हाला ते पटवून घेतलं पाहिजे असं नाही. तिची गुंतवणूक आणि तिचा अलिप्तपणा याचा संगम इतका सुरेख आहे की म्हणूनच आमच्या कुटुंबावर तिचा जबरदस्त पगडा आहे. एका अनामिक शक्तीने तिने हा डोलारा  सांभाळला . पाठीच्या कण्यासारखा .कदाचित ती आमच्यातून गेली.. ती नसली तर …. 

आणि मग जेव्हा जेव्हा माझ्या मनात आज तिला हे सांगायचं ,आता लवकरच हा निर्णय घ्यावाच लागेल असा विचार आला की वाटतं पण दादीला हे असं व्हावं का? दादी इतकी निर्मळ, निष्पाप, सेवाभावी, इतकी स्वच्छ टापटीपीची. ती आजारी झाली, तिचं दुखलं खुपलं  म्हणून ती कधीही निजून राहायची नाही. तिच्या कुठल्या कामात कसूर नाही. मग बाळाची आंघोळ असू दे, नातीची रिक्षा आली नाही तर घेईल दप्तर धरेल तिचं बोट आणि चालेल तुरुतुरु “चल ग बाई! घरात मीच रिकामी आहे, तुझी शाळा नको बुडायला. येताना रामाच्या मंदिरातही जाऊन येईन. नातही खुशच असते आजी बरोबर शाळेत जायला.

आणि वयाच्या या उतरणीवर अण्णांचं काही कमी करावे लागतं का तिला? त्यांचं गरम पाणी, दूध, नाश्ता अजून ती त्यांच्या बाबतीत सुनांना सांगत नाही. मोलकरणीच्या हातून धुतलेले धोतर त्यांना आवडत नाही म्हणून दादी त्यांचं धोतर स्वतःच्या हाताने धुते. किनारी सारख्या करून, काठाला काठ जुळवून अगदी परीटघडी सारखं त्यांच्या हातात ठेवते.

गेल्या वर्षीच अण्णांना एक सौम्यसा हृदयाचा झटका येऊन गेला. अण्णांना तिनं एखाद्या फुलासारखं जपलं. तिचा तो मूकपणा! कामाची लय! सेवेची तन्मयता अजोड होती. किती उपास धरले, किती नवस केले, किती पोथ्यांची पारायणं केली. दिवस-रात्र अण्णाजवळ बसून राहायची. औषधांच्या वेळा सांभाळायची. ते झोपले तर ती झोपायची. ते जेवले तर ती जेवायची. कधी अण्णांनी रडावं, धीर सोडावा, निर्वाणीची भाषा बोलावी मग कठोरपणे तिनेच त्यांना दटवावं.

“ अहो आम्ही तुमची इतकी सेवा करतोय तर तो ईश्वर काही डोळे झाकून ठेवेल का?”

त्या दिवसात मी तिला म्हणायचोही “अग! दादी जरा स्वतःकडेही बघ. कशी दशा झाली आहे तुझी आणि घरात करणारे आहोत ना आम्ही?  उद्या तुलाच काही झालं तर?”

मग दादी चष्मा काढायची, पदराच्या टोकांनी  शिणलेले डोळे पुसायची आणि माझ्याकडे नुसती बघायची. तिच्या नजरेतील भाषाच जगातल्या सर्व भाव-भावांना छेदून जाते असंच मला वाटायचं .

अण्णा बरे झाले, हिंडू फिरू लागले मग दादीचं मन  निवारलं. ती हसू लागली, बोलू लागली, सुनांना हाका मारू लागली. 

आज मला वाटतं— जग कितीही पुढे जाऊ दे, कुठलंही युग येऊ दे, सुधारणांचं, नवमतवादाचं पण व्यक्ती व्यक्तीच्या मनात जे पाप-पुण्याचे संकेत टिकून आहेत ते तसेच अचल राहणार. जेव्हा डॉक्टरने म्हणाले,” दादीला हे असं व्हावं याचं मलाही आश्चर्य वाटतं. पण त्याला आता इलाज नाही. शिवाय आता वैद्यकीय शास्त्र पुढे गेलय्. औषधही खूप आहेत आणि लेप्रसी  हा रोग तसा असाध्य नाही. तो संपूर्ण बरा होऊ शकतो. फक्त अवधी फार लागतो. कदाचित तीन—चार— पाच वर्षेही लागू शकतात. घरातील लहान मुले आणि इतरांचा विचार करता दादीला तुम्ही…”

– क्रमश: भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print